मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ईशान्य भारत ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ ईशान्य भारत ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल पी बी आचार्य म्हणाले, “भारतीयांना ईशान्येपेक्षा अमेरिकेबद्दल जास्त माहिती आहे”.    

त्यांनी एक वैध मुद्दा मांडला – आपल्यापैकी फार कमी लोकांना ईशान्येबद्दल पुरेशी माहिती आहे.

ईशान्येबद्दल काही आश्चर्यकारक तथ्ये येथे आहेत…… 

  1. ईशान्येत आठ राज्ये आहेत: अरुणाचल प्रदेश, मिझोराम, आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, सिक्कीम, नागालँड.
  2. ईशान्येत जवळपास 220 भाषा बोलल्या जातात, हे तिबेटी, दक्षिण-पूर्व आशियाई आणि पूर्व भारतीय संस्कृतींचे मिश्रण आहे.
  3. ईशान्य हा भारताचा एकमेव भाग आहे जो मुघल साम्राज्य जिंकू शकले नाही.
  4. ईशान्येवर 600 वर्षे राज्य करणारे अहोम राजवंश हे भारतीय इतिहासातील सर्वात प्रदीर्घ अखंड राजवंश आहे.
  5. जगातील सर्वात मोठे नदी बेट, माजुली आणि जगातील सर्वात लहान नदी बेट, उमानंदा दोन्ही ईशान्येला आहेत.
  6. भारतातील सात प्रमुख राष्ट्रीय उद्याने ईशान्येला आहेत.
  7. शिलाँग ही भारताची रॉक कॅपिटल मानली जाते.
  8. मेघालयातील मावसिनराम यांनी पृथ्वीवरील सर्वात ओले ठिकाण म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
  9. आसाममधील सुलकुची हे जगातील सर्वात मोठे विणकाम करणारे गाव आहे जिथे संपूर्ण लोकसंख्या रेशीम वस्त्रे विणण्यात गुंतलेली आहे.
  10. मुगा, आसामचे सुवर्ण रेशीम, जगात इतर कोठेही उत्पादित होत नाही.
  11. हा भारतातील सर्वात स्वच्छ प्रदेश आहे.मेघालयातील मावलिनॉन्ग हे संपूर्ण आशियातील सर्वात स्वच्छ गाव आहे.
  12. देशातील ऑर्किड्स पैकी 70% ईशान्येत आढळतात.
  13. मिझोराम आणि त्रिपुरा ही भारतातील सर्वात जास्त साक्षरता दर असलेल्या राज्यांपैकी आहेत.
  14. संपूर्ण ईशान्येत हुंडा संस्कृती नाही.महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे.  बलात्काराच्या घटना जवळपास शून्य
  15. सिक्कीम हे जगातील पहिले राज्य आहे जिथे 100% कृषी उत्पादन सेंद्रिय आहे आणि तसे प्रमाणित आहे.एका निवेदनानुसार, 25 देशांतील 51 नामांकित धोरणांना मागे टाकत सिक्कीमने फ्यूचर पॉलिसी अवॉर्ड 2018 जिंकला.  ब्राझील, डेन्मार्क आणि क्विटो (इक्वाडोर) च्या धोरणांना रौप्य पुरस्कार मिळाले.

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटना (FAO), वर्ल्ड फ्यूचर कौन्सिल (WFC) आणि IFOAM – ऑरगॅनिक्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्काराचे आयोजन केले जाते.

भारताच्या ईशान्य भागाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी कृपया ही माहिती तुमच्या सर्व संपर्कांपर्यंत पोहोचवा.

ही  खूपच प्रेरणादायी माहिती आहे…… 

संग्राहक : विनय मोहन गोखले    

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्पेशल रविवार…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “स्पेशल रविवार…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

नुकताच येऊन गेलेला रविवार माझ्यासाठी खूप स्पेशल ठरला. काय माहित कसा काय पण एखादा दिवसच उगवतो मुळी मस्त. खरतरं कामवालीने पण रविवारी सुट्टी घेतली होती त्यामुळे सगळी कामे आपला हात जगन्नाथ. पण तरीही अजिबात चिडचिड झाली नाही. उलट कामे वाढली तरी पटापट यंत्रवत झपाट्याने उरकली. महाशिवरात्रीचं पारणं असल्याने स्वयंपाक आपोआपच जरा साग्रसंगीत आणि गोड पदार्थांचा होता.त्यात रविवारी तारखेने “अहों” च्या गोंदवलेकर महाराजांची जयंती असल्याने गव्हल्याची खीर होती स्पेशल नैवेद्याला. माझी आत्या खूप सुंदर निगुतीने गव्हले करते आणि प्रेमाने माझ्यासाठी गव्हले राखून ठेवते. खरंच ही जवळची, प्रेमाची आणि आपल्यावर जीवतोडून मनापासून प्रेम करणारी मंडळी ही पण एक प्रकारची श्रीमंतीच बरं का.

सुट्टी चा रविवार एका कारणासाठी खास ठरला कारण ह्या दिवशी एक खूप छान मराठी चित्रपट मला सलग बघता आला. विनाव्यत्यय सलग चित्रपट बघण्याचा योग कितीतरी दिवसां नंतर आला होता.रविवारी दुपारी एक वाजता “गोष्ट एका पैठणीची” हा मराठी चित्रपट बघितला. काल परवा ह्या चित्रपटाचे समीक्षण पण वाचण्यात आलं. डोक्याला ताण न देणारा, डोक्यावरून न जाणारा उलटपक्षी नवीन चांगले विचार डोक्यात भरविणारा हा चित्रपट. ह्याचे परीक्षण नुकतेच सगळ्यांनी वाचल्यामुळे त्यावर न लिहीता ह्या चित्रपटाने आपल्याला काय दिलयं ह्याकडे आज बघूया.

चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी सामान्य, निम्न मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्रपटा च्या शेवटापर्यंत अगदी मध्यमवर्गीय कुटुंबा सारखे दाखवलेयं. त्यांच राहणीमान, घर, ह्यात कुठेही अगदी स्वप्नरंजन म्हणून सुद्धा केंद्रबिंदू असलेल्या जोडप्याकडे आवश्यक नसलेली श्रीमंती घुसडण्यात आली नाही. नायिका असलेली सायली संजीव परत एकदा  मराठी धारावाहिक “काहे जिया परदेस” मधील गौरी इतकीच प्रेक्षकांना आवडतेयं.नायक सुव्रत पण एकदम भुमिकेला न्याय देणारा अभिनेता.

ह्या चित्रपटाचा” पैठणी शोध मोहीम” हा गाभा असला तरी एका पैठणीमागोमाग  चार पैठण्यांचा मागोवा ह्या चित्रपटभर आहे. ह्या सिनेमाचे कथानक चित्रपट छान असल्याने. आपणच बघावा,मी फक्त ह्यातून ठळकपणे जाणवलेल्या गोष्टींचा उल्लेख करते.

सर्वप्रथम शोधमोहीमेची सुरवात ही येवल्यातून होते.तेथील पैठणीच्या दुकानातील माई सायलीला जी मदत करतात त्यावरून जगात अजूनही चांगुलपणा टिकून आहे ह्याचा परत एकदा अनुभव घेतला. मग शोधमोहीमे मधील पहिली पैठणी मिळते एका अमेरिकेत स्थायी असलेल्या मुलाच्या वडीलांकडे, मोहन जोशी ह्यांच्या कडे.त्या अनुभवातून वयाच्या एका स्टेजला तरी पैशाअडक्यापेक्षा हाडामासांची मुलं सानिध्यात हवीतच अशी प्रकर्षाने माणसाची ईच्छा असतेच हे कळलं. दुसरी पैठणी सापडते सांगलीच्या राजेसरकारां कडे .तेथे एकसोडून दोन पैठण्या मिळतात. मिलिंद गुणाजी ह्यांचा अभिनय बघून “मेन वील बी मेन” ह्याची जाणीव होते. तिसरी पैठणी सांगून जाते वेळ निघून गेल्यावर हाती शुन्य उरतं. त्यामुळे जवळच्या  माणसांना वेळीच वेळ द्यावा.

सिनेमाचा क्लायमॅक्स मात्र स्वतः प्रत्येकाने बघावा. एक छान तणावरहित सिनेमा एवढचं मी म्हणेन.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? मनमंजुषेतून ?

☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

जीवन हा प्रचंड रंगमंच आहे. या मंचावर मनुष्य अनेक अनुभूती घेत असतो, अनुभव घेत असतो. 

शास्त्रीय ज्ञानानुसार एकदा अनुभवलेले मनुष्याच्या स्मरणात कायम राहते. तथापि मानवी स्वभावानुसार मात्र काही प्रसंग त्याला कधीच विसरू नये असे वाटते तर काहींची आठवण कधीच येऊ नये असे वाटत असते. त्यातही काही घटना तर अकल्पित असतात, अविश्वनीय असतात, अद्वितीय असतात. 

माझ्याही आयुष्यात अशीच एक अभूतपूर्व घटना ६ जानेवारी २०२३ रोजी घडली. काय घडले ते कथन करण्यापूर्वी, तिचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी आधी मी थोडी पूर्वपीठिका सांगतो. 

अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी मला खेळतांना एक अपघात झाला होता. दुर्घटनेत माझा उजवा डोळा अधू झाला होता. तरीही मी जवळजवळ पंचवीस वर्षे व्यवस्थित शस्त्रक्रिया करू शकत होतो, प्रसूति करू शकत होतो. नंतर मात्र त्या डोळ्याला मोतीबिंदू, काचबिंदू वगैरे त्रास सुरु झाले. त्यावर तीन-चार शस्त्रक्रिया करायला लागल्या आणि अखेरीस त्याचे नेत्रपटल आतून फाटले. लगेच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे डोळा आणि दृष्टी वाचली, पण ते नावापुरतेच ! मला उजव्या डोळ्याने समोरची माणसे देखील ओळखता येत नाहीत. 

तथापि माझा डावा डोळा मात्र विलक्षण कार्यक्षम होता. उजवा डोळा इतकी वर्षे अधू असून देखील मी पन्नासपेक्षा अधिक पुस्तके लिहू शकलो…. अन् अचानक गेले महिना-दीड महिना मला साधे वर्तमानपत्र देखील वाचता येईना झाले, पानात आलेली मिरची देखील ओळखता येईना. 

नेत्रपटल विशारद नेत्रतज्ज्ञाला दाखवायला गेलेलो असतांना तपासणीच्या आधी माझ्या डोळ्यात वरचेवर औषध टाकून मला डोळे बंद  करून बसविले होते. माझ्या या डोळ्याचे काय होणार या विचाराने मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. आता हाही डोळा गेला तर मी करायचे काय – कसे वाचायचे, कसे लिहायचे आणि कसे जगायचे? माझ्या मस्तकात विचारांचे प्रचंड मोहोळ उठले होते.  सूरदास व्हायची भीती मला भेडसावत होती. सूरदासांनी उदंड काव्य केले खरे; पण कुठे त्यांच्यासारखे प्रासादिक व्यक्तिमत्व आणि कुठे माझ्यासारखा सामान्य माणूस ! ज्या शब्दांची आणि अक्षरांची मी आयुष्यभर सेवा केली तेच आता मला पारखे होणार की काय या विचाराने माझे डोके फुटायची वेळ आली; मस्तकात गरगरायला लागले. अखेरीस मी तेथील एका डॉक्टरांकडे एक कागद मागितला. तिला वाटले मला डोळे पुसायला कागद हवा आहे. तिने मला एक टिश्यू पेपर आणून दिल्यावर मी तिला सांगितले, ‘मला लिहायला कागद हवा आहे.’ 

आणि माझ्या आयुष्यातील ती अद्वितीय अनुभूती मला आली. बंद डोळ्यांनी मी शब्ददेवतेची आळवणी करणारी कविता लिहिली.   

शेजारीच बसलेल्या माझ्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘आम्हाला उघड्या डोळ्यांनी देखील इतके सरळ रेषेत लिहिता येणार नाही, तितके  सुबक तुम्ही बंद डोळ्यांनी लिहिलेत !’

… ही अनुभूती आणि ती कविता आज मी माझ्या समस्त वाचकांसाठी घेऊन आलो आहे : 

☆ शब्ददेवते…

शब्ददेवते रुसू नको गे अपुल्या भक्तावरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी  ||ध्रु||

कुवत जशी मी सजवीत आलो अलंकार चढवुनी 

कथा कविता कादंबरीना नटविले  रूपांनी

अगतिक झालो वयोपरत्वे दृष्टी झाली अधुरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी     ||१||

सादाविले तुम्हाला येता ओथंबुन भाव मना

निराश कधी ना केले माझ्या भावभावनांना

असे कसे मी सांडू माझ्या कवीकल्पनांना तरी 

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||२||

देवी शारदे कृपा करावी जागृत ठेवी कविता 

अमर करी मम साहित्याला देऊनिया शाश्वता

सारे सोडून गेले तरीही ते पावो अक्षरी

लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी   ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

संपर्क – एम.डी., डी. जी. ओ., श्रोत्री निवास, ४०/१-अ, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४

मो – ९८९०११७७५४ ईमेल – [email protected].

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ करवा चौथ – लेखक – सुश्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ करवा चौथ – लेखक – सुश्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

ही परंपरा उत्तरेतील आहे. पावसाळा संपला की आपल्याकडे सैन्य मोहिमा सुरु होत असत. मग आपला सैनिक नवरा लढायला जातो आहे. तो जिवंत परत येईल का नाही याची त्या स्त्रीला हुरहूर राहणे स्वाभाविक आहे. 

म्हणून या प्रथेचा जन्म झाला असावा की पतीने युद्धभूमीवर जाण्याच्यापूर्वी त्याच्या दीर्घायुष्यासाठी एक दिवस व्रतस्थ रहाणे. त्याच्या हातून व्रताची सांगता करून घेणे. चंद्र त्यात साक्षीला का घ्यायचा ? तर आपल्या संस्कृतीत चंद्र हा स्त्रीचा भाऊ मानला जातो. मनाचा कारक ग्रह चंद्र आहे. तो आपल्याला मानसिक दृष्ट्या कणखर करू शकतो. आपल्या पतीचे तो असेल तिथे रक्षण करेल. या भावनेतून चंद्राला साक्षी ठेवून नवऱ्याच्या हातून अन्नाचा घास खाऊन व्रताची सांगता करणे. नंतर नवरा युद्ध भूमीवर जाईल. या प्रथेचा खरा अर्थ त्याच लोकांना समजेल ज्यांच्या घरातील कोणीतरी सैन्यात आपल्या देशाची सेवा करत असेल.  

एक अत्यंत हृद्य प्रथा आहे ही. आणि हिचा संबंध पुरुष प्रधान संस्कृतीशी लावणारे लोक मनोविकृत आहेत. 

या कथेत पुरुषप्रधान संस्कृतीचे अवशेष शोधणाऱ्या लोकांना माझा प्रश्न : 

१) ज्या प्रमाणे सावित्री स्वतःला हवा तो वर निवडते आणि त्या पुढील घडणाऱ्या घटनाक्रमाची जबाबदारी घेते, इतके स्वतंत्र आणि परिपक्व तुम्ही तुमच्या मुलीला वाढवले आहे का ? तिने तसे वागले तर तुम्हाला चालेल, पटेल का ? तुम्ही तुमच्या मुलीला तितके स्वातंत्र्य दिले आहे का ?

२)  तुम्ही युद्ध भूमीवर लढायला जाणार असाल आणि परत येण्याची शाश्वती नसेल तर तुमच्या पत्नीने तुमच्या दीर्घायुष्याच्या कामनेने एक दिवस व्रत केले आणि तुम्ही तुमच्या हाताने तिला घास भरवला, तर त्यात तुमचे पतीपत्नी म्हणून नाते अधिक घट्ट होईल, का तुमच्या पत्नीचे हे कृत्य म्हणजे ती गौण व्यक्ती आहे ही भावना तुमच्या मनात निर्माण होईल ?   

लेखक – सुश्री सुजीत भोगले

संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ गीतेचा सोपा अर्थ… ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

जेव्हा आपण कुल्फी खात असतो तेव्हा आपण एक हात खाली धरतो, त्याला गीतेत “मोह” म्हटले आहे.

जेव्हा कुल्फी खाऊन झाल्यावर कुल्फीची दांडी चाटतो, त्याला गीतेत “लोभ” म्हटले आहे.

कुल्फीची दांडी फेकून झाल्यावर, समोरच्याची कुल्फी अजून कशी संपली नाही ते पाहतो, त्याला गीतेत ” ईर्षा” म्हटले आहे.

काही वेळेस कुल्फी संपण्याच्या आधीच कुल्फी कशी खायची असते, हे न समजल्याने दांडी हातात राहून कुल्फी गळून जमिनीवर पडते, त्याला गीतेत ” क्रोध” म्हटले आहे.

झोप पूर्ण होऊनसुद्धा जे काही लोक अंथरुणात लोळत राहतात, त्याला गीतेत “आळस”असे म्हटले आहे.

हॉटेलमध्ये भोजन झाल्यावर, ओंजळभर बडीशेप व साखर खातो, त्याला गीतेमध्ये,

“भिकारी”पणाचे लक्षण म्हटले आहे.

बाहेर जाताना लावलेले कुलूप ओढून पहाणे, ह्याला गीतेत “भय” म्हटले आहे.

व्हाॅटस् अपवर मेसेज पाठवल्यावर दोन निळ्या टीका दिसतात की नाही ते पाहणे किंवा फेसबूकवर एखादी पोस्ट टाकली तर त्याला किती लाईक्स मिळाले, हे सतत पहात रहाणे, ह्याला गीतेत “उतावळेपण” म्हटले आहे.

पाणीपुरी खाऊन झाल्यावर कधी, “साधी पुरी, कधी मसाला पुरी, कधी गोड पुरी दे रे, भैय्या,” असे म्हणतो, त्याला गीतेत “शोषण ” म्हटले आहे.

फ्रुटी पिऊन झाल्यानंतरही स्ट्राॕने शेवटच्या थेंबापर्यंत फ्रुटी ओढत राहणे, ह्याला गीतेत ” मृगतृष्णा” म्हटले आहे.

चणे विकत घेता घेता थोडे चणे किंवा शेंगदाणे हातात घेऊन खाणे, ह्याला गीतेत “अक्षम्य अपराध ” असे म्हटले आहे.

जेव्हा पंगतीत जेवताना मठ्ठा जिलेबी वाढणारा येत आहे, हे पाहून पानांतील मठ्ठा गटागट पिऊन आणि अख्खी जिलेबी तोंडांत कोंबून आणखी जिलब्या ताटात वाढून घेतो, त्याला गीतेत “छळवाद” असे म्हटले आहे.

ही पोस्ट वाचून झाल्यावर गालातल्या गालात हसू येणे म्हणजे ” मोक्ष.”

संग्राहिका :सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ न सांगितले गेलेले छत्रपती… लेखक – अज्ञात ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

न सांगितले गेलेले छत्रपती…!!!

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रमुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात….!

1.अफजलखानाचा कोथळा 

2.शाहीस्तेखानाची बोटे आणि

3.आग्र्याहून सुटका

पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील….!

१. आपल्या आईला, जिजाऊ माँसाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज “सामाजिक क्रांती” करणारे होते…!

२. रयतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे”लोकपालक” राजे होते…!

३. सर्व प्रथम हातात तलवारीबरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे”उत्तम प्रशासक” होते…!

४. विनाकारण व विना मोबदला झाडं तोडल्यास नवीन झाड लावून जगवण्याची शिक्षा देणारे “पर्यावरण रक्षक” होते…!

५. समुद्र प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती. तो विरोध पत्करून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे “स्व-धर्मचिकित्सक” होते …!

६. मुहूर्त न पाहता, अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करुन त्या सर्वच्या सर्व लढाया जिंकून  “अंधश्रध्दा निर्मूलनाचा संदेश देणारे  चिकित्सक राजे होते. !

७. ३५० वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरु केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे ! “जलतज्ञ” राजे छत्रपती शिवराय !!

८. ३५० वर्षांपूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे  १०० हून अधिक गडकिल्ल्यांचे निर्माते, “उत्तम अभियंते राजे” !

९. सर्व जातीधर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे !!

१०. परस्त्री मातेसमान मानत महिलांना  सन्मानाने वागवणारे ” मातृभक्त, नारीरक्षक ” छत्रपती शिवराय ! 

११. संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्री नर्तिका नाचवली गेली नाही, की मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत. !

— खऱ्या अर्थाने ते “लोकराजे” होते.  कारण ते धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पहात होते, आणि  हीच खरी शिवशाही होती…..!

जय जिजाऊ जय शिवराय 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

? इंद्रधनुष्य ?

☆ “सावित्री…” श्री सुजीत भोगले ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सावित्री ही राजकन्या. अत्यंत सुंदर अत्यंत गुणवान तितकीच बुद्धिमान सुद्धा. तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची कीर्ती अशी पसरली असते की तिच्याशी विवाह करण्याचे प्रस्ताव देव सुद्धा नाकारतात, ते पण या भीतीने की आपण तिच्याशी विवाह करण्यास पात्र नाहीत म्हणून.

अश्या सावित्रीचा जीव सत्यवानावर जडतो. सत्यवानाचे वडील हे राजे असतात, परंतु त्यांचे राज्य हरण होते. त्यांना अंधत्व येते आणि आता सत्यवान लाकडे तोडून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो. अश्या सत्यवानाशी विवाह करायचे सावित्री ठरवते. नारदमुनी तिला त्याचे आयुष्य लग्नाच्या नंतर एकच वर्ष आहे या शापाची पूर्वकल्पना देतात, तरीही ती अविचल राहते आणि त्याच्याशीच विवाह करते.

इथे एक पराकोटीची बुद्धिमान आणि सुंदर राजकन्या, जिची अभिलाषा देवांना सुद्धा आहे आणि त्याच वेळी आपण तिच्या पात्रतेचे नाहीत याची कल्पना असल्याने ते तिच्याशी विवाह करण्याचा प्रस्ताव सुद्धा नाकारतात, हे दोन्ही सत्य समजून घ्या.. 

त्यानंतर तिला सत्यवान आवडतो आणि ती त्याला वरते. इथे मुलीला स्वतःचा वर निवडण्याची मुभा होती हे सुस्पष्ट होते. आज सुद्धा जिथे ऑनर किलिंग होतात तिथे हे समजणे अत्यंत आवश्यक आहे. 

जुन्या काळात बऱ्याचदा असा प्रश्न येत असे. तुम्हाला बुद्धिमान पुत्र हवा असेल तर अल्पायु असेल. मंदबुद्धी चालणार असेल तर दीर्घायू होईल. त्याचप्रमाणे सावित्रीच्या समोरही प्रश्न निर्माण होतो. तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेमुळे तिचा विवाह अशक्य होऊन बसलेला असतो. त्यावेळी सत्यवान आवडला आहे, पण तो अल्पायु आहे हे समजते. 

परंतु अल्पकाळ का होईना आपल्याला मनोवांच्छित पतीचा सहवास प्राप्त होईल म्हणून सावित्री त्याच्याशी लग्न करते. त्यात तिची गुणग्राहकता दिसते आहे. 

नंतर यम ज्यावेळी त्याचे प्राण हरण करून घेऊन जाऊ लागतो, तेव्हा ती त्याच्याशी शास्त्रार्थ करते आणि त्याच्याकडून तीन वरदान मिळवते. यमाशी शास्त्रार्थ करणारे फक्त दोनच जण आहेत :  एक नचिकेता आणि दुसरी सावित्री ( एक स्त्री आणि एक बालक. आपण या दोघांना सुद्धा अजाण समजतो ). 

ती पहिल्या वरदानात सासऱ्याच्यासाठी नेत्र मागते. दुसऱ्या  वरदानात त्याचे राज्य मागते आणि तिसऱ्या वरदानात पती मागून घेते. 

ती पहिल्यांदा आपल्या कुलाच्या हिताचा विचार करते. यमाने तिला पुढील वरदान दिले नसते तर तिचे सहगमन झाले असते. मग त्या दोघांच्या पश्चात वृद्ध आणि अंध सासऱ्याला नेत्र मिळणे आवश्यक , राज्य मिळणे आवश्यक, इतका विवेक तिचा त्याक्षणी सुद्धा जागा असतो. 

सावित्रीची ही बुद्धिमत्ता आणि आपल्या कुलाप्रती असणारा समर्पण भाव हा आजच्या तरुणींनी आत्मसात करण्याच्या सारखी गोष्ट आहे.

आपल्याला आवडलेला पुरुषच पती म्हणून निवडणे आणि त्याच्यासह संसार करण्याच्यासाठी साक्षात मृत्यूशी सुद्धा आपली बुद्धी पणाला लावून शास्त्रार्थ करण्याचे धाडस आणि बुद्धिमत्ता असणारी स्त्री, म्हणून सुद्धा आपण सावित्रीकडे पाहू शकतो. 

राजकन्या असणारी सावित्री आपल्या वडिलांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊ शकली असती. परंतु ती मदत स्वीकारत नाही. नवऱ्याच्यासह झोपडीत सुखाने संसार करते. आपल्या आवडत्या पुरुषाच्यासाठी तडजोड करणे ती स्वीकारते, पण मनाविरुद्ध आणि गुणहीन असा नवरा स्वीकारत नाही. तिचा स्वाभिमानी स्वभाव हा गुण सुद्धा आत्मसात करण्याच्या सारखा आहे. 

आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचे निर्णय स्वतः घेणे आणि त्याच्या परिणामांची सुद्धा संपूर्ण जबाबदारी घेणे, समोर आलेल्या परिस्थितीसमोर हतबल होऊन हातपाय न गाळता आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर त्या समस्येवर मात करणे, हे एक व्यक्ती म्हणून सावित्रीचा विकास किती परिपूर्ण झाला आहे याचे निदर्शक आहे. 

जर वटसावित्रीची आपण पूजा करणार असलो तर प्रत्येक स्त्रीला या कथेतील हा सगळा भाग ज्ञात असणे आवश्यक आहे. या कथेतून यमाच्या तावडीतून नवऱ्याला सोडवून आणणे हा भाग गौण आहे. एक व्यक्ती म्हणून आयुष्यातील सगळे निर्णय स्वतः घेणे, त्याच्या परिणामांची कल्पना असूनही आपल्या तत्वांशी तडजोड न करणे, आणि ज्यावेळी सर्वस्व पणाला लावायची वेळ येईल त्यावेळी त्या पातळीवरील त्यागाच्या साठी सुद्धा उद्युक्त असणे, हे दैवी गुण ही कथा आपल्याला आत्मसात करायला प्रेरित करते.

ही कथा प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला, असे स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रेरणास्त्रोत म्हणून सांगितली पाहिजे. ही कथा प्रत्येक पुरुषाने आपल्याला सावित्रीसारखी गुणवान पत्नी हवी असेल तर आपल्याला सुद्धा तितके चांगले लोकोत्तर गुण आत्मसात करायला हवे हे ध्यानात घेण्यासाठी वाचली पाहिजे.  

यातील स्त्रीचे शोषण आणि पुरुषप्रधान संस्कृतीचे वर्चस्व शोधून काढणारे लोक महान आहेत.

लेखक : श्री सुजीत भोगले.

संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’ ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘स्पर्शाचं महाभारत.!’  ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

ज्येष्ठ पती-पत्नींनो, तुम्ही एकमेकांना शेवटचा स्पर्श हल्ली कधी केला होता?

…आठवतं का?

 

बर्‍याच वर्षांपूर्वी नसिरुद्दीन शहा आणि शबाना आजमी यांचा स्पर्श चित्रपट पाहिला होता. सई परांजपे त्याच्या दिग्दर्शिका.

अंधशाळेच्या प्रिन्सिपल सोबत झालेली भावनिक गुंतागुंत आणि

त्यामुळे गवसलेले स्पर्शांचे विविध अर्थ आणि कंगोरे यांचं सुंदर मिश्रण होतं त्यात..

नसिरुद्दीन शहा यांनी उभा केलेला प्रिन्सिपल केवळ अप्रतिम.

शबाना आजमी प्रिन्सिपल  आणि मुलांसोबत ओळख झाल्यानंतर साडी विकत घेताना डोळे मिटून त्या साडीचा “स्पर्श” हाताच्या बोटांनी अनुभवतात तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर आहे..

हे सगळं आठवायला एक कारण घडलं.

काल-परवा

आपलं माणूस 

हा सिनेमा पाहिला.. अप्रतिम..!

नाना आणि सुमित राघवन..

त्यातल्या शेवटच्या एका प्रसंगात नाना सुमितला बोलता-बोलता

विचारतात, “आबांना, म्हणजे तुझ्या वडिलांना, या वर्ष-दोन वर्षांत कधी सिनेमाला घेऊन गेला होतांस?

कधी आउटिंगला?

बाहेर जेवायला?”

सुमित गप्प…

इथपर्यंत ठीक..

पण नंतर नाना सुमितला विचारतात, “शेवटचं कधी शिवला होता रे म्हातार्‍याला?”

आणि अंगावर सरसरून काटा आला..

नाना पुढे म्हणतात,

“एका घरात राहून एकमेकांना आपण वर्षानुवर्षे स्पर्श करत नाही,ही साधी गोष्ट नाही.” हा तर पुढचा कहर..

 

किती साधी गोष्ट.. एकमेकांना ‘स्पर्श’ करणं. एकमेकांशी बोलतो आपण, एकमेकांची काळजीही घेतो,  पण खरंच स्पर्श टाळतो का?

आणि

तो खरंच इतका महत्वाचा असतो?

आयुष्यात किती वेळा किती जणांना कसे-कसे स्पर्श करतो आपण?

 

खरंतर त्वचा म्हणजे पंचेंद्रियांपैकी एक.

स्पर्शाची जाणीव करून देणारी. पण हीच स्पर्शाची जाणीव वादळ होऊन अशी अंगावर येते..

 

लहानशी गोष्ट. स्पर्श… पण तिचं महाभारत होतं. मग कितीतरी स्पर्श आठवतात, आणि आठवत राहतात..

पायाला मुंग्या आल्यावर कधी अंगठ्याला ‘स्पर्श’ केलाय?

 

आपलाच स्पर्श, पण किती अनोळखी वाटतो?

आणि मग असे कितीतरी स्पर्श आठवू लागतात!

उन्हाने तापलेल्या रस्त्यांवरून अनवाणी चालण्याने भाजलेल्या तळपायांना झालेला थंडगार पाण्याचा स्पर्श..

दिवाळीत आंघोळीआधी,

पाडव्याला आईने,

भाऊबीजेला बहिणीने अंगाला तेल लावताना, त्यांच्या तळव्यांचा स्पर्श..

तळवे सारखेच, पण कुठे आईची माया, कुठे बहिणीचा खट्याळपणा त्या स्पर्शांमधेे थांबलेला.

रूढी-परंपरा स्पर्शांशीच संबंधित..

 

ओवाळताना सुवासिनीच्या अंगठ्याचा कपाळाला होणारा स्पर्श..

 

लग्नात लज्जा होमाच्या वेळी, एकमेकांच्या ओंजळीतून सांडणारा स्पर्श..

 

स्पर्श लाजरे असतात, बुजरेअसतात..

मायेने ओथंबलेले असतात कधी कधी धीट, तर कधी आक्रमक असतात, पण ते बोलतात..

 

पायावर डोकं ठेवताना कपाळाला होणारा पायांच्या बोटांचा स्पर्श आश्वासक भासतो…

 

आजीने मायेने तोंडावरून फिरवलेला थरथरता वृध्द हात, त्यावेळी कदाचित नकोसा वाटला तरी, आता सतत भास होऊन गालांवरून फिरत असतो..

 

स्पर्श रेशमी असतात..

जाडेभरडे असतात..

आपल्या सगळ्या जीवनाला अर्थ देणारे असतात..

 

आज माझी आई सत्तरीच्या  पुढे

आहे. कधी-कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत मी टीव्ही पाहतो. ती पण माझ्या नसलेल्या केसांवरून हात फिरवत म्हणते,“रोड झालास रे”. ती स्पर्शांची गुंतावळ दहा-पंधरा मिनिटांत

कितीतरी देवाण-घेवाण करते..

 

स्पर्शांना धर्म, जात, देश कसलेच बंधन नसते.. ईदच्या दिवशी

एकमेकांना आलिंगन देऊन मुबारक बाद दिली जाते, तशीच दसर्‍याला सुद्धा गळाभेट असतेच की.

पाश्चात्य संस्कृती मध्ये

शेकहँड करतात. फ्रेंच लोक गालाला गाल लावतात. ही

परिचयाची, भेटीची पद्धत.

इथेही स्पर्श महत्त्वाचा..

 

का असेल स्पर्श महत्त्वाचा?

मला वाटतं इतर ज्ञानेंद्रिय खोटं बोलू शकतात पण स्पर्श फक्त खरं बोलतात..

हे प्रत्येक संस्कृतीला माहिती असतं..

मानवी जीवनाची अथांग गाथा अशीच स्पर्शांनी मोहरलेली आहे.

आणि तेच स्पर्श उतारवयात मिळेनासे झाले तर ..?

म्हणूनच नानांच्या प्रश्नाने अंगावर काटा येतो. “शेवटचं कधी शिवला होतास रे म्हातार्‍याला?”

 

लक्षातच येत नाही आपल्याला..

हजारो शब्दांचं, शेकडो औषधांचं

काम एखाद्या स्पर्शानं होऊन जातं. माणसं थकतात म्हणून स्पर्श नाही ना थकत..

ती आपली गोष्ट सांगत राहतात .

कुठे तरी, कोणाचे तरी,

हात ताटकळतात..

डोक्यावरून फिरण्यासाठी.,

कुणाचेतरी तळवे,

कोमेजून जातात तोंडावरून, पाठीवरून न फिरल्यामुळे..

सुरकुतलेल्या हातांवरील कातडी आसुसते, नातवांनी ओढून पाहावी म्हणून..,

पण वेळ नसतो ना आपल्याकडे.

पैसा असतो,

टीव्ही असतो,

गाड्या, घोडे सगळ काही आहे.

पण, पण म्हातारीच्या पाठीवर हात ठेवून “जेवलीस का गं ?” असं विचारण्यासाठीचा वेळ आणि स्पर्श हरवून बसलो आहोत आपण…!

 

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आत्मपरीक्षण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆ 

बालपण सारखं पायात कडमडतं . वय वाढत. तिथच बिघडत.  मनाला मी पणाची चाहूल लागते.  मग सुरू होतो डाव रडीचा.  हे माझं . ते माझं . तेव्हा सुटते सुसाट धावत मनाची कोती हाव.  मग चक्रावत डोकं. ते सिद्ध करण्यासाठी.  सगळं मलाच हवं.  माझं ही आणि दुस-याच ही. का कुणास ठाऊक हा अचानक झालेला बदल मनात घर करून बसतो आणि मरे पर्यंत तिथेच वस्तिला रहातो.  त्याचा छळ सोसत जगताना वर्तनावर अनेकानेक बंधन लादावी लागतात. अंगावर पडणा-या जबाबदा-या ही त्याच अनुषंगाने पारपाडल्या जातात. मनातलीआपुलकीची भावना नकळत कुठे परागंदा होते ते कळतच नाही. आत्मकेंद्री बनताना आवडलेल्या सगळ्यांनाच दूर लोटाव लागत.

आपलं अस्तित्त्व अबाधित राखण्यासाठी. असा कुठला चमत्कार हे सारं घडवत असतो आणि आपणही त्याला खुशाल दुजोरा देत जातो . दुस-याला कमी लेखत आपलं मोठेपण सिद्ध करण्यातच आपण आपल्याला धन्यमानतो. अनुभवलेल्या अप्रतिम अनुभवांवर विरजण टाकून मोकळे होतो.  का? कशासाठी? पुनः प्रत्यय सोडा त्याची अनुभूती ही क्षीण होत जाते.  हळूहळू लोपत जातं भोगलेल , आवडलेल, जगण्याच्या रबाडग्यात कायमचं.

असं करताना आपण ,आपणच निर्माण केलेल्या एका भ्रामक भावविश्वत भ्रमिष्ट होऊन वारत असतो. तेलंघाण्याच्या बैला सारख. तिथं वाटत सगळं आपलंच आहे. आपणच राजे आपल्या विश्वाचे. पण हे लक्षात येतनाही आपल्या. आपण कमावलेली एखादी गोष्ट हरवली तर ती आपण परत मिळवू शकतो पण जे देवाने आणि दैवाने  दिलेलं असतं ते हरवलं तर उभ्या जन्मात परत मिळवू शकत नाही. जीवनात स्थिरावण्यासाठी कल्पकता, कष्ट, संघर्ष , सत्ता मग उपभोग हे सार लचांड सांभाळता सांभाळता अमाप झिजून झाल्यावर मावळणारा उत्साह आणि थकलेले शरीर भेडसावत असते. जप स्वतःला नाही तर अचानक बला यायची वाट्याला. मग घाबरगुंडी जीवाची आणि धावपळ देहाची.  कपात काळाची.  अनवरत इच्छा ध्येय गाठायची.  या सा-यांचा ताळमेळ बसवताना  संधीच मिळत नाही उपभोग घेण्याची.

हस्य हुश्य करत मग आठवण जुन्या लाघवी मनसोक्त जगलेल्या जीवनाची. हातात असतंच काय त्यांच्या शिवाय. म्हणून आठवणीची साठवण होते पुनरपी दर्शन नाही. 

हे कळत फार उशीरा. संधी निघून गेल्यावर हातातून . वाटत हा शाप भोवतोका प्रत्येक जीवाला. का अहं पणाच्या प्रभावाखाली स्वतःला सिद्ध करण्यासाठी उडताना आपल्या पेक्षा आकाशात उंच उडत गेलेल्या असंख्य गरुडांच विस्मरण कसं होतं आपल्याला. याची जाणीव झाल्यावरच आपण म्हणतो आत्मपरीक्षण करतोय.

कशासाठी ? उपयोग काय त्याचा ?

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २० (ऋभु सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – ऋभु (देव / देवांची देवता)

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील विसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी ऋभु या देव / देवांच्या देवतेला  आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त ऋभुसूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद

अ॒यं दे॒वाय॒ जन्म॑ने॒ स्तोमो॒ विप्रे॑भिरास॒या । अका॑रि रत्न॒धात॑मः ॥ १ ॥

जननाच्या क्लेशापासुनिया ज्या देवा ना मुक्ती

त्यांच्यासाठी अपुल्या कंठे पंडित स्तोत्रे गाती

या स्तवनांनी प्रसन्न होउनी आशिष देती देव

त्यांच्या योगे ऋत्विजांना प्राप्त होई वैभव ||१||

य इंद्रा॑य वचो॒युजा॑ तत॒क्षुर्मन॑सा॒ हरी॑ । शमी॑भिर्य॒ज्ञमा॑शत ॥ २ ॥

या देवांनी इंद्रासाठी केली अश्व निर्मिती

आज्ञा करिता सेवेसाठी स्वतःहुनी येती

अद्भुत कर्मांनी आपुल्या सन्माना पात्र

आवाहन हे सार्थ करावे हे अमुचे होत्र ||२|| 

तक्ष॒न्नास॑त्याभ्यां॒ परि॑ज्मानं सु॒खं रथं॑ । तक्ष॑न्धे॒नुं स॑ब॒र्दुघा॑म् ॥ ३ ॥

यांनी निर्मिला अश्वीदेवांसाठी दिव्य शकट

अतिसुखदायी सहजी करतो संचार सर्वत्र

साकारली अश्वीदेवांस्तव धेनू बहूगुणी

क्षुधा नि तृष्णा निवारीतसे क्षीर मधुर देऊनी ||३||

युवा॑ना पि॒तरा॒ पुनः॑ स॒त्यम॑न्त्रा ऋजू॒यवः॑ । ऋ॒भवो॑ वि॒ष्ट्यक्रत ॥ ४ ॥

निर्व्याज अश्या वृत्तीची कीर्ति ऋभू देवाची

मातपित्यासी अर्पियली दक्षीणा तारुण्याची 

अपुल्या भक्तांच्यासाठी ते कनवाळू असती

प्रार्थनेसिया प्रसन्न होऊनी दान फलाचे करिती ||४||

सं वो॒ मदा॑सो अग्म॒तेन्द्रे॑ण च म॒रुत्व॑ता । आ॒दि॒त्येभि॑श्च॒ राज॑भिः ॥ ५ ॥

वैभवमंडित आदित्यासह देवराज इंद्र

मरुद्गणासह सिद्ध जाहले रथीं होऊनी स्वार

त्यांच्या संगे सहभागाचा मूर्तिमंत आनंद 

सत्वर येउनी आम्हा देती ऋभू किती आमोद ||५||

उ॒त त्यं च॑म॒सं नवं॒ त्वष्टु॑र्दे॒वस्य॒ निष्कृ॑तम् । अक॑र्त च॒तुरः॒ पुनः॑ ॥ ६ ॥

त्वष्टादेवाने निर्मिले दिव्य सोमपात्र 

तयात सारे साठविती ठेवूनी सोमरस

ऋभूदेवाने तया पासूनी केले चार चमस

अशी अलौकिक कर्मे त्यांची असती ज्ञात आम्हास ||६||

ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते । एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑ ॥ ७ ॥

वर्णन करण्या तुमचे शौर्य आम्ही वाचाहीन

तुम्ही इतुके चंडप्रतापी तुमच्या पायी लीन

एकवीस भक्तां प्रत्येकी एक रत्न हो द्यावे 

उत्तम तुमचे आशीर्वच देवा आम्हाला द्यावे ||७|| 

अधा॑रयन्त॒ वह्न॒योऽ॑भजन्त सुकृ॒त्यया॑ । भा॒गं दे॒वेषु॑ य॒ज्ञिय॑म् ॥ ८ ॥

अपुल्या श्रेष्ठत्वाने यांसी प्राप्त थोर मान 

समस्त देवांसम यांनाही यज्ञी मिळतो मान

अर्पण केला आम्ही त्यांना हविर्भाग त्यांचा

स्वीकारुनिया त्यासी त्यांनी मान राखिला अमुचा ||८||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे… 

https://youtu.be/QyH4F4zpSNI )

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares