☆ ORS चे जनक डॉ. दिलीप महालानोबिस सुश्री योगीन गुर्जर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
आज आपल्याला अचानक अशक्तपणा आला , जुलाब वगैरे आजारामुळे शरिरातील पाणी कमी झाले तर डॉक्टर आपल्याला ORS– oral rehydration therapy– घ्यायला सांगतात. बाजारात सहज उपलब्ध असलेले पाच रुपया पासून लहान लहान पाकिट sachet आपण पाण्यात घोळुन पितो व दोन पाच मिनिटांत तरतरी वाटते .
आज जगभरात ORS वापरले जाते. या ORS चे जनक एक भारतीय डॉक्टर होते हे वाचून तुम्हाला धक्का बसेल.
ते आहेत प.बंगाल मधील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ दिलीप महालानोबिस.
डॉ दिलीप महालानोबिस हे एक भारतीय बालरोगतज्ञ होते, जे अतिसाराच्या आजारांवर उपचार करण्यासाठी “ओरल रिहाइड्रेशन थेरपी “ च्या वापरासाठी प्रख्यात होते. १९६० च्या मध्यात त्यांनी भारतातील कलकत्ता येथील जॉन्स हॉपकिन्स इंटरनॅशनल सेंटर फॉर मेडिकल रिसर्च अँड ट्रेनिंग येथे कॉलरा आणि इतर अतिसाराच्या आजारांवर संशोधन केले.
अशा जगभरातील कोट्यवधी लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे १६ ऑक्टोबर २०२२ रोजी वयाच्या ८७ व्या वर्षी कोलकता येथील एका इस्पितळात निधन झाले.
( जन्म १२ नोव्हेंबर १९३२ )
त्यांचे कार्य नोबेल पारितोषिक मिळण्याइतके मोठे होते.
पण भारत सरकारने सुद्धा पद्म पुरस्कार दिला नाही.
तळ टिप:- यांच्या निधनाची मराठी माध्यमांनी दखल घेतली नाही म्हणून हा छोटासा लेख.
लेखिका : सुश्री योगीन गुर्जर
संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ बलिप्रतिपदा व भाऊबीज ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
बलिप्रतिपदा किंवा पाडवा
तिसरा दिवस बलिप्रतिपदा किंवा पाडवा ! या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होते. पाडवा हा एक चांगला मुहूर्त असतो, त्यामुळे सोने खरेदी, वाहन खरेदी यासारख्या मोठ्या खरेद्या या दिवशी केल्या जातात. पती-पत्नीच्या नात्याला नव्याने उजाळा देण्याचे काम पाडव्याच्या निमित्ताने होते. त्यामुळे बायकांना या दिवशी नवऱ्याकडून मनासारख्या भेटी मिळवता येतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळून मिळणाऱ्या ओवाळण्याची आतुरतेने वाट बघत असतात! असा हा आनंदाचा पाडवा असतो…. भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज! बहिण भावाच्या आनंदाचा दिवस! यानिमित्ताने मुली माहेरी येतात आणि आई वडील भावंडां बरोबर सण साजरा करतात. दिवाळीचा आनंद आता शिगेला पोहोचलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकालाच काही ना काही भेटी मिळालेल्या असतात तसेच एकमेकांच्या भेटी ही होतात. सणाचे दिवस कसे संपतात कळत नाही पण चार दिवसाची दिवाळी आपल्याला वर्षभरासाठी ऊर्जा देऊन जाते! तसेही आता आपण वर्षभर फराळाचे पदार्थ खातोच, कपडे खरेदी तर कायमच चालू असते त्यामुळे याचे महत्त्व फारसे वाटत नाही.
पण पूर्वीच्या काळी फराळाचे पदार्थ, कपडा खरेदी या गोष्टी प्रासंगिक असत. त्यामुळे दिवाळी कधी येते याची सर्वजण आतुरतेने वाट बघत असत. तरीही अजूनही आपल्याकडे दिवाळी म्हणजे दिव्यांचा आनंदाचा सण म्हणून आपण उत्साहाने साजरा करीत असतो…
☆ भीमाबाईचं पुस्तक प्रेम… प्राची उन्मेष ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆
ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांची ‘ बैल ’, कवी शंकर बोराडे यांची ‘ गांधी ’, लक्ष्मण महाडिक यांची ‘ माती ’,लता पवार यांची ‘आपली मैत्रीण ’, प्रा.व.ना.आंधळे यांची ‘ आई,मला जन्म घेऊ दे ’, असे कवी आणि त्यांच्या कवितांमध्ये हरवून जायचं असेल तर तुम्हाला नाशिक-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावरील ‘ रिलॅक्स कॉर्नर ’ हे उपहारगृह गाठावं लागेल. भीमाबाई जोंधळे या सत्तर वर्षाच्या तरुण आजी हे उपहारगृह चालवत असून त्यांचं अनोखं पुस्तकप्रेम बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. त्यांच्या या उपहारगृहामध्ये पोटाच्या भुकेबरोबर वाचनाची भूक भागविण्यासाठी हजारो मराठी पुस्तके आहेत.
पुस्तकं चाळता चाळता न्याहारी घेण्याची अनोखी शक्कल भीमाबाईंनी चालवली आहे. वय झालं म्हणून भीमाबाई हात बांधून बसल्या नाहीत. त्यांच्या हाताने बनलेली मिसळ आणि झुणका भाकर खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असते. केवळ चौथीपर्यंतचं शिक्षण घेतलेल्या या आजी सकाळी चार वाजता उठतात. गेल्या बावीस वर्षांपासून त्या पेपर एजन्सी चालवत असून मोहाडी, जानोरी, सय्यद पिंप्री आदी ठिकाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. सकाळी गठ्ठे बांधून त्या विक्रेत्यांना देत असतात. हे काम करता करताच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाल्याचे त्या सांगतात. त्यांचं शिक्षण खतवड शाळेत झालं. मोहाडीच्या देशमुख आणि धनगर गुरुजींचे संस्कार त्यांना मिळाले. शाळेत अण्णासाहेब कवडे यांच्या हाताने मिळालेल्या पाच रुपयांच्या आरश्याचे बक्षीस जीवनाला वेगळीच दिशा देऊन गेल्याचे त्या सांगतात.
लग्न झाल्यावर अवघ्या दोन एकर जमिनीत त्या स्वतः पिके घेत असत. सहा रुपये रोजाने देखील त्या काम करीत असत. महामार्गावर बारा वर्षापूर्वी एक छोटी टपरी टाकून त्यांनी हॉटेल सुरु केलं. तेव्हाच वृत्तपत्र टाकण्याचे काम देखील सुरु झालं. मराठी वाचन माणसाला सुसंस्कृत बनवत असते याचा अनुभव आल्याचे सांगत, दोन तीन कविता देखील त्या म्हणून दाखवतात. कवी दत्ता पाटील यांनी देखील त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. विशेष म्हणजे टपरीतून एका छोट्या हॉटेलपर्यंत त्यांचा प्रवास बघावयास झाला आहे. भीमाताईंनी नोटाबंदीच्या काळात अनेक भुकेलेल्यांना मोफत जेवण दिलं होतं. भीक मागणाऱ्यांना पैसे न देता खाऊ घालण्याची संस्कृती त्यांनी आजही जपून ठेवली आहे. त्यांच्या उपहारगृहामध्ये प्रत्येक टेबलावर दोन पुस्तके ठेवलेली असतात. बाळा नांदगावकर,भाई जगताप,अरुण म्हात्रे, अतुल बावडे,बाबासाहेब सौदागर अश्या ज्येष्ठ, नामांकित साहित्यिक, कवींनी या हॉटेलला भेट देऊन आजींच्या कार्याचा गौरव केला आहे. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकाचा वाढदिवस असेल तर त्याला एक पुस्तक आजी भेट देतात. मुलांनी मोबाईलपासून दूर राहावे आणि पुस्तकाच्या दुनियेत हरवून जावे या उद्देशाने त्या पुस्तक वाचन चळवळ चालवत आहे. आता मुलगा प्रवीण हा आईच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहे. त्याने आज पर्यंत तब्बल ७२ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सून प्रीती यादेखील त्यांना या कामात मदत करीत असतात.
पुस्तकांसोबत या हॉटेलमध्ये पारंपरिक वस्तू देखील बघायला मिळतात. पाटा, वरवंटा आदी वस्तू मुलांना दाखवून त्या कशा वापरायच्या याचं प्रात्यक्षिकही त्या देत असतात. मराठी पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी रिलॅक्स कॉर्नरला भेट द्यायला हवी.
भीमाबाई सांगतात, “ मी गेली बावीस वर्ष वृत्तपत्र वाटपाचा व्यवसाय करते आहे. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे हॉटेल व्यवसाय सुरु केला. सध्या मोबाईलमुळे वाचन संस्कृती कमी होत चालल्याचं दिसतं. त्यातूनच मला ही कल्पना सुचली. आज आमच्याकडे शेकडो पुस्तके आहेत. त्याचे वाचन करण्यासाठी नाशिकमधून नागरिक येतात याचं समाधान वाटतं. ही पुस्तक चळवळ व्यापक व्हावी हीच अपेक्षा आहे.
– प्राची उन्मेष, नाशिक
संग्राहक : सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कधी ही दाद ‘ अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती..’ अशी खानदानी असते. कधी ‘असा बालगंधर्व आता न होणे..’ अशी काव्यात्म असते ,कधी ‘ आपके पाँव देखे, बहुत हसीन हैं , इन्हें जमींपर मत उतारिए,मैले हो जाएंगे,’ अशी रूमानी असते, तर कधी ‘ इक रात में दो-दो चाँद खिले’ अशी अस्मानी असते.
परवा अमेरिकेत एका मॉलमध्ये लिफ्टची वाट पाहात थांबलो होतो. लेकीने व मी छान रंगसंगतीचा भारतीय पेहराव केला होता. लिफ्ट उघडली,आतून तीन चार अमेरिकन महिला बाहेर आल्या,एकजण व्हीलचेअर ढकलत होती. एक सुंदर, गोरीपान ,अशक्त मुलगी व्हीलचेअरमध्ये बसली होती. ‘बिच्चारी,’ अशी करुणा माझ्या मनात जागी व्हायच्या आतच, लिफ्टबाहेर पडताना अचानक माझ्याकडे व सोनलकडे पाहात तिने म्हटले,”Your attire is so beautiful!! I like it! ” मला अशी चकित, आनंदित, सुगंधित करून ती दूर निघूनही गेली. पण माझे काही तास खास करून गेली.
मला आठवतंय सिंगापूरच्या एका मत्स्यालयात गेलो होतो आम्ही.तिथल्या स्वच्छतागृहात जात असताना माझ्याबरोबर एक अत्यंत सुंदर वृद्धा आत जाताना मी पाहिली. ‘कुदरत ने बनाया होगा,फुरसत से तुम्हें मेरी जान’ असंच म्हणावंसं वाटावं अशी सुंदर गुलाबी कांती, आटोपशीर बांधा,पांढराशुभ्र ,चमकदारदाट बॉबकट आणि
चेह-यावरचा समाधानी,प्रेमळ,गोड स्मितभाव! बाहेर आल्यावर मी तिची वाट पाहात थांबले आणि ती आल्यावर तिला सामोरी होत म्हटलं,”Excuse me,but I must say you look so gorgeous, just like queen Elizabeth. ” तिने माझ्याकडे निमिषभर अतीव आश्चर्याने पाहिले आणि मग ढगाबाहेर येऊन सूर्य उजळावा तसा तिचा चेहरा उजळला. सुंदरसे स्मित करत तिने माझे दोन्ही हात हातात धरले आणि मला म्हणाली,” good gratius! You are so beautifuly sensitive! Thank you dear,Thank you so much! Be like this for ever!!” आणि दिवसभर मलाच सुंदर झाल्यासारखे वाटत राहिलं तिला सुंदर म्हटल्यामुळे!!
त्या दिवशी कोल्हापूरच्या ‘ ओपेल’ होटेलमध्ये जेवायला गेलो तेव्हा दिवस मावळला होता. भुकेपेक्षा दमल्याची जाणीव सगळ्यांनाच अधिक प्रकर्षाने होत होती.टेबलावरच्या मेन्यूकार्डमध्ये ‘दहीबुत्ती’ हा पदार्थ वाचून मोगँबो एकदम खुशच हुआ. काही मिनिटातच समोर आलेली, मस्त हिरवीगार कोथिंबीर पेरलेली,कढीपत्ता,लाल मिरची,जि-याचा तड़का ( वापरावेत कधीकधी अमराठी शब्द,पर्यायच नसतो त्या शब्दाच्या flavor ला 🙂 )मारलेली, दह्याचा अदबशीर आंबटपणा असलेली पांढरीशुभ्र दहीबुत्ती समोर आली आणि क्षुधेचा सुप्त राक्षसच जागा झाल्यासारखा ताव मारला. अहाहा!! अशी दहीबुत्ती मी ताउम्र चाखली नव्हती.अन्नदात्यासाठी पोटातून आलेली दाद ओठापर्यंत आली होती. पण त्याच्यापर्यंत पोहचवणार कशी? वेटरला विचारून पाहिले पण तो म्हणाला की शेफ सर आता फार बिझी आहेत म्हणून! मग काय करावे? त्याने दिलेल्या बिलाच्या पाठीमागेच लिहिले- ‘शेफसाहेब, तुम्ही बनवलेली चविष्ट दहीबुत्ती कोणत्याही पक्वान्नांना लाजवेल अशी! ‘तेरे हात मुझे दे दे ठाकुर!’ असे म्हणावेसे वाटत आहे. धन्यवाद! ‘ टेबलावरचेच गुलाबाचे फूल आणि चिठ्ठी वेटरच्या हातात दिली नि म्हटले,”कृपया तुमच्या शेफसाहेबांना द्याल का? तो मान हलवून निघून गेल्यावर माझा लेक मला म्हणाला,” तो खरंच त्यांना देईल तुझी चिठ्ठी असं वाटतंय तुला?” मी म्हटलं,” त्याचा विचार मी करतच नाही, मी दाद दिली ,संपलं. पण ती दिली नसती तर मात्र त्या पाककलेवर अन्याय केल्यासारखं वाटत राहिलं असतं.त्या भावनेतून मुक्त झाले.मला छान वाटलं, बस्स्!”
माझ्या क्लासच्या तपासलेल्या उत्तरपत्रिका वाटून झाल्या तेव्हा समोर बसलेल्या वैष्णवी पाटीलचा ( तब्बल २० वर्षानंतरही तिचे नाव लक्षात आहे माझ्या,तिच्या असेल का?) पेपर मुलांना दाखवत तिला म्हटलं, “वैष्णवी,असा पेपर तुझ्याएवढी असताना मला लिहिता आला असेल, असं नाही वाटत मला.” वैष्णवी डोळे मोठ्ठे करून बघत राहिली माझ्याकडे,
मला हसूच आलं. क्लास संपला,मी घरात आले आणि फोनची बेल वाजली. डॉ॰ विद्युत पटेल यांचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्या आईचा फोन होता. काही तक्रार असेल का, अशा विचारात फोन घेतला. त्या म्हणाल्या, “मॅडम आज क्लासमधून माझा मुलगा घरी आला आणि त्याने मला घडलेली गोष्ट सांगितली,
वैष्णवीला तुम्ही जे बोललात ते सांगितलं आणि म्हणाला,” एक टीचर असं कसं काय बोलू शकते? स्वतःकडे कमीपणा घेऊन? मी असं कधीच ऎकलं नाही.” त्या पुढे म्हणाल्या,” मॅडम ,तुम्ही चांगल्या बिया पेरताय. मुलांची झाडे मजबूत होतील.” मी चकित! वैष्णवीच्या आईचा फोन असता तर मी एकवेळ समजू शकले असते,पण….! मग बरं वाटलं की जाता जाता घातलेलं पाणीही मुळाशी पोचतंय!
बी.एड. चा पहिला दिवस! एकेक तास होत होता,नव्या नव्या प्राध्यापिकांची तोंड ओळख होत होती. मी वाट पाहात होते माझ्या आवडत्या मानसशास्त्राच्या तासाची.
कोण प्राध्यापिका असतील,कशा शिकवणा-या असतील अशा विचारात असतानाच एक प्राध्यापिका व्यासपीठावर येऊन उभ्या राहिल्या आणि स्वत:ची ओळख करून देत म्हणाल्या, “मी—. मी तुम्हाला मानस शास्त्र हा विषय शिकवणार आहे.”
माझा एकदम मूडच गेला. बुटक्याश्या,विरळ केसांचे पोनिटेल बांधलेल्या, खरबरीत चेह-याच्या या बाईंकडे माझा आवडता विषय असणार होता. नाराजीनेच मी थोडीशी मागे टेकून बसले. आणि हळूहळू पहाटेचा लालिमा पसरत पसरत सूर्याचं बिंब उजळत जावं तसा त्यांनी आपला विषय रंगवत नेला. तास संपला तेव्हा मनावर दाट पसरली होती ती त्यांच्या अनुपम अध्यापनकौशल्याची मोहिनी! भारावल्यासारखी मी बाकाजवळून उठले आणि धावतच, बाहेर पडणा-या त्यांच्याजवळ गेले. माझा गळा भरून आला होता. पश्चात्तापाने की हृदयातल्या अननुभूत आनंदाने? मी लहानग्या मुलीसारखं हरखून म्हटलं,” बाई,तुम्ही किती छान शिकवलंत…” आणि मला पुढे बोलवेच ना ! माझ्या भावना कळल्यासारख्या त्या छानशा हसल्या आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून निघून गेल्या. मी परत वर्गात आले. आपल्याला इतका आनंद कशाचा झाला आहे याचा विचार करीत…!!
लेखिका : सुश्री संजीवनी बोकील
संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन
नरकासुराचा वध या दिवशी केला गेला म्हणून हा विजय उत्सवाचा दिवस! दिवाळीच्या अभ्यंग स्नानाचा पहिला दिवस! गेले चार आठ दिवस घराघरातून दिवाळीची तयारी सुरू होत असे. घर स्वच्छ करणे, डबे लख्ख घासून पुसून ठेवणे, फराळाचे सर्व प्रकारचे पदार्थ बनवणे., लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शंकरपाळी हे तर व्हायलाच हवे, त्यातूनही उत्साह असेल तर अनारसे, चिरोटे! ज्या घरी दिवाळसण असेल तिथे तर अधिक उत्साह! लेक,जावई आणि सासरकडील मंडळी यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी! या दिवशी लक्षात रहाते ते नरकासुर वधाचे रेडिओ वर लागणारे कीर्तन! लवकर उठून दिवे, पणत्या लावून घरातील बाईची लगबग सुरू होते.सुवासिक तेल चांदीच्या वाटीत काढून ,पाट रांगोळी करून सर्वांना उठवायची जबाबदारी जणू तिचीच!मग मुलांचे उठल्यापासून फटाके उडवायची घाई आणि आईची आंघोळीची गडबड यांत वेळ कसा जातो कळत नाही!मुले किल्ल्यावर मावळे मांडण्यात गर्क,तर मुली रांगोळी काढण्यात!मग सर्वांना एकत्र गोळा करून तो फराळाचा मुख्य कार्यक्रम! आपल्या कडे पहिल्या दिवशी सकाळी सर्वांना ओवाळण्याची पध्दत आहे. हे सर्व झाले की आधी जवळ मंदिर असेल तर देवदर्शन आणि मग फराळ हे चालू राही.! फराळ आणि त्या नंतर दही पोहे खाण्याची आमच्या कडे पध्दत होती.त्यामुळे पोट थंड रहाते!
असा हा नरक चतुर्दशी चा पहिला फराळ झाला की दिवाळीची सुरुवात झाली… लक्ष्मीपूजन काही वेळा नरकचतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एका च दिवशी असते. अशावेळी सकाळचे फराळ झाले की दुपारच्या लक्ष्मी पूजनाची तयारी करावी लागायची. एकदा लक्ष्मीपूजन झाले की दिवाळीचे महत्त्वाचे काम आवरलेले असे. आताही बराच वेळा लक्ष्मीपूजन झाले की लोक फिरायला बाहेर पडतात….
व्यापारी लोकांच्या दृष्टीने लक्ष्मीपूजन हे महत्त्वाचे असते. या दिवशी दुकान ची पूजा केली जाते. नवीन वह्या आणून वही पूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाला भाताच्या लाह्या, बत्तासे, पेढे याचा लक्ष्मीला नैवेद्य दाखवला जातो. बाजारपेठेमध्ये फटाक्यांची आतषबाजी होते आणि दुकानांवर भरपूर रोषणाई केलेली असते. असा हा लक्ष्मीपूजनाचा सोहळा खूप महत्त्वपूर्ण असतो…
दसरा झाला. ह्या वर्षीचा दसरा जरा पाऊस,विजा,कडकडाट आणि गडगडाट ह्यामध्ये पार पडला त्यामुळे नेहमीचा सणाचा उत्साह, लगबग लुप्त होऊन जरा ह्या चैतन्यावर निरुत्साहाचं मळभ आलं होतं.असो.
“ कालाय तस्मै नमः “
नवरात्राची धावपळ, लगबग संपली. आता जरा निवांतपणा आला आला, असं वाटतं नं वाटतं तोच दिवाळी येतेय. नवरात्र उरकलं आणि आता वेध दिवाळीचे.
नवरात्र उरकलं हा विचार मनात आला खरा आणि लगेच मराठी भाषेची मोठी गंमतच वाटली. उरकलं हा शब्द तसा अर्थाने सरळसरळ घेतला तर बरोबरच, पण गर्भितार्थ बघितला तर चूकच.
आपण हे सणवार, कुळाचार हे मनापासून करीत असतो. ह्या पासून आपल्याला आनंद,समाधान लाभतं. आणि ‘उरकलं ‘ हा शब्द जरा निरुत्साही वातावरणात काम झालं की मनात येतो.
खरंच भाषा हा प्रकारच मुळात लवचिक. मोडू तसा मोडणारा, वळवू तसा वळणारा, वाकवू तसा वाकणारा. ही भाषाच आपल्याला एकाच शब्दाचे अनेक अर्थ पुरविते. तर एकीकडे हीच भाषा समानार्थी शब्दासाठी अनेक पर्याय पण सुचविते नाही का ? —–
☆ वसुबारस आणि धनत्रयोदशी ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
वसुबारस
दिवाळी या आपल्या मोठ्या सणाची सुरुवात वसुबारस पासून होते. वसुबारस म्हणजे गाई प्रति कृतज्ञता दाखवण्याचा सण!
महाराष्ट्र हे राज्य शेतीप्रधान असल्याने वसुबारस या दिवसाचे महत्त्व आहे. अश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. वसुबारस याचा अर्थ वसु म्हणजे द्रव्य व त्यासाठी असलेली बारस म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते त्यांच्या पायावर पाणी घालून हळदी कुंकू वाहून पूजा करतात. गाईला नैवेद्य म्हणून पुरणपोळी खाऊ घालतात. हिंदू संस्कृतीत गाईला गोमाता समजले जाते व तिच्या उदरात देवांचा वास आहे म्हणून गाई प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेही आपल्या संस्कृतीत नाग, बैल अशा निसर्गात असणाऱ्या प्राण्यांचे पूजा करून ते दिवस साजरे करण्याची प्रथा आहे. वसुबारस पासून अंगणात तुळशीपाशी घराबाहेर पणत्या, आकाश कंदील लावून दिवाळीची सुरुवात केली जाते..
धनत्रयोदशी
दिवाळी सणाचा दुसरा दिवस धनत्रयोदशी या दिवशी धनाची पूजा करतात. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर वैद्य लोक धन्वंतरी ची पूजा करतात धने गुळ याचा नैवेद्य दाखवतात ज्या वैद्यकीय बुद्धीच्या जोरावर आपण रोग्याला बरे करू शकतो, त्या धन्वंतरी बद्दल आदर, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी!
आता दिवाळी अगदी दारात आलेली असते. पूर्वीच्या काळी घराला अंगण असे त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अंगणात सडा मारून, दारात रांगोळी काढणे, पणत्या लावणे असा कार्यक्रम होत असे. आता फ्लॅट सिस्टीम मुळे ही मजा गेली, तरीही आपल्या छोट्याशा ब्लॉकच्या आत आनंदोत्सव साजरा करायचा म्हणजे आनंदालाच बंधन घातल्यासारखे वाटते! पण कालाय तस्मै नमः !
या सूक्ताचा शशांक दिवेकर यांनी गायलेला आणि सुप्रिया कुलकर्णी यांनी चित्रांकन केलेला व्हिडिओ यूट्युबवर उपलब्ध आहे. त्यासाठी लिंक देत आहे. रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
एक मोठे उद्योगपती होते. अतिशय धनाढ्य… भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या त्यांच्याकडे होत्या. काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…
एक दिवस ते गाडीमधून कंपनीत जाताना, त्यांनी ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला.कुठलं तरी अधलं -मधलं चॅनेल लागलं.चॅनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं.तो प्रवचक बोलत होता, “मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो, ते सर्व काही, मृत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं. तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…”
या उद्योगपतींनी हे ऐकल्यावर ते एकदम अंतर्मुख झाले.एकदम सतर्क झाले.त्यांना एकाएकी जाणवलं,
डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला की, आपण जे काही प्रचंड वैभव उभारलं आहे, त्यातला एकही रुपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही. सर्व काही इथेच सोडून जावं लागणार आहे.
त्यांना एकदम कसंतरीच झालं.ते कमालीचे अस्वस्थ झाले…. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली… बैठकीला झाडून सगळे सहाय्यक, सचिव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की, “मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो. तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा”.
सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलताहेत! मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही… हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढीगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलताहेत. हे जमणार कसं?
साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं. बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन.
जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला. पण काही जमेना. प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता. पण उत्तर काही सापडत नव्हतं.
बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होते.त्यांना हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं? का? मला न्यायचंय हे सर्व.जे मी मेहनतीने मिळवलंय,ते मला का नेता येऊ नये?त्यांना काही सुचेना.
मग त्यांनी यासाठी जाहिरात दिली. भलंमोठं बक्षीस ठेवलं. पण उत्तर सापडेना.
एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला. ‘साहेबांना भेटायचंय’, म्हणाला.
बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं.तो माणूस म्हणाला, “माझं नाव श्याम. मला तुम्हांला काही विचारायचंय. मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन.”
बिझनेसमन म्हणाले, “विचार”.
याने विचारलं की, “साहेब, तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय?”
“हो,”बिझनेसमन म्हणाले.
“खरेदी केलीये तिथे?” श्यामने विचारले.
“हो”. बिझनेसमन म्हणाले. “पैसे कसे दिलेत?” श्यामने विचारले.
“कसे म्हणजे?आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले,” बिझनेसमन उत्तरले.
“बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?. तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?”
थायलंडला बाथ… युरोपला युरो… म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते.” बिझनेसमन म्हणाले.
“म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत.तर ते तुम्हाला देशानुरूप, जागेनुरूप बदलून घ्यावे लागतात.जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते.”
“बरोबर,” बिझनेसमन म्हणाले.
“मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल. तिथे तुमचे रुपये कसे चालतील?” श्याम म्हणाला.
“मग?” बिझनेसमनने कुतूहलाने विचारले.
“तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे ‘पुण्य!’ आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल. मगच तुम्हाला ती वापरता येईल!
तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतील. मगच ती बरोबर नेता येईल आणि तिथे वापरता येईल.”
बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!
इथली करन्सी अशीच गोळा करावी लागेल की, जिचे पुण्यामध्ये रूपांतर होऊ शकेल. असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल.
बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं. ते श्यामच्या पायाच पडले. त्यांनी त्याला यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला. मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे, मिळवलं आहे,ते आता ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यायचं.आणि हे शेवटपर्यंत करतच राहायचं.वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे.