मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “सहजतेचा आनंद विरळा…” – लेखक : अज्ञात ☆ श्री मोहन निमोणकर

काल, परवाची गोष्ट असावी, मी सकाळी सकाळी आपला भाजी मंडईत भाजी घेत होतो, एवढ्यात अचानक बालपणीचा मित्र भेटला. तीस पस्तीस वर्ष जरी झाले असले तरी चेहेरपट्टीच्या खाणा खुणा तश्याच होत्या.पुढे गळा भेट झाली, समोरच्या टपरीवर चहा पीत पीत, आठवणींच्या हिंदोळ्यावर तास दीड तास कसा गेला ? ते कळलंच नाही पण मोठा आनंद देऊन गेला हे मात्र नक्की 

पुढं मित्र त्याच्या वाटेनं गेला, मी माझ्या वाटेला..

मनी विचार करू लागलो, की खरंच ही अचानक भेट किती आनंद दायी घडून आली…

खरंच आपण बऱ्याच गोष्टी ठरवून करू पाहतो, पण त्या एवढया आनंद देत नाही, जेवढ्या सहज घडून येतात. 

होय आयुष्यातल्या या सहजतेचा आनंदच विरळा..

आता हेच घ्याना, आपल्या ला गाणं ऐकायचा मूड असतो 

मग आपण लगेच मोबाइल मध्ये गाणी शोधतो, अवघ्या जगातील संगीत तिथं उपलब्ध असतांना, आपण मग हे लाऊ की, ते असं करता करता दहा, पंधरा मिनिटं अशी निघून जातात, गाण्याचा मूड ही जातो, मग कुठलं तरी नेहेमीच एकून कानाची  तृषार्तता भागवतो….

आता जरा, आपलं बालपण आठवा, एकच रेडिओ घरी दिवसभर चालू असायचा, कधी कुठलं गाणं लागेल त्याचा ठाव नाही, पण जे लागेल ते आनंदाने ऐकायचो, हा झाला सहजतेचा आनंद…..

आता टीव्ही चं ही घ्या, आपल्या लहानपणी आठवड्यातुन शनिवारी रविवारी एखादा दुसरा सिनेमा लागायचा, पण त्या साठी आठवडा भर उत्सुकता असायची, कारण सहजता असायची, केवढा  मोठा आनंद…..

आज आपल्या टी व्ही वर शेकडो सिनेमा ची चॅनेल आहेत, पण एक सिनेमा आपण धड पाहत नाही, किंवा जाहिराती त्या पाहू देत नाही, प्रचंड उपलब्धतेमुळे त्याचा आनंदच गेला….

तुमच्या आमच्या नाते संबंधाचही तेच, पूर्वी माणसं एक मेकांकडे यायची जायची, सहज एखादा पाहुणा यायचा.. चहा पाणी गप्पा टप्पा व्ह्यायच्या  मनं मोकळी व्हायची 

आता तशी होत नाही, मग आम्ही  कृत्रिम तेचे मित्र सोशल मीडियावर शोधतो, हे असं झालं आमची   भूक तिचं आहे, पण आता त्यासाठी आम्ही  खरं खूर अन्न पाणी न खाता त्याची

चित्र  पाहून भूक भागवण्याचा  प्रयत्न करत आहोत..

लग्न समारंभात आम्ही अचानक पणे भेटतो, गाठी भेटी घेतो, याय जायचं आमंत्रण ही देतो….

अन शेवटी एक वाक्य म्हणतो……

मी तसा रिकामाच आहे…

पण येतांना, एक फोन करून या..

अन तिथंच सहजतेचा आनंद हिरावून बसतो…

 

आता हे झालं बाहेरचं, अगदी आपल्या घरातलं च घ्या 

कुटुंबामध्ये पूर्वी संवाद साधतांना नर्म विनोदी पणा असायचं 

हास्य विलाप व्हायचा, भांडणा तली कटुता त्याने दूर व्हायची. आता अहंकारापायी, मोबाईल मुळे एकमेकांशी बोलनासो झालो, मग खास हसण्यासाठी, पैसे भरून सकाळी सकाळी, हास्य क्लब ला जातो, आणि नैसर्गिक हास्य सोडून, कृत्रिम हास्य विकत घेतो, ते कितपत आनंद देणार, तास दीड तास……..

आता आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बघा केवढ्या सहज होत्या, सकाळी न्याहारीला आम्ही  कधी शिळा परतलेला भात, तर कधी  पोळीचा भाकरीचा तिखट चुरमा खायचो  त्यानं आम्हाला कधी ‘ ऍसिडिटी ‘ झाली नाही क्वचित कधी तरी पोहे, उपमा  आम्ही खायचो..असा हलका फुलका नाष्टा घ्यायचो, आता त्याचा ब्रेकफास्ट झाला.. ब्रेड बटर, आम्लेट, पिझ्झा  बर्गर खातो, त्यानं वजन वाढतं.  आता पुढं गम्मत पहा..

 

मग खास पैसे खर्चून जिम लावतो, पायी न जाता महागडी गाडी घेऊन जातो, अन मग तिथं ट्रेंड मिल वर चालू लागतो 

पुढं डाएटसाठी खास कन्सल्टंट चा सल्ला हजार, दोन हजार रुपये देऊन घेतो, अन तो काय सांगतो…

सकाळी हलकं, फुलकं खा….

ही कृत्रिमता आम्ही विकत घेतो, आणि सहजता हरवून बसतो 

 

…… म्हणून म्हणतो मित्रांनो आयुष्यातली सहजता टिकवण्याचा प्रयत्न करा, नैसर्गिकता जपा, कारण   

ठरवून केलेल्या गोष्टी फारसा  आनंद देणार नाहीत…

 

लेखक : श्री सुमंत खराडे

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

जंगल फार्म आणि स्मार्ट सॉफ्टवेअर ☆  श्री मकरंद पिंपुटकर

गोष्ट खूप जुनी. २००८ सालापूर्वीची. साल नमूद करायचं कारण म्हणजे २००८ साली भारतात गूगल मॅप पहिल्यांदा अवतरलं, त्याच्या आधीचा हा प्रसंग.

तेव्हाच्या ठाणे जिल्ह्यातील (आताच्या पालघर जिल्ह्यातील) बोर्डी/डहाणूजवळील असवाली येथील सूर्यहास चौधरींच्या “जंगल फार्म” येथील हा प्रसंग thejunglefarm.in

निसर्गाच्या सान्निध्यात, जैवविविधता, पर्यावरण, adventure आणि unlimited धमाल याचं अफलातून मिश्रण म्हणजे “जंगल फार्म”. पैसा फेकून AC खोल्यांमध्ये निव्वळ ऐदीपणे लोळणे याच्यापलीकडे ज्यांची बुद्धी चालते अशांसाठी अप्रतिम पर्वणी.

बार्डाचा डोंगर, असवाली धरण, कोसबाड हिल, बोर्डी – घोलवड – डहाणूचे समुद्रकिनारे आणि खुद्द जंगल फार्मवरील अनेकविध उपक्रम या सगळ्याचा आस्वाद घेण्यासाठी दोन तीन दिवससुद्धा कमी पडतात आणि यासाठी वेगवेगळ्या शाळा कॉलेजांतून, मित्रमंडळासोबत अथवा IT/ अन्य कंपन्यांमधून अनेकजण इथे येत असतात, पुन्हा पुन्हा येत असतात.

या वेळी, एका IT कंपनीतून बस भरून ४०-४५ जण मुंबईहून “जंगल फार्म”ला येत होते. पश्चिम द्रुतगती मार्गाने चारोटी टोल नाक्यानंतर त्यांनी डावीकडे डहाणूसाठी वळण घेतले, पुढे सागर नाक्यापर्यंत आले आणि मग त्यांच्यातल्या एकाने सूर्यहास दादांना फोन लावला. 

“सूर्यादादा, आम्ही सागर नाक्यापर्यंत आलो आहोत, आता डावीकडे वळून “पार नाक्या”ला येतो आणि मग बोर्डीच्या रस्त्याला लागतो,” तो फोन करणारा सांगत होता. 

सूर्यादादाने ते कितीजण आहेत, कसे येत आहेत, बसने येत आहेत म्हटल्यावर बसचा नंबर काय वगैरे माहिती विचारून घेतली आणि मग तो बोलू लागला.

“तुम्ही मला वाटत पहिल्यांदाच येत आहात ना जंगल फार्मला ?” दादाने खात्री करून घेतली, “डहाणू ते बोर्डी साधारण २० किलोमीटर अंतर आहे आणि तिथून आपलं जंगल फार्म आणखी १० किलोमीटर. खरं सांगायचं तर रस्ता थोडा confusing आहे. पण माझ्या एका मित्राने मला एक नवीन सॉफ्टवेअर पाठवले आहे. तुम्ही जर फोन चालू ठेवलात आणि तुमचा मोबाईल डाटा चालू ठेवलात, तर तुम्ही कुठे आहात, आजूबाजूला काय आहे, ते मला इथे माझ्या फोनवर समजू शकतं.”

मुंबईहून येणाऱ्या ITवाल्याचे कान टवकारले. असं काही सॉफ्टवेअर ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाकडे असावं आणि मुंबईत राहणाऱ्या आपल्याला त्याचा थांगपत्ताही नसावा, याचं त्याला अप्रूपही वाटलं आणि वैषम्यही.

“तुम्ही फोन चालू ठेवा,” सूर्यादादा पुढे बोलत होता, “मी जरा ते सॉफ्टवेअर चालतं आहे ना खात्री करून घेतो, म्हणजे कसं यायचं ते मला तुम्हाला सांगता येईल.”

पुढच्या पाच मिनिटात पुढे कसं यायचं ते सूर्यादादा मुंबईच्या ग्रुपला सांगत होता. बस कितीही वेगात धावली किंवा तिची गती कमी झाली, तरी सूर्यादादांच्या सांगण्यातले landmarks चुकत नव्हते. 

पुढे सहज सांगताना जेव्हा दादाने “जरा म्हशींचा घोळका येत आहे, सांभाळून हां” किंवा “तुमच्या मागून स्कूल बस येत आहे” अशा बारीक सारीक खाणाखुणाही सांगितल्या, तेव्हा बसमधल्या समस्त मुंबईकरांसी अचंबा जाहला.

पाऊण एक तासानंतर बस असवाली धरणाजवळील कच्च्या रस्त्यावरून “जंगल फार्म”च्या रस्त्याला लागली, आणि गेटमधून आत वळली. सूर्यादादाचा फोन चालूच होता, त्यामुळे हा सगळा प्रवास निर्धोक निर्वेध पार पडला. 

सगळे जण उतरले, बसमधून सामान काढायला लागत होते, तेवढ्यात सूर्यादादा एका गाडीतून बसपाठोपाठ “जंगल फार्म”मध्ये शिरला. 

बसमधल्या माणसाने त्याचा कॉल कट केला आणि तो सूर्यादादांना भेटायला धावला. त्याला ते सॉफ्टवेअर बघायचे होते, समजावून घ्यायचे होते. 

सूर्यादादा त्याला भेटले आणि म्हणाले, “तुम्ही एवढ्या दुरून मुंबईहून आले आहात, दमला असाल, हात पाय तोंड धुवून घ्या, फ्रेश व्हा, चहा पिताना निवांत बोलू.”

हातात चहाचा कप घेतल्याघेतल्या तो फोनवरचा माणूस दादाच्या खनपटीला बसला, “दादा, हे कसं काय तुम्ही केलंत ते सांगा ना. म्हणजे बस कुठे आहे, कुठे वळायचं, एवढंच नाही तर मागेपुढे म्हशी आहेत, शाळेची बस आहे हे सगळं सगळं तुम्हाला कळत होतं. कोणतं सॉफ्टवेअर आहे ते सांगा तरी आम्हाला. तुम्ही आम्हाला ते विकू शकाल का ?” वगैरे वगैरे. 

चहा पित, मिश्किल हसत सूर्यादादा म्हणाला, “माझं secret मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मी तुमची सगळ्यांची माफी मागतो. 

असलं कुठलं सॉफ्टवेअर माझ्याकडे नाही. अहो, तुमची बस डहाणूला सागर नाक्याला होती, तेव्हा तुमच्या मागोमाग माझी गाडी होती. त्यामुळे कुठे वळण आहे, मागेपुढे कोण आहे हे मला प्रत्यक्ष दिसत होतं आणि मी तुम्हाला तसं सांगत होतो. बाकी ते मोबाईल डाटा चालू ठेवा – सगळं उगाच बनवाबनवी होतं.”

बसमधल्या IT तज्ञांनी कपाळावर हात मारला. सूर्यादादांनी त्यांना सहजी गंडवलं होतं. 

“अर्थात, हे असं नकाशा दाखवणारं सॉफ्टवेअर पुढेमागे येईलही कदाचित,” दादा गंभीरपणे सांगत होते.

“गूगल मॅपच्या रूपाने आता तसं ॲप आलं आहे खरं, पण मागच्यापुढच्या म्हशी ओळखता येण्याची सोय अजूनही गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई करू शकले नाहीयेत,” जंगल फार्मची धुरा आता समर्थपणे पेलणाऱ्या आपल्या मुलाला – तपन (8830262319) ला ही जुनी आठवण सांगताना, डोळे मिचकावत सूर्यादादा सांगत होते.

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर — लेखक : श्री संतोष भोसेकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

(प्रखर राष्ट्रभक्ती आणि शौर्याचा मूर्तिमंत अवतार असलेले क्रांतिकारक दामोदर हरी चापेकर) 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी एकाच घरातील तीन भावंडांनी आपली शिर कमले भारतमातेच्या चरणी अर्पण केली.  जुलमी इंग्रज अधिकारी  रँडचा वध करणारे मोठे बंधू दामोदर हरी चापेकर यांना १८ एप्रिल १८९८ रोजी फाशी देण्यात आले.

हरिकीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेले दामोदरपंत, बाळकृष्ण आणि वासुदेव हे तिघे बंधू . बालपणापासूनच त्यांना व्यायामाची आवड होती .त्यांच्यावर लोकमान्य टिळकांचा प्रचंड प्रभाव होता. तिघेही बंधू हरिकीर्तनात वडिलांना मदत करीत असत. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन लोकांमध्ये क्रांतीसाठी स्फूर्ती घडवीत. मुलांना कवायत शिकवीत. व्यायामाचे महत्त्व पटवून देत असत.

१८९७ मध्ये प्लेगची साथ सुरू झाली. त्यावेळी इंग्रजांनी पुण्यात प्रचंड अत्याचाराचा हैदोस मांडला होता. पुण्याचा कलेक्टर रँड हा अत्यंत क्रूर होता. पुण्यातील नागरिकांवर प्रचंड अत्याचार करू लागला. अत्याचारी रँड विषयी चापेकर बंधूंच्या मनात प्रचंड चीड निर्माण झाली. त्या अत्याचाराचा सूड घेण्यासाठी दामोदरपंतांनी रँडच्या वधाची योजना आखली.

२२ जून १८९७ या दिवशी पुण्यातील गणेश खिंडीत एका कार्यक्रमाहून परतत असताना उन्मत रँड आणि आयस्टर या दोघांना गोळ्या झाडून वध केला. द्रविड बंधूंच्या फितुरीमुळे दामोदर पंतांना पकडले आणि त्यांना पुण्याच्या येरवडा तुरुंगात आजच्या दिवशी फाशी देण्यात आले. तीनही बंधू अत्यंत धैर्याने फासावर चढले. या सशस्त्र क्रांतिकारकांचा इतिहास अजरामर आणि प्रेरक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्यावर जहाल असा पोवाडा रचला.

स्वार्थ मारुनी लाथ; ठोकिला रँड जनछळ शमनाला l

परार्थसाधू श्री चाफेकर योग्य का न  ते नमनाला ll

पराक्रमाच्या तेजा तुमच्या त्रासुनि निंदिती जरि घुबडे l

वीर कथा तुमची ही गाईल पिढीपिढी नव पुढे पुढे ll

दामोदर चाफेकर फासावर गेले त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले वर्णन..

न्यायाधीश हा जोशी उत्तम उदय मुहूर्ता योग्य गणी l

सत्य देशहित वऱ्हाड जमले कीर्ती नीति ह्या वऱ्हाडणि l

टिळक गजानन नमस्कारिला फास बोहले मग पुरले l

स्मरले गीतमंत्र दामूने मुक्ती- नवरीला हो वरिले l

परी अहाहा! मायावी ही नवरी वर पळवील कुठे l

कुठे हरपले वऱ्हाड सारे अंगाला  बहु कंप सुटे !

भारतमातेला सुद्धा या शूर अशा तीन बंधूंचा अभिमान वाटला असावा. जगाच्या इतिहासातील हे एकमेव उदाहरण आहे.        

क्रांतिकारक दामोदर हरी चाफेकर यांच्या पराक्रमाला वंदन.

लेखक : संतोष भोसेकर

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कोण गोंदवलेकर? … – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

कोण गोंदवलेकर? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती.

गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया गेलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता.

मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.

भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती.

 

चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं,

‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’

त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’

 

आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं.

त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं,

‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’

तो म्हणाला,

‘‘नाही.’’

 

मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी.

म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’

तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला,

‘‘मीच!’’

 

‘ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही,

गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत,

त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी?’

हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्यभरल्या स्वरात विचारलं,

‘‘मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत?’’

 

त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं, असं आहे!

 

त्यानं आपली जीवनकहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता.

कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं.. राहणं, झोपणं सारं रस्त्यावरच.

लहान पोराची दया येते, वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला.

मग चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या.

वाढत्या वयानं व्यसनंही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी, याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती.

 

एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली.

 

सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्रीगोंदवलेकर महाराजांची त्याच्या शब्दांत सांगायचं तर ‘या बाबाची’ ही तसबीर ठेवली होती.

 

डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या ‘बाबा’ कडे नजर टाकली.

 

त्याच्याच शब्दांत पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे.

तो म्हणाला, ‘‘मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं.

या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीनं पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं.

 

या जगात माझं कोणीतरी आहे, या जाणिवेनं मी हेलावलो.

ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो.

माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं!

 

मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली.

 

त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं.

 

रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे, आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही.

 

मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही, तेव्हा जाणवे, मी दारू पितो हे या बाबाला आवडत नाही.. मग दारू सुटली.

असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या. शिवीगाळ थांबली.

मग मी छोटीमोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो.

या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय.”

 

माझ्या मित्राचाही ऊर भरून आला.

तो म्हणाला, ‘‘अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव.’’

 

तो पटकन म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही. जिथं मी आहे, तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत, तिथं मी असणारच!’’

 

मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे.

त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे.

तरी आपल्यात पालट होत नाही.

 

आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो,

आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं!

याचं याइतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.

 

त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यांत मला गोंदवल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.

 

तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात.

 

आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती.

 

कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!

लेखिका : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆ रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

? काव्यानंद ?

☆माती सांगे कुंभाराला… कवी मधुकर जोशी ☆  रसग्रहण.. श्री प्रसाद जोग ☆

जीवनाचे अंतिम सत्य सांगणाऱ्या  माती सांगे कुंभाराला या मधुकर  जोशी यांच्या गीताविषयी :

संत कबीरांच्या “माटी कहे कुम्हार को” या भजनावरून. मधुकर जोशी  यांना जे गाणे सुचले. त्याला श्री. गोविंद पोवळे यांनी सुंदर  चाल लावून म्हटले आहे.

माती सांगे कुंभाराला पायी मज तुडविसी

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी !

जेव्हा एखादा कुंभार मातीची भांडी बनवत असतो त्यावेळेस त्याआधी तो त्या मातीला तुडवून घडण्या योग्य बनवत असतो. त्यानंतर तिला फिरत्या चाकावर ठेवून आपल्या हातांनी आकार देण्यास सुरुवात करतो. कालांतराने ती माती एका सुंदर वास्तूच्या रुपात सगळ्यां समोर येते. सगळे तिच कौतुक करू लागतात आणि  त्याच वेळेस त्या मातीला आकार देणाऱ्या कुंभाराचा अहं देखील हळूहळू वाढू लागतो. या सगळ्याचा कर्ता “मी” आहे ही भावना दिवसेंदिवस त्याच्या मनात रुजू लागते आणि त्याच वेळेस त्याच्या अहंकाराच्या फुग्याला वेळीच फोडण्यासाठी कवी त्याला .वरील ओळींच्या माध्यमातून  सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडक्यात तो परमेश्वर / निसर्ग माणसाला वेळोवेळी अप्रत्यक्षपणे सूचित करीत असतो की तू कितीही फुशारक्या मारल्यास, कितीही यश मिळवलेस, तरी तुला या सगळ्याचा त्याग करून माझ्यातच समाविष्ट व्हायचे आहे.

मला फिरविशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्‍नमंडपी कधी असे मी, कधी शवापाशी !

या ओळींमध्ये मातीच्या माध्यमातून कवी सुचवतो की, कित्येक वेळेस ज्ञानाच्या जोरावर आपल्या इच्छाशक्तीने तू काही काळापुरता जय मिळवतोस आणि समजतोस की हेच अंतिम सत्य आहे.पण प्रत्यक्षात मी अनादी अनंत आहे.  एखादवेळेस तुझ्या लग्न मंडपात असणारा मी उद्या तुझ्या शवापाशी देखील असणार आहे.

वीर धुरंधर आले, गेले

पायी माझ्याइथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती, अंती मजपाशी !

या ओळींमधून कवी  माणसाला आठवण करून देतो कि, जसा आज तू स्वतःला कर्ता समजत आहेस तसेच यापूर्वीही अनेक जण होऊन गेले आहेत. अनेकांनी अनेक राज्ये स्थापिली, अनेक मान सन्मान मिळवले, अनेक पराक्रम गाजवले पण शेवटी त्यांना देखील माझ्यातच विलीन व्हावे लागले. माझ्या दृष्टीने सगळेच समान आहेत. मी कुणातही भेदाभेद करत नाही. माझा न्याय हा सगळ्यांसाठी सारखाच आहे. ज्यावेळेस तुमची माझ्यात विलीन होण्याची वेळ येते त्यावेळेस मग ती व्यक्ती कुरूप असो वा रुपगर्विता, राजा असो वा पराक्रमी सरदार… या गोष्टींचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही.

गर्वाने का ताठ राहसी ?

भाग्य कशाला उगा नासशी ?

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी !

या कडव्यात कवी माणसाला सांगतो, उगाच वृथा अभिमान बाळगून का राहतोस? या गर्वाचा काहीही उपयोग होत नाही. झाला तर फक्त तोटाच होईल. एक लक्षात ठेव शेवटी  तुला माझ्यातच विलीन व्हायचे आहे. त्यांमुळे गर्व सोड

मनुष्य स्वभावर भाष्य करणारे मधुकर जोशी यांचं हे गाणं ऐकून सारेच अंतर्मुख झाले असतील .

मधुकर जोशी यांना विनम्र अभिवादन.

©  श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चला आजोळी जाऊया!…” ☆ सौ. रेणुका धनंजय मार्डीकर ☆

सौ. रेणुका धनंजय मार्डीकर

🌸 विविधा  🌸

☆ चला आजोळी जाऊया!सौ. रेणुका धनंजय मार्डीकर 

☆ चला आजोळी जाऊया! ☆

“माझ्या मामाची रंगीत गाडी हो

त्याला खिल्लाऱ्या बैलाची जोडी हो

कशी दौडत दौडत येई हो

मला आजोळी घेऊन जाई हो

    नाही बिकट घाट

    सारी सपाट वाट

मऊ गालीचे ठायी ठायी हो”

आजोळ!!

किती प्रेम, किती जिव्हाळा आहे ना या शब्दामध्ये. ग. ह. पाटलांची ही कविता ऐकली की परत एकदा फिरून आजोळी जावसं वाटतं. आजोळ म्हणजे प्रत्येकाच्या आईचं माहेर. मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा शाळेला कधी एकदा सुट्टी लागते आणि आपण आजोळी जातो अशी ओढ या बाल मनाला लागलेली असते. ही ओढ अजोळामध्ये मिळणाऱ्या प्रेमामुळे, लाडामुळे, आपुलकीमुळे असते.

माझी मुले छोटी होती तेव्हाची एक गोष्ट आठवते. दोन्ही मुलं रोज शाळेला स्कूल बसने जायची. स्कूल बसमध्ये एक शाळेतलाच माणूस मुलांना सोडायला यायचा. शेवटच्या दिवशी त्याने माझ्या मुलांना विचारले,

“अरे बच्चों, इस बार कहॉं जानेवाले हो छुट्टीयोंमे?”

त्यावर माझ्या छोट्या मुलाने क्षणभरही विचार न करता पटकन उत्तर दिले होते,

“मायके”

सगळेजण त्याच्या उत्तराने हसू लागली आणि त्याला विचारू लागली,

“अरे, किसके मायके जाने वाले हो?”तेव्हा देखील तो धीटपणे म्हणाला.

“मम्मी के मायके जानेवाले हैं।”

तेव्हा तो अगदी छोटा होता. दुसरीच्या वर्गात. पण तेव्हा मुलांना माझ्यापेक्षाही आधी आजोळी जायची ओढ असायची.नातवाला आजोळ विषयी वाटणारी ओढ किती छान काव्यरूप केली आहे बघा ग. ह. पाटलांनी.

“कोण कानोसा घेऊन पाही हो

कोण लगबग धावून येई हो

गहिवरून धरून पोटी हो

माझे आजोबा चुंबन घेती हो

    लेक एकुलती

    नातू एकुलता

किती कौतुक कौतुक होई हो”

आजोळी इसाई देवीच्या यात्रेला जाताना,महानंदीने छान शाकारलेल्या, त्यावर ताडपत्रीचे छत घातलेल्या बैलगाडीला चंगाळ्या(पितळी घुंगरांच्या गळ्यात घातलेल्या माळा) गळ्यात घालून जेव्हा लाल्या- झुब्या जुंपले जायचे, तेव्हा त्यांच्या दुडक्या चालीने चालताना बैलगाडीमध्ये बसणाऱ्या माणसांना आणि मुलांना जी मजा यायची ती दुसऱ्या कुठल्याही गाडीमध्ये येणार नाही. यात्रेत जाऊन आजोबांच्या मागे लागून लागून प्रत्येक रहाट पाळण्यात बसायचे. आजोबांनी मात्र ‘जावयाचं पोरं’ म्हणून काळजीने आणि ‘लेकीचे लेकरू’ म्हणून दुधावरच्या साईच्या प्रेमाने त्याचे सगळे लाड पुरवायचे.

चिंचेच्या दिवसात अंगणात पन्नास पोते चिंच येऊन पडायची. ती फोडण्यासाठी अंगणभर छत केलं जायचं आणि सगळी गल्लीतील मुलं, मुली, बायका येऊन चिंचा फोडायला बसायचे. नातवांसाठी तर हे औषधचं. आजीच्या मागे लागून हळूच चिंचेचे चोकणे करून घ्यायचे. आईला नकळत गुपचूप ते गट्टम देखील करायचे.

आंब्याच्या दिवसातली मजा तर काही औरचं. आढीतले पिकलेले आंबे टोपलं भरून आजोबांनी काढून आणायचे. नातवांना अंगातले बनियन सुद्धा काढून टोपल्या भोवती बसवायचे आणि मग बाळकृष्ण जसा लोणी खाताना सगळ्या अंगावर लोणी सांडायचा तसे हे दोन नातू आंबे खाताना सगळ्या अंगावर आंब्याचा रस सांडायचे. काय गोड चित्र असायचं ते.

आमच्या आजोळची दिवाळी अजूनही आठवते. दिवाळीत जवळजवळ पन्नास माणसं आजोबांच्या घरात असायची. घरामध्ये सगळ्या आज्ज्या, माम्या, मावश्या, आई सर्वजण मिळून कामं करायची. पाहुणे आलेत म्हटलं की कुठे ऑर्डर द्यायला जायची वेळ यायची नाही. सगळ्याजणी मिळून साग्रसंगीत स्वयंपाक बनवायच्या. गोड पदार्थ करताना तर आजोबा स्वतः होऊन हातभार लावायचे.पन्नास माणसांसाठी फ्रुटसलाड केलेलं मला आठवतं एक मोठा पाण्याचा बंब भरून सर्व फळे, ड्रायफ्रूट्स एकत्र करून, दूध घालून हलवत असलेले आजोबा अजूनही आठवतात. चुलत, मावस, सख्खे असा काहीही भेदभाव तेव्हा नसायचा. सर्वजण एकत्र येऊन अगदी गुण्यागोविंदाने रहायचे. कारण घराची सत्ता ही एका कर्त्या पुरुषाकडेच असायची त्यामुळे घरे एकसंध होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहणाऱ्यांना आजोळचा आनंद माहिती असणार.

माझ्या आईच्या आजोळच्या आठवणी ती मला सांगते. तिच्या सगळ्या मावश्यांची मुलं, मामांची मुलं, आणि माझ्या आईची भावंड सगळी उन्हाळ्यात एकत्र आजोळी जायची. ती सर्व मिळून पंधरा वीस जण व्हायची. एवढ्यांना मेजवानी खाऊ घालण्यासाठी माझ्या आईचं आजोळ काही श्रीमंत नव्हतं पण प्रेमळ होतं. तिची आजी रोज सकाळी सकाळी गरम गरम वरण, भाकरी सगळ्या नातवंडांना खाऊ घालायची आणि आई सांगते, “आजीच्या हातची गरम गरम वरण भाकरी त्यासोबत एक लिंबाच्या लोणच्याची फोड आणि त्यानंतर वाचायला मिळणारा गावकरी हा पेपर म्हणजे आमच्यासाठी (आईसाठी) स्वर्गसुख होतं.” आजच्या काळातल्या मुलांना रूचेल का हो ही सुखाची कल्पना?

आम्ही आजोळी गेलो की सर्वांना मदत करू लागायचो. पडतील ती कामे करायचो. आताच्या पिढीच्या सुखाच्या कल्पनाच बदलल्या आहेत. फोरव्हिलर मध्ये सुद्धा आताच्या सुखासीन झालेल्या मुलांना थोडीशी अडचण झाली तर सहन होत नाही. मग ती बैलगाडी मध्ये कशी काय बसणार त्यामुळे आपोआपच बैलगाडी संपुष्टात येऊन तिची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. काळाचा महिमा अजून काय…

मी लहान असताना आमच्या घरी तर उन्हाळ्यात असंख्य नातलग

यायचे. शेतात आमराई त्यामुळे घरात आंबेचं आंबे. माझ्या बाबांचे सख्खे, चुलत, सावत्र, आते, मामे, मावस, सगळी भावंडे यायची आणि भाच्चे,भाच्च्या देखील यायच्या. सर्वजण मिळून रहायची, खायची, धमाल करून जायची. सर्वांसाठी खुलं असलेलं माझ्या आई बाबांचं घर. माझ्या आत्याची मुलं तर माझ्या आई बाबांनी स्वतःच्या मुलांसारखी सांभाळली. प्रेम होते म्हणून आपुलकी होती. आपुलकी होती म्हणून आजोळ होतं आणि आहे.

आज जरी विभक्त कुटुंब पद्धती झाली असेल तरी देखील खूप ठिकाणी अजूनही आजोळचं प्रेम पाहायला मिळतं. माझ्याच घरी माझ्या सासूबाई वारल्या, सासरे आता थकले आहेत. पण सर्व नातवंडांसाठी,भाचऱ्यांसाठी आणि नातलगांसाठी माझं घर स्वागताला नेहमी आतुर असतं. सर्वजण येऊन राहतात भरभरून आनंद घेतात.

“आनंदाचा गोड ठेवा

आजोळच्या आठवणी

चला आजोळला जाऊ

भेटे सुखाची पर्वणी

*

आजी आजोबाची माया

भेटे तिथे गेल्यावर

आशीर्वाद खूप सारे

आणि प्रेम निरंतर”

 © सौ.रेणुका धनंजय मार्डीकर

औसा.

मोबा. नं.  ८८५५९१७९१८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ।माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

माझी मी। — ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्याकडे पोळ्या करणाऱ्या सुरेखा बाई चार दिवस आल्याच नाहीत. निरोप नाही काहीच नाही.मी अगदी वैतागून गेले.आता जर आल्या नाहीत तर मात्र घरी जाऊन बघून यायचे असं ठरवत होते मी. सकाळीच गेट वरची बेल वाजली. खिडकीतून बघितलं तर दोन मुली उभ्या होत्या.” बाई , सुरेखाबाई पडल्या,त्यांना

लागलंय. त्या येनार नाहीत कामाला !”  “ हो का?मग तू कोण आहेस? “ “ मी सून आहे त्यांची  कांता माझं नाव. “  .” वर या ग दोघी जरा!” .. मी त्यांना घरी बोलावलं. कांता अगदी साधी,जरा खेडवळच वाटली मला.

“ कांता,मग तू का नाही येत माझ्याकडे ग? कर की पोळ्या. त्या येत नाहीत तर तू ये ना! “ ती घाबरून म्हणाली, “ बया! मी नाही यायची ! “ “ अग पण का?मी तुला पगार देईन ना ! “ “ बाई, मिष्टर दारू  पितो माझा आणि संशोव घेतो वो.  मागं मागं येतो. मला लै भीति वाटती त्याची.” मी म्हटले “ असं नको करू

कांता. तुलाही नाही का  वाटत गं,आपल्याला चार पैसे मिळावेत? “ “  वाटतं ना बाई.  पण काय करू?चांगली दहावी पर्यंत शिकलेली आहे मी बाई. हाही बारावी झालाय पण दारूने सगळं बिघडत

गेलं. लग्नात नव्हता हो असा. पण वाईट मित्र भेटले आणि हा गेला वाहवत !  आता तर घरीच बसतो आणि काहीच काम करत नाही हो बाई . मी काम लावून दिलं तर चार दिवस पण नाही धड गेला.”  

कांताच्या डोळ्यात अश्रू होते. तिने थोडा विचार केला आणि म्हणाली,” बाई,मी लवकर सकाळी तो उठायच्या आत येऊन जाऊ का?  म्हणजे सातला ? चालेल का? करून बघते काय होतं ते.”  मी म्हटलं “ चालेल की अग. कशाला अवलंबून राहतेस ग त्या नवऱ्यावर? रहा की पायावर उभी. येतात ना पोळ्या भाकरी करता?” ती हसली.. म्हणाली “ तर वो. न यायला काय झालंय? येते उद्या.”  मला अगदी हायसं झालं.

दुसऱ्याच दिवशी सकाळी सातच्या आतच कांता आली. मी तिला सगळं दाखवलं. कांताने छान केल्या पोळ्या.पटापट आवरून ती गेली सुद्धा. एकही दिवस खाडा न करता  कांता येऊ लागली. आधी न बोलणारी कांता आता खुशाल गप्पा मारू लागली.कित्ती बडबडी होती ती. माझ्या नवऱ्याला म्हणायची  

 “ दादा,मधेमधे येऊ नका. मी देते आणून चहा तुमच्या खोलीत. बसा पेपर वाचत.” 

त्यांनाही प्रेम लागलं तिचं.  म्हणाले “ ससूनला नोकरी करतेस का कांता.?देतो लावून आया म्हणून.” 

तर म्हणाली “ या बया नको. लै घाणीचं काम ते . मला घाण वाटती.आणि रोज कोण जाणार ससूनला?मला लै भीती वाटती बया! मला नको रे बाबा.” आम्ही सगळे हसलो मग.

धाकट्या मुलीला म्हणायची”,ताई,पोळ्या शिका बरं का माझ्याकडून. बाईच्या जातीला सुटका नाही.तुम्ही किती पगार मिळवला तरी लग्न  झाल्यावर कुठे होतेय सुटका स्वयंपाकातून.  त्यातून तुम्ही  लै शिकलेल्या मुली. मिळाला नवरा अमेरिकेचा की सगळं करावं लागेल स्वतः . तिकडे बाया मिळत नाहीत ना म्हणे? ” कांताकडून माझी मुलगी पोळ्या भाजी सगळं शिकली. तिच्या कलाकलाने घेत कांताने तिला छान तयार केली  .माझ्याकडून मी हजार वेळा सांगून सुद्धा “ तू ओरडतेस मला ! नको जा शिकवू मला तू “ असं मला म्हणणारी माझी मुलगी निमूट शिकली सगळं कांताकडूनच !  अगदी तिच्या पद्धतीचं गावरान चिकन सुद्धा.  कांता माझी अत्यंत लाडकी झाली. मी तिला पगार वाढवला आणि सगळा आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवला .कांताला आणखीही कामं आमच्याच सोसायटीत लागली. 

एक दिवस म्हटलं ” काय ग कांता,आता नाही का  मिष्टर संशय घेत आणि मागं मागं येत?” 

ती म्हणाली “ हॅट! तो काय येतोय? असा झाडला त्याला एक दिवस बाई मी ! म्हटलं दारू पितोस

आणि वर रुबाब करतोयस होय रे? पैसा मिळवून आण आणि मगच बोल.”  गप बसला मग. हुशार आहे

हो ,पण या दारूने घात केलाय बघा.” 

आता कांता मस्तच रहायला लागली. आधीचं खेडवळ ध्यान आता पूर्ण बदललं. आम्ही दिलेल्या साड्या मस्त पिन अप करून ऐटीत येऊ लागली ती.  मला अतिशय कौतुक कांताचं.   तिचंही माझ्यावर खूप प्रेम. इतर  मालकिणी हेव्याने म्हणतात .. हो! त्या डॉक्टर बाईंकडे जायचं असेल आधी.आमच्याकडे उशीर करतेस कांता हल्ली!’ ती म्हणते ‘ हो मग.माझं पहिलं काम आहे ते. किती प्रेम करतात माझ्यावर

त्या. करणारच मी त्यांचं काम आधी .नसेल पटत तर बघा दुसरी बाई!’  बिचाऱ्या गप्प बसतात कारण हिच्यासारखी बाई मिळणार नाही हे पक्के माहीत आहे त्यांना.  

मध्यंतरी  कांताच्या नवऱ्याला खूप बरे नव्हते. हिने त्याला ऍडमिट केलं,त्या डॉक्टरला सगळी कथा

सांगितली. त्याने हिच्या नवऱ्याला चांगला दम भरला आणि म्हणाला दारू सोडली नाहीत तर दोन वर्षात मरालच तुम्ही.’ पुन्हा मी तुम्हाला ऍडमिट करणार नाही.हे शेवटचं!” 

काय आश्चर्य.त्या दिवसापासून त्याची दारू सुटली हे कांताचं भाग्यच म्हणायचं. त्याला शिपायाची नोकरी पण लागली एका शाळेत. खूप छान झालं मग कांताचं. हळूहळू त्यांनी होत्या त्या जागेत छानसं तीन

खोल्यांचं घर बांधलं.  हौसेने छान भांडी घेतली ,बसायला सोफा घेतला. एका मालकीणबाईकडून त्यांचा जुना पण छान अवस्थेतला फ्रीज घेतला. आम्हाला सगळ्याना  कांताचं अतिशय कौतुक आहे. माझ्या मुली परदेशातून आल्या की आठवणीने कांतासाठी मुद्दाम खूप छान उपयोगी वस्तू घेऊन येतातच. माझ्या बहिणींची पण  कांतावर माया आहे.त्या आल्या की कांता मस्त चहा करते ,त्यांच्याशी गप्पा मारते. बहिणीने तिच्या मुलाच्या लग्नात  कांताला आवर्जून बोलावलं होतं. तीही ऐटीत सुंदर साडी नेसून आली होती. 

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी लेकीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला  सहा महिने गेले होते. घर बंद होतं म्हणून काय अवस्था झाली असेल ही चिंता होतीच मनात. मी येण्याच्या आधी एक आठवडा कांताला फोन केला. ‘ मी अशी अशी या तारखेला येतेय.’  मुंबई एअरपोर्टला पोचल्यावर परत तिला फोन केला .मी पुण्याला सकाळी 6 ला पोचले. लॅच उघडून बघते तर काय… कांताने आमच्या कामवाल्या मावशीकडून सगळं घर सुंदर आवरून चकाचक करून घेतलं होतं.  बेडशीट्स बदललेली, बाथरूम्स स्वच्छ  केलेल्या,  फर्निचर झकास पुसलेलं ,फ्रीज मध्ये दूध,टोस्ट ब्रेड दही बिस्किटे आणून ठेवलेली. गॅसखाली चिट्ठी… ‘ मी बारा वाजता येतेय.’ माझ्या डोळ्यात पाणीच आलं बघा. 

बारा वाजता कांता मला पोळी मटकीची उसळ भात असा घरून डबा घेऊन आली. किती कौतुक वाटलं मला तिचं. गहिवरून आलं मला. कोण करतं हो इतकं ? पण ही मुलगी वेगळीच आहे. 

मध्ये माझ्या मैत्रिणींना मी घरीच पार्टी दिली. कांताला मदत करायला चारला बोलावलं. सगळ्या जणी आल्या, हिने सगळ्या डिशेस भरल्या, सगळ्यांशी हसून खेळून बोलली. मैत्रिणींना माझा चक्क हेवाच वाटला. एक म्हणाली ‘ अशी पाहिजे बाबा कांता आम्हालाही.’

कांता हसत म्हणाली, ”आमच्या बाई पण किती माया लावतात मला. आज पंधरा वर्षे झाली की मला इथं येऊन. मला हे घर माझंच वाटतं.”  तिने पटापट सगळं  मागचं आवरलं आणि घर ओटा स्वच्छ

करून गेली सुद्धा. मध्येच लाजत लाजत येऊन मला पायातले पैंजण दाखवले. म्हणाली, “देव

पावला बघा.एवढ्या वर्षात पहिल्यांदाच  केले नवऱ्याने पैंजण आणि हे सोन्याचे कानातले.”  मला वर

म्हणाली, “ बाई,तुमची कृपा.” 

“ अग मी काय केलं कांता? “ तर म्हणाली, “ बया ! नाही कसं?तुम्हीच की मला पायावर उभं केलं नाही का?बसले होते घरी भिऊन. आता बघा. नाही म्हटलं तरी आठ हजाराची काम आहेत मला.पुन्हा एक ला

घरी असते मी.आता स्वतः कमावतेय म्हणून नवरा पण आदर करतोय आणि सासूबाई पण दबून

असतात. हे सगळं माझं चांगलं तुम्हीच केलं नाही का? “ मला कांताने खाली वाकून नमस्कार केला. माझ्या आणि तिच्याही  डोळ्यात पाणी आलं. डोळे पुसून हसून म्हणाली, “ आता दिवाळीला स्कूटी घेतो तुला म्हणालाय आमचा नवरा ! बघते काय करतो.“ 

“ येते का पण तुला चालवता स्कूटी ग’? “ 

 “हो मग ! कवाच शिकली मी  .भुंगाट जाते की मैत्रिणीच्या स्कूटीवरून.. आता हा बाबा घेतोय तर घेऊ दे की. देव पावला म्हणायचा.” 

दोघीही हसलो आणि  कांता हसत हसत जिना उतरली.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

डोक्यात राख घालून घेतलेली मुलगी ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

ती विमनस्क अवस्थेतच स्मशानात पोहोचली. तिचा एकंदर अवतार पाहून ही आजही काहीतरी भलतंच  करणार असा कयास तिथं उपस्थित असलेल्या एकाने लावला आणि त्याने आपल्या मोबाईलचा कॅमेरा सुरू केला. ती जळून राखरांगोळी झालेल्या चितेजवळ जाऊन दोन्ही पायांवर बसली आणि तिने त्या राखेत हात घातला. यातील चिमुटभर राख ती कपाळावर लावेल असं वाटत असतानाच का कुणास ठाऊक तिने अत्यंत आवेगाने दोन्ही हातांच्या ओंजळीत ती राख घेतली…आधी तोंडाला फासली आणि मग आपल्या डोक्यात घातली….बघणारे सर्व स्तब्ध आणि नि:शब्द! काय बोलणार? 

“मी यानंतर कोणालाही असं बेवारस जळू देणार नाही!” असं काहीसं ती पुटपुटत राहिली बराचवेळ आणि तिथून निघून गेली झपाझप पावलं टाकीत. 

कालच दुपारी ती आली होती आपल्या सख़्ख्या भावाचं शव घेऊन इथं. सोबत मोजकीच माणसं. आणि त्यात कुणीही पुरूष नाही. तिच्या भावाला आदल्या संध्याकाळी काही लोकांनी गोळ्या घालून ठार मारलं होतं भररस्त्यात. तिने खूप आरडाओरडा केला पण कुणीही तिच्या मदतीला धाऊन आलं नाही. तिने स्वत: कशीबशी रुग्णवाहिका बोलावून घेऊन रक्तबंबाळ झालेल्या भावाला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. खरं तर तो जागीच गतप्राण झालेला होता. त्याचा देह उत्तरीय तपासणीसाठी शवागारात हलवला पोलिसांनी..ती ही तिथपर्यंत गेली पाय ओढत ओढत आणि तिथलं भयावह वास्तव पाहून ती मनातून पार हादरून गेली. अगणित शवं पांढ-या कापडांनी गुंडाळून ठेवलेली…नातेवाईकांची वाट पहात. 

   उत्तरीय तपासणी होण्यास काही वेळ तर लागणारच होता….भावाचं शव ताब्यात घेण्याची तिची हिंमत होईना…एकटीच होती ती त्याची नातेवाईक म्हणून. आईचं काहीच महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं होतं. वडील कामावर गेलेले होते. दिल्लीच्या मेट्रो रेल्वेत ते हंगामी चालक म्हणून कामावर होते. ती इस्पितळातून थेट घरी पोहोचली. आणि अगदी विमनस्क अवस्थेत बसून राहिली. वडील घरी आले…त्यांना ही बातमी समजली होती उडत उडत. पण नेमकं काय झालं हे त्यांना तिच्या तोंडूनच कसे बसे समजले आणि ते धाडकन खाली कोसळले आणि थेट कोमा मध्ये गेले…बेशुद्ध! 

खुनासारखं भयानक प्रकरण ऐकून जवळचा कुणीही नातेवाईक यांच्या घरी फिरकायला तयार नव्हता. आपण भावाला असं एकटं बेवारस टाकून तिथून निघून यायला नको होतं…तिला वाटलं. तो पर्यंत रात्र सरून गेली होती. ती तशीच इस्पितळात पोहोचली. काहूर माजलेल्या काळजानं तिने सोपस्कार उरकले आणि भावाला स्मशनात आणलं. पण अंत्यविधी पार कोण पाडणार. घरचा एकही पुरूष तिथं आलेला नव्हता. महिला तर करूच शकत नाहीत अंत्यविधी. मग तिने आपल्या डोक्यावर एक मोठं फडकं बांधलं…पगडी सारखं. आणि स्वत: पुढे होऊन जे काही करायचं असतं ते केलं भरल्या डोळ्यांनी. “दादा, तुला काल तिथं असं एकट्याला टाकून यायला नको होतं रे मी!” ती त्याचा देह विद्युतदाहिनीच्या मुखात दिसेनासा होईपर्यंत म्हणत होती. तिथं रडायला ती एकटीच होती. स्मशान भूमीत आणखी बरेच देह प्रतिक्षेत होते अंतिम निरोपाच्या. पण त्यापैकी अनेकांच्या देहासमवेत फक्त एखादा पोलिसच होता. अन्य कुणीही नाही. मग तिला समजलं….अशा हजारो बेवारस मृतदेहांची पोलिसांना विल्हेवाट लावावी लागते. २०१८ ते २०२२ या चार वर्षांतली आकडेवारी होती…अकरा हजार बेवारस देह. पैकी केवळ दीड हजारांच्या नातेवाईकांची तपास लागला आणि त्यांना शेवटचा निरोप मिळाला. बाकीचे असेच सरकारी यंत्रणांनी थंडपणे आणि यांत्रिकपणे इथपर्यंत पोहोचवले आणि इथल्यांनी एखादी चीजवस्तू जाळून टाकावी तसे ते देह अग्निच्या हवाली केले होते! 

ती सकाळी एका निश्चयानेच स्मशानभूमीत पोहोचली होती. तिने भावाची राख आपल्या डोक्यात घालून प्रण केला…मी करीन बेवारसांवर अंतिम संस्कार!

वर्ष २०१८…खरं तर तिचं लग्न ठरलं होतं. एका फौजीसोबत तिचं रीतसर लग्न लागणार होतं. ती उच्चशिक्षित समाजसेवा विषयात पदव्युत्तर पदवी. कायद्याचा अभ्यास सुरु होता. एका इस्पितळात एडसग्रस्तांसाठी समुपदेशक म्हणून सेवाही करीत होती. चारचौघींसाराखीच तिचीही स्वप्नं होती. आईने लग्नासाठी दागिने खरेदी करूनही ठेवले होते. पण ती आईच देवाघरी गेली आणि पुढच्याच वर्षी माणसा-माणसांतली करूणा रसातळाला नेणारा कोरोना उपटला. लग्न लांबणीवर पडलं. तिचा भाऊ एका रुग्णवाहिकेवर चालक म्हणून नोकरी करत असे. त्याचे कुणाशी काही वाद झाले आणि त्यात त्याचा खून पडला. 

हिच्या घरात आता आजारी वडील, त्यांची वृद्धा आई एवढीच माणसं शिल्लक राहिली होती. भावाच्या अंत्यसंस्कार प्रसंगी तिने त्याला दिलेला शब्द अक्षरश: खरा करून दाखवला आहे आजवर. गेल्या दोन वर्षात थोड्याथोडक्या नव्हे तर सुमारे चार हजारांना प्रेतांवर तिने विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. त्यात विविध जातीधर्मांच्या माणसांच्या प्रेतांचा समावेश आहे. दिल्ली सारख्या महानगरामध्ये आसपासच्या राज्यांतून हजारो लोक पोटाची खळगी भरण्यासाठी येत असतात घरंदारं सोडून. यातल्या अनेकांच्या नशिबी अशी एकाकी मरणं येतात. देहांवर ओळखपत्रं सापडत नाहीत. फौजदारी कायद्यामधील तरतुदींनुसार विशिष्ट काळ वाट पाहून या मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते. 

आपली कथानायिका पुजा शर्मा गेल्या दोन वर्षांपासून दरदिवशी सरासरी तीन-चार मृतदेहांवर स्वखर्चाने अंत्यसंस्कार करते. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हरिद्वार गंगा किनारी जाऊन या बेवारस लोकांची रक्षा विधिवत विसर्जित करते पापक्षालिनी गंगेच्या वाहत्या प्रवाहात…..हे पुण्यकर्मच नाही तर काय? 

नातेवाईक आता पुजा पासून अंतर ठेवून आहेत. तिच्या या कामामुळे तिचे लग्न होण्याची शक्यता कमी झाली आहे. तिच्या घरीही कुणी फारसं येत नाही. हो, पोलिस आणि सरकारी यंत्रणांना मात्र पुजा आता एक हक्काची माणूस झाली आहे. फाटलेल्या आभाळाला हे पुजा नावाचं थिगळ पुरणार नसलं तरी काही भाग झाकणारं तर निश्चितच आहे. पुजाचे वडील तिला त्यांच्या वेतनातून काही रक्कम देत असतात, तर आजी तिच्या निवृत्तीवेतनाचा काही भाग देते. आजीच्या मालकीचा असलेला जमिनीचा एक छोटा तुकडा तिने पुजाला दिला आहे…त्या जागी आता काही बेवारस वृद्धांना,बालकांना आधार मिळतो. पुजाने पुढे जाऊन Bright the Soul Foundation नावाने सामाजिक संस्था स्थापन केली आहे.

डोक्यात राख घालून काहीतरी विध्वंसक करण्याऐवजी पुजाने एक अत्यंत वेगळा मार्ग अनुसरला आहे…आणि म्हणूनच तिचं कौतुक वाटतं. पुजा शर्माच्या या कार्याला समाजाने पाठबळ दिलं तर बरंच होईल! 

सोळा संस्कारांपैकी हा सोळावा संस्कार न लाभणं यापरती दुर्दैवाची गोष्ट नसावी. सोबती काही जीवाचे मात्र यावे न्यावयाला..तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी…असं कविवर्य सुरेशजी भट म्हणून गेलेत…खरा तर हा सर्व जीवांचा हक्क आहे. हा हक्क मिळवून देण्यासाठी झगडणारी अनेक माणसं,संस्था आपल्या आसपास असतील…सांगलीतल्या अशाच एका मित्रमंडळाविषयी वाचल्याचं स्मरतं. या सर्व जिवंत मनाच्या माणसांना मानाचा मुजरा! 

एका गावात बैल विकणारा एक माणूस दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर दूर कुठल्याशा मुलखातून येत असे. त्याच्याकडच्या मोठ्या शिंगांच्या बैलांना स्थानिक भाषेत लोक हेडी बैलं म्हणून ओळखायचे…आणि म्हणून त्या विक्रेत्याला हेड्याबाबा असं नाव पडून गेलं होतं. मशगतीच्या कामाचा मौसम असल्यानं शेतकरी त्याच्याकडचे मोठाल्या शिंगांचे,ताकदवान बैल विकत घेतही असत. एकेवर्षी विकायला आणलेल्या बैलांना पाणी पाजायला म्हणून हा हेड्याबाबा नदीवर गेला आणि नदीतल्या त्याला अनोळखी डोहातल्या चिखलात रुतून बुडाला! दोन दिवसांनी त्याचं प्रेत पाण्यावरती आलं. त्याच्या देहाला हात कोण लावणार? ना ओळखीचा ना पाळखीचा…न जाणो कोणत्या जातीचा? जुना काळ तो. पोलिस पंचनामा असे फारसे सोपस्कार नव्हते त्या काळी. लोक नुसते काठावर उभे राहून दर्शक बनले होते. त्याच गावकुसाबाहेर राहणारा एक मोठ्या काळजाचा माणूस त्या चिखलात उतरला आणि त्याने ते प्रेत काठावर आणले. जनावरांची प्रेतं हाताळणं वेगळं…पण माणसाचा मृतदेह? सोपं काम नसतं हे! त्याने ते प्रेत दोन्ही हातांवर घेतलं आणि थेट त्याच्या मालकीच्या शेतावर नेलं. रीतसर सरण रचलं…आणि त्या अनोळखी,बेवारस देहाला अग्निच्या स्वाधीन केलं…सकाळी राख सावडली आणि ज्या नदीत त्याला मरण आलं होतं त्याच नदीत ती राख प्रवाहीत केली! लोक म्हणतात…हेड्याबाबा त्याच्या शेताची आजही राखण करतो…त्याने केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून! असो. 

पूजा शर्माची प्रेरणादायी कहाणी नुकतीच वाचनात आली. ती आपल्या माहितीसाठी लिहिली. पूजा शर्मा यांच्या सामाजिक संस्थेविषयी अधिक माहिती इंटरनेट वर मिळू शकते. ([email protected] या ईमेलवर संपर्क करता येईल.) विषय अप्रिय असला तरी अपरिहार्य आहे. 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

🔅 विविधा 🔅

देसी डोळे परी निर्मिसी… — लेखक – श्री श्रीनिवास बेलसरे ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार…

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात जुना सिनेमा मराठी होता ही गौरवास्पद बाब चित्रपटांबद्दलच्या चर्चेत अनेकदा दुर्लक्षित राहते. तो होता खुद्द दादासाहेब फाळके यांनी १९१३ साली दिग्दर्शित केलेला ‘राजा हरिश्चंद्र’. तो मूकपट होता तर पहिला मराठी बोलपट आला १९३२साली,  स्व. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेला ‘अयोद्ध्येचा राजा.’

परदेशात गाजलेल्या भारतीय चित्रपटांबद्दलच्या चर्चेतही  अनेकदा असेच होते. आपल्याला वाटते मराठी चित्रपट म्हणजे फक्त महाराष्ट्रात चालणारे सिनेमा. राजकपूरचा ‘मेरा नाम जोकर’ रशियात लोकप्रिय झाल्याने केवळ तोच परदेशात जास्त लोकप्रिय झालेला अभिनेता होता असा सर्वसाधारण समज असतो.  पण मराठी सिनेमांचाही गौरवशाली इतिहास आहेच. दुर्दैवाने त्याचा तितका गवगवा झालेला नाही.

आता ‘प्रपंच’ असे अत्यंत घरगुती नाव असलेला मराठी सिनेमा चक्क चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता हे कुणाला खरे वाटेल का? पण ते सत्य आहे. हल्लीसारखा तेंव्हा चीन स्वस्त पण तकलादू वस्तूंसाठी किंवा त्याच्या राक्षसी विस्तारवादासाठी प्रसिद्ध नव्हता! तेंव्हा चीन प्रसिद्ध होता तो प्रचंड लोकसंख्या आणि विचित्र मांसाहारी पदार्थांच्या सवयींसाठी!

तिथले सरकार कम्युनिस्टांचे, त्यामुळे एखादी समस्या समोर आली की तिचा इलाज लगेच करण्याचे धोरण. आपल्यासारखे ‘याला काय वाटेल?’ ‘तो काय म्हणेल?’ ‘बाबू गेनूसारखी न्यायव्यवस्थाच  समस्यानिवारणाच्या रस्त्यात आडवी पडेल का?’ हे प्रश्न त्या सरकारला कधीच पडत नसत. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी तातडीने पाउले उचलायची म्हणून आधी प्रबोधनाचे अभियान सुरु केले! आणि हेच कारण होते आपला ‘प्रपंच’(१९६१) चीनमध्ये  लोकप्रिय होण्यामागचे.

प्रपंचमध्ये दिग्दर्शकांनी त्याकाळी बहुतेक कुटुंबांत असलेल्या अपत्यांचा अतिरिक्त संख्येचा विषय हाताळला होता. चीनी सरकारला ही बाब आवडली. म्हणून त्यांनी लगेच संपूर्ण सिनेमा चीनी भाषेत डब करून घेतला! मग चीनी लोकांनी तो थियेटरबाहेर अक्षरश: मोठमोठ्या रांगा लावून पाहिला.

त्याचे असे झाले. गदिमांनी लिहिलेल्या कथेवर देव आनंदने ‘एक के बाद एक’ (१९६०) नावाचा सिनेमा काढला. अर्थात हिरो होते देव आनंद. त्याने सोबत शारदाला घेतले आणि दिग्दर्शनाचे काम राजऋषी यांच्याकडे सोपवले. सिनेमा साफ पडला. अनेकांच्या मते, देव आनंदने गदिमांच्या  कथेत खूप बदल केले होते.

मग गदिमांनी त्या कथानकावर एक कादंबरी लिहिली. ती गोविंद घाणेकरांना आवडली आणि त्यातून निघाला प्रपंच! दिग्दर्शक ठरले मधुकर पाठक आणि कलावंत होते सीमा देव, आशा भेंडे, सुलोचना लाटकर,  कुसुम देशपांडे, अमर शेख, श्रीकांत, शंकर घाणेकर, जयंत धर्माधिकारी.

कथा, पटकथा, संवाद सगळे गदीमांचेच होते. सिनेमा गाजला. त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक ‘स्वर्णकमल’ मिळाले. याशिवाय सर्वोत्तम फिचर फिल्मसाठीचे ‘गुणवत्ताधारक सिनेमाचे’ तिस-या क्रमांकाचे प्रमाणपत्रही मिळाले.

प्रपंचमध्ये गदिमांनी लिहिलेले एक भजनवजा गीत होते. आजही ते रसिकांच्या मनात अजरामर आहे. सुधीर फडकेंनी अतिशय भावूकपणे गायलेल्या या गाण्याला संगीतही त्यांचेच होते. विषय मात्र वेगळाच होता. जसे आपले काही संत महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठूरायाला काहीही बोलू शकतात, कधी तर शिव्याही देतात आणि तरीही त्यांचे त्यांच्या ईश्वराशी असलेले अत्यंत लडिवाळ नाते तसेच टिकून राहते तसे हे गाणे होते. यात गदिमा विठ्ठलाला फक्त कुंभार म्हणून थांबले नव्हते, त्यांनी त्याला ‘वेडा कुंभार’ म्हणून घोषित केले होते!

केवळ एखाद्या भारतीय धर्मातच शक्य असलेले भक्त आणि देवातले गंमतीशीर प्रेमळ नाते या गाण्यात फुलवले असल्याने आकाशवाणीवर सकाळच्या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात अख्ख्या महाराष्ट्राने हे गाणे असंख्य वेळा ऐकले आहे. गदिमांचे ते शब्द होते-     

“फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार.”

विश्वाचा ‘हा जगड्व्याळ पसारा त्या निर्मिकाने कशासाठी निर्माण केला असेल?’ असा प्रश्न प्रत्येक चिंतनशील मनाला कधी ना कधी पडलेलाच असतो. गदिमांनी तोच काव्यरूपाने खुलवून आपल्यापुढे ठेवला  आहे. ते करताना त्यांच्यातला भारतीय अध्यात्माची सखोल जाण असलेला विद्वान लपत नाही. मानवी शरीर हे पंच महाभूतातून निर्माण झाले आहे हे सत्य कविवर्य अगदी कुणालाही सहज समजेल इतके सोपे करून सांगतात. मग विठ्ठलाला म्हणतात तू ही मानवी मडकी निर्माण करून त्यांची रास रचून ठेवतोस, त्यांची संख्या तरी केवढी! अक्षरश: अमर्याद! –

माती पाणी, उजेड वारा, तूच मिसळसी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार.

त्यात पुन्हा भारतीय अध्यात्माने सांगितलेले सर्व प्राणीयोनीतले  मानवी जन्माचे महत्वही ते ‘आभाळच मग ये आकारा’ असे म्हणून सूचित करतात. तू एकाच साच्यातून आम्हाला घडवतोस तरीही प्रत्येकाचे नशीब वेगळेच असते. कुणा भाग्यवान माणसाच्या मुखात भगवान श्रीकृष्णासारखे लोणी पडते तर कुणा दुर्दैवी व्यक्तीच्या तोंडात निखारे पडतात. ही टोकाची विषमता, हा वरून तरी आम्हाला वाटणारा घोर अन्याय तू का सुरू ठेवतोस? बाबा, सगळे तुझे तुलाच माहित!

घटाघटांचे रुप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्याविणा ते कोणा न कळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणा मुखी अंगार.

जाता जाता गदिमा हेही सांगतात की अगणित कल्पांपासून देव ‘निर्मिती, वर्धन आणि विनाशाचे’ तेच काम करत आला आहे. ना त्याच्या निर्मितीला अंत, ना विनाशाला! जर सगळे नष्टच करायचे आहे तर मग ‘हे सगळे नसते उद्योग तू करतोसच कशाला’? असे एखाद्या धीट अभंगकर्त्याप्रमाणे ते विठ्ठलाला विचारतात- 

‘तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी. न कळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तयापुढे अंधार.’

निरीश्वरवादाचा आधारच विश्वाची वरवर वाटणारी अर्थहीनता आहे. बुद्धी असलेल्या सर्वांनाच पडू शकणारे प्रश्न गदिमांनी विचारले आहेत. पण ते कुणा भणंग संशयवाद्यांचे वितंडवाद घालण्याचे मुद्दे  नाहीत. ते एका भाविकाने आपल्या निर्माणकर्त्यासमोर निरागसपणे ठेवले प्रश्न आहेत. गाण्याचे शेवटचे वाक्य आपल्या डोळ्यासमोर निरागस अंध व्यक्तींचे अर्धवट संकोची स्मितहास्य असलेले, अश्राप चेहरे  आणते. मन गलबलते. देवाचा रागही येतो. पण तिथेच तर मेख आहे.

त्याने डोळे दिलेत आणि त्यापुढे अंधारही दिलेला आहे तो कशाला? खरे तर तेच प्रश्नाचे उत्तर आहे. निर्मात्याने आपल्या अपत्यापुढे मुद्दाम ठेवलेले ते रोचक आव्हान आहे. नुसते डोळे असून थोडाच कुणी डोळस ठरतो? मानवाने आयुष्याचा सदुपयोग करून अंतिम ज्ञानाची प्राप्ती करावी म्हणून तर समोर अज्ञानाचा अंधार ठेवला आहे. चर्मचक्षु असोत नसोत, आपणच पुरुषार्थ करून आपले ज्ञानचक्षु जागृत करणे,  सत्य जाणून घेणे यासाठीच तर सगळा उपद्व्याप असायला हवा. गदीमांनी उदाहरण जरी अंध व्यक्तीचे घेतले असले तरी हेतू माणसाचे अज्ञान स्पष्ट करणे हा आहे. त्यातूनच सत्य जाणून घेण्याचे मानवी जीवनाचे अंतिम ध्येय अधोरेखित करणे हा त्यांचा हेतू आहे. आणि तोच तर गाण्याचा संदेश आहे. 

लेखक : श्री श्रीनिवास बेलसरे

मो. 7208633003

संग्राहक : अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? मनमंजुषेतून ?

स.न.वि.वि. … लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

सुरुवातीला स.न.वि.वि. असे लिहिल्यामुळे मी काही सांगतोय किंवा कशाबद्दल तरी आमंत्रण देतोय, असे कदाचित वाटू शकेल.

पण अशी सुरुवात करुन लिहिण्याचा मोह आवरला गेला नाही. 

हल्ली लग्नपत्रिका, आमंत्रण पत्रिका यावरच असे लिहिलेले बघायला मिळते. एरवी असे शब्द लिहिले जात होते, हे सुध्दा विसरायला झाले आहे. उतारवयात स्मरणशक्ती कमी होते म्हणून काही गोष्टी विसरायला होतात. पण आता असे शब्द वाचण्यात आणि लिहिण्यात येत नसल्याने विसरायला झाले आहेत.

खरंच मोबाईलसारख्या सहज संभाषण करता येणाऱ्या वस्तू उपलब्ध झाल्यामुळे, नवनवीन शोधामुळे, काही गोष्टी सोप्या झाल्या असल्या, तरीही पत्रलेखन मात्र जवळपास बंदच झाल्यामुळे पत्रात लिहिले जाणारे काही शब्द लुप्त झाल्यासारखे वाटतात.

आज सहज अशा काही शब्दांची आठवण झाली…….

||• श्री •||• लिहून पत्राची सुरुवात.

*श्री.रा.रा. – श्रीमान राजमान्य राजश्री.

*स.न.वि.वि. – सप्रेम नमस्कार विनंती विशेष.

तीर्थरुप आई / बाबा.

*शि.सा.न. –  शिरसाष्टांग नमस्कार.

या सारखे शब्द वाचायलाच मिळेनासे झाले आहेत. 

कळविण्यास आनंद होतो की… असे लिहून पत्राची सुरुवात झाली, तर पुढे आनंदाची बातमी आहे, म्हणून पत्र अक्षरशः अधिरतेने वाचले जायचे. (दोन वेळेस)

पत्राच्या शेवटी लिहिले जाणारे…

– कळावे, लोभ असावा.

– आपला.

– तुझाच/ तुझीच (किती रोमँटिक!)

– आपला आज्ञाधारक

– मो.न.ल.अ.उ.आ‌. छो.गो. पा. : मोठ्यांना नमस्कार, लहानांना अनेक उत्तम आशिर्वाद छोट्यांना गोड पापा, असे लिहून तान्हुल्यांची सुध्दा आवर्जून आठवण ठेवली जायची. यात गोड पापा असे वाचतांना सुध्दा खरेच लहानांचा गोड पापा घेतला जातोय असा भास व्हायचा.

हे आणि या सारखे शब्द शाईच्या पेनासारखेच झाकण (टोपण) लावून जवळपास कायमचे बंद झाले आहेत असे वाटते.

त्यामुळेच असे आपलेपणा जपणारे शब्द पेनने कागदावर उतरण्याचे थांबलेच नाहीत, तर बंद झाले आहेत.

पत्र लिहून संपविताना एखादी गोष्ट आठवली तर ता.क (ताजा कलम) असे लिहून उरलेल्या जागेत ती मावेल अशा अक्षरात लिहीली जायची. त्यात सुध्दा गंमत वाटायची.

कदाचित शाईमुळेच त्या शब्दात आपलेपणाचा ओलावा येत असावा. नंतर बॅाल पॅाईंट पेनमुळे तो ओलावा कमी होत गेल्याचे जाणवले. 

आता तर मोबाईलवरच टाईप केल्याने ओलावा सुध्दा काही वेळा कृत्रिम वाटायला लागतो. खरेच या शाईने लिहिलेल्या अशा शब्दात एक आपलेपणाचा गोडवा होता.

पत्राची सुरुवात यापैकी कशानेही झाली, तरीही ते सुद्धा वाचलेच जायचे. आजच्या ई मेल, व्हॅाटसअप, फेसबुक च्या जमान्यात या शब्दांची मजा हरवली आहे.

पत्रांच्या ऐवजी आता ई-मेल येतात. यात सुध्दा, Dear, Sir/Madam, Respected Sir/Madam अशी सुरुवात आणि Regards, Yours असे लिहून शेवट होतो. यात आपलेपणा जाणवतच नाही. कार्यालयीन आणि कोरडे वाटतात हे शब्द. त्यात नात्यातला ओलावा नाहिच. Yours faithfully यापैकी फेथफुली वर तर मला फुलीच (X) माराविशी वाटते. 

यातही स.न.वि.वि. सारखेच नुसतेच GM, GN असे लिहिण्याची सवय आहे. पण सुप्रभात, शुभ रात्री, शुभ रजनीची मजा GM (गम) GN (गन) मध्ये नाही.

आजकाल फोनवरच बोलणे (त्यातही काही वेळा व्हिडिओ कॅाल) होत असल्याने साष्टांग नमस्कार, आशिर्वाद, गोड पापा अशा शब्दांच्या ऐवजी मग “काय? कसे काय? बाकी सगळे ठीक आहेत ना?” असे बाकी (चे) विचारुनच नात्यांची शिल्लक (बाकी) विचारली जाते, किंवा पाहिली जाते.

पत्र आले की आनंद व्हायचाच पण मोठे पत्र (अंतर्देशीय) आले की ते व्यवस्थित उघडून (खरेतर फोडून) रविवारच्या पुरवणीसारखे त्याचे वाचन व्हायचे. पण आता हे सगळे हरवले आहे असे वाटते. 

अधिक काय लिहू?

कळावे…

आपला नम्र

लेखक : अज्ञात 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print