सुश्री सुलभा तेरणीकर
इंद्रधनुष्य
☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
रेल्वेच्या भारतात दररोज सुमारे तेरा हजार गाड्या धावतात. या गाड्यांतून 2 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पण या तेरा हजार गाड्यांत फक्त एकच गाडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचं वैशिष्ट्य वेग, आरामदायी सुखसोयी अथवा आधुनिक तंत्रज्ञान नाही; तर त्या गाडीत मिळणारी दयाळू, माणुसकीची वागणूक!
या गाडीचं नाव ‘ सचखंड एक्स्प्रेस ‘!
अख्ख्या भारतात सलग 35 तास आणि 2, 000 कि. मी. प्रवास करणारी आणि महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना जोडणारी ही एकच अशी गाडी आहे की जिच्यातील प्रवाशांना दररोज सकाळची न्याहरी, दुपारचं भोजन आणि सायंकाळचं भोजन मोफत मिळतं.
‘सचखंड एक्प्रेस‘ (नं. 12715) ही गाडी महाराष्ट्रातील नांदेड आणि पंजाब राज्यांतील अमृतसर या शिखांच्या दोन पवित्र शहरांदरम्यान धावते.
या गाडीनं प्रवास करणाऱ्यांना ताजं घरगुती भोजन, एकही रुपया न आकारता, मोफत दिलं जातं. कढी भात, भाजी, आणि ताज्या पोळ्या या हसतमुखानं दिल्या जातात.
हे अन्न गाडीतील भटारखान्यात शिजवलं जात नाही; तर वाटेतील ज्या ज्या गावी गुरुद्वारा असतील त्या त्या गावांत शिजवलं जातं आणि त्या त्या गावातील स्वयंसेवक ते गाडीवर आणून प्रवाशांना देतात.
शिखांच्या ‘ लंगर ‘ मध्ये दररोज कुणाही गरीब, श्रीमंत, स्थानिक, अनोळखी किंवा बाहेरगावच्या व्यक्तीला त्या वेळचं अन्न मानानं दिलं जातं; त्या प्रथेला अनुसरूनच या गाडीत हे अन्न दररोज सर्व प्रवाशांना दिलं जातं.
हा अनोखा, अद्भुत आणि माणुसकी जागवणारा उपक्रम 1995 पासून सुरु झाला; आणि गेली 30 वर्षे तो अव्याहतपणे चालू आहे! ही सेवा एकाच गावी पुरवली जात नाही. वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या गावी ही सेवा पुरवली जाते.
या गावांची अधिकृत यादी अशी नाही; पण वाटेत लागणाऱ्या छ. संभाजी महाराज नगर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, दिल्ली आणि लुधियाना अशा शहरांत ही सेवा पुरवली जाते. ही सेवा रेल्वेच्या उपाहारगृहांतर्फे चालवली जात नसल्यामुळे हे अन्न घेणाऱ्यांना स्वत:ची थाळी, प्लेट, खाण्याचा डबा स्वतः बरोबर असणं आवश्यक आहे.
ही सेवा करणारे स्वयंसेवक एक तर फलाटांवर चालत असतात अथवा डब्यांत शिरून, ज्यांना हवं आहे त्यांना, हे ताजं अन्न देत असतात.
आजकालच्या देणा — घेण्याच्या व्यवहारी जगात, हजारो किलो मीटरवर माणुसकी जागवणारी ही सेवा एक वेगळंच दर्शन घडवते. शिखांनी त्यांची माणुसकीची परंपरा जागवणारी ही सेवा चालू केली आणि आज ती या गाडीचं अभिमानास्पद भूषण आणि ओळख बनली आहे!
या पुढे कुठल्याही व्यक्ती भारतीय रेल्वेविषयी बोलत असतील तर त्यांना प्रवासापेक्षा जास्त माणुसकीचं अनोखं, अद्भुत दर्शन घडवणाऱ्या सेवेबद्दल आवर्जून सांगायला विसरू नका.
औदार्य, विश्वास आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी ही सेवा हा चमत्कार आहे.
अनुवाद : श्री प्रकाश चान्दे
प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈