श्री सुनील देशपांडे
कवितेचा उत्सव
☆ “खरं आहे…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆
खरं आहे पहिल्यासारखं आज काही राहिलं नाही
पन्नास वर्षानंतर सुद्धा आजचं काही रहाणार नाही
पन्नास वर्षापूर्वी सुद्धा आजच्या सारखं नव्हतं काही
बदलणा-या काळाबरोबर बदलत असतं सारं काही
बदललं सारं तरी सारंच वाईट घडत नाही
प्रत्येक पिढी नंतर काही जगबुडी होत नाही
नातवंडं पहा आपली किती किती छान आहेत
आई वडील त्यांचे जरी म्हणतात ती वाह्यात आहेत
समुद्र ओलांडणारा म्हणे एके काळी भ्रष्ट असे
आज मात्र त्याच्या सारखा कर्तबगार कोणी नसे
नोकरी करणारी बाई तेव्हा अनीतिमान ठरत असे
जातीबाहेर लग्न करण्याने समाजस्वास्थ्य बिघडत असे
पदर पडला खांद्यावरून तर बाई चवचाल ठरत असे
चहा आणि सिनेमा सुद्धा तेव्हा व्यसन ठरत असे
सहशिक्षण झाले सुरू तरी ‘ती’ त्याच्याशी बोलत नसे
बोललेच कोणी मोकळे तर नांव त्याचे भानगड असे
पीरीयड बंक होत होते मॕटिनी हाऊसफुल्ल होत होते
सुधारलेले ती अन् तो चोरून सिनेमाला जात नव्हते ?
आधला असो वा मधला अलिकडचा वा पुढचा
नीतीमत्ता तिथेच असते दृष्टिकोन बदलतो तुमचा
रोमीओ होता चौदाचा बाॕबी नव्हती सोळाची ?
प्रेम त्यांचं अमर मात्र आर्ची बदनाम सैराटची ?
होऊदेना सैराट त्यांना घेऊदेना चटके थोडे
परिस्थितीचे खातील फटके शिकतील त्यातून धडे
वाढत्या वयात नीतिमत्तेचा ठेका कशाला घेता
वयाच्या क्वालिफिकेशनवर न्यायाधीश होता ?
न्यायाधीश होण्यासाठी मन संतुलित असावे लागते
पण वय जास्त झाल्यावर कित्येकांचे तेच बिघडते
© श्री सुनील देशपांडे
मो – 9657709640
email : [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈