मराठी साहित्य – जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ समर्पण  (अनुवादीत कथा) –  क्रमश: भाग 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

सगळीकडे गडबड-गोंधळ उडाला होता. सगळं अस्ताव्यस्त झालं होतं. शहराच्या प्रत्येक काना-कोपर्‍यातून भयध्वनी गुंजत होता. एकापासून दुसर्‍याकडे, दुसर्‍यापासून तिसर्‍याकडे असं करत कोरोना व्हायरस एलेग्ज़ेंडर नर्सिंग होमच्या उंबरठ्यावर येऊन धडकला होता. तिथे काही वयस्क मंडळी आधीपासूनच बिछान्यावर होती. सीनियर सिटीझनच्या या केअर होम मध्ये  अधिकांश लोक पंचाहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे होते. कुणी हिंडु-फिरू शकत होते, तर कुणी बिछान्यावर पडलेलेच असायचे. आपली दिनचर्या चालवण्यासाठी कुणाला मदतीची गरज नसे, तर कुणीकुणी पूर्णपणे दुसर्‍याच्या मदतीवरच अवलांबून असायचे. कुणी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही बाबतीत अस्वस्थ असायचे, तर कुणी फक्त मानसिकदृष्ट्या. ते चाला-फिरायचे पण असे की जसा काही त्यांच्यात जीवच नाही. त्यांच्याकडे बघताना वाटायचं जीवन तुटून-फुटून गेलय. कसे बसे ते तुकडे गोळा करून ते चालताहेत पण कुठल्याही क्षणी ते विखरून पडतील.

करोनाचा प्रहार सहन करण्याची ताकद या वयस्क मंडळींमध्ये खूपच कमी होती. त्याचा फायदा उठवून व्हायरस,    शहरातल्या अशा प्रकारच्या नर्सिंग होम्सना  आपलं लक्ष्य बनवत होता. आत्तापर्यंत सुरक्षित असलेलं हे नर्सिंग होम आता त्याच्या पकडीत सापडलं होतं. एका मागोमाग एक असे अनेक लोकांचे रिपोर्टस पॉझिटिव्ह येत चालले होते आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवलं जाऊ लागलं होतं. चोवीस तास सरता सरता दहा जणांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या साथीदारांमध्ये निराशा आणि दहशत पसरवत भिंतींना धडकून गोंधळ निर्माण करत होती. मृत्यूचं दृश्य डोळ्यांच्या अगदी जवळ येऊन टकटक करत होतं.

भीती आणि धोके यांच्याशी झुंजत, आणि आपल्या जिवाची काळजी करत इथले कर्मचारी ही परिस्थिती हाताळत होते. कुणी पॉझिटिव्ह झाल्याने घरी एकांतवासात होते, कुणी पॉझिटिव्ह होण्याच्या शंकेने घरी राहू इच्छित होते, पण नाईलाजाने काम करत होते. एका मागोमाग येणार्‍या आशा बातम्यांनी रोझा विचलित झाली होती. आपला शेजारी स्टीव्हबद्दलच्या बातमीची उतावीळपणे वाट बघत होती.

जीवनातले शहाऐशी वसंत पार केलेल्या रोझावर मृत्यूच्या बातम्यांचा आतंक आशा तर्‍हेने पसरला होता, की टी.व्ही.च्या स्क्रीनवरून  तिची नजर हटतच नव्हती. गेली दहा वर्षे हे नर्सिंग होम हेच तिचं घर होतं. गेले काही दिवस इथले कर्मचारी आशा तर्‍हेने घाबरत घाबरत आपले काम करत होते, जसे काही बिछान्यावर पडलेले हे लोक, त्यांच्यासाठी मृत्यूचा संदेश घेऊन उभे आहेत. सगळ्यांनी आपल्याला पूर्णपणे कव्हर केलं होतं. कळतच नव्हतं कोण कोण आहे. काम करणारे त्यांच्या अवती-भवती रोबोटप्रमाणे वावरतील, अशी स्थिती आत्तापर्यंत कधीच आली नव्हती.  हलक्या निळ्या रंगाच्या प्लॅस्टिक कव्हरमध्ये झाकलेले किंवा असं म्हणता येईल की प्लॅस्टिक गाऊन घातलेले , हातात हातमोजे, तोंडावर मास्क असे सगळे सजलेले होते. चष्म्याच्या मागे लपलेल्या डोळयांशवाय त्यांचं काहीही दिसत नव्हतं.

नर्सिंग होम ची रिसेप्शनिस्ट सूझन आली आणि तिने दिवंगत झालेल्या व्यक्तींची नावे सांगितली. त्यात स्टीव्हचं नावही होतं. रोझाच्या डोळ्यांच्या पापण्या जशा काही उघड-झाक करायच्या विसरूनच गेल्या.  अनेक स्नेह्यांबरोबर तिचा खास मित्र  स्टीव्हही तिला सोडून गेला होता. ती दोघे नेहमी गप्पा मारत. दोघांनीही इथलं जीवन खुशीने स्वीकारलं होतं. आता कुणालाही आपला परिवार, मुलं-बाळं यांची प्रतीक्षा नव्हती. दोघेजण एकमेकांचे चांगले साथीदार झाले होते.

त्या मोठ्या खोलीत चार पलंग होते. एका बाजूने दुसर्‍या बाजूपर्यंत कापडाचा पडदा होता. ती त्यांच्या खोलीची सीमा होती. त्यांचं आपलं घर होतं. कोण कुणाच्या चार भिंतींच्या आत डोकावत नसे. बसून बसून, झोपून झोपून बोलायचे. मोठमोठ्याने हसायचे. लंच-डिनरच्या टेबलवर एकमेकांची सोबत करायचे आणि फिरायलाही बरोबर जायचे.

मूळ लेखिका – सुश्री हंसा दीप

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रूखी ☆ सौ. स्मिता माहुलीकर

☆ जीवनरंग ☆ रूखी ☆ सौ. स्मिता माहुलीकर ☆ 

लघुकथा : रूखी

मी लग्न होऊन सासरघरी जेव्हा आले त्या वेळेस ती मला पहिल्यांदा भेटली, सावळा वर्ण,रेखीव नाक-डोळे आणि चुणचुणीत अंगकाठी अशी ती, ” भाभी, मैं रूखी. ”
असे म्हणत माझ्या समोर येऊन छानस हसली. रूखी, आमच्याकडे घरकामाला असलेली साधारण वीस एक वर्षाची राजस्थानी तरुणी. ” रूखी.. असले कसले नाव आहे तुझे! रूखी म्हणजे तर ओलावा नसलेली असा अर्थ होतो.” मी तिला म्हणाले. ” नाही खर तर माझं नाव रूखमणी (रुक्मिणी) असे आहे, मला पण रूखी म्हटलेले नाही आवडत पण माझी सासू मला आवर्जून ह्याच नावाने हाक मारते कारण मला काही मूलबाळ नाही आहे न… .हो, पण कोणी काही पण म्हणू दे. माझा नवरा शंकर मात्र मला रूखमणीच म्हणतो.” असे म्हणतांना नवर्‍यावरचे तीचे प्रेम तिच्या डोळ्यात दिसत होते. समवयस्क असल्याने कदाचित ती माझ्याशी मनमोकळेपणाने बोलायची. शंकरचे म्हणजे तिच्या नवर्‍याचे पण तिच्यावर खूप प्रेम आहे असे तिच्या बोलण्यातून जाणवायचे.
अशीच एके दिवशी कामं करायला आली तेव्हा जरा वैतागलेलीच होती। विचारल्यावर म्हणाली ” मला न शंकरचा रागच आला आहे आज. ऐकायलाच तयार नाही आहे माझं काही॰ मी त्याला दुसरी बायको आण असे सांगते आहे. ”

“ अग..पण असे तू  असताना दुसरं लग्न कसे शक्य आहे?” मीम्हणते.

” आमच्यात पंचायत बसते तिकडे आधीच्या बायकोचा होकार असला तर दूसरे लग्न करता येते.” ती म्हणते. मी निरुत्तर होते. ती बोलतच राहिली. “माझी लांबची बहिण आहे. आई-बाप कोणीच नाहीत तिला. दिसायला सुंदर आहे कोणीही तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेईल म्हणून मी विचार केला की शंकर सारख्या चांगल्या माणसाशी तीचे लग्न झाले तर बरेच होईल आणि आम्हाला पण तिच्यापासुन मूलं होतील. मी कसेही करून शंकरची समजूत घालेनच. ”

पंधरा दिवसांनी ती गावावरून आली बरोबर एक धप्प गोरी, सुमार नाकनक्षा असलेल्या तरुणीला घेऊन.

” भाभी, ही रूपा.. शंकरने हिच्याशी लग्न केले ..तुम्हाला भेटवायलाच इथे घेऊन आले. दोन दिवसानंतर गावी परत पाठवून देऊ.’

‘तुझ्या मनासारखे झाले न.. तू  खुश आहेस न, झालं तर मग..” मी दोघींना चोळी बांगड्यांचे पैसे देत म्हणाले.

चार- पाच महिन्या नंतर रुक्मिणी खुशीतच रूपाला दिवस गेल्याचे मला सांगू लागली. ” येथेच तिचे बाळंतपण करणार आहे, तिला जूळे होणार आहे असे डॉक्टर म्हणाले आहेत, म्हणून आम्ही घरच्यांनी असे ठरवले आहे की पहिले जन्माला येईल ते मूल रूपाचे आणि दूसरे माझे… म्हणजे मी पण आई होणार आहे..”

मी तिला साखर खाऊ घातली. ठराविक वेळी रुपाला दवाखान्यात नेले, तेव्हा रुक्मिणी पण तिच्या बरोबर गेली होती, मी दोन दिवसानंतर कामाला येईन असं म्हणून गेली. ती आज पंधरा दिवस झाले तरी तिचा काही पत्ता नाही..मला काळजी वाटायला लागली तशी मी एक दिवशी जवळच असलेल्या वस्तीत तिचे घर होते तिथे गेले. दारातच तिची सासू बसलेली होती. रुक्मिणी..रूखी आहे का असे विचारले. ” ती आता ईथे नाही रहात ” असे म्हणताच मी रूपा बद्दल, तिच्या मुलांबदल विचारू लागले, तशी रूपा आतून रागातच म्हणाली ” ती अपशकुनी आहे.. माझं बाळ किती गोंडस आहे आणि तिचं असलेल मूलं मेलेलच जन्माला आलं.  मला तिची भितीच वाटते माझ्या मुलाला पण खाऊन टाकेल ती म्हणून हाकलून दिले तिला. ” तेवढ्यात शंकर तिथे आला. ” शंकर ! तुझी रूखमणी कुठे आहे..” असे विचारल्यावर तो म्हणाला ” काहे की रूखमणी..वो तो रूखी.. है रूखी..” मी जेमतेम माझे अश्रू थोपवून तिथून परतले.

© सौ. स्मिता माहुलीकर

अहमदाबाद

 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – धूर्त मंत्रिपुत्र ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – धूर्त मंत्रिपुत्र ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ४. धूर्त मंत्रिपुत्र

अयोध्या नगरीत एक राजा होता. त्याला फुलांचे भयंकर वेड होते. त्याने त्याला आवडणाऱ्या विविध प्रकारच्या फुलांचे एक ‘पुष्पउद्यान’ तयार करून घेतले होते. तो आपलं विश्रांतीचा काळ त्या पुष्पोद्यानातच घावलीत असे व भरपूर आनंद उपभोगीत असे.

राजाचा एक मंत्री होता. त्याचा एक पुत्र दररोज त्या उद्यानात जाऊन फुले चोरीत असे. त्यामुळे त्या उद्यानातील बरीचशी फुले नष्ट झाली होती. हे लक्षात येताच राजाने माळ्याला बोलावून “माझ्या उद्यानात उमललेली फुले कोणीतरी चोरून नेत आहे. तेव्हा तू पहारा ठेवून त्या चोराला पकडून आण” असा आदेश दिला. आदेशानुसार माळ्याने जागता पहारा ठेवला. तेव्हा मंत्रिपुत्र फुले तोडतोय हे पाहून त्याला तत्काळ फुलांसह पकडून पालखीत बसवून नगरीत नेले.

त्यावेळी तो मंत्री नगरद्वाराजवळच होता. त्याला पाहून माळी म्हणाला, “तुझा हा पुत्र पुष्पोद्द्यानात फुले चोरत होता. त्याला आम्ही राजाजवळ नेत आहोत. तेव्हा याला राजगृही जाऊन सोडविण्याचा प्रयत्न करू नकोस.” हे ऐकून मंत्री त्याच्याकडे बघून “जर जगायचं असेल तर तोंड आहे. तुम्ही जा” असे मोठ्याने बोलला.

मंत्र्याचे हे शब्द ऐकून व त्याचा अभिप्राय लक्षात घेऊन मंत्रिपुत्राने स्वतःजवळ असलेली सगळी फुले खाऊन टाकली. नंतर राजाजवळ गेल्यावर राजाने “तू फुले का तोडलीस?” असे विचारताच मंत्रिपुत्र म्हणाला, “महाराज, मी आपले उद्यान बघण्यासाठी गेलो होतो. तिथे फुले तोडण्यासाठी नाही. मला ह्या माळ्याने अन्यायाने व जबरदस्तीने पकडले आहे.”

मंत्रिपुत्राजवळ फुले मिळाली नाहीत. तेव्हा माळ्याने मंत्रिपुत्राला अन्यायाने व जबरदस्तीनेच पकडले आहे असे निश्चित ठरवून राजाने माळ्यालाच दंड केला व मंत्रिपुत्राला सोडून दिले.

तात्पर्य – बुद्धिमान लोक ओढवणाऱ्या संकटाचा विचारपूर्वक सामना करतात.

 

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-4 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-4 ☆ श्री आनंदहरी ☆

पावसाने मध्ये जरा ओढ दिली असली तरी पुन्हा पाऊस हवा तसा लागला होता. बारा आणे पीक तरी पदरात पडणार होते.. ती खुश होती.. गावंदरीचा भुईमूग काढायला आला होता. बिरोबाच्या शिवारातलं सोयाबीन काढायला आले होतं. सगळ्यांचीच सुगीची गडबड चाललेली त्यात कामाला माणूस तरी कुठून मिळणार. ती गावात फिरून आली.  दोन दिवसाने सोयाबीन काढायला यायला दोघीजणी तयार झाल्या.

घरी आल्यावर ते सारे नवऱ्याला सांगून म्हणाली,

“उद्या येरवाळचं जाऊन हुईल तेवडा भुईमूग उपटून टाकूया. उपटून हुतील ती समदं याल बांधून घरला घेऊन येऊ..”

“घरला ? ती कशापाय ?”

नवरा कावदरला… तरीही ती शांतपणे म्हणाली,

“अवो, द्वारकामावशी हाय , ती बसल शेंगा तोडत काय हुतील त्येवड्या.. तिला रानात जायाचं हुत न्हाय पर हितं ईल..”

तो काहीच बोलला नाही. ती पुढं म्हणाली,

“आन सोयाबीन काढायचं काम करून आल्याव मी बी तोडीन की पारभर.. अवो, सुगीच्या दिसात हुईल त्येवडं वडाय लागतंयच की काम.  ”

येरवाळी जाऊन दिवसभरात होईल तेवढा भुईमूग उपटला.., ,दोघांनी वेलांचं एकेक वजं सोप्यात आणून टाकलं..

जेवणं झाली.. थोडावेळ शेंगा तोडून ती आडवी झाली.. लगेच डोळा लागला.. तिला कसल्याशा आवाजाने जाग आली. उठून पाहतेय तर रप रप पाऊस सुरू झालेला..  तिने दार उघडून पाहिलं…सगळ्या पावसाळ्यात झाला नव्हता असला पाऊस पडत होता. तिचा जीव खालवर होऊ लागला.  तिने नवऱ्याला हाक मारली. आणि म्हणाली ,

“अवो, कसला पाऊस पडाय लागलाय बगा की वाईच.. भुईमूग उपटून टाकलाय त्येवडा तरी आणूया..”

नवरा या कुशीवरून त्या कुशीवर वळत म्हणाला,

“काय न्हाय हुइत त्येला.. बघू सकाळच्या पारी.. झोप आता..”

तो लगेच झोपुनही गेला पण तिला काही झोप लागली नाही.

पाऊस कोसळतच होता.झुंजूमंजू झाल्यावर  तसल्या पावसात ती भुईमुगाच्या वावराकडे निघाली,.. साऱ्या शिवारात गुडघाभर पाणी झाले होते सगळा भुईमूग पाण्याखाली गेला होता ..उपटून ढीग लावलेले भुमुगाचे वेल ..एखाद- दुसरा वेल पाण्यावर तरंगताना दिसत होता तेवढा सोडला तर बाकी सारे वाहून गेले होते.. मनात उदासीनतेचा, निराशेचा पाऊस सुरू झाला होता.. तिच्या मनात आले.. हितं पाऊस कोसळतोय तेवढा बिरोबाच्या शिवारात नसेल कदाचित.. मनातल्या विचारासारशी ती तडक बिरोबाच्या शिवाराकडे गेली.. पाऊस तिथेही कोसळत होताच.. वावराला घातलेल्या हातभर तालीवरून पाणी वाहत होतं. सारे रान भरून वाहणाऱ्या शेततळ्यासारखं दिसत होते.. जणू पावसाने सोयाबीन पिऊन टाकला होतं..

ती भान विसरून पावसात चिंब भिजत सोयाबीनच्या रानाकडे एकटक पहात होती.. निर्मितीचा नाश होत असल्याची वेदना तिच्या गालावरून आसवं होऊन ओघळत होती..  साऱ्या आसमंतात तिच्या त्या आसवांचाच पाऊस कोसळत राहिला.

◆◆◆

(समाप्त)

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-3 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-3 ☆ श्री आनंदहरी ☆

बिरोबाच्या शिवाराची वाट चालता चालताच तिला सासूची आठवण झाली तसे तिला सारे आठवले.. तिच्या डोळ्यांत पाणी दाटलं.. तिने डोळ्यांना पदर लावून डोळ्यातलं पाणी टिपलं. विचारांच्या नादात ती बिरोबाच्या देवळाजवळ येऊन पोहोचली होती. देवळाजवळ येताच ती विचारातून भानावर आली. तिने क्षणभर थांबून देवासन्मुख होऊन मनोभावे देवाला हात जोडले आणि आपल्या वावराकडं गेली. पेरा चांगलाच उगवून आला होता..  पण रानात तण पण बऱ्यापैकी होतं .. तिची आई म्हणायची, ‘ ईचारा बिगार मन आन तणाबिगर रान असतंय वी कवा ? ‘  आईची आलेली आठवण तिने मनाच्या आतल्या कप्प्यात सरकवली आणि  खुरपं घेऊन भांगलायला सुरवात केली. सगळ्यांचाच भांगलणीचा घायटा असायचा. गावंदरीच्या रानात भांगलायला कुणीतरी यायचं किंवा भांगलणीचा पैरा करायला तयार असायचं पण एवढ्या लांब बिरोबाच्या शिवारात कुणी भांगलायला यायलाही तयार नसायचं. सासू होती तेंव्हा दोघीच सगळे रान भांगलून काढत असत.

तिने भांगलायला सुरवात केली. तिच्या सासूचा कामाचा झपाटा दांडगाच होता.. भांगलताना इतर बायकांची एक पात भांगलून व्हायच्या आधीच सासूची दुसरी पात निम्म्यापेक्षा जास्त भांगलून झालेली असायची.. पण तिचे कामही सासूच्या तालमीत तयार झाल्यासारखंच, सासूच्या पावलावर पाऊल ठेवल्यासारखंच होतं. दिवस मावळतीला येस्तोवर ती एकटीच भांगलत राहिली आणि मग घरी परतली होती.

दारात आली तेंव्हा सोयाबीनचा पेरा चांगलाच उगवून आल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावरुन पावसाच्या थेंबासारखं निथळत होतं. तिने दारातल्या बॅरलमधलं पाणी घेऊन हात-पाय धुतलं. तोंडावर पाणी मारून पदराने पुसलं. खाली ठेवलेल्या पाटीतील खुरपं घेतलं आणि ती गोठ्याकडे गेली. हातातलं खुरपं तिनं गोठ्यात असणाऱ्या आडमेढीच्यावर गवतात खुपसून ठेवलं. म्हशीसमोर वैरणीची  पेंडी सोडून टाकली आणि ती पाटी घेऊन सोप्यातनं मदघरात आली..हातातली पाटी भीतीकडंला असलेल्या कणगीवर ठेवली आणि सैपाकघरात जाऊन ती चुलीम्होरं बसली. चूल पेटवून त्यावर चहाचं भुगूनं ठेवलं. गुळाचा गुळमाट चहा प्याल्यावर तिला आणखीनच बरं वाटलं. चहाचे भुगूनं वैलावर सरकवून तिने चुलीवर कालवणाची डीचकी चढवली..

ती खुशीत होती पण दिवस जसजसे पुढं सरकू लागले तसतसे तिच्या मनातली खुशी फुलासारखी सुकू लागली. मनातली चिंता वाढू लागली.. उगवण चांगली झाली होती पण पावसाचा मागमूस नव्हता.. रानात चांगलं हिरवंगार दिसणारं सोयाबीन दिवसेंदिवस तिच्या मनातल्या स्वप्नांना सोबत घेऊन सुकत चालले होते. फुलोऱ्यात यायच्या आधीच पावसाच्या मायेविना उन्हानं सुकून,करपून जाणार असे वाटायला लागलं होतं. रानातल्या सोयाबीनकडे पाहिलं की तिच्या डोळ्यांत पाणी दाटून येत होतं.     ‘ उगा रानात जायाचं तरी कशापायी ?’ असे मनात येत होतं पण त्याच मनाला राहवतही नव्हते.. वारकऱ्यांच्या पावलांनी आपसूक पंढरीची वाट चालावी, तशी तिची पावलं रानची वाट चालत होती पण मनात वारकऱ्यांची ओढ, असोशी, आनंद नव्हता.

जीव जाईल आता असे वाटत असतानाच अचानक जीवाने उभारी धरावी तसे झाले. सोयाबीन पार वाळून जाईल असे वाटत असतानाच अचानक पावसाची रिमझिम आली आणि तिच्या करपलेल्या मनाने आणि रानात करपू लागलेल्या सोयाबीनने पुन्हा उभारी घेतली. पाऊस आला. अधून मधून येत राहिला. पुन्हा साऱ्या शिवरानं आणि तिच्या मनाने हिरवाई ल्याली  होती.

क्रमशः ——–  भाग 4

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-2 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-2 ☆ श्री आनंदहरी ☆

तिने चुलीवर चहाचं आदण ठेवलं होतं. सासू आल्यावर संगं संगं चहा घ्यायचा आणि स्वैपाकाच्या तयारीला लागायचं असा विचार तिने केला होता.. पण तिच्या आदमासापेक्षा सासूला यायला जास्तच उशीर झाला तशी मनात दाटू लागलेली काळजी.. ‘भेटलं असेल कुणीतरी..बसल्या असतील पारभर..’ असा विचार करत तिने चुलीतील राख बाजूला सारावी तशी बाजूला सारत चहाचे भुगुनं चुलीवरून उचलून वैलावर ठेवलं आणि चुलीवर तवा ठेवत, बसल्या जागेवरूनच फडताळाजवळचा भाकरीच्या पिठाचा डबा आणि परात जवळ ओढली..परातीत पीठ घेऊन तवलीतले पाणी घेऊन पीठ मळायला सुरवात केली.. चुलीतील जाळ कमी झालेला पाहताच फुंकणीने जाळ केला आणि भाकरी थापायला घेतली..

पहिली भाकरी तव्यात टाकून दुसरी मळायला घेतली. तेवढ्यात बाहेर कसलातरी गलका ऐकू आला.. कसला गलका झाला ते  सुरू असलेल्या पावसामुळे नीट ऐकू येईना.. नकळत तिचं काळीज हरणीवानी झाले तशी परात बाजूला सारून ती उठली.  सोप्यावर आली.. पण नेमका कशाचाच अंदाज येईना. उगा काळजी मनाला पोखरू लागली. जीव काही राहिना.. ती मागे परतली तोवर तव्यातली भाकरी करपली होती.. तिने तवा खाली उतरून ठेवला..चुलीतील लाकडं इस्तू झाडून बाजूला सारली आणि कसेबसे दार लोटून घेत पळतच गलक्याच्या दिशेने धावतच सुटली.  मारुतीच्या देवळाकडनं गलका ऐकू येत होता. तिचं घर गावाच्या एका टोकाला तर मारुतीचे देऊळ दुसऱ्या टोकाला होतं. ती जसजशी देवळाजवळ जात होती तसे गलका जास्तच ऐकू येऊ लागला होता पण पावसानं नीटसं ऐकू येत नव्हतं. पळता पळता मध्येच कुठून तरी  ‘ पान लागलं..’ असे शब्द तिच्या कानावर आले.. तिचं काळीज लख् कन हाललं… गावंदरीच्या रानात नाग-सापाचा वावर होता हे तिला ठाऊक होतं.. मनातल्या शंका-कुशंकांनी तिच्या पायातले त्राणच गेले होते… पण तरीही ती जिवाच्या करारावर पळत राहिली होती.

मारुतीच्या देवळाजवळ सारा गाव गोळा झाल्यागत दिसत होता. ती पावसात चिंब निथळतच देवळाजवळ आली.. तिला पाहताच दोघी तिघी बायका तिच्या जवळ आल्या तिला थोपवलं. तिला जवळ धरतच हळूहळू देवळाच्या मंडपाकडे सरकू लागल्या.. तिला नेमकं काय होतंय तेच समजेना.. तेवढयात एकीने विचारलं..

“रामा कुनीकडे गेलाय ?”

ही बाई नवऱ्याची चौकशी का करतेय ? आपल्या हातांना असे का धरलंय ? तिला काहीच समजत नव्हतं.. पण त्यामुळे तिच्या मनाला पुन्हा आशंकांनी घेरलं. तिला पुढं जायचे होते..पण तिला थांबवत एक म्हातारी  पाणावल्या डोळ्यानं म्हणाली,

“आगं, रखमीला पान लागलं..”

आपल्या सासूला पान लागलंय हे ऐकून तिच्या पायातील त्राणच गेले. ती मटकन तिथंच खाली बसली.

तोवर मंडपाच्या दाराशी असणारी गर्दी हटवण्यासाठी पाटील ओरडले,

“ये चला रं, सरका बाजूला.. आन कुणीतरी रामा कुठाय ती बघून त्येला म्होरं घालून तेच्या घरला घेऊन या जावा..”

गर्दी मागं सरली.. रखमा गेली ते जाणत्या बाया माणसांनी ओळखले होते. त्यातली एक तिच्या भोवतीच्या बायकांना म्हणाली,

“हिला घरला जावा घिऊन..”

बायका तिला घरी घेऊन निघाल्या..पण एवढ्या सगळ्या बायकांत तिला तिची सासू दिसली नव्हती.. तिला रडावं, ओरडावं, आक्रोश करावा असे वाटत होतं पण ती स्तब्ध होती.. दगडाच्या मूर्ती सारखी, भान हरपल्यासारखी.. बायका तिला घेऊन घराकडे निघाल्या होत्या.  त्यांच्या डोळ्यात पाणी होतं… पण तिचे डोळे ठक्क कोरडे होते. नाही म्हणायला पावसाचा जोर वाढला होता. पावसाचे थेंब तिच्या चेहयावरून ओघळत होते…कुणीतरी छत्री धरली होती तरीही..

तिची सासू, रखमा पान लागून गेली होती तेंव्हापासून रात्रभर पाऊस नुसता कोसळत होता.

क्रमशः ——–  भाग 3

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कथा – पाऊस-1 ☆ श्री आनंदहरी

☆ जीवनरंग ☆ कथा – पाऊस-1 ☆ श्री आनंदहरी ☆ 

गावाच्या खालतीकडे बिरोबाचे माळ.. बिरोबाच्या देवळाभोवतीचे शिवार त्याच्याच नावाने ओळखले जायचं.. माळ म्हणजे तसे माळरान नव्हतं.. बऱ्यापैकी सुपीक जमीन होती पण गाव लवणात वसलेलं होते. गावालगतच्या जमिनी काळ्याभोर , जास्तच सुपीक त्यामानाने बिरोबाच्या शिवाराची सुपीकता कमी इतकंच. ज्याला गावाजवळ जास्त जमीन होती तो गावापासून लांब असणारं बिरोबाच्या देवळाजवळचे रान कसायचाच नाही. त्यामुळे बिरोबाच्या शिवारात असे पडीक रान जास्त होतं म्हणून त्याला माळ म्हणायची सवय गावाला लागली होती. बिरोबाजवळचे तिचं रानही आधी पडीकच होतं म्हणे.. पण ती लग्न होऊन यायच्या आधीच तिच्या सासऱ्याने, घरात त्यांच्या भावाभावात वाटण्या झाल्यावर गावंदरीच्या रानात भागायचं नाही म्हणून बिरोबाच्या माळाचा आपल्या वाटणीचा एकराचा डाग कसायला सुरवात केली होती . आपला एकुलता एक पोरगा चांगला पैलवान व्हावा ही सासऱ्याची इच्छा होती पण सासऱ्यांच्या अचानक जाण्याने पोराची तालीम सुटली, आणि घराची , रानाची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती..सासरे गेल्यानंतर तीन वर्षांनी ती लग्न होऊन घरात आली होती.

तिला सासू तशी मायाळूच भेटली होती. कधी कधी रानात भांगलायला सोबत जाताना , कधी असेच दुपारच्या वेळी सोप्यात काहीतरी काम करत असताना सासू काही बाही जुनं सांगत राहायची.. जुन्या आठवणी काढत राहायची.त्यामुळे तिला तिच्या आज्जेसासुपासूनच्या अनेक गोष्टी माहीत झाल्या होत्या. तिची सासु जितकी बोलकी तितकाच तिचा नवरा अबोल होता.. पण सासुमुळे तिला नवऱ्याचं अबोलपण फारसं डाचत नव्हतं. तरीही एकदा तिने सासुजवळ नवऱ्याच्या अबोलपणाचा विषय काढला तेंव्हा सासू हसली होती . सासू का हसली ? यात हसण्यासारखं काय होतं हे काही तिला कळले नव्हते.. ती त्यामुळे खट्टू झाली होती..  तिचे खट्टू होणे तिच्या चेहऱ्यावरून पावसाच्या थेंबांसारखं निथळत होते.. सासूला ते जाणवलं तसे सासूने तिला लेकीसारखं जवळ घेतलं आणि म्हणाली,

“आगं, तुझ्यासंगं आत्तापातूर त्यो बोलला आसल त्येवडं त्येचा बा समद्या आयुष्यात माझ्यासंगं बोललेला न्हाय.. त्ये बी जाऊंदेल .. आगं, मी  माज्या मामांजीस्नी माझ्या सासूसंगं बोलताना येक डाव बी बघितलं न्हवतं.. मी नवरी हून आले तवा मला वाटायचं ह्येचं कायतरी बिनासल्यालं दिसतंय.. एकडाव मी सासूला ईचारल तर ती म्हणाली, ‘ ही ब्येनंच तसलं हाय.. कुनीबी बायकांसंगती बोलत न्हाय… ती घरात असली की निसतं मळभ दाटल्यावानी वाटतं बग ..”

सासूच्या शेवटच्या वाक्याने तिलाही हसू आले होते.

बिरोबाच्या शिवाराकडे जाता जाता तिला हे आठवले तसे तिच्याही चेहऱ्यावर क्षणभर हसू फुललं होतं.. पुढच्याच क्षणी सासूची आठवण झाली आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळलं..दोन वर्षांपूर्वी गावंदरीच्या रानातनं भांगलून माघारी येताना.. सासूनं तिला गवताचे वजं उचलून दिलं अन् म्हणाली,

“तू हो म्होरं . मी येती द्वारकामावशी संगं.. वाईच दमा दमानं .. ”

शेजारची द्वारकामावशी  आधीच म्हातारी  त्यात तिचे गुडघे दुखत होते.. तरी ती भांगलायला येत होती.. सासू जाता येता तिच्या गतीने तिला संगती घेऊनच जात येत असे. भांगलताना ही द्वारकामावशीला सांभाळून घेत होती. मावशीची मागं पडलेली पात पुढनं भांगलत येऊन पूरी करत होती..  तिला हे नित्याचच होतं. ती गवताचं वजं घेऊन वळत असतानाच द्वारकामावशींनी मिश्रीची डबी काढली तसे तिच्या मनात आलं , ‘ आता काय दोघीबी लवकर याच्या न्हाईत घरला.. मिश्री लावून झाल्याबिगर उठायच्याच न्हायती..,’  काहीसे स्वतःशीच हसून ती झपाझप घराकडे निघाली. ती निम्म्या वाटेत असतानाच पावसाला सुरवात झाली.. पण निवाऱ्याला कुठेही न  थांबता ती तशीच पावसात भिजत घरी आली होती….

पावसाची चळक थांबूनसुद्धा बराच वेळ झाला होता पण सासू घरी आली नाही.. तसे तिला काळजी वाटू लागली होती.. वेळ जात होता तशी तिच्या मनातली सासूची काळजी वाढतच चालली होती .

क्रमशः

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

श्री मंजुषा सुनीत मुळे

☆ जीवनरंग ☆ एक्सचेंज ऑफर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मॉर्निंग वॉकहून परततांना, वाटेवरच्या एका हॉलकडे आपोआपच लक्ष जात असे. वेगवेगळ्या प्रदर्शनांसाठी आणि सेल्ससाठीच तो हॉल बांधलायया विचाराने रोजच हसू यायचं. आज तो हॉल आठ वाजताच उघडलेला होता, आणि तिथे माणसांची रांग लागलेली होती. उत्सुकतेपोटी तिथे जरा रेंगाळले. दारावर एक पाटी टांगलेली दिसली ….” फ्री एक्सचेंज ऑफर “…. कुणातर्फे  ते काही लिहिलेलं नव्हतं. रविवार असल्याने तिथे थोडा वेळ घालवायला हरकत नव्हती. म्हणून जाऊन त्या रांगेत उभी राहिले. सगळ्यांच्याच हातात काही जुनाट वस्तू होत्या. चेहेऱ्यावर उत्सुकता ओसंडून वाहत होती. हॉलच्या दारात एक दणकट माणूस उभा होता. संयोजक असावा. थोड्याच वेळात त्याने पहिल्या २५-३० माणसांना आत बोलावलं. त्यात शेवटचा नंबर माझा होता.

” हातातलं सामान त्या शेल्फात ठेवा, आणि तिथे मध्यभागी ठेवलेल्या मोठ्या टेबलभोवती उभे रहा “…. त्याने जणू हुकूमच सोडला. हॉलमध्ये इतर एकही वस्तू नसल्याने आधीच्या उत्सुकतेच्या जागी फसवल्याचा संशय दिसायलालागला होता…. दार बंद करून संयोजक तिथे आला. त्याने प्रत्येकाला एकेक थाळी दिली. डोळे बंद करायला सांगितले. मग जादूची छडी फिरवावी तशी हातातली काठी सगळ्यां-भोवती फिरवली. त्याचा डोळा चुकवून मी हातातली थाळी टेबलखाली सरकवली, आणि गुपचुप त्याच्याचमागे  लपले.

…..” आता प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात अजिबात नकोशी आणि असह्य वाटणारी फक्त एक गोष्ट डोळ्यासमोर आणा आणि थाळीत हात ठेवा. आणि आता थाळी टेबलवर ठेवा..हां, आता ऐका. तुम्ही स्वतःची थाळी सोडून बाकीच्या पैकी तुम्हाला जी थाळी आवडेल ती एक थाळी उचलायची आहे. आणि कोणालाही रिकाम्या हाताने परत जाता येणार नाही. वेळ मर्यादित आहे. कळलय? आता उघडा डोळे “… आता प्रत्येकाच्या थाळीत काही ना काही दिसायला लागलं ….. प्रचंड गोंधळून सगळे नुसतेच टेबलभोवती फिरायला लागले… दचकत होते …. माना नकारार्थी हलत होत्या. मी नीट निरखून त्या टेबलकडे पाहिलं, आणि प्रचंड दचकले…..बाप रे …..नकोशा गोष्टी? त्रास, चिंता आणि दुःख यांची केवढी व्हरायटी होती त्यावर …. विद्ध झालेली मने…. पोखरलेले मेंदू…. मनावरचे खोलवर घाव आणि मनाच्या भळाभळा वहात असणाऱ्या जखमा, काळवंडलेल्या विझलेल्या असहाय्य नजरा…असाध्य रोगांच्या वेदनांनी तडफडणारे अवयव …. कुठे घरावरचे छप्पर टिकवतान्ना त्राण संपलेले हात पाय….. भुकेने तडफडणारे पोटाचे हताश खड्डे आणि त्यांना धरून लोंबकळणाऱ्या काही आशाळभूत नजरा…. तर कुठे स्वतःची संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून तगमगणारी अधाशी मने…. बाप रे बाप…. ते सगळं बघतांना असह्यतेखेरीज कुठली भावना जाणवतच नव्हती. डोळे विस्फारून सगळे नुसतेच टेबल भोवती फिरत होते. तिथून निसटण्याची संधी शोधत होते. … तेवढ्यात संयोजक हातातली काठी उगारत ओरडला…..”चला घ्या पटापट कुणाला काय चालणार आहे ते. बाहेर रांग वाढते आहे.”

सगळेच एव्हाना रडकुंडीला आले होते. तो आणखी मोठ्याने ओरडला.. “आवरा …. आणखी पाच मिनिटं देतो. उचला पटकन हवी ती थाळी. एवढी चांगली एक्सचेंज ऑफर पुन्हा कधीही मिळणार नाही तुम्हाला. ” आता सगळ्यांचा नाईलाज झाला. त्याची पाठ वळताच प्रत्येकजणच घाई -घाईने टेबलजवळ गेला, आणि गुपचुप स्वतःचीच थाळी शोधून उचलून निघू लागला. सगळ्यांची ती धावपळ तिरक्या नजरेने पहात, खट्याळपणे गालातल्या गालात हसत असलेला तो, त्याच्यामागेच लपलेल्या मला स्पष्ट दिसत होता. टेबलवरच्या सगळ्या वस्तू संपल्या, तशी खालच्या रिकाम्या थाळी कडे तीक्ष्ण नजर टाकत त्याने गर्रकन वळून माझ्याकडे पाहिलं. भीतीने मी थरथरायला लागले, तसा गडगडाटी हसत तो म्हणाला, ” लबाडी केलीस नामाझ्याशी? पण चल, माफ करतो तुला. कारण या सगळ्यांमध्ये तू एकटीच विवेकी आणि विचारी दिसतेआहेस…” आणि कौतुकाने त्याने माझ्या पाठीत धपाटा घातला …….

……….. आणि मी दचकून खाडदिशी जागी झाले. बाप रे ….. म्हणजे हे सगळं स्वप्न होतंतर. पण मग प्रकर्षाने जाणवलं की, त्या स्वप्नाइतकं विदारक वास्तव दुसरं कुठलंच नसावं.

‘परदुःख शीतल’ असं मला तरी यापुढे कधीच वाटू शकणार नाही हे मात्र नक्की. कारण मनापासून पटले होते की……. दगड मातीचे असोत, की दुःख वेदनांचे असोत, डोंगर दुरूनच साजरे असतात.

© सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले

☆ जीवनरंग ☆ ओळख ☆ सौ अंजली गोखले  ☆

बघता बघता लिली दिड वर्षाची झाली. ती सहा महिन्यांची झाली आणि आईचे ऑफिस सुरु झाले. त्यामुळे लिलीचा ताबा आजी कडेच. आताही आजीनं तिला छानसा फ्रॉक घातला, पावडर तीट लावली आणि दोघी देवा समोर आल्या. “हं’ म्हण, देवा, मला चांगली बुद्धी दे. “लिलीन आपले इवलेसे हात जोडले आणि म्हणाली, “देवा, आजीला च्यांग्ली बुदी दे.” आजीला हसू आवरल नाही. “सोनुली ग माझी म्हणत आजीनं तिच्या गालावरून हात फिरवला. हा रोजचाच कार्यक्रम झाला होता .

आज आजीनी एका ताटलीत पंधरा पणत्या लावल्या. लिलीला तो चमचमता प्रकाश दाखवत म्हणाल्या, “लिली, ही बघ गंमत ” लुटूलुटू चालत लिली आली. ताटलीतले ते दिवे बघून डोळे मोठ्ठाले करून पहायला लागली. आपले इटुकले हात गालावर धरून आजीकडे आणि त्या पणत्यांकडे पहायला लागली.

भिंतीवरील आजोबांच्या हार घातलेल्या फोटोकडे पहात आज देवाकडे बुद्धी मागायची विसरून गेल्या. त्या ज्योतींच्या प्रकाशात त्यांना आजोबां बरोबरच्या सहवासाच्या आठवणी आठवायला लागल्या . आजचा हा दिवस खास त्या आठवणींसाठीच होता. लिलीला मांडीवर घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवीत त्या तिथेच बसल्या. आजोबांना छकुल्या नातीची ओळख करून दिली. आजोबा फोटोमधून समाधानानं हसले.

 

©️ सौ अंजली गोखले 

मो ८४८२९३९०११

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडि

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी

☆ जीवनरंग ☆ बोध कथा – कृतघ्न वाघ ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆ 

||कथासरिता||

(मूळ –‘कथाशतकम्’  संस्कृत कथासंग्रह)

? बोध कथा?

कथा ३. कृतघ्न वाघ

एका अरण्यात एक वाघ रहात होता. अरण्यातील प्राण्यांना मारून तो आपली उपजीविका करीत असे. एकदा त्याने रानातील रेड्याला मारून त्याचे भक्षण केले. तेव्हा रेड्याचे एक हाड वाघाच्या दातात अडकले व चिकटून बसले. त्याने ते काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण व्यर्थ! ते हाड काही केल्या निघेना. दातातून पू व रक्त वाहू लागले. तो वेदनेने तळमळू लागला.शेवटी तो वाघ झाडाच्या बुंध्यापाशी जबडा पसरून बसला. हे हाड कसे निघेल? मी जिवंत राहीन की नाही? काय करावे? या विचारांनी वाघ चिंताग्रस्त झाला.

अचानक त्याचे लक्ष झाडावर बसलेल्या कावळ्याकडे गेले. अंधःकारात जणू दीपदर्शनच!  त्याने कावळ्याला आपली व्यथा कथन केली. पुढे तो कावळ्याला म्हणाला, “जर तू माझ्या मुखातून हाड काढून मला जीवदान दिलेस, तर मी तुला दररोज मी शिकार केलेल्या प्राण्याचे मांस तुझ्या अपेक्षेप्रमाणे देईन. माझ्यावर एवढे उपकार कर.” वाघाने वारंवार प्रार्थना केल्याने व त्या पशुश्रेष्ठाचे दुःख पाहून कावळ्याला दया आली. वाघाच्या मुखात प्रवेश करून त्याने ते हाड काढले, व वाघाला वेदनामुक्त केले.

नंतर वचन दिल्याप्रमाणे, ”आता तू मला मांस दे” अशी कावळ्याने वाघाला विनंती केली. तेव्हा, “माझ्या मुखात प्रवेश करून तू मला त्रास दिलास, त्यामुळे मी असंतुष्ट आहे. तू वर माझ्याकडे मांस मागतोस? तू क्षणभरही इथे थांबू नकोस. दूर जा!” असे वाघाने कावळ्याला सुनावले.

तात्पर्य – संकटकाळात ज्याने मदत केली आहे अशा व्यक्तीचे लोकांना सुखकारक काळात विस्मरण होते.

अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी

कथासरिता उपक्रम साहित्य कट्टा,संयोजन- डॉ. नयना कासखेडीकर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares
image_print