मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 1 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ वेबच्या जाळ्यात गुंतलेले स्पायडरमॅन… भाग – 1 – लेखिका : डॉ. कल्पना सांगळे ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

“मॅडम …मी ना … इंस्टावर माझ्या डान्स चे रील टाकत असते, ते तुम्ही लाईक करा हां …” वय वर्ष सहा असलेली आदिती मला सांगत होती.

“मी बाळाला तो चार महिन्यांचा असल्यापासून स्क्रीनवर सुंदर सुंदर कार्टून दाखवते, तो ते बघत असतो शांतपणे.”

“जेवतांना त्याला टीव्ही लावून द्यावाच लागतो मॅडम, त्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरत नाही, आणि लावला की तो एक ऐवजी तीन पोळ्या पण खातो !”

हे संवाद ऐकल्यासारखे वाटतात ना ? आपल्याला आपल्या घरी, शेजारी, नातेवाईकांकडे ही अशी मुले नक्कीच सापडतील. ही तर फक्त सुरुवात असते, पुढचे डायलॉग मी सांगते तुम्हाला!

“मॅडम, दिवसातील निम्मा वेळ हा स्क्रीन समोर असतो, आता भिंगाचा चष्मा लागायचा बाकी आहे फक्त !” 

“टीव्ही बंद केला की चिडचिड आणि हातातील वस्तू फेकून मारतो, टीव्ही फोडेल म्हणतो ! मग चालू करूनच द्यावा लागतो.”

“COVID च्या काळात त्याला स्मार्ट फोन घेऊन दिला होता, रात्री चॅटिंग करत असतो, कसले कसले व्हिडिओ बघत असतो, सकाळी त्यामुळे लवकर जाग येत नाही, शाळा बुडते, यंदा दहावीला आहे, फोन पण काढून घेता येत नाहीये, काय करू मलाच समजत नाहीये !”

“मॅडम ह्याला online games ची चटक लागली आहे, कॉलेज मध्ये आहे, सारखे पैसे मागत असतो‌ एकदा दुसऱ्याच्या गाडीतील पेट्रोल चोरत असातांना पकडला गेला होता, ते शेजारी चांगले म्हणून पोलिसात नाही गेले पण उद्या दरोडे टाकायला लागला तर मी काय करू?”

अशा अनेक संवादांना मी सामोरी जात आहे सध्या.

मुद्दा एकच !       

माहितीचा (चांगली – वाईट / खरी – खोटी /उपयोगी – निरुपयोगी ) अमर्याद स्त्रोत्र मोबाइलच्या माध्यमातून, आपल्या हातात अणुबॉम्ब प्रमाणे आहे .त्याचा विस्फोट होतोय आणि ह्या माहितीच्या स्फोटामधून आपल्याला हवी ती आणि तेवढीच माहिती कशी मिळवावी हे आपल्याला शिकवले गेलेले नाहीये !

मागच्या पिढीच्या पालकांचे काम तसे सोपे होते. आताच्या इतकी स्पर्धा तेव्हा नव्हती, एकेका घरात किमान चार पाच मुले असायची. आजी, आजोबा आणि इतर मुलांबरोबर ती आपोआप मोठी होत गेली‌. फार तर दूरदर्शन होते, तो ही सवय लागण्या इतपत लावला जात नव्हता. एकत्र कुटुंब असायचे, शेजारी पण मुलांवर लक्ष्य ठेवून असत. एकंदर काळच वेगळा होता. आपली जडणघडण अशा वातावरणात झाली.

आताची मुले जन्मापासून इंटरनेट बाळे झालेली आहेत‌. आई वडील हौशी, आपल्या मुलाने सर्व आघाड्यांवर पुढेच असले पाहिजे ह्या हट्टापायी त्याला खूप लवकर स्क्रीन exposure देतात. जन्मानंतर देण्यात येणारी BCG लस देताना मोबाईल वर नर्सरी rhymes लावणारी फोन addict आई बघतली आहे मी. बाळाला स्क्रीन ची सवय आपण लावून देतो आणि मग ती सोडवायला मानसोपचारतज्ज्ञ आपल्याला हवे असतात. किती विरोधाभास आहे हा !

त्यात अजून भर म्हणजे रिॲलिटी शोज !

लहान मुलांचे रिॲलिटी शो आले आणि आपली मुले त्याचा भाग व्हावी अशी अनेकांची इच्छा व्हायला लागली. त्यात जरा बरे गाणारे किंवा नाचणारे असतील तर लगेच विविध क्लासेस लावून त्यांना बॉलिवूड नाच, हीप होप, लावणी, contemprary नाच, ब्रेक डान्स वगैरेंमध्ये पारंगत करून शो मध्ये टाकले जाते. अवघ्या सहा ते चौदा पंधरा वर्षांच्या मुलामुलींसाठी जी गाणी आणि नाच निवडला जातो तो कधी कधी त्या वयाला अजिबात शोभणारा नसतो. पण मुलांना मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा पाहून पालक त्यांना प्रोत्साहन देतात. 

आठ वर्षाची मुलगी जेव्हा, “तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंगमहाल..” किंवा, “बाई गं.. कस्स करमत न्हाई….” गाण्यावर बैठकीची लावणी पेश करते, ते हावभाव अगदी बेमालूम करते, त्यावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या जातात, शो चे परीक्षक कौतुक करतात आणि पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात तेव्हा मला हसावे की रडावे हेच समजत नाही.

हे सर्व बघणारा कमी वयाचा प्रेक्षकवर्ग, लैंगिक भावना कमी वयातच जागृत झाल्यावर काय करणार ? हे नक्की काय होतंय ते ही समजत नसते. मग मदतीला इंटरनेट असतेच. नको ते पोर्न बघायला एका बोटाच्या क्लिकचा अवकाश ! न कळत्या वयात नको ते दिसते. लहान वयात लैंगिक गुन्हेगारी मग वाढीस लागते. मुलींमध्ये फार लवकर हार्मोन्स वर परिणाम होऊन पाळी लवकर सुरू होण्याचे हे ही एक कारण असू शकते, अर्थात इतर अनेक कारणे आहेतच! 

त्याच बरोबर OTT नावाच्या प्लॅटफॉर्म वर सेन्सॉरशिप नसल्यामुळे सॉफ्ट पोर्न नावाचा जो प्रकार बोकाळला आहे, आणि त्याचा easy access हा भयावह आहे. इथे पालकांचे लक्ष नसेल तर आपली मुले नक्की काय बघतील आणि त्याचे काय परिणाम होतील त्याची कल्पनाच न केलेली बरी ! 

आपण आता मुलांना सोशल मीडिया, OTT, online games, ह्या आणि इतर अनेक गोष्टींपासून लांब ठेवूच शकणार नाही, हे आधी नीट समजून घ्यायला हवे. आपल्या हातात आता त्यांना इंटरनेट साक्षर करणे एवढेच आहे. ह्या सर्व अमर्याद माहितीतून आपण आपल्याला हवी ती माहिती कशी घ्यावी, स्क्रीन time किती असावा आणि तो कसा असावा ते मुलांना समजावून सांगणे गरजेचे आहे. ह्यावर आपण काय करू शकतो ते आता आपण बघूयात.

IAP म्हणजे भारतातील बालरोगतज्ञांच्या संघटनेने काही guidelines दिलेले आहेत ज्यामध्ये ‘स्क्रीन time’ म्हणजेच तुमच्या मुलांचा दूरदर्शन, संगणक, मोबाईल, किंवा अजून अनेक स्क्रीन असलेली उपकरणे यावर जाणारा वेळ, तो किती असावा, व तो कोणत्या प्रकारे वापरला जावा ह्यावर मार्गदर्शन केलेले आहे.

      – क्रमशः भाग पहिला 

लेखिका :  डॉ. कल्पना सांगळे

पुणे.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आम्ही असे घडलो – लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ आम्ही असे घडलो – लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी ☆ प्रस्तुती – सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

डॉ. हिम्मतराव बावस्कर

३५ वर्ष सतत ग्रामीण भागात वास्तव्य करून ग्रामीण जनतेच्या आरोग्याविषयीच्या समस्या जाणून घेणं आणि त्यावर संशोधन करून त्या समस्या सोडवणं ही डॉ. हिम्मतराव बावस्कर यांच्या जीवनाची व जगण्याची नित्याची बाब झाली आहे. विंचूदंशावर संशोधन करून त्यावर नेमकी व साधी उपाययोजना केल्यामुळे विंचूदंशानं होणारं ४०% मृत्यूच प्रमाण १ टक्क्यावर आलं, याचे श्रेय त्यांना आहे. त्यांचं हे संशोधन जगप्रसिद्ध ‘ लॅन्सेट ‘ या वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालं. तसंच त्यांचे सर्पदंश, फ्लूरोसिस, हृदयरोग, थायरॉइड इ. आजारावरील संशोधनाचे ४५ प्रबंध प्रसिध्द झाले आहेत. जगभरातून याविषयी सल्ला मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे विचारणा होते. शून्यातून वर येऊन जागतिक संशोधनाचा पल्ला गाठणाऱ्या डॉ बावसकर यांची ही जडणघडण…

फुटलेल्या दगडी पाटीच्या तुकड्यावर अभ्यास करून शिक्षणाची सुरुवात, घरची गरिबी एवढी की शिक्षण बंद करून शेतात काम करावं अशी परिस्थिती. शिक्षण बंद होऊ नये म्हणून मग सुटीच्या दिवशी स्टँडवर कॅलेंडर, डायऱ्या, पंचांग विकणे; लाकड फोडणं, मोळ्या बांधणं अगदी बांधकामावर बिगारीच काम करणे अशी हिम्मतरावांच्या शिक्षणाची सुरुवात. त्यामुळे ते म्हणतात, मी जरी व्यवसायाने व बुद्धीने डॉक्टर असलो तरी हाडाचा शेतकरी आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, हा अभ्यास पुढे मानव जातीला उपयुक्त ठरणार आहे हा विचार नेहमीच त्यांच्या मनात येत असे. त्यामुळे फक्त परीक्षेपुरता अभ्यास त्यांनी कधीच केला नाही.

“पॅथाॉलॉजी ही वैद्यकीय शास्त्राची जननी आहे ” हे प्राध्यापकांच वाक्य कानी पडताच “बाॉइडची पॅथाॉलॉजी” हे हजार पानांचे पुस्तक पाठ करण्याचा प्रयत्न केला, ते पाठ करण्यासाठी पहिल्या परीक्षेला ते मुद्दाम बसले नाहीत. नेटाने अभ्यास करून परीक्षा देताना काचेच्या स्लाईडवर लावलेले रक्त स्त्रीचे आहे, हे ओळखलं. मायक्रोस्कोप खाली बघितल्यावर तेव्हा जगप्रसिद्ध पॅथाॉलॉजिस्ट डॉ.के. डी. शर्मा यांनी पैकीच्या पैकी गुण दिले. त्यामुळे हिम्मतराव त्यांचे आवडते विद्यार्थी बनले. त्यांनीच पुढे त्यांना एम. डी. साठी मदत केली. पुढील शिक्षण घेणे कठीण असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी नोकरी इमानदारीत १७ वर्षे केली. खाजगी प्रॅक्टिस केली नाही. विशेष म्हणजे जिथे कोणी वैद्यकीय अधिकारी जायला तयार नव्हता, त्या त्या ठिकाणी ते रूजू झाले.

कोकणामध्ये लाल जातीचे विंचू भयंकर विषारी आहेत, या भागात विंचूदंशाने मृत्यूच प्रमाण ४०% वर होतं, परंतु त्याबद्दल काहीही संशोधन झालेले नव्हते. हिम्मतरावानी विंचूदंशाच्या रुग्णांचा सखोल अभ्यास करायचं ठरवलं. विंचुदंश झालेल्या रुग्णांच्या नोंदी ठेवण्यास सुरुवात केली..

नाडीचे ठोके, रक्तदाब, थंड पडलेले हातपाय, हृदयात वाढलेला दाब आणि हृदय कमकुवत होऊन फुफ्फुसात पाणी साचून व दम लागून शॉकने रुग्ण दगावतात असे त्यातून सिद्ध झाले. त्याबद्दलचे हिंमतरावांचे प्राथमिक पत्र  “लॅन्सेन्ट” (वैद्यकीय क्षेत्रातील जगातले एक अत्यंत मानाचे जर्नल) मध्ये १९७८ ला प्रसिद्ध झाले. हे पत्र पाहून त्यांचे शिक्षक डॉ के. डी. शर्मा अतोनात खूष झाले. पुढील काळात संशोधनालाच चिकटून रहायचे असे हिम्मतरावानी ठरवले. संशोधनाने व ज्ञानाने मानव जातीवर उपकार होतात व जगात सर्वांना त्याचा लाभ मिळतो, पुढील काळात हीच संपत्ती मानली जाणार होती.

विंचूदंशाचे रुग्ण ज्ञात असलेल्या उपायाला दाद देत नव्हते. विंचूदंशावर प्रतिलस काढा, ही सर्वत्र मागणी होत होती. एम. बी.बी. एस. चे ज्ञान संशोधनाला कमी पडत आहे असे वाटल्यामुळे हिम्मतराव एम. डी. करण्यासाठी पुण्याला बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये रूजू झाले. त्यावेळेस त्यांनी अभ्यासलेल्या ५१ केसेस चा ” विंचूदंशाची प्राथमिक लक्षणे” हा प्रबंध १९८२ मध्ये “लॅन्सेन्ट ” मध्ये प्रसिद्ध झाला. विंचूदंशाच्या गंभीर रुग्णावर ‘प्राझोसीन ‘ हे औषध सापडले त्यांना. एका वर्षात २०० केसेस या औषधाने त्यांनी चांगल्या केल्या. “प्राझोसिन” हेच विंचूदंशावर योग्य औषध म्हणून १९८६ मध्ये “लॅन्सेन्ट” मध्ये प्रसिद्ध झालं. विंचुदंशाने शरीरातील अल्फा रिसेप्टर उत्तेजित होतात तर “प्राझोसीन ” हे अल्फा ब्लॉकर आहे. ह्यामुळे विंचूदंशाने होणाऱ्या परिणामावर “प्रोझोसीन ” मारा करते, म्हणून त्याला अँटिडोट असे म्हणतात.

भारतामध्ये पाँडीचेरी, कर्नुल , बेलारी, कच्छ या भागामध्ये कोकणासारखे विंचू आहेत. या भागातही प्राझोसीन वापरून मृत्यूचे प्रमाण घटले आहे. तसेच टर्की, अरेबियन देशात वेगळ्या जातीच्या विंचूदंशावरही ‘ प्राझोसीन ‘ वापरणं सुरू झालं आहे . आता बाजारात प्रतिलस ही आली आहे. 

लंडन येथील “सीबा फाऊंडेशन” द्वारा आयोजित वैज्ञानिकांच्या चर्चासत्रास डॉ हिम्मतराव बाविस्कर उपस्थित होते. त्यावेळी प्रतिलस विरुद्ध  ‘प्राझोसीन’ असा वाद सुरू झाला. तेव्हा अध्यक्षांनी हिम्मतरावाना त्यांचे विचार मांडण्यासाठी पाचारण केले. ते म्हणतात, एक भारतीय म्हणून माझे विचार तेथे मांडताना मला भरून आले. अनेक शास्त्रज्ञांना समक्ष भेटण्याची संधी मिळाली.

कुठल्याही आधुनिक सुविधा जिथे पोहोचल्या नाहीत, अशा खेड्यातील एका अशिक्षित कुटुंबात जन्म घेऊनही हे जगप्रसिद्ध संशोधन त्यांच्याकडून कसं घडलं, याचं वारंवार कुतूहल आणि आश्चर्य व्यक्त होत आहे. ते म्हणतात, या संशोधनाच्या कामात गरिबी, शिक्षणातील अडचणी, इतरांच्या टीका काही काही आडवं आलं नाही.

लेखिका : सुश्री प्रज्ञा पावगी

संकलक : गिरीश क्षीरसागर 

© सौ. श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ….आणि मृत्यूही गहिवरला !!! ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

…आणि मृत्यूही गहिवरला !!! ☆  श्री संदीप रामचंद्र सुंकले 

समर्थांनी दासबोधातील एक अख्खा समास मृत्यूवर खर्च केला आहे, याचा अर्थ मृत्यूचे आपले जीवनातील महत्व वादातीत आहे. आज मा. मनोहर पर्रिकरांच्या मृत्यूची बातमी येऊन थडकली आणि मनात पहिला विचार मनात आला की आज मृत्यूही गहिवरला असेल. 

यमाने तर आपले यमदूत अनेक दिवस त्यांच्या मागावर धाडले होते. अनेक युक्त्याप्रयुक्त्या करुन ते यमदूत त्यांना घेऊन जाण्याचा  प्रयत्न करीत होते. आज मात्र त्यांनी घाला घातला. यमदूतांचे काम यमाचा आदेश पाळणे, त्यामुळे त्यांचा काही दोष आहे, असे म्हणणे योग्य होणार नाही.

या धरतीवर अनेक जीव जन्मास येतात आणि यथाकाल आपले जीवन संपवतात. पण काही लोक नुसते जगत नाहीत तर  आपली ‘पात्रता’ वाढवत जातात. अशा लोकांचा मृत्यू  सुद्धा एका वेगळ्या अर्थाने ‘सोहळा’ होतो. आज यमाच्या दरबारात आनंदोत्सव असेल कारण आज एक ‘कर्मयोगी’ मृत्यूलोकातून यमलोकात प्रवेश करीत असेल.

एक तरुण साधारण २५-३० वर्षांपूर्वी IIT सारख्या नामांकित संस्थेतून पदवीधर होतो आणि नोकरीसाठी परदेशात न जाता परत गोव्यात येतो. त्याकाळी उपेक्षित असलेल्या राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतो आणि अनेक साथीदार सोबत घेऊन, चांगले संघटन करून गोव्याची सत्ता ताब्यात घेतो आणि एखाद्या चित्रपटाच्या कथेला लागू होईल असे जीवन जगतो. हे सर्व विलक्षण नव्हे काय ?

मुख्यमंत्री झाल्यावर ही पोशाख न बदलणारा पर्रिकरांसारखा एकमेव मुख्यमंत्री असावा. त्यांनी ना कधी आपला पोशाख बदलला ना कधी आपले माणूसपण बदलले.  हे लिहायला जितके सोपे तितके आचरणात आणायला भयंकर अवघड!!. पण मा. पर्रिकरांनी ते ‘जगून’ दाखवले.

स्कुटर वर फिरणारा, सर्वाना सहज उपलब्ध होणारा मुख्यमंत्री असा लौकिक त्यांनी मरेपर्यंत टिकवला, नव्हे तो  त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला असे म्हणता येईल.

“कार्यमग्नता’ जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती” हे काव्य मा.मनोहर पंतांनी जगून सिद्ध केले. मनुष्याचे काम बोलते हे  वचन आणि अशी अनेक वचने त्यांच्या जीवनाची अविभाज्य भाग होती असेच म्हणावे लागते. त्यांच्या बद्दल बोलताना माझे शब्दभांडार अपुरे पडत आहे पण लिहिणारा  हात थांबायला तयार नाही. 

आज मृत्यू ही त्यांच्या आत्म्यास नेताना गहिवरला असेल. या आधी जेव्हा जेव्हा यमदूत त्यांना न्यावयास आले असतील तितक्या वेळा  परममंगल  अशा भारतमातेने त्या यमदूतांस नक्कीच अडवले असेल. ती म्हणाली असेल, “माझ्या या लाडक्या लेकास नको घेऊन जाऊ.”  पण शेवटी नीयतीच्या पुढे कोणाचेच चालत नाही, हेच खरे…!!

श्री मनोहर पंतांचे सारे जीवन भारतमातेच्या सेवेत खर्ची पडले. 

इंग्रजी मध्ये एक ‘म्हण’ आहे.

It’s very easy,

To give an Example,

But

It’s Very Difficult, 

To become an Example.Try to be an Example.

मा. मनोहरपंत असेच जगले. त्यांच्या जीवनचारित्रास मी ही शब्द सुमनांजली अर्पण करीत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शापित आहे श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

शापित आहे श्रीकृष्णाचा गोवर्धन पर्वत –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

वृंदावनमध्ये गोवर्धन पर्वताचा खास महिमा आहे. वैष्णव लोक या पर्वताला श्रीकृष्ण समान मानतात. मान्यतेनुसार, गोवर्धन पवर्ताची परिक्रमा आणि पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. पृथ्वीवर गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्णाचे धाम गोलोकमधून आला होता. मान्यतेनुसार, एका शापामुळे या पर्वताची हळू-हळू झीज होत आहे.

गोवर्धन पर्वताला का देण्यात आला होता शाप ?? 

कथेनुसार श्रीकृष्णाच्या प्रेरणेने शाल्मली द्वीप मध्ये द्रोणाचल पत्नीच्या गर्भातून गोवर्धन पर्वताचा जन्म झाला. गोवर्धनला परमेश्वराचे रूप मानून हिमालय, सुमेरु इ. पर्वतांनी त्याची गिरीराज रुपात पूजा केली. एकदा तीर्थयात्रा करत पुलत्स्य ऋषी गोवर्धन पर्वताच्या जवळ आले. पर्वताचे सौंदर्य पाहून ऋषी मंत्रमुग्ध झाले आणि द्रोणाचल पर्वताला म्हणाले की, मी काशीला राहतो आणि तुम्ही तुमचा मुलगा गोवर्धन मला द्या. मी त्याला काशीमध्ये स्थापित करून तेथेच त्याचे पूजन करेल.

द्रोणाचल मुलाला देण्यासाठी तयार नव्हते परंतु गोवर्धन ऋषीसोबत जाण्यास तयार झाला. त्यापूर्वी गोवर्धन पर्वताने ऋषींना एक अट घातली. तुम्ही मला ज्या ठिकाणी ठेवाल त्या ठिकाणी मी स्थापित होईल. पुलत्स्य ऋषींनी गोवर्धनची अट मान्य केली. गोवर्धन पर्वत ऋषींना म्हणाला की, मी दोन योजन उंच आणि पाच योजन विस्तीर्ण आहे. तुम्ही मला कसे घेऊन जाल?

पुलत्स्य ऋषींनी सांगितले की, मी तुला माझ्या तपोबलावर हातावर उचलून घेऊन जाईल. त्यानंतर ऋषी गोवर्धनला घेऊन निघाले. वाटेत वृंदावन आले. वृंदावन पाहून गोवर्धनची पूर्वस्मृती जागृत झाली आणि त्याला आठवले की, याठिकाणी श्रीकृष्ण आणि देवी राधा बाल्यावस्था आणि तारुण्य काळात विविध लीला करणार आहेत. हा विचार करून गोवर्धन पर्वताने स्वतःचा भार आणखी वाढवला. यामुळे ऋषींना विश्राम करण्याची आवश्यकता वाटू लागली आणि त्यांनी गोवर्धनला हातावरून खाली ठेवले. गोवर्धन पर्वताला या मार्गात कोठेही ठेवायचे नाही, ही अट ऋषी विसरले.

काही काळानंतर ऋषी पर्वताजवळ आले आणि उचलण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा गोवर्धनने सांगितले की आता मी कोठेही जाऊ शकत नाही. मी तुम्हाला निघतानाच माझी अट सांगितली होती. त्यानंतर ऋषींनी गोवर्धनला सोबत येण्याचा खूप आग्रह केला परंतु गोवर्धनने नकार दिला. त्यानंतर संतप्त झालेल्या ऋषींनी गोवर्धन पर्वताला शाप दिला की, तुझ्यामुळे माझे कार्य अपूर्ण राहिले त्यामुळे आजपासून दररोज तीळ-तीळ तुझी झीज होईल आणि काही काळानंतर तू या जमिनीत सामावाशील. तेव्हापासून गोवर्धन पर्वत झिजत आहे. कलियुगाच्या अंतापर्यंत हा जमिनीमध्ये सामावलेला असेल……. 

लेखक : अज्ञात 

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नाना फडणवीस ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? इंद्रधनुष्य ?

☆ नाना फडणवीस ☆ श्री प्रसाद जोग

बाळाजी जनार्दन भानू ऊर्फ नाना फडणवीस ( निधन: १३ मार्च, १८००.)

पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील ते एक मुत्सद्दी होते. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते.लहानपणापासून नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. 

पेशवाईच्या काळात त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर माधवराव खुश असायचे.हिशोबातील काटेकोरपणा स्वतःला संभाळून काम करण्याची त्यांची वृत्ती माधवरावांना माहित होती. नानांच्या बाहेरख्यालीपणाबद्दल पेशव्यांना माहिती नव्हती असे नाही,पण त्याचा कोणताही त्रास राज्याला होत नाही ना हे ते पाहायचे. सेवकाच्या खाजगी आयुष्यात ते लक्ष घालत नसत. अंतकाळी थेऊर येथे नारायणरावांच्या हात विश्वासाने नानाच्या हाती दिला व त्यांना सांभाळून राज्य चालवा असे सांगितले.

माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवे बनलेल्या नारायणरावांचा राज्यकारभार चालवण्या इतका वकूब नव्हता.त्यांचा खून केला गेला त्या वेळी त्यांची पत्नी गंगाबाई गरोदर होती.राघोबादादांच्या वर्तुणुकीला उबगलेले सारे कारभारी एकत्र झाले त्यातूनच बारभाई हा गट सक्रिय झाला आणि त्याचे प्रमुखपद नाना फडणवीसांनी सांभाळले आणि त्यांनी गंगाबाईला झालेल्या पुत्राला माधवराव (दुसरे) याना पुढे करून राज्यकारभार केला. 

थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा पूर्वपदावर  आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवले. पुण्याचे वैभव वाढवले.

वाई (मेणवली) येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे. मेणवली येथील त्यांच्या वाड्यात खूप चित्रपटांचे चित्रीकरण होत असते.

पेशवाईमध्ये साडेतीन शहाणे प्रसिद्धीस पावले होते.१) नागपूरकर भोसल्याचे “देवाजीपंत”२)हैद्राबादच्या निजामाचे “विठ्ठल सुंदर”३)पेशव्यांच्या दरबारातील “सखारामपंत बोकील”(बापू)

वरील तिघांना पूर्ण शहाणे म्हटले जायचे कारण हे तिघेही मुत्सदी तर  होतेच त्याच बरोबर त्यांना युद्धकला देखील अवगत होती.

चवथे शहाणे पेशव्यांच्या दरबारातील :नाना फडणवीस,मुत्सद्दी असले तरी यांच्या जवळ युद्ध कला नव्हती तेव्ह्ड्यासाठी त्यांना अर्धे शहाणे म्हटले गेले.

नाना फडणवीस यांची नऊ लग्ने झाली होती; शिवाय त्यांना दोन रखेल्या होत्या. नानांचे पहिले लग्न दहाव्या वर्षी झाले.  नानांच्या नऊ बायकांपैकी सात त्यांच्या हयातीत वारल्या; नाना वारले तेव्हा त्यांची आठवी पत्‍नी बगाबाई व नववी जिऊबाई या देवसेवेसाठी सिद्धटेकला होत्या; त्यांना ही बातमी समजताच त्या पुण्यास येण्यास निघाल्या. वाटेत त्यांना ताब्यांत घेण्यासाठी पेशव्यांनी फौज पाठविली. परंतु तिला या बायकांच्या सोबत असलेल्या अरबांनी हुसकावून दिले, असे इंग्रज इतिहासकार मॅकडोनल्ड म्हणतो. या स्त्रिया पुण्यास आल्यावर बगाबाई नानांच्या पश्चात चौदा दिवसांनी वारली. जिऊबाईचे वय यावेळी नऊ वर्षांचे होते. तिने नानांनी अर्धवट ठेवलेले भीमाशंकराचे देऊळ बांधून पुरे केले.

रावबाजीच्या म्हणजे दुसऱ्या बाजीराव पेशव्याच्या स्वभावाचा धसका नाना फडणवीस यांच्या जिऊबाई या पत्नीनेही घेतला होता. नाना गेल्यावर या बाजीरावाने नानांच्या अरबांचा पगार चुकता करून नानांचे वाडे, जहागीर व इनामी गावे जप्त केली. नानांजवळील अफाट संपत्ती हाती येण्यासाठी जिऊबाईस शनवारवाड्यात आणून ठेवले. दौलतराव शिंद्याचीहि त्या संपत्तीवर दृष्टी असल्याने, त्याने बाईस दत्तक देऊन आपल्या ताब्यात देण्याबद्दल पेशव्यांस विनंती केली, पण पेशव्यानी ती नाकारली, आणि नानांचा पक्का सूड उगवला.

यानंतर नानांच्या पक्षाच्या सर्व मंडळींस पेशव्यानीं  नजरकैदेत ठेवले. यशवंतराव होळकराने पुणे जाळले, तेव्हा रावबाजी पळून गेले होते. तेव्हा जिऊबाई वाड्यातच होती. नानांचा व आपल्या घराण्याचा पूर्वापार संबंध जाणून यशवंतरावाने बाईस लोहगड (हा किल्ला नानांस सरकारांतून बक्षीस मिळाला होता) किल्ल्यावर नानांचा विश्वासू नोकर धोंडोपंत नित्सुरे याच्या स्वाधीन केले. नानांचा मुख्य खजिना तेथेच असे.

इंग्रजी राज्य झाल्यावर एलफिन्स्टनने बाईस पुण्यास आणून वार्षिक हजारांची नेमणूक कायम करून, बेलबाग संस्थान व मेणवली गाव जप्तीतून मोकळे केले. नंतर बाई मेणवलीस जाऊन राहिली. तिने १८२७ मध्ये मिरजेच्या गंगाधरराव भानू नावाच्या मुलास इंग्रजांच्या संमतीने दत्तक घेऊन त्याचे नाव माधवराव ठेविले व त्यास आपली बारा हजारांची नेमणूक, बेलबाग संस्थान व मेणवलीची वहिवाट मिळावी म्हणून फार खटपट केली; परंतु इंग्रजांनी तिचे काही एक ऐकले नाही.१८५४ च्या मार्चमध्ये जिऊबाई वारली. 

नाना फडणवीस यांच्या माधवरावांच्या पश्चातल्या कालखंडामधील जीवनावर लेखक विजय तेंडुलकर यांनी “घाशीराम कोतवाल”हे नाटक लिहिले आणि त्याचा पहिला प्रयोग,१६ डिसेंबर,१९७२ रोजी पुण्यातल्या भरत नाट्य मंदिरात झाला.या नाटकाने पुण्यात प्रचंड वादळ उद्भवले होते.

पेशवाईमधील इतिहासात स्वतःचे नाव नाव अधोरेखित करणाऱ्या नाना फडणवीस याना अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय सहावा — आत्मसंयमयोग — (श्लोक ४१ ते ४७) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।

शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४१ ॥

*

पुण्यवान जाहला असेल जरी योगभ्रष्ट

स्वर्गप्राप्तीपश्चात तया श्रीमान वंश इष्ट ॥४१॥

*

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्‌ ।

एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्‌ ॥ ४२ ॥

*

प्रज्ञावान कुळात अथवा येई तो जन्माला

ऐसा जन्म या संसारे दुर्लभ प्राप्त व्हायाला ॥४२॥

*

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम्‌ ।

यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥ ४३ ॥

*

पुर्वसुकृते तयास मिळतो योगसंस्कार पूर्वदेहाचा

तयामुळे यत्न करी अधिक तो परमात्मप्राप्तीचा ॥४३॥

*

पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।

जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥ ४४ ॥

*

पूर्वाभ्यासे अवश त्यासी भगवंताचे आकर्षण 

योगजिज्ञासू जाई सकाम कर्मफला उल्लंघुन ॥४४॥

*

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम्‌ ॥ ४५ ॥

*

सायासाने करी अभ्यास योगी बहुजन्मसिद्ध 

संस्कारसामर्थ्ये पापमुक्त त्वरित परमगती प्राप्त ॥४५॥

*

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।

कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

*

तपस्वी तथा शास्त्रज्ञाहुनी श्रेष्ठ असे योगी

सकाम कर्मे कर्त्याहुनिया खचित श्रेष्ठ योगी

समस्त जीवितांमध्ये योगाचरणे सर्वश्रेष्ठ योगी

कौन्तेया हे वीर अर्जुना एतदेव तू होई योगी ॥४६॥

*

योगिनामपि सर्वेषां मद्‍गतेनान्तरात्मना ।

श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥

*

योग्याने ज्या भजिले मजला श्रद्धावान अंतरात्म्याने

परमऱश्रेष्ठ योगी म्हणुनी त्या स्वीकारिले मी  आत्मियतेने  ॥४७॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥

*

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी आत्मसंयमयोग  नामे निशिकान्त भावानुवादित षष्ठोऽध्याय संपूर्ण ॥६॥

– क्रमशः …

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्यांना समजून घेताना… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

सौ.अश्विनी कुलकर्णी

🌈 इंद्रधनुष्य 🌈 

☆ त्यांना समजून घेताना… ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

(World Bipolar day निमित्त…) 

एक साठीच्या आसपासचे गृहस्थ आपल्या ३४  वर्षाच्या ‘क’ नावाच्या मुलाला घेऊन माझ्याकडे आले. कसबसं याला घरातल्या चौघांनी  धरून आणले  बघा मॅडम अस ते म्हणाले. घरी सर्वांच्या अंगावर ‘क’ धावून जातो. घरातून पळून रस्त्यावर जातो. अजिबात झोपत नाही. सारख्या येरझाऱ्या घालतो. सारखी बडबड करतो.  आठवडा झाला अस करतोय. कामावर जात नाही.

‘क’ बोलण्याच्या किंवा ऐकून घेण्याच्या अवस्थेत नव्हतेच. त्यांना त्यांच्या आजाराचीही कल्पना नव्हती. मी ‘क’ ची केस हिस्टरी  घेण्यासाठी अनेक प्रश्न रुग्णाच्या वडिलांना विचारले. त्यांच्यासोबत त्याचे भाऊ,मित्र ही आले होते. त्यांकडूनही क च्या केस बद्दल उपयुक अशी माहिती मिळत गेली.

वडील सांगत होते, क आणि त्याच्या पत्नीमध्ये सारखे किरकोळ कारणास्तव वाद होत होते. एके दिवशी पत्नी घर सोडून माहेरी गेली. परत आलीच नाही. त्यानंतर हळूहळू त्याचं वागणं बदलू लागलं. आता हा अस वागतोय. पण याआधी काही दिवस, वेगळंच वागण होत त्याच.  मी खूप थकलोय, माझ्यात शक्ती नाही म्हणत होता. जेवत नव्हता. एकटक कुठंतरी बघत बसायचा. अधून मधून रडायचा. सारख दिवसभर झोपायचा. आत्महत्येबद्दल विचार येत होते. आम्हाला काही कळत नाहीए. काय झालंय याला ? दोन तीन महिने झाले ,मधूनच कधी गप्पच होतो तर कधी तरी एकदम अंगात काही संचारल्या सारखा वागतो. सगळे देवधर्म केले,काही उपयोग नाही झाला. गावातल्या डॉक्टरांनी औषध दिली पण त्याचाही काही उपयोग नाही झाला.

‘क’ यांचा पूर्व इतिहास, कौटुंबिक इतिहास आणि इतर सर्व गोष्टी मानसशास्त्रीय दृष्टीने जाणून घेतल्या. त्यांची आजाराची लक्षण,  कालावधी निकषाद्वारे पडताळून पाहता, ‘क’ हे सध्या अत्योन्माद(Mania) अवस्थेत होते. आणि यापूर्वीची त्यांची अवस्था विषादावस्था (Depression) होती. आलटून पालटून येणाऱ्या या भावावस्था म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती-1 (Bipolar Disorder-1) अशी त्यांची विकृती होती.

पण एकंदरीत त्यांची सध्याची भावावस्था, लक्षणांची तीव्रता  ही नुसत्या चिकित्सेने कमी होणारी नव्हती. त्यामुळे मी क च्या आजाराबद्दल त्याच्या वडिलांना कल्पना दिली. आणि त्यांना मनोविकारतज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला.

मनोविकारतज्ञांचे उपचार सुरू झाले. काही दिवसानंतर त्यांच्या उपचारांसोबतच  ‘क’ व्यक्तीवर, मी थेरेपी सत्र सुरू केली. उपचार आणि थेरेपीने काही महिन्यातच  ‘क’ मध्ये लक्षणीय फरक दिसून आला. तो कामाला जाऊ लागला. त्याचे आत्महत्येचे विचार बंद झाल्याने, त्याला काहीतरी नवीन करण्याची इच्छा वाटू लागली. व्यायाम,योगा करत आपली मानसिक अवस्था सुधारण्यासाठी तो स्वतःही प्रयत्न करू लागला. 

भावस्थिती विकृती (Mood Disorder) – एमिल क्रेपलिन यांनी १८९९ मध्ये अतिउत्साहविषाद विकृतीचे (Manic Depressive Insanity) वर्णन केले आहे. हिच विकृती उभयावस्था भावविकृती म्हणून ओळखली जाते. या विकृतीस उन्माद अवसादविकृती असेही म्हटले जाते. भावस्थिती विकृतीमध्ये दोन भावस्थिती प्रामुख्याने आढळतात…

द्विध्रुवीय भावविकृती – । मध्ये अत्योन्माद (Mania) आणि विषाद (Depression)अश्या दोन्ही अवस्था व्यक्ती अनुभवते. 

द्विध्रुवीय भावविकृती – ॥ मध्ये अल्पोन्माद (hypomania) आणि विषाद/अवसाद (Depression) या दोन्हीचे झटके आलटून पालटून दिसून येतात. 5 ते 10 टक्के केसेस मध्ये द्विध्रुवीय ॥ विकृती ही द्विधृवीय – 1 मध्ये विकसित झाल्याचे दिसते.

चक्रीय विकृती (सायक्लोथायमिक डिसॉर्डर)-

अल्पोन्माद आणि विषाद आलटून पालटून येणारी स्थिती. 

या विकृती उद्भवण्यास अनेक जैविक तसेच मानसशास्त्रीय घटक कारणीभूत असल्याचे विविध संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

कित्येक कुटुंबात, नात्यात, परिसरात अशा अनेक व्यक्ती असतात की, परिस्थितीनुसार, घटनेनुसार,आघातानुसार आणि इतर अनेक कारणांनी व्यक्तीची मानसिक अवस्था बिघडलेली असते. त्यांना नक्की काय होत आहे हे कुटुंबातील इतर व्यक्तींच्या लक्षातच येत नाही. कुणी मानसोपचाराचा सल्ला दिला तर ते उधळून लावतात.  मानसोपचार घेतोय अस समजलं तर समाज काय म्हणेल? वेडा म्हणून लेबल लागेल का? आपण घरापासून, नात्यांपासून,समाजापासून दूर जाऊ का?  ह्या अस्वीकाराच्या विचारांनी आणि भीतीपोटी रुग्ण आणि रुग्णाचे कुटुंबीय रुग्णासाठी इतर  विविध उपचारांचा अवलंब करतात. तोपर्यंत त्रास वाढलेला असतो. रुग्णाचे वर्तन क्षतीग्रस्त झालेले असते. 

विकृतीची लक्षणे हळूहळू सुरू झाली की, काही वेळेस कुटुंबियांना वाटू शकते ही व्यक्ती असे वर्तन मुद्दाम करते आहे का? परंतु लवकरात लवकर मानसोपचार तज्ञाद्वारे उपचार घेणे गरजेचे आहे.  अर्थात या आजारापासून बरं होण्यासाठी औषधे घेणं खूप गरजेचं आहे. पण त्यासोबतच रुग्णाला मानसिक उपचार, थेरपी, स्वतःला मदत करणाऱ्या स्ट्रॅटेजी वापरून बरे होता येते. मात्र यासाठी रुग्ण व्यक्तीस पुरेशी झोप, योग्य आहार, कुटुंबाची साथ नक्कीच मिळायला हवी.

आज World Bipolar day म्हणजेच द्विध्रुवीय भावविकृती जनजागृती दिवस. 

30 मार्च हा दिवस विन्सेन्ट वॅन गॉग या जागतिक कीर्तीच्या फ्रेंच चित्रकाराचा  जन्मदिन आहे. वॅन गॉगला हा रोग असल्याचे त्याच्या निधनानंतर लक्षात आले. त्यामुळे त्याच्या जन्मदिनीच हा दिवस याबाबत जनजागृती व्हावी म्हणून साजरा केला जातो.  वॅन गॉगशिवाय यो यो हनी सिंग, शामा सिकंदर, विन्स्टन चर्चिल यांनी या रोगावर यशस्वी मात केली. जगातले अंदाजे २.८ टक्के नागरिक याने ग्रस्त आहेत.  भारतात हे प्रमाण अंदाजे ६.७ टक्के इतके आहे.           

मानसिक आजार असलेल्या सर्व व्यक्तींना इतर नागरिकांप्रमाणेच समाजात राहण्याचा, काम करण्याचा आणि उपचार घेण्याचा अधिकार कायद्यात आहे. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेणे अत्यावश्यक आहे, तसेच अशा व्यक्तींना, समाजातील व्यक्ती या नात्याने स्वीकारून, त्यांची  मनं समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे!

© सौ अश्विनी कुलकर्णी

मानसतज्ञ, सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च ☆ श्री प्रसाद जोग

जागतिक रंगभूमी दिन :: २७ मार्च

‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला.

जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास

१९६१ साली युनेस्कोच्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने जागतिक रंगभूमी दिनाची सुरुवात केली. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ साली साजरा करण्यात आला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी कुणीही एकजण दरवर्षी संदेश देतो. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. पहिल्या वर्षी १९६२ साली पहिला संदेश देणारी व्यक्ती म्हणजे ज्यो कॉक्चू होते.

वृत्तपत्रांतून मराठी नाटकांच्या येणाऱ्या जाहिराती पाहिल्या तर सगळी नाटके जोरदार व्यवसाय करत असतील असे वाटते. काही नाटकांचा अपवाद वगळता अन्य नाटकांना चांगले बुकिंग मिळत नाही. एके काळी काही मातब्बर नाटय़गृहातून दिवसातून मराठी नाटकांचे तीन-तीन प्रयोग होत असत. नाटय़गृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’ची पाटी झळकत असे. आता रविवार किंवा अन्य सुट्टीच्या दिवशीही अपवाद वगळता नाटक ‘हाऊसफुल्ल’ जात नाही, हे वास्तव आहे. नाटय़गृहाची भरमसाठ भाडी, जाहिरातींचे वाढलेले दर, कलाकारांची ‘नाईट’, एकमेकांशी असलेली स्पर्धा, नाटकाचा निर्मिती खर्च आणि तुलनेत मिळणारे उत्पन्न, प्रेक्षकांचा प्रतिसाद, तरुण पिढीचे पाठ फिरविणे या चक्रव्यूहात आजचे मराठी नाटक सुरू आहे.

पूर्वी नाटक कंपनी बस घेऊन त्यामध्ये सर्व नेपथ्य व कलाकारांना समवेत दौऱ्यावर निघायची व १५ / २० दिवसांचा दौरा आटपून परत जायची गावोगावच्या स्थानिक वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिराती यायच्या. दोन दिवस आधी तिकीट विक्री सुरु व्हायची आणि रसिक प्रेक्षक रांग लावून तिकिटे खरेदी करायचे.

हल्ली नाटकांचे दर ५०० /३००/२०० असे असतात.या मुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित  बिघडते  म्हणून प्रेक्षकांनी नाट्यगृहाकडे पाठ फिरवली आहे.

लंडन मध्ये दि माउस ट्रॅप नावाचे नाटक सुरु आहे. या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑक्टोबर ,१९५२ रोजी सादर केला गेला. तेंव्हापासून हे नाटक रोज अव्याहतपणे सादर केले जाते. रूढी आणि परंपरा प्रिय ब्रिटिश जनता या अगाथा ख्रिती च्या या रहस्यमय नाटकाचा  शेवट माहीत असला तरी येणाऱ्या पाहुण्याला  हे नाटक दाखवायला नेतात. कधी कधी एका दिवसात जास्त प्रयोग देखील केले जातात. १८ नोव्हेंबर,२०१२ साली या नाटकाचा २५००० वा प्रयोग सादर झाला.कलाकार बदलत गेले मात्र नाटक सुरूच आहे.१६ मार्च २०२० पर्यंत सतत चालू राहिला. कोविड-१९ साथीच्या आजारा दरम्यान हे नाटक तात्पुरते बंद करावे लागले. त्यानंतर १७ मे २०२१ रोजी या नाटकाचे पुन्हा प्रयोग सुरु झाले.

तसे एखादे गाजलेले  नाटक मुंबई / पुण्यासारख्या शहरात दररोज सादर व्हायला हवे. महाराष्ट्र शासन कोट्यवधी रुपये कितीतरी टाळता येणाऱ्या गोष्टीवर खर्च करत असते. सरकारने मराठीचा मानबिंदू म्हणून असे एखादे नाटक निवडावे व गावोगावीच्या कलाकारांना ते सादर करायला सांगावे आणि त्यांना त्या बद्दल मानधन द्यावे. तिकीट विक्री अल्प दरात करावी म्हणजे प्रेक्षक येतील आणि कमी पडणारे पैसे शासनाने घालावेत, या मुळे रंगभूमी जिवंत राहील आणि त्या साठी फार मोठा खर्च येईल असे वाटत नाही.मात्र परंपरा जपल्याचे श्रेय सरकारला जाईल.नाटक कोणते ठरवावे ते त्यातल्या जाणकार लोकांना विचारून किंवा प्रेक्षकांचे बहुमत घेऊन ठरवावे असे वाटते. पुणे आणि मुंबई ही दोन्ही महानगरे आहेत आणि येथे दररोज ये जा करणाऱ्या लोकांची संख्या खूप असल्यामुळे प्रेक्षकांची उणीव भासणार नाही.

जीव तोडून दिवस रात्र मेहनत करणाऱ्या,मन लाऊन काम करणाऱ्या,पडद्यावरील तसेच पडद्यामागील सर्व कलाकारांना आणि त्यांना टाळ्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन, दाद आणि प्रेरणा देणाऱ्या रसिक प्रेक्षक वर्ग यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

माहिती संकलन : श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्रिवेणी संगम !! भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ त्रिवेणी संगम !! भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

दोन जानेवारी. स्मरण दिन !

शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !

(जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली !) – इथून पुढे 

वरीष्ठांनी अ‍ॅडज्युटंट त्रिवेणीसिंग यांना सूचना दिली गेली की त्यांनी ड्यूटीवर तैनात असलेल्या जवानांना, अधिकाऱ्यांना सावध करून त्वरीत जम्मू रेल्वे स्टेशनकडे कूच करण्यास सांगावे…. त्रिवेणीसिंग यांनी तिकडे जाणे अपेक्षित नव्हते! पण इथे त्रिवेणीसिंग यांच्या मनातील बहादूर सैनिक जागा झाला. “साहेब,सर्वांना तयार होण्यास थोडा वेळ लागेल. मी क्विक रिअ‍ॅक्शन टीमच्या घातक कमांडोंना घेऊन पुढे जाऊ का? कारण स्टेशनवर यावेळी खूप गर्दी असेल… अतिरेक्यांना जास्त वेळ अजिबात मिळता कामा नये!” त्रिवेणीसिंग साहेबांनी आपल्या वरिष्ठांना विनंतीवजा आग्रहच केला आणि त्यांना परवानगी मिळाली!

लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांच्या नेतृत्वात शस्त्रसज्ज होऊन दहा घातक कमांडोज एका मिलिटरी जीप मधून वेगाने निघाले… चार किलोमीटर्सचे अंतर त्यांनी अवघ्या आठ-दहा मिनिटांत पार केले. अतिरेक्यांच्या जास्तीत जास्त जवळ पोहोचण्यासाठी त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या अधून-मधून जागा मिळेल तसे नागमोडी पद्धतीने वाहन दामटले.

तोपर्यंत कर्तव्यावर असलेले एक पोलिस, बी.एस.एफ.चे दोन जवान, दोन रेल्वे कर्मचारी आणि दोन नागरीक असे एकूण सात लोक हे सैन्याच्या वेशभूषेत रेल्वे स्टेशनमध्ये घुसलेल्या आत्मघातकी हल्लेखोरांच्या आधुनिक शस्त्रांतून झाडल्या गेलेल्या गोळ्यांना बळी गेले होते.

त्रिवेणीसिंग यांच्या पथकाने रेल्वेस्टेशनमध्ये धावतच प्रवेश केला. स्वत: त्रिवेणीसिंग अग्रभागी होते. प्लॅटफॉर्मवरच्या आडव्या पुलावरील आडोश्यामागे लपून एक अतिरेकी खाली तुफान गोळीबार करीत होता. जम्मू कश्मिर पोलिसांमधील एक पोलिस जवान त्याला प्रतियुत्तर देत होता. 

अशा भयावह स्थितीत त्रिवेणीसिंग साहेब वायूवेगाने पायऱ्या चढले आणि थेट त्या गोळीबार करीत असणाऱ्या अतिरेक्याच्यापुढे यमदूत बनून उभे ठाकले व त्याला सावरण्याची संधीही न देता त्याच्यावर धाडधाड गोळ्या झाडून त्याला त्याच्या ‘आखरी अंजाम’तक पोहोचवले.

इकडे पठाणकोट मध्ये जन्मेज सिंग यांच्या घराच्या हॉलमध्ये हलवाई येऊन बसला होता. लग्नात मेजवानीचा काय बेत करावा याची चर्चा सुरू होती. लगीनघरात आणखी कसले वातावरण असणार? लाडक्या लेकाच्या लग्नात सर्वकाही व्यवस्थित होईल याची तयारी सुरू होती! हॉलमधला टी.व्ही. सुरूच होता, त्यावरील बातम्याही! 

जन्मेजसिंग यांना त्यांच्या घराच्या बाहेर काही लोकांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज आला. जम्मू रेल्वे स्टेशनवर हल्ला झाल्याची ती चर्चा होती. तेवढ्यात त्रिवेणीसिंग यांच्या होणाऱ्या सासुरवाडीमधील कुणाचा तरी फोन आला! “टी.वी. देखिये! कुछ तो बडा हो गया है!…..

इकडे रेल्वेस्टेशनवरील पुलावर त्या अतिरेक्याचा समाचार घेतल्यावर त्रिवेणीसिंग दुसऱ्या अतिरेक्याच्या मागावर निघाले. तो अतिरेकी अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज होता.. ऑटोमॅटिक रायफल, हॅन्डग्रेनेड… शेकडो लोकांचा जीव सहज घेऊ शकणारा दारूगोळा! 

तो गोळीबार करीत दुसऱ्या जिन्याने खाली येऊन प्लॅटफॉर्मवर पोहोचलाही होता.. प्लॅटफॉर्मवरील पार्सलरूमच्या दिशेने तो गोळीबार करण्याच्या प्रयत्नात होता… तिथे तीनएकशे लोक जीवाच्या भीतीने लपून, गोठून बसलेले होते. आत शिरून फक्त रायफलचा ट्रिगर दाबला जाण्याचा अवकाश…. मृतदेहांचा ढीग लागला असता!

पण… त्रिवेणी ‘टायगर’ भक्ष्यावर झेपावला! ‘हॅन्ड-टू-हॅन्ड’ अर्थात हातघाईची लढाई झाली.. त्रिवेणीसिंग यांनी अतिरेक्याला खाली लोळवला.. त्याच्या छाताडात गोळ्या घातल्या.. इतक्यात त्या भस्मासूरानं त्रिवेणीसिंग साहेबांवर हातबॉम्ब टाकला…. भयावह आवाजाने परिसराच्या कानठळ्या बसल्या…. त्रिवेणीसिंग जबर जखमी झाले…. त्यातच त्या अतिरेक्याच्या रायफलमधील एक गोळी त्रिवेणीसिंग यांच्या जबड्यात समोरच्या दातांच्या मधून घुसून मानेतून आरपार झाली……! तोवर पाकिस्तानने भारताविरुद्ध डोकं भडकावून, भारतातल्या निष्पाप नागरीकांना ठार मारायाला पाठवलेला ‘फिदायीन’ कामगिरीवर अतिरेकी नरकातील त्याच्या साथीदारांना भेटायला वर पोहोचलाही होता. ..त्याच्यासमोर त्याच्याकडे पाय करून त्रिवेणीसिंग ही कोसळले…. तेवढ्यात इतर अधिकारी, सैनिक तिथे पोहोचले…. त्यात त्रिवेणीसिंग यांचे वरीष्ठ मेजर जनरल राजेंद्रसिंग ही होते…

त्रिवेणीसिंग तशाही अवस्थेत उभे राहिले….साहेबांना सॅल्यूट ठोकला…. आणि म्हणाले… ”मिशन अकंम्प्लीश्ड,सर!…. कामगिरी फत्ते झाली,साहेब!”…

त्रिवेणीसिंग जीवनाच्या कर्तव्य, निष्ठा, बलिदानाच्या त्रिवेणी संगमात विलुप्त झाले! 

हे सर्व केवळ काही सेकंदांमध्ये घडले होते…. एवढ्या कमी वेळ चाललेल्या कारवाईत शूर त्रिवेणीसिंग यांनी अलौकिक कामगिरी करून आपले नाव अमर करून ठेवले…!

पठाणकोट मधल्या आपल्या घरात जन्मेज सिंग यांनी टी.वी. वरच्या बातम्या धडकत्या काळजाने पहायला सुरूवात केली… टी.वी.च्या स्क्रीनच्या खालच्या पट्टीवर अक्षरे उमटली… लेफ्टनंट त्रिवेणीसिंग शहीद हो गये! 

डोळ्यांवर विश्वास बसेना… त्यानंतर ही पट्टी पुन्हा दिसेना…! हाच का आपला त्रिवेणी? हे नाव तसे कॉमन नाही! त्यांनी जम्मूला फोन लावले… काहीही निश्चित माहिती मिळेना… त्वरीत जम्मू गाठावी… निघाले…. दोन तासाच्या प्रवासाला धुकं, जागोजागी होणारी सुरक्षा तपासणी यांमुळे आठ तास लागले. युनीटबाहेर सर्व सैनिक, अधिकारी स्तब्ध उभे होते… जन्मेज सिंग यांनी ओळखले… त्रिवेणी आता नाहीत… “मेरी तो दुनिया ही उजड गयी!”

पुष्पलतांच्या दोन मुली आणि तिसरा त्रिवेणी… या संगमातील एक प्रवाह आता आटला होता. “भगवान त्रिवेणी जैसा बेटा हर माँ को दे!” त्या म्हणाल्या. “आज इतकी वर्षे झाली तरी त्रिवेणी आम्हांला सोडून नाही गेला…सतत आमच्या आसपासच असतो. उसके जाने की तकलीफ भी है, दुख भी है और अभिमान भी… उसने सैंकडो जिंदगीयाँ बचाई! युँही नहीं कई लोगों के घर में अब भी त्रिवेणी की फोटो लगी हुई है…. खास करके वैष्णोदेवी के भक्तों के, जो उस दिन जम्मू स्टेशनपर मौजुद थे!”

शांतता काळात दिला जाणारा सर्वोच्च ‘अशोक चक्र’ पुरस्कार लेफ्टनंट त्रिवेणी सिंग यांना मरणोत्तर दिला गेला…. २६ जानेवारी २००४ रोजी दिल्लीत मा. राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते लेफ्टनंट त्रिवेणी सिंग ठाकूर यांच्या वतीने ‘अशोक चक्र’ स्विकारताना कॅप्टन जन्मेज सिंग (सेवानिवृत्त) यांच्या एका डोळ्यात पुत्र गमावल्याची वेदना आणि दुसऱ्या डोळ्यात पुत्राच्या अजोड कामगिरीचा अभिमान स्पष्ट दिसत होता.

या बहादूर सैनिकास मानवंदना.

– समाप्त –

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ त्रिवेणी संगम !! भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

दोन जानेवारी. स्मरण दिन !

शौर्य, निष्ठा आणि बलिदानाचा त्रिवेणी संगम ! … लेफ्ट्नंट त्रिवेणी सिंग ठाकूर !

बाळाने या जगात पाऊल ठेवताच एक जोरदार आरोळी ठोकली! त्या एवढ्याशा गोळ्याचा तो दमदार आवाज ऐकून डॉक्टर म्हणाले, ”लगता है कोई आर्मी अफसर जन्मा है… क्या दमदार आवाज पाई है लडकेने!” तब्बल आठ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुत्रमुख पाहिलेल्या पुष्पलता म्हणाल्या, ”आर्मी अफसरही है… कॅप्टन जन्मेज सिंग साहब का बेटा जो है!” झारखंड मधील रांची जवळच्या नामकुम इथल्या एका प्रसुतिगृहातील १ फेब्रुवारी १९७८ची ही गोष्ट. 

बाळाचे नामकरण त्रिवेणी सिंग झाले. वडिलांना सेनेच्या गणवेशात लहानपणापासून पाहिलेल्या त्रिवेणी सिंग च्या मनात आपणही असाच रूबाबदार गणवेश परिधान करून देशसेवा करावी अशी इच्छा निर्माण होणं साहजिकच होतं. उत्तम व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले त्रिवेणी अभ्यासात सुरूवातीपासून अव्वल होते परंतू स्वभावाने एकदम लाजरे-बुजरे. कधी कुणाशी आवाज चढवून बोलणे नाही की कधी कुणावर हात उगारणे नाही. सणासुदीसाठी अंगावर चढवलेले नवेकोरे कपडे नात्यातल्या एका मुलाला आवडले म्हणून लगेच काढून त्याला देणारे आणि त्याची अपरी पॅन्ट घालून घरी येणारे त्रिवेणी!

त्रिवेणी मोठे झाले तसे वडिलांनी त्यांना मार्शल आर्ट शिकायला धाडले. यात त्यांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकून दाखवले. उंचेपुरे असलेले त्रिवेणी बॉडी-बिल्डींग करीत. ते पोहण्यात आणि धावण्यात ही तरबेज होते. एक लाजरेबुजरे लहान मूल आता जवान झाले होते.

कॅप्टन जन्मेज सिंग हे मूळचे पंजाबमधल्या पठाणकोटचे रहिवासी. घरी चाळीस एक एकर शेतजमीन होती. शेती करूनही देशसेवाच होते, अशी त्यांची धारणा. आपल्या एकुलत्या एक मुलाने शेतीत लक्ष घालावे, घरदार सांभाळावे अशी त्यांची इच्छा होती.

शिक्षणाच्या एक टप्प्यावर त्यांनी नौसेनेची परीक्षा दिली आणि अर्थातच निवडलेही गेले. प्रशिक्षणास जाण्याचा दिवस ठरला, गणवेश शिवून तयार होता, प्रवासाची सर्व तयारी झालेली होती. 

जाण्याच्या आदल्या दिवशी त्रिवेणी यांच्या आई,पुष्पलता यांच्या मातोश्री घरी आल्या आणि त्यांनी त्रिवेणी यांना नौसेनेत जाण्यापासून परावृत्त केले. त्यावेळी अनुनभवी, लहान असलेल्या त्रिवेणींनी घरच्यांच्या इच्छेचा मान राखला आणि पंजाब कृषी विद्यापीठात प्रवेश घेतला… आता घरात जय जवान ऐवजी जय किसानचा नारा गुंजत होता!

एकेदिवशी त्रिवेणींनी वडिलांना फोन करून सांगितले की “पिताजी, मेरा डेहराडून के लिए रेल तिकट बुक कराईये! मैं आय.एम.ए. में सिलेक्ट हो गया हूँ!” खरं तर त्रिवेणी यांनी ते सैन्य अधिकारी भरतीची परीक्षा देत आहेत याची कल्पना दिली होती आणि हे ही सांगितले होते की इथे जागा खूप कमी असतात आणि अर्ज हजारो येतात, निवड होण्याची तशी शक्यता नाही! त्यामुळे जन्मेज सिंग साहेबांनी ही बाब फार गांभिर्याने घेतलेली नव्हती. या परीक्षेत त्रिवेणी टॉपर होते, कमावलेली देहयष्टी, मैदानावरचे कौशल्य यामुळे शारीरिक चाचणीत मागे पडण्याचा काही प्रश्नच नव्हता. वळणाचे पाणी वळणावर गेले होते… त्रिवेणी आता जन्मदात्या जन्मेज सिंग साहेबांच्या पाऊलावर पाऊल टाकून  सैन्याधिकारी बनणार होते आणि याचा जन्मेजसिंग साहेबांना अभिमानही वाटला! जन्माच्या प्रथम क्षणी डॉक्टरांनी केलेली भविष्यवाणी त्रिवेणीसिंगांनी प्रत्यक्षात उतरवलेली होती!

त्रिवेणी सिंग यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादून येथील प्रशिक्षणात अत्यंत लक्षणीय कामगिरी बजावली, अनेक पदके मिळवली आणि बेस्ट कॅडेट हा सन्मानसुद्धा! जेवढे आव्हान मोठे तेवढी ते पार करण्याची जिद्द मोठी… ते बहिणीला म्हणाले होते…. ”मैं मुश्किलसे मुश्किल हालातों में अपने आप को परखना चाहता हूँ… मन, शरीर की सहनशक्ति के अंतिम छोर तक जाके देखना मुझे अच्छा लगता है.. दीदी!” आणि त्यांनी तसे करूनही दाखवले.

८ डिसेंबर,२००१ रोजी ५,जम्मू कश्मिर लाईट इन्फंट्री (जॅकलाय) मध्ये त्रिवेणी सिंग लेफ्टनंट म्हणून रूजू झाले आणि त्यांनी त्यावेळी झालेल्या अतिरेकीविरोधी धाडसी कारवायांमध्ये धडाकेबाज कामगिरी बजावली. शेतात लपून गोळीबार करणाऱ्या अतिरेक्याच्या समोर धावत जाऊन, त्याचा पाठलाग करून त्याला यमसदनी धाडण्याचा पराक्रमही त्यांनी करून दाखवला होता. युनीटमधील सहकारी त्रिवेणीसिंग यांना ‘टायगर’ म्हणून संबोधू लागले होते!

त्यांची हुशारी, सर्वांचे सहकार्य मिळवून काम करून घेण्याचे कसब पाहून त्यांना युनीटचे अ‍ॅड्ज्युटंट म्हणून कार्यभार मिळाला. 

वर्ष २००३ संपण्यास काही दिवस शिल्लक होते. त्रिवेणीसिंग यांचे मूळ गाव पठाणकोट, जम्मू पासून फार तर शंभर किलोमीटर्सवर असेल. त्यात त्रिवेणीसिंग लग्नबंधनात अडकणार होते…. एंगेजमेंटही झाली होती. फेब्रुवारी २००४ मध्ये बार उडवायचे ठरले होते.

सतत कामामध्ये व्यग्र असलेल्या त्रिवेणीसिंग साहेबांना त्यांच्या वरिष्ठांनी नववर्ष घरी साजरे करण्यासाठी विशेष सुटी दिली आणि साहेब ३१ डिसेंबर २००३ ला घरी आले.. आपले कुटुंबिय, मित्र आणि वाग्दत्त वधू यांच्यासोबत छान पार्टी केली. पहाटे दोन वाजता आपल्या वाग्दत्त वधूला तिच्या एका नातेवाईकाकडे सोडून आले. “सुबह मुझे जल्दी जगाना, माँ! ड्यूटी जाना है!” असे आपल्या आईला बजावून ते झोपी गेले…. नव्या संसाराची साखरझोप ती!

२ जानेवारी,२००४. नववर्षाच्या स्वागतसमारंभांच्या धुंदीतून देश अजून जागा व्हायचा होता. सायंकाळचे पावणे-सात, सात वाजलेले असावेत. थंडी, धुकंही होतं नेहमीप्रमणे. आज जम्मू रेल्वे स्टेशनवर नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. वैष्णोदेवीला जाणाऱ्या-येणाऱ्या सुमारे हजारभर यात्रेकरूंचा, देशभरातून कर्तव्यावर येणाऱ्या -जाणाऱ्या शेकडो सैनिकांचा आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेचा या गर्दीत समावेश होता. 

जम्मू रेल्वे स्टेशनपासून अवघ्या चार किलोमीटर्स दूर असलेल्या आपल्या छावणीत लेफ्टनंट त्रिवेणी सिंग साहेब आपल्या कामात मश्गूल होते. तेवढ्यात जम्मू रेल्वे स्टेशनवर आत्मघातकी हल्ला झाल्याची खबर मिळाली!

– क्रमशः भाग पहिला  

© संभाजी बबन गायके

पुणे

मो 9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print