मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

☆ जीवनरंग ☆ कथा ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆ 

आहात कोण तुम्ही? –

आशावादी की निराशावादी…

माणसाची मनोवृत्ती म्हणे त्याच्या बोलण्यावरून ओळखता येते, असं काही तत्त्ववेत्त्यांनी सांगून ठेवलं आहे. जुनंच उदाहरण द्यायचं झालं, तर ‘प्याला अर्धा रिकामा आहे’ असं विधान जो करतो, तो नक्कीच निराशावादी. आणि ‘वा! अर्धा भरलेला आहे की प्याला,’ असं कोणी म्हणत असेल, तर आशावादी तेथेची जाणावा!

अलीकडे एका समितीनं शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं शिक्षणाच्या दर्जाची पाहणी केली. देशात महाविद्यालयीन, विद्यापीठीय शिक्षण काय दर्जाचं दिलं जातं (किंवा दिलं जात नाही), याची यथासांग, साद्यंत पाहणी या समितीनं केली. ती करणाऱ्यांमध्ये बरेच तज्ज्ञ होते. हजारो विद्यार्थ्यांशी संपर्क साधून, काही शे प्राध्यापकांशी बोलून आणि अन्य काही शास्त्रीय कसोट्या लावून ही पाहणी करण्यात आली.

या समितीनं आपला अहवाल नुकताच सादर केला. तो स्वीकारायचा की नाही, हे सरकारनं अजून ठरवलं नाही. नेमकं काय करावं, अहवाल जसाच्या तसा स्वीकारावा, अंशतः स्वीकारावा की, पूर्णपणे फेटाळून लावावा, हे ठरविण्यासाठी तज्ज्ञांची आणखी एक समिती नेमण्याचं शिक्षणमंत्र्यांनी ठरवलं आहे म्हणे.

दरम्यानच्या काळात सरकारी सूत्रांमधून अहवाल फुटला. त्यातील काही निरीक्षणं, सूचना सगळीकडे झाल्या. अहवालात काय काय आहे, याच्या बातम्या मग बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या.

सरकारनं न स्वीकारलेल्या या अहवालातलं एक निरीक्षण तर फारच गाजलं. महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल अतिशय स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना समितीनं म्हटलं आहे, ‘पाहणी करताना आमच्या असे निदर्शनास आले आहे की, सांप्रत शिक्षणाचा दर्जा अतिशय खालावला आहे. विद्यार्थ्यांना चार वाक्ये व्यवस्थित लिहिता-वाचताही येत नाहीत. पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी लेखनाचा व वाचनाचा दर्जा अतिशय खालचा आहे. त्यांचे इंग्रजी संभाषण ऐकले, तर ते सातवीतील विद्यार्थ्यांच्या बरोबरीचे आहे.’

अशा कटू निष्कर्षांमुळे तमाम निराशावादी अधिकच निराश झाले आहेत. त्यातून त्यांनी शिक्षणपद्धती, शिक्षण क्षेत्र, संस्थाचालक, प्राध्यापक, कुलगुरू, सरकार आदी सर्वांवर टीकेची झोड उठविण्यास सुरुवात केली आहे.

या उलटही एक प्रतिक्रिया आहे. ‘अरे वा! आपल्याकडची सातवीतली पोरं एकदम ग्रॅज्युएट झालेल्या पोरासारखं लिहितात-वाचतात आणि फाडफाड इंग्रजी बोलतात की!!’

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

(मुक्त पत्रकार, ब्लॉगर)

संपर्क – [email protected],  [email protected]

(इंटरनेटमुळे छान छान विनोद वाचायला मिळतात. विशेषतः इंग्रजीतले विनोद. त्यातल्याच काही छोट्या विनोदांना मराठी साज किंवा बाज देऊन थो़डं विस्तारानं लिहिलं. एखाद्या धान्याचा दाणा फुलवून त्याची खमंग व कुरकुरीत लाही बनवावी, तसं. ह्या लघुकथा अशाच; वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर दोन-चार स्मितरेषा उमटल्या, तर हेतू साध्य झाला एवढंच!)

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा –गोटूचे भावविश्व ☆ सौ. दीपा नारायण पुजारी

☆ जीवनरंग ☆ कथा –गोटूचे भावविश्व ☆ सौ.दीपा पुजारी 

संध्याकाळचे पाच वाजले होते. आजोबांच्या बरोबर गोटू बाल्कनीत बसला होता . समोरच्या पिंपळाच्या झाडावरील कावळे एकदम उडाले. “काव काव”, “काव काव” करत सगळे थव्या थव्यांनी ऊडत इकडेतिकडे गेले. गोटूनं आजोबांना विचारलं,

“आजोबा, कित्ती कावळे?” त्याचे इवले हात पसरले होते. भाबडे डोळे मोठे झाले होते.

आजोबा म्हणाले, ” गोटू, शाळा सुटली कावळ्यांची. आता घरी चाललेत ते.”

“घरी?”, गोटूनं विचारलं.” पण आजोबा, कावळ्यांच घर असतं?”

आजोबा  थोडे विचारात पडले. थोड्या वेळानं म्हणाले,”बाळा,कावळीणीला अंडी घालायची असतात ना;  फक्त तेंव्हाच कावळा घरटं बांधतो. कसंही ओबडधोबड, काट्याकुट्या किंवा मिळेल ते साहित्य वापरुन बांधलं जातं.”

गोटू, “हो? आजोबा मला दाखवाल एकदा?”

“दाखवेन हं बाळ.”

गोटू एकदम ऊठला. “आजोबा मला आजीनं काऊ-चिऊची गोष्ट सांगितली आहे.

ती हो s s  ती हो, ती नाही का, पाऊस पडतो

आणि काऊचं घर जातं वाहून. “आजोबा,” तो पुढं म्हणाला ,” हा काऊ एकदमच बुद्दु दिसतोय.”

“का रे बाबा? असं का वाटलं तुला . . . . .

” बघा नं आजोबा; शाळेला जातो तरी  घरटं बांधता येत नाही. चिऊताई मात्र एकदम स्मार्ट . . . . . . .

“ती रे कशी?”

“शाळेला कुठं जाते? तरीही घरटं बांधते. . ते ही पावसात वाहून न जाणारं . . . ”

आजोबा नातवाचा आविर्भाव बघून हसले खरे. पण थोडेसे विचारात पडले. सगळ्याच गोष्टी शिक्षणामुळं, पदवी घेतल्यामुळं मिळतात असं नाही. बर्‍याचशा गोष्टी केवळ निरिक्षणातून, विवेकबुद्धीनं समजून घेता येतात. घरटं बांधणं हे कौशल्य आहे, जे चिमणीकडं आहे; सुगरणींकडं आहे.

कावळा, कबूतर असे काही पक्षी घरटं बांधताना दिसत नाहीत. कावळा वीणीच्या हंगामापुरतं का होईना घरटं बांधतो आणि फसतो. कोकीळकंठी पिल्लांचं गायन सुरु झाल्यावरच जागा होतो. आता काव काव आणि फडफड करत बसण्यापलिकडं काहीच पंखात उरत नाही. कोकीळेच्या रियाजात अंडी उबवण्यामुळं खंड पडत असावा कदाचित. कावळ्यालाही थोडी कमी अक्कल असते हे ही बरच म्हणायचं. तेव्हढ्यात गोटूच्या हाका कानावर आल्या . . .

” आजोबा . . . . आजोबा. . . . . .

कावकाव थांबली होती. पिंपळ शांत ऊभा होता. गोटू आजोबांना बॅट बॉल खेळायला बोलवत होता.

 

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

फोन.नं    ९६६५६६९१४८

email :[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन डबे ☆ सौ. नीला देवल

सौ. नीला देवल

☆ जीवनरंग ☆ दोन डबे ☆ सौ. नीला देवल ☆

राजू आज फार खुश होता. राकेश उर्फ रॉकी सारखाच स्पायडर मॅन चे चित्र असलेला, काल स्पर्धेत बक्षिस मिळालेला टिफिन चा डबा घेऊन तो शाळेत आला होता मधल्या सुट्टीत त्याने खाण्यासाठी डबा उघडला तर आतील ब्रेड जाम बघून तो रॉकी कडे धावला.  “रॉकी थांब डब्याची आदला बदल झाली आहे. हा घे तुझा डबा”. येवढे म्हणे तो रॉकी ने राजुचा डबा खायला सुर वात ही केली होती. “असु दे, आज माझा डबा तू खा, तुझा डबा मी खातो”. राजूने ब्रेड जाम खाल्ले तर रॉकी ने पोळी भाजी चाटून पुसून खाऊन टाकली.

दुसरे दिवशी रॉकी हट्टाने म्हणाला “राजू आज पण तुझा डबा मी च खाणार”. राजुच्या डब्यातील भाकरी, मेथीची भाजी लिंबाचं लोणचं रॉकी ने संपवले. त्रतोठरा बसणारा पाव जाम खावून राजूला भूक भागवावी लागली.   ओ लीने चार दिवस पवाचे तुकडे खाऊन राजूला वीट आला. दुसरे दिवशी त्याने आपला डबा रॉकी कडून हिसकावून घेतला. “तुझा डबा तू खा. तुझा पाव जाम नको मला. वीट आला त्याचा. कोरड कोरड खाऊन भूक भागत नाही माझी. जाम सुध्धा अगोडच लागतोय. माझ्या आईच्या भाजी भाकरी पुढे.” “होय रे राजू तुझ्या डब्यातल्या भाजी भाकरीची रोज एक नवीन च पण मस्त चव असते. भाकरी भाजी तिखट असूनही चवता चावता इतकी मस्त गोड होऊन जाते की बस!” ती भाकरी खाताना कमीच पडते. आता तुझा डबा रोज मीच खाणार सांगून ठेवतो तुला”. “रॉकी नको, नको माझा डबा मलाच हवा. तुझ्या विकतच्या ब्रेड जमला माझ्या आईच्या भाजी भाकरी ची चव कशी येणार?”

दोघांचे भांडण  शिक्षकानं पर्यंत गेले, “सर हा रॉकी माझा डबा रोज जबदस्तीने घेऊन खातो आणि मला त्याच्या डब्यातील पावाचे तुकडे मला खायला लावतो. मला पाव खावून  कंटाळा आला. शिवाय भूक भागत नाही ते वेगळेच” राजू म्हणाला. “पण तुझ्या डब्यातील भाकरी, पोळी भाजी खाऊन माझी भूक आणखीनच वाढत जाते. भाकरी कमीच पडते. असे वाटते.” सर म्हणाले,”रॉकी तुझ्या आईला तू पोळी भाजी द्यायला का नाही सांगत?”  सर तिला तिच्या लॅपटॉपच्या सततच्या कामातून सवड मिळत नाही. नोकरणी डबा देते. मग मलाही ब्रेड खाऊन खाऊन कंटाळा येतो ना!”

“बरोबर आहे. पण दुसऱ्याचा डबा खाणे योग्य नाही. ब्रेड विकणाऱ्या बेकरी वाल्यांना फ्कत पाईषाशी मतलब. तो पाव, केक खा नाही तर फेकून द्या त्यांना काहीच फरक नाही पडत. पण आई भाजी भाकरी, पोळी करताना आपल्या  मुलाने ती खावी, त्याच्या अंगाला ते जेवण लागून त्याने  धश्ट पुष्ट्ट, बलवान बनाव म्हणून मायेच्या, प्रेमाच्या हातानं त्यात तिखट मीठ घालतांना ममतेची गोडी ही त्यात ती घालत असते. म्हणून ती भाजी भाकरी चवीष्ट होऊन गोड मधूर होऊन जाते. त्यात   तिचे निस्वार्थी प्रेम असते. पै शाचा संभंध नसतो. रॉकी तुझा डबा फकत पैं सा , व्यवहार याने भरलेला असतो तर राजुचा डबा माया ममता  आणि निस्वार्थी प्रेम याने भरलेला असतो. असो. उद्या दोघांनी स्वतःचेच डबे खायचे. नाही तर मी शिक्षा करीन. अशी ताकी त देऊन सर गेले.

दुसरे दिवशी मधल्या सुट्टीत राजूने आपला डबा उघडला. पण रॉकी ने डबा उघडला च नाही. रडवेल्या डोळयांनी तो स्वताच्या बंद डब्या कडे  नुसताच बघत बसून राहिला.”  रॉकी,

 

© सौ. नीला देवल

९६७३०१२०९०

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खजिना ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ खजिना ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

राजा अगदी ऐटीत सोपानराव सावकारच्या दुकानात शिरला. ” तुम्ही मौल्यवान वस्तू गहाण ठेवून त्याच्या बदल्यात रोख पैसे देता म्हणे!!” आपल्या हातात असलेली रेशमी कपड्यांची पोटली तिथे ठेवत राजा म्हणाला. भरलेल्या पोटलीकडे आणि 9-10 वर्षाचा राजाकडे सोपानराव लालसेने बघू लागले.

“आहे काय ह्या पुरचुंडीत एवढे, चोरी बीरी तर केली नाहीस ना ?”

सोपानराव मोठ्या आवाजात म्हणाले. ” नाही हो मी गावा कडून येताना हा माझा खजिना घेऊन आलो आहे. माझ्या साठी तो लाख मोलाचा आहे. पण तुम्ही मला पाच हजार रूपये द्या,  नंतर मी तो सोडवून घेईन. ”

पुरचुंडी पालथी करत राजा म्हणाला. र्‍हा

समोर छोटे शंखशिंपले, सागरगोटे, रंगीबेरंगी छोटे छोटे दगड हे सगळे पसरलेले पाहून सावकारला खूप चिड आली. ” हा… हा आहे तुझा खजिना?  ह्या कचर्‍याचे पाच हजारच काय कोणी पाच रूपयेसुद्धा देणार नाही. ”

राजाला हे ऐकून राग आला, ” तुम्हाला काय माहित हे सगळे मी किती मेहनतीने कमावले आहे? ह्याच्यासाठी तर माझे मित्र स्वतःला सुद्धा गहाण ठेवून घेतील. ” सकाळी सकाळी पहिलं गिर्‍हाईक असं आल्याने सोपानराव खूपच चिडलेले होते. त्यांनी सगळ्या वस्तू उचलल्या आणि सरळ जाउन जवळच्या गटारीच्या नाल्यात टाकून दिल्या. छोट्या राजाला काही कळायच्या आत त्याचा खजिना गटारीत वाहून गेला.  त्याला रडूच आले.  तो संतापाने थरथरत कापत म्हणाला, ” तुम्हाला माझा खजिना  कचरा वाटला ना,  कधी तरी तुमचा खजिना पण  कचरा होईल तेंव्हा तुम्हाला कळेल.”
दिवसभर राजा जेवल्या खाल्या शिवाय चाळीच्या जिन्यात आई ची वाट बघत होता. त्याची आई लोकांचं  धुणंभांड्यांचं काम करी आणि बाबा हातगाडीवर हमाली करत. सध्या एक महिन्या पासून बाबांना बरे नसल्याने ते कामावर जाऊ शकत नव्हते. त्याचमुळे बाबांच्या औषधांसाठीच राजा स्वत:चा खजिना गहाण ठेवून पैसे आणणार होता. पैसे तर नाहीच मिळाले उलट त्याचा खजिना गटारीत वाहून गेला.

त्याच दिवशी संध्याकाळी  नोटाबंदी लागू झाली. पाचशे आणि हजारच्या नोटा चालनातून रद्द झाल्या. सावकाराला वेड लागल्या सारखे झाले. तो स्वत:कडे  आणि हातात असलेल्या पाचशे व हजार रूपयांच्या नोटांकडे बघत राहिला. सावकराच्या कपाटात असलेल्या लाखो रुपये किंमतीच्या नोटांचा कचरा झाला होता.

 

© सौ. स्मिता माहुलीकर

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – चाणाक्ष बालक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – चाणाक्ष बालक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा १.  चाणाक्ष बालक

कांचीपुरम हे त्या काळातील एक श्रेष्ठ दर्जाचे अध्ययनक्षेत्र होते. तिथे एक विद्वान राहत होता. त्याचे अध्यापनातील कौशल्य विलक्षण होते. गुरु ज्ञानी तर असावाच, पण ते ज्ञान शिष्यामधे संक्रमित होणे हे जास्त महत्वपूर्ण असते. त्यावरूनच त्याची गुणवत्ता सिद्ध होते. त्या विद्वानाने आपल्या पाठ-प्रवचनाद्वारे अनेक विद्यार्थ्यांना विद्यासंपन्न केले. त्यामुळे त्या विद्वानाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्याच्यासारखा श्रेष्ठ गुरु लाभावा म्हणून दूरवरून त्याच्याकडे विद्यार्थी येत असत.

एके दिवशी एक बालक त्या विद्वानाजवळ येऊन म्हणाला, “गुरुवर , आपणाकडून विद्या ग्रहण करावी अशी माझी मनोमन इच्छा आहे. तेव्हा आपण मला शिकवावे अशी नम्र विनंती आहे.”  त्या बालकाचे बोलणे ऐकताच त्याच्या बुद्धीची परीक्षा घ्यावी असे त्या विद्वानाला वाटले. म्हणून त्याने बालकास “देव कोठे आहे?” असा प्रश्न विचारला. तो प्रश्न ऐकताच क्षणार्धात बालक नम्रतेने उत्तरला, “गुरुवर, देव जिथे कोठे नाही ते आपण मला प्रथम सांगावे. नंतर मी आपल्या प्रश्नाचे उत्तर देतो.” बालकाच्या त्या उत्तराद्वारे विद्वानाला त्याच्या बुद्धीची क्षमता लक्षात आली. बालकाच्या विनंतीला अनुसरून त्याने त्याला विविध प्रकारचे ज्ञान देऊन विद्यासंपन्न केले.

तात्पर्य – खरोखरच बुद्धिमान व्यक्तींच्या बुद्धीची चुणूक बालपणातच दिसून येते !

 

अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी    

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ नजर ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे

सौ. प्रियदर्शिनी तगारे

☆ जीवनरंग ☆ नजर ☆ सौ.प्रियदर्शिनी तगारे ☆ 

दारावरची बेल वाजली. रजनीनं दार उघडलं. दारात समोरच्या फ्लॅट मधल्या काकू होत्या.

“आटपलं का तुझं?”

“हो काकू, आताच रमेश बॅंकेत गेले. मुलं तर आठालाच गेली शाळेत. तुमचं आवरलं ?”

“हो गं, म्हणूनच आले ना! बरं वाटतं तुझ्याशी बोलल्यावर. ये ना, बाहेरच पॅसेजमध्ये.”

दोघी पॅसेजमध्ये बोलत राहिल्या. एव्हढ्यात जिना चढून कुणी तरी वयस्क माणूस वर आला. तो जवळ आला आणि रजनीचं लक्ष त्याच्या डोळ्याकडं गेलं. ती एकदम दचकली. ‘अरे बापरे’असं  नकळत तिच्या तोंडून निघालं. काकूंची त्याच्याकडे पाठ होती. रजनीचा चेहरा पाहून त्या वळल्या. त्या माणसाकडं पहात बोलल्या, “या, हे आहेत घरात. येते गं रजनी “असं म्हणून काकू गेल्या.

सहा महिन्यांपूर्वी या गावात रमेशची बदली झाली होती. या अपार्टमेंटमध्ये फ्लॅट त्यांनी  भाड्याने घेतला होता. समोरच्या फ्लॅट मधल्या काकूंची सोबत चांगली होती.थोड्याच दिवसात त्यांनी रजनीला आईसारखी माया लावली होती.

तो माणूस आला त्यानंतर दोन दिवसांनी दुपारच्याच काकू आल्या. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मग काकू म्हणाल्या “रजनी, परवा तू त्या पाहुण्यांना बघून दचकलीस का ?”

रजनीनं न राहवून विचारलं,” काकू, ते ओळखीचे आहेत का तुमच्या ?”

“माझ्या बहिणीच्या दूरच्या नात्यातले आहेत ते. कुठल्याशा कार्यासाठी आले होते. पण तू …..”

रजनीनं क्षणभर काकूंकडं पहात आवंढा गिळला आणि ती बोलायला लागली,

“माझ्या लहानपणीची आठवण आहे ही. मी दहा-बारा वर्षांची असेन. घरात आई, बाबा, मी आणि माझी बहीण रागिणी एवढे होतो. आमच्या गल्लीत सगळी एकमजली लहान लहान घरं होती. आजूबाजूच्या घरातल्या सगळ्यांचं एकमेकांकडं येणंजाणं होतं. सगळ्या बायका एकत्र गप्पा मारत असत. आम्हा मुलींकरवी निरोपांची देवाणघेवाण होई तर कधी एखाद्या पदार्थ पोहचवला जाई. मी सगळ्यांकडं आनंदानं जात असे. फक्त गल्लीच्या टोकाला असलेल्या गोविंद अप्पांच्या घराकडे मात्र मी सहसा फिरकत नसे. खरं तर गोविंद अप्पांची बायको इंदिराकाकू आणि आमची आई यांची खूप मैत्री. पण मी तिकडं जात नसे याला कारण बापू, अप्पांचा धाकटा भाऊ. तसा तो मोठा होता, लग्न बिग्न झालेला. तो जेव्हां घरात असे तेव्हां घराच्या पायरीवर किंवा बाहेरच्या खोलीत उभा राहून सगळीकडे पहात असे. त्याची नजर फार विचित्र होती. त्या लहान वयातही मला त्यात काहीतरी वेगळं आहे हे जाणवत असे. त्यांच्या घरी जाऊन निरोप सांग असं आई म्हणाली की मी नाही म्हणायची. मग आईला राग यायचा. माझ्या न जाण्याला कारण होतं.

एकदा मी त्यांच्याकडे गेले. इंदिरा काकू  मागे स्वयंपाकघरात होत्या. तिकडे जाण्यासाठी मी निघाले तर मधल्या अंधाऱ्या बोळात बापूने मला……… त्याचा तो विचित्र स्पर्श आठवला तरी आजही अंगावर शहारा येतो. त्यावेळी मी आईला सांगू शकले नाही. काय सांगावं ते कळतच नव्हतं, खरं तर खूप काही घडलं नव्हतं. पण तरीही खूप काही होतं. त्याची नजर मनात धडकी भरवायची.

काकू, त्यादिवशी तुमच्या दाराशी त्यांना बघताच ती नजर आठवून मी दचकले.आई मला म्हणायची काहीतरीच विक्षिप्तपणा बाई तुझा. मग मलाही कधीतरी वाटायचं……..”

“नाही रजनी, तू चुकत नव्हतीस. हा बापू वागायला चांगला नव्हताच. बरं झालं; तेव्हां तू सावध झालीस. नाहीतर एखादा अवघड प्रसंग तुझ्यावर आला असता. मोठी माणसं काही वेळा लहान मुलांच्या बोलण्याकडं दुर्लक्ष करतात. पण त्याची मोठी किंमत मोजावी लागते. लहान मुलांना जेव्हां अशी जाणीव होते, त्यात नक्की तथ्य असतं”

काकूंचं बोलणं ऐकून रजनीला एव्हढ्या वर्षांनंतरही सुटल्याची भावना झाली.

 

© सौ.प्रियदर्शिनी तगारे

© सौ.प्रियदर्शिनी तगारे≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पुढचं पाऊल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ पुढचं पाऊल ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

“दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त ज्या आमदार-खासदारांना शिक्षा झाली असेल,  त्यांचं विधानसभा वा संसदेतील सदस्यत्व आपोआप रद्द होईल.”  सुप्रीम कोर्टाने जाहीर केले

“राजकारणातील अपराध्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हे चांगले पाऊल आहे.” एक कार्यकर्ता दुसर्‍यायाला म्हणाला.

“हा निर्णय राजकीय पक्षांनी मानला तर ना! उमेदवारांना तिकीट देण्याची वेळ आली की ते म्हणणार, जिंकणार्‍या उमेदवारालाच तिकीट देण्याचा विचार केला जाईल.”

“हां! हेही खरं आहे.”

“असं कळतं, कोणत्याच गोष्टीबाबत एकमत न होणारे सर्व राजकीय एकत्र येऊन त्यांनी  बैठक घेऊन निर्णय घेतलाय की याच सत्रात सरकार सुप्रीम कोर्टाचा आदेश निष्प्रभ बनवण्यासाठी संशोधन विधेयक मांडणार आहे. त्या विधेयकाचं सर्वच राजकीय पक्षांनी समर्थन करावं. राजकीय पक्ष गुन्हेगारांच्या पकडीत आहे आणि संसद राजकीय पक्षांच्या. त्यामुळे संशोधन विधेयक पारीत होणारच!”

“तर मग संसदेच्या पुढल्या सत्रात संसद आणि विधानसभेत अपराध्यांसठी काही सीटचं आरक्षण असावं, असंही विधेयक मांडलं जाईल.” दोघांचं बोलणं ऐकणारा सामान्य माणूस म्हणाला.

 

मूळ कथा – अगला कदम        मूळ लेखक – श्री अतुल मोहन प्रसाद

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिंइन्व्हेंट ☆ सौ ज्योती विलास जोशी

सौ ज्योती विलास जोशी 

☆ जीवनरंग ☆ रिंइन्व्हेंट ☆ सौ ज्योती विलास जोशी ☆ 

 

आज रविवार… म्हणून सहजच विद्याला सकाळ सकाळी फोन केला.

“काय विद्या काय चाललंय?”

“काही नाही गं !नेहमीचच जगण्यासाठीची धडपड …..

तिच्या या उत्तराने मी सटपटले.

” का ग ,काय झालं ?बरं नाही का?”

” मला काय धाड झाली.” पुन्हा तसाच सूर विद्याचा….

“गडबडीत आहेस का? नंतर फोन करते.”

तिचा मूड खराब आहे हे लक्षात आलं.

“नाही गडबड कसली? पण जिवाला शांतपणा म्हणून नाही बघ! सकाळी उठल्यापासून…….

“नुसती जगण्यासाठी धडपड असंच ना ?” मी तिला टोकले.

“नाहीतर काय अगं !”

पण झालं तरी काय सांगशील…..

“अगं अगदी रेसचा घोडा झाले बघ !!थांबायचं कुठं हे मला समजलं पण उपयोग काय त्याचा? लगाम ज्याच्या हाती त्याला तर समजायला हवं ना ?”

म्हणजे कामानं थकली आहेस म्हण….

“मला वाटलंच तुला असच वाटलं असणार!!”

सोड ना आता ती बँकेची नोकरी…व्हीआरएस घे . काय प्रॉब्लेम आहे ?

“तेच तर मला करायचं नाहीये ना”

दोन्हीकडून बोलतेस बाई! मनात तरी काय आहे तुझ्या? तुझा प्रॉब्लेम सोडवायचा तरी कसा?

“मला रिंइन्व्हेंट व्हायचयं ”

मी आ वासला .

“अगं खरंच फ्रस्ट्रेशन आलयं. इतकी वर्ष काम करते मी बँकेत .कधी म्हणून मला कंटाळा आला नाही ….अगदी आवडीचं काम आहे ते माझं. ना बॉसची कटकट न सहकाऱ्यांची पण आताशा नकोच वाटायला लागलयं सगळं .कधी एकदा आठवडा संपतो असं वाटतं आणि रविवारी सगळा राग घरातल्यावर निघतो ”

मला तरी अजून तुझा विषय समजलेला नाही. बोलून मोकळी हो बरं आणि री इन्व्हेंट म्हणजे काय हे ही सांग. “अगं काळाशी मिळतंजुळतं न घेणारी माणसे कालबाह्य होतात स्वतः ला री इन्व्हेंट न करणारी माणसे स्पर्धेतून बाद होतात”

अच्छा म्हणजे कामाचं प्रेशर आहे तर …मी अजून कोड्यातच !!

“तसं म्हण हवं तर!” असं म्हणून ती बोलू लागली.

” काय झालंय आताशा कोर बँकिंग सुरू झाले आहे. सगळं काही डिजिटल कॉम्प्युटराईजड!!… पेनलेस आणि पेपरलेस असं कामाचं स्वरूप आहे. इतके दिवस आम्ही जे मॅन्युअली करत होतो ते सगळं आता कॉम्प्युटर वर करावे लागते आम्हाला ते जमत नाही. बँकेने कॉम्प्युटर हाताळणारी प्रशिक्षित टीम अपॉईंट केली आहे आम्हा प्रत्येकाच्या मागे त्यातील एक कॅंडिडेट असतो. दिवसभर त्यांची मदत घेऊन आम्हाला काम करावे लागते .”

मग तुला प्रॉब्लेम काय आहे ?नवीन पिढीला महत्व दिलं म्हणून इतकी चिडली आहेस का ?

“जखमेवर मीठ चोळलसं माझ्या! तसं नाही गं, स्वतःबद्दल आम्ही मंडळी साशंक झालो आहोत. आम्हाला हे जमेल का? आकलन होईल का ?या मुलां इतका स्पीड येईल का? कस्टमर समोर सुद्धा बऱ्याच वेळेला की बोर्ड सहज हाताळता येत नसल्याने अपमान होतो .

बालवाडीत असल्यासारखं वाटतं. फरक इतकाच की त्यावेळी आम्ही निरागस होतो त्यामुळे अपमान हा शब्द आमच्या शब्दकोशात आलेला नव्हता .पण आताशा ‘इगो ”अपमान ‘असे शब्द आमच्या शरीराला चिकटलेले आहेत .एकदा वाटतं बस झालं व्हीआरएस घ्यावी पण मन हार मानायला तयार नाही .तुला काय वाटतं ?”विद्यानं मला बोलायला वाट करून दिली .

‘ विद्या मी तुला एक उदाहरण सांगते. बघ पटतंय का ते हरिणाला ठाऊक असतं की अत्यंत वेगवान अशा सिंहा पेक्षा जोरात पळाव लागेल नाहीतर आपण शिकार झालोच म्हणून समजा.त्याच प्रमाणे सिंहालाही ठाऊक असते की आपल्या पेक्षा जोरात पळणाऱ्या हरणाला गाठायचं असेल तर वेग वाढवायला हवा नाहीतर आपला उपवास ठरलेला! तुला वाटणारी ही रेस ही स्पर्धा म्हणजे जीवनाचा अपरिहार्य अविभाज्य असा भाग आहे. यथाशक्ती प्रयत्न करत राहणं हेच आपल्या हातात आहे. तुझ्या वयात एक्सेप्टन्स असणं जरुरी आहे .

मन हार मानायला तयार नाही हे तुझं वाक्य सकारात्मक आहे….. मनाला ऊर्जा देणारे औषध आपल्या शरीरात आहे हे ध्यानात असू दे.

“थोडक्यात काय बँकेच्या दारा बाहेर अपमान अहंकार सोडून आत प्रवेश करते आणि स्वतःला युवापिढीच्या मदतीने रिंइन्व्हेंट करते. इतकं सोपं आहे ते”.

माझ्या एका सहज केलेल्या फोन मुळे विद्याचे चित्त शांत झालं याचं मला आत्यंतिक सुख वाटलं.

 

© सौ ज्योती विलास जोशी

इचलकरंजी

[email protected]

9822553857

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवन रंग ☆ संदेश (भावानुवाद) ☆ सुश्री माया महाजन

श्रीमती माया सुरेश महाजन

☆ जीवनरंग ☆ संदेश ☆ श्रीमती माया सुरेश महाजन 

मूक-बधिर असलेल्या त्या आकर्षक तरुणीने स्वत:चे बुटिक उघडले होते. ज्यात रेडिमेड कपडे, सोफा कव्हर्स, चादरी, टॉवेल्स वगैरे बरोबरच महिलांच्या प्रसाधनाच्याही वस्तु ठेवल्या होत्या. तिची छोटी बहीण, जी मेडिकल प्रवेशाची तयारी करत होती, नेहमी आपल्या मैत्रिणीबरोबर रमा बरोबर, बुटिकमध्ये यायची तिची मैत्रीण आली की काही न काही वस्तु खरेदी करायचीच गप्पा मारता-मारता एकदा तिने सांगितले की तिला फॅशन डिझायनर बनायची इच्छा आहे, पण आई-वडिलांची इच्छा तिला डॉक्टर बनवायची आहे. परीक्षा झाल्यावर असे समजले की रमाचे पेपर्स काही चांगले नाही गेले. तिला अंदाज आला होता की तिला मेडिकलला प्रवेश मिळणे अशक्यच आहे. दोनच दिवसांनंतर तिने फॅनला लटकून आत्महत्या केली.

मूक-बधिर तरुणीला फारच धक्का बसला. तिने आपल्या डायरीत लिहिले, ‘निसर्गाने ज्यांना स्वस्थ, सुंदर आणि पूर्ण शरीर दिले आहे, अशी माणसेदेखील लहान-मोठ्या अपयशांना घाबरून इतके कुंठित, अवसान घातकी, तणावग्रस्त होऊन जातात की आपली जीवन यात्राच संपवून टाकतात. परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्यच त्यांच्यात नसते. याउलट आमच्यासारखे विकलांग मात्र कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला तयार असतात, कदाचित जीवन-संघर्षाचा धडा आपल्या अपंगत्वामुळे ते लहानपणापासून शिकत असतात. कोणाचाही जरासा स्नेह, सहयोग आणि प्रोत्साहन मिळताच आम्ही स्वत:ला खूप सुखी मानून घेतो तुम्ही कधी ऐकले आहे का कोण्या विकलांग व्यक्तिने जीवनात निराश होऊन, तणावग्रस्त किंवा मतिकुंठित होऊन आत्महत्या केली?’

तिने डायरीत ते पान फाडले आणि डिंकाने आपल्या बुटिकाच्या प्रवेशद्वारावर चिकटवून टाकले.

 

मूळ हिंदी कथा – लड़का-लड़की – सुश्री नरेन्द्र कौर छाबड़ा

मो.- ९३२५२६१०७९

अनुवाद – सुश्री माया सुरेश महाजन 

मो.-९८५०५६६४४२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गांधी ना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ गांधींना येऊ दे ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर 

`वर्मा सर,  आपण या कार्यालयात सगळ्यात ईमानदार ऑफीसर म्हणून सुप्रसिद्ध आहात. म्हणूनच आपण आपल्या केबीनमध्ये गांधिजींच्या दोन तसबिरी लावल्या आहेत का?  एक मागे आणि एक पुढे?  वर्मांच्या हाताखाली काम करणारे शर्मा आपल्या वरिष्ठांना विचारत होते.

`ते अशासाठी शर्मा,  माझ्यासमोर बसलेल्या अपरिचिताने माझ्यामागे लावलेला गांधीजींचा फोटो बघून खोटे बलू नये आणि मी जेव्हा खोटे बोलेन, तेव्हा निश्चिंत असेन,  की मला खोटं बोलताना गांधीजी बघत नाही आहेत. ‘आता काय सांगायचं,  दहात आठ वेळा तरी मला खोटं बोलावं लागतं’  वर्मांच्या मनात आलं,  पण ते बोलले नाहीत.

`पण सर, गांधीजींचा फोटो तर आपल्या पुढेही लावलेला आहे. त्याचं काय?’

`त्याचं काय आहे,  मी. शर्मा, तुम्ही बघितलं असेल, की मी शिपायाला वारंवार बोलावून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो.’

`होय! बर्‍याचवेळा… म्हणूनच आपल्या समोरील फोटावर कधी धूळ दिसत नाही. पण मागचा फोटो मात्र धुळीनं भरलेला आहे.’

`त्याचं असं आहे शर्मा,  जेव्हा मला खोटं बोलण्याची वेळ येते,  तेव्हा, त्यापूर्वी मी शिपायाला बोलवून फोटो स्वच्छ पुसून आणायला सांगतो. शिपाई तसंही कुठलंही काम दोन तासांच्या आधी करतच नाही. भिंतीवरून फोटो हटवला जाताच,  मी दोन-तीन फ्रॉड ठेके निपटून टाकतो.

‘वा:! काय बोललात! आता यावर चहा झालाच पाहिजे.’

`जरा थांबा. गांधीजी येऊ देत. तसंही कुठल्याही सरकारी कार्यालयात चहा पिण्याइतकं  खरं काम दुसरं कोणतं होत असेल?’  आणि दोघेही हास्य-विनोदात बुडून गेले.

मूळ हिंदी कथा – गांधी को आने दो         मूळ लेखिका- मृदुला श्रीवास्तव

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print