श्री जगदीश काबरे
इंद्रधनुष्य
☆ “व्यसनमुक्ती : नव्या काळाची नवी आव्हाने – भाग-४ (सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांच्या व्याख्यानाचा तपशील) ☆ संकलन व प्रस्तुती – श्री जगदीश काबरे ☆
(या विषयावर पुण्यातील “ मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा “ च्या संचालिका सुश्री मुक्ता पुणतांबेकर यांनी व्याख्यानातून मांडलेले विचार.)
काही उदाहरणं सांगता येतील की, काय काय प्रकारचे नियम आपण ठेवू शकतो. एक तर रात्री एक वेळ ठरवायची आठ-नऊ जी ठरवली असेल त्या नंतर कोणीच कुठलाच स्क्रीन वापरायचा नाही… टीव्ही असो लॅपटॉप असो की फोन. अवघड वाटतं ना कधी कधी ऐकायला! तर कोणीच स्क्रीन वापरायचा नाही, हे करता येईल. याचा फायदा असा होतो की, झोप शांत लागते. आपण स्क्रीनकडे बघत राहिलो ना तर आपल्या मेंदूला संदेशच जात नाही की आता रात्र झालीय. आता झोप यायला पाहिजे. कारण सतत आपण प्रकाशाच्या सोर्सकडे बघत असतो. जेव्हा अंधार होतो तेव्हा मेंदूला संदेश जातो की रात्र झाली आता झोप यायला पाहिजे. तर रात्री किती वाजता फोन बंद करायचा याचा एक नियम घरी ठरवता येईल. मग त्याच्यानंतरचा जो वेळ असेल तो आपण सगळे मिळून एकत्र गप्पा मारू शकतो, एखादा गेम खेळू शकतो वा असंचं काहीतरी… अभ्यास, वाचन या सगळ्या गोष्टी करता येतील. अजून एक नियम असा करता येईल की आपण जिथे झोपतो त्याच्या शेजारी फोन ठेवायचा नाही. बहुतेकांना सवय असते फोनवर गजर लावायची. समजा रात्रीबेरात्री जर का जाग आली तर आपण बघतो की काही मेसेज आलाय का वगैरे. झोपेतून जाग येऊन प्रकाशाकडे परत बघणं हे डोळ्यांसाठी आणि मेंदूसाठी ती खूप घातक गोष्ट असते. अजून एक गोष्ट आपल्याला माहिती नसते की या सगळ्यांमध्ये त्यातून निघणारी रेडिएशन्स शरीरासाठी घातक असतात. म्हणून अशाप्रकारे फोन सतत आपल्या जवळ असणारे चुकीचे आहे. रात्री तर लांबच ठेवायला पाहिजे. म्हणून आम्ही कित्येक वेळा असं पालक सभेत सांगतो की, गजराचं घड्याळ होतं ना पूर्वी तसं आणा सगळ्यांनी आणि आता ते घड्याळ वापरायला लागा. अजून एक नियम की संध्याकाळी मुलांनी मैदानी खेळ खेळायला जायला हवे. मुलांचे व्हिडिओ गेम वगैरे काही असेल ते खेळायला एक आपण टाईम लिमिट ठेवू शकतो. मुलं कोणते गेम खेळतात त्याच्यावरती आपलं लक्ष पाहिजे. कारण हे गेम प्रचंड एडीक्टिंग असतात. त्याचं व्यसनामध्ये रूपांतर होऊ शकतं. मुलं जे गेम खेळतात त्याच्यात मारणं, रक्तपात या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे मुलांमध्ये या गोष्टी विषयी काही वाटेनासे होते. आणि म्हणूनच मित्रांमध्ये थोडे जरी मतभेद झाले, भांडण झाले तरी एखाद्याचा ते प्रत्यक्ष खूनही करतात. या सगळ्यांचे प्रमाण खूप वाढत जाते. त्यांना गेम जिंकण्याचंही त्यांना व्यसन लागतं. त्यामुळे गेमसाठी एक टाइम लिमिट पाहिजे. आपली मुलं कुठला गेम खेळतात त्याच्यावरती पालकांचे लक्ष पाहिजे. असे अनेक प्रकारचे नियम आम्ही आजकाल पालकांना सांगत असतो.
शेवटी मला जे लोक नेहमी विचारत असतात की, कोणी व्यसनाकडे वळूच नये म्हणून त्यासाठी एकूणच तुम्ही काय उपाय सांगू शकता? आत्ताच सांगितल्याप्रमाणे कुटुंबात आपण सर्वांनी रात्रीचे जेवण जर का एकत्र केलं तर खूप छान संवाद होऊ शकतो. अर्थातच तेव्हा पालकांना मला एक वेगळी सूचना द्यायला लागते की, जेवताना मुलांचे मार्क, अभ्यास हा विषय काढू नका. आज दिवसभर मी काय केलं, आज माझ्या ऑफिसमध्ये किंवा दिवसभरामध्ये खूप छान गोष्ट काय झाली असा पालकांनी संवाद साधायला सुरुवात केली की मग मुलांना पण ते खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यामुळे काही घरांमध्ये एटिट्युड बदलते. मुलं मग आज काय झालं, त्याच्याबद्दल मला कृतज्ञता कशी वाटते, असं खूप छान इंटरेस्टिंग गोष्टी बोलतात. त्याच्यामुळे संवाद चांगला होऊ शकतो. टेकडीवर जाणं, एकत्र व्यायाम करणे, या गोष्टींनी एक संवाद चांगला होऊ शकतो. मुलं जे प्रश्न विचारतात त्यांना योग्य उत्तर देणं महत्वाचा असतो अन्यथा मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतो.
याबाबतीतली आमच्याकडे आलेली एक केस सांगते. आमच्याकडे आलेला एक मुलगा आठवीपर्यंत अगदी छान गुड बॉय प्रकारचा म्हणतात असा होता. एकदा तो शाळेतून घरी येत होता. आठवीत असताना त्यांनी बघितलं की, त्याच्या शाळेतली काही मोठी मुलं होती ती सिगरेट ओढत होती. त्याला पण उत्सुकता निर्माण झाली. घरी आल्यावर अगदी इनोसंटली त्यानं आईला विचारलं की, ‘आई माझ्या शाळेतली मुलं सिगरेट ओढत होती. मी पण ओढून बघू कसं वाटतं सिगरेट ओढल्यावर ते? ‘
हे ऐकल्यावर आई एवढी भडकली आणि त्याला एवढी रागवली की विचारता सोय नाही. पण मुलाची उत्सुकता काही शमली नाही. आईच्या चिडण्यामुळे तो प्रश्न त्याच्या मनात तसाच राहिला. दुसऱ्या दिवशीच सिगरेट ओढणाऱ्या त्या मुलांना त्याने तो प्रश्न विचारला. तर ती मुलं म्हणाली, ‘ तू आता मोठा झाला आहेस तेव्हा ओढायलाच पाहिजे सिगरेट. ‘ असं म्हणून त्याला सिगारेट ओढायला दिली. ती त्याच्या व्यसनाची सुरुवात होती. जनरली कुठलाही व्यसनाची सुरुवात ही सिगरेट, तंबाखूपासून होते. तशी त्या मुलाची झाली आणि मग पुढे त्याच्या आयुष्यामध्ये इतर व्यसनंसुद्धा त्याला लागली. खरं तर त्याची आई त्याला समजेल अशा भाषेत छान उत्तर देऊ शकली असती आणि त्याने ऐकलंही असतं. खूप निरागसपणे तो हा प्रश्न विचारत होता. आईने त्याचे दुष्परिणाम काय आहेत हे सांगितले असते तर त्याला व्यसन लागले नसते. समजा तिला उत्तर येत नसेल तर ती डॉक्टरकडे किंवा एखाद्या एक्सपर्टकडे मुलाला घेऊन जाऊ शकली असती. त्याचे काय काय दुष्परिणाम होतात त्यांच्याकडून त्याला कळले असते. पण तिने संवादाची खूप छान संधी गमावली. सांगायचा मुद्दा हा की, मुलं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा कुठलाही प्रकारच्या व्यसनाबाबत योग्य उत्तर देणे, योग्य माहिती मुलांपर्यंत पोहोचवणं हे महत्त्वाचं आहे.
दुसरी गोष्ट आपल्या प्रत्येकालाच असं वाटत असतं की, आपण आनंदी राहावं. पण त्यासाठी नशा करायला हवीच असे नाही. आनंद हा काही फक्त वाईट गोष्टीतूनच मिळवायला पाहिजे असं नाही आणि तो काही खरा आनंद नसतोच. कारण नशेतून जो आनंद मिळतो तो खूप क्षणिक आनंद असतो. पण त्याची व्यसनाधीन माणसाला खूप मोठी किंमत द्यायला लागते. आनंद मिळवण्यासाठी खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत. वेगवेगळे छंद आहेत, वाचन आहे, वेगवेगळे खेळ, व्यायाम, संगीत अशा कितीतरी गोष्टी असू शकतात. तर अशा प्रकारे कुठल्यातरी छंदांमध्ये मुलांना आपण गुंतवू शकतो. आपण स्वतःही अशा प्रकारे आनंद घेऊ शकतो. तुम्ही माझ्या बाबाची पुस्तके वाचली असतील तर त्यातून तुम्हाला कळले असेलच की, बाबांना खूप वेगवेगळे छंद होते. बासरी वाजवायचा, चित्र काढायचा, ओरिगामी, लेखन वगैरे तर होतंच. अनेकदा घरी पण बाबा नेहमी असं म्हणायचे की, माझी सिगरेट कुठली तर माझी बासरी हीच माझी सिगरेट आहे! मग सकाळी बाबांच्या असा ठरलेला डायलॉग असायचा… आता मी तिचा एक झुरका मारतो आणि मग बासरी वाजवायचे. मग किती चांगला धूर यायचा ना त्या बासरीतून सुरांचा! काही नुकसान होत नाही अशा नशेतून, उलट आनंदच मिळतो. म्हणून मी नेहमी म्हणते की, नशा अशा गोष्टीतनं आली पाहिजे ज्याच्यामुळे आपलं नुकसान व्हायला नको आणि इतरांचही नाही. आनंदामध्ये सर्वांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. व्यायाम केल्यामुळे पण एक प्रकारे नशा आल्याचा आपल्याला फिल येतो. अशा प्रकारे जेव्हा चांगल्या पर्यायी नशा मिळतात तेव्हा माणसाच्या आयुष्यात किती चांगले बदल घडू शकतात याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगते, राहुल जाधव त्याचं नाव. काही वर्षांपूर्वी राहुल आमच्याकडे झाला तेव्हा त्यांना दारू बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रग्सचं सुद्धा व्यसन होतं. तो मुंबईचा होता… डोंबिवलीला रहाणारा होता. मुंबईच्या गॅंगवॉरबद्दल ऐकलं असेल तर त्या तो गॅंग मध्ये होता. गणपती वगैरे आले की त्यामुळे जी काही नोकरी मिळेल ती पण त्याची नोकरी जायची. फ्रस्ट्रेशन प्रचंड वाढत होतं, चिडचिड वाढत होती. राहुल म्हणाला की, ‘मी एवढ्या जोरात पळतो पोलीस कायम माझ्या मागे असले तरी मी धूम ठोकायचो. ‘ त्या त्याच्या पाळण्याच्या गुणामुळेच फुल मॅरेथॉन मध्ये पळायचं त्याचं एक स्वप्न होतं. जेव्हा त्यानं ती पूर्ण केली आणि तो त्या पोलीस स्टेशनला गेला, जिथे त्याला कायम हजेरी द्यायला जायला लागायचं आणि अपमान वगैरे केले जायचा. तिथे तो ते मेडल आणि फोटो घेऊन जेव्हा गेला तेव्हा त्या पोलिसांनी त्याला सॅल्यूट ठोकला. तेव्हा राहुल खूप बरं वाटलं, आनंद झाला. रोज तो 50 किलोमीटर पेक्षा जास्त पळत असतो. कोविडच्या आधीच्या वर्षांमध्ये मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून ते थेट दिल्लीच्या इंडिया गेट पर्यंतचे अंतर त्याने 21 दिवसांमध्ये कापलं. मुंबई ते दिल्ली पळताना तो वाटेतल्या सर्व गावांमधील व्यसनमुक्ती केंद्रांना भेट देत गेला. तिथे त्याने मोटिवेशनल लेक्चर्स दिली. आता राहुल आमच्याकडेच काम करतो. त्याचे लग्न झालेय. राहुलवर आता एक वेब सिरीज येणारेय. आमच्याकडे अशी हजारो उदाहरणे आहेत की व्यसन सोडल्यानंतर त्यांचं आयुष्य किती चांगलं बदललंय. एवढेच करायला लागतं की त्यांना काहीतरी दुसरं एक चांगलं काम करण्याच्या मार्गाची ओळख करून द्यायला लागते. त्याची ओळख झाल्यानंतर त्यांचं आयुष्यच बदलून जातं.
असं असलं तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यसनाधीनता हा प्रश्न तर वाढतो आहे. पण आपण त्याचा प्रतिबंध कसा करायचा, प्रिव्हेन्शन कसं करायचं याचे उपाय सुद्धा आपल्या हातात आहेत. आपण पालक म्हणून, कोणी शिक्षक असा, तुमच्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते असाल, आपल्या प्रत्येकाला जे जे शक्य आहे असा प्रत्येकजण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. जे आपल्या सहवासात येतात त्यांच्याशी संवाद साधून त्यांना व्यसनातून बाहेर पडायला आपण मदत नक्कीच करू शकतो. आज मला खूप आनंद होतोय की या कार्यक्रमाला या भागातले खूपसे :मुक्तांगण मित्र’ सुद्धा इथे उपस्थित आहेत. इथे सांगली भागामध्ये कोणालाही असं वाटलं की कोणाला व्यसनाची समस्या आहे तर इथल्या मित्रांना सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू. तर मला खूप छान वाटतंय एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण खूप छान आणि शांतपणे हे सगळं ऐकून घेतलं. हा माझा खूप मोठा सन्मान आहे की हा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची मला संधी मिळाली. मी तुमच्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.
— समाप्त —
संकलन व प्रस्तुती : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈