सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ गौरी विसर्जन… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींच विसर्जन झालं घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या  विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक  हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का हे गौरीगणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेयं. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मनं तसचं घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेल असतं. घर कसं भरल्याभरल्यासारखं वाटतं.

ह्या सणावरांच्या निमीत्त्याने का होईना आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो.नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो, ह्या निमीत्त्यानेच आपल्या कडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे,नातलग आपले नेहमीचे रुटीन बदलवून गौरीगणपतीच्या निमीत्त्याने एकत्र येतात.ही एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांच नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.

आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमीटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो.

जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्ती साठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण  एकदा माहेरी चक्कर मारून येऊन,तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची खात्री पटली की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणे गौरी ह्या सुद्धा  माहेरची आठवण सतत मनात पिंगा घालणारच किंवा मधून मधून माहेराची ओढ वाटणारच त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी त्या औटघटकाच येणार,पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आनंदचा शिडकावा करुन जाणार,प्रेमाची मायेची पखरण करुन जाणार.त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री विश्वास पण तेवढाच असतो.जरी बाप्पा चे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.

आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरडकानवला देतो.मुरडकानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरडकानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.

सहज करता येण्यासारख्या गोष्टी,जुन्या प्रथा ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही झालाच तर फायदाच होतो त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा, अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या  गोष्टी उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे  तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ  पैसासुपारी ठेवणे अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते,त्या मनोमन  पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.

परत एकदा गौरीगणपतींना कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या ह्या हक्काच्या विनंतीने आजच्या पोस्ट ची सांगता करते.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments