श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ स्वर्गाची करन्सी….अज्ञात  ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

एक मोठे उद्योगपती होते. अतिशय धनाढ्य… भरपूर गाड्या, बंगले, कंपन्या त्यांच्याकडे होत्या. काही म्हणता कशालाच काही कमी नव्हतं…

एक दिवस ते गाडीमधून कंपनीत जाताना, त्यांनी ड्रायव्हरला रेडिओ लावायला सांगितला.कुठलं तरी अधलं -मधलं चॅनेल लागलं.चॅनेलवर एकाचं काही अध्यात्मिक बोलणं चालू होतं.तो प्रवचक बोलत होता, “मनुष्य आयुष्यात भौतिक अर्थाने जे काही कमावतो, ते सर्व काही, मृत्यूसमयी त्याला इथेच सोडून जावं लागतं. तो त्यातले काही म्हणजे काहीच घेऊन जाऊ शकत नाही…”

या उद्योगपतींनी हे ऐकल्यावर ते एकदम अंतर्मुख झाले.एकदम सतर्क झाले.त्यांना एकाएकी जाणवलं,

डोक्यात लख्खकन् प्रकाश पडला की, आपण जे काही प्रचंड वैभव उभारलं आहे, त्यातला एकही रुपया मरताना आपण आपल्या पुढल्या जन्मासाठी घेऊन जाऊ शकत नाही. सर्व काही इथेच सोडून जावं लागणार आहे.

त्यांना एकदम कसंतरीच झालं.ते कमालीचे अस्वस्थ झाले…. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी तातडीने एक बैठक बोलावली… बैठकीला झाडून सगळे सहाय्यक, सचिव, सल्लागार, सेक्रेटरी, कायदेतज्ज्ञ बोलावले आणि जाहीरपणे सांगितलं की, “मी ही अगणित संपत्ती मिळवली आहे, ती मी मरताना माझ्याबरोबर घेऊन जाऊ इच्छितो. तर मी ते कसे घेऊन जाऊ शकतो, ते मला तुम्ही नीटपणे, विचारपूर्वक सांगा”.

सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले की, आज साहेब हे काहीतरी असंबध्द काय बोलताहेत!  मरताना तर कुणालाच काही बरोबर नेता येत नाही… हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे आणि हे तर ढीगभर संपत्ती बरोबर न्यायची भाषा बोलताहेत. हे जमणार कसं?

साहेबांनी सर्वांना शोधकार्य करायला सांगितलं. बक्षिसे जाहीर केली की, जो कुणी मला यासाठी १००% प्रभावी पध्दत सांगेल, त्याला मी बेसुमार संपत्ती बहाल करीन.

जो तो पध्दत शोधायचा प्रयत्न करू लागला, माहिती काढू लागला. पण काही जमेना. प्रत्येकजण अथक प्रयत्न करत होता. पण उत्तर काही सापडत नव्हतं. 

बिझनेसमन दिवसागणिक उदास होत होते.त्यांना हरल्याप्रमाणेच वाटू लागलं की, मी का हे सर्व बरोबर नेऊ शकत नाही?म्हणजे मी हे सर्व इथेच सोडून जायचं?  का? मला न्यायचंय हे सर्व.जे मी मेहनतीने मिळवलंय,ते मला का नेता येऊ नये?त्यांना काही  सुचेना.

मग त्यांनी यासाठी जाहिरात दिली. भलंमोठं बक्षीस ठेवलं. पण उत्तर सापडेना.

एक दिवस, अचानक एक माणूस या बिझनेसमनच्या ऑफिसमधे आला. ‘साहेबांना भेटायचंय’, म्हणाला.

बिझनेसमननी त्याला केबिनमधे बोलावलं.तो माणूस म्हणाला, “माझं नाव श्याम. मला तुम्हांला काही  विचारायचंय. मगच मी यावर काही उत्तर सांगू शकेन.” 

बिझनेसमन म्हणाले, “विचार”.

याने विचारलं की, “साहेब, तुम्ही कधी अमेरिकेला गेलाय?”

“हो,”बिझनेसमन म्हणाले.

“खरेदी केलीये तिथे?” श्यामने विचारले.

“हो”. बिझनेसमन म्हणाले. “पैसे कसे दिलेत?” श्यामने विचारले.

“कसे म्हणजे?आपले पैसे देऊन अमेरिकन डाॅलर्स विकत घेतले व दिले,” बिझनेसमन उत्तरले.

“बाकी आणखी कुठल्या कुठल्या देशात गेलात?. तिथे काय खरेदी केलीत आणि काय काय चलने वापरलीत?”

ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिअन डाॅलर्स. सिंगापूरला सिंगापूर डाॅलर्स. मलेशियाला रिंगिट. जपानला येन. बांगलादेशला टका… सौदी अरेबियाला रियाल… दुबईला दिरहम्स…

थायलंडला बाथ… युरोपला युरो… म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी जी जी म्हणून करन्सी चालते, तीच घ्यावी लागते व वापरावी लागते.” बिझनेसमन म्हणाले.

“म्हणजे तुमच्याकडे असलेले पैसे हे सर्व ठिकाणी जसेच्या तसे चालत नाहीत.तर ते तुम्हाला देशानुरूप, जागेनुरूप  बदलून घ्यावे लागतात.जिथे जिथे, जी जी करन्सी आहे, ती ती तुमच्याकडचे रुपये देऊन बदलून घ्यावी लागते.”

“बरोबर,” बिझनेसमन म्हणाले.

“मग त्याच न्यायाने तुम्हाला तुमचे पैसे देऊन त्याबदली स्वर्गाची करन्सी देखील विकत घ्यावी लागेल. तिथे तुमचे रुपये कसे चालतील?” श्याम म्हणाला.

“मग?” बिझनेसमनने कुतूहलाने विचारले.

“तिथे ही करन्सी चालणार नाही, कारण स्वर्गाची करन्सी आहे ‘पुण्य!’ आणि तिथे तीच तुम्हांला घ्यावी लागेल. मगच तुम्हाला ती वापरता येईल!

तेव्हा तुमच्याकडचे पैसे हे तुम्हाला ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यावे लागतील. मगच ती बरोबर नेता येईल आणि तिथे वापरता येईल.”

बिझनेसमनच्या डोक्यात आता जास्त लख्ख प्रकाश पडला की, शेवटी बरोबर न्यायला ‘पुण्यच’ कमवायला हवं!

इथली करन्सी अशीच  गोळा करावी लागेल की, जिचे पुण्यामध्ये रूपांतर होऊ शकेल. असा काही विचार, वर्तन, आचरण करावं लागेल की, जे जाताना पुण्याच्या रूपात बरोबर नेता येईल.

बिझनेसमनच्या प्रश्नाला यथार्थ उत्तर मिळालं होतं.  ते श्यामच्या पायाच पडले. त्यांनी त्याला  यथोचित बक्षीस दिले आणि त्याचा सत्कार केला. मनोमन ठरवलं की, या भूतलावर जगण्यासाठी जे काही मिळवतो आहे, मिळवलं आहे,ते आता ‘पुण्य’ नावाच्या करन्सीमध्ये रूपांतरित करून घ्यायचं.आणि हे शेवटपर्यंत करतच राहायचं.वरती जाताना घेऊन जायला एवढे पुरेसे आहे.

लेखक :अज्ञात

संग्राहक : श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments