मराठी साहित्य – विविधा ☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? विविधा ?

☆ दे डाय रिच ! – लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ श्री सुनील देशपांडे 

(नकोशा मालमत्ता)…

एकीकडे तरुण पिढी स्थावर मालमत्तांपासून दूर चालली आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ अजूनही स्थावर मालमत्तामध्ये मनाने गुंतून पडलेले आहेत.

फक्त स्वत:साठीच राहायला घर नव्हे, तर आपल्या मुलांसाठीसुद्धा घरे ज्येष्ठांनी घेऊन ठेवली आहेत.

ज्यांची पुढची पिढी महाराष्ट्राच्याही बाहेर नव्हे तर परराष्ट्रात आहे, अशांसाठीसुद्धा पालकांनी आपल्या आयुष्यातील पै-पै जमवून घरे घेतली आहेत.

त्यांच्यापुढील पिढय़ांना या घरांमध्ये काडीचाही रस नाही. या मालमत्तांकडे बघण्यासाठी वेळ नाही. पुढची पिढी खूप व्यवहारी आहे.

माझे एक अशील वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी वारले. पत्नीचे आधीच निधन झाले होते. एक मुलगा लंडनमध्ये आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये रहातो. त्यांचे त्या देशाचे राष्ट्रीयत्व आहे. दोघांनाही वडिलांनी घेतलेल्या घरामध्ये स्वारस्य नव्हते. वडिलांनी इच्छापत्रानुसार सर्व मालमत्ता दोन्ही मुलांत समप्रमाणात देण्याचे लिहून ठेवले होते. मी इच्छापत्रानुसार व्यवस्थापक होतो. दोन्ही मुलांना सर्व मालमत्ता आपल्या नावावर करून घेण्यास, नंतर विकण्यास वेळ नव्हता. दोघांनी माझ्या नावाने कुलमुखत्यार पत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) बनवून दिले. सर्व मालमत्ता विकून येणारे पैसे विशिष्ट खात्यात जमा करून त्यांच्या देशात पाठवण्यास सांगितले.

ज्येष्ठ नागरिक आपल्या वास्तूंमध्ये भावनात्मकदृष्टय़ा गुंतलेले असतात, तशी तरुण पिढी नसते.

एका क्लाएंटने त्यांच्या निवृत्तीपश्चात राहण्यासाठी कोकणात घर बांधले होते. आई-वडिलांच्या पश्चात त्या मालमत्तेच्या सात/बारा उताऱ्यावर नावे लावण्यास मुलांना वेळ नव्हता. खेडय़ात जाऊन सरकारी अधिकाऱ्यांबरोबर कागदपत्रांची पूर्तता करणे कटकटीचे वाटत होते. हे सोपस्कार करून मिळणाऱ्या पशांमध्ये रस नव्हता. कारण त्यांचे उत्पन्न भरपूर होते. म्हणून वडिलांनाच त्यांच्या पश्चात, कोठे आड जागी घर बांधले म्हणून दूषणे देत होते.

आपली पारंपरिक दुसरी गुंतवणूक सोने-नाणे आणि चांदीच्या वस्तूंमध्ये असते. आणि ती सांभाळणे जोखमीचे असल्याने ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवली जाते. बँकेत ठेवल्याने त्याचा वापर संपतो आणि लॉकरचे भाडे व लॉकरसाठी द्यावी लागणारी ठेव रक्कम यांनी आपण बँकेला श्रीमंत करत असतो.

आमच्या लहानपणी सोन्याचा भाव अमुक होता. आज तो इतका वाढला, असे आपण म्हणतो. आपण मधली वर्षे मोजत नाही. सोन्याच्या गुंतवणुकीमध्ये दीर्घ मुदतीत परतावा फक्त सात टक्के असतो. वस्तू घडणावळ आणि वस्तू मोडताना होणारी घट विचारात घेतल्यास तो अजून कमी होतो.

तसेच होणाऱ्या नफ्यावर कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो तो वेगळाच.

सोन्या-चांदीतली गुंतवणूक ही खूपदा भावनात्मक जास्त असते. त्याचा व्यावहारिक विचार केला जात नाही.

मग सोने घेताना शुद्ध सोने घेऊन ठेवण्याऐवजी मुली-सुनांसाठी दागिने किंवा नातवंडांसाठी दागिने या स्वरूपात केली जाते.

खूपदा जुन्या पद्धतीचे दागिने नवीन पिढीस आवडत नाहीत. मग ते मोडून नवीन डिझाइनचे बनविले जातात. यात पुन्हा घट आणि घडणावळ जाते.

आज बाजारांत फेरफटका मारल्यास सर्वात जास्त दुकाने मोबाइलची नंतर सोने-चांदी, कपडेलत्ते, ओषधे, खाण्याचे पदार्थ यांची असतात. त्या तुलनेत वाणसामानाची फार कमी असतात. ज्यात नफा प्रचंड ती दुकाने जास्त. स्वाभाविकपणे त्यात ग्राहकाचा फायदा कमीच होणार.

नवीन पिढी जोखीम नको म्हणून खरे दागिने घालण्यापेक्षा खोटे घालणे पसंत करते. शेवटी खोटे जास्तच चकाकते. 😀

सोन्याची मागणी चीन आणि भारत देशात सर्वात जास्त आहे. इतर देशांत सोने दागिन्यांच्या स्वरूपात फार थोडय़ा प्रमाणात खरेदी केले जाते.

गुंतवणूक म्हणून इतर देशांत सोने शुद्ध स्वरूपात बाळगले जाते. बाजारातील सोन्याच्या भावातील चढ उतारानुसार त्याची खरेदी-विक्री केली जाते.

गुंतवणुकीच्या संकल्पना बदलत चालल्या आहेत. जुन्या योजनांचा परतावा पुढील काळात अजून कमी होण्याची शक्यता आहे. तो वेळीच समजून घ्या व पर्यायी गुंतवणूक योजना निवडणे क्रमप्राप्त ठरेल.

तिसरी भावनात्मक गुंतवणूक मुलांचे उच्चशिक्षण.

मुलांच्या उच्चशिक्षणासाठी आपल्या हौस-मौजेवर काट मारून प्रसंगी कर्ज काढतात. मुलं नोकरीला लागली की ते कर्ज फेडतात. मुलं परदेशात असतील तर हे कर्ज खूपदा आई-वडीलच फेडतात. याच्या पुढे जाऊन काही ज्येष्ठ आपल्या नातवंडांसाठी शिक्षणाची सोय म्हणून आयुर्वमिा पॉलिसी किंवा इतर गुंतवणूक करत असतात.

असेच एका ज्येष्ठ क्लाएंटला गुंतवणूक करताना विचारले,

‘‘काका, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज काढले. आता नातवासाठी गुंतवणूक का करता?’’ त्यांनी उत्तर दिले, ‘‘शिक्षणाचा खर्च दिवसेंदिवस खूप वाढतोय. तेवढीच नातवाच्या शिक्षणासाठी माझी थोडीशी मदत.’’

मी त्यांना म्हटले, ‘‘नातवाच्या शिक्षणासाठी गरज किती रकमेची असेल, याचा अंदाज आहे का? आणि तुमच्या मुलाने नातवाच्या शिक्षणासाठी यापूर्वीच ‘एसआयपी’ गुंतवणूक सुरू केली आहे. ती रक्कम त्याच्या शिक्षणासाठी भरपूर होईल.

नातवाच्या नावाने लाखभर रुपये ठेवण्यापेक्षा तुम्ही दोघे चांगल्या पर्यटनाला जाऊन या.’’

त्यावर ते म्हणाले, ‘‘ही रक्कम नातवाच्या वाढदिवसाची भेट म्हणून आता तरी गुंतवा. नंतरच्या वेळचे नंतर पाहू.’’

आपली मानसिकता कशी आहे. आपल्याला मुलांकडून पसे घ्यायला त्यातसुद्धा लग्न झालेल्या मुलीकडून पसे घ्यायला कमीपणा वाटतो. पण नातवंडांची सोय पाहणे जबाबदारीचे वाटते.

आयुष्यभर मुलांचा विचार केला आणि म्हातारपणी नातवंडांचा विचार करता.

आपले आयुर्मान वाढते आहे. आपले खर्च वाढते आहेत. याचा विचार करा. कायम दुसऱ्यांचा विचार करण्यात स्वत:ची हौस-मौज विसरू नका. आयुष्य स्वत:साठी जगा.

असे म्हणतात की *भारतीय लोक आयुष्यभर गरिबीत (कष्टांत) राहतात आणि पुढल्या पिढीला श्रीमंत करतात..

दे डाय रीच!*

© श्री सुनील देशपांडे

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ १ मे महाराष्ट्र दिन ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

१ मे महाराष्ट्र दिन… ☆ श्री प्रसाद जोग

१  मे १९६०  रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते नवनिर्मित महाराष्‍ट्र राज्याची स्थापना  झाली. या चळवळीत पत्रकार, राजकारणी, लेखक आणि विचारवंत यांनी सहभाग घेतला होता. नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी १०५  जणांनी आपले बलिदान दिले.

२१ नोव्हेंबर,१९५६ या  तारखेची ती संध्याकाळ होती. सकाळपासून फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते. मराठी बाण्याची मुंबई या अन्यायाने पेटून उठली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून त्याचा जळजळीत निषेध होत होता. याचा संघटित परिणाम म्हणून कामगार आणि पांढरपेशांचा एक विशाल मोर्चा, तेव्हाच्या सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येणार होता. दुपार नंतर, म्हणजे मुंबईतल्या शंभर-सव्वाशे कापडगिरण्यांमधील, कामगारांची चारची पहिली पाळी संपल्यानंतर गिरणगावातून मोर्चा निघेल, असा अंदाज होता. पण त्याला छेद देत पांढरपेशांचा प्रचंड जनसमुदाय, एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमू लागला. हा मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळला जाईल, असा अंदाज होता. कारण फोर्ट भागात जमाव आणि सभाबंदी जारी केली होती. सर्व कार्यालयांतील महिला कर्मचाऱ्यांना घरी पाठविले होते. जमावबंदीचा भंग करून, मुंबईकर फ्लोरा फाउंटनाच्या चौकात सत्याग्रहासाठी ठाण मांडून बसले होते. त्यानंतर थोड्या वेळातच विपरीत घडले. सत्याग्रहींना उधळून लावण्यासाठी लाठीमार करण्यात आला. मात्र, तरीही ते चौकातून हटत नाहीत म्हटल्यावर पोलिसांना गोळीबाराचा आदेश देण्यात आला. मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे “दिसताक्षणी गोळ्या” घालण्याचे पोलिसांना आदेश होते.

या सर्व हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे काँग्रेसी सरकारला नमते घेऊन १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करावी लागली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी झाली.

संयुक्त महाराष्‍ट्र स्थापनेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी १ मे या दिवसाला ‘सोन्याचा दिवस’ असे संबोधले होते. संयुक्त महाराष्‍ट्र राज्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलले होते, की ‘महाराष्ट्राच्या निर्मितीमुळे आपल्याला भरभराटीचे आणि सुखाचे दिवस येणार  असून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे, हा महाराष्‍ट्र राज्याचा मुख्यमंत्री या नात्याने मी माझे कर्तव्य समजतो. मराठी भाषिक प्रदेश एकत्र करून जनताभिमुख सरकार देणे, हे महाराष्ट्र राज्य स्थापनेमागील मुख्य धोरण आहे, हे सर्वांनी आपल्या मनावर कोरून ठेवावे.`

१  मे १९६०  हा मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या मं‍त्रिमंडळाने नवराज्याचा राज्यकारभार हाती घेतला. महाराष्ट्रातील लोक कोणत्या भागात राहत आहेत, त्यांची भाषा काय, त्यांचा धर्म, जात, पंथ कोणता, अशा विचाराला थारा न देता सर्वांना समान न्याय व समान संधी प्राप्त करून देणे, ही सरकारची मुख्य भूमिका असेल. केवळ मराठी बोलणाराच महाराष्ट्रीय नसेल तर जो महाराष्‍ट्रात राहून आपले जीवनमान समृद्ध करतो. असा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीय असल्याचे मानले तरच महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभावाचे प्रतिक असल्याचे राज्य असेल, असेही ते म्हणाले होते.

वेगवेगळ्या कवींनी महाराष्ट्र गीते लिहिली आहेत.

गोविंदाग्रज (राम गणेश गडकरी )>> मंगल देशा,पवित्र देशा,महाराष्ट्र देशा

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर >> बहू असोत सुंदर संपन्न की महा

राजा बढे  >>जय जय महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा

कुसुमाग्रज>>माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

शान्ता शेळके >>स्वराज्य तोरण चढे गर्जती तोफांचे चौघडे

महाराष्‍ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आला.

जुनी इंग्लिश नवे बदलून मूळ नावे पुन्हा प्रस्थापित करण्यात आली.भारतातल्या बऱ्याच शहरांची नावे दुरुस्त केली

मद्रासचे> चेन्न्नई< झाले

कलकत्याचे>कोलकाता< झाले

कोचीनचे > कोची< झाले

उटीचे > उधगमंडलम<झाले.

बेंगलोरचे > बंगळुरू < झाले

बेळगावचे >बेळगावी<झाले

बॉम्बे चे मुंबई केले आहे. परंतु परभाषीक महाराष्ट्रीयन हा आजही आवर्जून बॉम्बे च म्हणताना दिसतो. आपल्याला कोणी असे बॉम्बे म्हणताना आढळले तर त्या  व्यक्तीला तिथेच थांबवून मुंबई म्हणायला भाग पाडले पाहिजे.असे करायला लावणारा तोच मराठी माणूस.आणि तीच त्या १०५ हुतात्म्यांना आदरांजली.

संयुक्त महाराष्‍ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली होती. एस. एम. जोशी, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट, नाना पाटील, तुळशीदास जाधव, डॉ. धनंजय गाडगीळ, भाऊसाहेब हिरे, आचार्य अत्रे, प्रो. मधु दंडवते इत्यादी‍ अनेक व्यक्तींनी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी  मोलाचे योगदान दिले. या महान व्यक्तींचे आपण  सदैव ऋणी राहूया.

जय महाराष्‍ट्र, जय महाराष्‍ट्र, जय महाराष्‍ट्र

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – भोवतालच्या मीट्ट काळोखातही मनातला श्रद्धेचा धागा बाबांनी घट्ट धरून ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती. पण ती फलद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार घडणं आवश्यक होतं आणि एक दिवस अचानक,..?)

पुढे एक दोन दिवसांनी बाबा पोस्टातून घरी आले ते आठ दिवसांची रजा मंजूर करून घेतल्याचे सांगतच.

” मी गाणगापूरला जाऊन येईन म्हणतो”

” असं मधेच?”

” हो.तिथे जाऊन पादुकांचे दर्शन घेतो. नाक घासून क्षमा मागतो. तरच माझ्या मनाला स्वस्थता वाटेल.”

ते बोलले ते खरंच होतं गाणगापूरला जाण्यासाठी त्यांनी घर सोडलं त्याच दिवशी घरातलं फरशा बसवण्याचं काम पूर्ण करून गवंडी माणसं शेजारच्या घरी त्याच कामासाठी गेलेली होती. बाबा परत आले ते अतिशय उल्हसित मनानंच! त्यांच्या चेहऱ्यावर एवढ्या दूरवरचा प्रवास करून आल्याचा किंवा जागरणाच्या थकावटीचा लवलेशही नव्हता.आत येताच पाय धुवून त्यांनी स्वतःच देवापुढे निरांजन लावलं.मग कोटाच्या खिशातून एक पुरचुंडी काढली. ती अलगद उघडून देवापुढे ठेवली. त्यावर कोयरीतलं हळद-कुंकू वाहून नमस्कार केला.

“काय आहे हो हे?काय करताय?”आईने विचारलं.

” हा दत्तमहाराजांनी दिलेला प्रसाद.” ते प्रसन्नचित्ताने हसत म्हणाले.

“म्हणजे हो..?”

“मी संगमावर स्नान करून  वर आलो आणि वाळूतून चालताना सहज समोर लक्ष जाताच एकदम थबकलो. समोर सूर्यप्रकाशात काहीतरी चमकत होतं. मी जवळ जाऊन खाली वाकून ते उचलून घेतलं. पाहिलं तर तो वाळूत पडलेला हुबेहूब पादुकेसारखा दिसणारा गारेचा एक तुकडा होता.पण ही अशी एकच पादुका घरी कशी आणायची असं मनात आलं.काय करावं सुचेचना. मग सरळ मागचा पुढचा विचार न करता तिच्यासोबत हा दुसरा तेवढ्याच आकाराचा लांबट गारेचा खडा उचलून आणला…”ते उत्साहाने सांगत होते.हे वाचताना त्यांनी दुधाची तहान ताकावर  भागवून घेतली असं वाटेलही कदाचित,पण ते तेवढंच नव्हतं हे कांही काळानंतर आश्चर्यकारक रितीने प्रत्ययाला आलं.तोवर तत्काळ  झालेला एक बदल म्हणजे त्यानंतर घरातलं वातावरण हळूहळू पूर्वीसारखं झालं. यामधेही चमत्कारापेक्षा मानसिक समाधानाचा भाग होताच पण हे सगळं पुढे चमत्कार घडायला निमित्त ठरलं एवढं मात्र खरं!

आमच्या घरात फरशा बसवून झाल्यानंतरचा अंगणात रचून ठेवलेला फुटक्या शहाबादी फरश्यांच्या तुकड्यांचा ढीग अद्याप मजूरांनी हलवलेला नव्हता. त्यातल्याच एका आयताकृती फरशीच्या तुकड्यावर त्या गारेच्या दोन पादुका शेजारच्या घरी काम करत असलेल्या गवंडी मजुरांकडून बाबांनी सिमेंटमधे घट्ट बसवून घेतल्या. आश्चर्य हे की तेच मजुर त्या संध्याकाळी कामावरून घरी जाण्यापूर्वी आपणहून आमच्या घरी आले. बाबांना विचारुन त्यांनी त्या ढीगातले त्यातल्या त्यात  मोठे चौकोनी तुकडे शोधून त्या पादुका ठेवायला एक कट्टा आणि त्या भोवती तिन्ही बाजूंनी आणि वर बंदिस्त आडोसा असं जणू छोटं देऊळच स्वखुशीने बांधून दिलं! त्या कष्टकऱ्यांना ही प्रेरणा कुणी दिली हा प्रश्न त्या बालवयात मला पडला नव्हताच आणि आईबाबांपुरता तरी हा न पडलेला प्रश्न निरुत्तर नक्कीच नव्हता! आमच्या घरासमोरच्या अंगणातलं ते पादुकांचं मंदिर आजही मला लख्ख आठवतंय!

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून आंघोळ आवरून बाबांनी मनःपूर्वक प्रार्थना करून त्या पादुकांची तिथे स्वतःच प्रतिष्ठापना केली आणि त्यांची ते स्वत: नित्यपूजाही करु लागले.हे  सुरुवातीला निर्विघ्नपणे सुरु राहिलं खरं पण एक दिवस बाबांना अचानक पहाटेच फोनच्या ड्युटीवर जाण्याचा अनपेक्षित निरोप आला. परत येऊन अंघोळ पूजा करायची असं ठरवून बाबा तातडीने पोस्टात गेले पण दुपारचे साडेअकरा वाजत आले तरी ते परत आलेच नाहीत.आज पादुकांची पूजा अंतरणार या विचाराने आई अस्वस्थ झाली. आम्ही भावंडांनी आपापली दप्तरं भरून ठेवली.आईनं हाक मारली की  जेवायला जायचं न् मग  शाळेत.आईची हाक येताच आम्ही आत आलो.आई आमची पानंच घेत होती पण नेहमीसारखी हसतमुख दिसत नव्हती.

“आई, काय झालं गं?तुला बरं वाटतं नाहीये का?” मी विचारलं.आई म्लानसं हसली.तिच्या मनातली व्यथा तिने बोलून दाखवली.यात एवढं नाराज होण्यासारखं काय आहे मला समजेचना.

“आई, त्यात काय?आमच्या मुंजी झाल्यात ना आता?मग आम्ही पूजा केली म्हणून काय बिघडणाराय?खरंच..,आई, मी करू का पादुकांची पूजा?” मी विचारलं.आई माझ्याकडे आश्चर्याने बघतच राहिली.

” नीट करशील?जमेल तुला?”

” होs.न जमायला काय झालं? करु?”

“शाळेला उशीर नाही का होणार?”

“नाही होणार.बघच तू”

“बरं कर”आई म्हणाली.

त्यादिवशी पुन्हा आंघोळ करून आणि पादुकांची पूजा करून घाईघाईने दोन घास कसेबसे खाऊन मी पळत जाऊन वेळेत शाळेत पोचलो. दत्तसेवेच्या मार्गावरचं माझ्याही नकळत आपसूक पुढे पडलेलं माझं ते पहिलं पाऊल होतं! पुढे मग बाबांना खूप गडबड असेल, वेळ नसेल, तेव्हा पादुकांची पूजा मी करायची हे ठरुनच गेलं.

काही महिने असेच उलटले.सगळं विनासायास आनंदाने सुरु होतं.आणि एक दिवस मी पूजा करत असताना अचानक माझ्या लक्षात आलं, की त्यातल्या पादुकेच्या शेजारच्या गारेच्या दुसऱ्या लांबट तुकड्यालाही हळूहळू पादुकेसारखा आकार यायला लागलाय.

त्याच दरम्यान त्या छोट्याशा देवळावर सावली धरण्यासाठीच जणूकांही उगवलंय असं वाटावं असं देवळालगत बरोबर मागच्या बाजूला औदुंबराचं एक रोप तरारून वर येऊ लागलं होतं!!

ते रोप हळूहळू मोठं होईपर्यंत कांही दिवसातच त्या गारेच्या लांबट दगडाला त्याच्यासोबतच्या पादुकेसारखाच हुबेहूब आकार आलेला होता!!

आईबाबांच्या दृष्टीने हे शुभसंकेतच होते. हळूहळू ही गोष्ट षटकर्णी झाली तसे अनेकजण हे आश्चर्य पहायला येऊ लागल्याचं मला आजही आठवतंय.

कुरुंदवाड सोडण्यापूर्वीच बाबांना वाचासिद्धीची चाहूल लागलेली होती तरीही आम्हा मुलांच्या कानापर्यंत त्यातलं काहीही तोवर आलेलं नव्हतं.पण खूपजण काही बाही प्रश्न घेऊन बाबाकडे येतात ,मनातल्या शंका बाबांना विचारतात, बाबा त्यांचं शंकानिरसन करायचा प्रयत्न करतात आणि ते सांगतात ते खरं होतं हे येणाऱ्यांच्या बोलण्यातून अर्धवट का होईना  आमच्यापर्यंत पोचलो होतंच.

संकटनिवारण झाल्याच्या समाधानात ती माणसं पेढे घेऊन आमच्या घरी यायची. बाबांचे पाय धरू लागायची पण बाबा त्यांना थोपवायचे. ‘नको’ म्हणायचे. नमस्कार करू द्यायचे नाहीत.पेढेही घ्यायचे नाहीत.

“अहो, मी तुमच्या सारखाच एक सामान्य माणूस आहे. मला खरंच नमस्कार नका करु. तुमच्या देव मी नाहीय.मी हाडामासाचा साधा माणूस.तुमचा देव तो.., तिथं बाहेर आहे. त्याला नमस्कार करा. यातला एक पेढा तिथं,त्याच्यासमोर ठेवा आणि बाकीचे त्याचा प्रसाद म्हणून घरी घेऊन जा” ते अतिशय शांतपणे पण अधिकारवाणीने सांगायचे.

तो बाहेर देवापुढे ठेवलेला पेढाही आम्ही कुणीच घरी खायचा नाही अशी बाबांची सक्त ताकीद असे. त्या दिवशी कोणत्याही निमित्ताने जो कुणी आपल्या घरी येईल,त्याला तो पेढा प्रसाद म्हणून द्यायचा असं बाबांनी सांगूनच ठेवलं होतं. मग कधी तो प्रसाद दुधोंडीहून डोईवरच्या पाटीत दुधाच्या कासंड्या घेऊन घरी दुधाचा रतीब घालायला येणाऱ्या दूधवाल्या आजींना मिळायचा, तर कधी आम्हा भावंडांबरोबर खेळायला, अभ्यासाला आलेल्या आमच्या एखाद्या मित्राला किंवा पत्र टाकायला घरी येणाऱ्या पोस्टमनलाही त्यातला वाटा मिळायचा!

माझे आई बाबा तेव्हाच नव्हे तर अखेरपर्यंत निष्कांचनच होते. त्यांच्या संसारात आर्थिक विवंचना,ओढग्रस्तता तर कायमचीच असे. पण तरीही बाबांनी लोकांच्या मनातल्या त्यांच्याबद्दलच्या विश्वासाचा कधीच बाजार मांडला नाही. ते समाधानीवृत्तीचे होतेच आणि सुखी व्हायचे कोणतेच सोपे जवळचे मार्ग त्यांनी जवळ केले नव्हते. देवावरची आम्हा मुलांच्या मनातली श्रद्धासुद्धा तशीच निखळ रहाणं आणि आमच्या मनात अंधश्रद्धेचे तण कधीच न रुजू देणं ही माझ्या आई-बाबांनी आम्हा भावंडांना दिलेली अतिशय मोलाची देनच म्हणावी लागेल!

क्रमशः …दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रामका गुणगान करिये… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ राम का गुणगान करिये… ☆ श्री विश्वास देशपांडे

पं भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर या दोन भारतरत्नांनी गायिलेले ‘ गुणगान करिये रामका ‘ हे अतिशय सुंदर गीत. हे गीत ऐकताना जणू समाधी लागते. तशी रामाची कुठलीही गाणी गोडच ! मग ते गीतरामायण असो वा अन्य कुठलीही गाणी. मुळात रामायणच गोड ! पेढ्याचा कुठलाही भाग खाल्ला तरी तो गोडच लागणार ना ! तशीच अवीट गोडीची ही रामकथा. या रामकथेने हजारो वर्षांपासून अनेकांना प्रेरणा दिली. शेकडो लेखक आणि हजारो कवी लिहिते झाले. पण रामकथेची थोरवी संपली का ? वर्णन करून झाली का ? ती कधीच संपणार नाही. रामकथा म्हणजे विविध डोळे दिपविणाऱ्या रत्नांनी भरलेला एक सागर आहे. जेवढी खोल बुडी माराल तेवढी रत्ने हाताला लागतील. समुद्राला आपण रत्नाकर म्हणतो. रामकथा सुद्धा या अर्थाने एक रत्नाकरच ! 

मी सुरुवातीला उल्लेख केलेल्या गीताचे सुरुवातीचे शब्द आहेत ‘ रामका गुणगान करिये.’ रामाचं गुणगान कशाकरता करायचं ? आणि गुणगान केलं तरी कोणाचं जातं ? ज्याच्यात काही अलौकिक असे गुण आहेत, अशाच व्यक्तीचं आपण गुणगान करतो ना ! आपण रामाचं गुणगान करतो, कृष्णाचं गुणगान करतो, शिवाजी महाराजांचं गुणगान करतो, ते त्यांच्यात विशेष असे अलौकिक गुण आहेत म्हणून. आपण रावणाचं, कंसाचं, औरंगजेबाचं गुणगान करत नाही. आपण आपल्यासमोर असेच आदर्श ठेवतो की ज्यांच्यापासून आपल्याला काही शिकता येईल, प्रेरणा घेता येईल. आजच्या या लेखात प्रभू श्रीरामांचे असेच काही गुण आठवू या. त्या निमित्ताने त्यांचं गुणगान करू या.

सुरुवातीला मला डोळ्यासमोर दिसतो तो, वसिष्ठांच्या आश्रमात शिकणारा राम. राम राजपुत्र असला तरी, आश्रमात तो एक वसिष्ठ ऋषींचा आज्ञाधारक शिष्य म्हणूनच वावरतो. इतर शिष्यांबरोबरच आश्रमातील सगळी कामे करतो, नियम पाळतो. इतर विद्यार्थी जे काही अन्न ग्रहण करतील तेच अन्न तोही ग्रहण करतो. कुठेही राजपुत्र असल्याचा तोरा तो मिरवत नाही. आश्रमातील शिक्षण पूर्ण झाल्यावर निघताना वसिष्ठ ऋषींचा आणि गुरुमातेचा आशीर्वाद घेऊन तो निघतो. त्यावेळी गुरुमातेला तो म्हणतो, ‘ या आश्रमात तुम्ही आम्हाला मातेचे प्रेम दिले. मातेची आठवण येऊ दिली नाही. आमची पुत्रवत काळजी घेतली. या आश्रमातील वास्तव्यात माझ्याकडून जर काही चुकलं असेल तर, आपण उदार मनाने मला क्षमा करावी. ‘ केवढा हा नम्रपणा !

आश्रमातील शिक्षण पूर्ण करून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न आपल्या गृही परततात. आता खरे तर काही दिवस त्यांचे मौजमजेचे आणि विश्रांतीचे. पण अशातच विश्वामित्र ऋषी येतात. त्यांच्या यज्ञात राक्षस विघ्न आणतात म्हणून संरक्षणासाठी रामाला आपल्याबरोबर पाठवण्याची मागणी करतात. वसिष्ठ ऋषींच्या समजावण्यानंतर दशरथ राजा रामाला विश्वामित्रांसोबत पाठवतो. अशा वेळी राम आनंदाने त्यांच्याबरोबर जातो. सोबत लक्ष्मणही असतोच ! लक्ष्मण हा रामाची सावली आहे. सावली जशी आपली साथ सोडत नाही, तशीच लक्ष्मणही रामाची साथ कधीच सोडत नाही. विश्वामित्रांसोबत वनातून जात असताना राम आपल्या मधुर वाणीने आणि आज्ञाधारकतेने विश्वामित्रांचे मनही जिंकून घेतो. त्यांना म्हणतो, ‘ कदाचित माझ्या शिक्षणात काही अपूर्णता राहून गेली असावी. मला तुमच्याकडून काही नवीन शिकायला मिळावे म्हणूनच ही नियतीची योजना असावी. ‘ विश्वामित्र आपल्या या गोड आणि तेजस्वी शिष्यावर बेहद्द खुश होतात आणि राम लक्ष्मणाला काही दिव्य अस्त्रं बहाल करतात, जी त्यांना पुढील काळात उपयोगी पडतात. ‘

मग मला आठवतो तो राम की ज्याला राज्याभिषेक होणार असतो. खरं तर केवढा आनंदाचा हा प्रसंग ! आणि त्यानंतर लगेच कैकयी आपले दोन वर दशरथाकडून मागून घेते. एका वराने रामाला वनवासात पाठवावे आणि दुसऱ्या वराने भरताला राजा करावे. दोन्ही टोकाचे प्रसंग ! एक अति आनंदी होण्याचा, तर दुसरा अति दुःखी होण्याचा. पण या दोन्ही प्रसंगात रामाची स्थितप्रज्ञता आपल्याला दिसते. तो आनंदाने हुरळून जात नाही की वनात जावे लागेल म्हणून दुःखी होत नाही. कोणतीही परिस्थिती संयमाने कशी हाताळावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राम. म्हणूनच तो ‘ मर्यादापुरुषोत्तम ‘ आहे. त्याच्या वागण्याबोलण्यात सागराचे गांभीर्य आहे.

दशरथ राजामध्ये रामाला वनवासात जा म्हणून सांगण्याची हिंमत राहिलेली नसते. पण आपल्या पित्याने दिलेले वचन खोटे ठरू नये म्हणून तो आनंदाने वनवासाला जायला निघतो. खरं तर प्रजा त्याच्या बाजूनं असते. त्याने उठाव केला तरी प्रजेने त्याची साथ दिली असती एवढा तो प्रजेला प्रिय होता. पण रामाचा निर्धार, रामाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. त्यात कालत्रयीही बदल होणार नाही. सीतेसारखी तरुण आणि त्रिभुवनात जिच्या सौंदर्याची कोणी बरोबरी करू शकणार अशी पत्नी. नुकताच विवाह पार पडलेला. अशा वेळी आपल्या तरुण आणि सुंदर पत्नीचा मोहही त्याला अडवू शकत नाही. सीता नंतर त्याच्यासोबत जाते हा भाग वेगळा.

कैकयीमुळे आपल्या प्राणप्रिय असलेल्या बंधूला वनात जावे लागते हे लक्ष्मणाला कळते, तेव्हा तो कैकयीची निर्भत्सना करतो. अशा वेळी राम त्याला सुंदर शब्दात समजावतो. ‘ लक्ष्मणा, अरे जशी माता कौसल्या, माता सुमित्रा तशीच माता कैकयी. माता ही सदैव आदरणीय असते. ‘ जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियासि ‘ हे त्याचे ब्रीद आहे. ‘ नाहीतरी मला काही ऋषीमुनींची भेट घ्यायची इच्छा आहे. वनात गेल्यानंतर अनायासे ही इच्छा पूर्ण होईल, ‘ असे अत्यंत समजूतदारपणा आणि त्याच्या मनाचे औदार्य दाखवणारे उद्गार तो काढतो.

वनात असतानाही भरत त्याला भेटायला येतो. अयोध्येला परत येण्यासाठी खूप विनवणी करतो. परंतु राम त्याला निर्धारपूर्वक नकार देतो. शेवटचे अस्त्र म्हणून तो वसिष्ठांची पण तशीच इच्छा आहे असे रामाला सांगतो. पण राम भरताला म्हणतो, ‘ एकदा आपण वडिलांना जे वचन दिले ते पाळले नाही तर रघुकुलाच्या कीर्तीला कलंक लागेल. ‘ ‘ रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाई .’ हे ब्रीद कसोशीने पाळणारा राम आहे. या ठिकाणी दुसरा कोणीही असता तर भावाने विनंती केली, वसिष्ठांचीही तशीच इच्छा होती, असे सोयीस्कर उद्गार काढून अयोध्येला परत जाऊ शकला असता.

रामाने एकदा ज्याला आपले म्हटले, हृदयाशी धरले, त्याची साथ कधीच सोडली नाही. मग तो गुहक असेल, निषादराज असेल, सुग्रीव असेल किंवा बिभीषण असेल. शरणागताला आश्रय देणे, प्रसंगी आपल्या प्राणांचे मोल त्यासाठी द्यायला तयार होणे हे रामाचे ब्रीद होते. मित्र जोडताना जातपात, उच्चनीच, स्त्रीपुरुष असा भेद रामाने कधीच केला नाही. रामाने रावणावर विजय मिळवला, लंका जिंकली. ठरवले असते तर तो लंकेचा राजा होऊ शकला होता. पण तो मोह त्याला नव्हता. रावण जर रामाला शरण आला असता, तर रामाने त्याचेही मनपरिवर्तन केले असते. त्याचे राज्य त्याला परत दिले असते. पण तसे व्हायचे नव्हते. कोणी तरी रामाला विचारले, ‘ तुम्ही बिभीषणाला राज्य द्यायचे वचन दिले आणि ते त्याला दिले. पण जर रावण तुम्हाला शरण आला असता, आणि त्याने राज्याची मागणी केली असती तर काय ? ‘ अशा वेळी रामाने फार सुंदर उत्तर दिले आहे. तो म्हणतो, ‘ रावण माझ्याकडे आला असता तर, त्याला मी अयोध्येचे राज्य दिले असते आणि आम्ही चारही भाऊ अरण्यात निघून गेलो असतो. ‘ असे मनाचे औदार्य दाखवणारे उदगार फक्त रामच काढू शकतो. रावणाचा वध झाल्यानंतर त्याचा यथोचित अंत्यसंस्कार करावा असे तो बिभीषणाला सुचवतो. मृत्यूनंतर वैर संपते आणि त्याचा आदर्श रामाने घालून दिला.

रामाच्या चरित्रात असे त्याच्या गुणविशेष दर्शवणारे अनेक प्रसंग आहेत. महर्षी वाल्मिकींनी देखील श्रीरामाला देव म्हणून आपल्यासमोर ठेवले नाही. त्याच्या गुणांची पूजा आपण बांधावी, त्याचे अनुकरण करावे हाच त्यांचा उद्देश होता. समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे उद्गार काढले आहेत, तेच उद्गार तंतोतंत रामालाही लागू होतात. समर्थ म्हणतात

निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारु ।

अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी ।।

अशा या गुणनिधी असलेल्या रामाचे गुणगान करू या. त्याचे थोडे तरी गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करू या. जय श्रीराम !

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

श्री वैभव चौगुले

? विविधा ?

☆ “मेघ…” ☆ श्री वैभव चौगुले ☆

मनाच्या उंबरठ्यावर खूप गर्दी होती. मेघ दाटल्यासारखे मनातले आभाळ भरून आले होते. फक्त डोळ्यातून अश्रू वाहणे राहिले होते. नजर कोणत्याच नजरेला मिळालेली नव्हती. वीज जेव्हा क्षणार्धात धरणीचे चुंबन घेते. आणि क्षणातच तिच्या कवेतून पसार होते. अशी भेट बहुदा झाल्यानंतरच असवांची वाट मोकळी होणार होती.

मनातल्या दाटलेल्या आभाळाच्या मनात खूप काही लपून होतं. गरज होती आभाळ रितं होण्याची आणि मेघ अश्रू वाहण्याची. काळेभोर ढग का साटतात? कसे तरंगतात? हवे तिथे बरसतात का? की नको तेथे कोसळतात आणि कोसळेलच तर का ?  असे प्रश्न माझ्या मनात का उपस्थित होतात. मला कळत नाही.

कुणाला काय घेणे, देणे त्या दाटलेल्या ढगांचे आणि वाहणा-या आसवांचे! तहानलेल्या भावनांची तहान आसवांनी मिटेल का ? की तहान भागवण्यासाठी किती वेदनांची दारे ठोठावयाची यालाही काही मर्यादा आहे की नाही? डोक्याला फेटा जितका वेळ राहतो, तेवढेच सुख वाटेला येते. फेटा उतरला की दु:ख पुन्हा सिंहासनावर येऊन बसते. सुख दु:खाच्या या लपंडावात किती बुध्दीबळाचे प्यादे, हत्ती, घोडे, उंट, वजीर मारले जातात. अखेर राजा ही चुकत नाही. कारण या डावात एक हारल्याशिवाय दुसरा जिंकणार कसा? एकाला हारावेच लागते हा नियमच आहे. किती नियमात राहू…की बरसून जाऊ  मेघ होऊन एकदा त्या मुक्ततेने कोसळणा-या सरींसारखा! की वादळ होऊ आणि साठलेली काळजावरची धूळ उडवून टाकू! म्हणजे काळीज कसे आहे, हे तरी समजेल!

बरसल्यावर निदान मृदगंधातून तरी हृदयापर्यत पोहचता येईल. बाहेरून कसं ओळखायचं मन, की कोणत्या फोटोमध्ये किंवा कोणत्या सेल्फीमध्ये दिसेल हे मन! श्वासातून क्षणभर मनाला स्पर्श करून  मृदगंधाला सोबत घेऊन, मनापर्यत पोहचून मनाशी हितगूज करून पुन्हा  श्वासातून बाहेर येता तरी येईल. क्षणभर का होईना निखळ मनामनांची भेट होईल. शेवटी हा आभासचं!

आभाळ भरलेले असताना कबूतरांची जोडी खिडकीच्या आस-याखाली येवून बसताना दिसली. गुटरगुटर आवाज करत चोची जवळ चोच आणत जणू येणा-या संकटावर मात कसे करायचे? याचा विचार करत होते की काय? की सुटलेला गार वारा, मौसमातला थंडावा, ऋतूहळवा, प्रितीचा बहर, कुठेतरी पाऊस चालू असताना वा-या सोबत वाहणारा मृृदगंधचा स्वाद घेत प्रेमाचे संवाद करत असतील. याचा विचार माझ्या मनात येत होता. कोण आपल्याला पाहतं का? तसेतर वेळ्ला किती महत्व आहे आपल्याला माहीत आहे. मिळालेला वेळ ते हितगूज करण्यात घालवतात. एकमेकांना काय हवं काय को याची विचारपूस करतात हे काय कमी आहे का?  या जिवंत उदाहरणाकडे मी एकटक पाहत बसलो होतो.

चहा मला करायला येतो. या वेळी घरात कोणीच नव्हतं. मी चहा बनवायला घेतला. मला चहा जास्त लागत नाही. मी अर्धा कपच चहा घेत असतो. तो माझ्या मनाप्रमाणे व्हावा हे अपेक्षित असतं. दूध थोडसं, चहा पावडर, चिमूटभर साखर सोबत आल्ह किसून टाकलं आणि उकळी येऊन दिली. चहा गाळून घेतला, चहाचा कप हातात घेऊन खिडकीतून त्या कबूतराच्या जोडीकडे बघत गालातल्या गालात हसत ऋतुराजाच्या या प्रेमळ देखाव्याच्या स्वागतासाठीच जणू मी सज्ज झालो होतो.

आता हा मेघराजा कसं बरसणार, हे दाटलेले आभाळ मोकळे होताना वीज कितीदा धरणीला चुंबनार, आणि कितीदा मखमली जखमा करून सोडून जाणार, या कबूतराची जोडी माझ्या खिडकीच्या आस-याला थांबणार, की अजून कोणता आसरा शोधणार, हा वादळवारा गारवा देणार की डोक्यावरचे छप्पर घेऊन जाणार हे शेवटी प्रश्न ते प्रश्नचं……..चहा संपला आणि शेवटी माझ्याकामाकडे मी वळालो….

© श्री वैभव चौगुले

सांगली

मो 9923102664

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चला आजोळी जाऊया!…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ चला आजोळी जाऊया!सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

☆ चला आजोळी जाऊया! ☆

“माझ्या मामाची रंगीत गाडी हो

त्याला खिल्लाऱ्या बैलाची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

    नाही बिकट घाट

    सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो”

आजोळ!!

किती प्रेम, किती जिव्हाळा आहे ना या शब्दामध्ये. ग. ह. पाटलांची ही कविता ऐकली की परत एकदा फिरून आजोळी जावसं वाटतं. आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या आईचं माहेर. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा शाळेला कधी एकदा सुट्टी लागते आणि आपण आजोळी जातो अशी ओढ या बाल मनाला लागलेली असते. ही ओढ अजोळामध्ये मिळणाऱ्या प्रेमामुळे, लाडामुळे, आपुलकीमुळे असते.

माझी मुले छोटी होती तेव्हाची एक गोष्ट आठवते. दोन्ही मुलं रोज शाळेला स्कूल बसने जायची. स्कूल बसमध्ये एक शाळेतलाच माणूस मुलांना सोडायला यायचा. शेवटच्या दिवशी त्याने माझ्या मुलांना विचारले,

“अरे बच्चों, इस बार कहॉं जानेवाले हो छुट्टीयोंमे?”

त्यावर माझ्या छोट्या मुलाने क्षणभरही विचार न करता पटकन उत्तर दिले होते,

“मायके”

सगळेजण त्याच्या उत्तराने हसू लागली आणि त्याला विचारू लागली,

“अरे, किसके मायके जाने वाले हो?”तेव्हा देखील तो धीटपणे म्हणाला.

“मम्मी के मायके जानेवाले हैं।”

तेव्हा तो अगदी छोटा होता. दुसरीच्या वर्गात. पण तेव्हा मुलांना माझ्यापेक्षाही आधी आजोळी जायची ओढ असायची.नातवाला आजोळ विषयी वाटणारी ओढ किती छान काव्यरूप केली आहे बघा ग. ह. पाटलांनी.

“कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरून धरून पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

    लेक एकुलती

    नातू एकुलता

किती कौतुक कौतुक होई हो”

आजोळी इसाई देवीच्या यात्रेला जाताना,महानंदीने छान शाकारलेल्या, त्यावर ताडपत्रीचे छत घातलेल्या बैलगाडीला चंगाळ्या(पितळी घुंगरांच्या गळ्यात घातलेल्या माळा) गळ्यात घालून जेव्हा लाल्या- झुब्या जुंपले जायचे, तेव्हा त्यांच्या दुडक्या चालीने चालताना बैलगाडीमध्ये बसणाऱ्या माणसांना आणि मुलांना जी मजा यायची ती दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये येणार नाही. यात्रेत जाऊन आजोबांच्या मागे लागून लागून प्रत्येक रहाट पाळण्यात बसायचे. आजोबांनी मात्र ‘जावयाचं पोरं’ म्हणून काळजीने आणि ‘लेकीचे लेकरू’ म्हणून दुधावरच्या साईच्या प्रेमाने त्याचे सगळे लाड पुरवायचे.

चिंचेच्या दिवसात अंगणात पन्नास पोते चिंच येऊन पडायची. ती फोडण्यासाठी अंगणभर छत केलं जायचं आणि सगळी गल्लीतील मुलं, मुली, बायका येऊन चिंचा फोडायला बसायचे. नातवांसाठी तर हे औषधचं. आजीच्या मागे लागून हळूच चिंचेचे चोकणे करून घ्यायचे. आईला नकळत गुपचूप ते गट्टम देखील करायचे.

आंब्याच्या दिवसातली मजा तर काही औरचं. आढीतले पिकलेले आंबे टोपलं भरून आजोबांनी काढून आणायचे. नातवांना अंगातले बनियन सुद्धा काढून टोपल्या भोवती बसवायचे आणि मग बाळकृष्ण जसा लोणी खाताना सगळ्या अंगावर लोणी सांडायचा तसे हे दोन नातू आंबे खाताना सगळ्या अंगावर आंब्याचा रस सांडायचे. काय गोड चित्र असायचं ते.

आमच्या आजोळची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत जवळजवळ पन्नास माणसं आजोबांच्या घरात असायची. घरामध्ये सगळ्या आज्ज्या, माम्या, मावश्या, आई सर्वजण मिळून कामं करायची. पाहुणे आलेत म्हटलं की कुठे ऑर्डर द्यायला जायची वेळ यायची नाही. सगळ्याजणी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक बनवायच्या. गोड पदार्थ करताना तर आजोबा स्वतः होऊन हातभार लावायचे.पन्नास माणसांसाठी फ्रुटसलाड केलेलं मला आठवतं एक मोठा पाण्याचा बंब भरून सर्व फळे, ड्रायफ्रूट्स एकत्र करून, दूध घालून हलवत असलेले आजोबा अजूनही आठवतात. चुलत, मावस, सख्खे असा काहीही भेदभाव तेव्हा नसायचा. सर्वजण एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदाने रहायचे. कारण घराची सत्ता ही एका कर्त्या पुरुषाकडेच असायची त्यामुळे घरे एकसंध होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांना आजोळचा आनंद माहिती असणार.

माझ्या आईच्या आजोळच्या आठवणी ती मला सांगते. तिच्या सगळ्या मावश्यांची मुलं, मामांची मुलं, आणि माझ्या आईची भावंड सगळी उन्हाळ्यात एकत्र आजोळी जायची. ती सर्व मिळून पंधरा वीस जण व्हायची. एवढ्यांना मेजवानी खाऊ घालण्यासाठी माझ्या आईचं आजोळ काही श्रीमंत नव्हतं पण प्रेमळ होतं. तिची आजी रोज सकाळी सकाळी गरम गरम वरण, भाकरी सगळ्या नातवंडांना खाऊ घालायची आणि आई सांगते, “आजीच्या हातची गरम गरम वरण भाकरी त्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड आणि त्यानंतर वाचायला मिळणारा गावकरी हा पेपर म्हणजे आमच्यासाठी (आईसाठी) स्वर्गसुख होतं.” आजच्या काळातल्या मुलांना रूचेल का हो ही सुखाची कल्पना?

आम्ही आजोळी गेलो की सर्वांना मदत करू लागायचो. पडतील ती कामे करायचो. आताच्या पिढीच्या सुखाच्या कल्पनाच बदलल्या आहेत. फोरव्हिलर मध्ये सुद्धा आताच्या सुखासीन झालेल्या मुलांना थोडीशी अडचण झाली तर सहन होत नाही. मग ती बैलगाडी मध्ये कशी काय बसणार त्यामुळे आपोआपच बैलगाडी संपुष्टात येऊन तिची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काळाचा महिमा अजून काय…

मी लहान असताना आमच्या घरी तर उन्हाळ्यात असंख्य नातलग

यायचे. शेतात आमराई त्यामुळे घरात आंबेचं आंबे. माझ्या बाबांचे सख्खे, चुलत, सावत्र, आते, मामे, मावस, सगळी भावंडे यायची आणि भाच्चे,भाच्च्या देखील यायच्या. सर्वजण मिळून रहायची, खायची, धमाल करून जायची. सर्वांसाठी खुलं असलेलं माझ्या आई बाबांचं घर. माझ्या आत्याची मुलं तर माझ्या आई बाबांनी स्वतःच्या मुलांसारखी सांभाळली. प्रेम होते म्हणून आपुलकी होती. आपुलकी होती म्हणून आजोळ होतं आणि आहे.

आज जरी विभक्त कुटुंब पद्धती झाली असेल तरी देखील खूप ठिकाणी अजूनही आजोळचं प्रेम पाहायला मिळतं. माझ्याच घरी माझ्या सासूबाई वारल्या, सासरे आता थकले आहेत. पण सर्व नातवंडांसाठी,भाचऱ्यांसाठी आणि नातलगांसाठी माझं घर स्वागताला नेहमी आतुर असतं. सर्वजण येऊन राहतात भरभरून आनंद घेतात.

“आनंदाचा गोड ठेवा

आजोळच्या आठवणी

चला आजोळला जाऊ

भेटे सुखाची पर्वणी

*

आजी आजोबाची माया

भेटे तिथे गेल्यावर

आशीर्वाद खूप सारे

आणि प्रेम निरंतर”

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

🔅 विविधा 🔅

हनुमंत आमुची कुळवल्ली ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

रामायणात हनुमंताची भूमिका फार मोलाची राहिली आहे. रामाच्या कार्यात अग्रभागी आणि अतितत्पर कोण असेल तर तो एकमेव  हनुमंत किंवा हनुमान. हनुमंताच्या अंगी अनेक गुण होते आणि त्याचा उपयोग त्याने कधीही स्वतःसाठी केला नाही तर तो केला फक्त एका रामासाठी. हनुमंताच्या रामभक्तीच्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. बुद्धीवंतामध्ये वरिष्ठ, अतिचपल, कार्यतत्पर, कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, संभाषण चतुर, उत्तम सेवक, सर्व शक्तिमान, (बुद्धी आणि शक्ती एकत्र असणं अतिदुर्मिळ! ) असे हनुमंताचे अनेक गुण सांगितले जातात. रामायणात वर्णन केल्याप्रमाणे हनुमंताची आणि रामाची भेट तशी उशिरा म्हणजे सिताहरण झाल्या नंतरची आहे. पण पहिल्या भेटीतच हनुमंताचे वाक्चातुर्य पाहून प्रभू श्रीराम प्रसन्न झाले तसेच प्रथमच रामाचे दर्शन होऊन हनुमंत रामाचा कायमचा दास झाला. जिवाशिवाचे मिलन झाल्याचा तो अमृतक्षण होता. पण एकदा रामाची भेट झाल्यावर मात्र हनुमंतानी कधीच रामास अंतर दिले नाही. तो रामाचा एकनिष्ठ सेवक बनला. आपल्या असामान्य आणि अतुलनीय भक्तीने हनुमंताने नुसते देवत्व ( रामतत्व) प्राप्त केले नाही तर जिथे जिथे रामाची पूजा केली जाते तिथे हनुमंताची पूजा व्हायला लागली. रामाचे अनंत भक्त आहेत पण राम पंचायतनात मात्र फक्त हनुमंताचा समावेश आहे. आज सुद्धा जिथे जिथे रामकथा ऐकली जाते, सांगितली जाते तिथे तिथे हनुमंतासाठी मानाचे आसन ठेवलेले असते.

पूर्वी आपल्याकडे अध्ययन आणि अध्यापन हे मौखिक पद्धतीने म्हणजे पाठांतर रूपानेही केले जात असे. लिखीत स्वरूपात अध्ययनाची पद्धती त्यामानाने अलीकडील आहे. याचा एक दुष्परिणाम असा झाला की बराचसा इतिहास आपल्याकडे लिहिला गेला नाही आणि जो लिहिला गेला तो परकीय प्रवाशांनी किंवा आक्रमकांनी. स्वाभाविकपणे तो त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिला. त्यांच्या हिताच्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. यातून एक गैरसमज पसरविला गेला की रामायणात जे वानर होते ते (व्वा!) नर  नसून ती फक्त ‘माकडं’ होती. ही आपल्या पराक्रमी आणि विजयी इतिहासाची जगाने केलेली क्रूर चेष्टा आहे, असेच म्हणावे लागेल. रामायणात असे वर्णन आहे की किष्किंधा राज्य हे सुग्रीवाच्या अधिपत्याखाली होते. त्या राज्याचा सेनापती होता केसरी. आणि ह्या केसरीचा पुत्र हनुमंत. सध्याची दक्षिणेकडील चार राज्यं म्हणजे त्याकाळातील किष्किंधानगरी. सात मजली सोन्याचे महाल असल्याचे वर्णन रामायणात आहे. आजच्या काळात एखाद्या राज्याच्या मंत्र्याची संपत्ती किती असते आपल्याला कल्पना आहे, मग या चार एकत्रित राज्याचा सेनापती किती श्रीमंत असेल. असा हा भावी सेनापती हनुमंत रामाचा दास होतो, नुसता कागदोपत्री दास न होता तो कायमचा रामदास होतो यातच त्याच्या भक्तीचे ‘मर्म’ सामावले आहे.

महारुद्र जे मारुती रामदास।

कलीमाजि जे जाहले रामदास।।

असे ज्याचे वर्णन करण्यात येते ते समर्थ रामदास यांना सुरुवातीपासूनच हनुमंताबद्दल तीव्र ओढ, श्रद्धा, भक्ती होती. प्रभुश्रीरामानी दृष्टांत दिल्यापासून समर्थानी ‘समर्थ’ होईपर्यंत आणि पुढे कार्यसमाप्तीपर्यंत हनुमंताची अखंडित साधना केली. त्याचे यथायोग्य परिणाम आपण शीवकाळात अनुभवले.

शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न होतसे | शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत धावती ||”

समर्थ रामदास

यासमर्थ वचनाची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली पाहिजे. तो काळ मोगलांच्या आक्रमणाचा होता. टोळधाड यायची, घरावर नांगर फिरवला जायचा, आपलीच माणसे क्षुल्लक ‘वतनां’साठी, जहागीरीसाठी आपल्याच माणसांना मारायची. स्वाभिमान नष्ट झाला होता, समाजाला एक  प्रकारचे सामूहिक नपुंसकत्व प्राप्त झाले होते. समाज आपले शौर्य, वीर्य, धेर्य विसरला होता. कोणीतरी ह्या सर्वावर बसलेली काजळी झटकण्याची गरज होती. अशा अस्वस्थ मनाचा अभ्यास करून समर्थानी हनुमंताची मंदिरे स्थापन करून बलोपासनेस सुरुवात केली. तरुण बलवान  व्हायला लागले आणि विविध मठांतून शक्ती आणि बुद्धियुक्त असे नवीन तरुण घडू लागले आणि त्याचा उपयोग छत्रपतींना स्वराज्य स्थापनेसाठी झाला.

रामदास स्वामीनी पूर्ण विचार करून आपल्या आराध्य देवतेची निवड केली. आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा खुपच पुरातन आहे. शिष्य साधनेतून इतका ‘तयार’ होतो की शिष्याचे नुसते विचार बदलत नाहीत तर त्याची कुडी सुद्धा गुरुसारखी किंवा उपास्यदेवतेसारखी होते. आपला समाज हनुमंतासारखा बलवान, बुद्धिमान, सर्वगुंणसंपन्न व्हावा म्हणून हनुमंताची मंदिरे आणि मठ स्थापन करण्यात आले. उपास्य देवतेची निवड करतानाही समर्थांनी कोंदंडधारी रामाची निवड केलेली आहे. आपल्या पत्नीला रावणाने पळवून नेल्यावर रामाने आयोध्येला निरोप पाठवून सैन्य मागविले नाही, तर स्वतः उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीच्या आधारे, तेथील सामान्य मनुष्यांच्या (वानराच्या) साह्याने लंकेवर स्वारी करून आपल्या पत्नीला सोडवून आणले. ह्यासर्व कार्यात हनुमंत एकनिष्ठेने रामकार्यात कटिबद्ध होता. हनुमंताने जेंव्हा सिताशोधनासाठी लंकेत गेला, सितामाईला भेटला आणि म्हणाला की तुम्ही माझ्या सोबत चला, मी आपल्या मुलासमान आहे, आपण माझ्या माताच आहात. पण ती पतिव्रता म्हणाली की स्वतः प्रभू राम इथे येतील, ज्याने मला पळवून आणले त्याचा नाश करतील तेंव्हाच मी त्यांच्या सोबत येईन. ह्याला म्हणतात निष्ठा!.

अशा या हनुमंताची समर्थांनी उपासना केली आणि समाजाकडून कडून करवून घेतली. त्याकाळात रूढ झालेल्या क्षुद्र देवतांची पूजा, उपासना समर्थांनी बंद पाडली आणि तीही हनुमंताची उपासना सुरु करून. योग्य असा पर्याय उपलब्ध करून समर्थानी समाजाच्यातील भक्तीला आणि शक्तीला जागृत केले. ‘आधी केलं आणि मग सांगितले’ या उक्तीस जागून स्वतः समर्थ रोज एक हजार सूर्य नमस्कार घालायचे. त्या काळात आणि आज सुद्धा स्वतः व्यायाम करणारा संत पाहायला मिळणं हे दुर्मिळच!. समाजाची दुखरी नस काय आहे हे जाणून त्यानुसार उपचार करण्याचं काम समर्थानी केलं. एखाद्या मनुष्याला साधना करून मुक्ती मिळण्यापेक्षा संपूर्ण समाज एक पायरी उन्नत झाला तर ती प्रगती जास्त चांगली, हे सूत्र उरात ठेऊन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी समर्थानी अवघे जीवन खर्च केले. स्वतः लौकिक अर्थाने कधीही प्रपंच न करणारा हा रामदासी संतपुरुष लोकांनी ‘प्रपंच नेटका करावा’ असे सांगत होता. प्रपंच नेटका करण्यासाठी काय करावे लागेल हे सुद्धा त्यांनी सूत्रबद्ध रीतीने दासबोधात लिहून ठेवलेआहे.

सर्वसामान्य मनुष्य (समाजपुरुष ) हा लहान मुलाप्रमाणे वागतो. तो आदर्श जीवन जगायचं प्रयत्न करेलच असे नाही पण तो लहान मूलाप्रमाणे अनुकरणशील मात्र नक्कीच असतो. एखादया लहान मुलांचे वडील सैनिक असतील तर त्या लहान मुलास आपण सैनिक व्हावेसे वाटते, एखाद्याचे वडील डॉक्टर  असतील तर त्याला आपण डॉक्टर व्हावेसे वाटते. हे अगदी स्वाभाविक आहे. त्या मूलासमोर जो आदर्श प्रस्तुत केला जातो , तसे होण्याचा ते मूल प्रयत्न करतं, म्हणून समर्थांनी समाजापुढे हनुमंत हा आदर्शांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणून प्रस्तुत केला. हनुमंताचा आणिक एक विशेष गुण आहे. हा हनुमंत उपजत देव म्हणून जन्माला आलेला नाही, तर आपल्या भक्तीने, नराचा नारायण व्हावा त्याप्रमाणे भगवंताची (रामाची ) नित्य सेवा करून देवत्वास पोचलेला आहे. हनुमंत कर्तव्यतत्पर, प्रयत्नवादी आहे. व.पु. काळे म्हणतात त्याप्रमाणे मोटर सायकल वरून प्रभात फेरफटका (morning walk) करणाऱ्यांना हनुमंत कधीच उमगणार नाही. सर्व सैन्याला खांद्यावर बसवून लंकेत नेणं हनुमंताला अवघड नव्हतं, पण सामान्य मनुष्यात स्वाभिमान जागृत होण्यासाठी त्याला लढायला लावणं जास्त गरजेचं होतं आणि म्हणून सर्व वानरांच्या साह्याने रामसेतू बांधून लंकेत जाऊन युद्धात रावणांचा पराभव करून, त्याला मारून रामानी सितामाईला परत आणली.

आपल्या कुळातील पूर्वजांची माहिती कोणी आपल्याला विचारली तर आपण फारतर तीन किंवा चार पिढ्यांची नावे सांगू, पण त्या आधीच्या पिढ्यांची नावे सांगता येतीलच असे नाही, पण आपण हनुमंताच्या कुळातले आहोत, रामकृष्णाच्या वंशातले आहोत, छत्रपतींच्या वंशातले आहोत, असं नुसतं म्हटलं तरी आपले रक्त तापते, छाती गर्वाने फुगते आणि आपल्या अंगात आपसूक वीरश्री संचारते. ज्यांना आपला इतिहास वैभवशाली होता हे माहित असतं त्यांचा भविष्यकाळ सुद्धा उज्ज्वल असतो अशा प्रकारचे एक  वचन आहे. आपल्या बाबतीत ते नितांत खरे आहे. जिजाबाईंनी शिवबाला रामायणातील, महाभारतातील विजयाचा इतिहास शिकविला, अन्याय सहन करायचा नसतो, तर त्याविरुद्ध लढून न्याय मिळवायचा असतो हे शिकविले आणि मग चार इस्लामी पातशाह्यांच्या छाताडावर उभे राहून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले.

आज आपण आपल्या मुलांना हिंदुस्थानच्या पराजयाच्या आणि युरोपीय देशांच्या विजयाचा इतिहास शिकवीत आहोत, त्यामुळे आपली तरुण पिढी परकीय देशांच्या विकासासाठी परदेशी जात आहे, आपण सर्वच बाबतीत त्याचे अंधानुकरण करीत आहोत. आपण जन्माने हिंदू आणि आचरणाने ख्रिश्चन/मुस्लिम बनत आहोत. ह्याला एकाच कारण आहे ते म्हणजे आपण आपलो ‘कुळवल्ली’ विसरलो आहोत किंवा जाणीवपुर्वक विसरले जावी म्हणून समाजात विविध दुष्ट शक्ती कार्यरत आहेत. आपण वेळीच सावधान होण्याची गरज आहे. लौकिक अर्थाने परंपरा न पाळता जरा जागरूक राहून , ‘धर्म’ सजगतेने समजावून घेऊन आचरणात आणण्याची गरज आहे. छत्रपती जन्माला येतीलही पण त्याआधी मावळे मात्र आपल्याला आपल्या घरातच घडवावे लागतील. असे आपण करू शकलो किंवा प्रयत्न चालू केला  तर हनुमंत आमुची कुळवल्ली असे म्हणून घेण्यास आपण पात्र होऊ.

 जय जय रघुवीर समर्थ।

।श्रीराम।

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. मो. – ८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ हिंदुस्थानवालो, अब तो मुझे पहचानो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

हिंदुस्तानवालों! अब तो मुझे पहचानो!

८१ वर्षांनंतरही हे शब्द अगदी समर्पक आहेत, असे म्हणावे लागेल. १९४३ ते २०२४ हा सुमारे ८१ वर्षांचा कालखंड. या सर्व वर्षांतला एकही दिवस असा नसेल की एक आवाज कुठे ऐकला गेला नसावा. मास्टर विनायक (अर्थात विनायक दामोदर कर्नाटकी. मागील काळातील प्रसिद्ध अभिनेत्री नंदा यांचे वडील) यांनी एक चित्रपट काढण्याचा प्रयत्न केला होता ‘गजाभाऊ’. चित्रपट जरी मराठी भाषेत काढला जात असला तरी यातलं एक गाणं हिंदीत होतं…कवी होते पंडित नरेंद्र इंद्रा. आणि गाणं होतं या लेखाचं शीर्षक. दुर्दैवाने हा चित्रपट आणि गाणं कुठंही उपलब्ध नाही. या चित्रपटात लता दीनानाथ मंगेशकर ही चौदा पंधरा वर्षांची मुलगी निव्वळ आई,भावंडांचा उदरनिर्वाह होण्यास दोन पैसे मिळावेत म्हणून अभिनय करीत होती. त्याकाळी पार्श्वगायन फारसे प्रचलित झालेले नव्हते. कलाकार आपापली गाणी स्वत:च गात (खरे तर म्हणत!) असत. यासाठी अभिनयासोबत गाणंही येणं आवश्यक असे. आणि हा योग काही फारसा जुळून येत नसे. लतादीदींना आवडत नसतानाही अभिनय शिकावा लागला होता आणि गाणं आवडत असूनही तोपर्यंत तशी संधी मिळत नव्हती. त्यामुळेच लतादीदींनी हे गाणं अगदी पोटातून, अतिशय समरसून गायले असावे, यात शंका नाही.

लता दीनानाथ मंगेशकर नावाच्या एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा १९४३ पासून सुरू झालेला जीवनप्रवास सुमारे आठ दशके सुरू राहिला. दीदींचा हा प्रवास म्हणजे एक इतिहासच म्हणाव. दुर्दैवाचे सर्व अवतार जवळून पाहिलेल्या या शूर स्त्रीने आपल्या उपजत गानकलेने गायन क्षेत्रातील सम्राज्ञीपदाला गवसणी घातली हाही इतिहासच.

गायन,अभिनयासोबतच ज्योतिषाचा उत्तम अभ्यास असलेल्या मास्टर दीनानाथांनी आपल्या या लेकीच्या गळ्यात जसा गायनाचा उज्ज्वल भविष्यकाळ पाहिला होता तसा तिच्या ललाटावरील कर्माचा लेखही वाचला होता. त्यांनी दीदींना त्यावेळी असे सांगितल्याचं वाचनात येतं की, “लता, तु फार मोठी गायिका होशील. तुझे हे यश पहायला मी या जगात नसेन. आणि तुझे लग्न होणार नाही!” पहिल्या दोन भविष्यवाणींप्रमाणेच तिसरीही भविष्यवाणी अप्रिय असली तरी खरी ठरली याला दैव असं नाव आहे! कदाचित दैवाला दीदींना त्यांच्या त्यावेळी खूप संकटात असलेल्या कुटुंबासाठी आणि कोट्यवधी कानांना तृप्त करण्याची अपार शक्ती असलेल्या गायनकलेसाठी अधिक वेळ द्यायचा असावा! तसंच तर झालं किंबहुना तसंच केलं दीदींनी…हा इतिहास आहे!

आयुष्यात खूप नंतरच्या काळात त्यांनी असं म्हटलं होतं…पुन्हा जन्म नाहीच मिळाला तर बरेच आहे…पण पुनर्जन्म मिळालाच तर तो लता मंगेशकर म्हणून नको! लता मंगेशकर बनना आसान नहीं!

अगदी कोवळ्या वयातच आपल्या आईची आणि चार भावंडाची आई होण्याची जबाबदारी स्वत:हून पत्करणं आणि ती अखेरपर्यंत निभावून नेणं हे जावे त्याच्या वंशा तेंव्हाच कळू शकेल! सामाजिक व्यवहारातला त्यांचा करारी बाणा त्यांनी भोगलेल्या परिस्थितीतून आला असावा असं समजण्यास पूर्ण वाव आहे. ‘बहोत लोगों ने मेरे पैसे खाये!” असं एका मुलाखतीत दीदींना हसत सांगितलं आहे. आणि या बुडव्यांची नावे न उघड करण्याचा दिलदारपणाही त्यांनी दाखवला!

गाण्याचं ध्वनिमुद्रण करायला कक्षात जाताना आपली पादत्राणे त्या बाहेरच काढीत असत हे सर्वांनी पाहिलं आहे. कला ही देवता आणि कलाकार भक्त हा विचार त्यामागे होताच शिवाय ज्यामुळे पोटाला दोन घास मिळतात त्या कलेप्रती आदर व्यक्त करण्याची त्यांची ती पद्धत होती. सार्वजनिक जीवनात एका प्रसिद्ध स्त्रीने,त्यातून अविवाहीत स्त्रीने कसे वागावे याचा वस्तुपाठ म्हणजे दीदी. व्यवसायानिमित्त पुरूषांच्या गराड्यात राहणे अपरिहार्य असताना त्यातील प्रत्येकला दीदी म्हणावंसं वाटावं यासाठी सर्वोत्तम चारित्र्य आणि प्रचंड इच्छाशक्ती असावी लागते.

सामान्य माणूस म्हणूनच जन्माला आलेल्या व्यक्तीला त्याने असामान्यत्वाची पायरी गाठेपर्यंत अडचणी,समस्या,नैमित्तिक प्रलोभनं,मानवी स्वभावातील गुणदोष यांच्याशी संघर्ष करावा लागतोच. किंबहुना असामान्य होण्यापूर्वी माणूस सामान्यच असतो. या सर्वच अनुभवांतून तावून सुलाखून निघालेल्या दीदींनी स्वत:च्या वैय्यक्तिक आयुष्यात कुणालाही डोकावू दिले नाही. आणि यामुळे लोक काय आणि किती काय काय म्हणतील याची पर्वा केली नाही. जसा अंगभर पदर तसेच संपूर्ण आयुष्य नीटसपणे झाकून घेतलेले. एकतर गद्यात बोलणं अगदी नेमके आणि गाण्यासारखेच मधुर. शब्द अतिशय निगुतीने निवडलेले आणि उत्तरादाखल केलेल्या स्मितहास्यात माझे अबोलणेही विपरीत होत आहे अशी अवस्था अजिबातच नसे.

जगाच्या शब्दशस्त्राने क्लेश झाले नसतील असं नाही. पण जग होता वन्ही…संते आपण व्हावे पाणी हे त्यांनी माऊलींकडूनच शिकलेले असावे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात कुठेही आक्रस्ताळेपणा जाणवला नसावा. सत्य असत्यासी मन केले ग्वाही…नाही मानियेले बहुमता हे तुकोबारायांचे शब्दही त्या जगत राहिल्या. जगाला सातत्याने ऐंशी वर्षे तोंड देत राहणे हे सामान्य जीवाचे कामच नव्हे, हेच खरे! दीदींच्या मौनात सर्व मिटून गेले आणि आता तर त्याही अंतर्धान पावल्या आहेत.

हिंदी-इंग्लिश वृत्तपत्रे,हल्लीच्या दूरचित्रवाहिन्यांमध्ये प्रसिद्ध झालेल्या सर्वच ब-यावाईट बाबींकडे दीदींनी अतिशय प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष केले. मराठी वृत्तपत्रे आणि दृकश्राव्य वाहिन्यांनी मात्र दीदींच्या बद्द्ल कधी वावगे लिहिले,बोलल्याचे आढळत नाही….याला दीदींचे असाधारण व्यक्तिमत्व कारणीभूत आहे! भगवदगीता ध्वनिमुद्रित करण्याआधी पहाटे लवकर शुचिर्भूत होऊन दोन तीन तास श्लोक बिनचूक म्हणण्याचा सराव करणा-या आणि मगच ध्वनिमुद्रणासाठी जाणा-या दीदी, अत्यंत पीडादायक शारीरिक व्याधी असतानाही संत मीराबाईंची भजने ध्वनिमुद्रित करण्यासाठी तासनतास उभे राहणा-या दीदी,परदेशात शेकडो कार्यक्रम करून भारताचे नाव जगभर पोहोचवणा-या दीदी, ऐ मेरे वतन के लोगों गाण्यातील भावना चिरंजीव करून ठेवणा-या दीदी, १९८३ चा क्रिकेट विश्वचषक जिंकून आलेल्या खेळाडूंना मानधन देण्यासाठी गाण्यांचा कार्यक्रम करणा-या दीदी…अशा शेकडो गोष्टी आहेत आणि सामान्यांना अज्ञात अशा अनेक गोष्टीही असतीलच.

स्वत: कुठला मानसन्मान मिळवण्याचा प्रयत्न न करणा-या लतादीदींनी आपल्या वडिलांच्या मास्टर दीनानाथांच्या स्मृती जतन करण्याचा मनोभावे आणि यशस्वी प्रयत्न केला आहे. त्यांच्या हयातीतच त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाणं हे ही मोठेपणाचंच द्योतक. असो. लिहावं तेवढं कमीच आहे आणि आजवर अक्षरश: शेकडो लोकांनी दीदींबद्दल लिहिले आहे.

गेल्या काहीवर्षांत प्रसिद्ध व्यक्तींच्या आयुष्यावर आधारीत चित्रपट काढले गेले. आणि त्यात वावगे काहीच नाही. यामुळे या मोठ्या लोकांच्या आयुष्यात लोकांना डोकावता येते. परंतू, जेंव्हा जेंव्हा लतादीदींच्या आयुष्यावरील चित्रपटाचा विषय निघाला तेंव्हा तेंव्हा दीदींनी स्पष्ट नकार दिला. तरीही काही लोकांनी त्यांच्या आयुष्याशी साधर्म्य असणा-या कथा लिहून त्यावर चित्रपट काढला. साज (साझ) नावाचा एक चित्रपट आला होता. त्यात शबाना आझमी प्रमुख भूमिकेत होत्या. मेरी आवाजही पहचान है नावाची एक दूरदर्शन मालिकाही येऊन गेली. लतादीदींच्या आयुष्यावर (अनाधिकाराने) भाष्य करणारे युट्यूब विडीओज विशेषत: हिंदीत अनेक दिसतात. पण मंगेशकर कुटुंबियांनी या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत या गोष्टींना अजिबात महत्त्व दिले नाही.

दीदींच्या हयातीत त्यांना त्यांच्या बायोपिक (चरित्रचित्रपट) विषयी अनेकांनी विचारणा केलेली होती. पण त्यांनी स्पष्ट शब्दांत नकारच दिला होता. त्यांच्या मृत्यूनंतर तर याबाबत खूपच जोरात प्रयत्न झाले असतील. कारण लता मंगेशकर हा विषयच अत्यंत वेगळा आहे. पण एरव्ही काहीही माहित नसताना दीदींबद्दल विविध गोष्टी सांगत आणि पसरवत बसलेल्या व्यावसायिक लोकांकडून लता या विषयाला कितपत न्याय मिळाला असता हा ही प्रश्नच आहे.

एका खाजगी वृत्तवाहिनीने नुकत्याच घेतलेल्या एका मुलाखतीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनीही अशा चित्रपटास परवानगी देण्याचे स्वच्छ शब्दांत नाकारले आहे. दीदींच्या प्रतिमेला न्याय देऊ शकेल असं कुणी असावं असं त्यांना वाटत नाही. समाजानेही त्यांच्या या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. पण लतादीदींचे आयुष्यही लोकांना समजणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी हृदयनाथ मंगेशकर यांच्यापेक्षा पात्र अन्य कुणी व्यक्ती नाही. आठ दशके हृदयनाथ आणि दीदी सातत्याने एकत्र राहिलेत. हृदयनाथ स्वत: दीदींबद्द्ल लिहित आहेत. इतर कोणत्याही लेखकापेक्षा त्यांचे लेखन जास्त विश्वसनीय आहे यात दुमत नसावं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आजवर त्यांनी प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही साडे तीनशे पाने मजकूर लिहिला असून आणखी तितकीच पाने भरतील एवढ्या आठवणी,गोष्टी त्यांच्या स्मरणात आहेत. आणि हृदयनाथांची लेखनशैली सुद्धा अतिशय उच्चदर्जाची आहे. यापैकी आरंभीचे तीन लेख दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झाले आहेत. कदाचित आणखीही होतील. बाळासाहेबांनी अर्थात हृदयनाथ मंगेशकर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे,या लेखांचे पुस्तक निघावे अशीच रसिकांची इच्छा आहे. कारण तेच हे काम योग्य पद्धतीने पूर्ण करू शकतील! कारण हिंदुस्थानवालों, अब तो मुझे पहचानो असे सुरूवातीलाच म्हणून गेलेल्या लता मंगेशकर नावाच्या भारतरत्न स्वरचमत्काराला अजून हिंदुस्तानाने नेमके ‘पहचानलेले’ आहे, असे म्हणता येत नाही. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या या मनोवांच्छित कार्यास शुभेच्छा!

(मनातले सर्वच लिहिता येते असे नाही. अनेक बाबी निसटून जातात लिहिता लिहिता. पण तरीही एक प्रयत्न. संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ५ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र – “नाही वहिनी. आम्ही आणि डॉक्टरांनी काहीच केलेले नाही. आम्ही फक्त निमित्त होतो. बाळ वाचलंच नाहीय फक्त तर ते ‘वर’ जाऊन परत आलंय.” लेले काका सांगत होते,”आत्ता पहाटे आम्ही इथे आलो ते मनावर दगड ठेवून पुढचं सगळं अभद्र निस्तरण्याच्या तयारीनेच आणि इथे येऊन पहातो तर हे आक्रित! दादा, तुम्हा दोघांच्या महाराजांवरील अतूट श्रद्धेमुळेच या चमत्कार घडलाय.बाळ परत आलंय.”

या आणि अशा अनेक अनुभवांचे मनावर उमटलेले अमिट ठसे बरोबर घेऊनच मी लहानाचा मोठा झालोय.सोबत ‘तो’ होताच…!)

पुढे तीन वर्षांनी बाबांची कुरुंदवाडहून किर्लोस्करवाडीला बदली झाली ते १९५९ साल होतं. कुरुंदवाड सोडण्यापूर्वी आई न् बाबा दोघेही नृसिंहवाडीला दर्शनासाठी गेले.आता नित्य दर्शनाला येणं यापुढे जमणार नाही याची रुखरुख दोघांच्याही मनात होतीच. आईने दर पौर्णिमेला  वाडीला दर्शनाला येण्याचा संकल्प मनोमन सोडून ‘माझ्या हातून सेवा घडू दे’ अशी प्रार्थना केली आणि प्रस्थान ठेवलं!

किर्लोस्करवाडीला पोस्टातल्या कामाचं ओझं कुरुंदवाडपेक्षाही कितीतरी पटीने जास्त होतं.पूर्वी घरोघरी फोन नसायचे.त्यामुळे ‘फोन’ व ‘तार’ सेवा पोस्टखात्यामार्फत २४ तास पुरवली जायची.त्यासाठी पोस्टलस्टाफला दैनंदिन कामांव्यतिरिक्त जादा

रात्रपाळीच्या ड्युटीजनाही जावे लागायचे. त्याचे किरकोळ कां असेनात पण जास्तीचे पैसे मिळायचे खरे, पण ती बिले पास होऊन पैसे हातात पडायला मधे तीन-चार महिने तरी जायचेच. इथे येऊन बाबा अशा प्रचंड कामाच्या दुष्टचक्रात अडकून पडले.त्यांना शांतपणे वेळेवर दोन घास खाण्याइतकीही उसंत नसायची. दर पौर्णिमेला नृसिंहवाडीला दत्तदर्शनासाठी जायचा आईचा नेम प्रत्येकवेळी तिची कसोटी बघत सुरू राहिला होता एवढंच काय ते समाधान. पण तरीही मनोमन जुळलेलं अनुसंधान अशा व्यस्ततेतही बाबांनी त्यांच्यापध्दतीने मनापासून जपलं होतं. किर्लोस्करवाडीजवळच असलेल्या रामानंदनगरच्या आपटे मळ्यातल्या दत्तमंदिरातले नित्य दर्शन आणि सततचे नामस्मरण हा त्यांचा नित्यनेम.कधीकधी घरी परत यायला कितीही उशीर झाला तरी त्यांनी यात कधीही खंड पडून दिला नव्हता!

मात्र बाबांच्या व्यस्ततेमुळे घरची देवपूजा मात्र रोज आईच करायची. माझा धाकटा भाऊ अजून लहान असला तरी त्याच्यावरच्या आम्हा दोन्ही मोठ्या भावांच्या मुंजी नुकत्याच झालेल्या होत्या. पण तरीही आईने पूजाअर्चा वगैरे बाबीत आम्हा मुलांना अडकवलेलं नव्हतं. या पार्श्वभूमीवरचा एक प्रसंग…

पोस्टलस्टाफला किर्लोस्कर कॉलनीत रहायला क्वार्टर्स असायच्या. आमचं घर बैठं,कौलारू व सर्व सोयींनी युक्त असं होतं. मागंपुढं अंगण, फुलाफळांची भरपूर झाडं, असं खऱ्या ऐश्वर्यानं परिपूर्ण! आम्ही तिथे रहायला गेलो तेव्हा घरात अर्थातच साधी जमिनच होती. पण कंपनीतर्फे अशा सर्वच घरांमधे शहाबादी फरशा बसवायचं काम लवकरच सुरू होणार होतं. त्यानुसार आमच्याही अंगणात भिंतीना टेकवून शहाबादी फरशांच्या रांगा रचल्या गेल्या.

त्याच दिवशी देवपूजा करताना आईच्या लक्षात आलं की आज पूजेत नेहमीच्या दत्ताच्या पादुका दिसत नाहीत. देवघरात बोटांच्या पेराएवढ्या दोन चांदीच्या पादुका होत्या आणि आज त्या अशा अचानक गायब झालेल्या!आई चरकली.अशा जातील कुठ़ न् कशा?तिला कांहीं सुचेचना.ती अस्वस्थ झाली. तिने कशीबशी पूजा आवरली. पुढची स्वयंपाकाची सगळी कामंही सवयीने करीत राहिली पण त्या कुठल्याच कामात तिचं मन नव्हतंच. मनात विचार होते फक्त हरवलेल्या पादुकांचे!

खरंतर घरी इतक्या आतपर्यंत बाहेरच्या कुणाची कधीच ये-जा नसायची. पूर्वीच्या सामान्य कुटुंबात कामाला बायका कुठून असणार?

धुण्याभांड्यांसकट सगळीच कामं आईच करायची. त्यामुळे बाहेरचं कुणी घरात आतपर्यंत यायचा प्रश्नच नव्हता. आईने इथं तिथं खूप शोधलं पण पादुका मिळाल्याच नाहीत.

बाबा पोस्टातून दुपारी घरी जेवायला आले. त्यांचं जेवण पूर्ण होईपर्यंत आई गप्पगप्पच होती. नंतर मात्र तिने लगेच ही गोष्ट बाबांच्या कानावर घातली.ऐकून बाबांनाही आश्चर्य वाटलं.

“अशा कशा हरवतील?”

“तेच तर”

“सगळीकडे नीट शोधलंस का?”

“हो..पण नाही मिळाल्या”

आई रडवेली होऊन गेली.

“नशीब, अजून फरशा बसवायला गवंडीमाणसं आलेली नाहीत.”

“त्यांचं काय..?”

“एरवी त्या गरीब माणसांवरही आपल्या मनात कां होईना पण आपण संशय घेतलाच असता..”

त्या अस्वस्थ मनस्थितीतही बाबांच्या मनात हा विचार यावा याचं त्या बालवयात मला काहीच वाटलं नव्हतं,पण आज मात्र या गोष्टीचं खूप अप्रूप वाटतंय!

नेमके त्याच दिवशी गवंडी आणि मजूर घरी आले. पूर्वतयारी म्हणून त्यांनी जमीन उकरायला सुरुवात केली. त्यानिमित्ताने घरातले सगळे कानेकोपरेही उकलले गेले. पण तिथेही कुठेच पादुका सापडल्या नाहीत. पूजा झाल्यानंतर आई ताम्हणातलं तीर्थ रोज समोरच्या अंगणातल्या फुलझाडांना घालायची. ताम्हणात चुकून राहिल्या असतील तर त्या पादुका त्या पाण्याबरोबर झाडात गेल्या असायची शक्यता गृहीत धरून त्या फुलझाडांच्या भोवतालची माती खोलवर उकरून तिथेही शोध घेतला गेला पण पादुका मिळाल्याच नाहीत.

मग मात्र आईसारखेच बाबाही अस्वस्थ झाले. नेहमीप्रमाणं रोजचं रुटीन सुरू झालं तरी बाबांच्या मनाला स्वस्थता नव्हतीच.कुणाकडूनतरी  बाबांना समजलं की जवळच असणाऱ्या पलूस या गावातील सावकार परांजपे यांच्या कुटु़ंबातले एक गृहस्थ आहेत जे पूर्णपणे दृष्टीहीन आहेत.ते केवळ अंत:प्रेरणेने हरवलेल्या वस्तूंचा माग अचूक सांगतात अशी त्यांची ख्याती आहे म्हणे.बाबांच्या दृष्टीने हा एकमेव आशेचा किरण होता! बाबा स्वत: त्यांनाही जाऊन भेटले. आपलं गाऱ्हाणं आणि मनातली रूखरूख त्यांच्या कानावर घातली. त्यांनीही आपुलकीने सगळं ऐकून घेतलं. काहीवेळ अंतर्मुख होऊन बसून राहिले.तोवरच्या त्यांच्या चेहऱ्यावरच्या शांतपणाची  जागा हळूहळू काहीशा अस्वस्थपणानं घेतलीय असं बाबांना जाणवलं. त्यांची अंध,अधूदृष्टी क्षणभर समोर शून्यात स्थिरावली आणि ते अचानक बोलू लागले.बोलले मोजकेच पण अगदी नेमके शब्द!

“घरी देवपूजा कोण करतं?” त्यांनी विचारलं.

“आमची मंडळीच करतात”

बाबांनी खरं ते सांगून टाकलं.

” तरीच..”

“म्हणजे?”

” संन्याशाची पाद्यपूजा स्त्रियांनी करून कसं चालेल?”

“हो पण.., म्हणून..”

” हे पहा ” त्यांनी बाबांना मधेच थांबवलं.” मनी विषाद नको, आणि यापुढे हरवलेल्या त्या पादुकांचा शोधही नको. त्या कधीच परत मिळणार नाहीत.”

” म्हणजे..?”

” त्या हरवलेल्या नाहीयत. त्या गाणगापूरच्या पादुकांमध्ये विलीन झालेल्या आहेत.”

बाबांच्या मनातली अस्वस्थता अधिकच वाढली.कामात मनच लागेना ‘घडलेल्या अपराधाची एवढी मोठी शिक्षा नको’ असं आई-बाबा हात जोडून रोज प्रार्थना करीत विनवत राहिले.भोवतालच्या मिट्ट काळोखातही मनातला श्रध्देचा धागा बाबांनी घट्ट धरुन ठेवला होता. कांहीही करून हरवलेल्या त्या पादुका घरी परत याव्यात एवढीच त्यांची इच्छा होती पण ती फरुद्रूप होण्यासाठी कांहीतरी चमत्कार होणं आवश्यक होतं!आणि एक दिवस अचानक……?

क्रमश: दर गुरुवारी

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print