सौ राधिका भांडारकर
☆ माझी जडणघडण… ओळख – भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
ओळख
सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भटांची “केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” ही गझल मला फार आवडते. सुरुवातीला मला ही एक प्रणयभावनेची गझल वाटायची पण आयुष्याच्या एकेका टप्प्यावर जेव्हा जेव्हा मी ही गझल वाचत गेले तस तसे त्यातले खोल दडलेले अर्थ जाणवू लागले. हे प्रणयगीत नसून आयुष्यातली स्थित्यंतरे, एक पार केलेला टप्पा, उलटून गेलेला एक काळ याविषयी फार सुंदर भाष्य कवी सुरेश भट यांनी या गझलेत केलेलं आहे याची जाणीव झाली.
“केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली”
समजलंच नाही बालपण कधी संपलं! अचानक मिटलेले डोळे उघडावेत आणि नवी पहाट उगवलेली असावी तशी बाल्य संपल्याची, नवी वाट सुरू झाल्याची चटकन जाणीव झाली. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत होती.. अगदी तसेच झाले आणि लक्षात आले की माझ्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा आता पार झालेला आहे. तत्पूर्वी अनेक बदल जीवनात घडले. आमचं धोबी गल्लीतलं वास्तव्य संपलं. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर आणि राम मारुती रोडच्या सुरुवातीलाच असलेल्या आधुनिक, ऐसपैस, सर्वांसाठी वेगळ्या बेडरूम्स असलेला मागे पुढे बागेचं स्वप्न पूर्ण करणारी मोकळी जागा, चोवीस तास पाणी (हे फार महत्वाचं) वगैरे अनेक सुविधांचा “केदार” नावाचा बंगला पपांनी बांधला. खरं म्हणजे हा बंगला माझ्या आजोबांनी माझ्या आईला प्रेमाची भेट म्हणून दिला. “मालुने (म्हणजेच माझ्या आईने) एका चांगल्या ऐसपैस, सुख सोयी असलेल्या घरात राहावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कसं असतं ना! माझे पप्पा हे एक सेल्फमेड व्यक्तिमत्त्व होतं पण त्यांनी स्वाभिमानाचा दुराग्रह न बाळगता बापलेकी मधला एक प्रेमाचा धागा सांभाळला आणि मनापासून घर बांधणीच्या प्रक्रियेत भाग घेतला. वास्तविक बंगल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकही पैसा आजोबांकडून घेतला नाही नंतर पूर्ण रकमेचा चेक आजोबांनी पप्पांना दिला आणि तो मात्र त्यांनी प्रेमादर भावनेने स्वीकारला.
अर्थात इतक्या सुंदर घरात आमचं वास्तव्य असणार आहे यापुढे, ही कल्पना आम्हा सर्वांसाठी आनंदाची नक्कीच होती पण धोबी गल्लीचा निरोप घेताना मात्र फार म्हणजे फार जड गेले. हृदयाचा एक कप्पाच बंद झाल्यासारखे वाटले. ज्या वास्तूने, ज्या गल्लीने आम्हाला जन्मापासून घडवलं त्या सर्वांचा निरोप घेणं हे मुळीच सोपं नव्हतं याची जाणीव वास्तूचा उंबरठा ओलांडल्यानंतर पिळवटून गेली. काही जुनं सामान आम्ही त्याच घरात सोडून दिलं होतं पण एक दिवस जीजी एकटीच त्या घरी गेली आणि एका हातगाडीवरून ते सारं सोडलेलं सामान घेऊन आली. खरंच तेव्हा कळलं! ” महत्त्वाचं सामान नसतं, महत्त्वाच्या असतात त्या आठवणी! ”
आजही जीजी, हातगाडी आणि ते जुने सामान माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येतं.
एकच नव्हे तर पुढील आयुष्यात अनेक घरात मी राहिले. लग्नानंतरचे, सासरचे वाडा स्वरूप घर, त्यानंतर व्यवसायासाठी आम्ही दोघं जळगावला आलो तिथलं भाड्याचं वन बीएचके घर, नंतरचे आम्ही स्वतः बांधलेलं घर, मुलींची परदेशातील विदेशी धाटणीची प्रशस्त घरे आणि आता उतार वयातलं सह्याद्रीच्या कुशीतलं पुण्यातलं घर…… , इतकी सारी घरं असताना सुद्धा अगदी आज पर्यंत माझ्या स्वप्नात जर कुठलं घर येत असेल तर ते फक्त आणि फक्त धोबी गल्लीतलंच घर. तो जिना, तो उंबरठा, तो पायरीवरचा नळ, मागच्या गॅलरीत वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांचा वास आणि कितीतरी…
लिहिता लिहिता थोडी भरकटले कारण आज डोक्यात एक निराळाच विषय घेऊन लिहायला बसले होते.
तर आयुष्याचा एक टप्पा पूर्णपणे ओलांडला होता शिक्षण ही संपलं होतं. पुढे काय करायचं याचा निर्णय व्हायचा होता. सुरुवातीपासूनच आमच्या घरात, “तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यावेत” हाच जीवनाचा कन्सेप्ट होता. त्याप्रमाणे अजून पुढचे शिक्षण किंवा विवाह यामधला एक पर्याय मी निवडला तो म्हणजे नोकरी करणे.
त्या वेळी टक्केवारीनुसार अधिकतर स्त्रिया गृहिणी होत्या. नोकरी करणार्या स्रियांची संख्या खूप जास्त नव्हती.
पण कसे कोण जाणे मला लहानपणापासूनच वाटायचे आपण नोकरी करायची. पैसे कमवायचे.
म्हणजे आर्थिक सक्षमता वगैरे विचार नव्हते त्यामागे पण आपण कमावलेले पैसे, ते मनासारखे खर्च करायचे,
त्याचा कुणी हिशोब वगैरे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. या काही भावना मला सुखद वाटायच्या.
शाळेत असताना “खरी कमाई”अंतर्गत मी अक्षरश: कुणाचे अंगण झाडून दिले. कुणाचे तांदुळ निवडून दिले. कुणाच्या झाडांना पाणी घातलं आणि त्यांतून हातात पडणार्या काही नाण्यांची गंमत वाटायची. अर्थात ते पैसे शाळेकडे जमा व्हायचे अन् नंतर धर्मादाय. पण मेहनतीने पैसे कमावण्याचे समाधान वाटायचे.
मी वयाच्या अठराव्या वर्षापासून लहान मोठे समर जाॅब्स् केले. महाविद्यालये, बोर्डाच्या परिक्षांच्यावेळी पर्यवेक्षक
म्हणूनही काम केले. एका तासाला दहा रुपये मिळायचे. त्यावेळी दहा रुपयाला किंमत होती.
तुम्हाला गंमत सांगते, आम्ही लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत भाड्याची सायकल फिरवायला दोन आणे लागत. वडीलांशी करार असायचा, “अडीचकं” हा पाढा त्यांना बिनचूक, एका दमात म्हणून दाखवायचा मग ते मला दोन आणे द्यायचे. not a penny less not a penny more.!! खूप मोट्ठी कमाई वाटायची ती मला!!
पण ही सगळी किरकोळ कमाई. मजेची पण स्वत: पैसे मिळवण्याची मानसिकता इथूनच तयार झाली.
मी बी एस्सी झाले आणि घरात जाहीर केले “मी नोकरी करणार. “
बरीच उमेदवारी करावी लागली. अर्ज भरा, लेखी परीक्षा द्या, मुलाखतींना जा. पूर्व अनुभव नाही म्हणून नकारही पचवले. सुरवातीला मी रसायनशास्त्रातील पदवीधर म्हणून केमीकल इंडस्ट्रीत केमीस्ट म्हणून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. “हेक्स्ट” या विदेशी, औषधांच्या कंपनीत माझी उत्कृष्ट मुलाखतही झाली होती पण एक स्त्री म्हणून मला तो जॉब नाकारण्यात आला आणि माझ्याबरोबर शेवटपर्यंत असलेल्या एका मुलाला नेमणूक पत्र मिळाले. माझा प्रचंड पराभव होता तो! त्याहीपेक्षा मानसिक त्रास टोकाचा झाला. अजूनही वाटतं तेव्हा मला “सुधा मूर्ती”सारखे का होता आले नाही? माझ्यातली मुळातली बंडखोरी अशी लुळीपांगळी का झाली?
आतासारखे रेझ्युमे, सीव्ही, प्रोफाईल वगैरे लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणार्या संस्था नव्हत्या. माझे आजोबा
बँक आॅफ इंडीयात खूप वरच्या पदावर होते. (Chief Accountant) जरी तेव्हां ते निवृत्त असले तरी त्यांचा दबदबा होता. मी त्यांना सांगितलं, “मला तुमच्या बँकेत नोकरी मिळवून द्या!! “
त्यांनी नुसता नकारच दिला नाही तर ते म्हणाले, ” तू वाणीज्य शाखेची पदवीधर नसल्यामुळे तुला हा जाॅब मिळूच शकणार नाही. ”
पण बँकेच्या नोकरभरती च्या जाहिरातीत अशी कुठलीही अट नव्हती. ” “कुठल्याही शाखेत पदवीधर “एव्हढेच होते पण वशीलेबाजी हा प्रकार तेव्हा नव्हता इतका. त्यातून आजोबांची कठोर आणि कणखर तत्वे पण मीही त्यांचीच नात. त्यांना म्हटले, “तुमच्याच बँकेत मी नोकरी मिळवूनच दाखवेन तुम्हाला. “
अतिशय मेहनत, खटपट, प्रतीक्षा
पण अखेर नोकरी मिळाली. स्वीकारलेल्या आव्हानात यशस्वी झाले!!!
हो! पण त्यातही एक अनपेक्षित अडचण उभी राहिली होती. अंतीम नेमणूकीपूर्वी वैद्यकीय तपासणी होती. आणि त्यात मी चक्क नापास झाले. कुणाला खरंतरी का वाटाव? मी इतकी सुदृढ निरोगी असताना?
पण मला असा शेरा मिळाला. Less vision at left eye so medically unfit. Doctors certificate required.
आभाळ कोसळणं म्हणजे नक्की काय हे अनुभवले पण यावेळी मात्र आजोबा मदतीस धावले. त्यावेळी नेत्रचिकित्सक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले डॉ. चिटणीस आजोबांचे मित्र होते. त्यांनी नेत्रतपासणी केल्यानंतर सांगितले, ”काहीच मोठा प्राँब्लेम नाही. ही एक टेन्डन्सी आहे. ही मुलगी एकाच डोळ्याने पहाते, वाचते म्हणून हिचा दुसरा डोळा झोपून गेला. “अशी गंमतीदार कोटी करून मला सहजपणे त्यांनी फिटनेस सर्टीफिकेट दिले आणि हातातोंंडाशी आलेला निसटता घास पुन्हा मुखी गेला. गंगेत घोडं नहालं आणि मला नोकरी मिळाली. मात्र एक आणखी पदवीही मिळाली “एकाक्षी”
(हल्ली लहानपणापासून मुलांची नेत्रतपासणी, दंत तपासणी होते.. ही जागरुकता किती प्रशंसनीय आहे)
असो.
पण काय सांगू तुम्हाला जेव्हा माझा पहिला पगार झाला तेव्हाचा आनंद!!
मी आणि माझे वडील व्ही. टी. ते फ्लोरा फाउंटन बसने एकत्र जायचो. दहा पैसे तिकीट होतं. त्यादिवशी वडील म्हणाले, “आज तुझं तिकीट तूच काढायचंस..!”
मी म्हणाले “आज तुमचंही तिकीट मीच काढेन.”
पुढची चाळीस वर्षे मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले….
पैशाची गरज म्हणून मी नोकरी नाही केली.
माझ्या अस्तित्वाची ती गरज होती…..!!
हाती पडलेल्या पहिल्या पगाराने मला माझी भक्कम ओळख मिळाली आणि या ओळखीने मला नेहमीच आत्मविश्वास दिला. जगताना जी निर्भयता लागते ती मला मिळाली हे मात्र निर्विवाद!!
– क्रमशः भाग ४५.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈