मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ कैकयी… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

रामायणातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे कैकयी. तिच्यामुळेच रामायण घडले. वनवासात जाण्यापूर्वी राम  हा इतर राजांप्रमाणे फक्त रामराजा होता. पण रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपवून जेव्हा तो अयोध्येस परत आला तेव्हा तो” प्रभू रामचंद्र” झाला. शुद्ध परात्पर राजाराम वगैरे  सर्व विशेषणे त्याला त्यावेळेला लागली. आणि यासाठी कैकयीच  कारणीभूत आहे.

ती केकय देशाच्या अश्वपती राजाची कन्या होती. दशरथा पासून तिला भरत नावाचा पुत्र झाला. आपल्या मुलाला अयोध्येचे राज्य मिळावे म्हणून तिने सावत्र मुलगा राम याला वनवासास धाडण्याची गळ दशरथाला घातली. परंतु पुत्र विरहाच्या शोकामुळे दशरथाचा मृत्यू झाला. रामाचा वनवास व दशरथाचा मृत्यू या घटनांना कारणीभूत ठरल्यामुळे  तिला खलनायिका ठरवतात.”माता न तू, वैरिणी “या प्रसिद्ध

गाण्यामुळे तर ती जास्तच दुष्ट वाटू लागते. पण प्रत्यक्षात तसे नाही.

कैकयी अत्यंत सुंदर, धाडसी ,युद्धकलानिपुण, ज्योतिषतज्ञ होती .त्यामुळे दशरथाची सर्वात लाडकी राणी होती. एकदा देवराज इंद्र संब्रासुर नावाच्या राक्षसाशी लढत होता. पण तो राक्षस खूप शक्तिशाली होता म्हणून इंद्राने दशरथाकडे मदत मागितली. दशरथ युद्धाला सज्ज झाला. कैकयीदेखील त्याच्याबरोबर गेली. युद्धामध्ये दशरथाच्या सारथ्याला बाण लागला.  दशरथ हादरला. पण कैकयीने स्वतः उत्तम सारथ्य केले. दुर्दैवाने रथाचे एक चाक खड्डयात अडकले. कैकयी पटकन रथातून खाली उतरली. रथाचे चाक खड्डयातून बाहेर काढले. ते पाहून राक्षस घाबरला आणि पळून गेला. दशरथाचे प्राण वाचले. त्याने तिला दोन वर दिले.

रामाचा राज्याभिषेक ठरला. कैकयीने वराप्रमाणे दशरथाला रामाला 14 वर्षे वनवास आणि भरताला राज्याभिषेक असे दोन वर मागितले. त्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.

१)कैकयी ज्योतिष जाणत होती. तिने रामाच्या राज्याभिषेकावेळी कुंडली मांडली. त्यावेळी तिच्या लक्षात आले की सध्या चौदा वर्ष जो कोणी सिंहासनावर बसेल तो स्वतःचा आणि रघुवंशाचा नाश करेल. ते टाळण्यासाठी तिने रामाला वनवासाला पाठवले.

२) ती युद्ध कला निपुण होती. त्यावेळी वाली नावाचा एक राजा होता. त्याला वरदान मिळाले होते की जो कोणी त्याच्याशी युद्ध करेल त्याची निम्मी शक्ती त्याला मिळत असे. त्याच्याशी युद्ध करायला दशरथ आणि कैकयी गेले. पण दशरथ हरला. तेव्हा वालीने त्याला दोन अटी घातल्या. तुला सोडतो पण मला कैकयी  देऊन टाक किंवा तुझा राजमुकुट दे. अर्थात् दशरथाने आपला राजमुकुट त्याला दिला. ही गोष्ट फक्त या दोघांनाच माहीत होती. राजमुकुटाशिवाय राज्याभिषेक करता येत नाही . म्हणून तिने राज्याभिषेकाच्या आदल्या  रात्री रामाला बोलावले. विश्वासात घेऊन हे सांगितले .” तू वनवासाच्या निमित्ताने वालीचा वध कर आणि तो  राजमुकुट घेऊन ये.”  राम तयार झाला. आणि म्हणूनच राम जेव्हा रावणाचा, वालीचा ,वध करून अयोध्येस परत आला तेव्हा त्याने सर्वात प्रथम कैकयीला नमस्कार केला नंतर कौसल्येला.

३) श्रावणबाळाच्या मातापित्यांनी दशरथाला शाप दिला होता की तू देखील आमच्यासारखाच पुत्रशोकाने प्राण सोडशील. राज्याभिषेकाच्या वेळी दशरथ तसा वृद्धच झाला होता. रामाच्या मृत्यूपेक्षा विरहाच्या पुत्रशोकाने दशरथाचा मृत्यू झालेला बरा. असा सूज्ञ विचार करून , रामाचा मृत्यू योग टाळण्यासाठी तिने रामाला वनवासात पाठवले.

४) रामाचा जन्मच मुळी रावण किंवा सर्व राक्षसांचा वध करणे यासाठी होता.  राज्याभिषेकाच्या वेळी सर्व देवांना चिंता पडली की हा जर इतर राजांप्रमाणे राज्यकारभार करू लागला तर राक्षसांचा वध कोण करणार? ते सगळे सरस्वतीला शरण गेले. सरस्वती मंथरा दासीच्या जिभेवर आरूढ झाली. तिने कैकयीला गोड बोलून भुलवले आणि रामाला वनवासात पाठवण्यास भाग पाडले.

५) खरे तर तिचे भरतापेक्षा रामावर जास्त प्रेम होते. ती भरताबरोबर रामाला भेटण्यासाठी चित्रकूट पर्वतावर गेली. व म्हणाली, मी कुमाता आहे. तू मला क्षमा कर. तेव्हा रामाने तिची समजूत घातली.” तू सुमाता आहेस. ज्या मातेने भरतासारखा भाऊ मला दिला ती सुमाताच आहे .”

… मग आपणही तिला कुमाता न म्हणता सुमाताच म्हणूया ना?

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बुवा.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ बुवा… ☆ श्री सुनील शिरवाडकर

ट्रकने मुंबईत प्रवेश केला तेव्हा पहाटेचे पाच वाजले होते. एका साध्या टपरीवजा हॉटेलपाशी ट्रक थांबला. बुवा ड्रायव्हर शेजारीच बसले होते. ड्रायव्हरनं खाली उडी मारली. बुवांनाही जाग आली. रात्रभर म्हणावी तशी झोप लागलीच नव्हती. आणि रात्रभरच्या ट्रक प्रवासात ते शक्यही नसतं. पहाटे कुठं डोळा लागला तर मुंबई आलीच.

बुवांचं वय झालं होतं. त्यांना ट्रकच्या केबिन मधुन खाली उडी मारणं शक्य नव्हतं. ड्रायव्हर सोबतच्या माणसानं कशीतरी कसरत करुन बुवांना खाली उतरवलं. टपरीपुढे एक लाकडी टेबल होता.. आणि चार लोखंडी खुर्च्या. बुवा तेथे टेकले. प्लास्टीकच्या जगमधुन पेल्यात पाणी ओतले. खळखळुन चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं. खांद्यावरच्या पंच्याला तोंड पुसलं.

टवके उडालेल्या कपात एका पोरानं चहा आणुन दिला. त्या गरम चहाचा पहिला घोट घेतल्यावर बुवांना जरा बरं वाटलं. थोडी तरतरी आली.

ट्रक ड्रायव्हर नंतर चहाचे पैसे दिले.. ते ठरलेलंच असायचं. बुवांची परिस्थिती ड्रायव्हरला माहीत होती. म्हणुन तर तो नेहमी बुवांना कोल्हापूर पासुन मुंबई पर्यंत घेऊन यायचा.. काहीही पैसे न घेता. जातानाही तसंच.. त्याच ट्रकमधून बुवा पुन्हा कोल्हापुरला जायला निघायचे.

चालत चालत बुवा निघाले.. आणि पंधरा मिनिटांत आकाशवाणी केंद्रावर आले. त्यांचा अवतार बघून खरंतर गेटवर त्यांना अडवायला पाहिजे होतं.. पण बुवांना आता तिथे सगळे जण ओळखत होते. चुरगळलेला सदरा.. गाठी मारलेलं धोतर.. झिजलेल्या वहाणा.. पण दाढी मात्र एकदम गुळगुळीत. काल रात्री निघण्यापूर्वीच बुवांनी दाढी केली होती.

आकाशवाणी केंद्राच्या प्रतिक्षा गृहात बुवा आले. नेहमीच्या सोफ्यावर बुवांची नजर गेली. तो रिकामाच होता. बुवांना जरा बरं वाटलं. तिथे कुणी बसायच्या आत बुवा घाईघाईने गेले.. आणि सोफ्यावर चक्क आडवे झाले. दोनच मिनिटांत बुवा छानपैकी घोरु लागले.

एवढा आटापिटा करून कोल्हापुराहुन मुंबईला येण्याचं काय कारण? तर केवळ पैसा..

बुवांची परिस्थिती खुपच हलाखीची होती. साक्षात सवाई गंधर्वांचा आशिर्वाद मिळालेल्या कागलकर बुवांची सध्या ही अशी परिस्थिती होती. एकेकाळी सवाई गंधर्वांचे शिष्य म्हणून त्यांना कोण मान होता. पण आर्थिक नियोजनचा अभाव. कुणीतरी सांगितलं.. मुंबई आकाशवाणीवर गाण्याचा कार्यक्रम केला की साठ रुपये बिदागी मिळते. त्यांनी आकाशवाणी केंद्रावर चकरा मारायला सुरुवात केली.

तिथं त्यांना सांगण्यात आलं.. ’ तुम्ही कोल्हापूरचे.. त्यामुळे पुणे केंद्रावर जा. ’

पण झालं होतं काय.. पुणे केंद्रावर कलाकारांची गर्दी.. तिथं नंबर लागणं कठीण.. शिवाय बिदागी पण कमी.. म्हणून मग मुंबई केंद्रावर चकरा.

अखेर कुणाच्या तरी सांगण्यावरून त्यांनी मुंबईचा असाच एक डमी पत्ता दिला.. आणि आपण मुंबईकर आहोत असं सिद्ध केलं. मुंबई केंद्रावर त्या वेळी रविंद्र पिंगे अधिकारी होते. त्यांनीही समजुन घेतलं. वर्षाकाठी पाच सहा कार्यक्रम देण्याची व्यवस्था केली.

आकाशवाणी केंद्रावरच्या माणसांनी बुवांना जागं केलं. बुवांच्या रेकॉर्डिंगची वेळ झाली होती. बुवा उठले चुळ भरली.. तोंडावर पाणी मारलं.. ताजेतवाने झाले.. आणि रेकॉर्डींग रुममध्ये आले.

गळ्यात दैवी सुर घेऊन जन्मलेले कागलकर बुवा गायला बसले.. आणि..

.. त्यांच्या अलौकीक गायनानं सगळा रेकॉर्डींग रुम भारुन गेला.

अर्ध्या तासाचं रेकॉर्डींग झालं.. बुवा बाहेर आले. केंद्रावर असलेल्या कॅन्टीन मध्ये एक रुपयात राईस प्लेट मिळत होती. तिथे जेवण केलं. साठ रुपयांचा चेक खिशात टाकला.. आणि डुलत डुलत पुन्हा कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले.

उमेदीच्या काळात मिळालेला पैश्यात भविष्य काळाची तरतूद करणं सगळ्यांना तरच जमतं असं नाही. मग म्हातारपणी त्यांची ही अशी अवस्था होते. कागलकर बुवांचं नशीब थोडंफार चांगलं.. त्यांना आकाशवाणीनं मदतीचा हात दिला.

कागलकर बुवा ज्याला त्याला अभिमानाने सांगत.. पु. ल. देशपांडे यांनी माझा गंडा बांधला होता. आता पु. ल. तर बालगंधर्वांच्या गायकीचे चहाते.. मग सवाई गंधर्वांचे शिष्य असलेल्या कागलकर बुवांचा गंडा ते कसे बांधणार?

हाच प्रश्न एकदा रविंद्र पिंगे यांनी पु. लं. ना विचारला.

पु. ल. देशपांडे म्हणाले..

मी तेव्हा बेळगावात रहात होतो. कागलकर बुवा पण तेव्हा बेळगावातच रहात होते. मी बुवांची परिस्थिती पाहिली. दोन पैसे मिळावेत म्हणून त्यांनी गाण्याचा क्लास काढला होता. पण त्यांना विद्यार्थी मिळेनात.

मी विचार केला.. मी जर बुवांचा गंडा बांधला, तर बुवांचा जरा गाजावाजा होईल‌.. त्यांना विद्यार्थी मिळतील. केवळ म्हणून मी बुवांचा गंडा बांधला.. त्यामुळे मला अपेक्षित असलेला बोलबाला झाला.. त्यांच्याकडे बरेच विद्यार्थीही आले हे खरं.. पण माणूस मात्र खुपच गुणी.. त्यांच्यासारख्या थोर गायकाला अश्या परिस्थितीतला सामोरं जावं लागलं हे दुर्दैव..

आणि हे आम्हाला पाहायला लागतं आहे.. हे आमचं दुर्दैव!

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पडद्यामागच्या महिला… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆

सौ राधिका -माजगावकर- पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पडद्यामागच्या महिला…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

महिला दिनानिमित्त पदवी भूषण महिलांचा सत्कार होतो.आणि त्या उजेडात येतात. पण समाजातला हा कष्टाळू महिला वर्ग अंधारातच राहतो.त्यांच्या मनात प्रसिद्धीची हाव नसते. असतें ती निर्मळ, निरामय,कर्तव्य भावना आणि निरपेक्ष प्रेम. आपलं लक्ष त्यांच्याकडे गेलं की त्यांचा आत्मविश्वास दुणावतो आणि,..आणि त्यांची उमेद वाढते.अश्याच एका लक्ष्मीला आपण भेटूया का ?… 

नऊ हा आकडा जणू काही तिच्या आयुष्याला चिकटला होता.घरांत जावा,सासू , मुले, पुतणें अशी खाणारी नऊ माणसे होती, नवऱ्याच्या पगार फक्त 9000.मुलं नववीपर्यंत शिकलेली.आणि त्यात आता नवरात्राचे नऊ दिवस उपास करून थकलेली ती. मंदिराच्या पायरीवर बसलेली मला दिसली. मी म्हणाले, ” लक्ष्मी इतके उपास का करतेस ? अगं कित्ती गळून गेली आहेस तू,!सकाळपासून काहीच खाल्लं नाहीस का ? घाम पुसत ती म्हणाली, “किती काळजी करतासा ताईसाहेब ! आता घरी गेल्यावर भगर खाईनच की,”  “अगं पण घरी जाणार कधी ? त्याच्यापुढे करणार कधी?आणि खाणार कधी? ते काही नाही ऐक माझं, हे राजगिऱ्याच्या लाह्यांचे पुडे घेऊन जा,दुधात   भिजवून साखर घालून खा.आणि हॊ इतके उपास करतेस,अनवाणी फिरतेस,तूप लावत जा पायाला.” 

लाह्याचा पुडा घेतांना तिचे डोळे भरून आले.”ताई या मायेचे ऋण  कवा आणि कसे फेडू मी? “असं म्हणून ती पाठमोरी झाली. तापलेल्या डांबरी रस्त्यावर तिच्या अनवाणी पायातली जोडवी खणखण वाजत होती.तिसऱ्या दिवशी टवटवीत चेहऱ्यांनी सुस्नात, हिरव्यागार लुगड्यातली ठसठशीत, हळदी कुंकू लावलेली ती माझ्यासमोर आली, तेव्हां मी बघतच राहयले. उपासाचे,भक्ती,श्रद्धा भावनेचं आणि सात्विकतेचं तेज तिच्या चेहऱ्यावर  झळकत होतं. माझ्या विस्फारलेल्या नजरेला हंसून दाद देत ती म्हणाली,” वहिनी बाय हा डबा घ्या. अंबाबाईचा  प्रसाद. पहाटला देवपूजा करून तुम्ही दिलेल्या राजगिऱ्याच्या वड्या करून निविद  दाखवला. हा घ्या प्रसाद . टाका तोंडात.हाँ अक्षी !आता कसं! असं म्हणत ती दिलखुलास हसली. छान कुरकुरीत खुसखुशीत वडी जिभेवर विरघळली. मी आश्चर्याने विचारलं, “लक्ष्मी अगं उपासाच्या लाह्या मी तुला खायला दिल्या होत्या. दिवसभर उपाशी होतीस ना तू?” ऐका नं ताई तुमची मायेची कळकळ कळली मला , तुमच्या शब्दाचा मान राखून मुठभर लाह्या  दुधात भिजवल्या. फुलावानी फुलंल्या बघा त्या. खाऊन पोट तवाच गच्च भरलं.त्यातनं थोड्या राखून या चार वड्या केल्या. ईचार केला अंबाबाईला निविद बी व्हईल आणि ताईंना प्रसाद बी देणं व्हईल.” मी अवाक झाले. एका हाताने घेतलं तर दुसऱ्या हाताने परतफेड करणारी कुठल्या मातीची बनली आहेत ही माणसं .  

मनात आलं आज सगळीकडे भ्रष्टाचार झालाय. माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच. अशा प्रवृत्तीच्या सुशिक्षित समाजात राहूनही,वयाने मोठं होतांना कुठल्या विद्यालयातून डिग्री घेऊन बाहेर पडल्या आहेत ह्या महिला ? खरंच देव चरां चरांत आहे .पक्षी कसे उडतात ? मातीत बीज कसं अंकुरतं ? बाळ पावलं टाकून पुढे पुढे धावायला कसं बघतं ? ही दैवी शक्तीच   म्हणायची, आणि अशी निर्मळ  माणसं देवच घडवतो. ही माणसं सकारात्मक विचारांची कासं धरून, अनुभवाच्या शाळेत शिकून, एकमेकांवर प्रेम करायला शिकत असावीत. असंच असावं हे गणित. शेवटी हेच खरं की ह्या साध्या माणसांकडूनही खूप  गोष्टी घेण्यासारख्या असतात. हो ना? धनाचा नाही पण सुविचारांचा सांठा  असलेल्या लक्ष्मीला मी मानलं.  आजूबाजूला नजर टाकली की  कळतं,घासातला घास     काढून देणाऱ्या झळाळत्या  लक्ष्मी नक्कीच जगात असतील. ही,साधीमाणसं रोज काहीतरी चांगले धडे  कुठल्याही विद्यापीठात न जाता शिकत असतात. आणि,मग,सरावाने त्यांचे विचारही चांगले होऊन प्रेमाचं ‘वाण ‘ वाटता वाटता ही माणसं आयुष्याच् गणित सोप्प करून जीवनाचा आनंद गरिबीतही लुटतात. खरंच अशा साध्या सरळ व्यक्तींना मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतात. मी म्हणाले, “अगं काय हे ! स्वतः पोटभर न खाता दुसऱ्यासाठी राखून ठेवणाऱ्या तुझ्या स्वभावाला काय म्हणावं,गं,बाई!   भाबडे पणाने ती म्हणाली,” ताईबाई मायेची ओंजळ तुम्ही माझ्या पदरात टाकता.मन भरून जातं माझं.घरातले समदे, अगदी मुलं सुद्धा मला धूत्कारत्यात, म्हणत्यात ” तू अडाणी आहेस.डोकंच नाही तुला. साधा  हिशोबही येत नाही.” ती रडवेली झाली होती. मी म्हणाले” कोण म्हणतं तू अडाणी आहेस?  नाही  लक्ष्मी तुझे विचार तुझं वागणं,माणसं जोडणं डिग्री वाल्यांना पण जमणार नाही. स्वभावाने लोकसंग्रह वाढवून जीवनाचं गणित सोप्प करण्याची कला आहे तुझ्या अंगात. स्वतःला अशी कमी लेखू नकोस.आणि जमेल तसं लिहायला शिक. माझी मुलं शिकवतील तुला.कष्टाबरोबर चांगल्या मनाची चांगल्या स्वभावाची आणि प्रत्येकाला मदत करून आपलसं करण्याची कला तुझ्या अंगात असल्याने तुझी एक वेगळी ओळख निर्माण कर.. 

आणि अहो काय सांगू तुम्हाला! अगदी निरक्षर लक्ष्मी जिद्दीला पेटली आणि साक्षर झाली. हा योगायोगच म्हणायचा. माझी एक मैत्रिण बालवाडी,अंगणवाडी चालवते,.तिला मदतीची जरूर होती. मी लक्ष्मीला आमची सगळी काम सोडून,त्या मैत्रिणीकडे पाठवलं.एका नव्या दालनात, अंगणवाडीच्या प्रांगणात,तिचा प्रवेश झाला.आणि ह्या सुरवंटाचं फुलपांखरू झालं.छोट्या मुलांचे क ख ग घ चे बोबडे बोल ऐकताना लक्ष्मीनेही  अ, आ  ई चा धडा गिरवला. कष्टाळू मनमिळाऊ आणि मदतीला पुढे होणाऱ्या लक्ष्मीचा लोकसंग्रह वाढला आहे. आणि आता,'”बावळट काहीच येत नाही तुला!”असं म्हणून हिणवणाऱ्या नातलगांकडे आत्मविश्वासाने तिची पावले पडतात. कारण तिने ‘ तिच्यातली ती’  ‘सिद्ध करून दाखवली आहे.ती आता अंगणवाडी शिक्षिका झाली आहे. साध्या विषयातून तिने मोठा आशय मिळवला आहे. मित्र-मैत्रिणींनो कथा साधी आहे पण, कसलेल्या जमिनीत रुजलेल्या बिजाची, रूपांतरित झालेल्या कल्पवृक्षाची आहे. पडद्यामागून पुढे आलेल्या लक्ष्मीची आहे. आज लक्ष्मीने भरपूर शुभेच्छा, मानपत्र, समाजसेविकेचे, प्रशस्ती पत्रक मिळवली आहेत . इतकं करूनही ती थांबली नाही, तर आपल्या वस्तितल्या कितीतरी महिलांना तिने रमाबाई रानडे प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करून साक्षर केल.अशा ह्या स्वयंसिद्धेने आपल्याबरोबर मैत्रिणींनाही यशाचं दालन खुलं करून दिल आहे….धन्यवाद लक्ष्मी… 

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ चाय गरम , ‘चिनी’ कम ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

चाय गरम , ‘चिनी’ कम ! ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

१९८८-९० या काळात मी तेझपूर येथे पोस्टिंगवर होतो. तेझपूरपासून चीन सीमेपर्यंत टेलिफोन व संदेश सेवा पुरवण्याचे आमचे काम होते. अत्यंत दुर्गम अश्या पर्वतराजीतून, टेंगा, बोमडी-ला, शांग्री-ला, से-ला, नूरानांग, अशी ठिकाणे जोडत तवांगपर्यंत जाणारा भक्कम रस्ता, BRO म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या अभियंत्यांनी व कामगारांनी अक्षरशः खपून बनवलेला होता. वाटेत ठराविक अंतरावर एकेका उंच टेकाडावर माझ्या ५-६ जवानांची एकेक तुकडी पत्र्याच्या शेडमधून राहायची. हमरस्त्यापासून वरपर्यंत चढण्यासाठी मात्र रस्ते नव्हते, आणि पायवाटाही अत्यंत अरुंद व धोकादायक होत्या. अशा दुर्गम ठिकाणी दोन-दोन उन्हाळे, पावसाळे, हिवाळे काढणे आणि बारा महिने, २४ तास तेथील रेडिओ सेट चालू ठेवणे  म्हणजे चेष्टा नव्हती!

रेडिओ सेट, बॅटरी, जनरेटर वगैरेची देखभाल तर त्या जवानांना अहोरात्र करावी लागेच. पण, संपूर्ण तुकडीसाठी स्वयंपाक करणे, टेकडीवरून उतरून पाणी भरणे, सप्लाय ट्रकमधून भाजीपाला उतरवून टेकडीवर नेणे, अशी कामे त्या ५-६ जणांमध्येच वाटून घेतलेली असत. तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, दूध भुकटी, मसाले, असे रेशन आणि शेगडीसाठी केरोसीन त्या जवानांना महिन्यातून एकदा पोहोचवले जात असे. भाजीपाला आठवड्यातून एकदाच मिळू शकायचा पण, अत्यधिक बर्फ आणि खराब हवामान असल्यास कित्येकदा महिना-महिना डबेबंद वस्तूंवर गुजराण करावी लागे.

तेथील संचारव्यवस्थेची देखरेख करण्यासाठी आणि त्या निमित्ताने माझ्या जवानांची विचारपूस करून त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी, त्या मार्गावर माझे वरचेवर जाणे-येणे होते. त्यांच्या घरून आलेली पत्रे, त्यांच्यासाठी युनिटतर्फे थोडी मिठाई, अश्या गोष्टीही मी आवर्जून सोबत नेत असे. इतक्या कठीण परिस्थितीतही चोख सेवा बजावणाऱ्या त्या जवानांपैकी एकाच्याही चेहऱ्यावर मला एकदाही त्रासिक किंवा दुःखी भाव दिसला नाही हे विशेष! त्याउलट, मी गेल्यावर “सर, गरम-गरम चहा घ्या. भुकटीचा असला तरी त्यात सुंठ घालून फक्कड बनवलाय” हे वर असायचे !  

१९९०च्या मे महिन्यात, मी व स्वाती, आमची दीड वर्षांची मुलगी असिलता, माझे व स्वातीचे आई-वडील, आणि तिचे दोन भाऊ, असे त्या मार्गाने तवांगपर्यंत गेलो होतो. माझ्यासाठी ती नेहमीसारखी ड्यूटीच होती, माझ्या कुटुंबियांसाठी मात्र पर्यटन! तो डोंगराळ, बर्फाळ प्रदेश पाहून, आणि आमच्या रेडिओ तुकड्यांमधील जवानांच्या दैनंदिन जीवनाचे मी केलेले धावते वर्णन ऐकून सर्व कुटुंबीय अचंबित झाले होते.

समुद्रसपाटीपासून १३७०० फुटांवर असलेल्या से-ला खिंडीत आमची गाडी थांबली. त्या क्षणी माझा एक मेहुणा, (ऍडव्होकेट वैभव जोगळेकर), जवळ-जवळ ओरडलाच, “अरे, त्या टेकडीवरून कोणीतरी बर्फातून पळत-पळत येतोय.” आम्ही आधी पार केलेल्या चौकीकडून आमच्या येण्याची खबर रेडिओवर मिळाल्यामुळे, मला भेटायला आमचा एखादा जवान येत असेल हे मी ताडले. 

काही क्षणातच एक जवान सॅल्यूट ठोकून धापा टाकत माझ्यासमोर उभा राहिला. आपल्या कोटाच्या खालून त्याने ब्लॅंकेटमध्ये गुंडाळलेली किटली काढली. कुणाला काही कळायच्या आत, कागदी कपांमध्ये गरम-गरम चहा ओतून त्यांने प्रत्येकासमोर धरला.

डोळ्यात पाणी तरारलेल्या अवस्थेत माझ्या मेहुण्याने त्याला “हे काय?” असे विचारताच तो कसनुसं हसून म्हणाला, “हमारे साहब तो हमेशा उपर चढके आते हैं लेकिन परिवार को पोस्टपर आना मना है, इसलिये आप सबको चाय सडकपर ही पिलाना पडा सर। सॉरी सर।”

माझ्या मेहुण्याने प्रयत्नपूर्वक रोखलेले अश्रू त्याला फार काळ थोपवता आले नाहीत!

मुंबईला परत गेल्यानंतर त्याने पत्रात मला लिहिले होते, “…आर्मीच्या  जवानांच्या डोळ्यात, साहेब आल्याचा आनंद व आत्मीयता ठळकपणे दिसत असे. बरेचदा चुकून आम्हालाही सलाम झडले. तेंव्हा खरोखरच अगदी लाज वाटत असे. एकतर, आमची सॅल्यूट स्वीकारण्याची लायकी नाही, आणि दुसरे म्हणजे, जवान करत असलेले कष्ट व त्याग इतके उत्तुंग आहेत की त्यांना आम्हीच त्रिवार सलाम करावा.

मिलिटरीतल्या लोकांचे कष्ट व त्याग यांची कल्पना मला होती. पण, प्रत्यक्षात वास्तव हे कल्पनेपेक्षा कितीतरी पटीने ठसठशीत आहे हे या प्रवासात उमगले. दुर्दैवाने, कितीतरी लोकांना तुमची नीटशी माहिती नसते. त्यामुळे तुम्हा लोकांबद्दल रास्त अभिमान असणे वगैरे गोष्टी तर दूरच्याच असतात…”

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ती‘…. सुश्री उषा चौमार – लेखिका : सुश्री राधा गर्दे ☆ श्री आशिष बिवलकर ☆

सुश्री उषा चौमार

२०२० चे साल. राष्ट्रपती भवनाच्या मोठ्या हॉलमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविद हे मंचावर पद्मश्री, पद्मविभूषण इत्यादी पुरस्कार प्रदान करत होते.एकेक व्यक्ती भरल्या मनाने, सन्मानाने ते पुरस्कार ग्रहण करत होती. एकानंतर एक नावांची घोषणा होत होती आणि पुरस्कार प्रदान केले जात होते. प्रकाश झोतात, फोटोग्राफी चालू होती. 

… त्यातच एका नावाची घोषणा झाली..उषा चौमार.

घोषणा होताच ती  जागेवरून उठून मंचाकडे चालू लागली आणि आठवणींच्या वाटेवर थबकली.

राजस्थानच्या अलवर इथे जन्मास आलेली सात वर्षांची चिमुकली उषा एक दिवस  आई बरोबर संडासाची घाण (मल/ मैला) कशी स्वच्छ करावी हे बघायला गेली आणि ट्रेनिंग घेऊन  एक परात आणि गोलाकार मोठ्या पळीसारखं भांडं हातात घेऊन घरोघरी संडासाची घाण स्वच्छ करण्याचं काम करू लागली. तिची आई तिला काम नीट करता यावं म्हणून  हे  शिकवत होती. ज्या वयात पोरं खेळण्यात रमतात त्या काळात ऊषा घाण स्वच्छ करण्याचं काम करत असायची. त्यातून  दहा पंधरा रुपयांची प्राप्ती होत असे. कुणाकडे पाहुणे आले की अर्थातच संडासाची घाण जास्त व्हायची आणि त्याचे थोडे ज्यादा पैसे मिळायचे.कामावरून एक दिवस ही सुट्टी मिळत नसे. आजारपण आलंच तर दुसऱ्याला पाठवावं लागायचं आपल्यातले  पैसे ही तिला द्यावे लागायचे.

वयाच्या दहाव्या वर्षी उषाचे लग्न झाले पण तिच्या सासरी ही हेच काम पूर्वापार चालत आल्याने तिथे ही हेच काम ती करत असायची‌. अनेकदा घरी आल्यावर किती ही स्वतः ला स्वच्छ केले तरी जेवण जायचे नाही. लोक  दूरूनच नाक मुरडायचे. हे काम करण्यासाठी त्यांचा रस्ता/वाट दुसरी असायची ज्यावरून इतर कोणी कधीच जात नसायचं.

रात्रीचं शिळं अन्न प्लास्टिकच्या पिशवीत बांधून दूर फेकायचे आणि ते ती उचलून घरी आणायची.देवळाच्या पायरीवर ही तिला कोणी बसू देत नव्हतं.

एकदा असंच डोक्यावर ती घाण घेऊन चार पाच बायका चालल्या होत्या ठराविक ठिकाणी त्यांनी ती घाण टाकली आणि परत येताना त्यांच्या बाजूला एक गाडी येऊन थांबली. त्यातून एक व्यक्ती बाहेर येऊन त्यांच्याशी बोलू लागली,

“ मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.काही सांगायचं  आहे,काही विचारायचं आहे‌. ते घूंघट आधी वर करा.”

सगळ्यांच्या मनात विचार आला,

“ हा माणूस मार खाणार. आम्ही आपल्या दिरा समोर ही घूंघट उघडत नाही तिथे हा कोण लागून गेला.”

पण त्याने त्यांची वाट अडवत विचारलं,

“ तुम्ही हे काम सोडून दुसरं काम करायला तयार आहात का? पूर्वापार चालत आलंय म्हणून हे काम करताय हे खरं असलं तरी तुम्हाला दुसरं चांगलं काम करण्याची संधी मिळू शकते.”

ती व्यक्ती होती‌ बिंदेश्वरी पाठक,सुलभ इंटरनेशनलचे  कर्तेधर्ते.

त्यांनी सगळ्यांना दिल्लीला घेऊन जायचे ठरवले. दिल्ली म्हणजे त्या बायकांसाठी अमेरिकाच होती.सासूबाई म्हणाल्या,

“ अंशी नव्वद वर्षं झाली ह्या कामातून सुटका नाही आता मिळणार आहे होय?”

पण उषाच्या नवऱ्याने साथ दिली आणि ती दिल्लीला आली.पहिल्यांदा कारमध्ये बसली.  दिल्लीला सुलभ कार्यालयात तिथल्या शिक्षिकांनी आणि मुलींनी फुलांचा हार घालून स्वागत केले आणि तिने जन्मात पहिल्यांदा फुलांचा हार घातला. लग्नात ही तिच्या नवऱ्याने तिला फुलांचा‌ हार घातला नव्हता. त्यावेळेस उषाचं मन आणि डोळे दोन्ही भरून आले होते.

मोठ्या हॉटेलमध्ये आवडीचं जेवायचा पहिला प्रसंग फक्त पाठकजीं मुळे तिला अनुभवायला मिळाला. मिठाई आणि दोनशे रुपये बिदागी घेऊन ती तीन दिवसाने अलवरला परतली आणि ज्यांच्याकडे काम करायला जायची त्यांनी बोलायला सुरुवात केली,

“आता काय म्हणे हे काम करणार नाही मग काय महाराणी बनून रहाणार? बघू घर कसं चालतंय ते.”

नंतर अलवरला “ नई दिशा” म्हणून वर्ग सुरु झाला. तिथे टी.व्ही लावला गेला.साफसफाई शिकवताना जन्मात पहिल्यांदा सकाळी आंघोळ केल्यावर तिला वेगळाच अनुभव मिळाला कारण घाण स्वच्छ करताना सकाळी आंघोळ करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रोज आंघोळ करून, स्वच्छ कपडे घालून घरातून बाहेर पडताना वेगळाच अवर्णनीय आनंद मिळायला लागला.त्या घाण वासा ऐवजी उद् बत्तीचा सुगंध दरवळायला लागला.वर्गात, लोणची,पापड करणे, कापडी पिशव्या बनवणं वगैरे बरंच काही शिकवलं जाऊ लागलं.

“आमच्या हाताचा हा माल कोण विकत घेणार?” हे विचारल्यावर उत्तर मिळालं,

“सुलभ इंटरनेशनल”

बिंदेश्वरी पाठक ह्यांनी सुलभ इंटरनेशनलची सुरुवात “आरा” पासून केली. संडासाची घाण उचलणाऱ्यांना काय वाटत असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांनी दोन दिवस हे काम केलं आणि त्यांची मनोव्यथा जाणली. किती वेदना,किती पीडा आणि किती लाचारी ह्या कामात आहे हे त्यांनी प्रत्यक्ष जाणले.

आणि ह्या “नई दिशाने” ऊषाचे जीवन आमूलाग्र बदलून टाकलं.आता तिच्या पंखात बळ आलं होतं. एक सुंदर आकाश हात पसरून तिला कवेत घेण्यासाठी आतुर झालं होतं. आता उषाने जनजागृतीचे काम सुलभ इंटरनेशनलच्या सोबत सुरू केलं होतं. इतर शिक्षणा बरोबर तिने इंग्लिश भाषा शिकून आत्मसात केली. हा तिचा प्रवास २००३ पासून सुरू झाला आणि २००७ मध्ये ऊषा सुलभ इंटरनेशनलची प्रेसिडेंट झाली.

उषाने  अमेरिका,साऊथ आफ्रिका, इंग्लंड,फ्रांस ह्या देशाचे दौरे केले तिथे अनेक भाषणं दिली. गंमत म्हणजे तिने अमेरिकेत एका फैशन शोमध्ये  साडी घालून कॅटवॉक ही केला.

जिच्या डोक्यावर घाणीची टोपली/ परात असायची तिच्या डोक्यावर मानाची पगडी विराजमान होऊ लागली होती. तिच्या पासून लांब पळणारी लोक तिला सन्मानाने घरी बोलवून लागले. तिच्या कामाची दखल श्री. राजनाथ सिंह ह्यांनी घेतली. नंतर पंतप्रधान मोदींची ही भेट झाली. हे सगळं घडत होतं पण ऊषाकडे कधीच साधं वरण म्हणजे पिवळं वरण बनलं नाही. कारण म्हणजे,

“ते वरण मला वेगळीच आठवण करून देतं त्यामुळे मी हे वरण शिजवत ही नाही आणि खात ही नाही.”

तिच्या मनावर खोलवर झालेल्या यातनांची ही परिसीमा आहे. 

टाळ्यांचा गडगडाट झाला आणि ऊषा चौमार वर्तमानात परतली. आज हा सन्मान तिचा नव्हे तर सबंध त्या स्त्री जातीचा सन्मान होता ज्या परिस्थितीला हार न जाता आलेल्या प्रत्येक संधीचा सोनं करतात.सुलभ शौचालय आणि सुलभ इंटरनेशनलमुळे घाण उचलण्याचा प्रकार जवळपास संपुष्टात आला होता म्हणून अनेक लोकांचे आशीर्वादाचे हात ही डोक्यावर होते.

लेखिका : सुश्री राधा गर्दे

कोल्हापूर

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर – मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ जातांनाचे शब्द — लेखक : जीवन आनंदगावकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

“मी असा काय गुन्हा केला ?” 

हे शब्द प्रमोद महाजन यांनी, गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, अंतसमयी उच्चारले होते. आपल्या सख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, हे काय करताय ?” 

असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. महात्मा गांधीजींचे जातानाचे शब्द होते, “हे राम” तर चाफेकर बंधू ,भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी “वंदे मातरम” म्हणत मृत्यूचे स्वागत केले होते. तर मी या स्वार्थी जगात आता राहू शकत नाही असे म्हणून साने गुरुजींनी जीवनयात्रा संपवली आणि सात भाऊ असते तरी मातृभूमीसाठी दिले असते. 

आता माझे काम संपले असे ठामपणे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशन केले. 

एखाद्याचे जातानाचे शब्द नेमके काय असतात याची आपल्याला अतिशय उत्सुकता असते. एखादे वयोवृद्ध गेल्यावर जेव्हा नातेवाईक भेटायला येतात तेव्हा “काय म्हणाले हो ते जाताना ?” असे हमखास विचारले जाते. 

अगदी बोलायला यायला लागल्यापासून आपण अगणित वाक्ये बोलतो पण आयुष्याच्या अंतकाळी जे बोलतो ते खरेखुरे असते. त्यात खोटेपणाचा, दांभिकपणाचा, मीपणाचा लवलेश सुद्धा नसतो. ब-याचवेळा आयुष्यातल्या चुकांची किंवा पापांची कबुलीही असू शकते. 

शेवटच्या आजारपणात माझ्या पत्नीला ॲटॅक आला तेव्हा कार पळवित मी हॅास्पिटलला गेलो. 

तिला उचलून स्ट्रेचरवर ठेवताना ती एवढेच म्हणाली की,”उशीर झाला”. तेचं तिचे शेवटचे शब्द ठरले.

जगणे आणि मरणे यात फार मोठा वैचारिक खंदक असतो. तो पार करण्याची इच्छा फार कमी जणांची असते. आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाला त्या खंदकापर्यंत जाऊच नये असे वाटत असते. कारण जगण्याची आसक्ती प्रत्येकालाच, तिथे मृत्यूचे स्वागत कोण आणि कसे करणार ? 

सगळी कल्पना असते आयुष्यात मी आणि माझे करत इतकी संपत्ती आणि इतक्या वस्तू गोळा केल्यात. 

पण यातली एकही वस्तू मृत्यूबरोबर घेऊन जाता येणार नाही. वेगवेगळ्या फ़ॅशनचे कितीही महागडे कपडे घातले तरी जन्माला येताना नागवे आलोय आणि मरतांनाही तसेच जायचंय. येताना दोघांमुळे आलोय आणि मेल्यावर चौघांच्या खांद्यांवरून जायचंय. आपण एकटे काहीच करू शकत नाही पण तरीही प्रत्येक हाव काही सुटत नाही. हे माझे, ते माझे, माझेही माझे आणि त्याचेही माझेच अशी आपली नेहमी भावना असते. मृत्यू समोर दिसायला लागतो तेंव्हा ही भावना बोथट होते. 

प्रत्येक चर्चमध्ये जशी कन्फेशन बॉक्स असते तशी काल्पनिक बॉक्स मृत्यूच्या जाणिवेने तयार होते. आयुष्यात जे बेफामपणे वागलो, बोललो ते आठवू लागते. आयुष्यावर चढलेली खोटेपणाची आणि दांभिकतेची पुटे ढासळू लागतात. लहान बाळाची निरागसता मनात येऊ लागते. रागलोभाच्या आहारी जाऊन विस्कटून टाकलेली नाती पुन्हा गोळा करून आणाविशी वाटतात. खरे तर तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. जेंव्हा जगायचे असते तेंव्हा आपण जगलेलोच नसतो. आणि जगावेसे वाटू लागते तेंव्हा मृत्यू समोर येऊन उभा ठाकलेला असतो. 

भाऊसाहेब पाटणकर यांचा सुरेख शेर आहे …. 

दोस्तहो, दुनियेस धोका, मेलो तरी आम्ही दिला ।

जाऊनी नरकात, पत्ता स्वर्गाचा आम्ही दिला ।।

हाय रे दुर्दैव माझे, सर्वास कळले शेवटी ।

सारे सन्मित्र माझे, तेथेच आले शेवटी ।।

आपल्यासारख्या सर्व पापी माणसांचा सर्वात शेवटचा मुक्काम नरक आहे हे त्यांनी नर्मविनोदाने मोजक्या शब्दात पटवून दिले आहे. 

पण काहीकाही माणसे खरोखरच वेगळी असतात. त्यांना जगण्याचीही आसक्ती नसते आणि मरण्याचीही भीती वाटत नाही. ही माणसे ख-या अर्थाने जीवन जगतात आणि हस-या चेह-याने मृत्यूला सामोरे जातात. 

सामाजिक कार्यकर्ते ग प्र प्रधान यांनी मृत्यू हसत हसत स्वीकारला. आपला काळ जवळ आला आहे हे कळल्यावर त्यांनी आपला पुण्यातील राहता वाडा साधना ट्रस्ट या संस्थेला फुकट देऊन टाकला. आपल्या एका डॉक्टर विद्यार्थ्याच्या हॉस्पिटलच्या सर्वात वरच्या मजल्यावरच्या खोली भाड्याने घेतली आणि स्वतः डाळभात बनवून मृत्यू येईपर्यंत जगत राहिले. खरे तर तो वाडा विकला असता तर त्यांना करोडो रुपये मिळाले असते. पण आयुष्यभर एक तत्वज्ञान उराशी बाळगून जगलेल्या प्रधान मास्तरांनी निस्वार्थीपणे त्यावर पाणी सोडले. 

पु लं नी तर आयुष्यात मिळालेल्या सर्व संपत्तीचा ट्रस्ट केला आणि समाजाकडून मिळालेली सर्व संपत्ती समाजाला परत देऊन टाकली. एक आदर्श जगणे यापेक्षा वेगळे काय असते ? 

सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून एकविसाव्या वर्षी जिवंत समाधी घेणारे ज्ञानेश्वर माऊली म्हणजे विरक्तीचे टोक ! त्यांच्या जीवनाचाही सोहळा होता आणि अजीवन समाधीचाही ! जीवनमृत्यूची व्याख्या त्यापलीकडे ती काय करायची ? 

सुप्रसिद्ध अभिनेते बलराज सहानी यांना स्ट्रेचरवरुन ऑपरेशन थिएटरमध्ये नेत असताना त्यांनी नर्सकडून एक कागद मागून घेतला आणि त्यावर लिहिले,”आयुष्यात सगळं मिळालं, कोणतीही इच्छा शिल्लक नाही”. तोच त्यांचा शेवटचा संदेश होता.

“आनंद” चित्रपटात राजेश खन्नाला कॅन्सर दाखवला आहे. प्रत्यक्ष जीवनात तो कॅन्सरनेच गेला. त्याचे मरतानाचे शब्द होते,”पॅक अप”.

शेवटच्या आजारपणात मी वडिलांना भेटायला गावी गेलो. मी परत निघताना फक्त एवढंच म्हणाले, “लवकरच माझ्यासाठी तुला दीर्घ रजा घ्यावी लागेल”. पुढे  पंधरा दिवसांनी ते गेले.मी त्यांचे ऐकलेले तेच दोन शब्द!

माझा मुलगा अभिजित अलिकडेच पणजी येथे विषारी जेली फिशचा दंश होऊन गेला. मेडिकल हॅास्पिटलमध्ये त्याला ऑपरेशनसाठी नेताना मी त्याच्यासोबत होतो. तो मला म्हणाला,”सगळं संपलय”! तेचं त्यांचे शेवटचे शब्द ठरले. तो पुन्हा शुद्धीवर आला नाही.

अर्थात काही सामान्य माणसेसुद्धा असामान्य पद्धतीने जगतात आणि मृत्यूने आदर्श निर्माण करतात. मुंबईत राहणा-या वसंत त्र्यंबक निकुंभ यांनी पंधरा वर्षांपूर्वी दोन्ही हात पसरून मृत्यूचे स्वागत केले होते. आयुर्वेदाचा गाढा अभ्यास असलेले निकुंभ एखाद्या योग्यासारखे ८३ वर्षे जगले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे त्यांची रोजची दिनचर्या होती. त्यामुळे त्यांच्या नखात रोग नव्हता. पण एके दिवशी त्यांनी विचार केला की आयुष्यातल्या सर्व जबाबदा-या पूर्ण झाल्या आहेत, लेकी, सुना नातवंडे सारे सुखी आहेत. मग आता जगून काय करायचे ? त्यांनी इच्छामरण घ्यायचे ठरवले. पत्नी जिवंत असताना हा असा निर्णय घेणे म्हणजे आक्रीतच ! 

व्यवस्थित नियोजन करून एप्रिल महिन्यापासून हळूहळू एकेक खाद्यपदार्थाचा त्याग करत करत चार महिन्यांनी मृत्यूला त्यांनी बोलावून घेतले. या त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा सर्व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला पण ते आपल्या विचारांपासून ढळले नाहीत. तोंडी सांगून ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर सर्वांनी त्यांना पत्रे लिहिली आणि तुम्ही आम्हाला हवे अहात असे सांगितले तर त्या प्रत्येकाला स्वहस्ताक्षरात त्यांनी लिहिलेली उत्तरे तत्वज्ञानाने भरलेली होती. ती आजही वाचायला मिळतात. 

ज्याने आयुष्य आणि मृत्यू यांच्यातली सीमारेषाच पूर्णपणे पुसून टाकली आहे त्या माणसाचे तत्वज्ञान वाचत राहावेसे वाटते. जग हे मिथ्या आहे हे संतांनीच सांगितले पाहिजे असे नव्हे तर आपले आपल्यालाही ते कळू शकते हे वसंत त्र्यंबक निकुंभ यांच्या पत्रावरून आपल्याला कळते. 

माझ्या आवडत्या शिक्षकांना व त्यांच्या पत्नीला दोघांनाही कर्करोगाचे निदान झाले आणि त्या दिवसापासून  दोघांनीही औषधोपचार थांबवला. दीक्षितसर सेवानिवृत्त शिक्षक होते. त्यांनी आपल्या मुलांना सांगितले की कर्करोगावर औषध नाही हे मी मुलांना शिकवायचो. मग मीच औषधोपचारावर तुम्हाला खर्च करायला का लावू ? ते पैसे तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरा. आम्ही तृप्त आहोत, आम्हाला जाऊ द्या ! आणि खरोखरच त्या दाम्पत्याने कर्करोगाच्या वेदना शांतपणे सहन करत धीरोदात्तपणे जगाचा निरोप घेतला. 

ज्याला जन्म आहे त्याला मृत्यूसुद्धा आहेच ! जेवढ्या आनंदाने आपण जगण्याचा आनंद घेतो तेवढ्याच आनंदात मृत्यूचेसुद्धा स्वागत करायला हवे. आणि आयुष्यभर असे जगायला हवे की मृत्यूसमयी अपराधीपणाची भावना फिरकता कामा नये.

लेखक : जीवन आनंदगावकर, सेवानिवृत्त न्यायाधीश

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ फुलराणी.. ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ फुलराणी … ☆ श्री सुनील शिरवाडकर

खूप खूप वर्षांनी काल बालकवींचा “फुलराणी” हातात घेतला. एक एक कविता वाचत गेलो. किती मोठ्या आनंदास आपण मुकलो होतो. शाळेत असताना ‘आनंदी आनंद गडे..’, श्रावणमासी हर्ष मानसी..’ या कविता अभ्यासाला होत्या. पण त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केवळ त्या वाचल्या होत्या.

लहान मुल ज्या उत्कटतेने.. आनंदाने चहुकडे पाहत असते.. अगदी त्याचप्रमाणे बालकवी निसर्गाकडे बघत.म्हणून तर ते ‘आनंदी आनंद गडे..’ सारखी नादावुन टाकणारी कविता लिहू शकले. या कवितेत वारा वाहतो..चांदणे फुलते..पक्षी गातात. साध्याच गोष्टी.. पण किती नादमाधुर्य.

कल्पना विलास करणे हे बालकवींचे अजून एक वैशिष्ट्य. निसर्गातील द्रुष्ये पाहून कल्पनेने ते त्यावर शब्दांचा साज चढवतात.

इवलाच अधर हलवून

जल मंद सोडीते श्वास..

इवलाच वेल लववुन

ये नीज पुन्हा पवनास..

किती सुंदर कल्पना. पण असे जरी असले तरी कधी कधी ते कल्पनाविलासाच्या बाहेर येऊन निसर्गाचे चित्रण करतात. यातली मला सर्वाधिक भावलेली कविता म्हणजे “औदुंबर”. फक्त आठ ओळीतून बालकवी आपल्या एखादे  डोळ्यासमोर एक लँडस्केप उभे करतात.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन.

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

*

पायवाट पांढरी तयांतून अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

रंगांची किती मुक्त उधळण आहे या कवितेत.बालकवींना रंगाची विलक्षण आसक्ती.एका कवितेत ते म्हणतात..

पुर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची

कुणी उधळली मुठ नभी ही लाल गुलालाची.

“फुलराणी” ही तर अजरामर कविता….

हिरवे हिरवे गार गालिचे

हरीत तृणांच्या मखमालींचे.

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

अशीच एक कविता. ” तू तर चाफेकळी “ नावाची.त्यातील कल्पनाविलास पहा..

क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे

भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

श्रावणातील वातावरणाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात..

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे.

पहाटेच्या दाट धुक्याचे वर्णन करताना कवी म्हणतो..

 शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी

हर्षनिर्भरा नटली अवनी.

 लाल सुवर्णी झगे घालुनी

हासत हासत आले कोणी.

पानापानातुन.. ओळीओळीतुन शब्दांची श्रीमंती उधळणारा हा निसर्गकवी.”आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे” असे म्हणणारा..पण त्याला आयुष्य लाभले जेमतेम अठ्ठावीस वर्षांचे.१९०७ साली पहिले मराठी कवी संमेलन जळगाव येथे झाले. त्या संमेलनात त्यांना “बालकवी” ही पदवी देण्यात आली.आणि त्यानंतर अकरा वर्षांनी रेल्वे अपघातात त्यांचा करुण अंत झाला. शेवटच्या काळात त्यांच्या मनात उदासिनतेची छाया पसरली होती का? कारण एका कवितेत ते म्हणतात..

सुंदर सगळे, मोहक सगळे

खिन्नपणा परि मनिचा न गळे,

नुसती हुरहूर होय जिवाला

कां न कळे काही.

आणि मग..

कोठुनी येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला

काय बोचते ते समजेना

ह्रदयाच्या अंतरह्रदयाला.

बालकवींनी या जगाचा निरोप घेतला त्याला मागच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण झाली.आणि “फुलराणी” च्या प्रकाशनाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. विस्मरणात गेलेल्या या प्रतिभावंत कवीच्या स्मृतींना वाहिलेली ही एक आदरांजली.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

जागतिक कठपुतळी दिवस २१ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

साऱ्या जगभर २१ मार्च हा दिवस कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.इराणचे कठपुतळी कलाकार जावेद जोलपाघरी यांनी हा डायस साजरा करण्याची कल्पना मांडली आणि २००३ पासून हा दिवस जागतिक कठपुतळी दिवस म्हणून साजरा केला जातो.

इसवीसन पूर्व ४ थ्या शतकात महाकवी पाणिनी यांच्या अष्टाध्याई ग्रंथामधे पुतळा नाटकाचा उल्लेख आढळतो. भगवान शंकरानी लाकडी मूर्तीमध्ये प्रवेश करून माता पार्वतीचे मनोरंजन करून या कलेची सुरवात केली. उज्जैन नगरी च्या राजा विक्रमादित्याच्या सिंहासनाला ३२ पुतळे जोडले होते आणि त्यातील प्रत्येक बाहुलीच्या तोंडी एक गोष्ट सांगितली आहे .त्या गोष्टी सिंहासन बत्तीशी म्हणून प्रसिद्ध आहेत.

जगातील जवळपास सर्वच संस्कृतींमध्ये कठपुतळीचा खेळ बघायला मिळतो. ह्याला मानवी हालचालींचे चित्रण म्हणता येईल. मनोरंजन ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आधीपासूनच्या संस्कृतीमध्ये होती. कुठल्याही कथांना सत्यात उतरवण्याची क्षमता. कथा सांगण्यासाठी अभिनय ही गोष्ट वापरली जाते आणि अभिनय ही सुद्धा एक कला आहे जी त्या कथेला जिवंतपणा आणते. इतिहासात कथा दाखवण्यासाठी भारतातील लेणी आणि मंदिरांमध्ये छान छान प्रसंग हे दगडांमध्ये कोरून दाखवले आहेत. इजिप्तमधील भित्तिचित्रामध्ये देखील असे खूप प्रसंग आहेत. आपण मानवी हालचालींचे असे सूंदर चित्रण कुठेही पाहिले नसतील असे चित्रण त्या कलाकारांनी करुन ठेवले आहेत.

प्राचीन ग्रीक आणि इतर संस्कृतींमध्ये दहाव्या शतकातच ‘झेट्रोपे’ ह्या गोल आकाराच्या फिरणाऱ्या अशा यंत्राचा शोध लागला होता. ज्यात वेगामुळे आकृती हलण्याचा भास निर्माण व्हायचा.

चार्ल्स एमिल रेनॉड ह्याने मानवी चित्रांच्या कात्रणांचा वापर करुन त्यांचे हात पाय हलवून पाहिले ऍनिमेशन बनविले आणि तेसुद्धा कुठल्याही फिल्म विना. ते बनवून त्याने लोकांना आश्चर्यचकित केले.

विष्णुदास भावे हे सांगली संस्थानचे राजे चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी असणाऱ्या अमृतराव भावे यांचे पुत्र. विष्णुदास भावे हे स्वतः अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाल करवून घेता येऊ शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या विष्णुदास भावे यांनी बनवल्या होत्या. रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग बाहु्ल्या वापरून करावयाचा त्यांचा इरादा होता. परंतु तत्पूर्वी, कर्नाटकातील भागवत मंडळी कीर्तनी ‘खेळ’ करीत, त्याप्रमाणे खेळ रचण्याची चिंतामणराव पटवर्धनांनी भाव्यांना आज्ञा केली. १८४३ साली राजांच्या पाठबळावर भाव्यांनी सीता स्वयंवर हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणले. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’मध्ये नोव्हेंबर ५, १८४३ रोजी या नाटकाचा पहिला खेळ झाला. पुढे नाट्यलेखन व निर्मिती करून विष्णुदास भावे यांनी अनेक ठिकाणी प्रयोग केले. ९ मार्च १८५३ रोजी मुंबईला ‘ग्रांट रोड थिएटर’ येथे ‘इंद्रजित वध’ हा पहिला नाट्यप्रयोग केला. यानंतर विष्णुदास भावे यांनी १८६१ पर्यंत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या नाटकांचे प्रयोग केले. मात्र १८६२ मध्ये त्‍यांनी आपला नाट्यव्यवसाय काही कारणाने बंद केला.

विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये या बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग करणाऱ्या कलावंताच्या हातात आल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांचे रहस्य उलगडले आणि विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.

Attachments area

Preview YouTube video Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

Amazing Puppet Street Show, in Manhattan – Ricky Syers

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सातवा — ज्ञानविज्ञानयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच :

मय्यासक्तमना: पार्थ योगं युंजन्मदाश्रय: ।

असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु ।।१।।

कथिय श्री भगवंत 

ऐश्वर्या विभूती सामर्थ्य गुणांनी पार्था तू युक्त 

माझ्या ठायी अनन्य भावे मत्परायण तू भक्त

सकल जीवांचा आत्मरूप मी सर्वांचा प्राण

चित्त करुनी एकाग्र ऐकुनी स्वरूप माझे जाण ॥१॥

*

ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषत: ।

यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ज्ञातव्यमवशिष्यते ।।२॥

*

अतिगहन हे ज्ञान सांगतो तुजला पूर्ण विश्वाचे

यानंतर ना काही  उरते ज्ञान जाणुनी घ्यायाचे ॥२॥

*

मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये ।

यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वत: ।।३।।

*

सहस्रातुनी एखादा असतो यत्न करी मम प्राप्तीचा

मत्परायण होउनी एखाद्या आकलन मम स्वरूपाचा ॥३॥

*

भूमिरापोऽनलो वायुः खं मनो बुद्धिरेव च ।

अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा ।।४।।

अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम् ।

जीवभूतां महाबाहो ययेदं धार्यते जगत् ।।५।।

*

पृथ्वी आप वायु अग्नी व्योम बुद्धी मन अहंकार

मम अपरा प्रकृतीचे हे तर असती  अष्ट प्रकार

सामग्र विश्व जिने धारिले जाण तिला अर्जुना

परा प्रकृती माझी तीच शाश्वत जाणावी चेतना ॥४,५॥

*

एतद्योनीनि भूतानि सर्वाणीत्युपधारय ।

अहं कृत्स्नस्य जगत: प्रभवः प्रलयस्तथा ।।६।।

*

उत्पत्ती समस्त जीवांची प्रकृतीतूनी या उभय

जगताचे मी कारण मूळ निर्माण असो वा प्रलय ॥६॥

*

मत्त: परतरं नान्यत्किंचिदस्ति धनंजय ।

मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।।७।।

*

जग माझ्यात ओवलेले सूत्रात ओवले मणि जैसे 

माझ्याविना यत्किंचितही जगात दुसरे काही नसे॥७॥

*

रसोऽहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययो: ।

प्रणवः सर्ववेदेषु शब्द: खे पौरुषं नृषु ।।८।।

*

हे कौंतेया जाणी मजला जलातील प्रवाह मी

चंद्राचे चांदणे मी तर  सूर्याचा प्रकाश मी

गगन घुमटाचा शब्द मी वेदांचा ॐकार मी

पुरुषांचे षुरुषत्व मी विश्वाचा तर या गुण मी ॥८॥

*

पुण्यो गन्ध: पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसौ ।

जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु ।।९।।

*

पवित्र सुगंध मी वसुंधरेचा पावकाचे  तेज मी

सकल तपस्व्यांचे तप मी जीवसृष्टीचे जीवन मी ॥९॥

*

बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनम् ।

बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।।१०।।

*

धनंजया हे भूतसृष्टीचे बीज जाण मज 

विद्वानांची मी प्रज्ञा मी तेजस्व्यांचे तेज ॥१०॥

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 2 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

(IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.) 

इथून पुढे —

बाळाच्या आयुष्यातील पहिली दोन वर्ष ही त्याच्या मेंदूच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असतात. ह्या वेळेत त्याला योग्य चालना मिळाली तर बाळाचा मानसिक, बौद्धिक, आणि त्याच्या भाषेच्या वाढीचा आलेख उंचावतो.

IAP च्या guidelines अनुसार पाहिले दोन वर्ष बाळाला स्क्रीन टाइम अजिबात नको ! बाळ रडत आहे, लाव मोबाईल वर कार्टून, बाळ जेवत नाही लाव टीव्ही, आईला काम आहे तो एका जागी बसत नाही, दे लावून कॉम्प्युटर आणि बसू दे त्यासमोर! ह्या सवयी आपण लावत आहोत आणि त्यामुळे त्यांच्या जडणघडणीवर परिणाम होतोय हे कुणाच्या गावीही नाही!

दोन ते पाच वर्षापर्यंत एक तास किंवा कमी स्क्रीन time असावा. स्क्रीन मोठी असावी, म्हणजे लॅपटॉप किंवा टीव्ही, त्याच्या बरोबर पालकांनी देखील बसावे. तो काय बघत आहे ह्याकडे लक्ष द्यावे. शक्यतो शैक्षणिक गोष्टींसाठी यांचा वापर व्हावा. 

मनोरंजनासाठी स्क्रीन time ठेवला की नकळत त्याचा वापर वाढतो. त्याच बरोबर मैदानी खेळ, पुस्तके, त्याच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मिसळणे, गोष्टी सांगणे, गोष्ट सांगताना आपण हावभाव करत गोष्ट सांगणे, जेणेकरून मुले आपल्या चेहऱ्याकडे नीट निरखून बघत असतात, त्यांना मग emotions चेहरा बघून कळायला लागतात. 

मुलांचे घरातील इतर लोकांबरोबर मिसळणे ही व्हायला हवे. दोन ते पाच ह्या वयामध्ये मुलांचे सोशल स्किल्स देखील घडत असतात. इथे जर स्क्रीन time जास्त झाला तर ते अनेक गोष्टीत मागे पडतात. 

आणि सर्वात महत्वाचे हे की आधी पालकांनी आपला स्क्रीन time कमी करावा. मुले अनुकरणातून शिकतात. त्यांच्यापुढे आपण आदर्श घालून दिला तर ते लवकर शिकतील.

पाच सहा वर्षाचे मुल असेल तर त्याला आपण काही नियम घालून द्यावेत. ह्या वयात मुले नियम नीट पाळतात, त्यांना ते पाळल्यामुळे एक प्रकारे आपण सुरक्षित आहोत अशी भावना निर्माण होते. आपण डिजिटल नियम घालावे ते वयानुरूप असावेत. वय वाढले की नवीन नियम आपण त्यात टाकावेत.

उदाहरणार्थ…

  1. स्क्रीन हे मुलांना शांत किंवा इतर गोष्टींवरून लक्ष हटवण्यासाठी वापरू नये.
  2. स्क्रीन time, मैदानी खेळ, अभ्यास, जेवण, कौंटुबिक वेळ आणि छंद ह्यांची योग्य सांगड घालावी. स्क्रीन झोपेच्या आधी किमान एक तास बंद असावा. त्यामधील नील प्रकाश झोप उडवण्यासाठी कारणीभूत ठरतो.
  3. ह्याच वयात मुलांना कॉम्प्युटर समोर योग्य पद्धतीने कसे बसावे ते शिकवावे, पोक काढून किंवा मान वाकवून बसू नये. 
  4. स्क्रीन चालू ठेवून multy tasking करायचा प्रयत्न करू नये, म्हणजे शाळेचा अभ्यास किंवा गृहपाठ करत असताना कॉम्प्युटर किंवा मोबाईल बंद ठेवावा.
  5. मुले कॉम्प्युटर वर असताना आपण अधून मधून त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, ते काय बघत आहेत ह्यावर बारीक लक्ष ठेवावे. कुठले ही गेम्स किंवा प्रोग्राम, ज्यात हिंसा आहे किंवा addiction लागण्या सारख्या गोष्टी आहेत ते टाळावे. Privacy setting, browser आणि app साठी safe search engine, आणि योग्य antivirus आहे ना ते खात्री करून घ्यावी.
  6. मुलांना शांतपणे चिडचिड न करता आणि ठामपणे, “आता स्क्रीन time ची वेळ संपली आहे” हे सांगणे महत्वाचे आहे. असे सांगितले तर मुले ऐकतात.

जरा मुले मोठी झाली, टीन एज जवळ यायला लागले की त्यांना insagram, ट्विटर, What’sapp, telegram ची भुरळ पडायला लागते. आपण घरी कितीही बंधने लादायचा प्रयत्न केला तरी शाळेत, क्लास मध्ये, मित्रांच्या मार्फत त्यांना ह्या गोष्टी कळणारच आहेत. अश्या सोशल साईटचा वापर कुठल्या वयात करू द्यावा हे त्या प्लॅटफॉर्मवरच लिहिलेले असते. मुले हे platforms वापरायला लागली की काही गोष्टी आपण त्यांना सांगायलाच हव्यात.

  1. सोशल मीडिया वर आपण दुसऱ्यांना तसेच वागवले पाहिजे, जसे त्यांनी आपल्याशी वागावे याची आपण अपेक्षा करतो.
  2. आपली भाषा सुसंस्कृत असायला हवी. 
  3. इथे लिहिलेले किंवा पोस्ट केलेले फोटो हे कायम स्वरुपी राहू शकतात ह्याची त्यांना कल्पना द्यावी. त्याचा वापर कोणी वाईट कामासाठी करू शकतो हे ही समजावून सांगावे.
  4. आपल्या घरचा पत्ता, फोटो, किंवा कुठले ही password आपण सोशल मीडिया वर टाकू नये.
  5. सोशल मीडिया फ्रेंड ला भेटायला एकटे कधी ही जाऊ नये, घरातील मोठ्यांना बरोबर घेऊन जाणे.
  6. येथे कोणी तुम्हाला वाईट वागणूक देत असेल, bulling करत असेल तर तात्काळ घरातील जबाबदार व्यक्तीला सांगणे.

आणि इतके करून ही कोणी व्यक्ती तुमच्या मुलांना सोशल मीडिया वर त्रास देत असल्यास.. तुम्ही

  1. मुलाला कळू द्या की तुम्ही त्याच्यावर खूप प्रेम करता आणि कायम त्याच्या बरोबर असणार आहात.
  2. मुलाला सोशल मीडिया पासून काही काळ ब्रेक घेऊ द्या.
  3. वाईट मेसेजला उत्तर देऊ नका.
  4. ते मेसेज save करून ठेवा, नंतर reporting साठी कामी येतात.
  5. हा bully माहीत असल्यास त्याच्या पालकांशी बोला.
  6. शाळेत शिक्षकांना कल्पना द्या, बऱ्याच शाळेत काही पॉलिसीज असतात अश्या bully साठी.
  7. तरीही हा त्रास थांबला नाही तर आपण सायबर पोलिसांकडे तक्रार करू शकता. हे आपण childline phone no 1098 वर रिपोर्ट करू शकतो

थोडक्यात आताच्या वातावरणात, म्हणजेच ह्या माहितीच्या अणुस्फोट झालेल्या सोशल मीडियाच्या जाळ्यात आपण अडकलो आहोत. आपली मुले तर पुरती गुरफटून गेली आहेत. त्यांना ह्या वेब च्या जाळ्यातून सही सलामत बाहेर काढून त्या जाळ्याचा चांगला वापर करायला आपल्याला शिकवायचे आहे. काट्याने काटा काढायचा हा प्रकार आहे.

प्रयत्न नक्कीच करूयात ! 

– समाप्त – 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print