मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆– क्रमशः भाग पहिला 

(तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.)  – इथून पुढे — 

पुढे भूमध्य समुद्राभोवती ग्रीकांची सत्ता कमी होऊन इटलीच्या बहुईश्वरवादी रोमन लोकांचे साम्राज्य प्रबल होऊ लागले. या रोमन साम्राज्यातील सीझर या महान योध्याचा समकालीन आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या पॉम्पे या महान रोमन सैन्य अधिकाऱ्याने 63BC ला पूर्वेला सम्राज्यविस्तार करताना जेरूसलाम जिंकून घेतले. ज्युंचे राज्य रोमन सम्राज्याचा एक भाग बनले. पुढे सातव्या शतकात मुस्लिम आक्रमण होईपर्यंत ज्युंची मायभूमी रोमन साम्राज्याच्या आधीपत्याखाली राहिली. विद्रोहाची थोडी जरी शंका आली तर रोमन अधिकारी ज्यु लोकांना सुळावर चढवत.  ज्यु लोकांचे येशू वा जीजस नावाचे अतिशय लोकप्रिय रबाय अर्थात धर्मगुरू होते. रोमन लोकांनी विद्रोहाच्या शंकेवरून येशूला सुळावर चढावले. याच येशूपासून इसाई अर्थात ख्रिश्चन धर्माची सुरुवात झाली. येशूच्या जन्मापासून सध्या वापरात असलेली कालगणना अस्तित्वात आली. त्याच्या जन्माआधीच्या काळाला BC तर नंतरच्या काळाला ईसवी सन वा AD असे म्हटले जाते. इसाच्या जन्मापासून सुरु झाले म्हणून ईसवी सन. ई. स. 33 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी येशूला सुळावर दिल्यामुळे ज्यु आणि रोमन संबंध बिघडत गेले. 66AD ला ज्यु लोकांनी उठाव केल्याने रोमन विरुद्ध ज्यु असे युद्ध पेटले. हा उठाव दडपन्यासाठी 70AD ला रोमन सम्राट टायटसला स्वतः यावे लागले. त्याने जेरूसलामला वेढा घालून शेवटी ते जिंकून घेतले. जेरूसलाम शहर तटबंदीसहित जमीनदोस्त करण्यात आले. सोलोमनचे दुसरे मंदिर नष्ट करण्यात आले. हजारो ज्युंची कत्तल केली गेली. बाकी 96 हजार ज्युंना गुलाम बनवून रोमला पाठवले गेले. ज्यु लोकांच्या नशिबी परत वनवास आला. पहिल्या ज्यु-रोमन युद्धामुळे जेरूसलाम मधील बहुतेक ज्यु लोकवस्ती घटली असली तरी ज्यु आपल्या मातृभूमीत परत येत राहिले. ज्यु लोकांनी आपल्या मातृभूमीत परत 50 मोठया वसाहती आणि जवळपास 985 मोठी खेडी वसवली. पण आता रोमन लोकांनी ज्यु लोकांना दडपून ठेवले होते. इतकेच नव्हे तर सोलोमनच्या भग्न मंदिराच्या जागी आता अपोलो या रोमन देवाचे मोठे मंदिर उभे केले गेले होते.

या धार्मिक दडपशाही विरुद्ध 132 AD मध्ये परत ज्यु लोकांनी रोमन सम्राज्याविरुद्ध उठाव केला. त्याला ‘बार कोखबा उठाव’ असे म्हणतात. रोमन सैन्याने सर्व ज्यु वस्त्या उध्वस्त केल्या. 5 लाख 80 हजार ज्युंची कत्तल केली गेली. उरलेले अनेक युद्धानंतर येणाऱ्या रोगाराई आणि दुष्काळात मारले गेले. जे वाचले ते गुलामगिरीत विकले गेले. ज्यु लोकांना जेरूसलाम मध्ये प्रवेश निश्चिद्ध केला गेला. रोमन सम्राट हेड्रीयन याने ज्युंच्या पवित्र मायाभूमीला मुद्दाम ज्युंच्या पारंपरिक शत्रूदेशाचे म्हणजे पॅलेस्टीनचे नाव दिले. हा भाग आता सिरिया-पॅलेस्टीना म्हणून ओळखला जाऊ लागला. हा उठाव ज्यु लोकांसाठी अतिशय विध्वंसक ठरला. तरी प्रकरण शांत झाल्यावर ज्यु परत मातृभूमीकडे परतू लागले. पुढे सातव्या शतकात रोमन जेरूसलामवर मुस्लिम आक्रमण झाले तेव्हा दीड लाख ज्यु तेथे राहत होते.

एकाच मुळातून उगवले असले आणि आधीचे सर्व प्रेषित सामान असले तरी जीजसला प्रेषित मानन्यावरून आणि धर्मपरिवर्तन प्रचाराच्या मुद्द्यावर हळूहळू इसाई धर्म ज्यु धर्मापासून वेगळा होत गेला. ज्यु लोकांमध्ये ‘प्रोसेलीटीझम’ अर्थात प्रयत्नपूर्वक धर्मपरिवर्तन निशिद्ध मानले जाते. याउलट ख्रिश्चन लोक धर्मप्रचार करण्याला कर्तव्य मानतात. या सतत होणाऱ्या प्रयत्नामुळे इसाई धर्म हळूहळू वाढत गेला.

इस 313 मध्ये रोमन सम्राट कोन्स्टंटीनने एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजारहित धर्माचे समाज संघटनातील महत्व ओळखले. एकेश्वरवादी धर्मामुळे प्रजा संघटित होते. अशी संघटित प्रजेचे नेतृत्व करणे हा सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा तसेच मिळालेले टिकवण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. अशी संघटित प्रजा शत्रूचा कडवा प्रतिकार करून आपल्या धर्माचे, राज्याचे आणि पर्यायाने राजसत्तेचे रक्षण करते. धर्मप्रसारचे निमित्त करून राज्यविस्तरही करता येतो. ग्रीक-रोमनांचे परंपरिक शत्रू असलेल्या पर्शीयाने सम्राट सायरस महान पासूनच एकेश्वरवादी झोरीयास्ट्रीयन म्हणजे सध्याच्या पारशी धर्माला सम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली होती. आधी ज्यु नंतर पारशी राजकारणी लोक जनतेची धार्मिक ओळख वापरून सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा हा खेळ आधीच शिकले होते. रोमन लोकांना हा खेळ उशिरा कळला. चाणाक्ष कोन्स्टंटीनने प्रथम हा खेळ ओळखला. आपल्या वाढवडिलांचा अनेक ईश्वरांना मानणारा धर्म सोडून त्याने वेगाने वाढणारा इसाई धर्म स्विकाराला. ख्रिश्चन या खेळत एक पाऊल पुढे गेले. पण ज्यु आणि पारशी लोकांमध्ये धर्माप्रचार करून धर्मांतर करणे निशिद्ध होते. ख्रिश्चनांनी धर्मांतर करणे निशिद्ध तर ठेवले नाहीच पण धर्मांतरासाठी चर्चची खास यंत्रणा कामाला लावली. इसाई धर्माला राजाश्रय मिळाल्याने आणि धर्मांतरासाठी प्रयत्न होऊ लागल्याने इसाई धर्माचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. तिकडे पर्शिया म्हणजे सध्याच्या इराण मध्ये एकेश्वरवादी पारशी धर्माने अनेक वर्षांपासून आपला जम बसवलेला होता. पर्शिया आणि ग्रीक-रोमन लोकांमध्ये वर्षानुवर्षे हाडवैर चालू होते. सध्याच्या सिरिया आणि इराक मधील सीमा या दोन महासत्तांच्या मधील सीमा होती. आता दोन्हीकडील महासत्तामध्ये राजकीय युद्धाऐवजी धर्मयुद्ध होऊ लागले. दोन्ही कडील कडवे सैनिक एकमेकांशी लढताना माघार घेण्यास तयार नसत. प्रचंड मनुष्यहानी होई. त्यामुळे दोन्ही महासत्ता हळूहळू कमजोर होऊ लागल्या. 

तिकडे दक्षिणेला अरबस्थानच्या वाळवंटात ई स 570 मध्ये मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म झाला. वाळवंटातील अरब मूर्तिपूजक आणि अनेक ईश्वरांना मानणारे होते. व्यापारानिमित्र पैगंबर साहेबांचे सिरियाला वारंवार जाणे होई. समाजाला संघटित करुन सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी मूर्तिविरहित एकेश्वरवादी धर्माचा कसा उपयोग होतो हे मुहम्मद पैगंबरांच्या चाणक्ष्य बुद्धीने लवकरच ओळखले. मग त्यांनी अरबस्थानात आपल्या वेगळ्या एकेश्वरवादी संघटित धर्माचा प्रचार सुरु केला. आपल्या नव्या धर्माला इस्लाम असे नाव दिले. धर्म निर्माण करताना त्यांनी फारशी वेगळी मेहनत घेतली नाही. ज्यु आणि इसाई लोकांच्या एकेश्वरवादी धर्मग्रंथातील प्रेषित आणि पैगंबरांच्या गोष्टी त्यांनी इस्लाममध्ये जशाच्या तश्या घेतल्या. अगदी देवदूतही तेच ठेवले. फक्त ज्यु आणि इसाई लोकांच्या देवांच्या ऐवजी अरबी भाषेतील अल्लाह हा देवच एक खरा परमेश्वर आहे असे त्यांनी कुरानात म्हटले.अल्लाहने या आधी धाडलेल्या प्रेषितांनी दिलेला अल्लाचा संदेश लोकांनी भ्रष्ट केला आहे. आपल्याला कुरानाच्या रूपाने अल्लाने दिलेला संदेश हा कधीही भ्रष्ट न होणार अंतिम संदेश असेल असे त्यांनी जाहीर केले.

मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यू नंतर इस्लामच्या अनुयायांनी मौखिक कुराण एकत्रित करून लिहुन काढले. मी असे म्हटलो होतो किंवा नव्हतो असे म्हणायला त्या वेळी पैगंबर हजर नव्हते. लिखित कुरानात जुन्या एकेश्वरवादी धर्मात बदल करून सत्ता आणि संपत्तीचा हा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला गेला..

1)  धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा प्रमुख एकच असल्याने दोन्ही सत्ता एकाच माणसाचे हित पाहू लागल्या. त्यामुळे दोन्ही सत्तांचे एकमेकांवर नियंत्रण ठेवणे बंद झाले आणि दोन्ही सत्ता निरंकुश झाल्या. राजसत्ता आता कुठल्याही राजकीय युद्धाला धर्मयुद्ध ठरवू शकत होती. 

2)  प्रत्येक मुसलमानासाठी धर्मप्रचाचारार्थ जिहाद करणे कर्तव्य ठरवले गेले. त्यामुळे प्रत्येक सामान्य मुसलमान इस्लामचा कडवा सैनिक झाला. 

3) इस्लामी राजवटीत इतर धर्मांचे सहअस्तित्व जवळपास अमान्य केले गेले. मूर्तिपूजाकांपुढे आणि बहुईश्वरवादी लोकांपुढे धर्मांतर वा मृत्यू हे दोनच पर्याय शिल्लक ठेवले. एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजक नसलेल्या लोकांनाही झिजिया दिला तरच इस्लामी राष्ट्रात राहता येणे शक्य होते.

4) पुरुषप्रधान संस्कृतीत धर्मांतरचा निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना असल्याने इस्लाम धर्मात पुरुषांना अनेक वाढीव अनैतिक प्रलोभने नैतिक करून दिली गेली. तसेच युद्धानंतर लोकांची संपत्ती लूट, निहत्या लोकांची हत्या, आणि युद्धात हाती लागलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवणे अशा युद्ध अपराधांना धार्मिक नैतिकतेची बैठक दिली गेली. या प्रलोभनांमुळे पटपट धर्मपरिवर्तन होऊ लागले. युद्धात मेले तर जन्नत मध्ये या पेक्षा जास्त मज्जा मिळेल याचे वचन इस्लाम देतो. मुसलमान पृथ्वीवर दुःख भोगायल आला आहे आणि खरे जीवन तर मेल्यावर तिकडे स्वर्गात सुरु होणार आहे अशी शिकवण इस्लाम देतो. त्यामुळे मुसलमान मनुष्याची युद्धात मृत्यूची भीती कमी होते. काहींना तर शाहिद होऊन पटकन स्वर्गात जाण्याची आत्मघाती ओढ लागते. या सर्वांमुळे मुस्लिम पुरुष सदा युद्धासाठी उतावळे राहू लागले. असे ब्रेन वॉश झालेले कडवे मूठभर मुस्लिम योद्धे जिहादच्या वेडात आपल्यापेक्षा संख्येने खूप जास्त असलेल्या शत्रू सैन्याला जाऊन भिडत आणि कटून मरत. पण मरण्याआधी ते शत्रूचे बरेच नुकसान करून मरत असत. त्यामुळे मुस्लिम सैन्याला त्यांच्यासारखा त्याग करण्यास प्रोत्साहन मिळे आणि शत्रूचे मनोधैर्य खचे. त्यांचा उपयोग मुस्लिम राजकर्त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी मोठया प्रमाणात करून घेतला. साम्राज्य विस्ताराचे प्रत्येक युद्ध जिहाद म्हणून घोषित केले गेले.

ज्यु आणि इसाई लोकांनी हा नवा धर्म स्वीकारावा यांसाठी या जुन्या धर्मांमधील प्रेषित इस्लामात घेतले गेले. पण सोबत जुन्या धर्माला काळानुरूप भ्रष्ट झाल्याचे सांगून इस्लाम या आपल्या परमेश्वराशी इमानदार असलेल्या एकमेव धर्मात वेगळेपण निर्माण करून धर्मांतराला पर्याय शिल्लक ठेवला नाही. अब्रहम, इसाक, जेकब, मोजेस, डेव्हिड, सोलोमन या ज्यु पैगंबरांना कुराणकारांनी अनुक्रमे इब्राहिम, इसा, याकूब, मुसा, दाऊद, सुलेमान अशी अरबी नावे दिली. मुहम्मद पैगंबरांच्या काळी अरबस्थानात काही ज्यु कबिले आणि काही ख्रिश्चन लोक राहत होते. भविष्यात प्रेषित येणार आहे अशी त्यांची श्रद्धा होती. इस्लाम हे ज्यु आणि ख्रिश्चन धर्माचेच सुधारित रूप असल्याचा प्रचार करत असल्यामुळे मदिनेतील सधन आणि प्रतिष्ठीत ज्यु लोक आपल्याला पटकन पैगंबर मानतील अशी मुहम्मद पैगंबरांची अपेक्षा होती. त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-1 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

सध्या आपण रोज इस्राईल आणि हमास युद्धच्या बातम्या ऐकत आहोत. 7 ऑक्टोबर च्या सकाळी हमास या पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने इस्राईल वर हल्ला करून क्रूरपणे 1400 निशस्त्र नागरिकांचा बळी घेतला. महिलांवर अत्याचार केले. लहान मुलांचे गळे कापून क्रूरपणे हत्या केली गेली. दोनशेहुन अधिक लोकांना बंदी बनवून गाझा मध्ये नेले गेले. याच्या प्रतिक्रियेत इस्राईलने गाझापट्टीवर बॉम्बहल्ले केले. आता इस्राईली फौजा गाझा मध्ये शिरून हमासला नष्ट करायचे काम करत आहेत.

संपूर्ण युरोप आणि अमेरिकेतील प्रत्येक मोठया शहरांत पॅलेस्टीन आणि हमासच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले. त्याला प्रतिक्रिया म्हणून या शहरांमध्ये इस्राईलच्या समर्थनार्थ प्रदर्शने होऊ लागले आहेत. संपूर्ण जगाचे राजकारण या घटनेमुळे धवळून निघाले आहे. 

पण सतत चर्चेत असलेला हा इस्राईल देश आणि ज्यु धर्म प्रकरण आहे तरी काय?

बायबलनुसार एकेश्वरवादी इस्राईली लोकांची गोष्ट चार हजार वर्षांपूर्वी सुरु होते.

आपण सर्वांनी बायबल मधील नोव्हाच्या नौकेची गोष्ट ऐकली असेलच. बायबलनुसार चार हजार वर्षांपूर्वी या नोव्हाचा नववा वंशज उर या इराकी शहरांत राहत होता. त्याला तीन मुले होती. त्यापैकी अब्राहम नावाच्या मुलाचा जन्म ई स पूर्व 1900 साली झाला. पुढे त्याला एकेश्वरवादी देवाने दर्शन दिले. एकेश्वरवादाचे वचन घेऊन त्याला कॅनन (सध्याचे इस्राईल आणि पॅलेस्टीन) हा भाग कायमस्वरूपी देण्याचे वचन दिले. या भागाला बायबल मध्ये ‘प्रॉमिस्ड लँड’ असे म्हटले आहे.  देवाच्या आज्ञेनुसार अब्रहम आपल्या कुटुंबकबिल्यासह या भागात मुलबाळस्थानन्तरीत झाला. या अब्राहमलाच कुराणात इब्राहिम असे म्हटले आहे. 

अब्रहम 170 वर्षे जगाला. त्याच्या पत्नी साराला बरेच दिवस  झाले नाही. तात्कालिक प्रथेप्रमाणे तिने तिच्या हेगार या दासीमार्फत नवऱ्याकडून एक मूल होऊ दिले. त्याचे नाव इस्मेल असे ठेवले गेले. अब्रहम तोवर शंभरी जवळ पोहचला होता.  इसाक अशी त्यांची नावे होती. पुढे साराला स्वतःला मुलगा झाला. त्याचे नाव इसाक असे ठेवले गेले. थोरला इस्मेल दासीपुत्र असल्याने धाकटा असूनही इसाकला बापाचा वारसा मिळाला. संपत्ती आणि प्रॉमिस्ड लँड मधून बेदखल झालेल्या या इस्मेल (इस्माईल) पासून अरबस्थानातील अरब वंश सुरु झाला असे मुस्लिम मानतात. 

इसाक आणि त्याची पत्नी रेबेकाला जेकब नावाचा मुलगा झाला. या जेकबलाच पुढे इस्राईल असे संबोधले गेले. या जेकबलाच कुराणात याकूब असे म्हटले आहे. 

जेकबला चार बायकांपासून बारा मुले झाली.

जेकबच्या चार बायकांपैकी दोन मुख्य बायका (रेचल आणि लिया या दोघी सख्ख्या बहिणी) होत्या तर दोन उपस्त्रिया स्त्रिया होत्या. त्यांना झालेली बारा मुले खालील प्रमाणे होती.

1) रेचल – जोसेफ आणि बेंझामिन 

2) लिया – रुबेन, सिमियन, लेवी, जुडा, इस्साचर, झेबूलून 

3) बिलहा – डॅन आणि नेफ्ताली 

4) झिलपा – गाड आणि ॲश

या बारा भावांडापैकी जोसेफ बापाचा अतिशय लाडका होता. धाकटा जोसेफ वडिलांचा प्रिय असल्याने बाकी अकरा भावां त्याच्याविषयी ईर्षा वाटे. एक दिवस या इर्षेंपोटी सर्व भावांनी मिळून जोसेफला गुलामांच्या व्यापाऱ्याला विकून टाकला. जोसेफला हिंस्त्र प्राण्याने मारून खाल्ले असे त्यांनी वडिलांना सांगितले.

गुलाम म्हणून विकला गेलेला जोसेफला पुढे इजिप्तमध्ये नेले गेले. जोसेफला स्वप्नांचा अर्थ लावता येत असे. आपल्या अंगभूत गुणांमुळे जोसेफ इजिप्तच्या राजाचा लाडका झाला. राजाने त्याला गुलामगिरीतुन मुक्त होऊन इजिप्तचा मोठा अधिकारी केला. या जोसेफला कुरानात युसूफ असे म्हटले आगे.

जेकबचा कुटुंब कबिला कॅननच्या भागात गुण्यागोविंदाने राहत असताना भयंकर दुष्काळ पडला. दुष्काळात खाण्यापिण्याचे वांधे झाल्यामुळे हे बारा भाऊ इजिप्त मध्ये कामधंदा शोधायला गेले. जोसेफने त्यांना ओळखले पण भाऊ त्याला ओळखू शकले नाहीत. इजिप्तमध्ये मोठा अधिकारी झालेल्या जोसेफने दयाळू जोसेफने त्याच्या सर्व भावांना माफ केले. त्या सर्वांना नाईल नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पूर्वेकडील सुपीक असलेली गोशेन ही जहागीर म्हणून मिळाली. ते तिथेच स्थायिक झाले. हे सर्व इस पूर्व विसाव्या शतकाच्या आसपास घडले असावे असे मानले जाते.

पुढे इजिप्तमध्ये सत्तांतर झाले आणि सर्व ज्यु कबिले इजिप्शियन लोकांचे गुलाम झाले. 430 वर्षे गुलामगिरीत सडल्यानंतर मोझेस (कुराणात मुसा) या ज्यु पैगंबराने सहा लाख ज्यू लोकांना गुलामीतून मुक्त करून त्यांना आपल्या मायभूमीकडे परत नेले. हे सर्व इस पूर्व पंधराव्या शतकात घडले असावे असे मानले जाते. मोझेसच्या मृत्यू नंतर जोशूवा (येशूवा) या त्याच्या सहकाऱ्याने कॅनॉनचा प्रदेश जिंकून घेतला. या भागात प्रत्येक ज्यु काबील्याने आपले आपले छोटे राज्य स्थापित केले. हेच ते इस्राईलचे बारा कबिले. जेकबच्या बारा मुलांचे हे बारा वंशज होते.

इस पूर्व 1175 मध्ये भुमध्य सागरातील क्रिट बेटावर राहणाऱ्या बहुईश्वरवादी ग्रीक लोकांनी सध्याच्या गाझापाट्टीच्या सुपीक भुभागावर वसाहती वसवल्या. हे विस्तारवादी ग्रीक लोक पॅलेस्टिनी वा फिलिस्टिनी म्हणून ओळखले जात. खरे तर पॅलेस्टिनी आणि इस्राईलच्या लोकांच्या वसाहती शेजारी शेजारी असलेल्या वेगवेगळ्या भुभागवर होत्या. गाझामध्ये राहणाऱ्या ग्रीक पॅलेस्टिनी लोकांना इस्राईली शेजाऱ सहन होत नव्हता. राज्य विस्तारासाठी ते सतत इस्राईलवर हल्ले करु लागले. इस्राईलच्या लोकांचे ग्रीक पॅलेस्टिनी लोकांसोबत वारंवार खटके उडू लागले. त्याविरोधात सम्युअल या पैगंबराने सर्व ज्यु कबिल्यांच्या राजांना एक करून ज्यु लोकांचे संघराज्य स्थापन केल. साऊल या सुज्ञ व्यक्तीला त्यां सर्वाचा महाराज केला. हे सर्व ई.स. पूर्वी अकराव्या शतकात घडले. पुढे इस पूर्व 1000 व्या वर्षी अशाच एका खटक्यात डेव्हिड या मेंढपाळ मुलाने गोलियथ या धिप्पाड पॅलेस्टिनी योध्याला द्वंद्व युद्धात ठार मारले. हा ईश्वरी संकेत आहे असे समजून पॅलेस्टिनी लोक घाबरून युद्धातून पळून गेले. युद्ध टाळले. डेव्हिड महाराज साऊल चा लाडका झाला. त्यांनी त्याला आपला जावई करून घेतला. पुढे पॅलेस्टिन सोबत झालेल्या आणखी एका युद्धात महाराज साऊल आपल्या मुलांसह मारले गेले. मग डेव्हिडला लोकांनी ज्युंचा महाराजा केले. त्याने पुढे मोठा राज्य विस्तार केला. त्याने जेरूसलाम हे शहर जिंकून घेतले आणि तेथे आपली राजधानी वसवली.

डेव्हिड पासून पुढे खऱ्या अर्थाने ज्यु लोकांमध्ये राजघराणेशाही सुरु झाली. डेव्हिड च्या सोलोमन(मुसलमानांसाठी सुलेमान)या मुलाने महाराजा झाल्यावर आर्क ऑफ कोव्हीनंट साठी जेरुसलामचे प्रचंड मंदिर बांधले. तोपर्यंत मोझेस चे दहा ईश्वरी आदेश असलेला दगड ‘आर्क ऑफ कोविंनंट’ या पालखीत टाकून पाठीवर वाहिला जाई. आता त्यासाठी स्थायी मंदिर तयार झाले होते. ज्यु लोकांसाठी शांती, सुरक्षा आणि भरभराटीचा सुवर्णकाळ सुरु झाला होता.

सोलोमनने मंदिर बांधण्यासाठी काही कर लावले होते. पुढे ते कर कमी करण्यावरून ज्यु संघराज्यातील उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये वाद झाला. 931 BC मध्ये इस्राईलच्या संघराज्याचे दोन तुकडे झाले. उत्तरी तुकड्याला उत्तरी इस्राईल म्हटले गेले तर दक्षिणेकडील राज्याला जुडाचे राज्य म्हटले गेले. उत्तरेतील दहा काबील्यांनी करात सवलत देणाऱ्या जेरोबोला आपला राजा घोषित केले. दक्षिणेतील जुडा आणि बेंझमिनया दोन काबील्यांनी सोलोमनचा मुलगा रेहोबोम याला दक्षिणेतील जुडाच्या राज्याचे राजा मानले. उत्तरेतील समारिया हे शहर उत्तरी इस्राईलची राजधानी झाली. त्यामुळे या राज्याला समारियाचे राज्य असेही म्हटले जाते. दक्षिणेतील जुडा राज्याची राजधानी जेरूसलेमच राहिली. या दुफळीमुळे ज्यूंचे राज्य कमजोर झाले. 

723 BC मध्ये उत्तरेकडील सुमारिया राज्यावर अस्सेरिअन लोकांनी हल्ला केला आणि उत्तरी इस्राईलचे राज्य जिंकून घेतले. उत्तरेतील दहा ज्यू काबील्यांना त्यांच्या भूमितून परगंदा व्हावे लागले. या दहा टोळ्यांना इस्राईलच्या हरवलेल्या दहा टोळ्या असे म्हटले जाते. यापैकी काही काबिले अफगाणिस्तानात आणि काही ईशान्य भारतात स्थायिक झाल्याचा समज आहे.

यानंतर दक्षिणेतील जुडाचे राज्य पुढे पन्नास वर्ष टिकले. पण 587 BC मध्ये बॅबीलॉनच्या राजाने दक्षिनेतील जुडाच्या राज्यावर हल्ला करून जेरुसलाम शहर भुईसपाट केले. सोलोमनचे मंदिर पाडून टाकण्यात आले. दक्षिणेतील सर्व ज्यु लोकांना गुलाम बनवून बॅबीलॉनला नेण्यात आले. त्यांची गुलामगिरी पुढे 50 वर्ष चालली.

सायरस महान या पारशी(इराणी) राजाने 538BC मध्ये बॅबीलॉन जिंकून घेतले आणि ज्यु लोकांना गुलामीतून मुक्त केले. ज्यू लोकांना परत त्यांच्या मायभूमीत वसण्याची परवानगी दिली. सगळीकडून ज्यु परत मायभूमीत परत आले. ज्यु लोकांना जेरूसलाममधील जुन्या खंडर झालेल्या सोलोमनच्या मंदिराच्या जागी नवीन मंदिर बांधन्याची परवानगी मिळाली. इस्रा या पुजाऱ्याच्या पुढाकाराने सोलोमनचे दुसरे मंदिर बांधले. 

पुढे अलेक्झांडरच्या नेतृत्वात बहुईश्वरवादी ग्रीकांनी पर्शियन साम्राज्य नष्ट केले. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे साम्राज्य त्याच्या सरदारांमध्ये विभागले गेले. ज्यूंचे राज्य सम्राट सेलूसीडच्या वाट्याला आले. पॅलेस्टिनी लोक ग्रीक असल्याने ग्रीक लोक आत्तापर्यंत इस्राईलचे पारंपरिक वैरी झाले होते. आता ग्रीक लोक ज्यू  लोकांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करू लागले. ग्रीक आणि इस्राईली ज्यू लोकांमधील तणाव वाढू लागला. शेवटी 167 BC मध्ये माकबीयन या पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली ज्यू लोकांनी ग्रीकांच्या विरुद्ध उठाव केला. तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.

– क्रमशः भाग पहिला 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नंदकुमार सप्रे… ☆ श्री सुनील होरणे ☆

श्री सुनील होरणे

अल्प परिचय

नाव : सुनील नीलकंठ होरणे, अहमदनगर

शिक्षण: बी.ए.(अर्थशास्त्र)

व्यवसाय : इंटेरिअर डिझायनर आणि कॉन्ट्रॅक्टर

छंद : मराठी साहित्य लेखन, मानवी नातेसंबंध, व्यक्ती चित्रण, अध्यात्म आणि हिंदी चित्रपट

सामाजिक कार्य : विविध संस्थांमध्ये कार्यरत, एकाकी वृद्ध व्यक्ती तसेच, विद्यार्थी आणि युवकांसाठी विशेष कार्य. रामकृष्ण  मिशन बेलूर मठ कलकत्ता याना संलग्न असलेल्या संस्थेमध्ये कार्यरत.

? इंद्रधनुष्य ?

||◆||  नंदकुमार  सप्रे  ||◆||  श्री सुनील होरणे ||◆|| 

मध्यंतरी  एका अंत्यविधी साठी अमरधाम मध्ये गेलो होतो. जवळचे नातेवाईक आणि मृताच्या घरचे लोक चितेच्या ओट्याजवळ तयारी करत होते. इतर जे परिचित हजेरी लावण्या साठो आले होते, ते नेहमी प्रमाणे समोरच्या पायऱ्यांवर  एकमेकांची ख्याली खुशाली विचारत हास्य विनोदात दंग होते. सर्व विधी पूर्ण झाल्यावर एक गृहस्थ तिथे आले. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत दोन तीन पाण्याच्या बाटल्या आणि एक थर्मास होता.

मृताच्या घरच्या लोकांना त्याने पाणी पिण्यास दिलं आणि नंतर पेपर कपमध्ये चहा प्यायला दिला. कोणी नातेवाईक असावेत असं मला वाटलं.

या घटने नंतर बऱ्याच दिवसांनी मी नोबल हॉस्पिटलमध्ये कोणालातरी भेटायला गेलो होतो.

ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बरेच लोक बसले होते. बहुधा त्यांच्या कोणा नातेवाईकांचं आत ऑपरेशन चालू असावं. आणि अचानक बघितलं तर त्या दिवशी अमरधाम मध्ये दिसलेले ते गृहस्थ इथं देखील त्या बसलेल्या लोकांना चहा देत होते. आता माझी उत्सुकता वाढली. थोड्या वेळाने सर्वांना चहा देऊन ते थोडे बाजूला आले, मी ताबडतोब त्यांच्या जवळ गेलो.

“नमस्कार!” मी म्हंटल. त्यांना हे अपेक्षित नसावं ते कावरे बावरे होऊन माझ्याकडं बघू लागले. मी पुन्हा नमस्कार केला, या वेळी त्यांनी फक्त मान हलवली.

“आपलं नाव काय?” मी विचारलं. त्यांचा पुन्हा प्रश्नार्थक चेहरा. यावेळी कपाळावर आठया देखील. 

“तुमचं नाव सांगा.” त्यांनी तुटकपणे मलाच उलटा प्रश्न केला. आता मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो

“अहो महाराज, माझं नाव प्रशांत कदम. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून नाव विचारलं. आपण दोन मिनिटं बोलू शकता का?”

“नाही.” समोरून फटकन उत्तर आलं. आता मला धक्के पचवायची सवय झाली होती.

“नाही म्हणजे आत्ता नाही कारण आत्ता मला आणखी बऱ्याच ठिकाणी जायचंय. आपण नंतर कधीतरी भेटू. आणि माझं नाव नंदू… म्हणजे नंदकुमार सप्रे.”

एवढं बोलून ते तरा तरा चालायला लागले. मी त्यांच्या पाठमोऱ्या छबी कडे बघतच राहिलो.

साधारण साडेपाच फूट उंची,  मध्यम किंवा त्यापेक्षा बारीक शरीरयष्टी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा, पायात चपला. अहो हा माणूस बोलायला तयार नाही.

पण एक गोष्ट लक्षात आली. याला कुठंतरी काहीतरी दुःख आहे, वेदना आहेत. आणि त्या दिवसापासून माझा त्याच्यातील इंटरेस्ट वाढू लागला. आता याला पुन्हा एकदा भेटलं पाहिजे.

आणि तो दिवस लौकरच आला. मी कुठंतरी चाललो होतो आणि हे महाराज रस्त्याच्या कडेला सायकल हातात धरून उभे होते. बहुधा कोणाची तरी वाट पहात असावेत. मी ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला संगितली आणि पटकन खाली उतरून सप्रेच्या समोर जाऊन उभा राह्यलो.

“सप्रे कोणाची वाट बघताय?” मी.

“नाही वाट नाही बघत, सायकल पंक्चर झालीय.”

“अरेच्चा, थांबा आपण पंक्चर काढायची व्यवस्था करू.” मी ड्रायव्हरला बोलावून सायकल पंक्चर काढायला पाठवलं.

“अहो तुम्ही कशाला त्रास घेता, मी आणली असती करून.” सप्रे कसनुसा चेहरा करून म्हणाले.

“असू द्या हो सप्रे, चला आपण तो पर्यंत गाडीत बसून बोलू.”  सप्रे अक्षरशः बळजबरीने गाडीत येऊन बसले.

अतिशय अस्वस्थ झाले होते. मी बोलायला सुरुवात केली, “सप्रे ही चहाची काय भानगड आहे? जरा सांगता का? सप्रे गप्प. मला कळेना हा माणूस असा का वागतोय, धड बोलत देखील ही.

आणि माझं लक्ष्य त्यांच्या चेहऱ्याकडे गेलं, अहो हा माणूस रडत होता. त्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा वहात होत्या. मला एकदम अपराधी असल्या सारखं वाटलं. मी दोन्ही हातांनी सप्रेना धरलं “सप्रे मला माफ करा. तुम्हाला दुखवायचा माझा हेतु नव्हता. जाऊ द्या, मला काही सांगू नका पण कृपा करून तुम्ही शांत व्हा. पुन्हा मी तुम्हाला असले प्रश्न विचारणार नाही. I am sorry.”

दोन तीन मिनिटांनी सप्रे शांत झाले आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. “प्रशांतजी, आज पर्यंत या विषयावर मी कोणाशी बोललो नाही पण आज मी तुम्हाला सगळं सांगणार, याचं कारण अस आहे की, फक्त तुम्ही एकट्यानेच हा प्रश्न मला विचारला.

मी आणि माझी पत्नी दोघेही सरकारी अधिकारी.

मुलगा आणि सून दोघेही अमेरिकेत. तीन वर्षांपूर्वी पत्नीचे कोविड मध्ये निधन झाले. आम्ही दोघेही बाधित होतो. मला हॉस्पिटल मिळालं, तिला खाजगी हॉस्पिटल मिळालं नाही म्हणून सरकारी दवाखान्यात ऍडमिट केलं आणि चौथ्या दिवशी ती गेली.

इथं मी कोणालाही दोष देऊ इच्छित नाही, कारण परमेश्वरावर माझा पूर्ण विश्वास आहे. तिची वेळ भरली होती, त्यामुळे ती गेली, एवढंच सत्य आहे.

आणि मुळातच एकदा माणूस गेल्यावर त्याची कारणमीमांसा तपासत बसू नये असं मला वाटतं.

तिला चहा फार आवडायचा, दिवसातून चार पाच वेळा तरी ती चहा घेत असे. दुर्दैवाचा भाग असा की तिला हॉस्पिटलमध्ये चार दिवसात एकदाही चहा मिळाला नाही. आणि या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं आणि त्याच वेळी मी ठरवलं की आपण काहीतरी करायचं.

माणूस गेल्यानंतर त्याचे जवळचे नातेवाईक जास्त दुःखी असतात. आणि त्यांना काही हवंय का? हे देखील कुणी विचारत नाही. म्हणून मी थेट स्मशानभूमीत जाऊन ही सेवा देतो. त्यांच्या समाधानी चेहऱ्यात मला माझ्या पत्नीचा चेहरा दिसतो. हॉस्पिटल मध्ये गंभीर पेशंटचे नातेवाईक अतिशय तणावात असतात. त्यांना मी जाऊन भेटतो. चहा देतो, चौकशी करतो आणि दिलासा देतो. थोडा वेळ का होईना पण त्यांना बरं वाटतं. मी रिटायर असल्याने माझ्याकडे भरपूर वेळ आहे.

सुदैवाने आर्थिक परिस्थिती चांगली आहे. मोठा बंगला आहे आणि मी एकटाच आहे. म्हणून तिथं पंधरा अनाथ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केलीय.

मी प्रचंड भारावून गेलो होतो. काय बोलावे हे देखील मला कळत नव्हते.

“सप्रे तुम्ही फार मोठं काम करताय, You are great.” एवढंच मी बोलू शकलो. सप्रेची सायकल तयार होऊन आली होती.

सप्रे गाडीतून उतरले, मला त्यांचं व्हिजिटिंग कार्ड दिलं आणि ते निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी फक्त नतमस्तक झालो.

त्यानंतर सप्रेची आणि माझी गाठ भेट नाही.

एक दिवस कोणीतरी सप्रे गेले अस सांगितलं.

मी सप्रेच्या घरी गेलो. बंगल्याच्या गेटवर मोठा बोर्ड होता “मालती सप्रे मेमोरियल ट्रस्ट” आत एक जोशी नावाचे मॅनेजर होते. त्यांनी सांगितलं इथं राहणारे विद्यार्थीच आता सप्रेचं काम करतात.

मला आनंद चित्रपटातला शेवटचा प्रसंग आठवला.

राजेश खन्ना मरतो आणि नंतर अमिताभ तिथं येतो. त्यावेळी तो दोन वाक्य बोलतो.

“आनंद मरा नहीं,  आनंद मरते नहीं।

© श्री सुनील होरणे

९८२२११६६३६

E-mail : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

बहिणाबाई चौधरी – अहिराणी-मराठी कवयित्री... – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

स्मृती दिन ३ डिसेंबर,१९५१

बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि.मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी २४ ऑगस्ट १८८० रोजी महाजनांच्या घरी झाला.

१८९३ साली वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला.बहिणाबाईंना तीन मूळ होती  ओंकार, सोपान आणि काशी. वयाच्या तिसाव्या वर्षी  बहिणाबाईंना वैधव्य आले.

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या.

त्या निरक्षर होत्या; तरिही त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. छापील मजकुराविषयीची ही असोशी अनक्षर बहिणाबाईंनी या कवितेत उतरवली आहे. 

मंमई बाजारावाटे

चाले धडाड-दनाना

असा जयगावामधी

नानाजीचा छापखाना… 

नानाजीचा छापखाना

त्यात मोठे मोठे पुठ्ठे

तसे शाईचे दराम

आन कागदाचे गठ्ठे… 

किती शिशाच्या चमट्या

ठसे काढले त्यावर

कसे निंघती कागद

छापीसनी भरभर…

चाले ‘छाप्याचं यंतर’

जीव आठे बी रमतो

टाकीसनी रे मंतर

जसा भगत घुमतो… 

मानसापरी माणूस

राहतो रे येडजाना

अरे होतो छापीसनी

कोरा कागद शहाना…

सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावस भाऊ ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या.

पुत्र सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर लिहून घेतलेल्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे म्हणाले,

‘ हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे’

आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली.

‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीची ओळख  महाराष्ट्राला आणि जगभर पसरलेल्या माताही माणसाला झाली.ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता लिहून न ठेवल्यामुळे  त्यांच्याबरोबरच नष्ट झाली आणि माय मराठीचे अतोनात नुकसान झाले.

बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचल्या आहेत .त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ.सणसोहळे; काही ओळखीची माणसे,असे आहेत.

अहिराणी (खानदेशी) भाषेतून; अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे.खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग – या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.

उदा. ‘असा राजा शेतकरी चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.

तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा कमीत कमी शब्दात अर्थाची कमाल त्या करत असत.

‘अरे संसार संसार – जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके – तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे – आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे – तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, (आणि कमी) शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत.बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.

बहिणाबाईंच्या काव्यरचनांवर आधारित “खानदेशचा मळा आणि मराठवाड्याचा गळा” हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाड्यातील गायकांच्या आवाजात सादर केला जातो. बहिणाबाई चौधरींच्या कवितांवर आधारित व हा कार्यक्रम दत्ता चौगुले आणि माधुरी आशिरगडे यांनी संगीतबद्ध केला आहे.

दूरदर्शनने बहिणाबाईंवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे यांनी बहिणाबाई साकारली होती. उत्तरा केळकर यांनी त्यामधली गाणी .ओव्या म्हटली आहेत त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईंच्या कवितांच्या प्रेरणांवर आधारित ‘बहिणाई’ नावाच्या लघुपटाची निर्मिती केली.

बहिणाबाईंच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद ’फ्रॅग्रन्स ऑफ दि अर्थ’ या कवितासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे. अनुवादक माधुरी शानभाग आहेत. बहिणाबाईंचे अल्पचरित्र, आचार्य अत्रे, बा.भ. बोरकर, पु.ल. देशपांडे, इंदिरा संत यांनी लिहिलेली स्फुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर आणि प्रभा गणोरकर यांनी केलेली समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली आहे.

यापूर्वी प्रा. के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईंच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवाद केला होता.

बहिणाबाईंच्या स्मृतीस विनम्र अभिवादन

लेखक : अज्ञात 

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

?इंद्रधनुष्य?

 ☆  खरे “Indian Idol” – डॉ.पी.वीरमुथुवेल… लेखक : श्री संपत गायकवाड ☆ संग्राहक – श्री माधव केळकर ☆

फ्लॅटचे ७२ लाख कर्ज असताना बक्षीस मिळालेले २५ लाख दान करणारे अवलिया वैज्ञानिक. चांद्रयान-३ पूर्वतयारी सुरू असल्याने चार वर्षात एकही रजा घेतली नाही. 

इस्रोचे वैज्ञानिक,  चांद्रयान- ३ मोहिमेचे संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मिळालेले २५ लाख रुपये विविध शिक्षण संस्थांना दान केले त्यांचे वडील रेल्वेत तंत्रज्ञ होते. गरिबीत जीवन जगले व वडिलांचे संस्कार म्हणून बक्षिसाची रक्कम दान केली. एक लाख पगारातून कर्जाचे हप्ते फेडत सामान्य नोकरदाराप्रमाणे हे ISRO चे वैज्ञानिक संसार चालवत आहेत.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी लॅडिंग झालेल्या चांद्रयान-३ मोहिमेचे ISRO चे प्रकल्प संचालक डॉ.पी.वीरमुथुवेल यांच्यासह ८ वैज्ञानिकांना तामिळनाडू सरकारने प्रत्येकी २५/२५ लाख रुपये बक्षीस दिले होते.

डॉ.वीरमुथुवेल यांनी बक्षीस मला मिळाले असले तरी यावर अनेकांचा हक्क आहे, म्हणून स्वतः ला मिळालेले २५ लाख रुपये सगळेच्या सगळे, ज्या शैक्षणिक संस्थांनी वैज्ञानिक घडवले त्या संस्थांना दान करण्याचा निर्णय घेतला.

डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी भारतीय स्टेट बँकेकडून ७२ लाख रुपये कर्ज घेऊन फ्लॅट घेतला आहे. दरमहा १ लाख रुपये पगारातून हप्ता जातो. स्वत:वर कर्ज असूनही बक्षीसाची २५ लाख रक्कम एलुमलाई पॉलिटेक्निक कॉलेज वेस्ट तांबरम, चेन्नई माजी विद्यार्थी संघटना, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NIT), तिरुचिरापल्ली श्रीसाईराम अभियांत्रिकी महाविद्यालय आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT मद्रास यांना दान केली.

ISRO ही संस्था देशाची शान आहे. राष्ट्रीय विकासात योगदानासाठी समृद्ध वातावरण इस्त्रो संस्था देत आहे त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. २०१९ ते २०२३ या कालावधीत चांद्रयान-३ मोहिमेचे काम सुरू असल्याने एकही रजा डॉ.पी.वीरमुथुवेल यांनी घेतली नाही.

देशाचे खरेखुरे Idol, खरेखुरे हिरो आपल्या देशातील वैज्ञानिक आहेत.

डॉक्टर पी.वीरमुथुवेल यांच्या दातृत्वास व निष्काम सेवेसाठी साष्टांग नमस्कार. इस्रोच्या सर्वच वैज्ञानिकांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे ही परमेश्वराचे चरणी मनोमन प्रार्थना. 

लेखक : श्री संपत गायकवाड (माजी सहायक शिक्षण संचालक)

संग्राहक : श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अनोळखी लोक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

? इंद्रधनुष्य ?

☆ अनोळखी लोक… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

रेल्वे स्टेशनवर ज्या सूचना पुकारल्या जातात, त्यासाठी वेगळा एक माणूस नेमलेला असतो, जो प्रसंगी रेग्युलर रेकाॅर्डिंग न वाजवता स्वतः माईकवरून सूचना देत असतो. असेच एक ‘अनाऊन्सर’ श्री. विष्णू झेंडे ड्युटीवर असताना रात्री दहाच्या आसपासची वेळ होती.

मुंबईतील मोठ्या स्टेशन्सपैकी एक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर त्यांची ड्युटी कायमप्रमाणे चालू होती. आणि अचानकपणे कुठेतरी सुतळी बाँब फुटल्यासारखा आवाज यायला लागला. ‘कुठे छोटा-मोठा स्फोट झाला की काय’, असा विचार झेंडेंच्या डोक्यात येऊन गेला. त्यांनी तात्काळ ‘आरपीएफ’ला फोनवर झालेली गोष्ट कळवली, आणि योग्य माहिती घेण्यास सांगितले.

पण असे अनेक आवाज परत परत ऐकू यायला लागले, 

आणि त्यांना दोन व्यक्ती मोठ्या assault रायफल्स घेऊन प्लॅटफॉर्मवर दिसल्या. ते कसलेही साधे स्फोट वगैरे नव्हते, तर त्या रायफलीतून फायर केले जाणारे राऊंड आणि हँड ग्रेनेड होते, हे एव्हाना स्पष्ट झाले होते.

श्री. झेंडे ज्या ठिकाणी बसून रेल्वेच्या सूचना द्यायचे, तिथून सगळ्या प्लॅटफॉर्मवरच्या हालचाली बऱ्यापैकी स्पष्ट दिसायच्या. त्यांना हे दोन्ही रायफलधारी स्पष्ट दिसले होते. त्यातील एक ‘अजमल आमिर कसाब’ आणि दुसरा ‘अबू डेरा इस्माईल खान’ आहे, हे त्यांना त्याक्षणी माहीत नव्हतं, किंवा माहीत असण्याचं कारणही नव्हतं. परंतु हा काही साधासुधा प्रसंग नसून आतंकवादी हल्ला आहे, हे त्यांच्या पटकन लक्षात आलेलं.

असल्या प्रसंगांना सामोरं जाण्याची सवय नसते, तेव्हा भीतीनं गाळण उडणं स्वाभाविक आहे. झेंडेंच्या बाबतीतदेखील वेगळं काय अपेक्षित होतं..? परंतु त्यावेळी त्यांनी ज्याप्रकारे अचानक उद्भवलेल्या परीस्थितीला जे तोंड दिलं, ते अद्भुत होतं.

बुडत्याला काडीचा आधार असतो. इथं तर त्यांच्याजवळ स्टेशनचा पूर्ण आराखडा मेंदूत फिट होता, आणि स्टेशनवर प्रत्येक ठिकाणी स्पीकरशी जोडलेला माईक जवळ होता. आहे त्या परिस्थितीत घाबरून न जाता जे काही करता येईल ते करायचं, असं ठरवून त्यांनी माईक हातात घेतला, 

आणि लोकांना सावध करायला, सूचना द्यायला सुरुवात केली. मराठी आणि हिंदीमधून ते लोकांना स्टेशनच्या दुसऱ्या मार्गाकडे जाण्यासाठी सूचना करत होते. हे दोन आतंकवादी जिथं होते, तिथून दूर जाण्यासाठी सूचना करत होते.

लोकांवर बेछूट गोळीबार आणि हँड ग्रेनेड्सचा हल्ला चालूच होता, परंतु शेकडो लोक झेंडेंच्या सूचनेनुसार विरुद्ध दिशेला पळून जात होते, संकटापासून वाचत होते.

साहजिकच, त्या दोघांच्या लक्षात आलं, की कुणीतरी लोकांना सावध करतंय, त्यांना सुटकेचा रस्ता दाखवतंय. मग ते या अनाऊन्सरला शोधू लागले.

झेंडेंच्या बाबतीत  गोष्ट चांगली होती, की त्यांचा आवाज कुठून येतोय, हे कळत नव्हतं, परंतु झेंडे पहिल्या मजल्यावर बसलेले असल्याने दोन्ही आतंकवादी मात्र त्यांच्या नजरेच्या टप्प्यात होते. त्यामुळे त्या दोघांना आपल्यापर्यंत पोहोचायला वेळ लागेल, हे त्यांना माहीत होतं. 

त्यामुळे त्यांनी जितका वेळ शक्य आहे तोवर खिंड लढवायची ठरवली.

नंतरचा अर्धा तास ते माईकवरून लोकांना सूचना देत राहिले. अर्ध्या तासाने जवळजवळ पूर्ण स्टेशन रिकामे झाले होते. तोवर आतंकवाद्यांना देखील ‘ह्या सूचना कुठून येतायत’ ह्याचा सुगावा लागला होता. आता त्यांनी रेल्वे स्टाफच्या लोकांकडे विशेष मोर्चा वळवला,आणि त्यांच्यावर गोळीबार करू लागले. 

त्यावेळी त्यांनी जिथे झेंडे बसले होते त्या केबिन रूमवर देखील गोळीबार चालू केला. त्या गोळीपासून ते बचावले, परन्तु हळूहळू गोळ्यांचा आवाज जवळ जवळ येऊ लागला, तेव्हा त्यांनी काही क्षणांसाठी आपल्या जीवाची आशा सोडलेली. पण स्टेशनवरची गर्दी आता पूर्णपणे कमी झाल्याचं त्यांना समाधान होतं, 

आणि आता जे होईल त्याला सामोरं जाण्याची मानसिक तयारी केली होती. त्यांचं कर्तव्य त्यांनी दोन पाऊले पूढे जाऊन चोख बजावलं होतं, याचा त्यांना आनंद होता, समाधान होतं.

सुदैवाने ते सुरक्षित ठिकाणी लपले, आणि सुखरूप राहिले.

त्या स्टेशनवर कायम जवळपास हजारो लोक कोणत्याही क्षणी असतात. त्यादिवशी सीएसटी स्टेशनवरच्या हल्ल्यात जवळपास  ५२ लोकांनी प्राण गमावले. झेंडे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधाना मुळे हा आकडा शेकडोंनी कमी झाला होता. 

एवढ्यावर त्यांचं योगदान संपलं नाही, तर नंतर खटल्यादरम्यान त्यांनी कसाब विरोधात कोर्टात साक्षदेखील दिली, आणि त्याला शिक्षा मिळवून देण्यातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.

अगदी दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून सी.एस.एम.टी स्टेशनवरील वातावरण निवळून परत नव्याने सगळं सुरू झालं. लोकल्स भरून भरून पहिल्यासारख्या वाहू लागल्या. परंतु श्री. झेंडे यांचं २६-११ पूर्वीचं आणि नंतरचं जीवन यात प्रचंड बदल घडला असेल. त्या दिवसाच्या आठवणींमधून इतर अनेक प्रभावित लोकांप्रमाणे ते देखील बाहेर पडले नसतील.

आर्मीतील सैनिक आणि पोलीस यांच्याविषयी सदैव अपार आदर आहेच. परंतु श्री. विष्णू झेंडे यांच्याकडे पाहिलं, तरी देखील मला देशप्रेमाचे भरते तेवढ्याच तीव्रतेने येईल, जेवढे एका सैनिकाकडे पाहून येईल.

श्री झेंडे हे देखील सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या इतकेच महान देशप्रेमी आहेत, त्यांची समयसूचकता आणि धैर्याला नमस्कार.

प्रेषक :  चारुचंद्र करमरकर, नासिक 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः । 

परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ॥ ११ ॥ 

पुष्टी करावी देवतांची यज्ञ करूनिया

देवतांनी त्या तुष्ट करावे उन्नत करुनीया

निस्वार्थाने पुष्टी करावी तुम्ही परस्परांची 

याद्वारे तुम्हाला प्राप्ती व्हावी परमश्रेयाची ॥११॥

इष्टान्भोगान्हि वो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः । 

तैर्दत्तानप्रदायैभ्यो यो भुङ्क्ते स्तेन एव सः ॥ १२ ॥ 

यज्ञपोषित देवता खचित करितील कृपा इष्टभोगा

चौर्यकर्म अर्पण ना करता त्यांना निज भोगितो भोगा ॥१२॥

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः । 

भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ १३ ॥ 

यज्ञशेष अन्नसेवन करुनी साधू पापमुक्त

देहपोषणासाठी अन्न पापांपासुन ना मुक्त ॥१३॥

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः । 

यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ १४ ॥ 

सर्व जीव अन्नापासून पर्जन्यापासुन अन्न 

यज्ञकारणे वर्षावृष्टी कर्मापोटी हो यज्ञ  ॥१४॥

कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ । 

तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ १५ ॥ 

वेदकारणे कर्मोद्भव  परमात्मा वेदांचे कारण

यज्ञात सर्वथा सर्वव्यापि परमात्म्याचे प्रतिष्ठान ॥१५॥

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः । 

अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥ 

परंपरागत या चक्राला जो ना आचरितो

वासना भोगत इंद्रियांच्या जीवन व्यर्थ जगतो ॥१६॥

यस्त्वात्मरतिरेव स्यादात्मतृप्तश्च मानवः । 

आत्मन्येव च सन्तुष्टस्तस्य कार्यं न विद्यते ॥ १७ ॥ 

रत आत्म्यात आत्मतृप्त  संतुष्ट आत्म्यात

कर्तव्य तयासी काही नाही शेष जीवनात ॥१७॥

नैव तस्य कृतेनार्थो नाकृतेनेह कश्चन । 

न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः ॥ १८ ॥

कर्म करावे वा न करावे नाही प्रयोजन

समस्त जीवांसंगे त्यांचे निस्वार्थी जीवन ॥१८॥

तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर । 

असक्तो ह्याचरन्कर्म परमाप्नोति पूरुषः ॥ १९ ॥ 

त्याग करिता आसक्तीचा प्राप्ती परमात्म्याची

असक्त राहुनिया निरंतर करी पूर्ति कर्माची ॥१९॥

कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः । 

लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि ॥ २० ॥ 

जनकादी ज्ञान्यांना परमसिद्धी कर्मप्राप्त

संग्रह करुनीया लोकांचा कर्म करी तू नित्य ॥२०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अँटनी लैरीस आणि त्याचा पेटता ऊर… भावानुवाद : डॉ. प्रवीण आवटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

अँटनी लैरीस आणि त्याचा पेटता ऊर… भावानुवाद : डॉ. प्रवीण आवटे ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆ 

जाती धर्माच्या नावाखाली समाजात विद्वेष पसरवणाऱ्या सर्वांसाठी एक चपराक 

आन्टनी लैरीस त्याचं नाव. त्याच्या फ्रेंच नावाचा उच्चार करणंही महाकठीण. पण परवाच्या पॅरीस हल्ल्यात अतिरेक्याच्या गोळयांना त्याची बायको – हेलन बळी पडली आणि त्यानं आपल्या बायकोला जीवे मारणा-या अतिरेक्याला उद्देशून फेसबुकवर ही पोस्ट लिहिली, पेटत्या उरानं हे शब्द उच्चारणं तितकंच कठीण आहे.

लैरीस लिहतो –

तुला कळलंय का,

शुक्रवारी रात्री तू संपवलं आहेस,

एक आगळं वेगळं आयुष्य ..

ती माझ्या प्रेमाची जितीजागती मूर्ती होती

माझ्या लहानग्याची मायाळू ‘ममा’ होती…

पण तरीही,

माझ्या मनात तुझ्यासाठी

लवलेशही नाही द्वेषाचा ..!

 

मला नाही माहीत कोण आहेस तू ?

आणि खरं सांगू,

मला ते जाणून ही घ्यायचं नाही ऽ

आत्म्याचं थडगं झालंय ज्यांच्या

त्यांना असते का काही नाव गाव ?

 

वेडया,

तू जेव्हा बेधुंद चालवित होतास ,

तुझ्या निर्दयी गोळया

माझ्या प्रियेच्या देहावर

तेव्हा,

तुझ्या प्रत्येक गोळीसरशी

जखमी होत होता तुझा खुदा

रक्ताळत होते त्याचे ह्रदय ,

ज्याने स्वतःच्या प्रतिमेबरहुकूम

बनविले होते तुला …!!!

 

द्वेष आणि सूडाची भेट

तरीही,

मी देणार नाही तुला..!

अजिबात नाही..!!

मला आहे ठावे,

तुला हीच भेट हवी आहे.

पण तुझ्या आंधळया द्वेषाला

पांगळया रागाने प्रत्युत्तर देण्याचा

अडाणीपणा मी करणार नाही,

मी नाही जाणार बळी

तिरस्काराच्या या वेडगळ वणव्यात ..!

 

तुला घाबरावयाचे आहे मला,

तुला वाटते,

मी पाहवे संशयाने

माझ्या प्रत्येक देशबांधवाकडे

आणि स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी

मी ओलिस ठेवावे माझे स्वातंत्र्य ..

सॉरी,

असे काहीच नाही होणार,

हरला आहेस तू …!

 

अरे,

रात्रंदिवस मी वाट पाहत होती तिची

आणि

अखेरीस आज सकाळी मी पाह्यलं तिला.

तुला सांगू,

बारा वर्षांपूर्वी मी तिला पहिल्यांदा पाहयलं

आणि वेडयासारखा तिच्या प्रेमात पडलो,

त्या क्षणाची आठवण झाली…

तुझ्या गोळयांनी देहाची चाळण झालेली असतानाही

आजही ती तेवढीच सुंदर दिसत होती रे…

 

माझं चिमुकलं जग उध्वस्त झालंय

मानायचाच असेल तर,

हाच तुझा थोडासा विजय..!

पण माझी ही वेदना फार काळ टिकणार नाही

कारण

मला पक्के ठावे आहे,

ती सदैव माझ्यासोबतच असणार आहे

आणि

आम्ही पुन्हा विहरत राहू

आमच्या अनोख्या प्रेमाच्या नंदनवनात,

जिथे तुला पाऊल टाकायलाही बंदी आहे.

 

आता आम्ही दोघेच आहोत

मी आणि माझा लहानगा मेल्वील

अवघ्या सतरा महिन्यांचा आहे तो..!

पण लक्षात ठेव,

जगातल्या कोणत्याही सैन्याहून

बलशाली आहोत आम्ही बापलेक..!

तुझ्याकडे लक्ष दयायला वेळच नाही माझ्याकडे,

दुपारच्या झोपेतून आता जागा होईल माझा पोर

मला भरवायचे आहे त्याला

मग

आम्ही बापलेक खेळायला जाऊ…

आणि हो,

हा माझा चिमुकला मेल्वील

असाच मोकळा ढाकळा राहिल

पाखरासारखा

आनंदी असेल

गोजि-या फुलपाखरासारखा

आणि

तुझ्या काळजावर

उमटत राहिल भितीचा थरकाप

कारण

त्याच्याही मनात तुझ्यासाठी

द्वेषाचा लवलेशही नसेल…… 

 

भावानुवाद – डॉ प्रदीप आवटे

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ संत माळेतील मणी शेवटचा – लेखक : श्री सुमित्र माडगूळकर ☆ श्री आशिष बिवलकर ☆

“संत माळेतील मणी शेवटला…

आज ओघळला एकाएकी … “

...सुमित्र माडगूळकर

रिक्षावाल्याने अंगात झटका आल्यासारखी एकदम रिक्षा बाजूला घेतली,आत बसलेल्या माय – लेकराकडे बघून म्हणाला, “तुम्ही इथेच उतरा,मी या पुढे जाऊ शकत नाही “.समोर खूप गर्दी जमलेली होती.

माय – लेकराच्या तोंडावर प्रश्नचिन्ह पाहताच तो उत्तरला ” समोर पहा, ती महाकवीची अंतिम महायात्रा चालू आहे, मला त्यात सामील व्हायचे आहे, तुम्हाला माहित नाही? गीतरामायणकार ग.दि.माडगूळकर यांचे काल निधन झाले !”.

आत बसलेल्या माय – लेकराच्या चेहऱ्यावरील राग, प्रश्नचिन्ह क्षणार्धात दूर झाले व नकळत आई उत्तरली ” चल,आपणही पाच मिनिटे का होईना या अंतयात्रेत सामील होऊ, हीच या महाकवीला आपल्याकडून शेवटची श्रद्धांजली…. “.

—- 

१५ डिसेंबर १९७७ ची सकाळ. असे अनेक जण त्या अंतिम महायात्रेत सामील झाले होते… आपणहून…त्यांचे बालपण ‘नाच रे मोरा’,’झुक झुक अगीनगाडी’ म्हणत फुलले होते,तरुणपण ‘माझा होशील का?’,’हृदयी प्रीत जागते’ ने रंगविले होते,’देव देव्हाऱ्यात नाही,’इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ वर त्यांचे मन भक्तीरसात न्हाऊन निघाले होते.आयुष्याच्या संध्याकाळी ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’ ने मनाला हुरहूर लावली होती,आयुष्यातील प्रत्येक दुःखाच्या क्षणी ‘दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा,पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ सारख्या गीतरामायणातील गीतांनी आधार दिला होता.शाळेच्या बालभारतीच्या मराठीच्या पुस्तकात ‘मी सिंह पाहिला होता’,’औंधाचा राजा’,’आचंद्र सूर्य नांदो’,’शशांक मंजिरी’ सारख्या धडा-कविता मनाच्या कोपऱ्यात स्थान मिळवून होत्या ,नक्कीच वाचल्या होत्या.आज ते लाडके गदिमा शेवटच्या प्रवासाला निघाले होते … कोणाला दुःख झाले नसेल त्या दिवशी ?.

— डिसेंबर च्या एका पहाटे गदिमा दरदरून घाम फुटून जागे झाले,त्यांना विचित्र स्वप्न पडले होते “माडगूळच्या दारावरील गणपती” व “पंचवटीचे तुळशी वृदांवन व त्याचा कट्टा” दुभंगलेला दिसला होता. ते खूप अस्वस्थ झाले,विद्याताईंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण ते म्हणाले “तुझ्या व मुलांच्या मनाची तयारी कर. मी आता अनंताच्या प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. माझ्या दिव्यातील तेल आता संपत आले आहे “. एका पहाटे त्यांना खूप थंडी वाजून आली विद्याताईंनी घाईने नुकत्याच एका खेड्यातल्या समारंभात भेट मिळालेली उबदार घोंगडी त्यांच्या अंगावर घातली,गदिमा खिन्नपणे हसून म्हणाले “अग आता नको,काही दिवसांनी ती उपयोगी येईल”.

१४ डिसेंबर १९७७,गदिमांची आई ‘बनुताई दिगंबर माडगूळकर’ यांचा आदर्श माता म्हणून सत्कार होणार होता, माडगूळहून गदिमांचे धाकटे बंधू श्यामकाका आले होते. गदिमांना रात्रभर झोप नव्हती, विद्याताईंकडे बघून नुसते केविलवाणे हासत होते… डोळ्यात कारुण्य दाटले होते … ,काहीतरी सांगायचे होते पण …

गदिमा आईला म्हणाले, “आईसाहेब,आज तुमचा सत्कार आहे. विसरू नका. लवकर आवरून ठेवा. तुम्हाला न्यायला गाडी येईल.”

आई म्हणाली “तुम्ही नाही का येणार? “,आपल्या लाडक्या लेकाला बनुताई आदराने आहो जाहोच म्हणत असत. ‘येणार तर,पण आधी तुम्हाला गेले पाहिजे,आम्ही येतोच मागोमाग’. थोड्या वेळाने गदिमा व विद्याताई नातू सुमित्रला घेऊन बकुळीच्या पारावार जाऊन बसले. तितकेच गदिमा बाललीला पाहण्यात रमून गेले होते. तसा बराच वेळ गेला .. आत आल्यावर गदिमा विद्याताईंना म्हणाले “मंदे,तू आज मला तुझ्या हाताने आंघोळ घालशील का?” ,अंगात ताप होता विद्याताईंनी अंग गरम पाण्याने पुसून घेतले. कॉटवर स्वच्छ पांढरी चादर घातली.

”मंदे,आज मस्त वांगी भात आणि साजूक तुपातला शिरा कर,तोंडाची चवच गेली आहे… “,विद्याताईंनी त्यांच्या आवडीचे जेवण केले. गदिमा मनसोक्त जेवले त्या दिवशी. संध्याकाळी कार्यक्रमाला जाण्यासाठी विद्याताईंनी सर्व कपडे तयार करून ठेवले होते, रेशमी झब्बा,जाकीट,धोतर,सेंटवाला रुमाल. गदिमा म्हणाले ” मंदे,आता उशीर करू नकोस,लवकर आटप “. विद्याताई हसून म्हणाल्या “आत्ता आवरते बघा”. गदिमा बाहेरच्या निळ्या कोचावर जाऊन बसले.थोड्या वेळाने अचानक त्यांचा मोठा आवाज आला ” मंदे,अग लवकर इकडे ये, मला बघ कसं होतंय, खूप थंडी वाजते आहे बघ .. “. विद्याताई त्यांना लगबगीने आत खोलीत घेऊन आल्या .. अंगावर दोन तीन रग घातले पण त्यांची थंडी कमी होईना. दात एकमेकांवर आपटून जोरात आवाज येत होता.

विद्याताईंनी घाईघाईने मुलांना, सुनांना बोलवून घेतले, माळीबुवाला पाठवून डॉ.मेहतांना बोलवून घेतले. डॉ.मेहता म्हणाले ” कविराज,फटकन एक इंजेक्शन घेऊन येतो, ते घ्या व मस्त कार्यक्रमाला जा “. मेहता समोरच असलेल्या दवाखान्यात निघून गेले. गदिमांना दरदरून घाम फुटला होता. इकडे छोटा सुमित्र रडवेला चेहरा करून ” पपाआजोबा बोलत का नाहीत “  म्हणून एकटक बघत राहिला होता. त्याला कळत नव्हते “सर्वजण का जमलेत ?,ताईआजी का घाबरली आहे ? डॉक्टर काय करत आहेत ? “.

इकडे गदिमांचे पाय थंड पडले होते, विद्याताई व सुना त्यांच्या पायाला ब्रँडी चोळत होत्या. गदिमा म्हणाले “मला काही करू नका”. तितक्यात डॉ.मेहता परत आले त्यांनी इंजेक्शनची तयारी सुरु केली. तितक्यात गदिमांनी गजानन महाराजांना (शिवपुरी,अक्कलकोट) जोरात हाक मारली.  ” महाराज,मला आता सोडवा”. त्याचं बोलणं एकदम बंद पडले, जीभ तोंडात हलू लागली. डॉ. मेहतांनी इंजेक्शन दिले पण ते शिरेत न जाता तसेच बाहेर आले. अखेर संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास गदिमांची प्राणज्योत मालवली.

सकाळचाच प्रसंग..  बाथरूमला जाताना गदिमांनी विद्याताईंचा आधारासाठी दिलेला मदतीचा हात झिडकारून टाकला होता .. १९४२ साली प्रेमाने हातात घेतलेला त्यांचा हात आता कायमचाच सुटलेला होता … बुधवार १४ डिसेंबर १९७७ ची ती भीषण संध्याकाळ .. दोन सूर्य अस्ताला गेले. मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.

 फर्ग्युसन रस्त्यावरील उद्योगपती बाबुराव पारखे यांच्या विद्याविलास या बंगल्यात आदर्शमाता पुरस्कार सोहळा चालू होता. बनुताइंचा प.महादेवशास्त्री जोशी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तेव्हड्यात गदिमांची बातमी येऊन पोहचली. बनुताईनसमोर ही बातमी सांगता येत नव्हती, पण त्या महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय परत पंचवटीत जाण्यास तयार नव्हत्या, त्यासाठी अडून बसल्या. शेवटी दर्शन घेऊन त्या निघाल्या, मग कार्यक्रमात प.महादेवशास्त्री जोशी यांनी गदिमांच्या निधनाची वार्ता सांगितली, सगळीकडे शोकछाया पसरली. इकडे पंचवटीत त्या सत्काराच्या हारतुऱ्यांसकट पोहोचल्या, आपल्या लाडक्या लेकाची अवस्था पाहून त्यांचे काय झाले असेल, एकीकडे आई आदर्श माता पुरस्कार स्वीकारीत होती व एकीकडे मुलगा अनंताच्या प्रवासाला निघून गेला होता,सगळाच दैवदुर्विलास !.

पंचवटीच्या हॉलमध्ये पांढऱ्या चादरीखाली काहीतरी झाकलेले होते, माझे लाडके आजोबा कुठेच दिसत नव्हते, अगदी त्यांच्या निळ्या कोचावर सुद्धा. घरातले सगळे रडत होते, प्रचंड माणसे जमली होती,सगळे का रडत आहेत मला काहीच कळत नव्हते. त्यांना हसवावे म्हणून मी जास्तच चेकाळलो होतो, कधी नव्हे ते वेड्यासारखा इकडून तिकडून पळत होतो. शेवटी माझी रवानगी वरच्या मजल्यावर झाली.

— माझा बालहट्ट आता पुरविला जाणार नव्हता,एक महाकवी आपल्या शेवटच्या प्रवासाला निघालेला होता,माझ्या लाडक्या आजोबांचा हात माझ्या हातातून कायमचा सुटलेला होता.

१५ डिसेंबर १९७७. प्रचंड अंतयात्रा निघाली होती,पुणे मुंबई रस्त्याने जाणारी अंतयात्रा वाकडेवाडीच्या लोकांच्या हट्टाने वाकडेवाडीतून वळविण्यात आली. जेव्हा अंतयात्रा डेक्कनवर पोहोचली तेव्हा तिचे दुसरे टोक बालगंधर्व चौकात होते.इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. संगीतकार राम कदम “अण्णा अण्णा” म्हणत आक्रोशाने धावत होते… ,महाराष्ट्र शासनाच्या वतीने शरद पवार सामील होते. स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते.

सगळ्यांच्या मुखात आज एकच ओळी होत्या ….

“विठ्ठलाच्या पायी थरारली वीट… “

“संत माळेतील मणी शेवटला… आज ओघळला एकाएकी… “

अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. .गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत.

चंदनी चितेत जळाला चंदन…

सुगंधे भरून मर्त्यलोक 

लेखक : सुमित्र माडगूळकर 

संग्राहक : श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ 20 मुलांची आई ! … सुश्री अंजली कुलथे – लेखक : श्री धनंजय कुरणे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री अंजली कुलथे  

14 वर्षांपूर्वी आजच्याच तारखेला….26/11/2008 च्या रात्री नराधम अतिरेकी ‘अजमल कसाब ‘ त्याच्या एका सहकाऱ्यासोबत ‘कामा हॉस्पिटल’च्या आवारात शिरला आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला..

हॉस्पिटलचे दोन्ही सेक्युरिटी गार्ड्स जागीच ठार झाले.. ते दोघं रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.. जरा पुढे एक नर्स जखमी अवस्थेत पडली होती.. कसाब व त्याचा साथीदार पोर्च ओलांडून पहिल्या मजल्याचा जिना वेगानं चढत होते…

‘अंजली कुलथे’ नावाची 50 वर्षांची नर्स, हे भयानक दृश्य पहिल्या मजल्यावरून पहात होती… 26/11 ला ती ‘नाईट शिफ्ट’ला होती.. ती ‘प्रसूती कक्षाची इन-चार्ज’ होती.. तिच्या वॉर्डमध्ये 20 गर्भवती महिला होत्या….

… हातात बंदूका घेतलेले दोन अतिरेकी जिन्यावरून आपल्याच वॉर्डच्या दिशेनं येतायत हे पाहून अंजली जिवाच्या करारानिशी पुढे सरसावली.. आणि तिनं तिच्या वॉर्डाचे दोन जाडजूड दरवाजे कसेबसे बंद केले..

सर्व 20 महिलांना आणि त्यांच्या काही नातेवाईकांना तिनं त्या मजल्याच्या टोकाला असलेल्या छोट्या ‘पॅन्ट्री’च्या खोलीत हलवलं.. वीस गर्भवती महिलांना अशा आणीबाणीच्या वेळी शिफ्ट करणं ही किती नाजूक आणि जोखमीची गोष्ट होती…

कसाब व त्याचा साथीदार हॉस्पिटलच्या टेरेसवर गेले होते व तिथून खाली जमलेल्या पोलिसांवर गोळया झाडत होते.. ग्रेनेड टाकत होते… ते पाहून अंजलीनं, बाहेर येऊन, ‘जखमी होऊन पडलेल्या नर्सला’ कॅज्युअल्टी मध्ये नेलं आणि तिच्यावर योग्य उपचार सुरु झाले..

इतक्यात वीस पैकी एका महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या.. अंजलीनं तिला हाताला धरून, भिंतीला चिकटून चालत चालत डिलिव्हरी रूम मध्ये नेलं आणि तिथल्या डॉक्टरच्या साहाय्यानं प्रसूती सुखरूप पार पाडली..

हल्ल्याचा हा थरार संपल्यावर अनेक दिवस अंजली झोपेतून घाबरून उठत असे.. एका महिन्यानी तिला पोलिसांनी पाचारण केलं.. कसाबची ओळख पटवण्यासाठी… नंतर त्याच्या खटल्यात तिला साक्षीला बोलावण्यात आलं.. तिनं कोर्टाला एक विनंती केली… “माझा ‘युनिफॉर्म’ घालून येण्याची परवानगी 

मिळावी ! ‘कारण, त्या भीषण रात्री या युनिफॉर्मवर असलेल्या जबाबदारीची मला जाणीव झाली आणि त्यामुळेच मी हे धाडस करू शकले..” असं तिचं म्हणणं होतं…

अंजली कुलथे  यांनी त्या रात्री फक्त वीस महिलांचेच नव्हे तर, ‘ ही दुनिया पाहण्याआधीच मृत्युच्या जबड्यात पोहोचलेल्या ‘ वीस बालकांचेही प्राण वाचवले. आज ही मुलं चौदा वर्षांची असतील… त्यांना कदाचित ठाऊकही नसेल की त्यांच्या ‘ दोन जन्मदात्री ‘ आहेत… त्यांना नऊ महिने पोटात वाढवून  प्रत्यक्ष जन्म देणारी एक आई …. आणि  अंजली कुलथे   … जन्माआधीच जीवदान देणारी दुसरी आई ! 

अंजलीताई तुमच्या अतुलनीय धैर्याला आणि प्रसंगावधानाला सविनय प्रणाम !

लेखक : श्री धनंजय कुरणे

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print