मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ – भाग-1 – लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

मृत्युपत्र हे संपत्तीची वाटणी करणारं असतं, मात्र वैद्यकीय इच्छापत्राद्वारा माझ्या शरीराचं काय करायचं, मला व्हेन्टिलेटरवर ठेवावं का? किती दिवस ठेवायचं? माझ्या आजारपणावर ०किती खर्च करायचा, शरीर वा अवयव दान करायचे का यांसारख्या इच्छा लिहून ठेवता येतात.

अठरा वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध लेखक प्रभाकर पाध्ये यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी   ‘बंध-अनुबंध’ या गाजलेल्या आत्मचरित्राच्या लेखिका कमल पाध्ये एकटय़ाच राहत होत्या. डॉ. रोहिणी पटवर्धन आणि प्रमोदिनी वडके-कवळे त्यांची काळजी घेत असत. एक दिवस त्यांनी आपले डॉक्टर सुभाष काळे व या दोघींना घरी बोलावलं व सांगितले, ‘हे बघा डॉ. काळे माझ्यावर उपचार करतात. तुम्ही दोघी माझी काळजी घेता. इथून पुढे जर मी आजारी पडले आणि त्या वेळी मी निर्णय घेण्याच्या मन:स्थितीत, परिस्थितीत नसेन आणि माणूस म्हणून जगण्याच्याही स्थितीत नसेन तर तेव्हा माझ्यावर कोणतेही वैद्यकीय उपचार करू नका. कृत्रिम यंत्रणांवर मला जिवंत ठेवू नका. मी तुम्हा सर्वासमक्ष स्वेच्छेने माझा निर्णय जाहीर करीत आहे!’ 

‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या संकल्पनेची मुळं वृद्ध कल्याण शास्त्रज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन यांच्या मनांत इथेच रुजली आणि पुढे त्यांनी त्यांच्या प्रसाराचं कार्य सुरू केलं. ‘लिव्हिंग विल’ वा ‘वैद्यकीय इच्छापत्र’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत प्रचलित असली तरी भारतात मात्र अजून म्हणावा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. पण बदलत्या काळानुसार आज ‘वैद्यकीय इच्छापत्रा’ची निकड भासू लागली आहे हे निश्चित! वस्तुत: ही संकल्पना अद्याप कायद्याच्या चौकटीत नसली तरी  ती एक विचारांची दिशा आहे. ‘माझे वा माझ्या शरीराचे हाल होऊ नयेत, माझ्या कुटुंबियांना निर्णय घेण्यासाठी मानसिक त्रास होऊ नये. त्यांच्यावर महागडय़ा उपचारांचा ताण पडू नये,’ या भूमिकेतून वृद्ध आपली इच्छा या ‘लिव्हिंग विल’ द्वारे व्यक्त करू शकतात. 

आपलं शरीर व तब्येत हीसुद्धा एक प्रकारे आपली मालमत्ताच नसते का? मग त्यासंबंधी निर्णय निदान भविष्यकाळातील वैद्यकीय उपचारांबाबतचे आपले आपणच घ्यायला नको का? एखाद्याला बिछान्याला खिळून जगायचं नसेल किंवा कृत्रिम वैद्यकीय उपचार करून घेऊन जिवंत राहायचं नसेल, पण असे निर्णय घेण्यास तो समर्थ नसेल तर आपल्या प्रकृतीसंदर्भात कोणते उपचार केले जावेत वा जाऊ नयेत याचे स्पष्ट निर्देश करणारा दस्तऐवज म्हणजे ‘लिव्हिंग विल’ अर्थात ‘वैद्यकीय इच्छापत्र’! या ‘लिव्हिंग विल’मध्ये आयुर्मर्यादा वाढवणारे कोणतेही उपचार उदा. नळीने अन्न देणं, व्हेन्टिलेटरवर ठेवणं वगैरे करू नयेत असे स्पष्ट निर्देश करता येतात. तसेच देहदान, नेत्रदान, त्वचादान, अवयवदान यांसारख्या इच्छांचाही उल्लेख करता येतो. मात्र आपले फॅमेली डॉक्टर आणि कुटुंबियांशी नीट चर्चा करूनच हे इच्छापत्र बनवायला हवे. इतकं सगळं करूनही रुग्णालयातील आपल्या आई वडिलांच्या बाबतीत काय करायचं, हा निर्णय शेवटी मुलांकडे रहातोच. वृद्धांसाठी आपली इच्छा व्यक्त करण्याचा फक्त हा एक मार्ग आहे.

आपल्या शरीरावरील उपचारांविषयीच्या सर्व इच्छा शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर लिहून त्यावर ज्या व्यक्तीचं ते ‘लिव्हिंग विल’ आहे त्या व्यक्तीने सही करावयाची असते. त्यानंतर ही व्यक्ती सही करण्यास मानसिक व वैद्यकीयदृष्टय़ा सक्षम आहे असं लिहून त्यावर डॉक्टर सही करतात. त्याचबरोबर पती अथवा पत्नी तसंच मुलं व जवळच्या दोन विश्वासू व्यक्तींच्या सहय़ा घेऊन हे इच्छापत्र नोटराइज्ड करावं लागतं. हे नोटराईज केल्यामुळे ज्येष्ठांची तशी इच्छा होती हे स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतर या इच्छापत्राच्या सत्यप्रती काढून त्या फॅमिली डॉक्टर, कुटुंबीय व शक्य झाल्यास हॉस्पिटलला द्याव्या लागतात. फक्त हे इच्छापत्र करण्यापूर्वी प्राथमिक स्वरूपाची चर्चा पती-पत्नी, मुलं, डॉक्टर व सुहृद यांच्याबरोबर अवश्य करावी. तरच या इच्छापत्रातील इच्छांची पूर्तता होण्याची खूप शक्यता असते. 

”अर्थात तरीसुद्धा अनेक वेळा समोर मृत्यू दिसू लागताच तोंडाने कितीही निरवानिरवीची भाषा केली तरी रुग्ण उपचार सुरू ठेवायला सांगतात. व जोपर्यंत रुग्ण आपली इच्छा व्यक्त करण्याच्या परिस्थितीत असतो तोपर्यंत त्याच्या इच्छेनुसारच उपचार केले जातात. अनेक वेळा रुग्ण बेशुद्धावस्थेत असेल तरी भावनेच्या भरात नातलगच रुग्णास उपचार सुरू ठेवण्याचा आग्रह धरतात व ‘लिव्हिंग विल’ला विरोध करतात. एक डॉक्टर म्हणून नातलगांच्या मताचा आदर केला जातो त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाण्याची शक्यता नाही.’

अनेक रुग्णांचे फॅमिली डॉक्टर असणारे व ज्येष्ठ नागरिकांसाठी भरीव कार्य करणारे            डॉ. दिलीप देवधर ‘वैद्यकीय इच्छापत्रा’च्या अंमलबजावणीतील वस्तुस्थिती सांगतात. ‘लिव्हिंग विल’ अमलात आणताना एक डॉक्टर म्हणून आमचे काही निकष असतात. सर्वसाधारणपणे रुग्णाचं वय ७५ च्या वर असेल तरच हा निर्णय घेतला जातो. त्यातही आम्ही डॉक्टर रुग्णावरील उपचार एकदम बंद करत नाही. मल्टिपल ऑर्गन फेल्युअर असेल तर साधारणपणे ७२ तासांत व जास्तीत जास्त ४ ते ५ दिवसांत शरीर उपचारांना प्रतिसाद देऊ लागतं. जर तसं झालं नाही तर रुग्णाचे जवळचे नातलग, फॅमिली डॉक्टर, त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर असे सर्व जण एकत्र बसून चर्चा करतात व त्यानंतरच रुग्णाने शांतपणे मृत्यूला सामोरं जावं, असा निर्णय घेतला जातो. अर्थात अशा वेळी रुग्णाने स्वत: जर असं वैद्यकीय इच्छापत्र केलं असेल तर सर्वानाच हा कठीण निर्णय घेणं सोपं जातं व जवळच्या नातलगांना अपराधीभाव येत नाहीत.

सर्वसाधारणपणे डॉक्टरांचा अनुभव असा आहे की मध्यमवर्गीय माणसं भावनेच्या आहारी जाऊन रुग्णाच्या उपचारांसाठी भरमसाट खर्च करतात. वेळेला जमीनजुमला, दागदागिनेसुद्धा विकतात. भारी व्याजाने कर्ज उचलतात. त्यांची पुढची दहा-पंधरा र्वष कर्जफेडीतच जातात व ज्या रुग्णासाठी ते आपल्या मुलांच्या तोंडचा घास काढतात तो रुग्णही हाताला लागत नाही व निराशा पदरी पडते. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर ते कुटुंब मोठय़ा संकटातून वाचू शकतं.

आज माणसाची आयुर्मर्यादा वाढल्यामुळे आर्थिक गणितं साफ बदलली आहेत. वैद्यकीय खर्च सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्याने जबाबदारी घेऊन रुग्णाला त्याच्या परिस्थितीनुसार सल्ला देणारे डॉक्टर आता राहिले नाहीत. हल्लीची तरुण पिढी व्यवसायानिमित्त परगावी किंवा परदेशी असते. त्यामुळे परावलंबी रुग्णाला सांभाळणं खूप कठीण होत चाललं आहे. बरेच वेळा अशा मृत्युशय्येवरील रुग्णाला ठरावीक मुदतीपुढे हॉस्पिटलही ठेवून घेत नाहीत. अशा वेळी ‘लिव्हिंग विल’ असेल तर केवळ कृत्रिम यंत्रणांवर जिवंत असणाऱ्या रुग्णाच्या नातलगांना कटू निर्णय घेण्यासाठी ‘लिव्हिंग विल’ हा फार मोठा दिलासा ठरू शकतो.

परदेशस्थ मुलं तिथल्या नियमांप्रमाणे इथेही उपचारांची दिशा ठरवण्याचा आग्रह धरतात. त्यांना इथल्या अडचणी व मर्यादा लक्षात येत नाहीत व त्याचा इथे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स व जवळचे नातलग यांना खूप त्रास होतो. आई-वडील तब्येतीने धडधाकट असतानाच परदेशस्थ मुलं, इथे ज्येष्ठांची काळजी घेणारे दोन नातलग आणि डॉक्टर यांनी एकत्र बैठक घेऊन पुढील काळात ज्येष्ठ आजारी पडल्यास त्यांच्या उपचारांची दिशा, व्याप्ती व मर्यादा यांचा साकल्याने विचार करून असं ‘वैद्यकीय इच्छापत्र’ केलं तर ते सर्वानाच खूप सोयीचं होईल. अर्थात त्यासाठी निरोगी वृद्धांनी एखाद्या तरी डॉक्टरशी सतत संपर्कात राहून नियमित वैद्यकीय चाचण्या कराव्यात.

‘सनवर्ल्ड’वरील याच सदरातील लेखानंतर रोहिणी पटवर्धन त्यांना अनेक फोन आले. त्यांतील एका ज्येष्ठाची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. ते सांगत होते, ”मी युद्धनीतितज्ज्ञ म्हणून नोकरीनिमित्त सतत फिरतीवर होतो. सतत बाहेरगावी राहिल्यामुळे नातलगांशी माझा संबंध नाही. मला मुलं नाहीत. पत्नी हयात नाही. मी एकटाच आहे. मी तुमच्याकडे रोख रक्कम जमा करेन. त्यांतून खर्च भागेल एवढेच वैद्यकीय उपचार तुम्ही माझ्यावर करा. मी हे लेखी स्वरूपात दिलं तर तुम्ही मला प्रवेश देणार की नाही?”

‘वैद्यकीय इच्छापत्र’ अशा एकटय़ा अविवाहित, विनापत्य, मुलं असूनही जवळ नाहीत वा ज्यांना सांभाळणारं कोणीही नाही त्यांच्यासाठी वरदान आहे. तसंच असाध्य व्याधींनी पीडित ज्यावर औषध व उपचार उपलब्ध नाहीत अशांसाठीही ते उपयुक्त आहे. 

आयुष्यभर ज्या मुलांवर आपण जिवापाड प्रेम करतो, त्यांच्यासाठी कष्ट उपसतो, त्यांच्यावर अनावश्यक उपचाराचं ओझं लादणं वा त्यांना अप्रिय निर्णय घ्यायला लावणं यापेक्षा व्यावहारिक विचार करून ‘लिव्हिंग विल’ चा पर्याय स्वीकारणं अधिक योग्य आहे नाही का?     

वैद्यकीय इच्छापत्रासंदर्भात अधिक माहितीसाठी  संपर्क साधा –                    

लेखिका : डॉ. रोहिणी पटवर्धन 

मो – ९०२८६६४३३३   

प्रस्तुती  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक ३१ ते ४०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः । 

श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३१ ॥ 

चित्ती श्रद्धा निर्दोष दृष्टी मम मताचे अनुपालन

मुक्त होती ते जीवनातल्या समस्त कर्मापासून ॥३१॥

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ । 

सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३२ ॥ 

जे न मानिती मतास मम या देती  दोष सदैव मला

विरुद्ध माझ्या आचरण त्यांचे श्रेष्ठ मानुनी स्वतःला 

मूढ तयांसी घेई जणुनी अज्ञानी ते असती  खास

मोहापोटी पदरात त्यांच्या  केवळ असतो रे ऱ्हास ॥३२॥ 

सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेर्ज्ञानवानपि । 

प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति ॥ ३३ ॥

नियमानुसार सृष्टीच्या करिती समस्त भूत कर्म

सृष्टीविपरित कर्मनिग्रहास्तव काय फुकाचे वर्म ॥३३॥ 

इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ । 

तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ ३४ ॥ 

इंद्रियासक्ती मधुनी सुप्त राग-द्वेष असूर

कल्याणाच्या मार्गामधील रिपू असती घोर

तयासि कधिही वश ना व्हावे निरासक्त राहून

दूर ठेवुनी त्या दोघांना प्राप्त करी कल्याण ॥३४॥

श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुष्ठितात्‌ । 

 निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥ ३५ ॥ 

आचरण मनोभावे परधर्माचे नाही श्रेयस्कर 

आचरण गुणात अभाव जरी स्वधर्म श्रेयस्कर

मृत्यू आला जरी स्वधर्माचरणे तोही श्रेयस्कर 

भयदायी धर्म परि परक्याचा न कदापि श्रेयस्कर ॥३५॥

अर्जुन उवाच 

अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । 

अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥ ३६ ॥ 

कथात अर्जुन 

अशी काय प्रेरणा आहे कथन करी मोहना 

मनात नसता इच्छा करितो मनुष्य पापाचरणा ॥३६॥

श्रीभगवानुवाच 

काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः । 

महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम्‌ ॥ ३७ ॥ 

कथित श्रीभगवान

रजोगुणा पासुनी उद्भवले काम-क्रोध विकार 

अति भोगानेही अतृप्त राहतो कामाचा विचार

महत्पापी हा घोर वैरी प्रेरितसे करण्या पाप

आहारी कामाच्या न जाता जीवन हो निष्पाप ॥३७॥

धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च । 

षयथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्‌ ॥ ३८ ॥ 

धूम्र झाकतो अग्नीला धूळ दर्पणास 

वार आच्छादी गर्भाला काम झाकी ज्ञानास ॥३८॥

आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा । 

कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३९ ॥ 

काम जणू अनल जयास नाही कधिही अंत

विद्वानांच्या ज्ञानाला झाकोळणारा कामही अनंत ॥३९॥

इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते । 

एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्‌ ॥ ४० ॥ 

गात्रे मानस अन् प्रज्ञा कामाचे अधिष्ठान 

काम मोहवी जीवात्म्यास त्यांना झाकोळून  ॥४०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अवयवदान – जनजागृती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

अवयवदान – जनजागृती… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अवयव आणि देहदान महासंघ म्हणजेच Federation of   Organ and Body Donation ही संस्था ऊतीदान, देहदान व अवयवदानासाठी आपल्या अनेक जिल्हा शाखांमार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात काम करते.  जसं नेत्रदान आणि त्वचा दान करता येतं, तसंच हृदय, यकृत, किडनी, पॅनक्रियाज, इंटेस्टाईन, फुफ्फुसे , गर्भाशय वगैरे अवयवांचेही  दान करता येतं.

अर्थात वरील पैकी देहदान आणि त्वचा व नेत्रदान सोडता बाकीच्या गोष्टींचं दान फक्त ब्रेनडेड या मृतावस्थे पर्यंत पोहोचू शकणारे पुण्यवानच करु शकतात. 

एक किडनी, यकृताचा काही भाग,  गर्भाशय वगैरे काही जीवित व्यक्ती देखील दान करु शकते पण त्यासाठीचे कांही वेगळे नियम आहेत.

आपण गेल्यावर आपले देता येण्यासारखे अवयव दान देऊन आपण काही व्यक्तींना जीवनदान देऊ शकलो तर त्यापेक्षा अधिक आनंदाचे असे काय असेल?

अवयवदान केल्यानंतर देखील पार्थिवाचे, संबंधितांच्या धार्मिक प्रथेप्रमाणे अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. तेव्हा धार्मिक क्रियाकर्म शक्य होतील का नाही, हा विचार मनात येत असेल तर त्याचं उत्तर निश्चीतच तुमच्या तुमच्या धर्मात लिहिल्याप्रमाणे अंत्यविधी करता येतील असंच आहे.

मुळात अशी इच्छा व्यक्त करुन डोनर कार्ड भरले तरी काही ठरावीक केसेस मधे ती इच्छा पुर्णत्वास नेणे अशक्य होते. (जसं कॅन्सर, एडस्, हेपाटायटिस वगैरे)  तरी देखील आपली इच्छा नोंदवून तसे आपल्या जवळच्या कुटूंबियांस सांगणे व या संबंधी कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक यांचेशी वारंवार चर्चा करीत रहाणे केव्हाही उत्तमच.* 

आपल्यापैकी कोणाला जर ह्या विषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल, मनात असलेल्या शंकांचे समाधान करून घ्यायचे असेल,

आणि

आपणाकडे माईकची सोय असेल अथवा नसेल……

बंदिस्त सभागृह असेल अथवा नसेल……

मानधन देण्याची तयारी असेल अथवा नसेल……

कार्यकर्त्यांची फौज असेल अथवा नसेल……

पॉवर पॉइंट सादरीकरणाची सोय असेल अथवा नसेल……

अशा कोणत्याही अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत अवयवदानाच्या जागृती / प्रबोधन कार्यक्रमासाठी महाराष्ट्रात कोठेही आपण कमितकमी  १००  व जास्तीतजास्त ५००० श्रोते जमा करू शकत असाल 

तर कृपया संपर्क साधावा—- 

फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्ड बॉडी डोनेशन, मुंबई

अध्यक्ष : श्री पुरूषोत्तम पवार

मुंबई 

मो ९८२२०४९६७५

उपाध्यक्ष : श्री सुनील देशपांडे  

पुणे 

मो ९६५७७०९६४०

© श्री सुनील देशपांडे

पुणे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆

श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर

परिचय :  

महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चे काम केले आहे.

युवकांनी देशसेवेसाठी दोन वर्ष पुर्ण वेळ द्यावे, या बाळासाहेब देवरसांच्या आवाहनानुसार पहिले चार महिने आसाम ला व नंतर मध्यप्रदेशात अभाविप चे काम केले.

कामासाठी होशंगाबाद जिल्हा मिळाला असता एका आक्रमणकाऱ्याचे नाव आपण आपल्या सुंदर शहराला का देतो, असे म्हणत, “होशंगाबाद नहीं नर्मदापुर कहो!” हे अभियान सुरू केले. त्याला ३१ वर्षांनी यश आले व होशंगाबाद चे नामांतरण नर्मदापुरम् झाले. या नामांतरणादरम्यान भव्य मंचावर अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले होते.

आजकाल नर्मदा परिक्रमा करून आलेल्यांना संगठित करत, माझी गावनदी हीच माझी नर्मदा हे अभियान चालवतो. यासाठी गुगलमिटवरून नर्मदाष्टक उपासना मंडळ चालवतो. महाराष्ट्रासह अनेक राज्यातील गावांमध्ये गावनदी अभियान सुरू झालेले आहे.

व्यवसाय – मुद्रण

छंद – स्वदेशी चळवळी अंतर्गत हेअर आॅईल शिकाकाई शाम्पू, दंत मंजन व आंघोळीचे नदीपुरक साबण बनवत असतो.

? इंद्रधनुष्य ?

☆ बहुता सुकृतांची जोडी ☆ श्री किशोर पौनीकर ☆

वय केवळ ११७ वर्ष

केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री. नितीनजी गडकरींनी नर्मदा परिक्रमा मार्गात रस्ते बांधतो म्हटल्यावर, परिक्रमा मार्ग हा पारंपरिक पद्धतीचाच असावा, असा आग्रह करणारा लेख मी लिहिला होता. तो अनेकांना आवडला व भरपूर शेअर, फाॅरवर्ड झाला. लगोलग तिसऱ्याच दिवशी नर्मदा परिक्रमा क्षेत्रातील काही परिक्रमींच्या गैरवर्तणुकीवरही लेख लिहावा लागला. हा लेख सपाटून शेअर व काॅपी पेस्ट झाला. साम टिव्ही मराठी वर माझी मुलाखतही झाली. गेल्या चार दिवसांपासून सकाळी ८.०० ते रात्री ९.३० फोन सतत वाजतोय. व्हाॅटस् ॲपवरही कितीतरी मेसेजेस येत आहेत.

असाच एक मेसेज आला….. 

डाॅक्टर स्वामी केशवदास.

करनाली, तालुका डभोई, जिला बड़ौदा, गुजरात.

इतक्या फोन व मेसेजमध्ये या मेसेजकडे विशेष लक्ष जाणे शक्यच नव्हते. त्यांना विचारले, “आपल्याला मराठी येते का?” तर ते म्हणाले की, “गुजराती/हिंदी/इंग्लिश/तमिल/तेलगु/कन्नड़ भाषा अच्छी तरह जानते है। मराठी समझता हूं, पर बोल नहीं सकता!”

मी त्यांना माझे नर्मदा मैय्यावरील काही हिन्दी लेख पाठवलेत. त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

(सततचे फोन व मेसेजेस मध्ये गुंतून पडल्याने दुर्देवाने मी कोणाशी चॅटिंग करत आहे, हे मला माहितच नव्हते.) मी त्यांना म्हणालो की, केंव्हाही फोन करा.

आज त्यांचा मेसेज आला की, ते रात्री ८.३० नंतर मला फोन करतील. फोन तेच करणार होते, त्यामुळे मला चिंता नव्हती. नर्मदाप्रेमी अलग अलग बंधु भगिनींचे फोन व मेसेज सुरूच होते.

रात्री ९.३० ला फोन वाजला. हा नंबर व्हाॅटस ॲप चॅटिंग मुळे माझ्या जवळ सेव्ह होता. स्क्रिनवर नाव आले. #स्वामी_केशवदास, बडोदा, गुजरात.

मी फोन सुरू केला. अंदाजे ६५ वर्षे वय असलेला तो आवाज वाटला. मी बोलणे सुरू केले. स्वामीजींचेही बोलणे सुरू झाले. त्यांना माझा ‘गडकरींवरील लेख’ व ‘परिक्रमा की बेधुंद तमाशे’  हे दोन्हीही लेख फार आवडले होते. त्यांनी माझी साम टिव्ही मराठी वरील लाईव्ह मुलाखतही बघितली होती. मुलाखत संपल्यावर लगोलगच त्यांनी मला फोन लावला होता. पण तेंव्हा माझा फोन सतत बिझी असल्याने आमचे बोलणे झाले नव्हते. म्हणून त्यांनी मला मेसेज केला होता.

स्वामीजींना बोलतं करावं म्हणून मी काही प्रश्न विचारले व त्या दरम्यान ते बोलत असतांना दर वाक्यागणिक थक्क होण्याची वेळ माझ्यावर आली होती.

म्हैसूरला जन्म झालेले स्वामीजी प्रख्यात डेहराडून स्कूल मध्ये शिकले व नंतर ब्रिटनमध्ये ते वयाच्या ६७ वर्षापर्यंत प्रख्यात हार्ट सर्जन म्हणून कार्यरत होते. अमाप पैसा कमावला. त्यांनी लाहिरी महाशयांकडून क्रिया योगाची दिक्षा घेतली आहे. 

मी सहजच त्यांना विचारले, “स्वामीजी, आपने नर्मदा परिक्रमा कब की?”

“१९५६ में ” ते म्हणाले व मी एकदम उडालोच….

“स्वामीजी आपकी उम्र कितनी है? ” मी आतुरतेने नव्हे अधिरतेने विचारले…

“११७ वर्ष “

“ क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या????”

मी जवळपास किंचाळलोच. चौथ्या मजल्यावरच्या गॅलरीत उभा राहून बोलणारा मी, मला कोणीतरी १०० व्या मजल्यावर पॅराफिट वाॅल नसलेल्या गॅलरीत उभे केलेय, अशा चक्रावलेल्या अवस्थेत होतो.

मला, मी काहीतरी चुकीचेच ऐकत आहे, असे वाटत होते. मी पुन्हा त्यांना विचारले, “आपका जन्म वर्ष कौनसा है?”

“सन १९०५” ते उत्तरले.

माझे वय वर्ष ५७ होत असल्याने, आता बरीच कामं कमी करावीत, अशा सर्वसामान्य मराठी विचारांचा मी, मनातल्या मनात तुटक गणित मांडू लागलो….. १९०५ ते २००५ म्हणजे १०० वर्ष. २००५ ते २०२२ म्हणजे १७ वर्ष….. म्हणजे ११७ वर्ष बरोब्बर होते.

गॅलरीत वाहत असलेल्या हिवाळी थंड हवेतही मला घाम आला…

तिथूनच मी नर्मदा मैय्याला व मला घडवणाऱ्या वैनगंगेला नमस्कार केला…. एक साधा यःकश्चित व्यक्ती मी, ४५ वर्ष विदेशात विख्यात हार्ट सर्जन म्हणून काम केलेल्या, ११७ वर्षांच्या विभुतीने मला स्वतःहून फोन करून तुमचे व माझे विचार एकसारखे आहेत, हे म्हणावे…. मी पुन्हा चक्रावलो होतो.

पण…. 

माझे हे चक्रावणे येवढेच असावे, असे जे वाटत होते, ते त्यांच्या दर वाक्यागणिक वाढतच होते.

मी त्यांना त्यांच्या आश्रमा बद्दल विचारू लागलो. मला वाटले की एक हाॅल व कुटी, असे काहीसे ते सांगतील….

ते म्हणालेत, “नर्मदाजी के दोनो तट मिलाकर हमारे सात आश्रम है, पर हर आश्रम में मंदिर बनाने की जगह मैने २००, २५० काॅट के अस्पताल बनवाये है। पर इसकारण आप मुझे नास्तिक मत समझना। “

त्यांच्या आश्रमाचे सेवाकार्य ते सांगू लागले. “हमारे तीन आश्रम में ही नर्मदा परिक्रमावासी आते है, बाकी में अस्पताल, क्रियायोग साधना व स्वावलंबन के कार्य चलते है। हमारे किसी भी आश्रम में दानपेटी नहीं है, न ही हमने कोई रसिदबुक छपवाये है। हमारे ट्रस्ट में जो पैसा है, उसके ब्याज पर हमारे सब कार्य चलते है।”

मी जे ऐकत होतो, ते सर्व भव्य-दिव्य व व्यापक होते… स्वतःच्या आकलनशक्तीची संकुचितता मला कळली होती. मी हतबल होतो की, दिःग्मुढ, हेच मला कळत नव्हते.

काहीतरी बोलायचे म्हणून मी बोललो,” आपकी हिन्दी तो बहुत अच्छी है, आप दक्षिण भारतीय नहीं लगते। “

ते म्हणालेत, “हां ठिक पहचाना, वैसे हम उत्तर भारतीय है। मेरे पिताजी मैसूर के महाराजा के कुलपुरोहित थे।”

अजून एक मोठा धक्का मला बसायचा बाकी आहे, हे मला माहीत नव्हते…

मी विचारले, “आपके दादाजी कौन थे? “

“पंडित मदन मोहन मालवीय!”

” क्ऽक्ऽक्ऽक्ऽक्या?” आपण कितव्यांदा आश्चर्यचकित होत आहोत, हे मोजणे मी बंद केले होते.

“महामना पंडित मदन मोहन मालवीय?” न राहवून मी त्यांना पुन्हा विचारले.

“हां!  मेरे दादाजी बॅरिस्टर थे…. ” ते महामना पंडित मदन मोहन मालवीयांबद्दल सांगू लागलेत.

थोड्या वेळाने त्यांनी आपली गाडी पुन्हा नर्मदा परिक्रमेकडे वळवली. म्हणालेत, “आप परिक्रमा के बारे में जो आग्रह कर रहे है, वह बहुतही सटिक है। गुरू आज्ञा के बिना नर्मदा परिक्रमा करना मात्र चहलकदमी ही है! “

मग ते मराठी परिक्रमावासी व त्यांचे वागणे, परिक्रमेत शूलपाणी झाडीतून जाण्याचा अवास्तव आग्रह, शूलपाणीतील सेवाकेंद्रांची काही गडबड, असे बोलू लागले.

पुढे ते म्हणालेत,”मै अब तक खुद होकर केवल “राहूल बजाज” से फोनपर बात करता था। आपके परिक्रमापर के लेख व परिक्रमा फिरसे अध्यात्मिक ही हो, यह आपका प्रयास मुझे बहुत भाया। इसलिये आज मै आपसे खुद होकर फोन से बात कर रहा हूं।”

नर्मदा मैय्या अनाकलनीय चमत्कार करत असते, हे मला माहीत होते. यातले काही माझ्या वाहन परिक्रमेत मी अनुभवले होते. पण ती सामाजिक जीवनातही चमत्कार करते, हे मला यावर्षीच्या ४ ते ८ फेब्रुवारी दरम्यान कळले होते. होशंगाबादचे नामांतरण नर्मदापुरम् होण्याचे पूर्ण श्रेय तिने मला त्या भव्य मंचावर मुख्यमंत्री, खासदार व आमदारांच्या सोबत बसवून दिले होते.

आता राहूल बजाज यांचे शिवाय स्वतःहून कोणालाच फोन न करणारे स्वामी केशवदास, माझ्याशी स्वतःहून फोनवर बोलत होते.

मी पण नर्मदेच्या या चमत्काराचा फायदा घेतला. त्यांना म्हणालो की, “परिक्रमेतील वाढत्या गर्दीमुळे वमलेश्वर (विमलेश्वर) ला परिक्रमावासींना तीन चार दिवस अडकून पडावे लागते. त्यांच्यासाठी विमलेश्वर गावाअगोदर अंदाजे १५०० परिक्रमावासी राहू शकतील असा आश्रम बनवायला हवा, जेणेकरून नावाडी व ट्रॅव्हल कंपन्यांच्या साटेलोट्यांचा त्रास पायी व छोट्या वाहनाने परिक्रमा करणाऱ्यांना होऊ नये. तसेच आज केवळ १२ नावा चालतात, त्या वाढवून किमान २५ तरी व्हाव्यात.”

स्वामीजी म्हणालेत,”अभी गुजरात मे चुनाव का मौसम चल रहा है। चुनाव होने के पंद्रह बीस दिन बाद अपने उस समय के मुख्यमंत्री से ही सिधी बात करेंगे। विमलेश्वर में बडा आश्रम तो हम खुद ही बना देंगे। “

गेल्या दोन दिवसांपासून वमलेश्वर/विमलेश्वरच्या गर्दीमुळे मी फारच चिंतीत होतो. यावर काय तोडगा निघू शकतो? म्हणून मी भरपूर जणांना फोन केले होते. आपण यावर काय करू शकतो? हे चाचपडणे सुरू होते.

अशा वेळी नर्मदेने त्या क्षेत्रातला सुप्रिम बाॅसच माझ्याकडे पाठवून दिला. ११७ वर्षांचा हा तरुण आपल्या वयाच्या अर्ध्याहूनही लहान, नाव किशोर, पण स्वतःला प्रौढ समजायला लागलेल्या मला, नर्मदा प्रेरित सामाजिक कार्यासाठी नवचैतन्य भरत होता. 

नर्मदा मैय्या के मन में क्या चल रहा है, यह तो बस वहीं जानती है! 

नर्मदे हर ! नर्मदे हर! नर्मदे हर !

© श्री किशोर पौनीकर नर्मदापुरकर,

नागपूर

मो – 9850352424

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ @ २५ डिसेंबर @ नाताळ सण… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ @ २५ डिसेंबर @ नाताळ सण… लेखक : श्री संजीव वेलणकर ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असणारा आणि आनंदोल्हासाचा सण असणाऱ्या नाताळाचा अर्थात ख्रिसमसचा मूळ अर्थ आहे ख्राईस्ट मास. याचा अर्थ, येशूच्या (ख्रिस्त) जन्मानिमित्त करण्यात येणारी सामूहीक प्रार्थना. पण नाताळ केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो एक सण झाला आहे. दरवर्षी २५ डिसेंबर ख्रिश्चन जगतात अतिशय हर्षोल्हासाने साजरा केला जातो. ख्रिस्तापूर्वी रोम राज्यात पंचवीस डिसेंबरला सूर्यदेव डायनोसियसच्या प्रार्थनेसाठी मोठा उत्सव होत असे. इसवी सनाच्या पहिल्या शतकात लोक येशूचा जन्मदिवस २५ डिसेंबरला साजरा करू लागले. पुढे या उत्सवाची परंपरा निर्माण झाली. येशूच्या जन्माची कथा न्यू टेस्टामेट मध्ये दिली आहे.

त्यानुसार, देवाने आपला दूत गॅब्रियलला पृथ्वीवर मेरी नावाच्या एका तरूणीकडे पाठविले. गॅब्रियलने मेरीला सांगितले की, तुझ्या पोटी इश्वराचा पुत्र जन्म घेणार आहे. त्याचे नाव जीझस असेल. तो महान राजा असेल आणि त्याच्या राज्याला कोणतीही सीमा नसेल. मेरी कुमारीका व अविवाहित होती. त्यामुळे आपल्याला पुत्र कसा होईल, असा प्रश्न तिला पडला. तिने गॅब्रियलला तसे विचारलेही. त्यावेळी गॅब्रियल म्हणाला, इश्वरी आत्मा येऊन तिला शक्ती देईल. ज्या योगे तिला मूल होईल. लवकरच मेरीचे जोसेफ नावाच्या युवकाशी लग्न झाले. देवदूताने जोसेफच्या स्वप्नात जाऊन सांगितले, की मेरी गर्भवती असून तिला लवकरच मुलगा होईल. त्यामुळे तिची योग्य काळजी घ्यावी. तिला सोडून देऊ नये. त्यावेळी जोसेफ व मेरी नाजरथ मध्ये रहात होते. नाजरथ आता इस्त्रायलमध्ये आहे. त्या काळी ते रोमन साम्राज्याचा भाग होते आणि ऑगस्टस हा रोमचा सम्राट होता. ऑगस्टस याने एकदा आपल्या राज्याची जनगणना करण्याचे ठरविले. त्यासाठी बेथेलहेमला जाऊन प्रत्येकाला आपले नाव लिहावे लागत असे.

त्यामुळे बेथेलहॅमला मोठी गर्दी झाली होती. सर्व धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाणे भरून गेली होती. गर्भवती मेरीला घेऊन जोसेफही तेथे आला होता. पण खूप हिंडूनही त्यांना कुठे जागा मिळत नव्हती. शेवटी एका घोड्याच्या पागेत त्यांना जागा मिळाली. तेथेच मध्यरात्री भगवान येशूचा जन्म झाला. त्यांना गुंडाळून ठेवण्यात आले होते. तेथे जवळच काही धनगर गायींना चारत होते. त्यावेळी तेथे एक देवदूत आला, त्याने या धनगरांना सांगितले, की जवळच एका बाळाचा जन्म झाला आहे. हे बाळ म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून दस्तुरखुद्द परमेश्वरच आहे. धनगरांनी तेथे जाऊन पाहिले तर खरोखरच त्यांना बाळ दिसले. त्यांनी गुडघे टेकून त्याला नमस्कार केला. हे धनगर खूप गरीब असल्याने त्यांच्याकडे भेट म्हणून द्यायला काहीही नव्हते. म्हणून त्यांनी येशूला भगवान म्हणून स्वीकारले. ख्रिश्चनांसाठी या घटनेचे मोठे मह्त्त्व आहे. कारण त्यांच्या मते येशू हा इश्वरपुत्र होता. म्हणूनच ख्रिसमस हा आनंदोत्सव आहे. कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी पृथ्वीवर आला होता. म्हणूनच प्रार्थना, ख्रिसमस गीत कॅरोल्सचे गायन, शुभेच्छा पत्रांचे आदानप्रदान, विविध खाद्यपदार्थ या द्वारे येशूचा जन्मोत्सव आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. जगभरातील चर्च मध्ये या दिवशी यात्रा काढल्या जातात. भक्तीगीतांचे गायन होते. २४ व २५ डिसेंबरच्या दरम्यानची रात्र येशूच्या आराधनेत जागवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळीच जन्मोत्सव साजरा केला जातो. एकमेकांचा गळाभेट घेऊन लोक परस्परांना शुभेच्छा देतात. रोट व पवित्र मद्याचा प्रसाद ग्रहण केला जातो. चर्चमध्ये ख्रिसमस ट्री सजविला जातो. लखलखत्या दिव्यांची तोरणे घराघरांना, चर्चेसला लागतात. खरे तर सध्या साजरा केला जातो तशा पदधतीचा ख्रिसमस १९ व्या शतकात साजरा व्हायला लागला. ख्रिसमस ट्री पूर्वी फक्त जर्मनीत असायचे. ख्रिसमस मध्ये कॅरोल्सचा समावेश ब्रिटनमध्ये प्रिन्स अल्बर्टने केला होता. या दिवशी आतषबाजीची परंपरा टॉम स्मिथने सुरू केली. १८४६ मध्ये ख्रिसमर्स कार्ड बनविले गेले. १८७० पर्यंत त्याचा प्रसार सर्वत्र झाला. सांताक्लॉजचा उल्लेख १८६८ मध्ये एका नियतकालिकात वाचायला मिळतो. २५ डिसेंबर दोन गोष्टीं शिवाय अपूर्ण असतो. सांताक्लॉज आणि ख्रिसमस केक. बेकरी मध्ये ख्रिसमसची तयारी एक महिन्यापूर्वी सुरू होते. ड्रायफ्रूट्स रम मध्ये घालतात आणि ख्रिसमसच्या दिवशी हा मुरलेला मेवा केकच्या मिश्रणात घालतात. हा खास ख्रिसमस केक असतो. याशिवाय इतरही केकचे प्रकार असतातच.

लेखक : संजीव वेलणकर

पुणे

९३२२४०१७३३

संकलन : मिलिंद पंडित

कल्याण 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ अफाट बुद्धिसंपदेचा मालक… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

अमिताभ बच्चनजी ८० वर्षाचे झाले तरी अजूनही काम करतात म्हणून बातमी होते. मोदीजी सत्तरी पार करूनही किती राबतात यावर भरपूर कौतुकास्पद चर्चा होते. देवआनंदच्या चिरतरूण देहबोली वर मासिकांची कितीतरी पाने भरलेली असतात. हेमामालिनी या वयातही किती सुंदर दिसते यावर जवळपास सगळी चॅनेल्स चर्चा करतात. रेखाच्या उतारवयात उम्फ फॅक्टर जपण्यावर सोशल मिडियावर तुफान चर्चा होते.

आपण फिल्मी सितारे व राजकारणी यांच्यात इतके गुरफटून गेलो आहोत की त्यापलिकडे बरेचदा बहुसंख्य लोकांना इतर क्षेत्रात योगदान करणारे महर्षी दिसतच नाहीत. फार थोडे भारतीय अशा महान पण दुर्लक्षित लोकांची दखल घेतात.

हे लिहिण्यामागचे कारण म्हणजे डॉ रघुनाथ माशेलकर. १ जानेवारी २०२४ रोजी ते ८२ वर्षाचे झाले.

शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी लागणारी जुजबी फी भरण्याची ऐपत नसलेले माशेलकर महापालिकेच्या दिव्याखाली अभ्यास करून अकरावीला बोर्डात ११ वा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. अकरावीपर्यंत अनवाणी चालणारा हा माणूस न्यूटनने सही केलेल्या रजिस्टरवर सही करणारा पहिला महाराष्ट्रीयन ठरला.

तब्बल ६० पेक्षा अधिक पुरस्कार, ३९ डॉक्टरेट, २८ च्या आसपास पेटंटस्‌, २६५ शोध निबंध अशा अफाट बुध्दीसंपदेचा मालक असलेला हा महामानव.

हळद आणि तांदूळ यांची पेटंट लढाई जिंकून भारताला पेटंटविषयी नवी दिशा देणारा भारताचा सुपुत्र. २८००० तज्ञांसह ४० प्रयोगशाळा संचलित करणारी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) ही फक्त आकाराने मोठीअसलेली संस्था यश व किर्तीरुपाला आणणारा हा कर्मयोगी.

२३ व्या वर्षी रासायनिक अभियांत्रिकीमध्ये पी एच डी मिळविणारे माशेलकर जेल रसायनशास्त्र, पॉलिमर रिऍक्षन, फ्लुईड मेकॅनिक या विषयातील नावाजलेले तज्ञ आहेत. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण हे तीन पुरस्कार, म्हणजे फक्त भारतरत्न बाकी!

असा क्रषितुल्य भारतीय ८३ व्या वयात पदार्पण करताना अजुनही आपल्या क्षेत्रात कार्यरत आहे. याची दखल म्हणावी अशी कुणी घेत नाही हे भारतीयांचे करंटेपण म्हणावे लागेल

या महान वैज्ञानिकाला शंभरी पार केल्यानंतरही कार्यमग्न राहण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!!

वंदे मातरम !!

संग्राहक : श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640 Email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलु साबणेजोशी 

?इंद्रधनुष्य? 

☆ “आईनस्टाईनचा जिना” – लेखक : राजेंद्र वैशंपायन ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

हृषीकेश मुखर्जी या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकाने 70 च्या दशकात एक अप्रतिम चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव “बावर्ची”. एक प्रगल्भ प्राध्यापक ‘बावर्ची’ म्हणजे स्वयंपाकी बनून एका अशांतीने भरलेल्या कुटुंबात येतो आणि साध्या साध्या प्रसंगातून नातेसंबंधात प्रेम आणि कुटुंबात  शांती आणि आनंद कसा निर्माण करता येतं, हे कथाबीज  केंद्रस्थानी ठेवून बांधलेला तो अफलातून चित्रपट.  

त्या चित्रपटात त्या बावर्चीच्या पात्राच्या तोंडी रवींद्रनाथ टागोर यांचं एक वाक्य दिलं आहे ते असं;

“It’s very simple to be happy but its very difficult to be simple”

हा चित्रपट पाहिला होता तेव्हा ते वाक्य मनाला भिडून गेलं होतं आणि ते कायम स्मरणात राहिलं. त्यावर थोडं चिंतन झालं होतं पण त्या वाक्यातील खरं गूज मात्र लक्षात आलं नव्हतं. 

दोन तीन दिवसांपूर्वी गुगलवर काही शोधत असताना एक चित्र डोळ्यासमोर आलं. आईन्स्टाईनने बुद्धिमत्तेच्या पायऱ्या सांगितल्या आहेत त्यापासून तयार झालेला एक जिना त्या चित्रात दाखवलेला होता.

त्यातल्या पायऱ्या अश्या …. 

सर्वात खालच्या पातळीवर; 

Smart – हुशार

त्याच्या वरची पायरी:

Intelligent – बुद्धिमान

त्याच्या वरची पायरी;

Brilliant – तल्लख किंवा तरल

त्याच्या वरची पायरी; 

Genius – प्रतिभाशाली

आणि त्याच्याही वरची आईन्स्टाईनने सांगितलेली पायरी म्हणजे 

Simple –  सहज

आईन्स्टाईनच्या या बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांच्या जिन्याचं चित्र बघितलं आणि पू. रवींद्रनाथ टागोर यांच्या वाक्यामागचं गुह्य अचानक उमगलं.  त्या वाक्याचा मराठीतील भावानुवाद करायचा तर तो असा होईल; 

“आनंदी होणं खूप सोपं किंवा सहज असतं. पण सहज होणं अतिशय कठीण असतं.”

त्या वाक्याच्या गुह्यातील काही मुद्दे आइन्स्टाईनच्या जिन्याच्या संदर्भातून मला लक्षात आले. 

पहिली गोष्ट ही की कुठल्याही विषयात सहजता मिळवणं ही कठीण गोष्ट आहे कारण ती मिळवण्यापूर्वी हुशार ते प्रतिभासंपन्न हा बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांचा प्रवास खूप कठीण, कष्टसाध्य आहे जो अनेक तपं करत रहावा लागतो. त्यामुळे संगीत असो, साहित्य असो, इतर व्यवसाय असो, किंवा जीवनातील आनंदसाधना असो, या पायऱ्या साधण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या विषयात ‘सहज’ ही पातळी गाठणं कठीण आहे.

दुसरा मुद्दा असा लक्षात आला की हुशार ते प्रतिभाशाली या पायऱ्या कष्टसाध्य आहेत.  प्रयत्नांनी त्या साधल्या जाऊ शकतील पण सहजता मिळवायची असेल तर? 

यावर चिंतन करताना असं लक्षात  आलं की 

” प्रतिभा जेव्हा भगवंताशी शरणागत होते, तेव्हा ती सहज होते “. 

प्रतिभा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमागचा रजोगुणी अहंकार जेव्हा एका स्थितीला भागवंतापुढे शरणागत होऊन लयाला जाईल तेव्हा भगवंताच्या कृपेनेच सहजता येईल. 

याचाच दुसरा कंगोरा असा की केवळ प्रयत्नांनी सहजता मिळणार नाही आणि प्रयत्नांशिवाय केवळ शरणगातीनेही सहजता मिळणार नाही. म्हणून खूप प्रयत्न केल्यानंतरही भागवंतापायी शरणागती नसेल तरीही चालणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय नुसतंच शरणागत होऊनही चालायचं नाही. इतकंच नव्हे तर प्रयत्नांशिवाय जर मी शरणागत होण्याची भावना बाळगत असेन तर ती कोरडी शरणागती असेल, त्या शरणागतीतही सहजता नसेल.

यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठल्यावर, केवळ प्रयत्नांनी साधत नाही हे लक्षात आल्यावर, स्वाभाविकपणे घडणारी  संपूर्ण शरणागती, यानेच केवळ सहजता प्राप्त होईल हेही लक्षात आलं. 

या विचाराबरोबरच योगवासिष्ठ्य या अद्भुत ग्रंथात सांगितलेल्या प्रयत्नवादावरच्या काही सिद्धांतांचीही थोडीफार उकल झाली.

हा सगळा उहापोह मनात झाल्यावर एक मात्र झालं. आइन्स्टाईनच्या त्या जिन्यावर मी कुठे आहे हे जरी सांगता आलं नाही तरी कुठे जायचं आहे हे मला लक्षात आलं आहे यानेच अतीव  समाधान अनुभवत आहे. 

लेखक : राजेंद्र वैशंपायन 

मो – ९३२३२ २७२७७

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-4 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे

(ज्यु लोकांच्या शास्रधारी गटांनी त्याचा सशस्त्र प्रतिकार केला.) इथून पुढे — 

1939 ते 1945 मध्ये दुसरे महायुद्ध झाले. या काळात फळणीची योजना मागे पडली. दुसऱ्या महायुद्धात युरोपातील 60 लाख निरापराध ज्यु लोकांची नाझी जर्मनीने अमानुष कत्तल केली. आता मात्र ज्यु लोकांना आत्मरक्षा करता येण्याजोगा स्वातंत्र्य देश निर्माण करण्याची गरज सर्व जगाला जाणवली. 1947 साली संयुक्त राष्ट्र संघटनेने ज्यु लोकांच्या मायाभूमीची फाळणी करून ज्यु लोकांसाठी स्वतंत्र्य देश आणि अरबांसाठी स्वतंत्र देश निर्माण करण्याचा निर्णय घेतला. अरबांनी त्याला परत विरोध केला. पण दुसऱ्या महायुद्धात अनन्वित अत्याचार झालेल्या ज्यु लोकांसाठी संपूर्ण जगाने लावलेल्या रेट्यामुळे 1948 साली इस्राईल या नवीन देशाची स्थापना झालीच. लगेच शेजारील इजिप्त, सिरिया, ट्रान्सजॉर्डन, लिबेनोन, इराक, सौदी अरेबिया, येमेन या अरब राष्ट्रांनी मिळून ईस्राएलवर हल्ला केला. इस्राईलने सर्व अरब राष्ट्रांचा एकत्रित पराभव केला. आपले पहिले स्वातंत्र्ययुद्ध इस्राईलने महत प्रयासने जिंकले. त्यानंतर जगभरातून ज्यु आपल्या मायभूमीमध्ये येऊन स्थायिक होऊ लागले. अरब लोक इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचे प्रयत्न करत राहिले. दहशदवादी गटांकडून छोटे मोठे हल्ले तर सतत चालूच होते. पण शेजारील अरब देशांनी 1956 ला सुवेज कॅनल युद्ध, 1967 ला सहा दिवसाचे युद्ध, 1973 चे योनकिपरचे युद्ध करून इस्राईलचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला.  इस्राईलने या सर्व युद्धात अरबांचा पराभव करत आपले अस्तित्व टिकवले.

ज्यु लोकांनी कायम आपल्या मायभूमीत आपले अस्तित्व टिकवून ठेवले. इतकेच नव्हे तर अमाप कष्ट करून त्या वाळवंटात नंदनवन फुलवले. कमी पाण्यात केले जाणारी इस्राईली शेती आणि औद्योगिक प्रगती जगतमान्य आहे. इस्राईलची संरक्षण दले आणि गुप्तचर यंत्रणांची जगात दहशद आहे. मध्यपूर्व भागात तेल नसलेले एकमेव प्रगत राष्ट्र असा लौकिक इस्राईलने मिळवला आहे.

एकेश्वरवादी ज्यु लोकांनी स्वतःचा धर्म संभाळला. पण त्यांनी इसाई आणि मुस्लिम लोकांसारखा आक्रमक धर्मप्रचार केल्याची उदाहरणं फारशी ऐकीवात नाहीत. पण त्यांनी आपली वेगळी धार्मिक ओळख म्हणजे अहंकार जपला. त्यात ज्यु समाज कायम आर्थिक दृष्टया प्रगत होते. त्याचा फटका त्यांना वारंवार बसला. आर्थिक प्रगती करणे समाजमान्य आहे. त्यामुळे आर्थिक प्रगतीचा सरळ तिरस्कार करता येत नाही. काहीतरी वेगळे कारण शोधावे लागते. ज्यु लोकांनी जपलेले धार्मिक वेगळेपण त्यांच्या तिरस्काराचे कारण झाले.

‘नंगे से खुदा डरता है’ असे म्हणतात. पण ज्यु लोक कधीच भूखे किंवा नंगे नव्हते. व्यक्तीजवळ गमावण्याजोगे काही असेल तर व्यक्ती जरा घाबरूनच राहतो. ज्यु लोकांच्या अशा व्यापारी स्वभावामुळे त्यांना कधी कुणी घाबरले नाही. त्यामुळे ज्यु लोक सॉफ्ट टार्गेट झाले. त्यांच्या धर्मिक वेगळेपणाच्या आधारावर जगभर त्यांचा छळ झाला. नंगाडपणातून येणारी सत्ता आणि ताकत असल्याशिवाय संपत्ती टिकवता येत नाही. हे सत्य हिंदूप्रमाणे ज्यु लोकांनाही उशिरा उमगले. आजही सुसंस्कृत आणि सधन असललेले ज्यु इस्राईल बाहेर फारसे आक्रमक नाहीत. चालुबाजूनी ज्यु द्वेष्ट्या मुस्लिम अरब राष्ट्रानीं वेढलेल्या इस्राईल मध्ये ते आक्रमक राहिले नसते तर कधीच त्यांचे अस्तित्व नष्ट केले गेले असते.

जगभरात सर्वत्र फ्रस्ट्रॅटेड लोक आढळतात. त्यांच्या आत सुरु असलेली खदखद बाहेर काढण्यासाठी ते सॉफ्ट टार्गेट शोधत असतात. पूर्वीपारपासून ज्यु लोक हे अतिशय सॉफ्ट टार्गेट असल्यामुळे इस्राईलवर दहशदवादी हल्ला होऊनही जगभरातील सगळे वैफल्यग्रस्त लोक ज्युं आणि इस्राईल विरुद्ध मोर्चे काढत आहेत. आपले फ्रस्ट्रेशन कमी करायचा प्रयत्न करत आहेत.  मनातील दुःख आणि इर्षा कुठेतरी बाहेर पडणारच असते. इतिहासात असेच सर्व लोकांनी सॉफ्ट टार्गेट असलेल्या ज्यु लोकांवर आपले फ्रस्ट्रेशन काढले आहे. पहिल्या महायुद्धाशी ज्यु लोकांचा काहीही संबंध नव्हता. पहिले महायुद्ध हरल्यानंतर जर्मनीत प्रचंड अगतिकता निर्माण झाली. हिटलरने ज्यु लोकांना जर्मनीच्या परिस्थितीसाठी जबाबदार ठरवून ती सगळी अगतिकता काढण्यासाठी वांगे उपलब्ध करून दिले. 

इस्लाम आणि इसाई आक्रमक धर्मप्रचार करतात. धर्मप्रचार करताना इतर धर्माना आधी वाईट म्हणावे लागते. त्यामुळे धर्मप्रचार संघर्ष निर्माण होतात. इसाई धर्माला इतर धर्मांचे सहअस्तित्व तरी मान्य आहे. इस्लामला तेही मान्य नाही. ते आजवर मोठमोठया संघर्षाचे कारण ठरले आहे. पण हे दोन्ही धर्म कमालीचे आक्रमक आहेत. प्रतिकारात यांना उलटा मार पडल्यावर पटकन ते व्हिक्टिम कार्ड बाहेर कडून जगभर प्रदर्शने आयोजित करतात. ही कला ज्यु आणि हिंदू लोकांना आजवर जमलेली नाही. 

एकेश्वरवादी धर्म सर्वसमावेशक होऊ शकत नाहीत हे सत्य आहे. मी ज्यावर विश्वास ठेवला आहे तेच एकमेव सत्य आहे असा भ्रम झाला की आपल्या सारखा विश्वास असणारे आपले आणि त्या व्यतिरिक्त विश्वास असणारे परके वाटू लागतात. ‘केवळ आपण शहाणे आणि इतर जग बावळट’ इथपर्यंत ठिक आले. इतर लोकांशी संघर्ष होण्याची शक्यता कमी असते. पण धार्मिक नेत्याची ताकत त्याच्या समर्थकांच्या संख्येवरून ठरते. म्हणून ते आपल्या समर्थकांना संपूर्ण जगाला स्वतः सारखे शहाणे करून टाकण्याला म्हणजे धर्माप्रचार करण्याला धर्मकर्तव्य घोषित करून टाकतात. समस्या येथे सुरु होते. जेव्हा आपलाच विश्वास अंतिम सत्य आहे असा मानणारे लोक आपापल्या विश्वासाच्या प्रचारासाठी समोरासमोर समोर येतात तेव्हा संघर्ष अटळ असतो. सामूहिक धार्मिक ओळखीचा वैयक्तिक फायदा नगण्य असतो. पण या सामूहिक धार्मिक ओळखीचा फायदा धूर्त नेत्याने उचलला तर समूहातील बहुतेक मंडळी नागवले जातात. सामान्य लोकांचे ब्रेन वॉशिंग करून हे धूर्त नेते त्यानां धर्मायुद्धासाठी तयार करतात. असे कडवे सैनिक धर्मासाठी (म्हणजे नेत्यासाठी) लढले की नेत्याचा राजकीय फायदा पक्का होतो. अशा धर्मायुद्धात युद्धात मारतात ती सामान्यांची मुले. सामान्यांच्या मुलांच्या प्रेतांच्या पायऱ्या करून धूर्त नेते मंडळी उच्चं राजकीय पदापर्यंत पोहचतात. त्यासाठी आपल्या समूहाची वेगळी धार्मिक ओळख ते प्रयत्नपूर्वक जपतात. समूहाची धार्मिक ओळख सोडू पाहणाऱ्या सदस्यांवर कठोर कारवाई करून इतरांना समूह सोडण्यापासून पराववृत्त केले जाते. 

याउलट एका ईश्वराच्या अनेक रूपांना मानणारे हिंदू सारखे लोक ‘एकम् सत् विप्रा बहुदा वदन्ति’ असे म्हणत नवीन लोकांना त्यांच्या आराध्य देवांसहित स्विकारतात. म्हणूनच भारतावर हल्ले करायला आलेले शक, कुषाण, हुण सारखे अनेक लोक सुद्धा त्यांच्या देवा-धर्मासहीत हिंदू जीवन पद्धतीत समाविष्ट झाले. राजकीय संघर्षानंतर होऊ शकणारा मोठा धार्मिक संघर्ष टाळला. परदेशी गेलेले हिंदू तेथील देवांना आपल्या अनेक देवांपैकी एक देव म्हणून सहज स्विकारतात आणि त्या समाजाचा भाग होतात. वेगवेगळ्या लोकांचे आराध्य देव एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपे असल्याचा विश्वास असल्याने हिंदूंनी धर्मप्रचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे हिंदू समाज जगभर शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो.

कृष्णानेही अधर्मी लोकांविरुद्ध धर्मयुद्ध करायला सांगितले. पण सनातन परंपरेत न्यायाने वागण्याला धर्म वा यम म्हटले आहे. अहिंसा, सत्य, अस्तेय(चोरी न करणे), अपरिग्रह(गरजेपेक्षा जास्त संचयाचा लोभ न करणे) आणि ब्रम्हचर्य(निस्पृहतेच्या ज्ञानमार्गावर चालणे) या पाच नैसर्गिक न्याय तत्वानुसार मनुष्य वागल्यास त्याचा वैयक्तिक फायदा तर होतो. समाजातील बहुतांश लोक या पाच न्याय तत्वानुसार वागल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. या पाच न्यायतत्त्वांना डावलून समाजातील एखाद्या घटकावरती अन्याय झाल्यास सामाजिक समस्या निर्माण होतात आणि समाज स्वास्थ बिघडते.

सनातन परंपरेत या पाच यमधर्मा प्रमाणे न वागणाऱ्या लोकांना अधर्मी म्हटले जाई. धर्मी आणि अधर्मी या अतिशय वैयक्तिक ओळखी होत्या. ‘न्यायाने अर्थात धर्माने वागणारा’ ही जन्माने येणारी ओळख नव्हे. जन्मावरून कुणाला धर्मी वा अधर्मी म्हणता येत नव्हते. तसे असते तर एकाच कुटुंबात जन्मलेले कौरव अधर्मी आणि पांडव धर्मसंगत ठरले नसते. धर्मी-अधर्मी कर्मावरून ठरते. सनातन समाजात अधर्मी अशी ओळख असणे ही भूषणाची गोष्ट नव्हती. त्यामुळे अधर्मी व्यक्तींच्या समूहाला अधर्मी अशी सामूहिक ओळख देऊन संघटित करणे आणि त्या संघटीत शक्तीचा उपयोग आपला राजकीय फायद्यासाठी करणे हे धूर्त नेत्यांसाठी कठीण होते.

प्रेषितांना अपेक्षित असलेले बहुतेक संघटित ऐकेश्वरवादी धर्म हे वैयक्तिक आत्म उन्नतीचा मार्ग होते. पण नंतरच्या काळात जेव्हा धूर्त अनुयायी या महापुरुषांच्या विचाराचा पराभव करून धर्माचे राजकारण करतात तेव्हा मात्र धर्म अफूची गोळी झाले.  नेते गबर झाले आणि धर्माचे सामान्य अनुयायी नागवले गेले. जोपर्यंत सामान्य जनतेला हा खेळ नीट कळत नाही तोपर्यंत हा खेळ असाच चालू राहणार आहे.

– समाप्त –

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय तिसरा— कर्मयोग— (श्लोक २१ ते ३०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः । 

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ॥ २१ ॥ 

आचरणासी श्रेष्ठांच्या  अनुसरती सामान्य

बोल तयांचे  समस्त जगत मानिती प्रमाण्य ॥२१॥

न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन । 

नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥ २२ ॥ 

तिन्ही लोकी मजला पार्था  ना कर्तव्य काही

मजला अप्राप्त असेही काही या विश्वात नाही

देहाचे परि जाणुनिया भोग विन्मुख ना झालो

जीवनात जी विहीत सारी कर्मे करीत आलो ॥२२॥

यदि ह्यहं न वर्तेयं जातु कर्मण्यतन्द्रितः । 

मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ २३ ॥ 

उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्‌ । 

सङ्करस्य च कर्ता स्यामुपहन्यामिमाः प्रजाः ॥ २४ ॥ 

सावध राहूनीया मी पार्था नाही केली कर्मे

सर्वनाश जगताचा होइल जाणुन घे  वर्मे

मलाच अनुसरते हे विश्व मजला श्रेष्ठ मानून

अकर्मी होता मीच सारे होतील रे कर्महीन ॥२३-२४॥

सक्ताः कर्मण्यविद्वांसो यथा कुर्वन्ति भारत ।

कुर्याद्विद्वांस्तथासक्तश्चिकीर्षुर्लोकसङ्ग्रहम्‌ ॥ ३-२५ ॥ 

कर्मे करिती कर्मासक्त असती अज्ञानी

कर्म करावी अनासक्त ज्ञानी विद्वानांनी 

संग्रह करणे लोकांचा मनी धरुनी इप्सिता

कर्माचरणी मनुजे व्हावे हे कर्तव्य भारता ॥२५॥

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम्‌ । 

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन्‌ ॥ २६ ॥ 

परमात्मस्वरूपी लीन स्थित ज्ञानी विद्वान

कर्मासक्त अज्ञान्याचा करू नये बुद्धीसंभ्रम

शास्त्रविहित आचरुनीया कर्मे आदर्श मांडावा

कर्म करण्याचा सकलांना सुमार्ग दावावा ॥२६॥

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः । 

अहङ्कारविमूढात्मा कर्ताहमिति मन्यते ॥ ३-२७ ॥ 

मनुष्यद्वारे कर्मे घडती गुणपरत्वे प्रकृतीच्या

अहंकारमूढ मानतो परी कर्ता मी मम कर्मांचा ॥२७॥

तत्त्ववित्तु महाबाहो गुणकर्मविभागयोः । 

गुणा गुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते ॥ २८ ॥ 

समस्त गुण स्थायी गुणात शूर अर्जुना जाण

ज्ञान्या उमगते त्यांचे विभाग कर्म तथा गुण 

जीवन त्याचे असते सदैत तयात विहरत

तयामध्ये तो कधी न बद्ध होउनी आसक्त ॥२८॥

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । 

तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ २९ ॥ 

आसक्तीने मूढ जाहले गुणकर्मातच लुब्ध 

अर्धज्ञानी ते अज्ञानी असती मंदबुद्ध

बुद्धिभेद ना कधी करावा त्यांच्या आचरणात

प्रज्ञावाने मग्न असावे कर्मा आचरत ॥२९॥

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । 

निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३० ॥ 

चित्तासी तव एकरूप कर म्या परमात्म्याठायी

अर्पण करी रे तव कर्मांसी माझीया पायी

त्याग करोनी आशेचा ममत्वाचा अन् संतापाचा

शस्त्र धरोनी सिद्ध होई वसा घेउनी युद्धाचा ॥३०॥

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆

डॉ गोपालकृष्ण गावडे

? इंद्रधनुष्य ?

☆  ज्यू लोकांची मातृभूमी (प्रॉमिस्ड लँड) – वरदान की शाप ? — भाग-2 ☆ डॉ गोपालकृष्ण गावडे ☆– क्रमशः भाग पहिला 

(तीन वर्ष लढा देऊन जेरुसलामला ग्रीकांच्या अंमलातून मुक्त केले. ज्यूंचे जेरुसलेमवर परत राज्य आले.)  – इथून पुढे — 

पुढे भूमध्य समुद्राभोवती ग्रीकांची सत्ता कमी होऊन इटलीच्या बहुईश्वरवादी रोमन लोकांचे साम्राज्य प्रबल होऊ लागले. या रोमन साम्राज्यातील सीझर या महान योध्याचा समकालीन आणि त्याचा प्रतिस्पर्धी असलेल्या पॉम्पे या महान रोमन सैन्य अधिकाऱ्याने 63BC ला पूर्वेला सम्राज्यविस्तार करताना जेरूसलाम जिंकून घेतले. ज्युंचे राज्य रोमन सम्राज्याचा एक भाग बनले. पुढे सातव्या शतकात मुस्लिम आक्रमण होईपर्यंत ज्युंची मायभूमी रोमन साम्राज्याच्या आधीपत्याखाली राहिली. विद्रोहाची थोडी जरी शंका आली तर रोमन अधिकारी ज्यु लोकांना सुळावर चढवत.  ज्यु लोकांचे येशू वा जीजस नावाचे अतिशय लोकप्रिय रबाय अर्थात धर्मगुरू होते. रोमन लोकांनी विद्रोहाच्या शंकेवरून येशूला सुळावर चढावले. याच येशूपासून इसाई अर्थात ख्रिश्चन धर्माची सुरुवात झाली. येशूच्या जन्मापासून सध्या वापरात असलेली कालगणना अस्तित्वात आली. त्याच्या जन्माआधीच्या काळाला BC तर नंतरच्या काळाला ईसवी सन वा AD असे म्हटले जाते. इसाच्या जन्मापासून सुरु झाले म्हणून ईसवी सन. ई. स. 33 मध्ये वयाच्या 33 व्या वर्षी येशूला सुळावर दिल्यामुळे ज्यु आणि रोमन संबंध बिघडत गेले. 66AD ला ज्यु लोकांनी उठाव केल्याने रोमन विरुद्ध ज्यु असे युद्ध पेटले. हा उठाव दडपन्यासाठी 70AD ला रोमन सम्राट टायटसला स्वतः यावे लागले. त्याने जेरूसलामला वेढा घालून शेवटी ते जिंकून घेतले. जेरूसलाम शहर तटबंदीसहित जमीनदोस्त करण्यात आले. सोलोमनचे दुसरे मंदिर नष्ट करण्यात आले. हजारो ज्युंची कत्तल केली गेली. बाकी 96 हजार ज्युंना गुलाम बनवून रोमला पाठवले गेले. ज्यु लोकांच्या नशिबी परत वनवास आला. पहिल्या ज्यु-रोमन युद्धामुळे जेरूसलाम मधील बहुतेक ज्यु लोकवस्ती घटली असली तरी ज्यु आपल्या मातृभूमीत परत येत राहिले. ज्यु लोकांनी आपल्या मातृभूमीत परत 50 मोठया वसाहती आणि जवळपास 985 मोठी खेडी वसवली. पण आता रोमन लोकांनी ज्यु लोकांना दडपून ठेवले होते. इतकेच नव्हे तर सोलोमनच्या भग्न मंदिराच्या जागी आता अपोलो या रोमन देवाचे मोठे मंदिर उभे केले गेले होते.

या धार्मिक दडपशाही विरुद्ध 132 AD मध्ये परत ज्यु लोकांनी रोमन सम्राज्याविरुद्ध उठाव केला. त्याला ‘बार कोखबा उठाव’ असे म्हणतात. रोमन सैन्याने सर्व ज्यु वस्त्या उध्वस्त केल्या. 5 लाख 80 हजार ज्युंची कत्तल केली गेली. उरलेले अनेक युद्धानंतर येणाऱ्या रोगाराई आणि दुष्काळात मारले गेले. जे वाचले ते गुलामगिरीत विकले गेले. ज्यु लोकांना जेरूसलाम मध्ये प्रवेश निश्चिद्ध केला गेला. रोमन सम्राट हेड्रीयन याने ज्युंच्या पवित्र मायाभूमीला मुद्दाम ज्युंच्या पारंपरिक शत्रूदेशाचे म्हणजे पॅलेस्टीनचे नाव दिले. हा भाग आता सिरिया-पॅलेस्टीना म्हणून ओळखला जाऊ लागला. हा उठाव ज्यु लोकांसाठी अतिशय विध्वंसक ठरला. तरी प्रकरण शांत झाल्यावर ज्यु परत मातृभूमीकडे परतू लागले. पुढे सातव्या शतकात रोमन जेरूसलामवर मुस्लिम आक्रमण झाले तेव्हा दीड लाख ज्यु तेथे राहत होते.

एकाच मुळातून उगवले असले आणि आधीचे सर्व प्रेषित सामान असले तरी जीजसला प्रेषित मानन्यावरून आणि धर्मपरिवर्तन प्रचाराच्या मुद्द्यावर हळूहळू इसाई धर्म ज्यु धर्मापासून वेगळा होत गेला. ज्यु लोकांमध्ये ‘प्रोसेलीटीझम’ अर्थात प्रयत्नपूर्वक धर्मपरिवर्तन निशिद्ध मानले जाते. याउलट ख्रिश्चन लोक धर्मप्रचार करण्याला कर्तव्य मानतात. या सतत होणाऱ्या प्रयत्नामुळे इसाई धर्म हळूहळू वाढत गेला.

इस 313 मध्ये रोमन सम्राट कोन्स्टंटीनने एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजारहित धर्माचे समाज संघटनातील महत्व ओळखले. एकेश्वरवादी धर्मामुळे प्रजा संघटित होते. अशी संघटित प्रजेचे नेतृत्व करणे हा सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा तसेच मिळालेले टिकवण्याचा सर्वात सोपा मार्ग असतो. अशी संघटित प्रजा शत्रूचा कडवा प्रतिकार करून आपल्या धर्माचे, राज्याचे आणि पर्यायाने राजसत्तेचे रक्षण करते. धर्मप्रसारचे निमित्त करून राज्यविस्तरही करता येतो. ग्रीक-रोमनांचे परंपरिक शत्रू असलेल्या पर्शीयाने सम्राट सायरस महान पासूनच एकेश्वरवादी झोरीयास्ट्रीयन म्हणजे सध्याच्या पारशी धर्माला सम्राज्याचा अधिकृत धर्म म्हणून मान्यता दिली होती. आधी ज्यु नंतर पारशी राजकारणी लोक जनतेची धार्मिक ओळख वापरून सत्ता आणि संपत्ती मिळवण्याचा हा खेळ आधीच शिकले होते. रोमन लोकांना हा खेळ उशिरा कळला. चाणाक्ष कोन्स्टंटीनने प्रथम हा खेळ ओळखला. आपल्या वाढवडिलांचा अनेक ईश्वरांना मानणारा धर्म सोडून त्याने वेगाने वाढणारा इसाई धर्म स्विकाराला. ख्रिश्चन या खेळत एक पाऊल पुढे गेले. पण ज्यु आणि पारशी लोकांमध्ये धर्माप्रचार करून धर्मांतर करणे निशिद्ध होते. ख्रिश्चनांनी धर्मांतर करणे निशिद्ध तर ठेवले नाहीच पण धर्मांतरासाठी चर्चची खास यंत्रणा कामाला लावली. इसाई धर्माला राजाश्रय मिळाल्याने आणि धर्मांतरासाठी प्रयत्न होऊ लागल्याने इसाई धर्माचा प्रसार अतिशय वेगाने होऊ लागला. तिकडे पर्शिया म्हणजे सध्याच्या इराण मध्ये एकेश्वरवादी पारशी धर्माने अनेक वर्षांपासून आपला जम बसवलेला होता. पर्शिया आणि ग्रीक-रोमन लोकांमध्ये वर्षानुवर्षे हाडवैर चालू होते. सध्याच्या सिरिया आणि इराक मधील सीमा या दोन महासत्तांच्या मधील सीमा होती. आता दोन्हीकडील महासत्तामध्ये राजकीय युद्धाऐवजी धर्मयुद्ध होऊ लागले. दोन्ही कडील कडवे सैनिक एकमेकांशी लढताना माघार घेण्यास तयार नसत. प्रचंड मनुष्यहानी होई. त्यामुळे दोन्ही महासत्ता हळूहळू कमजोर होऊ लागल्या. 

तिकडे दक्षिणेला अरबस्थानच्या वाळवंटात ई स 570 मध्ये मुहम्मद पैगंबर साहेबांचा जन्म झाला. वाळवंटातील अरब मूर्तिपूजक आणि अनेक ईश्वरांना मानणारे होते. व्यापारानिमित्र पैगंबर साहेबांचे सिरियाला वारंवार जाणे होई. समाजाला संघटित करुन सत्ता आणि संपत्ती मिळवण्यासाठी मूर्तिविरहित एकेश्वरवादी धर्माचा कसा उपयोग होतो हे मुहम्मद पैगंबरांच्या चाणक्ष्य बुद्धीने लवकरच ओळखले. मग त्यांनी अरबस्थानात आपल्या वेगळ्या एकेश्वरवादी संघटित धर्माचा प्रचार सुरु केला. आपल्या नव्या धर्माला इस्लाम असे नाव दिले. धर्म निर्माण करताना त्यांनी फारशी वेगळी मेहनत घेतली नाही. ज्यु आणि इसाई लोकांच्या एकेश्वरवादी धर्मग्रंथातील प्रेषित आणि पैगंबरांच्या गोष्टी त्यांनी इस्लाममध्ये जशाच्या तश्या घेतल्या. अगदी देवदूतही तेच ठेवले. फक्त ज्यु आणि इसाई लोकांच्या देवांच्या ऐवजी अरबी भाषेतील अल्लाह हा देवच एक खरा परमेश्वर आहे असे त्यांनी कुरानात म्हटले.अल्लाहने या आधी धाडलेल्या प्रेषितांनी दिलेला अल्लाचा संदेश लोकांनी भ्रष्ट केला आहे. आपल्याला कुरानाच्या रूपाने अल्लाने दिलेला संदेश हा कधीही भ्रष्ट न होणार अंतिम संदेश असेल असे त्यांनी जाहीर केले.

मुहम्मद पैगंबरांच्या मृत्यू नंतर इस्लामच्या अनुयायांनी मौखिक कुराण एकत्रित करून लिहुन काढले. मी असे म्हटलो होतो किंवा नव्हतो असे म्हणायला त्या वेळी पैगंबर हजर नव्हते. लिखित कुरानात जुन्या एकेश्वरवादी धर्मात बदल करून सत्ता आणि संपत्तीचा हा खेळ वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला गेला..

1)  धर्मसत्तेचा आणि राजसत्तेचा प्रमुख एकच असल्याने दोन्ही सत्ता एकाच माणसाचे हित पाहू लागल्या. त्यामुळे दोन्ही सत्तांचे एकमेकांवर नियंत्रण ठेवणे बंद झाले आणि दोन्ही सत्ता निरंकुश झाल्या. राजसत्ता आता कुठल्याही राजकीय युद्धाला धर्मयुद्ध ठरवू शकत होती. 

2)  प्रत्येक मुसलमानासाठी धर्मप्रचाचारार्थ जिहाद करणे कर्तव्य ठरवले गेले. त्यामुळे प्रत्येक सामान्य मुसलमान इस्लामचा कडवा सैनिक झाला. 

3) इस्लामी राजवटीत इतर धर्मांचे सहअस्तित्व जवळपास अमान्य केले गेले. मूर्तिपूजाकांपुढे आणि बहुईश्वरवादी लोकांपुढे धर्मांतर वा मृत्यू हे दोनच पर्याय शिल्लक ठेवले. एकेश्वरवादी आणि मूर्तिपूजक नसलेल्या लोकांनाही झिजिया दिला तरच इस्लामी राष्ट्रात राहता येणे शक्य होते.

4) पुरुषप्रधान संस्कृतीत धर्मांतरचा निर्णय घेण्याचा अधिकार पुरुषांना असल्याने इस्लाम धर्मात पुरुषांना अनेक वाढीव अनैतिक प्रलोभने नैतिक करून दिली गेली. तसेच युद्धानंतर लोकांची संपत्ती लूट, निहत्या लोकांची हत्या, आणि युद्धात हाती लागलेल्या स्त्रियांना लैंगिक गुलाम बनवणे अशा युद्ध अपराधांना धार्मिक नैतिकतेची बैठक दिली गेली. या प्रलोभनांमुळे पटपट धर्मपरिवर्तन होऊ लागले. युद्धात मेले तर जन्नत मध्ये या पेक्षा जास्त मज्जा मिळेल याचे वचन इस्लाम देतो. मुसलमान पृथ्वीवर दुःख भोगायल आला आहे आणि खरे जीवन तर मेल्यावर तिकडे स्वर्गात सुरु होणार आहे अशी शिकवण इस्लाम देतो. त्यामुळे मुसलमान मनुष्याची युद्धात मृत्यूची भीती कमी होते. काहींना तर शाहिद होऊन पटकन स्वर्गात जाण्याची आत्मघाती ओढ लागते. या सर्वांमुळे मुस्लिम पुरुष सदा युद्धासाठी उतावळे राहू लागले. असे ब्रेन वॉश झालेले कडवे मूठभर मुस्लिम योद्धे जिहादच्या वेडात आपल्यापेक्षा संख्येने खूप जास्त असलेल्या शत्रू सैन्याला जाऊन भिडत आणि कटून मरत. पण मरण्याआधी ते शत्रूचे बरेच नुकसान करून मरत असत. त्यामुळे मुस्लिम सैन्याला त्यांच्यासारखा त्याग करण्यास प्रोत्साहन मिळे आणि शत्रूचे मनोधैर्य खचे. त्यांचा उपयोग मुस्लिम राजकर्त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी मोठया प्रमाणात करून घेतला. साम्राज्य विस्ताराचे प्रत्येक युद्ध जिहाद म्हणून घोषित केले गेले.

ज्यु आणि इसाई लोकांनी हा नवा धर्म स्वीकारावा यांसाठी या जुन्या धर्मांमधील प्रेषित इस्लामात घेतले गेले. पण सोबत जुन्या धर्माला काळानुरूप भ्रष्ट झाल्याचे सांगून इस्लाम या आपल्या परमेश्वराशी इमानदार असलेल्या एकमेव धर्मात वेगळेपण निर्माण करून धर्मांतराला पर्याय शिल्लक ठेवला नाही. अब्रहम, इसाक, जेकब, मोजेस, डेव्हिड, सोलोमन या ज्यु पैगंबरांना कुराणकारांनी अनुक्रमे इब्राहिम, इसा, याकूब, मुसा, दाऊद, सुलेमान अशी अरबी नावे दिली. मुहम्मद पैगंबरांच्या काळी अरबस्थानात काही ज्यु कबिले आणि काही ख्रिश्चन लोक राहत होते. भविष्यात प्रेषित येणार आहे अशी त्यांची श्रद्धा होती. इस्लाम हे ज्यु आणि ख्रिश्चन धर्माचेच सुधारित रूप असल्याचा प्रचार करत असल्यामुळे मदिनेतील सधन आणि प्रतिष्ठीत ज्यु लोक आपल्याला पटकन पैगंबर मानतील अशी मुहम्मद पैगंबरांची अपेक्षा होती. त्यामुळे सुरवातीला कुरानाच्या आयाती मध्ये ज्यु आणि ख्रिश्चनांविषयी ‘people of book’ असा चांगला उल्लेख येतो.

– क्रमशः भाग दुसरा 

©  डॉ गोपालकृष्ण गावडे

सिटी फर्टिलिटी सेंटर आणि गुरूदत्त डायग्नोस्टिक सेंटर

सिंहगड रोड, पुणे 

मो 9766325050

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print