मराठी साहित्य – विविधा ☆ “ढवळी…” ☆ सौ. अमृता मनोज केळकर ☆

? विविधा ?

☆ “ढवळी…” ☆ सौ. अमृता मनोज केळकर ☆

“कोजागरी पौर्णिमेच्या रात्रीचा जन्म आहे म्हणून अमृता इतकी गोरी आहे!” हे माझ्या आईचं लोकांनी विचारलेल्या “इतकी कशी गोरी हो तुमची पोर?” या प्रश्नाला ठरलेलं उत्तर होतं.😅 लहानपणी काहीही वाटत नव्हतं. पण जसजशी समज येत गेली तसतशी गोऱ्या रंगाच्या तोट्यांची कल्पना यायला लागली.😐

जरा मोठी झाल्यावर तर फारच भयानक अनुभव यायला लागले… एका बाईनं चक्क मला विचारलं “तुला कोड आहे का गं?” मला तर त्या वयात कोड म्हणजे काय हेही माहीत नव्हतं. 😂 आणि हो, हे विचारणारी ती एकटीच नव्हती… अनेकांनी अनेकदा मला हाच प्रश्न विचारलेला आहे…🤣 अगदी लहान असताना माझ्या अंगी असलेल्या रेसिस्टपणाचं हे फळ आहे असं मला नेहमी वाटत आलंय. ते कारण म्हणजे माझे बाबा मला माझ्या लहानपणीचा एक किस्सा सांगतात… बाबांना भेटायला त्यांचा एक पोलिस मित्र येणार होता. नेहमीप्रमाणे आईने मला बाबांच्या कडेवर पार्सल केलेलं त्यामुळे ते आणि त्यांच्या कडेवर मी असे आम्ही दोघे त्यांच्या मित्राला भेटायला गेलो. त्यावेळेस मी दोन वर्षांची  असेन… मला बघून बाबांच्या मित्राला आनंद झाला… “प्रमोद किती गोड आहे रे तुझी पोर!” असं म्हणून त्या सावळ्या माणसाने माझ्या गालाला स्पर्श केला. मला ते आवडलं नसावं कदाचित म्हणून मी माझ्या हाताने माझा गाल पुसला आणि बाबांना म्हंटले, “बाबा त्याला सांगा हात नको लावू त्याचा रंग लागेल…” बाबा हसून बेजार झाले… तो इन्स्पेक्टर अगदी ओशाळला… “प्रमोद अरे माझ्यासमोर मान वर करायची हिम्मत होत नाही लोकांची आणि तुझ्या पोरीने पार लाजच काढली माझी एका वाक्यात…”😂

शाळेत गेल्यावर तर आणखी वेगळी तऱ्हा… मी कधीच बॅकबेंचर नव्हते. अगदी पहिल्या बेंचवर बसायला आवडायचं म्हणून वर्गात सगळ्यात आधी येऊन बसायचे. मी बसायचे तिथे नेमकी वर्गाच्या दारातून उन्हाची तिरीप माझ्या चेहऱ्यावर पडायची. एकदा शिकवता शिकवता मध्येच बाईंनी मला उठून मागच्या बेंचवर जाऊन बसायला सांगितलं… मला कळलं नाही की काय झालं… बाई म्हणाल्या, “तुझा चेहरा आणि घारे डोळे मांजरीसारखे चमकतात उन्हात ते बघून शिकवण्यात लक्ष लागत नाहीय.”🤣 काय बोलणार यापुढे? बिच्चारी मी बसले गपचुप मागच्या बेंचवर!😅

अजून एक अनुभव आला तो लग्न ठरल्यावर. लग्न ठरलं की ब्युटी पार्लर हा पर्याय अपरिहार्य असतो हे माझ्या मनावर ठसविण्यात माझी मोठी बहीण यशस्वी झाली होती. त्यामुळे पैसे देऊन भुवया बिघडवून घ्यायला मी पार्लर मध्ये गेलेली असताना माझ्या सोबतच एक बाई तिच्या आठ – नऊ वर्षांच्या मुलाला घेऊन आलेली होती.  तिने पार्लर मधल्या काकुंना विचारलं “मी चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी कोणत्या ब्रँडचं क्रीम वापरू?” काकू म्हणाल्या, ” हर्बल क्रीम वापरा एखादं” बाई म्हणाली”मी फेअर अँड लव्हली वापरू का?” काकू म्हणाल्या, “अजिबात नको! चांगलं नाहीये ते स्किन साठी.”  हा सुखसंवाद चाललेला असताना त्या बाईचा मुलगा एकाएकी माझ्याकडे बोट दाखवून तिला म्हणाला, “आई तू कोणतंही क्रीम लावलंस तरी या ताईसारखी गोरी नाही होणार!” हा घरचा आहेर मिळाल्यावर बाई पेटलीच एकदम… माझ्यावरच घसरली… “काही कामधंदे नसतील त्या ताईला… आम्ही उन्हा तान्हात काम करून रापतो!” माझं हसू मी दाबून ठेवण्याच्या नादात तिला प्रत्युत्तर द्यायचं राहूनच गेलं…🤣 तात्पर्य: मुलांना पार्लर मध्ये आणू नये ती खूप खरं बोलतात.😬

माझ्या लग्नात पण “कशी दिसतेय जोडी, अगदी ब्लॅक अँड व्हाईट!” असं चिडवणारी भावंड मागल्याजन्मीचं उट्टं काढायला आलेली पितरं असावीत असा विचार मनात येऊन गेला…😅 नवऱ्याचे मित्र देखील कमी नव्हते त्यात – “पार्लरचा खर्च वाचवलास लेका!” असं म्हणणारे!

एकदा आईसोबत पुण्यात तिच्या एका मैत्रिणीकडे जायचं होतं. एक रात्र मुक्काम करावा लागणार होता. गप्पा, जेवणं वगैरे उरकल्यावर मी माझं अंथरूण आईच्या बेडशेजारी जमिनीवर अंथरलं. झोपून गेले. रात्री तहान लागली म्हणून पाणी प्यायला उठले तर लक्षात आलं की आईची मैत्रीण पण उठून बसली आहे आणि आपल्याकडे विस्मयाने एकटक पाहत आहे! माझी घाबरगुंडी उडाली! हे काय आता… या बाईला वेड – बीड लागलं आहे की काय? पाणी न पिता तशीच गपचुप झोपून गेले. सकाळी उठल्यावर घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने तिला विचारलं का बघत होतीस रात्री अमृताकडे? तर ती म्हणाली, “अगो नीलांबरी, तुझ्या मुलीचा चेहरा रात्री चमकत होता. खूप तेज दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर! रुक्मिणीस्वयंवरात जसं वर्णन आहे अगदी तसंच!” मग मी “नाही हो, तो बाहेरचा प्रकाश शोकेसच्या काचेवर पडून माझ्या तोंडावर रिफ्लेक्ट होत होता.” असं सांगून समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. दुपारपर्यंत माझ्या चेहऱ्यावरचं ‘ तेज ‘ पहायला त्यांच्या आणखी काही अध्यात्मिक मैत्रिणी जमल्या. आई मात्र माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती…😂

आमच्याकडे सैरंध्री नावाची एक आजी धुणी- भांडी करायला येत होती. माझी आणि तिची चांगली गट्टी होती… खूप प्रेमळ होती ती… सैरंध्री लांबूनच मला पहायची. मी दिसले नाही अंगणात तर लगेच आजीला विचारायची “तुमची ढवळी कुठाय वैनी?” तिने केलेलं माझं ‘ ढवळी ‘ हे नामकरण मला अजिबात आवडत नव्हतं. मी आईला विचारलं, आई ढवळी म्हणजे काय गं? आई म्हणाली, “खूप गोरी”…

ढवळी! खरंच कितीतरी रंग आणि अंतरंग पहायला मिळाले या एका गोऱ्या रंगामुळे! कधी अगदी डांबरट तर अगदी साधीभोळी रंगाने कितीही सावळी असली तरी मनाने अगदी शुभ्र, निर्मळ. काय भुललासी वरलिया रंगा… या अभंगासारखी अभंग! त्यामुळे परमेश्वराच्या कृपेने कधीही गोऱ्या रंगाबद्दल अहं मनात डोकावला नाही. तसंच मिळालेल्या वर्णाबाबत कधी वैषम्य सुद्धा वाटलं नाही. कधीकधी सैरंध्रीची हाक आठवते… “ढवळे, चुलिपाशी जाऊ नको बाय अंगाला काळं लागेल गो!” मी मोठी झाल्यावर मला कळलं की सैरंध्रीची नात साथीच्या रोगात वारली होती. ती माझ्याइतक्याच वयाची होती. मला बघून डोळ्यांत पाणी यायचं तिच्या! अनेक वेळा वाटलं असेल तिला मला उचलून कडेवर घ्यावंसं माझ्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवावा असं… पण परत नाही अडकली ती त्या मायेच्या स्पर्शात… आता वाटतं चुलिपाशी जाऊन अंग राखेने माखून घेतलं असतं तर कदाचित सैरंध्रीने मला उचलून घेतलं असतं… माझा ढवळा रंग तिला नक्की लागला असता…

✍️ सौ. अमृता मनोज केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “मराठी राजभाषा दिन…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

घड्याळाचे काटे घड्याळात आडवे झाल्याचे दिसले (सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटे.) आणि मी माझा अंथरुणावर पडलेला आडवा देह उभा केला. (सहा वाजता काटे असतात तसा उभा केला. खरेतर सकाळी सहा वाजता असतात तसा. असे म्हणणार होतो पण मी संध्याकाळचेच सहा वाजल्याचे बघतो. सकाळची सहाची वेळ घड्याळात बघायला वेळ कुठे असतो.)

ब्रश काढला. त्यावर पेस्ट पसरवली. तोपर्यंत लगेच माझ्या मोबाईलवर मॅसेज येण्याचे टोन ऐकू येऊ लागले.

आज सकाळी सकाळी इतके मेसेज कसे काय? हा प्रश्न पडला. कोणाचा तरी Birthday असावा अशा विचारात मी मोबाईल हातात घेतला. कारण Birthday wishes चे विशेष सांभाळायचे होते.पण तोंडातला ब्रश, आणि मोबाइलवर बोटे एकाचवेळी फिरवण्याची कसरत जमली नाही.

मग मोबाईल बाजूला ठेवला, आणि ब्रश केला. फ्रेश झालो. न्यूज पेपर हातात घेत सावकाश चहा घेता घेता परत एकदा मोबाईल हातात घेतला. परत तेच. कपबशी, न्यूज पेपर, आणि मोबाईल यांचा हाताशी ताळमेळ बसला नाही. परत मोबाईल बाजूला ठेवला. पण मॅसेज चे टोन सुरुच होते. आज काय विशेष आहे याचा विचार करता करताच अगोदर चहा संपवला.

आणि मग शांतपणे खुर्चीवर बसून अधिरतेने मोबाईल ओपन केला. थोडावेळ सगळे मॅसेज बघितले. एक लक्षात आले.

गुलाब, मोगरा, प्राजक्त, कमळ, बकुळी, चाफा अशा अनेक  छानशा पण टवटवीत दिसणाऱ्या फुलांच्या सुरेख चित्रांसोबत Hi, Hello, Good morning, Have a nice day असे Pop corn सारखे टणाटण फुटणाऱ्या सगळ्या मॅसेजेस् च्या जागी चक्क नमस्कार मंडळी, सुप्रभात, काय म्हणता…, कसे आहात, आजचा दिवस सुखाचा जावो असे चक्क मराठीत लिहिलेले बरेच मॅसेजेस् मोबाईलवर आले होते.

आणि लक्षात आले. आज मराठी राजभाषा दिन. मग काय?…..

मी कसा काय मागे राहणार. भ्रमराने फुलाफुलांवर जाऊन त्यातील मधुकण गोळा करावेत तद्वतच मी देखील माझ्या भ्रमणध्वनीवर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या समुहात पाठवलेले वेगवेगळे पण त्यातल्यात्यात काही वेचक संदेश टिपले. आणि कापा व चिकटवा अथवा नक्कल करा व चिकटवा या मार्गाचा अवलंब करत एकाचे दुसऱ्याला पुढे पाठवायला सुरुवात केली.

सध्या परिक्षेचे दिवस सुरू आहेत. नक्कलमुक्त अभियान राबवले जात असल्याचा भास निर्माण केला जातोय. पण तिथे जसा नक्कल करण्याचा सुळसुळाट असल्याचे वृत्त येते, तसेच मी देखील नक्कल करतोय याचे भान मला राहिले नाही.

निदान आज परत अंथरुणावर आडवे पर्यंत तरी शुभरात्री, शुभरजनी असे मराठीतलेच संदेश येतील.

हे ही नसे थोडके…….

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “वाचनवेड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “वाचनवेड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

…नव्याची नवलाई खरच आगळीवेगळीच असते हे काही खोट नव्हे. सगळं कसं अप्रुप, कौतुकाचं. माझं जरा बरं नसणं पण मी नवलाईने एन्जॉय करतेयं. हा आता मोबाईल, वाचन ह्या आवडत्या गोष्टींवर आलाय खरा थोडा अंकुश पण त्याजागी मस्त आराम,लाड कौतुक हे मिळतयं हे पण विसरून चालणार नाही. त्यामुळे कधी नवीन पोस्ट लिहीणं तर कधी जुन्या पोस्ट मध्ये अजून भर टाकून वरणात पाणी घालून वरण वाढवण्यासारखे सुरू आहे. अर्थात नवीन आजाराचं कौतुक पण खूप वाटतयं, त्या औषधांच्या,उपचारांच्या वेळा पाळणे, आज नवीन जागी कुठं दुखतयं कां ह्याचा शोध घेणे,आणि नोकरी वगळून उर्वरित वेळात मस्त आवडता आराम, ताणून देणं छान उपभोगतेयं. डॉ. म्हणलेत एवढी आजाराबाबत सकारात्मकता असल्यामुळे आजार चुटकीसरशी पळतोय,थोडक्यात काय तर हे आरामाचे दिवसही उरकत येताहेत.असो.

…नुकताच वाचनदिन झाला. त्या निमीत्ताने एक लता मंगशकरांवरील द्वारकानाथ सांझगिरी लिखित एक मस्त पुस्तक वाचायला हाती घेतलयं.आता हे पुस्तक हळूहळू सावकाश वाचावे लागणार, पुर्वीसारखे फडशापाडल्यागत वाचन आता करता येणार नाही.

वाचनाचं आणि माझं एक अलवार,सुंदर पण घट्ट जुळलेलं नातं. ना ह्या नात्यात कोणता स्वार्थ ना कुठलाही वेळेचा दुरूपयोग,असलीच तर ती फक्त चांगल्या गोष्टींची वैचारिक देवाणघेवाण. पुस्तक दिनाच्या निमित्ताने ह्या आमच्या अऩोख्या बंधांच्या आठवणींना उजाळा मिळाला.

प्रत्येक पुस्तकाची वेगवेगळीच खासियत असते बघा. काही पुस्तकात समाविष्ट असलेलं कथानक, विषय हा बाजी मारून जातो तर कधी त्या पुस्तकाच्या लेखकाची लेखनशैली भाव खाऊन जाते. कधीकधी हे कथानक पटणारं असतं म्हणून आवडून जातं तर कधीतरी न पटणारं कथानक पण आपण ह्या अँगलने कधी विचारच केला नाही हे शिकवून जातं. काही पुस्तकांतील अलंकारिक,नटवलेली भाषा मेंदूत ठसते तर कधीकधी अगदी सहज साध्या सोप्या भाषेत मांडलेले विचार अगदी आपल्या मनात घर करून राहतात.काही वेळा पुस्तकात ह्या दोन्ही भट्टी एकदम जमून येतात मग तर ते पुस्तक म्हणजे क्या कहना. अगदी हातातून सोडवत नाहीत अशी पुस्तकं.

वाचनासारखी मनं रमवणारी, चांगल्या गोष्टी शिकवणारी,नवनवीन माहितीचे भांडार खुली करून देणारी दुसरी कुठलिही गोष्ट नाही. अर्थातच मी हे म्हणायचं, लिहायचं म्हणून नाही तर स्वानुभवाने मनापासून सांगतेयं.

वाचनाइतका दुसरा चांगला मित्र नाही. फक्त हवा मात्र ह्या मैत्रीचा मनापासून स्विकार, आवडीने जवळीक. फक्त एक नक्की ह्या मित्राची निवड जरा दर्जेदार आणि चोखंदळपणे करावी लागते. आपण जे मनापासून वाचतो नं ते आपल्या मनातून मेंदूपर्यंत थेट झिरपत जाऊन वसतं. ह्या वाचनवेडा वरुन मला वपुंच एक वाक्य आठवलं,”प्रत्येकाला कसलतरी वेड हे हवचं,वेड असल्याशिवाय शहाणी व्यक्ती होऊच शकत नाही”.

जशी झाली बघा अक्षरओळख

तशी हाती आली मस्त अंकलिपी

बघून त्यातील अंक ,अक्षरे आणि चित्रं

गावला मला त्या रुपाने एक सच्चा मित्रं ।।।

 

शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकं

खरतरं वाटतं होती जराशी निरस,

पण त्यांनीच तर  केले अवघे

सगळ्यांचे उत्तरायुष्य खरे सरस।।।

 

किशोरावस्थेत अभ्यासला इतिहास

वाचनातून उमगले हिंदवी स्वराज्याचे तोरण,

ऐतिहासिक पुस्तके बनली

चढविण्या देशप्रेमाचे स्फुरण ।।।

 

ज्ञानसंपत्ती मध्ये नित्य करावी वृद्धी

पुस्तकांनी बहाल केली आपल्याला समृध्दी

पुस्तकांनीच बहाल केली खरी समृद्धी ।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जय जय महाराष्ट्र  माझा… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

🌸 विविधा 🌸

जय जय महाराष्ट्र माझा!… ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना अनेकानेक शुभेच्छा!

एक मे, महाराष्ट्र दिन! माझ्या लाडक्या महाराष्ट्राचे पोवाडे मुक्तपणे गायचा दिवस! ज्या पवित्र भूमीत मी जन्म घेतला, त्या भूमीचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी कसे करावे? त्यापेक्षा या मंगलमय दिनी शब्दपुष्पांची सुंदर माळच तिच्या कंठात घालते!

महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत जन्म घेतला ही माझी पूर्वजन्मीची पुण्याईच! या महान महाराष्ट्र देशाची महती अन श्रीमंती मी एका मुखाने काय आणि कशी वर्णावी? त्यासाठी प्रतिभावंत शब्दप्रभू गोविंदाग्रज यांनी रचलेले मनमोहक महाराष्ट्राचे महिमा-गीत “मंगल देशा” ऐकायला हवे. महाराष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र, हा कोता विचार मनात आणणे, म्हणजे प्रत्यक्ष महाराजांचा अपमान करणे होय. त्यांच्या संघटन शक्तीचे उदाहरण जरी घेतले तरी त्यांची दूरदृष्टी आपल्याला स्तिमित केल्याशिवाय राहत नाही. त्यांचे शौर्य, रणकौशल्य, पराक्रम, बुद्धिमत्ता, इत्यादी इत्यादी विषयी मी पामराने काय लिहावे, केवळ नतमस्तक व्हावे अन “शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप”! आपल्या मूठभर फौजेला हाताशी धरून “गनिमी कावा” अंमलात आणीत या “दक्खन के चूहे” ने औरंगजेबाच्या नाकी नऊ आणले. त्याचे वर्चस्व झुगारून “स्वराज्याचे तोरण” बांधणारे आपले खरे हृदयसम्राट गो-ब्राम्हण प्रतिपालक असे शिवाजी महाराज!

आमची लाडकी दैवते म्हणजे, विठू माऊली, साडेतीन शक्तीपीठे, अष्टविनायक, शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा इत्यादी इत्यादी! माझा महाराष्ट्र देश हा संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेला देश आहे. “पाऊले चालती पंढरीची वाट” या हाकेनिशी संतांच्या मागे हजारोंनी दिंडीत सामील होत “राम कृष्ण हरी” चा टाळ मृदुंगासहित गजर करणारे वारकरी आजही त्याच भक्तीने वारी करीत हा अनमोल भक्तीचा नजराणा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करीत आहेत. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय आणि समाज प्रबोधनाची श्रीमंती काय वर्णावी? फक्त नाव जरी उच्चारले तरी आपोआपच “तेथे कर माझे जुळती”! आपण ज्या स्वातंत्र्याचा मनमुराद उपभोग घेतोय, ते मिळवून देण्यात येथील अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व अर्पण केले. किती म्हणून नावे घ्यावीत! आज त्यांच्या स्मृती-चरणी नतमस्तक होऊ या!

अभिजात भाषा आणखी किती समृद्ध असू शकते? सरकारदरबारी “मराठी” या माझ्या मायबोलीला हा दर्जा केव्हा मिळेल? या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! तिची थोरवी गातांना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “माझ्या मराठीचे बोल कवतुके। परी अमृतातेंही पैजा जिंके। ऐसी अक्षरेरसिकें। मेळवीन॥“ ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात.

हे अभिजात साहित्य रचणारे हरी नारायण आपटे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज, पु.ल.देशपांडे, किती म्हणून नावे घ्यावीत! या साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! महाराष्ट्राची संगीत परंपरा अतिशय जुनी अन समृध्द आहे. संगीत नाटकांची परंपरा म्हणजे आपल्या महाराष्ट्राची खासियत आणि मक्तेदारीच समजा ना! स्त्रीसौंदर्याचे नवथर निकष निर्माण करणारे बालगंधर्व, त्यांचे आम्हा रसिकांना कोण अप्रूप. ज्यांच्या स्त्रीसुलभ विभ्रमांचे इथल्या स्त्रियांनीच अनुकरण करावे असा रसिकांना वेड लावणारा हा एकमेवाद्वितीय कलाकार!

मुंबापुरी अन कोल्हापूर म्हणजे सिनेसृष्टीची खाणच! रजतपटाचा “प्रथम पटल” निर्माण करणारे दादासाहेब फाळकेच! इतर प्रांतातून मुंबईच्या मायानगरीत स्थायिक झालेले अन कर्माने मराठीची बिरुदे अभिमानाने मिरवणारे संगीतकार, गायक, गीतकार अन कलाकारांची तर यादी संपता संपत नाही. अश्या या महाराष्ट्राला १ मे १९६० रोजी स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. या स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री होते, यशवंतराव चव्हाण!

आता आपण महाराष्ट्र दिनाचा इतिहास जाणून घेऊ या. त्याला काळी चौकट आहे हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोराफाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो.

१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला, शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

मी जन्मले आणि वाढले या पुण्य-पावन मातीत, जिथे सुवर्णालंकार अन रत्ने तितकी नव्हती, मात्र होते सुवर्णकांचनासम झळाळणारे अस्सल संस्काराचे तेज! पुस्तके वाचता-वाचता, नाटके बघता-बघता अन वय वाढता- वाढता ओळख पटली इथल्या साहित्यिक वैभवाची! मन मोहोरून विचारायचे; आचार्य अत्रे लिखित ‘कऱ्हेचे पाणी’ चाखू, की, गडकऱ्यांच्या सुधाकर अन सिंधूच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या ‘एकच प्याल्याचे’ रंग रंगमंचावर बघू, की पु ल देशपांडेंच्या त्या अवखळ फुलराणीचे “तुला शिकवीन चांगलाच धडा!” हे प्रसिद्ध स्वगत आत्मसात करू, की ‘मृत्युंजयाच्या’ उत्तुंग विविधरंगी व्यक्तिमत्वाने स्तिमित होऊ! “घेता किती घेशील दो कराने” अशी तेव्हा माझी अवस्था व्हायची! नागपूरच्या नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलचे शिक्षण घेतले अन चाकरी केली तिथेच, भरून पावले अन आयुष्य सार्थकी लागले. इथल्या मातीचे ऋण चुकवण्याचा विचार पण मनात येत नाही, कसा येणार? इतके विशाल आहे ते! ईश्वरचरणी मनोभावे प्रार्थना करते की, वारंवार याच पवित्र मातीत जन्मावे अन तिच्याच कुशीत शेवटी विश्रांती घ्यावी, यापरीस सौभाग्य ते कोणते! 

कुणीतरी म्हटले आहे की ठेच लागल्यावर “आई ग!” म्हणून कळवळतो तो खरा मराठी माणूस, पण आता इंग्रजाळलेले ओरिजिनल मराठी बॉय आणि गर्ल म्हणतात “ओह मम्मा!” ते बी मराठीच हायेत की! परप्रांतातून आलेले, येथील मातीशी नाते जोडून आता महाराष्ट्रीयन झालेल्यांचे काय? (याचे उत्तर जाणून घ्यायला अवधूत गुप्ते यांचे गाणे अवश्य ऐका अन पहा, ते देखील मनोभावे गाताहेत “जय जय महाराष्ट्र मेरा!”) शेवटी मने जुळली की मातीशी नाते जुळणारच की भावा! बंबैय्या मराठीची सवय झाली की, सारे सारे कसे सोपे होते! 

मंडळी, हा दिवस केवळ सार्वजनिक सुट्टी म्हणून उपभोगण्याचा नसून मराठी माणसाची अस्मिता जागवण्याचा आणि ती जपण्याचा आहे. मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतांना धोतर, फेटे, नऊवार साडी, नथ इत्यादी पारंपरिक वेषभूषांपुरतेच आणि मराठी पाट्यांपुरतेच मराठीपण जपायचे की त्यापलीकडील आपला जाज्वल्य इतिहास देखील आठवायचा हे आपले आपणच ठरवणे योग्य!!!

जय हिंद! जय महाराष्ट्र!

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे, फोन नंबर – ९९२०१६७२११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “१ मे…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

एक मे. हा दिवस प्रत्येक कामगारासाठी आणि प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती साठी खास आनंदाचा,सोनियाचा दिवस. कामगार दिनाबद्दल बोलायचं तर ह्या दिवशी कामगारांसाठी फायद्याची आणि फायदा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायद्याची रुपरेषा आखली गेली. आधी कामगार वर्गावर जी आपबिती होती नं ती नुसती कळूनही किंवा वाचूनही हळहळ वाटत होती.कामगारांचा आधी अक्षरशः कोणीही वाली नव्हता. पिळवणूक म्हणजे कशी असेल हे जेव्हा आम्ही लोकं आठ तास काम करुन माना टाकतो नं तेव्हा पूर्वी हा कामगार वर्ग पंधरा पंधरा तास नाँनस्टाँप काम करीत होता नं तेव्हा खरी जाणीव होते. आजच्या सुधारणांमुळे आम्ही काम करु त्या प्रमाणात, वाढत्या महागाई नुसार  आम्हाला त्या कामाचा मोबदला मिळतोयं पण खरचं पूर्वी जी वेठबिगारी होती नं ती फार भयानक होती हे आधीच्या कामगार मंडळींकडूनच समजतं आणि त्यांनी सहन केलेल्या आणि जिद्दीने तोंड दिलेल्या संकटाची कल्पना येते आणि तशी जाणीवही होते. बरं ह्या रुपरेषेत अनेक नानाविध मुद्द्यांमध्ये बदल फायदेशीर बदल करण्यात आले. ह्या मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने बालकामगारांवर बंदी, महिला कामगारांच्या कामावर मर्यादा, तसेच रात्रीच्या व धोक्याच्या कामासाठी वेगळे नियम, कायद्याने साप्ताहिक सुट्टी, कामाचा मोबदला वस्तू रुपात न मिळता तो नगदी स्वरूपात मिळणे, समान काम तर समान वेतनं इत्यादी नियम अंतर्भूत केल्या गेलेत.भारतात कामगार दिनाची सुरवात 1 मे 1923 पासून झाली.

महाराष्ट्र दिन म्हंटला की ह्या बद्दलच्या आठवणींची सुरुवात शालेय जीवनापासून होते.

ह्या दिवशी शाळेत सकाळी झेंडावंदन व्हायचे. एक मे नंतर मग दोन तीन तारखेकडे निकाल लागून मग उन्हाळी सुट्ट्यांची सुरूवात व्हायची

1 मे ह्या दिवशी खास ऐकू येणारी गीतं म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं”बहु असोत सुंदर संपन्न की महा,प्रिय अमुचा महाराष्ट्र देश हा”, आणि दुसरं गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी ह्यांच “प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा”.

अन्याय, पिळवणूक ह्यांची सुट्टी होऊन कामगारांना स्वावलंबनाने रोजीरोटी मिळवून देणारा हा कामगार दिवस व महाराष्ट्रातील जनतेला आपलं असं वेगळं अस्तित्व, जागा मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र दिन चिरायू होवो.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 65 – याची देही याची डोळा ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

भारतभूमीवर पाऊल ठेवले आणि स्वामीजींचे स्वागत सोहोळे व स्वामीजींना भेटायला ,पाहायला येणार्‍यांची ही गर्दी या वातावरणाने सारा प्रदेश भारून गेला होता. २७ जानेवारीला स्वामीजी जाफन्याहून पांबन येथे आले. ते रामनाद संस्थानमध्ये उतरले. संस्थांनचे राजे भास्कर सेतुपती स्वत: स्वामीजींना सन्मानपूर्वक घेऊन आले.आल्या आल्याच स्वामीजींना त्यांनी व सर्व अधिकार्‍यानी साष्टांग नमस्कार केला. खास शामियान्यात औपचारिक स्वागत झालं.विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेला शिकागोला जावे म्हणून प्रयत्न करणार्‍यात राजे भास्कर सेतुपती होते. स्वागत समारंभा ठिकाणी घोडा गाडीने नेण्यात येत असताना लगेचच गाडीचे घोडे काढून लोकांनी स्वता ती गाडी ओढली आणि एव्हढेच काय स्वता राजे सुधा गाडी ओढण्यात सहभागी झाले होते स्वामीजीं बद्दल एव्हढा आदर सर्वांनी दाखवला. एका संस्थांनाचा अधिपति एका संन्याश्याची गाडी ओढत होता हे दृश्य प्राचीन परंपरेची आठवण करून देत होते.

पांबन नंतर ते रामेश्वरला गेले. स्वामीजी स्वागताला उत्तर देण्यासाठी भाषणकर्ते झाले. त्यांच्या इंग्रजी भाषणाचे तमिळ भाषेत रूपांतर करून सांगण्यात येत होते. सर्वश्रेष्ठ धर्मपुरुषाचा सन्मान मंदिरातील पुजारी व व्यवस्थापक यांनी केला. सजवलेले ऊंट, हत्ती, घोडे असलेली मिरवणूक काढून रामेश्वर मंदिरापर्यन्त नेण्यात आली. इथल्या भाषणात त्यांनी सांगितले की, “केवळ मूर्तिपूजा करण्यापेक्षा दरिद्री माणसाला दोन घास अन्न आणि अंग झाकण्यासाठी वस्त्र देणे हाच खरा धर्म आहे”.

रामेश्वर नंतर रामनाद च्या सीमेवर जोरदार स्वागत करण्यात आले. स्वामीजींच्या आगमनार्थ तोफांची सलामीदिली, भुईनळे आतषबाजी केली, हर हर महादेव च्या प्रचंड घोषणा देण्यात आल्या. रामनाद चे राजे स्वता स्वामीजींच्या गाडी समोर पायी चालत होते, पुढे पुढे तर स्वामीजींना घोडागाडीतून ऊतरवून, सजवलेल्या पालखीत बसविण्यात आले, भाषणे झाली, नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या करंडकातून स्वामिजिना मानपत्र अर्पण केले गेले. सत्कारादाखल उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, “प्रदीर्घ कालावधीची रात्र संपत आहे, अत्यंत क्लेशकारक दु:ख मावळू लागले आहे, मृतप्राय वाटणार्‍या शरीरात नवी चेतना जागी होत आहे, जाग्या होणार्‍या या भारताला आता कोणी रोखू शकणार नाही, तो पुन्हा निद्रित होणार नाही, बाहेरची कोणतीही शक्ति त्याला मागे खेचू शकणार नाही. अमर्याद सामर्थ्य असणारी ही भारतभूमी आपल्या पायांवर ताठ उभी राहत आहे”. केवळ या सुरुवातीच्या स्वागतासाठी उत्साहाने जमलेल्या स्वदेशातील बांधवांकडे बघून स्वामीजींना एव्हढा विश्वास वाटला होता. आणि आपला देश आता पुढे स्वत:च्या बळावर ताठपणे उभा राहील अशी खात्री त्यांना वाटली होती. एका निष्कांचन संन्याशाचा उत्स्फूर्तपणे होणारा गौरव ही स्वामीजींच्या जगातील कामाची पावती होती.

रामनाद सोडल्यानंतर स्वामी विवेकानंद मद्रासच्या दिशेने रवाना झाले. आतापर्यंत छोट्या छोट्या शहरात व गावातील उत्साह आणि आनंद एव्हढा होता, आता तर मद्रास सारख्या मोठ्या शहरात मोठ्या लोकवस्तीच्या ठिकाणी भव्य सोहळे होणार होते. रामनाद, परमपुडी, मानमदुराई,मीनाक्षी मंदिरचे मदुराई,तंजावर असे करत स्वामीजी कुंभकोणमला आले.कुम्भकोणम नंतरच्या एका रेल्वे स्थानकावर गाडी थांबणार नव्हती तिथेही लोक स्वामीजींना बघायला आणि एकदा तरी त्यांचे दर्शन घ्यायला प्रचंड प्रमाणात जमले होते. गाडी थांबणार नाही असे दिसताचा लोक रेल्वे रुळांवर आडवे झाले आणि गाडी थांबवावी लागली तेंव्हा स्वामीजी डब्यातून बाहेर येऊन शेकडो लोकांनी  केलेले स्वागत स्वीकारले, छोटेसे भाषण केले. त्यांच्याप्रती आदर दाखवला.

कुंभकोणमहून स्वामीजी मद्रासला आले. हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व करण्यासाठी स्वामीजींनी अमेरिकेला जावे यासाठी मद्रास मध्ये खूप प्रयत्न केले गेले होते. त्यामुळे पाश्चात्य देशात उदंड किर्ति मिळवून वेदांतचा प्रचार करून आलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या स्वागताची तयारी खूप आधीपासून केली होती, एक स्वागत समिति स्थापन करण्यात आली होती, पद्धतशीरपणे  नियोजन केले गेले होते. वृत्तपत्रातून लेख प्रसिद्ध केले गेले. स्वामीजींच्या धडक स्वागत समारंभाची  वृत्ते प्रसिद्ध होत होती. त्यांनी पाश्चात्य देशात केलेल्या कामांवर अग्रलेख लिहिले गेले. विविध शाळा, संस्था, महाविद्यालये बाजारपेठा सार्वजनिक ठिकाणे येथे स्वामीजींना बोलावण्याचा धडाका सुरू होता. मद्रास मध्ये रस्ते, विविध १७ ठिकाणी कमानी, फलक,पताका, असे उत्सवी वातावरण होते. एगमोर स्थानकावर उतरल्यावर (६ फेब्रुवारी १८९७) स्वागत समितीने स्वागत केले. घोष पथकाने स्वागतपर धून वाजविली. मिरवणूक काढण्यात आली दुतर्फा लोक जमले होते, मोठ्या संख्येने स्त्रिया, मुले, प्रौढ, सर्व सामान्य नागरिक ते सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.

मद्रासमध्ये ९ दिवस मुक्काम होता. अनेक कार्यक्रम झाले, वेगवेगळ्या भाषेतील २४ मानपत्रे त्यांना देण्यात आली. खेतडीचे राजा अजितसिंग यांनी मुन्शी जगमोहनलाल यांच्याबरोबर स्वागत पत्र पाठवले होते. कोणी स्वागतपर संस्कृत मध्ये कविता लिहून सादर केली.

७ फेब्रुवारीला मद्रास मध्ये विक्टोरिया हॉल मध्ये मद्रास शहराच्या वतीने स्वामीजींचा मोठा सत्कार समारंभ झाला. जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित होते. असे सत्कार स्वामीजींनी याची देही याची डोळा अनुभवले, लोकांचे प्रेम आणि असलेला आदर अनुभवला. पण मनात, शिकागो ल जाण्यापूर्वी आणि शिकागो मध्ये गेल्यावर सुद्धा ब्राम्हो समाज आणि थिओसोफिकल सोसायटीने जो विरोध केला होता, असत्य प्रचार केला होता, वृत्तपत्रातून लेख, अग्रलेख यातून स्वामीजींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला होता त्याचे शल्य होतेच, त्याचे तरंग आता मनात उमटणे साहजिकच होते. यातील काही अपप्रचाराला उत्तर देण्याची खर तर संधी आता मिळाली होती आणि ती थोडी स्वामीजींनी घेतली सुद्धा. त्यांनी भाषण करताना अनेक खुलासे केले. धर्म नाकारणार्‍या समाज सुधारकांचा परखड परामर्श घेतला. भारताचे पुनरुत्थान घडवायचे असेल तर त्याचा मूळ आधार धर्म असायला हवा असे विवेकानंद यांना वाटत होते. भारतातील सुधारणावाद्यांचा भर सतत धर्मावर आणि भारतीय संस्कृतीवर केवळ टीका करण्यावर होता ते स्वामीजींना अजिबात मान्य नव्हते. मद्रासला त्यांची या वेळी चार  महत्वपूर्ण प्रकट व्याख्याने झाली. एका व्याख्यानात त्यांनी म्हटले की, “आम्हाला असा धर्म हवा आहे की, जो माणूस तयार करील, आम्हाला असे विचार हवे आहेत की, जो माणूस उभा करतील”.

स्वामीजींचे मद्रासला आल्यावर जसे जोरदार स्वागत झाले तसे ते नऊ दिवसांनी परत जाताना त्यांचा निरोप समारंभसुद्धा जोरदार झाला. इथून ते कलकत्त्याला गेले. स्वामीजींचे मन केव्हढे आनंदी झाले असणार आपल्या जन्मगावी परतताना, याची कल्पना आपण करू शकतो. बंगालचा हा सुपुत्र त्रिखंडात किर्ति संपादन करून येत होता.                  

कलकत्त्याला स्वागता साठी एक समिति नेमली होती, अनेक जण ही धावपळ करत होते. कलकत्त्यातील सियालदाह रेल्वे स्थानकावर स्वागतासाठी वीस हजार लोक जमा झाले होते.फलाट माणसांनी फुलून गेला होता. त्यांच्या बरोबर काही गुरु बंधु, संन्यासी, गुडविन, सेव्हियर पती पत्नी, अलासिंगा पेरूमल, नरसिंहाचार्य या सगळ्यांचे स्वागत केले गेले. सनई चौघड्याच्या निनादात आणि जयजयकारांच्या घोषणेत स्वामीजींचे पुष्प हार घालून स्वागत केले गेले. यावेळी परदेशातून सुद्धा अनेक मान्यवरांनी गौरवपर पत्रे पाठवली, त्याचे ही वाचन झाले व सर्वांना ती वाटण्यात आली.केवळ चौतीस वर्षाच्या युवकाने आपल्या कर्तृत्वाचीअसामान्य छाप उमटवली होती, त्याने बंगाली माणसाची मान अभिमानाने उंचावली होती. रिपण महाविद्यालय, बागबझार,काशीपूरचे उद्यान गृह, आलम बझार मठ, जिथे गुरूंचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प सारदा देवींसमोर सहा वर्षापूर्वी नरेंद्रने सोडला होता तिथे पाय ठेवताच आपण दिलेले वचन पुरे केले याचे समाधान स्वामीजींना वाटले, येथे रामकृष्णांनंद आणि अखंडांनंद यांनी दाराताच आपल्या नरेन चे स्वागत केले. पुजाघरात जाऊन श्रीरामकृष्णांना नरेन ने कृतार्थ होऊन अत्यंत नम्रतेने नमस्कार केला. नरेन ने ठाकूरांना नमस्कार केला तो क्षण गुरुबंधुना पण धन्य करून गेला.आता पुढच्या कार्याची आखणी व दिशा ठरणार होती.

क्रमशः…

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले

? विविधा ?

☆ जरतारी हे वस्त्र मानवा… — लेखक – श्रीनिवास बेलसरे ☆ डॉ. ज्योती गोडबोले

‘जगाच्या पाठीवर’ हा आजही अनेकांच्या स्मरणात असलेला सिनेमा आला होता १९६०ला. म्हणजे तब्बल ६२वर्षापूर्वी! त्यातली जवळजवळ सर्वच गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. गीतकार होते ग.दि.मा.! या सिनेमाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जसे मनोजकुमारच्या सिनेमात ‘सबकुछ मनोजकुमार’ असे असते तसेच इथे राजा परांजपे यांचे होते. दिग्दर्शक राजा परांजपे, लेखक राजा परांजपे आणि निर्मातेही राजाभाऊच!

तशी त्याकाळी राजाभाऊ परांजपे ही मोठी हस्ती होती. त्यांच्या कोणत्याच सिनेमात सिनेमाचे संवादलेखन कुणीतरी मुद्दाम केले आहे, पटकथा कुणीतरी ‘रचली’ आहे, चटकदार संवाद जाणीवपूर्वक ‘पेरले आहेत’ असे वाटतच नसे. एखाद्या ठिकाणी, एखाद्याच्या घरात किंवा एखाद्या कार्यालयात अगदी नैसर्गिकपणे जे घडू शकते तेच राजाभाऊंच्या सिनेमात दिसायचे. जणू राजाभाऊ कोणतीही तयारी न करता अशा एखाद्या ठिकाणी नुसते हळूच कॅमेरा घेऊन गेलेत आणि त्यांनी तिथे जे घडले ते सगळे शूट करून आणले, असेच वाटायचे! इतका त्यांचा सिनेमा खरा वाटे!

या सिद्धहस्त मराठी कलाकाराने एकूण २९ सिनेमांचे दिग्दर्शन केले आणि २० सिनेमात तर स्वत: कामही केले. आज किती मराठी प्रेक्षकांना हे माहित असेल की ‘मेरा साया’ (१९६६) हा हिंदी सिनेमा राजाभाऊंच्या ‘पाठलाग’ (१९६४)चा रिमेक होता! येत्या २४ एप्रिलला राजा परांजपेंचा ११३वा वाढदिवस येतो आहे. ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘पाठलाग’, ‘हा माझा मार्ग एकला’, ‘आधी कळस मग पाया’, ‘सुवासिनी’, ‘पडछाया’, ‘आधार’, ‘ऊन पाउस’, ‘पुढच पाउल’ असे एकापेक्षा एक सिनेमे देण्या-या या मराठी कलाकाराची आठवण निदान मराठी चित्रपट सृष्टीत तरी कितीजण ठेवतात बघू या!

‘जगाच्या पाठीवर’ची सगळी गाणी गदीमांनी अर्थात मराठीच्या वाल्मिकी मुनींनी लिहिली होती. एकेक गाणे ऐकले की गदीमांना त्रिवार वंदन करावेसे वाटते. केवढी प्रतिभा, केवढी अचाट कल्पनाशक्ती, कसल्या चपखल उपमा आणि केवढे महान तत्वज्ञान गाण्यातल्या चार शब्दांच्या पेन ड्राईव्हमध्ये कोंबून बसवायची त्यांची जादू! गदिमांना शब्दप्रभू नाही म्हणायचे तर कुणाला? या सिनेमात गदिमांनी चक्क एक छोटीशी भूमिकाही केली होती. सिनेमात सुधीर फडके यांनी गायलेले एक अत्यंत सुंदर गाणे होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे…’

हे त्या वेळच्या समाजाचे सर्वसाधारण वास्तव गदिमांनी नेमक्या शब्दात पकडले होते. त्या गाण्याशी सर्वांना आपली परिस्थिती जुळवून घेता यायची आणि कदाचित म्हणूनच ते अतिशय लोकप्रियही झाले होते. हल्ली जसे गगनचुंबी इमारत बांधताना मोठमोठ्या यंत्राचा वापर होतो, प्रचंड लोखंडी फाळ जमिनीत घुसवून मोठमोठ्या यंत्रानीच माती उपसली जाते, खोल पाया खणला जातो, तसे औद्योगिक जगाने त्याकाळी आपली राक्षसी नखे भूमातेच्या पोटात खुपसून तिची आतडी बाहेर काढून भौतिक सुबत्ता वाढवलेली नव्हती!! त्यामुळे माणसाच्या जीवनात ‘एकच धागा’ सुखाचा असे. दुखाचे धागे मात्र शंभर असायचे! कारण सगळ्याच गोष्टींची कमतरता होती. वस्तू कमी, नोक-या कमी, पगार कमी, दळणवळ कमी, सुखाची सगळीच साधने कमी. त्यामुळे ‘चित्ती कितीही समाधान’ असले तरी भौतिक सुखाची वानवाच होती. म्हणून कवी गदिमांनी म्हटले होते-

‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे… जरतारी हे वस्‍त्र माणसा तुझिया आयुष्याचे..’

इथे गदिमा समग्र जीवनाचे तत्वज्ञान एका अगदी वरच्या पतळीवर जाऊन सांगत आहेत. ते म्हणतात, ‘मानवा, तुझ्या आयुष्याचे वस्त्र हे दोन धाग्यांनी विणलेले आहे. त्यात एक धागा सुखाचा आहे आणि शंभर धागे दु:खाचे आहेत. तू जरी या जगात असे हे जरतारी वस्त्र पांघरत असला तरीही येताना तू उघडाच येतोस आणि हे जग सोडून जातानाही तू उघडाच असतोस.’ खरे तर श्रीकृष्णाने गीतेत ज्याला ‘आत्म्याचे वस्त्र’ म्हटले आहे ते शरीरही आपण इथेच सोडून जात असतो. मग ‘या जगातल्या व्यर्थ बडेजावासाठी कशाला खोट्या स्वप्नात रंगतोस रे?’ असा त्यांचा प्रश्न आहे. 

‘पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा.     कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे.’

आपली उपमा अधिक स्पष्ट करताना गदिमा किती चित्रमय शैली वापरून सगळे समजायला सोपे करून टाकतात ते पहाणे मोठे रंजक आहे. त्यांनी अलगद शेक्सपियरने आयुष्याला दिलेली तीन अंकी नाटकाची उपमा सूचित केली आहे.

गदिमा म्हणतात लहानपणी बाळाला कौतुकाने जी अंगडी-टोपडी घालतात ती जणू शरीराचीच प्रतीके आहेत. त्या बाळाला काही कळत नसते. आईवडील आजी आजोबा कौतुकाने जे काही घालतील त्यात ते खुश असते. मात्र तरुणपणी एकंदरच शारीरभावना सर्वार्थाने तीव्र होते. आपले शरीर हा आपला प्रेमविषय झालेला असतो. मग यौवनातील व्यक्ती हौशीने रंगीबेरंगी कपडे परिधान करते. पण कपडे म्हणजे केवळ वस्त्रे का? कविता गदिमांची आहे, त्यांना एवढा मर्यादित अर्थ कसा अपेक्षित असेल? त्यांचा अंगुलीनिर्देश आहे तारुण्यातील आसक्तीकडे, विषयात रममाण होण्याच्या वृत्तीकडे! त्याचे वर्णन ते फक्त तीन शब्दात करतात ‘रंगीत वसने तारुण्याची’.

‘मुकी अंगडी बालपणाची.. रंगीत वसने तारुण्याची..जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे’

गदिमांची प्रत्येक उपमा किती यथार्थ आहे ते पहा! म्हातारपणी शरीर थकलेले असते, ते झिजलेले, आकसलेले, छोट्याशाही आघाताला बाध्य झालेले असते. म्हणून ते वृद्धपणातील शरीराला जीर्ण शालीची उपमा देतात.  

शेवटी कवी स्वत:च अंतर्मुख होतो कारण त्याला श्रोत्यालाही अंतर्मुख करायचे आहे. शेवटच्या कडव्यात काहीशा स्वगतासारख्या ओळीत तो स्वत:लाच विचारतो? ‘हे माणसाच्या जीवनाचे असे सुखदुखाचा असमतोल निर्माण करणारे वस्त्र निर्माण करतो तरी कोण?’ तरीही किती विविधता असते या वस्त्रांत! कोणत्याच दोन माणसांचे आयुष्य सारखे असत नाही. अगदी जुळ्या भावंडातही काही ना काही वेगळेपणा असतोच.

इथे गदिमा थांबतात आणि स्वत:च पुन्हा स्वत:च्या प्रश्नाचे उत्तर देतात. तेच म्हणतात, युगानुयुगे माणसांच्या कोट्यावधी पिढ्यांच्या आयुष्याची वेगवेगळी वस्त्र विणणारा तो ‘वरचा’ विणकर तर अदृश्यच आहे. अखंड चालणारे त्याचे हातही अदृश्यच आहेत-

‘या वस्‍त्रांते विणतो कोण? एकसारखी नसती दोन. कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकराचे.’

असे अगदी साधेसाधे विषय घेऊन जुने कवी त्यातून जीवनाचा केवढातरी गूढ अर्थ सहज सांगून जात असत. म्हणून तर ही अनमोल गाणी आठवायची. त्यासाठीच तर आपला हा ‘नॉस्टॅल्जिया’!

♥ ♥ ♥ ♥ ♥

लेखक – श्रीनिवास बेलसरे.

संग्रहिका – डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

? विविधा ?

☆ “शतदा प्रेम करावे…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रौढत्वी निज शैशवास जपणे; बाणा कविचा असे!

 वरील काव्यपंक्ती अगदी शालेय जीवनापासून ऐकत आणि वाचत आले आहे.निबंधात आणि भाषणात या ओळींचा वापर मी अगदी माझ्याच लिहिलेल्या असल्याच्या दिमाखात वापरून मोकळी होत असे. अगदी..

कवी चा बाणा असल्याच्या ताठ्यात!!

पण तुम्हाला सांगते..तेव्हा कधीच हा प्रश्न पडला नाही की…हा बाणा फक्त कविचाच कां ?

पण आज प्रौढत्वी या प्रश्नाचं उत्तर शोधावंसं वाटलं.

 आतापर्यंत जगलेलं…भोगलेलं…घालवलेलं..

वाट्याला आलेलं..आणि उपभोगलेलं

असे सगळेच कंगोरे दृष्टीस पडले आयुष्याचे!! बालदिनाच्या निमित्ताने..व्हॉट्स ॲपवर फिरणार्या पोस्ट्स मधून डोकावणारं…डोळे मिचकावून हसणारं..खोड्याळ आणि खट्याळ..

गोडुलं बालपण दिसलं…आणि आलेलं प्रौढत्व शैशव जपण्यास सिद्ध झालं की!!

 बालपण आणि कविचा बाणा यांचा काही अन्योन्य संबंध आहे कां बरं?

आणि मग माझी स्वारी निघाली की कविच्याच मदतीने…कवी यशवंत देव यांच्या मदतीने..कवितेच्या गर्भात शिरूनी भावार्थाला भिडायला!*

शब्दांच्या पलीकडले स्पंदन..

शब्दांतूनच ओवायला!!*

 बालपण…..निर्व्याज, निरागस, निरामय, नितळ अशा वृत्तींचा देखणा आविष्कार!! बालकाचं मन सतत कुठल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात..विक्रमराजाच्या मानगुटीवर च्या वेताळा सारखं!

सतत कुतुहल, औत्सुक्य, जिज्ञासा,

त्यामुळेच सतत खळखळ वाहणार्या

पाण्याच्या प्रवाहा सारखं…निर्मळ, नितळ…अगदी तळ दिसावा इतकं!!!

कविचं मन ही असंचं….सतत अंतस्थ मनाची साद ऐकणारं, मनात उत्स्फूर्त विचारांचा धबधबा पेलून धरलेलं,

निसर्गा च्या हाका ऐकणारं, गूज, गूढ उकलण्या साठी धडपडणारं…निर्व्याज मन!! नव्या युगातील नव्या मनूचा शूर शिपाई बनून उभं ठाकणारं मन!!

(आई मला छोटीशी बंदूक दे ना! आठवलं ना बालगीत?)

तीच जिज्ञासू वृत्ती…अगदी..

को ऽहम् ते सोऽहम् चा शोध लागेपर्यंत चा शोध लागेपर्यंतची ओढ जपणारं मन!!

बघा…निराश, हताश, हतोत्साहित झाला असाल तर…लहान बालकांत बालक होऊन रमून पहा…एखादी कविता वाचून पहा….मग बघा…

ते बालपण…ती कविता तुमच्या रोमा-रोमांत संचरित होत झिरपत जातं…आणि थकलेल्या मनाला म्हणजेच पर्यायाने शरीरालाही कशी उभारी येते ती!!

नव्याने प्रेमात पडाल या जगण्याच्या..

आणि म्हणाल…” या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!!”👍🏻

आणि मग या प्रौढत्वी ही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतला…अगदी तुमच्याच आसपास असलेला आनंद सापडेल.एक आगळंच समाधान मिळेल. संतोष पावेल मन!!तृप्त मन,

आनंदी मन..मग आपोआपच निरोगी शरीर…तृप्त आत्मा!!

मग हा आत्मा आत्मरंगी रंगून…रामरंगी रंगायला मोठ्या समाधानाने तयार न झाला तरच नवल!!!!

म्हणूनच…कविमनाने…जिगिविषु वृत्तीने…प्रौढत्वी निज शैशवास जपण्याची खिलाडू वृत्ती अंगी बाणण्यास..सज्ज होऊ या कां??

चला तर मग…” ले शपथ..ले शपथ!

 भले ही हो…अग्निपथ! अग्निपथ!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रूचिरा आणि खवय्ये…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “निसर्ग चक्र…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

गुरुवारी संध्याकाळी अमरावती भागात प्रचंड वादळवारं,पाऊस झाला. सुरू झालेला वादळवारा,गडगडाट ह्यांच्या मा-याने मला उगीचच अस्वस्थ व्हायला झालं.जबराट वा-यानं झाडं,वृक्ष जणू गदगद हलू लागली,काही ठिकाणी ती उन्मळून पण पडायच्या बेतात आली. ह्याबरोबरच असंख्य पक्षी हे त्या झाडांवरील निवारा सोडून दुसरीकडे सैरावैरा आश्रय शोधायला भिरभीरु लागली. जवळच गोशाळा असल्याने तेथील पशूधन देखील हंबरायला लागलं.जवळच्या झोपड्यां मधील लोक पक्क्या इमारतींच्या आश्रयाला आले. तेवढ्यात वीज म्हणजेच इलेक्ट्रिसीटी पण गुल झाली. सगळीकडे अंधाराचं साम्राज्य पसरलं .हे सगळं खिडकीतून न्याहाळतांना मनं काळजीनं बेचैन झालं.काही वेळी अपरिचितां वर पण अशी आपत्ती कोसळली तरी आपल्याला काळजी ही आपोआपच वाटायला लागते.ह्यालाच माणुसकीचे बंध म्हणत असावेतं. अशा कातरवेळी एक अनामिक हूरहूर दाटून आली.क्षणभरासाठी का होईना देवावरचा

नशीबावरचा विश्वास डळमळला.पंचभूतांपैकी जल आणि वायू तत्वराशीच्या शक्तीचा पून्हा एकदा प्रत्यय आला. अशा संकटकाळी प्रकर्षाने जाणवतं खरचं सगळं इथल्या इथेच सोडून द्यावं लागतं. क्षणभरासाठी का होईना मोह,माया ह्यांचा विसरपडून आपली धुंदी खाडकन उतरते.

काही तासं गेले. काही तासांपूर्वीचे औदासिन्य, नैराश्य अजून मनावर तसचं होतं.त्यामुळे नेहमीसारखं कामाला लागतांना उत्साही वाटत नव्हतं,मरगळ अजूनही मनावर आपली चादर पसरवूनच होती.पण कामाला न लागता पण भागणार नाही ही सत्यता स्विकारुन कामाला उठले, दार उघडून गँलरीत आले आणि काय आश्चर्य, सभोवतालचे दृश्य बघून आत्मविश्वास परत आला,सुळकन नेहमीसारखी उभारी मनात शिरली.मरगळ, नैराश्य, औदासिन्य तर कुठल्या कुठे धूम पळून गेलं. एका चिमणीने आपलं बांधलेलं घरटं परत डागडुजी केल्यागत ठीक केलं,जणू काही विनातक्रार.

पक्ष्यांनी स्वतःसाठी दुसऱ्या झाडांचा आश्रय शोधला,ते सगळे पक्षी चोचीत बारीकसारीक काडीकचरा जमा करून आणित होते.त्यांनी परत नवीन घरटं बांधायला सुरवात देखील केली होती,त्याच तडफेने त्याच जोमाने.

विशेष म्हणजे दूरवरील त्या झोपड्यांमधील लोक पण स्थानिक लोकांच्या मदतीने डागडुजी करायला लागले ते पण न कंटाळता,न रडता.

खरचं आतापर्यंत बघितल्या पैकी सगळ्यात सुंदर दिवसाची ती सुरवात भासली मला.सगळ्यात प्रसन्न सकाळ ती हीच असं प्रकर्षाने जाणवलं.खरचं त्या परमेश्वराची लीला अगाध आहे.परत लढण्याचं,संकटातून परत जोमाने बाहेर पडून कामाला लागण्याचं बळ तोच आपल्याला पुरवितो ह्याची पक्की खात्री पटली आणि माझ्याही नकळत माझे हात आकाशाकडे बघत आपोआप नतमस्तक होऊन जोडल्या गेलेत.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चहा आणि मैत्री… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मी आणि काॅफी… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

चहा आणि मैत्री

 

चहा म्हणजे चहा असतो

माझ्यासाठी तुमच्यासाठी

आनंदाचा झरा असतो

चहा आणि मी आमची अगदी घट्ट मैत्री आहे..

माझी दिवसाची सुरुवात चहाने आणि दिवस संपतो सुद्धा चहानेच

एक कप चहा दिवसाची सुरवात किक फ्रेश करतो आणि रेंगाळलेल्या दुपारची मरगळ झटकतो…आणि ह्याच चहामुळे माझे अनेकांशी मैत्रीपूर्ण नाती तयार झाली…

ज्या चहात साखर नाही तो चहा पिण्यात मजा नाही आणि ज्यांच्या जीवनात मैत्री नाही अशा जीवनात मजा नाही असे इथे मनापासून नमूद करावेसे वाटते..

चहामुळे मित्र मैत्रीणी जमले आणि आपण चहाबाज झालो अशाच सर्वांच्या भावना असतात नाही का..!

“चला रे जरा चहा घेऊ या किंवा चला रे मस्त कटिंग चहा घेऊन या” असे म्हणत जमलेले  मित्र-मैत्रिणी आणि चहाची टपरी हा जसा माझा हळवा कोपरा आहे ना तसा अनेकांचा ही  हळवा  कोपरा असतो आणि  जर बाहेर मस्त पाऊस पडत असेल तर…

पाऊस पडत असताना

अजून हव तरी काय

एक कटिंग चाय

चवदार चहाचा सुगंध दरवळतो तसं आपणही दरवळाव. जीवनाचा आनंद कसा चहाच्या भरल्या कपा प्रमाणे भरभरून घ्यायला हवा, ताजा ताजा.. चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर आपणही ताजं व्हाव…

आयुष्य कसं चहाच्या रंगा सारखं असावं… प्रत्येक रंग हवा…! नवनवीन नाती जोडावीत. भरपूर मित्र असावेत म्हणजे तुमचा चहाचा ग्लास जरी रिकामा झाला तरी आठवणींचा ग्लास कायम भरलेला राहील…

माझ्यापुरतं सांगायचं झालं तर चहा घराचा असो की बाहेरचा.. माझ्या अनेक चांगल्या आठवणी या चहाच्या कपाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि अनेक जीवाभावाची मित्रमंडळीही बरं…!

कॉलेजच्या दिवसातली सर्वात जास्त मिस होणारी गोष्ट म्हणजे टपरीवरचा चहा… एक कटिंग चारजणांत पिण्याची मजा परत काही आली नाही…!

आयुष्यात किती कप चहा प्यायली असेल मी कुणास ठाऊक…! अगदी उडप्याच्या हॉटेलातल्या दुधाळ चहापासून ते तारांकीत हॉटेलमधल्या स्टाईलमारू चहापर्यंत.  गावोगावच्या टपऱ्यांवरच्या चहापासून रेल्वेतल्या चहा पर्यंत…

मैत्रीचे वय वाढत गेले….चहाच्या टपरीचे रुपडेही बदलले.. बदलत गेले

चहाची चव आणि प्रकारही बदलले  बदलत गेले.. आता तर चहाच्या कपाची साईजही बदलली आहे पण वाफाळता चहा आणि

मित्र-मैत्रिणींचा गप्पाचा रंगलेला फड याची लज्जत मात्र कधीही बदलणार नाही हे नक्कीच…!

जिभेवर रेंगाळणाऱ्या चहाच्या 

चवीशी इतर कुठल्याही पेयाशी तुलना होणार नाही…!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print