मराठी साहित्य – विविधा ☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

🌸 विविधा 🌸 

☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?” ☆ सुश्री शीला पतकी 

काळ बदलतोय.. काळ बदलतोय.. काळाची गती वाढली आहे… काळाबरोबर आपण चालल पाहिजे.. ही सगळी वाक्य मागची पिढी ऐकते आहे आणि वाटतंय ह्या काळाच्या वेगाबरोबर आपल्याला धावता येणार नाही पण प्रयत्न तर करायलाच पाहिजे आणि ते करताना या काळाची चाहूल घेतो की चाललय काय? .. तर सर्वच क्षेत्रांमध्ये खाली येणे सुरू आहे….!

कौटुंबिक क्षेत्रात तेच घडले आहे संवाद उरला नाही माणसं एकत्र राहत नाहीत म्हणजे एकत्र असलेली चार माणसही (भली मोठी कुटुंब एकत्र असलेली संपली आहे त्याचा उल्लेख मी करत नाही)एकमेकांशी बोलत नाहीत प्रत्येकाजवळ घराच्या कुलपाची चावी आहे ज्याच्या त्याच्या सवडीने घरामध्ये जो तो प्रवेश करतो घरातला रांधण कमी आणि बाहेरून मागवणं खूप झाले आहे आणि तेच मुलांना आवडते त्याचे धोके अनेकदा दिसतय पण आधुनिकतेची झापडं लावलेल्या आपल्याला ती दिसत नाहीत. अनेक मोठ्या नावावरती घरी येणारे अन्न हे वाईट टाकावू पदार्थापासून बनवणल्याचे लक्षात आले आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले प्रत्येक धोके माध्यमाने दाखवले आहेत. घरची वाळवणं, साठवणं, हे तर संपलेच आहे पण आरोग्य त्याचे काय? आरोग्य चांगले राहावे म्हणून वर्कआउट करणे व्यायाम करणे गाजर काकडी बीट खाणे, फ्रुट्स खाणे, कमीत कमी जेवण घेणे हे सर्व चालू आहे पण ही फॅशन आहे पुरेसा योग्य आहार नसल्यामुळे टिकाऊ पिढी तयार नाही हे अर्थात माझे मत आहे…!!!!

कपड्यांच्या बाबतीतही तेच आहे. फाटक्या कपड्यांना ऐश्वर्य आले आहे. कमी कपड्यांना सौंदर्य म्हटले जात….. आणी खूप खूप काही..!

मनोरंजनाच्या बाबतीत तेच आहे चित्रपटांना कथा नाहीत, उद्दिष्ट नाही, प्रबोधन नाही, गाण्यांना अर्थ नाही, संगीत कर्कश्य आहे, आवाजातली मधुरता असूनही वापरली जात नाही. काही मराठी नाटकं सोडली तर अनेक ठिकाणी चांगले विषय नाहीत चित्रपटांचे तेच आहे पण अगदी छोट्या प्रमाणावरती नवनवीन प्रयोग मात्र चांगले केले जातात उदा. अभिवाचन, एखाद्या कवीच्या कवितांचे गायन वाचन हे कार्यक्रम दर्जेदार आहेतच पण त्याबरोबर स्टँड अप कॉमेडी नावाखाली जे काही अचकट विचकट चालले आहे ते न बघवणारे न ऐकवणारे आहे. एका कार्यक्रमाचे नाव पहिले ‘हलकट ‘हेच जर कार्यक्रमाचे नावाचे तर किती अवघड आहे ना? कॉमेडी करणारा मुलगा सरळ म्हणाला…. अगदी स्टेजवरून पब्लिकमध्ये संवाद साधताना व ब्रेकप बद्दल बोलतोय आणि मुलीला म्हणतो पाळीच्या वेळेला येऊन सांग आणि अख्खे थेटर त्याच्यावर हसतय… फार वाईट वाटलं. तरुण हे सादर करत असतील आणि तरुणांनाही आवडत असेल तर मग आपण कुठे जाणार आहोत? विनोदाबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की विनोद अश्लील किंवा वाईट नसतो त्याचे नातेवाईक वाईट असतात म्हणजेच चिल्लर विनोद पण आता त्याच नातेवाईकान सुळसुळाट माजवला आहे! चांगल्या उत्तम मराठी वाहिनी वरचे शो हे अश्लीलते कडे जाणारे आहेत लोकांना बोलवून त्यांची खेचाखेची करणारे आहेत. हास्य जत्रा नावाच्या कार्यक्रमात परवा खूप वाईट विनोद झाला जरा बरा वाटणारा कार्यक्रम होता पण… उघडे बाबांना बघायला नागडे जाऊ… या वाक्याने कार्यक्रमाचा स्तर खाली येऊ लागला हे लक्षात आले.

शिक्षण शिक्षण क्षेत्रात असेच आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. रिझर्वेशन मुळे येणाऱ्या प्रमुखाला कदाचित व्यवस्थापनाचे ज्ञान नसते आणि मग शाळा आणि त्याचे व्यवस्थापन ढासळायला सुरुवात होते शिक्षक चांगलेच असतात काम करून घेणार हुशार हवा चांगल्या अभ्यासू मुख्याध्यापकाच्या अभावी काही शाळा गळती लागल्यासारख्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातून मात्र हे चित्र खूप चांगले आहे तिथे अनेक उत्तम प्रयोग करणारे शिक्षक आढळतात तेवढे समाधान वाटते.

बाकी सरकारी कामकाज राजकारण याबाबत काय आणि किती बोलावे? धाकटे शहाणे झाले आणि फुकट्याच राजकारण आले. अशी अवस्था आहे भ्रष्टाचारात तर न्यायालय सुद्धा मागे नाही मग न्याय कोणाकडे मागावा पक्ष बदलू लबाडांच्या टोळ्या तयार झाल्यात आणि त्या नवनविन नावाने सरकारं तयार करीत आहेत आणि पाच वर्ष काय तर एकमेकांना अश्लील शब्दात शिव्या देणे वाटेल ते बोलणे म्हणजे मला एकाने विचारले आपल्या वेळेला माझा आदर्श नेता हा निबंध होता आता कुणावर लिहावे? मी म्हणलं नाही आता असा निबंध येतच नाही ते काय वेडे आहेत का? असले निबंध द्यायला…. अशी मजा आहे मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधाचे पहिल वाक्य असेल अनेकांची युती केलेली माझे सरकार मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करेन आहे की नाही गंमत! … वर्तमानपत्र किंवा मीडिया, माध्यम आपली जबाबदारी विसरून कोणाच्यातरी खुंट्याला बांधले गेले आहेत मग त्याचीच भलावण करतात नागरिकांचे प्रश्न मांडणे हे त्यांच्या गावीही नाही नकारात्मक बातम्या… सकारात्मक घडते पण दिसत नाही कारण त्याला प्रसिद्धी नाही. ते म्हणतात ना खोट्याला हजार पाय आहेत आणि सत्य पांगळे करून टाकले आहे तशी गत झाली आहे…. देशभक्ती हा विषय शाळेत नाही आता उदाहरण तरी कोणाचे द्यावेत आम्ही शाळेत शिकत असताना देशभक्तीपर कविता असे थोरांची चरित्र असत. बाबू गेनू देशासाठी कसा मेला.. नंदुरबारचा शिरीष कुमारचा धडा अंगात स्फुरण देऊन गेला. “पुर्खोंसे चला आई यही हमारी परीपाठी है प्राण दिया है मगर नही दि कभी देश की माटी है! “या सारखी गाणी आता मुलांच्या ओठावर नाहीत हे दुर्दैव आहे हे सारे पाहून वाटते आपण तळ गाठायला चाललोत का? तुम्हाला काय वाटतय…?

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… ओळख भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… ओळख – भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

ओळख

सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भटांची “केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” ही गझल मला फार आवडते. सुरुवातीला मला ही एक प्रणयभावनेची गझल वाटायची पण आयुष्याच्या एकेका टप्प्यावर जेव्हा जेव्हा मी ही गझल वाचत गेले तस तसे त्यातले खोल दडलेले अर्थ जाणवू लागले. हे प्रणयगीत नसून आयुष्यातली स्थित्यंतरे, एक पार केलेला टप्पा, उलटून गेलेला एक काळ याविषयी फार सुंदर भाष्य कवी सुरेश भट यांनी या गझलेत केलेलं आहे याची जाणीव झाली.

“केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली”

समजलंच नाही बालपण कधी संपलं! अचानक मिटलेले डोळे उघडावेत आणि नवी पहाट उगवलेली असावी तशी बाल्य संपल्याची, नवी वाट सुरू झाल्याची चटकन जाणीव झाली. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत होती.. अगदी तसेच झाले आणि लक्षात आले की माझ्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा आता पार झालेला आहे. तत्पूर्वी अनेक बदल जीवनात घडले. आमचं धोबी गल्लीतलं वास्तव्य संपलं. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर आणि राम मारुती रोडच्या सुरुवातीलाच असलेल्या आधुनिक, ऐसपैस, सर्वांसाठी वेगळ्या बेडरूम्स असलेला मागे पुढे बागेचं स्वप्न पूर्ण करणारी मोकळी जागा, चोवीस तास पाणी (हे फार महत्वाचं) वगैरे अनेक सुविधांचा “केदार” नावाचा बंगला पपांनी बांधला. खरं म्हणजे हा बंगला माझ्या आजोबांनी माझ्या आईला प्रेमाची भेट म्हणून दिला. “मालुने (म्हणजेच माझ्या आईने) एका चांगल्या ऐसपैस, सुख सोयी असलेल्या घरात राहावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कसं असतं ना! माझे पप्पा हे एक सेल्फमेड व्यक्तिमत्त्व होतं पण त्यांनी स्वाभिमानाचा दुराग्रह न बाळगता बापलेकी मधला एक प्रेमाचा धागा सांभाळला आणि मनापासून घर बांधणीच्या प्रक्रियेत भाग घेतला. वास्तविक बंगल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकही पैसा आजोबांकडून घेतला नाही नंतर पूर्ण रकमेचा चेक आजोबांनी पप्पांना दिला आणि तो मात्र त्यांनी प्रेमादर भावनेने स्वीकारला.

अर्थात इतक्या सुंदर घरात आमचं वास्तव्य असणार आहे यापुढे, ही कल्पना आम्हा सर्वांसाठी आनंदाची नक्कीच होती पण धोबी गल्लीचा निरोप घेताना मात्र फार म्हणजे फार जड गेले. हृदयाचा एक कप्पाच बंद झाल्यासारखे वाटले. ज्या वास्तूने, ज्या गल्लीने आम्हाला जन्मापासून घडवलं त्या सर्वांचा निरोप घेणं हे मुळीच सोपं नव्हतं याची जाणीव वास्तूचा उंबरठा ओलांडल्यानंतर पिळवटून गेली. काही जुनं सामान आम्ही त्याच घरात सोडून दिलं होतं पण एक दिवस जीजी एकटीच त्या घरी गेली आणि एका हातगाडीवरून ते सारं सोडलेलं सामान घेऊन आली. खरंच तेव्हा कळलं! ” महत्त्वाचं सामान नसतं, महत्त्वाच्या असतात त्या आठवणी! ”

आजही जीजी, हातगाडी आणि ते जुने सामान माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येतं.

एकच नव्हे तर पुढील आयुष्यात अनेक घरात मी राहिले. लग्नानंतरचे, सासरचे वाडा स्वरूप घर, त्यानंतर व्यवसायासाठी आम्ही दोघं जळगावला आलो तिथलं भाड्याचं वन बीएचके घर, नंतरचे आम्ही स्वतः बांधलेलं घर, मुलींची परदेशातील विदेशी धाटणीची प्रशस्त घरे आणि आता उतार वयातलं सह्याद्रीच्या कुशीतलं पुण्यातलं घर…… , इतकी सारी घरं असताना सुद्धा अगदी आज पर्यंत माझ्या स्वप्नात जर कुठलं घर येत असेल तर ते फक्त आणि फक्त धोबी गल्लीतलंच घर. तो जिना, तो उंबरठा, तो पायरीवरचा नळ, मागच्या गॅलरीत वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांचा वास आणि कितीतरी…

लिहिता लिहिता थोडी भरकटले कारण आज डोक्यात एक निराळाच विषय घेऊन लिहायला बसले होते.

तर आयुष्याचा एक टप्पा पूर्णपणे ओलांडला होता शिक्षण ही संपलं होतं. पुढे काय करायचं याचा निर्णय व्हायचा होता. सुरुवातीपासूनच आमच्या घरात, “तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यावेत” हाच जीवनाचा कन्सेप्ट होता. त्याप्रमाणे अजून पुढचे शिक्षण किंवा विवाह यामधला एक पर्याय मी निवडला तो म्हणजे नोकरी करणे.

त्या वेळी टक्केवारीनुसार अधिकतर स्त्रिया गृहिणी होत्या. नोकरी करणार्‍या स्रियांची संख्या खूप जास्त नव्हती.

पण कसे कोण जाणे मला लहानपणापासूनच वाटायचे आपण नोकरी करायची. पैसे कमवायचे.

म्हणजे आर्थिक सक्षमता वगैरे विचार नव्हते त्यामागे पण आपण कमावलेले पैसे, ते मनासारखे खर्च करायचे,

त्याचा कुणी हिशोब वगैरे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. या काही भावना मला सुखद वाटायच्या.

शाळेत असताना “खरी कमाई”अंतर्गत मी अक्षरश: कुणाचे अंगण झाडून दिले. कुणाचे तांदुळ निवडून दिले. कुणाच्या झाडांना पाणी घातलं आणि त्यांतून हातात पडणार्‍या काही नाण्यांची गंमत वाटायची. अर्थात ते पैसे शाळेकडे जमा व्हायचे अन् नंतर धर्मादाय. पण मेहनतीने पैसे कमावण्याचे समाधान वाटायचे.

मी वयाच्या अठराव्या वर्षापासून लहान मोठे समर जाॅब्स् केले. महाविद्यालये, बोर्डाच्या परिक्षांच्यावेळी पर्यवेक्षक

म्हणूनही काम केले. एका तासाला दहा रुपये मिळायचे. त्यावेळी दहा रुपयाला किंमत होती.

तुम्हाला गंमत सांगते, आम्ही लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत भाड्याची सायकल फिरवायला दोन आणे लागत. वडीलांशी करार असायचा, “अडीचकं” हा पाढा त्यांना बिनचूक, एका दमात म्हणून दाखवायचा मग ते मला दोन आणे द्यायचे. not a penny less not a penny more.!! खूप मोट्ठी कमाई वाटायची ती मला!!

पण ही सगळी किरकोळ कमाई. मजेची पण स्वत: पैसे मिळवण्याची मानसिकता इथूनच तयार झाली.

मी बी एस्सी झाले आणि घरात जाहीर केले “मी नोकरी करणार. “

बरीच उमेदवारी करावी लागली. अर्ज भरा, लेखी परीक्षा द्या, मुलाखतींना जा. पूर्व अनुभव नाही म्हणून नकारही पचवले. सुरवातीला मी रसायनशास्त्रातील पदवीधर म्हणून केमीकल इंडस्ट्रीत केमीस्ट म्हणून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. “हेक्स्ट” या विदेशी, औषधांच्या कंपनीत माझी उत्कृष्ट मुलाखतही झाली होती पण एक स्त्री म्हणून मला तो जॉब नाकारण्यात आला आणि माझ्याबरोबर शेवटपर्यंत असलेल्या एका मुलाला नेमणूक पत्र मिळाले. माझा प्रचंड पराभव होता तो! त्याहीपेक्षा मानसिक त्रास टोकाचा झाला. अजूनही वाटतं तेव्हा मला “सुधा मूर्ती”सारखे का होता आले नाही? माझ्यातली मुळातली बंडखोरी अशी लुळीपांगळी का झाली?

आतासारखे रेझ्युमे, सीव्ही, प्रोफाईल वगैरे लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणार्‍या संस्था नव्हत्या. माझे आजोबा 

बँक आॅफ इंडीयात खूप वरच्या पदावर होते. (Chief Accountant) जरी तेव्हां ते निवृत्त असले तरी त्यांचा दबदबा होता. मी त्यांना सांगितलं, “मला तुमच्या बँकेत नोकरी मिळवून द्या!! “

त्यांनी नुसता नकारच दिला नाही तर ते म्हणाले, ” तू वाणीज्य शाखेची पदवीधर नसल्यामुळे तुला हा जाॅब मिळूच शकणार नाही. ”

पण बँकेच्या नोकरभरती च्या जाहिरातीत अशी कुठलीही अट नव्हती. ” “कुठल्याही शाखेत पदवीधर “एव्हढेच होते पण वशीलेबाजी हा प्रकार तेव्हा नव्हता इतका. त्यातून आजोबांची कठोर आणि कणखर तत्वे पण मीही त्यांचीच नात. त्यांना म्हटले, “तुमच्याच बँकेत मी नोकरी मिळवूनच दाखवेन तुम्हाला. “

अतिशय मेहनत, खटपट, प्रतीक्षा

पण अखेर नोकरी मिळाली. स्वीकारलेल्या आव्हानात यशस्वी झाले!!!

हो! पण त्यातही एक अनपेक्षित अडचण उभी राहिली होती. अंतीम नेमणूकीपूर्वी वैद्यकीय तपासणी होती. आणि त्यात मी चक्क नापास झाले. कुणाला खरंतरी का वाटाव? मी इतकी सुदृढ निरोगी असताना?

पण मला असा शेरा मिळाला. Less vision at left eye so medically unfit. Doctors certificate required.

आभाळ कोसळणं म्हणजे नक्की काय हे अनुभवले पण यावेळी मात्र आजोबा मदतीस धावले. त्यावेळी नेत्रचिकित्सक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले डॉ. चिटणीस आजोबांचे मित्र होते. त्यांनी नेत्रतपासणी केल्यानंतर सांगितले, ”काहीच मोठा प्राँब्लेम नाही. ही एक टेन्डन्सी आहे. ही मुलगी एकाच डोळ्याने पहाते, वाचते म्हणून हिचा दुसरा डोळा झोपून गेला. “अशी गंमतीदार कोटी करून मला सहजपणे त्यांनी फिटनेस सर्टीफिकेट दिले आणि हातातोंंडाशी आलेला निसटता घास पुन्हा मुखी गेला. गंगेत घोडं नहालं आणि मला नोकरी मिळाली. मात्र एक आणखी पदवीही मिळाली “एकाक्षी”

(हल्ली लहानपणापासून मुलांची नेत्रतपासणी, दंत तपासणी होते.. ही जागरुकता किती प्रशंसनीय आहे)

असो.

पण काय सांगू तुम्हाला जेव्हा माझा पहिला पगार झाला तेव्हाचा आनंद!!

मी आणि माझे वडील व्ही. टी. ते फ्लोरा फाउंटन बसने एकत्र जायचो. दहा पैसे तिकीट होतं. त्यादिवशी वडील म्हणाले, “आज तुझं तिकीट तूच काढायचंस..!”

मी म्हणाले “आज तुमचंही तिकीट मीच काढेन.”

पुढची चाळीस वर्षे मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले….

पैशाची गरज म्हणून मी नोकरी नाही केली.

माझ्या अस्तित्वाची ती गरज होती…..!!

हाती पडलेल्या पहिल्या पगाराने मला माझी भक्कम ओळख मिळाली आणि या ओळखीने मला नेहमीच आत्मविश्वास दिला. जगताना जी निर्भयता लागते ती मला मिळाली हे मात्र निर्विवाद!!

– क्रमशः भाग ४५.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यर्थ न हो बलिदान…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यर्थ न हो बलिदान…☆ सुश्री शोभा जोशी ☆

९ जून हा भगवान बिरसा मुण्डा यांचा बलिदान दिवस. माणूस जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्युची तारीख ठरलेली असते असं म्हणतात. जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. त्यावर माणसांची सत्ता नाही. पण जन्म आणि मृत्यु या मधल्या काळावर मात्र माणसाची सत्ता असते. तो काळ तुम्ही कसा व्यतीत करता यावर तुमच्या जन्माचे सार्थक अवलंबून असते.

इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांचे जीवन सार्थकी लागले. जनजातीतील अशा हुतात्म्यांमध्ये बिरसा मुण्डा यांचे नाव अग्रणी आहे. आपला धर्म, आदिवासी परंपरा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकांनी ख्रिश्र्चन पाद्र्यांच्या जाळ्यात अडकून आपला धर्म बदलू नये म्हणून केलेले प्रयत्न आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

बिरसांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ह्या दिवशी, वडिल सुगाना मुण्डा आणि आई कर्मी यांच्या पोटी झारखंड मधील उलिहातू गावी झाला. हे मुण्डा कुटुंब अत्यंत गरीब होते. गावोगावी जाऊन मोलमजूरी करून पोट भरत असे.

परिस्थिती वशात मुण्डा कुटुंबाने ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला आणि बिरसाला ख्रिश्र्चन मिशनर्‍यांच्या शाळेत घातले. तिथे जेवणात दिले जाणारे गायीचे मांस आणि त्याला शेंडी कापण्यासाठी केलेली सक्ती, याविध्द बिरसांनी बंड पुकारले. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

इथूनच बिरसांच्या इंग्रजांविरूध्दच्या संघर्षाला सुरूवात झाली. ते दोन पातळ्यांवर इंग्रजांशी संघर्ष करीत होते. एक म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर ख्रिश्र्चन धर्माचे आक्रमण होऊ नये म्हणून आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. बिरसांची आनंद पांडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून ते खूप गोष्टी शिकले.

हिंदू धर्माचे रक्षण. . . आनंद पांडे यांच्याकडे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. आपल्या रामायण, महाभारत, गीता इ. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. ख्रिश्र्चन पाद्री, जनजाती समाजाला निरनिराळी प्रलोभने दाखवून ख्रिश्र्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. पण बिरसाने लोकांना पटवून दिले की. . .

धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम।न तत्सेवेत मेधावी न हि तध्दितमुच्यते।।

धर्मास सोडून असलेले कर्म जरी महाफलदायी असलेतरी बुध्दिमानाने ते करू नये कारण ते हितकारक आहे असे कोठेही सांगितलेले नाही. असा उपदेश करून अनेक लोकांना त्यांनी ख्रिश्र्चन होण्यापासून परावृत्त केले.

त्यांनी बिरसाईयत पंथाची स्थापना करून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. भगवान बिरसा मुण्डा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, अस्तित्व वअस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष. . . . बिरसांचा लोकांवरील वाढता प्रभाव बघून ख्रिश्र्चन पाद्र्यांनी इंग्रज अधिकार्‍याकडे तक्रार केली की, बिरसा हा हिंदू सन्यासी, आदिवासींचा राजा होऊ पाहातो आहे तो ब्रिटिशांविरूध्द जनतेला भडकावतो आहे. या तक्रारीवरून बिरसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले. पण ग्रामस्थांनी सक्त विरोध करून बिरसांना पकडायला आलेल्या सशस्र पोलिसांशी तीव्र लढा दिला व त्यांना परत पाठवले. पण शेवटी छल कपटाने २५ आॅगस्ट १८९५ रोजी पोलिसांनी

अटक करून बिरसांना हजारीबाग तुरूंगात ठेवले.

३० नोव्हेंबर१८९७ रोजी बिरसा तुरूंगातून मुक्त झाले. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या हजारो लोकांची त्यांनी शिस्तबध्द संघटना बांधली आणि त्यांना इंग्रजांविरूध्द उठाव करण्यास प्रेरित केले. त्याला उलगुलान (क्रांती) नाव देण्यात आले. २४ डिसेंबर १८९९ यादिवशी उठाव करण्याचे निश्र्चित केले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिस चौक्या, शासकीय कार्यालये, गोदामे यांच्यावर हल्ले करण्यात आले. इंग्रज शासक, ख्रिश्र्चन पाद्री, आणि आमचे शोषण करणारे आमचेच लोक (उदा. जमीनदार, सावकार इ. )यांना त्यांनी प्रमुख शत्रू म्हणून घोषित केले.

९ जानेवारी १९०० रोजी बिरसांनी जोजोहातूच्या जवळील डोमबारी टेकड्यांवर एक सभा आयोजित केली या सभेत हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले होते. तेथील आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांना ही बातमी समजताच त्यांनी संपूर्ण डोंगराला आपल्या सैन्याचा वेढा दिला. आणि लोकांवर बेछूट गोळीबार केला.

इंग्रजांच्या बंदुकांपुढे बिरसांच्या सेनेच्या, धन्युष्यबाण, भाले यांचा निभाव लागला नाही. हजारो बायका, मुले, पुरूष मृत्युमुखी पडले.

बिरसा तिथून कसेतरी निसटलेआणि जंगलात लपून राहिले व तिथून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणार्‍यास ५००/-रू. चं बक्षीस जाहिर केलं. पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. पण बिरसा हाती लागले नाहीत.

“कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ “अशी आपल्याकडे म्हण आहे. शेवटी फंदफितुरी झाली आणि ३ फेब्रु. १९०० रोजी पोलिसांनी बिरसांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. शेवटी ९ जून १९०० या दिवशी रक्ताची उलटी होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांना विष देऊन मारण्यात आले असाही संशय व्यक्त करण्यात येतो.

त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. . . . बिरसांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून छोटा नागपूर क्षेत्रात सरकारने जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. त्यांच्या उपदेशामुळे मुण्डांच्या समाज जीवनात अमुलाग्र बदल झाला. अनेक क्षेत्रात मुण्डा आजही चमकदार कामगिरी करताना दिसतात. बिरसांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. जनजातीतील ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ रांची विमानतळाला त्यांचे नाव दिले आहे. १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

बिरसांनी भारतीय संस्कृती, परंपरा, स्वधर्माचे रक्षण करत स्वातंत्र्य लढ्यात कर्तव्याच्या रणभूमीवर मृत्युला आलिंगन दिले.

९ जून या त्यांच्या बलिदान दिनी आमचे त्यांना शतशः प्रणाम.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

सुश्री सुलभा तेरणीकर

? इंद्रधनुष्य 

☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆

रेल्वेच्या भारतात दररोज सुमारे तेरा हजार गाड्या धावतात. या गाड्यांतून 2 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पण या तेरा हजार गाड्यांत फक्त एकच गाडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचं वैशिष्ट्य वेग, आरामदायी सुखसोयी अथवा आधुनिक तंत्रज्ञान नाही; तर त्या गाडीत मिळणारी दयाळू, माणुसकीची वागणूक!

या गाडीचं नाव ‘ सचखंड एक्स्प्रेस ‘!

अख्ख्या भारतात सलग 35 तास आणि 2, 000 कि. मी. प्रवास करणारी आणि महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना जोडणारी ही एकच अशी गाडी आहे की जिच्यातील प्रवाशांना दररोज सकाळची न्याहरी, दुपारचं भोजन आणि सायंकाळचं भोजन मोफत मिळतं.

‘सचखंड एक्प्रेस‘ (नं. 12715) ही गाडी महाराष्ट्रातील नांदेड आणि पंजाब राज्यांतील अमृतसर या शिखांच्या दोन पवित्र शहरांदरम्यान धावते.

या गाडीनं प्रवास करणाऱ्यांना ताजं घरगुती भोजन, एकही रुपया न आकारता, मोफत दिलं जातं. कढी भात, भाजी, आणि ताज्या पोळ्या या हसतमुखानं दिल्या जातात.

हे अन्न गाडीतील भटारखान्यात शिजवलं जात नाही; तर वाटेतील ज्या ज्या गावी गुरुद्वारा असतील त्या त्या गावांत शिजवलं जातं आणि त्या त्या गावातील स्वयंसेवक ते गाडीवर आणून प्रवाशांना देतात.

शिखांच्या ‘ लंगर ‘ मध्ये दररोज कुणाही गरीब, श्रीमंत, स्थानिक, अनोळखी किंवा बाहेरगावच्या व्यक्तीला त्या वेळचं अन्न मानानं दिलं जातं; त्या प्रथेला अनुसरूनच या गाडीत हे अन्न दररोज सर्व प्रवाशांना दिलं जातं.

हा अनोखा, अद्भुत आणि माणुसकी जागवणारा उपक्रम 1995 पासून सुरु झाला; आणि गेली 30 वर्षे तो अव्याहतपणे चालू आहे! ही सेवा एकाच गावी पुरवली जात नाही. वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या गावी ही सेवा पुरवली जाते.

या गावांची अधिकृत यादी अशी नाही; पण वाटेत लागणाऱ्या छ. संभाजी महाराज नगर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, दिल्ली आणि लुधियाना अशा शहरांत ही सेवा पुरवली जाते. ही सेवा रेल्वेच्या उपाहारगृहांतर्फे चालवली जात नसल्यामुळे हे अन्न घेणाऱ्यांना स्वत:ची थाळी, प्लेट, खाण्याचा डबा स्वतः बरोबर असणं आवश्यक आहे.

ही सेवा करणारे स्वयंसेवक एक तर फलाटांवर चालत असतात अथवा डब्यांत शिरून, ज्यांना हवं आहे त्यांना, हे ताजं अन्न देत असतात.

आजकालच्या देणा — घेण्याच्या व्यवहारी जगात, हजारो किलो मीटरवर माणुसकी जागवणारी ही सेवा एक वेगळंच दर्शन घडवते. शिखांनी त्यांची माणुसकीची परंपरा जागवणारी ही सेवा चालू केली आणि आज ती या गाडीचं अभिमानास्पद भूषण आणि ओळख बनली आहे!

या पुढे कुठल्याही व्यक्ती भारतीय रेल्वेविषयी बोलत असतील तर त्यांना प्रवासापेक्षा जास्त माणुसकीचं अनोखं, अद्भुत दर्शन घडवणाऱ्या सेवेबद्दल आवर्जून सांगायला विसरू नका.

औदार्य, विश्वास आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी ही सेवा हा चमत्कार आहे.

अनुवाद : श्री प्रकाश चान्दे

प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अंतिम सत्य : म्हाताऱ्यांसाठी…’ – लेखक :डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘अंतिम सत्य : म्हाताऱ्यांसाठी…’ – लेखक :डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै 

१) पुरुष म्हातारा होतो, स्त्रिया वयस्कर होतात.

२) पुरुषाने त्याच्या मुलामुलींची लग्ने पार पाडल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतल्यानंतर, त्याचे कुटुंबातील जेष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते.

३) नंतर त्याला कुटुंबावर एक ओझे म्हणूनच वागवले जाते. एक विक्षिप्त, कटकट्या, अप्रत्याशित म्हातारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.

४) त्याने पूर्वी मुलांच्या व पत्नीच्या संदर्भाने घेतलेल्या कठोर निर्णयाची चिरफाड या काळात करीत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दोषीच ठरवले जाते. त्याने जर खरोखर चुका केल्या असतील तर देवच त्याचे रक्षण करो.

५) वयस्कर स्त्रीकडे मात्र मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहीले जाते, कारण तिच्याकडून करुन घेण्यासारख्या गोष्टी अजूनही असतात.

६) वयस्कर स्त्री योग्य वेळी म्हाताऱ्याची पार्टी सोडून मुलांच्या व सुनांच्या पार्टीत निघून जाते.

७) म्हातारा वयाने जास्त असल्यास, त्याच्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये, आपली काळजी घ्यावी म्हणून वयस्कर स्त्री सुनेशी जमवून घेते.

८) पुर्वायुष्यामधे कितीही कर्तृत्व गाजवलेले असो, त्याची पुण्याई म्हातार्‍याच्या कामी येत नाही.

९) वयस्कर स्त्री मात्र पुर्वपुण्याईचे व्याज खाऊ शकते.

१०) ज्यांची वंशपरंपरा असलेली भरपूर शेती आहे (की ज्याचा मुलाबाळांना मोह पडू शकतो) त्यांची अवस्था थोडी बरी असते. ज्यांनी आपल्या पश्चात मुलांच्यात भांडणे नकोत म्हणून खातेफोड केलेली असेल तर त्यांच्याही नशिबी वर सांगितल्याप्रमाणेच हाल असतात. शक्यतो खातेफोड करुच नये.

११) कोणत्याही हॉस्पिटलमधे जाऊन बघा. म्हातारा ॲडमिट आहे की म्हातारी हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरून लगेच कळते. म्हातारा ॲडमिट असेल तर मुलगी सोडून कोणाच्याही डोळ्यात पाणी नसते.

१२) तात्पर्य : वय झाल्यावर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे. पुरुषच जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवावे. या जगात कोणीच कोणाचे नसते हे लक्षात घेऊन सर्वांतून अलिप्त राहून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगावे.

१३) माझा सल्ला, इतरांसाठी जगलेले आठवू नका, उगाळू तर अजिबात नका.

१४) पुराणातसुद्धा कोणत्या स्त्रीने वानप्रस्थाश्रम, संन्यास स्विकारल्याचा दाखला नाही.

१५) संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठीच स्मृतींनी सांगितले आहेत. याचे महत्त्व लक्षात घ्या. आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते याची खात्री पटेल.

लेखक: डॉ. शिरीष राजे, मानस शास्त्रज्ञ.

प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी ☆

सौ. ज्योती विलास जोशी

? विविधा ?

☆ अपेक्षा… ☆ सौ. ज्योती विलास जोशी 

अपेक्षाभंग झाला की विनोद घडतो, अपेक्षाभंग आश्चर्यही घडवतो आणि हाच अपेक्षाभंग दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा छोटीशी, खूप मोठी, किमान, वाजवी अशा अनेक प्रकारची.. किती वेगवेगळी रूप आहेत अपेक्षेची. अपेक्षांच माध्यम विचारच आहेत त्या विचारांची पोत सुधारली पाहिजे. जेणेकरून मन शांत, सुरक्षित भयरहित आणि निरोगी राहील. नाहीतर मात्र अपेक्षा ही मनशांतीच्या वाटेवरची अडसरच ठरते…..

अपेक्षा करायच्याच नाहीत का मग? लहान असताना हीच अपेक्षा रडण्याचे शस्त्र वापरून पूर्ण करून घेता येते. छोटी अपेक्षा बघता बघता विशाल रूप धारण करते…. हटवादी होऊ लागते… आणि मग त्याखाली सुखाचे क्षण, कृतज्ञता, जिव्हाळा, नाती, परिपक्वता सृजनशीलता गाडले जातात. या अपेक्षांना जेव्हा तडा जातो तेव्हा दुःख शेजारी येऊन बसतं. अपेक्षा भंगाचा डोंगर म्हणजेच हे दुःख… त्यामुळं सतत मनात येणारे नकारात्मक विचार मनावर इतके हावी व्हायला लागतात की सकारात्मक विचारांना शोधण्याचा विचारही मन करू शकत नाही. मनपाखरू खट्टू होतं, आजारी पडतं… शरीर नियंत्रित करणार्या ह्या मनातील बिघाड शरीरावर प्रतिबिंबित होतो पर्यायाने शरीरही थकतं.

हीच अपेक्षा अहंकाराचं देखील मूळ आहे. कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली, कधी आपली दुसऱ्याकडून असलेली अशी ही अपेक्षा! ह्या अपेक्षांना मात्र एक मर्यादा हवी… फुग्याला त्याच्या क्षमते बाहेर फुगवलं तर तो जसा फुटतो तसा या वाजवी अपेक्षांचा फुगा फुटला तर नैराश्याची हवा आसमंत व्यापते. अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबलं जाऊ लागतं आणि प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने चिडचिड वाढते.

अपेक्षा करणं हा मनुष्य स्वभाव धर्म आहे.

आई वडिलांची मुलाकडून, सासूची सुनेकडून, गुरुची शिष्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या अपेक्षांना हक्काची एक झालर आहे. त्या गृहीत धरल्या जातात. आपण आपल्या बद्दल ठेवलेल्या अपेक्षांशी जर मैत्री केली तर नकळतच अपेक्षा आणि आपलं मन यांच्या सुसंवाद सुरू होतो आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातल्या भावभावनांचं व्यवस्थापन करायचा जणू अपेक्षा चंग बांधते.

नात्यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय त्यामुळे आपल्याला आपलंसं केल्याची आपली भावना सुंदर असते पण परिस्थिती नेहमी तशी राहत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा हे या नात्यातला अडसर ठरते.

आपल्या दुसऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या अपेक्षांबाबत मात्र स्थितप्रज्ञ राहिलेलं बरं! जिथं आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करावे लागतात तिथे दुसऱ्या बद्दलच्या अपेक्षांवर आपला अंकुश असू शकत नाही त्यामुळे याबाबतीत अलिप्ततेचे धोरण शहाणपणाचं…..

शेवटी अपेक्षाभंग हे दुःखाचे मूळच! नाही का?

©  सौ ज्योती विलास जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

सुश्री नीलाम्बरी शिर्के

? मनमंजुषेतून ?

☆ वो दिन भी क्या दिन थे… लेखक : डॉ. संदीप खारकांडे ☆ प्रस्तुती – सुश्री नीलाम्बरी शिर्के ☆

(Yadon ke purane album mein chhupa ke rakhe hain humne woh din…) 

फुल पँटचचं  माझं दरवर्षीच स्वप्नं दोन हाफ पँट्स मध्ये दुभंगलं जायचं (जे दहावी नंतर पुर्ण झालं) म्हणजे आमच्या पप्पांचा तसा शिरस्ता असायचा, एका फुल पँटच्या कपड्यात दोन हाफ पँट्स होतात, हाफ बाह्यांचा शर्ट अर्धा मीटर कापड वाचवतो, तेवढाच शिलाईचा खर्च पण वाचतो.दोघा भावाभावांना एकाच तागयातले कापड, त्यामुळे शर्ट पँट शेम शेम,राम बलराम    

शिसपेन्सिली  .. त्या पण अर्ध्या अर्ध्या कापून वापरायच्या .. उद्देश एवढाच की महाशयांनी हरवली तर अर्धीच जावी , त्या नवीन पेन्सिली कापलेल्या पाहिल्या की उगीचच वाईट वाटायचं,असो ..

असं सगळं काटकसरीचं बालपण होतं ..

तसा मी ७-८ वी ला असल्यापासून मला बच्चनच्या खुप गोष्टींचं आकर्षण  होतं सिनेमे खूप नाही बघितले तरी पण … 

त्याचे costumes .. दीवार मधलं त्याचं जॅकेट ..  त्याच्या त्या फुटभर bottoms असणार्‍या पँट्स .. brittles नावाचा त्याचा कपाळाच्या मधून पडलेला भांग, घोड्याच्या डोळ्याला लावलेली झापडं तसे झाकलेले दोन्हीही कान असा त्याचा तो hair cut .. तरी पण आवडायचा,सिलसिला मधले high neck चे t shirts इत्यादि इत्यादि .. अशा एक ना अनेक गोष्टीच आकर्षण .. एकदा तरी तशी बच्चनस्टाइल करावी ..तसं जॅकेट .. तशी bellbottom घालावी नी कुठेतरी मिरवून यावं.. 

sholay मधला जय, शराबी मधला विकी, दीवार मधला विजय आणिक काय काय .. यातलं एक तरी नाव आई वडीलांनी का ठेवलं नाही आपलं, इथपर्यंत सुद्धा  पतंग उडायचे .. 

सगळी स्वप्नवत दुनिया .. लहानपणीची perceptions काही औरच असतात,कुणाला काहीही वाटो ‘दुनिया गयी भाड मे’ .. ‘मला काही फरक पडत नाही अशी’ 

पण सरड्याची धाव कुंपणापर्यंतच बरं का.. 

यापुढची बच्चनची कोणतीच ‘रेखा’ मी पार केली नाही.  

लेखक : डॉ. संदीप खारकांडे 

प्रस्तुती : सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… आई – भाग – ४४ / २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आई..

(आई जेव्हा गेली तेव्हा पप्पांचा धाकटा मावस भाऊ ज्याला आम्ही “पपी” म्हणायचो तो डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाला, “आज आम्ही खरे पोरके झालो! आई जाण्याचं दुःख काय असतं हे आज कळतंय.”) इथून पुढे — 

आई जितकी कडक आणि कठोर शिस्तीची होती तितकीच गंमतीदारही होती. तिला नाटक, सिनेमा, क्रिकेटची मॅच बघायला मनापासून आवडायचे. त्यात ती इतकी रमायची, इतकी गुंतायची की पडद्यावर जे काय घडत आहे ते काल्पनिक आहे, अभिनय आहे हेही ती विसरून जायची.

एकदा आम्ही सारे मणीरत्नम् चा एक चित्रपट पाहायला गेलो होतो. बहुतेक “बॉम्बे” हाच असावा. त्यात एक मुसळधार पावसाचा सीन होता. तो कोसळणारा पाऊस पाहून आई चटकन उठली आणि म्हणाली “अगंबाई गच्चीत वाल वाळत घातलेत की.. ” तेव्हा माझी धाकटी बहीण आईला हसत म्हणाली, “अगं आई हा चित्रपटातला पाऊस आहे. खरा नव्हे. तुझे वाल नाही भिजणार या पावसाने. ”

खेळात तिला नेहमी जिंकायलाच हवं असायचं. हरलेलं तिला चालायचंच नाही. क्रिकेटची मॅच बघताना सुद्धा कोणाचं शतक हुकलं, कोण शून्यावर आऊट झाला, तिच्यामते कोणी धाव घेऊ शकत होता आणि तरीही त्याने ती घेतली नाही तर तिची हळहळ प्रचंड असायची. तिच्या शेजारी बसून मॅच बघताना आम्हाला खूपच गंमत यायची. तिच्या कमेंट्स ऐकायला मजा वाटायची. टेलिव्हिजन तर खूप नंतर आला पण रेडिओवर पण ती त्याच आत्मियतेने क्रिकेटचं धावतं वर्णन ऐकत बसायची आणि भारताची हार होत आहे असं वाटलं की रेडिओ धाडकन बंद करायची.

तिला स्वतःलाही खेळायला खूप आवडायचं.

एकदा माथेरानला सहलीला गेलो असताना तिने तिथल्या कॅरम स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. स्त्री पुरुष संयुक्तपणे आणि एकेरी खेळत होते. त्यात आईने दोन्ही विभागात विजेतेपद पटकावलं होतं. तेव्हा तिला झालेला आनंद माझ्या आजही लक्षात आहे. एक लहान मुल तिच्यात कुठेतरी दडलेलं असावं.

आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोबांकडे जायचो तेव्हा सगळे मिळून आम्ही पत्त्यातला “झब्बू” हा खेळ आवडीने खेळायचो. एका डावात आईला सतत “झब्बू” मिळत होता आणि तिच्या हातातली पानं वाढत होती. ती हरणार हे निश्चित होतं. त्यावेळी तिने चिडून हातातले पत्ते टाकून दिले आणि रागात म्हणाली, ” तुम्ही खेळा. मला नाही खेळायचं. ” 

त्या दिवशी मात्र आईने खेळात फार रडी खाल्ली होती पण आयुष्याच्या खऱ्या खेळात मात्र तिने कधीच रडी खाल्ली नाही. ती नेटाने लढत राहिली. जिंकेपर्यंत हरत राहिली पण तिने तिचा आत्मविश्वास कधीही ढळू दिला नाही. आमच्या घराच्या मागच्या जागेत एका नवीन वास्तूचे बांधकाम चालू होते. ज्याच्या भरवशावर पप्पा ते बांधकाम करत होते त्यानेच पप्पांना फसवले. घुसखोरी करून त्याने त्या वस्तूत मालकी हक्क गाजवायला सुरुवात केली. अनेक वर्ष कोर्टात केस चालली. तारखांवर तारखा पडत होत्या पण विजयाची माळ काही गळ्यात पडत नव्हती. त्याच दरम्यान पप्पांचं निधन झालं आणि ध्यानीमनी नसताना आईवर फार मोठी जबाबदारी पडली पण आम्हा सर्वांच्या लक्षात राहील इतका कणखरपणा आणि खंबीरपणा आईने त्यावेळी दाखवला. तोपर्यंत तिचेही वय झाले होते आणि सतत जिजी आणि पप्पांच्या अदृश्य संरक्षक कवचातच ती राहिली होती पण यावेळेस ती आत्मविश्वासाने बाहेर पडली. कोर्टाची एक एक पायरी नेटाने चढत राहिली. त्यानंतरही कितीतरी वर्ष ही केस चालली पण अखेर ती जिंकली. त्या दिवशीचा तिचा आनंद अवर्णनीय होता. तिने हात उंचावून तो व्यक्तही केला. जणू काय तिने विश्व करंडकच जिंकला होता.

जिजी गेल्यानंतर आधारवृक्ष कोसळलेल्या वेलीसारखीच तिची अवस्था झाली असावी. शेवटच्या श्वासापर्यंत जिजीचा जीव आईच्यातच गुंतलेला होता. शेवटच्या क्षणी जिजी जे म्हणाली ते मात्र काहीसं गूढ होतं पण आईच्या डोक्यावर हात ठेवून ती म्हणाली होती, ” मालू सांभाळून, जपून राहा, माझ्यामागे तुला अकरा वर्ष जगायचं आहे. ”

ती अकरा वर्षं आईच्या आयुष्यातली खूप महत्त्वपूर्ण होती. त्याकाळात ती महिला मंडळात जात असे. तिथे होणाऱ्या कार्यक्रमात, स्पर्धांमध्ये, सोहळ्यांमध्ये मनापासून भाग घेत असे. अनेक बक्षीसंही तिने मिळवली. तिच्या या गुणांचे दर्शन तसं आम्हाला खूप उशिरा घडलं कारण आम्ही नेहमी पप्पांच्याच कर्तुत्ववानतेला सलाम केला. मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणतात तसंच काहीसं आईच्या बाबतीत झालं असेल.

याठिकाणी मला आईची एक आठवण सांगावीशी वाटते.

पपांकडे झोटींग नावाचा एक विद्यार्थी गणित शिकायला यायचा. हा झोटींग अतिशय “ढ” होता. त्याला साध्या बेरजा वजाबाक्या जमत नसत. पपा एक दिवस त्याला चिडून म्हणाले, ” अरे बाबा! तुला टांगासुद्धा हाकलता येणार नाही. ”आईला पपांचं हे बोलणं बिलकुल आवडलं नाही. झोटींग गेल्यावर आई पपांना ठामपणे म्हणाली, ”अहो सगळीच मुलं हुशार नसतात. हुशार मुलांना कुणीही शिकवेल पण झोटींगसारख्या मुलाला आत्मविश्वास मिळवून देणं ही तुमचीही कसोटी होती. त्यात तुम्ही सपशेल नापास! ”

पपा पूर्णपणे निरुत्तर होते.

नंतरच्या काळात मी एक दिवस आईला सहज विचारलं, ”आई तू हे सगळं सुरुवातीपासून का नाही केलंस? आमच्यासाठी तू फक्त खमंग कुरकुरीत चकल्या करणारी, चवदार भाजणीची ढीगभर थालीपीठं थापणारी, तेलावरच्या पातळ, मुऊसूत पुरणपोळ्या आणि तत्सम बरंच काही करणारीच का राहिलीस? आयुष्याच्या उत्तरार्धात तू तुझ्याठायी असलेल्या गुणांचं, छंदांचं जतन करतेस हेच आधी केलं असतंस तर?”

तेव्हा आई चटकन म्हणाली, ”बाळांनो! तेव्हा माझ्या जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या, मला तुम्हाला घडवायचं होतं. तुमची जडणघडण तुमची भविष्यं ही महत्त्वाची नव्हती का? माझ्यासाठी तेच महत्त्वाचं होतं आणि बाकी सारं दुय्यम होतं.”

आज जेव्हा मी आजच्या काळातल्या स्त्रीचा आणि त्या काळातल्या स्त्रीचा विचार करते तेव्हा कुणाचं पारडं जड, कुणाचं हलकं याचं मोजमाप करता येत नाही पण आई म्हणजे नक्की काय याचं आकलन मात्र कुठलेही अवजड, अलंकारिक, नित्य नियमाचे, घासलेले शब्द न वापरताही मला होते.

जे तेव्हा कळलं नाही ते आता कळतं. ”हा रंग गडद आहे. हा नाही शोभणार तुला. हे फिक्या रंगाचंच कापड घे. ”

तयार होउन बाहेर पडताना ती हमखास मला हटकायची. ”हे काय केस नाही नीट विंचरलेस? नुसती झिपरट दिसतेस. जा कंगवा घेउन ये. ” तेव्हा आईचा मला प्रचंड राग यायचा. पण आता त्यापाठीमागची आईची मायेची भावना जाणवते. आपलं हे सावळं, सौंदर्यात काहीसं डावच असलेलं लेकरुही चारचौघात सुंदर दिसावं एव्हढाच तिचा भोळा भाव होता. कारण “ती आई होती म्हणोनि.. ”

अखेरच्या काळात कुठलाही गीताभ्यास न केलेली माझी आई संपूर्ण विरक्त, तटस्थ झालेली होती. ज्या वास्तूत ती राहत होती ती तिच्या वडिलांनी तिला दिलेली अनमोल भेट होती पण तोही पसारा पेलवण्याची शक्ती न उरल्यामुळे आणि आपल्याच मुलींच्या भविष्याचा विचार करून आणि आपल्या मागे कुठल्याही प्रकारचे कलह होऊ नयेत या भावनेने आम्हा लेकी- जावयांवर विश्वास ठेवून तिने तिची अनमोल वास्तू विकण्याचाही निर्णय घेतला आणि बजावलाही. तेव्हा म्हणाली मात्र, ”आता मला घर नाही. ”थोडी गहिवरली. पण आम्ही तिला लगेच म्हणालो,” आता तुला पाच हक्काची घरं आहेत.” 

जेव्हा ती गेली तेव्हा तिने आम्हा पाचीजणींना जवळ घेतले. आमचे मुके घेतले. म्हणाली, ”मी भाग्यवान आहे. मी तृप्त आहे. माझ्या परिपूर्ण आणि सुखी जीवनासाठी मी ईश्वराची आभारी आहे. आता तुमचा निरोप घेते. सुखी रहा. एकमेकींवरची माया कायम ठेवा. आनंदाने जगा.” 

त्रिभुवनातली सारी संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याची किंमत तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या त्या दोन थेंबांच्या किंमतीपेक्षा कमीच राहील कारण ते एका मातेचे, आशीर्वाद देणारे अनमोल अश्रू होते. त्यात संस्कारांची अजोड ठेव होती. ती गेली पण आमच्या अंगणात आनंदी जीवनाचं झाड लावून गेली.

एक गूढ मागे राहिलं. ३१ डीसेंबर २००५ साली तिचं निधन झालं. जिजीच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी.

पपा गेले, जिजी गेली, आई गेली आणि आमचं बालपण काळाच्या ओघात वाहून गेलं.

 – क्रमश: भाग ४४ / २  – भाग ४४ समाप्त..

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆

(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)

काही उदाहरणं सांगता येतील की, काय काय प्रकारचे नियम आपण ठेवू शकतो. एक तर रात्री एक वेळ ठरवायची आठ-नऊ जी ठरवली असेल त्या नंतर कोणीच कुठलाच स्क्रीन वापरायचा नाही… टीव्ही असो लॅपटॉप असो की फोन. अवघड वाटतं ना कधी कधी ऐकायला! तर कोणीच स्क्रीन वापरायचा नाही, हे करता येईल. याचा फायदा असा होतो की, झोप शांत लागते. आपण स्क्रीनकडे बघत राहिलो ना तर आपल्या मेंदूला संदेशच जात नाही की आता रात्र झालीय. आता झोप यायला पाहिजे. कारण सतत आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो. जेव्हा अंधार होतो तेव्हा मेंदूला संदेश जातो की रात्र झाली आता झोप यायला पाहिजे. तर रात्री किती वाजता फोन बंद करायचा याचा एक नियम घरी ठरवता येईल. मग त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो आपण सगळे मिळून एकत्र गप्पा मारू शकतो, एखादा गेम खेळू शकतो वा असंचं काहीतरी… अभ्यास, वाचन या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून एक नियम असा करता येईल की आपण जिथे झोपतो त्याच्या शेजारी फोन ठेवायचा नाही. बहुतेकांना सवय असते फोनवर गजर लावायची. समजा रात्रीबेरात्री जर का जाग आली तर आपण बघतो की काही मेसेज आलाय का वगैरे. झोपेतून जाग येऊन प्रकाशाकडे परत बघणं हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी ती खूप घातक गोष्ट असते. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती नसते की या सगळ्यांमध्ये त्यातून निघणारी रेडिएशन्स शरीरासाठी घातक असतात. म्हणून अशाप्रकारे फोन सतत आपल्या जवळ असणारे चुकीचे आहे. रात्री तर लांबच ठेवायला पाहिजे. म्हणून आम्ही कित्येक वेळा असं पालक सभेत सांगतो की, गजराचं घड्याळ होतं ना पूर्वी तसं आणा सगळ्यांनी आणि आता ते घड्याळ वापरायला लागा. अजून एक नियम की संध्याकाळी मुलांनी मैदानी खेळ खेळायला जायला हवे. मुलांचे व्हिडिओ गेम वगैरे काही असेल ते खेळायला एक आपण टाईम लिमिट ठेवू शकतो. मुलं कोणते गेम खेळतात त्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. कारण हे गेम प्रचंड एडीक्टिंग असतात. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. मुलं जे गेम खेळतात त्याच्यात मारणं, रक्तपात या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये या गोष्टी विषयी काही वाटेनासे होते. आणि म्हणूनच मित्रांमध्ये थोडे जरी मतभेद झाले, भांडण झाले तरी एखाद्याचा ते प्रत्यक्ष खूनही करतात. या सगळ्यांचे प्रमाण खूप वाढत जाते. त्यांना गेम जिंकण्याचंही त्यांना व्यसन लागतं. त्यामुळे गेमसाठी एक टाइम लिमिट पाहिजे. आपली मुलं कुठला गेम खेळतात त्याच्यावरती पालकांचे लक्ष पाहिजे. असे अनेक प्रकारचे नियम आम्ही आजकाल पालकांना सांगत असतो.

शेवटी मला जे लोक नेहमी विचारत असतात की, कोणी व्यसनाकडे वळूच नये म्हणून त्यासाठी एकूणच तुम्ही काय उपाय सांगू शकता? आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुटुंबात आपण सर्वांनी रात्रीचे जेवण जर का एकत्र केलं तर खूप छान संवाद होऊ शकतो. अर्थातच तेव्हा पालकांना मला एक वेगळी सूचना द्यायला लागते की, जेवताना मुलांचे मार्क, अभ्यास हा विषय काढू नका. आज दिवसभर मी काय केलं, आज माझ्या ऑफिसमध्ये किंवा दिवसभरामध्ये खूप छान गोष्ट काय झाली असा पालकांनी संवाद साधायला सुरुवात केली की मग मुलांना पण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे काही घरांमध्ये एटिट्युड बदलते. मुलं मग आज काय झालं, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता कशी वाटते, असं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. त्याच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो. टेकडीवर जाणं, एकत्र व्यायाम करणे, या गोष्टींनी एक संवाद चांगला होऊ शकतो. मुलं जे प्रश्न विचारतात त्यांना योग्य उत्तर देणं महत्वाचा असतो अन्यथा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.

याबाबतीतली आमच्याकडे आलेली एक केस सांगते. आमच्याकडे आलेला एक मुलगा आठवीपर्यंत अगदी छान गुड बॉय प्रकारचा म्हणतात असा होता. एकदा तो शाळेतून घरी येत होता. आठवीत असताना त्यांनी बघितलं की, त्याच्या शाळेतली काही मोठी मुलं होती ती सिगरेट ओढत होती. त्याला पण उत्सुकता निर्माण झाली. घरी आल्यावर अगदी इनोसंटली त्यानं आईला विचारलं की, ‘आई माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती. मी पण ओढून बघू कसं वाटतं सिगरेट ओढल्यावर ते? ‘ 

हे ऐकल्यावर आई एवढी भडकली आणि त्याला एवढी रागवली की विचारता सोय नाही. पण मुलाची उत्सुकता काही शमली नाही. आईच्या चिडण्यामुळे तो प्रश्न त्याच्या मनात तसाच राहिला. दुसऱ्या दिवशीच सिगरेट ओढणाऱ्या त्या मुलांना त्याने तो प्रश्न विचारला. तर ती मुलं म्हणाली, ‘ तू आता मोठा झाला आहेस तेव्हा ओढायलाच पाहिजे सिगरेट. ‘ असं म्हणून त्याला सिगारेट ओढायला दिली. ती त्याच्या व्यसनाची सुरुवात होती. जनरली कुठलाही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट, तंबाखूपासून होते. तशी त्या मुलाची झाली आणि मग पुढे त्याच्या आयुष्यामध्ये इतर व्यसनंसुद्धा त्याला लागली. खरं तर त्याची आई त्याला समजेल अशा भाषेत छान उत्तर देऊ शकली असती आणि त्याने ऐकलंही असतं. खूप निरागसपणे तो हा प्रश्न विचारत होता. आईने त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगितले असते तर त्याला व्यसन लागले नसते. समजा तिला उत्तर येत नसेल तर ती डॉक्टरकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे मुलाला घेऊन जाऊ शकली असती. त्याचे काय काय दुष्परिणाम होतात त्यांच्याकडून त्याला कळले असते. पण तिने संवादाची खूप छान संधी गमावली. सांगायचा मुद्दा हा की, मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कुठलाही प्रकारच्या व्यसनाबाबत योग्य उत्तर देणे, योग्य माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे.

दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपण आनंदी राहावं. पण त्यासाठी नशा करायला हवीच असे नाही. आनंद हा काही फक्त वाईट गोष्टीतूनच मिळवायला पाहिजे असं नाही आणि तो काही खरा आनंद नसतोच. कारण नशेतून जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक आनंद असतो. पण त्याची व्यसनाधीन माणसाला खूप मोठी किंमत द्यायला लागते. आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. वेगवेगळे छंद आहेत, वाचन आहे, वेगवेगळे खेळ, व्यायाम, संगीत अशा कितीतरी गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे कुठल्यातरी छंदांमध्ये मुलांना आपण गुंतवू शकतो. आपण स्वतःही अशा प्रकारे आनंद घेऊ शकतो. तुम्ही माझ्या बाबाची पुस्तके वाचली असतील तर त्यातून तुम्हाला कळले असेलच की, बाबांना खूप वेगवेगळे छंद होते. बासरी वाजवायचा, चित्र काढायचा, ओरिगामी, लेखन वगैरे तर होतंच. अनेकदा घरी पण बाबा नेहमी असं म्हणायचे की, माझी सिगरेट कुठली तर माझी बासरी हीच माझी सिगरेट आहे! मग सकाळी बाबांच्या असा ठरलेला डायलॉग असायचा… आता मी तिचा एक झुरका मारतो आणि मग बासरी वाजवायचे. मग किती चांगला धूर यायचा ना त्या बासरीतून सुरांचा! काही नुकसान होत नाही अशा नशेतून, उलट आनंदच मिळतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, नशा अशा गोष्टीतनं आली पाहिजे ज्याच्यामुळे आपलं नुकसान व्हायला नको आणि इतरांचही नाही. आनंदामध्ये सर्वांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. व्यायाम केल्यामुळे पण एक प्रकारे नशा आल्याचा आपल्याला फिल येतो. अशा प्रकारे जेव्हा चांगल्या पर्यायी नशा मिळतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात किती चांगले बदल घडू शकतात याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, राहुल जाधव त्याचं नाव. काही वर्षांपूर्वी राहुल आमच्याकडे झाला तेव्हा त्यांना दारू बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं सुद्धा व्यसन होतं. तो मुंबईचा होता… डोंबिवलीला रहाणारा होता. मुंबईच्या गॅंगवॉरबद्दल ऐकलं असेल तर त्या तो गॅंग मध्ये होता. गणपती वगैरे आले की त्यामुळे जी काही नोकरी मिळेल ती पण त्याची नोकरी जायची. फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढत होतं, चिडचिड वाढत होती. राहुल म्हणाला की, ‘मी एवढ्या जोरात पळतो पोलीस कायम माझ्या मागे असले तरी मी धूम ठोकायचो. ‘ त्या त्याच्या पाळण्याच्या गुणामुळेच फुल मॅरेथॉन मध्ये पळायचं त्याचं एक स्वप्न होतं. जेव्हा त्यानं ती पूर्ण केली आणि तो त्या पोलीस स्टेशनला गेला, जिथे त्याला कायम हजेरी द्यायला जायला लागायचं आणि अपमान वगैरे केले जायचा. तिथे तो ते मेडल आणि फोटो घेऊन जेव्हा गेला तेव्हा त्या पोलिसांनी त्याला सॅल्यूट ठोकला. तेव्हा राहुल खूप बरं वाटलं, आनंद झाला. रोज तो 50 किलोमीटर पेक्षा जास्त पळत असतो. कोविडच्या आधीच्या वर्षांमध्ये मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते थेट दिल्लीच्या इंडिया गेट पर्यंतचे अंतर त्याने 21 दिवसांमध्ये कापलं. मुंबई ते दिल्ली पळताना तो वाटेतल्या सर्व गावांमधील व्यसनमुक्ती केंद्रांना भेट देत गेला. तिथे त्याने मोटिवेशनल लेक्चर्स दिली. आता राहुल आमच्याकडेच काम करतो. त्याचे लग्न झालेय. राहुलवर आता एक वेब सिरीज येणारेय. आमच्याकडे अशी हजारो उदाहरणे आहेत की व्यसन सोडल्यानंतर त्यांचं आयुष्य किती चांगलं बदललंय. एवढेच करायला लागतं की त्यांना काहीतरी दुसरं एक चांगलं काम करण्याच्या मार्गाची ओळख करून द्यायला लागते. त्याची ओळख झाल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून जातं.

असं असलं तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यसनाधीनता हा प्रश्न तर वाढतो आहे. पण आपण त्याचा प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे उपाय सुद्धा आपल्या हातात आहेत. आपण पालक म्हणून, कोणी शिक्षक असा, तुमच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असाल, आपल्या प्रत्येकाला जे जे शक्य आहे असा प्रत्येकजण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. जे आपल्या सहवासात येतात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यसनातून बाहेर पडायला आपण मदत नक्कीच करू शकतो. आज मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला या भागातले खूपसे :मुक्तांगण मित्र’ सुद्धा इथे उपस्थित आहेत. इथे सांगली भागामध्ये कोणालाही असं वाटलं की कोणाला व्यसनाची समस्या आहे तर इथल्या मित्रांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मला खूप छान वाटतंय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण खूप छान आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. हा माझा खूप मोठा सन्मान आहे की हा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.

— समाप्त —

संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – आलेख ☆ अभी अभी # 698 ⇒ घराना ☆ श्री प्रदीप शर्मा ☆

श्री प्रदीप शर्मा

(वरिष्ठ साहित्यकार श्री प्रदीप शर्मा जी द्वारा हमारे प्रबुद्ध पाठकों के लिए साप्ताहिक स्तम्भ “अभी अभी” के लिए आभार।आप प्रतिदिन इस स्तम्भ के अंतर्गत श्री प्रदीप शर्मा जी के चर्चित आलेख पढ़ सकेंगे। आज प्रस्तुत है आपका आलेख – “घराना।)

?अभी अभी # 698 ⇒ घराना ? श्री प्रदीप शर्मा  ?

मेरा नाम राजू, घराना अनाम, बहती है गंगा,

जहां मेरा धाम …

लेकिन सभी जानते हैं, कपूर खानदान के इस चिराग का भी एक सेमी क्लासिकल फिल्म संगीत का घराना था, जिसमें शंकर जयकिशन, शैलेंद्र हसरत और मुकेश ने मिलकर जो गीतों की बरसात शुरू की थी, उसने मेरा नाम जोकर तक थकने का नाम नहीं लिया था। और जहां तक नाम का सवाल है, तो पृथ्वी थिएटर से शुरू इस कपूर परिवार के अभिनय का करिश्मा आज भी कायम है।

घराना गर्व और गौरव का विषय है, अच्छे घराने की बहू के लिए ही गृह लक्ष्मी जैसे विशेषणों का प्रयोग किया जाता था। राजघरानों में आज हम भले ही केवल होलकर और सिंधिया राजघरानों तक ही सिमटकर रह गए हों, लेकिन शास्त्रीय संगीत के घरानों की बात तो कुछ और ही है।।

नृत्य और संगीत हमें स्वर्ग की नहीं, गंधर्व लोक की देन हैं, सवाई गंधर्व और कुमार गंधर्व इनके प्रत्यक्ष प्रमाण हैं। आप मानें या ना मानें, संगीत के घरानों और राजघरानों का आपसी संबंध बहुत पुराना है। आइए कुछ संगीत घरानों की चर्चा करें।

भारतीय शास्त्रीय संगीत और नृत्य की वह परंपरा है जो एक ही श्रेणी की कला को कुछ विशेषताओं के कारण दो या अनेक उप श्रेणियों में बाँटती है।।

घराना (परिवार, कुटुंब), हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत की विशिष्ट शैली है, क्योंकि हिंदुस्तानी संगीत बहुत विशाल भौगोलिक क्षेत्र में विस्तृत है, कालांतर में इसमें अनेक भाषाई तथा शैलीगत बदलाव आए हैं। घराना शब्द हिंदी शब्द ‘घर’ से आया है जिसका अर्थ है ‘घर’। यह आमतौर पर उस स्थान को संदर्भित करता है जहां संगीत विचारधारा की उत्पत्ति हुई; उदाहरण के लिए, ख्याल गायन के लिए प्रसिद्ध कुछ घराने हैं: दिल्ली, आगरा, ग्वालियर, इंदौर, अतरौली-जयपुर, किराना और पटियाला।

इसके अलावा शास्त्रीय संगीत की गुरु-शिष्य परंपरा में प्रत्येक गुरु व उस्ताद अपने हाव-भाव अपने शिष्यों की जमात को देता जाता है। घराना किसी क्षेत्र विशेष का प्रतीक होने के अलावा, व्यक्तिगत आदतों की पहचान बन गया है, यह परंपरा ज़्यादातर संगीत शिक्षा के पारंपरिक तरीके तथा संचार सुविधाओं के अभाव के कारण फली-फूली, क्योंकि इन परिस्थितियों में शिष्यों की पहुँच संगीत की अन्य शैलियों तक बन नहीं पाती थी।

हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीत के गायन के लिये प्रसिद्ध घरानों में से निम्न घराने शामिल होते हैं: आगरा, ग्वालियर, इंदौर, जयपुर, किराना, और पटियाला।

सबसे पुराना ग्वालियर घराना है। तानसेन भी ग्वालियर से ही आए थे। हस्सू हद्दू खाँ के दादा नत्थन पीरबख्श को इस घराने का जन्मदाता कहा जाता है। दिल्ली के राजा ने इनको अपने पास बुला लिया था।।

जरा इन गायकों और उनके घरानों पर भी गौर कर लिया जाए ;

१. मेवाती घराना – पंडित जसराज

२.पटियाला घराना – उस्ताद बड़े गुलाम अली खां, बेगम अख्तर, निर्मला देवी और परवीन सुल्ताना

३. जयपुर अंतरौली घराना – मल्लिकार्जुन मंसूर, किशोरी अमोनकर और अश्विनी भिड़े।

४. किराना घराना – भीमसेन जोशी 

५. आगरा घराना – जितेंद्र अभिषेकी

इन घरानों की शुद्धता, मर्यादा और अनुशासन का पालन शिष्यों को भी करना पड़ता है। गुरु शिष्य परम्परा यूं ही फलीभूत नहीं होती।

ना मिलावट ना खोट यही शास्त्रीय संगीत की पहचान है। एक भी सुर गलत नहीं।

धारवाड़, कर्नाटक से आए, घराने की बंदिश से अपने को मुक्त रखते हुए, लोक संगीत को शास्त्रीय संगीत की ऊंचाईयों तक पहुंचाने वाले कुमार गंधर्व स्वयं अपने आपमें एक घराना हैं।।

♥ ♥ ♥ ♥ ♥

© श्री प्रदीप शर्मा

संपर्क – १०१, साहिल रिजेंसी, रोबोट स्क्वायर, MR 9, इंदौर

मो 8319180002

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares