सण हे चंद्रावर अवलंबून आहेत.आणि ऋतू हे सूर्यावर अवलंबून आहेत.आपल्या कालगणनेत चांद्र आणि सौर पद्धतीचा उत्तम असा मेळ घातलेला आहे. या गणितावरुन येणारा जास्तचा जो महिना असतो तो म्हणजे “अधिक मास” व कमी झालेला जो महिना असतो त्याला “क्षयमास” असे म्हटले जाते.
सूर्य एका राशीमधे असताना. जर दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला, तर पहिला येणारा महिना जो असतो तो अधिकमास असतो व दुसरा तोच असणारा महिना हा
निजमास असतो.
ज्या चांद्रमहिन्यात सूर्याचा राशीबदल होत नाही तो अधिकमास .
या आधिक मासात ३३ या संख्येला विशेष महत्व (प्राधान्य) आहे.
अधिक महिन्याचा आणि ३३ अंकांचा संबंध काय?
तर एका चांद्रवर्षात ३६० तिथी असतात.
आणि एका सौर वर्षात ३७१ तिथी असतात.
म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा ११ तिथीने लहान आहे.
आता प्रत्येक वर्षात ११ तिथी जर कमी झाल्या. तर ११ या संख्येप्रमाणे तिन वर्षात ३३ तिथी कमी होतात.
आणि ३३ तिथी ज्या कमी होतात. त्या कमी तिथींचा योग्य मेळ बसावा म्हणून एक महिना हा वाढीव धरण्यात येतो. आणि त्या वाढीव येणाऱ्या महिन्यालाच
अधिक महिना (अधिकमास, धोंडामास) म्हणतात.
दोन अधिकमासात कमीतकमी २७ महिने व जास्तीतजास्त
३४ महिने अंतर असते.
आता अधिकमासात कोणती कर्मे करावीत ? कोणती कर्मे करू नयेत ?
तर अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावीत म्हणजेच नामकरण, अन्नप्राशन इत्यादी कर्मे करावी. परंतू देव प्रतिष्ठापना, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांत, गृहारंभ इत्यादी कर्मे करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे.
अधिकमासाला पुरुषोत्तममास असे का म्हणतात ?
याविषयी एक कथा सांगितली जाते. अधिकमासाला धोंड्यामहिना,अथवा मलमास असेही म्हटले जाते.
या महिन्यात शुभ कार्ये केली जात नाहीत. फक्त नैमित्तिक कार्येच होतात. याचे या अधिकमासाला खूप वाईट वाटले. म्हणून एकदा हताश, निराश,दु:खी
झालेला अधिकमास हा श्रीविष्णूंकडे गेला
व आपली निराशा सांगितली
श्रीविष्णूने अधिकमासाला श्रीकृष्णाकडे पाठवले.
श्रीकृष्णाने मात्र अधिकमासाचे स्वागत करुन त्याचे “पुरुषोत्तम मास”
असे नांव ठेवले. आणि सांगितले हा सर्वोत्तम मास आहे. लोक या महिन्यात जास्त दानधर्म करतील. व त्या मुळे हा मास पुण्यकारक मास म्हणून ओळखला जाईल.
म्हणून याला अधिकमास अथवा ‘ पुरुषोत्तममास ‘ असे नांव प्राप्त झाले.
अधिकमासात ‘ विष्णूपूजनाला प्राधान्य आहे. तसेच अपूप दान ‘ देण्याची पद्धत आहे. अपूप म्हणजे जाळीदार पदार्थ. उदा.
(अनारसे, बत्तासे, मेसूर)
वेदकालातही
“न पूयते विशीयंति” इति -अपूप ‘ असे वर्णन आहे.
गहू किंवा तांदूळाच्या पिठात तूप व गूळ मिसळून केलेला विशेष पदार्थ (अपूप) म्हणजे “अनरसा”
अधिकमासात ३३ अनरशांचा नैवेद्य विष्णूला अर्पण करावा. व ३३ अनरसे दान करावेत असे सांगण्यात आले आहे.
विवाह समारंभात कन्यादानाचे वेळी जावई व मुलगी यांना विष्णू व लक्ष्मी स्वरुप मानून माता,पिता त्यांना नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णूसमानच असतो.
म्हणून विष्णूरुपी जावयाला ३३ अनरसे दान देण्याची पद्धत पडली आहे.
किती महिने अधिक येतात?
सूर्याच्या भासमान गतीमुळे ठराविकच महिने अधिक येतात.
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे ९ महिने अधिक येतात.
मार्गशीर्ष व पौष हे २ महिने क्षयमास होतात.
राहिला उर्वरीत माघ महिना. हा मात्र कधीच क्षय किंवा अधिक होत नाही.
आता क्षयमास म्हणजे काय?
कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्य दोन राशीत प्रवेश करतो. तो क्षयमास असतो.
आणि एक क्षयमास आला की त्यावर्षी दोन अधिकमास येतात.
संदर्भ– श्री दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक.
संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ चांगुलपणाची शिक्षा… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
(घरात किंवा एखाद्या कार्यक्रमात उरलेलं अन्न तुम्ही गरीबांना दान म्हणून देणार असाल, तर त्यापूर्वी हे आवर्जून वाचावे !)
साधारण महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मी राहतो त्या चौकापासुन काही अंतरावर एक लहान गल्ली आहे त्या गल्लीतल्या अपार्टमेंट मधुन राहणारे बरेचसे भाडेकरू I.T. मध्ये काम करणाऱ्यांपैकी आहेत. त्यांच्यापैकीच सुरज हा एक माझा मित्र आहे. मुळचा सोलापूरचा असणारा हा तरुण अभियांत्रिकीची पदवी मिळवून आता नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाला आहे.
अविवाहित असल्यानं तो आणि त्याच्याच कंपनीतील अजून दोघे असे फ्लॅट भाड्याने घेऊन राहतात. एखाद्या रविवारी सकाळी चहाच्या निमित्तानं आम्ही अधुन मधुन भेटत असतो. अशाच एका सकाळी चहाच्या कपासोबत त्याने ऐकवलेला हा अनुभव.
..
“शनिवारी रात्री आमची जोरदार पार्टी झाली होती. घरमालकाच्या कडक सुचना असल्यानं आमच्या पार्ट्या घराबाहेरच साजऱ्या होतात. रात्री बऱ्याच उशिरा आम्ही आटोपतं घेतलं. अन्न बरंच शिल्लक राहिलं होतं, काही काही पदार्थांना तर अक्षरश: हात सुद्धा लावलेला नव्हता. अन्न वाया घालवणं माझ्या जीवावर आलं होतं, त्या मुळे मी त्यांना पार्सल करून देण्याची विनंती केली. रात्री खूप उशिरा आम्ही फ्लॅटवर परत आलो. मी आल्या आल्या सर्व अन्न फ्रीजमध्ये ठेवुन दिलं आणि झोपायला गेलो. दुसऱ्या दिवशी जाग आली तेव्हा सकाळचे अकरा वाजले होते, दोन्ही मित्र अजूनही घोरत होते. मला चहाची खूप तलफ आली होती पण चहा बनवून घ्यायचा कंटाळा आला होता, दूध विकत आणण्यापासून तयारी होती.
असेच जाऊन खाली चौकातल्या टपरीवर चहा घ्यावा आणि परत येताना दूध घेऊन यावं असा विचार करून मी शॉर्ट्स आणि टी शर्ट वर बाहेर पडलो. चांगला एकाला दोन कप कडक चहा झाल्यावर थोडं बरं वाटलं.
..
मग जरा आजुबाजुला लक्ष गेलं, टपरी चौकातच असल्यानं गर्दी बऱ्यापैकी असते आणि गर्दी असते म्हणून मग भिकारीही बरेच असतात. असाच एक हडकुळा, गालफडं बसलेला, एका हाताने फाटक्या शर्टचा गळा घट्ट आवळुन धरलेला एक वयस्कर भिकारी माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि दीनवाणेपणाने काहीतरी पुटपुटत एक हात पुढं केला. मी शक्यतो पैसे देत नाही पण बऱ्याचदा जुने पण धडके कपडे, वापरात नसलेल्या वस्तु वगैरे देत असतो. त्याला पहाताच मला फ्रीजमधल्या अन्नाची आठवण झाली. आम्ही तिघांनी खाऊन सुद्धा बरचसं उरलं असतं एवढं अन्न शिल्लक होतं. त्यातील त्याला थोडंसं द्यावं म्हणुन मी त्याला विचारलं, त्यानंही मान डोलावून होकार दिला. मग पुढं मी आणि माझ्या मागुन रखडत्या पावलांवर तो असे फ्लॅटजवळ आलो. त्याला फाटकाबाहेरच थांबवून मी आतुन अन्नाची काही पॅकेट्स प्लॅस्टिकच्या पिशवीतून आणली आणि त्याच्या हातात दिली. त्यानं एकवार त्याच्याकडं पाहीलं आणि कृतज्ञतेने दोन्ही हात जोडुन मला नमस्कार केला. आणि त्याच रखडत्या चालीने हळू हळू निघून गेला. मलाही हातुन एक चांगलं काम घडल्याचं समाधान वाटलं.
..
पाहता पाहता रविवार संपला आणि दुसऱ्या दिवशीचे वेध लागले. माझी सकाळची ९ वाजताची ड्युटी असते त्यामुळं मी आठ वाजताच घरातुन बाहेर पडतो. अंघोळ आटोपुन आरश्यासमोर भांग पाडत असताना कसला तरी आरडाओरडा आणि गोंधळ माझ्या कानावर पडला. काय झालंय ते पहावं म्हणुन मी दार उघडुन बाल्कनीमधून खाली डोकावून पाहिलं. सोसायटीच्या गेटबाहेर झोपडपट्टीतल्या असाव्यात अश्या वाटणाऱ्या आठ दहा स्त्रिया आणि सात आठ पुरुषमंडळी वॉचमन समोर कलकलाट करत हातवारे करत होती. मी बाल्कनीतुन खाली पहात असताना त्यांच्यातील एकाचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि तो माझ्याकडे बोट दाखवून काहीतरी ओरडायला लागला आणि मग सर्वच जण वरती पाहत गोंगाट करायला लागले.
..
मला कश्याचीच कल्पना नव्हती. तेवढयात वॉचमनने मला खूण करून खाली बोलावलं. दरवाजा लोटुन घेऊन मी खाली गेलो. त्या घोळक्यात तो कालचा भिकारीही दिसत होता पण त्याच्या आदल्या दिवशीच्या आणि त्या वेळच्या रूपात आता जमीन अस्मानाचा फरक होता. आदल्या दिवशी पुटपुटल्यासारखा येणार आवाज आता चांगला खणखणीत येत होता आणि कंबरेत वाकुन रखडत चालणारा म्हातारा आता चांगला दोन पायांवर ताठ उभा होता. मला समोर पहाताच त्यानं माझ्यावर एक बोट रोखुन अर्वाच्य शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली आणि मग बाकीचे लोकही ओरडु लागले.
..
मला नक्की काय घडतंय तेच कळत नव्हतं. अजून दहा पंधरा मिनिटे गोंधळ झाल्यानंतर मग मला असं सांगण्यात आलं की, मी आदल्या दिवशी दिलेलं अन्न खाऊन त्यांच्यातील एक लहान मुलगा आजारी पडला, त्याला दवाखान्यात न्यावं लागलं आणि त्यापोटी झालेला खर्च सात हजार रुपये हा मी द्यावा असं त्यांचं म्हणणं होतं.
..
ते ऐकून मी सर्दच झालो, वास्तविक तेच अन्न आम्हीही रविवारी दुपारी खाल्लं होतं आणि आम्ही ठणठणीत होतो. आता त्यांच्यातल्या बायका पुढं झाल्या आणि त्यांनी अक्षरश: मला चहूबाजुंनी घेरून शिव्यांचा दणका उडवला. एव्हाना अपार्टमेंट मधील प्रत्येक बाल्कनीतुन चेहरे डोकावून पहायला लागले होते. मला मेल्याहुन मेल्यासारखं झालं होतं. तोपर्यंत मित्रही खाली आले होते.
..
ते लोक सरळ सरळ आम्हाला लुटतायत हे कळत असुनही काही करता येत नव्हतं. आमच्या अगतिक अवस्थेची त्यांना कल्पना आल्यामुळं आता त्यांच्यातील पुरुष मंडळी आमच्या अंगाशी झटायला लागली. बहुतांशी लोकांच्या तोंडाला आंबुस वास येत होता. मी कशीबशी सुटका करून त्यांच्या घोळक्यातून बाहेर आलो आणि पोलिसांना फोन लावावा म्हणून फोन बाहेर काढला (इतक्या वेळ फोन बाहेर काढला नव्हता, न जाणो त्यांनी कदाचित हिसकावूनही घेतला असता.)
..
“काय करताय साहेब ?” मला वॉचमनने विचारलं. “पोलिसांना फोन करतोय” मी उत्तरलो. “काही फायदा नाही साहेब, या लोकांना काही फरक पडत नाही. उलट उद्या पुन्हा शंभरभर लोकं येऊन गोंधळ घालतील, तुम्ही कशाला दिलात त्यांना खायला?” वाॅचमन म्हणाला.
..
माझ्या चांगुलपणाची ही परिणीती पाहून मी हबकुन गेलो होतो. वॉचमन मराठी होता, माझ्याच जिल्ह्यातील होता. अखेरीस त्याने पुढं होऊन रदबदली केली आणि दोन हजारांवर सौदा तुटला. मी आणि माझ्या मित्रांनी निमूटपणे पैसे गोळा करून त्यांच्या हातात दिले तेव्हाच जमाव हलला.
..
माझ्या निर्णयाबद्दल मी क्षणोक्षणी पस्तावत होतो.
हल्ली मी उरलेलं अन्न फक्त कुत्र्यामांजरांनाच खाऊ घालतो किंवा चक्क फेकुन देतो. आणि गंमत म्हणजे तो म्हातारा भिकारी अजूनही मी दिसलो कि निर्लज्जपणे फिदीफिदी हसत माझ्यापुढे हात पसरतो “दादा, द्या काही गरिबाला पोटाला !”
..
माझ्या चांगुलपणापायी झालेली हि शिक्षा माझ्या नेहमीच स्मरणात राहणार आहे”
..
ता. क. हल्ली पुण्यात तरी हा धंदा जोरात सुरू आहे असं दिसतं. आदल्या दिवशी शिळं पाकं अन्न घेऊन जायचं, अन दुसऱ्या दिवशी अख्खी वस्ती आणुन राडा करायचा. दिवसाला सात आठ हजार रुपयाला मरण नाही.
लेखक : अज्ञात
संग्राहिका : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आज 30 जानेवारी,. गांधीजींची पुण्यतिथी. स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या अनेक स्वातंत्र्यसेनानींपैकी महात्मा गांधी ह्याचं नाव अग्रस्थानी घेता येईल.आपल्या आधीची पिढी जास्त भाग्यवान. त्यांनी अशा अनेक थोरपुरूषांची कामगिरी स्वतः बघितली, जवळून अनुभवली.आमच्या पिढीपासून बाकी सगळ्यांना त्यांची थोरवी वाचून त्यांची महती कळली.मात्र आमच्या पिढीपासून कोणाला पारतंत्र्याची झळ पोचली नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी ह्यांच्या अहिंसा, सत्यवचन,द्रुढनिर्धार ह्या गुणांपैकी सगळ्यात जास्त मला भावलेला गुण म्हणजे त्यांचे सत्यवादी असणे.
कधी आपण आपल्या स्वतः च्या भुमीकेसाठी स्वतःच्या नजरेतून योग्य असतो,तेव्हा कदाचित दुसऱ्याच्या नजरेतून आपण चुकीचे असतो.पण आपले अंतर्मन आपल्याला सत्य सांगत असते फक्त ती स्विकारण्याची आपल्यात ताकद हवी.खूपदा आपण आपल्या चूका मनातल्या मनात कबूल करीत असतो पण ती जगासमोर मांडण्याचे धारिष्ट्य आपल्यात नसतं.आणि इथेच आपल्या सारख्या सामान्य माणसापेक्षा ह्या सत्यवादी महापुरूषाचे वेगळेपणं उठून दिसतं.
अगदी कधीही वेळात वेळ काढून महात्मा गांधींचे आत्मव्रुत्त म्हणजेच “सत्याचे प्रयोग”हे पुस्तक वाचा.त्यात त्यांच्या हातून घडलेल्या चूका त्यांनी नुसत्या सांगितल्याच नव्हे तर पुस्तकात छापून जगजाहीर केल्या आहेत.सहसा केलेल्या चूका लपविणारी खूप माणसे बघितली पण आपल्या चूका कोणाला माहीत नसूनही पुढच्या कित्येक पिढ्यांसमोर जगजाहीर होतील हे समजून उमजून देखील पुस्तकांत छापणारा अवलिया आगळावेगळाच.
गांधीजींवरील पु. ल. देशपांडे ह्यांनी लिहिलेले पुस्तक पण खुप वाचनीय. वाचले नसेल तर जरूर वाचा एवढच म्हणेन.
खरोखरच अशा वेगवेगळ्या गुणांच्या छटा असलेले अनेक थोरपुरूष या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झटले,लढले म्हणून आजचा हा स्वातंत्र्यात असलेला सोनियाचा दिन आम्हा लोकांना दिसतोय.अशा ह्या सगळ्या थोरपुरूषांना आमचे कोटी कोटी प्रणाम.
☆ “आनंदाचे डहाळी आनंदी सदन” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
अगं वेडे स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच बरं… झाडांच्या फांदीवर थाटलयं छोटसं घरकुल खरं… नाही लागायचा उन्हाचा ताव तो, वारा विसरून गेला आपण कसा बोचकारतो… पावसाच्या सरी सुता सारख्या एका लयीत छपरावर पाडतो…पिल्लांची काळजी आता नको करायला… एकदाच दिवसभर भटकून आणले अन्न तर पुन्हा पुन्हा नको जायला…. घरकुलात आता आनंद आनंदी भरुन भरून राहिला… किलबिलाटाचे संगीत लागेल वातावरणात घुमायला… रात्रीच्या चांदण्यात पानांची रुपेरी चमचमताना आनंद किती होईल बघायला… असं वाटतयं आला फिरूनी पुन्हा सळसळता तारुण्याचा जोष… घ्यावा लपेटून तुला मला तो गुलाबी थंडीचा मधुकोष… किती दिवसाची होती ती मनाला वेडी वेडी आस… असावे सुंदर सुंदर घरकुल आपले खास… इतके दिवस काडी काडी जमवून संसार केला फिरत्या रंगमंचावर…किती गावांच्या वेशी ओलांडल्या नि सारख्या झाडांच्या माड्या बदलल्या…सुखाचा संसार पसाभरच पसरला…अर्धा कष्टात नि अर्धा निवारा शोधण्यात गुंतला… ते कुणीसं सांगुन गेलयं नां भगवान के यहाॅं देर है लेकिन अंधेर नही.. अगदी बघ पटलयं… आयुष्याच्या उताराला का होईना पण स्व:ताचं हक्काचं घरकुल मिळालयं…पिल्लांना आकाशाने केव्हाचं आव्हान दिलयं… पंखातलं बळ अजमावयाला एकट्याने उंच उंच विहार करून दाखव म्हणून सांगितलयं… गेली सारी उडून क्षितिजावरून.. आणि आपण दोघचं उरलो आता या मोठ्या घरात… सोबतीला कुणी असावं असं वाटतयं या सरत्या वयात.. तसा तर योग कुठे असतो आपल्या घराचा.प्रत्येकाच्या नशिबात… बोलवूया त्यां निराधारानां देऊया मायेचा तो आसरा.. लाभेल आपल्याला द्विगुणित आनंद खरा खुरा… जाताना हे सारं आहे का नेता येणार… माघारी आपली आठवण कायमची त्यांच्या स्मृतीत राहणार… अक्षय आनंदाचा झरा असाच वाहता राहणार…
— संत तुकडोबांची ही कविता मनात ‘घर’ करून राहिली आहे.
असा विचार मनात आला आणि घर या शब्दानेच मला घेरले. डोक्यात घरघर चालू झाली. नक्की घर म्हणजे काय? कवितेत महाल ,झोपडी ही दोन्ही सुद्धा घराचीच रूपे आहेत ना?
मग घर म्हणजे काय? रहाण्याची सोय केलेली, ऊन वारा पाऊस यांपासून रक्षण करणारी एक हक्काची जागा?
तसेच सगळे प्रांत, राज्ये पाहिले की लक्षात येते प्रांत बदलला की घराची ठेवणही बदलली जाते. मग हे घर बैठे घर, इमारत, बंगला, झोपडी,फ्लॅट,महाल कोणत्याही स्वरुपात असो.
मन थोडे मागे गेले आणि आजीची आठवण झाली. आजी म्हणायची घर ही फक्त जागा नसून ती एक संस्कारांची संस्था असते.
तिच्या या विचारांचा विचार करता करता घर म्हणजे••• मनात घरच उभे राहिले.ती नेहमी म्हणायची ती कविता आठवली श्रीराम बाळकृष्ण आठवले यांची
☆ ते माझे घर…. ☆
ते माझे घर! ते माझे घर! ।।ध्रु.।।
*
आजी आजोबा वडील आई
लेकरांसवे कुशीत घेई
आनंदाचा बरसे जलधर! ते माझे घर! ।।१।।
*
कुठेहि जावे हृदयी असते
ओढ लावते, वाट पाहते,
प्रेमपाश हा अतीव सुखकर! ते माझे घर! ।।२।।
*
भिंती खिडक्या दारे नच घर
छप्पर सुंदर तेही नच घर
माणुसकीचे लावी अत्तर! ते माझे घर! ।।३।।
*
परस्परांना जाणत जाणत
मी माझे हे विसरत, विसरत
समंजसपणा समूर्त सुंदर! ते माझे घर! ।।४।।
*
मन मुरडावे, जुळते घ्यावे
सुख दुःखाना वाटुन घ्यावे
भोजन जिथले प्रसाद रुचकर! ते माझे घर! ।।५।।
*
ज्योत दिव्याची मंद तेवते
शुभं करोति संथ चालते
श्रीरामाची ज्यावर पाखर! ते माझे घर! ।।६।।
*
बलसंपादन गुणसंवर्धन
धार्मिकतेची सोपी शिकवण
अनौपचारिक शाळा सुंदर! ते माझे घर! ।।७।।
– श्रीराम बाळकृष्ण आठवले
आजीचा अशा घर संस्थेवर विश्वास होता आणि ती तेच संस्कार आमच्यावरही रुजवत होती.
याच विचारांना धरून तिने घराची संकल्पना अगदी स्पष्ट केली. घर म्हणजे एका कुटुंबातील सगळेजण एकत्र राहून आपुलकी जिव्हाळा जपतील अशी जागा.
तिने घरासाठी लागणार्या सर्व बाबींचा अर्थ नीट समजावून सांगितला.
घर म्हणजे त्यासाठी प्रथम लागते ती हक्काची जागा. हीच जागा जी आहे ती कोणाकडून हिसकाऊन घेतलेली बळजबरी करून ताब्यात घेतलेली नसावी तर आपुलकीच्या भावनेने तयार केलेली असावी. आणि ती म्हणायची आपुलकीच्या जागेतील राग लोभ द्वेषाचे खाचाखळगे प्रेम जिव्हाळ्याने लिंपून घरासाठी पक्की जमिन तयार केली पाहिजे.
त्यानंतर कुटुंबातील मोठे सदस्य यांच्या एकोप्याने घराच्या भिंती उभारल्या पाहिजेत. या भिंतीतून आत बाहेर करायला संस्कृती सकारात्मकता यांचे दार असायला हवे.
आनंद सुख प्रेम यांची हवा खेळती रहाण्यासाठी घराला भरपूर खिडक्या असाव्यात याच खिडक्या नातवंडे पतवंडांचे रूप घेतलेल्या असाव्यात . घराला आशिर्वाद संस्कार यांचे शिकवण देणारे छप्पर पाहिजे. हेच छप्पर आजी आजोबा किंवा त्या पेक्षाही मोठ्या पिढींचे असावे.
घरात माणुसकी रांधता यावी म्हणून घरातल्या स्त्रीला लक्ष्मीचे रूप देऊन तिच्या समाधानाकडे लक्ष देऊन तिच्या मनासारखे छानसे स्वयंपाकघर असावे. तिथे तिने प्रेमाने रांधलेले अन्न हे प्रसादाचे रूप घेत असते.
मनातील सगळे विकार धुवून टाकायला ते इतरांच्या दृष्टीसही नको पडायला म्हणून केलेला एक आडोसा अर्थात न्हाणीघर / बाथरूम असावे. तिथेच सगळ्यांनी आपापली मने साफ केली की आपोआप प्रसन्नता येते.
दिवसभर कामे करून सगळेच दमले की शांततेच्या अंथरुणावर तृप्ततेची झोप येण्यासाठी सगळ्यांच्या मायेची गोधडी पांघरायची, उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने एकमेकांच्या कुशीची उशी करून पहायची आजीने त्यासाठी केलेल्या प्रार्थनेच्या अंगाईत सगळ्यांना उर्जा प्रदान करणारी निद्रादेवी प्रसन्न व्हावी म्हणून समाधानाचे निद्रास्थान / बेडरूम असावे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे सगळे ज्या जागेत घडणार आहे त्या जागेवर लक्ष ठेवण्यासाठी , कृपादृष्टी घर आणि घरातील प्रत्येक सदस्यासाठी असावी म्हणून खास निर्माण केलेले देवघर तर हवेच!! हो ना?
आजीने सांगीतलेला हा अर्थ खरेच मनात घर होऊन राहिला आहे पण••• कालौघात घरापासून विभक्त व्हायला लागते आणि स्वतंत्र घर बांधायला लागते. तिथे आजीच्या संकल्पनेनुसार जमीन नसते तर एकमेकांच्या डोक्यावर बसायला जणू एकावर एक अशी जागा असते. नुसत्या भिंती उभ्या रहातात पण एकोपा आणायला चार जण तरी कुठे असतात? मग यांच्या भिंती समांतर उभारतात••• एकत्र कशा येणार?आपल्या मर्जीप्रमाणे जगताना सकारात्मकतेचे दार कोठून येणार? मग फक्त घरातील वस्तु सुरक्षीत ठेवण्याची सोय म्हणून दार बनते.
मुलांची खिडकी निर्माण झाली तरी आई वडिल कामाला जाणारे मुलांवर शिक्षणाचा बोजा पाळणाघराचे संस्कार मग आनंद सुखाची हवा येणार कोठून?
मोठ्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवल्यावर आशिर्वादाचे छप्पर लाभणार कसे?
घरातील स्त्रीच प्रचंड तणावाखाली वावरत असेल तर ती माणुसकी रांधणार कशी? तिच्या हातच्या खाण्याला प्रसादाची सर येणार कशी?
शॉवर,शॅंपू साबण ई अनेक सोयींनी युक्त बाथरूम असले तरी नाही निर्मऴ जीवन काय करील साबण या उक्तीप्रमाणे मन साफ होईल कसे? इतरांना त्याची बाधा होऊ नये असे असले तरी मुळात तेच साफ नसले तर दुसर्याला त्याची बाधा होणारच ना?
उद्याची चिंता डोक्यात ठेवली तर एसी पांघरायला मऊ ढोर(?) अंथरायला प्राण्यांच्या किंवा कृत्रीम फरचे बेड, असे सुसज्ज बेडरूम असूनही झोप येत नाही म्हणून झोपेच्या गोळ्या घेऊनही आढ्याला नजर लावूनच रात्र घालवायची?
आधुनिकतेच्या नावाखाली जागा अडते म्हणून किंवा देव काय करणार असेच मनात घेऊन कुठेतरी टांगलेले देव घरावर कृपादृष्टी ठेवणार?
प्रश्नांनी मनात दाटी केली आणि खरच घर असावे घरासारखे, घरात असावीत घराला घरपण देणारी माणसे, अशा कितीतरी विचारांनी एकत्र घराची ओढ निर्माण झाली.
घर असावे घराची ओढ निर्माण करणारे आकाशाला हात टेकू नयेत म्हणून विचारांची उंची लाभलेले तरी जमीनीवर घट्ट पाय रोवलेले, घराचे दार नेहमी आपल्या माणसांची वाट पहात नेहमी उघडे असलेले स्वागतासाठी स्नेहाच्या अंगणात काळजीच्या सड्यावर सौख्याच्या रांगोळीने सजलेले•••
☆ “माझ्या मनांतील राम” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर☆
22 जानेवारी 2024 हा ऐतिहासिक दिवस म्हणून संपूर्ण विश्वात नोंदवला गेला. पाचशे वर्षापासून प्रलंबित असलेले राममंदिर अखेर पूर्ण होऊन त्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनमोहक, सुहास्यवदन, राजीव लोचन असलेली रामलल्ला बालमूर्तिची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.या अशा एका ऐतिहासिक क्षणाने दाखवून दिले आहे की धर्म आणि श्रध्दा कधीही तसूभर कमी होत नाही.सत्य आणि न्याय यांचाच विजय होत असतो.
ज्याला शब्दरूपी चित्रित केलं महर्षी वाल्मिकींनी, ज्याला मोठ्या कौतुकाने, प्रेमानं गायलं तुलसीदासांनी, समर्थांनी ज्याला आळवलं असा प्रभू श्रीराम, ज्याने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, रावणाचा तसाच कित्येक राक्षसांचा वध केला असा प्रभू श्रीरामचंद्र, सृष्टीवरच्या अवघ्या जीव-जंतुना ज्याने कृतार्थ केले आणि करत राहतो असा प्रभू श्रीरामचंद्र. कित्येक जणांनी त्यावर लिहिलं, गायलं, चित्रित केलं, त्यावर लिहिण्याचा, त्याचा नाम गाण्याचा, त्याच रूप चितरण्याचा तसा कित्येक माध्यमातून अनेक प्रकारे अनुपम आनंद लुटला, तरी तो नेहमीपेक्षा फार फार वेगळा उरतो. त्याच्या नामाची ओढ खुणावत राहते, रूपाची माधुरी भुरळ घालत राहते. दरवेळी नव्याने…
ज्याची तुलनाच होऊ शकत नाही अस सौंदर्य, पराक्रम, कृपा, असणारा प्रभू श्रीरामचंद्र तो मुळी दिसतोच रामासाररखा…
अनेक संत, महात्मे, भक्तांच्या मांदियाळीने ही रामकथा ओघवती प्रवाही नि जीवंत ठेवली. त्यात तुलसीराम, एकनाथ भागवत, समर्थ रामदास, गोंदवलेकर महाराज या सारखे अनेक रामभक्तांचं अपूर्व योगदान आहे.श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर तर अनेक ग्रंथ पूर्वीपासून उपलब्ध आहेत आणि आजही त्यात नव्याने भर पडत असतेच.आजच्या काळाशी, समाजमनाशी, त्यांच्या जीवनव्यवहाराशी सुसंगत जोडली जाते.ते अभ्यासक, लेखक, संशोधक, प्रवचनकार, कीर्तनकार, प्रभूर्ती आपआपले विचार जेव्हा मांडतात तेव्हा तुमच्या आमच्या जीवनाला एक निश्चित आयाम, दिशा मिळून जाते.इतकच नाही तर त्या प्रभावाने काही वेळा तर जीवनाची दिशा सुध्दा बदलते.आता माझीच बदललेली पहाना…
सर्वसामान्य माणसांप्रमाणेच मी देखील सर्व षड्ररिपुयुक्त, शीघ्रकोपी, संयमाचा अभाव…तरी बर्यापैकी वाचन, मनन, असून मन अशांत, अस्वस्थ राहिले होते. एक दिवस सद्गुरुंच्या दर्शनाचा योग आला, त्यांच्या सानिध्यात असताना श्री प्रभू रामचंद्रांच्या जीवनातल्या अनेक घटनां ते सांगताना म्हणाले,
“सात हजार वर्षानंतरही रामाचे स्मरण केले जात आहे, कारण त्यांनी हजारो पिढ्यांपासून लोकांना चांगुलपणा जोपासण्यासाठी, सत्याला धरून राहण्यासाठी आणि एकमेंकासोबत प्रेमाने राहण्यासाठी प्रेरित केले. रामाचे जीवन आपत्तींची एक शृंखलाच होती. तरी देखील तो अविचल राहिला. त्याने कधीही कोणत्याही परिस्थितीत त्याच्या आत राग, संताप, किंवा द्वेष येऊ दिला नाही. राम जगात कृतीशील होता, लढाई देखील लढला, त्यात त्याने हेच दाखवून दिले. त्याच्या याच गुणापुढे आपण नतमस्तक आहोत.म्हणूनच त्याला एक अतिशय श्रेष्ठ मनुष्य, ‘मर्यादा पुरोषत्तम’ म्हणतो, देव म्हणत नाही.त्याचे गुण असे आहेत की तुम्हाला त्याचा आदर करावाच लागेल . तुम्ही सुध्दा तुमच्या जीवनात असे होऊ शकलात, तर तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. ही एक अशी संस्कृती आहे जिथे कोणीही स्वर्गातून उतरले नाही, जिथे मानव दैवी बनू शकतो. कुठेतरी एक देव आहे जो आपल्या सगळ्या गोष्टींची काळजी घेईल.या ढोबळ विश्वास प्रणालीपासून मनुष्यानी स्वतःच्या मुक्तीसाठी प्रयत्न करण्यासाठी आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हीही मर्यादा पुरुषोत्तम व्हाल. राम आणि रामायण भारतीय परंपरेचे अविभाज्य भाग आहेत. ही अशी एक संस्कृती आहे जिने मुक्तीला सर्वोच्च महत्व दिले आहे. याचा अर्थ जिवंत असताना सर्व गोष्टीपासून मुक्त होणे.तुम्ही रोजच्या जीवनातून माघार घेतली आहे असे नाही, तुम्ही सक्रिय आहात पण मुक्त आहात, तुम्ही संरक्षित कोषामध्ये नाही.’
कालपर्यंत रामायाणातील ढोबळ कथानक ऐकून नि वाचून माहीत असलेल्या माझ्या मनाला या सद्गुरूंच्या आश्वासक विचारांनी मोहिनी घातली नाही तरच नवल.माझ्यासारख्या कैक दिशा भरकटलेल्या युवकांना देशापुढे असलेली आव्हाने पेलण्याची शक्ति आणि बुध्दी श्रीराम देवो.राष्ट्रधर्म, कर्तव्य, नेतृत्व, संवेदनशीलता,
स्वपराक्रम, स्वाभिमान याबाबत तत्वाला मुरड घालून क्षणिक लाभासाठी स्वत्व पणाला लावण्याचा धोका पत्करत असेल, तर तेथे श्री.रामांच्या प्रामुख्याने वनवास काळातील जीवनाचा अभ्यास, युवा पिढीला योग्य मार्गावर आणू शकेल हा माझ्या मनातल्या रामाने दिलेला संदेशच आहे असच म्हणायला हवं.
कुठेतरी वीज कडाडली.त्या आवाजाने शहारुन अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं.पावसाचा जोर खूप वाढला होता.सकाळपासूनच तो वेड्यासारखा कोसळत होता.सकाळी रितेश आँफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता पण आतासारखं त्याचं स्वरुप रौद्र नव्हतं म्हणून तर रितेशला तिने अडवलं नव्हतं.सात वाजले होते.थोड्याच वेळात रितेश येणार होता.रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता.’
आई बाबा आले नाही का गं?”छोटी पाच वर्षांची प्रिया बाहेर येवून विचारत होती.अंजली भानावर आली.”
नाही अजून. येतील थोड्याच वेळात.तुझा अभ्यास झाला?”
मान डोलावत प्रियाने आपल्या हातातली वही तिच्यासमोर केली.एक ते दहा अंक लिहायचे होते.ते तिने व्यवस्थित लिहिले होते.
“आई देवाघरी जाणं म्हणजे काय गं?”तिच्या शेजारी सोफ्यावर बसत अचानक प्रियाने विचारलं.अंजली चमकली.
“का गं कुणी काही म्हंटलं का?”
” हो.ती आर्या आहे ना आमच्या क्लासमध्ये. तिचे बाबा देवाघरी गेले म्हणून ती आज आली नव्हती.”
अंजली अवघडली.त्या लहानग्या जीवाला काय सांगावं ते तिला सुचेना.शेवटी तिने खरं सांगायचं ठरवलं.
” बेटा आपण जन्म घेतो.मोठे होतो.शेवटी वय वाढलं की आपल्या सर्वांना मरण येतं.मरणं येणं म्हणजेच देवाघरी जाणं”
“हो पण मरणं म्हणजे काय?” प्रियाने निरागस चेहऱ्याने अजून एक गुगली टाकला.
” मरण म्हणजे आपलं आयुष्य संपणं.आपण मेलो की आपण नंतर कधीही कुणाला दिसत नाही.तू मोठी झाली की तुला सगळं व्यवस्थित कळेल.चल आता मला स्वयंपाक करु दे.बाबा येऊन फ्रेश झाले की आपण जेवायला बसू.”
लेकीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून तिला हसू आलं.पण तिचे प्रश्न लवकर संपणार नाहीत हे तिला अनुभवावरुन माहित होतं.प्रिया मग पुस्तक उघडून वाचत बसली.अंजली किचनमध्ये आली पण येतायेता प्रियाचा जन्म झाला तो दिवस तिला आठवला.मुलगीच झाली म्हणून सगळं घराणं नाराज होतं.कारणही तसंच होतं.तिच्या मोठ्या दिराला आणि नणदेलाही दोन्ही मुलीच होत्या.रितेशला तरी मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासुबाईंनी कितीतरी नवस कबूल केले होते.रितेशला स्वतःला मुलगाच हवा होता.तोच काय अंजलीच्या भावानांही मुलीच असल्याने आपल्याला तरी मुलगा हवा याची तिने स्वतःही स्वप्नं रंगवली होती.अर्थातच प्रियाच्या जन्मामुळे सर्वच नाराज होते.तिच्या सासुबाईंनी तर महिनाभर नातीचं तोंड पाहीलं नव्हतं.प्रिया मोठी झाली ,गोड दिसायला लागली.मग मात्र सर्वांची नाराजी कमी होत गेली.तिच्या बाललीलांनी आणि बडबडीने सर्वांना वेड लावलं.पण आता दुसऱ्यावेळी मात्र मुलगाच हवा असंच सगळ्यांचं म्हणणं होतं.
अंजलीचा स्वयंपाक झाला पण रोज सात वाजेपर्यंत घरी येणाऱ्या रितेशचा पत्ता नव्हता.पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिने ग्रुहित धरलंच होतं.पण सव्वाआठ झाले होते.प्रियाला भुक लागली असणार म्हणून तिने त्याला फोन लावला.बराच वेळ टूकटूक वाजत राहिलं .शेवटी फोन न लागताच बंद झाला.तिने लागोपाठ तीन चार वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता.शेवटी कंटाळून तिने प्रियाला हाक मारली.
“प्रियू.ये आतमध्ये आणि जेवून घे”
प्रिया आत आली आणि म्हणाली
” मी बाबा आले की जेवणार आहे”
“अगं वेडी आहेस का?बाहेर पाऊस सुरु आहे.त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. तू जेवून घे आणि झोप”
” नाही. मी बाबांसोबतच बसेन”
ती जणू हट्टालाच पेटली होती.
“बरं ठिक आहे.नऊपर्यंत वाट पाहू या.मग मात्र जेवून घ्यायचं हं मुकाट्याने”
प्रियाने मान डोलावली.
दोघीही हाँलमध्ये येऊन बसल्या.अंजलीने टिव्ही लावला.सिरीयलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती म्रुत्यु दाखवल्या जात होता.तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटू लागलं.तिने चँनल बदललं पण मनाची अस्वस्थता काही कमी झाली नाही.
“आई बाबांना खुप ऊशीर झाला ना?फोन कर ना त्यांना”प्रिया म्हणाली .तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर चांगलीच बैचेनी दिसत होती.अंजलीने मोबाईल घेऊन रितेशचा नंबर डायल केला पण मघासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतांनाच तिला एक कल्पना सुचली.रितेशचा मित्र प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता.तिने प्रकाशला फोन लावला
” भाऊजी हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाहिये.काही आँफिसचं महत्वाचं काम होतं का?” प्रकाशने फोन उचलल्यावर तिने विचारलं
“नाही तसं तर काही काम नव्हतं आणि रितेश तर साडेसहालाच आँफिसमधून बाहेर पडला.आतापर्यंत घरी पोहचायला हवा होता.मीसुद्धा आताच घरी आलोय.वाटेत खुप पाणी साचलंय.पण तुम्ही काळजी करु नका वहिनी. येईल तो.रस्त्यात कुठंतरी अडकला असेल”
” तुम्ही फोन करुन बघता का त्यांना?”
” हो करतो ना!आणि लगेच तुम्हांला अपडेट्स कळवतो”
“ओके.थँक्स” तिने फोन ठेवला
दहा मिनिट्स झाले पंधरा झाले तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला तेवढ्यात त्याचाच फोन आला
“वहिनी तीनचार वेळा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नाहिये. मला काय वाटतं आपण अकरापर्यंत थांबावं.मग नंतर मी कुणालातरी घेऊन त्याला पहायला जातो”
” भाऊजी पोलीस कंम्प्लेंट केली तर?”
” त्यासाठी आपल्याला सिटी पोलिस स्टेशनला जावं लागेल.एकतर सध्या जोरदार पाऊस सुरु आहे शिवाय ठिकठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत.त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणंच मुश्कील. दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहित नाही पण पोलिसही किमान चोवीस तास वाट बघायला सांगतात मगच तक्रार स्विकारतात.आपण असं करु उद्या सकाळी पोलिस स्टेशनला जाऊ तोपर्यंत वाट बघूया रितेशची “
“चालेल भाऊजी मी अकरा वाजता फोन करते तुम्हांला”
तिने फोन ठेवला तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली
“आई बाबा येतील ना गं?” तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती.
” हो गं बेटा.येतील.तू चल बरं जेवून घे आणि झोप.उद्या सकाळी शाळेत जायचंय ना?”
प्रियाने मान डोलावली
” पण मला भुक नाहिये.बाबा आल्यावर आपण एकत्रच जेवूया ना “
” नको.त्यांना उशीर झाला तर तू झोपून जाशील.आणि मग जेवणार नाहीस “
तिला ते पटलं असावं.म्हणून मग ती आईच्या मागे किचन मध्ये गेली.अंजलीने तिला वाढलं
“आई तू पण जेव ना!”
“नाही बेटा मी बाबांसोबतच जेवते तुला माहितेय ना?”
“हो”
प्रियाने जेवायला सुरुवात केली पण चतकोर पोळी खाऊन होत नाही तर ती म्हणाली
“आई बस झालं मला भुक नाहिये”
“अगं असं काय करतेस?तेवढी पोळी संपव तरी!रोज तर दोन पोळ्या खातेस.”
“नको ना आई प्लीज.मला खरंच भुक नाहिये”
“बरं चल.हात धू आणि झोप”
तिला बेडरुममध्ये झोपवून ती बाहेर हाँलमध्ये आली.परत तिने रितेशला फोन लावला पण तोच प्रकार पुन्हा घडला.मग तिने टिव्ही लावला.तिची आवडती सिरीयल सुरु होती पण ती बघण्यातही तिचं मन लागेना.नवरा करतो तशी चँनल वारंवार बदलून ती सर्फिंग करु लागली पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं.जरासा गाडीचा आवाज आला की तिचे कान टवकारायचे.टिव्ही म्युटवर करुन ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची.दोनतीनदा तर तिने दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं.पाऊस सुरुच होता.खरंतर पाऊस तिला खुप आवडायचा.रिमझिम पावसात तिला भिजायला खुप आवडायचं.पण आताचा पाऊस जीवन देणारा नसून जीवन हिरावून घेणारा होता.या पावसाने आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार कोसळणार होते.उभ्या पिकांना झोपवून टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं भंग पावणार होती.अर्थातच एरवी रोमँटिक वाटणाऱ्या या पावसाला आता मात्र ती मनातल्या मनात शिव्याच देत होती.
दहा वाजले.आता बेडरुममध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली तोच प्रिया बाहेर आली
“आई बाबा अजून आलेच नाही का गं?”तिने रडक्या आवाजात विचारलं
“नाही बेटा.पण येतील.तू जाऊन झोप”
” मला झोप येत नाहिये.बाबांचा फोन आला होता?”
“नाही. पण मला वाटतंय ते लवकरच येतील” आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता पण तीच्या समाधानाकरता ती बोलली.
प्रिया एकदम जोरजोरात रडायला लागली
“आई मला बाबांची खुप आठवण येतेय गं!”
अंजलीने तिला जवळ घेतलं
“अगं वेडाबाई इतकं रडायला काय झालं?अगं येतील बाबा”
“आई त्या आर्यांच्या बाबांसारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले?”
अंजलीला एकदम धक्का बसला.लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन तीही अस्वस्थ झाली
“चल काही काय बोलतेस.असं काही होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं बेटा.चल तू झोप बरं”
“नाही. मला झोप येत नाहिये. मला माझे बाबा पाहिजेत” ती अजुनच जोरात रडायला लागली
“हो पण तू रडल्यामुळे तुझे बाबा परत येतील का?चल आपण दोघीही झोपू”
तिला तसंच उचलून अंजली बेडरुममध्ये आली.तिला झोपवून थोपटू लागली.प्रिया अजून रडतच होती.थोड्या वेळाने तिचा आवाज कमीकमी होत गेला आणि शेवटी ती झोपली.ती झोपल्याचं पाहून अंजलीने स्वतः झोपायचा प्रयत्न केला.पण नाना शंका कुशंकांनी भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं.ती उठून हाँलकडे आली.वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिने हात जोडले.
” देवा काही चुकलं असेल तर माफ कर पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ देरे बाबा” तिने प्रार्थना केली.संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली.”आपणही ठेवावा का तसा?” तिला प्रश्न पडला.”नको.अजून तितकी वाईट वेळ आली नाहिये”तिने स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि ती हाँलमध्ये येऊन सोफ्यावर बसून राहिली. हाँलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही.बसल्याबसल्या रितेशचा हसरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला.त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या सहासात वर्षातले अनेक बरेवाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रितेश तसा चांगलाच होता.हसमुख होता,समजदार होता.पण आईवडिलांबाबतीत नको तेव्हढा संवेदनशील होता.त्यांच्यातले दोष दाखवलेले त्याला आवडायचे नाहीत.याचं कारणही तसंच होतं.रितेशला त्याच्या आईवडिलांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वाढवलं होतं.त्याची जाण रितेशला होती म्हणून तो नेहमी आईवडिलांची बाजू घ्यायचा.मग ते चुकीचे असले तरीही. त्यामुळे अंजलीला सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.
आज सकाळी लाऊडस्पीकरवर देशभक्तीची गाणी ऐकू येत होती . शाळेंच्या बक्षीस वितरणांचा कार्यक्रम , विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम , झेंडा वंदनाचा कार्यक्रम व नेत्यांची भाषणे ऐकू येत होती . त्यामुळे आज प्रजासत्ताक दिनाची जोरदार सुरुवात दरवर्षीप्रमाणे सुरु आहे हे कळत होते .
नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला निघालो होतो . सकाळची थंडी इतकी प्रचंड होती की दोनतीन कपडे, जॅकेट , कानटोपी , पायात वॉकींग शूज , अशा कडक बंदोबस्तात मी निसर्गात फिरत होतो . येताना गरमागरम जिलेबी आणायची म्हणजे 26 जानेवारी साजरी केल्यासारखे वाटते हा गोंडस विचारही मनात घोळत होता .
परत येताना नदीच्या किनारी जाऊन नंतर पुढे निवांत जावू असा विचार करून मी थोडी नेहमीची वाट बदलली . नदी किनारी आलो तर दोन निळ्या रंगाचे प्लास्टीक टाकून लाकडांचा आधार देऊन दोन तात्पुरत्या झोपड्या दिसल्या . पाच सहा उघडीनागडी चार पाच वर्षाची मुले एका चादरीवर लोळत पडलेली होती तर त्यातला एक सहा सात वर्षाचा मुलगा चाकूला धार करत होता .
मग त्याला हिंदीतून विचारले क्या करता है ? तर म्हणाला अभी रानडुक्कर मारनेको जाना है। इस लिए चाकू को धार करता हु.
इतक्यात दाढीवाला , मोठे केस सोडलेला बरेच दिवस अंघोळ न केलेला त्याचा बाप आला व निवांत बसला . क्या काम करते हो ? तर म्हणाला रानडुक्करे मारायची व खेडेगावात विकायची आमचा धंदा आहे . मग थोड्या गप्पा मारल्या त्यातून समजले अशा थंडगार हवामानात , झोंबणाऱ्या थंडीत नदीकिनारी एक दोन दिवस मुक्काम करायचा . रानडुक्कर मारायचे . दिवसभर त्यासाठी जवळपास रानोमाळ भटकंती करायची . रानडुक्कर मिळाले तर विकायचे नाहीतर निवांत पडी मारायची .
उघड्यावरच अंघोळी, उघड्यावर दगडाच्या चुलीवर स्वयंपाक, जंगलातील ओली सुकी झाडे शोधून बांधलेल्या उघड्या झोपड्या. त्याला कसलेही संरक्षण नाही. आयुष्याला कसलेही भविष्य नाही, पोरानां शाळा दफ्तरे नाहीत. कसली स्वप्ने, कसले अच्छे दिन, प्रजासत्ताक दिन म्हणजे काय? स्वातंत्र्य दिन म्हणजे काय? हे माहीत नाही.
त्याला सहज विचारले तुझे नाव काय ? तर म्हणाला रामजी . त्यांच्या मुलांची नावे तर खूप भारीभारीच होती . आता देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली . आपल्या देशाने तर खुप प्रगती केली .पाचशे वर्षानंतर रामाला घर मिळाले . अयोध्येत राममंदीर
बांधण्यासाठी किती हजार कोटी गेले व अजून जाणार आहेत याची गणतीच नाही . आजच कळाले तीन कोटी रुपये तर एका दिवसात भक्तांकडून दानपेटीत जमा झाले .
हातातली जिलेबीची बॅग रामजीच्या मुलानां दिली .त्यानां प्रजासत्ताक दिनाचे महत्व समजावत बसलो नाही . कारण जिलेबी खाताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद मला प्रजासत्ताक दिन साजरा केल्यासारखा वाटला .
या रामजीसारख्यांचा वनवास कधी संपणार ? त्यांच्या मुलानां शाळा दफ्तरे कधी मिळणार ? त्यांनां राहायला घरेदारे , पोटासाठी कामधंदा कधी मिळणार ? त्यांच्या बायकांनां ओल्या लाकडांची चुल जावून गॅसवर स्वयंपाक बनवायला कधी मिळणार ? त्यानां अच्छेदिन कधी येणार ?
पच्च्यांहत्तर वर्षात आपण किती प्रगती केली या विचारात ,देशभक्तीची गाणी मोठ्याने ऐकत मी परत निघालो . प्रजासत्ताक दिनाचा अर्धा दिवस आता संपला . . .
‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या नाटकाने प्रसिद्धीस आलेले प्रख्यात नाट्यकलावंत डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचा एक किस्सा शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज तुमच्यासोबत शेअर करतोय. ते व त्यांची पत्नी विजया जर्मनीला नाटकाच्या दौऱ्यानिमित्त गेले होते. दौरा आटोपून पुढच्या शहरात जाण्यासाठी ते फ्रँकफुर्ट विमानतळावर आले. तेथून त्यांना पुढच्या प्रवासाला जायचे होते. नेमका गडबडीत त्यांचा पासपोर्ट बॅगमध्ये सापडत नव्हता. खूप शोधाशोध सुरु होती. दोन-तीन वेळेस अनाउन्समेंट झाली. शेवटी विमानतळाचे काही अधिकारी त्यांना तुम्हाला जाता येणार नाही, असे म्हणू लागले.
त्यांच्यातील एका अधिकाऱ्याने त्यांना एक फॉर्म भरायला दिला. जर तुम्ही खोटा प्रवास केला असे सिद्ध झाले तर तुमच्याकडून दंड वसूल केला जाईल, अशा आशयाचा तो फॉर्म होता. त्या फॉर्मवर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप लिहायचे होते. त्या जागी त्यांनी ‘Teacher’ असा उल्लेख केला.
तो पाहताच क्षणार्धात तेथील वातावरण बदलले. तो अधिकारी कमरेत वाकून म्हणाला, “We Germans, Believe in two things. One is God..Another is Teacher! ते दोघेही खोटं बोलत नसतात.. मी परमेश्वराला दुखावले आहे. तुम्ही तुमच्या वतीने माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हणजे मी पापमुक्त होईन…” अशी अॅपॉलॉजी व्यक्त करीत त्या अधिकाऱ्यांने देशपांडे दाम्पत्याला थेट विमानात नेऊन बसविले.
प्रवासाच्या शेवटी देशपांडे दाम्पत्य मुंबईत आले. विमानतळावरील ग्रीन बेल्टमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. तेव्हा एका अधिकाऱ्याने त्यांना टोकले. तर दुसऱ्या अधिकाऱ्याने ते काय करतात, त्यांना विचार, असे फर्मान हाताखालच्या अधिकाऱ्यावर बजावले. यांच्या मनात टीचरची प्रतिमा उजळ झाली होती. त्यांनी ताठ मानेने आम्ही टीचर आहोत, असे सांगितले. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला तो वरिष्ठ अधिकारी ओरडून म्हणाला, ‘अरे वो फटिचर के पास क्या होगा? जाने दो उसे…’ वऱ्हाडकरांचे टीचर नावाचे विमान झटक्यात जमिनीवर आले.
कालांतराने ते औरंगाबादला गेले. काही दिवसांनी त्यांच्या घरी फ्रैंकफर्ट एअरपोर्टवरून एक टपाल आले. ज्यात आपण टीचर असतानाही आम्ही आपल्याला त्रास दिला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करणारे पत्र होते. देशपांडे यांना ते पाहून हसावे की रडावे ते कळेना.
संग्रहिका – श्रीमती उज्ज्वला केळकर
संपर्क – 17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र
मातीने त्याच्या नाजूक पाकळयांना जोजवत विचारलं, “काही त्रास नाही ना झाला ?”
सुकून गेलेल्या फुलाने देठापासून देह हलवण्याचा असफल प्रयत्न केला आणि पाकळयांनीच नाही म्हणून खुणावलं.
काही क्षण असेच गेले…
आपल्या कुशीत घेण्यास आतुर झालेल्या मातीने पुन्हा कातर आवाजात विचारलं, “झाडावरून गळून पडल्याचं खूप दुःख होतंय का ? फार वाईट असतं का हे सर्व ?”
म्लान पाकळ्यावर मंद स्मित झळकलं.
फुल म्हणालं, “निमिषार्धासाठी वाईट वाटलं..कारण झाडाशी, पानांशी, गुच्छातल्या सोबती फुलांशी, उमलत्या कळ्यांशी, ओबड धोबड फांद्यांशी आता ताटातूट होणार म्हणून वाईट वाटलं.
पण पुढच्याच क्षणाला आनंदही वाटला. जितका काळ झाडावर होतो तेंव्हा वारा येऊन कानात गुंजन करायचा, पाकळयांशी झटायचा, झोंबायचा… कधी त्याचा राग यायचा तर कधी त्याच्यासोबत अल्लड होऊन उडत जावं असं वाटायचं….. पण तेंव्हा मी झाडाचा एक भाग होतो त्यामुळे माझा एकट्याचा निर्णय घेण्यास मी स्वतंत्र नव्हतो… “
“तू आता स्वतंत्र झालास खरा, पण आता तू क्षणाक्षणाला कोमेजत चाललायस …. आता काय करणार ?” – मातीचा प्रश्न.
दीर्घ उसासा टाकत फूल म्हणालं, “आता वारा जिकडे नेईल तिकडे मी जाईन… वाऱ्यावर स्वार होऊन जीवात जीव असे तोवर जमेल तितके जग पाहून घेईन… मग एकेक पाकळ्या झडतील, देठापासून तुटून पडेन… पण जिथं अखेरचे श्वास घेईन तिथल्या मातीशी एकरूप होईन. त्या मातीचं एक अंग होऊन जाईन आणि तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईन, त्या बीजातून अंकुरलेल्या रोपा वर कोवळ्या फुलांचा एक टवटवीत गुच्छ असेल, माझं कर्म चांगलं असेल तर मीही त्या गुच्छात असेन !”
फुलाचं उत्तर ऐकून सदगदीत झालेल्या मातीने त्याच्या सुरकुतल्या पाकळयांचे हलकेच चुंबन घेतले.
काही वेळ निशब्द शांतता राहिली आणि पुढच्याच क्षणी मंद वाऱ्याची एक झुळूक आली आणि फुलाला त्याच्या अंतिम सफरीवर घेऊन गेली…
आपलं आयुष्यही असंच आहे…. आपलं जीवन ही तसेच – एक फूल आहे….
संसार कुटुंब आप्तेष्ट मित्र ही सगळी त्या झाडाची भिन्न अंगे. आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडल्या की कुणी स्वखुशीने त्यातून बाहेर पडतो तर कुणा कमनशिबींना परागंदा व्हावं लागतं.
मग सुरु होतो एका जीवाचा एकाकी सफर, जो आपल्याला आयुष्यातलं अंतिम सत्य दाखवून देतो.
… आयुष्यातली सत्कर्माची शिदोरी मजबूत असली की हा प्रवास सुसह्य असतो, इथं आपल्याला मदत करायला कुणी येत नसतं…. नियतीच्या वाऱ्यावर आपल्याला उडावं लागतं. आपणही असेच पंचतत्वात विलीन होतो आणि प्रारब्धात असलं तर जीवनाच्या पुष्पगुच्छात पुन्हा अवतीर्ण होतो !
…. स्वर्गाच्या दारात उभे असताना काही आठवणी उफाळून आल्या…
….जीवन सुंदर तर आहेच पण ते अर्थपूर्णही व्हावे !
लेखक : अज्ञात
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈