मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पटावरची प्यादी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ पटावरची प्यादी… भाग २ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

(इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.) – इथून पुढे – 

गुन्हा नोंदवला गेला तरीसुद्धा दोन-तीन तास तो सगळा तमाशा चालूच होता. शेवटी संध्याकाळच्या सुमारास एकदाचे ते गावकरी सगळे निघून गेले.

ते गेल्यानंतर मग पोलिस आम्हाला म्हणाले, “आम्हाला कल्पना आहे की तुम्ही यात विनाकारण गोवले जात आहात परंतु आमच्यावरती वरून राजकारणी लोकांचा दबाव असल्यामुळे आम्हाला नाईलाजाने तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल करून घ्यावी लागली आहे. आत्ता जो फोन होता, तो इथल्या स्थानिक नेत्याचा होता, सरकारी पक्षाचा आहे. त्यामुळे आमचे हात बांधले जातात.

तुम्हाला कल्पना नसेल, ” तो इन्स्पेक्टर सांगत होता, “पण इथल्या स्थानिक लोकांच्या मनात NGOबद्दल राग आहे. या जंगलाच्या जवळच खनिज मिळवण्यासाठी एक खाण कार्यरत होती, त्या खाणीमध्ये या गावातल्या आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतले अनेक गावकरी कामाला होते. परंतु त्या खाणीमुळे तिथल्या पर्यावरणाला जंगलाला नुकसान होत आहे हे काही पर्यावरणप्रेमी एनजीओनी सप्रमाण सिद्ध केलं. त्यामुळे ती खाण बंद केली गेली होती. खाण बंद झाल्यामुळे तिथल्या लोकांचा रोजगार गेला होता. हे या रागाचं एक मोठं कारण होतं.

तुम्ही या जंगलामध्ये वाघ आहेत का हे शोधत आहात. जर इथे वाघ मिळाले तर हे व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित होईल. जर असं झालं तर इथल्या सर्व गावकऱ्यांना इथून विस्थापित व्हावं लागेल. आणि ते ना गावकऱ्यांच्या पचनी पडणार आहे, ना ते येथील नक्षलवाद्यांच्या सोयीचे आहे.

आणि तुम्हाला अडकवण्याचं तात्कालिक कारण वेगळंच आहे. ” निरगाठ उकल तंत्राने तो अधिकारी सांगत होता. “काही आठवड्यांपूर्वी इथल्या एका तलावात काही गावकरी ब्लास्ट फिशिंगने (dynamite – विस्फोटकांनी) मासेमारी करत होते…. जंगलातच नव्हे, तर भारतात कुठेही, अशा पद्धतीने मासेमारी करणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. “… तर तुमच्या NGO ने त्या गावकऱ्यांना पुराव्यासकट पकडलं आणि वनखात्याच्या स्वाधीन केलं. वनखात्याने त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला.

आणि आता इथल्या स्थानिक नेत्याने या गावकऱ्यांना चिथावलं आहे, तुम्हाला अडकवयाचं आणि तुमच्या बदल्यात त्या गावकऱ्यांना सोडवायचं असा हा डाव आहे. “

आम्ही सगळे सुन्न झालो होतो. दरम्यान पोलिसांनी आम्हाला आमची ओळखपत्रे, परवानग्या दाखवायला सांगितली. आम्ही आमच्या कामासाठीच्या आमच्या एनजीओने घेतलेल्या परवानग्या, आमची ओळखपत्रे वगैरे सर्व गोष्टी त्यांना दाखवल्या. ते सर्व पाहून, इन्स्पेक्टरने हवालदारांना सूचना दिल्या आणि आरोपपत्र नोंदवले.

पोलिसांना आमच्या सच्चेपणाची खात्री पटली होती, परंतु त्यांनाही कायदेशीर प्रक्रिया पाळणे बंधनकारक होतं. त्या रात्री त्यांनी आम्हाला तिथेच पोलीस स्टेशनमध्ये ठेवून घेतलं. ते म्हणाले, आज आत्ता इथून बाहेर पडणं तुमच्यासाठी सुरक्षेचं नाही. त्यांनी आम्हाला जेलमध्ये टाकले नव्हते, परंतु रात्रभर आम्हाला पोलीस स्टेशनमध्येच राहावं लागलं. तोपर्यंत आमच्या एनजीओच्या ऑफिसला ही बातमी पोचली होती आणि मग तिथून सूत्रं हलवायला सुरुवात झाली.

कोर्टात खटला उभा राहणार होता, आमच्यातर्फे आमचे टीम लीडर हजर राहणार होते. आम्हाला सोडून देण्यात आलं. मी पुण्याला परत यायला निघालो. तालुक्याला बसस्थानकावर आलो तर तिथल्या वर्तमानपत्रात आम्हा सगळ्यांच्या फोटोंसकट आमची बातमी पहिल्याच पानावर ठळकपणे छापली होती. मी तोंड लपवत प्रवास केला.

मी घरी आलो. आई वडील अर्थातच घाबरलेले होते. वडिलांनी तर अल्टिमेटच दिला होता की ‘बास झाली तुझी समाजसेवा. अन्य चार मित्रांप्रमाणे कुठेतरी खर्डेघाशी कर पण यातून बाहेर पड. ‘

तिकडे कोर्टाच्या तारखा पडत होत्या. सुदैवाने मला स्वतःला तिथे उपस्थित राहावे लागत नव्हतं. आमच्या संस्थेचे अधिकारी आमच्यातर्फे आमच्या वतीने कोर्टात उभे राहत होते. ते क्षेत्र सोडून अन्य ठिकाणी आमची काही ना काही काम चालूच होती.

दीड वर्षानंतर मला पोलिसांकडून रजिस्टर पोस्टाने एक पत्र आलं. त्याच्यावरती बी फॉर्म असं काहीतरी लिहिलं होतं. पोलिसांनी कोर्टाला कळवलं होतं त्यांचा प्राथमिक तपास पूर्ण झाला होता आणि आमच्याविरुद्ध सकृतदर्शनी कोणतेही पुरावे नव्हते.

That was a great relief. आता आम्हा सर्वांवर कायद्याची कोणतीही लटकती तलवार नव्हती. पण त्यातलं मुख्य वाक्य मला कळलं नाही, त्या बी फॉर्ममध्ये लिहिलं होतं की “प्रकाश यादव” याच्याविरुद्ध आता कोणताही गुन्हा दाखल नाही, तो कोणत्याही प्रकारच्या गुन्हामध्ये आरोपी नाही किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा गुन्हा सिद्ध झालेला नाही.

ही मला clean chit होती, पण त्याच्यावरती नाव भलतंच होतं. माझं नाव तर प्रसाद जाधव आहे आणि ही क्लीनचीट कोणा प्रकाश यादवला दिलेली होती.

मी त्या पोलीस स्टेशनला फोन केला, त्यांना सांगितलं की मला बी फॉर्मचे पत्र आलं आहे पण त्यात वेगळंच नाव आहे. हा काय प्रकार आहे? “

तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, खरं कोण आणि खोटं कोण याची थोडीफार तरी समज आम्हाला असते. तुमच्याविरुद्ध बनाव रचला गेला होता हे आम्हाला त्याच दिवशी कळलेलं होतं. तुमच्याप्रमाणेच आम्हीही पटावरची प्यादी होतो हे आम्हालाही ठाऊक होतं. आणि म्हणून आम्ही तुम्हा चौघांचीही नाव लिहिताना जाणून-बुजून गफलत केली होती. उद्या दुर्दैवाने तुम्ही दोषी सिद्ध जरी झाला असतात तरी कागदोपत्री प्रकाश यादवला शिक्षा झाली असती, प्रसाद जाधवच्याविरुद्ध कोणताही कागद मिळाला नसता. उद्या तुम्ही पासपोर्ट काढायला गेला असतात, अन्य कुठल्या ठिकाणी नोकरीवरती जायचं असतं तर तुमच्या (खऱ्या) नावावर कोणताही गुन्हा नोंदवलेला मिळाला नसता, एवढी खबरदारी आम्ही घेतली होती. त्यामुळे जरी तुमच्याकडे आता बी फॉर्म आला असला तरी मुळात तुमच्या “प्रसाद जाधव” नावावरती कुठला गुन्हा दाखलच झालेला नव्हता. त्यामुळे तुम्हाला असंही चिंतेच कारण नव्हतं. ती सगळी घटना तुम्ही पूर्णपणे एक दु:स्वप्न समजून विसरून जा. ” इन्स्पेक्टर मला आश्र्वस्त करत होते.

“तिथल्या स्थानिक नेत्याचं काय झालं हो? ” मी पुन्हा आयुष्यात कधीही तिथे जाणार नव्हतो पण तरी माझी उत्कंठा मला गप्प बसू देईना.

तो पोलीस अधिकारी हसला आणि म्हणाला, “साहेब, ते आता आमदार झाले आहेत आणि कदाचित पुढच्यावेळी मंत्री सुद्धा होतील. ” 

माझ्या अंगावर सरसरून काटा आला. “तुला सांगतो, ” तलावाकाठी सूर्यास्त बघताना प्रसाद त्याच्या भावी वधूला सांगत होता, “त्या दिवशी, फक्त त्या दिवशी एकदाच, मला असं वाटलं होतं की उगाच आलो आपण या क्षेत्रात. पण नाही, दुसऱ्या दिवशी मी ती मरगळ झटकली आणि आजही मी आणि आमची NGO जंगल परिसर आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या शाळांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना जंगलांचं पर्यावरणाचे महत्त्व शिकवण्याच्या आमच्या कामावर रुजू आहे. “

मळभ दूर झालं होतं, प्रसादच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हलकं स्मितहास्य झळकू लागलं होतं. पटावराचे प्यादं आपलं निसर्ग रक्षणाचं काम इमाने इतबारे बजावत होतं.

(सत्यकथा – नाव बदलेलेले)

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पटावरची प्यादी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ❤️

☆ पटावरची प्यादी… भाग १ ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

तिचा हात हातात धरून प्रसाद जाधव तलावाकिनारी बसला होता. त्यांचं लग्न ठरलं होतं, साखरपुडा झाला होता आणि आज शनिवारी संध्याकाळी निवांतपणे फिरण्यासाठी ते दोघं तलावावर आले होते. त्यांचं arranged marriage होतं. त्यामुळे या अशा भेटीतूनच एकमेकांच्या विषयीची छापील बायोडाटामध्ये न छापलेली माहिती एकमेकांना होत होती.

मावळत्या सूर्यनारायणाकडे बघत तिने त्याला विचारलं, “शहरातले तुम्ही, मग या जंगलांचे वेड तुम्हाला कसं काय लागलं? “

खरंच होतं ते. त्याच्या अनेक मित्रांना हाच प्रश्न पडला होता. जन्मापासूनच तो अस्सल पुणेरी. पण त्याला आवड होती ती जंगलांची. त्याने वनशास्त्र (forestry) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. आजही तो एका पर्यावरण विषयक सामाजिक कार्य करणाऱ्या नॉन-गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन (NGO) मध्ये कार्यरत होता.

तिच्या प्रश्नावर तो नुसताच हसला, त्याने काहीच उत्तर दिलं नाही.

“असे कधी झालं का हो, ” तिनं अजून विषयाचा पिच्छा सोडला नव्हता, “की तुम्हाला वाटलं, की आपलं चुकलंच. आपण या असल्या विषयात यायलाच नको होतं. ” 

हा प्रश्न तसा अनपेक्षित होता, पण या प्रश्नाने कुठेतरी त्याच्या मनाची तार आर्तपणे छेडली गेली. इतका वेळ मोकळाचाकळा बसलेला तो, आता अचानक सावरून बसला. इतका वेळ त्याच्या ओठावरती अलगद विलसत असलेलं स्मितहास्य गायब झालं, कपाळावर आठ्या पडल्या आणि तो म्हणाला, “मी तुला एक गोष्ट सांगतो. एक आटपाट जंगल होतं”, आटपाट नगर होतं या चालीवर त्याने गोष्टीला सुरुवात केली,

“खूप मोठ्ठं जंगल! आणि या जंगलात वाघोबा सापडतात का हे बघण्यासाठी आमच्या NGO तर्फे, वनखात्याची रीतसर परवानगी वगैरे घेऊन, मी आणि माझे सहकारी गेलो होतो. जर वाघोबा सापडले असते, तर हे जंगल व्याघ्र अभयारण्य म्हणून घोषित झालं असतं.

वाघ शोधण्यासाठी आम्ही जंगलात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावले होते. या कॅमेरांचं वैशिष्ट्य असं असतं, की त्या कॅमेऱ्याच्या टप्प्यात हालचाल झाली की आपोआप तिथे फोटो काढला जातो. रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी ज्या वेळेला श्वापदं बाहेर पडतात, तेव्हा त्यांच्या हालचालीने हे कॅमेरा ऍक्टिव्हेट होतात आणि फोटो काढले जातात.

आमचं कामच हे होतं की रोज सकाळी जंगलात जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत तिथे जायचं, तिथल्या मेमरी कार्डमध्ये काही फोटो निघाले आहेत का, त्याच्यात वाघ दिसतोय का हे बघायचं, ते मेमरी कार्ड काढून घ्यायचं, नवीन रिकामं मेमरी कार्ड कॅमेरामध्ये ठेवायचं आणि मुक्कामी परत येऊन लॅपटॉपवरती तो डेटा कॉपी करून घ्यायचा, त्याची नोंद करायची.

एका दिवशी आम्ही चौघेजण नेहमीप्रमाणे सकाळच्या वेळेला जंगलात फिरत होतो. आमचं सकाळचं काम संपलं, सोबत आणलेले डबे खाल्ले आणि दुपारी एकच्या सुमारास आम्ही तिथून बाहेर पडलो. जंगलाची हद्द जिथे संपते, तिथवर आलो, मी गेट उघडलं आणि गाडी गेटमधून बाहेर आल्यावर गेट बंद करत असताना माझ्या लक्षात आलं की जंगल हद्दीच्या बाहेर, गेट समोर ३०-४० जण उभे होते. मी गेट बंद करण्याच्या नादात होतो, त्यामुळे एवढं लक्ष दिलं नाही, पण नंतर पाहिलं, तर त्यांच्यातला एक जण येऊन आमच्या टीम लीडरशी हुज्जत घालत होता.

तिथली स्थानिक भाषा मला येत नव्हती त्यामुळे तो काय बोलत आहे हे मला सगळं नीट कळत नव्हतं पण त्याचे हातवारे, देहबोली हे बघता काहीतरी भांडण चालू होतं एवढं नक्की. बघता बघता त्या गर्दीतून दोन बायका पुढे आल्या, आमच्या लीडरला काहीतरी अद्वातद्वा बोलू लागल्या आणि एकीने तर पुढे येऊन सरळ त्यांच्या मुस्कटात भडकवली. हे काहीतरी भलतंच घडतंय हे लक्षात येऊन आम्ही सगळेचजण पुढे सरसावलो आणि त्यांच्याशी वाद घालू लागलो. अचानक त्यांच्यातले पाच सातजण आले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करायलाच सुरुवात केली.

मी आमच्या जीपच्या पलीकडे होतो, त्या सगळ्यांपासून थोडासा दूर. मला ठाऊक होतं की इथून एक किलोमीटर अंतरावरती वनखात्याचं ऑफिस होतं आणि तिथेच जवळ पोलीस स्टेशन होतं. मी त्या दिशेने धावू लागलो, पण ती माणसं प्लॅनिंग करून पूर्ण तयारीतच आली होती. कोणीतरी पोलिसांकडे धावेल हे लक्षात घेऊन, त्या रस्त्यावरही दबा धरून त्यांची माणसं बसली होती.

त्यांनी मला पकडलं, आणि इतरांजवळ आणलं. आता आम्हा चौघांची साग्रसंगीत धुलाई चालू झाली होती. त्यांच्याकडे लाठ्याकाठ्या होत्या, त्याने ते आम्हाला धोपटून काढत होते. आम्ही पुरते घाबरलो होतो, कारण या जंगलामध्ये नक्षलवादीसुद्धा आहेत हे आम्हाला ठाऊक होतं, त्यामुळे आम्हाला कोण मारतंय? का मारतंय? हे मारणारे नक्षलवादी तर नाहीत ना? आणि आता आमचं पुढे काय होणार? अशी प्रश्नांची मालिकाच आमच्या डोळ्यासमोर नाचू लागली होती.

अर्धा एक तास मारहाण करून झाल्यावरती त्यांनी आम्हाला बांधलं आणि आमची वरात चालत चालत त्या पोलीस स्टेशनकडे आणली. जसे ते पोलीस स्टेशनकडे आले, तसं थोडंसं आम्हाला हायसं वाटलं, कारण हे जर नक्षलवादी असते तर ते आम्हाला पोलिसांकडे नक्कीच घेऊन आले नसते.

तिथल्या स्थानिक भाषेत त्यांनी पोलिसांकडे आमची तक्रार केली. आतापावेतो तिथे चांगलाच जमाव गोळा झाला होता. आम्हा चौघांना हाताला काढण्या बांधून गुन्हेगार म्हणून उभं केलं होतं.

त्या गावकऱ्यांची तक्रार होती की तिथल्या आदिवासी वनवासी बायका, ज्या जंगलामध्ये लाकूडफाटा गोळा करायला जात असत, त्यांची आम्ही छेड काढली, त्यांचा विनयभंग केला, त्यांच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.

हे समजताच आम्ही आश्चर्यचकित झालो, हे काहीतरी भयंकर कुभांड रचून आम्हाला त्यात गोवलं जात होतं.

स्वत:ची बुद्धी आणि शक्ती नसलेली – कोणाच्यातरी कुठल्यातरी अतर्क्य खेळातील पटावरची प्यादी झाल्याचं सपशेल जाणवत होतं. आता हे गावकरी आणखी काय करणार आणि पोलीस काय करणार – सगळाच भविष्यकाळ अनिश्चित आणि अंध:कारमय होता. गावकरी पोलिसांदेखत आमच्यावर भडास काढत होते, मारहाण करत होते, बायका आमच्या नावानं बोटं मोडत होत्या.

आश्चर्य म्हणजे पोलिसांची देहबोली बघून ते बहुधा या सगळ्या आरोपांशी सहमत वाटत नव्हते, ना ते आम्हाला मारहाण करत होते, ना आमच्याविरुद्ध काही लेखी तक्रार लिहून घेत होते. मराठी हिंदी चित्रपट बघून आपल्या मनात पोलिसांबद्दल खूप वेगवेगळे समज झालेले असतात, पण इथे जे काही जाणवत होतो ते असं की पोलीस कुठेतरी आम्हा चौघांच्या बाजूने आहेत.

बहुधा गावकऱ्यांच्याही हे ध्यानात आलं असावं. त्यांनी कोणाला तरी फोन लावला आणि तो फोन पोलीस इन्स्पेक्टरकडे दिला. इन्स्पेक्टरने फोनवरचं नाव पाहिलं, कपाळाला आठ्या घातल्या आणि फोनवर बोलू लागला. त्याने फोन ठेवला आणि त्यानंतर मात्र नाईलाजाने त्याने आमच्याविरुद्ध तक्रार लिहून घेतली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड, पुणे.  मो 8698053215

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वैरी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वैरी… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(आता निदान तीन आठवडे तिला फक्त काठी घेऊन घरातल्या घरात चालायचं होतं. केतकी दुपारी पुस्तक वाचायला लागली की तिचं मन लागत नसे वाचनात.) – इथून पुढे —

चार दिवसांनी अचानक केतकीला डॉ निखिलचा फोन आला. ”हॅलो, कशा आहात तुम्ही? बरं वाटतंय ना आता? ”

“हो डॉ. मी उत्तम आहे. थँक्स. पण प्लीज केतकीच म्हणा मला. ” डॉ हसले आणि फोन बंद झाला.

केतकीला फार गंमत वाटली. आपल्यालाही या डॉक्टरची आठवण का यावी तिला समजेना. कुठे ते इतके शिकलेले नावाजलेले डॉक्टर आणि कुठे आपण.

तीन आठवड्यानी केतकीला घेऊन आई परत हॉस्पिटल मध्ये आली. आज तिचं प्लास्टर काढणार होते. केतकीचं प्लास्टर डॉक्टर निखिलने हळुवारपणे काढलं. एक्सरे मध्ये हाडे जुळलेली दिसत होती.

“ वावा छान. आता तुम्ही हळूहळू चालू शकता आणि इथे निदान दोन आठवडे तुम्हाला फिजिओ थेरपी साठी यावं लागेल. तुम्ही हॉस्टेल वर खुशाल राहू शकता आता.”, डॉ निखिल म्हणाले.

केतकीची आई डॉक्टरांना विचारून गावी गेली. केतकी आता काठी घेऊन कॉलेजला जाऊ शकत होती. परीक्षा जवळ आली होती.

रोज सकाळी केतकी हॉस्पिटलमध्ये फिजिओला जाऊ लागली. तिचं पाय दुखणं खूप कमी झालं आणि लंगडणं सुद्धा. त्यादिवशी रविवारी ती खरेदी करायला जवळच्या मॉलमध्ये गेली.

”हॅलो मिस केतकी. कशी आहेस तू? माईंड फॉर अ कप ऑफ कॉफी? ”डॉ निखिल हसत तिला विचारत होते. केतकी त्यांच्या बरोबर कॉफी कॉर्नरला गेली.

“बाय द वे, तू अंजनगावला रहातेस का? ” केतकी आश्चर्याने म्हणाली “ हो. तुम्हाला कसं माहीत? ”

“अगं तुझ्या केसपेपरवर पत्ता नव्हता का? मग मला नाही का समजणार? ”,

केतकीला हसू आलं. “ खरंच की. ” ती म्हणाली.

“ तुझा पत्ता वाचताक्षणीच माझ्या लक्षात आलं, तू केतकी कर्वे म्हणजे आमच्या शेजारच्या बंगल्यातली असणार. मन द्विधा झालं, की पिढ्या न पिढ्या वैर जपलेल्या शेजाऱ्यांच्या या मुलीला आपण ट्रीटमेंट द्यावी का नाही? पण तुझा वेदनेने व्याकुळ चेहरा बघितला आणि माझ्यातला डॉक्टर जागा झाला. मी लगेचच कोणताही विचार न करता तुझ्यावर उपचार केले. मी तुला त्याच क्षणी ओळखलं केतकी. आता माझी ओळख…मी डॉ निखिल पोतदार. तुमच्याशेजारचा, तुमच्या आजोबांचे वैरी असलेल्या पोतदारांचा मुलगा.”

केतकीच्या डोळ्यात अश्रू आले.

“असं म्हणू नका डॉ निखिल. अहो कसलं ते वैर आणि काय हो? किती अहम् या जुन्या लोकांना. मी आभारी आहे तुमची फार. तुम्ही देवासारखे धावून आलात आणि मला बरं केलंत. ” केतकी डोळे पुसून निघूनच गेली.

त्यानंतर नकळत केतकी निखिलची वाट बघू लागली. पुन्हा एकदा दोघे ठरवून भेटले.

“ निखिल, एक विचारू? तुम्ही अजून लग्न का नाही केलं? तुमच्याचसारखी एखादी डॉक्टरमुलगी तुम्हाला अजून सापडली नाही का? ” केतकीने थट्टेने विचारलं.

निखिल गंभीर झाला. ” नाही केतकी. मला डॉक्टर बायको नकोय. मला माझ्या आईसारखी कर्तबगार आणि तितकीच हुशार बायको हवीय. मी काही वर्षांनी अंजनगावला हॉस्पिटल काढणार आहे. मला शहरी मुलगी नकोच आहे… केतकी, लग्न करशील माझ्याशी? ”

“अरे, पण मग ते आपल्या लोकांचं वैर? ते कदापि परवानगी देणार नाहीत निखिल ” नकळत केतकीने एकेरी हाक मारली निखिलला.

“ हो ग. ते आहेच. बघतो मी. पण तुला आवडेल का लग्न करायला माझ्याशी? ”

मनापासून हसत केतकी म्हणाली, ” तुला नकार देणारी महामूर्खच म्हणायची. असं दारी आलेलं भाग्य कोणी दूर लोटेल का? एका पायावर तयार आहे मी निखिल.. पण साप भी मरे लाठी भी न टूटे असं काहीतरी करावं लागेल रे. कोणाची मनं न दुखवता ”.

“ ते माझ्यावर सोड. ” 

नंतरच्या आठवड्यात निखिल आणि केतकी एकदम बरोबरच अंजनगावाला गेले.

निखिल आधी कर्व्यांच्या घरी गेला. या डॉक्टरला इथे बघून तर केतकीचे आईबाबा आश्चर्यचकितच झाले. निखिल त्यांना नमस्कार करून कर्वेआजोबांच्या पायाशीच बसला.

“ आजोबा मला तुमच्या नातीशी, केतकीशी लग्न करायचंय. पण अडचण अशी आहे की मी आहे निखिल पोतदार. तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा… आजोबा, खरं सांगतो, मला तुमच्या त्या जमिनी नकोत, ते वाद नकोत. तुमची जमीन मी तुम्हाला परत करून टाकतो. काय करायची ती जमीन? मला तुम्ही सगळे हवे आहात. मी उद्याच ते कागद घेऊन येतो. मला कोणतेही कटुत्व मागे ठेवायचे नाहीये. I really don’t want to carry forward all these stupid feuds and quarrels. माझे आजोबा बाबा तयार आहेत जमीन परत द्यायला. बास झाली ही खुळ्यासारखी भांडणे आणि तुमचे इगो. आणि आमचा काय दोष आहे यात आजोबा? गुन्हा करतोय का मी आणि केतकी? प्रेमात पडणं गुन्हा झाला का सांगा? ”

निखिलच्या डोळयांत पाणी होतं. केतकी धावत येऊन त्याच्या शेजारी बसली. ”आजोबा, हो म्हणा ना. ”

आजोबा आईबाबा थक्क होऊन हे बघत होते. आजोबा गहिवरले. त्यांनी निखिल आणि केतकीला जवळ घेतले.

“ निखिल, किती शहाणा मुलगा आहेस रे तू.. आमचं खूप चुकलं रे बाबा. ”

आजोबांनी दाराकडे बघितलं… निखिलचे आईवडील आणि वृद्ध आजोबाही दारात उभे होते.

कर्वे आजोबा उठले आणि त्यांनी “ चिंत्या.. “ म्हणत पोतदार आजोबांना मिठी मारली.

दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. “ किती किती पिढ्यानंतर ही दरी दूर झाली रे चिंतू ” कर्वे आजोबा म्हणाले.

“हो रे बाळकृष्णा. पोरं शहाणी म्हणायची आपली रे. ” पोतदार आजोबा म्हणाले.

“ निखिल, खुशाल करा हो लग्न. आमच्या केतकीला तू शंभर टक्के नीट संभाळशील याची खात्रीच झाली माझी. ” केतकीचे आजोबा डोळे पुसत म्हणाले.

निखिलचे आईवडील आत आले. बाबांनी कर्वे आजोबांच्या हातात पेपर्स ठेवले.

“कर्वे आजोबा, पूर्वी झालं ते गंगार्पण. हे तुमचे जमिनीचे कागद. उद्या कचेरीत जाऊन तुमच्या नावावर ट्रान्सफर करून देतो. ” निखिलचे बाबा म्हणाले.

आता केतकीचे बाबा म्हणाले, ”अहो काय हे. असं करू नका. आमची केतकी तुमच्या घरात जाणार आहे ना.. तर ही जमीन तिला राहू दे आजोबांची आठवण. निखिल, त्या जमिनीचा उपयोग पुढे मागे तुला हॉस्पिटल काढायला होईल बरं. ”

.. सगळ्यांचे डोळे पाणावले.

चारच दिवसात सकाळी उठून बघतात तर इतके वर्ष असलेली मधली भिंत पोतदारांनी पाडून टाकली होती. कित्ती वर्षांनी दोन्ही घरांचे दर्शन एकमेकांना झाले.

दोन्ही ओसरीवर झुलणारे झोपाळे आणि त्यावर बसलेले कर्वे आजोबा आणि तिकडून पोतदार आजोबा गप्पा मारू लागले.

एका चांगल्या मुहूर्तावर केतकी आणि निखिलचं शुभमंगल झालं.. या शुभ कार्याला आशीर्वाद द्यायला सगळं गाव आनंदानं लोटलं होतं… 

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ वैरी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ वैरी… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

कॉलेजमध्ये प्रवेश घेताना केतकी अगदी बेचैन होती. मुद्दाम सगळ्यांचा विरोध पत्करून हौसेने तिने शहरातल्या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला खरा, पण या सगळ्या मॉडर्न जगात आपला निभाव लागेल का, असं वाटून तिला दडपण आलं फार. खेडजवळ असलेल्या अगदी दहा हजाराची वस्ती असलेल्या खेड्यातून केतकी एकदम शहरात पोचली. आत्तापर्यंत तिचं जग किती सीमित होतं. आजी आजोबा, आई बाबा आणि धाकटा भाऊ कुणाल.

शाळेत अभ्यासात चांगली होती केतकी. अगदी स्कॉलर नाही पण अभ्यासू आणि नाकासमोर बघून चालणारी. केतकीच्या घरची पिढीजात श्रीमंती होती. कित्ती मोठी शेतीवाडी, बागायती गावात आणखी दोन मोठे वाडे. त्यांच्या बांधाला बांध लागून पोतदार काकांचीही शेती घर सगळं होतं. पोतदार सुद्धा कर्वे लोक इतकेच श्रीमंत, जमीनदार आणि प्रतिष्ठित होते. , पण पूर्वी काय घडलं कोणाला माहीत नाही पण या दोन कुटुंबातून विस्तव जात नसे.

— — कर्वे लोकांचं म्हणणं की पोतदारांच्या मागच्या पिढीत खोट्या सह्या करून, लबाड्या करून कर्व्यांच्या जमिनी लुबाडल्या. पैसे चारून सातबारा आपल्या नावावर करून घेतले. कोर्टात कर्वे पोतदारांविरुद्ध केस हरले. मग तर काय, हे वैर कायमचं वाढतच गेलं. कर्व्यांनी आपल्या दोन घरांच्या मध्ये मोठी भिंत बांधून घेतली. , जेणेकरून पोतदारांचे तोंडही बघायला लागू नये.

पोतदारांना दोन मुलगे होते. एक खूप शिकून शहरात स्थायिकच झाला होता. दुसरा असेल केतकी एवढा.

कर्वे कुटुंब आणि पोतदार एकमेकांच्या कोणत्याच भानगडीत पडत नसत की चौकश्या करत नसत. बिचाऱ्या बायकांची मात्र यात फार घुसमट होत असे. , त्यांना एकमेकांशी बोलावेसे वाटे, पण पुरुष लोकांचा दराराच असा होता की कोणी त्यांच्या विरुद्ध जायला धजत नसे.

केतकी शहरात कॉलेजला गेली. नवीन नवीन अगदी बुजरी असलेली केतकी आता या शहरी जीवनाला रुळायला लागली. फार आवडायचं तिला हे मोकळं वातावरण. केतकी आता पक्की शहरी झाली. सुट्टी पडली की केतकी गावाकडे जात असे. नाही म्हटलं तरी तिचं जन्मगाव होतं ते. तिला ओढ होतीच गावाकडची. पण थोड्याच दिवसात तिला तिच्या होस्टेलच्या आठवण यायची. त्या मैत्रिणी, कॉलेज, तिकडचे मोकळे वातावरण अगदी हवंहवंसं वाटे तिला.

केतकी आता शेवटच्या वर्षाला होती. डिग्री नंतर तिने एम ए करायचे ठरवले होते. त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी केतकीला बोलवायला आल्या.

” केतकी. , आम्ही सगळ्या या शीतल च्या फार्म हाऊस वर दोन दिवस जाणार आहोत. येतेस का? चल ना. मग एकदा हे वर्ष संपलं की कधी कोणाला भेटणार ग आपण? चल की. शीतलच्या बाबांचे फार्महाऊस जवळच आहे दोन तास अंतरावर. चल चल. आपण सात आठ जणी आहोत ”.

केतकीला त्यांचं मन मोडवेना. अगदी उत्साहाने त्या सगळ्या गाड्या करून रमत गमत शीतलच्या फार्म हाऊसवर पोचल्या. खूपच सुंदर होते त्यांचे फार्म हाऊस.

शीतलच्या आईबाबांनी प्रेमाने सगळ्या मुलीचं स्वागत केलं. खाण्या पिण्याची नुसती रेलचेल उडवून दिली त्यांनी. मुली मनसोक्त हिंडल्या, बागेत रमल्या. जवळच तळं होतं तिथे पाण्यात पाय बुडवून बसल्या..

शीतलच्या आई म्हणाल्या, ”बरं झालं ग तुम्ही सगळ्या आलात. आता डिग्री नंतर कोण कुठे जाल सांगता येत नाही. “

त्या दिवशी मुली फिरायला गेल्या आणि येताना अंधार पडल्याचे भान राहिले नाही त्यांना. झपझप चालत येत असताना केतकी एका मोठ्या दगडाला अडखळून जोरात पडली.

आई ग असं तिचं विव्हळणं ऐकून सगळ्या थांबल्या.

“काय झालं केतकी? ”अग बघ ना शीतल. पाय अडखळून पडलेच मी. थांब. मला हात द्या. मी तुम्हाला धरून धरून येते घरापर्यंत. ” केतकीचा पाय भप्प सुजला होता. कळ तिच्या मस्तकात जात होती. त्या वेदना सहन करत ती कशीबशी घरापर्यंत आली.

शीतलच्या आईने बघितलं आणि म्हणाल्या बाई ग! केवढा सुजलाय हा पाय. इथे तर आता डॉक्टर पण नसतात ग. थांब. मी लेप लावून देते. केतकीने तिच्या जवळची पेन किलर गोळी घेतली. दुसऱ्याच दिवशी सगळ्या परत शहरात जाणार होत्याच. रात्रभर केतकीला असह्य वेदना होत होत्या. कधी एकदा शहरात जाऊन डॉक्टरला दाखवते असं झालं तिला. पोचल्यावर तिची मैत्रीण स्नेहा म्हणाली “, केतकी खूप सुजलाय ग पाय. इथून जवळ एक चांगलं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आहे. मी रिक्षा आणते. आपण जाऊया तिकडे.”

केतकीने मान डोलावली. स्नेहा रिक्षा घेऊन आली आणि दोघीही त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या.

थोड्याच वेळात तिला आत नेलं आणि सगळे सोपस्कार झाले.

बाहेर येऊन डॉ. स्नेहाला म्हणाले, ”तुमच्या मिस केतकीना घोट्याजवळ आणि पावलाजवळ दोन फ्रॅक्चर्स आहेत. त्यांना प्लास्टर घालावे लागेल. तुम्ही त्यांचं हॉस्टेल वर मॅनेज कसं करणार? त्या पेक्षा त्यांना आठ दिवस आमच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं तर चालेल का? मग नंतर तुम्ही काय करायचं ते ठरवा. ”

स्नेहा आणि केतकी बरं म्हणाल्या. अशा स्थितीत ती गावाला तरी कशी जाणार होती?

केतकीला प्लास्टर घातले. तिने गावी फोन करून सगळं सांगितलं. आई बाबा आजोबा घाबरून गेले.

“आई तू मुळीच काळजी करूनकोस. मग आठ दिवसांनी तुम्ही आपली गाडी घेऊन याआणि मला घेऊन जा. तोपर्यंत माझं दुखणंही बरंच बरं होईल. ”

डॉक्टरांशी बाबा बोलले आणि त्यांनाही ते पटलं. त्या असह्य वेदना जरा कमी झाल्यावर केतकीला जगाचे भान आले. प्रथमच आज डॉक्टर सकाळच्या राऊंडला आल्यावर ती त्यांच्याशी छान बोलली. त्यांच्या एप्रन वरची नेमप्लेट बघितली तिनं. डॉ. निखिल असं नाव होतं. किती छान रुबाबदार डॉक्टर होता तो. तरुण आणि अगदी हसरा.

“काय मग? बरं वाटतंय का? जेवण आवडतंय का इथलं? ” त्यांनी हसून विचारलं.

“काय लाजवताय सर. माझी घरच्यासारखी काळजी घेतात अहो तुमच्या आया आणि सगळे तुम्ही. ” केतकीच्या डोळ्यात पाणी आलं.

चारच दिवसात केतकीला खूप बरं वाटायला लागलं.

तिचं प्लास्टर आता तीन आठवडे रहाणार होतं.

 ” डॉक्टर, मी घरी जाऊ का? माझे आईबाबा कार घेऊन मला न्यायला येतील, तुम्ही परवानगी दिलीत तर. मग आम्ही तुम्ही सांगाल तेव्हा प्लास्टर काढायला येऊ” केतकी म्हणाली.

डॉक्टर म्हणाले, ” हो पण नीट औषधे आणि काळजीही घ्या ”

केतकीचे आईवडील दुसऱ्याच दिवशी आले. तिचे आईवडील डॉक्टर निखिल ना भेटले. त्यांचे शतशः आभार मानत हॉस्पिटलचे बिल भरून केतकीला घरी घेऊन गेले. केतकीने जाताना बरोबर खूप पुस्तकं घेतली. आता निदान तीन आठवडे तिला फक्त काठी घेऊन घरातल्या घरात चालायचं होतं. केतकी दुपारी पुस्तक वाचायला लागली की तिचं मन लागत नसे वाचनात.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे वांझपण… – भाग-२ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

🌸 जीवनरंग 🌸

 ☆ तिचे वांझपण… – भाग-१ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

(बघा हं खुट्ट आवाज जरी झाला तरी आई जागी होते. रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपलंय का… तशी ही माझी आई. रात्रीची चारदा मला बघून जाते. अंगावरच पांघरून नीट करते……. आईला नाही शिकवावं लागत बाळाला कस सांभाळायचं!) – इथून पुढे — 

एका स्त्रीत ते सारं उपजतच असत, नाही का? माझ्या आईने आठ वर्ष झाली कसलीच हेळसांड नाही केली ह्या जीवाची. डोळ्यात किती वात्सल्य, माया, ममता, प्रेम. माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवार फुंकर घातली. प्रेमाचं अत्तर शिंपडल. त्याच्या शिडकाव्याने आयुष्य परत सुगंधीत झालं.

किती नाजुकतेने सांभाळलं हे नातं. आईच मन असतंच निर्मळ. ना कसला स्वार्थ ना परतफेडीची अपेक्षा. फक्त आनंद द्यायचा. दुःख सारं खोल अंतरंगात लपवून ठेवायचं.

फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं? इतकं सोपं का आई होणं? तिने साडे सात महिने वाट बघितली माझी कोमातून बाहेर येण्याची नवीन दिवस नवीन त्रास तरी ही आशेवर जगत आली. तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची. मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसववेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंदाइतकाच श्रेष्ठ, उच्चतम होता…… ती वांझ नाही… नक्कीच नाही..!!!

अत्रे काकू…. “आपण विचारांनी वांझ आहोत. “नवीन विचारांना, नविन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत. मला सांगा समाजात जे म्हाताऱ्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत, त्यांच्याकडे आजारपणात, त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकूनही बघत नाहीत ती वांझ नाहीत का?? वर्षानुवर्षे आई- वडील, भाऊ – बहीण एकमेकांशी बोलत नाहीत ती नात्यांनी वांझ नाहीत??

संवेदनाहीन, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी ती खरी वांझ………. वांझपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं?? वांझपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो.

आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत. आपल्यातल्या माणूसपणा वर प्रश्न निर्माण करतो. एखादी स्त्री वांझ आहे हे ठरवणारे आपण कोण??

मुलगी झाली तर मुलगा हवा, दोन मुलगे असतील तर एक तरी मुलगी पाहिजेच बाई, आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी.

असले विवेकशून्य तकलादू, मतलबी, विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तिचं मोजमाप नाही करू शकत!! तिला वांझ आपण ठरवणार? समाज तिचं मातृत्व शोधतो ना तेव्हा स्वत:चं पोकळपण उघडं करतो. स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्या सारख्याची आई होणं त्यासाठी आत्म्याची किती अथांगता, सहनशीलता, गहनता, मनाची शुद्धता हवी विचार करा. माझी रुही सोडून कोण आलं माझ्या मदतीला? ह्या अपंग लेकराला झिडकारलं नाही तिने हे सामर्थ्य ताकद फक्त एका आईची…. माझ्याही पोटच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात, आपुलकीने चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार, मुलंबाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे? मग मी मुलांना जन्म देवून ही वांझच ठरले का हा प्रश्न माझा मलाच पडतो तो पडायला हवा.

अत्रे काकू, काकू तुमची स्वतःची मुलगी गेली सात वर्षे तुमच्याशी बोलत नाही. मानपानावरून भांडण झाले म्हणून. तुम्ही म्हणता पोटच्याचा जीव कळकळतो त्यालाच शेवटी आपली माया येते असे असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला, दोन महिने जागेवर होता. लेक आईला बघायला ही नाही ना आली. अशावेळी आपण वांझ का हा प्रश्न पडू द्यावा मनाला. दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीवा, दोष, पडक्या बाजू सोयीने लपवायच्या हा तिच्यावर अन्याय नाही का…!

एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जावून माझी रुही घराची आई झाली. माझ्या लेकाची आई झाली. माझ्या मुलींना मायेने जपते. साऱ्यांचे हेवेदावे हेवेदावे, रागलोभ सारं पोटात घालते. देते ते फक्त प्रेम…. आईसारख… अमर्याद, निर्व्याज, निस्सिम, निर्मळ, निखळ. नात्यांची आई होण सोपं नाही! प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय ह्या अन्नपूर्णाच्या घशाखाली घास नाही उतरत, ती ह्या घराची लक्ष्मी आणि जिच्या बांगड्यांच्या किणकिणाटाने आणि पैंजनाच्या आवाजाने साऱ्या घरात चैतन्याचा, उत्साहाचा जन्म होतो. जिच्या घरातील अस्तित्वाने देवघरातील देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशिर्वाद देतात, जिच्या असण्याने बागेतली फुलं आनंदाने डुलतात, जी बागेतील प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते, जिच्या सुंदर हातातून तुळशीपुढे रोज नविन रांगोळी जन्म घेते. ह्या घराला जिने घरपण दिलं, ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने नविन आयुष्य दिलं, जग दाखवलं, भरभरून जगणं शिकवलं ती वांझ कशी असेल………

अत्रे काकूंच्या डोळ्यांतून वाहणारं पाणीच त्यांच्या मनाची अवस्था सांगत होतं…….

हे सारं ऐकून रुहीच्या चेहऱ्यावर तृप्ती, समाधान, भारावलेपण…. काय नव्हतं. आईपणाची नविन जवाबदारी सांभाळण्यासाठी आनंद, आत्मविश्वास, उर्जा घेऊन परत एकदा नव्याने सज्ज झाली. मनावरचं ओझं, मळभ, जळमटं सारं काही दूर झालं…… वेगळ्याच आनंदाने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं….

– समाप्त –  

लेखिका :  सौ. तिलोत्तमा ललित गुगळे

प्रस्तुती –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तिचे वांझपण… – भाग-१ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

🌸 जीवनरंग 🌸

 ☆ तिचे वांझपण… – भाग-१ ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆

आज रुही खूप आनंदात होती. छानपैकी आवरुन कॉलनीतल्या कर्वे काकूंकडे हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला गेली.

पण तिथेही तिला बायकांच्या नजरा, टामणेटुमणे यांचा सामना करावा लागला. खूप राग आला तिला बायकांचा. एकांतात जाऊन खूप रडली ती एकटी. व नशिबाला दोष देत राहिली.

आज ती खूपच अपसेट झाली होती. तशीच जरा रागातच घरी आली.

रुहीने रागात दरवाजा उघडला. रडून लाल झालेले डोळे. दरवाजा जोरात आपटला, हातातील पर्स सोफ्यावर फेकली… बेडरूममध्ये जावून बेडवर पडून परत रडू लागली. माझीच चूक. सगळ खापर माझ्यावरच फोडतात. मागच्या जन्मी काय पाप केलेलं? मीच का? मीच का? स्वत:शीच बडबडत तिथेच रडत रडत झोपून गेली.

बऱ्याच वेळाने खडबडून जागी झाली. सगळीकडे अंधार पडला होता. गडबडीत उठून लाईट लावले. संध्याकाळचे सात वाजले होते….. इतका वेळ कसे झोपलो, किती बेजबाबदार वागलो!!!!!

सासुबाई!!!!!

त्यांनी हाक नाही मारली…. ती पळत त्यांच्या रुमकडे गेली. लाईट लावली. Sorry आई!!! खरचं sorry.. थोडं पडले बेडवर आणि तिथेच डोळा लागला. तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं. सहाचा चहा…. मी चहा घेऊन येते. ती पटकन किचनमध्ये आली. चहा बनवून घेऊन आली.

आई!!! चहा…. एक मिनिट हं… मी उठवून बसवते. तिने सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हाताने पाठीमागे उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं. त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला. बशीत चहा ओतून फुंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली.

आई रागावलात का हो??

सासूबाई – गोड हसून.. रुही!!! नाही गं, होतं असं कधी कधी. मुद्दाम नाहीस करणार माहीत आहे मला!!! रुहीने चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालाने त्यांचे तोंड पुसले.

तितक्यात दारावरची बेल वाजली. आई मी बघते हं! आलेच..

रुही – आई, अत्रे काकू आहेत.

काकू, बसा मी पाणी घेऊन आले.

अत्रे काकू – सासूबाईंना… वहिनी तुम्हालाच भेटायला आले!!!

कशा आहात?

सासूबाई – मी मस्त मजेत. तुम्ही बोला!! कशा आहात?

अत्रे काकू – एकदम छान तिन्ही पोरांची लग्नं झाली. तिघांनाही मुलंबाळं आहेत. खूप आनंदात.

अत्रे काकू अडखळत….

वहिनी!!! एक विचारू? रागावणार तर नाही ना?

सासूबाई – संकोच कसला, विचारा! अगदी नि:संकोच पणे विचारा…

अत्रे काकू – ते…. रुहीला काही औषध पाणी कुठं घेतलं का नाही?

सासूबाई – कशासाठी? ती तर एकदम ठणठणीत आहे.

अत्रे काकू – अहो, असं काय करता. लग्नाला तेरा चौदा वर्षे तरी झाली असतील अजून ते…. मुलंबाळं…… रुही पाणी घेऊन येत होती. शेवटचा शब्द ऐकून पावलं तिथंच थबकली. आत जायची हिंमतच नाही झाली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. दुपारी पूजेसाठी गेले तिथंही साऱ्यांचा हाच प्रश्न, त्या बायकांच्या नजरा, ती कुजबूज, असंख्य प्रश्न…… शिक्का…

वांझपणाचा…..

तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले. पण तिला तर मुलं आहे की, ती आई आहे एका मुलीची आठ वर्षाच्या…. काकू गोंधळल्या. आणि म्हणाल्या,

काहीही काय बोलता वहिनी? आम्हाला कसं माहित नाही.

रुहीही बाहेर दचकली, हडबडली. स्वतःशीच – आई अशा का बडबडतायत. वयोमानानुसार मनावर काही परिणाम…. रुहीला भीतीच वाटली…

तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला… ही काय तुमच्या समोर ठणठणीत बसलेय… तिची मुलगी!!!

अत्रे काकू आश्चर्यानं… मला काही कळलं नाही!

रुहीही आई काय बोलताहेत ते काळजीने पण लक्षपूर्वक ऐकू लागली.

सासूबाई – अत्रेकाकू, रुही माझी सून नाहीच. आठ वर्ष झाली ह्या मुलीचा जन्म झाला! त्यावेळी ती आई झाली. जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले पण दोन्ही पाय गमावून…. साडे सात महिने कोमात होते. फक्त जिवंत…. आय सी यू त पडलेली. लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटल मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचला पण पाय गमावले कायमचे. त्या डोळे मिटून क्षणभर मागे पडल्या. तुम्हाला सांगू काकू, मृत्यूची वाट बघत होते. पण माझी आई – रुही, जिने साडे सात महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो ना तितकाच अवर्णनीय होता, ओसंडून वाहत होता अगदी. हे बाळ तिनं स्विकारले जसं आहे तसं.

अत्रे काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या, ही आई गेली आठ वर्ष सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं न्हावू माखू घालून छान स्वच्छ कपडे घालून सगळ्या अंगाला सुगंधी पावडर लावते, छान तेल लावून वेणी फणी करते. ओला झालेला बिछाना दिवसातून तीन तीन वेळा बदलते आणि कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्र रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते. उशाशी बसून असते न कंटाळता आणि आठवणीने वेळेवर सगळी औषधं-गोळ्या देते.

खायला दर दोन तीन तासांनी गरम गरम हवं ते तांदळाची खीर, पेज, नाचणीची खीर, कधी फळांचा ज्यूस चमच्याने थोडं थोडं तासभर भरवत बसते. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. कधी अंगावर सांडल तर त्रागा न करता कपडे बदलते. रुमालाने तोंड पुसते.

कोण करतं हे सगळं फक्त एक आईच…. एवढा संयम, सहनशीलता कोणात असते….. फक्त एका आईत…. लहानग्यानं कितीही दमवावं…. आईनं प्रेमानं सारं सहन करावं.

सारे नखरे रूसवे फुगवे झेलावेत. गुणाचं ते बाळ माझं म्हणत मन जपावं, लाड करावेत. बघा हं खुट्ट आवाज जरी झाला तरी आई जागी होते. रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपलंय का… तशी ही माझी आई. रात्रीची चारदा मला बघून जाते. अंगावरच पांघरून नीट करते……. आईला नाही शिकवावं लागत बाळाला कस सांभाळायचं!

– क्रमशः भाग पहिला 

लेखिका :  सौ. तिलोत्तमा ललित गुगळे

प्रस्तुती –  श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… भाग-२ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रतिकृती… भाग-२ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

(भलते सलते विचार करून हा प्रश्न निश्चितच सुटणार नव्हता. मनाशी ठाम निर्णय करूनच सुखदा उठली. गार पाण्याने डोळे, आणि ती फाईल घेऊन आपल्या सीनियर ऑफिसरांच्या केबिनकडे गेली.) इथून पुढे –

सुखदा ला येताना पाहताच दारातला शिपाई लगबगीने पुढे आला हातातली फाईल घेऊन म्हणाला,

” मॅडम आपण का आलात? मला बोलवायचे ना! “

” अरे नुसती फाईल द्यायची नाही. आपल्या साहेबांशी काही गोष्टी बोलाय च्या आहेत. ” या यामुळे त्याने साहेबांच्या केबिनचे दार उघडले. सुखदा साहेबांसमोर आली ” काय मॅडम काही विशेष काम? या बसा. “

साहेबांच्या टेबलासमोरच्या गुबगुबीत खुर्चीत बसत सुखदाने आपले काम, प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली. “सर, आजच्या उमेदवारांमधून या जॉन राईट ला सिलेक्ट करावे असे मला वाटते. पण सर एक प्रॉब्लेम आहे. याचे नाव जॉन राईट. याच्या आईची पूर्ण माहिती मिळाली. पण वडिलांचा रकाना रिकामाच आहे. त्याची आई ही माहिती द्यायला तयारच नाही. मी प्रयत्न केला सर. आपल्या इन्स्टिट्यूट मधला रिसर्च इतका महत्त्वाचा आहे की कुठेही जराही लीक होता कामा नये. आपल्या देशाच्या दृष्टीने ही घातक आहे. याचे वडील कोण कुठले? याचा त्यांच्याशी किती संबंध आहे आणि आपल्या कामात काही अडथळे निर्माण करणार नाहीत ना, एवढे नक्कीच पाहिले पाहिजे. म्हणून मी आपली परवानगी मागायला आले सर. “

सुखदाने आपल्या कामाचा इतका सखोल विचार केल्याचे पाहून सरांनाही कौतुक वाटले.

” ठीक आहे. त्यासाठी काय करणे योग्य आहे असे वाटते तुम्हाला? काही मदत हवी आहे का? “

” होय सर. त्याच्या बर्थ सर्टिफिकेट वरून आपण त्याचा जन्म कुठे झाला ते ट्रेस करू शकतो त्या हॉस्पिटल मधून आई-वडिलांची नावे माहिती सापडवू शकतो. आपल्या ऑफिसच्या परवानगीने चौकशी करता आली तर पटकन माहिती मिळेल. तेवढी परवानगी हवी आहे सर “

” ठीक आहे तुम्ही करू शकता”

” थँक्यू सर येऊ मी? ” म्हणत सुखदा उठलीच.

तिच्या मनावरचे ओझे एकदम उतरल्यासारखे झाले. आपल्या केबिनमध्ये येऊन प्रथम तिने घरी फोन लावला आणि आज आपल्याला घरी यायला उशीर होईल, कदाचित रात्रही होईल असे सांगितले. लगेच कॉम्प्युटर पुढे येऊन कामाला लागली.

इंटरनेटवरून पांडेचेरीच्या हॉस्पिटल ची फाईल तिने वाचायला सुरुवात केली. ते एक खूप जुने मोठे हॉस्पिटल होते. बऱ्याच वर्षांपासून तिथे रिसर्च सुरू आहेत. आपल्याकडे मुंबईला, बेंगलोरला, हैदराबादला ज्या ब्रॅंचेस आत्ता सुरू होत आहेत, त्या तिथे बऱ्याच आधीपासून सुरू आहेत. त्या वेगवेगळ्या ब्रांचेस ” जेनेटिकल इंजीनियरिंग ” याकडे तिचे लक्ष गेले. त्या ब्रँच मधील सगळे रिसर्च पेपर्स शोधायला तिने सुरुवात केली. टिशू कल्चर, टोटी पोटेनसि, kalus, हार्मोनल ट्रीटमेंट!!  अरे बापरे! किती पुढे गेले हे क्षेत्र! त्या मानाने आपण किती मागे होता अजून.

पण हे वाचून जॉन ची माहिती आपल्याला कशी काय मिळणार? कोणाची मदत घ्यावी? या हॉस्पिटलमधल्या मॅटरनिटी मधले सगळे रेकॉर्ड पाहायला हवेत. इतक्या वर्षापूर्वीची माहिती मिळणार का? बघू तरी. आपला शोध त्या दिशेने सुरू केला. तीस वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या बाळांची नावे, महिन्याचे रेकॉर्ड करत करत अचूक त्या दिवसापासून ती आली आणि जॉन चे नाव पाचवे होते. शिवाय त्याच्या नावापुढे चांदणी केली होती. काय बरे सुचवायचे या चांदणीतून? त्या चांदणीची खूण, त्या चिन्हाचा शोध घ्यायला तिने सुरुवात केली. त्या इन्स्टिट्यूट मधली अतिशय गुप्त बातमी तिला वाचायला मिळाली. त्या चांदणीची खूण म्हणजे हे बाळ ” टिशू कल्चर ” या नवीन प्रगत पद्धती मधून जन्माला आले आहे. त्या बाळाची वाढ आईच्या युटेरस मध्ये नुसती झाली आहे. पण प्रत्यक्ष त्या आईचा तो जीव निर्माण करण्यात काहीही वाटा नव्हता. फक्त वाढ करायची, त्याचे पालन पोषण करायचे, नॉर्मल फलन प्रक्रिया इथे घडलीच नाही. टिशू कल्चर या अत्यंत प्रगत प्रक्रियेतून या बाळाचा जन्म झालाय.

त्यावेळी डॉक्टर सुझी हॉस्पिटलमध्ये जॉईन होऊन दोनच वर्षे झाली होती. सुझी ला संशोधनात खूप इंटरेस्ट होता. रोजचा पेशंट तपास तपासत तिचे निम्मे डोके काहीतरी करावे याचाच विचार करत असे. अचानक तिच्या वॉर्डमध्ये एक तरुण महाराष्ट्रीयन मुलगा बेशुद्ध अवस्थेत ऍडमिट झाला. पाय घसरून पडण्याचे निमित्त झाले आणि बेशुद्ध झाला. तो आपल्या डॉक्टरेटचा शोध निबंध वाचण्यासाठी आला होता. काम जवळजवळ पूर्ण होत आले होते. अन हा अपघात! त्याच्याबरोबर त्याची काळजी घेणारे कोणी नव्हते. डॉक्टर सुझी आणि तिच्या स्टाफने त्याची जबाबदारी स्वीकारली. सुझी ला त्या तरुणाचा चेहरा खूप आवडला. तिने तरी लग्न न करण्याचे ठरवले होते. पण याचा चेहरा बघून ती इतकी भुलली की अशा तऱ्हेचा मुलगा किंवा मुलगी आपल्याला असावी म्हणून तरी लग्न करावे असे तिला वाटले. पण तेवढ्यासाठी का त्या बंधनात गुंतायचे? छे छे नको आणि सुझी चे विचार चक्र जोरात फिरू लागले. टिशू कल्चर च्या मदतीने आपण याच्यासारखे बाळ जन्माला घातले तर? याला तर काहीच कळणार नाही आणि आपली ही हौस फिटे ल. हा आत्ता बेशुद्ध असतानाच आपण याच्या शरीरातील टिशू रिझर्व करू शकतो. पुढचे काम कसे करायचे ते नंतर पाहू आणि खरंच सुहास्य उजव्या दंडातले पाच एमजी टिश्यू काढून घेऊन दोन स्टीचे सही घालून टाकले.

नंतर योग्य ट्रीटमेंट मुळे सुहास लवकर बरा होऊन आपल्या घरी गेला ही! त्याला काही पत्ताही नव्हता की आपल्या शरीराचा प्रयोगासाठी अशा तऱ्हेने वापर होतो.

सुझी ने मात्र नंतर आपल्या डीन ना आपली कल्पना सांगितली. त्या एक्सप्लेनचे इम्प्लांटेशन स्वतःच्याच युटेरस मध्ये करून आपणच त्याला वाढवणार असल्याचे सांगितले.

सुरुवातीला डीन अशा प्रकारच्या प्रयोगाला परवानगी द्यायला तयार नव्हते. अखेर खूप विचारांती आणि खूप गुप्तता पाळून डॉक्टर सुझी ला परवानगी देण्यात आली. तुझी मोठ्या उत्साहाने कामाला लागली. त्या कलेक्ट केलेल्या टिशू मधला दोन एमजी भाग घेऊन विशिष्ट कल्चर मिडीयम मध्ये त्याची वाढ केली आणि पुढच्या योग्य त्या स्टेप्स वापरून छोटीशी सर्जरी करूनच सुजीच्या यु टेरेसमध्ये ते इंजेक्ट केले.

पूर्ण नऊ महिने सुजी डॉक्टरांच्या देखरेखी खालीच होती. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी दिन पासून नर्सेस पर्यंत सगळे जातीने लक्ष देत होते आणि अखेर आठ पॉईंट मुलाच्या जन्मानंतर प्रयोगाची यशस्वी सांगता झाली.

सुशीला अगदी हवा तसाच मुलगा झाला. हुबेहूब तिचा तो पेशंट. त्या बाळाचे रीतसर पालकत्व सुझी नेच मिळवले आणि त्याला वाढवले.

मात्र म्हणतात ना, ” रक्तातले अनुवंशिक गुण मुलात उतरतात ” इथेही तसेच झाले. हा मुलगा घरी सुझी जवळ पॉंडेचरीत वाढत होता त्याची आवड निवड सगळी टिपिकल महाराष्ट्रीयन मुलाची होती. त्यात त सुभरही बदल नव्हता. सुजीनेही त्याला छान वाढवले आणि आज तोच पॉंडिचेरी हून महाराष्ट्रात इंटरव्यू साठी आला होता.

ही सगळी माहिती गोळा करता करता सुखदाचा मेंदू अगदी पुरता शिणून गेला. पण सुहासला ही माहीत नसलेले गुपित आज तिला समजले होते. हा जॉन म्हणजे सुहास चा मुलगा! म्हणजे तिचाच. पण,! मुलगा कसा म्हणता येईल! प्रतिकृती!

पण आरशात कसे आपले प्रतिबिंब पाहतो, तशी ही सुहासची प्रतिकृती.!

सुखदाने घड्याळात पाहिले. बापरे! दहा वाजून गेले होते. सगळा दिवस तिचा या संशोधनात गेला. एका नवीन संशोधनाला सुरुवात करण्यापूर्वीच दुसरेच संशोधन नकळत तिच्याकडून झाले होते.

आता हे सगळे सुहासला कसे सांगायचे आणि कसे पटवून द्यायचे याचाच विचार करून ती परत आपल्या केबिन मधून गाडीकडे चालली.

ज्या उत्साहात ती सकाळी आली होती त्याच उत्साहात, पण मोठे गुपित शोधून ती घरी चालली होती. सुहासला त्याच्या प्रतिकृतीची खबर सांगायला.

– समाप्त –

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रतिकृती… भाग-१ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

🌸 जीवनरंग 🌸

☆ प्रतिकृती… भाग-१ ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

नेहमीच्या उत्साहात सुखदा कार ड्रायव्हिंग करत होती. या इन्स्टिट्यूट मध्ये तब्बल तीस वर्षे ती जॉब करते आहे. रोज आपण जॉईन होतोय याच मूडमध्ये ती येत असे. आज तर काय, ती स्वतः आपल्या हाताखाली काम करण्यासाठी जूनियर सायंटिस्ट या पोस्टसाठी मुलाखती घेणार होती,

आपल्या करिअरचा सतत वर धावणारा आलेख तिच्या डोळ्यापुढे आला. शाळा-कॉलेज- पोस्ट ग्रॅज्युएशन – रिसर्च – जॉब अन मग लग्न – दोन सुंदर मुली- प्रमोशन…

आणखी काय हवं माणसाला आयुष्यात?

सुहास सारखा तिला, तिच्या बुद्धीला, व्यक्तिमत्वाला समजून घेणारा साथीदार मिळाला म्हणून तर एवढे शक्य झाले. नाहीतर आपली मैत्रीण माधवी, आपल्यापेक्षा हुशार असून घरी स्वयंपाक पाणी एवढेच करत बसली आहे इतकी वर्ष —- पुअर माधवी. जाऊ दे! बॉब कटचे केस उडवत सुखदाने तो विचार बाजूला टाकला.

आपल्या हाताखाली, आपल्याबरोबर काम करायला कोणाला बरे निवडावे? मुलगा की मुलगी? कोणी का असेना — असिस्टंट हुशार, चटपटीत, आणि आवडीने काम करणारा पाहिजे. नुसत्या फेलोशिपच्या पैशात इंटरेस्ट घेणारा नको. काय काय प्रश्न विचारायचे, कशाला महत्त्व द्यायचे हा विचार करतच इंस्टिट्यूटच्या सुरेख वळणावरून आपली कार वळवून पार्क केली आपली पर्स घेऊन आपल्या केबिनमध्ये आली.

रोजच्या प्रमाणे तिने आपला ड्रॉवर उघडला गणपतीच्या छोट्याशा फोटोला – आई बाबांच्या फोटोला मनोभावे नमस्कार केला. लहानपणापासून गणपती तिचे आवडते दैवत! चांगली बुद्धी देणारा म्हणून तिची त्याच्यावर खूप श्रद्धा! आणि त्यांनी दिलेल्या चांगल्या बुद्धीला खत पाणी घालणारे, आपल्या सगळ्या धडपडीला प्रोत्साहन देणारे, खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आई-बाबा म्हणून न चुकता सुखदा आपल्या या दैवतांना वंदन करी.

“मॅडम, आत येऊ? आज आपण मुलाखती घेणार ना? दहा उमेदवार बाहेर आले आहेत. पाठवू का त्यांना एक एक करून? ” तिची सेक्रेटरी विचारत होती. ” हो, जरूर. सुरू करूया ना. जेवढे हे काम लवकर होईल तेवढे बरे ना. दुपारच्या आत हेड ऑफिसला कळवता येईल आपल्याला. “” ओके मॅडम — मॅडम ही या दहा जणांच्या नावांची, त्यांच्या क्वा लिफिकेशन ची लिस्ट! मी पाठवते त्यांना “.

आपल्या पर्सच्या छोट्या आरशात सुखदाने आपला चेहरा पाहिला. नाहीतर उमेदवार पॉश, आणि इंटरव्यू घेणारी बावळट असे नको व्हायला. ग्लासमधले थंडगार पाणी पिऊन आपले पेन आणि पेपर पॅड घेऊन मुलाखत घ्यायला सरसावून बसली.

तासामध्ये सहा उमेदवार झाले. पण तिच्या मनासारखा काही येईना. कुणाला फर्स्ट क्लास आहे पण आपल्याच विषयातले नॉलेज नाही. ज्यांना नॉलेज आहे इंग्रजीमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. एक बोलली छान, पण तिला क्लास नाही. आपल्याला एकही चांगला असिस्टंट मिळू नये का? सुखदा मनात थोडी खट्टू झाली. हा नेक्स्ट? सुखदाने नाव वाचले. जॉन राईट. अरे, एखाद्या क्रिकेटर सारखे नाव आहे, आपल्या भारतात? जॉन राईट? सुखदाने मान वर केली आश्चर्याचा जबरदस्त धक्का बसून हातातले पेन खाली पडले तिच्या.

अगदी वीस वर्षांपूर्वीचा सुहास! सुखदा त्याच्याकडे पहातच राहिली. एवढे सेम टू सेम पर्सनॅलिटी असू शकते? कसं शक्य आहे हे? की सुहासने आपल्याला फसवलं? छे छे! ते तर अशक्यच! मग काय पाहतोय आपण हे?

“मॅडम, मे आ्य कम इन प्लीज? ” या प्रश्नाने सुखदा भानावर आली…… ओ यस,….. कम इन… सीट डाउन! ” थँक्यू मॅडम “.

त्याच्या चेहऱ्यावरून सुखदाची नजर हटतच नव्हती. जॉन राईट – आपल्या सुहास सारखा कसा? सुखदा ना काही समजेना. ” मॅडम ही माझी सर्टिफिकेट्स ” आपल्या हातातील प्लास्टिक कव्हर ची फाईल पुढे करून जॉन बोलला. सुखदा आणखीनच दचकली. हा किती सहज मराठी बोलतोय! कसं शक्य आहे हे?

“मॅडम एनी प्रॉब्लेम? माझा बायोडाटा पाहताय ना ” जॉन सुखदाला विचारत होता. पाठोपाठ आश्चर्याचे जबरदस्त धक्के बसल्याने तिला काही सुचेना.

ठीक आहे. याची माहिती तर काढू. असा विचार करून त्याचे निरीक्षण करत करत त्याचा बायोडाटा पाहू लागली. नाव- जॉन. एस. राईट. मधले एस अक्षर सुखदाच्या नजरेत चांगलंच झोंबलं! आईचे नाव डॉक्टर सुझी राईट. वडिलांचे नाव —- (डॅश? ), जन्मस्थळ पॉंडिचेरी. ओ…. पांडिचेरी? सुहास त्याच्या डॉक्टरेटच्या पेपर प्रेझेंटेशनसाठी पॉंडिचेरीलाच गेला होता ना? ती वर्ष नेमकी कशी काय जुळत आहेत? काय प्रकार आहे?

जॉनचं शिक्षण, त्याचं बोलणं इतकं इम्प्रेसिव्ह होतं की त्यांना सिलेक्ट न करण्याचं काही कारणच नव्हतं. त्याच्या तंतोतंत दिसण्याचा काय प्रकार आहे? बोलतो ही किती सुहाससारखं? याच्या जन्माचा रहस्य कसं शोधून काढायचं?

“मिस्टर जॉन, तुम्ही पॉंडिचेरीचे ना? मग इतक्या लांब महाराष्ट्रात कसं काय येणार? मराठी कसं काय बोलता?

“मॅडम मला लहानपणापासून महाराष्ट्राची खूप ओढ आहे. माझी आवड बघून मॉमलाच मला कॉम्प्युटर वरून मराठी शिकण्याची संधी दिली. शिकताना मला विशेष प्रॉब्लेम आहे आला नाही. माझी मॉम तिथल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आहे. “

“ओ रियली? ” तुझ्या मॉमला भेटायलाच पाहिजे. तिचा एड्रेस, फोन नंबर, ईमेल ऍड्रेस देणार? ” सुखदाने लगेचच धागा पकडला त्याच्याकडून लिहूनही घेतला.

पुढच्या मुलाखतीत तिने गुंडाळल्याच. पटकन आपल्या लॅपटॉप पुढे येऊन इंटरनेट वरून तो ऍड्रेस शोधून काढला. पटकन पत्र टाईप केलं. ” जॉनला जॉब मिळत आहे. पण त्याच्या वडिलांचे नाव, पत्ता, काय करतात एवढेच कळल्यास बरे होईल. “

पण छे! एवढा अवघड प्रश्न इतक्या चुटकीसरशी कुठे सुटलाय? तिकडून उत्तर आले, ” सॉरी ते नाव अतिशय गुप्त ठेवायचे आहे. सांगू शकत नाही. “

काय बरे करावे? सुखदाला काही म्हणजे काही सुचेनासे झाले. आज तिचे कशातच लक्ष लागत नव्हते. दुपार झाली तरी स्वतःचा टिफिन तिने खाल्ला नाही. रोजच्या प्रमाणे घरी फोन केला नाही.

डायरेक्ट सुहासला विचारावे का? पण काय विचारणार? मनाला तरी पटते का ते? इतक्या वर्षाच्या सहवास इतका तकलादू का आहे? मग कसे जमणार हे? हा जॉन एवढा कसा सुहास सारखा? नेमका इथेच कसा आला? याचा ट्रेस कसा काढायचा? सुखदा ला काही सुचेना.

सरळ अर्ध्या दिवसाची रजा काढून घरी जावे का? पण घरी जाऊन तरी चैन पडणार का? उगाच सुहास बद्दल मनामध्ये संशय मात्र वाढत राहील. त्याच्याबद्दल का शंका घ्यायची? डोळे मिटून सुखदा विचार करू लागली. शांतपणेच हा प्रॉब्लेम हाताळायला पाहिजे. त्यालाच अपॉइंट करायचे असेल तर त्याच्या जन्माचा छडा लावायलाच पाहिजे. जरी त्याला घेतले नाही तरी डोक्यातले विचार तिला स्वस्थ बसू देईनात.

शांतपणे विचार करायला लागल्यावर तिला हळूहळू एक मार्ग दिसायला लागला. तो विचार अतिशय शांतपणे, संयमाने आणि आपल्या ऑफिसच्या वजनाचा वापर करून, ऑफिसची मदत घेऊन कसा सोडवायचा हे तिला सुचायला लागले. आणि त्याच प्रोसिजरने तिने जायचे ठरवले.

भलते सलते विचार करून हा प्रश्न निश्चितच सुटणार नव्हता. मनाशी ठाम निर्णय करूनच सुखदा उठली. गार पाण्याने डोळे, आणि ती फाईल घेऊन आपल्या सीनियर ऑफिसरांच्या केबिनकडे गेली.

 – क्रमश: भाग पहिला 

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “गुंतागुंत…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? जीवनरंग ?

“गुंतागुंत…☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

“ हे काय? अशी कशी पोलीस चौकीत आलीस तू वेडा बाई! काय तुझा अवतार झालाय हा? .. पिंजारलेले केस… काळवंडलेला चेहरा.. अंगावरच्या वस्त्राची चिंध्या चाळण झालेली.. भात्याने फुगवल्यासारखी उराची धकधक… त्राण संपल्यासारखा देह ठायी ठायी पडत झडत…. इथे कशाला आली आहेस? ‘ साहेब मला एफ. आर. नोंदवायचा आहे… माझ्यावर त्या नराधमाने…’ एवढंच बोललीस.. पुढचे बोल उमटलेच नाहीत… आणि बेशुद्ध झालीस… नेमकं काय झालयं कळल्याशिवाय आम्हाला पुढं कसं जाता येईल? … ” 

– तरीही ती गप्पच..

“ अगं आधी उठ तू.. भानावर ये! आणि सविस्तर काय झालयं ते सांग! … घाबरू नकोस.! .. “ 

– ती जराशी सावरली. पण तिची भीती मात्र अजूनही तिला काहीही सांगण्यापासून जणू रोखून ठेवत होती. तिला कशाबद्दल तक्रार नोंदवायची आहे हे कळल्याशिवाय आम्ही पोलिस तरी तिची मदत कशी करू शकणार होतो? मग मी माझी खुर्ची तिच्याजवळ घेतली आणि तिला समजावू लागलो…….

“ हे बघ, आम्ही तुला नक्कीच तातडीने मदत करू… कारण आम्ही संवेदनशील मनाचीच माणसं आहोत.. ‘खल निग्रहणाय’ या बोध वचनाला आम्ही बांधील आहोत…” माझं बोलणं तिला कळतंय की नाही अशी शंका वाटावी असाच तिचा चेहरा दिसत होता.

“ इकडे लक्ष दे.. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की तुझ्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाच्या आम्ही नक्कीच मुसक्या आवळू… पण त्या आधी घडलेली घटना.. का? कशी? कधी? कोणी? …. हे सगळं तू सांगितलंस तरच ना? या अंतहीन प्रश्नांची उत्तरे मिळायलाच हवीत… गुन्हेगाराला पकडण्यासाठी, त्याच्यावर न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणि आणि भक्कम पुराव्यांची फायलींची चळत सादर करून गुन्हा करणाऱ्याला गुन्हेगार ठरवल्यावर कायद्याची आंधळी न्यायदेवता तुझ्यावर झालेल्या अन्यायाचं परिमार्जन म्हणून कागदोपत्री न्याय तुला देऊन आश्वस्त करेल… “

आता ती जराशी भानावर आल्यासारखी वाटत होती. माझं बोलणं तिला कळतंय असं वाटल्यावर मी पुढे तिला समजावयाला लागलो – – 

“ तुला न्याय मिळवून दिल्याचं समाधान जे तुला मिळेल ना तसंच ते न्यायालयाला आणि पर्यायाने आम्हालाही मिळत असते. तेव्हा एक खरी लढाई जिंकल्याचा, आमच्या कर्तव्य पूर्तीचा आनंद आम्हाला मिळतो… कारण आम्ही संवेदनशील आहोत… पण ही गोष्ट तुझ्या लक्षात येत नसली.. छोटीशी वाटत असली, तितकी महत्वाची वाटत नसली, तरी तिच्याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखी नसते ती. कळतंय का काही? नसलं कळत तरी सांगतो.. आता आलीयेस ना भानावर.. मग आधी नीट सावरून बस आणि मी काय सांगतोय ती ऐक. ”

ती एव्हाना पूर्ण सावरल्यासारखी दिसत होती. आणि मीही समोर जणू माझा एखादा विद्यार्थी बसलाय असं समजून तपशीलवार माहिती द्यायला लागलो… एखादी फिर्याद घेऊन आलेल्या आणि पोलिसांनी तात्काळ गुन्हेगाराला शिक्षा करावी अशी अपेक्षा असणाऱ्या सगळ्यांनाच ही माहिती असायलाच हवी असं माझं ठाम मत होतं, आणि म्हणूनच आमची बाजू सांगण्याची संधी मी कधीच सोडायचो नाही… 

“ हे बघ, कायद्याचा बीजमंत्र असा आहे.. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये… आणि यासाठीच आरोपीपेक्षा फिर्यादीवर फार मोठी जबाबदारी असते.. ती म्हणजे आरोपी हाच खरा गुन्हेगार आहे हे न्यायालयाला पटवून देणे… आणि आणि केवळ या एकाच गोष्टीसाठी फिर्यादीला न्यायालयाच्या वर्षानुवर्षे पायऱ्या झिजवाव्या लागतात… तोवर गुन्हा करूनही आरोपी मात्र सुखात जगत असतो… सुटलेल्या शंभर गुन्हेगारातील तो सुद्धा एक असतो…. दाताच्या कण्या करून कायद्याचा कीस पाडून, कंठशोष करून आपला मुद्दा तुझा वकील कोर्टाला सांगत असतो… त्याचवेळेला.. नेमके त्याच कायद्यातल्या पळवाटेचा संधीसाधूपणाने आरोपी ‘ तो मी नव्हेच ‘ असं सांगून कोर्टाची दिशाभूल करून आपली निर्दोष सुटका करून घेतो… ‘ तमाम जलि़लों के बाद ये अदालत इस ऩतीजे पे पहुंची है कि गुनेहगार निर्दोष पाया है अत: ये अदालत उसे बाइज्जत बरी करती है.. कोर्ट इज ॲडजर्न… “ 

.. या माझ्या बोलण्यातलं तिला नेमकं किती आणि काय कळलं ते मला कळायला मार्ग नव्हता खरं तर.. पण तिच्या चेहेऱ्यावर ऐकण्याची उत्सुकता मात्र नक्कीच जाणवत होती. मग मीही उत्साहाने सांगू लागलो..

“.. तर काही वेळेला गुन्हा शाबित झाल्याने गुन्हेगाराच्या शिक्षेचा निकाल दिला जातो… त्या तेव्हढ्याच वेळेपुरतं तुझ्यावर झालेल्या अत्याचाराचं परिमार्जनाचं झाल्याचं आणि बराच कालापव्यय झालेला असला तरी मिळालेल्या न्यायाचं सुख नि आनंद मिळतो… क्षणैक असला तरी… आणि ते स्वाभाविक आहे. पण खरं काय आहे माहिती आहे… आपण संवेदनशील म्हणून किती फुशारक्या मारल्या ना तरी… त्या न्यायाला संवेदनेशी काहीही देणंघेणं नसतं.. फक्त नि फक्त फुल प्रुफ साक्षी, अक्षय टिकणारा पुरावा यावरच कोर्टाची भिस्त.. बाकी सगळं व्यर्थ…. मग तिथे चारचौघात कायद्याच्या नावाखाली अधिकच धिंडवडे काढले जातात… एका अन्यायाचा न्याय मिळविण्यासाठी कायद्याच्या आवरणाखाली आणखी हजारो अन्याय केले जातात… तुझ्या सोशिकतेचा अंत पाहिला जातो. न्याय मिळण्याच्या लढाईत प्रसंगी तुलाच संपवलं जातं… आणि शेवटी कोर्ट कागदावर आपली मोहर उठवतं त्याला ‘न्याय ‘ असं म्हटलं जातं… किती किती नि कसं कसं गुंतागुंतीचं होऊन बसलेलं असतं सारं… आपल्याला अखेर न्याय मिळाला हे शेवटी आपल्याच समाजात ओरडून सांगावं लागतं, कारण तो कोर्टाचा न्याय निवाड्याचा कागदच मुळी शब्द गिळून मौनात असतो… समाजमन निष्ठूर असतं. ते सहसा कुणाला आपल्यात सामावून घेत नाही.. त्यांची दृष्टि कलुषित ती कलुषितच राहते… तिकडे तो आरोपी.. कायद्याने शाबीत ठरलेला गुन्हेगार.. राजरोसपणे ताठ मानेने समाजात वावरताना दिसतो… समाजही त्याचा हारतुरे घालून जाहीर सत्कार करत असतं… एका असंवेदनशील जाणीवेची सत्ता दुसऱ्या संवेदनशील जाणीवेला देशोधडीला लावून टाकते…. ही एक अनाकलनीय न सुटणारी गुंतागुंत आहे बघ..! “

तिने तिच्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद करावी की नाही या संभ्रमात मला तिला पाडायचंच नव्हतं. फक्त वास्तवाची जाणीव करून दिली तर ती ठामपणे कोर्टात उभी राहून स्वतःसाठी न्याय मिळवू शकेल हे मला सांगायचं होतं … त्यासाठी पुढच्या सगळ्या गोष्टींना तिने न घाबरता.. न डगमगता तोंड द्यावं.. आम्ही तिच्या पाठीशी असू.. हे मला सांगायचं होतं.

पण.. पण माझा हा प्रयत्न कुचकामी ठरला.. नुसते शब्द ऐकूनच ती पुन्हा घाबरली असावी.. कारण मी बोलायचं थांबताच ती झर्रकन उठली आणि तिथून जवळजवळ धूम ठोकल्यासारखी चौकीतून पळून गेली.

‘मी तरी कशाला तिला इतकं सांगत बसलो ‘.. मलाच आता संभ्रम पडला होता..

– – – शंभर गुन्हेगारातला आणखी एक गुन्हेगार मी माझ्याही नकळत मोकळा सोडला होता का????

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “ऐक ना…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

🔆 जीवनरंग 🔆

☆ “ऐक ना…” ☆ श्री मंगेश मधुकर

“हॅलो.. मी बोलतेय. ”

“डार्लिंग, नंबर सेव आहे”

‘ऐक ना”

“बोल”

“बिझी नाहीस ना. तुला सांगायचं होतं. ”बोलण्यावरून ती अपसेट असल्याचं लगेच त्याच्या लक्षात आलं.

“काय झालं. आर यु ओके”

“काल ऑफिस आणि घरी दोन्हीकडं भांडणं झाली. कुणालाच सोडलं नाही. फुल वादावादी… ”पुढची दहा मिनिटं ती बोलत होती आणि ‘हं, ओके, ’ एवढ्याच प्रतिक्रिया देत तो ऐकत होता.

— 

तो आणि ती दोन वर्षापूर्वी भेटले.

आधी ओळख नंतर मैत्री मग प्रेम.

‘नातं’ एकेक पायऱ्या चढत गेलं.

दोन महिन्यांपूर्वीच साखरपुडा झाला.

दोघांचाही स्वभाव बोलका,

आपसात बोलताना मात्र नेहमीच तो श्रोता.

रोज फोनवर बोलणं व्हायचं.

‘बिझी नाहीस ना’ विचारून नळ सुरू केल्यासारखी बोलत रहायची.

त्याच्याकडं मन मोकळं करायला आवडायचं.

सगळं शेअर करायची. चिडायची, रडायची.

तो सांभाळून घ्यायचा. समजावून सांगायचा.

गरजेनुसार सल्लासुद्धा द्यायचा.

मात्र स्वतःविषयी फार बोलायचा नाही.

तिला हे कधी जाणवलं नाही.

तो कायम आनंदात असं तिनं गृहीत धरलेलं.

रोजच्याप्रमाणे कॉल आला.

“ऐक ना”म्हणत तिनं बोलायला सुरवात केली.

प्रमोशन मिळालं म्हणून जाम खुशीत होती.

तो ऐकत होता पण चित्त थाऱ्यावर नव्हतं.

कारण कंपनीकडून ब्रेक मिळालेला.

अचानक नोकरी गेल्यानं तो प्रचंड टेंशनमध्ये.

कॉल कट करावा असं वाटलं पण जमलं नाही.

ती प्रमोशनच्या उत्साहात तर तो बेकारीच्या वैफल्यात.

पण त्यानं जाणवू दिलं नाही.

मनापासून अभिनंदन केलं.

सेलिब्रेशनसाठी ती आग्रही पण तो तयार नव्हता.

आनंदी मूड बघून नोकरी गेल्याचं तिला सांगितलं नाही.

त्याला वाटलं,

जसं आपण समजून घेतो. आधार देतो 

तसंच तीसुद्धा करेल.

पण असं काहीही घडलं नाही.

राग आला नाही पण खूप वाईट वाटलं.

एकटेपणाची जाणीव तीव्रतेनं झाली.

आपल्या माणसाकडून झालेला ‘अपेक्षाभंग’ जास्त त्रासदायक असतो.

दाटून आलेल्या भावना आवरताना आवाज कातर झाला.

त्याचा बदललेला सूर तिच्या लक्षात आला नाही.

ती बोलत राहिली अन तो ऐकत राहिला.

— 

दोन दिवसांनी त्याच्या नोकरीविषयी समजल्यावर ती जाम भडकली.

फोनवर झापायला सुरवात केलीतो मात्र नेहमीप्रमाणे शांत.

“आता का गप्प. बोल ना. एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवलीस” 

“खूप खुष होतीस त्यावेळी माझं रडगाणं कशाला?? म्हणून सांगितलं नाही. ”

“खरंतर सगळयात आधी मला सांगायला पाहिजे होतं. तू चुकलास. असं वागायला नको होतं. ”

“काय केलं असतसं” कधी नव्हे ते त्याचा आवाज चढला.

“असं का बोलतोस. नीट बोल.”

“नीटचं बोलतोय. मी कसा आहे असं एकदाही विचारलं नाहीस. तुला माझी कंडिशन समजतच नाहीये. नोकरी गेली यापेक्षा सांगितलं नाही याचाच तुला राग आलाय” त्याचा आवेश बघून ती गप्प झाली. काय बोलावं हे न सुचल्यानं फोन कट केला. फोनकडं पाहत तो खिन्नपणे हसला.

 तिनं आपली मनस्थिती समजून घ्यावी एवढी माफक अपेक्षा परंतु,…

एक गोष्ट पक्की कळली की स्वतःच स्वतःला सावरायला हवं.

जे तो नेहमीच करत आलाय. काहीवेळ डोळे मिटून बसला.

भावनावेग ओसरल्यावर तिला फोन केला पण कॉल कट. पुन्हा पुन्हा फोन करत राहिला.

शेवटी तिनं फोन घेतला. “माझ्यावर विनाकारण चिडलास. वाट्टेल ते बोललास. तुझ्याकडुन ही अपेक्षा नव्हती.”

“सॉरी!!  ते जरा टेंशन मध्ये होतो म्हणून.. ”

“काहीही बोलशील. टेंशन्स मलाही आहेत पण मी बोलून मोकळी होते.”

“तुझ्यासाठी मी आहे पण माझ्यासाठी??”

“म्हणजे.. ”

“जाऊ दे. प्रमोशनची पार्टी कधी देतेस ते सांग. ”त्यानं चतुराईनं विषय बदलला. एक्साईट होऊन ती बोलायला लागली तो ऐकत होता पण डोळ्यात पाणी होतं.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares