श्री सुनील शिरवाडकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ फुलराणी … ☆ श्री सुनील शिरवाडकर

खूप खूप वर्षांनी काल बालकवींचा “फुलराणी” हातात घेतला. एक एक कविता वाचत गेलो. किती मोठ्या आनंदास आपण मुकलो होतो. शाळेत असताना ‘आनंदी आनंद गडे..’, श्रावणमासी हर्ष मानसी..’ या कविता अभ्यासाला होत्या. पण त्याच्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठीच केवळ त्या वाचल्या होत्या.

लहान मुल ज्या उत्कटतेने.. आनंदाने चहुकडे पाहत असते.. अगदी त्याचप्रमाणे बालकवी निसर्गाकडे बघत.म्हणून तर ते ‘आनंदी आनंद गडे..’ सारखी नादावुन टाकणारी कविता लिहू शकले. या कवितेत वारा वाहतो..चांदणे फुलते..पक्षी गातात. साध्याच गोष्टी.. पण किती नादमाधुर्य.

कल्पना विलास करणे हे बालकवींचे अजून एक वैशिष्ट्य. निसर्गातील द्रुष्ये पाहून कल्पनेने ते त्यावर शब्दांचा साज चढवतात.

इवलाच अधर हलवून

जल मंद सोडीते श्वास..

इवलाच वेल लववुन

ये नीज पुन्हा पवनास..

किती सुंदर कल्पना. पण असे जरी असले तरी कधी कधी ते कल्पनाविलासाच्या बाहेर येऊन निसर्गाचे चित्रण करतात. यातली मला सर्वाधिक भावलेली कविता म्हणजे “औदुंबर”. फक्त आठ ओळीतून बालकवी आपल्या एखादे  डोळ्यासमोर एक लँडस्केप उभे करतात.

ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळासावळा झरा वाहतो बेटांबेटांतुन.

चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे

शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे

*

पायवाट पांढरी तयांतून अडवीतिडवी पडे

हिरव्या कुरणांमधुन चालली काळ्या डोहाकडे.

झाकळुनी जळ गोड काळिमा पसरी लाटांवर

पाय टाकुनी जळांत बसला असला औदुंबर.

रंगांची किती मुक्त उधळण आहे या कवितेत.बालकवींना रंगाची विलक्षण आसक्ती.एका कवितेत ते म्हणतात..

पुर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची

कुणी उधळली मुठ नभी ही लाल गुलालाची.

“फुलराणी” ही तर अजरामर कविता….

हिरवे हिरवे गार गालिचे

हरीत तृणांच्या मखमालींचे.

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

अशीच एक कविता. ” तू तर चाफेकळी “ नावाची.त्यातील कल्पनाविलास पहा..

क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे

भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.

श्रावणातील वातावरणाचे वर्णन करताना बालकवी म्हणतात..

क्षणात येते सरसर शिरवे

क्षणात फिरुनी ऊन पडे.

पहाटेच्या दाट धुक्याचे वर्णन करताना कवी म्हणतो..

 शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी

हर्षनिर्भरा नटली अवनी.

 लाल सुवर्णी झगे घालुनी

हासत हासत आले कोणी.

पानापानातुन.. ओळीओळीतुन शब्दांची श्रीमंती उधळणारा हा निसर्गकवी.”आनंदी आनंद गडे..इकडे तिकडे चोहीकडे” असे म्हणणारा..पण त्याला आयुष्य लाभले जेमतेम अठ्ठावीस वर्षांचे.१९०७ साली पहिले मराठी कवी संमेलन जळगाव येथे झाले. त्या संमेलनात त्यांना “बालकवी” ही पदवी देण्यात आली.आणि त्यानंतर अकरा वर्षांनी रेल्वे अपघातात त्यांचा करुण अंत झाला. शेवटच्या काळात त्यांच्या मनात उदासिनतेची छाया पसरली होती का? कारण एका कवितेत ते म्हणतात..

सुंदर सगळे, मोहक सगळे

खिन्नपणा परि मनिचा न गळे,

नुसती हुरहूर होय जिवाला

कां न कळे काही.

आणि मग..

कोठुनी येते मला कळेना

उदासीनता ही हृदयाला

काय बोचते ते समजेना

ह्रदयाच्या अंतरह्रदयाला.

बालकवींनी या जगाचा निरोप घेतला त्याला मागच्या वर्षी शंभर वर्षे पुर्ण झाली.आणि “फुलराणी” च्या प्रकाशनाला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण झाली. विस्मरणात गेलेल्या या प्रतिभावंत कवीच्या स्मृतींना वाहिलेली ही एक आदरांजली.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments