मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.

अश्या सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात, परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अश्या सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्या नंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.

इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या, जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या.. 

त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. 

जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे. तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याचप्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसलेला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे, पण तो अल्पायु आहे हे समजते. 

परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे. 

नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, तेव्हा ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत :  एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). 

ती पहिल्या वरदानात सासऱ्याच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या  वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. 

ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्याक्षणी सुद्धा जागा असतो. 

सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.

आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्याच्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्रीकडे पाहू शकतो. 

राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्याच्या सारखा आहे. 

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे. 

जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे, आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्या साठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.

ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला, असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.  

यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत.

लेखक : श्री सुजीत भोगले.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – ऋभु (देव / देवांची देवता)

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील विसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ऋभु या देव / देवांच्या देवतेला  आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋभुसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद

अ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या । अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥

जननाच्या क्लेशापासुनिया ज्या देवा ना मुक्ती

त्यांच्यासाठी अपुल्या कंठे पंडित स्तोत्रे गाती

या स्तवनांनी प्रसन्न होउनी आशिष देती देव

त्यांच्या योगे ऋत्विजांना प्राप्त होई वैभव ||१||

य इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ । शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥

या देवांनी इंद्रासाठी केली अश्व निर्मिती

आज्ञा करिता सेवेसाठी स्वतःहुनी येती

अद्भुत कर्मांनी आपुल्या सन्माना पात्र

आवाहन हे सार्थ करावे हे अमुचे होत्र ||२|| 

तक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ । तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥

यांनी निर्मिला अश्वीदेवांसाठी दिव्य शकट

अतिसुखदायी सहजी करतो संचार सर्वत्र

साकारली अश्वीदेवांस्तव धेनू बहूगुणी

क्षुधा नि तृष्णा निवारीतसे क्षीर मधुर देऊनी ||३||

युवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ । ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥

निर्व्याज अश्या वृत्तीची कीर्ति ऋभू देवाची

मातपित्यासी अर्पियली दक्षीणा तारुण्याची 

अपुल्या भक्तांच्यासाठी ते कनवाळू असती

प्रार्थनेसिया प्रसन्न होऊनी दान फलाचे करिती ||४||

सं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता । आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥

वैभवमंडित आदित्यासह देवराज इंद्र

मरुद्गणासह सिद्ध जाहले रथीं होऊनी स्वार

त्यांच्या संगे सहभागाचा मूर्तिमंत आनंद 

सत्वर येउनी आम्हा देती ऋभू किती आमोद ||५||

उ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् । अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥

त्वष्टादेवाने निर्मिले दिव्य सोमपात्र 

तयात सारे साठविती ठेवूनी सोमरस

ऋभूदेवाने तया पासूनी केले चार चमस

अशी अलौकिक कर्मे त्यांची असती ज्ञात आम्हास ||६||

ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते । एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥

वर्णन करण्या तुमचे शौर्य आम्ही वाचाहीन

तुम्ही इतुके चंडप्रतापी तुमच्या पायी लीन

एकवीस भक्तां प्रत्येकी एक रत्न हो द्यावे 

उत्तम तुमचे आशीर्वच देवा आम्हाला द्यावे ||७|| 

अधा॑रयन्त॒ वह्न॒योऽ॑भजन्त सुकृ॒त्यया॑ । भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥

अपुल्या श्रेष्ठत्वाने यांसी प्राप्त थोर मान 

समस्त देवांसम यांनाही यज्ञी मिळतो मान

अर्पण केला आम्ही त्यांना हविर्भाग त्यांचा

स्वीकारुनिया त्यासी त्यांनी मान राखिला अमुचा ||८||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे… 

https://youtu.be/QyH4F4zpSNI )

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वीर मारुती… – श्री मंदार लवाटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ वीर मारुती… – श्री मंदार लवाटे ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

‘बुद्धिमताम् वरिष्ठम्’ अशा देवता म्हणविल्या जाणाऱ्या शनिवार पेठेतल्या वीर मारुतीचा गेली दोनशे वर्षे अखंड उत्सव सुरू आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मूर्तीचे शेंदूराचे कवच निसटले आणि मारुतीरायाची विलोभनीय मूर्ती समोर आली. विशेष म्हणजे, चैत्र पौर्णिमा म्हणजेच, हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा इथे चालणारा उत्सव पानिपतच्या युद्धात बळी पडलेल्या वीरांच्या स्मृतिनिमित्त होतो, याची आजही अनेकांना कल्पना नाही. 

अशी होती परंपरा…

परंपरेनुसार, जी घराणी पानिपतच्या युद्धात लढली त्या घराण्यातला ज्येष्ठ पुत्र वीराची वेशभूषा करून मारुतीरायाच्या भेटीला येतो. ही भेट होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच, धूलिवंदनाला होते. देवाला भेटण्यासाठीची जय्यत तयारी करून पूजेचे तबक हाती घेऊन तो मारुतीच्या भेटीला येतो. इथे येऊन देवाला मिठी मारली, की त्या घराण्यातला वीर देवापर्यंत पोहोचतो, अशी त्यामागची श्रद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी बारा गाडे असत आणि ते गाडे ओढण्याचा मानही वीराला मिळत असे. ही परंपरा होती तेव्हा जोरदार यात्राही व्हायची. काळानुरूप यातल्या अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत. ‘हे स्थान पुरातन असल्याचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये आढळतो. या ठिकाणी युद्धापूर्वी नवस बोलला जायचा. युद्धातून माणूस परतल्यास त्याला तुझ्या दर्शनाला आणू. जो युद्धावरून येतो तो वीर. दास, प्रताप आणि वीर अशी मारुती दैवताची तीन रूपे आहेत. धूलिवंदनाला अजूनही अनेक घराण्यांतले लोक इथे येतात. मारुतीरायाच्या भेटीला येताना घरातले टाक घेऊन येण्याची परंपरा आहे. काहीजण शस्त्रही आणतात. जुना मारुती आहे, एवढाच उल्लेख आढळतो. त्यामुळे पुण्यातल्या जुन्या देवस्थानांपैकी तो एक आहे. हा मारुती पिंपळाच्या वृक्षाखाली आहे.’

पूर्वी गांगल कुटुंबीय अनेक वर्षे उत्सव पाहायचे. आता त्या घराण्यातले कुणी नसल्याने उत्सवाची परंपरा पुढे राम दहाड, सचिन दाते, महेश पानसे, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी ही कार्यकर्ते मंडळी चालवत आहेत. ही परंपरा अखंड सुरू ठेवण्याची परंपरा कार्यकर्ते सांभाळत असून, लोकवर्गणीतूनच हा उत्सव चालतो. आपापल्या इच्छेनुसार त्यासाठी मंडळी योगदान देतात.

वीर मारुतीच्या भेटीसाठी वाजतगाजत येण्याची परंपरा आजही सुरू आहे. त्या निमित्ताने वीरांचे हार घालून; तसेच प्रसाद देऊन स्वागत केले जाते. वर्षानुवर्षे हनुमान जयंती ते अक्षयतृतीया असा १८ दिवसांचा कीर्तन महोत्सव इथे होतो. अनेक कीर्तनकार आपली सेवा रुजू करतात. 

वीर मारुतीबाबत पेशवे दफ्तरात अनेक कागदपत्रे धुंडाळली; मात्र मारुतीची स्थापना कशी आणि केव्हा झाली, याचा उल्लेख मिळत नाही. मारुतीरायाच्या या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिशा आहेत. आवेशपूर्ण अशी ही मूर्ती वीर मारुती या प्रकारातली आहे.

लेखक : श्री मंदार लवाटे

इतिहास संशोधक

संग्राहिका : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-4 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

श्वानांच्या  गुणांच्या बाबतीत महाभारतातली एक गोष्ट सांगितली जाते. पांडव स्वर्गात जाताना ,’ सरमा ‘ ही कुत्री त्यांच्याबरोबर होती. जो खोटे बोलला नाही ,खोटे वागला नाही, निस्वार्थ सेवा, आज्ञाधारकता, आणि  निष्ठावंत सेवक असा राहिला, त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार होता .या अटींमध्ये  ‘सरमा ‘ पास झाली . तिच्या गुणवैशिष्ट्यांमुळे तिला स्वर्गाचे दार सहजगत्या खुले झाले.

आपण इतिहासात वाचतो की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर , त्यांचा लाडका कुत्रा  ‘ वाघ्या ‘ महाराजांच्या चितेवर धन्यासाठी झेपावला होता. या निष्ठेचे वर्णन करायला शब्दही तोकडे आहेत खरोखर.

गुजरातमधील पालमपुर तालुक्यात काही कुत्रे इतके श्रीमंत आहेत की, ते पाच कोटींचे मालक आहेत. काही वर्षांपूर्वी नवाबाने गावकऱ्यांच्या नावावर केलेली जमीन, त्यांनी आपल्या कुत्र्यांच्या नावाने केली. त्या कुत्र्यांची जमीन वीस  बिघा, म्हणजे त्याची किंमत जवळजवळ पाच-सहा कोटीहून जास्त आहे.  पहा ही कुत्र्याची श्रीमंती !

 एखाद्याचं नशीब पहा कसं असतं ते. अंतराळयानातून सजीव म्हणून ‘ लायका ‘ या कुत्रीलाच पाठवले होते. अंतराळात जाणाऱ्या पहिल्या सजीवाचा मान या कुत्रीला मिळाला. काय म्हणावं तिचं नशीब !

आत्तापर्यंत श्वानांवर सर्वात जास्त पुस्तके लिहिली गेली आहेत. श्वानांचा एक विश्वकोशही आहे .जी व्यक्ती प्राण्यांना प्रेमाने सांभाळते, तिच्यापेक्षा पाळीव प्राणी त्या व्यक्तीवर अधिक प्रेम करतात. त्या प्रेमाला माणूसच कमी पडतो, असं म्हणायला हरकत नाही .काही श्वान आपलं सुंदर रूप आणि आज्ञाधारकपणा या गुणांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरही  गाजतात.  थायलंडमधील बँकॉक येथे डॉग शो मध्ये आशिष लिमये यांची ‘ माया ”  ‘ (दोन वर्षे वयाची, बेल्जियम मेनोलीज जातीची ) हिने “सेव्हन बेस्ट ऑफ ब्रीड “, आणि ” सेव्हर चॅलेंज सर्टिफिकेट”  अशी दोन मानाची पदके मिळविली.  कॅनल क्लब ऑफ इंडियाच्या स्पर्धेतही ती चॅम्पियन ठरलेली आहे. खरंच किती कौतुक करावे?

ऑलिंपिक सारख्या सामन्याच्या वेळी ,काही मोजकेच श्वान, प्रेक्षकांमध्ये दंगा होऊ न देण्याचे काम 

करतात . लोक पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतात. व्यवस्थापनात पोलिसांपेक्षा कुत्र्यांची संख्या कमी चालते.

श्री. गिरीश कुबेर यांनी ” पंचकन्या  स्मरे नित्यम “, या लेखामध्ये, घरातल्या पंचकन्यांचे (कुत्र्यांचे ) व्यक्तिमत्व इतके छान अधोरेखित केले आहे की, ते पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते. ते लिहितात की या पंचकन्यांनी हेच शिकवलेलं की — “चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो”. पहा बरं काय वाटतं त्यांना ते.  

” मी आणि माझी ३१ बाळं “, हा ममता रिसबूड यांनी लिहिलेला लेख वाचताना त्यांनी त्या बाळांसाठी (प्राण्यांसाठी ) घेतलेले कष्ट आणि त्याग खरोखरच वाखाणण्याजोगा आहे असे वाटते.

चित्रपटांबद्दल तर काय सांगावे? ” हम आपके है कौन” मधला ‘टफी ‘, “सच्चा झूठा” मधला ‘ मोती’, 

“माँ “मधील ‘डॉगी’, “बेताब “मधला ‘बोझो’, ” वॉटर” मधला ‘ काळू’ —  किती नाव सांगावीत तितकी 

कमीच !  या श्वानांचा अभिनय आपण हौसेने आणि आवडीने पाहतो ना!

पूर्वीचे मुंबई येथील श्वान शिक्षक श्री. शां ना दाते यांचा २५ वर्षे, चार श्वानांबरोबर सहवास होता. त्यांनी मुंबई दूरदर्शनवर त्यांच्या ‘ प्रिन्स ‘ या कुत्र्यासह, मुलाखती आणि मार्गदर्शन केले होते. ‘ प्रिन्स ‘ चे अत्युत्तम काम असलेल्या  ” फुल और कलियाँ”” ( १९६० साली) या बोलपटाला पंतप्रधान पुरस्कार मिळाला. ते अभिमानाने सांगत असत की, “मी मोठा झालो नाही. ‘प्रिन्सने ‘, मला मोठं केलं.” तो स्वर्गवासी झाल्यानंतर त्याचा स्मरणविधीही ते करत असत.

पोलीस खात्यातील श्वान निवृत्तीनंतर कोणीही दत्तक घेऊ शकतात .गुन्हेशोधक ,बॉम्बशोधक ,नारकोटिक्स शोधक ,रेस्क्यू टीम, फॉरेस्ट, असे वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे श्वान पूर्ण प्रशिक्षित आणि लसीकरण केलेले असतात .रात्री गस्त घालणे, गुन्हेगारांना पकडणे, विमानतळ, गोद्या या ठिकाणी पहारा आणि तपासणी ,लपवून आणलेले मादक पदार्थ शोधणे, अशी कामे पोलीस दलातील श्वानांना करावी लागतात. काही वेळा पोलीस शोध घेऊ शकत नाहीत, अशावेळी श्वान ते काम बिनचूक करतो. परदेशात काही ठिकाणी प्रेमापोटी कुत्र्याची स्मारकंही उभी केली गेली आहेत.

आमच्याच घरातल्या कुत्र्यांच्या इमानदारीचे किती कौतुक आणि अनुभव सांगावे तितके कमीच ! ओसाड रानात केवळ कुत्र्यांच्या जीवावर आम्ही निर्धास्तपणे राहत होतो. वेगवेगळ्या टोनमध्ये आवाज काढून कितीतरी साप, विंचू, अगदी चोरही त्यांनी पकडून दिले आहेत. न फिटणारे आणि अनंत उपकार आहेत त्यांचे आमच्यावर ! कर्मयोग , ज्ञानयोग आणि भक्ती योगाच्या मार्गातून मी त्यांच्यातल्या ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असते.

ही श्वानांची गौरव गाथा वाचताना काही जणांचे आक्षेपही असणार. निरपराध्यांना भटकी कुत्री चावतात, त्याचे काय? पण एक कुत्रा चावला तर उरलेल्या पंचवीस कुत्र्यांना मारून टाकायचे का? मारून टाकणे, हा त्यावरचा उपाय नव्हे. पोटाची भूक भागत नसेल तर ते आक्रमक होतात. कित्येक ग्रुप सध्या वेगवेगळ्या ठिकाणी भटक्या जनावरांना खाद्य देण्याचे पवित्र कार्य करत आहेत. केवळ त्यांची संख्या वाढू नये म्हणून, आकडा न सांगता प्रामाणिकपणे त्यांचे निर्बिजीकरण व्हायला हवे .कुत्रा पाळायचा असेल तर भटक्यातला पाळला ,तर एक जीव जगेल. आणि तुमच्यावर अनंत उपकार करेल.  श्वानांची ही गाथा कितीही लिहिली तरी न संपणारी आहे. ती अशीच कौतुकाची गाथा चालतच राहणार.

— समाप्त —

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मिरज तालुक्यातील गवळेवाडी गावातील घटना. शाळेच्या मैदानात खेळताना, मुलांना पाच फूट लांब आणि दोन इंच जाडीचा भला मोठा नाग दिसला. सदैव संरक्षणात तत्पर असलेल्या ‘ भालू ‘ या कुत्र्याला आणले गेले. नागाला पाहताच ‘भालू ‘ ने नागावर झडप घातली. आणि ‘ भालू ‘ आणि नागाची झुंज सुरू झाली . ‘भालूने ‘ नागाला आपल्या तोंडात धरून फेकून दिले .नागानेही आक्रमक होऊन ,भला मोठा फणा काढून, ‘ ‘भालू ‘ वर हल्ला करून त्याला दंश करण्यास सुरुवात केली. नाग फुसफुस आवाज करू लागला. दोन तासांच्या झुंजीनंतर ‘ भालू ‘ने नागाला जेरीस आणून ठार मारले. ‘भालू ‘ कोणालाही जवळ येऊ देईना. नाग मेल्याची खात्री झाली. आणि मगच तो घरी परतला. नागाच्या दंशाने ‘भालूच्या ‘ तोंडाचा  चेंदामेंदा झाला होता. काही तासातच त्याचे अंग सुजायला लागले. तोंडाला फेस यायला लागला. तो बेचैन होऊन लोळायला लागला .काही वेळाने आपल्या मालकाकडे पहात एका जागी झोपून राहिला. कर्तव्यपूर्ती करून चिरनिद्रेत विलीन झाला. डफळ्या रंगाच्या ,उंच ,सडपातळ, मोठ्या दमाच्या, शिकारी आणि पराक्रमी भालूला आजही गावकरी विसरले नाहीत.

एखादा कुत्रा पराक्रमी असेलच असे नाही.  पण दैवी म्हणावे असे सुंदर रूप आणि उत्तम अभिनय परमेश्वराने त्याला बहाल केलेले असते. त्यावर तो अलोट पैसा आणि जागतिक कीर्ती मिळवू शकतो आणि आपल्या मालकालाही मिळवून देतो १९४२ ते ४४ सालची गोष्ट. कॉलेजातीचा ‘कॉल ‘ त्याचे नाव. अत्यंत हूड असा कुत्रा. त्याच्या हूडपणाला कंटाळल्यामुळे मालकाला नकोसा झाला म्हणून त्याला त्यांनी विदर्भातल्या  डॉक्टरला देऊन टाकला. खरंतर ही जात थोडी अर्धांग आणि भोजरी असून सुद्धा पाच-सहा महिन्यात तो अवघड कामही उत्तमरीत्या करू शकला.  एके दिवशी पेपरमध्ये केली जातीचा कुत्रा पाहिजे अशी हॉलीवुडची जाहिरात आली.  ३०० कुत्र्यांचा इंटरव्यू झाला आणि त्यामध्ये कॉल ची निवड झाली.  ट्रेनरना खूप आनंद झाला.  लसीकरण होम या चित्रपटासाठी त्याची निवड झाली चित्रपटाचा नायक एक कुत्रा असूनही तो चित्रपट खूपच गाजला.  कितीतरी देशात तो चित्रपट दाखवला गेला आणि लोकांनी त्याला डोक्यावर घेतले. आणखी चित्रपटांसाठी अनेक देशातून पत्रे आली.  अनेक करारही झाले.  आता त्या 

कॉल ची कमाई वार्षिक ५० हजार डॉलर झाली.  लागोपाठ आणखी पाच सहा चित्रपट निघाले. काही वेळा तो प्रेक्षकात हास्याचे फवारे उडवायचा, तर कधी डोळ्यात अश्रूही उभे करायचा.  लसीकरण होम चित्रपटानंतर तो लसी म्हणूनच प्रचलित झाला.  लोकांनी त्याला डोक्यावर घेतले.  त्याच्या रेखाचित्रांची मासिके निघाली.  शाळेत शिक्षक त्याच्या निष्ठेच्या गोष्टी मुलांना सांगायला लागले.  धर्मोपदेशक त्याच्या निष्ठेवर प्रवचने देऊ लागले.  तो हॉलीवुडचा एक अमोल कुत्रा झाला.  श्वान प्रदर्शनात फक्त उपस्थित राहण्यासाठी एक दिवसाचे एक हजार डॉलर्स मिळत असत.  त्याचे सहा चित्रपट होईपर्यंत त्याने शूटिंग साठी वीस हजार मैलांचा प्रवास केला होता– कधी रेल्वेच्या वातानुकूलित खास डब्यातून, कधी खास बांधणीच्या स्टेशन वॅगनमधून, इतकच काय पण स्वतःच्या विमानातूनही तो प्रवास करीत असे.  एकदा कॅनडामध्ये शूटिंगला गेलेला असताना सैनिकांच्या हॉस्पिटलमधून त्याला पाहण्यासाठी निमंत्रण आले.  त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर सैनिकांचे चेहरे एकदम खुलले.  त्याला प्रत्यक्ष पाहून सैनिकांना खूप आनंद झाला, कारण त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्याला पाहिलेले होते.  एक आश्चर्य म्हणजे एक दीर्घकाळ पडून असलेला सैनिक लसी ला पाहून ताडकन उठून बसला.  त्याचा हात चाटून त्याला शेकहॅण्ड  केले.  डॉक्टरांनी आणि औषधांनी जे काम झाले नव्हते ते लसीने केले.  किती कौतुक करावे त्याचे बरं.

आजकाल मेडिकल क्षेत्रात डॉग थेरपी म्हणून कुत्र्याचा वापर केला जातो. परदेशात ज्येष्ठ नागरिकांसाठी कंप्यानियन म्हणून कुत्रा पाळतात. आणि त्याला शिकवतात. ते   ज्येष्ठांचे चोरापासून ,धोक्यापासून रक्षण करतात. एखाद्याला एपिलेप्सीचा त्रास असेल, आणि कुत्रा बरोबर असेल ,तर त्या व्यक्तीला चक्कर येण्यापूर्वी काही क्षण कुत्र्याला अगोदर जाणीव होते. आणि तो त्या व्यक्तीला त्याचे कपडे पकडून खाली बसवतो, आणि सावध करतो… जर्मनीतील म्युनिच शहरातील घटना.  ‘आर्को ‘ हा एक म्हातारा कुत्रा. ५६ वर्षाच्या एकट्याच राहणाऱ्या वालडरमनने  त्याला ठेवून घेतले .एके दिवशी  वालडरमनला रस्त्यातच हार्ट अटॅक येऊन तो खाली पडला. ‘आर्को ‘ ५०  मीटरवर पळत जाऊन पादचाऱ्यांवर भुंकायला लागला. आणि त्यांना घेऊन  मालकाजवळ आला. लोकांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले .बरे वाटून परत घरी आल्यानंतर मालकाची सेवा करण्यासाठी आणखी काही वर्षे  तो जगला .” मी म्हातारा झालो तरी काय करू शकतो ” हे त्यांनी दाखवून दिले. मालकावरच्या निष्ठेला शब्दच अपुरे आहेत.

 कधी कधी एखाद्याचे दैव कधी उजळेल सांगता येत नाही. आमच्या  घरापासून ,रस्त्याच्या कडेला  झुडुपात एका कुत्रीने चार पिल्लांना जन्म दिला. आठ दहा दिवसांनी पिलांची आई कुठे गायब झाली समजले नाही. पिले रात्रंदिवस आईसाठी भुकेने ओरडत होती. त्यांची आई आली तर चावेल, म्हणून कोणी पिलांना उचलण्याचे धाडस करत नव्हते. अखेर माझ्या मैत्रिणीने त्याना उचलून घरी आणले. दूध-खाणे सुरू केले. त्यांच्या बाललीलांनी सगळ्यांना लळा लावला. दोन पिलांना कोणीतरी सांभाळायला घेऊन गेले. उरलेल्या दोघांची नावे ‘ बंड्या’  आणि  ‘ गुंडी ‘ अशी ठेवली गेली. काही  कौटुंबिक अडचण आल्याने ‘ बंड्या ‘ आणि ‘ गुंडीला’  ” पीपल फॉर ॲनिमल” च्या संस्थेत पाठवले गेले. इतर प्राण्यांबरोबर दोघेही छान रुळले. संस्थेतील काही गाढवांना उटीला पाठवायचे होते. उटी , (मसिन गुडी)  या ठिकाणी डॉक्टर मिसेस एलिना वोटर आणि डॉक्टर नायजेल वोटर (नॉर्वेचे भारतात स्थायिक झालेले व्हेटर्नरी डॉक्टर ) यांनी २० एकर जागेत “इंडिया प्रोजेक्ट फॉर नेचर” ही संस्था  स्थापन केली आहे. तेथे गाढवांबरोबर गुंड्या आणि बंडी यांनाही पाठवले गेले. परदेशस्थ काही संस्था आणि व्यक्ती अशा प्राण्यांना दत्तक घेतात. बंड्या आणि गुंडीच्या फोटोची जाहिरात झाली. यु .के. मधील एका प्रसिद्ध बँड ग्रुपचे गायक  पाँल प्राणीप्रेमी होते .त्यांनी फोटो, कागदपत्रे यांची पूर्तता केली .त्यांची नावे बदलून त्यांचे ‘ पॉल ‘म्हणजे (स्वतःचे) आणि  नँन्सी (बायकोचे) असे नामकरण केले. दत्तक विधान झाले . ‘बंड्या’ आणि ‘गुंडी’  मराठी जोडी  पाँल आणि नॅन्सी अशी इंग्लिश झाली. रस्त्याच्या कडेला झुडुपात जन्माला आलेली, रात्रंदिवस आईविना भुकेने व्याकुळ होऊन ओरडत राहिलेली ,’बंड्या ‘ आणि ‘ गुंडी ‘  म्हणजेच  पाँल आणि नॅन्सी उटीला आनंदी आणि मुक्त जीवन जगायला लागले. कसं नशीब असतं ना एकेकाचं !

 — क्रमशः भाग तिसरा . 

 ©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गौरव गाथा श्वानांची… भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ गौरव गाथा श्वानांची… भाग-1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

इंग्लंड मधील एका खेड्यातील घडलेली घटना. मध्यरात्री पोलीस गस्त घालत होते. बरोबर  ‘ एरडेल  टेरियर’, जातीचा ‘ ब्रूस ‘ हा  कुत्रा होता. अचानक थांबून तो गुरगुरायला लागला . हुकूम मिळताच, तो जवळच्या झुडूपात गडप झाला. काही क्षणातच, एक माणूस डोक्यावर हात घेऊन ‘ ब्रुस ‘च्या पुढे आला. चपळाईने त्या माणसाने, खिशातून पिस्तूल काढले . ‘ ब्रूसच्या ‘  धोका लक्षात आला. आणि त्याने पटकन, माणसाचा पिस्तूल धरलेला हात पकडला. पिस्तूल गळून पडले त्याच्या हातातून !.आणि अखेर तो पकडला गेला. घरफोडीची बरीच हत्यारे त्याच्याजवळ सापडली. आणि अनेक गुन्हेही उघडकीस आले. ‘ ब्रूस ‘चे सर्वांनी कौतुक केले.

ग्वाटेमालाला बऱ्याच वर्षांपूर्वी रात्रीच्या वेळी मोठा भूकंप झाला. दिवस उजाडताच, पडलेल्या घरांखालील माणसे शोधायला सुरुवात झाली. तेव्हा लक्षात आले की, गावातली सगळी कुत्री गावाबाहेर पळून गेली होती. ती नंतर परत आली . आणि कुत्र्यांनीच मृत आणि जिवंत माणसांना शोधून काढले. लोकांना समजेना की, सगळी कुत्री गावाबाहेर कशी गेली? कुत्र्यांना भूकंपाची जाणीव अगोदर होते .आणि  ती दूर दूर जाऊन भुंकत राहतात. नुकत्याच  सीरिया आणि तुर्कीच्या भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी भारताने इतर मदतीबरोबरच डॉग स्काँडही पाठवले आहे.

दुसऱ्या महायुद्ध काळात, जर्मन विमाने लंडनवर बॉम्ब वर्षाव करीत होती. अनेकदा इमारती कोसळून अनेक जण त्याखाली गाडले जात होते. अशावेळी ‘ जेट ‘ नावाच्या कुत्र्याने अनेक जणांना वाचवले. एकदा एका ठिकाणी, ‘आता येथे कोणी सापडणार नाही’ असे म्हणून,’ जेटला ‘ घेऊन पोलीस परत निघाले. पण ‘जेट ‘ परत जायला तयार होईना. एका ठिकाणी उकरून भुंकायला लागला. पोलिसांनी तेथे जाऊन आणखी थोडे उकरून पाहिले तर, एका तुळईखाली बरेच जण बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार झाले .आणि सर्वजण शुद्धीवर आले .डोळ्यात पाणी आणून सर्वांनी ‘जेटचे ‘ खूप खूप कौतुक तर केलेच ,पण  त्याचे आभार कसे मानावेत, यासाठी त्यांना शब्द सुचेनात. ‘ जेट ‘ सर्वांचा प्राण दाता ठरला.

‘रॉक अँड रोल ‘, संगीताचा भारलेला काळ होता तो. ते संगीत म्हणजे अक्षरशः वेड लावणारे होते.  लंडनमध्ये सिनेमा पाहून झाल्यानंतर प्रेक्षक रस्त्यावर, मोठमोठ्याने ओरडून नाचत सुटले .जमाव बेभान झाला. जमावाने शोकेसेस आणि दुकाने फोडायला सुरुवात केली . स्कॉटलंड यार्डचे पोलीस कुत्र्यांना घेऊन आले. कुत्र्यांना  जमावाच्या अंगावर सोडणे शक्य नव्हते. पण केवळ कुत्र्यांना पाहताक्षणीच जमाव शांत झाला. केवळ  कुत्र्यांच्याच्या हजेरीने जमावावर केवढा परिणाम झाला पहा बरं ! किमयागार म्हणावे का त्याला?.

मुंबईच्या लोकलमध्ये, एका तरुण मुलीची, दागिन्यांसाठी हत्या झाली. कळवा स्टेशनवर गाडी थांबताच काही तरुण डब्यातून उतरून गेले. पोलिसांना पत्ता लागत नव्हता. कळवा स्टेशनवर एका झाडाखाली त्यांना एक चप्पल रोड दिसला. त्यावर खाऱ्या चिखलाचे थर होते. शोध आणि तपास घेण्यासाठी पुण्याहून ‘राणी ‘ या डॉबरमन कुत्रीला आणले. तिची मदत घेतली. कळवापासून जवळच दिवा गावाजवळ असा चिखल होता. पोलीस गावात चौकशी करू लागले. ‘राणी ‘ कुत्रीला पाहून तरुण आरोपी गडबडला. घाबरला. आरोपी हा पोलिसांपेक्षा कुत्र्याला जास्त घाबरतो. त्याप्रमाणे तो पकडला गेला. त्या मुलीचे दागिने त्याने घराच्या छपरात लपवून ठेवले होते. पुढे तो आणि त्याचे साथीदारही पकडले गेले .आणि त्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या. राणी कर्मयोगी झाली म्हणायची ना!.

सहारा विमानतळावर हेरॉईन, अफू, ब्राऊन शुगर अशी मादक द्रव्ये प्रवासी लपवून आणतात. ज्या बॉक्समध्ये अशी द्रव्ये असतात , तो बॉक्स पाहताच  ‘हीरो’,  हा निष्णात कुत्रा पेटीकडे पाहून मोठमोठ्यांना भुंकायला लागायचा. अशा द्रव्यांचा वास त्याला कसा येतो ? ही गोष्ट कस्टम अधिकाऱ्यांनाही समजत नसे. त्याच्या आठ नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ‘ हिरोने ‘, 200 कोटी रुपयांची मादक द्रव्ये शोधून काढून आपल्या  ‘ हिरो ‘ या नावाचे सार्थक करून दाखवले.

अगदी अलीकडची गोष्ट. अगदी अभिमान वाटावा अशी. जम्मू कश्मीरमधील, बारामुल्ला भागात आतंकवाद्यांना पकडण्यासाठी जवानांच्या बरोबर आणखी एक जवान  ( झूम नावाचा श्वान ) काम करीत होता. आतंकवादी एका घरात लपले होते . ‘ झूम ‘ च्या गळ्यातल्या पट्ट्यावर चीप बसविली होती. आतंकवाद्यांची माहिती घेण्यासाठी, प्रथम ‘ झूम ‘ला पाठवले गेले . जेणेकरुन ‘ झूम ‘ कोठे आहे ,हेही पट्ट्यावरील चीपमुळे कळणार होते. ‘ झूमने ‘ दोन आतंकवाद्यांना  बरोबर ओळखले .आणि त्यांच्यावर हल्ला केला . त्यांना अगदी जेरीस आणले. आतंकवादी पकडले गेले. पण प्रतिकार करताना ,एका आतंकवाद्याने  ‘ झूम ‘ वर गोळ्या झाडल्या . त्याला गोळ्या लागल्या. तरीही तो न हरता, आतंकवाद्यांशी झटतच राहिला. जखमी झाला. “. बचेंगे तो और भी लढेंगे ” असे जणू आपल्या कृतीने तो सांगत होता. त्याला श्रीनगरच्या व्हेटरनरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आठ दिवस तो उपचारांना हळुवार प्रतिसाद देत होता. पण अखेर एक ज्वलंत देशभक्त मृत्यूच्या स्वाधीन झाला. अनंतात विलीन झाला. शहिद झाला. त्याला सन्मानाने निरोप दिला.  

२६ नोव्हेंबर २००८च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात, अतिरेक्यांनी फेकून दिलेला जिवंत हॅन्ड ग्रेनेड पोलीस टीमने  “मॅक्स ” या कुत्र्याच्या साहाय्याने शोधून काढला .आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले. २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याच्या वेळी, त्याने बरीच थरारक कामे केली होती. हॉटेल ‘ताज ‘ च्या बाहेर तब्बल आठ किलो आरडीएक्सचा आणि २५ हँड ग्रेनेडचा शोध त्याने  घेतला होता. आणि अनेक नागरिकांचे प्राण वाचवले होते. ११ जुलै २०११ रोजी झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोटादरम्यान झवेरी बाजार येथील जिवंत बॉम्ब शोधून  त्याने उल्लेखनीय असे कर्तव्य बजावले होते . सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या हस्ते ‘ मॅक्स ‘चा गौरव केला गेला. पोलीस दलातील प्रत्येकालाच ‘ मॅक्स ‘ चा लळा लागलेला होता. लाडक्या ‘ ‘मॅक्स ‘ च्या निधनाने पोलीस दलही खूप हळहळले .सर्वांनाच वाईट वाटले .

 —क्रमशः भाग पहिला

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगीची गोष्ट… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले.  मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली  होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं.  त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.

एका क्षणी या चिमुकल्या जीवालाअवघड जागग आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला.  त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली —- ते मोठे पान  मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल? 

— ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही ! 

तो छोटा प्राणी मुंगी — खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

— फक्त सोडून देण्याची चिंता नाही. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत.  आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही….

कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…

तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला. अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…

मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली. आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

बोध:

१.  हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत !

२.  एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही. 

३.  कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा. 

४.  (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्यानंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल.  तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.

—  मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.

 

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि, मरुत् 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणीसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अग्नी आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त  अग्निमरुत् सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद  

प्रति॒ त्यं चारु॑मध्व॒रं गो॑पी॒थाय॒ प्र हू॑यसे । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ १ ॥

चारूगामी अती मनोहर याग मांडिलासे 

अग्निदेवा तुम्हा निमंत्रण यज्ञाला यावे

मरुद्गणांना सवे घेउनीया अपुल्या यावे

यथेच्छ करुनी सोमपान यज्ञाला सार्थ करावे ||१||

न॒हि दे॒वो न मर्त्यो॑ म॒हस्तव॒ क्रतुं॑ प॒रः । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥

अती पराक्रमी अती शूर तुम्ही अग्नीदेवा 

तुमच्या इतुकी नाही शक्ती देवा वा मानवा 

संगे घेउनि मरुतदेवता यज्ञाला यावे

आशिष देउनी होमासंगे आम्हा धन्य करावे ||२|| 

ये म॒हो रज॑सो वि॒दुर्विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ३ ॥

द्वेषविकारांपासुनी मुक्त दिव्य मरूतदेवता

रजोलोकीचे त्यांना ज्ञान अवगत हो सर्वथा

अशा देवतेला घेउनिया सवे आपुल्या या 

अग्निदेवा करा उपकृत ऐकुनि अमुचा धावा ||३||

य उ॒ग्रा अ॒र्कमा॑नृ॒चुरना॑धृष्टास॒ ओज॑सा । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ४ ॥

उग्र स्वरूपी महापराक्रमी मरूत देवांची

तेजधारी अर्चना तयांस असते अर्काची 

समस्त विश्व निष्प्रभ होते ऐसे त्यांचे शौर्य

अग्नीदेवा त्यांना घेउनिया यावे सत्वर ||४||

ये शु॒भ्रा घो॒रव॑र्पसः सुक्ष॒त्रासो॑ रि॒शाद॑सः । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ५ ॥

धवलाहुनीही शुभ्र जयांची अतिविशाल काया

दिगंत ज्यांची कीर्ती पसरे शौर्या पाहुनिया  

खलनिर्दालन करण्यामध्ये असती चंडसमर्थ

त्यांना आणावे त्रेताग्नी अंतरी आम्ही आर्त ||५|| 

ये नाक॒स्याधि॑ रोच॒ने दि॒वि दे॒वास॒ आस॑ते । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥

द्यूलोक हे वसतीस्थान स्वर्गाचे सुंदर

तिथेच राहत मरूद देव जे दिव्य आणि थोर

आवाहन अमुच्या यज्ञासत्व वीर मरूद देवा

त्यांना घेउनिया यावे हो गार्ह्यपती देवा ||६||

य ई॒ङ्‍ख्य॑न्ति॒ पर्व॑तान् ति॒रः स॑मु॒द्रम॑र्ण॒वम् । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ७ ॥

किति वर्णावे बलसामर्थ्य हे मरूद देवते

नगस्वरूपी जलदा नेता पार सागराते  

नतमस्तक मरुदांच्या चरणी स्वागत करण्याला  

अग्नीदेवा सवे घेउनीया यावे यज्ञाला ||७||

आ ये त॒न्वन्ति॑ र॒श्मिभि॑स्ति॒रः स॑मु॒द्रमोज॑सा । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ८ ॥

चंडप्रतापी मरुद्देवता बलशाली फार

अर्णवास ही आक्रमिती सामर्थ्य तिचे बहुघोर

सवे घेउनिया पवनाशी आवहनीया यावे 

हविर्भाग अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला द्यावे ||८||

अ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तये सृ॒जामि॑ सो॒म्यं मधु॑ । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ९ ॥

सोमपान करण्याचा अग्ने अग्रमान हा तुझा 

प्रथम करी रे सेवन हाची आग्रह आहे माझा

मरुद्गणांना समस्त घेउनी यज्ञाला यावे

सोमरसाला मधूर प्राशन एकत्रित करावे ||९||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/y5VJJebUi-s

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९

Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रैवन पक्षी… ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? इंद्रधनुष्य ?

☆ रैवन पक्षी… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆

एक पक्षी गरुडाला चोच मारण्याचा प्रयत्न करतो, तो म्हणजे रैवन पक्षी..

हा गरुडाच्या पाठीवर बसून मानेवर / गळ्यावर आपल्या चोचीने प्रहार करत असतो. परंतु गरुड ह्याच्या क्रियेला एकदाही प्रत्युत्तर देत नाही की, रैवन बरोबर झटापटी देखील करत नाही, म्हणजेच गरुड रैवनच्या कृतीकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असतो. गरुड स्वतःचा वेळ आणि ऊर्जा रैवन बरोबरच्या लढाईत वाया घालवत नाही. गरुड स्वतःचे पंख  उघडून हवेत उंच उंच उडत राहतो. गरुड जसजसे उंच जातो तसतसे रैवनला श्वास घेण्यास त्रास होतो आणि शेवटी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रैवन स्वतःहून खाली पडतो. 

म्हणूनच कधीकधी सर्वच लढायांना उत्तर देण्याची गरज नाही. लोकांचे युक्तिवाद, फालतूचे प्रश्न किंवा त्यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देण्याची काही एक गरज नाही.

 

मित्रहो.,

आपली प्रतिमा उंचवा.

समाज उपयोगी काम करीत राहा.

समोरचे स्वतःहून खाली पडतील…

संग्राहक : श्यामसुंदर धोपटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ जुनी लोकं हुशार होती की नाही हेच कळत नाही..!!!…डाॅ.किरण कल्याणकर ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

हैदराबाद मधील शास्त्रज्ञाने शोधले की केळीच्या बुंध्यातील किंवा केळीच्या कमळातील, पानातील, जो चिकट द्रव पदार्थ असतो, तो खाल्यानंतर कॅन्सर वाढवणारी ग्रंथी स्लो किंवा हळू हळू निष्क्रिय होत जाते ….

त्यामुळे जुनी लोक केळीच्या पानावर जेवण घ्यायचे, कारण गरम भात किंवा इतर पदार्थ त्यावर टाकले की तो चिकट द्रव त्या अन्नातून पोटात जायचा …

पण आज उलट झालंय.. प्लास्टिक व थर्मोकोलमुळे महाभयानक परिस्थिती ओढवत आहे, नाल्या जॅम होऊन पूर येत आहे…

शहरी भागात खेडोपाडी लग्नात प्लास्टिक कोटिंग पत्रावळी, द्रोण, मग त्यात गरम पदार्थ टाकल्याने ते पोटात अन्नाद्वारे जाऊन कॅन्सर वाढवत आहेत… कृपया वेळ आली आहे, 

“जुनं ते सोनं ” आहे, हे प्रत्येक आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून  सिद्ध झाले आहे ..

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.

– केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

– केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात. केळीच्या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात.

– त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात.   

सगळ्याच भारतीय परंपरा टाकाऊ नसतात. किंबहुना भारतीय परंपरांमागे असलेला निसर्गाचा आणि मानवी आरोग्याचा सूक्ष्म विचार पाहून शास्त्रज्ञही वेगळ्या दृष्टीकोनातून त्यांकडे पाहू लागले आहेत. भारतीय संस्कृती ही मुळातच निसर्गपूजक आहे. निसर्गपूजेतून निसर्गरक्षणाचा विचार त्यामागे आहे. आपल्या संस्कृतीत सूर्य, वारा, पाऊस अशा निसर्गातील शक्तींनाच देव मानून त्यांची पूजा केली जाते. भारतीय संस्कृती ही निसर्गाचं ‘दोहन’ करायला शिकवते; ’शोषण’ नव्हे. उदा. आपण गाईचं दूध तेवढं काढून घेतो, पण गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणं हे झालं ‘शोषण’ आणि गाय जिवंत ठेवून दूध, गोमुत्र आणि शेण आपल्या उपयोगासाठी घेणं म्हणज़े ‘दोहन’. अशाप्रकारे निसर्गातील संसाधनांचा उपभोग घेताना त्यांची पुनर्भरण क्षमता अबाधित ठेवणं हे भारतीय परंपरांचं मूलतत्व आहे. गंमत अशी की, या परंपरा लोक केवळ परंपरा म्हणून वा धार्मिक भावनेने पाळत होते. त्यामागचं शास्त्र उमगलेलं नव्हतं. आज आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे शास्त्रीय कसोट्यांवर या परंपरांची उपयुक्तता पडताळून पाहणं आणि आधुनिक विज्ञानाच्या परिभाषेत त्यांचं महत्व पटवून देणं शक्य झालं आहे. शिवाय, उपयुक्त परंपरा आणि निरूपयोगी परंपरा कोणत्या ते ओळखणंही शक्य झालं आहे. ‘केवळ परंपरा म्हणून नव्हे तर अमुक एक गोष्ट वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त आहे म्हणून ती करावी’ हा एक नवा विज्ञानवादी दृष्टीकोनही मिळाला आहे.

केळीच्या पानावर जेवणं ही अशीच एक निसर्गाचा आणि आरोग्याचा सूक्ष्म विचार असणारी भारतीय परंपरा आहे. केळीच्या पानाची आरोग्यदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या असलेली उपयुक्तता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध झालेली आहे. मोठा आकार, लवचिकता, तंतुमयपणा आणि सहज उपलब्धता या वैशिष्ट्यांमुळे जेवायला ताटाऐवजी केळीचं पान घेण्याची परंपरा जवळजवळ संपूर्ण भारतात, विशेषत: दक्षिण भारतात वर्षानुवर्षं असलेली आढळते. काही अन्नपदार्थ शिजवताना भांड्याच्या तळाशी केळीचं पान घालण्याची पद्धतही होती, ज्यामुळे अन्नपदार्थाला एक मंद सुवास येतो. शिवाय तळाशी केळीचं पान घातल्यामुळे पदार्थ खाली लागून करपण्याचा धोकाही टळतो. अळुवडीसारखे पदार्थ केळीच्या पानात गुंडाळून शिजवतात. अनेक ठिकाणी वेष्टन म्हणूनही केळीच्या पानाचा उपयोग करतात. केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत फक्त भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, सिंगापूर, मलेशिया, फिलीपिन्स, मेक्सिको, मध्य अमेरिका या देशांमध्येही आढळते.

केळीच्या पानावर जेवण्याचे शरीराला होणारे फायदे आधुनिक विज्ञानाने सिद्ध झाले आहेत. केळीच्या पानात पॉलिफेनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतो आणि रोगप्रतिकारक्षमता वाढवतो. जेवण जेवून झालं की पान गुरांना घातलं जातं. ते गुरांचंही अतिशय आवडीचं अन्न आहे. म्हणजे निसर्गाकडून वस्तू घेऊन उपयोग झाल्यावर ती निसर्गालाच परत द्यायची. यामुळे भांडी घासायचे श्रमही वाचतात, पाणीही वाचतं आणि भांडी घासायला साबण न वापरल्यामुळे घरगुती सांडपाण्याचं उत्सर्जनही कमी होतं. हल्ली कुठलाही घरगुती वा सार्वजनिक कार्यक्रम असल्यास सर्रास प्लास्टीकच्या वा थर्माकोलच्या डिश खाण्यासाठी वापरल्या जातात. खाऊन झाल्यावर या डिश कचर्‍यात फेकून दिल्या जातात. यामुळे किती कचरा वाढतो? केळीचं पान हा याला एक चांगला पर्याय आहे. ते सहज विघटनशील असल्यामुळे पर्यावरणपूरक आहे. खेडेगावांमध्ये केळीची पानं घरच्या घरीच उपलब्ध होतात. शहरामध्ये ती विकत घ्यावी लागतात, पण उपलब्ध असतात. शहराच्या आजूबाजूच्या केळी बागायती करणार्‍या शेतकर्‍यांना केळ्यांबरोबरच केळीची पानं विकणं हे एक चांगलं उदरनिर्वाहाचं साधन होऊ शकतं. मुंबईत दादर आणि इतर काही रेल्वे स्टेशनांच्या बाहेर दहा रुपयांना चार वगैरे अशा किमतीत केळीची पानं मिळतात. त्यामुळे ती ‘महाग’ नक्कीच नाहीत. घरगुती कार्यक्रमासाठी प्लास्टीक डिश वापरण्यापेक्षा केळीची पानं वापरण्यात अशक्य काहीच नाही.

केरळमध्ये जेवणासाठी  व जेवण पॅकींगसाठी केळीच्या पानांचा वापर सुरू पण झाला आहे ..

पण आपण कधी सुधारणा करणार ? वेळ कुणासाठी थांबत नाही..

लेखक : डॉ कल्याणकर किरण, M.D. (Ayu.)

आयुर्वेदिक कॅन्सर तज्ञ, -स्वायु कॅन्सर केयर सेंटर 

-श्री विश्व गणेश आयुर्वेद पंचकर्म, खारघर, नवी मुंबई. 

प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print