मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मरणाला मिठी मारणारा योद्धा-धन्वंतरी!…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

मरणाला मिठी मारणारा योद्धा-धन्वंतरी! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग

मरण त्याला काही अगदीच अनोळखी नव्हतं. वैद्यकीय व्यवसायात आणि पुढे सेनेत जबाबदारी सांभाळली तेंव्हा त्याने कित्येक जखमी शरीरं, शत विक्षत देह पाहिले… आणि अर्थात कित्येक मृत्यूसुद्धा! सैन्यसेवा आणि मरण एकमेकांच्या हातात हात गुंफून चालत राहतात… काहींचा हात सुटतो.. काहींचा सुटत नाही! त्यादिवशी मृत्यूदूत त्याला अगदी समोरासमोर भेटले… नव्हे त्यातील एक तर त्याच्याच दिशेने येताना दिसला!

गोष्ट आहे वर्ष २०१० मधील फेब्रुवारी महिन्यातील. त्यादिवशी २६ तारीख होती आणि मेजर डॉक्टर साहेबांना अफगाणिस्तान देशातील राजधानी काबूल मधील भारतीय दुतावासात कर्तव्यावर रुजू होऊन केवळ तेराच दिवस उलटलेले होते. त्यांचा १४ मे १९७२ रोजी सुरु झालेला जीवनप्रवास मणिपूर पासून सुरु होऊन आज ते अफगाणिस्तान मध्ये होते.

जात्याच बुद्धीमान असलेले मेजर साहेब १९९६ मध्ये एम. बी. बी. एस. डॉक्टर झाले. पण अभ्यासासोबत साहेबांना खेळाची आणि त्यातल्या त्यात शरीरसौष्ठव क्रीडाप्रकाराची अतिशय जास्त आवड होती. क्रीडा वैद्यक शास्त्राचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी मोठ्या हौसेने पूर्ण केला होता.

भारतीय सैन्यात निष्णात वैद्यक अधिकाऱ्यांची नेहमीच गरज असते. पण त्यासाठीची निवड प्रक्रिया अतिशय कठीण मानली जाते. या अधिकारी मंडळींना डॉक्टरकी तर करावी लागतेच, पण गरज पडली तर हाती शस्त्रही धरावे लागते.

१५ फेब्रुवारी २००३ रोजी मेजर साहेब सिल्चर येथील लष्करी रुग्णालयात रुजू झाले. त्यांना वैद्यकीय ज्ञान तर प्रचंड होतेच पण सैन्यात त्यांना सैन्य प्रशिक्षणही प्राप्त झाले.

अतिउंचावर लष्करासाठी रस्ते बांधणी करण्याची जबाबदारी असलेल्या Border Road Organization या GREF अर्थात General Reserve Engineering Force (GREF) मध्ये साहेबांची नेमणूक झाली. भारतीय सैनिकांना ते वैद्यकीय उपचार देत असतच पण परिसरातील इतर नागरीकांनाही त्यांच्या सेवेचा लाभ देत असत.

अरुणाचल प्रदेश हा तर अतिशय दुर्गम प्रदेश. तिथे मेजर साहेबांसारखे निष्णात डॉक्टर उपलब्ध असणे, ही तेथील सामान्य नागरीकांच्या दुष्टीने सुदैवाची बाब होती.

९ फेब्रुवारी २००६ मध्ये डॉक्टरसाहेब आगरतळा येथील लष्करी रुग्णालयात बदलून गेले… आणि हे रुग्णालय त्यांनी अक्षरश: एकहाती चालवले. तेथील जवानांना त्यांनी आपल्या क्रीडावैद्यक शास्त्रातील अभ्यासाचा आणि अनुभवाचा खूप फायदा करून दिला. वेळ मिळेल तेंव्हा फुटबॉल आणि badminton खेळणे हा तर त्यांच्या आवडीचा विषय होता. असा माणूस सर्वांना प्रिय होईल यात नवल नव्हते.

२००७ मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आंतराष्ट्रीय सैन्य क्रीडा स्पर्धांत साहेबांनी खेळाडूंच्या अंमली पदार्थ सेवन करून खेळणाऱ्या खेळाडूंविरोधात कडक सेवा बजावली. त्यांनी २००८ मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही वैद्यकीय अधिकारी म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली होती. आगरतळा येथे लष्करी वैद्यकीय रुग्णालयात काम करीत असताना वेळात वेळ काढून त्यांनी इतर खाजगी, शासकीय रुग्णालयांतही विनामूल्य सल्लासेवा उपलब्ध करून दिली होती.. हे विशेष.

२००७ मध्येच त्यांना सैन्य सेवा मेडल आणि अतिउंचीवर उत्तम सेवा केल्याबद्द्लचे पदक प्रदान केले गेले. सैनिक निवडीसाठी असलेल्या वैद्यकीय पथकातही त्यांनी अतिशय उत्तम सेवा केली.

२०१३ वर्ष सुरु झाले होते. त्यावेळी भारताचे अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये वैद्यकीय कार्य सुरु होते. साहेबांचा अनुभव आणि कष्ट करण्याची वृत्ती पाहून त्यांना काबूल मध्ये Indian Medical Mission मध्ये सहभागी करून घेण्यात आले… हा एक मोठा बहुमान समजाला जातो!

युद्धग्रस्त, हिंसाचारग्रस्त अफगाणिस्तानमधील अनेक नागरिक भारताने मानवतेच्या भूमिकेतून उभारलेल्या या वैद्यकीय सेवा कार्याचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी करीत होते. तिथल्या नूर गेस्ट हाऊस मध्ये भारतीय डॉक्टर्स मंडळींची राहण्याची व्यवस्था केली गेली होती. अर्थात या गेस्ट हाऊसला भारतीय सैन्याने सशस्त्र संरक्षण पुरवले होतेच. कारण अफगाणिस्तान मधील परस्पर विरोधी गट कधीही हल्ला चढवू शकत होते. खरे तर मानवतेच्या दृष्टीकोनातून चाललेले हे सेवाकार्य होते.. पण अतिरेकी मनाला ह्या बाबी समजू शकत नाहीत… हेच खरे!

त्यादिवशी या गेस्ट हाऊस मध्ये सहा लष्करी वैद्यकीय अधिकारी, ५ सह-वैद्यकीय कर्मचारी आणि इतर काही अधिकारी वास्तव्यास होते. आणि या इमारतीवर अतिरेकी हल्ला चढवण्यात आलाच… भयावह हल्ला. पाचशे किलो आर. डी. एक्स. ने भरलेले एक वाहन या इमारतीच्या अगदी समोर आले. त्यातून तीन हल्लेखोर उतरले आणि इमारतीकडे धावले.. याच इमारतीच्या पलीकडील इमारतीत अन्य काही परदेशी लोक वास्तव्यास होते… आधी भारतीय पथकाला मारले की ते अतिरेकी तिथून पुढील इमारतीत जाणार होते…

तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी विरोध करताच त्या वाहनचालकाने ते वाहन स्वत:सह इमारतीच्या सीमा भिंतीवर धडकवले. हा धमाका इतका मोठा होता की तिथे साडे तीन मीटर बाय अडीच मीटर खोलीचा खड्डा पडला! वाहनातून आधीच उतरून पळत आलेल्या चालून आलेल्या तिघा अतिरेक्यांनी मग या इमारतीवर हातगोळे फेकले… आणि ती इमारत पेटली!

कामावर निघायच्या तयारीत असलेल्या डॉक्टर्स लोकांकडे एकच हत्यार होते… स्टेथोस्कोप.. आणि हे हत्यार जीव वाचवणारे होते… पण स्वत: डॉक्टर मंडळीचा जीव वाचवण्याच्या क्षमतेचे नव्हते.

सर्वजण त्यातल्या त्यात सुरक्षित असणाऱ्या खोल्यांकडे पळाले…. पण त्यांना अतिरेक्यांनी पाहिले… क्षणार्धात एके ४७ रायफली धडाडल्या… हातगोळे फेकले जाऊ लागले… आश्रय घेतलेल्या खोल्यांमध्ये आता मृत्यूचे तांडव सुरु झाले… काही माणसं मारली गेली!

मेजर लैश्राम मात्र त्या आगीने वेढलेल्या खोलीतून थेट बाहेर पडले… एक अतिरेकी त्याच खोलीच्या दिशेने धावत येत होता… त्याच्या हातात शस्त्रे होतीच… हातगोळे सुद्धा होते. मेजर लैश्राम सुद्धा त्याच्या दिशेने विद्युतवेगाने धावत सुटले… मेजर स्वत: खूप जखमी होते.. रक्तबंबाळ झालेले होते…

अतिरेक्याने हातगोळा फेकण्याआधीच लैश्राम साहेबांनी त्याला मिठी मारली… त्याचे दोन्ही हात जखडून टाकले…. तारुण्यात शरीरसौष्ठ्व सरावाने कमावलेले स्नायू आता खरोखरीचे बळ दाखवू लागले… तो अतिरेकी खूप धिप्पाड, बलदंड होता.. पण मेजर साहेबांची हिंमत त्याच्यापेक्षा भारी होती… पण त्या हल्लेखोराकडे आणखी एक जालीम शस्त्र होते…. शरीराला गुंडाळून घेतलेली स्फोटके! तो सुसाईड मिशनवर होता…. त्याच्यासोबत तो अनेक जीवांना घेऊन परलोकी जाण्यास सज्ज होता….!

मेजरसाहेबांनी त्याला असा दाबून धरला की त्याला श्वास घेणे दुर्धर झाले… रायफल चालवणे तर दूरच… त्याच्या हातातल्या हातगोळ्यांचा त्याला वापर करणेही शक्यच नव्हते… यात बराच वेळ गेला… त्यामुळे इतरांना तिथून सुरक्षित निसटून जाण्याचा अवधी मिळाला.

शेवटी त्याने करायचे ते केलेच.. त्यापासून मात्र साहेब त्याला दुर्दैवाने रोखू शकले नाहीत… त्याने कमरेला लावलेल्या स्फोटकांचा स्फोट घडवून आणला… क्षणार्धात दोघांच्याही देहांच्या चिथड्या उडाल्या… रक्ता-मांसाचा चिखल नुसता! पण यात साहेबांचे रुधीर त्यागाच्या, देशभक्तीच्या सुगंधाचे वाहक होते! आपल्या इतर दहा सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी या डॉक्टर साहेबांनी आपले प्राण अर्पण केले होते…

औषध उपचारांनी प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनी आपले रक्त शिंपडून इतरांचे प्राण राखले! ही कामगिरी केवळ अजोड… नि:स्वार्थी आणि मोठ्या शौर्याची. संकट आले म्हणून माघारी न पळता संकटाला आपल्या पोलादी बाहुपाशात घेणाऱ्या भारतीय सैनिकाचे रक्त होते ते….

शांतता काळातील सर्वोच्च सैन्यपदक ‘अशोक चक्र’ डॉक्टर साहेबांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले. त्यांच्या बंधूंनी हे पदक तत्कालीन राष्ट्रापती महोदया महामहीम श्रीमती प्रतिभाताई देवीसिंग पाटील यांच्या हस्ते मोठ्या अभिमानाने आणि भावाच्या आठवणींनी भरलेल्या काळजाने स्वीकारले.

मणिपूर मधील नाम्बोल गावात हुतात्मा मेजर डॉक्टर लैश्राम ज्योतीन सिंग साहेब यांच्या मागे त्यांचे पिताश्री आणि मातोश्री त्यांच्या आठवणीत दिवस काढत आहेत. आईबाबा लहानग्या ज्योतीन साहेबांना लाडाने इबुन्गो म्हणून हाक मारत.

विविध प्रकारे त्यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न झाले आहेत. पण भारतातील खूप लोकांना हे नाव अद्याप बहुदा माहीत नसावे… असे वाटले… म्हणून हा लेखन-प्रयास!

जय हिंद! जय हिंद की सेना!

(ही माहिती लिहिताना मेजर जनरल ए. सी. आनंद साहेब, (विशिष्ट सेवा मेडल विजेते) यांच्या लेखाचा आणि इंटरनेटवरील इतर साहित्याचा आधार घेतला आहे.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ३  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

अमृतस्वरूपा च ॥ ३ ॥

अर्थ : आणि (ती भक्ति) अमृतस्वरूपा (ही) आहे.

विवरण : द्वितीय सूत्रात परमप्रेम हे भक्तीचे यथार्थ स्वरूप आहे, असे स्पष्ट केल्यानंतर या सूत्रात त्या प्रेम भक्तीचा एक महत्त्वाचा विशेष श्री नारदमहर्षि सांगतात, ती प्रेमरूपा भक्ती ‘अमृतस्वरूपा’ आहे. अमृत म्हणजे मरण-विनाश-बाधरहित अवस्था अथवा स्वरूप होय.

विवेचन:

सर्व संतांनी सत्संगाचा महिमा गायिला आहे. भक्ति करणे म्हणजे भगवंताशी संग करणे, असे म्हटले तर अधिक उचित होईल. एखाद्या मनुष्याचा हात चुकून कोळशाला लागला तरी त्याचा हात काळा झालाच म्हणून समजा. याच सूत्रानुसार भगवतांच्या थोड्याशा सत्संगाचा मनुष्याच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. 

अमृत शब्दाचा प्रचलित अर्थ असा आहे की जे मृत्यू पासून आपल्याला वाचवते ते अमृत. समुद्र मंथनातून अमृत निर्माण झाले असे म्हणतात…..

थोडक्यात जे आपल्याला अमर करते ते अमृत. आजपर्यंत अनेक लोक जन्माला आले आणि मृत्यू पावले. त्यांची गणती करणे निव्वळ अशक्य आहे. त्यातील काही मोजक्या लोकांची नावे आपल्या लक्षात आहेत, इतिहासाला ठाऊक आहेत. ज्यांनी या धरती साठी, समाजासाठी, योगदान दिले, त्याग केला, विशेष कार्य केलं त्यांचीच नावे समाजाने लक्षात ठेवली आहेत. त्यातील प्रमुख नावे ही संतांची आहेत. आपल्याला आपल्या मागील चौथ्या किंवा दहाव्या वंशजाचे नाव सांगता येईलच असे नाही पण माउलींचे, समर्थांचे, तुकारामांचे, अर्थाचे संतांचे गोत्र ही पाठ असेल,. ही किमया नव्हे काय ? ही किमया कशामुळे  घडली असेल….?

प्रत्येक संतांनी आपल्या आवडीनुसार भक्ति केली असेल, नवविधा भक्तीचा अंगिकार केला असेल, पण भक्ति च केली यात बिल्कुल शंका नाही. भक्ति करणारा मनुष्य देहाने जातो, पण नामरूपाने, कीर्तिरूपाने अमर होतो, अमर राहतो हे सिद्ध होते. 

मेलेल्या मनुष्याला अमृत देऊन काही काळापुरते जिवंत करणे आणि भक्ताला मरण प्राप्त झाल्यानंतरही अनंत काळ अमर करणे , यात अमृत श्रेष्ठ म्हणता येईल की भक्ति….? आपल्या मनात भक्ति हेच उत्तर आले असेल ना ?

अमृत स्वरूपा असे नारद महाराज म्हणतात, तेव्हा त्याचा अर्थ कसा घ्यायचा ? सरळ अर्थ घेतला तर आपल्या लक्षात येईल की भक्ति मुळे मनुष्य अमृत समान होऊ शकतो…!

स्वरूप म्हणजे आपले रूप असा अर्थ घेतला तर आपले रूप आरशात दिसते तसे आहे की कसे ? आरशात दिसते ते बाह्य रूप आहे आणि दिसत नाही, जे अंतर्यांमी आहे ते आत्मरूप आहे. भगवंताला जाणणे म्हणजे अंतर्यामी असलेल्या आत्म तत्वाला जाणणं….

शबरी मातेची कथा आपल्याला माहित आहे. काही शे  बोकडांची हत्या होऊ नये, म्हणून ही मुलगी लग्नाच्या आदल्या दिवशी घर सोडून निघाली ती मातंग ऋषींच्या आश्रमात आली. मातंग ऋषींनी तिला सांगितले की तू अखंड नाम घे, प्रभू श्रीराम तुझे दर्शन घ्यायला येतील….! तिचा तिच्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास होता. गुरू वाक्य प्रमाण मानून तिने साधना करायला सुरुवात केली. तिला राम कसे असतील हे माहीत असण्याचे कारण नव्हतं. तिने आपल्या मनात रामाची प्रतिमा तयार केली. अर्थात ते आपल्या मातंग ऋषींसारखेव असतील……! जटाभार ठेवलेले, वल्कले नसलेलं…! शबरी जसे रूप मनात धरले, अगदी त्याच रुपात येऊन रामाने तिला दर्शन दिले.  एवढेच नव्हे तिची उष्टी बोरे भगवंताने आनंदाने खाल्ली. लक्ष्मण तिला म्हणाला की ही बोरे उष्टी आहेत. त्यावर ती म्हणाली की ही बोरे दिसायला उष्टी आहेत, पण खऱ्या आज ती अभिमंत्रित आहेत. हे सामर्थ्य भक्तीने प्राप्त होऊ शकते….!

जय जय रघुवीर समर्थ!!!

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– क्रमशः सूत्र ३ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही देशाची खरी कन्यारत्ने …” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“ही देशाची खरी कन्यारत्ने … ☆ श्री संभाजी बबन गायके 

होय, याच त्या कर्नल सोफिया कुरेशी मॅडम.  तुम्ही आज भारताने  पाकिस्तानी अतिरेकी प्रशिक्षण केंद्रांवर चढवलेल्या हवाई हल्ल्याचे media briefing करताना पाहिलेल्या सैन्याधिकारी ! आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग !! 

– – एक ASEAN मध्ये गवसलेलं रत्न ! आणि एक आकाशाने भारताला दिलेलं कन्यारत्न !

या दोघींनी आज जे केलं.. तो खरा इतिहास असणार आहे ! 

The Association of South East Asian Nations अर्थात ASEAN संघटनेचे नाव भारतासाठी नवीन नाही. आशियातील दक्षिणपूर्व देशांनी एकत्रित येऊन ही संघटना स्थापन केली आहे. अर्थातच आपल्या भारत देशाचा या चळवळीत मोठा वाटा आहे. 

— — थायलंड,व्हिएतनाम,म्यानमार, सिंगापूर, फिलिपिन्स,मलेशिया,ब्रुनेई,लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक,इंडोनेशिया,कंबोडिया इत्यादी बहुदा १८ देश आसीयान मध्ये सामील आहेत. जगात इतर जागतिक महासत्ता असताना आणि त्या त्यांचे प्रश्न सोडवण्यात गुंतलेल्या असताना, त्यांच्या तुलनेने लहान असणाऱ्या देशांच्या स्वतःच्या काही समस्या असतात,त्या सोडवण्यासाठी या लहान देशांनी एकत्रित येणे गरजेचे होते. 

या सर्व अठरा देशांच्या पायदळ सैन्याचा एक मोठा प्रशिक्षण आणि संयुक्त सराव २०१६ मध्ये पुण्यात पार पडला. यापैकी १७ देशांच्या सैन्याचे नेतृत्व पुरुष करीत होते…मात्र भारतीय सैन्यतुकडीचे नेतृत्व होते सोफिया कुरेशी या कणखर तरुणीकडे! भारतीय सैन्याच्या दळणवळण विभागात Corps of Signals मध्ये या एक अतिशय आदरणीय अधिकारी म्हणून गणल्या जातात. दळणवळण संदर्भातील कामांत त्या वाकबगार असून अतिरेकी विरोधी कारवायांत आघाडीवर असतात.

 Asean सारख्या मोठ्या सैन्य संमेलनात भारतीय सैन्याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे ! त्यावेळी मेजर जनरल पदावर असलेले व पुढे Chief of Defence Staff या सर्वोच्च पदावर पोहोचलेले दिवंगत बिपीन रावत साहेब यांनी सोफिया यांच्याबद्दल बोलताना..’ त्या अंगभूत नेतृत्वगुण आणि कौशल्याच्या जोरावरच या सन्मानास पात्र ठरल्या आहेत..’ असे गौरवोद्गार काढले, हे लक्षणीय आणि सोफिया यांचे कर्तृत्व अधोरेखित करणारे आहे!

गुजरात मध्ये वडोदरा येथे १९८१ या वर्षी जन्मलेल्या सोफिया या microbioligy विषयात पदवीधर आहेत. त्यांचे आजोबा भारतीय सैन्यात धार्मिक शिक्षक पदावर कार्यरत होते..त्यामुळे त्यांच्यावर भारतीय सैन्याचे संस्कार लहानपणापासूनच होत गेले. त्यांनी १९९९ मध्ये OTA Chennai येथून भारतीय सेनेत प्रवेश मिळवला. २००१ मध्ये ऑपरेशन पराक्रम मध्ये त्या पंजाब येथे कर्तव्यावर होत्या. त्यांचे यजमानही mechanized infantry मध्ये कार्यरत आहेत!

सोफिया यांनी UN Peace Keeping Force मध्ये आणि पुढे Congo या युद्धग्रस्त देशात अनेक वर्षे सेवा बजावली असून त्यांना military negotiations आणि सेवाकार्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.

आजच्या briefing मध्ये सहभागी झालेल्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्या व्योमिका नावाचा अर्थच मुळी आकाश कन्या असा आहे..त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच हवाई दलात कारकिर्द घडवण्याचा चंग मनाशी बांधला होता. आणि हा हट्ट खराही करून दाखवला. भारतीय हवाई दलात एक अत्यंत धैर्यवान,कुशल हेलिकॉप्टर पायलट म्हणून त्यांचे नाव सन्मानपूर्वक घेतले जाते! चिता आणि चेतक नावांची अत्याधुनिक  हेलिकॉप्टर्स त्या लीलया उडवतात…अडीच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणे त्यांनी यशस्वी केली असून काही वर्षांपूर्वी अरुणाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये त्यांनी अत्यंत खराब हवामानात एकही अपघात होऊ न देता संकटग्रस्त लोकांची सुटका करण्यात यश मिळवले होते. व्योमिका सिंग यांनी २१,६५० फूट उंचीवर असणाऱ्या माउंट मणिरंग शिखरावर यशस्वी चढाई सुद्धा करून दाखवली आहे! २००४ मध्ये हवाई दलात प्रवेश मिळवलेल्या व्योमिका मॅडम २०१७ मध्ये विंग कमांडर बनल्या!

या दोघींनी  ही  briefing ची जबाबदारी उत्तमपणे पार पाडली .. आणि त्यांच्या द्वारे भारतीय सैन्य आणि राजकीय नेतृत्व यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे….सुवासिनी महिलांचे सौभाग्य कुंकू पुसणाऱ्या नेभळट देशाला या आरशात काही दिसेल, ही अपेक्षा !

India is proud of you both…

Col. Sofiya madam and Wing Commander Vyomika Singh madam …Jai Hind!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अशी विचित्र नावे का?  ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? इंद्रधनुष्य ?

☆ अशी विचित्र नावे का? ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

पुण्यात अनेक मारुती मंदिरे आहेत. पण त्यात विचित्र नावाची काही मंदिरे आहेत. त्यासंबंधी काही माहिती.

1) पत्र्या मारुती

पुण्यात ससून रुग्णालयाचे काम चालू होते. त्यासाठी पत्रे मागवले होते. रुग्णालय बांधताना त्या पत्र्यांचा उपयोग केला गेला. त्यात काही तुकडेही होते. त्या सर्व तुकड्यांचा उपयोग करून नारायण पेठेत एक मंदिर बांधले गेले. त्यात मारुतीची प्रतिष्ठापना केली. लोक साहजिकच त्या मंदिराला पत्र्या मारुती मंदिर असे म्हणू लागले. पुण्यात लक्ष्मी रोड आहे. तिथे शगुन चौक आहे. त्या चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना एक चौक लागतो. त्या चौकात हा पत्र्या मारुती आहे.

2) जिलब्या मारुती 

जिलब्या मारुती मंदिर पुण्यातील तुळशीबागे जवळ आहे. खूप वर्षांपूर्वी तिथे एक हलवायाचं दुकान होतं. तो हलवाई रोज खूप जिलब्या बनवायचा. पण प्रथम तयार झालेल्या जिलब्यांचा एक हार बनवायचा आणि श्रद्धेनं त्या मारुतीच्या गळ्यात घालायचा. ते पाहून लोकांनीच त्याला जिलब्या मारुती असे नाव ठेवले.

3) दुध्या मारुती 

हे मंदिर शुक्रवार पेठेत आहे. मंदिराच्या परिसरात पूर्वी गाई-म्हशींचा गोठा होता. तिथे खूप दूध तूप मिळत असे. येथील गोठ्यातील गवळी या मारुतीवर दुधाचा अभिषेक करायचा. इतर ठिकाणी सर्व देव पाण्याच्या अभिषेकाने थंड होत असतात. येथे मात्र दुधाचा अभिषेक. म्हणून या मारुतीला दुध्या मारूती असे नाव पडले

4) बटाट्या मारुती 

हे मंदिर पुण्यातील शनिवार वाड्यातील मैदानावर आहे. पूर्वी इथेच भाजी मंडई भरत असे. आजूबाजूचे शेतकरी या ठिकाणी भाजीपाला विक्री करत असत. तिथे कांदा बटाटा खूप प्रमाणात विकला जात असे. बटाटा विकणारे शेतकरी या मंदिराच्या शेजारीच बसत असत म्हणून त्याला बटाट्या मारुती असे नाव पडले

5) उंबऱ्या मारुती 

.. हे मंदिर बुधवार पेठेत आहे. हे मंदिर उंबराच्या झाडाखाली आहे म्हणून याला उंबऱ्या मारुती असे नाव पडले.

6) खरकट्या मारुती 

लक्ष्मी रोडवरील तुळशी बागेत हे मंदिर आहे. पूर्वी दर्शनासाठी आजूबाजूचे खूप लोक येत. त्यावेळेस हॉटेल्स नव्हती. ते घरूनच जेवण बांधून आणत असत. ते बांधून आणलेली शिदोरी मंदिराच्या परिसरात बसूनच खात असत. तिथे त्यांचे खरकटे पडत असे म्हणून त्याला खरकट्या मारुती असे नाव पडले.

7) रड्या मारुती 

हे मंदिर गुरुवार पेठेत आहे. पूर्वी लोक या मारुती समोर मृतदेह ठेवून रडत असत. म्हणून ला रड्या मारुती असे नाव पडले.

8) उंटाड्या मारुती 

पुण्यात रास्ता पेठेत केईएम हॉस्पिटल प्रसिद्ध आहे. पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफीला त्या हॉस्पिटल समोर थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा म्हणून त्याला उंटाड्या मारुती असे नाव पडले

9) डुल्या मारुती 

पुण्यात हे मंदिर गणेश पेठेतील लक्ष्मी रोडवर आहे. हे मंदिर खूप पूर्वी स्वामी समर्थांनी बांधले आहे असे म्हणतात. पानिपतच्या युद्धात आपले मावळे अहमद शहा अब्दालीशी लढत होते. ते युद्ध अत्यंत गंभीर होतं. युद्धाचे हादरे या मारुतीला देखील बसू लागले. तो अक्षरशः डुलू लागला. म्हणून त्याला डुल्या मारुती असे म्हणू लागले.

10) भांग्या मारुती 

पुण्यात शिवाजी रोडवर रामेश्वर चौक आहे. त्या चौकात हे मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपती कडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकत असत. भांगदेखील विकली जात असे. म्हणून या मंदिराला भांग्या मारुती असे नाव पडले.

– – वर्षानुवर्षे या मंदिरांची अशीच नावे आहेत. ती नावे बदलण्याचा देखील काही लोकांनी प्रयत्न केला. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून देखील मंदिरांची ही विचित्र नावे बदलण्याचा प्रयत्न झाला. मात्र पुणेकरांच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. ही नावे पुण्याच्या समृद्ध ऐतिहासिक अस्मितेचा आणि धार्मिक वारशाचा भाग आहेत असे लोकांचे ठाम मत आहे. त्यामुळे अजून तरी हीच नावे या मंदिरांना दिली गेली आहेत.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – २ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

(कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.) – इथून पुढे —– 

डुंगरसिंग नावाचा एक सुभेदार आमच्या कॅम्पचा प्रमुख जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) होता. कॅम्पचे व्यवस्थापन आणि आमच्यामध्ये असलेला तो एकमात्र दुवा होता. सडसडीत बांध्याचा, मध्यम उंचीचा, काळा-सावळा डुंगरसिंग तसा दिसायला सामान्यच होता. मात्र त्याचे अंतरंग हळूहळू उलगडत गेले. तो एक अतिशय कर्तव्यनिष्ठ, सरळसाधा, मनमिळाऊ आणि संवेदनशील माणूस वाटे. प्राप्त परिस्थितीत त्याने आणलेले ते सोंग असू शकेल असे कुणालाही वाटणे साहजिक होते, पण कालांतराने घडलेल्या काही गंभीर प्रसंगातून मला त्याचा खरा स्वभाव कळत गेला.

भारतीय सैन्यातल्या एका इन्फन्ट्री बटालियनमध्ये शिपाई म्हणून भरती होऊन सुभेदार पदापर्यंत पोचलेला डुंगरसिंग रोहतक-हिसार भागातला राहणारा होता. आमच्याकडच्या पंजाबी लोकांप्रमाणेच भारतातले रोहतकी लोकदेखील बोलण्या-वागण्यामुळे काहीसे आडदांड वाटले तरी वृत्तीने साधेसरळ असतात. त्यांची रोखठोक पण काहीशी शिवराळ अशी उर्दूमिश्रित पंजाबी भाषा आणि नर्मविनोदी बोलणेही सहजच मनाला भिडणारे असते.

आम्हाला लागणाऱ्या, साबण, टूथपेस्ट व ब्रश, दाढीचे सामान, अशा दैनंदिन वापराच्या वस्तूंची एक यादी करून महिन्याच्या सुरुवातीला डुंगरसिंगकडे सुपूर्द करणे हे माझे काम होते. दरमहा भत्त्यापोटी मिळणाऱ्या दरडोई ९० रुपयांमधून ही खरेदी केली जाई. या व अशा प्रकारच्या संभाषणातून माझा व डुंगरसिंगचा परिचय वाढत गेला आणि आमच्यादरम्यान एक वेगळेच नाते निर्माण झाले. त्या विलक्षण माणसासोबतच्या नात्याचे स्मरण ठेवूनच आज चाळीसहून अधिक वर्षानंतर माझे हे मनोगत मी लिहितो आहे.

पैसे, घड्याळे, अंगठ्या वगैरे मौल्यवान वस्तू बाळगायला बंदी असल्याने त्या आमच्याकडून आधीच काढून घेतल्या गेल्या होत्या. माझी साखरपुड्याची अंगठी मी मोठ्या हिकमतीने लपवून ठेवलेली होती. एके दिवशी मी ती अंगठी कुरवाळत बसलेलो असताना अचानकच डुंगरसिंगने मला पाहिले. ती अंगठी माझ्या वाग्दत्त वधूने मला दिली असल्याने ती जमा केली नसल्याचे मी त्याला सांगितले. डुंगरसिंगच्या पुढच्या वाक्यामुळे, त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाच्या मोठेपणाबाबत माझी खात्री झाली, “साहेब, देव तुमचे भले करो. ती मुलगी खरोखरच मोठी भाग्यवान आहे. “

काही दिवसातच, आमच्या खोलीतून आम्ही एक भुयार खणायला सुरुवात केली होती. रोज रात्री थोडे-थोडे काम आम्ही करत होतो. आमच्यापैकी एकजण खिडकीशी बसून टेहळणी करत असे. कॅम्पचे एकमेव प्रवेशद्वार तिथून दिसू शकत होते. प्रवेशद्वारापासून आमच्या खोलीपर्यंत पोचायला सहजच पाचेक मिनिटे लागत असत. माझी खणायची पाळी संपवून मी विश्रांती घ्यायला पाठ टेकणारच होतो तेवढ्यात खोलीच्या दरवाज्यावर जोरजोराने थापा पडू लागल्या. आमच्या ‘टेहळणी बुरुजा’ला बहुदा मध्येच डुलकी लागली होती. आमची एकच तारांबळ उडाली. कॅम्प व्यवस्थापनाला पक्की खबर मिळाली असणार. म्हणूनच भारतीय शिपाई तडक आमच्या खोलीपर्यंत येऊन पोचले होते. आमच्या बराकीची बित्तंबातमी डुंगरसिंगशिवाय कुणाकडे असणार होती?

आम्ही घाईघाईने सर्व झाकपाक केली आणि दरवाजा उघडण्यापूर्वी झोपेच्या नाटकाचे संपूर्ण नेपथ्य तयार केले. आम्हाला बराकीतून बाहेर काढून उभे केले गेले. खोलीची झाडाझडती सुरु झाली. बाहेर पडण्यापूर्वी, माझी अंगठी मी शिताफीने माझ्या सामानातून काढून माझ्याजवळ ठेवली होती. पण लगेच आमची अंगझडतीही सुरु झाली. अंधारातच माझ्या खांद्यावर कुणीतरी हलकेच थापटल्यासारखे केले आणि एक हात माझ्यापुढे पसरला गेला. तो डुंगरसिंगचा हात होता. मी काय करणे अपेक्षित होते हे मला कळून चुकले. मुकाट्याने त्याच्या हातावर माझी अंगठी मी ठेवली. झडतीची कारवाई संपली आणि डुंगरसिंगासह सगळी पार्टी निघून गेली. आमचा पलायनाचा बेत तर फसलाच होता, पण त्या रात्री मला झोप लागणे तसेही अशक्यच होते. त्या अंगठीतल्या सोन्याचे वजन आणि त्याच्या किंमतीची मला पर्वा नव्हती. पण ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी होतो त्या काळातला माझा एकमेव भावनिक आधार मी गमावला होता!

दुसऱ्या दिवशी मंद हसत आणि डोळे मिचकावत सुभेदार डुंगरसिंग माझ्यापाशी येऊन म्हणाला, “तुम्ही लोक काहीनाकाही ‘चमत्कार’ दाखवण्याच्या तयारीत असणार याची कल्पना मला होतीच. इतर बराकीतल्या लोकांपेक्षा अधिक लाल दिसणारे तुमचे डोळेच सर्व काही सांगत होते! ” हे बोलत असतानाच डुंगरसिंगने खिशातून एक कागद काढून गुपचूप माझ्या हातात कोंबला. त्या कागदामध्ये माझी अंगठी गुंडाळलेली होती!

डुंगरसिंगच्या माणुसकीचा मला त्या दिवशी आलेला प्रत्यय मोठा विलक्षण होता.

आमच्या प्रियजनांकडून आलेली पत्रे रेड क्रॉसतर्फे आम्हाला मिळत असत. अर्थातच ती कॅम्प व्यवस्थापनाद्वारे उघडून, वाचून, सेन्सॉर केली जात. सुभेदार डुंगरसिंग ती पत्रे आमच्यापर्यंत पोचवत असे. आमच्यापैकी विवाहित आणि मुलेबाळे असलेल्या अधिकाऱ्यांच्या मुलांची नावे, इयत्ता, त्यांचे छंद अशा गोष्टीही हळूहळू डुंगरसिंगला पाठ झाल्या होत्या. त्या अधिकाऱ्यांशी तो त्याविषयी चर्चा करत असताना असे वाटे की जणू तो स्वतःच्याच कुटुंबाविषयी बोलत असावा. डाक येण्याच्या दिवशी एखाद्या अधिकाऱ्याच्या नावे एकही पत्र न आल्यास, डुंगरसिंग अगदी आत्मीयतेने त्या अधिकाऱ्याची समजूतही काढत असे.

डुंगरसिंगच्या चांगुलपणाची परतफेड करण्याची संधी एके दिवशी मला मिळाली. आमच्या बराकीच्या कोपऱ्यातल्या त्याच्या ठराविक जागी बसून तो हळूहळू हुंदके देत असल्याचे मला दुरूनच जाणवले. मी त्याच्या जवळ पोचेपर्यंत, आपले अश्रू पुसून शांत दिसण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. परंतु, मी त्याच्या खांद्यावर हात ठेवताक्षणी मात्र त्याचा बांध फुटला. सुभेदार डुंगरसिंग हमसून-हमसून रडू लागला. १५-१६ वर्षांची त्याची मुलगी अचानकच वारल्याचे त्याला नुकतेच पत्राद्वारे समजले होते. तिच्या अंत्यसंस्कारालाही तो जाऊ शकला नव्हता!

युद्धात जिंकलेला सैनिक असो किंवा पराभूत सैन्यातील एखादा युद्धकैदी असो, दोघेही मनुष्येच तर असतात. त्यांच्या भावभावनाही एकसारख्याच असतात. त्यांना आपापली दुःखे एकाच तीव्रतेने टोचतात किंवा आनंदही सारख्याच उत्कटतेने होत असतो!

कालांतराने, कैदेतून आमची सुटका होण्याची वेळ आली. सुभेदार डुंगरसिंग काहीशा विमनस्क अवस्थेत होता. त्याच्या मनात दोन परस्परविरोधी भावना उचंबळत असाव्यात असे जाणवले. परंतु, त्या दोन्ही भावना त्याच्या नैसर्गिक स्वभावधर्माला अनुसरूनच होत्या. युद्धकैद्यांची पहिली तुकडी रवाना झाली तेंव्हा त्याचे डोळे भरून आले होते. डोळ्यातले अश्रू कसेबसे मागे सारत तो चेहऱ्यावर उसने हसू आणू पाहत होता, पण त्याचे थरथरणारे ओठ सत्य सांगून गेले. आम्ही मायदेशी परतणार म्हणून तो आमच्या आनंदात सहभागी होता, पण आमच्या जाण्याचे दुःखही तो लपवू शकत नव्हता.

मनाने पर्वताएवढ्या विशाल अशा डुंगरसिंग नावाच्या माणसाचा अल्प सहवास मला लाभला हे माझे थोर भाग्यच म्हणायचे. तो जिथे असेल तिथे परमेश्वराने त्याला सर्व सुखे द्यावीत इतकीच माझी प्रार्थना आहे. त्या कठीण काळातले आमचे दिवस त्याच्यामुळे अविस्मरणीय होऊन गेले!

– समाप्त – 

[ब्रिगेडियर मेहबूब कादिर (सेवानिवृत्त) यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा त्यांच्या पूर्वानुमतीसह केलेला भावानुवाद]

लेखक / अनुवादक : © कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “दुश्मनी में भी इक शराफत रखते हैं…” भाग – १ ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

‘लक्ष्य’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या तोंडी असलेला एक संवाद आठवत असेल, “ये इंडियन आर्मी है, हम दुश्मनी में भी एक शराफत रखते हैं… “

आपल्या मायभूमीकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्यांचे डोळे फोडायलाच हवेत, आणि भारताविरोधात उठलेला प्रत्येक हात खांद्यापासून कलम केलाच पाहिजे, याबाबत कधीच दुमत असणार नाही. परंतु सच्च्या सैनिकाने आपली नीतिमत्ता आणि माणुसकी विसरणे योग्य नव्हे, हेही तितकेच खरे आहे. वरकरणी ही दोन्ही विधाने परस्परविरोधी वाटू शकतात. पण कारगिल युद्धामधली आणि त्यापूर्वींचीही अनेक उदाहरणे सांगता येतील ज्यामध्ये भारतीय सैनिकांनी पराक्रम गाजवण्यात कधीच कुचराई केली नाही, परंतु, त्याच वेळी आपले माणूसपण हरवले नाही.

आज मी अशीच एक गोष्ट सांगणार आहे.

१९७१ साली बांगलादेश युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानी सैन्यातल्या एका तत्कालीन कॅप्टनने कथन केलेला स्वानुभव त्याच्याच शब्दात…

डुंगरसिंग 

१९७२ सालच्या मार्च-एप्रिलच्या दरम्यान आम्हाला आग्र्याहून रांची येथील कॅम्प ९५ मध्ये हलवण्यात आले. त्या प्रवासादरम्यान आमच्यावर पहारा देणाऱ्या एका भारतीय सैनिकाने आमच्यापैकी एका अधिकाऱ्याला गोळी घालून ठार केले. त्याचे कारण काय हे तो पहारेकरीच जाणे! आमचा आणखी एक अधिकारी तर बेपत्ताच झाला. एकूणात, उत्तर हिंदुस्थानातल्या भीषण उकाड्यात आम्ही रेल्वेने केलेला तो प्रवास अक्षरशः जीवघेणाच ठरला होता.

आम्हाला आग्र्याहून तडकफडकी हलवण्याचे कारणही तसे सबळ होते. आग्र्याच्या युद्धकैदी शिबिरातून पळून जाण्याचा आमचा प्रयत्न नुकताच फसला होता. त्यामुळे ‘अतिशय डेंजरस कैदी’ असा शिक्का आमच्यावर बसलेला होता. त्या घटनेचे कठोर परिणाम होणार याची आम्हाला कल्पना होती आणि होईल ते भोगायची मानसिक तयारी आम्ही ठेवली होती. यात जगावेगळे असे काहीच नव्हते. युद्धात पकडले गेल्यास, शत्रूच्या तावडीतून शिताफीने निसटण्याचा जमेल तितका प्रयत्न करण्याचे बाळकडू प्रत्येक सैनिकाला प्रशिक्षणादरम्यान दिलेलेच असते. परंतु, युद्धकैद्यांचा पलायनाचा बेत फसल्यास, शत्रू काही त्यांना उत्तेजनार्थ बक्षीस निश्चित देणार नाही याचीही कल्पना प्रत्येकाला असतेच.

रांचीच्या कॅम्प ९५ मध्ये पोचताच आमची शिरगणती झाली आणि ५-६ जणांच्या गटात आम्हाला एकेका खोलीत डांबले गेले. या नवीन शिबिरामध्ये आमच्या सोबतीला, सरपटणारे, उडणारे नाना प्रकारचे किडे होते. त्याशिवाय उंदीर तर होतेच, पण त्यांचा पाठलाग करत येणारे हिरवट-पिवळे गवती सापदेखील आम्हाला अधूनमधून दर्शन द्यायचे.

रांचीवर निसर्गाची मात्र मेहेरनजर होती. स्वच्छ निळ्या आकाशाला टेकू पाहणारे आणि वाऱ्यासोबत डोलणारे गडद हिरवे माड आम्हाला खिडकीतून दिसायचे. चहाच्या मळ्यांनी तर आसपासच्या टेकड्यांवर जणू सोनहिरवे गालिचेच घातले होते. आमची दृष्टी पोचेल तिथपर्यंत हिरव्या रंगाच्या विविध छटांची नुसती पखरण होती. आसपास उगवलेले गवत तर अक्षरशः शांघायच्या मखमलीसारखे होते – मऊ आणि गुबगुबीत. वाऱ्याच्या झुळकीने गवत हलले की त्यावरची हिरवी छटाही बदलत असे. इथला पावसाळा मार्चमध्ये सुरु होई आणि नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७५० इंच पाऊस पडे. कधी-कधी तर ठरवून एकत्र आल्यासारखे, तीन बाजूंनी एकाचवेळी ढग दाटून येत आणि पाऊस कोसळू लागे. निसर्गाचा असा अद्भुत आविष्कार मी कधीच कुठे पाहिलेला नव्हता.

इथल्या दमट वातावरणाचे तोटेही खूप होते. धुवून वाळत टाकलेल्या आमच्या कपड्यांवर किंवा टॉवेलवर संध्याकाळपर्यंत बुरशी लागत असे. आल्यानंतर काही दिवसातच आमच्या कातडी बुटांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली आणि ते वेडेवाकडे झाल्याने वापरणे अशक्य झाले. त्यामुळे, अंगावर खाकी रंगाच्या अर्ध्या चड्ड्या, बिनबाह्यांचे बनियन आणि पायात साध्या-सुध्या ‘हवाई चप्पल’ हाच वेष सगळ्यात सोयीस्कर आणि आरोग्याच्या दृष्टीने चांगला असल्याचे लक्षात आले. असल्या दमट हवेत शरीराची योग्य काळजी न घेतल्यामुळे आमच्या शरीरावरच्या विविध बेचक्यांमध्ये घाम साठून राही. त्यामुळे, अंगावर उठलेले उन्हाळी फोड, खरूज आणि नायटे यांनी आम्ही अक्षरशः बेजार झालो. त्या जागी लावायला एक गुलाबी रंगाचे मलम आम्हाला दिले गेले होते. शरीराच्या बेचक्यांमध्ये ते मलम लावून, ती जागा उन्हात वाळू देणे हाच एकमेव उपाय होता. सकाळी-सकाळी, खुशाल नग्नावस्थेत उन्हात पहुडलेल्या आम्हा कैद्यांचे ते बीभत्स दृश्य पाहण्याची शिक्षा, कॅम्पच्या वॉचटॉवरवर पहारा देणाऱ्या भारतीय शिपायांना भोगावी लागे! त्याला मात्र आमचा नाईलाज होता.

ब्रिटीशकालीन रांची कॅन्टोन्मेंटच्या एका कोपऱ्यात आमचा युद्धकैदी कॅम्प होता. अगदीच कामचलाऊ अशा बराकींमध्ये आम्हाला मिळालेल्या खोल्या तशा प्रशस्त होत्या. एकेका खोलीला लागूनच संडास-बाथरूम होती. सर्वांसाठी एकच सामायिक स्वयंपाकघर आणि जेवणाचा हॉल होता. खिडक्यांवर गज ठोकून त्या बंदिस्त केलेल्या होत्या आणि बराकीचा दरवाजाही रात्रीच्या हजेरीनंतर बाहेरून कुलूपबंद केला जात असे. आमची खोली बराकीच्या एका टोकाला होती. तिथून अक्षरशः ढांगेच्या अंतरावर असलेले कुंपण आम्हाला सतत भुरळ घालत असे. जवळजवळ त्या कुंपणाला लागूनच दाट जंगल सुरु होत होते आणि त्यापलीकडे पाटण्याला जाणारा रस्ता होता. कॅम्पमध्ये पोचल्यानंतर आमच्यापैकी काहीजण रेडक्रॉसतर्फे मिळालेली पुस्तके वाचण्यात दंग झाले, तर काहीजणांनी धार्मिक वाचन व प्रार्थनेला वाहून घेतले. काही थोडेजण मात्र अगदीच सैरभैर झाले आणि अखेरपर्यंत निराशेच्या गर्तेतच राहिले.

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “’मर्रि कामय्या…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “मर्रि कामय्या…☆ सुश्री शोभा जोशी ☆

हे नाव अशा एका जनजातीतील व्यक्तिचं आहे, ज्याचं घर जाळलं गेलं, ज्याला जंगलात राहावं लागलं. त्याचंच घर नाही तर सबंध गावच जाळलं गेलं. त्याच्या मनाची काय अवस्था झाली असेल!असं आहे की सूर्याला तात्पुरतं ग्रहण लागलं म्हणून त्याचं तेज कमी होत नाही. तसंच कामय्यांचं झालं.

आंध्र प्रदेशातील, पाडेरू क्षेत्रातील, हुकूमपेट मंडलातील गरूडापल्ली गाव हे या वीराच्या नावाने ओळखले जाते. कामय्यांचा जन्म कोंडा दोरा जनजातीत झाला होता.

ब्रिटिशांच्या काळात, आपल्या देशातील काही सावकारांनी भोळ्या- भाभड्या वनवासींकडून जास्तीत जास्त कर वसूल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यांना पाणी, रस्ते, शिक्षण या प्राथमिक सुविधाही मिळत नव्हत्या. त्यांचं अगदी सरळ सरळ शोषण चालू होतं. हीच परिस्थिती गरूडापल्ली गावातही होती. या सावकारांना इंग्रजांचा पाठिंबा होता ही गोष्ट लपून राहिली नव्हती. या सावकारांच्या विरूध्द पर्यायाने इंग्रजांविरूध्द लढा उभा करण्याची योजना मर्रि कामय्यांनी ठरवली. आता सूर्याला लागलेलं ग्रहण सुटेल ही आशा लोकांच्या मनात जागृत झाली.

सिताराम राजूंनी १९२४ मध्ये केलेल्या रम्पा संग्रामापासून प्रेरणा घेऊन कामय्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला.

ज्या ज्या गावात कोंडा जनजातीतील लोक राहात त्या त्या गावात ग्राम समित्या निर्माण करून शाळा सुरू केल्या. आज आपण जनजातीतील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून आपण निरनिराळ्या प्रकारे प्रयत्न करत आहोत. दूर दूर वनात राहाणार्‍या मुलांना औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण मिळावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून संस्कार वर्ग, छात्रावास चालवत आहोत. असाच प्रयत्न त्याकाळी जनजातीतील लोकांनीही केला होता. त्यातलेच एक मर्रि कामय्या होते.

लोकांना स्वावलंबी बनवण्याचेही प्रयत्न चालू होते. हळू हळू लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली. ही गोष्ट इंग्रजांच्या पचनी पडत नव्हती. त्यांनी कामय्यांविरूध्द कारवाई करण्यास सुरूवात केली. प्रथम त्यांनी गरूडापल्ली गाव जाळून खाक केले. कामय्या डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या गावातील ३६० बेघर झालेल्या कुटुंबांना घेऊन एक बीटागरूदू नावाचे गाव वसवले. इंग्रजांनी तिथेही अत्याचार सुरू केले. कामय्यांच्या सगळ्या संपत्तीचा लिलाव केला. कामय्या काही काळ आपल्या साथीदारांबरोबर जंगलात भटकत राहिले. अशा परिस्थितीत ५० लोकांचं एक दल बनवून इंग्रजांविरूध्द संघर्ष सुरू केला. अर्थातच त्याचं नेतृत्व कामयांकडे आलं. इंग्रजांनी त्यांना कैद करून ११ दिवस तुरूंगात टाकले. या ११ दिवसात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले.

कैदेतून मुक्त झाल्यावर, असहकार आंदोलनात सहभागी झाले, हा आरोप त्यांच्यावर ठेऊन त्यांना पुन्हा कैद केले. यावेळी कैदेतून मुक्त झाल्यावर ते भूमीगत झाले. त्यांनी आपले केंद्र वारंवार बदलून इंग्रजांशी लढा चालू ठेवला.

अशावेळी एक दुर्घटना घडली. त्यांची मुलगी नदी पार करत असताना त्यांच्या नजरेसमोर वाहून गेली. हा त्यांच्या मनावर झालेला खूप मोठा आघात होता. तरीही आंदोलनातून त्यांनी माघार घेतली नाही. व्यक्तिगत जीवनातील अनेक प्रकारचे कष्ट सहन करूनही ते इंग्रजांबरोबर संघर्ष करत राहिले. हा संघर्ष भारत स्वतंत्र होईपर्यंत चालू राहिला.

५ मे १९५९ ला त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. तुमच्याजवळ काहीच नसताना, तुमच्या मनात जनहिताची निर्माण झालेली ओढ यातूनच लोकांना तुमची ओळख पटते. आणि म्हणूनच कामय्यांचे नाव त्या भागात आदराने घेतले जाते. या जनजातीतील वीराला ५ मे या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.

©  सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे… – लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे☆

? इंद्रधनुष्य ?

☆ आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे… – लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे ☆ प्रस्तुती – सुश्री कालिंदी नवाथे ☆

एकदा नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला गेला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृध्द महिला आली. म्हणाली, ‘‘प्रसाद कधी मिळेल?”

सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती खट्टू झाली. तेवढ्यात त्या कार्यालयात असणारी एक महिला म्हणाली, ‘‘थांब मावशी. एक लाडू आहे. देते तुला!” वृध्देला आनंद झाला.

बुंदीचा लाडू हातात घेऊन तिने कपाळाला लावला आणि लाडवाचा एक तुकडा घेऊन उरलेला लाडू परत देत म्हणाली, ‘‘पुन्हा कुणी आलं तर यातला कणभर त्यालाही देता येईल. कुणी तसंच जायला नगं! परसाद जीव निवण्यासाठी पायजे… पोट भरण्यासाठी नाय्!”

मला तिचे पाय धरावे वाटले. आध्यात्मिकतेने अनासक्ती येते ती अशी! मन प्रसन्न असेल ना; तर मणाने नाही, कणानेही समानाधा लाभते हे त्या वृध्देच्या संवादातून उलगडले.

परमार्थ वेगळे काय शिकवतो? आयुष्यातला प्रत्येक क्षण भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारता आला तर सारे तणाव, सारा वैताग संपून जाईल. जगणे ‘प्रासादि’क होईल. बीजात सारा वृक्ष सामावलेला असतो, तसा कणा कणात ब्रह्मांडव्यापी आनंद कोंदटलेला असतो. पण आपल्या हव्यासापोटी आपण ब्रह्मांडच खिशात घालायचे म्हणतो. मग हट्ट सुरू होतो. आणखी मिळवेन, खूप मिळवेन, जास्तीत जास्त मिळवेन. शेवटी ओंजळ रिक्तच राहते. असे निराश होण्यासाठी आपल्याला आयुष्य मिळालेले नाही. खरे तर आयुष्य हाच महाप्रसाद आहे. एकदा ते मिळाले म्हणता ना, आणखी काय हवे? आता मिळवायला नव्हे तर वाटायला शिकले पाहिजे. तळहातावर मिळालेला गोपाळकाला, स्वत:साठी थोडा ठेवून कण कण सर्वांना वाटायचा असतो!

देता यायला लागले की आपणही कृष्ण होतो. परमार्थ म्हणजे जवळचे उत्तम सर्वांना देणे. थोड्यातलाही आनंद घेणे. आपले अश्रू रोखून हसण्याचे चांदणे पसरणे. बस्स, हव्यास आणि हट्ट सोडण्याची तयारी करायला पाहिजे.

लेखक : श्री आनंद प्रकाश देवतरसे 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘१ मे ची कहाणी…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘१ मे ची कहाणी…’ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

दरवर्षी १ मे हा दिवस आपण “ महाराष्ट्र दिन “ म्हणून उत्साहाने साजरा करतो. या महाराष्ट्र दिनाचा हा इतिहास जाणून घेऊ या.

या इतिहासाला काळी चौकट आहे ती हुतात्म्यांच्या रक्तलांछित बलिदानाची ! २१ नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या आसपास तणाव जाणवत होता. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्यास नकार दिला होता. या अन्यायकारक निर्णयामुळे मराठी माणसाचा संताप शिगेला पोचला होता. सर्वदूर होणाऱ्या सभांमधून या निर्णयाचा जाहीर निषेध होत होता. याचा परिणाम म्हणजे मराठी अस्मिता जागी झाली. सरकारचा निषेध करण्यासाठी कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाऊंटन समोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर मोठा जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून अत्यंत त्वेषाने घोषणा देत, फ्लोरा फाउंटनच्या ठिकाणी गोळा झाला. तो पांगवण्याकरता पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र मोर्चेकरी बधले नाहीत. मग मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारला झुकावे लागले आणि शेवटी १ मे, १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. म्हणून १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.

या १०६ हुतात्म्यांनी जिथे बलिदान केले त्या फ्लोरा फाउंटनच्या चौकात १९६५ मध्ये हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. आता तो ‘हुतात्मा चौक’ म्हणून ओळखला जातो. या आंदोलनात आचार्य अत्रे यांचे प्रत्यक्ष रित्या आणि त्यांच्या मराठा या दैनिकात छापल्या जाणाऱ्या ज्वलंत लेखांचे खूप मोठे योगदान आहे.

१ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ म्हणूनही ओळखला जातो. ४ मे १८८६ मध्ये अमेरिकेतील कामगारांनी आठ तास काम करण्यास नकार दिला आणि आपल्या न्यायहक्कासाठी संप केला. शिकागोत अनेक कामगार ठार झाले. त्यानंतर १८८९ मध्ये या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्याची घोषणा समाजवादी संमेलनात करण्यात आली. म्हणूनच दरवर्षी जगभरात १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपणा सर्वांना शुभेच्छा 🌹🙏

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ प्रेरणापुंज ऋतुराज ॥ –  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ प्रेरणापुंज ऋतुराज ॥ –  माहिती संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

बिहारचा युवक ऋतुराज चौधरी ने परवा रात्री १:०५:०९ वाजता गुगल ला हादरवून सोडलं. त्याने ५१ सेकंदांपर्यन्त गुगल इंजिनच हॅक करून टाकलं. हॅक होताच अलम दुनियेत बसलेल्या गुगल अधिकाऱ्यांचे हातपाय थंडगार पडले. अमेरीकेच्या ऑफिसमधे एकच हल्लकल्लोळ माजला.

त्यांना नेमकं कारण कळण्यापुर्वीच म्हणजे ५१ सेकंदाने ऋतुराजने गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पुर्ववत सुरू केली आणि गुगल ला मेल करून कळवून दिले कि गुगलच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे तो ते हॅक करू शकला.

सदरहू ई मेल करून ऋतुराज झोपी गेला कारण आपल्या देशात रात्र होती. परंतू मेल वाचून अमेरीका मात्र बैचैन झाली. मेल मधे ऋतुराजने दिलेल्या सर्व तपशीलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनी सुध्दा १ सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना तांत्रिक उणिवेची खात्री पटली.

अमेरीकेत तडकाफडकी ह्या गंभीर विषयावर १२ तास मिटींग चालली आणि शेवटी निर्णय झाला की संबंधीत युवकाला बोलाविण्यात यावं.

दिवसा ठीक २ वाजता ऋतुराज ला मेल आला की ‘आम्ही तुझ्यातील गुणवत्तेला सॅल्यूट करत आहोत. कृपया तू आमच्यासोबत काम कर.

आमचे अधिकारी तुला न्यायला येत आहेत. ‘

लगेच दुसऱ्या मेल द्वारा गुगलने ऋतुराजला 

‘जॉईनींग लेटर ‘ दिले ज्यामधे ३. ६६ कोटी रूपयांचे पॅकेज आहे.

ऋतुराज जवळ पासपोर्ट नव्हता. गुगलने भारत सरकारशी विस्तृत चर्चा केली आणि केवळ दोन तासाच्या अवधीमधे त्याचा पासपोर्ट तयार करून त्याच्या घरी पोहोचता केला. ऋतुराज आता प्रायव्हेट जेट विमानाने अमेरिकेला रवाना होईल.

ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील ‘बी टेक’ द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. आणि बेगुसराय शहराजवळ असलेल्या मुंगेरगंज नावाच्या खेड्याचा रहिवासी आहे.

जगाच्या सुपरपॉवरला भारी पडलेल्या भारतमातेच्या ह्या अद्भुत गुणवंत युवकाला सलाम. —–

माहिती संकलक : अज्ञात 

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares