प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

??

☆ जातं… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

मी जातं…… जातीपातीतील नव्हे ! खूपच अनादी कालीन ! माझ्याशिवाय ह्या मानव जातीची भूक भागत नाही ! तसा माझा ह्या पृथ्वीवर जन्म केव्हा झाला ते सांगता येत नाही. गरज ही शोधाची जननीच ! त्यामुळेच माझा शोध कोणत्या अवलीयाने लावला ते ही अज्ञात ! 

कदाचित रामायण, महाभारत असेल किंवा त्यापुढेही माझा जन्म झाला असेल, नक्की सांगता येत नाही एवढं खर ! मानवी भूक निर्माण झाली व गहू बाजरी ज्वारी निर्माण झाली तेंव्हा पासूनच मी आहे ! पण माझं अस्तित्व अजुनी टिकून आहे, व पुढेही टिकून राहील ! 

मी मुळातच दणकट व खंबीर ! कारण मी दगडातून निर्माण झाले. माझं व स्त्रीच सख्य हे कायमच, स्त्री माझी बाल मैत्रीण ! तिच्या वाटेला आलेलं सुख दुःख मी स्वतः पाहिलंय ! तिच्या वेदना मी जाणल्या !

माझी घरघर व तिच्या प्रपंच्याची घरघर ही भल्या पहाटेच होत असे ! तीन मला ब्राम्ह्य मुहूर्तावर जाग करण्याची सवय लावली ! तिच्या खड्या आवाजातील ओव्या व माझी घरघर एकदमच एकावेळी चालू होतं असत. व आमच्या आवाजाने मग इतर लोक उठत असत.

माझी सुख दुःखाची दोन पाती (पाळ ) मी स्त्रीच्या गळ्यात बांधली ! हे कमी पडू नये म्हणून माझ्या वरच्या पाळीच्या कडेला गोलसर खळीत वेदनेचा दांडा बसवला गेला ! (कदाचित तो त्रिगुणात्मक असावा ) जेणेकरून तो दांडा हातात धरून मला गोलगोल फिरवता येईल अशी सोय पण केली ! खळी ही जणू माझ्या गालावरचीच खळी ! कायमची ! माझा दांडा व तिच्या वेदना ह्या केव्हा एकरूप झाल्या ते कळलेच नाही ! पाळ बाजूला केल तरी, तो वेदनेचा दांडा तसाच ठेवला जातो.

माझ्या खालच्या पाळ्याला मात्र मधोमध एक सुख दुःखाना एकत्र ठेवणारा, प्रेमाचा मजबूत खिळा आहे ! जेणेकरून दोन्ही सुख दुःखाची पाळी एकत्र नांदतील ! 

मी म्हटलं तर वर्तुळाकार ! म्हटलं तर शून्य ! 360 अंशातून कायम फिरते ! व माझ्या भोवती तो वेदनेचा दांडा पण फिरतोच ! माझ्यात व सृष्टीत काय फरक आहे ! ती पण गोल फिरत असतेच की सूर्यभोवती ! काहीवेळा वापर नसल्यास शून्या सारखी हरवते ! शून्यात टक लावून बसते ! 

माझ्या वरच्या पाळीत माझं ऊर्ध्वमुखी तोंड ! जे मुखात पडेल ते गोड मानून घेते ! कधी गहू, कधी ज्वारी, कधी कडवट बाजरी, कधी शुभ्र तांदुळ ! येणाऱ्या घासाला पवित्र मानून, त्याचे चर्वण करायचे व त्याचे कठीण अस्तित्व घालून त्याला सुता सारखे मऊ करायचे ! व बाहेर त्याला धुतल्या तांदळासारखा शुद्ध करून पाठवायचे ! 

जो पर्यंत संसार आहे, प्रपंच आहे, तोपर्यंत माझं हे काम असच अव्याहत पणे चालू असणार ! संसार म्हटलं की भूक आलीच ! ह्या संसारात मोक्ष मिळे पर्यंत हेच माझं अखंड व्रत ! व्वा काय जन्म दिलास देवा ! माझ्या ह्या भाळी दोन सुख दुःखाच्या पाळी, ऊर्ध्वमुख वर वेदनेचा दांडा ! तो ही शून्यात फिरणारा ! 

कित्येक दाणे मुखात येतात, कित्येक सुपात आहेत, कित्येक शुभ्र होऊन बाहेर पडले ! मी मात्र तशीच फिरत आहे. वरच्या पाळीत मात्र तू विविध नक्षी कोरलीस पण खालच्या पाळीच काय ? तिला मात्र छन्निचे घाव सोसावे लागतात ! 

माझं कालपरत्वे रूप बदललं ! यांत्रिकी झालं ! कोणी मिक्सर केलं म्हणून काय झालं ? माझ्या पाळ्या बदलाव्या लागल्या तरी, मी अजुनी वर्तुळातच फिरते ! ती कायमची येणार दळण दळत !! 

© प्रा डॉ. जी आर (प्रवीण) जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments