मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

घन तमी… ☆ डॉ. जयंत गुजराती

शिशिर सरला. वसंतपंचमी ही येऊन गेली. ऋतुबदलाचे संकेत केव्हापासूनचेच. ऊन आता मी म्हणत असलेलं. रात्री तर गारवा अजूनही झोंबणारा. रात्र आली की उदासीनतेची छाया पसरून राहते, मनाच्या कणाकणावर. खिडकीशी येऊन बसलं की थंडावत असलेली रात्र जागी होते. रात्रीला कोलाहल तसा कमीच. रस्त्यावरची वर्दळ कमी कमी होत गेली की शांतता अवतरते. बराच वेळ टिकणारी. त्या शांततेच्या उदरातही बरंच काही लपलेलं असतं. अभोगी,  अव्यक्त, तेही अंतस्थ, म्हणजे ते तसं असतंच सदानकदा, पण रात्रीने दारावर टकटक केले की ते अकारण असलेलं मनातलं बरंच काहीचं अस्तित्व टोकदारपणे जाणवू लागतं, मग स्वस्थ असणं काही होत नाही. तमाचा खेळ पाहत बसण्यापलिकडे काहीसुद्धा होत नाही,  घडत नाही.  एक दीर्घ श्वास, उच्छ्वास निसासा काही म्हणो….

एकेक पान गळून निष्पर्ण झालेलं झाड समोर खिडकीशीच. एकाद्या व्रतस्थ मुनीसारखं उभं असलेलं. बोलेल काही, आताच. लगेच. वाटत राहतं. सारखं निरखणं त्याला. तसा तो एकाकीच. वाटतं की तो बोलला तर सगळ्या जखमा उघड्या करेल. तसं त्यालाही उचंबळून येत असेलच की. कुणीतरी ऐकणारं लाभावं म्हणून तरसून गेलाही असेल. खोलवरच्या, वरवरच्या जखमांचं दालनच असेल. मूळापासून ते टोकापर्यंत. तडतडणाऱ्या साली, भेगाळलेला बुंधा. हिरवं काही नसण्याची निराशा आणि झुंज गारठ्याशी. पाऊसकाळ अजून तसा लांबच, भिजवून टाकायला. जमीन तशी कोरडीच.  हात आकाशाला टेकायचे म्हणून वर वर वाढणं तेव्हढं झालेलं, पण हेमंत व शिशिराने सारे वैभव लुटून नेलेलं. एक साधं इटुकलं पानही राहू दिलं नव्हतं फांद्यांवर. कोण काळाचे वैर उभं राहिलेलं. तग धरणं तेव्हढं हातात. गारठ्याबरोबर असतो वारा तोही अचूक सूड उगवतो. 

कधीकधी उत्तर, मध्य वा पूर्वरात्रीच चंद्र उगवतो, तो काही सूड उगवत नाही. उलट त्याचं असणं हे आश्वासक थोडंफार. तसा तो लांबच, पण शुभ्रधवल किरणांची पखरण करून बापजन्माचा दाह शमवण्याचा त्याचा प्रयत्न, तोही कधीकधी केविलवाणा भासणाराच. तोही किती पुरणार? जेथे शीतलतेचीही धग वाटावी ही परिस्थिती. किती काढावी कळ? किती सोसावं? 

नेहेमी निळंशार असणारं आभाळही राखूडलेलं. एकदा का दिवाकर मावळला की आभाळ रंग बदलतंच.कितीही असोत टिमटिमणारे तारे, ते अनंत असलेलं आभाळ गूढ वाटू लागतं. तेही अनंत. तसं असलं तरी जितकी भूमी हवीशी तितकंच आभाळही. ते परकं नसतंच कधी. दिवसभराची दगदग संपली की एकांतात तेच साथीला. बस न्याहाळत रहावं त्याला. निरूद्देश. काहीच बोलू नये, काही सांगू नये. फक्त एकमेकांपुरतं असण्याचंच नातं! बस तेव्हढंच पुरे!! 

पर्णहीन असलेल्या खोडावर एखादा निशाचर येऊन बसतो सावकाश. विसावा घेऊन झालं की देतो कर्णकर्कश हाळी व पंख फैलावत उडून जातो. काहीक्षण वाटत असतं आहे कुणीतरी सोबतीला, पण ते काहीक्षणच. हवी असते तशी साथ, यावं कुणीतरी, गुजगोष्टी कराव्यात, ख्यालीखुशाली विचारावी, मनमोकळं करावं, रितं व्हावं. आपलंसं होऊन जावं, पण ते तितकसं सोपं नसतं. मोकळं होता येतच नाही. आभासी क्षणिक जवळीक तशी आभासीच. निष्पर्ण वृक्षावर घरटं कधी करतात का पाखरं?

दिवस चटकन निघून जातो. रात्र सरतासरत नाही. ती सरपटत असते हळुहळू गोगलगायीसारखी. दूरसुदूर तमाचं साम्राज्य. दिवा लावो वा निओनसाइन्स. तमाचं राज्य अढळच, एकछत्री. क्षणाक्षणावर अंमल त्याचा. हटता हटत नाही तो काळोख, आत आत झिरपत जात असलेला, जन्मोजन्मीचं नातं असल्यागत. तो काळोखही आवडायला लागतो कधी ते कळतही नाही. मग रात्र होण्याची वाट पहायची सवयच लागते. काळोखाला घट्ट मिठी मारण्यासाठी. काळोखाला नसतात दिशा, काळोखाला नसतात मार्ग. काळोखाला नसतो तळ वा नसते गती. काळोख बऱ्याचदा असतो गोठून जाणारा क्षण. तोही कल्पेच्या कल्पे वाटावा असा. त्या गोठलेल्या काळोखाचं सौंदर्य शिल्पीत करावं अशी एक शलाका क्षणभर चमकून जाणारी. तीही निखळणाऱ्या ताऱ्यागत, उल्कागत. तरीही  तम, काळोख आपला वाटावा तो क्षण मोलाचा! 

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ एआय – मदतनीस की स्पर्धक… भाग – 2 ☆ श्री श्रीकांत कुलकर्णी ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे  ☆

(आर्थिक व्यवहार प्रचंड वाढले. या वाढीव आर्थिक व्यवहारांना सहजपणे तोंड देईल अशी बँकिंग प्रणाली विकसित झाली.) – इथून पुढे 

पूर्वी प्रत्येक व्यवहार बँकेत जाऊन करावा लागे तिथे आता तसे करण्याची गरज उरली नाही. बँकेत कॉम्पुटर आले तशी जॉब जातील अशी ओरड करणाऱ्या युनियन्सचे देखील या ऑटोमेशनच्या रेट्यापुढे काहीही चालले नाही. देशाचे बजेट काही हजार कोटींचे असे ते काही लाखो कोटींचे झाले. ग्राहकाला बँकेत जाण्याची गरज नसल्याने ब्रांच मधील स्टाफ कमी झाला असला तरी बँकांची आणि ब्रांचेसची संख्या वाढल्याने बँक क्षेत्रात बेकारी वाढली नाही. पैसा खेळू लागला त्यामुळे बँकेचा स्टाफ जो कांऊटर बसून व्यवहार करत होता तो कार लोन, होम लोन,बिझनेस लोन देण्यसाठी मार्केटिंग करत फिरू लागला. ऑटोमेशनमुळे बँकेत जाऊन व्यवहार करण्याची गरज संपली तशी कॅश व्यवहार करण्याची गरज देखील संपली. अगदी १० रुपयांची वस्तू घेण्यास पैसे जवळ बाळगण्याची गरज देखील संपली. QR कोड नावाची जादुई गोष्ट प्रत्येक दुकानात फेरीवाल्याकडे आली. आर्थिक देवाणघेवाण गरिबच काय अशिक्षित देखील सहज करून लागला. सुट्या पैशांचा प्रश्न तर सुटलाच. पण उरलेले किती द्यायचे घ्यायचे ही वजाबाकी (होय काही सुशिक्षित तरुणांना देखील ही वजाबाकी अवघड जात असे)  करण्याचा प्रश्न पण संपला. बँकेत एके काळी राजकीय पक्षांच्या लोन वाटपाच्या योजनांसाठी लागणारी झुंड बंद झाली आणि सामान्य व्यावसायिक आत्मनिर्भर होऊ लागला. त्याचा क्रेडीट स्कोर तयार होऊ लागला. लोन देण्यसाठी बँक पुढे येऊ लागली कारण लोन बुडणार नाही याची खात्री बँकेला झाली.

इतके दिवस ऑटोमेशन मानवी कष्ट कमी होतील किंवा कमीत कमी मानवी कष्टात जास्तीत जास्त उत्पादकता मिळावी या साठी होती. उत्पादकतेबरोबरच गुणवत्ता आणि अचूकता हा देखील उद्देश होता. आता हे ऑटोमेशन मानवी क्षमताच्या आणि भावभावनांच्या ताबा घेऊ लागले आहे किंवा त्यावर मात करू लागले आहे. उदा. गाडी चालवणे ही केवळ मानवी क्षमता असे आजवर आपण मानत आलो आहोत. कारण गाडी चालवताना कान आणि डोळे या ज्ञानेंद्रियांकडून जे ज्ञान होते, त्या ज्ञानाचे मेंदूंत अतिशय वेगाने पृथक्करण करून ड्रायव्हरला गाडीचा वेग वाढवणे, कमी करणे,आपत्कालात प्रसंगी क्षणात ब्रेक दाबणे, जरुरी इतके डावीकडे वा उजवीकडे वळणे इत्यादी क्रिया आपला मेंदू इतर अवयावांकडून सहजतेने घडवून आणतो. एकदा गाडी चालवण्याचे तंत्र शिकले की गाडी केव्हाही हातात घ्या आपला मेंदू आणि इतर अवयव एकमेकांशी संवाद साधून आपण अपघातरहित गाडी चालवतो. हे केवळ मानवाला दिलेले ईश्वरी वरदान आहे असा आपला आजवरचा समज. अर्थात गाडी चालवताना मेंदू आणि अवयव यांच्यातील संवाद काही कारणाने वा लक्ष विचलित झाल्याने तुटला तर अपघात हमखास. हे लक्ष विचलित होणे ही चूक मानवाच्या हातून होणे ही सहज प्रवृत्ती आहे. पण ही चूक प्राणांतिक ठरू शकते. ए-आय या मानवी चुकांपलीकडे काम करण्याची क्षमता ठेवते. यात कारला चहू बाजूने कॅमेरे लावलेले असतात. या कॅमेर्यांनी घेतलेल्या फोटो एका कृत्रिम मेंदूकडे पाठवले जातात हा मेंदू (CPU) या इमेजेसचे तत्काळ पृथक्करण करून गाडीत असलेल्या वेगवेगळ्या मोटोर्सना (अवयव) आज्ञा देऊन काय action घ्यायची हे घडवून आणतो. हे काम मानवी मेंदू आणि त्यांचे अवयव ज्या तत्परतेने करतात त्यापेक्षा अधिक वेगाने आणि अचूक घडू शकते. आता ड्रायव्हरची गरजच नाही. ए-आयला मानवी भावभावना नसल्याने चित्त विचलित होण्याचा प्रश्नच नाही. शिकवलेले काम मुकाट्याने करायचे. रस्त्यात सुंदर मुलगी दिसली म्हणून चित्त विचलित झाले. घरी बायकोशी भांडण झाले म्हणून आज गाडी अवास्तव वेगात नेली आणि धडकवली हा प्रश्नच नाही. आता भावभावनांच्या कल्लोळातून अपघात होण्याचा प्रश्न टळला. कोणत्याही नव्या डेव्हलपमेंटनवे प्रश्न उपस्थित नको का व्हायला? मग अशा ए-आय चलित गाड्या आल्या तर ज्या लाखो ड्रायव्हरांना नोकऱ्या मिळतात त्यांच्या बेकारीचे काय. ग्राहकाला नाकारणे, अवास्तव पैसे मागणे, उर्मटपणे बोलणे हे दुर्गुण घेऊन जर ड्रायव्हर ग्राहकाशी वागणार असतील तर उद्या OLA UBER अशा गाड्या घेऊन रस्त्यावर आल्या तर काय हा प्रश्न आहे. अशा गाड्या महाग आहेत आणि फक्त अतिश्रीमंतांना त्या परवडतील त्यामुळे काळजी नाही असा जर आपला समज असेल तर तो खोटा आहे. आज गाडीच्या भोवती लावलेले कॅमेरे गाडी चालवताना चालकाला अपघाताची क्षमता असलेल्या जागेची सूचना देऊ लागल्या आहेत. अगदी ५० फुटावर असलेला स्पीड ब्रेकर गाडीला ओळखता येतो. किंवा रस्त्यावरचे खड्डे ओळखून गाडीतील लोकांना त्रास होणार नाही नाही या नुसार गाडीचा वेग कमी होऊ शकतो अशी वाहने बाजारात सहज उपलब्ध होत आहेत. तेव्हा ए-आय आधारित स्वस्त कार्स फार दूर नाहीत. वर कारचे उदाहरण दिले आहे. अशा अनेक जागा ए-आय माणसाकडून हिसकावून घेते आहे. अनेक रेस्टॉरंटमध्ये वेटर्सची जागा ए-आय रोबोट्सनी घेतली आहे. डिलिव्हरीबॉय डिलिव्हरीड्रोन घेतायत. जगातले अनेक संशोधक नवनव्या कल्पनांना मूर्त स्वरूप देऊन या कामात आपली creativity दाखवत आहेत. ए-आय हे केवळ शाप की वरदान हा निबंध लिहिण्याइतकेच मर्यादित नाही तर त्यापलीकडे मानवी जीवनावर परिणाम साधणारे आहे. यात केवळ ड्रायव्हर, डिलिव्हरीबॉय आणि वेटर्सचे जॉब जाणार नाहीत तर चित्रकार, कलाकार, व्हाईस artist, actors, क्लार्क, शिक्षक, मॅनेजरस् अशा अनेकांना आपले स्कील वा ज्ञान ए-आयच्या पलीकडे अद्ययावत ठेवावे लागणार आहे. हा तंत्रज्ञानाचा रेटा कोणीच रोकु शकणार नाही. रेल्वेत, मेट्रोमध्ये बुकिंग क्लार्क आता लागतच नाहीत. तंत्रज्ञानामुळे मेट्रोमध्ये विदाऊट तिकीट तुम्ही जाऊच शकत नाही. रस्त्यावर ट्राफिक नियमांचे केलेलं उल्लंघन तुमच्या मोबाईलवर त्याचे चलन येते कारण कॅमेरे तुम्हाला गुन्हा करताना ओळखतात. ‘उपरवाला सब देख रहा है’ ही उक्ती आता प्रत्यक्षात आली आहे ती ए-आयमुळे. अमेरिकेत येणाऱ्या परदेशी प्रवाशांना तपासणीमधून जावे लागत नाही ए-आय कॅमेरे तुम्हाची ओळख पटवून घेतात नी तुम्हाला अमेरिकेत प्रवेश द्यायचा की नाही हे ठरवतात. कारण तुमची ओळख ए-आय कॅमेरे ज्या अचूकतेने घेतो ती मानवाच्या दृष्टीतून कधीतरी सुटू शकते.  बेकायदेशीर मानवी तस्करी,गुन्हेगारांचा शोध ए-आय सहज घेऊ शकते. पोलिसांना ए-आय वरदान ठरणार आहे. उद्या ए-आय स्वयंपाकघरात येणार आहे. गृहिणीचा वा गृहस्थाचा सुगरणपणा ए-आय माध्यमातून काय स्वयंपाक करायचा आणि चव कोणती आणायची हा असणार आहे.

ए-आय हा मानवाचा मदतनीस असणार त्यापेक्षा जास्त स्पर्धक असणार हे निश्चित. इतकी वर्षे ऑटोमेशन मशीनपुरते मर्यादित होते. आता एआयमुळे ते मानवापर्यंत येऊन ठेपले आहे.  या स्पर्धाकाशी मुकाबला सोपा नाही. गेली २५ वर्षे softwareक्षेत्राने मध्यम वर्गाला उच्च मध्यम वर्ग अथवा श्रीमंतीचे दिवस आणले. त्यांचा गर्व देखील हे एआय उतरवणार आहे. Software coding आता एआय करू लागले आहे. एके काळी मॅट्रीक पास होण्याच्या जोरावर नोकरी मिळवणे आणि ती रिटायर होईपर्यंत टिकवणे शक्य होई. आता ही मंडळी आता भाग्यवान वाटू लागली आहेत. छोट्याश्या ज्ञानाच्या भांडवलावर संसार ४-४ मुलाबाळांची लग्ने केली. आता आपले आज कमावलेले ज्ञान उद्या निकामी आणि निरुपयोगी ठरणार आहे. ज्ञानाची कुशलतेची expiry date पाच वर्षांच्या आत येते आहे. कशी टक्कर देणार याला हा मोठा प्रश्न आहे.  आपली विनयशीलता,कार्यक्षमता, बुद्धिमत्ता, चातुर्य  या गुणांवर काही प्रमाणात टक्कर देणे शक्य आहे. मत्सर, इर्षा,भांडखोरवृत्ती, उर्मटपणा सोडला आणि एकमेकांना धरून या स्पर्धेवर मात करावी लागेल. नाहीतर बायको/नवऱ्याचा  प्रेयसी/प्रियकराचा स्वभाव फार किरकिरा आहे म्हणून कोणी एआय ड्रिव्हन अलेक्सा अथवा जॉन बरोबर रहाणे पसंत करू लागले तर ही स्पर्धा कुठपर्यंत जाईल हे सांगता येणार नाही. काळजी घेऊयात. नाहीतर…..पस्ताओगे.

असो. ऑटोमेशनविषयी सध्या इतकेच.

– समाप्त – 

© श्री श्रीकांत कुलकर्णी

मो ९८५००३५०३७ 

Shrikaant.blogspot.com;  Shrikantkulkarni5557@gm

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

??

इटुकली — ☆ डॉ. जयंत गुजराती

घरभर फिरली भिरभिरत्या पंखाने. अक्षरशः नाचतच होती इथून तिथे. पाय म्हणून, ठरतच नव्हते. जणू सगळं घाईचंच होऊन बसलं होतं. सांगावंसं वाटलं, अगं जरा हळू चाल…. पण ती काही ऐकणार नव्हती. तिचं आपलं निरीक्षण चालू होतं दिवसभर बस्तान कुठे बसवायचं ते. तिच्या चिवचिवाटाने कान कावले होते. मधूनच ती गायब होई. पुन्हा काहीवेळात खिडकीच्या गजावर दिसे. मग हॉलभर फिरे.  किचनमधे उडे, व्हरांड्यातून तर सारखी येजा. बेडरूममधे ही चक्कर मारून आली. कधी ट्युबलाईट वर विसावे तर कधी पंख्यावर विसावे. कधी कपाटावरचा कोपरा धुंडाळे तर कधी खोल्यांमधल्या दारांवरून सूर मारे.  शेवटी वैतागून मीच तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळीस ती लगबगीत असलेली इटुकली दिसेना म्हणून मीच अस्वस्थ झालो. बायको म्हणाली, ‘येईल पुन्हा, ’ मी वर्तमानपत्र हातात घेऊन स्वस्थ होण्याच्या प्रयत्नात. पण थोडंफार वाचून झाल्यावर, वर्तमानपत्र हलकेच खाली सरकलं जाई, मग माझी नजरच भिरभिरायला लागे. ती कुठेच दिसेना तर पुन्हा डोकं वर्तमानात खुपसलं.  तसाच ऑफिसला गेलो. मनात प्रश्नचिन्ह घेऊन, ‘ कुठे गेली असेल? ’ दिवसभर मीच ‘चिवचिव’ला अधीर. संध्याकाळी घरी आलो तरीही घरभर शांतताच. अगदी अचानक आलेली पाहुणी अलोप व्हावी याची रूखरूख मनात. 

सकाळीस जाग आली ती घागर हिंदकळावी खळखळून तसं हिचं  माझे दोन्ही बाहू धरून उठवणं चालू होतं.  काय? माझा प्रश्नचिन्ह असलेला चेहेरा पाहून ती बोलली. चला वरती हे बघा पोटमाळ्यात काय आहे ते!! धडकीच भरली. असं काय असेल सकाळी सकाळी पोटमाळ्यावर? मी तडक पाहिलं तर पोटमाळ्यावर एक कोनाडा रिकामा सुटलेला होता त्यात लगबगीनं ती इटुकली व तो पिटुकला वरच्या कौलांतून  व पोटमाळ्याच्या त्रिकोणी खिडकीतून वाट काढत गवताच्या काड्या व काटक्या गोळा करून आणून टाकत होते. बस्तान बसवायला जागा सापडली तर मी मनात खुश होऊन पुटपुटलो. खाली येताच छानशी शीळही घातली मी. तसं आल्याचा चहा हातात देत बायकोने कोपरखळी मारलीच. ‘ आली ना परत पाहुणी!! झाला ना मनासारखा शेजार!! ’ मीही चहाचा घोट घेत फिरकी टाकलीच, ‘ सखी शेजारिणी!! ’ तसं दोघं हसत सुटलो. 

दोन तीन दिवसात हॉल कम बेडरूम कम सबकुछ छानसं घरटं उभं राहिलं. त्यात कुठूनतरी कापूसही आणून टाकला होता बहुतेक पिटुकल्याने. बोर्ड लावायचं का? हिचं तुणतुणं चालूच. डोळ्यात मिश्कीली. तर माझ्यात पुन्हा प्रश्नचिन्ह. तिनंच खुलासा केला, ‘ छोटंसं बॅनर, नांदा सौख्यभरे! ’ आता माझ्यापेक्षा हीच जास्त गुंतत गेली. मातीचं खापर आणलं बाजारातून त्यात पाणी भरून ठेवलं. रोज वाटीभर मऊसूत भातही पोटमाळ्यावर पोहोचायला लागला. “ आणखी काय काय आवडतं हो खायला त्यांना, मी करत जाईन तेवढं!! ” मला तसं म्हटलं तर पाखरांबद्दलचं ज्ञान अगाधच!!  पोपट असता तर हिरवी मिरची, पिकलेला पेरू वगैरे सांगून तरी टाकलं असतं. मग हिनेच शक्कल लढवत, शिजवलेले तेही वाफाळलेले हिरवे मूग, वाफाळलेलेच मिठातले शेंगदाणे, लालचुटूक डाळिंबाचे दाणे अन् काय काय सुरू केलं!! मी आपला प्रश्नकर्ता नेहेमीचाच…. “ अगं इतकं सगळं लागतं का त्यांना? ” हिनं मान डोलावत चपखल उत्तर दिलं. “ तुम्हाला नाही कळायचं, डोहाळे लागले की लागतंच सगळं!! ” प्रश्नचिन्हा ऐवजी माझे डोळे विस्फारलेले. “ तुला कसं कळलं शुभवर्तमान? ” “ बघाच तुम्ही, मी म्हणतेय ते खरं की नाही? ’ तसं हीचं काहीच चुकत नाही. काही दिवसांतच सहा अंडी प्रकट जाहली मऊसूत कापसावर.  

मग काय इटुकली ठाण मांडून कोनाड्यात तर पिटुकल्याची येजा वाढली आतबाहेर. घरात कोवळे जीव वाढणार याचा कोण आनंद आम्हा दोघांना, त्या दोघांसह.  चैनच पडेना. सारखी उत्सुकता. ऑफिसमधूनही हिला विचारणं व्हायचं, “ एनी प्रोग्रेस? ” दिवसातून दोन तीनदा पोटमाळ्यावर चढणं.  काही हालचाल दिसतेय का? हे पाहणं! अजून काहीच कसं नाही? हा प्रश्न खांबासारखा उभाच. “ सगळं निसर्गनियमा सारखं होईल, धीर धरा. ” हिचा मोलाचा सल्ला. तरीही आतून आमचाच जीव वरखाली!! खरंतर आमचे अगोदर कावलेले कान आतुरलेले कोवळी चिवचिव ऐकण्यासाठी. 

(२०/०३/२०२३ – # जागतिक चिमणी दिवस)  

© डॉ. जयंत गुजराती

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ झुळुक… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 ‘ वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, 

  घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे ‘

माझ्या बाल्कनीतल्या झोक्यावर संध्याकाळी बसले की मन असे स्वैरपणे फिरत असते. तीन-चार वर्षांपूर्वी लॉकडाऊनच्या काळात बाहेर फिरता तर येत नसे, पण या झोक्यावर बसून मन मात्र भरपूर फिरून येई. दिवसभराच्या उन्हाच्या काहिली नंतर येणारी संध्याकाळची वाऱ्याची झुळूक तन आणि मन दोन्ही शांतवून टाकते. थंडी किंवा पावसाळ्यात या झुळूकेचे तितके महत्त्व नाही ,पण उन्हाळ्यात ही झुळूक खूपच छान वाटते! दु:खानंतर येणार सुख जसं जास्त आनंद देते तसेच आहे हे!

सतत सुखाच्या झुल्यावर झुलणाऱ्याला ती झुळूक कशी आहे हे फारसे जाणवणार नाही, पण खूप काही कष्ट सोसल्यानंतर येणारे सुखाचे क्षण मात्र मनाला गार  वाऱ्याच्या झुळूकीचा आनंद देतात!हीच झुळूक कधी आनंदाची असते, 

कधी मायेची असते. एखाद्याला घरात जे प्रेम मिळत नाही पण दुसऱ्या कुणा कडून तरी, अगदी जवळच्या नात्यातून, शेजारातून किंवा मित्र-मैत्रिणींकडून मिळते तेव्हा तो प्रेमाचा सुखद ओलावा ही त्याच्या मनाला मिळालेली आनंदाची झुळूक असते!

कधी कधी साध्या साध्या गोष्टीतूनही आपण आनंद घेतो. गर्दीने भरलेल्या बसमध्ये कशीबशी जागा मिळून बस जेव्हा सुटते, तेव्हा खिडकीतून येणारी वाऱ्याची झुळूक आपल्याला’ हुश्श’ करायला लावते. कधी अशी झुळूक एखाद्या बातमी तून मिळते. अपेक्षा नसताना एखादी चांगली गोष्ट घडली तर ती सुखद झुळुकीसारखीच असते. माणसाचे आयुष्य सतत बदलत असते. कधी एकापाठोपाठ एक इतकी संकटे येतात की त्या सर्वांना कसे तोंड द्यावे कळतच नाही! पण अशावेळी अचानकपणे एखादी चांगली गोष्ट घडते की, त्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते!

माझ्या परिचित एका मैत्रिणीची गोष्ट. तिच्या नवऱ्याचा एक्सीडेंट झाला. जीव वाचला पण हॉस्पिटलमध्ये दोन महिने पडून राहावे लागले. दोन लहान मुली होत्या तिला. नवऱ्याचा व्यवसाय बंद पडलेला.. राहायला घर होते पण बाकी उत्पन्नाचे साधन नव्हते. पण अचानकपणे तिने अर्ज केलेल्या नोकरीचा कॉल आला. ट्रेनिंग साठी एक महिना जावं लागणार होतं, मुलींना आपल्या नातेवाईकांजवळ सोपवून ती ट्रेनिंग पूर्ण करून आली.आणि  नोकरी कायमस्वरूपी झाली आणि आयुष्यात सुखाची झुळूक आली.

वादळ वाऱ्यात झाडं ,घरं, माणसं सारीच कोलमडतात.. वादळ अंगावर घेण्याची कुवत प्रत्येकात असतेच असे नाही. पण ‘झुळूक’ ही सौम्य असते. ती मनाला शांती देते.

लहानपणी अशी झुळूक परीक्षेनंतर मिळायची. भरपूर जागरणे, कष्ट करून अभ्यास करायचा आणि मग पेपर्स चांगले गेले की मिळणारा आनंद असाच झुळूकीसारखा वाटायचा! रिझल्ट ऐकला की मन अगदी हलकं फुलकं पीस व्हायचं आणि वाऱ्यावर तरंगायला लागायचं! अशावेळी कृतकृत्यतेची झुळूक  अनुभवायला मिळायची!

वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात ही झुळूक आपल्याला साथ देते. कधी कधी आपण संकटाच्या कल्पनेने ही टेन्शन घेतो. प्रत्यक्ष संकट राहत दूर ,पण आपलं मन मात्र जड झालेलं असतं! अचानक कोणीतरी सहाय्य करते , आणि संकट दूर होते. एका आगळ्या झुळुकेचा अनुभव मनाला येतो.

कोरोनाच्या काळात आपण अशाच कठीण परिस्थितीतून जात होतो. मन अस्थिर झालं होतं. जीविताची काळजी, भविष्याची काळजी दिसून येत होती. प्रकृती आणि नियती दोन्ही आपल्या हातात नाहीत! पण तेच कोरोनाचं संकट जसं दूर झालं, तशी मनामध्ये समाधानाची झुळूक येऊन गेली! काही काळातच रोगाचे उच्चाटन झालं आणि निसर्गाने हिरावून घेतलेले आपले स्वातंत्र्य पुन्हा आपल्याला मिळाले! ती ‘सुखाची झुळूक’ अशीच सौम्य आनंद देणारी होती. सोसाट्याचा वारा आणि वादळ माणसाला सोसत नाही, त्याचप्रमाणे संकटांचा माराही झेलताना माणसाला कठीण जाते! पण थोडंसं जरी सुख मिळालं तर ती ‘सुखाची झुळूक’ माणसाला आनंद देऊन जाते.

संकटाच्या काळावर मात करताना कुठून तरी आशाताई स्वर येतात, “दिस येतील, दिस जातील…” या गाण्याचे! कोणत्याही संकटाला कुठेतरी शेवट असतोच, जेव्हा एखादं वादळ परमोच्च क्षमतेवर असतं तेव्हा कधीतरी ते लयाला जाणारच असतं! ते वादळ जाऊन शांत झुळूक येणारच असते.पण तोपर्यंत त्या  वादळाला धीराने, संयमाने तोंड देत वाट पहावी लागते ! …. 

… तेव्हाच त्या वादळाचे झुळुकीत रूपांतर झालेले आपल्याला अनुभवायला मिळते !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆– तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर ☆

सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ – तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात..! – ☆ सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

(सोनेरी संक्रांत)

(आमचे दातार बाबा आता 94 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत त्यानिमित्त त्यांना अनंत शुभेच्छा…)

१४ जानेवारीची संध्याकाळ. मी आणि सुनील नुकतीच मैत्री झालेल्या आमच्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त  शुभेच्छा द्यायला स्कूटरवरून, अंधेरीला चाललो होतो. त्यादिवशी मुंबईत प्रथमच इतकं झोंबरं गार वारं वाहत असेल. गार गार वारं खात, शिवाजी पार्कहून अंधेरीला पोहोचेस्तोवर आमचाच बर्फ होऊन गेला होता! 

माझी मैत्रीण अनिताने (वाकलकर) अत्यंत प्रेमानं आमचं स्वागत केलं आणि आम्हाला घराच्या गच्चीत नेलं. तिथं ए.सी.पी. श्री.व सौ.लोखंडे, जयकर काका, अनेक कार्यक्रमांचे आयोजक, अनिताचे आईवडील, बहीण अशी काही मंडळी जमली होती. गप्पाटप्पा झाल्यावर लोखंडेंनी बेंजो वाजवून आणि काही इंग्लिश गाणी गाऊन पार्टीत साजेल अशी धमाल आणली! जयकर काकाही नेहमीप्रमाणे या आनंदात सामील झाले होते. आता माझीही गाण्याची वेळ  येणार, हे मी जाणून होते.

काळा फ्रिलवाला फ्रॉक घातल्याने आधीच पाय गारठून गेले होते. त्यात गावं लागणार, या विचाराने आणखी थंडी वाढत गेली. मित्रमंडळींची धमाल संपल्यावर, मला सर्वांनी गायला सांगितलं. अगदी घरगुती समारंभ असल्याने, मीही लगेच मानेनं होकार दिला. जयकर काकांनी फर्माईश केलेलं ‘मैं मंगल दीप जलाऊँ’ हे भजन मी गायलं. थंडीमुळे हरकतीही सरास्सर येत होत्या! गाणं नेहमीप्रमाणे झालं.

तिथं जमलेल्या मंडळींपैकी, साठीच्या आसपासचे एक सदृहस्थ मला येऊन भेटले. “अहो, तुम्ही गाणं छान म्हटलंत, पण याची कॅसेट मिळू शकेल काय? मी आत्ताच त्याचे पैसे देतो.” मला मनातून खूप हसू आलं, पण चेहऱ्यावर मी दाखवलं नाही. मराठी माणूस आणि ताबडतोब पैसे देऊन कॅसेट घ्यायची स्पष्ट तयारी? मी मनात म्हटलं, ‘असेल बुवा…. !’ आणि त्यांना सांगितलं, “माझी ‘मंगलदीप’ नावाची कॅसेट मी तुम्हाला देऊ शकते. ते म्हणाले, “उद्या सकाळी मी माझ्या माणसाला पाठवतो.”

त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांचा ड्रायव्हर दोन्ही हातात लालकंच, टचटचीत  स्ट्रॉबेरीची दोन प्युनेट्स घेऊन आला. “आमच्या दातार साहेबांच्या शेतावरची हायेत.” तो म्हणाला. “दातार साहेबांनी कॅसेट मागितली व त्याचे हे शंभर रुपये!”  मी त्यांना कॅसेट दिली व पैसे नकोत म्हणून खुणेनंच सांगितलं. मला खूपच गंमत वाटली. कितीतरी वेळ  मी त्या स्ट्रॉबेरीकडे पाहात होते आणि मनातल्या मनात हसत होते. मला स्ट्रॉबेरी आवडते म्हणून नाही –  तर कॅसेट दिली म्हणून स्ट्रॉबेरी दिली त्यांनी? असो. पण छान झालं म्हणून मी तो विषय तिथंच सोडला. 

३१ जानेवारी १९९४. माझ्या स्वतंत्र कार्यक्रमाला ‘मंगलदीप’ नावाने अधिष्ठान लाभलं आणि तो दिवस दोन्ही अर्थांनी माझ्या आयुष्याला सुरेल वळण देणारा, सुंदर कलाटणी देणारा ठरला. हा ‘तेजाचा मंगलदीप’ माझ्या आयुष्याला उजाळा देणाराही ठरला. ती माझ्या आयुष्यातली ‘सोनेरी संक्रांत’ होती!

तो कार्यक्रम गोरेगांवच्या अभिनव कला केंद्रातर्फे त्यांच्या शाळेच्या हॉलमध्ये होता. हॉल गच्च भरला होता. राजेश दाभोळकरांची सिस्टिम असल्याने माइक टेस्टिंग करतानाच आज कार्यक्रम सुंदर होणार, रंगणार, हे माझ्या लक्षात आलं. ‘मैं मंगलदीप जलाऊँ, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘काय सांगू शेजीबाई’, ‘लव लव करी पातं’, अशी अनेक गाणी झाली. दातारसाहेब, अनिताच्या वडिलांबरोबर माझ्यासाठी फुलांचा सुंदर गुच्छ घेऊन आले होते. जयकर काकांनीही छान गुच्छ आणला होता. मला आपल्या ओळखीच्या लोकांनी कौतुक केलेलं पाहून खूप बरं वाटलं. कार्यक्रम खूपच रंगला, तसा दुसर्‍या दिवशी सर्वांचा फोनही आला.  आणि आश्चर्य म्हणजे, मला न सांगता, गुपचूप दातार साहेबांनी या कार्यक्रमाची ऑडिओ कॅसेट मोठ्या हिकमती करून मिळवली! हे त्यांनी आमच्या पुढच्याच भेटीत प्रांजळपणे सांगितलंही! 

असे हे नाशिकचे संपूर्ण दातार कुटुंबीय माझ्या गाण्यांचे चाहते! दातार साहेबांची  पत्नी निर्मला, ही माझ्या ‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केव्हातरी पहाटे’ आणि ‘लवलव करी पातं’ या गाण्यांच्या  जबरदस्त प्रेमात! ‘ही छोटी पद्मजा संगीताच्या क्षेत्रात आणखी पुढे कशी जाईल? त्यासाठी आपल्याला काय करता येईल?’ असा विचार नेहमी निर्मलाकाकूंच्या  मनात असे. 

३१ जानेवारी १९९४ च्या रात्री  उशीरा नाशिकला घरी पोहोचल्यानंतर, दातार साहेबांचा  मुलगा राजन, सून शोभना, आणि नात स्नेहा यांना ती कॅसेट त्यांनी ऐकवली. त्यावर तत्काल या सर्वांच्या प्रतिक्रिया मला देण्यासाठी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि म्हणाले, “स्नेहा केवळ दहा वर्षांची आहे. तुम्ही सादर केलेल्या ‘मैं मंगलदीप जलाऊँ’ या पहिल्याच गाण्यामध्ये ‘तू प्रेम का सागर बन जा, मैं लहर लहर खो जाऊँ’ या ओळी स्नेहाने ऐकल्या. ते सूर तिच्यापर्यंत पोहोचले आणि त्यात ती हरवून गेली. एका दहा वर्षांच्या मुलीला खिळवून ठेवणारी सुरांमधली ती ताकद बघून, आम्हां सर्व कुटुंबियांचा तुमची काही गाणी रेकॉर्ड करण्याचा निर्णय त्याक्षणी पक्का झाला.”  

दातार परिवाराच्या  या स्नेह आणि आशीर्वादातून ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’, ‘घर नाचले नाचले’, ‘गीत नया गाता हूँ’, या ध्वनीफितींचा, तसंच अनेक उर्दू गझला, अभंग, गीते  यांचा जन्म झाला. ही फेणाणी-जोगळेकर आणि संपूर्ण दातार परिवारासाठीही  परम आनंदाची गोष्ट आहे! या सगळ्या ध्वनीफितींच्या रेकॉर्डिंग दरम्यान आम्हां दोन्ही कुटुंबियांच्या गाठी भेटी वाढल्या, आणि हे दातारसाहेब आमच्या संपूर्ण कुटुंबियांचे ‘दातारबाबा’ कधी झाले, ते कळलंच नाही! 

अशा ह्या तीर्थरूप दातारबाबांनी मला वैयक्तिक, सांस्कृतिक, सांगितिकदृष्ट्या सर्वार्थाने घडवलं, त्यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त मी काय गाऊ, काय बोलू, असा प्रश्न मनात असतानाच, नाशिकचं आणि साहित्यातलं आपलं सगळ्याचं दैवत म्हणजे आदरणीय कुसुमाग्रज, अगदी श्रीकृष्णासारखे माझ्या मदतीला स्वप्नात धावून आले आणि कानात कुजबुजले, ‘पद्मजा, ज्यांच्यासाठी संगीत, साहित्य, कला, हाच परमोच्च आनंद आहे, परमेश्वर आहे आणि जीवनाचं हेच वैभव आहे, त्या आपल्या बाबांना तू एकच सांग…’

‘तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला देऊ?

काय तुला वाहू मी काय तुला वाहू?…’

आज मला आठवते, ती १४ जानेवारी १९९४ची माझी आणि सुनीलची, बाबांशी झालेली पहिली भेट! मकरसंक्रांतीचा दिवस! त्यादिवशी एकदाच त्यांना, “तिळगूळ घ्या आणि गोड बोला” म्हणायची संधी मिळाली. कारण त्यानंतर त्यांच्यासारख्या स्पष्टवक्त्या माणसाला, गोड बोला म्हणणं, फार कठीण होतं! कधी कधी संगीतावरून, कवितेवरून आणि अनेक गोष्टींवरून आम्ही कैकवेळा अगदी कचाकचा भांडलो. अगदी जन्माचे वैरी असल्यासारखे! पाहणाऱ्याला वाटेल की झालं, आता सारं संपलं! पण त्यानंतर फक्त १० मिनिटांतच बाबांचा फोन येतो, “अगं, पद्मजा, आज वृत्तपत्रात वाचलेल्या एका लेखात, पत्रकार टेंबे काकांच्या लेखात इंदिरा संतांच्या कित्ती सुंदर ओळी आल्यात पहा…. अगदी चित्ररूप आहेत !”

*“दारा बांधता तोरण, घर नाचले नाचले,

आज येणार अंगणी सोनचाफ्याची पाऊले”*

खरोखरीच अस्साच सोनचाफ्याचा सुगंध घेऊन बाबा आमच्या आयुष्यात आले.आणि  इंदिराबाईंच्या शब्दांप्रमाणे…

“येऊ देत माझ्या घरी किरणांचे झोत ..  तेजस्वी पित्याचे ते वात्सल्याचे हात”….

असे वात्सल्याचे हात अगदी थेट, कधी आईच्या तर कधी वडिलांच्या मायेने आम्हां सर्वांच्या पाठीवरून कौतुकाने फिरले.

जगावं कसं? वागावं कसं? शब्दोच्चार स्पष्ट कसे म्हणावेत? कागदावरील शब्द ‘जिवंत’ करून ‘अर्थपूर्णरित्या’ कागदातून बाहेर कसे काढावेत, याचं भान मला बाबांनीच दिलं. सुरुवातीला वाटायचं दगड, माती, सिमेंट, धोंडे यात बुडालेला बिल्डर मला काय सांगणार? मी हट्टी! कलावंत ना! माझा हेका मी सोडत नव्हते, परंतु हळूहळू लक्षात आलं, या नाशिकच्या मातीत, काश्मीरसारखं जसं प्रत्यक्ष केशर फुलवून त्यांनी यश खेचून आणलं, तसंच माझ्या गाण्यातही, ही जाण वाढवून केशराचा सुगंध पेरला!

‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’ रेकॉर्ड करत असताना, कवितेचा प्रत्येक शब्द न् शब्द स्पष्ट नि भावपूर्ण आला पाहिजे, याकडे त्यांचा आवर्जून कटाक्ष असे. सर्वस्व तुजला वाहुनी’ या गझलेतील ‘हुंदका’ हा शब्द, मला हुंदका फुटेस्तोवर माझ्याकडून गावून घेतला.  ही गझल जेव्हा कुसुमाग्रजांनी माझ्याकडून पहिल्यांदा ऐकली, तेव्हा विंदांच्या शब्दांच्या ताकदीमुळे तात्यांचे (कुसुमाग्रजांचे) पाणावलेले, तरीही तृप्त डोळे मला आजही आठवतात.

कोणतीही कविता गाण्यापूर्वी, बाबा त्या कवितेतील प्रत्येक शब्दाच्या अर्थाचा, उच्चारांचा   माझ्याकडून अभ्यास करवून घेत. ‘गीत नया गाता हूँ’ या माजी पंतप्रधान अटलजींच्या कविता ऐकून दुसरे माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी, त्यांच्या कविता स्वरबद्ध करायला दिल्या. यातील काही कविता तीन ओळींच्या तर काही साडेसात ओळींच्या……  त्या भावपूर्ण होतील, अशा पद्धतीने बाबांनी मला जोडून दिल्या. इंडस्ट्रीतील सर्वोत्तम सर्व कलाकार, उत्कृष्ट रेकॉर्डिंग स्टुडिओत रेकॉर्ड करून तासन्‌तास बाबा त्यात रस घेऊन संगीताचा, रेकॉर्डिंगचा अभ्यास करायचे, तेही न थकता अत्यंत उत्साहाने! संगीत हे त्यांच्यासाठी कायम ‘S’ Vitamin चं ठरलं. 

माझा मुलगा आदित्यशी, त्याच्याच वयाचा होऊन क्रिकेट खेळणारे, त्याला आईच्या तक्रारी बिनदिक्कत सांगायला हक्काचं स्थान असलेले आजोबा दातारबाबा! सुनीलला, माझा भाऊ विनायकला, महत्त्वाच्या प्रसंगी योग्य मार्गदर्शन करणारे, उषाताईला, अटलजींचे पोर्ट्रेट करताना प्रोत्साहन देणारे बाबा, नाईक, खरे, धारप, सुभेदार इत्यादी सर्व मित्रांशी गप्पा मारताना सात मजली गडगडाटी हास्य करणारे, ‘गीत नया…’ कॅसेटचा सोहळा दहा दिवसांत करा, असा, पी.एम. हाऊसमधून फोन आला असताना, कधीही न घाबरणारे, पण दहा दिवसांत थाटात सर्व काही झालं पाहिजे, या विचाराने थरकापणारे, पण निश्चयाचा महामेरू असणारे, नात स्नेहाचे नृत्य डोळ्यातून प्रेम ओसंडून पहातानाचे बाबा, दगड, विटा, माती, धोंडे यांनी घेरलेले बिल्डर बाबा, त्यातून मला कवितेचे विविध रंग समजावणारे बाबा, लेक राजनच्या अफाट बुद्धिमत्तेविषयी, प्रगतीविषयी ऊर भरून कौतुक करणारे, सून शोभनाचेही कौतुक करणारे, पत्नी निर्मलाने त्यांना कसे विविध विषयांत घडवले, हे अभिमानाने सांगणारे बाबा, तसंच आमच्या  सर्वांचा ‘उंच उंच माझा झोका’ पाहताना उचंबळून येणारे, सर्वांवर प्रेमाचा अतिवर्षाव करणारे बाबा, अशी ही बाबांची अनेक वेगवेगळी रूपं मला वेळोवेळी दिसतात म्हणून म्हणावंसं वाटतं,

‘आई, बाबा, मित्र, गुरू, अन् तुम्ही संगीतसारथी;

तुम्हापुढे फिकेच पडतील, अतिरथी महारथी…!’

©  सुश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

??

☆ ‘होलिकोत्सवाचे बदलते रंगरूप’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

नमस्कार प्रिय वाचकांनों !  

आपण सर्वांना होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा !

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी’ अथवा ‘होली आई रे कन्हाई, रंग छलके सुना दे जरा बांसुरी’ सारखी कर्णमधुर गाणी टीव्ही वर पाहिली, की रंगपंचमीची सुरुवात फार आधीपासून झाली हे लक्षात येते. गुलालाने गुलाबी अन केशरी सुगंधी जलाने रंगलेल्या कृष्ण, राधा आणि गोपिकांच्या सप्तरंगी होलिकोत्सवाचे वर्णन आपल्याला सुपरिचित आहे. राधा आणि गोपींबरोबर कृष्णाची रसिक रंगलीला ब्रजभूमीत ‘फाग लीला’ म्हणून ओळखली जाते. ब्रज भाषेचे प्रसिद्ध कवी रसखान यांनी राधा आणि गोपी यांच्या सोबत कृष्णाने खेळलेल्या रंगोत्सवाचे अतिशय रसिकतेने ‘फाग’ (फाल्गुन महिन्यातील होळी) या सवैये काव्यप्रकारात बहारदार वर्णन केले आहे. उदाहरणादाखल दोन सवैयांचे वर्णन करते.

रसखान म्हणतात-

खेलिये फाग निसंक व्है आज मयंकमुखी कहै भाग हमारौ।

तेहु गुलाल छुओ कर में पिचकारिन मैं रंग हिय मंह डारौ।

भावे सुमोहि करो रसखानजू पांव परौ जनि घूंघट टारौ।

वीर की सौंह हो देखि हौ कैसे अबीर तो आंख बचाय के डारो।

(अर्थ: चंद्रमुखीसम ब्रजवनिता कृष्णाला म्हणते, “आज ही फाल्गुन पौर्णिमेची होळी बिनदिक्कत खेळ. तुझ्याशी ही धुळवड खेळून जणू आमचे भाग्यच उजळले आहे. मला गुलालाने रंगव, हातात पिचकारी घेऊन माझे मन तुझ्या रंगात रंगवून टाक. ज्यात तुझा आनंद समाहित आहे, ते सर्व कर. पण मी तुझ्या पाया पडते, हा घुंघट हटवू नकोस आणि माझी तुला शपथ आहे. हा अबीर माझ्या डोळ्यांत नको टाकूस, इतरत्र टाक, अन्यथा तुझे सुंदर रूप बघण्यापासून मी वंचित राहून जाईन!”)

रसखान म्हणतात-

खेलतु फाग लख्यी पिय प्यारी को ता सुख की उपमा किहिं दीजै।

देखत ही बनि आवै भलै रसखान कहा है जो वारि न कीजै॥ 

ज्यौं ज्यौं छबीली कहै पिचकारी लै एक लई यह दूसरी लीजै। 

त्यौं त्यौं छबीलो छकै छवि छाक सो हेरै हँसे न टरै खरौ भीजै॥

(अर्थ: एक गोपी तिच्या मैत्रिणीला फाग लीलेचे वर्णन करतांना सांगते, “हे सखी! मी कृष्ण आणि त्याच्या प्रिय राधेला होळी खेळतांना पाहिले. त्या वेळेला जी शोभा पाहिली, तिची तुलना कशी होणार? ते शोभायमान दृश्य अतुलनीय होते. अगं, त्यावर ओवाळून न टाकण्याजोगी एकही वस्तू शोधून सापडणार नाही. सुंदरी राधा जसजशी कृष्णाला आव्हान देते आणि त्याच्यावर एका मागून एक रंग उधळते, तसतसा कृष्ण तिच्या सौंदर्याने अधिकच वेडा होत जातो. राधेची पिचकारी पाहून तो हसत बसतो, पण तिथून पळून न जाता तिथेच उभे राहून तिने उडवलेल्या रंगात चिंब भिजत राहतो.”) 

या फाल्गुन महिन्यात केशरी अग्निपुष्पांचे वस्त्र लेऊन पलाश वृक्ष ऐन बहरात आलेले असतात. (त्याच पुष्पांना पाण्यात भिजवून सुंदर नैसर्गिक केशरी रंग तयार होतो). ही दैवी अन पावन परंपरा जपणारी गुलाल आणि इतर नैसर्गिक रंगांसमेत खेळल्या जाणारी होळी म्हणजे मथुरा, गोकुळ आणि वृंदावनातील खास आकर्षण. तिथे हा सण सार्वजनिक रित्या चौका-चौकात वेगवेगळ्या दिवशी खेळल्या जातो, म्हणूनच ही होळी फाल्गुन पौर्णिमेच्या महिनाभर किंवा पंधरा दिवस आधीच सुरु होते.  

मथुरेजवळ एक मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करतांनाचा माझा अनुभव अविस्मरणीय असाच होता. धुळवड जोरदार होतीच, पण होळीच्या या दुसऱ्या दिवशी कॉलेजला सुट्टी असल्याने होळी पोर्णिमेलाच सकाळी कॉलेजचे तमाम कॉरिडॉर गुलालाने रंगून गेले होते. अख्या स्टाफने कॉलेजमध्ये अशी ‘धुळवड’ खेळल्यावर दुपारी १२ वाजता पोबारा केला. होळी पोर्णिमेलाच ही अग्रिम धुळवड झाल्यावर मग दुसऱ्या दिवशी सार्वजनिक धुळवड अर्थातच आपापल्या परिसरात साजरी केली गेली. मी मात्र बघायला जाणे शक्य असूनही बरसाना (राधेचे मूळ गाव) ची लठमार होळी बघितली नाही, त्याचे वैषम्य नक्कीच आहे. लठमार होळीचे हे जबरदस्त आकर्षक दृश्य दिसते राधेच्या गावात बरसानात, मथुरा, गोकुळ, वृंदावनातील अन स्थानिक पुरुष मंडळींना बरसानाच्या महिलांच्या लाठ्यांचा प्रतिकार करतांना बघून मजा येते. तसेही त्या भागात राधेवरील नितांत भक्ती दिसून येते. तेथील लोक बहुदा एकमेकांना अभिवादन करतांना ‘राधे-राधे’ म्हणतात.

आमच्या लहानपणी प्रत्येक घरी ऐसपैस अंगण असायचे अन घरोघरी होळी पेटवली जायची. होळीसाठी जुनी लाकडे, जुन्या झाडांच्या वाळलेल्या काटक्या, जीर्ण झालेले लाकडी सामान, इत्यादी गोळा व्हायचे. शेण गोळा करून त्याच्या लहान लहान गोवऱ्या थापायच्या अन प्रत्येक गोवरीच्या मध्ये एक छिद्र ठेवायचे, अशा गोवऱ्यांची माळ तयार करून पेटलेल्या होळीला अर्पण करायची. आता अशा माळा विकत घेता येतात. या होलिकोत्सावाची प्रसिद्ध कथा अशी की, होलिका या हिरण्यकश्यपूच्या बहिणीला अग्नीपासून भय नव्हते. याच कारणाने हिरण्यकश्यपूच्या पुत्राला म्हणजेच विष्णुभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी ती पेटलेल्या अग्निकुंडात त्याला आपल्या मांडीवर घेऊन बसली. मात्र प्रत्यक्ष विष्णूची कृपा असल्याने प्रल्हाद जिवंत राहिला, आणि होलिका राक्षसी जळून खाक झाली. त्याचेच प्रतीक म्हणून दर फाल्गुन पौर्णिमेला अग्नी पेटवून त्यात आपल्या घरातील आणि समाजातील वाईट गोष्टी जाळून टाकणे हे अपेक्षित असते. मात्र निरोगी वृक्षांची कत्तल करून आणि जंगलतोड करून लाकडे जमा करून होळी पेटवणे योग्य नाही. झाडांचा नाश म्हणजे पर्यावरणास हानी पोचवणे होय. आधीच अतोनात वृक्ष तोड झाल्याने दूषित पर्यावरणाची समस्या गंभीर होते आहे. त्यात भर टाकून अशी होळी पेटवणे अयोग्य आहे. आजकाल प्रत्येक मोठ्या कॉम्प्लेक्स मध्ये होळी पेटवतात. त्यापेक्षा दोन तीन किंवा जवळपासच्या परिसरातील लोकांनी एकत्र येऊन प्रतीकात्मक लहानशी होळी पेटवून हा सण साजरा करावा असे मला वाटते.

माझ्या लहानपणीच्या धुळवडीच्या रम्य आठवणी पाण्याशी निगडित आहेत. नागपूरला आमच्या आईवडिलांच्या घरी खूप मोठं अंगण होतं. त्यात एक बरीच मोठी कढई होती, म्हणजे साधारण ३ वर्षांच मूल उभे राहील इतकी. त्याचा उपयोग एरवी १०० हून अधिक असणाऱ्या आमच्या झाडांना पाणी देण्याकरता होई. माझे ते आवडते काम होते. कढईत पाणी भरण्याकरता एक नळ होता, अन त्याला जोडलेल्या लांबच लांब पाईपने झाडांना पाणी देणे, खास करून उन्हाळ्यात अति शीतल असे काम होते. मात्र धुळवडीच्या दिवशी त्याच पाण्यात रंग मिसळून एकेकाला बुचकळून काढणे अन पिळून काढणे हा आमचा प्रिय उद्योग असायचा. अशीच सिमेंटची टाकी प्रत्येकाच्या घरी असायची, त्यांत एकामागून एक अशा आंघोळी करणे आणि जिथे जे मिळेल ते विनासंकोच खाणे, अशी धुळवड साजरी व्हायची.

कराड, कोल्हापूर अन सांगली पासून प्रत्येकी अंदाजे ४० किमी दूर असलेल्या इस्लामपूर येथे मी २०१६ ला नोकरीच्या निमित्याने गेले. तिथे धुळवडीचा (होळी पेटण्याचा दुसरा दिवस) इतर दिवसांसारखा एकदम नॉर्मल होता. मला कळेना, हे काय? चौकशी केल्यावर कळले की इथे ‘रंगपंचमी’ साजरी होते. रंगपंचमी म्हणजे होळी पौर्णिमेपासून पाचवा दिवस. मात्र मला हे माहितीच नव्हते. सुट्टी मिळो न मिळो, इथे रंगपंचमीच्या दिवशी सगळे आवर्जून सुट्टी घेतात. आमच्या मेडिकल कॉलेजमधील मुले भारताच्या विविध भागातील असल्यामुळे त्यांनी आपली डबल सोय केली, म्हणजेच धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी मस्ती! 

आता मोठ-मोठ्या निवासी संकुलांत धुळवड साजरी होते. हौसेला मोल नाही हेच खरे. बहुदा बॅकग्राऊंडला तत्कालीन चालणारी डिस्को गाणी अन त्यावर सानथोरांनी एकत्र येऊन आनंदाने बेधुंद नृत्य करणे हा अविभाज्य भाग! तसेच यासोबत कुठे कुठे (पाण्याचा अल्पसंचय असतांना देखील) कृत्रिम कारंज्यांची व्यवस्था आणि त्यात सचैल भिजणे. हा पाण्याचा अपव्यव खरंच अस्वस्थ करणारा आहे. त्यासोबत धुळवडीला मद्यपान आणि मांसाहार असलेल्या पार्ट्या देखील होतात. एकमेकांना रंगात रंगवून एकात्मकता वृद्धिंगत करणे हा धुळवड साजरी करण्यातला मूळ विचार आहे. मात्र त्याचे विकृत रूप समोर आले की दुःख होते. ज्यांचा कातडीवर वाईट परिणाम होतो आणि जे सतत धुवूनही जाता जात नाहीत असे केमिकल्स असलेले भडक रंग, तसेच चिखलात खेळणे, अचकटविचकट बोलणे, स्त्रियांची छेड काढणे, अश्लील शिव्या देणे, नशेत धुंद होऊन भांडण तंटा करणे, एकमेकांच्या जीवावर उठणे, कधी कधी तर चाकूने हल्ले करणे, खून करणे, इथवर अपराध होतात. या दिवशी वातावरण असे असते की, कांही ठिकाणी स्त्रियांना घराबाहेर पडण्याची देखील भीती वाटते. होळीचे हे अनाकलनीय बीभत्स रूप आपल्या संस्कृतीत बसत नाही. या सर्वच असामाजिक वागणुकींला आळा बसायला हवा. पोलीस त्यांची ड्युटी करतातच, पण समाजभान नावाची चीज आहे ना! आपला सण साजरा करतांना इतरांच्या सुखाची आपण ‘होळी’ तर करीत नाही ना याचे स्मरण असू द्यावे.

मैत्रांनो, होळी हा सामाजिक एकात्मकतेचे प्रतीक आहे, म्हणूनच कोरड्या, सुंदर पर्यावरण स्नेही विविध रंगांचा वापर करून, वृक्षतोड न करता आणि व्यसनाधीन न होता हा राष्ट्रीय एकात्मकतेचा प्रतीक असा होलिकोत्सव आनंदाने साजरा करावा असे मला वाटते, अन तुम्हाला?  

गीत – ‘नको रे कृष्ण रंग फेकू चुनडी भिजते’ गीतप्रकार-हे शामसुंदर (गवळण) गायिका- सुशीला टेंबे, गीत संगीत-जी एन पुरोहित

‘होली आई रे कन्हाई’- फिल्म- मदर इंडिया (१९५७) गायिका- शमशाद बेगम, गीत- शकील बदायुनी, संगीत-नौशाद अली

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “गाडी घुंगराची आली… गाडी घुंगराची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “गाडी घुंगराची आली… गाडी घुंगराची…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

व्हाट्सअपच्या ग्रुपवर काही अनपेक्षित असा खजिना मला मिळाला आहे.

जे मी कधी वाचले नव्हते ऐकले नव्हते असे अभंग गाणी वाचायला आणि ऐकायला मिळाली… त्याचा मला खूप आनंद झाला. हा ठेवा मी वहीत लिहून ठेवला आहे. आता कधीही काढून वाचताना पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येतो .

 

यात काही गजानन महाराजांची पदे आली होती.

“गजानना या करी आवाहन आसनस्थ   व्हावे”

हे गजानन महाराजांचे आवाहन आले होते .त्यातील सहज शब्द मनाला भावतात. यात त्यांची यथासांग  पूजा सांगितली आहे…. आणि शेवटी..

 

“मिटतील चिंता हरतील व्याधी टाळतील आपत्ती

गजाननाच्या कृपाप्रसादे सहजमोक्ष प्राप्ती…”

असे शब्द आहेत..

 

कृपाप्रसाद….

 या शब्दाजवळ थोडं थांबायचं… विचार करायचा…

या प्रसादाची  गोडी किती अपूर्व असेल नाही का….. हा एकदा खाऊन संपणारा प्रसाद नाही….

त्यांची कृपा झाली की मन भरणार आहे .अजून काही हवं ही भूक संपणार आहे.

 

त्यांच्याकडे एकच मागणं आहे. डोक्यावर तुमचा वरदहस्त असू दे ….मग त्यानंतर काही मागायचे मनात येणारच नाही. 

“गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची….”

प्रत्यक्ष गजानन महाराजांची घुंगराची गाडी तिला न्यायला आलेली आहे. मग काय काय झालं असेल याचं सुरेख वर्णन या गीतात आहे…

 

तिच्या हातात वैराग्याची बांगडी भरली, सज्ञानाचे पातळ तिला नेसवले आणि संत गुरु कृपेची चोळी शीऊन दिली… आणि हे सगळं दृढनिश्चयाच्या पाटावर बसवून…

असेल कुणाच्या नशिबात असे माहेरपण… 

या शब्दांनी आपण थक्क होतो….ही शिकवण आपल्यासाठी पण आहेच की…हे  वाचल्यावर आपोआप समजते .

 

नंतर त्यांनी तिला मोक्षपदाची वाट दाखवून दिलेली आहे. 

लेकीचं मन कशानी शांत होणार आहे हे त्यांच्या शिवाय अजून कोण जाणणार……

 

“लागली समाधी सारे दंग समाधीत…..”

लागली समाधी…  मध्ये हृदय मंदिरात महाराजांना बसवून त्यांची मानसपूजा कशी करायची हे सांगितले आहे. ही वाचतानाच माझ्या मनातच ती पूजा सुरू होते….पूजा झाली की प्रसाद आलाच…

पण तो कशाचा मागायचा हे समजावून सांगितले आहे…

घर ,पैसा, अडका नकोच….. आता हवी आहे फक्त मन:शांती

किती सुरेख मागणं आहे ना… वाचून आपण लगेच भानावर येतो…

खरंच आहे एकदा मनःशांती  मिळाली की बाकी काही मागायचं मनातच येणार नाही…

 

एका गाण्यात गजानन महाराजांना एका भक्ताने जेवायला बोलावले अशी कल्पना केली आहे… प्रत्यक्ष महाराजांचे जेवण… त्यात सगळ्या पदार्थांची रेलचेल आहे पक्वान्नांपासून महाराजांना आवडणाऱ्या पिठलं भाकरी पर्यंत…. आपण वर्णन ऐकत राहतो …. अगदी सजवलेलं ताट आपल्याला समोर दिसत असतं ….आणि शेवटी…

“अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले म्हणून हे  ब्रह्म्याचे पूजन…”

…. ही ओळ आपल्याला जागेवर आणते. विचारांना प्रवृत्त करते… महाराजांच्या प्रकटीकरणापासूनची कथा समोर येते. त्यांनी काय सांगितले आहे ते आठवायला लागते….

 

सुरेल आवाजातली गजानन महाराजांची बावन्नी ऐकत रहावी…

“चिंता साऱ्या दूर करी

संकटातुनी पार करी….”

महाराज आहेतच  आपल्याला सांभाळायला असे समजून घेऊन शांतपणे हे ऐकत बसावे…

ऊठूच नये…

 

घरात बसून वाचत राहू…. अभ्यास करत राहू….

पुढचं महाराज ठरवतील तसं…

बोला गजानन महाराज की जय !!!! 

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “मनाची पिशवी…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परवा बाजारात गेले होते••• आणि घरच्या उपयोगासाठी, किंवा नित्योपयोगी, काही वस्तू मिळत आहेत का ते पहात होते••• एका छोट्याशा दुकानासमोर, आपोआप पावले थबकलीच••• दुकान होते वेगवेगळ्या पिशव्यांचे••• मग त्यात अगदी पारंपारिक असलेला आजीबाईचा बटवा••• फॅशन म्हणून आलेला •••ते अगदी छोटी अशी मोबाईल बॅग म्हणून खांद्याला अडकवायची मोठा बंद असलेली साधीच पण मोहक अशी पिशवी•••

मग भाजी आणण्याकरता वेगळ्या पिशव्या••• किराणा आणण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• प्रवासाला जाण्यासाठीच्या वेगळ्या पिशव्या••• शाळेत न्यायच्या••• डब्बा ठेवायच्या •••कॉलेज कुमारांसाठी •••लॅपटॉप साठी••• सामान ने-आण करण्यासाठी•••टिकल्या ठेवण्यासाठी••• हातातच पर्स म्हणून वापरण्यासाठी••• महिलांचे दागिने ठेवण्यासाठी••• साड्या ठेवण्यासाठी••• रुमाल, ब्लाउज ठेवण्यासाठी••• उगीचच शो म्हणून वापरण्यासाठी••• लॉन्ड्रीचे कपडे देण्यासाठी •••अरे बापरे!•••

अजून खूप मोठी यादी••• लांबतच जाईल••• इतक्या तऱ्हेच्या पिशव्या त्या दुकानात होत्या••• दुकानाचे नाव पण कलात्मक ठेवलेले होते••• “BAG THE BAG”••• आणि सेक्शनला त्या त्या पिशव्यांची नावे दिली होती•••

दुकानात जाऊन हरखून जायला जायला झाले••• दुकानात गेल्यावर पिशव्यांचे एवढे प्रकार पाहून लक्षात आले ••• व्यवसाय करायचा म्हटल्यावर कोणताही करता येतो •••फक्त थोडा अभ्यास आणि लोकांची मानसिकता लक्षात घ्यायला हवी••• बघा साधी पिशवी, पण त्याचे एवढे प्रकार •••एवढी रुपे••• एकदम समोर आल्यावर••• गरज नसतानाही, एखादी तरी पिशवी घेतल्याशिवाय बाहेर पडतच नव्हते कोणी •••

पिशवीची व्याख्या काय हो? पिशवी म्हणजे कोणतेही सामान, वस्तू, सहजपणे ने-आण करता येण्यासाठी, त्याला धरायला बंद असलेली, पण बंद नसलेली, किंवा बंद करता येण्याजोगी, वस्तू••• पूर्वी या सगळ्या पिशव्या जुन्या कापडापासून, कपड्या पासून, बनवल्या जायच्या••• पण आता फक्त कापडाच्या नाहीत तर कागदाच्या, प्लास्टिकच्या, ऍक्रॅलिक पदार्थांपासून, नवीनच बनवलेल्या पिशव्या मिळतात••• म्हणूनच खूप आकर्षक दिसून त्या घेण्याचा मोह कोणालाच आवरता येत नाही•••

यावरुनच आठवली ती स्पंजची पिशवी••• सध्या ती पाहायला मिळत नाही ••• पण काही वर्षांपूर्वी अशा बऱ्याच पिशव्या लोक वापरत होते •••दिसायला अगदी छोटी पिशवी••• पण त्यात सामान भरायला सुरुवात केल्यावर, कधी पोत्यासारखे रूप घ्यायची••• कळायचे पण नाही••• आपण अशा वस्तू त्यात भरू लागतो••• तसतसा स्पंज ताणून ती पिशवी मोठी मोठी होत जायची ••• त्यामुळे कुठेही सहज ने-आण करता येण्यासाठी ही पिशवी सगळ्याकडे असायची•••

 मग लक्षात आले •••आपल्या शरीरात सुद्धा किती पिशव्या आहेत ना ? पोट, किडन्या, हृदय, जठर, मेंदू, स्त्रियांना गर्भाशय, अगदी शरीरातील शिरा धमन्या या पेप्सी मिळणाऱ्या पिशव्या सारख्याच नाहीत का?

म्हणजे काहीही असो••• कुठेही असो •••कसेही असो••• पिशव्यांची गरज ही पदोपदी लागते ••• आणि ती आपण वापरतच असतो••• पण पिशवी ही अशी वस्तू आहे, जी वापरायची •••पण परत रिकामी पण करायची असते •••जर रिकाम्या न करता पिशव्यांचा फक्त वापर केला तर काय होईल हो? घरातली जागा निष्कारण व्यापली जाणार •••कितीही मोठे घर असले तरी; एक दिवस जागा कमी पडू लागणार ••• हो ना? म्हणूनच आपण त्या त्या पिशवीचा उपयोग तेवढ्यापुरता करत असतो •••पुन्हा पुन्हा वापरली तरी ती काढ घाल करून त्या पिशवीचा वापर करत असतो•••

पिशवी ची व्याख्या, पिशवीचा उपयोग, पिशव्यांचे प्रकार पाहून वाटले••• आपले मन हे पण एक पिशवी आहे ना? नक्कीच आहे••• आणि तिचे रूप •••त्या स्पंजच्या पिशवी सारखे आहे••• काहीही••• कितीही •••कसे पण कोंबा••• ती पिशवी सगळे धारण करते•••

मग लक्षात आले •••पण पिशवीतून काढ घाल ही नेहमी होत राहिली पाहिजे •••नाहीतर एक दिवस जागा कमी पडणार••• पण मग त्याचा वापर तसा करायला हवा••• पण कोणी तसा करत नाहीये••• या मनामध्ये मिळेल ते••• दिसेल ते •••फक्त कोंबत आलो आहोत••• विशेषत: नको त्या वस्तूच •••पहिल्यापासून जास्त प्रमाणात भरल्या गेल्याने, त्यात हव्या त्या वस्तू ठेवायला जागा कमी पडत आहे•••

कोण केव्हा रागवले•••कोण केव्हा   भांडले••• कोण कोणाला काय बोलले••• हे सगळं बारकाव्यानिशी आपण आपल्या मनात ठेवत असतो••• म्हणून तेवढेच लक्षात राहते••• मग चांगल्या घटना, चांगले बोलणे, चांगले वागणे, याला मनात साठवायला जागा कमी पडते••• म्हणून आपण त्या वस्तू वापरून टाकून देतो•••

यामुळे प्रत्येकाचे मन हे नकारात्मक  गोष्टींनी भरले गेले आहे •••एक दिवस सुट्टीच्या दिवशी •••किंवा निवांत वेळी •••ही सगळी नकारात्मकता काढून फेकून दिली पाहिजे •••षड्रिपूंचे  जाळे काढून टाकले पाहिजे••• म्हणजे सकारात्मकतेला ठेवायला मनाच्या पिशवीत जागा होईल••• आत्मविश्वास त्यामध्ये भरता येईल ••• सगळ्यांचे चांगले गुण पाहण्याची दृष्टी त्यात जपता येईल••• या मनाच्या पिशवीला, अंतर्मनाचा बंद लावला की, किती छान या पिशवीचा वापर होईल ना?•••

कोणत्याही दुकानात न मिळणारी, पिशवी तुमची तुम्ही कलात्मकतेने सजवू शकता••• कधी त्याला चांगल्या वर्तणुकीची झालर  किंवा  लेस लावू शकता••• तर कधी चांगल्या विचारांच्या टिकल्या, आरसे लावून, आकर्षक करू शकता••• मग नकारात्मकता काढून, सकारात्मकतेला थारा दिलेली ही मनाची पिशवी, आजीबाईंच्या बटव्याची सारखी कधीच आऊटडेटेड न होणारी •••अशी असेल••• त्यातूनच कोणत्याही प्रसंगी••• कोणतीही ••• आवश्यक वस्तू तुम्हाला तुमच्या यशाच्या मार्गातील अडथळा दूर करायला मदत करेल••• बघा प्रत्येकाने आपली मनाची पिशवी साफ करून ठेवा•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

??

☆ प्राक्तन…. ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆

प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत होता. कधी हा रंग कधी तो…., दोरा कधी वर कधी खाली, कधी मागून पुढे कधी पुढून मागं, अनेक रंगांचे, अनेक प्रकारचे धागे एकमेकांत गुंफून   आयुष्याचं एक वस्त्र तो विणत होता.ते सुंदर बनेल की कुरुप हे त्याचं त्यालाच माहीत नाही. फक्त विणत रहायचं, धावत रहायचं येवढंच त्याला माहीत ! बाकी सगळ रहस्यच! 

आवडता रंग हाती आला की गडी जाम खूश! मग हव तसं, हव तिथं तो रंगवून घ्यायचा, अनेक दोऱ्यात माळून सुंदर नक्षीकाम करून घ्यायचा. त्याला आवडेल तसं दोरा वर खाली हलवायचाआणि त्यातून निर्माण झालेल्या चित्राकडे,  आपल्याच निर्मिती कडे गौरवाने पहात रहायचा. वाटायचं हे क्षण असेच  रहावेत. हा आनंदाचा रंग कायम आपल्याच हातात रहावा. दुःखं,संकटं, विघ्न अशी छिद्रे आपल्या वस्त्राला नकोच. सौंदर्य नष्टच होईल  ना मग! इतरांनी आपलं वस्त्र बघितलं की नेहमी वाह वाहच केली पाहिजे असंच त्याला वाटायचं! 

पण शेवटी नियतीच ती! उचललेला चहाचा पेला ओठांपर्यंत पोहोचायच्या आधी कोणती अन् किती वादळ उठवेल सांगण कठीण! आयुष्य नावाचा खेळ असाच असतो ना! खेळ अगदी रंगात येतं अन् अचानक एका छोट्याशा चुकीनं सर्वस्व उद्धवस्त होतं. जणू काही त्या धोट्याच्या हातात नासका, कुजका, तुटका धागा येतो अन् सुंदर विणलेल्या कापडाला भली मोठी भोकं पडत जातात. कधी एकमेकांत गुंतलेले धागे निसटू लागतात, कधी घट्ट बसलेली वीण उसवू लागते, तर कधी धागेच एकमेकांना तोडू लागतात. 

किती विचित्र! वेळ बदलली की धाग्यांचे रंग सुद्धा बदलत जातात. जवळचे कोण, लांबचे कोण हे लक्षात यायला लागतं. काल पर्यंत अगदी मिठी मारुन बसलेले धागे झटक्यात लांब पळतात. जवळ कोण नसतच अशावेळी . सहाजिकच मोठं छिद्र निर्माण होणारच की तिथं!  वेळच तशी येते ना. आणि मग हा आयुष्याचा खेळ नकोसा होऊन जातो. कारण अगदी जवळच्या धाग्यांनी सुद्धा साथ सोडलेली असते. स्वतः होऊन असेल किंवा नियतीचा घाला असेल तो. पण छिद्र पडलेलं असतं हे मात्र नक्की! अशा वेळी काय करावं सुचत नाही. पुन्हा तोच तुटलेला दोरा बांधून घ्यावा म्हटलं तर धोट्याला माग कुठं जाता येतं. तो पुढेच पळणार. 

मागचं बदलता येत नाही अन् पुढचं रहस्य उलगडत नाही. एकच पर्याय हाती असतो. फक्त धावत राहणं, पळत राहणं,आलेला प्रत्येक क्षण अनुभवत राहणं..बस्स..! 

अशा वेळी कधी कधी कोणाचा आधाराचा धागा आपल्या वस्त्रातील छिद्राला सांधण्याचा प्रयत्न करत असतं. पहिल्या सारखं साफाईदारपणा नसतो त्याच्यात, ओबडधोबड का होईना, पण छिद्र झाकलं गेलं याचंच समाधान!

काहीतर खूप मोठं गमावल्याची सल कायम सलत राहते पण खूप काही चांगल अजून शिल्लक आहे याची आस सुद्धा लागून राहते. हीच तर खरी मेख आहे या प्राक्तन नावाच्या रहस्याची! हे रहस्य उलगडण्यासाठी, आयुष्याचं एक सुंदर वस्त्र विनण्यासाठी हा अनुभवाचा धोटा कायम धावत राहणंच योग्य आहे.  आपण फक्त त्रयस्तासारखं त्या आयुष्यरुपी वस्त्राकडे पहात रहायचं, संकटाच्या वेळीपण मन शांत ठेवून आलेल्या प्रत्येक क्षणाचा स्वीकार करायचा, कारण त्यामुळेच मार्ग सापडत जातं, हवं ते गवसतं आणि महत्त्वाचं म्हणजे भविष्य बदलत जातं.

म्हणूनच या प्राक्तनाच्या हातमागावर अनुभवाचा धोटा उजवं अन् डावं करत एकसारखा धावत असतो. कधी हा रंग कधी तो………नेहमी सारखंच………

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जातं…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ जातं… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

मी जातं…… जातीपातीतील नव्हे ! खूपच अनादी कालीन ! माझ्याशिवाय ह्या मानव जातीची भूक भागत नाही ! तसा माझा ह्या पृथ्वीवर जन्म केव्हा झाला ते सांगता येत नाही. गरज ही शोधाची जननीच ! त्यामुळेच माझा शोध कोणत्या अवलीयाने लावला ते ही अज्ञात ! 

कदाचित रामायण, महाभारत असेल किंवा त्यापुढेही माझा जन्म झाला असेल, नक्की सांगता येत नाही एवढं खर ! मानवी भूक निर्माण झाली व गहू बाजरी ज्वारी निर्माण झाली तेंव्हा पासूनच मी आहे ! पण माझं अस्तित्व अजुनी टिकून आहे, व पुढेही टिकून राहील ! 

मी मुळातच दणकट व खंबीर ! कारण मी दगडातून निर्माण झाले. माझं व स्त्रीच सख्य हे कायमच, स्त्री माझी बाल मैत्रीण ! तिच्या वाटेला आलेलं सुख दुःख मी स्वतः पाहिलंय ! तिच्या वेदना मी जाणल्या !

माझी घरघर व तिच्या प्रपंच्याची घरघर ही भल्या पहाटेच होत असे ! तीन मला ब्राम्ह्य मुहूर्तावर जाग करण्याची सवय लावली ! तिच्या खड्या आवाजातील ओव्या व माझी घरघर एकदमच एकावेळी चालू होतं असत. व आमच्या आवाजाने मग इतर लोक उठत असत.

माझी सुख दुःखाची दोन पाती (पाळ ) मी स्त्रीच्या गळ्यात बांधली ! हे कमी पडू नये म्हणून माझ्या वरच्या पाळीच्या कडेला गोलसर खळीत वेदनेचा दांडा बसवला गेला ! (कदाचित तो त्रिगुणात्मक असावा ) जेणेकरून तो दांडा हातात धरून मला गोलगोल फिरवता येईल अशी सोय पण केली ! खळी ही जणू माझ्या गालावरचीच खळी ! कायमची ! माझा दांडा व तिच्या वेदना ह्या केव्हा एकरूप झाल्या ते कळलेच नाही ! पाळ बाजूला केल तरी, तो वेदनेचा दांडा तसाच ठेवला जातो.

माझ्या खालच्या पाळ्याला मात्र मधोमध एक सुख दुःखाना एकत्र ठेवणारा, प्रेमाचा मजबूत खिळा आहे ! जेणेकरून दोन्ही सुख दुःखाची पाळी एकत्र नांदतील ! 

मी म्हटलं तर वर्तुळाकार ! म्हटलं तर शून्य ! 360 अंशातून कायम फिरते ! व माझ्या भोवती तो वेदनेचा दांडा पण फिरतोच ! माझ्यात व सृष्टीत काय फरक आहे ! ती पण गोल फिरत असतेच की सूर्यभोवती ! काहीवेळा वापर नसल्यास शून्या सारखी हरवते ! शून्यात टक लावून बसते ! 

माझ्या वरच्या पाळीत माझं ऊर्ध्वमुखी तोंड ! जे मुखात पडेल ते गोड मानून घेते ! कधी गहू, कधी ज्वारी, कधी कडवट बाजरी, कधी शुभ्र तांदुळ ! येणाऱ्या घासाला पवित्र मानून, त्याचे चर्वण करायचे व त्याचे कठीण अस्तित्व घालून त्याला सुता सारखे मऊ करायचे ! व बाहेर त्याला धुतल्या तांदळासारखा शुद्ध करून पाठवायचे ! 

जो पर्यंत संसार आहे, प्रपंच आहे, तोपर्यंत माझं हे काम असच अव्याहत पणे चालू असणार ! संसार म्हटलं की भूक आलीच ! ह्या संसारात मोक्ष मिळे पर्यंत हेच माझं अखंड व्रत ! व्वा काय जन्म दिलास देवा ! माझ्या ह्या भाळी दोन सुख दुःखाच्या पाळी, ऊर्ध्वमुख वर वेदनेचा दांडा ! तो ही शून्यात फिरणारा ! 

कित्येक दाणे मुखात येतात, कित्येक सुपात आहेत, कित्येक शुभ्र होऊन बाहेर पडले ! मी मात्र तशीच फिरत आहे. वरच्या पाळीत मात्र तू विविध नक्षी कोरलीस पण खालच्या पाळीच काय ? तिला मात्र छन्निचे घाव सोसावे लागतात ! 

माझं कालपरत्वे रूप बदललं ! यांत्रिकी झालं ! कोणी मिक्सर केलं म्हणून काय झालं ? माझ्या पाळ्या बदलाव्या लागल्या तरी, मी अजुनी वर्तुळातच फिरते ! ती कायमची येणार दळण दळत !! 

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print