दोन दिवसांपासून वातावरणात हलका बदल व्हायला सुरवात झालीयं. ही शिशिराची चाहूल . हे बदलते ऋतू आणतात आयुष्यात वैविध्य, रंगत आणि शिकवितात एक मोलाचा संदेश. आयुष्यात दिवस हे देखील ऋतुंप्रमाणे बदलत असतात. त्यामुळे कुठल्याही चांगल्या स्थितीत हुरळून जायचं नाही आणि कुठल्याही वाईट स्थितीत डगमगायचं नाही, कारण दिवस हे ऋतुंप्रमाणे बदलत असतात.
दिनदर्शिकेप्रमाणे मार्गशीर्ष आणि पौष ह्या मराठी महिन्यात शिशिर ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी ह्या इंग्रजी महिन्यात शिशिर ऋतू असतो.
शिशिर ऋतूमध्ये झाडांची पाने पिवळी पडतात व गळतात. त्यानंतर त्या झाडांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात होते. या ऋतूत काही प्रमाणात गारवा व थंडी असते आणि काही प्रमाणात उन्हाळ्याची चाहूल देखील एकीकडे येणे सुरू होते. या ऋतूत फळे व फुले बहरलेली असतात .
या काळात उत्तरेकडून थंड वारे वाहत असतात. उन्हाळा सुरू झाला की पहिले दोन चार दिवस ती पानगळ,पिकली पानं गळतांना बघून मन हुरहुरतं,उदास होतं पण हे तर निसर्गचक्र. परत नवीन पालवी फुटतांना बघितली की परत मन हरखतं,प्रफुल्लित होतं.सगळे आपले मनाचे खेळ. आंब्याचा मोहोर,डवरलेला गुलमोहर आणि फुललेला पळस बघणं म्हणजे डोळ्यांचं पारणं फेडणारं सुख,आनंद.तो पळस आणि गुलमोहर डोळ्यात किती साठवून ठेवू असं होतं खरं.
ह्या शिशिराची आठवण होतांना हमखास आठवण होते वा.रा.कांत ह्यांच्या “शिशीरऋतूचे गान ” ह्या कवितेची.त्या कवितेतील शेवटचे कडवे आणि त्याचे माझ्या शब्दांत रसग्रहण पुढीलप्रमाणे
हलके हलके हसते,गळते तरुचे पान न पान
पानझडीत या ऐकुन घ्या गं शिशीर ऋतुचे गान
फुले जळाली, पाने गळली,
फळांत जरी रसधार गोठली,
सर्व स्रुष्टी जरी हिमे करपली,
पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान
पानझडीत ह्या ऐकून घ्या गं शाशीरऋतुचे गान
खरंच हा ऋतु साक्षात वृक्षांच्या उदाहरणावरुन आपल्याला शिकवून जातो.अगदी हलके हलके सहजतेने वृक्षाची पानगळ झाली, फुलं जळाली, अगदी परिसीमा म्हणजे अवघी स्रुष्टी जरी हिमे करपली. तरी आपलं मनं मात्र कायम आशावादी सकारात्मक ठेवा कारण येणारा उद्या कायम आपल्यासाठी वसंत ऋतू म्हणजे भरभराट घेऊन येणारच आहे.त्यामुळे खचून न जाता उद्याची वाट बघत आशावादी सकारात्मक हसतमुख रहा. आपल्यातील कित्येक आदर्श पिकली पानं जरी गळून पडली तरी त्यांचा आदर्श आपल्याला कायम शिकवण देत राहील
त्यांच्या आठवणी,आदर्शवाद आपल्याकडे असलेला अनमोल ठेवा असेल,तो कायम स्मरणात ठेवा आणि आचरणात आणा.
☆ अप्पर हाफ – लेखक – श्री रविकिरण संत ☆ संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर ☆
मी नुकताच NTC च्या एका काॅटन मिलमधे ‘सुपरवायझर’ ह्या पोझीशनवर लागलो होतो. गेटच्या आत कंपाऊंडमधे एका व्यक्तीचा अर्धपुतळा लावलेला होता.
खूप दिवसांनी मिलमधे माझ्यासारखा पंचविशीतला इंजिनीअर आला असावा. कारण बहूतेक जण अर्ध्या वयाचे दिसत होते. पहिल्याच दिवशी लंच अवरला मला तेथील सिनीअर्स कडून असे सांगण्यात आले की कामाचे टेन्शन घ्यायचे नाही. ही सरकारी कापड गिरणी आहे. इथे वेळेवर येवून पोहचणे हेच मुख्य काम. ‘ब्राइट करियर’ वगैरे गोड कल्पना तुझ्या डोक्यात असतील तर ही मिल तुझ्यासाठी नाही. आम्ही इथे जेवण झाल्यावर रोज तासभर डोळे मिटून आराम करतो.
मग त्यातील एक सिनीअर उत्साहाने सांगू लागले, ” तो गेट जवळचा पुतळा पाहिलास ना, ते काशीराम बंकाजी आहेत. त्यांचा मृत्यू १९४८ साली वयाच्या ५९ व्या वर्षी झाला. त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला आम्ही कामगारांनी पैसे गोळा करून सुप्रसिद्ध शिल्पकार व्ही.पी.करमरकर यांच्याकडून त्यांचा अर्धपुतळा त्यावेळी चाळीस हजार रुपयात बनवून घेतला आणि समारंभपूर्वक तो सिनेकलाकार अशोककुमार यांच्या हस्ते स्थापन केला.”
” पुतळ्यासाठी कामगारांनी पैसे ऊभे केले म्हणता, म्हणजे कामगारांसाठी त्यांनी खूप काही केले असणार!” मी म्हणालो.
” खूपच केले. माझे वय आज ५७ आहे. मी १९४१ साली मॅट्रिक होवून वयाच्या १८ व्या वर्षी इथे सुपरवायझर पोस्टवर नोकरीला लागलो. त्यावेळी ही कंपनी ‘बंका काॅटन मिल्स’ या नावाने प्रसिद्ध होती. मिलमधे २१०० कामगार होते. मालक काशीराम बंका ‘काॅटन किंग’ म्हणून हिंदुस्थानात प्रसिद्धी पावले होते.”
” सन १९०० च्या पहिल्या दशकात राजस्थानातून मुंबईत आले तेव्हा बंकाजी फक्त १६ वर्षांचे होते. ते अतिशय मेहनती, हुशार आणि मुत्सद्दी होते. त्यावेळी सर्व महत्वाचे व्यवसाय ब्रिटीश कंपन्यांच्या हातात होते. बंकाजींनी मुंबईत काॅटन ट्रेडिंगचा व्यवसाय सूरू केला. पुढच्या पाच वर्षांत त्यांच्या ‘काशीराम बंका काॅटन ट्रेडर्स’ कंपनीला ब्रिटीश सरकारच्या काॅटन काॅन्ट्रॅक्ट बोर्डाची मेंबरशीप मिळाली जो बोर्ड पुढे East India cotton association चा मेंबर झाला.”
” बंकाजी एवढ्यावर थांबले नाहीत. ते भपकेबाज रोल्स राॅइस गाडी वापरीत. पुढे ते Indian merchant’s chamber चे अध्यक्ष झाले. १९३५ साली त्यांना New York cotton exchange ची प्रेस्टीजीअस मेंबरशीप मिळाली, जी भारतीय माणसाला अपवादानेच मिळायची. ती त्यांच्या मृत्युपर्यंत कायम होती. मुंबईच्या स्टाॅक एक्सचेंजचे ते फाउंडर मेंबर होते. त्यावेळी ब्रिटन आणि अमेरिकेत काॅपर, शुगर, व्हीट एक्स्चेंजेस होती. त्या सर्व ठिकाणी बंकाजींनी आपल्या प्रेझन्सने दबदबा निर्माण केला.”
“बंकाजी हयात असेपर्यंत आमच्या मिलच्या लायब्ररीत New York Times येत असे. त्यात वाचलेल्या आर्टीकल्समधे त्यांच्या बिझनेस प्रोजेक्शन्सकडे पाश्चिमात्य पत्रकार भितीयुक्त आदराने पाहात असल्याचे जाणवायचे. ते कोणते शेअर्स विकत घेतात किंवा विकतात यावरून मार्केटमधे चलबिचल व्हायची.”
“१९२० साली बंकाजींनी टेक्स्टाईल मिल काढण्यासाठी ही तीनशे एकराची प्रशस्त जागा घेतली. मिलचे बांधकाम तीन वर्षांत पूर्ण झाले. त्यातील चाळीस एकरात निवासासाठी चाळी, शिक्षणासाठी शाळा आणि एक हाॅस्पिटल बांधण्यात आले. ह्या तिन्ही गोष्टी कामगारांसाठी विनामूल्य होत्या. मग ब्रिटनहून मशिनरी मागवण्यात आली आणि १९२५ साली ही मिल सूरू झाली.”
” फक्त आमचीच मिल तेव्हा वर्षांतून दोनदा बोनस द्यायची. एक दिवाळीत तर दूसरा जूनच्या १ तारखेला.”
“१ जूनच का?”
” कारण १३ जूनच्या आसपास शाळा सूरू व्हायच्या. तेव्हा मुलांची पुस्तके, वह्या, युनिफॉर्म, बूट, दप्तरे, छत्र्या ह्यासाठीच्या खर्चाची ती सोय असे. बंकाजी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप आग्रही होते. मॅट्रिक झालेल्या प्रत्येक मुलाला त्यांच्याकडे नोकरीची ऑफर असे. तसेच हवी असल्यास उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळे.”
” बंकाजी खरोखर देवमाणूस होते.” मी भारावून म्हणालो.
” …आणि हा देवमाणूस अतिशय प्रामाणिक होता. त्यावेळचे श्रीमंत लोक गांजा, मदिरा आणि मदिराक्षी यांच्या सहाय्याने आपले शौक पूर्ण करायचे. पण बंकाजींना त्यांच्या आईने सोळाव्या वर्षी मुंबईला पाठवताना ‘गांजा आणि मदिरेपासून तू दूर रहाशील’ अशी शपथ घातली होती. मग त्या देवतूल्य आईच्या शपथेनुसार बंकाजी आयुष्यभर तसेच वागले.
मिलचा चार एकर भाग त्यांनी उंच भिंत घालून वेगळा केला. त्यात एक टूमदार हवेली बांधली. तळमजल्यावर पार्टी हाॅल, किचन व पहिल्या मजल्यावर चार प्रशस्त बेडरूम्स बनवल्या. हवेली समोर दोन एकरात छोटा कृत्रीम तलाव बांधला. त्यात खास काश्मीरहून आणलेला शिकारा ठेवला. दूपारी ते मिलच्या ऑफिसातून हवेलीत जेवायला जात. आवडीची भरीत- भाकरी खाल्ल्यावर ते शिकार्यात वामकुक्षी घेत. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन युरोपीयन मुली नावेत असत.
” उंच भिंती पलिकडचे हे कसे काय तूम्हाला दिसायसे?” माझा प्रश्न.
“आमच्या स्पिनिंग डिपार्टमेंटच्या तिसर्या मजल्यावरच्या एका खिडकीतून आम्ही हे चोरून बघत असू. त्यातली एक मुलगी त्यांचे पाय चेपत असायची तर दुसरी नाव वल्हवत असे. दर शनिवार, रविवार हवेलीवर संध्याकाळी पार्टी असे. त्यांत मी त्या काळातल्या सर्व नटनट्यांना भेटलो.”
” ते कसे काय?” मला आश्चर्याचे धक्के बसत होते.
” त्याची गंमतच झाली. मी नाशिकच्या ‘न्यू इंग्लिश स्कूल’ मधून १९४१ ला मॅट्रिक झालो ज्याचे १९४३ ला पुढे नाव बदलून ‘जे.एस. रूंगठा’ हायस्कूल झाले. आठवी ते अकरावी आम्हाला इंग्रजी विषय शिकवायला थॉमस लेन नावाचे ब्रिटीश शिक्षक होते. ते अतिशय सुंदर शिकवत. तिथल्या चार वर्षांच्या अध्यापनानंतर सर्व मुले छान इंग्रजी बोलत असत.”
“त्यावेळेस बंका काॅटन मिल्स मधे केलेल्या नोकरीच्या अर्जात उत्तम बोलता येणार्या भाषेंत मी इंग्रजी, मराठी आणि हिंदी असा उल्लेख केला होता. म्हणून माझा इंटरव्हू घ्यायचे काम जेम्स स्टूअर्ट नावाच्या ब्रिटीश स्पिनिंग मास्तरना दिले गेले. त्यांनी मला नाशिकला कुणाकडे, किती वर्षे इंग्रजी शिकलो असे विचारले. तसेच इथे मुंबईत कुणाकडे राहिला आहेस असे विचारले.
मी सर्व प्रश्नांची उत्तरे सफाईदार इंग्रजीत दिली. त्यानंतर मला बंकाजींच्या केबिनमधे पाठवण्यात आले.
बंकाजी म्हणाले,” तुला मिलमधे सुपरवायझरची नोकरी देतो पण दर शनिवार आणि रविवार तुझी हवेलीत ड्यूटी असेल.
” सर तिथे मी काय करायचे?”
मी नम्रपणे विचारले.
” त्या दोन्ही दिवशी बर्याच विदेशी पाहुण्यांचा राबता असतो. त्यांना काय हवे नको ते बघायचे.”
अशा रितीने माझा हवेलीत प्रवेश झाला.
हवेलीतल्या पार्ट्यांना कधी हिंदी फिल्म इंडस्ट्रीतल्या नटनट्या यायच्या तर कधी ब्रिटीश पदाधिकारी! त्यांत गांजा, चरस, मदिरा, तर्हेतर्हेचे मांसाहार ह्यांची रेलचेल असे. बंकाजी स्वतः ह्यातील कशालाही स्पर्श करत नसत. कारण त्यांच्या आईच्या शपथेने त्यांना बांधलेले होते.
मात्र पार्टी पुर्ण भरात आल्यावर हळूच एखाद्या नटीबरोबर ते पहिल्या मजल्यावरच्या खोलीत काही काळासाठी गडप होत! राजस्थानच्या छोट्या गावात आयुष्य काढलेल्या त्यांच्या माऊलीला मदिराक्षी हा प्रकार ठाऊक नसावा, म्हणून तिच्या शपथेत हा एक मुद्दा राहून गेला!
मला ती १९४२ सालची बंकाजींची बर्थ डे पार्टी अजून आठवतेय. एकीकडे भारतात गांधीजींचे “छोडो भारत” अभियान गाजत होते तर दुसरीकडे बंकाजींचे “आवो भारत” अभियान!
” दुसर्या महायुद्धाच्या दरम्यान जगातल्या चित्रपट उद्योगावर मंदीचे सावट आले होते. बंकाजींनी त्यांच्या वाढदिवसाला हाॅलिवूडच्या ‘मर्ले ओबराॅन’ या नटीला आमंत्रित केले होते.”
” ही तिच का जी ‘द डार्क एन्जल’ या गाजलेल्या चित्रपटातील जबरदस्त भूमिकेबद्दल अकॅडेमी अवाॅर्डसाठी नाॅमिनेट झाली होती?”
मी विचारले.
” तिच ती! ती इथे चार दिवस होती. एके दिवशी पार्टी चालू असताना रात्री साडेअकराच्या सुमारास ‘प्लीज अलाऊ मी टू गेट फ्रेशन अप’ असे बंकाजींना सांगून ती वरच्या मजल्याचा जीना चढू लागली. मला तिने मागून येण्याची खूण केली. मी मागोमाग तिच्या बेडरूमच्या दारापर्यंत गेलो.
” प्लीज गेट मी अ पॅक ऑफ कंडोम !” तिने मला विनंती केली.
मी काहीच न उमगुन तिच्याकडे पहात राहिलो.
तिने तेच वाक्य परत एकदा म्हटले, तरी माझ्या डोक्यात प्रकाश पडेना. हा शब्द ना कधी लेन सरांनी सांगितला होता ना डिक्शनरीत पाहिला होता! मी तसाच बावळटासारखा उभा राहिलो.
” नो वंडर यू पिपल हॅव सो मेनी चिल्ड्रेन.” असे म्हणून तिने धाड्कन दरवाजा बंद केला.
“मग जिना उतरत असताना मला थोडाफार अंदाज आला की हे असे काहीतरी उपकरण असावे जे मुले रोखून धरते. पण ते भारतात मिळत नसणार ह्याची मला खात्री वाटली. असे वाटण्याचे कारण बंकाजींच्या सतत बदलत्या युरोपियन सेविका! जेव्हा एखाद्या सेविकेचे पोट थोडे वाढे तेव्हा तिची रवानगी मायदेशात होई!”
बंकाजींचा असा सर्व कामेतिहास त्यांच्याकडून ऐकल्यावर मला काय रिॲक्ट व्हावे हे सुचेना.
” मग अशा माणसाचा पुतळा गेटवर लावून कसली प्रेरणा मिळणार ?” मी थोडे चिडून विचारले.
” ह्या माणसाने डोके वापरून कसा जगात दबदबा निर्माण केला, डोळ्यांनी कसे कामगारांचे दैन्य पाहिले, कान वापरून कशी त्यांची गाऱ्हाणी ऐकली आणि मग दोन्ही हातांनी कसे भरभरून दान दिले हे आम्ही पाहिले. कामगारांच्या ह्रदयात त्यांनी कायमचे स्थान मिळवले त्या प्रीत्यर्थ त्यांचा हा अर्धपुतळा बसवला गेला. त्यांचा कमरेखालचा हिस्सा आमच्या खिजगणतीतच नाही. समर्थांनी म्हटलेच आहे,
जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे l
जनी वंद्य ते सर्व भावे करावे ll
मग मीही मनोमन त्यांना हात जोडले.
– समाप्त –
लेखक – श्री रविकिरण संत
साल १९७९
संग्राहिका – सुश्री सुप्रिया केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो, फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.
फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.
☆ फुंकर… ☆
धनी निघाले शेतावरती
बांधून देण्या भाजी भाकर
चुलीत सारून चार लाकडे
निखार्यावर घाली फुंकर
माय जाणते दमले खेळून
बाळ भुकेले स्नानानंतर
बशी धरूनी दोन्ही हातानी
दुधावरती हळूच फुंकर।
कुसुम कोमल तान्हे बालक
चळवळ भारी करी निरंतर
ओठ मुडपुनी हसे, घालता
चेहर्यावरती हळूच फुंकर।
खेळ खेळता सहज अंगणी
डोळ्यात उडे धूळ कंकर
नाजूक हाते उघडून डोळा
सखी घालते हळूच फुंकर।
राधारमण मुरलीधर
धरूनी वेणु अधरावर
काढीतसे मधु मधूर सूर
अलगुजात मारून फुंकर।
किती दिसांचा वियोग साहे
रागेजली ती प्रिया नवथर
कशी लाजते पहा खरोखर
तिच्या बटांवर घालून फुंकर।
सीमेवरूनी घरधनी येता
अल्प मिळाला संग खरोखर
रात जाहली पुरेत गप्पा
दिवा मालवा मारून फुंकर।
संसारातील जखमा, चटके
सोसायाचे जगणे खडतर
सुसह्य होते कुणी घालता
सहानुभूतीची हळूच फुंकर।
अटल आहे भोग भोगणे
कुणी गेल्याचे दु:ख भयंकर
पाठीवरती हात फिरवूनi
दु:खावरती घाला फुंकर।
कितीक महिने गेले उलटून
मित्र भेटही नाही लवकर
मैत्रीवरची धूळ झटकुया
पुनर्भेटीची घालून फुंकर।
संग्राहिका – सौ. विद्या पराडकर
वारजे पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ही सर्व श्रीरामाची इच्छा …! ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆
स्वामी विवेकानंद यांनी भ्रमंतीमध्ये अनेक गोष्टी अनुभवल्या. काही चांगल्या तर काही वाईट…
अनेकदा ते उपाशी रहात तर कित्येकदा अत्यंत थकून जात. खूपदा भुकेलेही असत. अनेक दयाळू माणसेही त्याना भेटली व त्यांनी स्वामीजींना मदतही केली. बहुतेक गरीब आणि कनिष्ठ म्हणवणाऱ्या जातीतील अनेक लोकांनी त्यांना अन्न व आश्रय दिला आहे…
एकदा उत्तर प्रदेशात ते एका रेल्वे स्टेशनवर रणरणत्या उन्हात भुकेले व तहानलेले बसले होते. खिशात एकही पैसा नव्हता. एक जवळच बसलेला व्यापारी त्याना टोमणे मारत होता. त्याला संन्याशाविषयी वावडे होते.
तो स्वामीजीना म्हणाला, ” पहा बरं मला कसे सुग्रास अन्न पाणी चाखायला मिळते ! कारण मी पैसे मिळवतो व मला हव्या त्या उत्तम गोष्टी घेऊ शकतो. तुम्ही पैसे मिळवत नाही मग अशी उपासमार काढावी लागते.”
यावर स्वामीजी काहीच बोलले नाहीत. पण थोड्याच वेळात एक अद्भुत प्रसंग घडला. एक हलवाई आला.
त्याने स्वामींजीसाठी जेवण आणले होते. चटई अंथरुन त्याने ताट वाढले, पाणी ठेवले आणि त्यांना जेवायला बसायची विनंती करु लागला.
स्वामीजी त्याला म्हणाले, “अहो तुमची काही तरी गल्लत होत आहे. यापूर्वी मी तुम्हाला कधीही पहिल्याचे आठवत नाही.”…
हलवाई सांगू लागला,
” नाही हो ! मी तुम्हालाच स्वप्नामध्ये पाहिले. माझ्या स्वप्नात प्रत्यक्ष श्रीराम आले व म्हणाले, यांना स्टेशनवर जेवण घेऊन जा. म्हणून तर मी आपणास लगेच ओळखले. आता सर्व जेवण गरम आहे तोवर कृपया आपण खाऊन घ्यावे.”
स्वामीजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते हलवायाला वारंवार धन्यवाद देऊ लागले.
तो मात्र.. ” ही सर्व श्रीरामाची इच्छा !” असेच म्हणत राहिला.
बाजूचा व्यापारी हे सर्व पाहून हतबुद्ध झाला. त्याला आपली चूक समजली. त्याने क्षमायाचना करीत स्वामीजींच्या चरणावर आपले मस्तक ठेवले….
(रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशन यांच्या ‘स्वामी विवेकानंद – जीवन आणि उपदेश’ या पुस्तकामधील काही भाग.)
संग्राहक : अनंत केळकर.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
चं म त ग ! 😅 एक अफलातून सोमवार ! 💃☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
“अहो उठा, पाच वाजून गेले!”
“हो गं, जरा गजर तर होऊ दे “
“मी दोनदा गजर बंद केलाय म्हटलं!”
“दोनदा ?”
“मग, साडे चारचा गजर एकदा त्याच्या वेळेला झाला तेव्हा आणि मी बंद केल्यावर snooz ला जाऊन परत पाच वाजता झाला तेंव्हा “
“अरे बापरे, म्हणजे आता वाजले तरी किती ?”
“साडेपाच वाजत आले, मला पण सगळे आटपून आठ पाच पकडायची आहे”
“जाऊ दे, आज कंटाळा आलाय ऑफिसला जायला”
“हे तुमच दर सोमवारच झालंय हल्ली”
“हल्ली म्हणजे?”
“हल्ली म्हणजे डोंबिवलीला रहायला आल्यापासून म्हणतेय मी”
“हो, पण फ्लॅटात रहायची हौस कोणाला होती?”
“म्हणजे, हौस काय मला एकटीलाच होती? उलट आपल्या गिरगांवातल्या जागेपासून, माझी आर्यन education ची शाळा हाकेच्या अंतरावर आणि तुमच BMCच ऑफिस दोन बस स्टॉपवर होतं.”
“हो नां, मग मी जे म्हणतोय ते बरोबरच आहे ना?”
“काय डोंबलाच बरोबर?
अहो, तुम्हांलाच BMC मधे प्रमोशन मिळाल्यावर गिरगांवातल्या चाळीतल्या दोन खोल्या, काडेपेटीच्या आकाराच्या वाटायला लागल्या आणि तुम्ही तसं बोलून पण दाखवत होतात हजारदा, विसरले नाही मी अजून.”
“अग म्हणून तर मी गिरगांवातली जागा विकून ठाण्याला वन बेडची जागा घेऊया म्हटलं, तर तुझ्या आईनं खोडा घातला त्यात”
“उगाच माझ्या आईला दोष देवू नका यात”
“का, का दोष देवू नको? तिच्यामुळेच तर आपण येवून पडलो ना डोंबिवलीला?”
“हो क्का, मग मला आता एक सांगा, तुम्ही जी ठाण्याला वन बेड बघितली होती, ती कुठेशी होती हो ?”
“कुठेशी म्हणजे तुला जस काही माहितच नाही, वाघबीळला!”
“हां, म्हणजे सांगायला ठाण्याला राहतो, पण स्टेशन पासून रिक्षाने फक्त वीस मिनिटावर, काय बरोबर ना ?”
“अग पण तिथे सुद्धा हजारो लोकं राहून, नोकरी साठी रोज मुंबई गाठतातच ना ?”
“बरोबर, पण त्याच वीस मिनिटापैकी फक्त दहा मिनिट पुढे ट्रेनने प्रवास करून तुम्ही डोंबिवलीला पोचता त्याच काय ?”
“ते जरी खरं असलं तरी आपली जागा स्टेशनपासून लांब असल्यामुळे, इथे डोंबिवलीला उतरल्यावर सुद्धा रिक्षाच्या भल्या मोठया लायनीत, वीस वीस मिनिट उभ रहावं लागतच ना?”
“हो, पण या सगळ्या गोष्टीत तुम्ही एक महत्वाचं विसरताय ?”
“काय, दोन सोसायटया सोडून तुझी आई रहाते ते?”
“ते तर आहेच, पण त्या वाघबीळच्या जागेच्या बजेट मध्ये माझ्या आईने आपल्याला डोंबिवलीला दोन बेडची जागा मिळवून दिली ते!”
“अग हो, पण ठाणा म्हटलं की कसं ऐकायला जरा बरं वाटत आणि शिवाय स्टेटस वाढल्यावर त्या प्रमाणे नको का रहायला?”
“हवं ना, मी कुठे नाही म्हणत्ये ? मग त्या चांगल्या BMC च्या quarters मिळत होत्या मोठया, त्या का नाही घेतल्यात हो ? म्हणजे ही वेळ आली नसती नां?”
“तुला ना काही कळत नाही”
“काय, काय कळत नाही?”
“अग, quarters घेतली की house allowance मिळत नाही आणि शिवाय तिकडे सुद्धा रोज ऑफिस मधल्या लोकांचेच चेहरे बघायचे ना?”
“मग इथे गोपाळ नगर मधल्या आपल्या आराधना सोसायटीत तुमचे शेजारी पाजारी रोज बदलतात की काय ?”
“अग तसं नाही, पण नाही म्हटलं तरी मॉनिटरी लॉस हा होतोच होतो आणि शिवाय…”
“ही तुमची पळवाट झाली”
“अग पळवाट वगैरे काही नाही. Quarters न घेण्यात दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आहेच.”
“अस्स, तो कोणता?”
“अग रिटायर झाल्यावर quarters सोडावी लागते आणि त्या जागेची आपल्याला नंतर इतकी सवय झालेली असते, की रिटायरमेंट येई पर्यंत आपण विसरूनच जातो, की आता काही महिन्यातच आपल्याला ही जागा सोडायची आहे आणि रहायची दुसरी सोय करावी लागणार आहे आता ते”
“हो ना, पण आता आपण काही quarters मधे रहात नाही त्यामुळे ती भीती नाही! तेव्हा आता उठा आणि पाणी
जायच्या आत सगळं आवरून ऑफीसला पळा”
“अग खरंच कंटाळा आलाय आज. तू पण दांडी मारतेस का ?”
“अशक्य, आताच नवीन वर्ष सुरु झालय आणि परीक्षा…”
“मी तुला कधी सांगतो का गं दांडी मारायला ? आज जरा आग्रह करतोय तर एवढा काय भाव खातेस”
“पुरे, पुरे, तुम्ही आता जाताय अंघोळीला का मी जाऊ ?”
“असं काय ते ?आज जरा मजा करू, गोपी टॉकीजला पिच्चर टाकू आणि मॉडर्न प्राईड मध्ये मस्त हादडू”
“अरे बापरे, आज कसले डोहाळे लागलेत एका माणसाला?”
“म्हणजे नवरे मंडळीच विसरतात असं नाही तर ?”
“मी नाही समजले तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, उगाच आमच्या सारखं कोड्यात बोलू नका, सरळ काय ते सांगा”
“म्हणजे तुम्ही बायका कोड्यात बोलता हे मान्य आहे तर तुला ?”
“आता बऱ्या बोलाने सांगणार आहात की जाऊ मी अंघोळीला?”
“मॅडम आज जर का तुमचा वाढदिवस असता आणि मी तो विसरलो असतो, तर अख्ख घर डोक्यावर घेतल असत आपण !”
“होच मुळी, आपल्या एकुलत्या एक बायकोचा वाढदिवस नवरा विसरतो म्हणजे काय?”
“आणि नवऱ्याचा वाढदिवस बायको विसरली तर चालतं वाटतं मॅडम ?”
“Oh my God, सॉरी सॉरी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !”
“It’s OK, थँक्स! मग काय आज मी सांगितलेला प्रोग्राम follow करणार की दुसरं काही विशेष तुमच्या डोक्यात आहे मॅडम ?”
“दुसरं काही विशेष नाही, पण आज एक काम मात्र मी न चुकता नक्कीच करणार आहे”
“काय सांगतेस काय, खरंच?”
“खरंच म्हणजे? तुम्हाला माहित्ये मी शाळेत मुलांना खरं बोलायला शिकवते आणि स्वतः चुकून सुद्धा खोटं बोलत नाही.”
“अग हो, पण आज एक काम नक्की करणार आहेस म्हणजे काय करणार आहेस, ते आणखी सस्पेन्स न वाढवता सांगशील का प्लिज?”
“सांगते ना, आज कुठल्याही परिस्थितीत आठ पाच चुकवायची नाही म्हणजे नाही !”
(संस्कारधानी जबलपुर के हमारी वरिष्ठतम पीढ़ी के साहित्यकार गुरुवर डॉ. राजकुमार “सुमित्र” जी को सादर चरण स्पर्श । वे आज भी हमारी उंगलियां थामकर अपने अनुभव की विरासत हमसे समय-समय पर साझा करते रहते हैं। इस पीढ़ी ने अपना सारा जीवन साहित्य सेवा में अर्पित कर दिया। वे निश्चित ही हमारे आदर्श हैं और प्रेरणा स्त्रोत हैं। आज प्रस्तुत हैं एक भावप्रवण गीत – प्रतिबंध बहुत हैं…।)
साप्ताहिक स्तम्भ – लेखनी सुमित्र की # 122 – गीत – प्रतिबंध बहुत हैं…
(प्रतिष्ठित कवि, रेखाचित्रकार, लेखक, सम्पादक श्रद्धेय श्री राघवेंद्र तिवारी जी हिन्दी, दूर शिक्षा, पत्रकारिता व जनसंचार, मानवाधिकार तथा बौद्धिक सम्पदा अधिकार एवं शोध जैसे विषयों में शिक्षित एवं दीक्षित। 1970 से सतत लेखन। आपके द्वारा सृजित ‘शिक्षा का नया विकल्प : दूर शिक्षा’ (1997), ‘भारत में जनसंचार और सम्प्रेषण के मूल सिद्धांत’ (2009), ‘स्थापित होता है शब्द हर बार’ (कविता संग्रह, 2011), ‘जहाँ दरक कर गिरा समय भी’ ( 2014) कृतियाँ प्रकाशित एवं चर्चित हो चुकी हैं। आपके द्वारा स्नातकोत्तर पाठ्यक्रम के लिए ‘कविता की अनुभूतिपरक जटिलता’ शीर्षक से एक श्रव्य कैसेट भी तैयार कराया जा चुका है। आज प्रस्तुत है एक भावप्रवण गजल – “उसकी आँखो की है तारीफ यही…”।)