मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शौर्य-श्रीमंत सैनिक” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

“शौर्य-श्रीमंत सैनिक ☆ श्री संभाजी बबन गायके 

डोईवर अक्षता पडल्या आणि अवघ्या पंचवीस-तीस दिवसांत कुंकू सीमेवर लढायला गेलं…. त्यावेळी ती सतरा वर्षांची असेल नसेल! त्यानंतर त्याला नऊ महिन्यांनीच पाहण्याचा योग आला! तिच्या यजमानांच्या नावाचा अर्थ चमकता तारा… अगदी चुनचुनीत मुलगा! वाढत्या वयासोबत या ता-याची चमक वाढतच होती.

इतरांचे धनी नोकरीवरून सुट्टीवर आले की, बायकोसाठी सोन्याचे दागिने आणत असत… हिचा नवरा मात्र पहिल्याच सुट्टीत चांदी घेऊन आला! पण ही चांदी हि-यापेक्षाही मौल्यवान आणि चमचमती. या चांदीच्या दागिन्याच्या एका बाजूला हाती बंदूक घेऊन ताठ उभा असलेला सैनिक दिसत होता तर दुस-या बाजूला बंदुकीची संगीन… टोकदार… आभाळाकडे उंचावलेली… शत्रूच्या नरडीचा वेध घेऊ पाहणारी. तो चांदीचा दागिना म्हणजे एक पदक होतं…. सेना मेडल म्हणतात याला. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी हे पदक आपल्या छातीवर अभिमानाने मिरवण्याचे भाग्य लाभले होते तिच्या कुंकवाला….. होय… शिपाई चुन्नीलाल तिच्या घरधन्याचं नाव. जम्मू येथील रहिवासी. सहा मार्च १९६८ रोजी जन्मलेले चुन्नीलाल वयाच्या सोळाव्या वर्षी सेनेत भरती झाले दोन वर्षांच्या कठीण प्रशिक्षणापश्चात त्यांना 8, Jammu And Kashmir Light Infantry नेमणूक मिळाली. आणि पहिल्याच वर्षी म्हणजे १९८७ मध्ये त्यांना फार मोठ्या लष्करी कारवाईत सहभागी होण्याची सुवर्णसंधी लाभली…. होय… सैनिकासाठी लढाई करायला मिळणे म्हणजे एक सुवर्णसंधीच असते. पण या लढाईसाठी त्यांना काही महिन्यांचे खूप कठोर प्रशिक्षण घ्यावे लागले… कारण त्यांची नेमणूक होणार होती सियाचीनच्या पर्वतांचे रक्षण करण्यासाठी.

१९८७ हे वर्ष होते… पाकिस्तानी घुसखोर सेनेने हजारो फूट उंचीवर असलेले एक शिखर बेकायदा ताब्यात घेतले होते… आणि त्याला त्यांच्या कायद-ए-आजम (कायदेआजम) अर्थात मोहम्मद अली जिनाचं नावही देऊन टाकलं होतं! भारत-पाक-चीन या सीमा त्रिकोण भागात ही शत्रूची चौकी असणं म्हणजे भारतासाठी मोठाच धोका होता. शत्रूला तिथून हुसकावून लावण्याची नितांत गरज लक्षात घेऊन लढाऊ बाणा असलेले सैनिक या कामगिरीवर पाठवण्यात आले! ही कामगिरी जीवघेणी होती. प्रचंड अंगावर येणारे शिखर, थंडी, बर्फ आणि वरून पाकिस्तानी अचूक गोळीबार यांतून त्या चौकीपर्यंत पोहोचायचे होते…. नायब सुबेदार बाणासिंग स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सामील झाले… तसेच आपले तरुण वीर चुन्नीलाल सुद्धा… त्यांच्या सोबत तसेच नीडर इतरही काही जवान होतेच. बाणा सिंग साहेबांचे मार्गदर्शन होते…. चुन्नीलाल इंच इंच पर्वत चढत चढत अंधार, थंडी, बर्फ याची पर्वा न करता मोठ्या कौशल्याने त्या बर्फाळ पर्वतावर चढले…. यातील एक सुळका ४५७ मीटर्स उंचीचा आणि एकदम खडा म्हणजे जवळजवळ ९० अंशाचा होता… बर्फाचे वादळ सुरु होते… समोरचे नीट काही दिसत नव्हते…. पण तरीही चुन्नीलाल यांनी शत्रूच्या बंकरवर तुफान हल्ला चढवला…. सहका-यांना सोबत घेऊन त्या बंकरमधील सर्व पाकिस्तानी यमसदनी पोहोचवले…. त्यांना वाटलं ही भूताटकीच की काय? इतक्या उंचीवर असे कोणी येईल आणि हल्ला करेल हे त्यांनी स्वप्नातही पाहिले नसेल! या मोहिमेतील कामगिरी बद्दल त्यांचे म्होरके बाणा सिंग साहेबांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले! या मोहिमेला ‘राजीव’ असे नाव दिले गेले होते आणि ही मोहीम यशस्वी केल्याबद्दल या चौकीला बाणा सिंग यांचे नाव देण्यात आले! आणि चुन्नीलाल यांना याच मोहिमीतील यशस्वी सहभागासाठी त्यांच्या कारकीर्दीतील पहिले मोठे मेडल मिळाले होते…. सेना मेडल! ही तर फक्त सुरुवात होती…. पुढे १९९९ मध्ये त्यांनी पूंच सेक्टर मध्ये थोडेथोडके नव्हे तर १२ पाकिस्तानी घुसखोर ठार मारण्यात मोठी भूमिका बजावली! या मोहिमेत त्यांचे दुसरे पदक आले… वीर चक्र!.. पाच टोके असलेला तारा असतो या चांदीच्या चक्रावर! चुन्नीलाल नावाच्या ता-याच्या छातीवर हे दुसरे पदक मोठ्या डौलाने विराजमान झाले. एका साध्या सैनिकाने कमावलेली हे मोठी दौलत होती.

चुन्नीलाल पुढे आफ्रिकी देशात आपल्या भारतातर्फे संयुक्त राष्ट्र सैन्यातही कामगिरीवर गेले… त्यांच्या पलटणला तिथेही उत्तम शाबासकी प्राप्त झाली! 

२१ जून २००७… या दिवशी चुन्नीलाल हे नायब सुबेदार या पदावर पदोन्नत झाले…. सामान्य सैनिक म्हणून भरती झालेले सैनिक अंगभूत गुणांच्या जोरावर उच्च पदावर पोहोचू शकतात… त्यातलेच नायब सुबेदार हे पद. यांच्याकडे सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व दिले जाते… आणि इतर महत्त्वाची कामे तर असतातच! चुन्नीलाल यांना बढती मिळून केवळ तीनच दिवस उलटले होते. नायब सुबेदार साहेब कुपवाडा मधील एका सैन्य चौकीचे प्रमुख होते… उंची होती १४ हजार फूट. रात्र मोठी अंधारी होती…. आकाशात ढगांनी दाटी केलेली. दोन हातापलीकडचे काही दिसत नव्हते…. पारा वजा ५ इतका खाली गेलेला… जीवघेणी थंडी. पहाटेचे साडे तीन वाजलेले… चुन्नीलाल साहेब पहा-यावर मौजूद होते… त्यांना सीमेजवळ काही हालचाल जाणवली…. त्या स्थितीत ते स्वत: शोध घेण्यासाठी पुढे सरसावले. तेवढ्यात तेथून जोरदार गोळीबार झाला… चुन्नीलाल साहेबांनी आपल्या सहका-यांना सावध केले होतेच. प्रत्युत्तर तर दिले गेलेच… दोन अतिरेकी ठार मारले गेले! पण या गदारोळात आपले दोन सैनिक जखमी झाले… आणि जिथे अतिरेकी लपले होते नेमके त्याच्याजवळच कोसळले होते… लपलेल्या अतिरेक्याकडून या सैनिकांच्या जीवाला शंभर टक्के धोका होता… चुन्नीलाल साहेब निर्धाराने पुढे गेले… आणि त्या दोघांना ओढत सुरक्षित ठिकाणी आणून ठेवले… पण तिथे एक अतिरेकी लपून बसला होता आणि तिथून पळून जायच्या बेतात होता… चुन्नीलाल साहेबांनी त्याचा माग काढला… त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला… आणि त्याला वर पाठवला! पण त्याची एक गोळी साहेबांच्या पोटात घुसली… प्रचंड रक्तस्राव सुरु झाला! 

रुग्णालयात पोहचेपर्यंत नायब सुबेदार चुन्नीलाल साहेब स्वर्गस्थ झाले होते… ही कामगिरी त्यांना त्यांचे तिसरे पदक देऊन गेली… अशोक चक्र! शांतता काळात सैनिकांना प्रदान केले जाणारे सर्वोच्च सैन्य पदक! 

नायब सुबेदार या तिस-या पदकाने आणखी श्रीमंत ठरले होते… तिन्ही महत्त्वाची, सन्मानाची पदके मिळवणारे एकमेव सैनिक ठरले चुन्नीलाल साहेब! त्यांच्या धर्मपत्नी चिन्तादेवी यांनी २६ जानेवारी २००८ रोजी आपल्या पतीचं हे पदक मोठ्या अभिमानाने स्वीकारले… चुन्नीलाल साहेबांनी एवढी मोठी श्रीमंती प्राप्त केली होती… जिचे मोल करणे अशक्य! चुन्नीलाल साहेब हे इतर सैनिकांसाठी आदर्श बनले आहेत! त्यांच्या अलौकिक जीवनावर आणि शौर्याबद्दल Bravest of the Brave : The Inspiring Story of Naib Subedar Chunni Lal, AC()अशोक चक्र), VrC, (वीर चक्र) SM(सेना मेडल) हे Lt General Satish Dua (Retd) यांनी लिहिलेले एक इंग्रजी पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. एका सैनिकाच्या कामगिरीची एका मोठ्या अधिका-याने घेतलेली ही नोंद अत्यंत अभिमानास्पद अशीच आहे.

जय हिंद.. जय भारत.. जय हिंद की सेना ! 

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

सात्वस्मिन्परमप्रेमरूपा ॥ २ ॥

सा – ती (भक्ती), अस्मिन् – या, प्रत्यक्ष नित्यअपरोक्ष परमात्म स्वरूपाचे ठिकाणी, परमप्रेमरूपा – म्हणजे परमप्रेम असणे हेच तिचे स्वरूप (अशी आहे).

वरील सूत्राचा अर्थ सोप्या शब्दात पुढील प्रमाणे सांगता येईल. भक्ति हे परमप्रेमरूप आहे. खरंतर इतका सुलभ अर्थ असताना याचे अधिक विवरण करण्याची गरज आहे? पटकन उत्तर नाही असेच येईल, पण गरज आहे हेच त्या प्रश्नांचे खरे उत्तर आहे.

या नश्वर जगातील प्रत्येक जण प्रेमाचा भुकेला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही. इतकेच नव्हे तर प्रत्येक जण कमीअधिक प्रमाणात दुसऱ्यांवर प्रेम करीत असतो, हे आपल्याला मान्य असेल…!

आणखी एक गोष्ट आपल्याला सर्वांना मान्य होण्या सारखी आहे ती म्हणजे सामान्य मनुष्य ज्याला प्रेम म्हणतो किंवा प्रेम करतो ते प्रेम नसते, तर स्वार्थापोटी केलेली कृति असते. एका गावात एक कुटुंब होते, त्या पती पत्नीचे एकमेकांवर निरतिशय प्रेम होते. दुर्दैवाने त्यातील पतीचे आकस्मिक निधन झाले. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. लोकं अंत्ययात्रेला जमले. पत्नी कलेवर उचलू देईना. शेवटी गावातील म्हाताऱ्या बायकांनी तिची समजूत काढली आणि अंत्ययात्रा निघाली. अंत्ययात्रा वेशीपर्यंत पोचते न पोचते तोच त्या स्त्रीचा आवाज लोकांना ऐकायला आला. ती म्हणाली, भाऊ, यांच्या करगोट्याला तिजोरीची चावी आहे, ती काढून द्या…

तर, सामान्य मनुष्य असे प्रेम करतो.

आपण आता खऱ्या प्रेमाचे खरे (सत्यकथा) उदाहरण पाहू.

एक मोठे कीर्तनकार होऊन गेले. आयुष्यभर त्यांनी पांडुरंगाची सेवा केली. वयोमानानुसार दोघांनाही वृद्धत्व आले. त्यांच्या शेवटच्या आजारपणात घरातील मंडळींनी असे ठरवले की महाराजांचे काही बरेवाईट झाले तर त्यांच्या पत्नीला लगेच सांगायचे नाही. त्यांना ते सहन होणार नाही….

एके दिवशी महाराजांनी प्राण सोडला. बातमी घरातील कर्त्याला सांगण्यात आली. घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला…. ! पुरेशी काळजी घेऊनही ती बातमी कोणीतरी त्या माउलीला सांगितली. बातमी ऐकताच ती माउली म्हणाली की आगी, महाराज गेले !! मग मी इथे काय करते ? त्या माउलीने त्याक्षणी प्राण सोडला…. !

याला म्हणतात, “संपूर्ण समर्पण, परमप्रेम!!!”

मनुष्याचे खरे प्रेम कोणावर असते ? सांगा पाहू. कोणी म्हणेल, आईवर, कोणी म्हणेल बाबावर, कोणी काही कोणी काही सांगेल. सर्व उत्तरे कदाचित बरोबर असतील पण अचूक असतीलच असे म्हणता येणार नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे, मनुष्य आपल्या देहावर सर्वात जास्त प्रेम करतो. देहाला जरा कष्ट झाले तरी मनुष्याचे चित्त विचलित होतं. मनुष्य 

दिवसभर देहाला सुख कसे लाभेल, यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतो. (यातून त्याला किती सुख मिळते, हा प्रश्न न विचारलेला बरा…)

भगवतांनी एकट्याला करमेना, म्हणून हा पसारा निर्माण केला, पण तो सर्व व्यापून वेगळा राहिला. मनुष्य पण एकट्याला करमत नाही, म्हणून प्रपंच पसारा निर्माण करतो, पण मनुष्य मात्र त्या पसाऱ्यात गुरफटला जातो, इथेच त्याची फसगत होते…, असो.

लौकिक व्यवहारात मनुष्य प्रेम करतो ते वस्तूसापेक्ष किंवा व्यक्तिसापेक्ष असते. पण परमार्थमार्गात प्रगती सुरु झाली की तेच प्रेम ‘योग’ बनते. सर्वत्र एकच भगवंत आहे अशी पक्की खात्री झाली कि द्वैत गळून पडते आणि सद्गुरु आणि मी एकच आहोत, याची अनुभूती येते. हा साधनेतील परमोच्च बिंदू म्हणता येईल.

निःस्वार्थी प्रेमाची अनुभूती देणारी सर्वात पहिली व्यक्ती म्हणजे आपली जननी (आई). आपल्या बाळाचे लिंग, चेहरा, रंग, सौंदर्य काहीही माहित नसताना ती त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. आपले सद्गुरु देखिल आपली जीवापाड काळजी घेतात, आपण प्रपंचात बुडतोय हे बघून त्यांच्याही जीव आपल्यासाठी तिळ तिळ तुटतो. पण जेंव्हा एखादा ब्रम्हानंद बुवासारखा सत्शिष्य भेटतो तेंव्हा सद्गुरुंना प्रसूतीचा आनंद मिळतो, दोघेही प्रेमात न्हाऊन निघतात, दोघेही एका विशिष्ठ सम पातळीवर एकरूप होतात, मग तिथे कोणी गुरू नसतो, कोणी शिष्य नसतो, सर्वत्र प्रेम प्रेम आणि प्रेम भरून राहते.

” तिर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल… “ असा सर्व परिवार ‘विठ्ठल’ झाल्याची अनुभूती तो साधक घेतो.

संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगावर निरतिशय प्रेम होते. ते प्रेम पुढील प्रमाणे व्यक्त करतात. साधकांसाठी हा आदर्श ठरावा.

आवडे हे रूप गोजिरे सगुण

पाहता लोचन सुखावले || धृ. ||

*

आता द्रूष्टी पुढे एसाची तू राहे

जो मी तुज पाहे वेळोवेळा || १ ||

*

लाचावले मन लागलीस गोडी

ते जीव न सोडी ऐसे झाले || २ ||

*

तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी

पुरवावी आळी माय बाप || ३ ||

(अभंग क्रमांक ३१३८, सार्थ तुकाराम गाथा. धार्मिक प्रकाशन संस्था)

देवर्षी नारद महाराज की जय!!!

– लेख दुसरा 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अमृताची तळी राखू या… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ अमृताची तळी राखू या… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

पुढच्या पिढीनं खरा महाराष्ट्र राखला पाहिजे, हे अगदी बरोबर आहे. पण राखण्यासाठी तो आधी जाणून घेतला पाहिजे, त्याला समजून घ्यावं लागेल. तो पर्यटनाच्या आणि मौजमजेच्या पलिकडे जाऊन पहावा लागेल.. !

वेड्या बाभळींमध्ये अडकलेल्या इतिहासाच्या खुणांचे श्वास मोकळे केले पाहिजेत.. गडोगडची दैवतं पाहिली पाहिजेत, पुजली पाहिजेत. तिथं घटकाभर बसून त्या वैभवी काळात डोकावून बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपले उघडे डोळे ४०० वर्षं मागं जाऊन गतकाळ पाहू लागतील.

प्रतापगडावरच्या आईभवानीचा आशीर्वाद घेऊन थोरले राजे अफजलखानाच्या भेटीस उतरले तेव्हां प्रतापगडाच्या दरवाज्यास काय वाटलं असेल, हे आपण विचारलंय का कधी? भर पावसात अंधाऱ्या रात्री ज्या राजदिंडीनं राजे पन्हाळा उतरले, ती पार नामशेष होऊ घातलेली दिंडी पाहिलीय का आपण? कधी विचारलंय का तिचं मनोगत? तान्हाजीरावांच्या समाधीपाशी बसलोय का आपण? थोडीथोडकी नव्हे, जवळपास चार शतकं उन्हातान्हाचे मार झेलत उभ्या असलेल्या बाजींच्या समाधीची वास्तपुस्त केली का आपण? “तुटून पडतां मस्तक खाली धुंद धडाने लढलेले” असं ज्यांचं वर्णन आहे, त्या मुरारबाजींची समाधी पाहिली आहे का आपण?

रायरेश्वरावर शिवरायांनी वाहिलेला बेलभंडारा दिसलाय का आपल्याला? महाबळेश्वर क्षेत्री शिवरायांनी त्यांच्या मातोश्रींची केलेली सुवर्णतुला दिसली का आपल्याला? नागोजी जेध्यांच्या घरी सांत्वनासाठी गेलेले शिवाजीराजे आपण पाहण्याचा प्रयत्न केलाय का? आपले बालपणापासूनचे जिवलग मित्र सूर्याजी काकडे धारातीर्थी पडल्याची बातमी कळल्यानंतर शोकाकुल झालेले राजे आपल्याला दिसले का? 

त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे ही नावं कदाचित कित्येकांना ठाऊकही नसतील. राजे आग्र्याहून निसटले, त्यानंतर फुलादखानाने आग्र्यात जोरदार झाडाझडती सुरु केली. त्यात शिवाजी महाराजांचे हे दोन वकील सापडले. तब्बल नऊ महिने त्यांचा अनन्वित छळ सुरु होता. आपली दोन माणसं हकनाक नरकयातना भोगत आहेत, या जाणिवेनं राजे अस्वस्थ होते. त्यांनी या दोघांच्या सुटकेबाबत औरंगजेबाशी पत्रव्यवहार केला. नऊ महिन्यांनी दोघे सुटले. त्यांना राजगडावर भेटताना राजांच्या मनी कोणते भाव असतील ?

बहिर्जी नाईक असोत, बाळाजी आणि चिमणाजी देशपांडे असोत, कान्होजी जेधे असोत, रामाजी पांगेरा असोत, यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय आपल्या मुलांना व्हायला नको का? महाराजांचे सुवर्ण सिंहासन साकारणारे रामजी दत्तो चित्रे आपल्या मुलांना का ठाऊक नसावेत?

जंजिऱ्याच्या तटाला शिड्या लावून रात्रभर कुमक येण्याची वाट पाहत बसलेल्या लायपाटलाचं कौतुक करणारे शिवाजीराजे, बजाजी नाईक निंबाळकरांची घरवापसी करवून घेणारे शिवाजीराजे, सप्तकोटेश्वराची पुनर्स्थापना करणारे शिवाजीराजे, पाचाड कोटात तक्क्याच्या बावेवर बसून आजुबाजूच्या आयाबहिणींशी सहज गप्पागोष्टी करणारे शिवाजीराजे, स्वतःच्या आईला सती जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे शिवाजीराजे… हे राजे जाणून घेतले तर आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात किती अमूल्य फरक पडेल.. !

आपला इतिहास, आपल्या परंपरा, आपली संस्कृती, आपली विचारधारा जाणून घेणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. मराठी इतिहास इतक्या अतर्क्य आणि विस्मयकारक गोष्टींनी भरलेला आहे की, त्याचा वेध घेताना आपण आजही मंत्रमुग्ध होतो. भल्याभल्यांची मती गुंग होते. पण आपल्या मुलांना ह्या सगळ्याचा परिचय आहे का? आणि तो परिचय असला पाहिजे असं त्यांच्या पालकांना मनापासून वाटतं का?

गावोगावी शालेय मुलांच्या पाठांतराच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. पण त्यात कवी भूषणाचे छंद म्हणून दाखवण्याची स्पर्धा मी पाहिली नाही. शालेय संस्कृत अभ्यासक्रमात सुभाषितमाला असतात. पण त्यात कवींद्र परमानंद गोविंद नेवासकरांच्या शिवभारतातले श्लोक नाहीत. आज्ञापत्र, राज्यव्यवहारकोष यांच्यावर आधारित धडे नाहीत. पोवाडे नाहीत, कवनं नाहीत. परिचय होणार कसा?

संस्कृती आणि इतिहासातल्या उत्तम चंदनी गोष्टी आपल्यापर्यंत आल्या, त्या जतन करण्यासाठी. पुढच्या अनेक पिढ्यांना चांगली प्रेरणा मिळावी, त्यातून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळावी, त्यांच्या जगण्याला सुबक आकार यावा, असा इतिहासाचा सकारात्मक उपयोग आपल्याला करता येणार नाही का? इतिहासातलं विकसन आणि गुणवत्ता उलगडून दाखवता येईल का? त्यातून या सगळ्या परंपरेचे वारशाचे जाणकार आणि जतनकार तयार होतील का? यासाठी आपण सारे प्रयत्न तरी करुया.

ही अमृताची तळी आपल्या महाराष्ट्राला भरभरुन मिळाली आहेत, हे आपलं भाग्य. आता ती तळी अभ्यासपूर्वक राखणं, पुढच्या पिढ्यांना तयार करणं आणि त्यातलं चैतन्य अक्षय्य जपणं ही तर आपलीच जबाबदारी.. !

© श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हम Indian Army है… Tension मत लो !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

हम Indian Army है… Tension मत लो ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ते सैनिक किंवा पोलिस घालतात तशा गणवेशात आले होते… आणि त्यांनी निष्पाप पर्यटकांना ठार मारले… बचावलेले पर्यटक जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागले.. काही वेळाने त्यांच्याजवळ सैनिकी गणवेशात असलेले आणि शस्त्रे असलेले काही लोक पोहोचले… बचावलेल्या लोकांना आपलाही मृत्यू जवळ आल्याचे दिसू लागले… आमच्या माणसांना मारले… आता आम्हांलाही मारून टाका… असं अगदी हताश, असाहाय्य स्वरात त्यातील काही स्त्रिया म्हणू लागल्या… लहान मुलं तर अत्यंत भेदरलेली होती…. आलेल्या सैनिकांमधील एक ज्येष्ठ सैनिकाच्या दोन वाक्यांनी या लोकांच्या जीवात जीव आला…. हम फौज ही… हम Indian Army है… आपकी सुरक्षा के लिये आये हैं… आप Tension मत लो! 

हे शब्द ऐकल्यानंतरही ही माणसं काही क्षण अविश्वासाने नुसती पहात राहिली.. धापा टाकीत, रडत राहिली.. सैनिकांनी या लोकांना पिण्याचे पाणी दिले… लहान मुलांना जवळ घेतले… आणि त्यांच्या भोवती सुरक्षेचे कडे करून ते उभे राहिले… काहीवेळाने त्या सर्वांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्यात आली!

या हल्ल्यात २६ बळी घेतले गेले… आणि सबंध भारतात शोकाचा आगडोंब उसळला… जे अगदी साहजिकच आहे.

भारतीय सैन्याने गेली साडेसात दशके देशाचं tension अंगाखांद्यावर बाळगलेलं आहे… १९६२, १९६५, १९७१, १९९९ ही चार घोषित युद्धं, श्रीलंकेला पाठवली गेलेली शांतिसेना यांतून हजारो सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहेच… पण तितकाच त्याग देशांतर्गत शांतता राखण्यासाठीही केला आहे… हे ध्यानात घ्यावे, असे आहे.

एकट्या काश्मिरात १९४७ पासून २०२५ पर्यंत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हे सैनिक जर आज हयात असते तर आपल्या सीमा आणखीन बळकट झाल्या असत्या… त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सहवासाचा अधिक काळ आनंद घेतला असता! 

काश्मिरात भारतीय सैनिकांविषयी रागाची भावना आहे, त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देतात, अतिरेकी त्यांनाच लक्ष्य करतात आणि संधी मिळताच त्यांना ठार केले जाते…. पर्यटकांना ते काही म्हणजे काहीच करीत नाहीत… खुशाल काश्मीर सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जा…. असाच विचार गेली काही वर्षे केला जात आहे. पहलगाम मध्ये बळी पडलेली ही सव्वीस माणसं आपली.. मग सैनिक कुणाचे आहेत? ते कुणासाठी मरण पत्करताहेत? का ते हातात रायफल असूनही त्यांच्या अंगावर येणा-या स्थानिकांच्या शिव्या खाताहेत.. दगड झेलत आहेत? या याचा विचार भारतीय जनता अगदी अभावाने करताना दिसते!

फारच मोठा हल्ला झाला आणि त्यात जास्त संख्येने सैनिक बळी गेले तरच जनमानसात मोठी खळबळ उडते. एखाद दुसरा बळी गेला की त्याची एक साधी बातमी बनते. मृत सैनिकाचे गाव, त्याचे जवळचे नातलग यांच्या पुरतेच हे दु:ख मर्यादित राहते… अमर रहे म्हणाले की, स्मारक बांधले की कर्तव्य संपले!

एक सैनिक हा हजारो नागरिकांच्या जीवनाचा रक्षक असतो आणि म्हणून त्याचे प्राण महत्वाचे असतात. आणि जेंव्हा त्याचाच बळी जातो तेंव्हा नागरिकांतून शोकासंतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आणि गरजेचे असते. इस्रायल नावाच्या एका छोट्या देशाचे उदाहरण हल्ली सर्वांना ज्ञात आहे.. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला अजून कुणात हिम्मत आलेली दिसत नाही! त्यांनी सव्वीस मारले म्हणून आपण त्यांचे बावन्न मारावेत, असेही नागरिक म्हणतात. या हिशेबाने तर आजवर हा आकडा काही हजारांच्या वर गेला असता! 

काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर आपली सत्ता आहे, तिथे आपली वहिवाट असावी म्हणून तिथे पर्यटकांनी मोठ्या संख्येने जावे म्हणजे तिथली परिस्थिती भारताला अनुकूल होईल.. असाही एक मतप्रवाह आहे… आणि त्याचेच फलित म्हणजे कश्मिरात वर्षागणिक वाढत गेलेली पर्यटकसंख्या आणि अर्थातच त्यांना मिळालेला भरमसाठ पैसा. यातून काही भाग पैसा अतिरेकी कारवायांना जात असणार अशी शंका आहे.

पहलगामच्या हल्ल्यानंतर बहुसंख्य पर्यटक परत निघून आले आणि ज्यांनी आरक्षण केले होते त्यांनी ते रद्द केले. असे होणे ही पहिली प्रतिक्रिया. पण त्यानंतर दुस-याच दिवशी तिथे राहिलेल्या काही पर्यटकांचा एक विडीओ दिसतो त्यात एक महिला म्हणते… छोटी बाते तो होती रहती हैं! 

फेसबुकवरील एका प्रतिक्रियेत एक महिला म्हणते की बळी गेलेला नौदल अधिकारी तर प्रशिक्षित होता.. त्याने प्रतिकार का नाही केला? 

अतिरेक्यांनी हिंदू असेल त्यालाच मारले (आणि त्यांच्या कामात मध्ये आला त्याचा धर्म पाहिला नाही) आणि हे मेलेल्यांच्या आप्तांनी तिथेच लगेच सांगितले आणि ते रेकॉर्ड झाले… हे भारतीयांचे नशीब. अन्यथा असे झालेच नाही असे म्हणायला पाकिस्तानी आणि आपलेही लोक मोकळे झाले असते.

हा हल्ला सत्ताधारी पक्षाने पुढे येणा-या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडवून आणला आहे… असा दावा करणा-या भारतीय लोकांना या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यांनीच बघून घ्यावे… जिवंत माणसांना हे शक्य होणार नाही! 

काहीही झाले तर लष्कराने येऊन लोकांना वाचवावे असे जणू लोकांनी ठरवून ठेवले आहे… पण लष्कराच्या बाजूने कोण कोण उभं आहे… आणि हे उभं राहणं केवळ घोषणा देणं नसतं हे ही लक्षात घ्यावे.

आजचीच बातमी आहे…. बुकींग केलेले वाया जाऊ नये म्हणून अनेक लोक काश्मिरात दाखल झालेले आहेत… आणि स्वर्गाचा आनंद लुटू पहात आहेत! एवढी निर्लज्ज माणसं जगाच्या पाठीवर कुठे नसतील! आणि या तिथे मौजेसाठी गेलेल्या लोकांना लष्कराने संरक्षण द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे.

काश्मीर मध्ये पर्यटन हा एक फार मोठा व्यवसाय आहे… त्यांच्यासाठी पर्यटक देव असतीलही… पण त्यांना कुठलेही देव चालतील.. फक्त यांनी पैसे दिले पाहिजेत. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथे जाणा-या लोकांची मानसिकता अनाकलनीय आहे. असो. यावर कोण काय करणार?

कोणत्याही समाजघटकाला या जगाच्या गदारोळात टिकून राहायचे असेल तर एकी हेच बळ. हे पक्ष्यांना समजते…. आपल्या पक्षांना कधी समजणार?

पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्व पर्यटक परतले असते तर एक मोठा निषेध नोंदवला गेला नसता का? या पर्यटकांच्या परत जाण्याने तेथील व्यावसायिक कायमचे उपाशी मेले नसते! आणि त्यांनी या आधी गेली कित्येक महिने प्रचंड कमावले होतेच की! त्यांनाही थोडी कळ लागू दिली असती तर काय बिघडले असते? क्रियेला काय प्रतिक्रिया येते त्यावर अनेक बाबी अवलंबून असतात!

एक राष्ट्र म्हणून, एक समाज घटक म्हणून आपण एकमुखी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती…. असे जोवर होत नाही तोवर…… पहलगाम सारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत… देशात आहेत… सैनिक त्यांच्या कर्तव्यावर आहेत… ते म्हणत राहतील… हम INDIAN ARMY है…. tension मत लो! आणि आपले लोक त्यांना TENSION देत राहतील!

  

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ घिबलीच्या निमित्ताने… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? इंद्रधनुष्य ?

☆ घिबलीच्या निमित्ताने… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

सोशल मीडियावर निरनिराळ्या तांत्रिक कला-प्रकाराचे ट्रेंड्स येत आहेत. आपला फोटो वेगवेगळ्या आर्ट फॉर्ममध्ये बनवणे हा त्यातलाच ट्रेंड. त्यात घिबली आर्ट हा सध्या लोकप्रिय आहे. त्यामुळे कलेच्या विश्वात कलाकारांचे हक्क, त्यांची होणारी हानी, कलेचे सामान्यीकरण, जगण्यातल्या अनेक जागांचं, भावनांचं सपाटीकरण, तांत्रिकतेमुळे नैसर्गिक कलेचं सामान्यीकरण असे अनेक मुद्दे निर्माण झालेत. त्यावर विस्तृत विचारमंथन होऊन समाजात सजगतादेखील निर्माण व्हायला हवी. पण ही जबाबदारी केवळ कलाकार, तंत्रज्ञ किंवा सर्वसामान्य व्यक्ती यापैकी एकाचीच नसून ती सर्वांचीच आहे.

आपणच आपली कलेकडे बघण्याची दृष्टी, तिचं जगण्यातलं स्थान, ‘स्व’ओळख आणि ‘स्व’प्रतिमेबद्दलचं प्रेम, विवेकशीलता, सामाजिक जाणीव, जगण्यातला अभाव-प्रभाव, आभासी जगताचं आयुष्यातलं स्थान याचा विचार करावा. असे ट्रेंड्स फॉलो करणं का गरजेचंय हे तपासायला हवं. एक व्यक्ती म्हणून वेगळ्यावेगळ्या रूपांमध्ये आपण कसे दिसू ही स्वाभाविक इच्छा तंत्रज्ञानातला ‘त’ आणि कलाकृती मधला ‘क’ माहित नसणाऱ्यांनादेखील सहज पूर्ण करता येते. आणि आपण गम्मत, अपुऱ्या इच्छा, स्वप्नं याची थोडीफार पूर्ती होईल म्हणून सहभाग घेतो. क्षणभंगुर आनंदासाठी आभासी जगात रमून आपली माहिती अज्ञात तंत्रज्ञानाला देताना सावध राहायला हवं. कुठलंही तंत्रज्ञान हे सहजासहजी काहीही फुकट देत नाही. त्यामागे त्याचा छुपा हेतू असतोच. या ट्रेंडमुळे फोटो वापरण्याची एक मुभाच आपल्याही नकळत त्याला दिली आहे. माहितीचा हा प्रचंड साठा गोळा करून याचा वापर केला जाणार निश्चितच मात्र तो कसा हे सांगणं अवघड आहे.

कलाकारांच्या दृष्टीने यात दोन बाजू अशा की कलाकाराला, कलाकृतीला मिळालेली ही एक उत्तम दादही आहे. कदाचित यातून कलाप्रकारांचा तात्काळ प्रसार होऊन सकारात्मकता निर्माण होईल. पण त्यापेक्षाही जास्त धोका म्हणजे ‘नैसर्गिक कलेचं’ तांत्रिक कलेद्वारे अवमूल्यन आणि शोषण होईल, झपाट्याने सामान्यीकरण होईल. कलेचं सार्वत्रिकरण होणं वेगळं आणि सामान्यीकरण होणं वेगळं. नैसर्गिक कलेसाठीच्या आवश्यक सरावाला, सातत्याला आणि मुख्यतः वैचारिक कृतीला जे दुय्यमत्व प्राप्त होईल, ते कालांतराने नैसर्गिक मानवीय क्षमतेलाच अतिशय नुकसानकारक ठरेल. कारण कलेचा पायाच मुळी सर्जनशीलता आहे. आणि तो व्यक्तीचं जगणं, अनुभव, संस्कार (कला व जीवन) या सगळ्याच्या पोषणातून निर्माण होतो. प्रथा-परंपरांचं हस्तांतरण, नीती-मूल्यं, भावभावना प्रकटीकरण, नैसर्गिक अनुबंध इत्यादी जगणं संपन्न करणाऱ्या, व्यक्तिमत्त्व घडवणाऱ्या गोष्टींची पूर्तता जर एका क्लिकवर आणून ठेवली तर आपलं जगणं आपणच संकुचित करत आहोत. अर्थपूर्ण गोष्टी आपणहूनच निरर्थक ठरवत आहोत.

आत्ताचा ‘घिबली’ चा ट्रेंड हे प्रतिरूप आहे. मूळ घिबली आर्टमध्ये फक्त विशिष्ट चित्रशैली अभिप्रेत नसून उत्तम कथन करणारी ‘कंटेंट व्हॅल्यु’ महत्त्वाची आहे. त्यातली हाताने काढलेली चित्रं, उबदार रंगसंगती, सौम्य प्रकाश, पार्श्वभूमीचे बारीकसारीक तपशील, वातावरणातली प्रसन्नता, शिवाय अॅनिमेशन्समधल्या हालचाली, संयत वेग यांचा एकत्रित परिणाम म्हणून हा जपानी कलाप्रकार लोकप्रिय झाला. केवळ चित्रप्रकार म्हणून नव्हे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे कृत्रिमतेचा वापर करूच नये का? तर अतिशय मर्यादित आणि अपरिहार्य ठिकाणीच करावा. आपला आनंद, इच्छा व्यक्त्ततेसाठी नैसर्गिक कलेचा आस्वाद, प्रत्यक्ष अनुभूतीच घ्यायला हवी. पदार्थाच्या फोटोतून जशी भूक भागत नाही तसंच आस्वादक आणि कलाकार म्हणून कृत्रिम साधनांवर कला बहरत नाही जिवंत राहणार नाही. याची जाणीव अधोरेखित करण्याचीच ही वेळ आहे.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ श्रीपरशुरामस्तोत्रम॥ – रचना : श्री वासुदेवानंद सरस्वती  ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आज दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी परशुराम जन्मोत्सव आहे. — त्यानिमित्ताने सादर.) 

|| कराभ्यां परशुं चापं दधानं रेनुकात्मजम ||

|| जामदग्न्यं भजे रामं भार्गवं क्षत्रियान्तकम || १ ||

*
|| नमामि भार्गवं रामं रेणुकाचित्तनंदनम || 

|| मोचिताम्बार्तिमुत्पातनाशनं क्षत्रनाशनं || २ || 

*
|| भयार्तस्वजनत्राणतत्परं धर्मतत्परम || 

|| गतवर्गप्रियं शूरं जमदग्निसुतं मतम || ३ ||

*
|| वशीकृतमहादेवं दृप्तभूपकुलान्तकम || 

|| तेजस्विनं कार्तवीर्यनाशनं भवनाशनम || ४ || 

*
|| परशुं दक्षिणे हस्ते वामे च दधतं धनुः || 

|| रम्यं भृगुकुलोत्तंसं घनश्यामं मनोहरम || ५ || 

*
|| शुद्धं बुद्धं महाप्रज्ञामंडितं रणपण्डितं || 

|| रामं श्रीदत्तकरुणाभाजनं विप्ररंजनं || ६ || 

*
|| मार्गणाशोषिताब्ध्यंशं पावनं चिरजीवनं || 

|| य एतानि जपेद्रामनामानि स कृती भवेत || ७ ||

*
॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचितं श्रीपरशुरामस्तोत्रं संपूर्णम् ॥

☆ ☆ ☆ ☆

☆ श्री परशुराम स्तोत्र : मराठी भावानुवाद  ☆

रेणुका तनय धनुर्धारी हाती परशु धारिला

जामदग्नी भार्गव रामा नमन क्षत्रियसंहारकाला ॥१॥

*
भार्गव रामासी वंदन रेणुकाचित्तनंदना नमन

मातृसंकट विमोचक अद्भुत क्षत्रियांचा विनाशन ॥२॥

*
दक्ष भयभीत स्वजनांस्तव दक्ष धर्मा रक्षित 

प्रिय गतवर्गासी वीर जमदग्नी जिवलग सुत ॥३॥

*
महादेवा केले वश दृप्तभूप कुलाचा नाश

तेजोमय कार्तवीर्य संहारक करी भवभयनाश ॥४॥

*
दक्षिण करात परशु धरिला वाम हस्ते धरी धनू

भृगुकुलवंशज रमणीय मनोहारी घनश्याम तनू ॥५॥

*

शुद्ध बुद्ध महाप्रज्ञावान पण्डित रणधुरंधर

श्रीदत्तकरुणापात्र राम विप्रगणांचे करी रंजन ॥६॥

*
चिरंजीव पावन पंथे शोषितो अंश सागराचा 

जपतो जो राम नामासी प्रसाद तया कार्यसिद्धीचा ॥७॥

*

॥ इति श्री प. प. वासुदेवानंदसरस्वती विरचित निशिकान्त भावानुवादित श्रीपरशुरामस्तोत्र संपूर्ण ॥

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆

श्री संदीप काळे

? इंद्रधनुष्य ?

(फोटो ओळ : ‘संजीवन’ शाळेत अनोखे उपक्रम राबवले जातात. सोबतच्या फोटोमध्ये मुली झाडाला राखी बांधत असल्याचा संग्रहित फोटो. फोटोत शशीताई ठकार, अनघादेवी, प्राचार्य धनंजय शिरूर आदी.)

☆ “जगावेगळी ‘संजीवन’ शाळा” ☆ श्री संदीप काळे ☆

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आय. पी. एस. अधिकारी मनोजकुमार शर्माजी यांची वाट बघत थांबलो होतो. गेटच्या समोर असणाऱ्या गाडीकडे माझी सहज नजर गेली. पाहतो तर काय ? माझ्या समोरच्या गाडीमध्ये सन्माननीय मंत्री महोदय शिवेंद्रराजे भोसले महाराज एकटेच कुणाची तरी वाट पाहत थांबले होते. महाराजांचे लक्ष मोबाईलमध्ये होते. मी जाऊन जोरात ‘नमस्कार महाराज’ म्हणेपर्यंत महाराज मोबाईलमध्येच पाहत होते. आमच्या गप्पा झाल्यावर मी महाराजांना नम्रपणे म्हणालो, ‘महाराज, तुम्हाला व्हॉटसॲप पाहायला वेळ मिळतो का ?’

त्यावर महाराज हसून म्हणाले, ‘नाही, अजिबात नाही. आता एक आमदार माझ्यासोबत येत आहेत. त्यांची वाट बघत थांबलो होतो. व्हॉटसॲपमध्ये काही ग्रूप आहेत, ते मी पाहतो. त्यात मी शिकलेल्या पाचगणीच्या संजीवन शाळेचाही एक ग्रूप आहे, त्या ग्रूपमध्ये गेलो की, शाळेची आठवण येते. नवीन माहिती, फोटो मी पाहत असतो. ‘

महाराज अधिक उत्साहाने मला संजीवन शाळेविषयी सांगत होते, ‘मी ज्या संजीवन शाळेत शिकलो, त्या शाळेच्या खूप आठवणी आहेत. ‘ महाराज एक-एक करून त्या शाळेच्या आठवणी सांगत होते आणि मी ऐकत होतो. महाराजांकडून पाचगणीच्या संजीवन शाळेचे कौतुक सुरू होते. महाराज ज्यांची वाट पाहत थांबले होते, ते आमदार आले आणि महाराज निघून गेले. शर्माजी आले, त्यांची भेट झाली, तेही निघून गेले.

त्या दिवशी विधान भवनामध्ये अनेकांच्या भेटी झाल्या. अनेकांशी बोलणे झाले, पण त्या सर्वांमध्ये बोलण्याची आठवण राहिली ती महाराजांच्या संजीवनी शाळेच्या प्रेमाविषयी.

मी माझ्या नरिमन पॉईंट येथील आंबेसी सेंटर मधील कार्यालयात पोहोचलो. कार्यालयात गेल्यावर पहिल्यांदा पाचगणीची संजीवन शाळा नेमकी आहे तरी कशी, हे गुगलवर सर्च केले. शाळेची माहिती मिळाल्यावर त्याच दिवशी मनोमन ठरवले की, शक्य तितक्या लवकर संजीवन शाळेला भेट देण्यासाठी जायचे.

पुढच्या आठवड्यात त्या शाळेला भेट देण्याचा दिवस उजाडला. पाचगणीमध्ये प्रवेश केल्यावर महाबळेश्वर रोडवर भीमनगरमध्ये संजीवन चौक आहे, तिथेच संजीवन विद्यालय ट्रस्टची संजीवन शाळा आहे. पाचगणी आणि संजीवन शाळेभोवती असणारे नैसर्गिक सौंदर्य जगाच्या पाठीवर फार कमी ठिकाणी असेल.

मी शाळेत पोहोचलो. ‘संजीवन’चे प्राचार्य धनंजय शिरूर सर यांच्याशी माझे आधीच फोनवर बोलणे झाले होते. त्यांना भेटण्यासाठी मी शाळेतल्या शिपायाला निरोप दिला. शिपाई मला म्हणाला, ‘सरांची बैठक सुरू आहे. आपण थोडा वेळ बसा. ‘ मी ‘हो’ म्हणून बाहेर बसलो.

माझ्या लक्षात आले, शिरूर सर यांना वेळ लागणार आहे, म्हणून मी फेरफटका मारावा या उद्देशाने बाहेर पडलो. शाळेच्या परिसरात जे सौंदर्य होते, ते फारच मोहक होते. मला माहित होते की, याच भागात ‘तारे जमींन पर’ हा चित्रपट तयार झाला होता.

एका मोठ्या वडाच्या झाडाखाली, शाळेतल्या काही मुली एका ज्येष्ठ महिलेसोबत कसली तरी तयारी करत होत्या. एक मोठा केक आणला होता. टाळ्यांच्या गजरात तो केक कापला गेला. त्या मुली अगदी भावूक होऊन तो केक त्या महिलेला भरवत होत्या. त्या महिला तिथे असणाऱ्या मुलींना म्हणत होत्या, ‘काय गं, घरी गेल्यावर मला विसरणार तर नाही ना.. ?’ काही बोलण्याच्या आधी त्या मुली भावनिक होऊन त्या महिलेच्या गळ्यात पडल्या. ते सारे भावनिक चित्र मन हेलावून सोडणारे होते.

माझ्या बाजूला बसून संगणक गेम खेळणाऱ्या मुलाला मी विचारले, ‘या महिला कोण आहेत?’ 

त्यावर तो मुलगा म्हणाला, ‘त्या आमच्या शशी मॅम आहेत. ‘ 

मी पुन्हा त्यांना विचारले, ‘तुमच्या शिक्षिका आहेत काय ?’

त्याने कपाळावर हात मारत मला सांगितले, ‘अहो, या शाळेच्या प्रमुख आहेत. ‘

मी म्हणालो, ‘अरे, मला नव्हते माहीत. ‘ 

मी त्यांच्या जवळ जाऊन माझा परिचय देत त्यांना वाकून नमस्कार केला. आमचे बोलणे सुरू झाले आणि गप्पांमधून त्या मॅमनी त्या शाळेविषयी मला जे काही सांगितले, त्यातून मी अवाक् तर झालोच, शिवाय शशी मॅमची शाळा अवघ्या ‘जगात’ वेगळी कशी आहे हेही मी पाहिले. जे मंत्री महोदयांनी मला विधान भवनाच्या गेटवर सांगितले होते, ते माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर होते.

मूळचे बडोदा येथील असणारे कृष्णराव पंडित आणि रावसाहेब पंडित या दोघांनी १९२२ ला भारतीय संस्कृती जपणारी शाळा उभी करायची, असे स्वप्न पाहिले होते. पाचगणी आणि परिसरात ख्रिश्चन धर्माशी निगडित अनेक शाळा सुरू झाल्या होत्या. हिंदू संस्कृती प्रामुख्याने जपली जावी, खेळाला प्राधान्य देऊन प्रशासकीय सेवेतील अधिकारी घडावेत, या हेतूने संजीवन संस्थेची निर्मिती झाली.

पाच विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली शाळा आज शशी मॅम ज्या मुलींना निरोप देत होत्या, त्या मुली पन्नास हजारावा आकडा पार करीत होत्या. प्रगतीचे हे शिखर गाठत असताना या संस्थेने मागे वळून कधी पाहिलेच नाही.

प्राचार्य धनंजय शिरूर सर (7798881662) हे संजीवनचे ११ वे प्राचार्य आहेत. शिरूर सर आधीपासून याच संजीवन शाळेत शिक्षक होते. मग ते व्यवस्थापनाच्या भूमिकेत आले, आणि नंतर प्राचार्य झाले. २००३पासून आजपर्यंत शिरूर सर यांनी शाळेसाठी दिलेले योगदान खूप मोठे आहे.

मी शशीताई यांच्याकडून जे काही शाळेविषयी ऐकत होतो, ते सारे काही अद्भुत असेच होते. पण मी जेव्हा शशीताईकडून शाळेशी संबंधित असलेला विषय ऐकला, तेव्हा मी शशीताई यांच्यापुढे अधिकच नतमस्तक झालो.

शशीताई ठकार शिक्षणासाठी ८वीला असताना ग्वालियरमधून पाचगणीला आल्या. सर्व विषयांत त्या अतिशय हुशार. राज्य आणि देशपातळीवर त्यांनी खेळात शाळेचे नाव केले. एखाद्या तरुणाच्या प्रेमात पडायच्या वयात शशीताई संजीवन शाळेच्या प्रेमात पडल्या. शशीताई संजीवनमध्ये शिक्षक झाल्या, प्राचार्य झाल्या, संचालक झाल्या आणि आता त्या शाळेच्या चेअरमन आहेत. वय वर्ष ९३च्या शशीताई आजही या वयात शाळेसाठी सर्व कामे अगदी नेटाने करतात. संजीवन शाळा, कॉलेजचे रूपांतर स्किल आणि स्पोर्ट विद्यापीठात करायचे खूप मोठे स्वप्न शशीताईंनी उराशी बाळगले आहे.

शशीताई यांनी ना लग्न केले, ना कुणासोबत संसार, ना कुण्या नातेवाईकांसोबत नाते ठेवले. शाळा हेच त्यांच्यासाठी ‘जग’ ठरले आणि त्या शाळेला जागतिक असा अमूल्य दागिना बनवण्याचे काम शशीताईनी केले. शाळेच्या भिंती आणि मोठे मस्टर लिहिण्यासाठी कमी पडतील इतके मोठे विद्यार्थी घडवण्याचे काम झाले आहे. फोर्स मोटर्सचे सीईओ प्रसन्न फिरोदिया, संगीतकार ललित पंडित, मृण्मयी लागू, अमित देशमुख, रीतेश देशमुख, विद्यमान मंत्री शिवेंद्रराजे भोसले महाराज अशी कितीतरी नावे घेता येतील. किती आयपीएस झाले, किती आयएएस झाले, किती वैज्ञानिक झाले, कित्येकांनी मोठ्या पदांवर जात सामाजिक कीर्ती मिळवली, याचा आकडा फार मोठा होता. ही शाळा नाही तर उज्ज्वल इतिहास घडवणारे चालते बोलते विद्यापीठ आहे.

मी शशीताईंना विचारले, ‘जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते?’ 

शशीताई शांतपणे म्हणाल्या, ‘मी आयुष्यभर पिढ्या घडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. अजून पुढे करतच राहणार. ‘ थोड्या काळजीच्या स्वरात ताई म्हणाल्या, ‘कोविडमुळे आम्ही खूप अडचणीत सापडलो. आमच्या शाळेविषयी शासन स्तरावर सतत अनास्था असते. पूर्वी मदत करणारी माणसे खूप होती, पण आता फारसे लोक पुढे येत नाहीत. त्यामुळे हा एवढा मोठा जगन्नाथाचा रथ ओढायचा कसा, हा प्रश्न आहे. ‘

आमचे बोलणे चालू होते, तेव्हढ्यात मला शोधत प्राचार्य शिरूर सर तिथे आले. शशीताई म्हणाल्या, ‘तुम्ही संपूर्ण शाळा फिरून या. मी तुमची घरी वाट पहाते. ‘ ताई निघाल्या. रस्त्याने जाताना प्रत्येक मुलगा ताईला जणू त्या त्यांच्या आईच आहेत, असेच बोलत होत्या.

मी शिरूर सर यांना म्हणालो, ‘या वयात काय उत्साह! काय काम करण्याची ताकद! बापरे! किती कमाल आहे! ‘

शिरूर सर म्हणाले, ‘ताई म्हणजे अजब आणि अद्भुत रसायन आहेत. वय वर्ष ४० असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची त्यांना नावे तोंडपाठ आहेत. शिरूर सर जे जे बोलत होते, ते सारेच कमालीचे होते. शिरूर सरांनी मला त्या शाळेत जे जे दाखवले ते सारे शिक्षण आणि सामाजिकता दृढ करणारे होते. सर्व प्रकारचे खेळ, संगीत, चित्रकला, सर्व प्रकारच्या अकादमींची पूर्व तयारी, या सर्व क्षेत्रांत जागतिक पातळीपर्यंत सहभागी झालेली मुले तिथे होती. पहिली ते बारावीपर्यंत कुणालाच नव्वद टक्केच्या खाली मार्क्स वाले कुणी आहेत का ? नाही, असा प्रश्न मला त्या शाळेच्या यशाचा आलेख पाहून बघायला मिळत होता. स्कीलिंगवर संस्थेचा खूप भर होता. केवळ नोकरी नाही तर स्कीलिंगच्या माध्यमातून मुले उभी राहिली पाहिजे, स्वत:चा व्यवसाय त्यांनी सुरू केला पाहिजे, यासाठी वीसपेक्षा जास्त स्कीलिंगचे कोर्स येथे चालवले जातात.

शिरूर सर म्हणाले, ‘संस्थेने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले आहेत. आसपासच्या सर्व गावांत मोबाईल वाचनालय सुरू केले आहेत. पाच हजारांहून अधिक महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रशिक्षण दिले आहे. अनेक भागांतून गरिबांची मुले शासनाच्या माध्यमातून येथे मोफत शिकण्यासाठी येतात. ही शाळा म्हणजे दुसरं घर आहे. शैक्षणिक जडणघडणी सोबत मानसिक आधार, जीवनाची पायाभरणी हे इथले वैशिष्ट्य आहे.

मुलांकडून इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर टाळणे, सतत फास्ट फूड खाणे टाळणे, बेशिस्तपणा दूर करणे, आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन थांबवणे. आमच्या शाळेत या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात. म्हणून भारत भरातून आमच्याकडे प्रवेश असतात. आमच्याकडच्या माजी विद्यार्थांनी अनेक गरीब विद्यार्थी येथे घडावेत यासाठी त्यांच्याकडून शिष्यवृत्ती देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यातून अनेक विद्यार्थी शिकतात. ‘

शिरूर सर जे जे सांगत होते त्याचा डेमोही दाखवत होते. एकीकडे आमचे बोलणे सुरू होते, तर दुसरीकडे वाटेत भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला शिरूर सर काहीतरी सांगत होते. कुणी पोहत होते, कुणी क्रिकेट खेळत होते, तर कुणी अनेक वैज्ञानिक प्रयोग करीत होते. जसे ‘तारे जमींन पर’, ‘थ्री इडियट’ या चित्रपटांत लहान मुले जे जे प्रयोग करीत होते, ते ते सारे प्रयोग या ‘जगा’वेगळ्या संजीवन शाळेत मी माझ्या डोळ्याने पाहत होतो.

खेळाच्या एका शिक्षकाची ओळख करून देताना शिरूर सर म्हणाले, “हे सचिन कांबळे सर, सर्व देशी, विदेशी खेळात विशेषतः क्रिकेट आणि फुटबॉलमध्ये यांनी संजीवन शाळेचे नाव सातासमुद्रापार नेले आहे”.

हसतमुख, अत्यंत उत्साही कांबळे सर यांच्याशी खेळाचे सारे यश समजून घेताना कधी वेळ गेला ते कळलेच नाही. आख्खा दिवस त्या शाळेत गेला.

मला निघायचे होते. आम्ही शशीताईंकडे गेलो. त्यांनी त्यांच्या हाताने बनवलेले जेवण वाढले होते. जेवल्यावर त्यांनी स्वतः तयार केलेले ग्रीटिंग मला दिले. त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या कन्या, संस्थेच्या संचालक अनघा देवी (9049919912) यांची मला त्यांनी ओळख करून दिली. तेव्हढ्या मोठाल्या पायऱ्या उतरून ताई मला निरोप देण्यासाठी खाली आल्या. ताईंच्या पायावर डोके ठेवून मी गाडीत बसलो.

आपल्या राज्यात शाळा या विषयाला घेऊन असाही प्रयोग होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसत नव्हता. गाडी बरीच पुढे गेल्यावर मी मागे नजर टाकली. शशीताईंचा हात अनघादेवी ताईंच्या हातात होता. अनघादेवी ताईंच्या मागे प्राचार्य शिरूर सर जात होते, आणि शिरूर सरांच्या मागे सचिन कांबळे सर होते. शशी ताईने पुढे शाळेचा कारभार सुवर्ण अक्षराने लिहिण्यासाठी कार्यक्षम माणसे तयार केली होती. शाळेच्या भविष्याला पुढे नेणारी दुसरी पिढी शशी ताईंनी तयार केली होती.

मला या शाळेला भेट देऊन आल्यावर अवघे ‘जग’ फिरून आलो असे वाटत होते. आज याच ‘जगात’ वेगळ्या असणाऱ्या ‘संजीवन’ आणि तुमच्या आसपास असणाऱ्या त्या प्रत्येक चांगल्या शाळेला तुमची गरज आहे, ती तुमच्या आमच्या मदतीची. या शाळा टिकल्या तर आमची संस्कृती, आमचा भारत देश टिकेल ? बरोबर ना. करणार मग अशा शाळेला मदत ? नक्कीकरा. 

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —

Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.

सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.

एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.

सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.

ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही! 

मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.

Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.

आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.

अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.

ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.

पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.

पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.

तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.

आयुष्य त्याचे सोपे नव्हते.

घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.

आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.

त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.

त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण 

पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.

सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.

या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.

“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.

हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही 

पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.

आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात? 

माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.

गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.

माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..

आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार! 

वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..

आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.

— समाप्त —

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

अथातो भक्तिं व्याख्यास्यामः

साधन चतुष्ट्य 

भक्त म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो. भक्त होण्यासाठी काय पात्रता लागते, तर असे अमुक अमुक सांगता येणं अवघड आहे. पण भक्ताने कसे असावे, किंवा आदर्श भक्त कसा असतो ते सांगता येईल….. ! उत्तम भक्ताची लक्षणे अनेक ग्रंथात आलेली आढळतील.

जेव्हा आपण भक्ति चा शास्त्र म्हणून अभ्यास करतो, तेव्हा त्याला काही सूत्रे जोडावी लागतात, पटतंय ना ?

त्यातील प्रमुख चार सूत्रे खालील प्रमाणे आहेत.

१. नित्यानित्यविवेक म्हणजे जगात नित्य म्हणजे शाश्वत काय आहे आणि अनित्य म्हणजे अशाश्वत काय आहे हे जाणणे.

२. नित्य आणि अनित्य जाणल्यानंतर त्यांचा यथासंभव त्याग करणे.

३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे.

४. मुमुक्षता

कोणत्याही शास्त्राची, विषयाची पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी किमान पात्रता असणे अनिवार्य ठरते. एखाद्याला वैद्यकीय पदवी घ्यायची असेल तर बारावीला नुसते उत्तीर्ण होऊन चालत नाही तर सर्वोत्तम गुण असावे लागतात. त्या अनुषंगाने भक्तिशास्त्र शिकण्यासाठी, भक्तीचा लाभ होण्यासाठी आंतरिक व्याकुळता खूप महत्वाची ठरते. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, त्याप्रमाणे मनात जोपर्यंत वासनेचा जोर आहे तो पर्यंत भक्तीचा उगम होणे कठीण आहे. परंतु मनुष्याचे सुकृत उदयास आले आणि त्याचवेळी सद्गुरूकृपा झाली तर मात्र भक्ति देवता त्याच्यावर कृपा करते असे सर्व संत सांगतात. याच सूत्रानुसार ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन चतुष्ट अत्यावश्यक सांगितले गेले आहे.

आपण एकेक मुद्दा पाहू.

१. नित्य आणि अनित्य :~ मी नसताना भगवंत होता, मी असताना भगवंत आहे आणि उद्या कदाचित मी नसेल तेव्हाही भगवंत असेल…, अर्थात तो नित्य आहे. तसेच मी अनित्य आहे, या नश्वर जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य अर्थात कधीतरी नष्ट होणारी आहे. माउली म्हणतात,

“उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥”

 (ज्ञानेश्वरी २. १५९)

२. ईश्वर सर्व चराचरात भरून राहिला असल्याने तो माझ्यामध्ये ही आहे. त्याला ओळखणे म्हणजेच भगवंताची ओळख करून घेणे असल्याने, येथील अनित्य गोष्टीत न रमता त्यांचा त्याग करायला शिकणे.

३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे. हे सहा गुण आहेत. प्रत्येक साधकाने नव्हे तर प्रत्येक मनुष्याने त्याचा अंगिकार करायला हवा.

शम.

म्हणजे मनाचा निग्रह, अर्थात स्वतःच्या बाबतीत कठोर आणि दुसऱ्याच्या बाबतीत मृदु. सामान्य मनुष्य नेहमी याच्या उलट करीत असतो.

दम.

इंद्रियांचा निग्रह. एखाद्याने शुभ्र पांढरा कपडा परिधान केलेला असेल तर मनुष्य त्या कपड्याकडे न पाहता त्यावर कुठे एखादा डाग दिसतो का ते पाहतो… , त्याची नजर चांगल्या गोष्टींकडे न जाता, वाईट गोष्टीकडे जाते. इथे इंद्रियांचा निग्रह महत्त्वाचा ठरतो.

श्रद्धा

सद्गुरूंवर, त्यांच्या वचनावर दृढ श्रद्धा. आईने घास भरवायला तोंडाशी आणला की बाळ अगदी सहज तोंड उघडते, त्याची त्याच्या आईवर आत्यंतिक श्रद्धा असते. त्याच्या मनात असे कधीही येत नाही की आई या घासात मला विष घालेल…. ! अशी श्रद्धा असलेला कल्याण नावाचा शिष्य समर्थांनी कल्याणा, माझी छाटी… असे म्हटले की क्षणाचाही विलंब न करता थेट कड्यावरून उडी मारतो…

उपरम

सर्व कर्माचा त्याग करणे, अर्थात इथे मनाने त्याग अभिप्रेत आहे. कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही….

तितिक्षा

मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग येत जात असतात. सुख आले की मनुष्य खुश असतो पण दुःख येऊच नये असे त्याला वाटत असते. जो मनुष्य सुखदुःखात समतोल रहातो, तोच खरा अधिकारी ठरतो. त्याची कसलीच तक्रार नसते. “तू ठेवशील तसा राहीन….. !” इतकेच त्याला कळते…

समाधान 

मनुष्य अनेक इच्छा मनात धरून असतो. कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात. समाधानी व्हायचे असेल तर पुढील सूत्र उपयोगी पडू शकेल.

इच्छा पूर्ण झाली तर देवाची कृपा समजावी आणि इच्छा अपूर्ण राहिली तर देवाची इच्छा समजावी. आपण आनंदात असावे.

४. मुमुक्षता

 जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे हे प्रत्येक मानव देह प्राप्त केलेल्या जीवाचे आद्य कर्तव्य आहे. हे मनुष्याचे प्रमुख दीर्घकालीन ध्येय असले पाहिजे. त्यासाठी अन्य छोटी छोटी ध्येय जरूर असावीत, पण त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन ध्येयाकडे डोळेझाक होऊ देऊ नये.

देवर्षी नारद महाराज की जय!!

– क्रमशः सूत्र १ / २ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.) इथून पुढे — 

आता ज्यांच्या घरात शक्यतो दुसऱ्यांबद्दल निदान उघड वाईट बोलायचे संस्कार नव्हते त्या घरातील मुले असे गॉसिपिंग करत असतील तिथे आजची परिस्थिती पहा.

इथे ट्रोलिंग च्या नावाखाली कोणालाही जे काही बोलतात, especially राजकीय नेते, त्यांचे कुटुंब, अभिनेते, अनंत अंबानीला सुद्धा.. काहीही संबंध नसताना. त्यांचाच जियो वापरून शिव्या देतात, रेवडी उडवतात…

अशा काळात आपली मुले मोठी होतायत, आपले निरीक्षण करत आहेत, ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या पुढे आपले स्थान कस्पटासमान आहे अशांना सुद्धा अर्वाच्च भाषेत बोलताना रोज पाहत आहेत आणि हेच बाळकडू पुढच्या पिढीला पोचत आहे असेही वाटले.

आपण उत्तम आईवडील आहोत असे समजणारे, कुणाचा पुरुषार्थ काढतात, कुणाला टरबूज म्हणतात, xxxxx, व्येश्या म्हणतात. त्या प्रतिक्रिया सहज, अगदी उत्स्फूर्त असतात. असे ट्रोल करणे आपल्याहून लहान मुले बघत असतात.

ते तरी आईबाबांना कुठे ट्रोल करतात, ते ही दुसऱ्यांना करतात.

ट्रोल करणे सहज असते, मजा असते, धमाल असते हे पाहताना, ट्रोल स्वतः झालो तरी ती मजा म्हणून घ्यायची एवढे मात्र ते शिकू शकत नाहीत. लहान असतात आणि त्यामुळे अपघात होतात. कुणाला मारले जाते, कुणी आत्महत्या करतात.. कुणी नैराश्यात जातात, व्यसनात जातात..

आता यावर काय उपाय आहे तर निदान आपण आपल्यापुरते सभ्य वागणे, ते शक्य नसेल तर हे जंगल आहे आणि त्या जंगलात वावरायला शिकले पाहिजे हे लहान मुलांना शिकवणे.

ह्यात अस्वस्थ होत असाल तर सगळ्यांनीच आरशासमोर उभं राहायची गरज आहे.

अपेक्षांचे ओझे आणि नकार या चक्रात अडकलेली आणि बहकलेली पिढी प्रत्येक काळात होती आणि बहकण्याचे मार्ग सुद्धा आधीच्या पिढीसाठी न समजणारे होते. आपले कुठे चुकले हे विचार करणारी पिढीही प्रत्येक काळात होती. कदाचित कुटुंब मोठे होते म्हणून असेल, एवढ्या मोठ्या कुटुंबात वाट चुकलेले एखादे मूल तसेच सामावले गेले. त्याचा फार गाजावाजा झाला नाही.

आता लहान कुटुंबात, यश आणि अपयश magnifying glass मधून बघण्याची सवय झाली आहे. साधे KG पास होणे टोप्या उडवून साजरे केलं जाते, तशाच चुका सुद्धा तेवढ्याच वाईट पद्धतीने मांडल्या जातात.

आपण यशस्वी आहोत हे सिद्ध करण्याचे फार कमी मार्ग माझ्या आधीच्या पिढीकडे होते.

शिक्षण, चांगली नोकरी, घर, जमले तर गाडी, बायकोच्या अंगावरील ठळक दागिने आणि स्वतःचा संसार करण्यास योग्य ठरलेली मुले.. बस.

हे झाले की बहुतांशी लोक समाधानात जगायची. निदान आयुष्याचा स्विकार असायचा. आता ह्या गोष्टी असायलाच हव्या, granted धरल्या जातात. अर्थात ह्या गोष्टी काही जन्माबरोबर येत नाहीत ना! त्यासाठी वेळ, मेहनत आणि “बांधिलकी” अपेक्षित असते.

प्रचंड स्पर्धा, मोठी महत्त्वाकांक्षा, मोठी स्वप्ने यामुळे मेहनत प्रचंड लागते, वेळ कमी पडतो, कुटुंबासाठी द्यायचा वेळ जो पूर्वी असायचा तो काढणे खरच कठीण झाला आहे. म्हणून असेल, “बांधिलकी outsource करण्याचे प्रमाण वाढले आहे. ”

साधेच बघा, पैसे मोजून आवडीने घेतलेल्या घरात. इंटेरियर करायला आर्किटेक्ट असतो, अनेकवेळा तुमच्या घरावर तुमच्या आवडीची खूण नसतेच…ट्रेंड जसा तसे घर असते. घरात घालवायचा वेळ सुद्धा अत्यंत कमी झाल्याने ते मेन्टेन करण्यासाठी सुद्धा नेमलेला स्टाफ असतो. आपल्या घराला कधीतरी प्रेमाने आपला स्पर्श होतो? त्यात सुट्टी पडली की एवढ्या लाडा कौतुकाने सजवलेले घर सोडून आपण out station जातो.

तक्रार नाही ही. हे घरा घरातील वास्तव आहे. घर तरी मानले तर व्यक्ती.. नाहीतर दगडाच्या भिंती.

मुलांची गोष्टच वेगळी असते. अगदी आवर्जून जन्माला घातलेले बाळ किती वर्ष बिलगुन असते! 

स्पर्धेला प्राधान्य देणारे हे जग आहे. दोन वर्षापासून त्याला सगळ्या विषयात प्रवीण करायला शिक्षक असतात, सांभाळायला आया असतात.

त्याचे जीन्स पिढीजात आले असतील पण विचार, आचार, सवयी ह्या नक्की कोणाच्या असतात? 

ऑफिस, करिअर आणि मिळाला वेळ तर सोशल लाईफ ह्यात मूल पालकांकडून काही उचलेल अशी संस्कार घडवणारी सोबत मिळते का मुलांना ? 

मौज मजा, लाड आणि अभ्यास सोडून म्हणते आहे मी. संस्कार म्हणजे पालकांच्या वर्तनाचा मुलावर उमटणारा ठसा.

दैनंदिन आचरण, यात पालकांचे आईवडिलांशी, भावंडांशी असलेले संबंध, मित्रांबरोबर असताना वर्तन, घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर असलेले वागणे, पार्टनर बरोबर असलेला बंध, सोशल मीडियावर असलेले तुमचे वर्तन, ह्या सर्व गोष्टी मूल indirectly न्याहाळत असतात. ते बघून मूल आपोआप घडत जाते. आपण नाही का म्हणत, अरे हा बाबासारखा नम्र आहे, आईसारखा हुशार आहे, आजोबांसारखा लाघवी आहे..

केवळ पेशी व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत. उदा. हुशारी आनुवंशिक असेल पण मेहेनत करणे हे मुलानी शिकण्यासाठी समोर उदाहरण असावे लागते. मूल घडवण्याचा पाया त्याचे घर असते.

तो बंध जर निर्माण झाला नसेल तर अचानक काही वर्षांनी लक्षात येते की अरे हे एवढे वेगळे का वागते, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी निवडी, त्याची स्वप्ने, त्याची व्यसने.. ह्यात कुठेच आमचा प्रभाव का नाही ? 

कारण ते पालकांबरोबर खऱ्या अर्थाने वाढतच नाही. एकाच घरी राहणे हे पुरेसे नसते त्यासाठी. मूल तुमचे उरतच नाही. उरतात ती त्यांनी केलेली कर्मे आणि ती निस्तारण्याची, कायद्यानं पालकांवर टाकलेली जबाबदारी.

ती आऊटसोर्स करता येत नाही. चुकून जर काही भलते झाले तर पालक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर येतेच.

ती टाळू शकत नाही म्हणून पालक जास्त खचत जातात. आपण अयशस्वी आहोत हा अपमान जास्त त्रास देतो.

मुलं वाढवणे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला समाजात वावरायला मदत करणे ही स्वतःहून स्विकारलेली गोष्ट असते. ती गृहित धरलेली कमिटमेंट असते. ती outsource पैशाने होऊ शकत नाही.

कितीही आदर्श वागायचा प्रयत्न केला म्हणून दगडातून मूर्ती घडतेच असे मला म्हणायचे नाही. काही केसेस आपल्या हाताच्या बाहेर असतात पण निदान वाट चुकलेल्या बोटीला आसरा मिळायला बंदर आहे एवढा विश्वास देण्याचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. गरज पडली तर त्याचे आयुष्य सावरण्यासाठी आयुष्याच्या स्वप्नाची सुद्धा तडजोड करण्याचा निर्धार हवा.

लहान मुलांचे जग छोटे असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी काय आहोत त्याही पेक्षा काय नाही आहोत ते त्यांना लगेच समजते. मूल एकदा घरापासून, मनातून तुटले की ती भेग सांधली जात नाही.

आईवडिलांचा अपमान करणे, त्यांना न भेटणे, त्यांच्याशी तुटक वागणे हे सौम्य प्रकार. मुलगा सुज्ञ असेल तर तो स्वतःचा विकास घडवून आईवडिलांवर बहिष्कार टाकतो, नसेल तर गरज असलेल्या सोबतीच्या शोधात मूल असे हरवले जाते.

Adolescence मध्ये हे वरकरणी दिसत नाही पण अशाही केसेस दिसतात. कुणाबरोबर पळून जाणे, ड्रग्स, व्यसने …आजूबाजूला माणसे असूनही मनात भरून उरलेला एकाकीपणा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे.

पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.

– क्रमशः भाग दुसरा  

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares