मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) : ऋचा १ ते ९ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २८ (सोमसूक्त) – ऋचा १ ते ९

ऋषी – शुनःशेप आजीगर्ति : देवता – १-४ इंद्र; ५-६ उलूखल; ७-८ उलूखल व मुसळ; ९ प्रजापति

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील अठ्ठाविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी विविध  देवतांना  आवाहन केलेले  असले तरी  हे मुख्यतः  सोमवल्लीला उद्देशून आहे. या सोमवल्लीपासूनच सोमरसाची निर्मिती केली जाते. हे सूक्त सोमसूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

यत्र॒ ग्रावा॑ पृ॒थुबु॑ध्न ऊ॒र्ध्वः भव॑ति॒ सोत॑वे ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ १ ॥

 उखळामध्ये सोमवल्लीवर खलूनिया शक्तीने

जड विशालश्या वरवंट्याने रगडूनी जोराने

अर्पिण्यास तव केले सिद्ध सोमरसा भक्तीने

त्या स्वीकारी देवेंद्रा मोदाने प्रसन्नतेने ||१||

यत्र॒ द्वावि॑व ज॒घना॑धिषव॒ण्या कृ॒ता ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ २ ॥

जघनद्वयासम संनिध असती पाषाणाच्या तळी

सोमरसाला निर्मियले आम्ही त्यातुनी उखळी

उत्सुक होऊनिया शचिनाथा सोमरसा स्वीकारी

शिरावरी अमुच्या देवेंद्रा कृपाछत्र तू धरी ||२||

यत्र॒ नार्य॑पच्य॒वमु॑पच्य॒वं च॒ शिक्ष॑ते ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ३ ॥

 पुढे नि मागे हलवूनिया करा घुसळणे शिक्षा

नारीला मिळते या योगे कौशल्याची दीक्षा

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनि त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||३||

यत्र॒ मन्थां॑ विब॒ध्नते॑ र॒श्मीन्यमि॑त॒वा इ॑व ।
उ॒लूख॑लसुताना॒मवेद्वि॑न्द्र जल्गुलः ॥ ४ ॥

 कासऱ्यांनी बांधीयले रविला बंधन घालाया

सोमवल्लीला घुसळून उखळी सोमरसा काढाया

उखळातुनिया प्राप्त होतसे पवित्र सोमरस

स्वीकारुनी त्या देवेंद्रा हे धन्य करी आम्हास ||४||

यच्चि॒द्धि त्वं गृ॒हेगृ॑ह॒ उलू॑खलक यु॒ज्यसे॑ ।
इ॒ह द्यु॒मत्त॑मं वद॒ जय॑तामिव दुन्दु॒भिः ॥ ५ ॥

 सोमरसाच्या निर्मितीस्तव वापर तव उखळा

घरोघरी घुसळती सोमवल्ली तुझ्यात उखळा

करी गर्जना विजयदुंदुभीसम रे तू उखळा

सोमरसा तू देशी आम्हा गर्व तुझा उखळा ||५||

उ॒त स्म॑ ते वनस्पते॒ वातो॒ वि वा॒त्यग्र॒मित् ।
अथो॒ इंद्रा॑य॒ पात॑वे सु॒नु सोम॑मुलूखल ॥ ६ ॥

 मरूत शीतल मंद वाहतो येथे वनस्पते

देई आम्हाला विपूल उत्तमशा सोमरसाते

सोमपान होईल तयाने देवराज इंद्राचे

प्रसन्न होउनिया कल्याण करील तो अमुचे ||६||

आ॒य॒जी वा॑ज॒सात॑मा॒ ता ह्यु१च्चा वि॑जर्भृ॒तः ।
हरी॑ इ॒वान्धां॑सि॒ बप्स॑ता ॥ ७ ॥

 चर्वण करताना गवताचे अश्व करीती ध्वनी

रव करती ही उभय साधने सकलांच्या कानी

तया कारणे आम्हा होतो सामर्थ्याचा लाभ

यज्ञामध्ये त्यांचा आहे अतीव श्रेष्ठ आब ||७||

ता नो॑ अ॒द्य व॑नस्पती ऋ॒ष्वावृ॒ष्वेभिः॑ सो॒तृभिः॑ ।
इंद्रा॑य॒ मधु॑मत्सुतम् ॥ ८ ॥

काष्ठांच्या हे साधनद्वयी श्रेष्ठ तुम्ही हो किती

ऋत्विज कौशल्याने  करिती सोमाची निर्मिती

मधूर सोमरसाला अर्पू बलशाली  इंद्राला

प्रसन्न व्हावे त्याने आम्हा प्रसाद द्यायला ||८||

उच्छि॒ष्टं च॒म्वोर्भर॒ सोमं॑ प॒वित्र॒ आ सृ॑ज ।
नि धे॑हि॒ गोरधि॑ त्व॒चि ॥ ९ ॥

 भूमीवरती सांडियलेला भरा हो सोमरस

त्यासी भरुनीया ठेवावे सज्ज दोन चमस

पवित्र दर्भातुनिया घेई त्यासी गाळून

चर्मावरती वृषभाच्या देई त्या ठेवून ||९||

(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.) 

https://youtu.be/p79BQ7tsfg4

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 28

Rugved Mandal 1 Sukta 28

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-2— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-2 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

(महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.) इथून पुढे —

पुढच्या महिन्यात, नेहमीप्रमाणे गुरबचन सिंग युनिटमध्ये आला. रेशन व दारूचा कोटा घेतल्यानंतर तो माझ्याकडे आला तेंव्हा, EME सेंटरकडून समजलेल्या माहितीसंबंधी मी त्याला सांगितले. प्रथम त्याने साफ कानावर हात ठेवले. खरा ‘भगोडा’ तो स्वतः नसून, त्याचा जुळा भाऊ असल्याचा बनावही त्याने केला.

गुरबचन सिंगचे बोलणे ऐकल्यानंतर, आमच्या रेजिमेंटचे सुभेदार मेजर आणि हवालदार मेजर त्याला घेऊन काही काळ ऑफिसबाहेर गेले. त्या दोघांनी त्याला खास ‘मिलिटरी खाक्या’चा एक डोस दिला असणार. थोड्याच वेळात माझ्या ऑफिसात येऊन गुरबचन सिंगने, तो स्वतःच ‘भगोडा’ असल्याची कबुली दिली. 

लगेच, मेजर महंती यांनी माझ्यासह बसून, गुरबचन सिंगची चौकशी सुरु केली. त्याची इत्थंभूत कहाणी ऐकायला, आम्हा दोघांव्यतिरिक्त, CO साहेब व इतर अधिकारीही हजर होते. 

त्याने दिलेल्या जबानीप्रमाणे, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी अचानक चिनी हल्ला येताच, आपल्या सैन्याच्या सर्व तुकड्या इतस्ततः पांगल्या. ज्याने-त्याने आपापल्यापुरते पाहावे अशी स्थिती होती. तश्या विचित्र परिस्थितीत, गुरबचन सिंग कसाबसा जीव वाचवून, प्रथम भूतानमध्ये पळाला आणि नंतर कलकत्त्यात पोहोचला. खोटे नाव धारण करून त्याने एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये नोकरी केली. 

आधी ट्रकचा क्लीनर, आणि नंतर ड्रायव्हर म्हणून, १९६३ ते १९६७ या काळात त्याने कलकत्ता-मुंबई मार्गावर अनेक फेऱ्या केल्या. अश्याच एका फेरीत, तो जमशेदपूर येथे थांबलेला असताना, त्याच्या एका मित्राने, टेल्कोमध्ये त्याची वर्णी लावून दिली.

अत्यंत निष्ठेने आणि उत्तम काम करीत असल्याने १९६८ पासून तो तेथेच नोकरीवर टिकला होता. मात्र, पाच वर्षांनंतर त्याच्या सर्व्हिस बुकाची पडताळणी करणे आवश्यक झाल्याने तो माझ्यापर्यंत पोहोचला होता.  

ही संपूर्ण कहाणी ऐकून, निवृत्त कर्नल ब्रार आणि टेल्कोचे इतर सर्व वरिष्ठ अधिकारी अक्षरशः स्तिमित झाले.   

गुरबचन सिंगला आर्मीच्या पद्धतीप्रमाणे रीतसर अटक झाली आणि EME सेंटरमधून आलेल्या आरक्षी दलासोबत त्याची त्रिमुलगेरीला रवानगी झाली. तेथे आर्मी कोर्टासमोर चाललेल्या खटल्यात त्याला १८ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेल्याचे समजले. 

इकडे माझ्या कानात मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवली. गुरबचन सिंग ‘भगोडा’ असल्याची वस्तुस्थिती प्रथमतः मीच उघडकीला आणली होती. त्यामुळे, एखाद्या हस्तकाकरवी, अथवा तुरुंगातून सुटल्यावर स्वतःच, गुरबचन सिंग माझ्यावर निश्चित सूड उगवणार हे भाकीत अनेकांनी वर्तवले. 

मी जेमतेम २३ वर्षांचा आणि अननुभवी अधिकारी होतो. मला भीती वाटणे स्वाभाविक होते. अविचाराने, आणि निष्कारणच आपण या फंदात पडलो असेही मला वाटू लागले. शेवटी, ‘जे जे होईल ते ते पाहावे’ असे स्वतःशी म्हणून, मी ते सर्व विचार बाजूला सारले. 

या घटनेपाठोपाठ आमच्या CO साहेबांनी, म्हणजेच लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंनी, गुरबचन सिंग ज्यांचा ड्रायव्हर होता त्या कर्नल ब्रार यांना विनंती करून, त्यांच्यापाशी काही मागण्या केल्या. पहिली मागणी अशी की, शिक्षा संपताच गुरबचन सिंगला पुन्हा टेल्कोमध्ये कामावर रुजू करून घेतले जावे. दुसरे असे की, गुरबचन सिंगची पत्नी आणि मुलांना सध्या टेल्कोच्या आवारातील घरातच राहू द्यावे, त्याच्या मुलांना टेल्कोच्या शाळेतच शिकू द्यावे, आणि टेल्कोतर्फे त्यांना घरखर्चासाठी दरमहा थोडासा भत्ताही दिला जावा. 

CO साहेबांच्या विनंतीला मान देऊन, कर्नल ब्रार यांनी, या सर्व गोष्टी अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला. टेल्कोच्या वाहन परीक्षण विभागाचे प्रमुख, निवृत्त मेजर डी. एन. अगरवाल यांचीही या कामी अतिशय मोलाची मदत झाली. मुख्य म्हणजे, चीन युद्धामुळे उद्भवलेल्या विचित्र परिस्थितीचा बळी झालेल्या एक माजी सैनिकाचा, सहानुभूतीपूर्वक विचार केला गेला! एखाद्या कर्मचाऱ्याचे हित जपण्याचे टाटा समूहाचे धोरण आणि एकंदर उदार मनोवृत्ती, याचे हे द्योतकच मानले पाहिजे! 

त्याउपर, CO साहेबांनी आम्हाला आदेश दिला की, गुरबचन सिंगच्या परिवाराला दरमहा रेशन आणि जीवनावश्यक वस्तू आमच्या रेजिमेंटच्या कॅन्टीनमधून घरपोच दिल्या जाव्यात. अर्थातच, CO साहेबांच्या या आदेशाची कसून अंमलबजावणी करण्यात मी कमी पडलो नाही. 

या घटनेनंतर लगेच, म्हणजे ऑक्टोबर १९७३ मध्ये लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धेंची आमच्या युनिटमधून दुसरीकडे बदली झाली. पण, त्यांच्या जागी आलेल्या, लेफ्ट. कर्नल एस. के. अब्रोल या नवीन CO साहेबांनीही या आदेशात काडीचाही बदल केला नाही. ज्या पद्धतीने आम्ही हे संपूर्ण प्रकरण हाताळले त्याबद्दल टेल्को आणि टिस्कोच्या अधिकाऱ्यांनीही आमचे वारेमाप कौतुक केले. 

१९७४-७५ मध्ये केंव्हातरी, सक्तमजुरीची शिक्षा भोगून गुरबचन सिंग जमशेदपूरला परतला. मी अजूनही आमच्या युनिटचा Adjutant  होतो, आणि अविवाहित असल्याने ऑफिसर्स मेसमधील एका खोलीत राहत होतो. 

गुरबचन सिंग परतल्याची आणि तो लगोलग मला भेटायला येत असल्याची खबर, निवृत्त कर्नल ब्रार यांच्याकडून समजताच मी तयारीला लागलो. गुरबचन सिंग व त्याच्या पत्नीसाठी चहा-नाश्ता आणि मुलांसाठी चॉकलेट मागवून मी एक छोटेखानी मेजवानीच आयोजित केली. आल्या-आल्या गुरबचन सिंग अक्षरशः माझ्या पायावर कोसळला आणि मनसोक्त रडला. मलाही माझ्या भावना काबूत ठेवणे अवघड झाले. 

या सर्व प्रकरणात, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे आणि टाटा समूहाचे कर्नल ब्रार व मेजर अगरवाल यांच्याकडून मी नकळतच एक मोलाचा धडा शिकलो. कायदा व नियमांच्या चौकटीत राहूनच, पण सहानुभूति आणि माणुसकी न विसरता आपण काम केले, तर अक्षरशः जादूची कांडी फिरल्यागत अकल्पित परिणाम साधता येतो.    

गुरबचन सिंगने कर्नल सहस्रबुद्धेंचे आणि माझे शतशः आभार मानले. त्याने मला प्रांजळपणाने सांगितले की, त्याला पकडून देण्यास जरी मी जबाबदार होतो तरीही, ११ वर्षे त्याच्या मनात डाचत असलेल्या अपराधी भावनेचा निचरा होण्यासाठीही मीच कारणीभूत झालो होतो. त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद झळकत होता. मुख्य म्हणजे, शिक्षा भोगून दोषमुक्त झाल्यावर, तो आता स्वच्छंदपणे आपले आयुष्य जगू शकणार होता ! 

– समाप्त – 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एका ‘भगोड्या’ ची गोष्ट – भाग-1— मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

श्री मेघ:श्याम सोनावणे

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆  एका ‘भगोड्या’ ची गोष्ट –  भाग-1 — मूळ इंग्लिश – ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त) – मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆

१९७१ च्या युद्धात कामगिरी बजावल्यानंतरही आम्ही बराच काळ पाकिस्तान सीमेवरच तैनात राहिलो होतो. आमचे तोफखाना दळाचे चौदावे फील्ड रेजिमेंट, जून १९७३ मध्ये जमशेदपूरला आले. Adjutant या पदावर मी अजून नवखा होतो. अत्यंत ‘कडक’ अशी ख्याती असलेले लेफ्टनंट कर्नल रामचंद्र परशुराम सहस्रबुद्धे हे आमचे कमांडिंग ऑफिसर (CO) होते. 

जमशेदपूरच्या टेल्को कंपनीमध्ये कामाला असलेला एक माजी सैनिक, गुरबचन सिंग, एके दिवशी सकाळी मला भेटायला आला. तसा तो आमच्या युनिटमध्ये वरचेवर येत असे. माजी सैनिक असल्याने, रेशन, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि दारूच्या बाटल्या आर्मी कॅन्टीनमधून विकत घेण्याचा हक्क त्याला होता. त्याकरिता आवश्यक ती कागदपत्रेही त्याच्याकडे होती. टेल्कोच्या सर्व माजी सैनिकांच्या वतीने त्यांचा कोटाही तोच घेऊन जात असे. 

पंजाब रेजिमेंटचे, कर्नल ब्रार नावाचे एक सेवानिवृत्त अधिकारी टेल्कोच्या प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे जनरल मॅनेजर होते. गुरबचन सिंग हा त्यांचा ड्रायव्हर होता. टेल्को व टिस्कोच्या इतरही महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मोटारीही तो क्वचित चालवीत असे. अर्थातच, एक निष्णात ड्रायव्हर असल्याने, टेल्को (टाटा मोटर्स) आणि टिस्को (टाटा स्टील) अश्या मातबर कंपन्यांसाठी तो एक मोलाचा कर्मचारी होता.  

आमच्या युनिटसोबत संलग्न असलेल्या, ‘इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनियर्स’ (EME) या विभागाच्या सर्व सैनिकांशी गुरबचन सिंगचा परिचय होता. तसेच, आमच्या रेजिमेंटचे नायब सुभेदार/सुभेदार पदावरील ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (JCO), आणि नाईक/हवालदार पदावरचे नॉन कमिशन्ड ऑफिसर (NCO), हे सगळेच त्याला ओळखत होते. 

एरवी त्याचा संबंध मुख्यतः आमच्या युनिटच्या क्वार्टर मास्टर (QM) सोबतच येत असल्याने, मी त्याला पूर्वी कधी पाहिलेले नव्हते. त्या दिवशी मात्र आमच्या QM ने गुरबचन सिंगला माझ्याकडे पाठवले, कारण त्याचे सर्व्हिस बुक एखाद्या सेनाधिकाऱ्याकडून सत्यापित करून घेणे आवश्यक झाले होते. 

गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे, आणि त्यालाही सोबत घेऊन आमचे हेडक्लार्क माझ्याकडे आले. माझ्या नावाचा व आमच्या युनिटचा शिक्का त्या कागदांवर छापणे आणि मी सही करणे, असे एखाद्या मिनिटात होण्यासारखे काम असल्याने, सर्व सज्जता करूनच हेडक्लार्क माझ्याकडे आले होते. परंतु, निव्वळ ‘सह्याजीराव’ बनून काम करणे मला मान्य नव्हते. 

मी गुरबचन सिंगच्या आर्मी सर्व्हिससंबंधी सखोल चौकशी केली. त्याने सांगितले की, तो पूर्वी EME मध्ये व्हेईकल मेकॅनिक (VM) होता. खात्री करून घेण्यासाठी, आमच्या लाईट रिपेअर वर्कशॉप (LRW) मधल्या VM ला बोलावून मी विचारले असता, त्यानेही मला सांगितले की प्रशिक्षणकाळात गुरबचन सिंग त्याचा बॅचमेट होता. 

ही सर्व चौकशी चालू असतानाच अचानक, CO साहेबांनी माझ्यासाठी बझर वाजवल्याने मला तातडीने त्यांच्याकडे जावे लागले.  

CO साहेबांच्या ऑफिसमधून परतल्यावर माझ्या मनात नेमके काय आले देव जाणे, पण मी गुरबचन सिंगच्या कागदांवर सही करण्यास नकार दिला. आमच्या युनिटचे सुभेदार मेजर आणि हेडक्लार्क हे दोघेही माझ्या निर्णयामुळे थोडेसे नाराज दिसले.

त्यानंतर मी हेडक्लार्कना आदेश दिला की, सिकंदराबादजवळील त्रिमुलगेरी येथे असलेल्या EME सेंटरमध्ये, गुरबचन सिंगची सर्व कागदपत्रे पाठवून, त्यांची खातरजमा करून घेण्यात यावी. हे ऐकल्यानंतर मात्र, माझे डोके चांगलेच फिरले आहे, याबद्दल बहुदा आमच्या हेडक्लार्कची खात्रीच पटली असणार! प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव जरी माझ्या गाठीशी असला तरीही, दैनंदिन कार्यालयीन कामात तसा मी नवखाच होतो. त्यामुळे, हे खबरदारीचे पाऊल उचलणे मला आवश्यक वाटले होते. 

“Adjutant साहेब सध्या व्यस्त आहेत पण यथावकाश तुझे काम होईल” असे काहीतरी गुरबचन सिंगला तात्पुरते सांगून हेडक्लार्कनी वेळ मारून नेली असावी. 

आमच्या युनिटकडून गेलेल्या पत्राला आठवड्याभरातच EME सेंटरमधून तारेने उत्तर आले. त्यामध्ये लिहिले होते, “चीन सीमेवरील धोला-थागला जवळील चौकीवर तैनात असताना, २१ ऑक्टोबर १९६२ रोजी, चिनी हल्ला होताच, गुरबचन सिंग हा शिपाई शत्रूसमोरून पळून गेला होता. नंतर त्याचा काहीच ठावठिकाणा न समजल्याने, त्याला ‘बेपत्ता किंवा मृत’ घोषित केले गेले होते. आता तुम्हाला तो जिवंत सापडलेला असल्याने, त्याला त्वरित ताब्यात घेऊन आम्हाला कळवावे. आम्ही आरक्षी दल पाठवून त्याला आमच्या ताब्यात घेऊ.”

सोप्या शब्दात सांगायचे तर, आर्मीच्या कायद्यानुसार तो एक पळपुटा किंवा ‘भगोडा’ शिपाई होता! आता त्याची रीतसर चौकशी होऊन त्याच्यावर यथोचित कायदेशीर कारवाई केली जाणार होती!

ती तार वाचून युनिटमधील आम्हा सर्वच अधिकाऱ्यांना धक्का बसला. आमचे CO, लेफ्ट. कर्नल सहस्रबुद्धे तर माझ्यावरच भडकले. त्यांना न विचारता, न सांगता, मी अश्या प्रकारचे पाऊल का आणि कसे उचलले याबद्दल CO साहेबांनी मला जाब विचारला. 

“सर, EME सेंटरकडे चौकशी करण्याची सणक सहजच माझ्या डोक्यात आली. तोपर्यंत तुम्ही ऑफिसमधून निघूनही गेला होतात. परंतु, तुम्ही दिलेली शिकवण माझ्या चांगली लक्षात होती की, ‘कोणत्याही कागदावर डोळे झाकून सही करू नये’.” 

माझे उत्तर CO साहेबांना नक्कीच आवडले असावे. कारण ते एकदम शांत झाले आणि त्यांनी आमच्या युनिटचे 2IC, मेजर कृष्णा आणि बॅटरी कमांडर, मेजर (पुढे निवृत्त मेजर जनरल) महंती या दोघांनाही बोलावून घेतले. आम्हा सर्वांच्या विचार-विनिमयानंतर, एकमताने असे ठरले की, आम्हाला मिळालेल्या माहितीबद्दल टेल्कोच्या अधिकाऱ्यांना, अगदी निवृत्त कर्नल ब्रार यांनाही, सध्या काहीच कळवायचे नाही. महिन्याभराने सामान घेण्यासाठी गुरबचन सिंग पुन्हा येईल त्यावेळी सापळा लावून त्याला पकडण्याचे आम्ही ठरवले.  

– क्रमशः भाग पहिला 

मूळ इंग्रजी अनुभवलेखन : ब्रिगेडियर अजित आपटे (सेवानिवृत्त)

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 9422870294

प्रस्तुती : मेघ:श्याम सोनावणे . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ एक कोयता गँग – अशीही… ☆ श्री मकरंद पिंपुटकर

बंड्या काळे त्याच्या मित्राकडे – क्राईम रिपोर्टर रजत सरदेसाईकडे आला होता. रजतच्या टेबलावर त्याने लिहिलेल्या एका लेखाचा मसूदा पडला होता – शीर्षक होतं – “आणखी एक कोयता गँग !”.

 “आता ही कुठली बाबा कोयता गँग ? पुणे परिसरातील वेगवेगळ्या कोयता गँगबद्दल तू स्वत:च तर गेले सहा महिने लिहीत आहेस की.” 

“बंडोपंत, हा लेख हातात कोयते घेऊन वार करणाऱ्या गुंडांबद्दल नाहीये. हा लेख सिकल सेल ॲनिमिया या रोगाबद्दल आहे – थॅलेसेमियाबद्दल. सिकल म्हणजे कोयता. जशी कोयता गँग धोकादायक आहे तसेच हा रोगही तसाच आणि तितकाच धोकादायक आहे हे सांगण्यासाठीचा हा प्रपंच.” रजत निरगाठ उकल तंत्राने समजावून सांगत होता.

 “ॲनिमिया ? पण तो तर रक्तातील हिमो का काहीतरी कमी झाल्याने होतो ना ?”

“हिमोग्लोबिन.”

 “हां, तेच ते.”

 “पण मग त्याचा कोयत्याशी काय संबंध ?” बंड्या पूर्णपणे out of depth होता.

 “तुला हिमोग्लोबिन म्हणजे काय ते ठाऊक आहे का ? रेड ब्लड सेल्स ?”

 बंड्याचा चेहरा कोराच आहे हे पाहून रजतने समजावण्यास सुरुवात केली. — “रक्तात रेड ब्लड सेल्स असतात. यांचा नॉर्मल आकार मेदुवड्यासारखा असतो. त्यात हिमोग्लोबिन प्रोटीन असतात. ही प्रोटीन्स फुफ्फुसांमधून आलेला ऑक्सिजन शरीरात सर्वत्र पोचवतात आणि तयार झालेला कार्बन डाय ऑक्साईड गोळा करून फुफ्फुसांपर्यंत पोचवतात.”

बंड्याला फारसा काही अर्थबोध झालेला दिसत नव्हते. 

“थोडक्यात सांगायचं तर हिमोग्लोबिनशिवाय ना प्रत्येक अवयवाला ऑक्सिजन मिळेल, ना प्रत्येक अवयवातून कार्बन डाय ऑक्साईड गोळा केला जाईल.”

 “पण मग यात कोयता कुठे आला ?” बंड्याचा हैराण प्रश्न.

“काही अनुवांशिक बदलांमुळे या मेदुवड्यासारख्या असणाऱ्या रेड ब्लड सेल्स कोयत्यासारख्या (sickle) किंवा चंद्रकोरीसारख्या (crescent moon) होतात. त्यांचे ऑक्सिजन व कार्बन डाय ऑक्साईड वहनाचे काम ते करू शकत नाहीत, शिवाय टोकेरी आकारामुळे रक्तवाहिन्यांना इजा होते ती वेगळीच. ऑक्सिजन न मिळाल्याने अशा पेशंटसना धाप लागते, गुदमरल्यासारखं होतं, सतत अशक्तपणा राहू शकतो.”

 “अरे बाप रे, असं लफडं आहे होय ?” लेखाची पानं चाळता चाळता बंडू म्हणाला. “पण हा रोग होतो कशाने ? चौरस आहार न घेतल्याने, अस्वच्छतेमुळे का संसर्गाने ?”  

 “नाही. यापैकी कशानेच हा रोग होत नाही. हा रोग आई वडिलांतील अनुवंशीय (genetic) बदलांमुळे होतो. ज्यांना थॅलेसेमिया झाला आहे अथवा जे थॅलेसेमियाचे वाहक (carrier) आहेत अशा आईवडिलांच्या मुलांना थॅलेसेमिया होण्याची शक्यता खूप जास्त असते. सिंधी, लोहाणा आणि पंजाबी समाजांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे लग्नापूर्वी कुंडली, पत्रिका जुळवून बघण्यापेक्षा आपण थॅलेसेमियाच्या दृष्टीने कोणत्या गटात – थॅलेसेमिया मुक्त, वाहक का रोगी – कोणत्या गटात मोडतो ते तपासून बघण्याचा आग्रह धरला गेला पाहिजे. आपण थॅलेसेमियाचे रोगी वा वाहक असलो तर दुसऱ्या थॅलेसेमिया रोगी वा वाहकाशी लग्नच करू नये अथवा केलेच तर मुलं होण्याचा चान्स न घेतलेलाच बरा.  डॉ. राणी बंग आणि डॉ. अभय बंग हे गोंड समाजामध्ये कार्यरत आहेत. या समाजात ‘एक देव’, ‘दोन देव’ अशा उपजाती आहेत आणि वर वधू दोघंही एकाच उपजातीचे असलेले त्यांना चालत नाही. या समाजातही थॅलेसेमियाचे प्रमाण जास्त आहे. म्हणून मग डॉ. बंग यांनी त्यांच्या धार्मिक भावनांचा आधार घेत त्यांना सांगितलं, की आता समाजात आणखी एक नवी उप-जात आली आहे – सिकल देव. ही उप-जात रक्त तपासणीतून ओळखता येते, आणि नवरा बायको दोघेही ‘सिकल देव’ उप-जातीचे असले तर तेही चालत नाही.”

 “व्वा ! त्या बिचाऱ्यांना हे वाहक, रोगी प्रकरण कळणार नाही. पण त्यांच्या धार्मिक श्रद्धांना जोडल्याने हे काम सोप्पं होऊन गेलं,” बंड्याला हे पटलं…..  “पण मग या रोगावर उपाय काय ? हा रोग कशाने बरा होतो ?” 

 “आजच्या घडीला तरी हा रोग पूर्णपणे बरा कधीच होत नाही. Prevention is better than cure हे इथं अगदी चपखलपणे लागू पडतं. बाळ आईच्या गर्भात असताना नाळ किंवा गर्भजलाची तपासणी करून बाळाला थॅलेसेमिया आहे का नाही हे सुनिश्चित करता येते. दुर्दैवाने जर बाळाला थॅलेसेमिया झालाच तर या रोगाच्या तीव्रतेनुसार विविध उपाययोजना करता येतात. चौरस आहार व व्हिटॅमिन यांनी पेशंटची प्रकृती चांगली रहाण्यास मदत होते. नियमितपणे हात धुणे, संसर्ग टाळणे यानेही पेशंटची आजारी पडण्याची वारंवारिता frequency कमी करता येते. अनेकदा गरजेनुसार महिन्यातून एकदा पेशंटला चांगले रक्त देणे – blood transfusion – हा उपाय प्रामुख्याने केला जातो. पूर्वी रक्तदात्याच्या आरोग्याबद्दल ठोस माहिती नसायची. व दात्याकडून मिळालेल्या रक्तामुळे कावीळ, HIV असे रोग पेशंटला होण्याची भीती असायची. पण आता मिळणाऱ्या रक्ताची सखोल परीक्षा होते, व हे रक्त निर्धोक आहे याची खात्री पटल्यानंतरच ते पेशंटला दिले जाते, त्यामुळे हा धोका आता मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच, रक्त स्वीकारतानाच्या सुया व अन्य वैद्यकीय अवजारे आता one time use असतात किंवा व्यवस्थित निर्जंतुक केली असतात, त्यामुळे त्यातून अन्य संसर्गाचे वा रोगाचे संक्रमण होण्याची शक्यता आता खूप कमी झाली आहे. (करोना काळात मात्र या पेशंटना रक्त मिळवण्यास खूप अडचणी आल्या.)

 सारखे रक्त स्वीकारल्याने पेशंटच्या रक्तातील लोहाचे प्रमाण धोकादायकरीत्या वाढू शकते. त्यामुळे हे प्रमाण कमी करणारी औषधे पेशंटला घ्यावी लागतात. सुदृढ बाळाच्या नाळेतील पेशी वापरणे (stem cell therapy), bone marrow transplant असेही उपचार केले जातात. आयुर्वेद, होमिओपथी यांच्याही काही औषध पद्धती आहेत, परंतु आजच्या घडीला तरी, या जनुकीय आजारावर (genetic disease) १००% खात्रीलायक, १००% परिणामकारक उपाय नाही. 

 पाच दहा वर्षांपूर्वी, या रोगाची प्राणघातकता खूप भयावह होती. आजच्या घडीला हा इतका जीवघेणा रोग नाही, परंतु पेशंटला जपावे खूप लागते. जसं कोयता गँग बाबतीत वेळीच आणि नियमित सावधगिरी घेणं गरजेचं आहे, तसंच या रोगाचं आहे, आणि म्हणूनच या अशा सिकल सेल ॲनेमियाच्या कोयता गँगपासून सावध राहिलं पाहिजे,” रजतने सांगितले आणि तो समेवर आला. 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची…… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ गोष्ट यूझर मॅन्युअलची… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

अखेर तो धावपळीचा, उत्साहाचा दिवस उजाडतो. हातात असलेल्या कॅमेराची बॅग सांभाळत मी त्या स्टुडिओवजा रूममध्ये जाते. तिथे जणू सिनची तयारी सुरू असते. दिग्दर्शक आणि कथा लेखक त्या सीन लावणाऱ्यांना भरपूर सूचना करत असतात. त्यात बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ठाकठूकचा आवाज, मध्येच कुठे पडदा जोराने झटकल्याचा, जोरात टेबल सरकवल्याचा आवाज हे वातावरण निर्मितीत मोलाची भर घालत असतात. या सगळ्या तालामध्ये मीही अगदी एकतानतेनं कॅमेराची बॅग उघडून तो सेट करायला लागते.

वर्षातून किमान तीन-चारदा तरी हे काम करावे लागत असल्याने सगळ्यांचे हात सरावलेले असतात. नजरसुद्धा हळूहळू सरावायला लागलेली असते. तर कॅमेराचा स्टॅन्ड, त्याची योग्य पोझिशन, त्याची निरनिराळी सेटिंग्ज इकडे माझं लक्ष केंद्रित झालेलं असतं. आणि मग एकदा मनासारखं सेटिंग झाल्यावर हळुवार हाताने त्या कुशनमधून अलगद कॅमेरा बाहेर काढला जातो. आणि मग स्टॅन्डवर त्याला स्थानापन्न करण्याचा सोहळा सुरू होतो. कॅमेरा जणू त्या दिवशी राजाच्या थाटात असतो. त्याचा रुबाब काय वर्णावा… खरंतर तो ही एक अप्रत्यक्ष दिग्दर्शकच आहे की आजचा. म्हणून त्याचाही मूड सांभाळावा लागतो. जरासा सुद्धा सेटिंग्ज मधला ढिलेपणा त्याला चालत नाही. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष एकदा माझ्याकडे आणि एकदा कॅमेराकडे लागलेलं असतं. कारण सीन मधला कॅमेरा सेट करणं हा आमच्यासाठी शेवटचा पण महत्त्वाचा भाग असतो.

सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आणि आम्हा दोघांच्या म्हणजे मी आणि कॅमेराच्या दृष्टिकोनातून ‘परफेक्ट व्ह्यू’ सेट झाला की मी जरा रिलॅक्स होते. आणि मग आपोआपच माझी नजर विंगेतून जणू लपूनछपून पाहणाऱ्या आजच्या विशेष कलाकारांकडे म्हणजेच पॅकिंगमधून हळूच वर डोकावणाऱ्या प्रॉडक्ट्सकडे जाते. दृष्ट लागण्यासारखं रुपडं असतं त्यांचं आज ! तुकतुकीत अंगकांती असलेल्या आणि आपल्या काळ्याकरड्या पोशाखात उठून दिसणाऱ्या या प्रॉंडक्टसवर आज विशेष पॉलिश्ड झळाळी असते. त्यांचा नवथरपणा जाणवत असतो.

आता प्रमुख दिग्दर्शक सगळी सूत्रं आपल्या हातात घेतो. त्यातल्या एकेका प्रॉंडक्टला हळूहळू त्याच्या त्याच्या नियोजित जागेवर सेट केलं जातं. ते करताना प्रत्येकाची एनर्जी लेवल चेक केली जाते. सगळी फंक्शन्स व्यवस्थित होतायत ना, जर त्या प्रॉंडक्टला अटॅचमेंट असतील तर त्यांचा शार्पनेस व्यवस्थित आहे ना. वगैरे वगैरे…… 

….. आणि मग ऑल ओके आहे हे सगळ्यांच्याच नजरेतून चेक केलं जातं. मग लाईटचा फोकस्ड अभिनय सुरू होतो. कधी मंद, कधी तीव्र, कधी वरून, कधी खालून आणि मग प्रत्येक सीननुसार योग्य असणारं त्याचं सेटिंग ठरवलं जातं. ते करताना रिफ्लेक्शन तर पडत नाहीये ना, शॅडो ओव्हरलॅप होतं नाहीयेना हे कळीचे मुद्दे विचारात घेतले जातात. आणि मग सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली की अॅक्शन असं म्हणून फायनल कामाला म्हणजेच फोटोग्राफीला सुरुवात होते. जिच्यासाठी हा सगळा जामानिमा झालेला असतो आणि जी सलग काही तास चालते.

तर मंडळी, एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की हे काही सिनेमा-नाटक इ.बाबतच वर्णन नाहीये… पण दिग्दर्शक, सिन, कथानक, कॅमेरा, स्टुडिओ हे शब्द तर आलेत. मग नक्की आहे तरी काय हे….. 

… तर मंडळी, ही आहे एका प्रोडक्टच्या यूझर मॅन्युअलच्या, म्हणजेच इन्स्ट्रक्शन मॅन्युअलच्या निर्मितीची तयारी… आपण एखादी छोटीशी वस्तू किंवा मशीन विकत घेतलं की त्याच्यासोबतच एक छोटीशी पुस्तिका आपल्याला मोफत मिळते. जर ती वस्तू महागाची असेल आणि वापरण्यासाठी आपल्याला सवयीची नसेल तर आपण ती उघडून बघतो. त्यात काही चित्रं दिलेली असतात. काही सूचना दिलेल्या असतात‌, त्या वाचतो आणि त्याप्रमाणे आपण ती वस्तू वापरायला सुरुवात करतो.  त्यात काही बिघाड झाले असतील तर काय करायचं, वस्तू वापरून झाल्यावर कशी ठेवायची, कुठे ठेवायची, वापरण्यासाठीसुद्धा ती कशा ठिकाणी ठेवली गेली पाहिजे, काय क्रमाने ती इन्स्टॉल (रचली) केली गेली पाहिजे. अशा अनेक गोष्टी त्यात सांगितलेल्या असतात. आपल्यासाठी तर या गोष्टी खिजगणतीतही नसतात.

पण हीच प्रॉडक्ट्स जेव्हा महत्त्वाच्या कामासाठी वापरली जाणार असतात, उदाहरणार्थ मेडिकल सर्जरी… तेव्हा त्यांच्या निर्मितीनंतर त्यांच्या वापरण्याबाबत काटेकोरपणे सूचना द्याव्या लागतात. आणि वापरणारे त्या पाळतातही.  म्हणूनच गरज असते निर्दोष आणि अचूक अशा युझर मॅन्युअलची. ही युझर मॅन्युअल्स उत्कृष्ट असणं हे देखील त्या प्रॉडक्ट्सचं एक वैशिष्ट्य असतं जे त्याला उत्कृष्ट निर्मितीचा दर्जा देण्यामध्ये सहाय्यभूत ठरतं.  अशी ही यूझर मॅन्युअल्स तयार करण्याचं काम  ग्राफिक डिझायनर म्हणून काही वर्षांपूर्वी मी अनेकदा केलं आहे. पण हे सगळं आज सांगण्याचं प्रयोजन काय… तर २७ एप्रिल हा आहे ‘वर्ल्ड ग्राफिक्स डे’!

आणि वर वर्णिलेल्या फोटोग्राफीपासून पुढे त्याचं युझर मॅन्युअलमध्ये रूपांतर होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं ठरणारं काम म्हणजे ग्राफिक्स डिझाईन. याच्यासाठी ग्राफिक्स डिझायनर आपलं कौशल्य पणाला लावतो. तो या सगळ्या फोटोंवरून काही ठराविक फोटो निवडून क्रमवार पद्धतीने एक कथा तयार करतो जी दिग्दर्शकांच्या कथेशी मिळतीजुळती असते. त्यावरून वेगवेगळ्या ग्राफिक डिझाईनच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने या सगळ्या फोटोंचं ग्राफिक्समध्ये रूपांतर करतो‌. आणि मग त्यात तज्ज्ञ व्यक्तींच्या योग्य सूचना, तसंच ते बनवणारे कुशल इंजिनियर्स यांच्याकडील माहिती एकत्रित करून पुढे एडिटिंग, प्रूफ रीडिंग इ. आणखीन बऱ्याच प्रक्रिया होऊन हे युझर मॅन्युअल / इन्स्ट्रक्शन मॅन्युअल तयार होतं‌. ज्याच्याकडे काही अपवाद वगळता जास्त गांभीर्याने पाहिलं जात नाही.

प्रत्येक इन्स्ट्रक्शन मॅन्युअल असंच केलं जातं का… माहित नाही.  ते प्रॉडक्ट्सनुसार नक्कीच बदलतं.  आता तर आणखीन सॉफ्टवेअर्सही अपडेट झाल्यामुळे याचीही पद्धत बदललेली असू शकते. पण ग्राफिक्स, त्याचे डिझाईनिंग, त्यासाठी लागणारे विचार आणि इमॅजिनेशन या गोष्टी मात्र तशाच असतील. सुंदरता, उपयुक्तता, सुलभता आणि नाविन्यता या चार गोष्टी आज आपल्या जगण्यात महत्त्वाच्या ठरल्या आहेत. आणि हे सगळं सहज साध्य होत आहे त्यात एक वाटा ग्राफिक्स डिझाईनचाही आहे, हे महत्त्वाचं ! 

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कृषिदिन निमित्त – “पोरीयातारा कृषीपुत्र वसंतराव नाईक” ☆ श्री कचरू चांभारे ☆

श्री कचरू चांभारे

? इंद्रधनुष्य ?

☆ कृषिदिन निमित्त – “पोरीयातारा कृषीपुत्र वसंतराव नाईक” ☆ श्री कचरू चांभारे ☆

(आज १ जुलै – हा दिवसकृषिदिन‘ म्हणून साजरा केला जातो, त्यानिमित्त)

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहिलेले महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. शेती टिकली तरच देश टिकेल. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, असं आग्रहपूर्वक मांडणारे वसंतराव हे कृषीनिष्ठ कृषीपुत्र होते. महाराष्ट्राचा इतिहास एक यशवंत व दोन वसंत यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. ते तिघे नव महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. नाईक साहेबांनी शेती, उद्योग, विद्युतनिर्मिती, तलाव बांधणी, विहिरी खुदाई, रस्ते बांधकाम, सिडको वसाहत निर्मिती, पंचायतराज सत्ता विकेंद्रीकरण, अशा सर्वच क्षेत्रात क्रांतीकारी काम केलेले आहे. त्यांचा कोणताही एक पैलू घेतला तरी त्यावर खूप मोठे लिहिण्यासारखे आहे.

१ जुलै १९१३ रोजी वसंतरावांचा जन्म फुलसिंग नाईक व सौ. होनुबाई मातापित्याच्या पोटी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली या छोट्या गावी झाला. गहुली हे गाव त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड (नाईक) यांनीच वसविले आहे. बंजारा समाजात नायकाला प्रतिष्ठेचे व मानाचे स्थान असते. मेहनत, जिद्द, व शिक्षण या जोरावर स्व-संस्कृती, रितीरिवाज जपूनही नागरी संस्कृतीला अंगीकारणारा बंजारा हा बहुधा एकमेव समाज असावा. संत सेवाभायांनी दिलेली शिकवण पाळली की राजयोग येतोच याचं उदाहरण म्हणजे नाईक घराणे होय. १९५२ पासून पुसद तालुक्यातील राजकारणावर नाईक घराण्याचे निर्विवाद वर्चस्व आहे. याच घरातून महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री, दोन मंत्री मिळालेले आहेत.

वसंतरावांचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण दरवर्षी वर्गासोबतच गावही बदलत झाले. प्राथमिक चौथीपर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांना रोज चार पाच किमी पायपीट करावी लागत असे. माध्यमिक शिक्षण अमरावतीला व पुढे बीए, वकीलीचे शिक्षण नागपूरला झाले. कुशाग्र बुद्धिमत्ता, संवाद चातुर्य व उच्च शिक्षण यामुळे ते अल्पावधीतच लोकप्रिय झाले. शेतक-यांचे कैवारी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या थोर नेत्याच्या सोबत वकिली शिकताना, महात्मा फुलेंच्या विचाराचे पाईक असलेल्या वसंतरावांनी देशसेवेचे धडे गिरवले. इथूनच त्यांच्या राजकारणाची पायाभरणी झाली. चाळीसच्या दशकात त्यांनी राजकारणात पदार्पण केले व पहिल्याच प्रयत्नात ते पुसद नगरपालिकेचे पहिले नगराध्यक्ष झाले. याच पुसद तालुक्याने त्यांना तब्बल पाचवेळा आमदार केले. तसेच पुढे सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांच्या रूपाने पुसद तालुका कायम नाईक घराण्याशी बिलगून राहिला. पुसद तालुका मध्यप्रांतात असताना तिथेही वसंतराव उपमंत्री राहिले.

आज देशपातळीवर नावाजलेली म. न. रे. गा. म्हणजे नाईक साहेबांनी स्थापिलेली रोजगार हमी योजना होय. या योजनेमुळे महाराष्ट्रात अनेक तलाव, विहिरी बांधून झाल्या.

१९६३ ते १९७५ हा साहेबांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ तसा कसोटीचाच होता. अन्नधान्याचे संकट व दुष्काळाचे सावट राज्यावर होतेच. शिवाय पाकिस्तानसोबतचे  युद्धही याच काळातले. कोयना भूकंपही याच काळातला. मुख्यमंत्री म्हणून निवड झाली तेव्हा दुखावलेले काही  मातब्बर आमदारही सोबतीला होतेच. वसंताला ग्रीष्म करण्यासाठी. सरकारच्या बाहेर आचार्य अत्रे, सेनापती बापट, मृणालताई गोरे, जांबुवंतराव धोटे अशी मातब्बर मंडळी सामाजिक प्रश्नावर सरकारशी लढायला होतीच. पण अंगमेहनतीने चातुर्याने वसंत असा फुलला की मुख्यमंत्री निवासाचे नावच वर्षा झाले व ते आजही कायम आहे.

साहेब स्वतः शेतकरी होते. दौ-यावर असताना ते वाटेतल्या शेतक-यांना थेट बांधावरून उतरून शेतात जाऊन मार्गदर्शन करत असत. चार कृषी विद्यापीठे, कोराडी, पारस औष्णिक वीज प्रकल्प, ही साहेबांची देण आहे. एकाचवेळी राहुरी, परभणी, अकोला, दापोली या चार कृषी विद्यापीठांची निर्मिती ही देशपातळीवरची आजपर्यंतची एकमेव घटना आहे. सर्वसामान्य लोकांना वसंतरावांचे सरकार आपले वाटत होते, म्हणूनच १९६७ साली देशात काँग्रेस विरोधी लाटेत काँग्रेसची सरकारं कोसळत असताना, महाराष्ट्रात मात्र २०२ आमदारांसह नाईकसाहेब दुस-यांदा मुख्यमंत्री झाले. व पुन्हा १९७२ साली २२२ आमदारांसह तिस-यांदा मुख्यमंत्री झाले.

१९६६ च्या पुण्यातील शनिवार वाडा सभेत ते बोलताना म्हटले होते की, “ पुरोगामी महाराष्ट्र अन्नधान्यासाठी कुणापुढे हात पसरणार नाही. दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी जाहीरपणे फासावर जाईल. ” ही घोषणा काही निवडणुकीतल्या टाळ्यांसाठी नव्हती, तर ही घोषणा म्हणजे हरितक्रांतीची नांदी होती. भूदान चळवळीत योगदान देताना नाईक साहेबांनी लोकसहकार्याने तब्बल पाच हजार एकर जमीन भूदान चळवळीस मिळवून दिली. ते स्वतः एक जमीनदार असल्यामुळे त्यांना भूदानासाठी जमीनदारांचे मन वळविणे सोपे गेले.

अखिल भारतीय स्तरावर त्यांनी भटक्या बंजारा समाजाला संघटित करुन संमेलनही घेतले होते. शिवाजीराव मोघेसारख्या तरुणाला बळ देऊन आदिवासी संघटन मजबूत केले. हरिभाऊ राठोड, मोहन राठोड, राजाराम राठोड यासारख्या नवतरूणांना झेप घ्यायला भाग पाडलं. नाईक साहेब जन्मजातीने बंजारा होते, तरी त्यांचे कार्य पुरोगामी होते. शेती उद्धारक होते. सर्व जातीतील पुढाऱ्यांना व प्रादेशिक प्रांत अस्मिता जोपासणारांना हाताळून त्यांनी महाराष्ट्राला प्रगतीचे पंख दिले.

पंडित नेहरू यांनी हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्रीला बोलाविले म्हणून यशवंतराव दिल्लीला गेले. मारोतराव कन्नमराव राज्याचे मुख्यमंत्री झाले. जनतेशी नाळ असलेले, स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आलेले मारोतराव कन्नमवार हे एक लोकप्रिय नेते होते. परंतु दुर्दैवाने अल्पकाळातच त्यांचे निधन झाले. नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी अनेक मातब्बर आमदार रांगेत होते. यशवंतरावांनी वसंतराव नाईकांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. वसंतराव नाईक हे सर्वांना सोबत घेवून चालणारे नेते होते. मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेले व नाईकांच्या मंत्रीमंडळात गृहमंत्री असलेले बाळासाहेब देसाई मुंबईतील गिरणी कामगार संबंधित एका घटनेनंतर राजीनामा देऊन पाटणला निघून गेले होते. त्यांच्या पाठिंब्याला समर्थन म्हणून आणखी दोघांनी राजीनामे दिले होते. नैसर्गिक व राजकीय परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायची ती वेळ होती. अशातच कोयना भूकंप झाला. कोयना हे गाव बाळासाहेब देसाई यांच्या मतदारसंघात येत होते. बाळासाहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता. नाईक साहेबांनी मृदू आर्जवाने बाळासाहेबांचे मन वळविले व त्यांना महसूलमंत्री केले. कोयनेतील बेचिराख झालेली घरे उभी केल्याशिवाय आता मुंबई नाहीच, ही खुणगाठ बांधून बाळासाहेब कोयनेत ठाण मांडून बसले. वसंतराव बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. सत्तर हजार घरांचे पुनर्वसित बांधकाम झाल्यावरच बाळासाहेब देसाई मुंबईला परतले.

बंजारा समाजात संत सेवाभाया, पोहरादेवी व फुलसिंग नायकेर छोरा वसंतराव यांना परमोच्च स्थान आहे. या स्थानाची कारणं बंजारा समाजाच्या उत्कर्ष वाढीच्या प्रवासात दडलेली आहेत.

” पोरीयातारा “ या शब्दाचा अर्थ होतो उच्च मार्गदर्शक, अढळ तारा. वसंतरावांचे महाराष्ट्रातील स्थान पोरीयातारा असेच आहे. बुद्धी, परिश्रम, निष्ठा या बळावर ते दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले. आजन्म शेतीशी व शेतीव्यवस्थेशी  एकनिष्ठ असलेल्या कृषीपुत्राचा जन्मदिन ‘ कृषी दिन ‘  म्हणून साजरा व्हावा, ही घटना कृषी संस्कृतीला संजीवनी देणारी आहे.

अन्नदात्या नाईक साहेबांना जयंती दिनी विनम्र अभिवादन.

© श्री कचरू चांभारे

संपर्क – मुख्याध्यापक, जि. प. प्रा. शाळा, मन्यारवाडी, ता. जि. बीड

मो – 9421384434 ईमेल –  [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ “अश्वारूढ योद्ध्यांची माल्टा मालिका” ☆ अनुवाद – सुश्री सुलू साबणे जोशी 

जगभरातील प्रचलित नाण्यांत सर्वात वजनदार, एक किलो वजनाचे, हे चांदीचे नाणे चलनात आणले आहे – एका युरोपमधल्या चिमुकल्या देशाने – ज्याचे नाव आहे “ माल्टा “ 

‘अश्वारूढ योद्ध्यांच्या माल्टा मालिके’तील हे चांदीचे नाणे असून २००३ या वर्षी ते चलनात आणले गेले. भारतीयांसाठी ही अतिशय गौरवाची बाब आहे की, या नाण्यावर  राजा महाराणा प्रताप यांना स्थान मिळालेले आहे.

या नाण्याचे चलनी मूल्य ५००० लिरा आहे आणि वजन आहे १ किलो (चांदी). हे एक किलो वजनाचे नाणे जगात उपलब्ध असलेल्या नाण्यात आकारानेही सर्वात मोठे आहे. या नाण्याच्या एका बाजूला महाराणा प्रताप यांचे चित्र, त्यांच्या जीवनकालासह आहे, तर दुस-या बाजूस माल्टा देशाचे नाव व चिन्ह आहे. माल्टा सरकारने अशी १०० नाणी चलनात आणली आहेत.

सोळाव्या शतकातील एका हिंदू राजाची गौरवास्पद दखल, आपल्यापासून ६,५०० कि.मी. दूर असलेल्या एका लहानशा देशाने घ्यावी, याचा अर्थच असा होतो की, महाराणा प्रताप यांचे प्रभावशाली शौर्य जगविख्यात आहे.                                                                                                                       *                                                                          

या उलट, आपल्या देशांतील इतिहासात मात्र आक्रमक घुसखोरांची नोंद  ‘थोर’ अशी केली गेली आहे, याचे सखेद आश्चर्य वाटते.

अनुवाद : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

(मूळ इंग्रजीत असलेली ही गौरवास्पद माहिती आपल्या सर्वांपर्यन्त पोहोचावी या उद्देशाने सुश्री साबणे यांनी ती मराठीत अनुवादित केली आहे.) 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू : डॉ. श्रीकांत जिचकर… ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? इंद्रधनुष्य ?

शैक्षणिक क्षेत्रातील महामेरू : डॉ. श्रीकांत जिचकर☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले

एकच माणूस डॉक्टर होता, तो वकीलही होता, तो आयपीएस अधिकारी तसंच आयएएस अधिकारी होता. याशिवाय तो पत्रकारही होता. इतकंच नाही तो कीर्तनकार, आमदार, खासदार आणि मंत्रीही होता.

इतक्या पदव्या मिळवणारा ज्ञानयोगी म्हणजे “श्रीकांत जिचकर” होय.

“ शैक्षणिक क्षेत्रातील  महामेरू “ म्हणून संबोधता येईल असं नाव म्हणजे श्रीकांत जिचकर होय.

— अवघ्या ४९ वर्षांचं जीवन, ४२ विद्यापीठं, २० पदव्या आणि २८ सुवर्णपदकं — 

हा एवढा ज्ञानाचा खजिना या अवलियाने जिंकला. आयएएस असो वा आयपीएस, एलएलएम

असो वा एमबीबीएस, देशातील बहुतेक सर्वच पदव्या मिळवण्याचा विक्रम श्रीकांत जिचकर यांच्या नावावर जमा आहे.

जिचकरांनी मिळवलेल्या २० पदव्यांमध्ये एमबीबीएस आणि एमडी, एलएलबी, एलएलएम, डीबीएम आणि एमबीए, जर्नालिझम यांचा समावेश आहे. जिचकरांनी १० विषयांत एमए. केलं. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉपी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास-संस्कृती आणि पुरातत्व, मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवीही मिळवली.

जिचकरांनी मिळविलेल्या या बहुतेक पदव्या प्रथम श्रेणीतून मिळवल्या आहेत. श्रीकांत जिचकर यांची भारतातील सर्वात शिक्षीत व्यक्तींच्या पंक्तीत गणती होते. या ज्ञानयोगी चैतन्याच्या झऱ्याने, ज्ञानदेवता सरस्वतीलाही अक्षरश: मोहून टाकलं. त्यामुळेच आपल्या अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी एकही वर्ष

वाया जाऊ न देता, बहुतेक सर्व पदव्यांवर नाव कोरलं. जिचकार यांनी १९७८ साली यूपीएससीची परीक्षा दिली. यामध्ये त्यांनी अपेक्षित यश मिळवून आयपीएस झाले. पुढे दोनच वर्षांत म्हणजे १९८० साली त्यांनी आयएएसची पदवी देखील घेऊन टाकली.

विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी आयएएसचा राजीनामा दिला. या बुद्धिवंताने वयाच्या २५ व्या वर्षी पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि जिंकून दाखवली. जिचकर महाराष्ट्र विधानसभेमध्ये १९८० साली वयाच्या २५ व्या वर्षी निवडून गेले. महाराष्ट्र विधानसभेत निवडून गेलेले ते सर्वांत तरुण आमदार होते.

जिचकरांनी १२ वर्षे विधानसभेमध्ये काम केले. एकेकाळी त्यांच्याकडे १४ खात्यांचा कारभार होता. 

यानंतर त्यांनी राज्यसभेवरही धडक मारली. १९९२ साली त्यांची राज्यसभेवर निवड झाली. जिचकर १९९८ सालापर्यंत राज्यसभेचे सदस्य होते. या काळामध्ये त्यांनी विविध समित्यांमध्ये काम केले. त्यांनी युनो आणि युनेस्को संघटनांसाठीही काम केले. 

जिचकर यांचा जन्म नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका छोट्याशा गावात झाला. जगातील सर्वांत हुशार १० विद्यार्थ्यांमध्ये  (Brilliant स्टुडंट) “ पहिल्या क्रमांकामधे बुद्धिमान “ म्हणून त्यांना बहुमान मिळाला आहे. त्यांनी जगभर शिबिरे आयोजित करून  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.जिचकर यांनी जगातले पहिले ‘ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ‘ रामटेक, नागपूर येथे सुरू करून जगभर आपल्या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. जिचकर यांच्या वैयक्तिक ग्रंथालयामध्ये ५२,००० पुस्तकांचा संग्रह आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचा डॉ. श्रीकांत जिचकर नावाच्या या कर्मयोगी अवलीयास आदरपूर्वक सलाम…

संग्राहिका :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद : मण्डल १ – सूक्त २७ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते १२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते १२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ – ऋचा १ ते १२

ऋषी – सुनःशेप आजीगर्ति : देवता – १ ते १२ अग्नि; १३ देवगण

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सत्ताविसाव्या  सूक्तात शुनःशेप आजीगर्ती  या ऋषींनी अग्नी देवतेबरोबरच इतरही देवतांना  आवाहन केलेले असल्याने हे अग्नि व अनेक देवतासूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.

मराठी भावानुवाद ::

अश्वं॒ न त्वा॒ वार॑वन्तं व॒न्दध्या॑ अ॒ग्निं नमो॑भिः । स॒म्राज॑न्तमध्व॒राणा॑म् ॥ १ ॥

जिराहधारी वारू तव चरणी नतमस्तक

आम्ही तुमच्या पायांवरती ठेवितो मस्तक

वंदन करुनी अनेकदा करितो तव बहुमान

यज्ञे यज्ञे तुम्ही असता सदैव विराजमान ||१||

स घा॑ नः सू॒नुः शव॑सा पृ॒थुप्र॑गामा सु॒शेवः॑ । मी॒ढ्वाँ अ॒स्माकं॑ बभूयात् ॥ २ ॥

योगाच्या सामर्थ्याने हा युक्त दिव्य दाता

एक समयी सर्वव्यापी हा सकलांचा त्राता

सौख्याचा वर्षाव करी तो समस्त भक्तांवरी

कृपा करुनिया आम्हावरती सदैव धन्य करी ||२||

स नो॑ दू॒राच्चा॒साच्च॒ नि मर्त्या॑दघा॒योः । पा॒हि सद॒मित्वि॒श्वायुः॑ ॥ ३ ॥

सर्व सृष्टीचा आत्मा तू तर सकलांचे जीवन

सन्निध अथवा दूर असो आम्ही तुमचे दीन

अवनीवरती कितीक जगती करुनी पापाचरण

त्यांच्या पासून तुम्ही करावे अमुचे संरक्षण ||३||

इ॒ममू॒ षु त्वम॒स्माकं॑ स॒निं गा॑य॒त्रं नव्यां॑सम् । अग्ने॑ दे॒वेषु॒ प्र वो॑चः ॥ ४ ॥

 आर्त होउनीया श्रद्धेने किति स्तोत्रे रचिली

अर्पण करण्या देवांना भक्तीभावे गाईली

श्रवण अग्निदेवा करता तव मनास भावली

देव समुदायामध्ये तू स्तुती त्यांची केली||४||

आ नो॑ भज पर॒मेष्वा वाजे॑षु मध्य॒मेषु॑ । शिक्षा॒ वस्वो॒ अन्त॑मस्य ॥ ५ ॥

प्राप्त कराया उत्तम मध्यम कसलेही सामर्थ्य

सन्निध अमुच्या सदा असावे मनात आम्ही आर्त

परम कोटीच्या संपत्तीला कसे करावे प्राप्त

कॢप्ती शिकवा आम्हा अग्ने होउनी अमुचे आप्त ||५||

वि॒भ॒क्तासि॑ चित्रभानो॒ सिन्धो॑रू॒र्मा उ॑पा॒क आ । स॒द्यः दा॒शुषे॑ क्षरसि ॥ ६ ॥

अलौकीक कांती तेजोमय देदीप्यमान

दान करावे संपत्तीचे हा तुमचा मान

कृपा प्रसादाचा तू असशी थोर महासागर

प्रसाद लहरी सन्निध त्याला संपत्तीचा पूर  ||६||

यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु॒ यं जु॒नाः । स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॑ ॥ ७ ॥

 तुझे लाभले रक्षण ज्याला युद्धात घोर

तुझ्या प्रेरणे निखरून येते ज्याचे शौर्य थोर

संपत्तीवर राज्यावरती त्याची सत्ता अचल

तुझ्या कृपेने त्यासी नाही बंधन दिक्काल ||७||

नकि॑रस्य सहन्त्य पर्ये॒ता कय॑स्य चित् । वाजो॑ अस्ति श्र॒वाय्यः॑ ॥ ८ ॥

तुझ्या कृपेचा भाग्यवंत जो काय तयासी विघ्न

बलशाली हे देवा तव सामर्थ्य तया संलग्न

कीर्तिमंत तो होई विश्वे कृपा तुझी लाभता

दुजी वांच्छना मनात नुरते अशा भाग्यवंता ||८||

स वाजं॑ वि॒श्वच॑र्षणि॒रर्व॑द्‍भिरस्तु॒ तरु॑ता । विप्रे॑भिरस्तु॒ सनि॑ता ॥ ९ ॥

विद्वानांसह संपत्तीचा लाभ आम्हा होवो

अमुच्या अश्वांसवे अम्हाला पराक्रमी यश देवो

अतीघोर असलेल्या कार्यी विजयश्री लाभो

देवा तव संचार त्रिस्थळी कृपा तुमची लाभो ||९||

जरा॑बोध॒ तद्वि॑विड्ढि वि॒शेवि॑शे य॒ज्ञिया॑य । स्तोमं॑ रु॒द्राय॒ दृशी॑कम् ॥ १० ॥

स्तवनांनी जागृत होशी हे स्तोत्रप्रिय देवा

यागाकर्मा  कसे करावे मार्ग आम्हा दावा

प्रसन्न करण्या रुद्रासीया स्तोत्राला शिकवा

मनुष्य जाती वरती तुमचा वरदहस्त ठेवा ||१०||

स नो॑ म॒हाँ अ॑निमा॒नो धू॒मके॑तुः पुरुश्च॒न्द्रः । धि॒ये वाजा॑य हिन्वतु ॥ ११ ॥

धूम्र चिन्ह केतनावरती कीर्ती दिगंत

गुणास नाही गणना काही थोर गार्ह्यपत्य

 बुद्धिशालि करी आम्हा देवा देई सामर्थ्य

आर्जव अमुचे तुमच्या ठायी गाउनिया स्तोत्र ||११||

स रे॒वाँ इ॑व वि॒श्पति॒र्दैव्यः॑ के॒तुः शृ॑णोतु नः । उ॒क्थैर॒ग्निर्बृ॒हद्‍भा॑नुः ॥ १२ ॥

वैभवशाली हे सम्राटा आवसथ्य देवा

मोहित होऊनिया स्तुतींनी आम्हाला पावा

तेजे प्रखर सौंदर्याने दिव्य नटलेला

ऐका हो प्रार्थना आमुची देई प्रसादाला ||१२||

नमो॑ म॒हद्‍भ्यो॒ नमो॑ अर्भ॒केभ्यो॒ नमो॒ युव॑भ्यो॒ नम॑ आशि॒नेभ्यः॑ ।

 यजा॑म दे॒वान्यदि॑ श॒क्नवा॑म॒ मा ज्याय॑सः॒ शंस॒मा वृ॑क्षि देवाः ॥ १३ ॥

नमः महत्ऽभ्यः नमः अर्भकेभ्यः नमः युवभ्यः नमः आशिनेभ्यः ।

वंदन करितो मी  श्रेष्ठांना आणि सानांना

नमस्कार तरुणांना आणिक वंदनीय वृद्धांना

आपण सारे याग मांडुया देवांच्या सन्माना

स्तुती विसरण्याचा देवांची प्रमाद व्हावा ना ||१३||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/I6GdUxBiEm0

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1, Sukta 27

Rugved Mandal 1, Sukta 27

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? इंद्रधनुष्य ?

☆ ऐ वतन, मेरे वतन… भाग-2 ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

(“सैनिकाने लढताना नीतिमत्ता विसरता कामा नये” हे वाक्य बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. उदाहरण म्हणून, कारगिल युद्धातली एक सत्य घटना त्यानेे सांगितली.) इथून पुढे —- 

एका चकमकीत, त्याच्या युनिटच्या जवानांनी पाकिस्तानी घुसखोर सैनिकांच्या चौकीला वेढा घातला होता. बराच वेळ धुमश्चक्री सुरु होती. शेवटी, निकराचा हल्ला चढवून भारतीय सैनिकांनी पाकिस्तान्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढला. चौकीमध्ये पाकिस्तानी सैनिकांची प्रेते इतस्ततः पडलेली होती. भारतीय हद्दीत छुपी घुसखोरी केलेली असल्याने त्या सैनिकांच्या अंगावर युनिफॉर्मऐवजी स्थानिक रहिवाश्यांसारखेच कपडे होते. मात्र, हे आपल्या आयुष्यातले शेवटचेच युद्ध असल्याचे ओळखून, मुलकी कपड्यांमधल्या त्या प्रत्येक सैनिकाने छातीवर आपापली पदके लावलेली होती! एक सच्चा सैनिक म्हणून वीरमरण पत्करण्यासाठी त्यातला प्रत्येकजण सज्ज होता!

चौकीवर विजय मिळवल्यानंतर या भारतीय मेजरने सर्वप्रथम, पाकिस्तानी सैनिकांच्या ओळखपत्रांवरून प्रत्येकाची ओळख पटवली. एका पत्राद्वारे त्या नावांची यादी पाकिस्तानी सेनेकडे पाठवून, त्या सर्व मृत सैनिकांचा यथोचित सन्मान व्हावा अशी इच्छा त्याने व्यक्त केली! 

काही काळानंतर त्याला समजले की त्याच्या विनंतीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून त्या शहीदांचा सन्मान केला गेला होता!   

त्याच युद्धात, बॉम्बचा तुकडा गालफडात घुसल्यामुळे त्याचा चेहरा असा विचित्र, आणि ओबड-धोबड झालेला होता, हेही सहजच बोलल्यासारखे त्याने सांगितले. इतकेच नव्हे तर, त्याच्या मणक्यांमध्ये आणि पायांमध्ये शस्त्रक्रियेद्वारे रॉड बसवलेले होते. म्हणूनच, सोबतच्या महिला सहप्रवाश्यांना तो स्वतःचा खालचा बर्थ देऊ शकला नव्हता हेही त्याने काहीश्या दिलगिरीच्या स्वरातच सांगितले! 

आर्मीच्या डॉक्टरांचे तो तोंड भरून कौतुक करीत होता. “माझे फाटलेले थोबाड छान शिवून मला एक नवीन चेहरा त्यांनीच तर दिला ना!” हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नव्हता. त्याउलट, एक मिश्किल भावच मला जाणवला! मी थक्क होऊन त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या त्या बदललेल्या चेहऱ्याबद्दल घरच्या मंडळींना काय वाटले? असे आम्ही विचारताच तो हसून म्हणाला, “माझी बायको, आणि आमची सहा वर्षांची मुलगी म्हणतात, आता मी पहिल्यापेक्षा जास्त देखणा दिसतो!”

काश्मिरातल्या खेड्या-पाड्यांमधल्या घरात लपून बसलेले अतिरेकी शोधणे आणि त्यांना ठार करणे, हे त्याच्या मते सगळ्यात अवघड काम होते. (त्यावेळी नुकताच मुंबईवर अतिरेकी हल्ला होऊन गेला होता.  सैन्यदलाच्या आणि नौदलाच्या कमांडो सैनिकांनी ‘ताज’ हॉटेलमध्ये आणि इतरत्र केलेली कारवाई माझ्या डोळ्यांसमोर उभी राहिली). 

“Cordon & Search कारवाई म्हणजे एक जीवघेणा लपंडावाचा खेळ असतो. त्यामध्ये आमच्या सतर्कतेची आणि संयमाची अक्षरशः अग्निपरीक्षाच असते. अशा कारवाया बहुदा रात्रीच्या अंधारातच होतात. संपूर्ण खेड्याला आम्ही वेढा घालतो आणि एकेक घर तपासत जातो. अतिरेकी नेमका कुठे लपला असेल याचा पत्ता लावायचा असतो. त्याला बेसावध गाठून आम्ही ठार करणार, की तोच आधी आमचा वेध घेणार हे मात्र ‘काळ’च ठरवतो!”

मेजर शांतपणे बोलत राहिला, “आम्ही आता पूर्वीपेक्षा अधिक अनुभवी झालो आहोत.  पण, अतिरेकीसुद्धा अधिक शहाणे झाले आहेत. ते आता आमच्या डोक्यावर किंवा छातीवर नेम धरत नाहीत. मांड्यांवर गोळ्या झाडतात. मांडीमधली रक्ताची धमनी फुटलेल्या सैनिकाला तातडीने हॉस्पिटलात न्यावेच लागते. नाही तर अत्यधिक रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्या जवानाला सुखरूपपणे हलवण्यात आमचे मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो आणि अतिरेक्यांना नेमके तेच हवे असते.” 

ऐकता-ऐकता आमच्या डोळ्यावरची झोप केंव्हाच उडून गेली होती. मी आणि इतर सहप्रवासी अचंबित होऊन, जणू तो थरार प्रत्यक्ष अनुभवत होतो. 

मी सहज त्याला विचारले, “अतिरेक्यांविरुद्धच्या तुझ्या कामगिरीबद्दल तुला एखादे शौर्यपदक मिळाले असेल ना?”

“नाही, मॅडम.”

मी आश्चर्यानेच विचारले, “का बरं? का नाही मिळालं?”

“मॅडम, मी जे केलं, ते करणाऱ्या प्रत्येकाला जर आर्मीने शौर्यपदक देणं सुरु केलं, तर पदकांचा स्टॉकच संपून जाईल!” तो हसत-हसत म्हणाला. 

त्याच्या या अनपेक्षित उत्तराने आम्ही सगळेच अवाक झालो होतो. आमच्या मते जे अतुलनीय शौर्य होते, ती त्याच्या दृष्टीने जणू एखादी सामान्य घटनाच होती. 

कदाचित, जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांसोबत लढणाऱ्या प्रत्येक सैनिकाचे आणि अधिकाऱ्याचे तेच दैनंदिन जीवन असेल! 

निःस्वार्थ सेवा म्हणजे काय, ते मला माझ्या डोळ्यासमोर, मूर्तस्वरूपात दिसत होते, आणि मी ते रूप मनात साठवून घेत होते.  

एका सहप्रवाशाने अचानकच विचारले, “कुठून येते ही एवढी प्रेरणा तुम्हा लोकांमध्ये?”

“या देशावर, देशवासीयांवर असलेले प्रेम, आणि मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?”

अगदी सहजपणे त्याने उच्चारलेले ते वाक्य ऐकून माझ्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. मला माझे लहानपण आठवले. त्या काळी, सिनेमा संपल्यावर राष्ट्रगीत वाजत असे. आम्ही सगळे उठून उभे राहायचो. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे निव्वळ मौजमजा करण्याचे, सुट्टीचे दिवस नव्हते. आम्ही सकाळी आनंदाने घराबाहेर पडायचो, आणि अभिमानाने ध्वजवंदन करायचो. “जय जवान, जय किसान” हे वाक्य उच्चारत, मातृभूमीच्या त्या दोन सच्च्या सेवकांना मनापासून अभिवादन करायचो. 

आजदेखील जवानांची आणि किसानांची आपल्या देशाला पूर्वीइतकीच नितांत गरज आहे. मला खात्री आहे की आपल्या सर्वांच्या मनात, खोल कुठेतरी, त्यांच्याबद्दलचा आदर आणि अभिमान दडलेलाही आहे. मात्र, तो मनातच न ठेवता, बाहेर काढून, झाडून, झटकून, छातीवर मिरवायची आज गरज आहे. आपल्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यासोबत त्याची जाणीव आपल्याला होत राहिली तरच आपल्या वागण्या-बोलण्यातही तो आदर दिसत राहील. 

“… मी एक भारतीय असल्याचा सार्थ अभिमान. आणखी काय?” —- “जय हिंद”

– समाप्त –

मूळ इंग्रजी अनुभव लेखिका : सौ. स्मिता (भटनागर) सहाय. [भारतीय नौदलातील कॅप्टन सहाय यांच्या पत्नी]

मराठी भावानुवाद : कर्नल आनंद बापट [सेवानिवृत्त]— ९४२२८७०२९४ (#केल्याने भाषाटन) 

संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print