मराठी साहित्य – विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर

☆ विविधा ☆ पंख ☆ सुश्री श्रेया सुनील दिवेकर ☆

माझ्या मनात एक विचार आला असे वाटले की आज मला जर पंख असते तर?? मी छान नभाची सैर करून आले असते. तोडल्या असत्या ह्या सगळया साखळ्या आणि उंच भरारी घेतली असती आकाशात.

ह्या माझ्या विचारांना खिजवायला की काय कोण जाणे माझ्या समोरून एक मस्त फुलपाखरू उडत गेल, आपल्याच दुनियेत जणू हरवले होते . रंगबिरंगी त्यांचे रंगीत पंख बघून अगदी हेवाच वाटला मला त्यांचा. असे वाटू लागते की आपल्याला पण हवे होते असे नाजूक सुंदर पंख. मग आपण ही जाऊ शकलो असतो कुठे ही क्षणभरात. मस्त फुलांच्या परागांवर बसुन मध चाखला असता आणि मनसोक्त बागडलो ही असतो हा विचार मनातून जात नाही तोवर,

पक्ष्यांचा थवा उंच नभात उडताना पहिला. अगदी छान आपल्याच धुंदीत मस्त उडत होते सारे. मग मला वाटले जर आपण पक्षी झालो असतो तर कित्ती छान झाले असते. आसमंतात निळ्या आकाशात उंच भरारी घेतली असती. वरती जाऊन हिरव्यागार शालू मधे, नटलेली धरती पहिली असती. मस्त डोंगरावर बसुन वाऱ्याशी हितगुज केले असते.छान झाडाच्या फांदी वर बसुन उंच झोके घेतले असते.

मनानी झोके घेतच होते की तो वर एकदम जोरात आवाज ऐकू आला, वर पाहिले तर भव्य वीमान दिसले. ते तर जवळ जवळ गगनाला भिडले होते. अस वाटले की हातच लावते आहे आकाशाला.

मग काय माझ्या मनात आले, आपण विमानच झालो असतो तर?? मनात येईल तेव्हा रात्रीच्या वेळी चंद्र चांदण्यांनांची भेट घेता येईल.

आता मात्र स्वतः वरच हसू आले असे वाटले की पंख नसताना पण आपले मन किती ठिकाणी उंच भरारी घेऊन आले.

फुलपाखरू होऊन फुलांमधला मध चाखला, तर पक्षी बनुन झाडावर बसुन उंच झोके घेतले, विमान बनून आकाशातले तारे ही तोडले.

आता मला सांगा नक्की उंच भरारी घेतली तरी कोणी??

फुलपाखरांनी, पक्ष्यांनी, विमानांनी, की माणसाच्या मनानी.

सहज मनाच्या कोपऱ्यातून ☺️

 

©  सुश्री श्रेया सुनील दिवेकर 

मो – 9423566278

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

☆ विविधा ☆ जीवनदान ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

कुठून आली, कशी आली आहे कोण जाणे, पण एक चांगली मोठी झालेली मांजरी घरात आली.सगळ्यांच्या मागे मागे करायला लागली.जणू काय ते आमच्याच घरातली आहे की काय असे वाटावे.रुपाने अगदी सुंदर.वा वा म्हणण्यासारखी.पिवळा, पांढरा, काळा सगळे रंग तिच्यामध्ये आलेले होते.तिचं नामकरण झालं “सुंदरी”.

आता ती आमच्या घरातली झाली.आठ-दहा दिवसात तिचं पोट मोठे दिसायला लागलं.आता हिला पिल्लू होणार याची खात्री झाली.यथावकाश एके सकाळी माळ्यावरील अडगळीतून खाली आली.पोट दिसत नव्हते.वरती धुळीत पिल्ले असणार हे पक्क.सुंदरी साठी एक मोठ्या खोक्यात अगदी मऊ अंथरूण तयार केले.अडचणीतून अलगत पिल्लांना उचलून खोक्यात ठेवून तो खोका आमच्या बेडरूम मध्ये अगदी सुरक्षित ठेवला.सुंदरीची तिन्ही पिल्ले वेगवेगळ्या रंगाची नाजूक आणि छान होती.सुंदरीला खोके पसंत पडले.त्यामुळे पिलांसह त्यात ती छान राहत होती.तिच्यासाठी खोलीचे दार किलकिले ठेवत होतो.दहा दिवसांनी पिल्लांचे डोळे उघडायला लागले.आता त्यांचं रुपडं आणखीनच गोजिरवाणा दिसायला लागलं.एके दिवशी सकाळी उठून पहातो तो पिल्ले आणि सुंदरी सगळेच गायब!खोकं मोकळं पाहून धस्स झालं.दुपारी खाण्यासाठी घरात आली.परत जाताना कोठे जाते लक्ष ठेवलं.जवळच असलेल्या हॉस्पिटलच्या गॅलरी च्या बाहेर अडचणीत ती पिलांना घेऊन गेली होती.एक पिल्लू पत्र्याच्या खोल अडचणीत अडकले होते.ते अखंड ओरडत होते.आणि सुंदरी पावसात पत्र्यावर बसून आक्रोश करत होती.बाकी दोन दोन पिल्लांकडे पुन्हा पुन्हा ही जात होती.खाण्यासाठी घरी येत होती.तिच्या पत्र्या कडच्या काकुळतीच्या येरझाऱ्या आता मात्र पहावत नव्हत्या.अडकलेल्या पिलासाठी ती कासावीस झाली होती.पिल्लु ही भुकेने व्याकुळ झाली होते.राहुल आणि स्वप्नील दोघेही  पत्र्यावर चढले.खूप प्रयत्न केला पण पिलापर्यंत हात पोचत नव्हता.सुंदरीची घालमेल बघवत नव्हती डोळ्याने ती काकुळतीला येऊन जणू सांगत होती “माझ्या बाळाला लवकर काढा रेss”.रायगडावरून बाळासाठी जीव टाकलेल्या हिरकणीची ची आठवण झाली.काय करावे ते काही सुचत नव्हते संध्याकाळ व्हायला लागली.रात्र झाली तर अंधारात काहीच करता येणार नव्हते.पिलाला लवकर काढले तर ठीक नाहीतर ते मरणार असे वाटायला लागले.गडबड केली.पत्रा काढण्यासाठी डॉक्टरांची ची परवानगी घेतली.नट बोल्ट काढून पत्रा सरकवला पिल्लू बारीक झाले होते.जणू नजरेने काकुळतीने “मला माझ्या आई कडे पोचवा” म्हणत होते. सुंदरीची त्याला भेटण्याची गडबड चालू झाली.पिलाला घरात आणले.तिला आपल्या पिलाला किती चाटू आणि किती नको असे झाले होते.भुकेला जीव आईला चुपूचुपू प्यायला लागलि.एक जीव वाचवला याचा सर्वांना आनंद झाला.जीवदान मिळाले पिलाला बाकी दोन पिल्लांनाही घरात आणले.

तीनही पिल्ले सुंदरी सह मजेत आनंदात रहायला लागली.त्यांचे खेळ अगदी बघत रहावेत असे.कुस्तीचे सर्व प्रकारचे डाव जणू! दोन पिल्ले अगदी जड मनाने चांगल्या घरी दिली.जीवदान मिळालेले पिल्लू तिचे निरर्थक नाव ‘टिल्ली’.ते मात्र आमच्याच घरात सुंदरी बरोबर आणि आमच्या दोन कुत्र्यांबरोबर खेळण्यात दंग असते.मजेत आणि खुषीत आहे.त्याच्याकडे पाहताना त्याला जीवदान दिल्याचे समाधान आणि आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही.सुंदरी आणि टिल्ली दोघांचेही ही चेहरे आणि डोळे आमच्याशी बोलतात “गॉड ब्लेस यु”.

 

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

मो. ९४०३५७०९८७

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

संक्षिप परिचय 

युनियन बॅंक ऑफ़ इंडिया मधून चीफ मॅनेजर पदावरुन निवृत्त. लेखन हा मनापासून जोपासलेला व्यासंग. कथा, नाट्य ललित लेखन. स्वत:च्या कथांचे कथाकथन.

तीन कथासंग्रह प्रकाशित.अनेक कथा कन्नडमधे भाषांतरीत.कथांना अनेक लेखनपुरस्कार.विविध एकांकिका,नाटकांना नाट्यलेखन पुरस्कार व प्रयोगाना वैयक्तिक व सांघिक पुरस्कार.

☆ विविधा ☆ सावर रे…! ☆ श्री अरविंद लिमये ☆

सावर रे…!  अधीरता ही एक मनोवस्था.

तान्हया वयात ऐकण्यापाहण्यातून बाळ शिकत असते.सगळं शिकायची,हाताळून पहायची,परिणामांचा अंदाजच नसल्याने तेजाळ ज्योतीलाही बोट लावून पहाण्याची अस़ोशी

हे सगळं या अधीरतेपोटीच निर्माण झालेलं असतं.ती अधीरता आतुर,उत्सुक,उत्कंठित,अशा सकारात्मक अर्थछटा ल्यालेली असल्याने घरच्या मोठ्यांच्या कौतुकाचाच विषय असते.

त्या वयातले अधीरतेपोटी केले जाणारे हट्टही बालहट्ट म्हणून हौसेने पुरवले जात असतात. तसेच या अधीरतेमुळे बाळाला इजा होऊ नये म्हणून एरवी लाड करणारी घरची वडिलधारी माणसे बाळाची निगराणीही करीत असतात.

वय वाढत जातं तसं ही निगराणी स्वत:च स्वत: करणे अपेक्षित असते. कारण अधीरता ही  या वयातही एक मनोवस्था असली, तरी तिच्या अर्थछटा बदललेल्या असतात. पूर्वीची उत्सुकता आता उतावीळणा ठरायची शक्यता असते. बेचैनी,तहानलेला,भुकेला अशा अर्थछटाही त्यात मिसळलेल्या असतात.अशावेळी केवळ उत्सुकता, उतावीळपणाने घेतलेले निर्णय अडचणीत आणायला निमित्त ठरु शकतात.अधीरतेतला अविचारी उतावीळपणा कमी करण्यासाठी समतोल विचारच बालपणातल्या घरच्या मोठ्यानी केलेल्या निगराणीची जबाबदारी तेवढयाच आत्मियतेने स्विकारणारा एकमेव पर्याय असतात.एवढा समंजसपणा असेल तर मात्र मनातली अधीरता वैचारीकतेचं अधिष्ठान लाभल्यामुळे भरकटणारी नसते.हुरहूर,उत्सुकता,क्षणिक अस्वस्थता,ओढ,या सगळ्या अधीरतेच्या सावल्या मग मनाला काळवंडून टाकणार्या अंधार्या सावल्या नव्हे तर त्या त्या क्षणी हळूवार मायेने सावरणार्या सांजसावल्या होऊन सोबत करतात.अविचारी उतावीळ अधीरतेने घेतलेले निर्णय संकटांच्या गर्तेत लोटून अख्खं आयुष्य उध्वस्त करणारे ठरल्याची असंख्य उदाहरणं जशी आजुबाजूला आपण पहातो,तशीच जीवघेण्या संकटातही खंबीर राहून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारी धीरोदात्त माणसंही आपल्या बघण्यात असतात.

अधीरतेच्या लाटेत वहावत जायचं की अधीरतेला संयमाने भरकटण्यापासून रोखायचं हे ज्याच्या त्याच्या वैचारीक परिपक्वतेवर अवलंबून असते हे ओघाने आलेच.

© श्री अरविंद लिमये

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझं वेड…. ☆ सौ. मानसी काणे

☆ विविधा ☆ माझं वेड…. ☆ सौ. मानसी काणे 

मी त्याच्यासाठी वेडी झाले होते,  वेडी आहे आणि राहीन. त्याला मी प्रथम पाहिल तेंव्हा तो मुक्या माणसाच्या भूमिकेत होता पण त्याचे डोळे माझ्याशी बोलले. मग ‘‘देखा न हाय रे सोचा न हाय रे’’अस म्हणत आपले उंचच उंच पाय त्यान नाचवले आणि त्याचा खट्याळपणा मला फार भावला. मग वेगवेगळ्या रुपात ‘‘विजय’’या एकाच नावान तो मला सतत भेटत राहिला. डोळ्यात अंगार पेटवून त्वेषान ‘‘है कोई माईका लाल ’’अस त्यान विचारताच माझही रक्त उसळल.‘‘ये पुलिस स्टेशन है तुम्हारे बापका घर नहीं’ ’अस म्हणत त्यानं खूर्ची उलटवून टाकली तेंव्हा त्याची तडफ पाहून मी सुखावले.‘‘मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाता’’ अस त्यान ठणकावल तेंव्हा त्याचा स्वाभिमान पाहून मी भारावले.आपल्या हातावर गोंदलेल्या ‘‘मेरा बाप चोर है’’या गोंदणाकड त्यान करूण नजरेन पाहिल तेंव्हा माझा गळा दाटून आला.‘‘मैं बहुत थक गया हूं माँ’’अस म्हणून त्यान आईच्या मांडीवर हताशपणे डोक टेकवल तेंव्हा माझाही शक्तीपात झाल्यासारख वाटल.तो अन्यायाविरुद्ध नेहमी पेटून उठायचा.सगळ्या जगाशी लढायचा.शर्टाच्या दोन्ही टोकांची गाठ मारून एक खांदा झुकवून डायनामाईट लावून तो धुरातून मोठ्या डौलात बाहेर यायचा पण तोपर्यंत इकडे माझ्या नाडीचे ठोके थांबलेले असायचे. कधीकधी तो प्रेमान ‘‘मै अपने बच्चे के लिए पालना लाया हूं सुधा’’ अस म्हणायचा तेंव्हा त्याच्या नजरेत मला कोवळा बाप दिसायचा .‘‘तुझे थामे कई हाथों से, मिलूंगा मदभरी रातों से ’’अस म्हणत कधी तो प्रियकर प्रेमळ पती व्हायचा. कधी प्रेयसीला ‘‘हे सखी’’ अशी साद घालायचा. त्याच हे प्रेम करणं मला त्याच्या पेटून उठण्याइतकच वेड  लावायच. त्यानं ‘‘इंतहा हो गई इंतजार की’’ अस म्हटल तेंव्हा त्याच्याबरोबरच मीही जिवाच्या आकांतानं वाट पाहिली .‘‘इसके आगे की अब दास्ताँ मुझसे सुन सुनके तेरी नजर डबडबा जाएगी ’’अस तो म्हणाला आणि खरच माझे डोळे भरून आले. ‘‘डॉक्तरानीजी बेहोश मत कीजिए मुझे. मैं होश में दर्द सहना जानता हूं’’ अस म्हणत आपला जखमी हात टाके घालण्यासाठी त्यान पुढ केला तेंव्हा त्याच्या मनातल वादळ माझ्याही मनात उसळल. माऊथ ऑर्गनच्या करूण स्वरातून त्यान आपल विधवेवरच अबोल प्रेम व्यक्त केल. आपल्याला डाकूंच्या हाती सोपवणार्‍या कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी बापाकडं त्यान निश्चयानं पाठ फिरवली. त्याच्या प्रेमभंगाची आणि दु:खाची झळ मला पोहोचली.‘‘कल अगर न रोशनी के काफिले हुए?’’ या प्रेयसीच्या प्रश्नावर ‘‘प्यार के हजार दीप है जले हुए ’’अस म्हणत हात पसरून उभ्या असलेल्या त्यान मलाही एक आधाराच आश्वासन दिल. कधीतरी कोणी ‘‘मोहब्बत बडे कामकी चीज है’’ अस म्हटल्यावर ‘‘ये बेकार बेदाम की चीज है’’ अस तो तोडून  टाकायचा. पण मी मात्र ‘‘सब कहते है तूने मेरा दिल लिया, मैं कहती हूं मैंने तुझको दिल दिया’ अशी दीवानी झाले होते. शेकडो माणस आजूबाजूला वावरत असूनही पडदाभर फक्त तो आणि तोच असायचा. पहाणार्‍याची नजर त्याच्यावरून जराही इकडतिकड होऊच शकायची नाही. त्याच प्रेम, त्याची हाणामारी, त्याचा राग ,त्याचा त्वेष या सगळ्यासाठी, त्याच्या आवाजासाठी, त्याच्या डोळ्यातल्या अनामिक आकर्षणासाठी मी खरच वेडी होते आणि आहे. ‘‘भाईयों और बहनों, देवियों और सज्जनों हम और आप खेलने जा रहे है यह अदभुत खेल कौन बनेगा करोडपती’’ परत तोच रुबाब, तोच धीर गंभीर आवाज ,प्रौढत्वाला न्याय देणारा अप्रतीम रंगसंगतीचा पोषाख ,सर्वाना समजून घेणारे डोळे आणि तेच भारावून टाकणं. साठी उलटून घेली तरी माझ त्याच्याबद्दलच वेड काही कमी होत नाही. येस आय अ‍ॅम क्रेझी फॉर माय अँग्री यंग मॅन!

© सौ. मानसी काणे

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी श्री मं ती ☆ सौ.अंजली गोखले

☆ विविधा : माझी श्री मं ती ☆ सौ.अंजली गोखले 

 

मी कशाला आरशात पाहू ग, मीच माझ्या अगोबाई! तुम्ही सगळे ऐकताय होय? माझे हे घर पहाताय होय? बर बर .

लांबू न कशाला डोकावताय ? या, मीच दाखवते हे घर म्हणजे बंगला !

हा मोठा हॉल , इथलं फर्निचर पॉश आहे ना? . ही मुलीची , पिंकीची खोली  हे बेडरूम, ही गेस्टरूम आणि हे किचन – स्वयंपाक घर .

सकाळी ९ ते ६ या बंगल्यावर माझच राज्य असत. या घराचे मालक म्हणजे आमचे साहेब आणि आमच्या वहिनी बाई मी आल्यावर ऑफिसला जातात. सकाळीच पिंकी शाळेला गेलेली असते. ९ नंतर हा बंगला माझा असतो.

इथली स्वच्छता, स्वयंपाक, वॉशिंग मशिन लावणं सगळ सगळं मी करते. १२ वाजता डबा न्यायला, डबेवाला येतो. साहेबांचा आणि बाई साहेबांचा डबा मी भरून देते. पिंकी आली की तिला वाढते. तिच्याशी गप्पा मारते आणिमग माझं जेवण करते. दुपारचं आवरून झालं की मी आणि पिंकी टि.व्ही . बघतो . तिचं कार्टून,  मध्ये माझी सिरीयल, तिथं जाहिराती लागल्या की पुनः कार्टून ! तीपण खूष मीपण खूष!

हा पण दुपारी 3 वा – मी तिला अभ्यासाला बसवते. आणि मी जरारेस्ट घेते. झोपते नाही म्हणायचं रेस्ट घेते. दिवसभर हा बंगला मीच वापरते. छान स्वच्छ ठेवते. या कामासाठी दरमहिना मला पंधरा हजार रु पगार मिळतो.

माझ्या संसाराला खूप मदत होते. मी शिकले नाही म्हणून हे काम करते. पण माझ्या मुलाला मी खूप शिकवणार आहे. कलेक्टर करणार आहे. म्हणून तर हा सगळा खटाटोप !

दिवस सगळा कामात जातो. पण संध्याकाळ झाली की मला माझी झोपडी आठवते. कधी एकदा घरीजाते आणि भाकऱ्या थापते असे मला होते. हा बंगला, इथले हे ऐश्वर्य माझ्यासाठी बुडबुडा आह . माझी झोपडी, राबणारा नवरा , माझं लेकरू, माझी गरीबी हीच माझ्यासाठी खरी श्रीमंती आहे.

 

© सौ.अंजली गोखले

मो   ८४८२९३९०११

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

संक्षिप परिचय 

मुळगाव : सांगली

सध्याचे ठिकाण: नवी मुंबई,  बेलापूर

नोकरी: स्टिल कंपनीत एक्पोर्ट म‌ॅनेजर

विडंबन, ललित लेखन, प्रासंगिक चारोळ्या लेखनाची  आवड

‘देवा तुझ्या द्वारी आलो’ (www.kelkaramol.blogspot.com), ‘माझे ‘टुकार ई-चार’ (www.poetrymazi.blogspot.com) या दोन अनुदिनीवर ( ब्लाॅग) नियमित लेखन

जोतिष शास्त्र अभ्यास

☆  विविधा : इकडचे – तिकडचे “ज्ञानविस्तार” – श्री अमोल अनंत केळकर

 

‘जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे

विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे’

खरं म्हणजे  मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.

आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे  शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे  लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते

चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा

अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

सत्य शिवाहुन सुंदर हे

वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम  हिंदी -संस्कृत  किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन  किंवा अशा अनेक वाटा .

एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटच्या ठरलेले स्टेशन आले की  प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही. बघा ना, रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष  अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते  पण आता ती बेळगाव पर्यत जाईल  हा झाला  त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा  विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी/व्यवसायास/प्रोफेशनला पूरक म्हणून असेल   किंवा निव्वळ  आवड छंद म्हणून असेल

‘अपारंपारिक शिक्षण’ किंवा ‘ज्ञान – विस्ताराची’ सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच  असते. आई – बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी (संस्कार/आचरण इ इ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी

मग हळूहळू आपली ओळख होते  पेपर , रेडिओ , दूरदर्शन (टीव्ही) या माध्यमांची. ज्ञान विस्ताराच्या या मार्गात  वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो .  इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे   आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल – मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप )  हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात  किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर – चूक असतात  हे ओळखणे ही एक ‘ कलाच ‘ आहे.  यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण  सध्यातरी ज्ञान – विस्ताराचा हा ‘ राज ‘ मार्ग ठरला आहे यात शंका नाही

यात ही दोन प्रकार आहेत बरं  का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार  प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ‘ ढ ‘ वगैरे प्रकार मला मान्य नाही )  तर  व्हायचं काय की  मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे   एका ‘ मध्यम’ मुलाकडे  एखाद्या विषयाचे  दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून  काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी  हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र  प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे  इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या ‘मध्यम’ मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा

आज हीच ‘ मध्यम ‘  मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ‘ किस ‘ पाडतात ?

माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून  सुरु असलेली  ‘ ज्ञान – विस्ताराची  ‘  माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही   पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले

‘व्यवहार ज्ञान’  घेणे हे ही महत्वाचे नाही का ?

एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे

‘व्यवहार ज्ञान’ एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश – रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी  तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही  ?

चला मंडळी आवरत घेतो.

इधर चला में , उधर चला , जाने कहाॅ में किधर चला

वेळ झाली आहे आता जरा दुसरी कडे जाऊन तिथे आलेले

‘ज्ञानरूपी मोती’   ओजळीत गोळा करून इतरत्र देण्याची.

मज पामरासी काय थोरपण

पायींची वाहणं पायी बरी |

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव

म्हणती द्यानदेव तुम्हा ऐसें ||

???

( अ-ज्ञानी ) अमोल

१३/०६/२०२०

 

©  श्री अमोल अनंत केळकर

नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्रतीबिंबाचा कवडसा ☆ सौ. सुनिता अनंत गाडगीळ

☆ विविधा : प्रतीबिंबाचा कवडसा –  सौ.सुनिता गाडगीळ☆

छान बंगला  ‘मृदगंध अभिरुचीपूर्ण बांधणीची साक्ष पटवणारा . त्याच्या पाठी मागच्या बाजूला माईंची खोली होती. त्या खोलीतून अधून-मधून रडन्याचा  आवाज ऐकू येत होता माईंच्या समोर त्यांची नातसून पाठमोरी उभी होती. सुरेखा स्वयंपाक घरात होती. नव्या सुनेला  जेऊ घालावं म्हणून काजू कतली बनवत होती .सुरेख a ला माईंच्या खोलीतली बोलणी नीट ऐकू येत नव्हती .तिच्या कपाळाला त्यामुळे आठी पडली होती. काय सांगत असणार आहेत माझ्या कागाळ्या लग्नातलं पुन्हा दुसरं काय सासूच्या बाबतीत सुरेखाच्या मनाची पाटी कोरी नव्हती. लोक तोंडावर बोलत नाहीत पण यांच्या फाटक्या तोंडामुळे सासूबाईंच्या नादाला ही लागत नाहीत लग्न होऊन या घरात आल्यापासून हेच सुरु आहे .आता रेवाला जर काही म्हणत असतील तर मात्र मी शांत बसणार नाही .सुरेखा तरातरा माईंच्या खोलीत गेली. पहिल्यांदाच रागावून बोलली. पानावर या मगाशीच बोलला मी त्या नवीन आलेल्या मुलीला वेळेवर चार घास गरमागरम खाऊ देत माझ्या कागाळ्या जर चालू असतील ना तर तुमच्याबद्दल सांगण्यासारखं माझ्याकडे पण खूप आहे. मी तोंड मिथुन राहिले राहिले ना सांगा सांगा ना.. दोघींना कळेचना सुरेखाला काय झालं आपल्या माणसांची साथ आयुष्यभराची असते ती हवी आहे ग मला हे हवे होते हे सोडून गेले .टपटपणार या डोळ्यांमधली ताकद संपल्यासारखे त्यांचे डोळे दिसू लागले .त्यांचे ते डोळे बघून सुरेखा स्वयंपाक घरात आली.

माईंना भूक लागली असणार या स्वयंपाकाच्या नादात जेवणाची वेळ चांगलीच पुढे गेली म्हणत तिने पानात पोळी वाढली . कोकणातलं माहेर असलेल्या सुरेखाला गरम भात पहिल्यांदा खवासा वाटायचा पण एक चपाती आणि असेल ती भाजी खाल्ल्या शिवाय सुरेखाला त्या भात खाऊ द्यायच्या नाहीत. नवीन आलेल्या सुनेला तशीच सक्ती करतील म्हणून सुरेखा विचारायला गेली होती. अस्मिता तुला पहिल्यांदा गरम गरम…… भात वाढू …..?सुरेखाच्या कानावर माईंचा आवाज येत होता.,

सुनबाई तुला सांगते मी या घरात आले तेव्हा इथला स्वयंपाक मला आवडत नव्हता मला हिरवी मिरची ,खोबरं सगळं घालून केलेला चमचमीत स्वयंपाक आवडायचा पण मी इथे मनाला मुरड घातली .सासूबाईंच्या   शिकले .तुझ्या नवऱ्याच्या आवडीनिवडीप्रमाणे राल तर त्याच्या पोटाचे हाल होणार नाहीत. घरचे जेवण व्यवस्थित असते की पुरुषांची तब्येत चांगली राहते. त्यांची तब्येत चांगली राहते  जग जिंकता येईल. सुरेखाला भात आवडतो हे मला माहीत आहे पण आमटी-भात, दहीभात त्यामुळे त्यात तिचे कसे होणार…..! दिवसभर स्टॅमिना राहायला नको……? मी यासाठी तिच्याशी अशी वागते होते ग ….!. जिव्हाळा होता त्यामागे. सगळंच फोडून नाही सांगता येत आमच्या वयाच्या माणसांना ….माझं काही चुकलं का सांग बरं बाळा… सासु झालेल्या  सुरे आला आता माईन मधला आईचा ओलावा हवा हवासा वाटला. नव्या नवरीची आई व्हायला निघालो आहोत आपण, त्यासाठी इतकी वर्ष आपल्या संसाराची सावली झालेल्या माईंचा आशीर्वाद घ्यायलाच हवा.

सुरेखा झटकन बाहेर आली. माईंच्या पायाशी नम्रपणे वाकली. आपल्या त्याची क्षमा मागण्यासाठी…,  माईंनी तिला पोटाशी उचलून धरले. नव्या सुनेला तिच्या आईच्या प्रतिबिंबाची कवडसा मृदगंध बंगल्यात दिसू लागला होता. त्याकडे बघत असल्याने पानात अगोदर आमटी-भात वाढण्याचा प्रश्न विचारण्याचा संभ्रम संपला होता.

 

© सौ. सुनिता अनंत गाडगीळ

9420761837

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कौतुक ☆ सुश्री अश्विनी कुलकर्णी

☆ विविधा : कौतुक –  सुश्री अश्विनी कुलकर्णी ☆

कौतुक!एक आपलासा करणारा शब्द! कुणी कुणाचं कौतुक करावं?

जे खरच आवडतं आणि भावतंही …जे सहज सुंदर असतं… मग ते काव्य असो,लिखाण असो,चित्र असो, एखादी कलाकृती असो… एखाद्याच्या खेळातील यश असो…एखाद्याचा जबरदस्त विचार असो!

एखाद्याच्या शब्दाच कौतुक करावं, सुंदर हस्ताक्षराच करावं ,  एखाद्याच्या प्रगतीच, एखाद्याच्या निखळ आणि नितांत सुंदर भावनांचं कौतुक करावं! एखाद्याने केलेल्या पाककृतींचे कौतुक कराव, एखाद्याच्या अंगी असलेल्या छंदाच कौतुक करावं, तर प्रत्येकातील चांगलं काय? हे शोधून आणि ओळखून त्याच कौतुक करावं!

एखाद्याचा किरकोळ दोष सोडून देऊन, त्याकडे दुर्लक्ष करून त्या व्यक्तीला न तोडता, तिच्या  गुणांना जर आपुलकीच्या शब्दांनी कौतुकाच प्रेम दिल तर नक्कीच अवगुणही लयास जाऊ शकतील  !

कौतुक मारून मुटकून करता येत नसत. ते आतूनच करता येण म्हणजेच दुसऱ्यांच्या भावना जपण एकमेकांना आदर व आधार देण भावना न दुखावणार व माणुसकी जपणार, अस म्हणता येईल. खूप अवास्तव कौतुक करण्यापेक्षा एका शब्दाच झालेलं कौतुक, शाबासकी व पुढील वाटचालीस  प्रेरणा दायी ठरेल अस असाव! आपला एखादा कौतुकाचा आणि योग्य मार्गदर्शनाचा शब्द कित्येकांचे यशाचे आलेख उंचावू शकतो.

कौतुक करताना ती अतिशयोक्ती आहे असं वाटू नये…वरवर कौतुक करणारेही कळतात आणि तोंड देखल करणारे ही कळतात….

जे चांगलं आणि कौतुक करण्यायोग्य असत, त्याच कौतुक करायला पैसे पडत नसतात. समोरच्याची बुद्धिमत्ता, हुशारी, चांगुलपणा, ह्याच कौतुक करायलाही खर तर मन मोठं असावं लागतं….ते सर्वानाच जमत नाही. मी का म्हणून? हा ‘मी’ जो आहे तोच खरा नाशक असतो आपल्या प्रगतीचा आणि भावी आयुष्याचाही!

आणि दुसर एक… मत्सर! एक मोठा भयावह दंश!हा दंश ज्यांना झालेला असतो त्यांचा तर विचारच सोडून द्यावा….

मन साफ आणि निर्मळ असावं! कायमच … म्हणचे भाव स्वभाव होऊन जातो!

दुसर्यांना चांगलं द्यावं ,माफ करावं, दुसऱ्यांकडून शिकाव, दुसऱ्यांचे चांगलं चिंताव! दुसऱ्यांच्या आनंदात जे खरोखर आनंदी होतात ते खरच मनापासून कौतूक करत असतात, आणि दुसऱ्याच्या कौतुकास ही पात्र होतात!

 © सुश्री अश्विनी कुलकर्णी 

सांगली

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बिलोरी ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ विविधा : बिलोरी  ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆

उगवतीला पीतवसनाची आभा अलगद पसरत जाते अन् सृष्टी जागी होऊ लागते… दशदिशांत सामावलेला, अवघं चराचर व्यापून उरलेला अनंत रूपांतला कान्हुला आपल्या अंत:चक्षूंना जाणवू लागतो… पक्षांची किलबिल, झरे-नद्यांच्या प्रवाहांना बहाल करतो तो आपल्या बासरीतले सूर… नुकतेच भुईतून उगवलेले मौजेत डुलणारे कोंब, इवलुशी रोपटुली म्हणजे त्याच्यातल्या बाळलीलांना आलेलं उधाण…  झाडांच्या पालवीतल्या कोवळेपणात, अनेक हिरव्या रंगछटांच्या पानांच्या सळसळीत, फुलांच्या मनमोहक सुगंधात, त्यांच्याभोवती रुंजी घालणाऱ्या फुलपाखरांच्या बागडण्यात ओसंडत राहातं त्याच्यातलं सळसळतं चैतन्य… गुरा-वासरांच्या डोळ्यांतल्या मायाळूपणातही तोच वसलेला…

विशाल पर्वत-डोंगररांगांतून फैलावते त्याच्यातली भव्यता… अथांग, शांत सागराच्या सखोलतेत विसावतो त्याच्यातला तत्ववेत्ता, खळाळत्या लाटांतून बहरणारा ‘तो’ म्हणजे रासलीलेतला आवेगी शृंगार अन्  ओहोटीतल्या लाटांतून शांतावत जाणारा ‘तो’ म्हणजे त्याला अंतरी जपून ठेवणाऱ्या राधेच्या मनातलं त्याचं चिरंतन… ऋतूबदलात सामावलेली त्याच्या भावनांची आंदोलनं… झरणाऱ्या मेघसरींनी वसुंधरेला उल्हसित करणारा तो… प्रखर उन्हाच्या झळांतून ओसंडणारा त्याचा क्रोध आणि तो निमाल्यानंतर सुखावणारं शारदचांदणं घेऊन येणाराही तोच…

अस्ताचलाच्या भावविभोर क्षणांत मावळतीला आभाळभर सांडलेले रंग त्यानं मस्तकी धारण केलेल्या मोरपिसाचं नभदर्पणातलं प्रतिबिंब तर नव्हे!? असं वाटू लागतं आणि भूल पडत जाते ते निरखण्यात हरवून जाण्याची… हळूहळू ती रंगभूल साकार करत जाते यमुनेचा किनारा, रंगक्षणांत माखलेला घननीळ आणि त्याला डोळ्यांत साठवणारं अवघं गोकुळ… शृंगाराचं ते अद्भुत लेणं मनात अवतरत असताना भान हरपून जातं… अचानक त्याक्षणी तिथलेच होऊन जाताना यमुनेच्या तीरी चाललेल्या लगबगीत मन सामील होऊन जातं…

साक्षात मनभावन मनमोहन आपल्याला सामोरा आणि त्याच्या रंगांचं गारूड अनुभवण्यासाठीचं आपल्या जिवाचं आतुरलेपण, तो बिलोरी पीतवसन नवोन्मेष रोमारोमांत साठवून ठेवण्याची ओढ, त्या खट्याळ नजरेतले नाजूक सोनसळी संकेत टिपताना नुरलेपणातलं बेभानफूल माळण्याची अधीरता, त्याच्या ओठांवर रेंगाळणारी सानिका होण्याचा मोह आणि एका क्षणी अवघं तनमन कृष्ण झाल्याची जाणीव!…

अंतर्बाह्य व्यापणारा झंकार चैतन्यरंगाची उधळण करणारा आणि मनाच्या तारा छेडत राहून सौख्यधून अनुभवायला देणारा… तीच चाहूल त्यानं वेढून घेतल्याची, तीच खूण त्यानं त्याच्या रंगात माखून टाकल्याची आणि देहभान हरपवून त्याच्यात सामावून घेतल्याची!… तिथून पुढं बाकी रंगांचे रंग फिके पडत जात सावळरंगाचं देखणेपण अवतीभवती पसरत जातं… काळजाला चांदणभास देणारी शीतलता जाणवू लागते आणि अख्खं आभाळ नीरव शांततेत न्हात सावळरंग पांघरतं…!

त्या नीरवतेच्या कुशीत पहुडले असताना चेहरामोहरा नसलेलं कुणी काळजाचा ठाव घेत गालावर मोरपीस फिरल्याचे भास होऊ लागतात… आजूबाजूला एक धून विहरत असल्याची जाणीव होते… स्वत्व विरून जात मन त्या क्षणाच्या स्वाधीन होतं आणि आपल्यातल्याच त्याची नव्यानं ओळख पटते..

 

©  सुश्री आसावरी केळकर-वाईकर,

चेन्नई

मो 09003290324

ईमेल –  [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी

श्री सतीश स.कुलकर्णी 

अल्प परिचय  
सतीश स. कुलकर्णी : साधारण तीस वर्षांपासून पत्रकारितेत. ‘केसरी’, ‘लोकसत्ता’ ह्या दैनिकांमध्ये उपसंपादक ते वृत्तसंपादक. तीन वर्षांपासून मुक्त पत्रकारिता व व्यावसायिक लेखन, ब्लॉगलेखन. ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीच्या ‘डिजिटल महाराष्ट्र’ उपक्रमात  khidaki.blogspot.com ब्लॉगला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस. ललित लेखनाचे ‘शब्दसंवाद’  पुस्तक प्रकाशित. शब्दांकन, संपादन, पुनःलेखन, मुद्रितशोधन, पुस्तक परिचय आदी काम व्यावसायिक तत्त्वावर करतो.

☆ विविधा : फुलले हसू… ☆ श्री सतीश स. कुलकर्णी ☆

(डॉ. एडनवाला ह्यांना ‘स्माईल ट्रेन’ चा जीवनगौरव पुरस्कार अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या हस्ते देण्यात आला.)

अहमदनगरचा स्थापना दिन २८ मे रोजी असतो. यंदा त्याच्या एक दिवस आधीच शहरानं आपला एक सुपुत्र गमावला. केरळातील त्रिशूर येथे जवळपास ६० वर्षे राहिलेल्या डॉ. हिरजी सोराब एडनवाला ह्यांनी २७ मे रोजी अखेरचा श्वास घेतला. ‘स्माईल मेकर’ ही त्यांची सर्वदूर असलेली ओळख.

कोण होते हे डॉ. एडनवाला? नगरशी त्यांचा नेमका काय आणि कसा संबंध? त्यांचा जन्म १९३० मध्ये नगर येथे झाला. भिंगार कँप परिसरातील ११, नगरवाला रस्ता पत्त्यावरचा बंगला, हेच डॉ. एडनवाला ह्यांचं जन्मस्थळ. त्यांचं आजोळ नगर. त्यांची आई होमाई होरमसजी नगरवाला. पत्नी गुलनारही नगरनिवासीच. ते वाढले मुंबईमध्ये. तिथे वैद्यकीय शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्रिशूर (केरळ) येथेच स्थायिक झाले. त्यांच्या निधनाची बातमी ‘पारशी टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाली.

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या जन्मजात व्यंगामुळे अनेक मुलांचं आयुष्य बिकट होतं. व्यंगामुळे चेहरा विकृत होतो; बोलताना त्रास होतो. समाजात टिंगलटवाळी वाट्याला येते आणि ती मागे पडत जातात. हे जन्मजात व्यंग शस्त्रक्रियेने दूर करून ह्या मुलांच्या आयुष्यात हसू फुलवणं हेच डॉ. एडनवाला ह्यांनी जीवनध्येय मानलं. प्रदीर्घ कारकीर्दीत अशा १६ हजार मुलांवर शस्त्रक्रिया केल्या.

वैद्यकीय शिक्षणानंतर डॉ. एडनवाला ह्यांनी आपलं कार्यक्षेत्र म्हणून त्रिशूरच्या ‘ज्युबिली मिशन हॉस्पिटल’ची १९५८मध्ये निवड केली. अखेरच्या क्षणापर्यंत ते तिथेच कार्यरत राहिले. दुभंगलेले ओठ व टाळू ह्या व्यंगामुळे मुलांना किती त्रास होतो, हे सुरुवातीच्या काही वर्षांत त्यांच्या लक्षात आलं आणि हे दुःख दूर करण्याकडे त्यांनी लक्ष केंद्रित केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळे ह्या रुग्णालयातील ‘चार्ल्स पिंटो क्लेफ्ट सेंटर’ ह्या शस्त्रक्रियांचे भारतातील अग्रणी केंद्र बनले.

दुभंगलेले ओठ-टाळूवरची शस्त्रक्रिया खर्चिक आहे. अनेक पालकांना हा खर्च परवडणारा नसतो. दूरवरून येणाऱ्या गरीब पालकांना डॉ. एडनवाला ह्यांनी कधी निराश केलं नाही. रुग्णालय, मित्र आणि काही संस्था ह्यांच्या मदतीने ते ह्या मुलांवर मोफत शस्त्रक्रिया व उपचार करीत.

ह्याच व्यंगावर विविध देशांमध्ये उपचार करणारी, त्यासाठी पुढाकार घेणारी स्वयंसेवी संस्था म्हणजे ‘स्माईल ट्रेन’. साधारण २० वर्षांपूर्वी डॉ. एडनवाला ह्या संस्थेबरोबर काम करू लागले. मग ते संस्थेचाच एक घटक बनले. त्यांच्या निधनानंतर ‘स्माईल ट्रेन’ ने संकेतस्थळावर विशेष श्रद्धांजली लेख प्रसिद्ध केला.

हसू फुलविण्याचे हे मिशन डॉ. एडनवाला ह्यांनी अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत चालविले. नव्वदीच्या घरात असलेल्या या शल्यविशारदाने शेवटची शस्त्रक्रिया २०१९च्या डिसेंबरमध्ये केली.  श्री बेहेराम नगरवाला सांगतात की, आपला जन्म जिथं झाला, त्या घराबद्दल त्यांना फार जिव्हाळा होता. घराजवळचा हौद, तिथलं चिंचेचं झाड, आईने लावलेलं चिकूचं झाड ह्याची ते नेहमी आठवण काढीत. अगदी अलीकडेच त्यांनी घराचे फोटो मागविले होते. ते पाठवण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी आली.

… सविस्तर लेख वाचण्यासाठी इथं भेट द्या >> – https://khidaki.blogspot.com/2020/07/Adenwalla.html

 

©  श्री सतीश स.कुलकर्णी 

संपर्क – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

 

Please share your Post !

Shares
image_print