मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अतिशय घातक असणारी कबुतर विष्ठा… श्री योगेश पराडकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆ अतिशय घातक असणारी कबुतर विष्ठा… श्री योगेश पराडकर ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

कबुतर हा पक्षी दिसायला खूप साधा असला तरी तो आपल्याला फक्त ६ महिन्यात मरणाच्या दारात उभे करू शकतो.– यावर विश्र्वास बसत नाही ना…! पण हे खरे आहे.

२ आठवड्यापूर्वी कबुतर विष्ठा या कारणे, ठाणे इथे राहणारा माझा जवळचा मित्र मी गमावला. मित्र राहत असलेल्या फ्लॅटच्या खिडकीखाली ग्रिलमधे AC च्या duct unite च्या आजूबाजूस कबुतर निवास आणि विष्ठा जवळ जवळ 3 महिने होती. दुर्लक्षित कबुतरे, अंडी पिल्ले, काटक्या- विष्ठा यात राहत होती.

AC मधून जी हवा घरात येते, त्यातून सुकलेल्या विष्ठेमधील सूक्ष्म जंतूयुक्त धूळ घरात जाईल याची तिळमात्र कल्पना त्या कुटुंबाला नव्हती.

कबुतर उडते तेव्हा ही विष्ठा धूळ AC च्या बाहेरच्या outlet च्या मागच्या बाजूने, जाळीमार्गे आतमधे जाते आणि तेथून आत येणाऱ्या पाईपमधून हे जंतू बंद AC तून आत प्रवेश करतात. त्यामुळे खिडक्या घट्ट बंद असतील तरी जंतूसंसर्ग होतोच.

हे जंतू पाणी, फिनेल, एसिड, डेटॉल यामधेही जिवंत राहतात हे नवल आहे… रिपोर्टमधे हे लिहिलेले होते.

Report मधे लिहिलेली लक्षणे —- अशक्तपणा, सुका खोकला, ताप, पोटशुल, सहजच घाम येणे,

अंगाला सूज येणे–जाणे, ऑक्सिजन लेव्हल कमी होणे, चिडचिड.होणे. एक विशेष लक्षण म्हणजे अचानक श्वास लागून हायपर होणे, ही आहेत.  हे सगळे त्या  report मधे वाचून हादरलोच.

जेमतेम पंचेचाळीशीचा  मित्र २ महिने आजापणामुळे त्रस्त होऊन, एक्सरे आणि इतर टेस्ट करायला गेला.

(योगायोग असा की ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट साठी गेला आणि उपचार चालू केले, ते डॉक्टर कपूर हे हल्लीच स्वतः वृद्धापकाळाने निवर्तले).

—अक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस हे रोगाचे निदान झाले. (हा रोग कबुतर विष्ठा यापासून होतो)

Doctor Kapoor हा दुवा  गेल्यावर उपचार पद्धती आणि हॉस्पिटल दोन्ही बदलावी लागली.

Lungs आणि श्वास नलिका पूर्ण infected झाली होती… Report आले त्यात 60 % lungs निकामी झाले होते हे नमूद केले होते. चौकशी करता या विषया संदर्भात माहिती समोर आली. पण फार उशीर झाला होता आणि “यावर काहीच उपचार नाही पेशंट जगेल तितका जगवा” हे डॉक्टर जेव्हा म्हणाले, तेव्हा तो मित्र हादरला.

एक्यूट हाइपर सेंसिटिविटी न्यूमोनाइटिस मधे नक्की होते काय…???—– Lungs मधील आतला भाग आकुंचित होत जातो आणि कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. रुग्णाला ऑक्सिजन द्यावा लागतो. विशेष म्हणजे हा रोग लवकर समजत नाही. प्रतिकार शक्ती कितीही चांगली असो, effect होतोच.

Lungs प्रत्यारोपण ही सहज होऊ शकले नाही. कारण उपलब्धता नाही आणि costly आहे.

शेवटी म्हणता म्हणता मागील आठवड्यात त्या मित्राला मृत्यूने गाठले. आम्ही सर्व मित्र २ मास्क नाकातोंडावर बांधून वैकुंठ यात्रेत सामील झालो.

— कबुतर हा शांतीदुत नसून यमदुत आहे हे मित्राच्या मृत्यूने शाबीत केले.

आता त्या घरातील सर्व व्यक्तींना वर सांगिल्याप्रमाणे फूफुसाचा रोग कमी जास्त प्रमाणात झालेला आहे.

उपचार सुरू आहेत. पण पुढचा पूर्ण जन्म हा श्वसनाच्या रोगाने त्रस्त असलेले ते उर्वरित कुटूंब

मी पाहिले.— वाईट वाटले पण क्षुल्लक कबुतर किती मोठा घात करू शकते यावर विश्र्वास बसला…

— SO साद। BUT REALITY.

या विषयसंदर्भात जाणकार व्यक्तीकडून माहिती घेऊन हे लिहिण्याचा खटाटोप केला…कबुतर या विषयास थारा देऊ नये…कारण इतर पक्षी प्राणी हे पाणी आणि माती mud bath याची आंघोळ  करतात म्हणून ते स्वच्छ असतात. पण कबुतर हे फार गलिच्छ आहे. त्यामुळे रोग संकर पूर्ण अंगभर घेऊन ते वावरत असते. काळ्या रंगाच्या पिसवा कबुतर विष्ठेतून निर्माण होतात, आणि त्या सुईच्या टोकापेक्षा सूक्ष्म असतात.

मुंबई (zoo) प्राणी संग्रहलय आणि पुणे सर्प उद्यान मधील माझे मित्र डॉक्टर आणि डॉक्टर मैत्रीण यांनी कबुतर याबाबत अधिक खुलासा केला. इतर पशू पक्षी हे दाणे आणि नैसर्गिक खाद्य खात असल्याने त्यांच्या मल मूत्र यातून संसर्ग होत नसतो आणि ती विष्ठा खत म्हणून झाडाला पूरक असते.

पण कबुतर, वटवाघूळ, गिधाड, तरस, आणि कमोडो द्रेगोन यांची लाळ आणि विष्ठा Acidic आणि घातक असते.

— शक्यतो कबुतर आसपास वास्तव्य करणार नाही  हाच यावर एक जालीम उपाय आहे.

— अपने गुलाब चाचा की प्यारीसी देन शांतीदूत होकर मौत को बुलावा देती है…यह अपने आंखों से देखा है… मामुली कबुतर से जुडी इक आखों देखी सत्य घटना…

लेखक : योगेश पराडकर.

संग्राहक : माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆  ॥श्री विंध्येश्वरी स्तोत्रम्॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

 ॥श्री विंध्येश्वरी स्तोत्रम्॥ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मूळ संस्कृत स्तोत्र व त्याचा मराठी भावानुवाद : 

निशुम्भशुम्भमर्दिनीं प्रचण्डमुण्डखण्डिनीम्।

वने  रणे  प्रकाशिनीं   भजामि   विन्ध्यवासिनीम्।।१॥

निशुम्भशुम्भ हारिणी मुंडचंड नाशिनी

पराक्रमी रणी वनी भजितो विंध्यवासिनी ॥१॥

त्रिशूलरत्नधारिणीं  धराविघातहारिणीम्।

गृहे  गृहे  निवासिनीं  भजामि  विन्ध्यवासिनीम।।२।।

रत्नत्रिशूल धारिणी अवनी संकट हारिणी

घराघरात वासिनी भजितो विंध्यवासिनी  ॥२॥

दरिद्र दुःख हारिणी, सदा विभूति कारिणी।

वियोग शोक हारिणी, भजामि विन्ध्यवासिनी॥३॥

दीन दुःखहारिणी साधूसुखकारिणी

विरहशोकनिवारिणी भजितो विंध्यवासिनी ॥३॥

लसत्सुलोलचनां  लतां  सदावरप्रदाम्।

कपालशूलधारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्।।४।।

चंचलसुनेत्र सुकुमारी सदैव शुभवरदायिनी

कपालशूल धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥४॥

करे    मुदा    गदाधरां    शिवां    शिवप्रदायिनीम्।

वरावराननां   शुभां    भजामि   विन्ध्यवासिनीम्।।५।।

गदाहस्त शोभिणी सर्वमंगल दायिनी

सर्वरूप धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥५॥

ऋषीन्द्रजामिनप्रदां त्रिधास्यरूपधारिणिम्।

जले स्थले निवासिनीं  भजामि   विन्ध्यवासिनीम्।।६।।

ऋषीश्रेष्ठ कन्यका त्रिस्वरूपधारिणी

भूजले निवासिनी भजितो विंध्यवासिनी ॥६॥

विशिष्टसृष्टिकारिणीं   विशालरूपधारिणीम्।

महोदरां  विशालिनीं   भजामि   विन्ध्यवासिनीम्।।७।।

विशेष सृष्टी निर्माती प्रचंड रूपधारिणी

विशाल उदर धारिणी भजितो विंध्यवासिनी ॥७॥

प्रन्दरादिसेवितां मुरादिवंशखण्डिनीम्।

विशुद्धबुद्धिकारिणीं भजामि विन्ध्यवासिनीम्।।८।।

इंद्रादि सुर सेविती मुरादि दैत्य विनाशिनी

सुबुद्ध बुद्धीदायिनी भजितो विंध्यवासिनी ॥८॥

॥ इति श्रीविन्ध्येश्वरीस्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ इति  निशिकान्त भावानुवादित श्री विंध्येश्वरीस्तोत्र संपूर्ण ॥

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीपती (इ.स.१०१९ ते १०६६)… लेखिका – सुश्री लीना दामले(खगोलीना) ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीपती (इ.स.१०१९ ते १०६६)… लेखिका – सुश्री लीना दामले(खगोलीना) ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

श्रीपती (इ.स.१०१९ ते १०६६)

(प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ, ज्योतिष जाणकार आणि गणिती.)

श्रीपती यांचा जन्म रोहिणीखंड या आताच्या महाराष्ट्रातील गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नागादेवा/ नामादेवा असे होते तर त्यांच्या आजोबांचे नाव केशव. ( जन्मदात्रीचे नाव माहीत नाही.)

श्रीपती यांनी श्री. लल्ला यांच्या शिकवणीनुसार अभ्यास केला. त्यांचा मुख्य भर ज्योतिषशास्त्रावर होता. त्यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास त्यांच्या ज्योतिषशास्त्रावरच्या संशोधनासाठी केला. आणि गणिताचा अभ्यास किंवा त्यातील संशोधन खगोलशास्त्रावरच्या त्यांच्या संशोधनाला पुष्टी देण्यासाठी केला. उदाहरणार्थ ग्रहगोलांचा अभ्यास.

श्रीपती यांनी ज्योतिषशास्त्रातील कुंडलीतील घरांच्या विभाजनाची पद्धत शोधून काढली, त्याला ‘ श्रीपती भव पद्धती’ म्हणतात.

श्रीपती यांची ग्रंथ संपदा :

धिकोटीडा- करणं 

धिकोटीडा- करणं (१०३९) या ग्रंथात एकंदर २० श्लोक आहेत ज्यात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणा संबंधी माहिती आहे.

या ग्रंथावर रामकृष्ण भट्ट (१६१०) आणि दिनकर (१८२३) यांनी टीका ग्रंथ लिहिले आहेत.

ध्रुव- मानस

ध्रुव- मानस (१०५६) यात १०५ श्लोक असून त्यात ग्रहांचे अक्षांश, ग्रहणे आणि ग्रहांची अधीक्रमणे यावर भाष्य केले आहे.

सिद्धांत-शेखर

सिद्धांत-शेखर यात त्यांचं6अ खगोलशास्त्रा वरील महत्वाच्या कामाचा उहापोह १९ प्रकरणांमध्ये केला आहे. त्यातली काही महत्वाची प्रकरणे :

प्रकरण १३: Arithmetic (अंकगणित) यावर ५५ श्लोक आहेत.

प्रकरण १४: Algebra (बीजगणित)

 यात बीजगणिताच्या अनेज नियमांची चर्चा केली आहे. पण त्यात सिद्धता किंवा प्रमाण असे दिलेले नाही आणि बीजगणिताची चिन्हे वापरलेली नाहीत.

ऋण आणि धन संख्यांची बेरीज ,वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ इ. बद्दल माहिती आहे.

Quadratic समिकरणे सोडवण्याचे नियम इथे दिले आहेत.

प्रकरण १५: Sphere

 Simultaneous indeterminate equations सोडवण्याचे नियम यात दिले आहेत. हे नियम ब्रह्मगुप्ताने दिलेल्या नियमामप्रमाणे आहेत.  

गणित- तिलक

गणित- तिलक हा एक अपूर्ण असा ग्रंथ आहे. हा अंकगणितावरील १२५ श्लोकांचा प्रबंध आहे जो ‘श्रीधर’ यांच्या कामावर आधारित आहे. याच्या न सापडलेल्या भागात सिद्धांत शेखरच्या १३ व्या प्रकरणातील १९ ते ५५ श्लोकांपर्यंतचा भाग असावा.

ज्योतिष-रत्न-माला

ज्योतिष-रत्न-माला हा ज्योतिषशास्त्रावरचा २० प्रकरणे असलेला ग्रंथ असून लल्ला यांच्या ज्योतिष-रत्ना-कोषा वर आधारित आहे. श्रीपती यांनी या ग्रंथावर मराठीत टीका लिहिली आहे. मराठी भाषेतील हा सगळ्यात जुना ग्रंथ आहे असे मानले जाते. या ग्रंथावर अनेकांचे टीका ग्रंथ आहेत.

जातक- पद्धती

जातक- पद्धती यालाच श्रीपती पद्धती असेही म्हटले जाते. हा एक ८ प्रकरणे असलेला ज्योतिषशास्त्रावरचा ग्रंथ आहे. हा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ असून त्यावर अनेक टीका ग्रंथ आहेत.

दैवज्ञ – वल्लभ 

हा ग्रंथही ज्योतिषशास्त्रावर आहे, ज्यात शेवटाला वराहमिहिरांच्या ग्रंथातील उतारे आहेत. दैवज्ञ – वल्लभ  याची हिंदी आवृत्ती श्री. नारायण यांनी लिहिली आहे.

कल्याण ऋषी यांच्या नावे असलेल्या ‘मानसगिरी किंवा जन्म-पत्रिका-पद्धती’ या ग्रंथात श्रीपती यांच्या ‘रत्नमाला’ ‘श्रीपती पद्धती’ या ग्रंथातील असंख्य उतारे आणि अवतरणे आलेली आहेत.

लेखिका : सुश्री लीना दामले (खगोलीना). 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमरकंटक… एक दिव्य तीर्थ ! ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अमरकंटक… एक दिव्य तीर्थ ! ☆ प्रस्तुती – सौ. विद्या पराडकर ☆

अमरकंटक… जेथे भगवान शिवाने समुद्र मंथना नंतर “हलाहल” पचविण्यासाठी तप:साधना केली होती! अमरकंटक… नर्मदा मातेचं जन्म स्थान ! अमरकंटक … देवतांच्या सहवासाने पवित्र झालेली भूमी ! अमरकंटक … सिद्धांच्या  साधनेने सिद्ध झालेलं सिद्धक्षेत्र ! अमरकंटक… योग्यांना आकर्षित करणारे ऊर्जात्मक ठिकाण ! अमरकंटक … महर्षी मार्केंडेय, महर्षी कपिल ,महर्षी भृगू, महर्षी व्यास, च्यवन ऋषी, जमदग्नी ऋषी, अगस्ती ऋषी,दुर्वासा ऋषी , वशिष्ठ,कृतू,अत्री,मरिची, गौतम,गर्ग, चरक,शौनक… अशा किती तरी महान ऋषी-मुनींनी,योग्यांनी, सिद्धांनी, साधकांनी  जिथे तप केले… साधना केली… ऋचा- मंत्र रचले…ग्रंथांची निर्मिती केली…मानव जातीच्या कल्याणासाठी वैद्यक शास्त्र,रसायन शास्त्र, वास्तु शास्त्र , ज्योतिष शास्त्र अशा अनेक प्रांतांत वेगवेगळे शोध लावले अशी  गुढ-रहस्यमय  भूमी ! अमरकंटक…जिथे  जगद्गुरू शंकराचार्यांचे वास्तव्य देखील  काही काळ होते! खरंच , अमरकंटक म्हणजे अष्टसिद्धी प्राप्त करून देणारे एक तीर्थक्षेत्रच आहे!

अमरकंटक म्हणजे दुर्लभ औषधीय वनस्पतींचे भांडार आहे! चरक संहितेत वर्णन केलेल्या अनेक औषधी वनस्पती फक्त इथेच सापडतात! शेकडो दुर्लभ झाडं, पौधे, वेली, कंदमुळे, फळं, फूलं यांचा इथे खजिना आहे! जगात कुठेही न सापडणारी गुलबकावली केवळ अमरकंटकमधेच फुलते! सुमारे ६३५ औषधीय वनस्पती इथे सापडतात!

अशा या अमरकंटकमध्ये  विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत जेथे एकत्रित येतात, तो उंच डोंगराळ भाग म्हणजेच मैकल पर्वत! येथेच शिवाने साधना केली.योगाभ्यासाद्वारे आणि येथील अगम्य वनौषधींच्या सहाय्याने हलाहलचा प्रभाव कमी  केला! साहजिकच कैलास नंतर शिवाचे आवडते ठिकाण कोणते,तर ते म्हणजे अमरकंटक! याच ठिकाणी नर्मदा मातेचा जन्म झाला ! अनेक प्राचीन ऋषींची अष्टसिद्धी प्राप्तीची तपोभूमी हिच! किंबहुना   अमरकंटक म्हणजे एक प्रकारे त्यांची प्रयोगशाळाच होती! होय प्रयोगशाळा… कारण अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा शोध इथेच लागला! या अमरकंटक मध्ये! 

जमदग्नी ऋषींनी “संजीवनी” विद्या इथेच मिळवली!अश्र्विनी कुमारांनी च्यवन ऋषींसाठी “चवनप्राश” इथेच तयार केले! “वैज्ञानिक विचारांचे जनक” म्हणून ज्यांचा अभिमानाने उल्लेख केला पाहिजे, अशा कपील मुनींनी परमाणू या संकल्पनेवर रचना केल्या, त्यादेखील इथेच! महामृत्युंजय मंत्राचे प्रणेते महर्षी मार्केंडेय यांनी ” मार्केंडेय पुराणा”ची निर्मिती इथेच केली! वैद्यक शास्त्राची देवता आणि आयुर्वेदाचा प्रणेता ” धन्वंतरी ” इथेच अनेक रोगांच्या औषधांची उकल करायचा! इथे कोणी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला. कोणी वास्तुशास्त्रातील शोध लावले.कोणी मंत्र रचले.कोणी  ग्रंथ निर्माण केले.कोणी संहिता लिहील्या .तर कोणी अष्टांग योगाच्या आधारे अष्टसिद्धी मिळविल्या!

कारण हे क्षेत्रच एकप्रकारे भारलेले आहे! अमरकंटकच्या वातावरणांतच  ‘जादू’ आहे! सहसा कुणाच्या लक्षात येत नाही, पण इथे तुम्ही नर्मदा स्नान करा  आणि शांत ध्यानाला बसा. तुमच्या दोन्ही नाड्या समान चालतात! सूर्य नाडी आणि चंद्र नाडी…! कपालभाती करण्याची गरजच नाही. म्हणूनच अनेक सिद्धांचा वास इथे असतो! म्हणूनच मत्सपुराणात अमरकंटकला  कुरुक्षेत्रापेक्षाही पवित्र तीर्थाचा दर्जा दिलेला आहे! पद्मपुराणामध्ये तर नारदमुनी युधिष्ठिराला सांगतात की, अमरकंटकच्या चारही दिशांना कोटी रुद्रांचे प्रतिष्ठान आहे! 

अशा पवित्र  अमरकंटकाचे नाव कधिकाळी ‘अमरकंठ’ असे होते. जे शिवा वरून पडलं होते.  पुढे अमरकंठचे अमरकंटक झाले! स्कंद पुराणात अमरकंटक या नावाची सुंदर फोड केली आहे. पुराणकार म्हणतात, अमर म्हणजे देवता आणि कट म्हणजे शरीर !  जो पर्वत देवतांच्या शरीराने आच्छादीत आहे तो पर्वत म्हणजे ‘अमरकंटक’ पर्वत! 

अशा प्रकारे अमरकंटकचा उल्लेख अनेक पुराणात आहे. रामायणात आहे. महाभारत आहे. अनेक ठिकाणी अमरकंटकचा उल्लेख वेगवेगळ्या नावांने आहे.  शिव पुराणात  

” ओंकारमरकंटके” असा याचा उल्लेख आहे,तर रामायणाने त्याला  “ऋक्षवान पर्वत” म्हटलेलं आहे. त्यावरून नर्मदेला  देखील ‘ऋक्षपादप्रसूता’ म्हटलं गेलं आहे!

महाभारतात  एका ठिकाणी याचा “वंशगुल्म तीर्थ” म्हणून उल्लेख आहे!तर महाभारताच्या वनपर्वात  ” आनर्त देश” असाही उल्लेख आहे!वाणभट्ट याला “चंद्र पर्वत” म्हणून नावाजतो. कोणीतरी याला “महारूद्र” देखील संबोधले आहे!कुठे “अनूपदेश” म्हणून…. तर कुठे “सर्वोदय तीर्थ” म्हणून…. काही ठिकाणी  “स्कंद” “मैकल”असाही उल्लेख आहे! कालीदास तर आपल्या साहित्यात या ठिकाणाचे “आम्रकूट”  नावाने सुंदर वर्णन करतो!  

अमरकंटकला कोणत्याही नावाने ओळखले तरीही यांचे निसर्ग सौंदर्य मात्र अप्रतिम आहे! उंच पर्वत …खोल दऱ्या … घनदाट जंगल…त्यातून वाहणारे झरे…नद्या…लहान- मोठे प्रपात…आकाशाला भिडणारे वृक्ष…वृक्षांवर बागडणारे हजारो पक्षी…त्यांचा किलबिलाट…फळा- फुलांची श्रीमंती…आणि त्याच बरोबर गर्द झाडीत ध्यानस्थ बसलेली प्राचिन मंदिरे! स्वर्ग- स्वर्ग म्हणतात तो हाच!

अशा या  निसर्गरम्य अमरकंटकचा उल्लेख  ज्याअर्थी रामायण – महाभारतात आहे, त्याअर्थी रामायणातील –  महाभारतातील नायक इथे नक्कीच आले असतील! पांडवांनी “नर्मदा पुराण” तर साक्षात मार्केंडेय ऋषींच्या मुखातून ऐकलेले आहे!  

अमरकंटक पासून  वीस एक किलो मीटर अंतरावर लखबरीया नावाचं गाव आहे. इथे लाखो मानव निर्मित गुंफा आहेत. म्हणून या गावाचं नाव “लखबरीया” पडलं आहे! आणि या गुंफा पांडवांनी वनवास काळात निर्माण केल्या होत्या , अशी  इथे  जनकथा आहे!लाखो गुंफा  इथे आहेत म्हणण्यापेक्षा त्या  होत्या असं म्हणणं जास्त  इष्ट ठरेल! कारण काळाच्या ओघात काही गुंफा बुजल्या गेल्या , काही बंद केल्या गेल्या!आज फक्त तेरा गुंफाच पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत.वसंत पंचमीच्या दिवशी येथे छान पैकी जत्रा भरते!

रामायण काळातील अनेक जनजमाती आजही येथे सापडतात! इंद्रजिताने मूर्छित केलेल्या लक्ष्मणावर   ऐन युद्धकाळात  योग्य उपचार करणारा सुषेण वैद्य तुम्हाला आठवत असेल. हा सुषेण अमरकंटकच्या परिसरात वाढलेला. निषाद जमाती पैकी एक ! तेव्हाची “निषाद” जमात म्हणजे आजची ” बैगा ” जमात होय!  जी जमात फक्त अमरकंटक क्षेत्रातच जिवीत आहे! अमरकंटकला रामायणामध्ये ऋक्षवान पर्वत म्हटलेलं आहे. याठिकाणचा प्रमुख ऋक्षराज म्हणजेच रामाचा एक सेनापती ” जांबुवंत”!  पर्वत गाथा नावाच्या एका ग्रंथांनुसार तर रावणाने पुष्पक विमानातून अमरकंटक येथे येऊन तपश्र्चर्या केलेली आहे!

अमरकंटक हे शिवाचं प्रिय स्थान असले तरी, इथं शैव संप्रदायासह वैष्णव,जैन, शाक्त,गाणपत्य असे अनेक संप्रदाय आनंदाने नांदले आहेत! त्यामुळेच शेकडो- हजारो वर्षे हे स्थान भारतीयांचे आध्यात्मिक केंद्र राहिले आहे! इथे धार्मिक चर्चा होत असत!  यज्ञ व्हायचे!सत्संगाचे मेळे भरायचे! भारतीय समाजात आणि संस्कृतीमध्ये अमरकंटकचे महत्त्व अधोरेखित आहे!

संग्राहिका –  सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ केदारनाथ मंदिर – एक न उलगडलेल कोडं… लेखक – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

केदारनाथ मंदिर – एक न उलगडलेल कोडं… लेखक – श्री विनीत वर्तक ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

केदारनाथ मंदीराचे निर्माण कोणी केलं याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या जातात.  अगदी पांडवांपासून ते आद्य शंकराचार्य पर्यंत. 

केदारनाथ मंदिर हे साधारण ८ व्या शतकात बांधलं गेलं असावं असे आजचं विज्ञान सांगत. म्हणजे नाही म्हटलं तरी हे मंदिर कमीतकमी १२०० वर्षांपासून अस्तित्वात आहे. 

केदारनाथ जिकडे आहे तो भूभाग अत्यंत प्रतिकूल असा आज २१ व्या शतकातही आहे. एका बाजूला २२,००० फूट उंचीचा केदारनाथ डोंगर, दुसऱ्या बाजूला २१,६०० फूट उंचीचा करचकुंड तर तिसऱ्या बाजूला २२,७०० फुटाचा भरतकुंड. अशा तीन पर्वतातून वाहणाऱ्या ५ नद्या – मंदाकिनी, मधुगंगा, चीरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी. – ह्यातील काही ह्या पुराणात लिहिलेल्या आहेत. 

ह्या क्षेत्रात फक्त ” मंदाकिनी नदीचं ” राज्य आहे. थंडीच्या दिवसात प्रचंड बर्फ तर पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणारं पाणी. अशा प्रचंड प्रतिकूल असणाऱ्या जागेत एक कलाकृती साकारायची म्हणजे किती खोलवर अभ्यास केला गेला असेल. 

“केदारनाथ मंदिर” ज्या ठिकाणी आज उभे आहे तिकडे आजही आपण वाहनाने जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी त्याचं निर्माण कां केल गेलं असावं ? त्याशिवाय १००-२०० नाही, तर तब्बल १००० वर्षापेक्षा जास्ती काळ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत मंदिर कसं उभं राहीलं असेल ? हा विचार आपण प्रत्येकाने एकदा तरी करावा. 

जर पृथ्वीवर हे मंदिर साधारण १० व्या शतकात होतं तर पृथ्वीवरच्या एका छोट्या “Ice Age” कालखंडाला हे मंदिर सामोरं गेलं असेल असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. साधारण १३०० ते १७०० ह्या काळात प्रचंड हिमवृष्टी पृथ्वीवर झाली होती व हे मंदिर ज्या ठिकाणी आहे तिकडे नक्कीच हे बर्फात पूर्णतः गाडलं गेलं असावं व त्याची शहानिशा करण्यासाठी “वाडिया इंस्टीट्यूट ऑफ जिओलॉजी, डेहराडून” ने केदारनाथ मंदिरांच्या दगडांवर “लिग्नोम्याटीक डेटिंग” ही टेस्ट केली. लिग्नोम्याटीक डेटिंग टेस्ट ही  “दगडांच आयुष्य” ओळखण्यासाठी केली जाते. ह्या टेस्टमध्ये असं स्पष्ट दिसून आलं की  साधारण १४ व्या शतकापासून ते १७ व्या शतकाच्या अर्ध्यापर्यंत हे मंदिर पूर्णतः बर्फात गाडलं गेलं होतं. तरीसुद्धा कोणतीही इजा मंदिराच्या बांधकामाला झालेली नाही. 

सन २०१३ मध्ये  केदारनाथकडे ढगफुटीने आलेला प्रलय सगळ्यांनी बघितला असलेच. ह्या काळात इकडे “सरासरी पेक्षा ३७५% जास्त” पाऊस झाला. त्यानंतर आलेल्या प्रलयात तब्बल “५७४८ लोकांचा जीव गेला” (सरकारी आकडे). “४२०० गावाचं नुकसान” झालं.  तब्बल १ लाख १० हजार पेक्षा जास्त लोकांना भारतीय वायूसेनेने एअरलिफ्ट केलं. सगळंच्या सगळं वाहून गेलं. पण ह्या प्रचंड अशा प्रलयातसुद्धा केदारनाथ मंदिराच्या पूर्ण रचनेला जरासुद्धा धक्का लागला नाही हे विशेष.

“अर्किओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया” यांच्या मते ह्या प्रलयानंतरसुद्धा मंदिराच्या पूर्ण स्ट्रक्चरच्या ऑडिटमध्ये १०० पैकी ९९ टक्के मंदिर पूर्णतः सुरक्षित आहे.  “IIT मद्रास” ने मंदिरावर “NDT टेस्टिंग” करुन बांधकामाला २०१३ च्या प्रलयात किती नुकसान झालं आणि त्याची सद्यस्थिती ह्याचा अभ्यास केला. त्यांनी पण हे मंदिर पूर्णतः सुरक्षित आणि मजबूत असल्याचा निर्वाळा दिला आहे.  

दोन वेगळ्या संस्थांनी अतिशय “शास्त्रोक्त आणि वैज्ञानिक” पद्धतीने केलेल्या चाचण्यात मंदिर पास नाही 

तर “सर्वोत्तम” असल्याचे निर्वाळे आपल्याला काय सांगतात ? तब्बल १२०० वर्षानंतर जिकडे त्या भागातले सगळे वाहून जाते, एकही वास्तू उभी रहात नाही, तिकडे हे मंदिर दिमाखात उभे आहे आणि नुसतं उभं 

नाही तर अगदी मजबूत आहे.  ह्या पाठीमागे श्रद्धा मानली तरी, ज्या पद्धतीने हे मंदिर बांधले गेले आहे,  ज्या जागेची निवड केली गेली आहे,  ज्या पद्धतीचे दगड आणि संरचना हे मंदिर उभारताना वापरली गेली आहे,  त्यामुळेच हे मंदिर ह्या प्रलयात अगदी दिमाखात उभं राहू शकलं, असं आजच विज्ञान सांगतं आहे.

हे मंदिर उभारताना “उत्तर–दक्षिण” असं बांधलं गेलं आहे. भारतातील जवळपास सगळीच मंदिरे  ही “पूर्व–पश्चिम” अशी असताना केदारनाथ “दक्षिणोत्तर” बांधलं गेलं आहे. याबाबत जाणकारांच्या मते जर हे मंदिर  “पूर्व-पश्चिम” असं असतं, तर ते आधीच नष्ट झालं असतं. किंवा निदान २०१३ च्या प्रलयात तर नक्कीच नष्ट झालचं असतं. पण ह्याच्या या दिशेमुळे केदारनाथ मंदिर वाचलं आहे. 

दुसरी गोष्ट म्हणजे ह्यात जो दगड वापरला गेला आहे तो प्रचंड कठीण आणि टिकाऊ असा आहे. अन् विशेष म्हणजे जो दगड या मंदिराच्या बांधकामासाठी वापरला गेला आहे तो दगड तिकडे उपलब्ध होत नाही.  मग फक्त कल्पना करा की ते दगड तिथेपर्यंत वाहून नेलेच कसे असतील ?  एवढे मोठे दगड वाहून न्यायला (ट्रान्सपोर्ट करायला) त्याकाळी एवढी साधनंसुद्धा उपलब्ध नव्हती.  या दगडाची विशेषता अशी आहे की वातावरणातील फरक, तसेच तब्बल ४०० वर्ष बर्फाखाली राहिल्यावरसुद्धा  त्याच्या “प्रोपर्टीजमध्ये” फरक झालेला नाही.  

त्यामुळे मंदिर निसर्गाच्या अगदी टोकाच्या कालचक्रात आपली मजबुती टिकवून आहे. मंदिरातील हे मजबूत दगड कोणतही सिमेंट न वापरता “एशलर” पद्धतीने एकमेकात गोवले आहेत. त्यामुळे तपमानातील बदलांचा कोणताही परिणाम दगडाच्या जॉइंटवर न होता मंदिराची मजबुती अभेद्य आहे. २०१३ च्या वेळी एक मोठा दगड आणि विटा घळईमधून मंदिराच्या मागच्या बाजूला अडकल्याने 

पाण्याची धार ही विभागली गेली, आणि मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याने सर्व काही आपल्यासोबत वाहून नेलं. पण मंदिर आणि मंदिरात शरण आलेले लोक सुरक्षित राहिले, ज्यांना दुसऱ्या दिवशी भारतीय वायूदलाने एअरलिफ्ट केलं होतं. 

श्रद्धेवर विश्वास ठेवावा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण तब्बल १२०० वर्ष आपली संस्कृती, मजबुती 

टिकवून ठेवणारं मंदिर उभारण्यामागे अगदी जागेची निवड करण्यापासून ते त्याची दिशा, त्याचं बांधकामाचं मटेरियल आणि अगदी निसर्गाचा पुरेपूर विचार केला गेला ह्यात शंका नाही.  “Titanic जहाज” बुडाल्यावर पाश्चिमात्य देशांना “NDT टेस्टिंग” आणि “तपमान” कसे सगळ्यावर पाणी फिरवू शकते हे समजलं. पण आमच्याकडे तर त्याचा विचार १२०० वर्षापूर्वी केला गेला होता. केदारनाथ त्याचं ज्वलंत उदाहरण नाही का ? काही महिने पावसात, काही महिने बर्फात, तर काही वर्ष बर्फाच्या आतमध्ये राहून सुद्धा ऊन, वारा, पाऊस ह्यांना पुरुन उरत, समुद्रसपाटीपासून ३९६९ फूट वर “८५ फूट उंच, १८७ फूट लांब, ८० फूट  रुंद” मंदिर उभारताना त्याला तब्बल “१२ फूटाची जाड भिंत आणि ६ फूटाच्या उंच प्लॅटफोर्मची मजबूती” देताना किती प्रचंड विज्ञान वापरलं असेल ह्याचा विचार जरी केला तरी आपण स्तिमित होतोय. 

आज सगळ्या प्रलयानंतर पुन्हा एकदा त्याच भव्यतेने “१२ ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात उंचावरचं ” असा मान मिळवणाऱ्या केदारनाथच्या वैज्ञानिकांच्या बांधणीपुढे आपण “नतमस्तक” होतो.

वैदिक हिंदू धर्म-संस्कृती किती प्रगत होती याचे हे एक उदाहरण आहे, त्याकाळी वास्तुशास्त्र, हवामानशास्त्र, अंतराळ शास्त्र, आयुर्वेद शास्त्र, यात आपले ऋषी अर्थात शास्त्रज्ञ यांनी खूप मोठी प्रगती केली होती……. 

म्हणूनच मला मी “हिंदू”असल्याचा अभिमान वाटतो.

|| ॐ नमः शिवाय ||

लेखक : श्री विनीत वर्तक

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मुंगीची गोष्ट ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ मुंगीची गोष्ट ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले.  मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली  होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पाहिलं.  त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतल. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.

एका क्षणी या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती.ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला.  त्या घटनेने माणूस घाबरून गेला आणि त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने मनुष्याने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे – जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली.

मुंगी पान लहान छिद्रात कसे वाहून नेईल? 

ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही! 

तो छोटा प्राणी, खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

फक्त सोडून देण्याची चिंता नाही. 

आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत.  आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही.. ..

कथा पुढे चालू ठेवत आहे…तुम्हाला याचा आनंद मिळेल…

तो श्रीमंत माणूस जरा अधीर झाला.  अजून थोडा वेळ थांबला असता तर त्याने काहीतरी वेगळं पाहिलं असतं…

 मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली.

आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

बोध:

  १.  हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत!

 २.  एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही..

 ३.  कमावलेली वस्तू तुमच्या भावांसोबत शेअर करा

 ४.  (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्या नंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल.  तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.

मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण किती शिकू शकतो.

संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक मनस्वी कार्यकर्ती :  प्रतिभा स्वामी – लेखिका – सुश्री बागेश्री पोंक्षे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ एक मनस्वी कार्यकर्ती :  प्रतिभा स्वामी – लेखिका – सुश्री बागेश्री पोंक्षे ☆ प्रस्तुती : सुश्री माधुरी परांजपे ☆

आज २०२३ साली अत्यंत वेगाने चालणार्‍या या जगात विचार-भावना-कल्पना यांचं येणं, आपल्यावर त्यांचं अक्षरश: कोसळणं आणि कालचा विचार किंवा कालची गोष्ट याला आज बदलतं स्वरूप मिळणं हे किती सहज झालंय. आजची तरुण पिढीदेखील बदलत्या काळाप्रमाणे खूप वेगाने वेगवेगळ्या गोष्टी शिकतेय. नवनवीन तंत्रज्ञान, त्याचा वापर करून वेगाने आपली कामं पूर्ण करणं आणि रोज नवीन काहीतरी शिकणं हे ही पिढी अगदी सहजपणाने करतेय ! अशा अनेक मनस्विनी मला माझ्या कामामुळे भेटल्या.

— त्यातलं प्रतिभाचं जे भेटणं झालं, ते कायमचं लक्षात राहायला कारणही तसंच होतं. सांगोल्यात मराठी माध्यमाच्या शाळेत प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तिच्या कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशनच्या मास्टर्स डिग्रीसाठी तिने कोल्हापूर युनिव्हर्सिटी निवडली.

पदवी पूर्ण केल्यानंतर पाठोपाठच्या दोन भावंडांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी प्रतिभाने शिक्षणातून दोन वर्षांचा विश्राम घेतला होता. त्या काळात आपल्या वडिलांच्या मिळवत्या हातांना तिने स्वत:च्या हाताची साथ दिली! सांगोला डेपोला मेकॅनिक म्हणून काम करीत असलेल्या वडिलांना थोडा आधार झाला. दोन वर्षांनंतर कोल्हापूर युनिव्हर्सिटीची मास्टर्ससाठीची प्रवेश परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे प्रतिभाला तिचं पुढचं शिक्षण अल्प पैशामध्ये करता येणार होतं. त्यासाठी हा सांगोल्यातून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास!

कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्समधून मास्टर्स केल्यानंतर तिने दोन वर्षं छोटी-मोठी कामं केली आणि नंतर पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर कंपनीत ती रुजू झाली. पगार चांगला होता, पण तिचं मन काही त्यात लागत नव्हतं. मनाला कामाचं समाधान मिळत नव्हतं. घड्याळ्याच्या काट्यांबरोबर फिरत राहून शहरांत काम करताना कामात समाधान नाही.. असं झालं होतं. हे काम काही खरं नाही असं वाटायचं. कंपनीत कामाला जाताना बस स्टेशन, बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी छोटी-छोटी मुलं भिक्षा मागताना तिला दिसायची आणि या मुलांचं भविष्य काय? या विचाराने अस्वस्थपणाचं एक बीज तिच्या काळजात रुजलं. आपण सॉफ्टवेअरच्या कामातून पैसे मिळवतो आहोत, पण उद्याची जी देशाची संपत्ती आहे, अशी ही लहान-लहान मुलं भिक्षा मागत फिरत आहेत. त्यांच्या उभ्या आयुष्याचं ती काय करतील? या प्रश्नांनी ती अस्वस्थ झाली.

अभ्यास केल्यावर तिच्या असं लक्षात आलं की ही सगळी मुलं ग्रामीण भागातून शहरी वस्त्यांमध्ये राहायला आली आहेत. आपण एक-दोघा मुलांसाठी काहीतरी करू शकू; पण अशी खूप मोठ्या संख्येत मुलं आहेत आणि त्यांचा प्रश्न मूळ ठिकाणी जाऊन बघितला, तर तो ‘जगायला’ पुढे काही नाही अशा ग्रामीण भागातल्या मुलांचा प्रश्न आहे, हे तिने जाणलं! यासाठी ग्रामीण भागात काही करून पाहण्याची तिची इच्छा दृढ होत गेली.

‘आज सॉफ्टवेअर क्षेत्रात मी आहे. अनेक जण आहेत. मी माझी कंपनी सोडून दुसरं काम सुरू केलं, तर कंपनीला दुसरं कोणीतरी या कामासाठी नक्की मिळेल. पण या मुलांचा विचार करणारे किती जण असतील? कदाचित त्यांची संख्या कमी असेल. मग मला त्यासाठी गेलं पाहिजे.’ … मनाचा कौल झाला आणि अस्वस्थता संपली.

प्रतिभाचे मामा म्हणजे आदरणीय विजयजी स्वामी. प्रतिभा कायमच तिच्या मनातलं त्यांच्याशी बोले, चर्चा करी. विजयजींशी बोलून निर्णयाचा पक्केपणा तपासायचं प्रतिभाने ठरवलं आणि विजयजींनी तिला ज्ञान प्रबोधिनीत पोंक्षे सरांकडे पाठवलं. तिची सगळी गोष्ट ऐकल्यानंतर ग्रामीण भागातल्या महिलांकरता प्राधान्याने काम करणार्‍या सुवर्णाताई गोखले यांच्याकडे सरांनी तिला पाठवलं. प्रतिभाचा निर्णय पक्का होता. आज तिच्या वयाच्या पस्तिशीतच तिने ग्रामीण भागात राहून आठ वर्षं पूर्णवेळ काम केलंय. ज्या वयात सर्वसाधारणपणे स्वत:च्या नोकरीचं, व्यवसायाचं, लग्नाचं ठरवायचं, त्या वयात प्रतिभाने ग्रामीण भागात राहू काम करायला सुरुवात केली.

सुवर्णा गोखलेंसारख्या हाडाच्या मेंटोरकडे (अधिमित्राकडे) प्रतिभा आली, म्हणून आज तिचे स्वत:चे जे विचार आहेत, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारं वस्तुनिष्ठ असं कृतीवर भर देऊन प्रयोग करत शिकण्यासाठीचं व्यासपीठ तिला मिळालं.

पुण्यापासून 50 कि.मी. अंतरावरील वेल्हे तालुक्यात तालुक्याच्या ठिकाणी राहून प्रतिभा काम करते आहे. तिने सुरुवात केली ती वेल्ह्यातल्या दुर्गम भागातल्या मुलींकरता चालवल्या जाणार्‍या सहनिवासात (होस्टेलमध्ये) राहून, या शिक्षणाची आस असलेल्या मुलींची ताई बनून. अशी ताई जी अभ्यासातले अडलेलं सांगेल, संगणक शिकवेल, एखादे काम कसं करायचं, कामाचं नियोजन कसं करायचं हे तर शिकवेलच, तसाच कामामागचा विचार उलगडून सांगेल. आज अशा 60पेक्षा जास्त युवतींना शिक्षणासाठी योग्य बनवण्याचं आणि वेगवेगळ्या कामात पुढाकार घेण्याचं शिक्षण तिने दिलंय!

पण ती मुळात इथे आली होती ते आणखीही एका कामासाठी. ते काम तिला ग्रामीण भागात राहायला येऊन तीन वर्षं झाल्यावर दिसलं……. समाजाच्या एकूण उतरंडीत सगळ्यात शेवटच्या पायरीवर सुटून राहिलेला कातकरी समाज. आज ग्रामीण भागात तयार केलेल्या युवा मैत्रिणींच्या मदतीने ती वेल्हे तालुक्यातील 15 कातकरी वस्त्यांवर काम करते आहे. शाळेचं नाव काढताच पळून जाणारी कातकरी मुलं आज शाळेची गोडी लागून नियमित शाळेत जायला लागली आहेत, तर काही मुली चक्क वसतिगृहात (सहनिवासात) येऊन राहिल्या आहेत. स्वत:ची आणि वस्तीची स्वच्छता यापासून तिने कामाला सुरुवात केली आहे.

स्वत:चं अस्तित्वच नसलेल्या कातकरी समाजाला इंचभरही मालकीची जागा नाही, पॅन कार्ड-आधार कार्डाच्या रूपात कागदावर त्यांचं अस्तित्व नाही! यासाठी त्यांना पॅन कार्ड, आधार कार्ड मिळवून देण्याच्या कामापासून प्रतिभाने सुरुवात केली आहे. सामाजिक जाणिवेचा आणि अन्यायाने अस्वस्थ होणार्‍या काळजाचा वसा सहनिवासातल्या आणि युवती विभागातल्या प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचावा, म्हणून मावळातल्या मुलींनीच कातकरी मुलांसाठी काम केलं पाहिजे अशी गाठ तिने मारून ठेवली आहे. यातूनच पुढील ज्योत लागणार आहे, लागली आहे.

यातूनच कदाचित शहरातील बस स्टँडवर, बाजारात लोकांसमोर पसरलेले चिमुकले तळवे मनगटाला धरून उलटे करण्याचं आणि त्याची मूठ होईल अशी आशा करण्याचं स्वप्न तिने पाहिलं आहे. तिचं अस्वस्थ मन आता थोडं थोडं शांत होत आहे. ‘मी माझ्यापुरतं माझ्या मनात आलेल्या अस्वस्थतेला कृतीने उत्तर दिलं’ असं जणू ती म्हणते आहे. देशाची उद्याची आशा असलेल्या तरुण मुलामुलींना चांगल्या गोष्टींच्या नादाला लावण्याचा नाद तिने घेतलाय.

वेल्हेे तालुक्यातल्या ६०-७० युवती, त्यांच्यासमोर ठेवलेलं शिक्षणाचं संघटनेचं उदाहरण, १५ कातकरी वस्त्यांमधील कातकरी समाजातले ७०० बहीण-भाऊ, वेल्हे तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधील २०० युवती, मावळ भागामधील गावांमधील ‘स्वाधार’ नावाच्या प्रकल्पातील २०० गावकरी असं आपलं वर्तुळ  वाढवत वाढवत प्रतिभाने आपलं कुटुंब मोठं केलं आहे. या सात-आठ वर्षांत तिने केलेलं काम पाहूनच प्रतिभाचं भेटणं हे माझ्या कायम लक्षात राहिलेलं आहे, असं मी म्हटलं !

https://www.evivek.com/Encyc/2023/3/4/social-worker-Pratibha-Swami.html

लेखिका : सुश्री बागेश्री पोंक्षे

संग्राहिका – सुश्री माधुरी परांजपे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ९ व १०☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा ९ व १० ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ ऋचा ९ व १०

देवता : अग्नि

आज मी आपल्यासाठी मेधातिथि कण्व या ऋषींनी अग्नि देवतेला  उद्देशून रचलेल्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळातील  बाविसाव्या सूक्तातील नऊ आणि दहा या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद : 

अग्ने॒ पत्नी॑रि॒हा व॑ह दे॒वाना॑मुश॒तीरुप॑ । त्वष्टा॑रं॒ सोम॑पीतये ॥ ९ ॥

अग्निदेवा ऐका आर्त अमुची ही प्रार्थना 

त्वष्टादेवा सवे घेउनीया सोमप्राशना

देवपत्निही सिद्ध जाहल्या यज्ञी साक्ष व्हाया

यागास्तव हो त्यांना संगे  यावे घेऊनिया ||९||

आ ग्ना अ॑ग्न इ॒हाव॑से॒ होत्रां॑ यविष्ठ॒ भार॑तीम् । वरू॑त्रीं धि॒षणां॑ वह ॥ १० ॥

अग्निदेवा हे ऋत्विजा कृपा करी आता 

घेउनि या देवी सरस्वती धीषणा वरुत्रा 

चिरयौवन त्या असती जैशी सौंदर्याची खाण

बलशाली ही करतिल अमुचे सर्वस्वी रक्षण ||१०||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)  

https://youtu.be/NMnaWg9mK08

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 9 – 10

Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 9 – 10

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छंदोबद्ध पुरण – कवी अभिनव फडके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ छंदोबद्ध पुरण – कवी अभिनव फडके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(एखाद्याचा “पुरण” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना) — 

श्री. अभिनव फडके यांच्या लेखणीतून…

इंद्रवज्रा:

चाहूल येता मनि श्रावणाची

होळी तथा आणखि वा सणाची

पोळीस लाटा पुरणा भरोनी

वाढा समस्ता अति आग्रहानी ||

 

भुजंगप्रयात:

सवे घेउनी डाळ गूळा समाने

शिजो घालिती दोनही त्या क्रमाने

धरी जातिकोशा वरी घासुनीते

सुगंधा करावे झणी आसमंते ||  

(जातिकोश – जायफळ)

 

वसंततिलका:

घोटा असे पुरण ते अति आदराने

घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने

पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते

पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||

 

मालिनी:

अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते

हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते

कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती

कडक नच करावी राहुद्या तैलवंती ।।

 

मंदाक्रांता:

घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी

ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती

बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा

पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||

 

पृथ्वी:

करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे

पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे

समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे

असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||

 

शार्दूल विक्रिडित:

हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या

उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या

वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे

नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे ||

 

कवी – श्री अभिनव फडके

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? इंद्रधनुष्य ? 

☆ “- १० मार्च — सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी -” – लेखक : श्री राजेश खवले ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

१० मार्च ! सावित्रीआई फुले यांची पुण्यतिथी! नुकतीच कोरोनाची लाट येऊन गेली. रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अनेक डॉक्टर, नर्सेस आणि इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावून कर्तव्य बजावले. अनेकांनी तर आपले प्राणही गमावले ! त्यांच्या कार्याला शतशः प्रणाम! त्यांचे हे काम सावित्रीआई फुले  यांनी 1896-97 साली पुण्यात प्लेगच्या साथीत केलेल्या कामाची आठवण करून देणारे आहे. आज सावित्रीआई यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने त्यांचे या क्षेत्रातील कार्य जाणून घेणे औचित्यपूर्ण आहे.

१८९६ मध्ये भारतात आलेला प्लेग हा Bubonic प्लेग होता. चीनच्या पश्चिम यूनान या प्रांतात 1850 साली या प्लेगचा रुग्ण पहिल्यांदा आढळला. चीन ते हॉंगकॉंग आणि तेथून भारत असा या रोगाचा प्रसार झाला. येर्सिनिया पेस्टीस या जिवाणूमुळे हा रोग होत असे. उंदीर किंवा तत्सम प्राण्यांच्या अंगावर वावरणारे पिसू हे या जीवाणूचे वाहक  होते. १८९६ साली या प्लेगची भारतात सुरुवात झाली. पहिला रुग्ण मुंबईमध्ये आढळून आला. लवकरच बंगाल, पंजाब, द युनायटेड प्रोविन्स आणि नंतर ब्रह्म देशातही या प्लेगने धुमाकूळ घातला. केवळ एका महिन्यात पुण्याची 0.६ टक्के जनता प्लेगने बळी गेली होती. पुण्यातील जवळजवळ अर्ध्या लोकांनी गाव सोडले होते. दिवसाला तीनशे ते चारशे लोक प्लेगने मरत असत. काही वर्षातच लाखो लोक या प्लेगच्या आजाराला बळी पडले. सरकारने या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी ‘ The Epidemic Diseases Act 1897 ‘ पारित केला.

प्रा. ना. ग. पवार सांगतात- १८९७ सालच्या सुरुवातीपासून पुणे व पुण्याच्या ग्रामीण भागात प्लेगने थैमान घातले होते. यशवंत फुले यावेळी अहमदनगरला होते. त्यांना सावित्रीबाईने बोलावून घेतले. वानवडी व घोरपडी यांच्यामध्ये असलेल्या ग्यानोबा ससाने यांच्या माळरानावर आपल्या नोकरीतून सुट्टी काढून आलेल्या डॉक्टर यशवंतने खाजगी इस्पितळाची सेवा उपलब्ध करून दिली.

ग्यानोबा कृष्णाजी ससाणे सांगतात, तात्यासाहेब (म्हणजे महात्मा फुले) सन १८९० साली वारले. तात्या नंतर यशवंतराव डॉक्टरकीची परीक्षा पास झाले व फौजेत नोकर राहिले. यशवंतरावाने १८९३ साली डॉक्टरकीचे शिक्षण पूर्ण केले होते. डॉ. यशवंत यांना डॉक्टर विश्राम रामजी घोले यांचे मार्गदर्शन लाभले होते. विश्राम रामजी घोले हे १८९३ साली व्हाईसरायचे असिस्टंट जनरल सर्जन होते. महात्मा फुले यांना अर्धांगवायूचा आजार झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार डॉक्टर घोले यांनीच केले होते. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर डॉक्टर यशवंत यांनी सैन्यात नोकरी पत्करली होती.दक्षिण आफ्रिकेतून सुट्टी घेऊन ते आले होते.

प्रा. ना.ग. पवार सांगतात, सावित्रीबाईंजवळ पैशाची कमतरता असूनही त्यांनी इतरांच्या आर्थिक मदतीने रुग्णांची यथाशक्ती सेवा केली. प्लेगचा उद्भव झाला आहे किंवा होणार आहे असा संशयाने सुद्धा गोरे सोल्जर्स घराघरात घुसून रुग्णांना बाहेर काढत व धाक दाखवीत. ते सावित्रीबाईंना पाहवले नाही.

मुंढवे या खेडेगावात मागासवर्गीयांची वस्ती होती. झोपडीवजा घरात अस्वच्छता ही भरपूर! तेथे या  प्लेगचा अधिक जोर होता. या सर्व भागात सावित्रीबाई जातीने फिरू लागल्या. सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंना बरीच साथ दिली. सत्यशोधक समाजाचे एक पुढारी नारायण मेघाजी लोखंडे यांची सावित्रीआईंना विशेष साथ लाभली होती.

प्रा. हरी नरके सांगतात, इतक्यात मुंबईत कामगार नेते आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे प्लेगने आजारी असलेल्या कामगारांवर रुग्णांवर उपचार करताना गेल्याची बातमी आली. सावित्रीबाईंना शोक अनावर झाला. जवळचा खंदा कार्यकर्ता गेला पण त्या रडत बसल्या नाहीत. उठल्या नी पुन्हा कामाला लागल्या. यावेळी पुणे शहरातले बहुतेक सगळे पुढारी जिवाच्या भीतीने गावोगावी पांगले होते. प्रा. पवार सांगतात, तीन-चार महिने प्लेगचा फारच जोर होता. माणसे पटापट मरू लागली. औषधोपचार नीट होणे कठीण व शासकीय सेवाही तुटपुंजी अशा अवस्थेत सावित्रीबाईंनी स्वतःचे प्राण पणास लावून प्लेगच्या साथीत दिवस-रात्र एक करून मदत कार्य केले.

प्रा. हरी नरके सांगतात, सावित्रीबाई स्वतः आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत. त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुढंवा गावच्या गावकुसाबाहेर  पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या. मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली, आणि दहा मार्च १८९७ रोजी रात्री नऊ वाजता त्यांचे प्लेगमुळे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी दिन बंधने शोकाकुल होऊन दिली.

खरे पाहिले तर यावेळी सावित्रीबाईंचे वय हे जवळजवळ ६७ वर्ष होते. म्हणजे त्या सदुसष्ट वर्षाच्या आजीबाई झाल्या होत्या. परंतु समाजकार्य करण्याची उर्मी त्यांच्या अंगामध्ये अगदी ठासून भरलेली होती. मुंढवा ते हडपसरचा ससाणे मळा हे अंतर सुमारे आज सात ते आठ किलोमीटर होते. यावेळी तो पांडुरंग नावाचा मुलगा सुमारे दहा- अकरा वर्षाचा होता. सावित्रीआईंनी त्याला चादरी मध्ये गुंडाळून आपल्या पाठीवर घेतले आणि हा सात ते आठ किलोमीटरचा प्रवास चालत पूर्ण केला. मुलाला 

दवाखान्यामध्ये पोहोचविले. डॉक्टर यशवंत यांनी त्या मुलावर उपचार केले आणि तो मुलगा वाचला सुद्धा!

सावित्रीआईंच्या मृत्युनंतर यशवंतराव पुन्हा सैन्यात गेले. १८९८-९९ मध्ये ते अफगाणिस्तानात क्वेटा येथे लढाईवर गेले होते. अफगाणिस्तानात दोन वर्ष होते. १९०१ साली ते चीनमध्ये लढाईवर गेले होते. ते नंबर १२८ पायनर पलटणीवर डॉक्टर होते. १९०५ साली अहमदनगर मध्ये पुन्हा प्लेगची साथ आली. यशवंतराव प्लेगच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहमदनगरला गेले. रुग्णांवर उपचार करताना त्यांनादेखील प्लेग झाला. १३ ऑक्टोंबर १९०५ रोजी त्यांचा प्लेगने मृत्यू झाला.

दहा मार्च ! आजच्याच दिवशी रुग्णांची सेवा करताना सावित्रीआईंनी त्यांचे प्राण गमावले. रुग्णांच्या सेवेकरिता आपले प्राण पणाला लावणाऱ्या सावित्रीआई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त्याने त्यांना विनम्र अभिवादन.

लेखक : श्री राजेश खवले

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print