मराठी साहित्य – विविधा ☆ १ मे महाराष्ट्र दिन ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

भीष्माचार्य भालजी ☆ श्री प्रसाद जोग

(भालजी पेंढारकर जन्मदिन दि. २  मे १८९९ निमित्त)

मराठी चित्रसृष्टीतले भीष्माचार्य, कोल्हापूरची शान वाढवणारे “जयप्रभा स्टुडिओ”चे मालक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कवी, नव्या कलाकारांना घडवणारे मूर्तिकार अशी असंख्य बिरुदे ज्यांना लावता येईल त्या भालजी पेंढारकर यांचा आज स्मृतीदिन

भालजी पेंढारकरांनी कोल्हापूर हे मराठी चित्रपट बनवण्याचे प्रमुख केंद्र बनवले. त्यांच्या जयप्रभा स्टुडिओ मधून एकाहून एक उत्तम चित्रपट निर्मिले गेले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा संच म्हणजे कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम, वगैरे…

चित्रपटाच्या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, चंद्रकांत मांडरे, सूर्यकांत मांडरे, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. शिवाजीराजांचा चा काळ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकिर्दीमुळे भालजींना यथार्थतेने चित्रतपस्वी असे म्हटले जाते.

१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओ जाळला गेला. नुकताच तयार झालेला मीठभाकर व बाळ गजबरांचा “मेरे लाल” हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून जयप्रभास परत उभे केले. जिद्दीतून मीठभाकर व मेरे लाल ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस पुन्हा एकदा वेग मिळवून दिला.

भालजींचे चित्रपट

आकाशवाणी, कान्होपात्रा, कालियामर्दन, गनिमी कावा, गोरखनाथ, छत्रपती शिवाजी, नेताजी पालकर, बहिर्जी नाईक, भक्त दामाजी, मराठा तितुका मेळवावा, महारथी कर्ण, मीठभाकर, मोहित्यांची मंजुळा, राजा गोपीचंद, वाल्मिकी, साधी माणसं, सावित्री, सुवर्णभूमी

भालजींनी योगेश या नावाने गाणी लिहिली ती गाणी देखील लोकप्रिय आहेत.

१) अखेरचा हा तुला दंडवत

२) अरे नंदनंदना

३) डौल मोराच्या मानच्या र

४) तुझी माझी प्रीत जमली नदीकाठी

५) माझ्या कोंबड्याची शान

६) माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचं पाणी जात

७) राजाच्या रंगमहाली

९) वाट पाहुनी जीव शिणला

१०) चल चल जाऊ शिणुमाला.

सिनेसृष्टीतला दादासाहेब फाळके हा अत्युच्च  पुरस्कार त्यांना १९९१ साली प्रदान केला गेला.

भारत सरकारने  त्यांच्या  सन्मानार्थ टपाल तिकीट काढले होते.

भालजी पेंढारकर यांना विनम्र अभिवादन

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌸 जीवनरंग 🌸

दोन लघुकथा – बक्षिसी… / चांगला पर्याय – A better option श्री मकरंद पिंपुटकर

(१) बक्षिसी…

सकाळची वेळ. सुषमा आपली गावातल्या घराच्या व्हरांड्यात नुकती कुठे बसत होती.

तिचे गेले दोन चार दिवस खूपच धावपळीचे गेले होते. अगदी घोटभर चहाही गळ्याखाली उतरला नव्हता दोन दिवसांत.

पण आता सगळीच धावपळ संपली होती, शांत झाली होती.

सकाळची वेळ होती. दिवसाचा पहिला चहा करून सुषमाने आपल्या सासूला दिला, आणि व्हरांड्यात बसून, स्वतः पहिला घोट घेणार, एवढ्यात दारासमोर रिक्षा थांबली. आणि त्यातून उतरणारी शम्मो, कम्मो, राजो, राणी आदि तृतीयपंथींना बघून सुषमाला पुढे काय होणार ते तिला उमगलं.

साठ एक वर्षांची राणी त्यांची म्होरक्या – सगळ्यात पुढे होती.

“कुठं आहे आमची नवी सून ? हाय दैय्या, अजून बेडरूममध्येच आहे का ? आणा, आणा तिला बाहेर. तिला आशिर्वाद द्यायचे आहेत आणि आमची बक्षिसी घ्यायची आहे, ” घुंगरू मागवत राणीची वटवट सुरू झाली.

“सूनबाई नाहीये इथे, ” तिला मध्येच थांबवत सुषमा शांतपणे म्हणाली.

“ओ हो, हनीमूनला गेले का ? कुठे गेले – गोवा का काश्मीर का लक्षद्वीपला ? आणि परत कधी येणार ? आम्हाला सांगा, आम्ही तेव्हा परत येऊ, ” राणीची टकळी लगेच नव्या ट्रॅकवर सुरू झाली.

“नाही, ते परत येण्यासाठी नाही गेले. ते वेगळे झाले. ते दुसऱ्या नव्या घरात राहायला गेले. ” सुषमा.

“आं, ते का बुवा ?” 

कधी नव्हे ते राणीला पुढं काय बोलावं ते सुचेना.

“तू यांना ओळखतेस ना ?” व्हीलचेअरवर बसलेल्या आपल्या सासूकडे बोट दाखवत सुषमाने विचारलं.

“म्हणजे काय ? तू लग्न होऊन इथे आलीस तेव्हा तुझी बक्षिसी घ्यायला मीच आले होते की. त्याच्या आधीपासून ओळखते मी तुझ्या सासूला. ” राणी म्हणाली, पण काय चालले आहे याचा तिला अजून उलगडा होत नव्हता.

“आमच्या नव्या सूनेला माझ्या या सासूबाईंची अडचण होत होती. तिला घरात ही अशी dustbins नको होती. तिचं माझ्या लेकाशी आधीच बोलणं झालं होतं म्हणे. त्याला तिचं म्हणणं मान्य होतं, पण आम्हा दोघींना सांगायची हिंमत झाली नव्हती.

लग्नाचे विधी पार पाडून वरात घरी आली, पाहुणेरावणे काल गेले आणि संध्याकाळीच हे दोघेही नव्या घरात शिफ्ट झाले.

मला म्हणत होती तूही ये म्हणून. पण मी काही सासूबाईंना सोडून गेले नाही. ते त्यांच्या घरात सुखी आहेत, मी माझ्या घरी. “

मंद हसत राणीने घुंगरू पायात बांधायला सुरुवात केली, सुषमा हैराण झाली.

“अग, हे एवढं रामायण ऐकूनही तू नाचणार आहेस ?”

“हो तर. बक्षिसी घ्यायला आली आहे, बक्षिसी घेऊनच जाणार. वर्षानुवर्षे नव्या सुनेसाठी बक्षिसी घेते, आज पहिल्यांदाच, सासूला जपणाऱ्या अशा सुनेबद्दल तिच्या सासूकडून बक्षिसी घेईन. काय आज्जी ?” व्हीलचेअरवरच्या आजींकडे सहेतुकपणे पहात राणी म्हणाली.

दिलखुलास हसत, आजीबाईंनी आपल्या बटव्यातून पाचशेची नोट काढली, राणीला दिली.

राणीने सुषमावरून ती नोट ओवाळली, तिची अलबला काढली. ते पाचशे रुपये कम्मोला दिले. आपल्या पर्समधून एकशे एक रुपये काढून तिनं सुषमाला दिले, म्हणाली, “हे माझ्याकडून बक्षीस तुला. तू नेक काम करते आहेस. सुखी रहा. “

आणि मग मंडळींनी घुंगरू बांधले, ढोल वाजू लागले, आणि राणी, शब्बो, कम्मो, राजो – सगळ्याच जणी बेभान होऊन नाचल्या, नाचतच राहिल्या.

लेखक : श्री मकरंद पिंपुटकर 

= = = = = =

(२) चांगला पर्याय – a better option

नोकरीतील कामासाठी मला दर आठवड्याला एकेकदा पुण्याहून सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जावे लागायचे, रात्री घरी परत.

खेड शिवापूरच्या ठरलेल्या धाब्यावर जेवण व्हायचं. इतक्या वर्षांच्या वेगवेगळ्या trial and error नंतर आता जेवणाचा मेनू ठरलेला आहे. पापड, ३ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, आणि गोड म्हणून श्रीखंड वाटी.

सवयीने टेबलही ठरलेले आहे, “काय हवं ?” विचारायला येणारा वेटरही ठरलेला आहे. आताशा तर तो काय हवं हे विचारतही नाही. मी आलो की पापड आणून ठेवतो, आणि मग बाकीचं जेवण.

कालही तसंच झालं. मी माझ्या नेहमीच्या टेबलावर बसलो, पण माझा नेहमीचा वेटर दिसत नव्हता, पण दोन मिनिटात एक तरुण पोरगं आलं, “ते शंकरभाऊंना बरं नाहीये, आज रजेवर आहेत ते. “

अच्छा, म्हणजे, माझ्या अन्नदात्याचं नाव शंकर होतं तर. “बरं मग, तुझं नाव काय आहे ?” 

“सचिन, सर. “

काळा सावळा, तरतरीत, चापून चोपून पाडलेला भांग, कॉलरशी झिजलेला, थोडा चुरगळलेला पण स्वच्छ हाफ शर्ट, पायात चपला.

“बरं, सचिन, असं कर, मला एक पापड… ” मी सांगायला सुरुवात करत होतो, तेवढ्यात मला हाताने थांबवत तो म्हणाला, “माहिती आहे, सर. २ पोळ्या, रायता, दाल तडका, दही, श्रीखंड. ” 

“अरे व्वा, गृहपाठ झाला आहे तर. ठाऊक आहे तर मग आण लवकर, मित्रा, पोटात कावळे कोकलत आहेत. “

तो थबकला, म्हणाला, “सर, हरकत नसेल तर एक better option सुचवू ?”

“बोला, काय better option सांगताय ?” मला रूटीन बदलायला आवडत नाही. आणि एका वेटरच्या सांगण्यावरून तर नाहीच नाही. पण एकदम काहीतरी खवचटपणे बोलणं योग्य वाटलं नाही मला.

“सर, तुम्ही त्यापेक्षा आमची veg थाळी घेता का ? दोन पोळ्या, दोन भाज्या, दाल तडका, भात, रायता, दही, खीर, पापड अशी थाळी असते. तुम्हाला भात नको असेल तर त्या ऐवजी एक पोळी extra घेता येईल सर, किंवा एक भाजी कमी करून extra पोळी घेता येईल आणि तुमच्या नेहमीच्या बिलापेक्षा २०% कमी बिल होईल, सर. ” त्यानं सांगितलं.

मी मेनू कार्ड पाहिलं. तो बरोबर सांगत होता.

मला आश्चर्याचे एका पाठोपाठ एक धक्के बसत होते.

एकतर तो माझ्या टेबलवर कधीच आला नव्हता, तरीही मला काय हवं ते त्याला ठाऊक होतं. Better option म्हणण्याइतकं त्याला इंग्रजी येत होतं, बोलताना नम्रपणे बोलत होता, भाताऐवजी अथवा भाजीऐवजी पोळी देण्याची मॅनेजमेंट त्याला उमगत होती, आणि तो टक्केवारीची गणितं तोंडी करू शकत होता.

“तू काय करतोस ?” मी त्याला विचारता झालो.

“सर, इथे वेटर आहे, ” काहीसं गोंधळून तो म्हणाला.

“नाही, नाही. त्याव्यतिरिक्त काय करतोस ?”

“दिवसा एमपीएससी ची तयारी करतो, सर. रात्रपाळीच्या नोकरीचे दोन पैसे जास्त मिळतात, आणि निवांतपणा असला तर दोन पुस्तकंही वाचता येतात. ” आत्मविश्वासानं तो म्हणाला.

“मित्रा, better option च घेऊन ये. “

जेवण झालं, छान होतं. बिल घेऊन सचिन आला. मी बिल दिलं, पण आज मी टिप नाही ठेवली.

याच्यासाठी पैश्यांची टिप महत्त्वाची नव्हती.

माझ्या खिशाला पार्करचं चांगलं पेन होतं. मी ते खिशातून काढलं, आणि त्याच्या खिशात ते ठेवलं. “तुला सह्या करण्यासाठी, ” मी म्हटलं.

त्याचे डोळे लकाकले.

सगळी सुखं हात जोडून उभी असतानाही बहाणेबाजी करणारी एक जमात आहे, आणि गरीबी पाचवीला पूजली असताना, पोट हातावर असताना, नशिबाला दोष न देता, मेहनतीने better option शोधणारा एक वर्ग आहे.

सचिन या दुसऱ्या वर्गातला आहे. दिवसा अभ्यासाने स्वप्नांची दुनिया सजवत आहे, रात्री मेहनत करून सध्याच्या दुनियेत जगण्याची तजवीज करत आहे.

आणि सचिन नक्की जिंकणार, कारण याच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये, आणि जिंकण्यासाठी अख्खी दुनिया.

मी उद्याच्या एका प्रशासकीय अधिकाऱ्याला एक पेन भेट म्हणून दिलं आले.

परिस्थितीबद्दल रडगाणं गाण्यापेक्षा, ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणं हाच better option आहे.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं. ती मनातल्या मनात रडू लागली. पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.) – इथून पुढे 

म्हणता म्हणता ती साठ वर्षाची झाली. जय बारावी झाला, मग तो B. Farm ला गेला. त्याला व्यवसायाची आवड म्हणून तिने त्याला “जय एजन्सी ‘सुरु करून दिली. एवढी वर्षे ती मेडिकल चालवत होती, त्यामुळे तिच्या ओळखी होत्याच. एका वर्षात त्याला वीस कंपन्याच्या agencies मिळाल्या. दहा माणसे कामाला ठेवली. जोरात धंदा होऊ लागला. मग माल सप्लाय करण्यासाठी टेम्पो घेतला. त्याला मुली सांगून येऊ लागल्या, मग परंजपे डॉक्टर यांच्या ओळखीच्या कुटुंबातील वर्षा चें स्थळ आले आणि जयचे लग्न होऊन वर्षा सून म्हणून घरात आली.

गॅलरीतल्या खुर्चीवर बसल्या बसल्या आशुच्या डोळ्यसमोर तिच्या आयुष्याचा चलदचित्रपट सरकत होता. साठ वर्षे आपण पुरी केली, कळलेच नाही. या आयुष्यात आईवडिलांसारखे विजुआते आणि काका तसेच डॉ पराजपे यांचे उपकार न विसरण्याजोगे. याच आयुष्यात शिरीष भेटला आणि मनात वसला तसेच बाहेर पण पडला.

हे आपले साठ वर्षाचे आयुष्य. जय आणि वर्षा यांनी आपली एकस ष्ठी ठेवली आहें आणि तो विचारतो, जन्मदात्याला आणि काकाकाकूला बोलवणार का, म्हणून?

काय केल बाबा तूझ्या पित्याने?

काकाकाकूने? हाकलून दिल घरातून, पुन्हा चौकशी पण केली नाही कधी. जिवंत आहोत का मेलो याची..

आशुची एकसष्ठी पार पडली. बहीण भावोजी, भाचरे, भाऊ वहिनी तसेच मावंशी आणि तीच कुटुंब, विजुआते, डॉ काका, डॉ पराजपे फॅमिली हॉस्पिटलस्टाफ, जिल्ह्यातील केमिस्ट परिवार तसेच अनेक ओळखीची मंडळी हजर होती. कार्यक्रमला मंगळसूत्र घातलेल्या बाईचा नवरा उपस्थित नाही म्हणून काही मंडळींनी कुजबुज केली पण ज्यांना आशुची परिस्थिती माहित होती, त्यांना आश्यर्य वाटले नाही.

सर्व मंडळी आपापल्या घरी गेली, पुन्हा आशू मेडिकल मध्ये आणि जय वर्षा एजन्सी मध्ये मग्न झाले. एक दिवस वर्षाने आपल्या नवऱ्याला म्हणजे जयला विचारले 

“जय, तूझ्या आईचा जवळजवळ पस्तीस वर्षे नवऱ्याशी संबंध नाही मग तिला दुसरे लग्न करावे असे वाटले नाही कधी?

“विजआजी मला एकदा म्हणाली होती, शिरीष गोखले नावाचा एक कोल्हापूरमधील MR तिला आवडायचा, असे आईने आजीला सांगितले होते. त्याची बायको घटस्फोट घेणार होती आणि मग आई घटस्फोट घेऊन त्यांच्याशी लग्न करणार होती, पण काही कारणाने ते लग्न झाले नाही. शिरीष गोखले आता कुठे असतांत कोण जाणे?

एक दिवस आशू दुकानात असताना जयचा फोन आला “आई, गावाकडून काकूने निरोप दिला आहें, तुझे बाबा जास्त आजारी आहेत, त्यांना घेऊन जा ‘

“आत्ता आठवण झाली का आमची, पण तुझा पत्ता त्यांना कळला कसा?

“अग त्या गावातील एक मुलगा माझ्या एजन्सी मध्ये कामाला आहें, त्याने त्यांना सांगितले असणार. ‘

“काय आजारी आहेत?”हार्ट अटॅक आलाय बहुतेक ‘.

“ठीक आहे, मुलगा आहेस म्हणून कर्तव्य कर, गाडी घेऊन जा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कर ‘.

जय गाडी घेऊन गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला आणि डॉ परकार हॉस्पिटल मध्ये त्याना ऍडमिट केले.

हॉस्पिटल मध्ये सर्व तपासण्या झाल्या आणि बायपास करायला हवे असे डॉ नी सांगितले. जयने सर्व पैश्याची व्यवस्था केली. जय रोज हॉस्पिटल मध्ये जात होता पण आशू एकदाही गेली नव्हती. पंधरा दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. आधल्या दिवशी जय आईला म्हणाला “आई, ते म्हणत आहेत, माझे गावाकडे खुप हाल होत आहेत, जेवणं पण मिळत नाही, खिशात पैसे नाहीत, मी तुमच्याघरी येऊ काय?’

आशू कडाडली -“जय, त्यांना त्यांच्या घरी पोहोचून ये. त्या घाणीतून मी पस्तीस वर्षांपूर्वी मी तुला घेऊन बाहेर पडले, ती घाण परत माझ्या घरात नको. आणि परत असले निरोप मला देऊ नकोस. यांनतर तूझ्या माणसाला सांगून ठेव, त्या घरातले बरे किंवा वाईट निरोप दयायचे नाहीत. मी इथे मानाने रहाते आहें, मानिनी सारखी. त्यांची दृष्ट लागायला नको ‘.

जय वडिलांना गावी पोहोचून आला.

    आशुचे आयुष्य नेहेमीसारखे सुरु होते, सून वर्षा हल्ली सतत म्हणायची “आई, तुम्ही कुठेच फिरला नाहीत. अजून धड कोकण पाहिले नाहीत. केंव्हा तरी लग्नकार्याच्या निमित्ताने मुंबई किंवा पुणे, ते पण घाईत. लोक आता युरोप ट्रिप करतात, नर्मदा परिक्रमा करतात, तुम्ही पण जा ना… ,

आशू मनात म्हणायची, मला पण जावेसे वाटते पण जाऊ कुणाबरोबर…

रोज सारखा कंटाळवाणा दिवस सुरु होता, निमा आणि मीना काऊंटर सांभाळत होत्या, आशू स्टोकिस्ट कडून आलेली बिले चेक करत होती, एव्हड्यात दुकानासमोर रिक्षा थांबली आणि गृहस्थ हातातील बॅग सांभाळत सरळ आत येत म्हणाला “मॅडम, चहा मागवा ‘.

आशू चमकली, तोच आवाज, बोलण्याची तीच पद्धत वीस वर्षा पूर्वीची. तिने झटकन मान वर करून पाहिले, डोळे विसफ़ारले, चेहरा आश्रयचकित झाला, ती किंचाळली “शिरीष ‘.

काही कळायच्या आत ती त्याला बिलगली. शिरीषने तिला थोपटत म्हणाला, “होय आशू, मी शिरीष ‘.

ती रडत रडत म्हणाली “अरे तू आहेस?

“होय आशू, मी आहें. तुला कुणीतरी सांगितले असेल मी आत्महत्या केल्याचे. करायचा होता मला नाश स्वतःचा, पण शेजाऱ्यांनी धावपळ करून मला वाचवलं, आता गेल्या महिन्यात ती पण गेली कॅन्सरने. माझा शत्रू संपला पण मी आहें ‘.

आशुच्या लक्षात आलं, आज आपण जे वागलो ते पाहून दुकानातल्या मुलींना आश्यर्य वाटलं असणार. ती परत शिरीष पासून अलग झाली आणि त्याला म्हणाली “चल, आपण घरी जाऊ, मला तुझ्याशी खुप खुप बोलायचं आहें ‘. निमाला दुकानाकडे लक्ष दयायला सांगून तिने रिक्षा बोलावली आणि त्याला घेऊन ती घरी आली.

मग शिरीषने आपली सर्व हकीकत सांगितली. मग बायको आपल्यावर कसा लक्ष ठेऊन असायची. कुणाला फोन करतो, कुणाचा येतो हे पहायची. रोज पैशावरून, जेवणावरून भांडणे. आपण या काळात तीन नोकऱ्या सोडल्या. कंटाळून खुप झोपेच्या गोळया घेतल्या, पण शेजारी बरा होता त्याच्या लक्षात आले, त्यानी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले आणि वाचवले. कंटाळवणे आयुष्य चालले होते. दोन वर्षांपूर्वी बायकोला कॅन्सर झाला. मी हयगय न करता सगळे उपचार केले पण उपयोग झाला नाही, आपण जगत नाही हे लक्षात आल्यावर तिला माझ्या बरोबर दुष्ठपणाने वागल्याचा पक्षचताप झाला, तिने क्षमा मागितली आणि पंधरा दिवसात ती गेली ‘.

आशू शिरीषला म्हणाली “शिरीष, तू पुन्हा भेटशील ही आशा मी सोडली होती, माझ्या मनातला पुरुष तूच होतास, आता मी समाजाचा विचार करणार नाही, माझ्यावर कसल्या जबाबदाऱ्या नाहीत. जय चें लग्न झाले आहें, दुकान, एजन्सी जोरात सुरु आहें, पण मी एकटी आहें रे, तुझ्यावाचून मी अपुरी आहें, मला या वयात साथी हवा आहें आणि तो तूच आहेस. आपण लग्न करू आणि आयुष्याचा शेवटचा काळ एकमेकासामावेत घालवू, नाही म्हणू नकोस शिरीष..

“नाही कशाला म्हणू आशू, मी मनापासून तुझ्यावरच प्रेम केलाय. ‘

“तर मी आज जय आणि वर्षाला सांगते, आम्ही लग्न करतोय म्हणून ‘

    त्याच दिवशी जय आणि वर्षा घरी आली आणि अनोळखी माणूस पाहून चक्रवली.

आशू ने जयला ओळख करून दिली 

“जय, हा शिरीष, शिरीष गोखले.

जयला एकदम आश्यर्य वाटले, त्याने त्यांचे नाव विजूयाआजी कडून ऐकले होते. त्याला माहित होत, आईला यांच्याशी लग्न करायची इच्छा होती.

“अरे हो, छान छान.. मी ऐकलं होत तुमच्याबद्दल.. विजू आजी म्हणाली होती ‘

“हो ना, जय तेंव्हा आम्ही लग्न करू शकलो नव्हतो, पण समाज काय म्हणेल, कोण काय म्हणेल याची पर्वा न करता आम्ही लग्न करत आहोत ‘.

 जयच्या डोळयांतून पाणी आलं, आपल्या आईने कसे संन्यासी सारखे आयुष्य काढले, हे त्याने पाहिले होते. आईला सुख मिळालेच पाहिजे निदान या वयात.

जयने शिरीषला मिठी मारली, वर्षाने आशूला मिठी मारली.

चार दिवसांनी आशू आणि शिरीष यांचे मोजक्या लोकात लग्न झाले.

जयने दुसऱ्या दिवशी दोन युरोप ट्रिपची तिकिटे शिरीषच्या हातात ठेवली.

आयुष्यात पहिल्यांदा आशू विमानात बसणार होती. ती घाबरत नव्हती कारण तिचा प्रिय शिरीष तिच्यासमवेत होता. त्याचा हात हातात घेऊन ती लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंड, जर्मनी फिरणार होती.

– समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.) – इथून पुढ़े 

मी – तुम्हाला शिरीष गोखले माहित असतील ना?

MR – हो, का?

मी – मी त्यांच्याकडे गेल्या महिन्यात ऑर्डर्स दिली होती, त्याने कुठल्या एजन्सी कडे दिली काही कळत नाही, अजून माल आला नाही, म्हणून..

  1. R -मॅडम, शिरीष माझा मित्रच. तो सध्या डिस्टर्ब मूड मध्ये आहें.

मी – काय झालं? आजारी आहें का तो?

  1. R.-आजारी नाही. त्याची बायको घर सोडून गेली आहें कायमची.

मी – का? एवढा चांगला नवरा आणि..

  1. R-शिरीष चांगलाच आहें हो. पण त्याची बायको तऱ्हेवाईक आहें, कुणाशी तिचे पटत नाही, त्यांची रोज भांडणे व्हायची. आता मात्र ती कायमची घर सोडून गेल्याचे मला समजले आणि त्यामुळे शिरीष…

मी – त्या मूळे शिरीष सतत दारूच्या नशेत. कुणाला भेटत पण नाही, फोन केला तर हॅल्लो करतो आणि ठेऊन देतो.

आशुच्या लक्षात आले, शिरीष कडे फोन आहें.

मी – तुमच्याकडे त्यांचा फोन नंबर आहें का?

MR- आहें

अस म्हणून त्याने आशूला शिरीषचा लँडलाईन नंबर दिला.

शिरीष सतत दारूच्या नशेदेत त… काय हे, एवढा हुशार देखणा पुरुष आणि याची बायको याच्याशी भांडतेच .. आणि आता सोडून गेली म्हणे…

दैव देत आणि कर्म.. असच नाही का… मला असा नवरा मिळाला असता तर.. आयुष्य म्हणजे आनंदाच झाड झालं असत..

आशूने मिळालेल्या फोन नंबर वर फोन लावला.

आशु – हॅल्लो, शिरीष बोलतात काय?

शिरीष दारूच्या नशेत होता. मोठया प्रयासाने त्याने रिसिव्हर उचलला.

शिरीष – कोण बोलताय?

आशु – मी आशा, रत्नागिरीहुन, जय मेडिकल..

शिरीश ची खाडकन दारू उतरली. तो रेसिव्हर सांभाळत उत्तरला 

शिरीष – कोण मॅडम? कसा काय फोन केला? आणि माझा नंबर कुठे मिळाला?

आशू – नंबर कसा मिळाला हे महत्वाचे नाही, तुमचे काय चालले आहें?

शिरीष – कसले आणि काय?

आशु – मला कळले आहें तुम्ही व्यसनात अडकला आहात. माझी इच्छा आहें की तुम्ही आज पासून हे व्यसन बंद करा आणि पूर्वीसारखे कामाला लागा.

शिरीष – हो मॅडम, आज पासून नव्हे आता पासून व्यसन बंद.

आशु – माझा तुमच्यावर विश्वास आहें, ठेवते.

आशूने फोन ठेवला, शिरीषआश्यर्य चकित झाला,्जी आपल्याला आवडते ती जय मेडिकलची मालकीनीने स्वतः आपल्याला फोन केला.आपण तिला आवडतो की काय?मग तिच्या गळ्यातील काळे मणी आणि कुंकू.. याचा अर्थ काय?

थोडी तब्येत बरी झाल्यानंतर शिरीष रत्नागिरीत आला. आल्या आल्या तो जय मेडिकल मध्ये आला. त्याला पहाताच आशूला मस्त वाटलं. त्याची तब्येत बरी दिसताच तिला आनंद झाला.

आशू – कशी आहें तब्येत?

शिरीष – कशी दिसते? चांगली आहें.

आशू – आयुष्यात असे प्रसंग येत असतात, स्त्रियांवार सुद्धा येतात पण कोण व्यसने सुरु करत नाही, त्याला तोंड द्ययच असत.

शिरीष – तुमच्यावर असे प्रसंग आले नाहीत म्हणून..

आशू – आले होते नव्हे त्यात मी अडकले आहें पण..

शिरीष – कसला प्रसंग मॅडम..

आशू – हे दुकान आहें, सांगेन.. कुणाला तरी सांगावे असे वाटते.. पण आज आणि इथे नको.

शिरीष – मग केंव्हा?

आशू – मी फोन करेन तुम्हाला..

बर अस म्हणून आणि चहा पिऊन शिरीष गेला.

शिरीष कोल्हापूरात गेला पण रोज आशुचा फोन येईल म्हणून वाट पहात होता. पण चार दिवस झाले तरी तिचा फोन आला नाही.

इकडे आशू विचार करत होती, खरच हे संबंध वाढवावे की आत्ताच कट करावेत. आपल्याला हे झेपेल? जय चें काय,? आपली बहीण, भाऊ, विजू आते, काका? डॉ परांजपे फॅमिली? आणि आपला अजून घटस्फोट नाही झालेला? शिरीषचा पण नाही झालेला.

शिरीष आपल्याला हवासा वाटतो, सतत सोबत असावासा वाटतो. त्याच्या खांद्यावर मान ठेऊन समुद्राकडे पहात राहावंसं वाटतं.अजून आपण तरुण आहोत, तरुण स्त्री च्या सर्व इच्छा भावना आपल्यालाही आहेत.

पाच दिवस वाट पाहून मग शिरीषने तिला कॉल लावला. ती खुप आंनदीत झाली. तिने आपला सर्व भूतकाळ त्याला सांगितला.त्याला खुप वाईट वाटलं.त्यानेही आपली घरची परिस्थिती, आईवडील, नोकरीं, लग्न, मूल न होणं वगैरे सांगून आपलं मन मोकळ केल.

आणि मग रोज रात्री उशिरा जय झोपल्यावर त्यांचे फोनवर बोलणे सुरु झाले. शिरीषने तिला जीवनसाथी बनण्याची इच्छा व्यक्त केली.आशुने सर्व अडचणी सांगितल्या. अजून घटस्फोट न घेतल्याचे सांगितले. त्यावर त्याने इतकी वर्षे स्वतंत्र राहिल्यानंतर सहज घटस्फोट मिळेल असे सांगितले आणि पुढील आठवड्यात आपण रत्नागिरीमध्ये येत असून त्यावेळी मराठे वकिलांना भेटूया, असे सांगितले. तसेच आपली पत्नी बहुतेक या महिन्यात आपणाकडून घटस्फोट मागणार अशी बातमी आपल्याला कळली असल्याने ती पण अडचण नाही, असे सांगितले.

आशू आंनदात होती. तीच मन मोरासारखे थुई थुई नाचत होते. गेली कित्येक वर्षात ती देवळात गेली नव्हती. आता ती देवळात जाऊन देवाचे दर्शन घेत होती. येताना फुलांच्या दुकानात जाऊन रोज कुठल्या न कुठल्या फुलाचा गजरा घेऊन केसात माळत होती.तिने स्वतः साठी फारसे ड्रेस किंवा साडया घेतल्या नव्हत्या, आता मात्र तिने जय साठी कपडे घेतलेच पण आपल्यासाठी शोभणारे ड्रेस तसेच साडया, सॅन्डल्स घेतले. घरात नवीन फर्निचर घेतले.

शिरीष पुढील आठवड्यात आला म्हणजे वकिलांना भेटून घटस्फोटची नोटीस दयायची,अशा आंनदात आशू होती. शिरीष पण घटस्फोट घेईल, मग आतेला, बहीण भावाला सांगायचे असे तिने ठरवले. सर्वाना आनंदच होईल हे तिला माहित होते.

रोज रात्री त्या दोघांचा फोन ठरलेला होता.शनिवारी रात्री तिने फोन लावला, दुसऱ्यादिवशी दुकान बंद म्हणून तिला बोलण्यास वेळ होता.

“हॅल्लो शिरीष… तिने लाडाने त्याला विचारले 

“कोण? तू मेडिकलवाली काय, माझ्या नवऱ्याला फुस लावतेस?”पलीकडून खेकसत एका स्त्रीचा आवाज आला.

आशू घाबरली 

“कोण.. कोण.. शिरीष आहें…

“शिरीष हवाय तुला? तुला लाज वाटतं नाही एका लग्न झालेल्या पुरुषाला रात्रीअपरात्री फोन करायला..आणि तिने असभ्य भाषेत शिव्या द्यायला सुरवात केली.

आशू गडबडली. तिने फोन खाली ठेवला.पाच मिनिटानंतर पुन्हा फोनची रिंग वाजली, तिला वाटले शिरीषचा फोन असेल. पलीकडून तीच बाई बोलत होती 

“ए भवाने, मी शिरीष गोखलेची बायको बोलते आहें, मला कळलं हल्ली माझा नवरा रत्नागिरीत पडलेला असतो, कोणी मेडिकलवाली भुलवते आहें त्याला, पण लक्षात ठेव मी जिवंत असेपर्यत काही घडणार नाही, मी दोघांना जेलमध्ये घालेन, माझ्या नवऱ्याचा नाद सोड, दुसरा कुणी पकड…. आणि ती बरीच बडबडत राहिली,शिव्या देत राहिली.

आशू सुन्न झाली. तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली एका मिनिटात. आशू रडू लागली, आयुष्यात प्रत्येक ठिकाणी ठोकरच बसते आहें.

मग दुसऱ्या दिवशी शिरीषचा फोन आला, तो रडत तिची माफी मागत होता. हे पण संकट जाईल अस म्हणत होता, पुन्हा आपण एकत्र येऊ अस म्हणत होता, तिने त्याचे म्हणणे ऐकले आणि शांतपणे रेसिव्हर खाली ठेवला.

शिरीष नावाचा चॅप्टर तिने बंद केला. पुन्हा ती देवळात जायची बंद झाली, गजरा माळायची बंद झाली. आता घर, रोजचे जेवणं, डबा घेऊन दुकानात जाणे, जयचा डबा, त्याची शाळा, केंव्हातरी विजू आतेकडे जाणे, भावाबहिणीला फोन करणे बस्स..

तिच्या दुकानात रोजच M. R. येत असत, त्यांच्या गप्पातून तिला कळलं, शिरीषने पुण्याला बदली घेतली. मग काही दिवसांनी कळलं, शिरीषने कंपनी बदलली आता तो मराठवाड्यात असतो. त्याच्या बायकोचे आणि त्याचे रोज भांडण होते, मारामारी रोजची इत्यादी.ती निर्वीकार मानाने सर्व ऐकत होती.

एका दिवशी ती नेहेमीप्रमाणे दुकानात असताना एका कंपनीचा MR तिला म्हणाला 

“तुम्हांला कळलं का मॅडम, शिरीष गोखलेने आत्महत्या केली म्हणे.

ती किंचाळली “काय?’

“म्हणजे अजून गेला नाही तो, हॉस्पिटल मध्ये आहें पण सिरीयस आहें अशी बातमी आहें ‘.

तो MR गेला पण तिच्या काळजाचे पाणीपाणी झालं.ती मनातल्या मनात रडू लागली.पुढे काय झालं शिरीषचे हे तिला कळेना. कुणाला विचारावे तरी पंचायती.

– क्रमशः भाग तिसरा 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.) – इथून पुढे.

काकी –अग, या वेळी.. आणि तूझ्या डोकयातून रक्त येतेय.. आणि जय का रडतोय?

तोपर्यत काका पण बाहेर आले, त्यानी आशाची परिस्थिती पाहिली. त्यांच्या लक्षात आले, घरी मारझोड झाली आहे.

काका –अग तिला आत तर येउदे.

आशा आणि यश आत आले. काकीने तिला पाणी दिले.

काकी –काय झाले ग? मारलं का तुला?

आशा – होय काकी, जावेने काठीने मारले आणि यांनी घरातून बाहेर फेकून दिले. काका, आजची रात्र मला आसरा द्या. उद्या मी विजूआतेकडे जाणार. आजची रात्र मला आसरा द्या.

काका –अग, रहा ना. आसरा कसला? आमची मुलगीच तू.

काकीने दोघांना आत घेतले. चटकन गॅस वर भात ठेवला, दही होतच. दहिभात दोघांना वाढला. कपडे बदलायला दिले.

आशा –काकी, उद्या सकाळच्या गाडीने मी रत्नागिरीला जाते. विजू आतेने मला सांगून ठेवलय, घरात काही त्रास झालं तर आपल्याकडे यायचं. काकी, मला फक्त पन्नास रुपये द्या,S.T तिकिटासाठी.

काकी –काही काळजी करू नकोस. मी इथे राहा पण म्हंटल असत, पण याच गावात राहिलीस तर तूझ्या घरच्यांना कळणार आणि मग मला शिव्या खायला लागणार.

आशा –बरोबर आहें काकी, आणि मला स्वतःच्या पायावर उभ राहायला हवं आणि जयचं पण पुढील आयुष्य आहें, यासाठी रत्नागिरी सारखं शहर हवंच.

त्या रात्री ती आणि जय काकीकडे राहिली, सकाळी लवकर उठून काकांनी दिलेले पाचशे रुपये घेऊन तिने रत्नागिरीला जाणारी बस पकडली.

आशा जयला सोबत घेऊन सकाळच्या गाडीने रत्नागिरीत पोहोचली आणि चालत चालत मधल्या आळीतील विजुआतेच्या घरी आली, विजुआतेचे यजमान जे डॉक्टर होते, ते स्कूटरवर किक मारून दवाखान्यात जाण्यासाठी तयार होते, त्यानी तिला मुलासोबत येताना पाहिले. त्यानी बायकोला हाक मारून सांगितले

” विजू, अग आशा येते आहें जयला घेऊन ‘.

विजआते गडबडीने बाहेर आली. आशा ला पाहून तिला आनंद झाला पण एवढे सकाळीच आलेली पाहून काळजी पण वाटली.

“अग आशु, सकाळीच, ये ये…

विजूआतेला पहाताच आशाच्या गळ्यात कोंडून ठेवलेला हुंदका बाहेर पडला आणि आतेच्या गळ्यात पडली.

“अग अग आशु, काय झालं, तू आत ये पाहू.

तिने तिच्या नवऱ्याला दवाखान्यात जायला सांगितले. आशु आणि जयला घेऊन ती आत आली. प्रथम तिने जयला दूध बिस्किटे दिली आणि आशूला चहा पोहे.

मग आशुने आतेला सर्व हकीकत सांगितली, डोकयावरची खोक दाखवली. आते तिची खोक पाहून हळहळली. आते म्हणाली

“आशु, तू आता आंघोळ कर, जयला आंघोळ घाल, आराम कर. दुपारी हे आले की मग ठरवू काय करायचे ते ‘.

दुपारी डॉक्टर घरी आले, मग सर्वांची जेवणे झाली. आतेने डॉक्टरना आशुची सर्व हकीकत सांगितली. डॉक्टरनी पण आशूला लहानपणा पासून पाहिलेले, तिचे लाड केलेले. तिची अशी अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले. त्यानी आशूला विचारले.

“आशू, तुला परत त्या घरात जायचे आहें काय? असेल, तर पोलिसांकडे तक्रार करून तुला मानाने घरात प्रवेश मी मिळवून देतो आणि घरातल्या सर्व मंडळींना सक्त सूचना देऊन ‘.

“नाही काका, मला त्या घरात जायचे नाही, नवऱ्याशी संबंध ठेवायचे नाहीत, मला माझ्या पायावर उभे राहायचे आहें, त्यासाठी धंदा, नोकरीं करून जयला मोठं करायचे आहें ‘

“ठीक आहें, तू कष्ट करायची तयारी ठेव, आम्ही तूझ्या पाठीशी आहोत.’

जुलै महिना सुरु होता, डॉक्टरकाकांनी रत्नागिरीच्या फार्मसी कॉलेज मधून D.farm चा फॉर्म आणला आणि आशुचे फार्मसी कॉलेज सुरु झालं. जय आता शेजारच्या बालवाडीत जाऊ लागला होता. विजूआतेचा एकच मुलगा सुनील पुण्यात मेडिकला होता, त्यामुळे रत्नागिरीत आते आणि डॉक्टरकाका दोघेच असायचे. त्यामुळे त्याना पण आशू आणि जय मूळे जाग होती.

आशूकॉलेज मध्ये जाऊ लागली, कॉलेज मधील मूल तिच्यामागून कॉमेंट्स मारत होती, पण कुणाकडेही लक्ष न देता आशूने चिकाटीने फार्मसी कोर्स पुरा केला. काकांचे लक्ष होतेच.

काकांचे मित्र परांजपे डॉक्टर यांचा मुलगा प्रथमेश स्त्री रोग तज्ज्ञ झाला होता आणि रत्नागिरीत हॉस्पिटल काढणार होता. त्याच्या हॉस्पिटलचें काम सुरु होते, त्या हॉस्पिटल मध्ये मेडिकल स्टोअर ची जागा ठेवली होती. डॉक्टरकाकांनी परंजपेना सांगून ती जागा आशू साठी पक्की केली.

दिवाळीत हॉस्पिटलचें उदघाटन झाले आणि त्याच दिवशी डॉक्टरकाका आणि विजआते च्या हस्ते “जय मेडिकल ‘चें उदघाट्न झाले. डॉक्टरकाकांनी स्वतः जामीन राहून आशूला बँक कर्ज मिळवून दिले.

पहिल्या दिवसापासून परांजपे हॉस्पिटलमध्ये गर्दी होऊ लागली आणि त्यामुळे जय मेडिकल मध्ये पण गर्दी होऊ लागली.

हॉस्पिटलच्या आवारात असल्याने तेथल्या नर्सेस आणि इतर स्टाफ तिचा मित्र बनला. त्यामुळे दिवस कसा संपायचा हे तिला कळत नसे. रोज येणारे पेशन्ट औषधं खरेदी करता करता तिला आपल्या घरच्या गोष्टी सांगायचे. औषधं सप्लाय करणारे डिस्ट्रिब्युटर, त्यांचे सेल्समन, मेडिकल रिप्रेझेन्टॅटिव…..

मेडिकल रेप. ची तिला आठवण झाली आणि आशू खुर्चीतून उठली आणि तिच्या बेडरूमला जोडून असलेल्या गॅलरीत आली. तिला शिरीष ची प्रकर्षाने आठवण झाली, कुठे असेल शिरीष? शिरीष गोखले?

मेडिकल सुरु केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आते काकांचा पाठींबा होताच पण परांजपेडॉक्टर मंडळीचा पण होता. तिची संसारातील फारपट त्याना समजली होती. मग डॉ परांजपे यांचे लग्न झाले आणि डॉ समिधा त्या हॉस्पिटल मध्ये आली. समिधा आशुची मैत्रिणच झाली.रिकामा वेळ असेल तेंव्हा समिधा तिच्या मेडिकल मध्ये येउंन बसायची.

आतेकडे येऊन पाच वर्षे झाली होती, या काळात तिच्या सासरच्या मंडळींनी तिची चौकशी पण केली नव्हती.कर्ज फिटले होते, त्यासुमारास रत्नागिरीत प्लॅट सिस्टिम सुरु झाली होती. तिने पण समुद्रा जवळ मोठा प्लॅट बुक केला आणि एका वर्षात ती जय सह तिकडे राहू लागली.

आशुच्या डोळ्यसमोर तो काळ आला. आपण त्या वेळी पस्तीशीच्या होतो. आर्थिक सुबत्तेमुळे आणि सतत चांगल्या लोका मध्ये असल्याने आपण फारच देखण्या दिसत होतो. अचानक शिरीष भेटला.

शिरीष -शिरीष हा एका मोठया औषधं कंपनीचा प्रतिनिधी (M. R), डॉ ना भेटायला रोज किमान सहा सात तरी M.R. यायचे. डॉक्टरना भेटून झाले की ते आपल्या मेडिकल मध्ये येऊन नवीन औषधाची माहिती सांगायचे,ऑर्डर्स घयायचे. शिरीष पण त्यातलाच. तो कोल्हापूर मधून यायचा. दर महिन्याच्या बारा किंवा तेरा तारिखला तो रत्नागिरीत असायचा. त्याच्या व्यक्तिमत्वत काही तरी जादू होती, तो डॉ कॉल ला आला की हॉस्पिटल मधील नर्सेस पण उत्तेजित व्हायच्या, त्यांच्यात नेत्र पल्लवी सुरु व्हायची, डॉ कॉल नंतर तो आपल्या मेडिकल मध्ये यायचा. आत येता येता

“मॅडम, चहा मागवा ‘अस ओरडत यायचा. मी पण पुष्पाला चहा आणायला पाठवायची, तेव्हड्यात माझ्या खुर्ची समोर टेबल घेऊन तो माझ्या डोळ्यात बघत बोलायचा.

“मॅडम, या ड्रेस मध्ये छानदिसताय, आज तुमचा नवरा खूष असणार..’

मी काही बोलण्याचा प्रयत्न करणार तोच तो ऑर्डर बुक काढायचा आणि पेन उघडून ऑर्डर्स साठी वाट पाहायचा. इतरांना कंजुषीने ऑर्डर्स देणारी मी शिरीषला मात्र मोट्ठी ऑर्डर्स दयायचे. मग चहा घेऊन तो निघायचा. निघताना म्हणायचं ” मॅडम,आता पुढील बारा तारीख ‘.

पुढची बारा तारीख कुठली मी दुसऱ्यादिवशी पासून त्याची वाट पहायचे. रोज कॅलेंडर कडे पहात उसासे सोडायचे. मग दहा तारीख.. मग अकरा… मग बारा.. आणि ती मस्त कपड्यात अकराच्या सुमारास यायचा.. माझं मन म्हणायचे, याच लग्न झाले असणार.. याची बायको यांच्यासारखीच सुंदर असेल… किती नशीबवान ती… मग माझी परिस्थिती मला जाणवायची आणि मी उसासे सोडायची.

डिसेंबर महिना आला, मी बारा तारीखची वाट पहात होते, बारा तारिखला छाती धडधडत होती.. शिरीष अकरा वाजता येईल..

पण दुपारचे दोन वाजले तरी तो आला नाही.. दुसऱ्या दिवशी नाही… तिसऱ्या दिवशी नाही. माझ्याकडे to पर्यत लँड लाईन आला होता पण शिरीषचा नंबर कुठे माहित होता?

पंचवीस तारीख पर्यत वाट पाहून शेवटी कोल्हापूर मधून आलेल्या दुसऱ्या कंपनीच्या M. R. कडे मी त्याची चौकशी केली.

–क्रमशः भाग दुसरा

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ मानिनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ मानिनी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर

आशाने साठ वर्षे पुरी केली आणि तिचा मुलगा जय तसेच सून वर्षा यांचे म्हणणे पडले, आईची एकसष्ठी साजरी करायची.जयने त्याच्या अनुमावशीला आणि माधवमामाला फोन केला.

जय – मावशी, आईने साठी पुरी केली, आमची इच्छा आहें तिची एकसष्ठी साजरी करूया, तुझे काय मत आहें?

मावशी – होय बाबा, तिने आयुष्भर कष्ट केलेत, त्रास खुप सोसलाय. तुला वाढवताना आणि व्यवसाय सुरु करून पैसे मिळविताना, तीच कोणी कौतुक केलंच नाही पण इतरांचे कौतुक करायला ती सर्वांच्या आधी पुढे असते. आणि नेहेमी हसतमुख, तू दिवस ठरव, आम्ही आहोत तूझ्या मदतीला.

जय – हो मावशी, मामाला पण फोन केलाय, तो पण मामीसह येणार आहें.

संध्याकाळी जय आणि वर्षाने आईला एकसष्ठी कार्यक्रमाबद्दल सांगितले, तेंव्हा आशाने त्याला उडवून लावले.

आशा – असले कार्यक्रम मला आवडत नाहीत रे आणि मी माझ्या आयुष्यात काय एवढे दिवे लावलेत की पराक्रम केलाय म्हणून माझा एवढा कार्यक्रम करतोस तू? मी आपली साधी बाई, नवऱ्याने घरातून हाकलून लावलेली. माझे कसले कार्यक्रम नकोत.

आई अशी ऐकणार नाही हे जयला माहित होते, त्यामुळे त्याने अनुमावशीला आणि आशाच्या आत्या विजूआत्या ला कळविले. मग विजू आत्या ने आशाला दम भरला तशी आशा तयार झाली.

मग जय आणि वर्षाने तयारी चालू केली, छोटा हॉल पाहिला,आईला न कळवता हिऱ्याची अंगठी केली,सोन्याचा नेकलेस केला. साडया खरेदी केल्या. जवळच्या नातेवाईकांना भेटी घेतल्या. एका योग गुरुचे प्रात्यक्षिक आणि लेक्चर ठेवले.

कुणा कुणाला बोलवायचे याची यादी करण्यासाठी जय आणि वर्षा बसली. एव्हड्यात वर्षाच्या लक्षात आलं म्हणून तिने जयला विचारले “तूझ्या बाबांना, काका काकू ना बोलवणार आहेस क?’

जय थंबकला. हा जटील प्रश्न त्याच्या लक्षात आला नव्हता.

“हे आईलाच विचारायला हवं ‘जय म्हणाला.

रात्री आशा मेडिकल स्टोअर मधून आली, त्यानंतर काही वेळाने जय आणि वर्षा आपल्या एजन्सी मधून आली. रात्री जेवताना तिघांनी एकत्र जेवायचं हे ठरलेलं.

जेवायला सुरवात केली एव्हड्यात जय ने आईला विचारले 

“आई, बाबांना काका काकूंना बोलवायचं आहें ना?

हे वाक्य आशाने ऐकलं मात्र, हातातला घास ताटात टाकून ती किंचाळली “नाही, अजिबात नाही,’

“अग पण एकसष्ठी ला बायकोबरोबर नवरा…

“नावाचा नवरा तो, हिम्मत नव्हती म्हणून सोडल नाही मी.. पण मनातून कधीच कंटाप केलाय त्याला, मला घरातून हाकलून लावलेल्या माणसाला कार्यक्रमला बोलवायचं, पुरुष नाही का बायको नसेल तर कणवतीला सुपारी लाऊन कार्य उरकतात, मग आम्ही बायका तसं का करू नये?’.

संतापलेल्या आशाने घास ताटात टाकला आणि हात धुवून खोलीत गेली आणि धाडकन दरवाजा लाऊन घेतला.

जय वर्षाला म्हणाला “उगाचच बाबांचं नाव घेतलं, त्या रागाने आई रात्रभर झोपायची नाही.

बेडवर पडलेल्या आशाचा संताप संताप झाला.काही गोष्टी विसरायचंय म्हंटल तरी पिशाच्च होऊन समोर उभ्या राहतात. तिच्या डोळ्यसमोर तीस वर्षांपूर्वीचें तीच लग्न डोळ्यसमोर आले.

तीस वर्षांपूर्वी 

आशा भावंडात शेंडेफळं. सर्वात देखणी आणि सर्वांची लाडकी.अभ्यासात जेमतेम पण खेळात, नृत्यात पुढे.शाळेतील नाटकात सुद्धा तिने भाग घेतलेला आणि बक्षीसे मिळविलेली. तिने तारुण्यात प्रवेश केला आणि ती अनेकांची “दिल की धडकन ‘झाली.पण तिने कुणाकडे लक्ष दिले नाही. मोठया बहिणीचे अनुचे लग्न झाले आणि मग भावाचे माधवचे पण लग्न झाले.त्यानंतर आशा साठी नवरा शोधणे सुरु झाले.

आशाचा आपल्या आईवडिलांवर विश्वास होता. आपल्यासाठी ते योग्य ते स्थळ शोधतील हे तिला माहित होत. मग ओळखीतून नितीनचें स्थळ आले, दापोलीच्या जवळच त्यांचे घर होते, गावात औषध दुकान होते. नितीन आणि त्याचा मोठा भाऊ दुकान सांभाळत होते. घरी फक्त नितीनची मोठी वहिनी आणि त्यांची दोन मुले. म्हणजे नितीन आणि भावाची चार माणसे.

वडिलांना नितीन बरा वाटला. आपण पण आईवडिलांना जास्त त्रास नको म्हणूंन होय म्हंटल.थोडक्यात लग्न झालं आणि आपण सासरी गेलो. नव्याचे चार दिवस संपले आणि सासरची नेमकी परिस्थिती लक्षात यायला लागली. घरात जशी थोरल्या जाऊची दादागिरी तशीच मोठया दिराची दुकानात.दुकानचा सर्व व्यवहार मोठया दिराच्या हातात -आलेले पैसे, दयायचे पैसे, माल मागवणे, चेक्स वर सही सर्व मोठया भावाकडे. नितीन फक्त काऊंटर वर उभा किंवा एका टेबलावर बसलेला.

घरी पैशाचा व्यवहार थोरल्या जाऊकडे, पैसे हवे असतील तर तिच्याकडे मागायचे.

रात्री नितीन खोलीत आला की ती नवऱ्याला विचारायची.

“तुम्हाला या घरात आणि दुकानात कसलीच किंमत नाही, सर्व काही मोठया भावाच्या आणि वहिनीच्या ताब्यात. मग इथे राहता कशासाठी? आता लग्न केले आहें तर माझा पण काही विचार करायला नको?मी तिच्याकडे पैसे मागणार नाही. मी तुमच्यकडे मागेन. तुम्ही मला पैसे आणुन द्या ‘.

असे ती बोलली की नितीन चिढी आणि अबोला ठेवी.

आशाला काय करावे हे सुचेना. तिच्या लक्षात आले, या घरातून बाहेर पडायला हवे तरच पुढचे आयुष्य सुसह्य होईल.

आशाने शहरात जाऊन नवीन औषधं दुकान काढायचे म्हंटले की तिचा नवरा चिडायचा, भाऊ वहिनी, पुतणे पासून वेगळे व्हायचे नाव घेईना.त्यात आशाला दिवस गेले त्यामुळे तिची आणखी चिडचिड व्हायची.

प्रसूतीसाठी आशा माहेरी आली, तिच्या घरची एकांदर परिस्थिती पाहून तिची आई रडायची. मोठया मुलीला समजूतदार माणसे मिळाली, मुलाला चांगली बायको मिळाली पण लाडक्या धाकट्या मुलीच्या बाबतीत फसवणूक झाली, म्हणून तिला वाईट वाटायचं.

जयचा जन्म झाला आणि आशा सुखावली. त्याचा चेहरा थेट तिच्यासारखा होता. सहा महिने माहेरी राहून आशा घरी आली पण घरची परिस्थिती होती तशीच.

सासरी आल्यानंन्तर पुन्हा तसेच दिवस जाऊ लागले. मोठी जाऊ जयचा तिरस्कार करत होती, तो रात्रीचा रडायला लागला की हिची बडबड सुरु होई, मोठे दीर सुद्धा चिडत असत. आशाची पुतणी लहान जयला खेळाऊ पहात असे पण तिचे आईवडील तिच्यावर चिडत असत.

छोटया जयला डॉक्टर कडे न्यायचे तिने तीन तीन वेळा नवऱ्याला सांगितले, पण तो सोबत आला नाही. मान खाली घालून तिला जावकडे पैसे मागावे लागत होते. जाऊ चिडून बोलून दोनशे रुपये हातावर टिकवत असे. सुदैवाने तिची अनुमावशी आली की तिच्या हातात हजार रुपये टेकावून जात असे, त्या पैशाचा तिला आधार होता.

जुन्या आठवणींनी डोक्यात पिंगा घालायला सुरवात केली तशी आशाची झोप उडाली, मग ती बेडवरून उठली आणि तिच्या रूममध्ये असलेल्या झुलत्या खुर्चीवर येऊन बसली.

मन मारून नाईलाजाने ती घरात राहत होती. मधल्या काळात बाबा देवाघरी गेले, दोन वर्षांनी आई गेली. माधव मुंबईला आणि मोठी बहीण पुण्यात. अशा वेळी तिला रत्नागिरीत राहणाऱ्या विजूआतेचा आधार वाटे. महिन्यातून एकदा ती विजूआते कडे जाई.

अशा परिस्तितीत जय पाच वर्षाचा झाला, तेंव्हा ती परत एकदा नवऱ्याच्या मागे तगादा लावला, त्या गावात जिल्हा परिषदेची चौथी पर्यत शाळा होती पण चार किलोमीटरवर. या असल्या शाळेत मुलाला घालून त्याचे नुकसान होईल म्हणून दापोली नाहीतर खेड मध्ये नवीन दुकान काढू म्हणजे तेथे बिऱ्हाड करता येईल आणि जयला पण शाळेत घालता येईल.

तिचा मोठा आवाज ऐकून जाऊ मध्ये पडली, मग दीर बोलू लागला. त्याच्या धीराने नवरा आशा बरोबर भांडू लागला. मग जाऊ घरात गेली आणि कपडे सुकत घालायची काठी घेऊन आली आणि त्या काठीचे दोन तडाखे तिच्या डोक्यात घातले, आशाच्या डोक्याला खोक पडली आणि रक्त येऊ लागले. 

 तिचा नवरा मग पुढे झाला आणि त्याने तिला हाताला धरून बाहेर ढकललं. ती अंगणात पडली. तिचे रडणे ऐकून जय जागा झाला आणि आईच्या दिशेने धावला.

आशाच्या जावेने दार बंद करून घेतले. रडत रडत आशा उठली, तिच्या पायाकडे बसलेल्या जयला तिने उचलून घेतले आणि बंद केलेल्या दाराकडे पहात ती अंगणातून बाहेर पडली.

या रात्रीच्या वेळी सोबत लहान बाळाला घेऊन कुठे जावे, असा ती विचार करत असताना तिला मारुतीच्या देवळाशेजारचे बाबीं काका आठवले. बबिकाका आणि काकीकडे ती कधीमधी जायची. त्यांची एकूलती एक मुलगी लग्न करून दिलेली मालवणला असायची, त्यामुळे ती दोघेच घरात असायची. काकी तिला खूप प्रेमाने वागवायची.आशाचे घरची मंडळी तिला खुप त्रास देतांत, म्हणून ती हळहळायाची.

रात्रीच्या अशा वेळी आशाला काका काकीची आठवण आली. ती त्यांच्या घरच्या दिशेने चालू लागली.

आशाने काकाच्या घरचा दरवाजा खटखटवला, काकीने दरवाजा उघडला, काकीला तिला यावेळी आशा परिस्थितीत पाहून आश्यर्य वाटले.

–क्रमशः भाग पहिला

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ बाळ… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? जीवनरंग ?

☆ बाळ…  ☆ सौ. वृंदा गंभीर

किती सुंदर भावना ममतेची, मायेची, वत्सल्याची भावना. बाळाची चाहूल लागली कि जगच बदलून जातं सगळं. जग सुंदर निसर्गरम्य दिसायला लागतं. एक आई जागृत होते, जी स्वतः एक मुलगी, बायको, सून, वहिनी, बहीण असते ती अचानक आई होते. तिचं जग बाळाभोवती फिरायला लागतं. आई होणं सोपं नाही, पण आई शिवाय स्त्री जन्माला ही अर्थ नाही. ‘आई’ किती सुंदर शब्द ‘आ’ म्हणजे आत्मा, ‘ई’ म्हणजे ईश्वर. आत्म्याचं आणि ईश्वराचं मिलन म्हणजे ‘आई’ म्हणून म्हणतात ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी’.

अशीच एक ममतेची कथा आज घेऊन आले आहे.

“वसू, ये वसू, अगं मुलाचं लग्न जमलं म्हणे तुझ्या, काय करते गं मुलगी? कुठली आहे?, किती शिकली आहे?, घराणं कसं आहे?, कुणी सुचवलं हे स्थळ तुला!” एक ना अनेक प्रश्न विचारत पमी घरात आली. 

पमी आणि वसू दोघी बालपनाच्या मैत्रिणी पण सख्या बहिणी सारख्या. एकमेकांना अजिबात करमत नाही दोघींशिवाय‌. कुठेही एकत्र असतात. सगळं एकमेकींच्या मनाने विचार करून निर्णय घेतात. पण हा एवढा मोठा निर्णय पहिल्यांदा वसू आणि घरच्यांनी घेतला होता कारण पमी गावी गेली होती.

वसू- “अग हो हो, सांगते सगळं, जरा बस तरी, पाणी पी मग बोलते तुझ्याशी…..”

पमी म्हणाली, “का केलं असं वसू मला काही कळू दिलं नाही, माझं काही चुकलं का? कि कुठे कमी पडले मी? सांग बरं…..”

वसू – “अग पमी, तुझं काही चुकलं नाही. मलाच फार वाईट वाटत होतं गं. क्षणा क्षणाला तुझी आठवण येत होती, पण काय करू, काकांना बरं नाही म्हणून तू गावी गेलेली, मग कसं कळवायचं तुला. तू लगेच इकडे आली असतीस, म्हणून नाही सांगितलं… आम्ही ठरवलं गं तू आल्यावर पुन्हा मुलगी बघायला जायचं, तर उद्याच जाऊ या आपण.” तेंव्हा कुठे पमी शांत झाली. व दुसऱ्या दिवशी सगळे मुलगी बघायला गेले.

रानडेच्या दारात गाडी थांबली. गाडी बघून रानडे बाहेर आले व त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सगळे घरात आल्यावर त्यांचेशी पमीची ओळख करून दिली. निवांत चहा नाष्टा झाला व मुलीला बोलवणं गेलं. उंच, गोरीपान, सडपातळ, कळेभोर केस, बोलके डोळे, स्मित हास्य, जशी स्वर्गातली अप्सरा, अशी नेहा समोर आली. पमी तर बघतच राहिली तिच्याकडे. 

नेहाने सर्वांना नमस्कार केला व समोर बसली, पमीने विचारले “तू काय करते? शिक्षण किती झालं तुझं?”

नेहा म्हणाली, “मावशी मी डाॅक्टर आहे. गायनिक स्पेशल आहे.”

पमीला खूप आनंद झाला. तीने नेहाच्या तोंडावरून हात फिरवला व पर्स मधून पैसे काढून तिच्या हातावर ठेवले. नेहा नको नको म्हणत होती पण पमी म्हणाली “हे सुनमुख बघितलं म्हणून आहे ग, ठेव तुझ्याकडे आशिर्वाद म्हणून.” सगळे जण हसायला लागले. जेवणं करून सर्वांचा निरोप घेऊन पाहुणे निघाले.

महिन्यावर लग्न आलेलं होतं. धावपळ सुरु होती. कामं वाढलेली होती. लग्न थाटामाटात करायचं होतं कारण ओम हा नावाजलेला डाॅक्टर होता. त्याच्या स्टेटस प्रमाणे लग्न व्हावं असचं सर्वांना वाटत होतं.

लग्नाचा शुभदिवस उजाडला व लग्न छान पार पडलं….. नेहाचा गृहलक्ष्मी म्हणून जोरात गृहप्रवेश झाला. खूप नातेवाईक, मित्र मंडळी स्वागताला आलेली होती.  थट्टा मस्करी सुरू होती.  खूपच सुंदर अविस्मरणीय असं वातावरण होतं. सगळे विधी पार पडले. पाहुणे आपापल्या घरी गेले व नेहाचा आणि ओम चा संसार सूरू झाला. हसत खेळत असा हा प्रवास सुखकर सुरु झाला. 

बोलता बोलता लग्नाला एक वर्ष झालं. आता लोक विचारायला लागले, काही गोड बातमी आहे कि नाही ? नेहा लाजून सांगत असे, “नाही अजून, होईल, अजून कुठे आमचं वय झालं…”

एक दिवस वसू पमीला म्हणाली, “तू विचार बरं नेहाला, तुम्ही काही विचार केला का, उशिरा मुलं वगैरे.” तेंव्हा नेहा हॉस्पिटल मधून आल्यावर पमीने नेहाला विचारले. तेंव्हा नेहा म्हणाली “मावशी, आहो तसं काही नाही, आई होणं मलाच आवडणार आहे. बाळ ही भावनांचं पूर्णत्वाकडे नेणारं आहे, पण खरंच अजून तरी काही नाही. मी ओम बरोबर बोलते व ट्रीटमेंट सुरु करते.”

पमी हो म्हणाली व “लवकर बघ बाई काहीतरी, एखादं झालं कि तुम्ही खुशाल पाळणा लांबवा, आमचं काही म्हणणं नाही,” असं बोलून पमी गेली.

आता नेहाच्या मनाला ही बाळाचे वेध लागलेले होते. तिच्या डोक्यात फक्त बाळ आणि बाळच होतं. तिचं दुसरीकडे लक्ष लगात नव्हते. मन चलबिचल होत होतं… ओम घरी येताच नेहा ने लगेच बाळाचा विषय काढला. ओम ला पण बाळ हवं होतं. दुसऱ्या दिवशी दोघांची ट्रीटमेंट सुरु झाली. काही टेस्ट केल्या. ओम मध्ये शुक्राणूंची कमतरता होती. त्याला टॅबलेट सूरू केल्या. खूप प्रयत्न करूनही उपयोग होतं नव्हता. नेहा एक गायनिक होती. ओम डाॅक्टर असून निराश झाला होता. पण नेहा म्हणाली, “आपण टेस्टटयूब बेबीचा वापर करून आई बाबा होऊ शकतो.” त्यांनी हे घरात सर्वांना सांगीतले. सगळे सुशिक्षित असल्यामुळे सर्वांचा होकर आला. 

नेहाच्या हाताला यश आले व तब्बल पाच वर्षांनी नेहाला आई होण्याची चाहूल लागली. नेहा आता आणखी खूपच सुंदर दिसायला लागली. घरातील सगळे तिची काळजी घेत होते. हॉस्पिटल चा ताण वाढतं होता. तरीही तिने स्वतः ट्रीटमेंट घेतली आणि त्यात ती सक्सेस झाली म्हणून अशा अनेक बायका तिच्याकडे ट्रीटमेंट घ्यायला यायला लागल्या. नेहा सर्वांना प्रेमाने आपुलकीने समजून सांगत ट्रीटमेंट देत होती. 

नेहाचे नऊ महिने पूर्ण होताच दहाव्या दिवशी नेहाने सुंदर मुलाला जन्म दिला. ती खूप खुश होती कारण तिचं स्त्री त्व पूर्ण झालेलं होतं. ती ‘आई’ झालेली होती. तिच्यासाठी तिचं बाळ हेच जग झालेलं होतं. नऊ महिने पोटात वाढवलेलं बाळ आता तिच्या कुशीत होतं. नऊ महिने सहन केलेला त्रास, रोज झालेले बदल, प्रसूती वेदना, सगळं सगळं ती विसरलेली होती कारण ती ‘आई’ झाली होती.

आई ममत्व, वात्सल्य, प्रेमाचा महासागर असते. कले कलेनं बाळ वाढत असतं. त्याचं कौतुक बघण्यात दिवस निघून जात असतात. जी मुलगी आईला त्रास देते, आई ला हट्ट करते, ती आज आई झालेली असते. तिला आई काय असते ते कळतं. म्हणून म्हणतात ‘आई होण्यासाठी वीस वर्ष वाट पहावी लागते व बाप होण्यासाठी पंचवीस वर्ष वाट पहावी लागते तेंव्हा आई आणि बाप कळायला लागतो.’

नेहा पुन्हा हॉस्पिटल मध्ये येऊ लागली‌. खूप अशाळभूत नजरेने महिला तिच्याकडे येऊ लागल्या. बहुतेकांना बाळ होत नव्हतं. कुणाला उशिर होत होता, काहींना पंधरा वीस वर्ष झालेली होती. क्वचित ठिकाणी अपयश येतं तो नशिबाचा भाग म्हणावा लागेल. नेहाने कित्तेक महिलांच्या चेहऱ्यावर हसू आणलं, कित्तेक घरात दिवे लावले, कित्तेक आज्जी आजोबा आनंदाने राहू लागले.

आज विज्ञान कितीतरी पुढे गेलेलं आहे. परंतु ज्यांना काहीच गोळ्या औषध घ्याव्या लागत नाही तरीही त्यांना मुलं होतात, वाढतात, मोठी होतात, ती लोकं किती भाग्यवान म्हणावी लागतील. असो तो सृष्टीचा नियम आहे. पण देवाने काय दिलं, देव आहे का ?असा प्रश्न ज्यांना पडतो ना त्यांनी हे नक्कीच लक्षात घ्यावं, जेंव्हा बाळासाठी पैसे मोजावे लागतात, समाजाचे बोलणे ऐकावे लागतात, वांझपणाचा कलंक लागतो तेंव्हा नक्कीच देवाला शरण जायला हवं.

नेहा सुसंस्कारी आई होती म्हणून तीने चिन्मय ला छान संस्कार दिले. चिन्मय परदेशात जाऊन आई सारखा गायनिक सर्जन होऊन परतला. नवीन टेक्नॉलॉजी शिकून आल्याने कुणाच्याही पदरी निराशा येऊ नये म्हणून सेवा देऊ लागला व वंशाचा दिवा घरोघरी पेटवण्याचा प्रयत्न करत प्रत्येक आई च्या चेहऱ्यावर हसू आणू लागला कारण ‘आई’ ही वत्सल्य, आशा, किरण असते. जिथे आशा संपते तिथे किरण येतात व

आईला पूर्णत्वाकडे  घेऊन जातात.

© सौ. वृंदा पंकज गंभीर 

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पाच अनुवादित लघुकथा… ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ पाच अनुवादित लघुकथा☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर 

((१) – पायरी – सुश्री मनोरमा जैन पाखी (२) – भेट – डॉ. योगेन्द्रनाथ शुक्ल (३) – करुणा – श्री ललित समतानी (४) – उंबरठ्याचे बंधन – डॉ. विनीता राहूरीकर (५) – स्वातंत्र्य – सुश्री विभा रानी श्रीवास्तव)

 (१) – पायरी

‘ए, ऐकलंस का, आपला अभिजीत…..’

‘त्याचं काय?’

 ‘त्याला साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार मिळालाय.’

 ‘माहीत आहे. त्यात काय खास आहे?’

 ‘खास कसं नाही? एवढा साहित्य अ‍ॅकॅडमीचा पुरस्कार…..’ तिचं बोलणं ऐकून नीतू चकित झाली.

 ‘कागदी सर्टिफिकेट आणि चार दमडया….’

 ‘तू तर कमाल करतेस हं स्वाती! अभिनंदन केलंस की नाही त्याचं?’ नीतूने उत्सुकतेने विचारलं. स्वातीने सामान गोळा करून बॅगेत भारत म्हंटलं, ‘उशीर होतोय. मुलांना भूक लागली असेल. लवकर घरी जाऊ या.’ तिचा आवाज विस्कळीत झाला होता.

 ‘काय झालं स्वाती? तू तर त्याची बेस्ट फ्रेंड आहेस ना!’

 ‘हं!’

 ‘सांग ना! काही तरी झालय, जे मला माहीत नाही. ‘

 स्वातीने मॉलमधील जिन्याकडे बोट दाखवत म्हंटलं, या पायर्‍यांचं काम आहे, दुसर्‍याला दुसर्‍या मजल्यावर पोचवणं, जिथे त्यांच्या जरुरीचं सामान आहे. ‘

 स्वातीच्या डोळ्यात तिला वापरून घेतल्याचं दु:ख झळकत होतं. अभिजीतच्या वर चढण्यातील तीही एक पायरी होती.

मूळ कथा – सीढियाँ   

मूळ लेखिका – सुश्री मनोरमा जैन पाखी  

अनुवाद – सौ.  उज्ज्वला केळकर 

मो. – ८८३९९३४७४२         

☆☆☆☆☆

(२) – भेट

‘प्रशांत भाऊ, आपण अनेक विद्यार्थ्यांना, डॉक्टर बनवलं आहे. भाऊसाहेब, माझे बॉसदेखील आपल्या पत्नीला पी.एचडी. करवू इच्छितात. जर तुम्ही कृपा केलीत, तर माझीही त्यांच्यापुढे पत-प्रतिष्ठा वाढेल.’

‘प्रकाशजी, आपण आहात एक प्रशासनिक अधिकारी आणि मी प्राध्यापक. आम्हाला आपल्यासारखं सामान, गाडी, बंगला, नोकर-चकार मिळत नाहीत. अन्य सुविधाही नसतात, म्हणून या कामात लागून राहिलोय. तीन-चार विद्यार्थी नेहमीच माझ्या सेवेसाठी तत्पर असतात.’

‘भाऊसाहेब, स्पष्ट बोलणं झालं, तर नेहमीच संबंध चांगले रहातात. नाही का? म्हणून विचारतोय, किती खर्च येईल?’

‘प्रकाशजी, आपल्या स्पष्टवक्तेपणाचं मला नेहमीच महत्व वाटतं. आपण माझे मित्र आहात, त्यामुळे एक लाखात काम भागवू…. हं…. बाहेरून जे परीक्षक येतील, त्यांना हॉटेलमध्ये उतरवणे, हिंडवणे-फिरवणे, त्यांचे खाणे-पिणे, त्यांना द्यायच्या भेटी यांचा खर्च वेगळा.’

‘खर्चाची आपण चिंता करू नका. बॉसची कमीत कमी एक लाखाच्या वर मिळकत आहे. फक्त, ते आपल्या पत्नीला पी.एचडी.ची डिग्री तिच्या वाढदिवसाची भेट म्हणून देऊ इच्छितात.’

‘…. मग डील पक्कं !’

‘पक्कं!’

मूळ कथा – तोहफे   

मूळ लेखक – डॉ. योगेन्द्रनाथ शुक्ल  

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर

मो. – 9977547030 

☆☆☆☆☆

(३) – करुणा

रतन – ‘डॉक्टर साहेब, माझ्या वडलांना एकदा तरी दाखवा. मी आपल्या पाया पडतो. मी त्यांना दुरूनच बघेन. तीन दिवस सतत चालून मी इथपर्यंत पोचलोय.

डॉक्टर – एकदा सांगितलं नं, तू आत नाही जाऊ शकत.

रतन – ‘डॉक्टर साहेब, त्यांना दिसत नाही. मी एकदा जरी त्यांना पहिलं, तरी मनाला शांती मिळेल. 

डॉक्टर – तुला कळत कसं नाही. ते करोंनाचे पेशंट आहेत. त्यांना कोणीच भेटू शकत नाही.          

रतन – ‘डॉक्टर साहेब, माझ्या पायाच्या जखमा बघा. मी किती मुश्किलीने इस्पितळापर्यंत पोचलोय, माझं मला माहीत!

डॉक्टर – अरे, तुझ्या पायात तर पस झालाय. याचा ताबडतोब इलाज करून घे, नाही तर पाय कापायची वेळ येईल. सिस्टर करुणा, यांना ड्रेसिंग रूममध्ये नेऊन ताबडतोब यांच्या जखमांवर मलमपट्टी करा.

सिस्टर करुणा – भाऊ, या जखमा कशा झाल्या?  

रतन – सिस्टर मी तीन दिवस पायी चालत इथे माझा बाबांना बघण्यासाठी आलो. पण डॉक्टरसाहेब मला त्यांना भेटू देत नाहीत. तुम्ही मला भाऊ म्हणालात. ताई, असं काही तरी करा की मी माझ्या वडलांना बघू शकेन.’

सिस्टर करुणा – हे बघ, मी तुला, मला काहीच माहीत नाही, असं दाखवून कोरोंनाच्या वॉर्डमध्ये सोडते. पुढचं तुझं तू पहा.  

रतन – बाबा, हे पाणी घ्या.

बाबा – अरे रतन, तू इथे कसा पोचलास?’

रतन – आता मी आलोय बाबा. तुम्ही काळजी करू नका.  

डॉक्टर – (वॉर्डमध्ये रतनच्या पायांच्या पट्ट्यांकडे दुर्लक्ष करत) सिस्टर करुणा तू साक्षात करुणेची मूर्ती आहेस आणि मी किती विवश होतो.

मूळ कथा – करुणा  

मूळ लेखक– श्री ललित समतानी       

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर  

मो. – ९८२६०९५७११     

☆☆☆☆☆

(४) – उंबरठ्याचे बंधन

‘हे काय वाहिनी, बॅगेत कपडे भारतीयस. कुठे निघालीस?’+++

‘रामनगरच्या कॉलेजमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता. तो मंजूर झालाय. दोन दिवसांनी जॉईन होईन. संध्याकाळच्या गाडीने निघेन. ‘

‘तुला नोकरी करण्याची काय आवश्यकता आहे? आणि संध्याकाळपर्यंत भाऊसुद्धा परत येईल.’

‘आता आपलं पोट भरण्यासाठी नोकरी तर करायलाच हवी ना! आई-वडलांवर ओझं होऊन तर राहू शकणार नाही. ‘

‘वाहिनी, आपलं पोट भरण्यासाठी म्हणजे…. गेली दोन वर्षे भाऊला त्या हलकट बाईच्या तावडीतून सोडवण्यासाठी तू जीवाचं रान केलंस. आता सगळं काही ठीक झालय. त्याची अक्कलदेखील ठिकाणावर आलीय. त्याला आता कळून चुकलय, की केवळ पैशासाठी तिने त्याला जाळ्यात अडकवलं होतं. आता तो परत येतोय, आणि तू…’

कुटुंबाची बदनामी होत होती. आई-बाबा, म्हातारपणी मुलाच्या या असल्या वागण्यामुळे दु:खी – कष्टी झाले होते. लोक नावे ठेवत होते. कसले कसले टोमणे मारत होते. शिवाय, उद्या तुझ्या लग्नातही अडचणी आल्या असत्या. मी या घराबाद्दल असलेलं माझं कर्तव्य निभावलं. तुला तुझा भाऊ आणि आई-बाबांना त्यांचा मुलगा परत मिळवून दिला.’

‘आणि तुझा नवरा ….. भाऊ अन मुलगा या व्यतरिक्त तो तुझा नवराही आहे नं! ‘

‘जो परततोय, तो या घरचा मुलगा आहे. भाऊ आहे. माझं नातं तर त्याच दिवशी संपलं, ज्या दिवशी त्याने दुसर्‍या बाईशी संधान बांधलं आणि या घराच्या बाहेर पाऊल ठेवलं. उंबरठ्याचं बंधन काय केवळ बायकांसाठीच असतं का? ‘

मूळ कथा – दहलीज का बंधन  

मूळ लेखिका – डॉ. विनीता राहूरीकर

अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर    

मो. – ९८२६०४४७४१     

(५) – स्वातंत्र्य

‘मी आज सकाळपासून बघतोय अम्मी, तू गुपचुप आहेस. काय झालं? ‘

‘होय बेटा, मलाही असंच वाटतय. बेगम, बेटा बरोबर बोलतोय. तुझं असं उदास होणं आपल्या घराला उदास करतय. आता सांग तरी काय झालं? ’ शौकत मलिकने आपल्या बायकोला विचारले.

उद्या रविवार आहे. आमच्या विद्यालयात बाहेरची परीक्षा आहे. इंटर्नल म्हणून ज्यांची नेमणूक झाली होती, त्यांची तब्बेत अचानक बिघडली. त्यांचा आणि मुख्याध्यापकांचा दोघांचा फोन होता, की मी ती जबाबदारी घेऊन तिथे परीक्षेच्या वेळी उपस्थित रहावं.’

‘पण ही जबाबदारी तुलाच का? आणखीही शिक्षक असतीलच नं तुमच्या विद्यालयात.’

‘जास्तकरून बिहारी शिक्षिका आहेत. दिवाळीपासून पौर्णिमेपर्यंत त्यांचा पर्व काळ असतो. त्या असतात कुठे घरात? ‘ मिसेस मलिकच्या बोलण्यातील उदासीनता अधिक गडद होऊ लागली होती.

‘काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.’ मुलगा म्हणाला.

‘चिंता कसली? सरळ कळवून टाक, की आईची सहाय्यिका रविवारी सकाळी चर्चला जाते. तुझं घरी असणं गरजेचं आहे.’ पती मलिक महोदयांनी फर्मान सोडलं. काहीशा घाबरलेल्या सहाय्यिकेने सुटकेचा दीर्घ नि:श्वास सोडला.

‘कसं बोलताय अब्बा आपण? आपल्या ऑफीसमध्ये अशी काही परिस्थिती अचानक निर्माण झाली असती, तर आपण काय केलं असतंत?’

‘मी पुरुष आहे. पुरुषाचं बाहेरचंच काम असतं!’

काळ खूप बदललाय अब्बू! बदलत्या काळाबरोबर आपणही बदलायला हवं. उद्या अम्मी आपल्या विद्यालयात जाऊन आपली जबाबदारी निभावेल. सहाय्यिका चर्चमधून परत येईपर्यंत घर आणि दादीची जबाबदारी आपण सांभाळू! ‘

‘बेटा, तू बरोबर बोलतोयस. घर चालवायचं, तर आपापसात एक दुसर्‍याच्या अडचणी जाणून, समजून चालवायला हवं. तरच जिंदगी मजेत जाईल!’

एवढ्यात मुलाचे लक्ष पिंजर्‍यात बंद असलेल्या पक्ष्याकडे गेले. तो बाहेर पडण्यासाठी तडफडत होता.पिंजर्‍याचं दर उघडून पक्ष्याला आकाशात उडवत मुलगा म्हणाला, ‘सगळ्यांना स्वातंत्र्य मिळायला हवं.’

मूळ कथा- खुले पंख   

मूळ लेखिका – सुश्री विभा रानी श्रीवास्तव 

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

मो. – ९१६२४२०७९८ 

अनुवादिका –  सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग  ☆ सांगड… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ सांगड… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

“अंजलीताई येऊ का? ” दारावर टकटक करीत निर्मलाताईंनी आवाज दिला. ” आज इकडे कुठे अशा दुपारच्या वेळी? ” ” सहजच! एकाच सोसायटीत राहतो पण भेटीगाठी होत नाहीत,म्हणून विचार केला आज जावं झालं.” ” या! या! बसा.” अंजलीताईंनी निर्मला ताईंचं स्वागत केलं.

या निर्मलाताई ढमढेरे, शेलाट्या, सावळ्या वर्णाच्या, असतील साधारण ५५च्या पुढे, पण मुख्य म्हणजे भारीच उचापत्या. कोणाकडे भांडण झालं, कोणाची मुलगी पळून गेली,कोणी कंपनीत फ्रॉड केला अशा प्रकारच्या बातम्या सोसायटीभर पसरतात त्या निर्मलाताईंकडूनच! निर्मलाताई म्हणजे वृंदावन सोसायटीतलं चालतं बोलतं बातमी पत्र!

शेजारच्या बिल्डिंग नंबर चार मध्ये राहणाऱ्या निर्मलाताई आज इतक्या दिवसांनी सौ.अंजलीताई माने यांच्याकडे आल्या, म्हणजे नक्कीच काहीतरी खबर काढण्यासाठी आल्या असाव्यात.

श्री.व सौ.माने, उच्च विद्या विभूषित.अंजलीताई रूपारेल कॉलेजमध्ये समाजशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका होत्या. दोन वर्षे झाली त्यांना सेवानिवृत्त होऊन.   डॉ.विद्याधर माने (पीएच.डी.) आय. आय.टी. मुंबई, येथे प्राध्यापक. मेकॅनिकल इंजीनियरिंग विभागाचे प्रमुख. आता सेवानिवृत्त असले तरी त्यांचे विद्यापीठात जाणे- येणे, पुस्तके लिहिणे ही कामे चालूच असतात. त्यांनी लिहिलेली कितीतरी पुस्तके संदर्भ पुस्तके म्हणून प्रसिद्ध आहेत.

नीलिमा आणि नीरज ही त्यांची दोन अपत्ये. नीलिमा,एम्.डी. ऑन्कॉलॉजिस्ट ( कॅन्सर स्पेशालिस्ट) म्हणून अंधेरीतील कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे आणि नीरज कम्प्युटर्स सायन्स इंजिनीयर होऊन, अमेरिकेतील मॅसेच्यूसेट्स या विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहे.

साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं हे चौकोनी कुटुंब! त्यांच्या घरात प्रवेश केल्यावर कोणत्याही प्रकारचा श्रीमंती देखावा नाही,परंतु सरस्वतीचा वास आहे, सकारात्मक  ऊर्जा आहे असे काहीसे जाणवते आणि मन प्रसन्न होते.

दिवाणखान्यातील सोफ्यावर बसून निर्मलाताईंची काकदृष्टी अगदी घरभर फिरत असल्याचे अंजली ताईंच्या नजरेतून सुटले नाही.

“काही हवं आहे का निर्मलाताई तुम्हाला? हे घ्या थंड पाणी प्या, दुपारच्या वेळी फार गरम होतं.” काहीतरी संवाद घडावा या हेतूने अंजलीताई त्यांच्याशी बोलू लागल्या.

इकडच्या तिकडच्या जुजबी गोष्टी केल्यानंतर गायकाने जसे समेवर येऊन धडकावे त्याप्रमाणे निर्मलाताईंनी भात्यातला बाण बाहेर काढला.” बऱ्याच दिवसात तुमची नीलिमा कुठे दिसली नाही येता जाता? बाहेरगावी गेली आहे का? ती डॉक्टर झाल्याचे पेढे खाल्ले होते, त्यानंतर पुढे काहीच कळले नाही.”

माने कुटुंब काळा सोबत राहणारं.नित्य देवपूजा,

सणवार,गौरी,गणपती,संक्रांतीचे,  चैत्रगौरीचे हळदी-कुंकू,श्रावणातले उपास-तापास या गोष्टी त्यांच्या घरात अगदी रूढी,परंपरेप्रमाणे चालू होत्या, पण म्हणून त्याचे फार स्तोम  नाही. देव धर्माचा कोणताही दिखावा नाही. सद्यपरिस्थितीनुसार जुन्या चालीरीतीत योग्य ते बदल करण्याची त्यांची नेहमीच तयारी. प्रत्येक  चालीरीतीचा अभ्यास करून, त्यामागील शास्त्र समजून घेऊन त्यांच्या घरी परंपरेचे जतन होत असते. थोडक्यात हे माने कुटुंब परंपरा जपणारे सुधारक कुटुंब आहे, त्यामुळे निर्मलाताईंच्या प्रश्नाला खरे उत्तर देण्यास मागेपुढे पाहण्याची अंजलीताईंना काहीच गरज वाटली नाही.त्यांनी सत्य परिस्थिती अगदी खुल्या दिलाने निवेदन केली.

“अहो निर्मलाताई, नीलिमा आता इथे आमच्या सोबत राहत नाही. रोज अंधेरीला अपडाऊन करणे फार त्रासाचे असल्यामुळे, तसेच रात्री-बेरात्री जावे यावे लागत असल्यामुळे तिने कोकिळाबेन हॉस्पिटल जवळच टू बीएचके फ्लॅट घेतला आहे आणि ती व तिचा पार्टनर दोघे तिथेच राहतात.”

निर्मलाताईंना आश्चर्याचा धक्का बसल्याचे अंजलीताईंच्या तात्काळ लक्षात आले.” म्हणजे लग्न कधी झालं? आम्हाला काहीच माहित नाही!” ” लग्न नाही झालं अद्याप,परंतु गेले वर्षभर दोघे एकत्रच राहत आहेत. एकत्र राहून त्यांची पार्टनरशिप परस्पर पूरक आहे की नाही,दोघांचे स्वभाव,दोघांच्या आवडीनिवडी,एकमेकांना समजून घेणे या आणि अशा गोष्टी व्यवस्थित जुळल्या तर लग्न बंधन स्वीकारायचे असे त्या दोघांनी ठरविले आहे. “

अंजलीताईंनी निर्मलाताईंच्या शंकेचं निरसन केलं.

“हे तुम्हा दोघांना मान्य आहे?”

“अहो,आमच्या मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे? मुलं चांगली जाणती आहेत, आपल्याहून त्यांना सर्वच बाबतीत अधिक ज्ञान आहे. नीलिमाने आमची पंकजशी ओळख करून दिली आहे.तोही हार्ट सर्जन आहे,चांगला देखणा रुबाबदार आहे. त्याचे वडील नाशिकमध्ये एक नामांकित डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. एकंदरीत सर्वच चांगलं आहे.  मग तुम्हीच सांगा आम्ही काय फक्त विरोधासाठीच विरोध करायचा का?”  अंजलीताई नीलिमाताईंना त्यांची परखड मते सांगत होत्या.

आपल्या संस्कृतीप्रमाणे लग्न  संस्थेवर त्यांचा विश्वास आहे परंतु  जुन्या रुढीला चिकटून बसणे त्या दोघांनाही मान्य नाही. नुसत्या पत्रिका जुळवून आणि एक दोन भेटीत मुला मुलींची खरी ओळख आणि स्वभावाची पारख कधीच होत नाही यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. त्या निर्मलाताईंना सांगत होत्या,  “आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती. कितीही शिकलो सवरलो तरी आपण बायकाच नेहमी पडती बाजू घेऊन संसार सांभाळत होतो,पण आता तसं नाही.मुलगा आणि मुलगी दोघेही समान पातळीवर कामं करतात. अशा परिस्थितीत त्यांची मतं जुळली नाहीत,त्यांच्यातील वाद सतत वाढत राहिले तर त्याची परिणती काय? तर दोघातील फारकत! तशात एखाद दुसरं मूल असलं तर त्या निरपराध बालकाची अवस्था फारच केविलवाणी! ही परिस्थिती लक्षात घेता काही काळ एकत्र राहून एकमेकांना नीट ओळखूनच लग्न केलेलं चांगलं असं आता आमचंही मत आहे.”

मान्यांची डाॅक्टर कन्या नीलिमा ही तिच्या boy friend बरोबर लिव्ह इन मध्ये राहत आहे ही बातमी आता वार्‍यासारखी संपूर्ण सोसायटीत पसरणार याची अंजलीताईंना पक्की खात्री आहे.

नवा जमाना, नवे विचार! ते दोघे लग्न करणारच आहेत यातच श्री व सौ माने यांना समाधान आहे.

लोक काय म्हणतील याची त्या दोघांना पर्वा नाही. त्यांच्या मुलीवर आणि तिच्यावर झालेल्या संस्कारांवर दोघांचाही पूर्ण विश्वास आहे.

जुन्या नव्याची सांगड घालून  ते दोघे आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत…

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जत्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

🌸 जीवनरंग 🌸

☆ जत्रा…  ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी 

तीन वरसात एकडाव भरणारी म्हसोबची जत्रा अगदी तोंडावर येऊनश्यान ठेपल्याली. तस गावच पोलीस पाटील मल्लप्पा काळजीत हुतच ! त्यांनी गजू ला ताबडतोब बोलवून घेतला अन लगोलग  गजुला, गावच सरपंच शिवगोंडा पाटील कड निरोप धाडला. गजू पटलांच्या वाड्यावर लै जुना गडी. पन कामात इमानदार ! त्यानं कैक वर्स वाड्याव काम केल्याल. तडक  चावडीवर पंचांना निरोप द्याय गेला.

मल्लप्पा पाटील अंकली गावचं लै बडी असामी, मोठं जंक्शन  परस्थ ! गडी सहा फूट उंच आडदांड बांधा, गव्हाळ रंग दुटंगी धोतार, बाराबंदी, डोईस मोठा फेटा, फेट्याचा शेमला लांबलचक मागून डाव्या खांद्यावर म्होर आलेला, नाक फेंदारलेलं, नाकाखाली ह्ये लफ्फेदर मिश्या, मिश्याना पीळ, कानां म्होर कल्ले, गडी निबार, खर कडक शिस्तीचा ! घरी नोकर चाकर, जमीन जुमला, ऐसपैस टोलेजंग वाडा, गाई म्हसरांची  मोठी दावण, अस सगळं मोठं काम हुत.

गजु सरपंचांना पाटलांचा निरोप देऊन आला, अन म्हणाला ” तुम्हाला सरपंचांनी टकोटक बोलावलं ” तस पाटील बी लगेच उठलं, पटका गुंडाळून शेमला पुढं टाकला व सुपारी कातरुन दाढत धरली, पान पण चुना लावुन तोंडात टाकलं वर अब्दार तामकुची चिमट टाकली घोड्यावर मांड टाकून चावडी जवळ केलीच.

चावडीत गेल्या गेल्या समदी लोक उभारून पाटलासनी नमस्कार केली. आतल्या खोलीत पाटील गेलं, शिवगोंडा पुढं येऊन अदबीने नमस्कार केला व बैठक बसली. तस सरपंचांनी चहाची ऑर्डर सोडली, डायरेक्ट मुद्द्याला हात घालत सरपंच म्हणलं ” काय बी काळजी करू नगा पाटील साहेब !

म्या आजच  मिटिंग बोलावतो व जतरची समदी तयारी करून घेतो. अस म्हणल्याव पाटलांचा जीव भांड्यात पडला. चहापाणी झालं तस सरपंच म्हणलं फकस्त तुम्ही बळी द्यायचा रेडा तयार ठेवा. जत्रा भन्नाट भरवितो. पाटील आलं तस घोड्यावरन गेलं.

सांच्याला समद्या पंचांना अवतांण दिल तशी लगोलग समदी जमा झाली.

समद्याना विषय माहीत हुताच ! फकस्त कामाची वाटणी तेवडी शिल्लक हुती.

चहा पाणी झालं तस, सरपंचांनी समद्या कामाची वाटणी बी आधीच करून ठेवल्याली हुती.  फकस्त त्यांना ते काम सांगायचं हुत.

तस त्यांनी प्रत्येक पंचाला  ते ते काम सोपवलं व मिटिंग सम्पली.

गण्या उठला अन म्हनला पंच रेड्याच काय ? त्यावर शिवगोंडा म्हनले रेड्याचा मान खायम पाटलांच्याकडे अस्तुया नव्ह ? तस न्हाय म्हणायचं मला  गणू विनाकारण खाकरत म्हनला, एक रेडा माझ्या बी घरी हाय नव्ह ! मुद्दाम त्याला मी बाजार दाखवला न्हाय.

शिवगोंडा- मग तस जाऊन पाटलासनी सांग की. हाय काय न्हाय काय.

गणू – तस नव्ह पंच तुम्ही संगीतल्याल जरा येगल पडतंय ! पंच हसत म्हनलं जा जा सांगतु मी त्यांना !

त्यावर गणू म्हनलं न्हाई म्हंजी त्यांना तसा सांगावा द्या की, म्हंजी दुसरीकडं बाजार हिंडाय नगो त्यासनी.

ते बी खरच म्हणा ! अस पंच म्हटले अन समदीजन उठून जतरच्या कामाला  लागली.

गावच्या गटारी साफ करायला यल्लप्पा, मल्लपा रुजू झाले. रस्ता साफ कराया गावकुसाबाहेरच्या बायका कामाला लागल्या.

इजेच्या डांबवर नवीन बलब घालण्यात आले.

गावात डांगरा पेटवून, समद्याना कळवण्यात आलं.

म्हसोबाच्या देवळा म्होर स्वच्छता करण्यात आली. आजूबाजूला मंडप घालून कनाती बांधण्यात आल्या.

बैलगाडीत हौद घालून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. जवळपासच्या गावात आवतान धाडण्यात आलं. माहेरवाशिणी अन पै पाव्हन जमलं तस वाहनांन येऊ लागली ! गावात समदीकडे फरफर्या लावण्यात आल्या म्हसोबाच्या देवळाला बाहेरून आतून रंगरंगोटी करण्यात आली. गावात कस निस्ता  उत्साह संचारला व्हतंच ! पोर बाळ रस्त्यावर हिंदडू लागली. दिवस जवळ येईल तस. प्रत्येकानं मागून घेतलेला नवस फेडीत व्हता.

म्हसोबाचा पुजारी रात अन दिस भर बसू लागला !  त्याला मदत घरच्याची बी मिळू लागली !  भानुदास पुजारी वयान तस म्हातर पन तस त्यांच्या अंगाकड बघितलं तर जाणवत नव्हतं! धोतर अन गळ्यात मुंडीछाट कपाळावर भंडारा ! त्याची कैक डोई म्हसोबाच्या सेवा करण्यात गेल्याली ! चेहऱ्यावर कायम हसत बोलणं. त्याला देवस्थानची दहा एकर जमीन बी कसून खात व्हता. तस त्याला काय बी कमी नव्हतंच !

देवा म्होर रोज वाजत गाजत लोक येत अन आपला बोलेला नवस पुरा करत ! मग कोण देवाच्या नावं गाय सोडीत कोण वासरू ! कोण बैल ! अस हे रोज चाल्याल हुतच!

रस्त्याच्या दोन्ही बाजून  जागा मिळेल तस दुकान सजत व्हतीच ! त्यात देवा म्होर नारळ, कपूर, उदबत्त्या, प्रसाद म्हणून बेंड बत्तास, पेढे चिरमुर ! त्याला लागून देवाच्या मूर्तीच अन टाक असल्याला दुकान ! त्यांच्या खालत देवच फोटू असल्याला फ्रेमच दुकान ! मग  ओळींन बांगड्यांची दुकान त्याच्या खालोखाल भांड्याची दुकान, मग शेवटी मुलांच्या खेळण्याची दुकान.

बाजूला मोठं पटांगण त्यात मुलांना बसायला पाळण ! गोल फिरत्याल घोड खुर्च्या. अन घसरगुंडी !

अस समदी जत्रा भरल्याली !

लागून पाच सात होटेल चहाच गाडे, भेळ, वडा पाव, त्यातच गारेगारची सायकल, रंगीबेरंगी बर्फाचा गोळा, उसाचा रस, सोडालेमनच दुकान ! अस हे समद वरश्या परमान झ्याक जुळून आल्याली जत्रा.

त्यात हावसे नवसे गवसे लोक हिंडत व्हतीच ! बाया बापड्या लेकरं चिल्ल पिल्लं समदी  जण मजा घेत व्हते.

शाळेच्या माग तमाश्या पण आलेला, येक टुरिंग टाकीज पण बसकण मारल्याली व्हतीच की ! जे जे पाहिजे ते ते वरसा प्रमान झाल्याल व्हत ! आता फकस्त भंडारा उधळयाच व्हता, रेड्याचा बळी दिला की झालं ! जतरा पार पडणार व्हती.

घरोघरी  पक्वांन्न शिजत व्हती, त्याचा वास गल्लीतन फिरत व्हता. जत्रेचा मुख्य दिवस उजाडला. जो तो आनंदात व्हता, ठेवणीतील कपड घालुनश्यान जो तो घरातील निवद देऊन येत व्हता. गर्दी ज्याम वाढल्याली, भंडारा जो तो उधळत व्हता, समदी रस्ते, गल्ल्या पिवळधमक झाल्याल !

देवळा म्होर तर नारळाच्या भकलाचा खच पडलेला ! भानुदास पूजऱ्याच्या कणग्या निवदान

काठोकाठ भरलेल्या व्हत्या ! हाताखाली घरची समदीजन मदत करत  व्हतीच. तरी बी लोकांना आवरण जिकिरीचं झालं व्हत ! आवंदा तर गर्दी इपरित जमल्याली. समदिकड भांडऱ्यांन पिवळा चिखल झाल्याला ! भंडारा अन नारळाचं पाणी घ्या की !

सांच्याला रेड्याचा बळी बरुबरीन सहा वाजता द्यायचा व्हता ! चालरीतच तशी व्हती. हिकडं गण्याचा रेडा गावच्या पाटलांनी चांगली बोली देऊन इकत घेतला हुता ! त्यापायी गण्याबी लै खुषीत हुता !

त्या रेड्याला स्वच्छ धुवून श्यान पाठीवर झुल घाटलेली ! गळ्यात मोठा झडूंच्या फुलांचा हार ! घातला. डोईला भंडारा फासलेला गळ्यात दोन्ही बाजूला दोरखंड बांधलेलं.

दोघा रामोश्यानी त्याला गच्च धरलेल् ! त्याला गावातून मिरवत नन्तर मग देवीम्होर बळी द्यायचा व्हता !

शेवटचा घास म्हणून पाटलीनबाई आल्या, त्याला पाच पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या ! बादलीभर पाणी पाजलं अन त्याला पाच सवाष्णीन ओवाळल !

दुपारचं 3 वाजता पाटलांचा रेडा वाड्या भैर पडला ! म्होर ढोल ताशा, अन सुंदरी वाजवणार कोर्वी लोक हुतच ! त्याच्या म्होर धनगराच् ढोल पथक ! त्याच्या म्होर गावठी बँड वाजवणंर  लोक ! मध्येच कोणतरी नाचत हुता, त्याच्या अंगावर चिरमुर अन चिल्लर टाकली जात हुती !

भंडारा तर पोत्यानी फेकला जात व्हता !

मिरवणूक एकेक गल्ली तुन भैर पडत हुती मध्येच काही घरातल्या बायका रेड्याला पुरण पोळी चारवत हुत ! अशी ही जंत्री कसबस गावातून मिरवत देवाम्होर आली तवा सांच्याला दिवस मावळतीला कलला व्हता.

सांच्याला सहाला काही अवधी हुता, तस म्हसोबा म्होर रेड्याला उभं केलं !  सगळी कडे शांतता पसरली ! वाद्य बँड ढोल समद बंद पडल !  भानुदास पुजारी लगबगीनं म्होर झाला. त्यानं रेड्याच्या पायावर पाणी घातलं. म्हसोबच्या अंगावरील हार रेड्याच्या गळ्यात घातला ! बुट्टी भरून ठेवलेल्या निवदाच्या पुरण पोळ्या रेड्याला खायला दिल्या. त्याच्या अंगावरची झुल काढून त्याच्या वर समदिकड भंडारा उधळला !  तस इतर जमलेल्या लोकांनी बी  इतका भंडारा उधळला की, रेडा बिथरला ! अन एकदम मानेला जोरात हिसका दिला ! तस त्याला दोरखंडानी धरलेलं रामोशी उत्तान पडलं ! त्यांच्या डोळ्यात भंडारा गेल्यान त्यांना बी काय झालं ते कळलं न्हाय ! जनावर बिथरल्याल त्यांनी जी मुसंडी मारली ती दहापाच जणांना तुडवून अंगात वार शिरल्यावनी पळून गेल ! — त्याच्या माग गावाची लोक काही पैलवान पळत व्हत पण —- ते कुठं पळून गेल ते शेवट पत्तर कळलं नाही !  पूजाऱ्याला तर भोवळ आली अन ते एका कोपऱ्यात पडलं !

झालं जो त्यो गण्याचा नावानं बोंब मारत व्हता ! एवढमातूर खर !

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print