मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बाप आहे म्हणून…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “बाप आहे म्हणून” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते. तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते. एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता. मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.

आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं,पुण्यात आहे अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे.अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा का पोटाला..?  मी होय म्हणलं.. अण्णांनी फोन ठेवला..आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाले “ हे बघ येताना किलोभर बोंबील आणि सुकट घेऊन ये. तुझ्या त्या खडकीच्या दोस्ताकडणं ..मी बर अण्णा म्हणलं…परत फोन ठेवला…मीटिंग सुरू झाली..आणि परत लगेच दोन मिनिटांनी अण्णांचा परत फोन आला..मी शांतपणे पुन्हा फोन घेतला..पलीकडून अण्णा म्हणाले, “आर टिव्हीचा रिचार्ज संपलाय तेवढं बॅलन्स मार त्यावर लगेच…” मी होय आण्णा म्हणून फोन ठेवला आणि ताबडतोब बॅलन्स टाकला..

तर लगेच परत फोन आला..अण्णा परत म्हणले “ हम्म आलाय आलाय बॅलन्स चालू झालं..” मी बर अण्णा म्हणून फोन ठेवला..सगळ्यांना सॉरी म्हणून मी बोलायला सुरू होणार तेवढ्यात परत फोन आला…मी परत फोन घेतला आणि अण्णांनी विचारलं “ आरं ती भारताची मॅच कवा हाय..साऊथ आफ्रिका सोबत हाय नव्हं आता..त्यावेळी वल्डकप सुरू होता..अण्णांना क्रिकेटचा जरा नाद आहे.मी बाजूच्या एकाला विचारलं, “सर कधी आहे ओ साऊथ आफ्रिकेसोबत आपली मॅच..??? त्याने तर तोंडावरचा राग लपवत सांगितलं की उद्या आहे मॅच म्हणून….मी तसंच अण्णांना सांगितलं…मग अण्णांनी परत फोन कट केला…

चार पाच वेळा एका दमात फोन झाल्याशिवाय आण्णा शांत बसत नाहीत ही सवय मला माहित होती.आता दोन तास तरी त्यांचा फोन येणार नाही याची खात्री मला झाली आणि मी पुन्हा सर्वांना बोललो सर आता करा सुरू…  माझ्या त्या फोनमुळे वातावरण जरा बदलले होते याची जाणीव मला झाली होती..पण मी काय लै लोड घेतला न्हाय..मीटिंग संपली..

मीटिंग संपल्यावर नाष्टा आला..नाष्टा करताना सगळेजण त्यांच्या फोनवर आलेले मिसकॉल पाहत होते.आणि मला ते समजावे म्हणून एकमेकांना कॉल आलेले दाखवत होते.माझ्या ही फोनवर सात ते आठ अनोळखी नंबर वरून आलेले मिस कॉल दिसत होते…मी मात्र त्याकडे दुर्लक्ष करून नाष्टा पोटात ढकलू पाहत होतो..

त्यातला एकजण मला म्हणाला, दादा एक बोलू का? रागावू नका पण मीटिंग सुरू असताना फोनवर लै बोलला तुम्ही..आणि वडिलांचाच तर फोन होता आणि एवढं काय महत्वाचं ही नव्हतं.. तुम्ही मिटिंग संपल्यावर ही बोलू शकला असता त्यांना.? त्याच्या सुरात सगळ्यांनी सुर मिसळला आणि शांतपणे ते सर्वजण माझ्यावर राग व्यक्त करू लागले.

त्या सगळ्यांचं बोलण झाल्यावर मी फक्त इतकंच म्हणलं…

आज बापाचा आपल्याला दिवसातून हजारवेळा कॉल येतोय यासारखी सुंदर गोष्ट जगात दूसरी कुठलीच नाही साहेब …आणि साहेब मी जर फोन उचलला नसता ना तर किमान दोन तास तरी माझा बाप माझ्या काळजीत तडफडला असता..साहेब आज बापाचा फोन येतोय उद्या भविष्यात बाप निघून गेल्यावर या नंबर वरून कॉल येणार नाही..हा काळजी असणारा आवाज कानावर पडणार नाही.. आणि साहेब मिटिंग,कार्यक्रम वैगेरे होतच राहतील…माझं बोलणं सुरू होतंच तेवढ्यात अण्णांचा परत फोन आला…मी पटकन उचलला आणि स्पिकरवर टाकला…अण्णा जोरात बोलत म्हणाले,

“आर बोंबील घेताना खारा मासाबी जर चांगला भेटला तर किलोभर घेऊन ये..तोंडाला चव येईना लका…मी शांतपणे होय म्हणाल्यावर फोन ठेवला…

त्यावेळी अचानक समोरच्या खुर्चीत बसलेले परांजपे सर एकदम लहान मुलासारखे रडू लागले..सगळेजण शांत झाले…डोळे पुसत ते म्हणाले, चंदनशिवे खरं आहे तुमचं…मी आयुष्यात काय गमावून बसलोय याची आज तुम्ही मला जाणीव करून दिली.पण आता वेळ निघून गेली ओ.. आता नाही येत फोन माझ्या वडिलांचा. कारण वडीलच गेले ओ निघून पार पार दूर निघून गेले. रेंजच्या बाहेर गेले.सगळ्याचे डोळे पाणावले. आणि गंमत म्हणजे ज्यांचे वडील रेंज मध्ये आहेत त्यांनी त्यांनी आपापल्या वडिलांना फोन करायला सुरवात केली. का कुणास ठाऊक पण सर्वजण अगदी लहान मुलासारखे बापाशी बोलू लागले. मात्र परांजपे सरांचा हंबरडा आतल्या आत हंबरत राहिला.

आम्ही बाहेर पडलो.सगळेजण त्यांच्या त्यांच्या गाडीतून निघून गेले. आणि मी माझ्या खडकीच्या मित्राला म्हंजे रुपेशला फोन केला..पलीकडून रूप्या शिवी देतच म्हणाला काय रे नालायक माणसा आज आठवण आली का तुला??. मी पण तसाच शब्द फिरवत म्हणलं, नालायका कोथरूडला ये ना बोंबील, सुकट आणि खारा मासा घेऊन.. आण्णाने घेऊन यायला लावलं आहे. तसा रुप्या हसत म्हणाला मी तुला फोन करणारच होतो कारण अण्णांचा मला फोन आला होता मघाशीच.. येतो घेऊन थांब तिथंच…तासाभराने रुप्या सगळं घेऊन आला.मी मात्र त्या बोंबलाच्या दरवळनाऱ्या वासात अण्णांचा हसरा चेहरा शोधू लागलो..

मित्रहो, बापाचा फोन येतोय ना.. येतोय ना..तर दुनिया गेली उडत..बापाचा फोन उचलायचा आधी..तुमची मिटिंग, तुमचं ऑफिस कुठेही पळून जाणार नाहीय. दुनिया जिथं आहे तिथंच असणार आहे.पण केव्हा ना केव्हा तरी बाप जाणार आहे रेंजच्या बाहेर. तिथून बाप फोन करू शकणार नाहीय. त्यावेळी कितीही तडफडून वाट बघितली तरी स्क्रिनवर हा नंबर येणार नाहीय. म्हणून दोस्ता दुनियेला जरा वाळत घालायचं आणि बापाच्या प्रेमात ओलं होऊन जायचं. बस्स इतकंच सांगायचं होतं.वाचून झालं असेल तर पहा वडिलांचा मिस कॉल पडलाय का? चला लावा बरं फोन आपल्या बापाला वाट पाहतोय ना तो तुमच्या फोनची…

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ऋतू बाभुळतांना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “ऋतू बाभुळतांना” ☆ सुश्री शीला पतकी 

ऋतू गाभूळताना ही माझ्या एका मैत्रिणीची सुंदर कल्पना आणि त्या कल्पनेचा विलास खूपच छान तिच्या निरीक्षणाला किती दाद द्यावी तेवढी कमी. मुख्य म्हणजे “गाभूळताना” हा शब्द तिने वापरला आहे तोच किती सुंदर आणि समर्पक आहे … आणि सहज माझ्या लक्षात आलं माझ्याच पेशातला ऋतू गाभूळत नाही तो बाभूळतो!… मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाभूळतो हा शब्द कुठे मराठीत?… अगदी बरोबर आहे तो आस्मादिकांचा शोध आहे.. म्हणजे गाभूळतो म्हणजे काय तर आंबट असलेली चिंच तिला एका विशिष्ट कालावधीत एक गोड स्वाद यायला लागतो आणि ती जी तिची अवस्था आहे त्याला आपण गाभूळणे असे म्हणतो!.. अगदी तसेच बाभूळणे  या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे पहा शाळा सुरू होण्याचा कालावधी हा तसा गोड आहे आणि काटेरी सुद्धा आहे..

 पालकांना वाटतं पोर शाळेत जाते चार पाच तास निवांत… पण त्याला साधारणपणे दीड महिना रिझवताना पालक मेटाकुटीला आलेले त्यामुळे मुलगा एक वर्ष पुढच्या इयत्तेत जातोय हा आनंद चार पाच तास घरात शांतता हे सुख पण त्याबरोबर शाळेची भरावी लागणारी भरमसाठ पी पुस्तक वह्या गणवेश ट्युशन कोचिंग क्लासेस सगळ्या चिंता सुरू होतात म्हणजे एकूण काटेरी काळ सुरु होतो त्या पोराचं करून घ्यायचा अभ्यास त्याला बसला वेळेवर सोडणे हे सगळं धावपळीचं काम सुरू होत मग ते सगळं काटेरीच नाही का? मग गोड आणि काटेरी याच मिश्रण करून मी शब्द तयार केला बाभूळणं! आता वळूयात आपल्याला लेखाकडे

ऋतू बाभूळताना…….!

सकाळी सकाळी वर्तमानपत्र घराच्या दारात येऊन पडतं मोठी हेडलाईन असते सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दहा लाख पुस्तकांचे वितरण झाले.  बचत गटाला बारा लाख गणवेशाची तयारी करण्याचे दिलेले काम वेळेत पूर्ण झाले… वृत्तपत्रात व टि व्ही वर अशा बातम्या सुरू झाल्या, शाळेच्या स्वच्छतेच्या छायाचित्रांचे नमुने यायला लागले ,शाळेत कसे स्वागत करावे याबद्दलच्या विविध कल्पना, विविध शाळेच्या माध्यमातून वृत्तपत्रात छापून यायला लागल्या की खुशाल समजावे ऋतू बाभूळतोय!

एप्रिल महिन्याच्या पाच सात तारखेला परीक्षा संपून पालक आणि विद्यार्थी हुश्श झाले. त्यानंतर शाळा संपल्या आणि घरामध्ये पोरांचा धुडगूस सुरू झाला!.. कॅरम बोर्ड बाहेर निघाले सोंगट्या आल्या पावडरी आणल्या गेल्या.. वाचण्यासाठी मुद्दाम आजोबांनी छोटी छोटी पुस्तक आणून ठेवली.. क्रिकेटच्या स्टम्स बॅट बॉल यांची नव्याने खरेदी झाली. विज्ञान उपकरणाचे किट्स यांचे नवीन बॉक्सेस घरी आले व्हिडिओ गेम फार खेळायचे नाहीत या अटीवर या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या घरातल्याच एका खोलीत ड्रॉइंग चे पेपर खडू कागद हे सगळं सामान इतस्ततः  विखुरलेलं …फ्लॅटमध्ये अनेक छोट्या मुलींच्या भातुकलीचे घरकुल…. या सगळ्या विखुरलेल्या सामानाची आवरावर सुरू झाली की खुशाल समजावं ऋतू बाभूळतोय…!

मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुप वर  शाळेचा मेसेज येतो … पेरेंट्स आर रिक्वेस्टेड टू अटेंड द मीटिंग विच विल बी हेल्ड ऑन धिस अंड दिस…. मग शाळापूर्वतयारीची सूचना देण्यासाठी पालकांच्या सभेची गडबड चालू होते. शाळा युनिफॉर्म चे दुकान सांगते वह्या घेण्याचे दुकान सांगते पुस्तके घेण्याचे दुकान सांगते  सगळी दुकान वेगवेगळी… मग लगबग सुरू होते आणि गर्दीत जाऊन वह्या पुस्तके गणवेश.. पिटीचा गणवेश विविध रंगाचे दोन गणवेश.. ते कोणत्या वारी घालायचे ते दुकानदारच आम्हाला सांगतो. रस्त्यावर मग छत्री रेनकोट स्कूल बॅग्स डबे पाण्याच्या बॉटल्स यांची प्रदर्शना मांडली जातात आणि खरेदीची झुंबड उडते मग बूट मोजे  पुस्तक वह्या यांचे कव्हर्स ही सगळी खरेदी सुरू झाली की समजावं ऋतू बाभूळतोय. .!

घरामध्ये आजोबांची सर्व वह्यांना कव्हर घालून देण्याची गडबड सुरू होते मग कात्री डिंक यांची शोधाशोध त्याबरोबर आम्ही आमच्या वेळेला कसे कव्हर घालत होतो.. जुन्या रद्दीच्या पानांची वही कशी शिवत होतो या कथाही ऐकायला मिळत अशा कथांची पुनरावृत्ती सुरू झाली की समजावं ऋतू बाभुळतोय…

 किचन मधल्या खोलीत आई आणि आजी यांची आठ दिवस मुलांना डब्यात काय काय द्यायचं याची कच्ची तयारी सुरू झाली की समजावं ऋतू बाभळतोय…! मुलाचे कोणते विषय कच्चे आहेत याचा पुन्हा एकदा अभ्यास करून कोणाकडे त्याच्या खास ट्युशन लावाव्यात याची पालक मैत्रिणींशी तासंतास फोनवर गप्पा आणि चर्चा सुरू होते आणि एक गठ्ठा निर्णय घेऊन त्या सगळ्या  पालकिणी त्या शिक्षकांना भेटायला जातात…. तेव्हा खुशाल समजाव की ऋतू बाभुळतोय !

कॉलनीच्या मधल्या मैदानातलं पोरांचं गोकुळ नाहीस होऊन ती शाळेत जाणारी पोरं गंभीर चेहऱ्याने घरात एकत्र आली आणि त्यांच्या चर्चा सुरू होतात…. आता सुरू झाला बाबा ते होमवर्क पूर्ण करा त्या क्लासेस ना जा शिवाय  मम्मीचा अट्टाहास ..एखादी कला पाहिजे म्हणून त्या तबल्याच्या क्लासला जा..! एक म्हणतो मी तर रोज देवाला प्रार्थना करतो ती खडूस टीचर आम्हाला येऊ नये काय होणार कुणास ठाऊक?… दुसरा म्हणतो ती टेमीना मॅडम आम्हाला आली तर फार छान रे.. ती शिकवते पण छान आणि पनिश पण फार करत नाही…. स्कूलबस चे अंकल तेच असावेत बाबा जे गेल्या वर्षी होते ते खूप मज्जा करतात…. अशा चर्चा सुरू झाल्या की खुशाल  समजावं ऋतू बाभूळतोय!

कॉलनीतल्या सगळ्या मुलांनी आणि पालकांनी मिळून केलेली सहल कॉलनीच्याच प्रांगणात केलेले एक दिवसीय शिबिर भेळ ..आईस्क्रीम  सहभोजन ..वॉटर पार्क.. हॉटेलिंग सगळं संपून गुमान घड्याळाच्या काट्याला बांधून चालायचे दिवस आले की खुशाssल समजावं ऋतू बाभूळतोय….!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ४ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

वनिता

आज हे लेखन करत असताना माझ्या स्मृतीपटलावर अनेक चेहरे रेखान्वित होतात.  काळाच्या प्रवाहाबरोबर ते दूरवर वाहत गेले असतील पण आठवणींच्या किनाऱ्यावर ते पुन्हा पुन्हा हळूच अवतरतात.  पाटीवरची अक्षरं पुसली गेली,पाटी कोरी झाली पण आठवणींचं तसं नसतं धूसर झालेल्या आठवणी मनाच्या पाटीवर मात्र पुन्हा पुन्हा प्रकाशमय होतात.

शाळेजवळ राहणारी शारदा शिर्के आठवते.  तशी दणकटच होती.  तिच्या कपड्यांना मातकट वास यायचा पण ती आम्हा मैत्रिणींना आवडायची. तशी वागायला, बोलायला टणक होती कुणालाही पटकन धुडकावून लावायची. भीती तिला माहीतच नसावी.  अभ्यासात तशी ठीकच होती. गृहपाठ सुद्धा नियमितपणे करायची नाही आणि बाई रागावल्या तरी तिला काही वाटायचं नाही.  पण डबा खायच्या सुट्टीत कधी कधी ती आम्हाला तिच्या घरी घेऊन जायची  तिच्या घराच्या भिंती मातीच्या होत्या जमीन शेणानं सारवलेली असायची.  जमिनीवर कुठे कुठे पोपडे उडलेले असायचे. तिच्या घरातलं एक मात्र आठवतं! फळीवरचे चकचकीत घासलेले पितळेचे डबे आणि चुलीवर  रटरट उकळणारा कसलासा रस्सा आणि तिच्या घरी पत्रावळीवर खाल्लेला, तिच्या आईने प्रेमाने वाढलेला तो गरम-गरम तिखट जाळ रस्सा भात.  फार आवडायचा.  त्या उकळणाऱ्या आमटीचा वास आणि चव अजूनही गेली नाही असं कधी कधी जाणवतं आणि हेही आठवतं की त्या बदल्यात शारदा आमच्याकडून नकळत आमच्या पाटीवरचा गृहपाठ उतरवून घ्यायची. आता आठवण झाली की मनात येतं पुस्तकातलं गणित आपण अचूकपणे शिकलो पण जीवनातले असे give and take चे हिशोब आपल्याला मांडता आले का?  हे तंत्र शारदाला कसं काय लहानपणापासून अवगत होतं?

परिस्थिती…

परिस्थिती शिकवते माणसाला.

बारा नंबर शाळेच्या दगडी पायऱ्यावरून मी नाचत बागडत उड्या मारत पुन्हा माझ्या वर्गात जाते. वर्गाच्या भिंतीवर लावलेली बालकलाकारांची चित्रं, गुळगुळीत रंगीत पेपरच्या बनवलेल्या विविध बोटी… शिडाची बोट, बंब बोट पक्षी, प्राणी, फुले पुन्हा एकदा नजरेत भरून घेते.

या कलाकुसरीत तसा माझा भाग नसायचा.  क्राफ्टचा एक तास म्हणून मी काही केलं असेल तेवढंच पण तेही काही आवर्जून वर्गाच्या भिंतीवर लावावं असं नव्हतं पण एक आठवण आहे. निबंधाचा तास होता आणि कुलकर्णी बाईंनी सांगितलं,” आपल्या आजी विषयी पाच ओळी लिहा.”

 त्यावेळी मी पाटीवर लिहिलेली एक ओळ आठवते. 

“ कधीकधी आई खूप रागावते पण आजी मला कुशीत घेते. तिच्या लुगड्याचा वास मला खूप आवडतो.”

बहुतेक सगळ्यांनी आजीचं नाव, आजीचा वर्ण, उंच की बुटकी वगैरे लिहिलं होतं पण मी लिहिलेलं कुलकर्णी बाईंना तेव्हा खूपच आवडलं असावं आणि त्यांनी ते सर्वांना वाचूनही दाखवलं. त्याचवेळी  वनिता नावाची माझी एक मैत्रीण होती, तिने तिच्या पाटीवर फक्त एवढंच लिहिलं होतं, “माझ्यावर प्रेम करणारी आजीच मला नाही. देवा! माझे लाड करणारी आजी मला देशील का?”

सुखदुःख, मनोभावना कळण्याचं ते वय नव्हतं.  आपल्यापेक्षा कुणाकडे काहीतरी कमी किंवा काहीतरी जास्त आहे हेही कळण्याचं वय नव्हतं.  कदाचित मनाला जाणवत असेल पण ते शब्दांतून किंवा वाचेतून व्यक्त करायची क्षमता नसेल पण ज्या अर्थी आज इतक्या वर्षानंतरही वनिताने तिच्या पाटीवर लिहिलेले वाक्य मला आठवतंय त्याअर्थी मी त्यावेळी नक्कीच वनिताशी वेगळ्या प्रकारे कनेक्ट झालेच असणार.

वनिता खूप हुशार होती. तिचा नेहमी पहिला नंबर यायचा.  ती कविता, पाढे अगदी घडघड म्हणायची. पटपट गणितं सोडवायची.  खरं म्हणजे ती माझ्याच वर्गात आणि माझ्याच वयाची होती पण अंगापिंडाने थोडीशी रुंद असल्यामुळे मोठी भासायची.  ती परकर पोलका घालायची कधी कधी तिच्या पोलक्यावरच्या  ठिगळातले धागे सुटलेले असायचे.  रोजच ती  धावत पळत शाळेत यायची आणि शाळा सुटल्यावर पळत पळत घरी जायची. आमच्यासारखी  ती मैत्रिणींच्या घोळक्यात रेंगाळत कधीच राहिली नाही. खूप वेळा तिचे डोळे सुजलेले असायचे, चेहरा रडका असायचाा, तिच्या गालांवर मारल्यासारख्या लालसर खुणा  असायच्या, तिच्या हातावर भाजल्याच्या खुणा असायच्या,त्र तिची पाटी फुटकी असायची, पेन्सिलीच बुटुक असायचं पण तरीही ती इतकं नीटनेटकं सुवाच्च्य,सुंदर अक्षर काढायची!

शाळेच्या बाकावर मी नेहमी तिच्या शेजारीच बसायचे.  का कोण जाणे पण मला तिचा इतर मैत्रिणींपेक्षा जास्त आधार  वाटायचा. ती कुणाशीच भांडायची नाही. पण तरीही  मला ती अशी भक्कम वाटायची, फायटर वाटायची. मला असंही  वाटायचं आपल्यापेक्षा वनिताला खूप जास्त कळतं. जास्त येतं.  तिला स्वयंपाक करता यायचा, पाणी भरता यायचं, घरातला केरवारा करता  यायचा,  तिने आणलेली डब्यातली पोळी भाजीही तिनेच बनवलेली असायची.  तेव्हा मनात दोनच प्रश्न असायचे इतकं सगळं हिला कसं जमतं? आणि तिला हे का करावं लागतं? मला याचे उत्तर तेव्हा कळलं जेव्हा रत्नाने मला सांगितलं,

“वनिताला किनई  सावत्र आई आहे. ती तिला खूप छळते, मारते,  तिच्याकडून घरातली सारी कामं करून घेते.  तिला किनई एक सावत्र भाऊ आहे तो लहान आहे आणि त्यालाही तीच सांभाळते. बिच्चारी..” त्यादिवशी वनिता म्हणजे माझ्या मनात कोण म्हणून अवतरली हे सांगता येत नाही. पण मला ती हिमगौरी भासली. सिंड्रेला वाटली. माझं बालमन तेव्हा अक्षरशः कळवळलं होतं. मात्र  घरी आल्यावर मी माझ्या आजीला म्हटलं, “माझ्याबरोबर काबाड आळीत चल.” काबाड आळी आमच्या घरापासून जवळच होती. आजीने,” कशाला?” विचारल्यावर मी तिला म्हणाले होते, “काबाड आळीत वनिता राहते. तिची सावत्र आई तिला खूप छळते. तू तिला चांगला दम दे!”

 हे काम समर्थपणे फक्त माझी आजीच करू शकते याची किती खात्री होती मला!

त्या वेळी शाळेच्या दर्शनी भिंतीवर साने गुरुजींची वक्तव्ये लिहिलेली होती. 

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी 

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

त्या बालवयात असं काही ऐकलं, पाहिलं, अनुभवलं आणि सहजपणे त्याचा संदर्भ जेव्हा या ओळींशी लागला त्यामुळेच असेल पण ते भिंतीवरचं अनमोल अक्षर वाङमय मनात मोरंब्यासारखं मुरलं.

चौथीनंतर प्राथमिक शिक्षण संपलं आणि हायस्कूलचं जीवन सुरू झालं. कोणी कुठल्या कोणी कुठल्या शाळेत प्रवेश घेतला.

ठाण्याला तेव्हा थोड्याच प्रमुख शाळा होत्या. त्यातली एक मो.ह. विद्यालय आणि दुसरी  सरकारी ..गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल. माझं नाव गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये घातलं. काही  मैत्रिणी पुन्हा याच शाळेत एकत्र आलो तर बऱ्याच जणी एकमेकींपासून पांगल्या.  दूर गेल्या.

चौथीनंतर वनिता कुठे गेली ते कधीच कळलं नाही. मी तिचा पत्ता काढू शकत नव्हते का? काबाड आळीत जाऊन तिचं घर शोधू शकत नव्हते का?  चौथीची स्कॉलरशिप मिळवणारी बारा नंबर शाळेतली ती एकमेव विद्यार्थिनी होती. तिनं पुढचं शिक्षण घेतलं की नाही? 

वनिताच्या आठवणीने कधी कधी अंगावर सरसरून काटा उभा राहतो. कदाचित तिच्या सावत्र आईने कुणा थोराड माणसाशी तिचं लग्नही लावलं असेल. तिच्या आयुष्याची परवडच झाली असेल. दुःखद, कष्टप्रद आयुष्य जगतानाच तिचा शेवटही झाला असेल.  कालप्रवाहात ती वाहून गेली असेल पण त्याचवेळी तिच्याविषयी दुसरं ही एक चित्र मनात उभं राहतं.

वनिता धडाडीची होती.  ती एक सैनिक होती, योद्धा होती.  तिच्यात एक उपजत शौर्य होतं, सामर्थ्य होतं.  तिने कुठे तिचं रडगाणं आपल्याला कधी सांगितलं होतं? उलट शाळेच्या मधल्या सुट्टीत ती सर्वांचे हात हातात घालून रिंगण करायची आणि मोठ्याने गाणी म्हणायला लावायची.

कधी “उठा उठा चिउताई सारीकडे उजाडले..”

तर कधी..

 “शाळा सुटता धावत सुटले

 ठेच लागुनी मी धडपडले

 आई मजला नंतर कळले

 नवी कोरी पाटी फुटली

आई मला भूक लागली..”

कुणी सांगावं अशा या वनिताने एखाद्या जिल्ह्याचे  कलेक्टर पद अभिमानाने भूषविले असेल.  ज्या ज्या वेळी सिंधुताई सपकाळ  सारख्या सक्षम स्त्रियांचा उल्लेख होतो त्या त्या वेळी त्यांच्या ठिकाणी मला हरवलेली माझी बालमैत्रीण  वनिता दिसते.  

आज मागे वळून पाहताना वाटतं बालपणीचा काळ सुखाचा किंवा रम्य ते बालपण असं म्हणताना आणि त्यातली वास्तविकता पडताळताना मला हमखास गोबऱ्या गालाच्या, सुजर्‍या  डोळ्यांच्या,  कोरड्या न विंचरलेल्या केसांच्या, फुटक्या पाटीवर सुरेख अक्षर काढणाऱ्या, मधुर गाणी गाणाऱ्या लहान  पण प्रौढत्व आलेल्या वनिताची आठवण येते. वाटतं कुठेतरी माझ्या जडणघडणीत तिचा अंशतः वाटा आहे. त्या संस्कारक्षम वयात तिने एक विचारांचा अमृत थेंब नकळत माझ्या प्रवाहात टाकला होता.

HARDSHIP DOES NOT KILL US, MAKES STRONGER!

HARD TIMES IN THE PAST MOTIVATE OUR PRESENT.

 – क्रमशः … 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

आभाळात काळ्या ढगांची गच्च दाटी झाली होती…

 काळोख दाटून आला होता ..  अंधारलं होतं 

 तो भार ढगाला सहन होईना

 तसा कोसळायलाच लागला

 धो धो ..  कितीतरी वेळ .. अविरत…

 मग एक क्षण असा आला

 .. सगळं मोकळं झालं

 ढगातून सोनेरी ऊन बाहेर पडलं

 ती बघतच राहिली…

 

 आता धरणी ते पाणी कुशीत घेईल नव्या सृजनासाठी..

 कोवळे अंकुर वर येतील पावसाळ्यातला हा सोहळा..

 आज तिने नीट समजून घेतला

 

 निसर्ग शिकवतो आपल्याला

 भरून आलं की योग्य ठिकाणी मोकळं करावं.. मन…

  मनातलं बोलून सांगून..

 प्रेमाने समजून घेणाऱ्याकडे

 

 मग समजूतीचे अंकुर फुटतात नव्याने जगण्यासाठी….

मायेचा प्रेमाचा प्रकाश मिळाला की अंकुरातून पाने येतील…

 पुढे फुलं फळं सुद्धा येतील

 

 तो सावळा ..

आभाळातला…

 आज तिच्यासाठीच बरसला

 म्हणजे खरंच तो तिथे असतो…

 

 अरे  खरंच की..

मग आता चिंताच नको 

आज तिचा तिला साक्षात्कार झाला.  तिने वर पाहून समाधानाने हात जोडले…

 कधी   कुठे कुठल्या रूपात भेटशील कळतच नाही रे .. .. 

  माझ्या सावळ्या…..

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मनातला पाऊस” – लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

श्री मयुरेश उमाकांत डंके

॥मनातला पाऊस॥

(देवाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका ***) 

काल रात्री १ वाजेपर्यंत हवेत गारवा होता, आभाळ गच्च भरलेलं, अगदी कुंद वातावरण होतं. पण, दीड वाजता जो पाऊस सुरू झाला, त्यानं पार दैनाच करून टाकली. रात्री दीड वाजल्यापासून रस्त्यावर, रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर, दुकानाच्या पायऱ्यांवर, थोडक्यात म्हणजे जिथं जागा मिळेल तिथं, भर पावसात कुडकुडत बसून राहिलेले वारकरी मी पाहतोय. त्यांना झोपायलासुद्धा जागा उरली नाही. दिवसभर पायी चालून थकून गेलेली ती माणसं तशीच बसून राहिली होती. 

अंथरूण म्हणून एखादं प्लॅस्टिकचं इरलं, उशाला एखादी पिशवी किंवा बोचकं आणि पांघरायला साधी शाल.. त्या प्लॅस्टिकच्या कागदावर संपूर्ण शरीर कुठलं मावतंय? पण, जागा मिळेल तिथं, कसलीही तक्रार न करता माणसांनी पथाऱ्या टाकलेल्या.. डोकं आणि पाय एकाचवेळी झाकलेच जाऊ शकत नाहीत अशी ती शाल.. त्यामुळे, कित्येकांचे पायांचे तळवे आणि त्यांना पडलेल्या भेगा दिसत होत्या.

पहाटे साडेतीन च्या सुमारास भर पावसातच त्यांची आवरा-आवरीची लगबग सुरू झाली. ज्यांची साठी-पासष्ठी केव्हाच उलटून गेली आहे, अशी माणसं अशा वातावरणात रात्री साडेतीन वाजता रस्त्याच्या कडेला असलेल्या सार्वजनिक नळावर आंघोळ करतात, आणि तशीच थंडीनं गारठत पहाटे दर्शनाच्या रांगेत जाऊन उभी राहतात. त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी आपण न बोललेलंच बरं. कारण, मी पाहिलेल्या अशा व्यक्तींपैकी काही जण पंचवीस-पंचवीस एकर शेतीचे मालक होते. त्यांच्या अंगावरची तुळशीची माळ म्हणजे सोन्याइतकीच मौल्यवान. त्यामुळे, ‘जे आहे ते भगवंताचंच आहे’ अशाच धारणेनं ही माणसं जगतात. (आपण स्वत:ला पांढरपेशे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. मग त्या पेशाचे सगळे गुणावगुण चिकटतातच आपल्याला)

पण, वारकरी होणं सोपं नाही, हे त्यांच्याकडं पाहिलं की, लगेच समजतं. वारी करणं ही गोष्टच निराळी आहे. अगदी वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं तर, वारी हे २५ दिवसांचं, ६०० तासांचं काऊन्सेलिंग सेशनच आहे. आणि, मानसशास्त्राचा पुस्तकी अभ्यास अजिबात नसलेले अनेकजण केवळ स्वसंवादातून, स्वत:करिता उत्तम वेळ देऊन, स्वत:चे व इतरांचे प्रश्न सोडवतात, हा अनेक अभ्यासकांचा अनुभव आहे. 

कोणती गोष्ट मनाला लावून घ्यावी आणि कोणती गोष्ट फार विचार न करता सोडून द्यावी, हे या माणसांकडून खरोखर शिकण्यासारखं आहे. त्यांना महागड्या वस्तू, ब्रॅंडेड कपडे, प्राॅपर्टी, बॅंक बॅलन्स, खेळता पैसा, दागदागिने, परदेशी सहली यांतल्या एकाही गोष्टीत रस नसतो. दरवर्षी सगळा संसार महिन्याभरासाठी अन्य कुटुंबियांवर सोपवून माणसं निर्धास्तपणे वारीला येतात, म्हणजे त्यांची कुटुंबियांविषयीची मतं काय असतील याचा आपण विचार करायला हवा. “कुणी दिलाच दगा, तर माझा पांडुरंग बघून घेईल” असं अगदी बिनधास्त म्हणणं आपल्याला इतकं सहज जमेल का? 

काल रात्री एका काकांशी बोलत होतो. घराचा विषय निघाला. 

“आता पुतण्या म्हणाला, काका मी हीच जमीन कसणार. मला द्या. माझाही हक्क आहेच जमिनीवर. माझा वाटा मला द्या.” 

“मग?”

“माझा भाऊ होता तिथंच. पण तो काहीच बोलला नाही.”

“मग तुम्ही काय केलंत?”

“आता पुतण्याला नाही कसं म्हणायचं? अंगाखांद्यावर खेळवलेलं पोर. त्याचं मन कशाला मोडायचं? दिली जमीन.”

“मग आता?”

“उरलेली जमीन कमी कसाची आहे. पण, माझा पांडुरंग बघून घेईल सगळं. अहो, जमिनीपायी घर मोडलं तर हातात काय राहणार? त्यापेक्षा हे बरं.”

त्यांच्या घरात जे घडलं, तेच जर आपल्या घरात घडलं असतं तर मालमत्तेच्या वाटण्यांवरून किती रामायणं-महाभारतं झाली असती, असा विचार कदाचित माझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असावा. पण, त्यांच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत नव्हतं. 

“एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव अलगद काढून घेता आला पाहिजे” ते म्हणाले. मला काहीच सुचेना. मी अक्षरश: क्लिन बोल्ड झालो होतो. 

ते म्हणाले, “एखाद्या गोष्टीवरचा हक्क सहजपणे सोडून देता आला पाहिजे. आपल्याला तेच तर जमत नाही. म्हणूनच, प्रश्न आहे. तुमच्या पिढीला फार पुढं जायचंय, मोठं व्हायचंय, म्हणून तुम्ही दिवसरात्र पैसे कमावता. पण, बिल्डींगच्या १५ व्या मजल्यावरच्या घरात राहणाऱ्या माणसाला दारात आलेल्याला पाणी सुद्धा विचारावंसं वाटत नसेल तर, त्या पैशाचा काय उपयोग?”

“मग काय, पैसे कमवू नयेत का?”

“माझं तसं म्हणणं नाही. पण जीव माणसातच गुंतवला तर बरं असतं. पैशात गुंतवला तर माणसाला त्याच्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही.”

“पण माणसं फसवणार नाहीत कशावरून?” मी. 

“ पण, ती फसवतीलच हे कशावरून?”

मी पुन्हा सपशेल आडवा. 

“अरे, तुमच्या वयाच्या पोरांचं इथंच चुकतं. तुम्ही भावाला भाऊ मानत नाही, बहिणीला बहीण मानत नाही, आईवडीलांच्या मनाचा विचार करत नाही. तुम्ही कुणाचाच विचार केला नाहीत तर उद्या तुम्हाला तरी कोण विचारील? तुम्ही सगळ्या गोष्टीत फायदा-नुकसान बघत बसता. म्हणून तुम्हाला माणूस बघितला की आधी त्याचा संशयच येतो. मग कशाला राहतंय तुमचं मन स्वच्छ?”

शाळेतच न गेलेल्या त्या माणसाकडे इतकी वैचारिक सुस्पष्टता असेल, असं मला वाटलंच नव्हतं. 

“राजगिऱ्याचा लाडू खाणार का?” त्यांनी विचारलं. 

मी विचारात पडलो. रात्रीचे साडेतीन वाजून गेले होते, पोटात भूक तर उसळ्या मारत होती. पण एकदम हो कसं म्हणायचं, म्हणून मी नको म्हटलं. 

“हे बघा देवा. पुन्हा आहेच तुमच्या मनात संशय.” ते म्हणाले. 

“तुम्हाला वाटणारच, हा कोण कुठला माणूस आहे, हे ठाऊक नसताना याच्याकडून असं काही कसं काय घ्यायचं? आणि तेही रस्त्यावर बसून?” 

“तसं नाही हो.” मी म्हणालो खरा. पण खरोखरच माझ्या मनात तीच शंका आली होती. 

“यामुळेच माणसं कायम अस्वस्थ असतात. ती त्यांच्या मनातलं खरं काय ते सांगतच नाहीत. सगळा लपवालपवीचा कारभार..!”

आता यावर काय बोलणार? लाडू घेतला. लाडू खाऊन त्यांच्याचकडच्या बाटलीतलं पाणी प्यायलो. 

“चला माऊली, निघू का आता? पाऊस कमी झालाय.” मी म्हटलं. 

“थांबा देवा.” काका म्हणाले. पिशवी उघडली, आतून एक तुळशीची माळ काढली, माझ्या गळ्यात घातली. “देवा, पांडुरंगाला सोडू नका, तो तुम्हाला सोडणार नाही. पण त्याला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या कामाला लावू नका. माऊलींनी सुद्धा तसं कधी केलेलं नाही, स्वत:करता काही मागितलं नाही, हे विसरू नका. मोठं होण्याच्या इतकंही मागं लागू नका की, आपल्या माणसानं मारलेली हाक तुम्हाला ऐकू येणार नाही. तुम्ही माझ्या नातवाच्या वयाचे म्हणून बोललो, राग मानू नका..”

त्या काकांना नमस्कार करून निघालो. बाहेरचा पाऊस थांबलाय, पण मनातला मात्र सुरू झालाय.. आता तो थांबणं कठीण आहे !

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानस तज्ज्ञ, संचालक- प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे. 

मो 8905199711

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ बाजीप्रभूंचे बलिदान… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ बाजीप्रभूंचे बलिदान… सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆ प्रस्तुती – सौ.अंजली दिलीप गोखले ☆

सौ.अंजली दिलीप गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

१३ जुलै. तब्बल पावणे चारशे वर्षे होत आली. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला तोच हा दिवस. बाजीप्रभूंच्या बलिदानाने पावन खिंड पावन झाली, तोच हा दिवस.

बाजी, आजही तुम्ही तेथे लढता आहात का? आज ही तुमचे कान ५ तोफांचे आवाज ऐकण्यासाठी आतुर झाले आहेत का? आजही तुम्ही तुमच्या शूरवीर मावळ्यांच्या समवेत अभेद्य अशा खडकाप्रमाणे उभे आहात का?

बाजी, तुम्ही आपल्या स्वामी-भक्तिचा संदेश केवळ मराठी मनालाच नव्हे, महाराष्ट्रलाच नव्हे तर संपूर्ण जगताला देऊन अमर झाला आहात .आणि म्हणूनच प्रत्येक मराठी मनात, प्रत्येक मराठी ओठावर 

आजच्या दिवशी या ओळी आपसूक येत राहतील …. 

” गाऊ त्यांना आरती

     भारतभूची ही पावन धरती

        पृथ्वीचे अलंकार इथे घडती

           बलीदानाने तुमच्या

                पावन झाली

                  पावनखिंडीची धरती

        

 मराठी मने तुम्हाला

               अभिमानाने स्मरती

                    गाऊ त्यांना आरती .

                             गाऊ त्यांना आरती .

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆

सौ. राधिका (माजगांवकर) पंडित 

? मनमंजुषेतून ?

☆ अन्नपूर्णेची परिक्षा— ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित ☆ 

मी राधिका गोपीनाथ पंडित. माझी आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा होती. कुणाचेही आदरातिथ्य करून त्यांना खाऊ घालण्यात तिला खूप आनंद मिळायचा.”अतिथी देवो भव” हे तिचंही ब्रीदवाक्य होते आणि वाईटातून चांगले शोधणारे असे तिचे सकारात्मक विचार होते.

लहानपणी आपण किती बेजबाबदार असतो. आपल्या मुळे कोणाला त्रास होईल हे असलं काही डोक्यातच येत नसे. 

असाच एक माझ्या बेजबाबदार पणाचा गंमतीदार किस्सा आठवला…

मी शाळेत जाण्याच्या गडबडीत होते. श्रावणातला शनिवार होता. आमच्या समोरच श्री जोगेश्वरी मंदिर होते. मंदिरात एक गरीब वयोवृद्ध ब्राह्मण बसायचे. वयोमानानुसार खूप खूप थकले होते बिचारे. बायको नाही आणि मुलंबाळंही नाहीत, एकटा जीव सदाशिव होता. आई दररोज देवीच्या दर्शनाला जायची व तेथील गुरुजींना डाळ- तांदूळ दक्षिणा म्हणून द्यायची. 

एकदा शाळेत जाताना आईने मला त्या गुरुजींना “दूध, केळी घ्यायला आमच्या घरी बोलावले आहे” असा निरोप द्यायला सांगितले. 

धांदल, गडबड, धांदरटपणा आमच्या पाचवीला पूजलेला. मी धावत पळत जाऊन मंदिरातील गुरुजींना सांगितले, “गुरूजी, मी माजगावकरांची मुलगी.. ते समोर दिपमाळेजवळ घर आहे ना तिथे आम्ही रहातो. माझ्या आईने किनई तुम्हाला आज जेवायला बोलावलंय.”

गुरूजी एकदम खुशीने हसले आणि म्हणाले, “आई, माते जोगेश्वरी तुझी लीला अगाध आहे. आज उपासमार न होता क्षुधा शांतीची सोय झाली.”

ते काय पुटपुटले ते मला काहीच कळल नाही. शाळा गाठायची होती ना घंटेचा टोल पडायच्या आत, नाहीतर खा छडी. दप्तर आवरत मी धावतच सुटले. जवळच आप्पा बळवंत चौकात शाळा होती म्हणून बरं .

इकडे घरी वेगळाच प्रसंग घडत होता. जेवायच्या आधी आई कपडे वाळत टाकत होती. नंतर जेवायला बसणार होती. इतक्यात काठी टेकत गुरूजी आले. आत येतानाच ते म्हणाले, “माई, जेवायला वेळ आहे का अजून? अवकाश असेल तर मी जरा वेळाने येतो. मला घाई नाही. सावकाश होऊ द्या तुमचा स्वयंपाक”.

आई क्षणभर गांगरलीच. पण हुशार होती माझी आई. मी केलेल्या उपद्व्यापाची तिला तात्काळ कल्पना आली. मी ‘दूध-केळी घ्यायला या’ असं सांगायच्या ऐवजी ‘जेवायला या,’ असं परस्पर आमंत्रणच दिलं आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. 

तिने गुरुजींना विनंती केली, “गुरूजी, स्वयंपाकाला थोडा वेळ आहे तर..” 

गुरूजी तात्काळ म्हणाले, “अहो माई, सावकाश होऊ द्या. मला काही घाई नाही. मी असं करतो उरलेला जप मंदिरात जाऊन पूर्ण करतो. धावपळ करू नका. मी एक तासाने येतो, नाहीतरी आज उपवासच आहे मला. १२ नंतरच सोडेन म्हणतो.”

तरी आईने त्यांना दूध-केळी दिलेच आणि बजावले.. साडे बारा ला नक्की जेवायला या हं!. जेवायला उशीर झाला तर तुम्हाला पित्ताचा त्रास होईल”. आणि गुरूजींची पाठ वळताच आईने पदर बांधला व तिच्यातली अन्नपूर्णा जागी झाली. आईच्या सुगरणपणाची ती सत्वपरीक्षाच होती. त्या वेळी गॅस पण नव्ह ता.

आईने पटकन दोन स्टोव्ह पेटवले. बटाटे, वरण भाताचा कुकर लावला. कणीक भिजवली. तोपर्यंत दुसऱ्या स्टोव्ह वर शिरा करायला घेतला. कुरडई, पापड, भजी तळली. चटणी, लोणची होतीच. कोशिंबीर, भाजी, आमटी पण झाली. पाटपाणी, रांगोळी, पानापुढे विडा, दक्षिणा पण ओली करून ठेवली गेली आणि ती पोळ्या करायला बसली. हे सगळं उठत बसत भराभर चाललं होतं. कारण त्या वेळी उभ्याचा ओटा वगैरे नव्हता. 

“बसा नं जेवायला. माझ्या मुळे तुम्हाला मात्र जेवायला उशीर झाला.” बोलता बोलता पान वाढलं गेलं. गरमागरम वरणभात, लिंबू, तूप, भजी, कुरडई, पापड, केशरी शिरा, गरम मऊसूत पोळ्यांनी सजलेलं भरगच्च ताट बघून गुरूजी प्रसन्न- प्रसन्न हसले. भुकेले होते बिचारे.

आग्रहाचं सुग्रास जेवण जेऊन तृप्तीची ढेकर देत ते म्हणाले, “खूप छान, अतिशय रूचकर, च विष्ट होतं जेवण. खरं सांगू!माई आमची मंडळी गेल्या पासून इतकं चवदार भोजन चाखायलाच मिळालं नव्हतं हो मला. अन्नदात्री सुखी भव!!” तृप्त मनाने विडा, दक्षिणा घेवून ते सावकाश जीना उतरून गेले पण.

आमच्या घराजवळ दोन दगडी दिपमाळ भक्कमपणे उभ्या होत्या. अजूनही आहेत म्हणा. तिथे गुरूजी थबकले. मागे वळून त्यांनी हात जोडले आणि वास्तुला हात जोडून आमच्या घराकडे बघून पुन्हापुन्हा आशिर्वाद दिला त्यांनी.  इकडे आईच्या चेहऱ्यावरून समाधान ओसंडून वाहत होत. तिनेही हात जोडले आणि म्हणाली “अतिथी देवो भव:”.

त्या दिवशी माझी शाळा लवकर सुटली. जिन्यातच मला  माझ्या मोठ्या बहिणीने  लीलाने गाठले.आणि मी केलेल्या गोंधळाचा पाढा वाचून ‘तुझ्या मुळे बघ आईला केवढा त्रास झाला,’ असं म्हणून भरपूर झापलं.

मी तर रडवेली झाले. आता दोनच उपाय… सौ. आईचे पाय धरायचे, नाहीतर कांगावा करून भोकाड पसरायचे. अखेर मी आईची क्षमा मागितली. 

माझ्या क्षमाशील आईने मुसमुसणाऱ्या मला जवळ घेतलं आणि म्हणाली…. “अगं गुरूजींना तू जेवायला सांगितलेस ना ते बरंच झालं. आज अनायासे ब्राह्मण जेवणाचे पुण्य मिळाले. प्रत्येक दाण्यावर देवाने खाणाऱ्याचे नाव लिहीलेले असते. ज्याचा शेअर असतो तो येवून घेवून जातो. आज अवचित अतिथी देव आले आपल्याकडे आणि माझ्या घरादाराला, तुम्हा मुलांना तृप्त मनाने आशिर्वाद देवुन गेले.”

तर, असा सकारात्मक विचारांचा धडा आईकडून आम्हाला मिळाला. अशी होती आमची आई. दुसरी श्यामची आईच जणू काही..

© सौ. राधिका (माजगांवकर) पंडित

पुणे

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ दोन अक्षरी मंत्र… – लेखिका : सुश्री मंगला खानोलकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

अणुशक्ती नगर मधल्या माझ्या एका मैत्रिणीला दोन्ही मुलगेच होते.आम्हा सर्वांची मुलं एकत्रच लहानाची मोठी झाली. जेव्हा आमची मुलं काॅॅलेजातही जायला लागली तेव्हा आमच्या group मधली  ती मैत्रीण आम्हाला म्हणाली की ‘ मला दोन्ही मुलगेच आहेत ग. कधीकधी ना मला, आज ना उद्या त्यांची लग्नं होऊन

घरी सुना येतील या विचाराची भीतीच वाटते. काय माहीत मला कशा सुना मिळतील….? हल्लीच्या मुलींच्या इतक्या गोष्टी ऐकतो ना आपण…. !’

आम्हाला तर तिचं बोलणं ऐकून हसूच आलं.आम्ही तिघी मैत्रिणी दोन दोन मुलीवाल्या होतो.आम्ही

म्हटलं की ‘ आम्ही मुलींच्या आयांनी घाबरायचं , त्यांना घर कसं मिळेल.. ? सासरची माणसं कशी असतील..म्हणून. तर तूच काय घाबरते आहेस… ?’ मग आम्ही सर्वांंनी तिची समजूतही 

घातली आणि चेष्टाही केली. पण तिच्या मनात या विचाराने घर केलेलं होतंच. 

एकदा आम्हाला आमच्या काॅलनीतल्या एक ओळखीच्या बाई भेटल्या.त्या आमच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या.त्यांना पण दोन्ही मुलगेच होते आणि त्यांची लग्नं झालेली होती.

त्यांच्याशी गप्पा मारताना माझी मैत्रीण त्यांना म्हणाली, ‘तुम्हाला दोन सुना आहेत. तुम्हाला टेन्शन नाही का येत त्यांच्याशी बोलताना किंंवा वागताना… ?’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘ नाही हो. या मुली तशा चांगल्या असतात. फक्त त्यांच्या बाबतीत आपण काही पथ्यं पाळली ना , की  काहीच  प्रॉब्लेम येत नाही.मग सुनांचे आपल्याशी संबंध कायम गोडीगुलाबीचेच राहातात. 

माझ्या मुलांची लग्नं ठरल्यानंतर लगेेचच, ‘घरात सून आली की तिच्याशी कसं वागायचं ‘ते मी ठरवून टाकलेलं होतं.

– – पहिली गोष्ट म्हणजे तिला कधीही कुठल्याही बाबतीत टोकायचं नाही…मुुळात तिच्याकडून फार 

अपेक्षाच ठेवायच्या नाहीत..!

आता समजा मुलगा आणि सून अचानक बाहेर जायला निघाले, तर ‘कुठे जाता? कधी येणार.. ?जेवायला  असणार का….. ?’ यातलं काहीही त्या दोघांना विचारायचं नाही… !

कधी मुलाने येऊन सांगितलं की ‘ ‘आज ‘ही’ office मधून येताना परस्पर माहेरी जाणार आहे राहायला..’ 

तर त्यावर ,’ किती तारखेला परत येणार… ?’असा प्रश्न विचारायचा नाही.किंवा ‘ तिनेच का नाही मला

सांगितलं.. ? तू मध्यस्थ कशाला हवास.. ? मी काय तिला नको म्हणणार होते का..?असलं 

काहीही बोलायचं नाही. फक्त ”बरं !” एवढंच म्हणायचं.

जर मुलगा सून खरेदी करून आले आणि मुलगा म्हणाला की दुकानात नेमका सेल लागलेला होता.म्हणून हिने चपलांचे तीन जोड घेतले. तर, ‘चपलांचे चार जोड आधीचेच घरात पडले आहेत.आता हे कशाला हवे होते? आम्ही तर चपलांचा एकच जोड तुटेपर्यंत वापरायचो..!’ असं पुटपुटायचं सुद्धा नाही..काय

म्हणायचं.. ? ” हो का … बरं… !”

कधी सून म्हणाली की,’आई , आज माझ्या 5- 6 मैत्रिणी येणार आहेेत घरी. तेव्हा तुम्हालाआणि 

बाबांंना आज संध्याकाळी TV वरच्या संंध्याकाळच्या serials नाही बघता येणार. मग तुमच्या खोलीतच बसून राहाण्यापेक्षा संध्याकाळी तुम्ही थोडावेळ गार्डनमधे जाल का..?म्हणजे तुम्हालाही कंटाळा येणार नाही आणि माझ्या मैत्रिणींनाही मोकळं वाटेल.’तर  ह्यावर आपण काय म्हणायचं…..? ” बरं…!”

समजा त्या दोघांचा अचानक बाहेेर जेवायला जायचा बेत ठरला तर मुलगाच सांगेल तुम्हाला.’आई 

आम्ही बाहेर जातोय.बाहेरून जेवूनच येऊ. तर ‘ अरे मग आधी सांगायला काय झालं होतं… ? बाईला चार पोळ्या कमीच करायला सांगितलं असतं ना ? आता सगळं अन्न उरणार. आणि उद्या आम्हाला सगळं शिळं खावं लागणार… !’ अशी कुरकुर करायची का…?छे …छे… ! 

मग आपण काय म्हणायचं..? ” बरं !”

आजकाल तर अगदी दिवसाआड Amazon मधून खरेदी केलेली parcels घरी येत असतात. मुलं

दिवसभर घरात नसतातच.तेव्हा आपणच ती घेऊन ठेवतो.पण ती अजिबात उघडायची नाहीत. संध्याकाळी सून घरी आल्यावर, कपाळावर अगदी एकही आठी न घालता, शांतपणे ‘ हे तुझं काय काय मागवलेलं आलंय बरं का ग ‘  असं म्हणून सगळं तिच्या ताब्यात द्यायचं.’एवढं काय काय मागवलं आहेस… ?’ असं ही विचारायला जायचं नाही.. आणि तिने दाखवलंच तर ”वा.. छान.. !”‘ म्हणायला देखील विसरायचं नाही.

अगदी, आपल्याला नातू किंवा नात झाल्यानंतर, पाच सहा महीन्यांनी कामावर हजर होताना जर सून म्हणाली की ‘आता रोज office ला जाताना मी बाळाला माझ्या आईकडेच सोडून जात  जाईन आणि संध्याकाळी येताना घेऊन येत जाईन.’ तर अशा वेळी, तुुमच्यात अगदी बाळाला सांंभाळायची आवड आणि ताकद दोन्ही असली तरीदेखील फक्त एकच  दोन अक्षरी मंत्र उच्चारायचा …! 

सांंगा कोणता….? ” बsssरं…! “

‘फक्त हा एकच ‘मंत्र’ तुम्ही सदैव जपत राहिलात, तर मग तुमचं मुलाशी नि सुनेशी असलेलं नातं अगदी निश्चित छान राहील….!’

….खरंतर हा मंत्र मुलांच्या आणि मुलींच्या, दोन्ही आयांनी पक्का लक्षात ठेवणं आवश्यक आहे.

एकूणच मुलांच्या संसारात कोणतीच लुडबूड करायची नाही. की त्यांना सल्ले द्यायलाही जायचं

 नाही…मग कित्ती सोपं होऊन जाईल ना सगळं….?

मात्र कायम हे लक्षात असू दे की कधीकधी,अगदी सोप्प्या वाटणा-या गोष्टीच सगळ्यात कठीण असतात

लेखिका : सुश्री मंगला खानोलकर

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रदक्षिणा… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

??

☆ प्रदक्षिणा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

यशला तर खरं म्हणजे इथे येण्याची इच्छाच नव्हती.काय तर म्हणे..हे गुरुजी तुला चांगला मार्ग दाखवतील.त्यांच्याकडे प्रत्येक समस्येवर उपाय आहे.तसं म्हटलं तर समस्या अशी नव्हतीच.तीशी उलटुन गेली.. अजुनही यशचं लग्न जमत नाही..ही बाबांच्या मते समस्या होती..यशच्या द्रुष्टीने नव्हती.

बाबांचा खुपचं आग्रह झाला म्हणून यश आता शिखरे गुरुजींकडे आला होता.बरोबर आणलेली कुंडली त्याने गुरुजींच्या समोर ठेवली.गुरुजींनी ती कुंडली बघितली. पंचांग उघडलं.. बाजुला असलेल्या पाटीवर पेन्सिलने काही तरी आकडेमोड केली..बराच वेळ विचार केल्यावर त्यांनी यशला सांगितलं..

“तुमच्या कॉलनीत गजानन महाराजांचं मंदिर आहे.तु गुरुवारी त्या मंदिरात जायचं.. दुर्वा फुलं वहायचं.. आणि अकरा प्रदक्षिणा घालायच्या.बघु..कसं लग्न जमत नाही ते.”

यशला ते काही पटलं नाही.त्याने तसं सांगितलं सुध्दा.गजानन महाराजांना.. किंवा कोणत्याही देवाला  प्रदक्षिणा घातल्याने नक्की काय मिळते? पण मग गुरुजींनी त्याला समजावून सांगितले. त्यामुळे आपण देवाच्या सान्निध्यात अधिक काळ रहातो.एका जागी बसुन चिंतन करणे..हा एक मार्ग झाला.आणि प्रदक्षिणा घालणे हा दुसरा.प्रदक्षिणा घालण्याने एक गोष्ट मात्र हमखास होते..ती म्हणजे चालण्याचा व्यायाम.

मग शिखरे गुरुजींनी त्याला वेगवेगळ्या प्रदक्षिणांबद्द्ल माहिती द्यायला सुरुवात केली.मंदिर लहान असेल तर कमी वेळात प्रदक्षिणा होतात..मोठे असेल तर जास्त वेळ लागतो. त्रिंबकेश्वरला ब्रम्हगिरी पर्वत आहे.हा पर्वत म्हणजे साक्षात शिवाचे रुप.श्रावण महिन्यात या ब्रम्हगिरीलाच प्रदक्षिणा घालण्यासाठी लाखो भाविक येतात.ही प्रदक्षिणा पुर्ण करण्यासाठी साधारणपणे एक दिवस लागतोच.श्रावणसरी अंगावर झेलत..ओम नमः शिवाय चा जप करत शेतातून,नदितुन वाट काढत ही प्रदक्षिणा पुर्ण केली जाते. या प्रदक्षिणेने धार्मिक पुण्य किती मिळते हा वेगळा भाग.एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात रहाण्याचा आनंद मिळतो तो खरा महत्वाचा.

देवाला आपल्या उजव्या हाताला ठेऊन फेरी मारणं म्हणजे प्रदक्षिणा.याला कोणी फेरी म्हणतात..कोणी परिक्रमा म्हणतात..तर कोणी उजवी घालणं असंही म्हणतात.प्रदक्षिणा का घालायची?त्यांचं काय महत्त्व आहे? हे विषद करणारा एक संस्कृत श्लोक आहे.

यानि कानि च पापानी

जन्मांतर कृतानी च

तानि सर्वाणि नश्यन्तु 

प्रदक्षिणे पदे पदे.

म्हणजे..

आमच्याकडुन कळत नकळत झालेली.. आणि पुर्व जन्मातील सर्व पापे या प्रदक्षिणा करता करता नष्ट होऊन जावो.

प्रदक्षिणा म्हटलं की आठवते ती नर्मदा परिक्रमा. एखाद्या नदीला संपुर्ण प्रदक्षिणा घालण्याची कल्पनाच अभिनव.मेघदुत या महाकाव्यात कवी कालिदासाने नर्मदा नदीचे वर्णन खुपच सुंदर केले आहे.तिची वळणे.. मध्ये मध्ये येणारे छोटे मोठे डोंगर ‌.काठावर डुलणारी उंच उंच झाडे.. घनदाट अरण्ये हे सगळंच परिक्रमा करणार्यांना आकर्षुन घेतं.नदीच्या किनार्यावर असलेली गावे..मंदिरे..बदलत जाणारे समाज जीवन या सर्वांच्या सोबतीने वाटचाल करणं हा एक रोमांचकारी अनुभव आहे.

अलीकडे वाहनात बसुन नर्मदा परिक्रमा करण्याचं प्रमाण वाढलं आहे.पण शास्त्रशुद्ध पद्धतीने नर्मदा परिक्रमा करायची असेल तर त्यासाठी तीन वर्ष.. तीन महिने.. तेरा दिवसांचा कालावधी सांगितला आहे. ‌परीक्रमेला बहुधा ओंकारेश्वर येथुन सुरुवात केली जाते.पण तसा नियम नाही.बाकी नियम मात्र भरपूर आहे.परीक्रमे दरम्यान नर्मदा नदीचे पात्र ओलांडून जाता येत नाही.सोबत फारसं सामान नसावं.सदावर्तात जेवण करावं.नाही तर पाच घरी भिक्षा मागावी.त्यात मिळालेल्या शिधा घेऊन तो रांधावा.मिळेल ते पाणी प्यावं.आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सतत ‘ओम नर्मदे हर..’ हा मंत्र जपावा.

नर्मदा परिक्रमा केल्यावर तेथील अनुभव अनेक जण शब्दबद्ध करतात.ते सर्वच वाचनीय असतात.जगन्नाथ कुंटे यांनी अनेक वेळा नर्मदा परिक्रमा केली.’नर्मदे हर हर’.. आणि ‘साधनामस्त’ या पुस्तकांमधून ते आपल्याला नर्मदा परिक्रमेच्या अद्भुत विश्वात घेऊन जातात.

यशला या निमित्ताने बरीच माहिती मिळाली.गुरुजींचं म्हणणं त्यांना पटलं.दर गुरुवारी तो मंदिरात जाऊ लागला.मनोभावे प्रदक्षिणा घालु  लागला.मधल्या काळात त्यानं गजानन विजय ग्रंथाचे पारायण ही केलं.

आणि खरोखरच यशच्या सेवेला यश मिळालं. आज यशचा लग्न समारंभ साजरा होत होता.आताही तो प्रदक्षिणा घालत होता..ती म्हणजे सप्तपदी.हो..ती पण एक प्रदक्षिणाच..प्रज्वलित अग्नीभोवती..देवां.. ब्राम्हणांच्या साक्षीने घातलेल्या या सात फेर्यानंतर वैवाहिक जीवनाचा प्रारंभ होतो.गजानन महाराजांना घातलेल्या प्रदक्षिणेचं फळ आज त्याला सप्तपदीच्या प्रदक्षिणेच्या रुपाने मिळालं होतं.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ३ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

शाळा नंबर १२

रॉबर्ट ब्रेक एकदा म्हणाला होता, 

“I FEEL I WANT TO GO BACK IN TIME,NOT TO CHANGE THINGS BUT TO FEEL A COUPLE OF THINGS TWICE…

I WISH I COULD GO BACK TO SCHOOL NOT TO BECOME A CHILD BUT TO SPEND  MORE TIME WITH THOSE FRIENDS,I NEVER MET AFTER SCHOOL.”

माझं अगदी असंच काहीसं झालेलं आहे.

आम्ही मुलं नगरपालिकेच्या शाळेत शिकलो.  म्हणजे माझं प्राथमिक पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत झालं. माझ्या शाळेचे नाव शाळा नंबर १२.  घरापासून अगदी जवळच आमची शाळा होती.  माझ्या काही बालमैत्रिणी शाळा नंबर चार मध्ये जात तर मुलगे दगडी शाळेत जात. आमची शाळा फक्त मुलींची होती. शाळेची अशी नावं आठवली तरी आता गंमत वाटते. लिटिल मिलेनियम स्कूल, ब्लूमिंग पेटल्स, किडझी. स्माईल अशी आकर्षक नावं असलेल्या शाळा तेव्हा नव्हत्याच.  नर्सरी, प्लेग्रुप्स यांची ओळखही नव्हती म्हणजे शिशुविहार, बालक मंदिर वगैरे सारखे काही खासगी शैक्षणिक समूह होते पण आमच्या शिक्षणाची सुरुवात मात्र शाळा नंबर १२ या नगरपालिकेच्या शाळेपासूनच झाली.

त्यावेळी ठाण्यात एक कॉन्व्हेंट स्कूल होतं. सेंट जॉन द बाप्टीस्ट हायस्कूल पण मला वाटतं आमची पालक मंडळी मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान बाळगणारी होती.  आपल्या मुलांचं शिक्षण हे मातृभाषेतूनच झालं पाहिजे याच विचारांची होती.  कदाचित आपल्या मुलांना एखाद्या मिशनरी इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये का पाठवू नये असा विचारही त्यांच्या मनाला तेव्हा शिवला नसेल आणि आमच्या बालमनावरही नगरपालिकांच्या शाळांतून मिळणारं  शिक्षण हेच खरं शिक्षण असा काहीतरी विचार पक्का केला असावा आणि त्यावेळी आमचा जो मराठी माणसांचा एक गट होता त्यातली सगळीच मुलं मराठी आणि नगरपालिकांच्या शाळेतून शिकत होती. त्यामुळे याहून काहीतरी उच्च, दर्जेदार असू शकतं हा विचार त्यावेळेच्या मुलांच्या मनात कशाला येईल?  मात्र काही अमराठी मुलं आमच्या परिसरात होती आणि ती मात्र कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. याचा परिणाम असा झाला की   नकळतच इंग्लिश माध्यमातून शिकणारी मुलं आणि मराठी माध्यमातून शिकणारी  मुलं यांच्यात संस्कृतीच्या  भिंती त्यावेळी निर्माण झाल्या. या भिंती थेट महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत टिकल्या.

टेंभी नाक्यावर टाऊन हॉल समोर बारा नंबर शाळेची इमारत होती. ब्रिटिश कालीन दगडी इमारत होती ती! शाळेला मागचं— पुढचं अशी दोन प्रवेशद्वारे होती. मागच्या बाजूला पटांगण होतं आणि ते रस्त्याला लागून होतं पुढचे प्रवेशद्वार हे मुख्य द्वार होते आणि नऊ दहा लांबलचक अशा दगडी पायऱ्या चढून आमचा शाळेच्या मधल्या आवारात प्रवेश व्हायचा आणि त्याच्या डाव्या उजव्या बाजूला वर्ग होते.

शाळेच्या समोर चाळ वजा घरे होती. अडचणीची, खडबडीत बोळातली आणि अरुंद घरात दाटीवाटीने राहणारी, खालून पाणी भरणारी, भाजीपाला किराणाच्या पिशव्या सांभाळणारी, सायकलवरून कामाच्या ठिकाणी जाणारी, जीवनाची दहा टोकं एकमेकांशी जुळवण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारी माणसं होती ती. वयाच्या सहाव्या वर्षापासून डोक्यात बसलेलं हे जीवन आज इतकी वर्ष झाली, स्वतःच्याच आयुष्यात इतकी स्थित्यंतरे झाली. एका उजळ वाटेवरून प्रवास होत गेला तरीही ही चित्रं पुसली गेली नाहीत.

बारा नंबर शाळेच्या त्या दगडी पायऱ्यांवर दहा मिनिटाच्या आणि अर्ध्या तासाच्या सुट्टीत बालमैत्रिणींसोबत केलेल्या गप्पा,  गायलेली बडबड गीते आणि चवीने चोखत खाल्लेली आंबट चिंबट चिंचा बोरं, एकमेकांना दिलेली सोनचाफ्याची फुलं आजही आठवतात. 

एक छोटसं दफ्तर… शाळेत जाताना आईच  दफ्तर भरायची.  त्यात एखादं पाठ्यपुस्तक, काळी दगडी पाटी आणि पेन्सिल आणि मधल्या सुट्टीत खायचा डबा एवढेच सामान शाळेसाठी आम्हाला पुरायचं.  आमच्या शालेय जीवनाचं नातं होतं पाटी— पेन्सिल, खडू —फळा आणि बुटके लांबलचक वर्गात बसायचे बाक यांच्याशी.

एकेका वर्गाच्या अ ब क ड अशा तुकड्या असायच्या.”अ तुकडीतली  मुलं हुशार आणि “ड” तुकडीतली मुलं ढ!

 “ढ” हे अक्षर मला तेव्हा फार त्रासदायकच वाटायचं कारण “ढ” या अक्षराला माझ्या मते फारशी चांगली पार्श्वभूमी नसताना माझे आडनाव मात्र ढगे  होतं.

एक दिवस वर्णमाला शिकत असताना बाई सांगत होत्या “क कमळातला …

“ख”  खटार्‍यातला ..

“ग”  गडूतला ..

असं करत करत त्या “ढ”जवळ आल्या आणि माझ्या शेजारी बसलेली रत्ना पेडणेकर नावाची मुलगी मोठ्याने म्हणाली “ढ” ढगेतला.

सगळा बालचमु  हसला.  माझे डोळे पाण्याने भरले.

बाईंनी मात्र रत्नाला हात पुढे करायला सांगितला आणि तिच्या हातावर सपकन छडी मारली.  तिचेही डोळे गळू लागले आणि त्याचेही मला फार वाईट वाटले. पण त्यानंतर  मी आणि रत्ना एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी झालो हे नवल नाही का?  यालाच मी आमचे बालविश्व म्हणेन.

मात्र त्यादिवशी शाळेतून घरी परतल्यावर मी— संध्याकाळी पप्पा ऑफिसमधून घरी आल्यावर त्यांना पहिला प्रश्न विचारला होता,

“ आपण आपलं आडनाव बदलू शकतो का?”

त्यावेळी पपा मिस्कीलपणे म्हणाले होते..

“म्हैसधुणे,धटींगण,झोटींग असे आपले  आडनाव असते तर..”

शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे? मला आजही असं वाटतं नावात खूप काही असतं. सहज आठवलं म्हणून सांगते वरपरीक्षेच्या त्या अप्रिय काळात माझ्या कन्येने “टकले” नावाच्या सर्वगुणसंपन्र स्थळाला केवळ आडनावापायी नकार दिला होता.असो..

रत्ना  पेडणेकर ही ठाण्यातल्या एका मोठ्या कलाकाराची मुलगी होती. सिव्हील हॉस्पिटलच्या समोर त्यांचा सुंदर बंगला होता.  गणपती उत्सवात तिचे वडील गणेश मूर्ती समोर अतिशय कलात्मक असे पौराणिक  कथांवर आधारित  देखावे  उभे करायचे आणि ठाण्यातली सगळी मंडळी पेडणेकर यांचा गणपती बघण्यासाठी त्यांच्या बंगल्यासमोर प्रचंड गर्दी करायचे.

अशा घरातली ही रत्ना  शाळा नंबर १२ मध्ये टांग्याने यायची. सुरेख इस्त्री केलेले तिचे फ्रॉक्स असायचे. तिच्या वडिलांचा ठाण्यात दबदबा होता.  हे सांगण्याचे कारण इतकंच की असे असतानाही तिने केलेल्या एका किरकोळ चुकीलाही बाईंनी थोडेसे हिंसक शासन केले पण तिच्या वडिलांनी शाळेत येऊन कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. एकदा आपलं मूल शाळेत गेलं की ते शिक्षकांचं. तिथे हस्तक्षेप नसायचा हे महत्त्वाचं. त्यामुळे घर, शाळा, आजुबाजूची वस्ती ही सारीच आमची संस्कार मंदिरे होती. आम्ही सारे असे घडलो. नकळत, विना तक्रार.

१२ ते ५ अशी शाळेची वेळ होती. एक दहा मिनिटांची सुट्टी आणि एक डबा खायची सुट्टी.

सगळे वर्ग एका शेजारी एक. मध्ये भिंत नाही फक्त एक लाकडी दुभाजक असायचा.  वर्ग चालू असताना शेजारच्या वर्गातल्या बाईंचा आवाज आणि शिकवणंही ऐकू यायचं.  कुठे गणितातले पाढे, कुठे कविता पठण, कुठे उत्तर दक्षिण दिशांचा अभ्यास, कुठे बाराखड्या, तोंडी गणितं आणि अशा सगळ्या खिचडी अभ्यासातून आम्ही एकाग्र चित्ताने शिकत होतो.

“आईने आणssले चाssर पेरू.

माधवने दोन चोरून खाल्ले. किती उरलेsss?

आम्ही आमच्या हाताची चार बालबोटं उघडायचो, दोन दुमडायचो आणि एक साथ उत्तर द्यायचचो

दोssन.

मग बाई म्हणायच्या, “शाब्बास!”

आयुष्यातल्या बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार या साऱ्यांची सुरुवात जणू काही अदृश्यपणे या शाळा नंबर १२ पासूनच सुरू झाली.

आज नातीचा अभ्यास घेताना लॅपटॉप,टॅब्लेट(यास मी अधुनिक युगातली पाटी असेच म्हणते.) त्यावरचे अभ्यासक्रम, उत्तरे देण्याची पद्धत, आकर्षक पुस्तके, त्यातील रंगीत चित्रे! एकंदरच दृक् श्राव्य अभ्यासाचं बदलतं, नवं,स्वरूप बघताना मला माझी बारा नंबरची शाळा हमखास आठवते.

पण इथेच आम्ही शिकलो, वाढलो घडलो.

आजही नजरेसमोर ते फुलपाखरू बागडतं,

“फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू ..”

नाही तर 

“देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश सूर्य देतो ।”

ये ग ये ग सरी 

माझे मडके भरी 

सर आली धावून

मडके गेले वाहून 

 

सरसर गोविंदा येतो 

मजवरी गुलाल फेकि.तो…

 

झिम पोरी झिम कपाळाचा भीम

भीम गेला फुटून

पोरी आल्या उठून..

 

अडम तडम तडतड बाजा

उक्का तिक्का लेशमास

करवंद डाळिंब फुल्ला…

 

लहान माझी बाहुली

मोठी तिची सावली…

अशा  सुंदर गाण्यातून खरोखरच आमचं बालपण हसलं, बागडलं.

मला जर आज कोणी प्रश्न विचारला,” मराठी भाषेनं तुला काय दिलं तर मी नक्की सांगेन माझ्या  मराठी भाषेने मला असं सुंदर काव्यमय बालपण दिलं.”

आजही त्या शाळेतल्या दफ्तराची मला आठवण येते.  माझं दफ्तर आणि माझी आई यांच्याशी माझं एक सुंदर, भावनिक अतूट नातं आहे.

आठवणीच्या पेटीत

एक दफ्तर होतं

एक पाटी होती

दफ्तर जागोजागी

ऊसवलं होतं

पाटीही फुटली होती.

पण पाटीवरची अक्षरं

नव्हती पुसली.

कळायला लागेपर्यंत

आईने रोज

पाटी दफ्तर भरलं

वह्या पुस्तकं,खडु पेन्सीली..

आज आई नाही

पण दफ्तर आहे

पाटी फुटली

तरी अक्षरे आहेत

त्या जीर्ण दफ्तरावर आता

माझाच सुरकुतलेला

हात फिरवताना वाटतं,

हेच तर आईनं

दिलेलं संचीत.

वेळोवेळी तिने

हव्या असलेल्या गोष्टी

आत भरल्या.

नको असलेल्या काढल्या.

हळुच….ऊसवलेल्या ,

दफ्तरात डोकावून पाह्यलं,

त्यात नव्हते मानअपमान,

दु:खं ,निराशा, राग,

होतं फक्त समाधान,

आनंद….तृप्ती!!

एकेका अक्षरात ,

जपून ठेवलेला…

मानवतेचा ओलावा….

 

खरंच या साऱ्या आठवणींच्या लाटेवर मी तरंगतच राहिले की… आता थोडा ब्रेक घेऊया.

 

शाळेची घंटा घणघण वाजली

दहा मिनिटांची सुट्टी झाली…

–  क्रमशः भाग ३. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print