मराठी साहित्य – विविधा ☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? विविधा ?

☆ नाती अपडेट व्हायला हवीत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

नेहमीप्रमाणे आठवड्यातून मी घरी जात असतो तसाच कालही गेलो. घरी आलो की सगळी दुनिया विसरून मी माझ्या दोन वाघांशी म्हणजे माझ्या निर्भय आणि शार्दुल सोबत मस्त रमून जातो. गेल्या गेल्या असाच रमून गेलो. बायकोने चहा दिला. चहा घेत असताना आमची दिदी आली, दिदी म्हणजे माझ्या मोठ्या भावाची मुलगी. तसा तो चुलत भाऊ पण मला सख्खा भाऊ नसल्यामुळे माझी सगळी चुलत भावंडे मी सख्ख्यासारखी ठेवली आहेत. भावांची बहिणींची सगळी लेकरं मला तात्या म्हणूनच बोलतात.

दिदी तसच मला पाहून जोरात आनंदाने ओरडली.”अय्या तात्या कधी आलायस, बरा आहेस का? असं म्हणत जवळ येऊन बसली आणि म्हणली, ”तात्या अरे पुढच्या महिन्यात लग्नाची तारीख काढायची म्हणतायत पप्पा. ”मी या दोन वाघांना मिठीत घेऊन रमून गेलो होतो तिच्या या वाक्याने मी थोडासा गडबडलो. मी म्हणलं दिदी कुणाचं गं लग्न? दिदीने सांगितलं तिचंच लग्न म्हणून आणि फलटण चे पाहुणे आहेत. सगळं ठरवून झालं आहे तात्या फक्त तारीख काढायची बाकी आहे. आणि तू हवा आहेस इथं, सुट्टी घे. बाकीचे कोणते कार्यक्रम घेऊ नकोस. दिदी हे बोलत होती आणि मी आतून  घायाळ होत चाललो होतो. कारण यातलं एक टक्कासुद्धा माझ्या कानावर आलेलं नव्हतं. मी बायकोला जोरात आवाज देऊन बाहेर बोलावलं आणि रागाने विचारलं, की घरातली एवढी महत्वाची गोष्ट तू मला का सांगितली नाहीस. तर तिलाही यातलं काही माहीत नव्हतं. मला प्रचंड आतून वेदना होत होत्या. मी यांचा कुणीच नाहीय का? म्हणून आतून हुंदकत होतो. त्याच तंद्रीत पायात चप्पल घातली आणि थेट त्याच्या घरी. जेमतेम दहा मिनिटांचं पावली अंतर आमच्या दोन घरांमध्ये.

आमचं गाव असल्यामुळे घराची दारे बंद नसतात, की दारावर बेल वैगेरे नसते. थेट घरात घुसलो तर हा मोठा भाऊ आमचा नुकताच जेवायला बसला होता. मी कसलाही विचार न करता त्याला एवढंच म्हणलं. ”का रे दादा आपल्या दीदीला पाहुणे येऊन पसंत करून गेले. सगळी बोलणीसुद्धा झाली. फक्त तारीख काढायची राहिलीय आणि यातलं आम्हाला कुणालाच माहीत नाही असं का.? तर मला म्हणाला,”तुम्हाला कुणाला आमची काळजी आहे का.? तुम्हाला कुणाला आमचं चांगलं झाल्याचं बघवतच नाही. त्याच्या या बोलण्याने मी कोसळून गेलो. ”मी म्हणलं अरे आम्हाला कळलं तर आम्ही येणार ना. तर तो रागाने एकटक माझ्याकडे पाहत म्हणाला, नितीनराव आठ दिवसांपूर्वी मी तुला व्हाट्सअप्प ला मॅसेज करून ठेवलाय की दिदीला फलटणचे पाहुणे बघायला येणार आहेत म्हणून आणि तू अजूनही तो मॅसेज साधा वाचला सुद्धा नाहींयस. मी रोज पाहतोय तू ऑनलाईन असतोस पण माझा मॅसेज तू वाचत नाहींयस.

तातडीने मी माझा मोबाईल खिशातून बाहेर काढला, प्रिय दादा म्हणून त्याच्यासमोर नाव सर्च केलं आणि व्हाट्सअप्प ला पाहिलं तर खरोखर त्याने मला आठ दिवसापूर्वी तसा मॅसेज पाठवला होता. मी त्याच्याकडे नजर उचलून पाहिलं. तर, आता तुझ्यात आणि माझ्यात कसलेच नाते उरले नाही असा काही त्याच्या चेहऱ्यावरचा अनोळखी भाव पाहून मला त्याची अक्षरशः किव आली.

मग मी बोलायला सुरवता केली, की, ”दादा कामाच्या घाईत व्हाट्सअप्प वर येणारे प्रत्येक मॅसेज प्रत्येकजण आवर्जून वाचतोच असे नाही. मोबाईल काय माझ्या शरीराचा अवयव नाहीय दादा. त्यावर काही आलं की लगेच माझ्या मेंदूशी कनेक्ट होत नसते. आपलं घर लांब नव्हतं. तुझ्या बायकोने येऊन सांगायला हवं होतं किंवा साधा एखादा फोन तरी करायचा ना निदान, तुझा आवाज कानातून मेंदूत तरी गेला असता. तू व्हाट्सअप्प वरून मला कळवलं म्हणजे तू तुझं नात्यातील कर्तव्य पार पाडलं असं वाटलं का तुला? आणि तो माझ्याकडून मॅसेज वाचायचं राहून गेलं म्हणून तू इतक्या टोकाचे बोलतोय की बस्स आपल्यात आता काहीच नातं नाही राहिलं. मग तस असेल तर आम्हीही व्हाट्सअप वरूनच अक्षता पाठवतो, त्या दिवशी हवं तर दिदीचा फोटो dp ला ठेवतो. तू तिकडून आम्हाला जेवणाचं ताट पाठव चालेल ना दादा हे, ’यावर जरा तो गार पडला. मी प्रचंड अस्वस्थ होतो. ”माझ्या भावाच्या मुलीच्या लग्नात वरातीत मित्रांना घेऊन तंगड्या वर करून नाचायचं स्वप्न पाहणारा मी. नसेल माझी परिस्थिती सध्या तुझं ओझं उचलण्याची पण कुठूनतरी हप्त्यावर का होईना निदान एक गोदरेजचं कपाट तरी मी घेतलंच असतं की रे माझ्या दीदीसाठी. लग्नाच्या मांडवात पंगतीला भात वाढण्याची स्वप्न पाहणारा हा तुझा भाऊ केवळ तुझा व्हाट्सअप्प चा मॅसेज मी वाचला नाही म्हणून तुला इतका परका वाटायला लागला का रे? हे व्हाट्सअप्प इतकं महत्वाचं झालं का? “ हे व्हाट्सअप कधी आलं? तुझा माझा संवाद साधण्यासाठी आपल्याला याची गरज पडावी? ”एखादी साधी गोष्ट असती तर मी समजून घेतलं असतं पण, आयुष्यातली इतकी महत्वाची गोष्ट तू समोरासमोर माझ्याशी न बोलता या माध्यमातून सांगू पाहत होतास.?

दादा वयाने मोठा आहे. माझ्या बोलण्यावर तो मान खाली घालून उभा होता. त्याची चूक त्याला कळली होती. पण खरंतर तो चुकीचा नव्हताच. तो डिजिटल होता होता इतका गुंतून गेला की नातीसुद्धा त्यावरच टिकवू पाहायला लागला. दोघांच्याही डोळ्यात गच्च पाणी भरून आलं होतं. तसाच त्याला जोरात आवळून मिठीत घेतला. मिठीत येत फक्त एवढंच म्हणाला, नितीन सॉरी भावा, चुकलं, आज कळलं आयुष्यात की तू कवी का आहेस ते.

घट्ट झालेली मिठी मी डोळे पुसत पुसत सैल केली. हातात मोबाईल घेतला. नेट सुरू केलं. व्हाट्सअप्प उघडलं आणि नाव पुन्हा सर्च केलं प्रिय दादा. तो हे पाहतच होता. दोघांचेही डोळे ओसंडून वाहत होते आणि मी त्याच्यासमोर त्याला तिथून कायमचं ब्लॉक केलं आणि एवढंच म्हणलं, आयुष्यातली सगळी सुख दुःखे समोरासमोर भेटून बोलत जाऊया, हात हातात धरून संवाद साधत राहूया, आपल्या नात्यात संवाद साधण्यासाठी असल्या कुठल्याच माध्यमाची आपल्याला गरज पडता कामा नये, असं म्हणत दोघेही एका ताटात जेवलो. इथं सेल्फी काढावा वाटला मला पण तो मोह आवरला. तसाच मी माझ्या घरी आलो आणि तो त्याच्या घरी राहिला.

आज कायमचं अंतर वाढत जाणार होतं. मी अंतर वाढवणाऱ्या गोष्टीच संपवून टाकल्या.

मित्रांनो संवाद साधणारी माध्यमे आज प्रत्येक घरात आहेत. आपण याच्याशी कनेक्ट झालोय. जग जवळ आल्याची फिलिंग आपण अनुभवत असताना आपली नाती दुरावत तर चालली नाहीत ना? याचे भान आपल्या प्रत्येकाला असायला हवे म्हणूनच हे लिहावं वाटलं मला.

खालील कवितेच्या ओळी माझ्या मनाचा अंतरंग अक्षरशः ढवळून काढत आहेत त्या ओळी ………

एकविसाव्या विज्ञान युगात

ही केवढी मोठी घोडचूक

रक्ताच्या नात्यालाही आज

लागते व्हाट्सअप आणि फेसबुक….

आणि खरं सांगू तुम्हाला,

खरच आपली जेवढी रक्ताची, जवळची, जी आपली असणारी माणसं, जिथं खरंच या लोकांशी समोरासमोर हातात हात घेऊन संवाद व्हायला हवा असं वाटणारी माणसं जी आहेत ना, त्यांना व्हाट्सअप वरून कायमचं ब्लॉक करा. काळजाचा डेटा कायम चालू ठेवा. तिथून ही नाती कधीच ब्लॉक होऊ देऊ नका. एकमेकांशी संवाद साधत, डिजिटल होता होता नाती जपता जपता आनंदाने जगता येईल आपण तसे जगुया.

लेखक – अनामिक

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सेवाग्राम… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

सेवाग्राम☆ सौ कल्याणी केळकर बापट

मागे येऊन गेलेल्या कोरोनाच्या लाटेने आपली सगळ्यांमध्ये भ्रमंती, पर्यटन ह्या बाबतीत विचार  करायची असलेली खरतरं शक्तीच काढून घेतलीय. एरवी आपल्याला सवय असते अगदी दोनचार दिवस जरी मोकळे,सवडीचे मिळाले की आपण लगेच कुठेतरी जवळपास का होईना पण सहपरीवार वा मित्रमंडळींसोबत सहलीस जाण्याचे ईमले बांधायला लागतो. ह्या फिरस्तीच्या आवडीच्या नादापायी खूपदा लांबवरचा,दूरवरचा प्रदेश आपण आवर्जून बघतो मात्र आपल्या जवळचा आसपासचा प्रदेश मात्र पाहू पाहू करीत बघायचा राहूनच जातो.भलेही हा जवळील सुप्रसिद्ध प्रदेश आपल्या डोळ्याखालून जात नाही मात्र दूरदूरचे लोक ह्याला भेट देण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी दूरवरून येतात.

आमचा विदर्भ हा चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्ध असणे ही बाब आम्हां सगळ्यांसाठीच अभिमानाची आहे.विदर्भ सुद्धा संतमहात्मे, थोर पुरुष ह्यामुळे ओळखला जाऊ लागला तर ही बाब आपणांसाठी जरा जास्तच गौरवाची ठरते.

विदर्भातील वर्धा जिल्हा हा सेवाग्राम व पवनार ह्या पवित्र भूमींसाठी सुप्रसिद्ध.  ८ एप्रिल. हा दिवस आचार्य विनोबा भावे ह्यांच्या पवनार आश्रमाच्या स्थापनेचा दिवस. खरोखरच अशी ठिकाणं बघितली की नतमस्तक व्हायला होतं.आता थोडसं आचार्य विनोबाजी आणि पवनार आश्रमाबद्दल जाणून घेऊया.

आपली आई ही बहुतेक प्रत्येक व्यक्तीचं दैवत,गुरु असते. लहानपणी तर आई हेच बाळाचे सबकुछ असते असही म्हणायला हरकत नाही. त्यामुळे आपल्या आईसाठी आपल्याला काही करता आलं तर त्याचं आत्मिक समाधान काही ओरचं लाभतं बघा. अशाच एका असामान्य व्यक्तीने आपल्या आईसाठी संस्कृत मध्ये असलेली भगवद्गीता ही समजण्यास सोप्प्या मराठी भाषेत लिहीली  तीच ही “गीताई” होय. ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून आपले आचार्य विनोबाजी भावे होतं.

11 सप्टेंबर 1895 रोजी कोकणात विनोबाजींचा जन्म झाला. आज त्यांची जयंती.त्यांना विनम्र अभिवादन.भारतीय संस्कृती व जीवनशैलीबद्दल त्यांचा विशेष अभ्यास होता. राष्ट्रभाषा हिंदी असावी व लिपी देवनागरी असावी, असा त्यांचा आग्रह होता.

वेगवेगळ्या भाषांच ज्ञान अवगतं असणं हा खरोखरीच कौतुकाचा विषय. साधारण तीन चार भाषांच्या वर जर कोणाला जास्ती भाषा अवगतं असतील तर मला त्या व्यक्तींच खूप कौतुक वाटतं.ह्या अवलीयांना तर तब्बल  १४ भारतीय भाषा येत होत्या. वेद आणि आश्रम व्यवस्थेवर त्यांचा गाढा विश्वास आणि अभ्यास होता.

मा. विनोबाजींनी भरपूर प्रमाणात जमीनीचा मालकी हक्क असलेले जमीनदार व भूमिहीन जनता ह्यामधील प्रचंड तफावत व  त्यापासून निर्माण झालेली दरी जाणली आणि मग त्यांनी सुरू केली स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाची कामगिरी म्हणजे भूदान चळवळ. देशातील जमीनदारांनी त्यांच्या जमिनीचा सहावा हिस्सा भूमिहीनांसाठी दान करावा, असे त्यांचे आवाहन होते. १९५१ साली काही लोकांनी तेलंगण भागात जमीनदारां  विरुद्ध संघर्ष केला. तेव्हा जमिनीची योग्य वाटणी केली तरच खरी सामाजिक क्रांती होऊ शकेल, अशी भूमिका विनोबांनी घेतली. केवळ समाज प्रबोधनातून ७० दिवसांत त्यांना सुमारे १२ हजार एकर जमीन मिळाली.

त्यांचा कोणताही विचार वा दृष्टिकोन हा वैश्विक असायचा.महात्मा गांधींचे ते एकनिष्ठ अनुयायी होते.१९४८ साली महात्मा गांधींच्या निधनानंतर निर्माण झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर विनोबांनी सत्य-अहिंसा व सर्वधर्मसमभावावर आधारलेला सर्वोदयाचा मार्ग सांगितला. म्हणूनच जणू ह्या गांधीजींच्या तत्त्वावरील ‘श्रद्धा’ परत मजबूत करण्याचे काम त्यांनी केले, असे मानले जाते. आचार्य दादा धर्माधिकारी यांचे या कामी त्यांना बहुमोल सल्ला व सहकार्य लाभले.

आपला सर्वांगीण व्यासंग वाढवितांना त्यांनी कुराणाच्या मराठी भाषांतरापासून ते गीताई पर्यंत अनेक ग्रंथ लिहिले. ‘साम्ययोग’ नावाचे मासिक ते पवनार आश्रमातून काढत होते. विनोबाच्या इतर ग्रंथात ऋग्वेदसार, ईशावास्य वृत्ती, वेदान्ससुधा, गुरुबोधसार, भागवतधर्म प्रसार यांचा समावेश आहे. त्यांचे ‘मधुकर’ नावाचे पुस्तक आबालवृद्धात परिचित होते.

विदर्भाचा गौरव म्हणून आपल्याला त्यांच्या पवनारच्या आश्रमाचा उल्लेख करता येईल.त्या आश्रमात त्यांनी बाजार गाठावा लागणारं नाही हे तत्व बाळगून शेतीमध्ये भाजीपाला व धान्य पिकवायला सुरवात केली. त्यांनी ऋषीशेती चा प्रघात सुरू केला.धाम  नदीचे तीरावर आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम आहे. हा आश्रम १५ एकर जागेवर् विस्तारलेला आहे. ह्यात खुप् जैविक विविधता आहे. अनैसर्गिक गोष्टींपासून खुप दुर आणि निसर्गाच्या सान्निध्यात वसलेला असा हा आश्रम ईथे येणा-या लोकांना आकर्षित करतो.  विनोबांनी हा आश्रम खास करून् महिलांसाठी चालु केला. येथे येणा-या महीला साध्वी किंवा  उपासक होत्या. विनोबाजींनी वय वर्षे पन्नास ते सत्तर च्या दरम्यान अख्खा भारत पालथा घातला.त्या द्वारे जनजागृती पण त्यांनी केली.अशा या गौरवशाली व्यक्तीचा सन्मान भारतसरकारने 1983 मध्ये त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा पदवी देऊन केला.

दिवाळीच्या सुमारे सात दिवस आधी विनोबांनी ‘प्रायोपवेशन’ सुरू केले. प्रशासनातील मोठे अधिकारी जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक, पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत व असंख्य कार्यकर्त्याच्या गराड्यात विनोबांनी १५ नोव्हेंबर १९८२ रोजी म्हणजे दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी सकाळी देहत्याग केला. पंतप्रधान इंदिरा गांधींपासून सर्व राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री त्यांच्या अंत्यसंस्कारास्तव आश्रमात उपस्थित होते.

आज पवनार आश्रमाच्या स्थापनेच्या दिवसामुळे विनोबाजींचे थोर कार्याची परत एकदा उजळणी झाली.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ३ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- माझ्याही समोर पुढे आयुष्यभर हे असे कसोटीचे क्षण येणार आहेत याची मला कल्पना कुठून असायला? पण म्हणूनच ‘त्या’च्यापर्यंत पोहोचणारा माझा प्रवास ‘त्या’चेच बोट धरून अगदी निश्चिंतपणे सुरू झाला होता एवढं खरं !!)

तथाकथित चमत्कारांवर माझा विश्वास नाही. चमत्कारांवर विश्वास ठेवून भ्रमित होणंही योग्य नाही असंच मला वाटतं. त्या

बालवयातल्या मी प्रमुख साक्षीदार असणाऱ्या अनेक प्रसंगांच्या बाबतीत मात्र हे असं विश्लेषण करायची पात्रता त्यावेळी माझ्याजवळ नव्हती म्हणून असेल पण तेव्हा तरी ते चमत्कारच वाटले होते. आज इतक्या वर्षानंतर त्या प्रसंगांचं पुनरावलोकन करताना मात्र मी म्हणेन की ते प्रसंग चमत्कार नसले तरी अनाकलनीय मात्र नक्कीच होते आणि त्यामागे ईश्वरी कृपालोभाचे संकेतही निश्चितच होते

आमच्या कुरुंदवाडच्या वास्तव्यातले असेच हे प्रसंग. तिथे बाबांचा नित्यदर्शनाचा नेम प्रतिकूल परिस्थितीतही कसा निष्ठेने सुरू होता हे यापूर्वीच सविस्तरपणे सांगितलेले आहेच. त्यांच्या या निरपेक्ष सेवेनंतर ते निश्चितच कसोटीला उतरले असणार. एरवी हा प्रसंग अशा पद्धतीने घडलाच नसता.

तो काळ साधारण १९५४ ते १९५८ चा. विष्णूमंदिराच्या जवळच्या लेलेवकिलांच्या वाड्यात आमचं बिऱ्हाड होतं.‌ मोठं स्वैपाकघर आणि माडीवरची प्रशस्त खोली आमच्याकडे आणि स्वतंत्र स्वयंपाकघर असलेल्या बाकी पाच खोल्यांचा ऐवज लेले कुटुंबासाठी अशी विभागणी होती.‌दोन्ही कुटुंबे दूरच्या नात्यातलीच. त्यामुळे एकाच घरातले हे वेगवेगळे वास्तव्य केवळ सोय आणि सोबत म्हणून दोघांनी मनापासून स्वीकारलेलं होतं.

माझ्या पाठच्या भावाचा जन्म तिथलाच. ऑगस्ट १९५६ चा. त्याच्याच जन्माच्या वेळची ही गोष्ट. धुवांधार  पावसामुळे शेजारच्या आनेवाडीला  (हा पंचगंगेचा एक फाटा) नेहमीप्रमाणे पूर आलेला. पुराचे पाणी गावभर पसरत आमच्या वाड्याच्या मुख्य उंबऱ्याला लागलेले आणि धुवांधार पाऊस सुरूच. आईचे दिवस भरत आले होते.पाऊस असाच कोसळत राहिला तर पाणी कुठल्याही क्षणी घरात घुसू शकेल अशी ती अवेळ. त्यामुळे मुलांना वरच्या माडीवर झोपवून दोन्ही कुटुंबातली मोठी माणसं रात्रभर एकत्र पडवीतच बसून होती. त्या काळात बाळंतपणाला सुईणच घरी यायची. पण या पावसा-पूरात सुईण येणार कशी ही विवंचना होती ती वेगळीच!

“दादा, आता काय करायचं?” लेले वकील बाबांना म्हणाले. बाबा काळजीत होतेच. त्यांनी आईकडे पाहिलं. खरंतर अशा परिस्थितीत आईचा जीव टांगणीला लागायला हवा होता पण निदान वरकरणी तरी ती शांतच होती.

“आपण काय करणार? होईल ते पहात रहायचं.” ती शांतपणे म्हणाली.

“ते खरंच.पण तुम्हाला अचानक त्रास सुरू झाला तर..?” लेलेकाकू तिच्या जवळच बसल्या होत्या,त्या म्हणाल्या. त्यांच्या  बोलण्यात त्यांच्या मनातली काळजी लपून रहात नव्हतीच.  स्वतःचीच समजूत घातल्यासारखं आई म्हणाली,

“त्या सगळ्याचा भार दत्त महाराजांवर. संकट नाही यायचं. आणि आलंच तर शेवटी त्याचं निवारणही तेच करतील.”

परिस्थिती चिंताजनक असूनसुद्धा आईच्या शब्दांमुळे इतरांच्या मनावरचं ओझं थोडं तरी हलकं झालं. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर खूप वेळाने तिथे पडवीतच पसरलेल्या अंथरुणांवर सर्वजण आडवे झाले तरी कुणाच्याच डोळ्याला डोळा नव्हता. आणि आश्चर्य म्हणजे पहाटेच्या आसपास पावसाचा जोर हळूहळू ओसरत चालला आणि फटफटीत उजाडेपर्यंत उंबऱ्याशी येऊन ठेपलेल्या पाण्याने दोन पावलं माघार घेतली होती! आईचे दिवस भरत आल्याचं दडपण तिकडे सुईणीच्या मनावरही होतंच. त्यामुळेच ती विषाची परीक्षा नको म्हणून,स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सकाळी सकाळीच चिंब भिजल्या अवस्थेत कमरेपर्यंतच्या पाण्यातून चालत आमच्या घरी मुक्कामाच्याच तयारीने येऊन पोचली तसा सर्वांचा जीव भांड्यात पडला! त्याच दिवशी दुपारी बाळाचा सुखरूप जन्म झाला!पण…?

अतिशय अनपेक्षितपणे सगळं सुरळीत पार पडल्याचं समाधान मात्र दीर्घकाळ टिकणार नाहीय याची कुणालाच कल्पना नव्हती. कारण दुसरं जीवघेणं संकट दबा धरून बसलेलं होतंच!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – आनंदाची गुढी ☆ श्री विश्वास देशपांडे

फाल्गुन मासातल्या होळीबरोबर थंडी पण संपते आणि येणारा चैत्र महिना नवीन वर्षाचा संदेश घेऊन येतो. पण तो नुसता येत नाही. आनंदाचे प्रतीक म्हणून तो खूप काही गोष्टी आपल्यासोबत आणतो. तसं तर चैत्र हा शब्द चित्रा नक्षत्रावरून आला आहे. चित्र म्हणजे विविधता. या चैत्र महिन्यात किती तरी विविध गोष्टी निसर्ग आपल्यासाठी घेऊन येतो. वसंत ऋतूचे आल्हाददायक आगमन झालेलं असतं. वसंत हा खरं तर ऋतूंचा राजाच म्हणायला हरकत नाही. या वसंतात सृष्टी गंधवती होते. झाडं आपली जुनी वस्त्रं टाकून नवीन रेशमी पर्णसाज परिधान करतात. तांबूस कोवळी, पोपटी, हिरवीकंच पाने जणू नैसर्गिक तोरणाचा साज सृष्टीला चढवतात. निरनिराळी फूल फुलून आलेली असतात. गुलाब, मोगरा यासारखी अनेक फुलझाडं आपल्या सुगंधानं वातावरण प्रसन्न करतात. आम्रवृक्षासह विविध झाडांना आलेला मोहर, वातावरण धुंद करीत असतो. कोकिळेचा पंचम स्वर आसमंतात निनादत असतो. अशाच प्रसन्न वातावरणात मराठी महिन्यातला पहिला दिवस वर्षातला पहिला आनंदाचा सण घेऊन येतो. घराघरांवर गुढ्या उभारल्या जातात.

रावणाचा वध करून प्रभू श्रीराम अयोध्येला परत आले तेव्हा अयोध्येच्या प्रजाजनांनी गुढ्या तोरणे उभारून रामरायाचे स्वागत केले. या दिवशी रेडिओवर माणिक वर्मांच्या भावपूर्ण आवाजातलं गाणं हमखास ऐकायला येतं आणि आपलं मन प्रसन्न करतं.

विजयपताका श्रीरामाची

झळकते अंबरी

प्रभू आले मंदिरी

*

गुलाल उधळून नगर रंगले

भक्तगणांचे थवे नाचले

रामभक्तीचा गंध दरवळे

गुढ्या तोरणे घरोघरी ग.

किती सुंदर शब्द ! खरोखरच वातावरणात रामभक्तीचा गंध दरवळत असतो. कारण गुढीपाडव्यापासून श्रीरामांच्या नवरात्राला सुरुवात होते. आपले सण, उत्सव किती सुंदर तऱ्हेने निसर्गाशी आणि ईश्वराशी जोडले आहेत. निसर्ग आणि मानव यांच्यातील अतूट नाते तेव्हाच त्यांना उमजले होते. पर्यावरण जपणे, त्याच्या साथीने जगणे हा त्यांच्या जीवनाचाच जणू एक भाग झाला होता. इको फ्रेंडली वगैरे शब्द आपण आज वापरत असलो तरी त्यावेळी जे काही होते, ते सगळेच इको फ्रेंडली होते. असे सण साजरे करण्यामागे पूर्वजांची दृष्टी किती विशाल आणि उदात्त होती, याचे प्रत्यंतर या सगळ्या सणांमागील पार्श्वभूमी जेव्हा आपण समजून घेतो, तेव्हा लक्षात येते. त्यामागे असणारा आरोग्याचा दृष्टिकोन, सामाजिक एकतेचा संदेश खूप महत्वाचा असतो. पण आपण जेव्हा हा उद्देश समजून न घेता हे सणवार साजरे करतो, तेव्हा मात्र ती एक औपचारिकता होते. सुटी, खाणेपिणे, मौजमजा यातच दिवस व्यतीत होतो. नवीन पिढीच्या दृष्टीने तर आपल्या या प्रथा, परंपरा समजून घेणे आवश्यक वाटते तरच भविष्यात आपली संस्कृती, सामाजिक एकोपा टिकून राहील.

गुढीपाडवा हा सण देशाच्या सगळ्या भागात साजरा होतो. दक्षिण भारतात त्याला युगादी किंवा उगादी असे म्हटले जाते. काही ठिकाणी पाडो किंवा पाडवा असेही म्हटले जाते. गुढीपाडवा हा सण आजचा नाही. असे ,म्हणतात की ब्रह्माने याच दिवशी सृष्टी निर्मिली. गुढीपाडव्याचे संदर्भ हजारो वर्षांपासूनच्या वाङ्मयात आपल्याला मिळतात. अगदी रामायणापासून त्यांची सुरुवात होते. गुढी या शब्दाचा अर्थ तामिळ भाषेत लाकूड किंवा काठी असा होत असला आणि प्राचीन मराठी वाङ्मयात गुढी या शब्दाचा झोपडी, कुटी वगैरे असा असला तरी खरं म्हणजे गुढी हा शब्दच आनंदासाठी आला आहे. एखादं मोठं काम करणं, शत्रूवर विजय प्राप्त करणं, हाती घेतलेल्या कामात यश मिळणं या सगळ्या गोष्टींसाठी गुढी उभारणे असा वाक्प्रयोग केला जायचा. माधवदासांनी लिहिलेल्या ‘ उत्कट साधूनि शिळा सेतू बांधुनी… या श्रीरामांच्या मराठी आरतीत पुढील ओळी किती सुंदर आहेत बघा –

प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।

लंकादहन करुनी अखया मारिला ।।

मारिला जंबू माळी, भुवनी राहाटीला ।

आनंदाची गुढी घेऊनिया आला ।।

श्रीरामांनी रावणाचा वध केल्यानंतर म्हणजेच एक अलौकिक असे कार्य संपन्न केल्यानंतर हनुमंत आनंदाची गुढी घेऊन आला. इथे गुढी म्हणजे विजयपताका असा अर्थ घेता येईल. अयोध्येच्या नगरजनांनी सडे शिंपून, रांगोळ्या काढून आणि गुढया तोरणे उभारून श्रीरामांचे स्वागत केले. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला तेव्हाही नगर वासियांनी श्रीकृष्णाचे असेच स्वागत केले होते असे म्हणतात. महाभारताच्या आदिपर्वात गुढीचा उल्लेख आढळतो. खरं तर असाही अर्थ घेता येईल की आपला देह हीच एक नगरी आहे. आपल्या हृदयमंदिरात आपण आनंदाची गुढी उभारून श्रीराम, श्रीकृष्ण यांचे स्वागत करतो. त्यासाठी हृदयाचे दरवाजे उघडे हवेत. आपल्या मनातील काम, क्रोध आदी वासना जेव्हा नष्ट होतील, त्यांच्यावर विजय प्राप्त होईल, तेव्हाच श्रीरामांचा प्रवेश आपल्या हृदयमंदिरात होईल. परमेश्वर हा आनंदस्वरूप आहे. तो सत चित आनंद म्हणजेच सच्चीदानंद आहे. तो आपल्या हृदयात प्रवेशला की आनंदाची गुढी आपोआपच उभारली जाते.

स्त्रीला आदिशक्ती मानून तिची पूजा पूर्वीपासून केली जाते. माता पार्वती म्हणजे आदिशक्ती. शंकर आणि पार्वती यांचा विवाह पाडव्याच्या दिवशी ठरला आणि तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तो पार पडला. तेव्हापासून पाडव्याला स्त्रीच्या रूपात आदिशक्तीची पूजा केली जाते. गुढीपाडव्याचा उल्लेख म्हाईंभट यांनी लिहिलेल्या लीळाचरित्रातही आढळतो. ज्ञानेश्वरीत सुद्धा गुढीचा उल्लेख येतो. ज्ञानेश्वर माउली म्हणतात-

अधर्माची अवधी तोडी । दोषांची लिहिली फाडी ।

सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।

अधर्म आणि दोष नष्ट करणारी सुखाची गुढी मी उभवितो. कोणाकडून ? तर सज्जनांकडून. सुखाची गुढी सज्जनच उभारू शकतात. संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखामेळा यांच्या वाङ्मयातही गुढीचे उल्लेख आढळतात. चोखोबा तर म्हणतात-

टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची ।

चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन प्रवास करून आल्यानंतर दुर्लभ असा मानवदेह प्राप्त होतो. नरदेह प्राप्त होणे म्हणजे आनंदाची गुढी ! म्हणून भगवंताच्या भक्तीत रंगून जाऊन आनंदाने टाळी वाजवावी.

गुढी हे मानवी देहाचंही प्रतीक आहे. आपल्या पाठीतून जाणारा मेरुदंड म्हणजे वेळू किंवा काठी. त्यावर आपले डोके म्हणजे घट. गुढीवरचे रेशमी वस्त्र म्हणजे जणू मानवी देह. त्यावर असणारी कडुलिंबाची आणि आंब्याची पाने म्हणजे मानवी जीवनातील सुखदुःखाचे प्रतीक. गुढीला घातलेला साखरेचा हार किंवा गाठी म्हणजे परमेश्वराचे प्रतीक. जेव्हा आपण आपली सुखदुःखे त्या परमेश्वररूपी साखरेच्या गोड चवीबरोबर मिसळून घेतो, तेव्हा जीवनही गोड, अमृतमय होते. आरोग्याच्या दृष्टीनेही कडूलिंबाच्या पानांचे महत्व आहे. लिंबाची पाने चवीला कडू असली तरी गुणधर्माने थंड आहेत. पुढे सुरु होणाऱ्या कडक उन्हाळ्याला तोंड देता यावे म्हणून कडुलिंबाच्या पानांची चटणी गूळ, मीठ, मिरपूड इ. घालून खातात.

संत एकनाथांच्या रचनांमध्ये तर अनेकवेळा गुढीचा उल्लेख आपल्याला आढळतो. जेव्हा आपण काहीतरी विशेष अशी गोष्ट साध्य करतो, तेव्हा विविध रूपांमध्ये गुढीचे प्रतीक त्यांना भासमान होते. मग ती गुढी हर्षाची, ज्ञातेपणाची, भक्तीची, यशाची, रामराज्याची रोकडी, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची अशी विविध प्रकारची आहे. गुढी वारीत आणि रणांगणातही उभविली जाई. जशी एखादी ज्योत ( बटन ) खेळाडूंकडून पुढे नेली जाते, तशीच ती चपळ माणसांच्या हस्ते युद्धात आणि वारीत पाठवण्यात येई. त्याद्वारे काही संकेत दिलेले असत. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात –

पुढे पाठविले गोविंदे गोपाळा । देऊनिया चपळा हाती गुढी ।।

शालिवाहन राजांची गोष्ट तर प्रसिद्धच आहे. शालिवाहनांच्या राज्यात अपार समृद्धी होती. पण त्यामुळे प्रजेत आळस आणि सैन्यामध्ये उत्साह आणि चपळता राहिलेली नव्हती. कुठलीही गोष्ट एकाच ठिकाणी वापर न होता पडून राहिली की ती गंजते किंवा बिनकामाची ठरते. तसेच शालिवाहनाच्या सैन्याचे झाले होते. शत्रूच्या आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात राहिले नव्हते. अशातच शकांचे आक्रमण राज्यावर झाले. मग काय करायचे ? सैन्याला प्रशिक्षण द्यायचे किंवा नवे सैनिक भरती करायचे तर काही वेळ जाणारच. मग शालिवाहनांनी हजारो मातीचे सैनिक, हत्ती, घोडे तयार केले. त्याच्या साहाय्याने त्यांनी जुलमी अशा शकांचा पराभव केला. मग तो विजय लोकांनी गुढया तोरणे उभारून साजरा केला. तेव्हापासून शालिवाहन शक सुरु झाला. पण खरंच मातीचे सैनिक, हत्ती, घोडे लढले असतील का ? मला वाटतं त्याचा प्रतीकात्मक अर्थ आपण घ्यायला हवा. शालिवाहन राजाचे सैन्य मृत्तिकेसमान म्हणजे चैतन्यहीन, निरुत्साही झाले होते. त्यांच्यात मरगळ आली होती. मातीच्या सैन्यात प्राण फुंकणे म्हणजे त्यांच्यातील चैतन्याला आवाहन करणे, त्यांच्यातील स्वत्व, स्वाभिमान, शौर्य, देशाभिमान जागृत करणे. किती सुंदर अर्थ आहे हा !

जेव्हा जेव्हा समाजात अशी स्वत्वहीनता, मरगळ आणि गुलामगिरीची वृत्ती अंगवळणी पडते, तेव्हा तेव्हा त्या समाजात असेच प्राण फुंकावे लागतात. वर्षानुवर्षे गुलामी रक्तात भिनलेल्या समाजात असे चैतन्य समर्थ रामदास स्वामी, तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले म्हणूनच शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्मितीची गुढी उभारता आली. स्वातंत्र्यपूर्व काळात असे चैतन्य लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पं नेहरू, लाल बहादूर शास्त्री, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, स्वा सावरकर यांच्यासारख्या नेत्यांच्या आणि क्रांतिकारकांच्या तेजस्वी त्यागातून निर्माण झाले आणि स्वातंत्र्याची गुढी उभारली गेली.

गुढी ही उंच उभारली जाते. ती आशाअपेक्षांचे प्रतीक असते. ती जणू आपल्याला सांगते, तुमचे ध्येय, आशा, अपेक्षा अशाच उंच असू द्या. त्यांना मर्यादा घालू नका. स्काय इज द लिमिट ! आपल्या नवीन वर्षाचा आरंभ या सणाने होतो म्हणून वर्षारंभीचे उत्तम, उदात्त असे संकल्प मनाशी योजा आणि वर्षभरात आपल्या प्रयत्नांनी ते तडीस न्या. हाच गुढीपाडव्याचा संदेश आहे.  कवयित्री बहिणाबाई फार सुंदर संदेश आपल्याला आपल्या कवितेतून देतात. त्या म्हणतात –

गुढीपाडव्याचा सन, आता उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं, सोडा मनातली अढी

गेली साली गेली आढी, आता पाडवा पाडवा

तुम्ही येरयेरांवरी लोभ वाढवा वाढवा.

या बहिणाबाईंच्या सांगण्याप्रमाणे मनातली अढी सोडून देऊन एकमेकांवरचे प्रेम वाढवू या. आनंदाची गुढी उभारू या.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गुढीपाडवा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “गुढीपाडवा…” ☆ सौ राधिका भांडारकर 

शालिवाहन या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात अर्थात आरंभ म्हणजेच गुढीपाडवा होय. तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. पहिला महाराष्ट्रीयन राजा म्हणून आजही शालिवाहन राजाचे महत्व आहे. या संदर्भात एक अख्ख्यायिका आहे.

शालिवाहन राजाने मातीची माणसे बनवली. त्यावर पाणी शिंपडून त्यांच्यात प्राण भरला आणि हेच होते शालिवाहनाचे  सैन्य. या सैन्याच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला. या विजया प्रित्यर्थ शालिवाहन शके सुरू होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते.  या दिवशी पंचांग वाचन आणि देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत केले जाते.

महाभारतातील आदीपर्वा मध्ये उपरीचर नामक राजाने इंद्रा कडून मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीत रोवली आणि त्या काठीची पूजा केली. हा दिवस होता चैत्र शुद्ध प्रतिपदेचा. नवीन वर्षाचा आरंभ दिन म्हणून या दिवसाला  गुढीपाडवा असे म्हणून साजरा करण्याची पद्धत आहे.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती याच दिवशी आणि पुढे सत्य युगाची सुरुवात झाली.  या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिकाधिक संचित करायचा प्रयत्न करतो.

भगवान विष्णूने  मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला तोही दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा.

लंकाधीश  रावणाचा वध करून श्रीराम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येस परतले आणि अयोध्या नगरवासीयांनी घरावर गुढ्या, तोरणे उभारून आनंदोत्सव साजरा केला म्हणूनच गुढीपाडवा म्हणजे विजय दिन.  हा दिवस  देशभर साजरा केला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्या संदर्भात अशा अनेक आख्यायिका आहेत पण या दिवसा मागे एक निसर्ग तत्त्वही आहे. गुढीपाडव्या निमित्ताने त्याचाही विचार व्हायला हवा.

शिशिरातील पानझडी नंतर ऋतुचक्र हळुवार कूस पालटते आणि पर्णहीन वृक्षांना नवचैतन्याची चाहूल लागते, रंगविभोर फुलांनी डवरलेल्या वृक्षाचं पुष्पवैभव, आंबेमोहराचा सुगंध, कोकिळेचा वसंत पंचम एका सर्जनशील ऋतुच्या आगमनाची वर्दी घेऊन येतो. रंग, रूप, गंध! नाद स्पर्शातील शालीनता म्हणजे वसंतागमनाची नांदी आणि त्यासाठीच गुढीपाडव्याच्या निमित्ताने केलेला चैत्र शुद्ध प्रतिपदेचा, नववर्षाचा, आरंभाचा आनंदोत्सव.

युगादि तथा उगादी या नावानेही हा दिवस साजरा केला जातो. (आंध्र प्रदेशात) पडव, पाडवो या संस्कृत शब्दाचा मराठी अपभ्रंश पाडवा. याचा अर्थ  चंद्राची कला. चैत्रशुद्ध प्रतिपदे नंतर चंद्र कले कलेने वाढतो म्हणून यास चैत्र पाडवा म्हणतात. आपले पूर्वज निसर्गा विषयी कृतज्ञता पाळण्यासाठी सूर्य, चंद्र, पर्वत, नदी, वृक्ष यासारख्या निसर्ग स्वरूपाची पूजा करायचे त्यातूनच या प्रतीकात्मक गुढीची निर्मिती झाली.

गुढी म्हणजे ब्रह्मध्वज— विजय ध्वज. पराक्रम, विजय, सर्जनशीलता, उत्पत्ती आणि चैतन्य यांचे प्रतीकात्मक पूजन म्हणजे गुढीपाडवा.

घराचा दरवाजा, खिडकी, अथवा गच्ची भोवतालची जागा  स्वच्छ करून धान्य आणि रांगोळीने सजलेल्या पाटावरून मोकळ्या आकाशात सहा ते सात फूट उंचावर एक काठी उभारावी त्यावर साडी व जरीचे वस्त्र गुंडाळावे, वरती तांब्याचा किंवा कोणत्याही धातूचा कलश उपडा ठेवावा, फुलांची माळ, कडुनिंबाचा पाला आणि साखरगाठीने  काठी सजवावी.

अशा रीतीने गुढीची पूजा करण्यामागे काही शास्त्रीय संदर्भ आहेत. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज हे मनुष्य देहाचेही प्रतीक आहे. गुढीसाठी वापरण्यात येणारी काठी म्हणजे आपल्या मेरुदंडाचे, मणक्याचे,कण्याचे प्रतीक आहे. शरीराला ताठ उभे करण्यासाठी जसा मणका गरजेचा तसा गुढीचा हा बांबू! शरीर केवळ हाडांसह चांगले कसे दिसेल? त्यावर मासाचे आवरण असते म्हणून बांबूला रेशमी वस्त्रादी  गोष्टींने सजविले जाते आणि त्यावर मस्तकरुपी कलश ठेवला जातो.

वैज्ञानिकतेच्या नजरेतूनही याचे महत्त्व आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रजापतीच्या प्रकाश लहरी सर्वाधिक प्रमाणावर धरतीवर येतात. गुढीवरचा उपडा कलश म्हणजे जणू काही डिश अँटेनाच. तो वातावरणातल्या या  लहरी खेचून घेतात आणि या लहरींचा स्पर्श छताखाली राहणाऱ्या लोकांना होतो. या लहरींनी जमिनीची उत्पादन क्षमता ही वाढते म्हणूनच शेतकरी या महिन्यात शेतीची नांगरणी करतात.

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाच्या पानांचंही खूप महत्त्व आहे. गुढीचा प्रसाद म्हणून धणे, गुळ आणि कडुनिंबाचा पाला यांचे एकजीव मिश्रण दिले जाते. कडूनिंब म्हणजे पुराणातला परिभद्र वृक्ष. हा संजीवक वृक्ष आहे आणि यांच्या पर्णसेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चैत्रात हा नवी पालवी धारण करतो म्हणून नवचैतन्य देणाऱ्या कडूनिंबाचे या दिवशी फार महत्त्व आहे.

कडुनिंबाचं कडूपण आणि साखरगाठीचा गोडवा …किती सूचक मिश्रण आहे हे! माणसाचं जगणं असंच असतं ना थोडं कडू थोडं गोड. काही वेळा कटू बोलावं लागतं, ऐकावही लागतं आयुष्यातली कडू ही चवही अपरिहार्य आहे आणि असं बघा सगळंच गोड असतं तर जगण्यासाठी काही आव्हान उरलं असतं का?

आता या सणा मागची आणखी एक गंमत! थोडा मिस्कीलपणा! ज्यात आपलं बालपण सांचलेलं आहे. चिडवत होता की नाही तेव्हा ….”गुढीपाडवा आणि नीट बोल गाढवा”

आता याचा विचार करताना  वाटते या गमतीदार शब्दसमूहात केवळ यमकच नव्हे तर एक सहज मारलेली आपुलकीची टप्पल आहे हो! जगण्याचं भान देणारी टप्पल.. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त मिळणारा एक आनंदाचा संकेत आणि संस्कार.

आपणा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठी साहित्यातील अजरामर पत्रे… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

मराठी साहित्यातील अजरामर पत्रे ☆ श्री विश्वास देशपांडे

माझीा मुलगी पुण्यात शिक्षणासाठी राहायची, तेव्हा दर आठवड्याला तिचे मला एक पत्र यायचे.मुलगा शिकायला होता, तेव्हा तोही पत्र पाठवायचा. त्यांच्या पत्रांची आम्ही आतुरतेने वाट पाहत असू. त्यातील काही सुंदर पत्रे आजही आम्ही जपून ठेवली आहेत. पत्राच्या सुरुवातीला लिहिलेले ‘ प्रिय दादा, किंवा प्रिय आई ‘ हे शब्द अंगावर मोरपीस फिरल्यासारखे जादू करायचे. आणि शेवट ‘ तुमची लाडकी, तुमचा लाडका ‘ यासारख्या हृदयस्पर्शी शब्दांचा असायचा. दुसरे नवीन पत्र येईपर्यंत आधीचे पत्र दोनतीन वेळा तरी वाचून झालेले असायचे. आताशा  पत्र लिहिणे हा भाग कालबाह्य होत चालला असला तरी एक काळ असा होता, की ज्यावेळी पत्रांच्या माध्यमातूनच एकमेकांशी संवाद साधला जायचा. दूर अंतरावर असणाऱ्या आपल्या प्रिय जनांशी संवाद साधण्याचे ते एक प्रभावी माध्यम होते.

आजही आपल्यापैकी काहींनी आपल्या वडिलांनी आपल्याला लिहिलेलं पत्र , भावाने लिहिलेलं पत्र वा अन्य कोणी लिहिलेलं पत्र आठवण म्हणून जपून ठेवलं असेल. ही पत्रं म्हणजे एक अनमोल ठेवा असतो. कधी त्या माणसांची आठवण आली, तर ती पत्रं पुन्हा वाचावी. त्यासारखा दुसरा आनंद नाही.

जी ए कुलकर्णी या प्रख्यात कथालेखकाने आपल्या प्रिय वाचकांना लिहिलेली पत्रे काही वाचकांनी तर प्राणापलीकडे जपून ठेवली. त्याही पुढे जाऊन काहींनी ती पत्रं चंदनाच्या पेटीत ठेवली. त्या पत्रांना जीएंच्या आठवणींचा मधुर सुगंध आहे.

जीएंची पत्रे प्रदीर्घ असत. जीएंनी त्या काळात अनेक प्रसिद्ध साहित्यिकांना सुद्धा पत्रे लिहिली. जीएंनी श्री. पु. भागवत, सुनीता देशपांडे इ ना लिहिलेली पत्रे पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाली आहेत. तो आपल्यासारख्या वाचकांसाठी एक अनमोल ठेवाच आहे. अशाच महान साहित्यिक, विचारवंतांच्या पत्रांचा संग्रह ह वि मोटे यांनी करून तो पुस्तक रूपाने प्रसिद्ध केला. व. पु. काळे यांची पत्रे सुद्धा त्यांच्या चाहत्यांनी जपून ठेवली आहेत. वपुंची आगळीवेगळी भाषाशैली, आपले विचार मांडण्याची पद्धत यामुळे त्यांची पत्रे कधीही वाचली तर नुकतीच लिहिल्यासारखी ताजी वाटतात.

पत्रलेखनाच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या मुलांना काही गोष्टी सांगितल्या,  हितगुज केले. पं नेहरूंनी तुरुंगात असताना इंदिरा गांधींना पत्रे लिहून भवतालच्या जगाची माहिती दिली. सुधारणा, राजकारण, इतिहास, धर्म इ बद्दल माहिती दिली. साने गुरुजींनी सुद्धा आपल्या छोट्या पुतणीला म्हणजे सुधाला पत्रे लिहून खूप गोष्टी समजावल्या आहेत. ती पत्रे ‘ साने गुरुजींची सुंदर पत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.

तर लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांच्यासारख्या समाजसुधारकाने पत्रासारख्या प्रभावी माध्यमाचा उपयोग समाजसुधारणेसाठी केला. ‘ प्रभाकर ‘ या साप्ताहिकातून त्यांची ही पत्रे प्रसिद्ध झाली. इतिहास, राजकारण, अर्थशास्त्र, परंपरा, धर्म जातीभेद, स्त्रीजीवन इ विषयांवर त्यांनी तब्बल १०८ पत्रे लिहिलीत. ही पत्रे ‘ शतपत्रे ‘ म्हणून प्रसिद्ध आहेत.

आज ही सगळी माहिती एवढ्याकरिता सांगितली की या पत्रांनी मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. ज्यांना अभिजात मराठी वाचायचे आहे, मराठीचा अभ्यास करायचा आहे, मराठीवर प्रभुत्व मिळवायचे आहे अशांनी जरूर ही पत्रे वाचावी. किमान ही पुस्तके चाळावी .

वर उल्लेखिलेली प्रसिद्ध पत्रे आहेत तसेच चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना लिहिलेले पत्रसुद्धा प्रसिद्ध आहे. पण ते वेगळ्या कारणासाठी. योगी चांगदेवांना ज्ञानेश्वर महाराजांची योग्यता कळल्यावर एकदा त्यांच्या  मनात आले की आपण ज्ञानेश्वरांना पत्र लिहावे. पण सुरुवात कशी करावी हेच त्यांना उमजेना. ज्ञानेश्वरांना आशीर्वाद लिहावा, तर ते आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठे. आणि नमस्कार लिहावा तर ते आपल्यापेक्षा वयाने लहान. म्हणून काहीच न लिहिता त्यांनी ज्ञानदेवांना कोरेच पत्र पाठवले.

खरं तर चांगदेव मोठे योगी, ज्ञानी आणि चौदाशे वर्षे वय असलेले. पण अध्यात्ममार्गात अहंकार सर्वात मोठा शत्रू असतो. सिद्धीच्या मागे लागल्यामुळे चांगदेवांमध्ये अहंकार शिरला. आणि ब्रह्मज्ञानापासून ते वंचित राहिले. म्हणून छोटी मुक्ताई म्हणाली, ‘ चांगदेव अजून पत्रासारखे कोरेच राहिले.’ आपणही हे सगळे समजून घेणार नसू तर आपणही तसेच कोरे राहू. ‘ मेरा जीवन कोरा कागज कोराही रह गया. ‘ अशी आपली गत नको व्हायला.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कप्पे… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

कप्पे☆ सौ कल्याणी केळकर बापट

अगदी लहानपणापासून आपल्याला काही गोष्टींच आकर्षण असतं. काही वस्तुंची, गोष्टींची संकल्पना आपल्या डोक्यात फीट बसलेली असते आपापल्या आवडीनुसार.

अगदी लहानपणी खेळतांना ति.सौ.आईची पर्स घेऊन मिरवायची खूप आवड.अगदी तेव्हा पर्स असं सुध्दा न म्हणता त्या वस्तू ला प्रस अस म्हंटल्या जायचं . त्या पर्समध्ये मला नेहमीच त्या पर्सच्या आकार, रंगापेक्षाही त्या पर्सला कप्पे म्हणजेच किती “खाणे”आहेत ह्याकडेच लक्ष असायचे.जितक्या जास्त कप्प्यांची पर्स तितकी ती जास्त आवडायची.

पुढे थोडे मोठे झाल्यावर घरोघरी गोदरेज ची कपाटं आलीतं.ही कपाटं तशी सर्रास नव्हती.अगदी घरटी एखादचं असायचं.ही लोखंडी कपाटं अगदी लोकल मेड असली तरीही त्या कपाटाला सगळे “गोदरेजचं कपाट” असचं म्हणायचे.माझ्या दृष्टीने ह्या कपाटातील कप्पे हेच आकर्षण केंद्र असायचं. ह्या कपाटात खालचे आणि वरचा एक असे मोकळेढाकळे , ऐसपैस,कप्पे होते. मधल्या भागात एक अगदी छोटसं लाँकर असायचं त्याचा वापर अगदी इटुकले पिटुकले किडुकमिडूक सोन्याचे बारीकसारीक डाग ठेवायला केल्या जायचा.

एक होतं तेव्हा माझं,तुझं असा काही शब्दचं नसायचा जे काही असायचं ते “आपलं”, सगळ्यांच सामायिक असायचं. त्यामुळे त्या एकाच कपाटात वेगवेगळ्या कप्प्यात अख्ख्या कुटूंबाचं जणू सर्वस्व एकवटलेलं असायचं.

काय नसायचं त्या कपाटात?  त्या कपाटात सगळ्यांचे ठेवणीतले कपडे, महत्वाचे दस्तावेज, घरातील सगळ्या हिशोबाच्या डाय-या,पैसे, ठेवणीतील फक्त पाहुणे अआले की बाहेर काढायच्या चादरी, क्राँकरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे ह्याच्याशी निगडित असलेल्या आठवणी.

ह्या कप्प्यांनी मात्र पुढील आयुष्यात खूप मोलाची गोष्ट शिकविली. ह्या कप्प्यांच महत्त्व च  वेगवेगळे. ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीचं स्थान वेगवेगळं. आपण ठरविलेल्या कप्प्यांमध्ये ठराविक जागीच ठराविक वस्तूचं महत्व योग्य. त्याची जर का स्थान,जागा सोडून सरमिसळ झाली तर सगळचं बिघडणारं.

तसचं अगदी मनात पण मी अनेक कप्पे तयार करुन त्याच्यात सरमिसळ होणार नाही ह्याची पुरेपूर काळजी घेण्याचं ठरविलं. प्रत्येक नात्याचा कप्पा वेगवेगळा, त्याच महत्व वेगवेगळं. त्यामुळे एखाद्या नात्यात बाधा निर्माण झाली तरी आपले बाकीचे नाते सावरायला असतात, किंवा आपणही एका नात्यासाठी बाकी नात्यांचं प्रेम काळजी ह्याने सक्षमपणे उभे राहू शकतो. मनाच्या ह्या कप्प्यांमध्ये रागाचा कप्पा मात्र अगदीच छोटासा आणि मागचा निवडला,फारसा न वापरल्या जाणारा,जास्त महत्व नसलेला.

प्रेमाचा,स्नेहाचा कप्पा मात्र मोठा आणि अगदी हाताला येईल असा ठेवला,वारंवार वापरात येणारा, कदाचित कुणावर चुकीने,गैरसमजाने आरोप केले असतील,आळ घेतले असतील तर दिलदारपणे खुल्यादिलाने माफी मागण्याचा कप्पा सदैव नजरेच्या टप्प्यात ठेवलायं,जेणेकरून कुणीही व्यक्ती विशेषतः निर्दोष व्यक्ती आपल्याकडून नकळत का होईना पण दुखावल्या जाणार नाही ह्या काळजीने.

अशा त-हेचे अनेक कप्पे मनात योग्य जागी तयार केलेत ज्यामुळं मनाला एक वेगळे समाधान लाभतं लाभतं हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆

(सत्य आणि गैरसमज)

भारतीय सौर 9 चैत्र 1946

गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ करण्याचे नैसर्गिक, ऐतिहासिक महत्त्व :-

येणाऱ्या वर्ष अमावस्येला कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५१२५ वर्ष पूर्ण होत आहेत.

“चैत्रे मासि जगद् ब्रह्मा ससर्ज प्रथमे हनी |

शुक्लपक्षे समग्रे तु तदा सूर्योद्ये सति ||”

महत्त्व : इसवी सन १ जानेवारीपासून, आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून, हिंदु वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून, व्यापारी वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून, शैक्षणिक वर्ष जूनपासून, सौर वर्ष, चांद्र वर्ष व सौर-चांद्र वर्ष (लुनी सोलर) या वर्षांचेही निरनिराळे वर्षारंभ, इतके वर्षारंभ करण्याचे दिवस आहेत. यांत सर्वत्र बारा महिन्यांचेच वर्ष आहे. `वर्ष बारा महिन्यांचे असावे’, असे प्रथम कोणी सांगितले व जगाने ते कसे मान्य केले ? याचा प्रथम उद्‌गाता `वेद’ आहे. वेद हे अतीप्राचीन वाङ्मय आहे, याबद्दल कोणाचेही दुमत नाही. “द्वादशमासै: संवत्सर:” असे वेदात आहे. वेदांनी सांगितले म्हणून ते जगाने मान्य केले. या सर्व वर्षारंभांतील अधिक योग्य प्रारंभदिवस `चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा आहे. १ जानेवारीला वर्षारंभ का ? याला काहीही कारण नाही. कोणीतरी ठरविले व ते सुरू झाले. याउलट चैत्र शुद्ध प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास नैसर्गिक, ऐतिहासिक कारणे आहेत.

नैसर्गिक :-

ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत- संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त व विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) व वसंत ऋतू सुरू होतो. सर्व ऋतूंत `कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‍गीतेत (१०:३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक व आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते. वृक्षवल्ली टवटवीत दिसतात.

ऐतिहासिक :-

या दिवशी

अ. श्रीरामांनी वालीचा वध केला तो हाच दिवस.

आ. सत्ययुगाचा प्रारंभ झाला तो हाच दिवस.

इ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला. या दिवसापासूनच `शालिवाहन शक’ सुरू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.

ई. इंद्राने वृत्रासूरावर विजय मिळवला तोच हा दिवस.

उ. श्री विष्णूने मत्स्यावतार घेतला तोच हा दिवस ( स्मृती कौस्तुभ ग्रंथात याचा उल्लेख आहे.)

सृष्टीची निर्मिती :-

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला सुरुवात झाली, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.

१ जानेवारी नव्हे, तर गुढीपाडवा हाच पृथ्वीचा खरा वर्षारंभदिन : `गुढीपाडव्याला सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या उत्पत्तीकाळाशी निगडित असल्याने सृष्टी नवचेतनेने भारित होते. याउलट ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता सुरू होणारे नवीन वर्षाचे कालचक्र हे विश्‍वाच्या लयकाळाशी निगडित असते. गुढीपाडव्याला सुरू होणार्‍या नववर्षाची तुलना सूर्योदयाला उगवणार्‍या तेजोमयी दिवसाशी करता येईल.

गुढी उभारण्याची पद्धत :-

चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा हिंदू धर्मियांचा वर्षातील पहिला सण व नूतन वर्षाचा पहिला दिवस. अभ्यंगस्नान करणे, दाराला तोरणे लावणे व पूजा यांबरोबरच घरोघरी गुढी उभारून हा सण साजरा केला जातो. दुष्ट प्रवृत्तींच्या राक्षसांचा व रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येत परत आले, तो हाच दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती याच दिवशी केली. अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी !

गुढीपाडव्याच्या दिवशी तेज व प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते व आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ५ ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी.

गुढीचे स्थान : गुढी उभी करतांना ती दरवाजाच्या बाहेर; परंतु उंबरठ्यालगत (घरातून पाहिल्यास) उजव्या बाजूला उभी करावी.

पद्धत :

अ. गुढी उभी करतांना सर्वप्रथम सडासंमार्जन करून अंगण रांगोळीने सुशोभित करावे गुढी उभारण्याच्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून त्याच्या मध्यबिंदूवर हळद-कुंकू वाहावे.

आ. गुढी उभी करतांना ब्रह्मांडातील शिव-शक्‍तीच्या लहरींना आवाहन करून तिची स्वस्तिकावर स्थापना करावी. यामुळे गुढीच्या टोकावर अस लेल्या सर्व घटकांना देवत्व प्राप्‍त होते.

इ. गुढी जमिनीवर उंबरठ्यालगत; परंतु थोडीशी झुकलेल्या स्थितीत उभी करावी.

आंब्याच्या पानांचे महत्त्व:-

इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानांत जास्त सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात. कोवळया पानांत तेजतत्त्व अधिक असते, म्हणून पूजेत आंब्याच्या कोवळया पानांचा वापर करावा.

कडूलिंबाच्या पानांचे महत्त्व:-

गुढीला कडूलिंबाची माळ घातली जाते. ईश्‍वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता आंब्याच्या पानांनंतर कडूलिंबाच्या पानांत जास्त असते. या दिवशी कडूलिंबाच्या कोवळया पानांद्वारे वातावरणात पसरलेल्या प्रजापति लहरी खेचून घेतल्या जातात. प्रजापति लहरी ग्रहण करण्यासाठी आवश्यक गुण सर्वसाधारण व्यक्‍तीत ईश्‍वराकडून येणार्‍या लहरी ग्रहण करण्याची क्षमता खूप कमी असते.

गुढी उभारण्यामागची वैज्ञानिक किरणे :

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात?

तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्‍तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्‍त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते.

तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे! गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्‍ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून निर्माण होणार्‍या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्‍या शिव-शक्‍तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्‍या लहरींची गती ही उसळणार्‍या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते.

गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ ! साडेतीन मुहूर्ताच्यापैकी एक महत्वाचा पूर्ण मुहूर्त ! हाच सृष्टीच्या निर्मितीचा दिवस ! सृष्टीचा वर्धापन दिन ! ब्रह्माजीने याच दिवशी सृष्टीच्या निर्मितीस प्रारंभ केला. याच दिवशी सत्ययुगाचा प्रारंभ झाला.

श्रीगणेशयामल तंत्रशास्त्रामध्ये गुढीपाडव्याचे महत्व स्पष्ट केलेले आहे. २७ नक्षत्रांच्यापासून २७ लहरी निर्माण होत असतात. त्या २७ लहरींच्यापैकी प्रजापति लहरी, यमलहरी व सूर्यलहरी या तीन लहरी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तीन लहरींचा संपूर्ण सृष्टीवर व सर्व प्राणिमात्रांच्यावर परिणाम होत असतो. प्रजापति लहरींच्यामुळे अंकुरांच्या निर्मितीसाठी जमिनीची क्षमता वाढते. विहिरींना नवीन पाझर फुटतात. बुद्धीची प्रगल्भता वाढते व शरीरामध्ये कफ प्रकोप निर्माण होतो. यानंतर यमलहरींच्यामुळे पाऊस पडतो. बीजांना नवीन अंकुर फुटतात व शरीरामध्ये वायूचा प्रकोप निर्माण होतो. तसेच, सूर्यलहरींच्यामुळे जमिनीची उष्णता वाढते. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते आणि शरीरामध्ये पित्त प्रकोप निर्माण होतो. याप्रमाणे प्रजापति, यम व सूर्य या तीन्हीही लहरींचे योग्य आणि उपयुक्त प्रमाणात एकत्रीकरण गुढीपाडव्याच्या दिवशी होत असते. यामुळे गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे. या दिवशी सृष्टीच्या निर्मितीचा आनंद व्यक्त करण्यासाठी गुढी उभारली जाते व सृष्टीकर्त्या ब्रह्माजीचे पूजन केले जाते. पोकळ वेळूच्या काठीला भरजरी खण, नवीन वस्त्र लावून त्यावर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उलटा ठेवला जातो. गुढीला कडुनिंबाचे, आंब्याचे डहाळे लावले जातात. अशी गुढी घरोघरी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान करून, घराच्या उंबऱ्याच्या बाहेर, उजवीकडे जमिनीवर स्वस्तिक रेखून सूर्योदयाच्या वेळी उभारली जाते. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात.

सूर्योदयाला गुढी उभारल्यानंतर प्रजापति तत्व वेगाने तांब्याच्या कलशामध्ये व वेळूच्या काठी मध्ये येते. सूर्यास्ताच्या वेळी प्रजापति लहरी संपतात. तेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करून -‘ब्रह्मध्वजाय नम:|’ असे म्हणून नमस्कार करून गुढी उतरविली जाते. गुढी आत आणल्यानंतर कलशामधील प्रजापति लहरी घरामध्ये प्रवेश करतात. यामुळे घरामध्ये सुख, शांति, ऐश्वर्य, आरोग्य नांदते. त्यादिवशी घराच्या दाराला लावलेले आम्रपानांचे तोरण हे मंगलसूचक आहे.

☺️ गुढीपाडव्याच्या दिवशी कडूनिंबाची पाने, फुले, गुळ, साखर, ओवा, चिंच, मिरे, हिंग हे पदार्थ एकत्र करून भक्षण केले जातात. यामुळे शरीरामधील कफ-वात-पित्त यांचा प्रकोप नाहीसा होऊन ते संतुलित होतात. त्यामुळे रक्तशुद्धी होऊन शारीरिक स्वास्थ्य प्राप्त होते. कडूनिंब-गुळ-चिंच वगैरे पदार्थांचे आंबट-गोड-कडू असे भिन्न-भिन्न स्वाद आहेत. याप्रमाणेच आपले जीवन म्हणजे सुख-दु:खादि अशा अनेक प्रसंगांचे मिश्रण असून त्यामध्ये मनाची समतोल वृत्ति ठेवावी, हाच संदेश मिळतो.

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगामधील संवत्सरफल जरूर वाचावे. त्यामध्ये ब्रम्हदेवाची सृष्टि, ब्रह्मदेवाचे आयुष्य व त्याप्रमाणे कालगणनेचे वर्णन केलेले असून या संवत्सराचे फल लिहीलेले असते. ते वाचल्यामुळे मनुष्याला समष्टीची, सृष्टीची व अव्याहत अखंड, प्रचंड मोठया कालचक्राची जाणीव होते. त्यामुळे मनुष्यामधील ‘मी कोणीतरी फार मोठा आहे,’ हा अंहकार कमी होऊन ईश्वराच्या अद्भुत निर्मितीच्या सत्तेच्या पुढे त्याचे मन नम्र, विनयशील होते.

गुढी ही दैवी शक्तीचे प्रतीक आहे. त्यामधील कलश हे पूर्णतेचे प्रतीक आहे. गुढीमधून व्यष्टि व समष्टि म्हणजेच विश्व व जीव यांचा संबंध तसेच, सृष्टीच्या विराट स्वरुपाची व अद्भुत शक्तीची, ऊर्जेची संकल्पना केलेली आहे.

गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूला प्रारंभ होतो. अंकुरांना नवीन पालवी फुटतात. निसर्गामध्ये नवचैतन्य निर्माण होते. सृष्टीमधील नवचैतन्य मनुष्याच्या मनामध्ये प्रविष्ट होते. मनुष्याच्या जीवनामध्ये नवीन स्फूर्ति, चेतना, प्रेरणा, आत्मविश्वास, उत्साह, धैर्य निर्माण होते. मनुष्य हाच सृष्टीचा प्रमुख घटक असल्यामुळे मनुष्यामध्ये स्फूर्ति निर्माण झाली की, आपोआपच सृष्टि बदलते मनुष्याचे कुटुंब बदलते, समाज बदलतो. राष्ट्र, विश्व सर्वांच्यामध्येच नवचैतन्य निर्माण होते. म्हणूनच गुढीपाडवा हा उत्सव विजय व आनंदाचे प्रतीक असून कोणत्याही नवीन कार्याला या दिवसापासुनच प्रारंभ केला जातो. म्हणूनच मानवी जीवन भव्य, दिव्य, उदात्त व परिपूर्ण करणाऱ्या आर्य सनातन वैदिक हिंदु धर्माचा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे गुढीपाडवा ! यावरून लक्षात येते की, सृष्टीची निर्मिती म्हणजे केवळ योगायोग नसून त्यामागे निश्चित नियोजन आहे व आपल्या हिंदू संस्कृतीमधील प्रत्येक सण, परंपरा या महत्वपूर्ण, अर्थपूर्ण असून त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे.

गुडीपाडवा हा सण आधी पासून सुरु आहे याचा आणखी एक पुरावा म्हणजेच खालील चोखामेळांचा अभंग

“टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥”

विसर्जन:-

सूर्यास्तानंतर लगेचच गुढी उतरवावी ज्या भावाने गुढीची पूजा केली जाते, त्याच भावाने गुढी खाली उतरवली पाहिजे, तरच जिवाला तिच्यातील चैतन्य मिळते. गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून व प्रार्थना करुन गुढी खाली उतरवावी. गुढीला घातलेले सर्व साहित्य दैनंदिन वापरातील वस्तूंच्या शेजारी ठेवावे. गुढीला अर्पण केलेली फुले व आंब्याची पाने यांचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. गुढी सूर्यास्तानंतर लगेचच खाली उतरवावी. सूर्यास्तानंतर १ ते २ तासांत वातावरणात वाईट शक्‍ती कार्यरत होऊ लागतात. सूर्यास्तानंतरही गुढी उभी असल्यास त्यात वाईट शक्‍ती प्रवेश करू शकतात. त्या शक्‍तींचा आपल्याला त्रास होऊ शकतो.

गुढीची पूजा करतांना व गुढी उतरवतांना पुढील प्रार्थना करावी

अ. गुढीची पूजा करताना करावयाची प्रार्थना : “हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील सात्त्विक लहरी आमच्याकडून ग्रहण केल्या जाऊ देत. त्यांतून मिळणार्‍या शक्‍तीतील चैतन्य सातत्याने टिकून राहू दे. मला मिळणार्‍या शक्‍तीचा वापर माझ्याकडून साधनेसाठी केला जाऊ दे”.

हीच आपल्याचरणी प्रार्थना !!

आ. गुढी खाली उतरवतांना करावयाची प्रार्थना :

“हे ब्रह्मदेवा, हे विष्णू, आज दिवसभरात या गुढीत जी शक्‍ती सामावली असेल, ती मला मिळू दे , हीच आपल्या चरणी प्रार्थना!!

अशा रीतीने आपण येत्या वर्षात प्रत्येक सण समजून आणि उमजून साजरा करू म्हणजे देश विघातक आणि धर्म विघातक शक्तींचे मनसुबे पूर्णत्वास जाणार नाहीत.

जगातील सर्वात प्राचीन आणि विज्ञानाधिष्ठित धर्मात जन्म मिळाल्याबद्दल आपण त्या परमनियतीचे निरंतर ऋणी असायला हवे आणि याचा सार्थ अभिमान (दुराभिमान नव्हे!)

बाळगायला हवा. चला आपण सर्व सनातन हिंदू धर्माचा जयजयकार करू.

भारत माता की जय।

© दासचैतन्य

मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उन्हाचे दिवस…  ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

☆ उन्हाचे दिवस… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

फाल्गुनाचा उल्लास सरला की उन्हाची काहिली सुरू होते. आसमंत तापत जातं. सावली हवीहवीशी वाटायला लागते. सूर्याच्या झळा जीव नकोसा करून टाकतात. माठाचे पाणी प्यायलो तरी तहान भागत नाही. हाश्शहुश्शचे चित्कार उमटायला लागतात. घामाच्या धारा टिपल्या जातात, तरीही पुन्हापुन्हा येणाऱ्या. वाऱ्याची मंद झुळूक सुखावणारी वाटू लागणारी. वळवाचा पाऊस  गारांसह आला तर तोही हवाहवासा.

चैत्र पालवी नुकतीच झाडांच्या फांद्यांवर फूटु पाहणारी. लाल पिवळे कोंब उलून येणारे. शिशिरात झडून गेलेला पालापाचोळा नवं रुप घेऊन अवतरण्याच्या तयारीत. नूतन वर्षाचा प्रारंभ बरंच काही नवीन नवीन घडवत होणारा. चैतन्याचा स्त्रोत खळाळणारा. उत्सवाचं गाणं गुणगुणण्याचे निसर्गाने ठरवलेलं. निसर्ग बेलगाम. स्वत:ची श्रीमंती मुक्तपणे उधळण्यास आतुर असलेला. शिशिराची कात टाकून नवीन कलेवर धारण करून नूतन संवत्सराचे आगमन साजरे करणारा. एक मनस्वी कलाकार.

निसर्गाचे यौवनात पदार्पण झाले की मनुष्यही  त्यापासून वेगळा राहू शकत नाही. तोही वसंताच्या आगमनाचे स्वागतच करतो. चैत्री पाडव्याला गुढी उभारून नव्या युगाला कवेत घेण्यास उत्सुक होतो. निसर्गाने भरभरून दिलेले धान खळ्यावरून दारी आलेले. केलेली मेहनत फळाला आलेली. दोन पाच कवड्या हाताशी येणार याची चाहूल सुखावणारी. कोठारे उतू गेली की समाधानाची लकेर डोळ्यात  चमकणारी. मुलीला उजवायचं असतं. घरच्या लक्ष्मीसाठी थोडंथोडकं का होईना हिरण्य घ्यायचं असतं. तिचा राबता हात सोन्याच्या कंकणांनी सुशोभित करायचा असतो. तिलाही समाधानाचे दोन क्षण गवसून द्यायचे असतात. मग बहावा फुलतो. सोनेरी स्वप्नांच्या राशी घेऊन.

तप्त उन्हाच्या झळा शमविण्यासाठीच जणू मोगरा उमलतो. शुभ्र व गंधित. आसमंत दरवळून सोडणारा. हातात घेतला तर त्याचा गंध हातांनाही आपलेसे करणारा. वेडावून टाकणारा. अल्प काळासाठी का होईना आपलं अस्तित्व जाणवून देणारा. तयाचा वेलू गेला गगनावरी असं ज्ञानरायांनाही भूरळ घालणारा मोगरा. कधी देवादिकांच्या शिरी स्थानापन्न होणारा वा रमणींच्या केशकलापात विसावणारा. पाकळ्या पाकळ्यांतून ताजेपणाचे विभ्रम सादर करणारा. वसंता बरोबर ग्रीष्मातही टिकून राहणारा मोगरा. एक शीतल व सुगंधित शिडकाव्याचे मूर्तिमंत स्वरूप. त्या निळ्या आभाळातील किमयागाराचे कसे मानू आभार!!

मोगरा तसा एकटा नसतो सोबत रातराणीला ही त्याने आणलेलं. चैत्र वैशाखाच्या वणव्यात पामर मानवाला हळुवारपणाचा दिलासा देण्यासाठीच ही योजना परमेश्वराने केली असावी. रात्रभर फुलून येणारी रातराणी लावीन वेड जीवा या स्वप्नातल्या कळ्यांसह सोबत देत राहते.

पळस फुलांचा केशरी बहर ओसरू लागला की गुलमोहोर आपले रक्तवर्णी रूप घेऊन उभा ठाकतो. फांदीफांदीवर आपल्या जखमा घेऊन आलेला. चिरंतन काळापासूनच्या वेदना उघड करणारा. आतापर्यंत जपून ठेवलेली ठसठस फांदीफांदीतून व्यक्त करणारा. कुठून कसा मोकळा होऊ या घालमेलीत एक अख्खं वेदनांचे झाडच उभे ठाकलेले. तप्त ग्रीष्मातच  फुलून येण्याचं प्राक्तन. दुपारची उन्हे सरली की पायाशी सडा ओल्या जखमांचा. सगळंच दुखणं रितं करून टाकण्याचे जणू ठरवलेले त्याने आणि त्यासाठी निवड केली ग्रीष्माचीच. होरपळलेल्या क्षणांचा ही बहर होऊ द्यावा ही संकल्पना तडीस नेणारा गुलमोहोर. एक घायाळ रूतणारं, खुपणारं काव्य.

उन्हाचे दिवस तापू लागले की अवघं जग थंडाव्यासाठी आसुसलेलं.  उन्हाच्या झळा वाहू लागल्या की कडूनिंबाची सावलीही गोड वाटू लागते. अंमळ विसाव्यासाठीचे  हक्काचे ठिकाण. घटकाभर विश्रांति घेतली की तजेलपणा घेऊनच कडूनिंबाच्या सावलीतून बाहेर पडावं. चैत्र पालवीचे  वैभव मिरवत पांथस्थांना गारवा देण्याचे पुण्यकर्म गाठी बांधणारा कडूनिंब आपला सखाच.

हेमंताच्या गारठ्यात आलेली आम्रमंजिरी आता फळाला आलेली. कच्या कैरीचं पन्हं तहान शांतवणारं. पुढे रसाळ आंब्याची चाहूल देणारं. ग्रीष्मातच येणारे करवंद, जांभळे, आंबटगोड असणारी गारसेल चिंच, पिवळे धम्मक रायण, रसरशीत ताडगोळे व पांढरे जांबू, निसर्ग काही कमी करत नाही. कमी पडू देत नाही. तो आपला देतच असतो. किती घेशील दो कराने ही आपली अवस्था. ऋतुचक्राचे हे तप्त पर्व आपणास सुखावह जावो. ऋतु चक्रातील प्रत्येक घटक महत्वाचा आणि म्हणूनच छोट्याशा अबोलीचा विसर पडू नये.  छोटी नाजूक अबोली फुलास येते जेव्हा इतर फुलांचा बहर  ओसरू लागतो. तेव्हा तिचीही दखल घ्यायलाच हवी. नाही का? आणि हो, दिवसभर उन्हाची काहिली सहन केल्यावर  गारवा अनुभवून देणारी, कसा विसर पडेल तिचा? तिच चैत्र यामिनी…

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. -९८२२८५८९७५ , ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ऋतूनां कुसुमाकर… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? विविधा ?

☆ “ऋतूनां कुसुमाकर…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

वसंत हा निसर्गाचा उत्सव आहे. सतत सुन्दर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसन्त असेल तर वसन्त हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मीकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत ’ ऋतूनाम्‌ कुसुमाकरः’ असे म्हणून ऋतुराज वसंताची बिरुदावली गायली आहे. सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये जणू पुन्हा रुजून येतो.

कात टाकणारे साप, धुळीची, किरणात नाचणारी बाळे, संध्याकाळी कौलांवर रेंगाळणारे कवडसे आणि खडकात फुलणारा चाफा हे सारे आजूबाजूला दिसू लागले की कळते आता बसंत आने को है..अन् मन, सावरीच्या कापसासारखं अलवार होऊन वाऱ्याच्या झुळकी होतं… अशा एक ना दोन अनेक जादू घडत गेल्या आणि या सगळ्या वसंताच्या आगमनाच्या सुचना आहेत हे वयपरत्वे कळत गेले… फुलांचा संभार सांभाळत उभा असलेला चाफा बघणं मला आवडतं… असं वाटतं ,रात्रीच्या वेळी त्याच्या फुलांमधून चांदण्यांचे झरे झिरपतात आणि मुरतात त्याच्या सालीमध्ये…, वाटतं जणू चाफा म्हणजे चांदण्यांचं घरच आहे की काय? तर कधी वाटतं, एखादी सोनपरी आपले इवले पंख पांघरून येईल कुठूनशी आणि चाफ्याच्या फुलावर मोठ्या डौलात बसून झोके घेत राहील… देवघरात झुल्यावर बसवलेल्या गोैरीसारखी…

खरंच हा वसंत एकटा येत नाही कधी. तो घेवून येतो नवीन पालवीची जादू… जी तो पखरत जातो कोमेजलेल्या फांद्यांपासून कोमेजलेल्या मनांपर्यंत… आणि उत्फुल्ल करून टाकतो सारा आसमंत… आपल्या पेटार्‍यातल्या रंगबिरंगी चिजा काढून रंगवून टाकतो सारा राखाडी बाज आपल्या रंगांच्या पंचमीत… चाफा, मोगरा, अमलताश, पलाश, बहावा सारेच त्याचे साथी आणि गुलमोहर तर प्राणप्रिय सखा, वाटायचं हा वसंत जसाकाही कान्हा आणि ही सृष्टी जणू राधिका; जी कान्हाच्या स्वागतासाठी सारी मरगळ झटकून साजशृंगार करते आहे. पाखरांच्या गळ्यातून तिच्या कान्हाजीचे स्वागत करते आहे, म्हणते आहे…

ऋतू वसंत तुम

अपनेही रंग सो

पी ढुंढन मै

निकसी घर सो

ऋतू बसंत तुम..

जणू काही कित्येक काळाच्या तितिक्षेनंतर विरहिणीला तिचा प्राणसखा भेटावा आणि तिने म्हणावे…

सजण दारी उभा… काय आता करू? घर कसे आवरू? मज कसे सावरू? हाच तो क्षण बहाव्यानं आपल्या सोनसळी फुलांनी सजण्याचा आणि पलाश,पांंगार आणि गुलमोहराने बहरण्याचा. वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसन्ताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो. वसन्त म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. जीवन व वसन्त ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती सन्त म्हणते. ज्याच्या जीवनात वसन्त फुलतो तो सन्त!

आकाश हेच घर असणाऱ्या तेजाने सगळीकडचा अंधार,उदासिनता दूर सारून प्रकाशानं आसमंत उजळून टाकावा आणि या तेजाचे काही कण पिऊन समस्त सृष्टीने नवा जन्म घ्यावा..असंच काहीसं वाटतं वसंताच्या येण्यानं..जणू फुलणाऱ्या प्रत्येक कळीतून नवीन जीवन जन्माला यावे आणि त्याने आपल्या रंग,गंध,रसातून उधळून द्यावे जीवनासक्तीचे तुषार जे शिशिराच्या वृद्ध उदास पानगळीलाही जगण्याचा मोह पाडतील..हीच तर वसंताची जादू आहे..वसंत म्हणजे सकारात्मकता.वसंत म्हणजे उत्साह. वसंत म्हणजे यौवन..वसंत येतो, दवांत न्हातो… दर्वळ दर्वळ होतो. जणू एखाद्या लाजऱ्या पानसखीचे मंथर गाणे गातो..कधी फुलात हसतो,वनी लगडतो, झऱ्यांत झुळझुळ वाहतो..तर कधी गंध कोवळा  माखून घेऊन आभाळी पसरतो..कधी वाऱ्यावर लहरत सूर सोहळा होतो तर कधी तृणांच्या मखमालीवर गवतफुलाबरोबर उमलताना सोनसावळा होऊन खुलतो..एखाद्या आमराईत सहज वाऱ्याच्या हिंदोळ्यावर आंबवती झुलताना कोकीळाच्या गळ्यातील पंचम तान होतो  असा हा ऋतूनाम् कुसुमाकरः वसंत येतो अन् आपल्या ऋतूवैभवाने चिंब भिजवतो..मला, तुम्हाला आणि साऱ्या चराचराला..तेव्हा आठवतं, ‘गगन सदन तेजोमय’ …तेव्हा नक्कीच स्वागत करूया या ऋतूराजाचं जीवनातल्या नवीन बहरासाठी..

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print