सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “व्यर्थ न हो बलिदान…☆ सुश्री शोभा जोशी ☆

९ जून हा भगवान बिरसा मुण्डा यांचा बलिदान दिवस. माणूस जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्युची तारीख ठरलेली असते असं म्हणतात. जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. त्यावर माणसांची सत्ता नाही. पण जन्म आणि मृत्यु या मधल्या काळावर मात्र माणसाची सत्ता असते. तो काळ तुम्ही कसा व्यतीत करता यावर तुमच्या जन्माचे सार्थक अवलंबून असते.

इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांचे जीवन सार्थकी लागले. जनजातीतील अशा हुतात्म्यांमध्ये बिरसा मुण्डा यांचे नाव अग्रणी आहे. आपला धर्म, आदिवासी परंपरा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकांनी ख्रिश्र्चन पाद्र्यांच्या जाळ्यात अडकून आपला धर्म बदलू नये म्हणून केलेले प्रयत्न आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

बिरसांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ह्या दिवशी, वडिल सुगाना मुण्डा आणि आई कर्मी यांच्या पोटी झारखंड मधील उलिहातू गावी झाला. हे मुण्डा कुटुंब अत्यंत गरीब होते. गावोगावी जाऊन मोलमजूरी करून पोट भरत असे.

परिस्थिती वशात मुण्डा कुटुंबाने ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला आणि बिरसाला ख्रिश्र्चन मिशनर्‍यांच्या शाळेत घातले. तिथे जेवणात दिले जाणारे गायीचे मांस आणि त्याला शेंडी कापण्यासाठी केलेली सक्ती, याविध्द बिरसांनी बंड पुकारले. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.

इथूनच बिरसांच्या इंग्रजांविरूध्दच्या संघर्षाला सुरूवात झाली. ते दोन पातळ्यांवर इंग्रजांशी संघर्ष करीत होते. एक म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर ख्रिश्र्चन धर्माचे आक्रमण होऊ नये म्हणून आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी.

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. बिरसांची आनंद पांडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून ते खूप गोष्टी शिकले.

हिंदू धर्माचे रक्षण. . . आनंद पांडे यांच्याकडे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. आपल्या रामायण, महाभारत, गीता इ. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. ख्रिश्र्चन पाद्री, जनजाती समाजाला निरनिराळी प्रलोभने दाखवून ख्रिश्र्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. पण बिरसाने लोकांना पटवून दिले की. . .

धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम।न तत्सेवेत मेधावी न हि तध्दितमुच्यते।।

धर्मास सोडून असलेले कर्म जरी महाफलदायी असलेतरी बुध्दिमानाने ते करू नये कारण ते हितकारक आहे असे कोठेही सांगितलेले नाही. असा उपदेश करून अनेक लोकांना त्यांनी ख्रिश्र्चन होण्यापासून परावृत्त केले.

त्यांनी बिरसाईयत पंथाची स्थापना करून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. भगवान बिरसा मुण्डा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, अस्तित्व वअस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष. . . . बिरसांचा लोकांवरील वाढता प्रभाव बघून ख्रिश्र्चन पाद्र्यांनी इंग्रज अधिकार्‍याकडे तक्रार केली की, बिरसा हा हिंदू सन्यासी, आदिवासींचा राजा होऊ पाहातो आहे तो ब्रिटिशांविरूध्द जनतेला भडकावतो आहे. या तक्रारीवरून बिरसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले. पण ग्रामस्थांनी सक्त विरोध करून बिरसांना पकडायला आलेल्या सशस्र पोलिसांशी तीव्र लढा दिला व त्यांना परत पाठवले. पण शेवटी छल कपटाने २५ आॅगस्ट १८९५ रोजी पोलिसांनी

अटक करून बिरसांना हजारीबाग तुरूंगात ठेवले.

३० नोव्हेंबर१८९७ रोजी बिरसा तुरूंगातून मुक्त झाले. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या हजारो लोकांची त्यांनी शिस्तबध्द संघटना बांधली आणि त्यांना इंग्रजांविरूध्द उठाव करण्यास प्रेरित केले. त्याला उलगुलान (क्रांती) नाव देण्यात आले. २४ डिसेंबर १८९९ यादिवशी उठाव करण्याचे निश्र्चित केले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिस चौक्या, शासकीय कार्यालये, गोदामे यांच्यावर हल्ले करण्यात आले. इंग्रज शासक, ख्रिश्र्चन पाद्री, आणि आमचे शोषण करणारे आमचेच लोक (उदा. जमीनदार, सावकार इ. )यांना त्यांनी प्रमुख शत्रू म्हणून घोषित केले.

९ जानेवारी १९०० रोजी बिरसांनी जोजोहातूच्या जवळील डोमबारी टेकड्यांवर एक सभा आयोजित केली या सभेत हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले होते. तेथील आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांना ही बातमी समजताच त्यांनी संपूर्ण डोंगराला आपल्या सैन्याचा वेढा दिला. आणि लोकांवर बेछूट गोळीबार केला.

इंग्रजांच्या बंदुकांपुढे बिरसांच्या सेनेच्या, धन्युष्यबाण, भाले यांचा निभाव लागला नाही. हजारो बायका, मुले, पुरूष मृत्युमुखी पडले.

बिरसा तिथून कसेतरी निसटलेआणि जंगलात लपून राहिले व तिथून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणार्‍यास ५००/-रू. चं बक्षीस जाहिर केलं. पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. पण बिरसा हाती लागले नाहीत.

“कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ “अशी आपल्याकडे म्हण आहे. शेवटी फंदफितुरी झाली आणि ३ फेब्रु. १९०० रोजी पोलिसांनी बिरसांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. शेवटी ९ जून १९०० या दिवशी रक्ताची उलटी होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांना विष देऊन मारण्यात आले असाही संशय व्यक्त करण्यात येतो.

त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. . . . बिरसांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून छोटा नागपूर क्षेत्रात सरकारने जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. त्यांच्या उपदेशामुळे मुण्डांच्या समाज जीवनात अमुलाग्र बदल झाला. अनेक क्षेत्रात मुण्डा आजही चमकदार कामगिरी करताना दिसतात. बिरसांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. जनजातीतील ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ रांची विमानतळाला त्यांचे नाव दिले आहे. १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे.

बिरसांनी भारतीय संस्कृती, परंपरा, स्वधर्माचे रक्षण करत स्वातंत्र्य लढ्यात कर्तव्याच्या रणभूमीवर मृत्युला आलिंगन दिले.

९ जून या त्यांच्या बलिदान दिनी आमचे त्यांना शतशः प्रणाम.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments