☆ “भारतीय आधुनिक पंचदर्शने (Indian Renaissance)” ☆ श्री जगदीश काबरे ☆
हा १९व्या आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीचा एक महत्त्वाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिक जागरणाचा काळ होता. याला भारतीय पुनर्जागरण असेही म्हणतात. या काळात भारतात पाश्चात्त्य विचारसरणी आणि भारतीय परंपरांचा समन्वय घडून आला, ज्यामुळे समाज सुधारणा, शिक्षणाचा प्रसार, धार्मिक सुधारणा आणि राष्ट्रीय जागृतीला चालना मिळाली.
या भारतीय ‘पंचदर्शना’ ची प्रमुख वैशिष्ट्ये:
सामाजिक सुधारणा: यात बालविवाह, सतीप्रथा, विधवांच्या दुरवस्थेसारख्या सामाजिक कुरीतींविरुद्ध आवाज उठवला गेला. राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथेविरुद्ध लढा दिला आणि १८२९ मध्ये सतीप्रथा बंदी कायदा लागू झाला. ते आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात. ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवापुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले. तर आगरकरांनी विधवांच्या दुरावस्थेचे विदारक सत्य मांडले. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला.
धार्मिक सुधारणा: महात्मा फुले, आगरकर, महर्षी विठ्ठल शिंदे, स्वामी विवेकानंद, काही प्रमाणात सावरकर यांनी परंपरागत हिंदू धर्मातील अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना आव्हान देण्यात आले. राजा राममोहन रॉय यांनी ब्रह्मो समाज (१८२८) स्थापन करून एकेश्वरवाद आणि तर्कशुद्ध धार्मिक विचारांना प्रोत्साहन दिले. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज (१८७५) स्थापन करून वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि मूर्तिपूजा, जातीप्रथा यांना विरोध केला.
शिक्षणाचा प्रसार: याच काळात पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव वाढला, विशेषतः इंग्रजी शिक्षण देणारे राजा राममोहन रॉय यांनी कोलकात्यात हिंदू कॉलेज (१८१७) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तर महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी प्रयत्न केले.
राष्ट्रीय जागृती: टिळक, गांधी, नेहरू यासारख्या राजकीय धुरीणांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना आणि राष्ट्रीय अस्मिता जागृत केली. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या ‘आनंदमठ’ (१८८२) मधील “वंदे मातरम्” गीताने स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा पाश्चात्त्य जगात – विशेषत: १८९३ च्या शिकागो धर्मसभेत प्रचार केला.
साहित्य आणि पत्रकारिता: या काळात बंगाली, हिंदी, मराठी, तमिळ अशा प्रादेशिक भाषांमध्ये नवीन साहित्य निर्माण झाले. पत्रकारितेने सामाजिक आणि राजकीय जागृतीला चालना दिली. उदा. , राजा राममोहन रॉय यांचे “संवाद कौमुदी” आणि “मिरात-उल-अखबार” यांनी सुरुवातीच्या काळात केलेल्या जागृतीच्या कामगिरीचा विशेष उल्लेख करायला हवा.
या काळाने भारतीय समाजाला आधुनिकतेच्या दिशेने नेले आणि स्वातंत्र्यलढ्याचा पाया घातला. जातीप्रथा, अंधश्रद्धा यांना आव्हान देत सामाजिक समानतेचा विचार पुढे आला. शिक्षण आणि विज्ञानाच्या प्रगतीमुळे भारतीय समाजात नवीन विचारांचा उदय झाला. हे खरे असले तरी या ‘पंचदर्शना’ चा प्रभाव मुख्यतः शहरी आणि उच्चवर्गीय समाजापुरता मर्यादित राहिला. ग्रामीण भागात त्याचा प्रभाव कमी होता. काही सुधारणांना परंपरावादी समाजाकडून विरोधाला सामोरे जावे लागले. पण भारतीय ‘पंचदर्शना’ नी भारताला सामाजिक, धार्मिक आणि बौद्धिकदृष्ट्या नवीन दिशा दिली, हे मान्यच करावे लागेल. यामुळे भारतीय समाजात आधुनिकता, तर्कशुद्धता आणि राष्ट्रीय जागृतीचा उदय झाला, ज्यामुळे स्वातंत्र्यलढ्याला गती मिळाली.
नाशिक जिल्ह्यात बागलाण तालुक्यात मुल्हेर म्हणून छोटेसे गाव आहे. तेथे उद्धव महाराजांची समाधी आहे. उद्धव महाराजांच्या निर्वाणीच्या वेळेस सुमारे तीन साडेतीनशे वर्षांपूर्वी त्यांच्या शिष्यांनी तिथे बकुळीचे झाड लावले. अजूनही त्या झाडाला फुले येतात व त्यातून साखरे सारखा पदार्थ निघतो. जणू काही उद्धव महाराजांचा प्रसादच!
मी बागलाण तालुक्यातच राहत असल्यामुळे मुल्हेरला वारंवार जाणे येणे व्हायचे. तेव्हा तो समाधीपुढे उभा असलेला प्रचंड मोठा बकुळीचा वृक्ष माझ्या नेहमी पाहण्यात यायचा. बकुळीच्या फुलांचा मंद सुगंध त्याचे औषधी उपयोग आणि माझे झाडांवरचे प्रेम, त्यामुळे बकुळीचे झाड आपण लावायचे असे मी वारंवार ठरवत होते. कितीतरी वेळा मी त्याच्या बिया गोळा करून आणल्या. हम्पीला गेले होते तेथून देखील बकुळीच्या झाडाच्या बिया आणल्या होत्या. घरी रोप करण्याचा प्रयत्न केला. परंतु जमले नाही.
नर्सरीतूनही बकुळीचे रोप काही आणले गेले नाही आणि बकुळीचे झाड लावायचा माझा मानस मनातच राहून गेला.
मी नव वसाहतीत रहायला आल्यावर रस्त्याच्या कडेला झाडे नाहीत म्हणून एक बहाव्याचे झाड व एक गुलमोहाराचे झाड असे लावायचे ठरवले. त्याप्रमाणे रोपे आणून लावली देखील. रोपांची झाडे झाली. परंतु बहाव्याची म्हणून आणलेली रोपे बहाव्याची नव्हती. दुसऱ्या झाडाची निघाली. ती कोणती झाडे आहेत हे मला ओळखू आले नाही. त्यामुळे मन अगदी खट्टू झाले. परंतु आता झाडे वाढली आहेत तर राहू दे ना असं म्हणून ती तशीच वाढू दिली. गुलमोहाराची लावलेली झाडे व्यवस्थित वाढली होती. पण त्याचा पालापाचोळा खूप पडतो म्हणून कॉलनीतल्या लोकांनी ती काढून टाकली आणि वसंत ऋतूत लाल पिवळ्या रंगाची उधळण आकाशात व्हावी ही माझी इच्छा अर्धवटच राहून गेली.
दोन-तीन दिवसांपूर्वी अचानकच सकाळी सकाळी कॉलनीतून चालत बाहेर गेले. जाताना घाई होती, पण येताना रेंगाळत आले आणि थबकलेच…. माझ्याकडून बहावा म्हणून लावल्या गेलेल्या परंतु मला ओळखू न आलेल्या झाडाखाली बकुळीच्या फुलांचा सडा पडला होता.
बकुळीची फुलं पाहिली आणि मन अगदी पिसे पिसे झाले. अहो आश्चर्यम्, जे बकुळीचे झाड मला लावायचे होते ते मी लावले नव्हते. परंतु माझ्या मनातले झाड मात्र माझ्याही अपरोक्ष परमेश्वराने माझ्या हातूनच माझ्या घराजवळ लावून घेतले होते आणि त्या झाडाने मी कितीही त्याच्याकडे दुर्लक्ष केले तरी आज माझ्यापुढे त्याच्या फुलांचा नजराणा माझ्या ओंजळीत टाकला होता.
पटपट खाली वाकून बकुळीची फुले वेचली. घरी येऊन गजरा केला आणि केसात माळूनही घेतला. मला इतका आनंद झाला होता की ती बकुळीची फुले आणि गजरा मी वारंवार हातात घेऊन वास घेऊन त्याचा सुगंध तन मनात भरून घेत होते.
अजूनही बकुळीच्या फुलांचा हंगाम सुरू आहे. झाडाखाली बकुळीची फुले पडतातच आहेत. त्यामुळे लहान मुलासारखी मी त्या झाडाखाली जाते आणि मनाशी,
‘या बाई या
बकुळीच्या झाडाखाली फुले वेचूया ‘
असे म्हणत ती नाजूक सुंदर सुवासिक फुले वेचत राहते अन् मनाशीच म्हणत राहते,
‘गोड गोडूले,
मोतीयाचे दाणे कुणी खाली पाडले? ‘
*** इति ***
लेखिका : सौ. सरोज चंद्रात्रे
संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे
माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ धीरे से आजा रे अखियन में… – लेखिका : माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
संगीतकार सी. रामचंद्र
” धीरे से आजा रे अखियन में “….
अनेक वर्षांपूर्वीची पण विसरता न येणारी ही हकीकत आहे —
“बाळ रडतंय? ग्राईप वॉटर दे त्याला” अशी माझी परिस्थिती झाली होती. संध्याकाळी मी ऑफीस मधून घरी आले तेव्हा मस्त खेळत असलेला माझा तान्हा मुलगा अचानक खूप रडू लागला. आम्ही रहात असलेल्या बिल्डिंगमध्ये लहान बाळ म्हणून त्याचे लाड होत असत. कौतुक होत असे. संध्याकाळी त्याच्याशी खेळायला आजूबाजूची लहान मुलं येत असत. तसेच बिल्डींग मधल्या शेजार्यांची जा – ये त्याच्यासाठी आमच्या घरी असे. त्याचं रडणं थांबवण्यासाठी सगळ्यांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले, उपाय सुचवले. पण ते व्यर्थच. असा इतका, तो कधीच रडत नसे. मी मनातून धास्तावले होते.
या काळात, शिवाजी पार्कला आमच्या शेजारच्या गल्लीत राहणारे सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर यांच्याशी नुकताच परिचय झाला होता. आमच्या शेजार्यांचे ते मित्र होते. नेमके त्याच वेळी ते रात्री गप्पा मारायला म्हणून तिथे आले. आमच्या मजल्यावरच्या चारही ब्लॉक्समधील सगळी मंडळी आमच्या घरात, आणि “बाळ रडतंय” चा गोंधळ बघत ते थोडा वेळ शांतपणे आमच्या दाराच्या चौकाटीत उभे राहिले.
काही मिनिटांनंतर ते पुढे आले आणि मला म्हणाले,
“दे त्याला माझ्याकडे! ”
साशंक मनाने मी बाळाला त्यांच्या हातात दिलं. त्यांनी त्याला जवळ घेतलं आणि किंचित हसून मला म्हणाले, “अगं मुली, त्याचं काही दुखत नाही. त्याला कंटाळा आलाय. तुमची औषधं, तुमच्या नजरेतील भिती, तेच तेच चुटक्या वाजवणं हे सगळं त्याला नको आहे. शांत रहा आता जरा मी बघतो”.
ते सोफावर छान मांडी घालून बसले. बाळाशी हंसले, त्याला मांडीवर घेऊन थोपटू लागले. बाळाचं रडण कमी झालं. आम्ही सगळे चकित होऊन बघत होतो. तोंडावर बोट ठेवून त्यांनी आम्हा सगळ्यांना शांत रहाण्याची खूण केली.
-एखाद मिनीट गेलं असेल…. आणि आमच्या घराच्या भिंती जणू झंकारल्या. खुद्द सी. रामचंद्र उर्फ अण्णा चितळकर माझ्या मुलासाठी लोरी म्हणत होते”.
“धीरेसे आजा रे अंखियन मे, निंदिया आजा रे आजा.. “
आणि बाळ मजेत त्यांचं बोट मुठीत धरुन हसत होतं.
आम्ही सगळे स्तब्ध. एक इतकं मोठं नामवंत, प्रज्ञावंत, कीर्तिवंत असं संगीतातलं व्यक्तिमत्त्व, आमच्या घरात केवळ एक लहान बाळ रडतय् म्हणून ही लोरी, जी लता मंगेशकरांच्या आवाजात देशातल्या घराघरात पोचली आहे. ती म्हणतांना ऐकणं, बघणं हा एक शब्दातीत अनुभव होता. मुख्य म्हणजे ते स्वत: त्या लोरीत इतके रमले होते की गाणं पूर्ण होतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझा मुलगा त्यांच्या मांडीवर गाढ झोपला होता.
मला योगायोगाने भेटलेल्या प्रतिभावंतांच्या भेटी संबंधीच्या आठवणीतील ही एक मनावर कोरली, नव्हे, गोंदली गेलेली आठवण आहे.
नंतरही ते अधून मधून येत राहिले. गप्पांच्या ओघात कधी ते विविध चाली ऐकवत असत, कधी एखाद्या गाण्यामागची आठवण सांगत असत. ते गप्पात रमून जायचे आणि इतरांनाही मजा आणायचे.
एखादा गायक, कलाकार, लेखक, कवी यांना सर्वसामान्य माणसं त्यांच्यातील प्रतिभेमुळे ओळखत असतात, त्यांच्या कलेवर प्रेम करत असतात. हेच प्रतिभावंत जेव्हा एखाद्या क्षणी स्वत:चं समाजातलं मोठेपण विसरुन, नकळत, सहजगत्या आपला स्वभाव, माणूसपण दाखवतात तेव्हा ती एक स्मृती बनून मनात घर करुन रहाते.
सी. रामचंद्र या नावापुढे एक संगीत रसिक म्हणून तर पूर्वी माझे हात जुळायचेच पण वर दिलेल्या घटनेनंतर त्यांच्या नावाच्या उल्लेखाने एक “आई ” म्हणूनही माझे हात आपोआप जुळतात. कोणत्याही वाद्याशिवाय, कोणतीही साथ नसतांनाचा त्यांचा निखळ आवाज, ती तल्लीनता आणि चेहर्यावरचे लहान बाळा प्रतीचे वत्सल भाव आठवतांना मला आजही गहिवरुन येतं.
मंदिरातल्या घंटा नादासारखा त्यांचा आवाज या गाण्याच्या संदर्भात मला आश्वासक वाटला. कोणत्याही अस्वस्थ क्षणी तद्रूप होऊन त्यांनी गायलेले लोरीचे शब्द आठवत रहातात आणि डोळे झोपेच्या आधीन होतात.
“धीरे से आजा रे अँखियन में
निंदिया आजा रे आजा, धीरे से आजा
छोटे से नैनन की
बगियन में
निन्दिया आजा रे आजा,
धीरे से आजा
लेकर सुहाने सपनों की कलियाँ
आके बसा दे पलकों
की गलियाँ,
पलकों की छोटी सी
गलियन में
निन्दिया आजा रे आजा,
धीरे से आजा. “
लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
आपल्या आयुष्यात सजीव भेटतातच. तशाच काही निर्जीव गोष्टीही अवचित, अचानक भेटतात. पण निर्जीव तरी कशा म्हणू? कारण अशा वस्तू कधी सुखावतात, अल्लद मोरपीस फिरवतात. काही रडवतात. काही तर आपल्या आठवणींचा अगदी आतला, आतला कप्पा उघडून देतात. पुनःप्रत्ययाचा आनंद देतात.
अशा अचानक, अवचित गाठ पडलेल्या अलक कथा…
अण्णासाहेब सकाळचे फिरून आले. सूनबाई एप्रिलच्या कडकडीत उन्हात आमची परंपरागत सोन्याची जर असलेली पैठणी दांडीवर ऊन दाखवायला घालत होती.
अण्णासाहेब तिकडून जात असताना दांडीवरच्या पैठणीने त्यांच्या अंगाशी लडिवाळपणे घसट केली. “आलात फिरून, दमला असाल, ” पाठोपाठ बोलण्याचा भास.. गर्रकन अण्णासाहेब 65 वर्ष मागे गेले.. अंगापेक्षा बोंगा मोठा असूनही पैठणी सावरत असलेली कावेरी आठवली. क्षणभर त्या पैठणीला हळूवार कुरवाळत म्हणाले “आज अचानक गाठ पडे. “
सूनबाईच्या नजरेतून सासऱ्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी सुटले नाही. तिचेही डोळे पाणावले.
2. दिवाळीची साफसफाई चालू होती. माळ्यावरचे सामान खाली आले होते. नको असेल ते सामान काढून टाकायचे, असे ऑडिट चालू होते. एवढ्यात चांदीची मूठ असलेली सामानातली काठी उचलून चार वर्षांचा नातू घोडा घोडा खेळायला लागला. शांताक्का ती काठी पाहून खूप मागे जाऊन पोचल्या. नातवाचे खेळून झाल्यावर ती काठी हातात धरून शांताक्का कितीतरी वेळ नुसत्याच बसून होत्या. कुठूनसा आवाज येत होता, “वापर तू आता, फिरायला जाताना असू दे आधाराला. “
काठीचे निमित्त.. पण एवढ्या वर्षांनी “आज अचानक गाठ पडे” असे वाटून मन भूतकाळात फिरून आले.
आई खूप आजारी होती. शेवटचेच आजारपण. भेटायला गेले तेव्हा मला क्षीण आवाजात म्हणाली, “ताई, तुला काय देऊ ग? हातातल्या दोनच बांगडयांपैकी एक तू घेऊन जा,” असे म्हणून काढत होती.
“आई ग, बांगडी नको ग.. तुझी आठवण म्हणून तुझी एक मऊसूत नऊवारी साडी घेऊन जाते.. त्याची छानशी गोधडी शिवून रोज पांघरूण म्हणून वापरेन. तेवढीच तू कायम माझ्या अगदी जवळ असशील ना ग.”
आई गेली, पण होती माझ्या अगदी जवळच. गोधडी थोडी जीर्ण झाली तरी मी वापरत होते. एकदा लेकाने नवीन छान पांघरूण आणले आणि म्हणाला “आता हे वापर आई. ” त्याचे मन मला मोडवले नाही. पण अंथरुणाच्या तळाशी मी गोधडी ठेवून दिली होती. माझ्या आईची आठवण.
नातसुनेला मुलगा झाला. यांच्या माॅडर्न जमान्यात दुपटी शिवायला छान मऊसे काही सापडेनाच. मग मीच माझ्या आईच्या गोधडीची चार दुपटी शिवली..
आत्ता तो गुलाम तिच्यावरच पहुडला आहे.. जणू काही त्याची खापरपणजी त्याला अंगाई म्हणत जोजावत आहे..
मनोमन मी आणि आई बाळाजवळ बसलो होतो.. “आज अचानक गाठ पडे”.
4. मी सोळाच वर्षांची होते.
नुकतीच अकरावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हाची फॅशन म्हणून आम्ही सगळ्या मैत्रीणींनी मिळून उंच टाचाच्या चपला खरेदी केल्या होत्या.. टाॅक टाॅक करत रुबाबात चालायचे स्वप्नरंजन होते तेव्हाचे.. दोनच महिन्यांत माझे लग्न ठरले(तेव्हाचा काळ). आम्ही दोघे उंचीने जवळपास सारखेच होतो. झाले! टाॅक टाॅक चालायचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उंच टाचांच्या चपला बासनात गुंडाळून ठेवल्या. परवाच नातीला त्या सापडल्या..
म्हणाली, “आज्जी तू का नाही वापरल्यास ग? आता घालत जा.”
दोन्ही पायांची कनी Replacement झाली होती. आणि आत्ता त्या टाॅक टाॅक अवचित समोर आल्या. “आज अचानक गाठ पडे”.
5. मोबाईल ची लांब रिंग वाजली. बंगलोरहून मावसभाऊ बोलत होता. लग्न होते त्याच्या लेकाचे. त्यासाठी त्याला आमच्या आईच्या पिढीतील एका नातेवाईकांचा पत्ता हवा होता. खूप जुने असल्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा काँटॅक्ट मिळणे अशक्यच होते. म्हणूनच त्याने मला फोन केला होता.. माझ्याजवळ माझ्या आईची डायरी होती. आणि मोबाईलच्या जमान्यातही मी ती वेळोवेळी अपडेट करत होते.
त्याला हवा होता तो पत्ता मी दिला आणि सहज म्हणून डायरी चाळत होते.
तेव्हा त्या डायरीतून टुपकन दोन जुनी पोस्टकार्डं माझ्या मांडीवर पडली.. माझ्या नमू आणि कुसुम मावशांनी लिहिलेली पत्र होती ती.. काय नव्हते त्या पत्रांमधे? अगदी वरच्या टोकापासून ते थेट पत्त्याच्या लाईनपर्यंत गिचमीड करून मजकूर ठासून भरलेला होता.. ती नुसती गिचमीड नव्हती. तर त्यात ओतप्रोत माया, प्रेम, काळजी भरून वाहात होती.. ओसंडत होती.
आजच्या मोबाईलच्या जमान्यातील इमोजी, खोटे खोटे वरपांगी मेसेजेस, वाढदिवसानिमित्त आणि मेल्या-गेल्यां बद्दल खोटी सहानुभूती.. या पत्रांच्या पार्श्वभूमीवर सगळेच कसे उघडे बोडके पडले होते..
जुना पत्ता शोधता शोधता मला माझ्या जिवाभावाच्या, माझ्यावर निखळ, निस्वार्थी प्रेम आणि माया करणाऱ्या मावशा भेटल्या.. कित्ती तरी वेळ आम्ही बोलत होतो.. “आज अचानक गाठ पडे.. आज अचानक गाठ पडे.”
लेखिका : श्रीमती प्राची पेंडसे
प्रस्तुती : श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सगळ्याच पातळ्यांवर आपण तळ गाठणार आहोत का?…” ☆ सुश्री शीला पतकी☆
काळ बदलतोय.. काळ बदलतोय.. काळाची गती वाढली आहे… काळाबरोबर आपण चालल पाहिजे.. ही सगळी वाक्य मागची पिढी ऐकते आहे आणि वाटतंय ह्या काळाच्या वेगाबरोबर आपल्याला धावता येणार नाही पण प्रयत्न तर करायलाच पाहिजे आणि ते करताना या काळाची चाहूल घेतो की चाललय काय? .. तर सर्वच क्षेत्रांमध्ये खाली येणे सुरू आहे….!
कौटुंबिक क्षेत्रात तेच घडले आहे संवाद उरला नाही माणसं एकत्र राहत नाहीत म्हणजे एकत्र असलेली चार माणसही (भली मोठी कुटुंब एकत्र असलेली संपली आहे त्याचा उल्लेख मी करत नाही)एकमेकांशी बोलत नाहीत प्रत्येकाजवळ घराच्या कुलपाची चावी आहे ज्याच्या त्याच्या सवडीने घरामध्ये जो तो प्रवेश करतो घरातला रांधण कमी आणि बाहेरून मागवणं खूप झाले आहे आणि तेच मुलांना आवडते त्याचे धोके अनेकदा दिसतय पण आधुनिकतेची झापडं लावलेल्या आपल्याला ती दिसत नाहीत. अनेक मोठ्या नावावरती घरी येणारे अन्न हे वाईट टाकावू पदार्थापासून बनवणल्याचे लक्षात आले आहे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले प्रत्येक धोके माध्यमाने दाखवले आहेत. घरची वाळवणं, साठवणं, हे तर संपलेच आहे पण आरोग्य त्याचे काय? आरोग्य चांगले राहावे म्हणून वर्कआउट करणे व्यायाम करणे गाजर काकडी बीट खाणे, फ्रुट्स खाणे, कमीत कमी जेवण घेणे हे सर्व चालू आहे पण ही फॅशन आहे पुरेसा योग्य आहार नसल्यामुळे टिकाऊ पिढी तयार नाही हे अर्थात माझे मत आहे…!!!!
कपड्यांच्या बाबतीतही तेच आहे. फाटक्या कपड्यांना ऐश्वर्य आले आहे. कमी कपड्यांना सौंदर्य म्हटले जात….. आणी खूप खूप काही..!
मनोरंजनाच्या बाबतीत तेच आहे चित्रपटांना कथा नाहीत, उद्दिष्ट नाही, प्रबोधन नाही, गाण्यांना अर्थ नाही, संगीत कर्कश्य आहे, आवाजातली मधुरता असूनही वापरली जात नाही. काही मराठी नाटकं सोडली तर अनेक ठिकाणी चांगले विषय नाहीत चित्रपटांचे तेच आहे पण अगदी छोट्या प्रमाणावरती नवनवीन प्रयोग मात्र चांगले केले जातात उदा. अभिवाचन, एखाद्या कवीच्या कवितांचे गायन वाचन हे कार्यक्रम दर्जेदार आहेतच पण त्याबरोबर स्टँड अप कॉमेडी नावाखाली जे काही अचकट विचकट चालले आहे ते न बघवणारे न ऐकवणारे आहे. एका कार्यक्रमाचे नाव पहिले ‘हलकट ‘हेच जर कार्यक्रमाचे नावाचे तर किती अवघड आहे ना? कॉमेडी करणारा मुलगा सरळ म्हणाला…. अगदी स्टेजवरून पब्लिकमध्ये संवाद साधताना व ब्रेकप बद्दल बोलतोय आणि मुलीला म्हणतो पाळीच्या वेळेला येऊन सांग आणि अख्खे थेटर त्याच्यावर हसतय… फार वाईट वाटलं. तरुण हे सादर करत असतील आणि तरुणांनाही आवडत असेल तर मग आपण कुठे जाणार आहोत? विनोदाबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की विनोद अश्लील किंवा वाईट नसतो त्याचे नातेवाईक वाईट असतात म्हणजेच चिल्लर विनोद पण आता त्याच नातेवाईकान सुळसुळाट माजवला आहे! चांगल्या उत्तम मराठी वाहिनी वरचे शो हे अश्लीलते कडे जाणारे आहेत लोकांना बोलवून त्यांची खेचाखेची करणारे आहेत. हास्य जत्रा नावाच्या कार्यक्रमात परवा खूप वाईट विनोद झाला जरा बरा वाटणारा कार्यक्रम होता पण… उघडे बाबांना बघायला नागडे जाऊ… या वाक्याने कार्यक्रमाचा स्तर खाली येऊ लागला हे लक्षात आले.
शिक्षण शिक्षण क्षेत्रात असेच आहे मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. रिझर्वेशन मुळे येणाऱ्या प्रमुखाला कदाचित व्यवस्थापनाचे ज्ञान नसते आणि मग शाळा आणि त्याचे व्यवस्थापन ढासळायला सुरुवात होते शिक्षक चांगलेच असतात काम करून घेणार हुशार हवा चांगल्या अभ्यासू मुख्याध्यापकाच्या अभावी काही शाळा गळती लागल्यासारख्या झाल्या आहेत. ग्रामीण भागातून मात्र हे चित्र खूप चांगले आहे तिथे अनेक उत्तम प्रयोग करणारे शिक्षक आढळतात तेवढे समाधान वाटते.
बाकी सरकारी कामकाज राजकारण याबाबत काय आणि किती बोलावे? धाकटे शहाणे झाले आणि फुकट्याच राजकारण आले. अशी अवस्था आहे भ्रष्टाचारात तर न्यायालय सुद्धा मागे नाही मग न्याय कोणाकडे मागावा पक्ष बदलू लबाडांच्या टोळ्या तयार झाल्यात आणि त्या नवनविन नावाने सरकारं तयार करीत आहेत आणि पाच वर्ष काय तर एकमेकांना अश्लील शब्दात शिव्या देणे वाटेल ते बोलणे म्हणजे मला एकाने विचारले आपल्या वेळेला माझा आदर्श नेता हा निबंध होता आता कुणावर लिहावे? मी म्हणलं नाही आता असा निबंध येतच नाही ते काय वेडे आहेत का? असले निबंध द्यायला…. अशी मजा आहे मी मुख्यमंत्री झालो तर या निबंधाचे पहिल वाक्य असेल अनेकांची युती केलेली माझे सरकार मी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करेन आहे की नाही गंमत! … वर्तमानपत्र किंवा मीडिया, माध्यम आपली जबाबदारी विसरून कोणाच्यातरी खुंट्याला बांधले गेले आहेत मग त्याचीच भलावण करतात नागरिकांचे प्रश्न मांडणे हे त्यांच्या गावीही नाही नकारात्मक बातम्या… सकारात्मक घडते पण दिसत नाही कारण त्याला प्रसिद्धी नाही. ते म्हणतात ना खोट्याला हजार पाय आहेत आणि सत्य पांगळे करून टाकले आहे तशी गत झाली आहे…. देशभक्ती हा विषय शाळेत नाही आता उदाहरण तरी कोणाचे द्यावेत आम्ही शाळेत शिकत असताना देशभक्तीपर कविता असे थोरांची चरित्र असत. बाबू गेनू देशासाठी कसा मेला.. नंदुरबारचा शिरीष कुमारचा धडा अंगात स्फुरण देऊन गेला. “पुर्खोंसे चला आई यही हमारी परीपाठी है प्राण दिया है मगर नही दि कभी देश की माटी है! “या सारखी गाणी आता मुलांच्या ओठावर नाहीत हे दुर्दैव आहे हे सारे पाहून वाटते आपण तळ गाठायला चाललोत का? तुम्हाला काय वाटतय…?
☆ माझी जडणघडण… ओळख – भाग – ४५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
ओळख
सुप्रसिद्ध कवी, गझलकार सुरेश भटांची“केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली” ही गझल मला फार आवडते. सुरुवातीला मला ही एक प्रणयभावनेची गझल वाटायची पण आयुष्याच्या एकेका टप्प्यावर जेव्हा जेव्हा मी ही गझल वाचत गेले तस तसे त्यातले खोल दडलेले अर्थ जाणवू लागले. हे प्रणयगीत नसून आयुष्यातली स्थित्यंतरे, एक पार केलेला टप्पा, उलटून गेलेला एक काळ याविषयी फार सुंदर भाष्य कवी सुरेश भट यांनी या गझलेत केलेलं आहे याची जाणीव झाली.
“केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली”
समजलंच नाही बालपण कधी संपलं! अचानक मिटलेले डोळे उघडावेत आणि नवी पहाट उगवलेली असावी तशी बाल्य संपल्याची, नवी वाट सुरू झाल्याची चटकन जाणीव झाली. एका नवीन आयुष्याची सुरुवात होत होती.. अगदी तसेच झाले आणि लक्षात आले की माझ्या जडणघडणीचा एक महत्त्वाचा टप्पा आता पार झालेला आहे. तत्पूर्वी अनेक बदल जीवनात घडले. आमचं धोबी गल्लीतलं वास्तव्य संपलं. जुन्या मुंबई आग्रा रस्त्यावर आणि राम मारुती रोडच्या सुरुवातीलाच असलेल्या आधुनिक, ऐसपैस, सर्वांसाठी वेगळ्या बेडरूम्स असलेला मागे पुढे बागेचं स्वप्न पूर्ण करणारी मोकळी जागा, चोवीस तास पाणी (हे फार महत्वाचं) वगैरे अनेक सुविधांचा “केदार” नावाचा बंगला पपांनी बांधला. खरं म्हणजे हा बंगला माझ्या आजोबांनी माझ्या आईला प्रेमाची भेट म्हणून दिला. “मालुने (म्हणजेच माझ्या आईने) एका चांगल्या ऐसपैस, सुख सोयी असलेल्या घरात राहावे ही त्यांची आंतरिक तळमळ होती. कसं असतं ना! माझे पप्पा हे एक सेल्फमेड व्यक्तिमत्त्व होतं पण त्यांनी स्वाभिमानाचा दुराग्रह न बाळगता बापलेकी मधला एक प्रेमाचा धागा सांभाळला आणि मनापासून घर बांधणीच्या प्रक्रियेत भाग घेतला. वास्तविक बंगल्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांनी एकही पैसा आजोबांकडून घेतला नाही नंतर पूर्ण रकमेचा चेक आजोबांनी पप्पांना दिला आणि तो मात्र त्यांनी प्रेमादर भावनेने स्वीकारला.
अर्थात इतक्या सुंदर घरात आमचं वास्तव्य असणार आहे यापुढे, ही कल्पना आम्हा सर्वांसाठी आनंदाची नक्कीच होती पण धोबी गल्लीचा निरोप घेताना मात्र फार म्हणजे फार जड गेले. हृदयाचा एक कप्पाच बंद झाल्यासारखे वाटले. ज्या वास्तूने, ज्या गल्लीने आम्हाला जन्मापासून घडवलं त्या सर्वांचा निरोप घेणं हे मुळीच सोपं नव्हतं याची जाणीव वास्तूचा उंबरठा ओलांडल्यानंतर पिळवटून गेली. काही जुनं सामान आम्ही त्याच घरात सोडून दिलं होतं पण एक दिवस जीजी एकटीच त्या घरी गेली आणि एका हातगाडीवरून ते सारं सोडलेलं सामान घेऊन आली. खरंच तेव्हा कळलं! ” महत्त्वाचं सामान नसतं, महत्त्वाच्या असतात त्या आठवणी! ”
आजही जीजी, हातगाडी आणि ते जुने सामान माझ्या नजरेसमोर अनेक वेळा येतं.
एकच नव्हे तर पुढील आयुष्यात अनेक घरात मी राहिले. लग्नानंतरचे, सासरचे वाडा स्वरूप घर, त्यानंतर व्यवसायासाठी आम्ही दोघं जळगावला आलो तिथलं भाड्याचं वन बीएचके घर, नंतरचे आम्ही स्वतः बांधलेलं घर, मुलींची परदेशातील विदेशी धाटणीची प्रशस्त घरे आणि आता उतार वयातलं सह्याद्रीच्या कुशीतलं पुण्यातलं घर…… , इतकी सारी घरं असताना सुद्धा अगदी आज पर्यंत माझ्या स्वप्नात जर कुठलं घर येत असेल तर ते फक्त आणि फक्त धोबी गल्लीतलंच घर. तो जिना, तो उंबरठा, तो पायरीवरचा नळ, मागच्या गॅलरीत वाळत घातलेल्या ओल्या कपड्यांचा वास आणि कितीतरी…
लिहिता लिहिता थोडी भरकटले कारण आज डोक्यात एक निराळाच विषय घेऊन लिहायला बसले होते.
तर आयुष्याचा एक टप्पा पूर्णपणे ओलांडला होता शिक्षण ही संपलं होतं. पुढे काय करायचं याचा निर्णय व्हायचा होता. सुरुवातीपासूनच आमच्या घरात, “तुम्ही तुमचे निर्णय स्वतंत्रपणे घ्यावेत” हाच जीवनाचा कन्सेप्ट होता. त्याप्रमाणे अजून पुढचे शिक्षण किंवा विवाह यामधला एक पर्याय मी निवडला तो म्हणजे नोकरी करणे.
त्या वेळी टक्केवारीनुसार अधिकतर स्त्रिया गृहिणी होत्या. नोकरी करणार्या स्रियांची संख्या खूप जास्त नव्हती.
पण कसे कोण जाणे मला लहानपणापासूनच वाटायचे आपण नोकरी करायची. पैसे कमवायचे.
म्हणजे आर्थिक सक्षमता वगैरे विचार नव्हते त्यामागे पण आपण कमावलेले पैसे, ते मनासारखे खर्च करायचे,
त्याचा कुणी हिशोब वगैरे विचारण्याचा प्रश्नच नव्हता. या काही भावना मला सुखद वाटायच्या.
शाळेत असताना “खरी कमाई”अंतर्गत मी अक्षरश: कुणाचे अंगण झाडून दिले. कुणाचे तांदुळ निवडून दिले. कुणाच्या झाडांना पाणी घातलं आणि त्यांतून हातात पडणार्या काही नाण्यांची गंमत वाटायची. अर्थात ते पैसे शाळेकडे जमा व्हायचे अन् नंतर धर्मादाय. पण मेहनतीने पैसे कमावण्याचे समाधान वाटायचे.
मी वयाच्या अठराव्या वर्षापासून लहान मोठे समर जाॅब्स् केले. महाविद्यालये, बोर्डाच्या परिक्षांच्यावेळी पर्यवेक्षक
म्हणूनही काम केले. एका तासाला दहा रुपये मिळायचे. त्यावेळी दहा रुपयाला किंमत होती.
तुम्हाला गंमत सांगते, आम्ही लहान असताना मे महिन्याच्या सुट्टीत भाड्याची सायकल फिरवायला दोन आणे लागत. वडीलांशी करार असायचा, “अडीचकं” हा पाढा त्यांना बिनचूक, एका दमात म्हणून दाखवायचा मग ते मला दोन आणे द्यायचे. not a penny less not a penny more.!! खूप मोट्ठी कमाई वाटायची ती मला!!
पण ही सगळी किरकोळ कमाई. मजेची पण स्वत: पैसे मिळवण्याची मानसिकता इथूनच तयार झाली.
मी बी एस्सी झाले आणि घरात जाहीर केले “मी नोकरी करणार. “
बरीच उमेदवारी करावी लागली. अर्ज भरा, लेखी परीक्षा द्या, मुलाखतींना जा. पूर्व अनुभव नाही म्हणून नकारही पचवले. सुरवातीला मी रसायनशास्त्रातील पदवीधर म्हणून केमीकल इंडस्ट्रीत केमीस्ट म्हणून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला. “हेक्स्ट” या विदेशी, औषधांच्या कंपनीत माझी उत्कृष्ट मुलाखतही झाली होती पण एक स्त्री म्हणून मला तो जॉब नाकारण्यात आला आणि माझ्याबरोबर शेवटपर्यंत असलेल्या एका मुलाला नेमणूक पत्र मिळाले. माझा प्रचंड पराभव होता तो! त्याहीपेक्षा मानसिक त्रास टोकाचा झाला. अजूनही वाटतं तेव्हा मला “सुधा मूर्ती”सारखे का होता आले नाही? माझ्यातली मुळातली बंडखोरी अशी लुळीपांगळी का झाली?
आतासारखे रेझ्युमे, सीव्ही, प्रोफाईल वगैरे लिहिण्यासाठी मार्गदर्शन करणार्या संस्था नव्हत्या. माझे आजोबा
बँक आॅफ इंडीयात खूप वरच्या पदावर होते. (Chief Accountant) जरी तेव्हां ते निवृत्त असले तरी त्यांचा दबदबा होता. मी त्यांना सांगितलं, “मला तुमच्या बँकेत नोकरी मिळवून द्या!! “
त्यांनी नुसता नकारच दिला नाही तर ते म्हणाले, ” तू वाणीज्य शाखेची पदवीधर नसल्यामुळे तुला हा जाॅब मिळूच शकणार नाही. ”
पण बँकेच्या नोकरभरती च्या जाहिरातीत अशी कुठलीही अट नव्हती. ” “कुठल्याही शाखेत पदवीधर “एव्हढेच होते पण वशीलेबाजी हा प्रकार तेव्हा नव्हता इतका. त्यातून आजोबांची कठोर आणि कणखर तत्वे पण मीही त्यांचीच नात. त्यांना म्हटले, “तुमच्याच बँकेत मी नोकरी मिळवूनच दाखवेन तुम्हाला. “
अतिशय मेहनत, खटपट, प्रतीक्षा
पण अखेर नोकरी मिळाली. स्वीकारलेल्या आव्हानात यशस्वी झाले!!!
हो! पण त्यातही एक अनपेक्षित अडचण उभी राहिली होती. अंतीम नेमणूकीपूर्वी वैद्यकीय तपासणी होती. आणि त्यात मी चक्क नापास झाले. कुणाला खरंतरी का वाटाव? मी इतकी सुदृढ निरोगी असताना?
पण मला असा शेरा मिळाला. Less vision at left eye so medically unfit. Doctors certificate required.
आभाळ कोसळणं म्हणजे नक्की काय हे अनुभवले पण यावेळी मात्र आजोबा मदतीस धावले. त्यावेळी नेत्रचिकित्सक म्हणून अत्यंत प्रसिद्ध असलेले डॉ. चिटणीस आजोबांचे मित्र होते. त्यांनी नेत्रतपासणी केल्यानंतर सांगितले, ”काहीच मोठा प्राँब्लेम नाही. ही एक टेन्डन्सी आहे. ही मुलगी एकाच डोळ्याने पहाते, वाचते म्हणून हिचा दुसरा डोळा झोपून गेला. “अशी गंमतीदार कोटी करून मला सहजपणे त्यांनी फिटनेस सर्टीफिकेट दिले आणि हातातोंंडाशी आलेला निसटता घास पुन्हा मुखी गेला. गंगेत घोडं नहालं आणि मला नोकरी मिळाली. मात्र एक आणखी पदवीही मिळाली “एकाक्षी”
(हल्ली लहानपणापासून मुलांची नेत्रतपासणी, दंत तपासणी होते.. ही जागरुकता किती प्रशंसनीय आहे)
असो.
पण काय सांगू तुम्हाला जेव्हा माझा पहिला पगार झाला तेव्हाचा आनंद!!
मी आणि माझे वडील व्ही. टी. ते फ्लोरा फाउंटन बसने एकत्र जायचो. दहा पैसे तिकीट होतं. त्यादिवशी वडील म्हणाले, “आज तुझं तिकीट तूच काढायचंस..!”
मी म्हणाले “आज तुमचंही तिकीट मीच काढेन.”
पुढची चाळीस वर्षे मी आर्थिक स्वातंत्र्य उपभोगले….
पैशाची गरज म्हणून मी नोकरी नाही केली.
माझ्या अस्तित्वाची ती गरज होती…..!!
हाती पडलेल्या पहिल्या पगाराने मला माझी भक्कम ओळख मिळाली आणि या ओळखीने मला नेहमीच आत्मविश्वास दिला. जगताना जी निर्भयता लागते ती मला मिळाली हे मात्र निर्विवाद!!
९ जून हा भगवान बिरसा मुण्डा यांचा बलिदान दिवस. माणूस जन्माला येतो त्याच वेळी त्याच्या मृत्युची तारीख ठरलेली असते असं म्हणतात. जन्म आणि मृत्यु या दोन्ही गोष्टी माणसाच्या हातात नाहीत. त्यावर माणसांची सत्ता नाही. पण जन्म आणि मृत्यु या मधल्या काळावर मात्र माणसाची सत्ता असते. तो काळ तुम्ही कसा व्यतीत करता यावर तुमच्या जन्माचे सार्थक अवलंबून असते.
इंग्रज सत्तेविरुद्ध लढताना ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या हुतात्म्यांचे जीवन सार्थकी लागले. जनजातीतील अशा हुतात्म्यांमध्ये बिरसा मुण्डा यांचे नाव अग्रणी आहे. आपला धर्म, आदिवासी परंपरा टिकवण्यासाठी केलेले प्रयत्न, लोकांनी ख्रिश्र्चन पाद्र्यांच्या जाळ्यात अडकून आपला धर्म बदलू नये म्हणून केलेले प्रयत्न आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरूध्द दिलेला लढा या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.
बिरसांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ह्या दिवशी, वडिल सुगाना मुण्डा आणि आई कर्मी यांच्या पोटी झारखंड मधील उलिहातू गावी झाला. हे मुण्डा कुटुंब अत्यंत गरीब होते. गावोगावी जाऊन मोलमजूरी करून पोट भरत असे.
परिस्थिती वशात मुण्डा कुटुंबाने ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला आणि बिरसाला ख्रिश्र्चन मिशनर्यांच्या शाळेत घातले. तिथे जेवणात दिले जाणारे गायीचे मांस आणि त्याला शेंडी कापण्यासाठी केलेली सक्ती, याविध्द बिरसांनी बंड पुकारले. त्यामुळे त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले.
इथूनच बिरसांच्या इंग्रजांविरूध्दच्या संघर्षाला सुरूवात झाली. ते दोन पातळ्यांवर इंग्रजांशी संघर्ष करीत होते. एक म्हणजे आपल्या हिंदू धर्मावर ख्रिश्र्चन धर्माचे आक्रमण होऊ नये म्हणून आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी.
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे भेटलेली माणसे. बिरसांची आनंद पांडे यांच्याशी भेट झाली आणि त्यांच्याकडून ते खूप गोष्टी शिकले.
हिंदू धर्माचे रक्षण. . . आनंद पांडे यांच्याकडे त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले. आपल्या रामायण, महाभारत, गीता इ. धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. ख्रिश्र्चन पाद्री, जनजाती समाजाला निरनिराळी प्रलोभने दाखवून ख्रिश्र्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडत होते. पण बिरसाने लोकांना पटवून दिले की. . .
धर्मादपेतं यत्कर्म यद्यपि स्यान्महाफलम।न तत्सेवेत मेधावी न हि तध्दितमुच्यते।।
धर्मास सोडून असलेले कर्म जरी महाफलदायी असलेतरी बुध्दिमानाने ते करू नये कारण ते हितकारक आहे असे कोठेही सांगितलेले नाही. असा उपदेश करून अनेक लोकांना त्यांनी ख्रिश्र्चन होण्यापासून परावृत्त केले.
त्यांनी बिरसाईयत पंथाची स्थापना करून काही मार्गदर्शक तत्वे सांगितली. भगवान बिरसा मुण्डा हे आदिवासींची धार्मिक व्यवस्था, संस्कृती, परंपरा, अस्तित्व वअस्मितेचे प्रतिक आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोक त्यांना भगवान म्हणू लागले.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांशी संघर्ष. . . . बिरसांचा लोकांवरील वाढता प्रभाव बघून ख्रिश्र्चन पाद्र्यांनी इंग्रज अधिकार्याकडे तक्रार केली की, बिरसा हा हिंदू सन्यासी, आदिवासींचा राजा होऊ पाहातो आहे तो ब्रिटिशांविरूध्द जनतेला भडकावतो आहे. या तक्रारीवरून बिरसांना तात्काळ अटक करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने दिले. पण ग्रामस्थांनी सक्त विरोध करून बिरसांना पकडायला आलेल्या सशस्र पोलिसांशी तीव्र लढा दिला व त्यांना परत पाठवले. पण शेवटी छल कपटाने २५ आॅगस्ट १८९५ रोजी पोलिसांनी
अटक करून बिरसांना हजारीबाग तुरूंगात ठेवले.
३० नोव्हेंबर१८९७ रोजी बिरसा तुरूंगातून मुक्त झाले. त्यावेळी त्यांना भेटायला आलेल्या हजारो लोकांची त्यांनी शिस्तबध्द संघटना बांधली आणि त्यांना इंग्रजांविरूध्द उठाव करण्यास प्रेरित केले. त्याला उलगुलान (क्रांती) नाव देण्यात आले. २४ डिसेंबर १८९९ यादिवशी उठाव करण्याचे निश्र्चित केले. ठरल्याप्रमाणे त्या दिवशी पोलिस चौक्या, शासकीय कार्यालये, गोदामे यांच्यावर हल्ले करण्यात आले. इंग्रज शासक, ख्रिश्र्चन पाद्री, आणि आमचे शोषण करणारे आमचेच लोक (उदा. जमीनदार, सावकार इ. )यांना त्यांनी प्रमुख शत्रू म्हणून घोषित केले.
९ जानेवारी १९०० रोजी बिरसांनी जोजोहातूच्या जवळील डोमबारी टेकड्यांवर एक सभा आयोजित केली या सभेत हजारोंच्या संख्येने लोक सामिल झाले होते. तेथील आयुक्त स्ट्रीटफिल्ड यांना ही बातमी समजताच त्यांनी संपूर्ण डोंगराला आपल्या सैन्याचा वेढा दिला. आणि लोकांवर बेछूट गोळीबार केला.
इंग्रजांच्या बंदुकांपुढे बिरसांच्या सेनेच्या, धन्युष्यबाण, भाले यांचा निभाव लागला नाही. हजारो बायका, मुले, पुरूष मृत्युमुखी पडले.
बिरसा तिथून कसेतरी निसटलेआणि जंगलात लपून राहिले व तिथून त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. ब्रिटिशांनी त्यांना पकडून देणार्यास ५००/-रू. चं बक्षीस जाहिर केलं. पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. पण बिरसा हाती लागले नाहीत.
“कुर्हाडीचा दांडा गोतास काळ “अशी आपल्याकडे म्हण आहे. शेवटी फंदफितुरी झाली आणि ३ फेब्रु. १९०० रोजी पोलिसांनी बिरसांना अटक केली. त्यांना रांचीच्या तुरूंगात डांबण्यात आलं. तिथं त्यांचा अनन्वीत छळ करण्यात आला. शेवटी ९ जून १९०० या दिवशी रक्ताची उलटी होऊन त्यांची प्राण ज्योत मालवली, त्यांना विष देऊन मारण्यात आले असाही संशय व्यक्त करण्यात येतो.
त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. . . . बिरसांच्या मृत्युनंतर त्यांच्या कार्याचा परिणाम म्हणून छोटा नागपूर क्षेत्रात सरकारने जमीन सुधारणा विषयक कायदे लागू केले. त्यांच्या उपदेशामुळे मुण्डांच्या समाज जीवनात अमुलाग्र बदल झाला. अनेक क्षेत्रात मुण्डा आजही चमकदार कामगिरी करताना दिसतात. बिरसांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावले आहे. जनजातीतील ते एकटेच क्रांतीकारक आहेत ज्यांना हा सन्मान प्राप्त झाला आहे. भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ रांची विमानतळाला त्यांचे नाव दिले आहे. १५ नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस ‘ जनजाती गौरव दिन ‘ म्हणून साजरा करण्यात येत आहे.
बिरसांनी भारतीय संस्कृती, परंपरा, स्वधर्माचे रक्षण करत स्वातंत्र्य लढ्यात कर्तव्याच्या रणभूमीवर मृत्युला आलिंगन दिले.
९ जून या त्यांच्या बलिदान दिनी आमचे त्यांना शतशः प्रणाम.
☆ “’सचखंड एक्स्प्रेस‘ मधील अनोखा आणि अविश्वसनीय उपक्रम!” – (अनुवादित लेख) अनुवाद : सुश्री प्रकाश चांदे ☆ प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर ☆
रेल्वेच्या भारतात दररोज सुमारे तेरा हजार गाड्या धावतात. या गाड्यांतून 2 कोटींपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. पण या तेरा हजार गाड्यांत फक्त एकच गाडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिचं वैशिष्ट्य वेग, आरामदायी सुखसोयी अथवा आधुनिक तंत्रज्ञान नाही; तर त्या गाडीत मिळणारी दयाळू, माणुसकीची वागणूक!
या गाडीचं नाव ‘ सचखंड एक्स्प्रेस ‘!
अख्ख्या भारतात सलग 35 तास आणि 2, 000 कि. मी. प्रवास करणारी आणि महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांना जोडणारी ही एकच अशी गाडी आहे की जिच्यातील प्रवाशांना दररोज सकाळची न्याहरी, दुपारचं भोजन आणि सायंकाळचं भोजन मोफत मिळतं.
‘सचखंड एक्प्रेस‘ (नं. 12715) ही गाडी महाराष्ट्रातील नांदेड आणि पंजाब राज्यांतील अमृतसर या शिखांच्या दोन पवित्र शहरांदरम्यान धावते.
या गाडीनं प्रवास करणाऱ्यांना ताजं घरगुती भोजन, एकही रुपया न आकारता, मोफत दिलं जातं. कढी भात, भाजी, आणि ताज्या पोळ्या या हसतमुखानं दिल्या जातात.
हे अन्न गाडीतील भटारखान्यात शिजवलं जात नाही; तर वाटेतील ज्या ज्या गावी गुरुद्वारा असतील त्या त्या गावांत शिजवलं जातं आणि त्या त्या गावातील स्वयंसेवक ते गाडीवर आणून प्रवाशांना देतात.
शिखांच्या ‘ लंगर ‘ मध्ये दररोज कुणाही गरीब, श्रीमंत, स्थानिक, अनोळखी किंवा बाहेरगावच्या व्यक्तीला त्या वेळचं अन्न मानानं दिलं जातं; त्या प्रथेला अनुसरूनच या गाडीत हे अन्न दररोज सर्व प्रवाशांना दिलं जातं.
हा अनोखा, अद्भुत आणि माणुसकी जागवणारा उपक्रम 1995 पासून सुरु झाला; आणि गेली 30 वर्षे तो अव्याहतपणे चालू आहे! ही सेवा एकाच गावी पुरवली जात नाही. वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या गावी ही सेवा पुरवली जाते.
या गावांची अधिकृत यादी अशी नाही; पण वाटेत लागणाऱ्या छ. संभाजी महाराज नगर, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, दिल्ली आणि लुधियाना अशा शहरांत ही सेवा पुरवली जाते. ही सेवा रेल्वेच्या उपाहारगृहांतर्फे चालवली जात नसल्यामुळे हे अन्न घेणाऱ्यांना स्वत:ची थाळी, प्लेट, खाण्याचा डबा स्वतः बरोबर असणं आवश्यक आहे.
ही सेवा करणारे स्वयंसेवक एक तर फलाटांवर चालत असतात अथवा डब्यांत शिरून, ज्यांना हवं आहे त्यांना, हे ताजं अन्न देत असतात.
आजकालच्या देणा — घेण्याच्या व्यवहारी जगात, हजारो किलो मीटरवर माणुसकी जागवणारी ही सेवा एक वेगळंच दर्शन घडवते. शिखांनी त्यांची माणुसकीची परंपरा जागवणारी ही सेवा चालू केली आणि आज ती या गाडीचं अभिमानास्पद भूषण आणि ओळख बनली आहे!
या पुढे कुठल्याही व्यक्ती भारतीय रेल्वेविषयी बोलत असतील तर त्यांना प्रवासापेक्षा जास्त माणुसकीचं अनोखं, अद्भुत दर्शन घडवणाऱ्या सेवेबद्दल आवर्जून सांगायला विसरू नका.
औदार्य, विश्वास आणि माणुसकीचं दर्शन घडवणारी ही सेवा हा चमत्कार आहे.
अनुवाद : श्री प्रकाश चान्दे
प्रस्तुती : सुश्री सुलभा तेरणीकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘अंतिम सत्य : म्हाताऱ्यांसाठी…’ – लेखक :डॉ. शिरीष राजे ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
१) पुरुष म्हातारा होतो, स्त्रिया वयस्कर होतात.
२) पुरुषाने त्याच्या मुलामुलींची लग्ने पार पाडल्यानंतर, कुटुंबातील इतर सदस्यांच्या आर्थिक स्थैर्याची काळजी घेतल्यानंतर, त्याचे कुटुंबातील जेष्ठ आणि श्रेष्ठ स्थान संपुष्टात येते.
३) नंतर त्याला कुटुंबावर एक ओझे म्हणूनच वागवले जाते. एक विक्षिप्त, कटकट्या, अप्रत्याशित म्हातारा म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते.
४) त्याने पूर्वी मुलांच्या व पत्नीच्या संदर्भाने घेतलेल्या कठोर निर्णयाची चिरफाड या काळात करीत त्याला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी दोषीच ठरवले जाते. त्याने जर खरोखर चुका केल्या असतील तर देवच त्याचे रक्षण करो.
५) वयस्कर स्त्रीकडे मात्र मुलांकडून व सुनांकडून सहानुभूतीने पाहीले जाते, कारण तिच्याकडून करुन घेण्यासारख्या गोष्टी अजूनही असतात.
६) वयस्कर स्त्री योग्य वेळी म्हाताऱ्याची पार्टी सोडून मुलांच्या व सुनांच्या पार्टीत निघून जाते.
७) म्हातारा वयाने जास्त असल्यास, त्याच्यानंतर मुलगा आपल्यापासून दूर जाऊ नये, आपली काळजी घ्यावी म्हणून वयस्कर स्त्री सुनेशी जमवून घेते.
८) पुर्वायुष्यामधे कितीही कर्तृत्व गाजवलेले असो, त्याची पुण्याई म्हातार्याच्या कामी येत नाही.
९) वयस्कर स्त्री मात्र पुर्वपुण्याईचे व्याज खाऊ शकते.
१०) ज्यांची वंशपरंपरा असलेली भरपूर शेती आहे (की ज्याचा मुलाबाळांना मोह पडू शकतो) त्यांची अवस्था थोडी बरी असते. ज्यांनी आपल्या पश्चात मुलांच्यात भांडणे नकोत म्हणून खातेफोड केलेली असेल तर त्यांच्याही नशिबी वर सांगितल्याप्रमाणेच हाल असतात. शक्यतो खातेफोड करुच नये.
११) कोणत्याही हॉस्पिटलमधे जाऊन बघा. म्हातारा ॲडमिट आहे की म्हातारी हे नातेवाईकांच्या पाणावलेल्या डोळ्यांवरून लगेच कळते. म्हातारा ॲडमिट असेल तर मुलगी सोडून कोणाच्याही डोळ्यात पाणी नसते.
१२) तात्पर्य : वय झाल्यावर पुरुषाने स्वतःसाठी इतरांकडून अपेक्षा न करता जगण्याचे कौशल्य शिकावे. पुरुषच जन्मभर विद्यार्थी असतो हे लक्षात ठेवावे. या जगात कोणीच कोणाचे नसते हे लक्षात घेऊन सर्वांतून अलिप्त राहून स्वावलंबी, स्वाभिमानी जीवन जगावे.
१३) माझा सल्ला, इतरांसाठी जगलेले आठवू नका, उगाळू तर अजिबात नका.
१४) पुराणातसुद्धा कोणत्या स्त्रीने वानप्रस्थाश्रम, संन्यास स्विकारल्याचा दाखला नाही.
१५) संन्यास व वानप्रस्थाश्रम हे पुरुषांसाठीच स्मृतींनी सांगितले आहेत. याचे महत्त्व लक्षात घ्या. आपले पूर्वज दूरदृष्टीचे होते याची खात्री पटेल.
☆
लेखक: डॉ. शिरीष राजे, मानस शास्त्रज्ञ.
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अपेक्षाभंग झाला की विनोद घडतो, अपेक्षाभंग आश्चर्यही घडवतो आणि हाच अपेक्षाभंग दुःखाचं मूळ आहे. अपेक्षा छोटीशी, खूप मोठी, किमान, वाजवी अशा अनेक प्रकारची.. किती वेगवेगळी रूप आहेत अपेक्षेची. अपेक्षांच माध्यम विचारच आहेत त्या विचारांची पोत सुधारली पाहिजे. जेणेकरून मन शांत, सुरक्षित भयरहित आणि निरोगी राहील. नाहीतर मात्र अपेक्षा ही मनशांतीच्या वाटेवरची अडसरच ठरते…..
अपेक्षा करायच्याच नाहीत का मग? लहान असताना हीच अपेक्षा रडण्याचे शस्त्र वापरून पूर्ण करून घेता येते. छोटी अपेक्षा बघता बघता विशाल रूप धारण करते…. हटवादी होऊ लागते… आणि मग त्याखाली सुखाचे क्षण, कृतज्ञता, जिव्हाळा, नाती, परिपक्वता सृजनशीलता गाडले जातात. या अपेक्षांना जेव्हा तडा जातो तेव्हा दुःख शेजारी येऊन बसतं. अपेक्षा भंगाचा डोंगर म्हणजेच हे दुःख… त्यामुळं सतत मनात येणारे नकारात्मक विचार मनावर इतके हावी व्हायला लागतात की सकारात्मक विचारांना शोधण्याचा विचारही मन करू शकत नाही. मनपाखरू खट्टू होतं, आजारी पडतं… शरीर नियंत्रित करणार्या ह्या मनातील बिघाड शरीरावर प्रतिबिंबित होतो पर्यायाने शरीरही थकतं.
हीच अपेक्षा अहंकाराचं देखील मूळ आहे. कधी एखाद्या व्यक्तीची आपल्याकडून असलेली, कधी आपली दुसऱ्याकडून असलेली अशी ही अपेक्षा! ह्या अपेक्षांना मात्र एक मर्यादा हवी… फुग्याला त्याच्या क्षमते बाहेर फुगवलं तर तो जसा फुटतो तसा या वाजवी अपेक्षांचा फुगा फुटला तर नैराश्याची हवा आसमंत व्यापते. अपेक्षांच्या ओझ्याखाली मन दबलं जाऊ लागतं आणि प्रश्नाचे उत्तर न सापडल्याने चिडचिड वाढते.
अपेक्षा करणं हा मनुष्य स्वभाव धर्म आहे.
आई वडिलांची मुलाकडून, सासूची सुनेकडून, गुरुची शिष्याकडून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या अपेक्षांना हक्काची एक झालर आहे. त्या गृहीत धरल्या जातात. आपण आपल्या बद्दल ठेवलेल्या अपेक्षांशी जर मैत्री केली तर नकळतच अपेक्षा आणि आपलं मन यांच्या सुसंवाद सुरू होतो आणि त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मनातल्या भावभावनांचं व्यवस्थापन करायचा जणू अपेक्षा चंग बांधते.
नात्यात एकमेकांकडून असलेल्या अपेक्षा, थोडी जास्त जवळीक असण्याची झालेली सवय त्यामुळे आपल्याला आपलंसं केल्याची आपली भावना सुंदर असते पण परिस्थिती नेहमी तशी राहत नाही. अपेक्षेपेक्षा जास्त अपेक्षा हे या नात्यातला अडसर ठरते.
आपल्या दुसऱ्यांच्या बद्दल असणाऱ्या अपेक्षांबाबत मात्र स्थितप्रज्ञ राहिलेलं बरं! जिथं आपलं मन ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला इथे प्रयत्न करावे लागतात तिथे दुसऱ्या बद्दलच्या अपेक्षांवर आपला अंकुश असू शकत नाही त्यामुळे याबाबतीत अलिप्ततेचे धोरण शहाणपणाचं…..