मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ केव्हा शिकू आपण हे ??—  मूळ हिन्दी लेखिका – सुश्री सुधा मूर्ती ☆ अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट !

त्यावेळी मी रशियातील मॉस्को इथे होते. एका रविवारी मी बागेत गेले होते. उन्हाळ्याचे दिवस होते पण हलका रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. हवेत सुखद गारवा आला होता. बाग अतिशय सुंदर होती. एका चबुतऱ्याखाली बसून मी त्या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते.

अचानक माझी नजर एका युवक युवतीच्या जोडीवर पडली. अगदी थोड्या वेळापूर्वीच लग्न झाले असावे त्यांचे !

ती नववधू अगदी सुंदर होती ! पंचवीस एक वर्षांची, सोनेरी केसांची आणि निळ्या चमकत्या डोळ्यांची ! जणू बाहुलीच ! नवरा मुलगाही साधारण त्याच वयाचा वाटत होता ! तडफदार आणि आकर्षक ! त्याने सैन्याचा पोशाख घातला होता. नववधूच्या अंगावर सॅटिनचा पांढराशुभ्र, मोती आणि नाजूक लेसने सजवलेला पोशाख होता. तिच्या दोन मैत्रिणीही तिच्यामागे उभ्या होत्या. नववधूचा पोशाख मळू नये म्हणून त्यांनी तो हातांनी उचलून धरला होता. एका मुलाने त्यांच्या डोक्यावर छत्री धरली होती. पाऊस पडत होता ना ! नववधूच्या हातात फुलांचा सुंदर गुच्छ होता. दोघांची जोडी अगदी साजेशी आणि सुरेख दिसत होती.

मी विचार करु लागले, ‘ बाहेर पाऊस पडत असताना इतके छान कपडे घालून हे दोघं लगेच असे बागेत का बरं आले असावेत ? लग्न लागल्यावर त्यांच्याकडेही एखादा काही समारंभ वगैरे असेलच की !’ 

मी आता त्यांच्याकडे लक्षपूर्वक पहात होते. ते दोघेही बागेत असलेल्या युद्ध-स्मारकाकडे गेले. हातातला गुच्छ त्यांनी त्या स्मारकावर अर्पण केला. तिथे दोन मिनिटे शांत उभे राहून त्यांनी मनोमन श्रद्धांजली वाहिली व ते हळूहळू परत फिरले.

आता मात्र माझी उत्सुकता मला स्वस्थ बसू देईना !

या जोडीबरोबर एक वृद्ध गृहस्थही आलेले होते. मी त्यांच्या जवळ जाताच त्यांनी माझी साडी पाहून विचारलं 

“ आपण भारतीय आहात का ?”

“ हो, मी भारतीय आहे. “

मग नकळत आमच्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी त्यांना विचारलं, “ आपल्याला इंग्रजी कसं येतं ?” 

“ मी काही दिवस परदेशात काम करत होतो.”

“ मला एक गोष्ट सांगता का ? हे नवविवाहित जोडपं लग्नानंतर लगेचच या युध्दस्मारकाला भेट द्यायला का आलं आहे ? “ न राहवून मी लगेच माझी शंका एकदाची विचारून टाकली.

ते म्हणाले, “ ही रशियातली परंपरा आहे. इथे कोणाचाही विवाह नेहमी रविवारीच होतो, मग ऋतू कोणताही असू दे ! विवाह-नोंदणीच्या रजिस्टरवर सह्या केल्यानंतर त्या जोडप्याने तिथल्या जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन तिथे श्रध्दांजली अर्पण करणं बंधनकारकच आहे असं म्हणता येईल. काय आहे.. ह्या देशात प्रत्येक युवकाला कमीत कमी दोन वर्षे सैन्यात नोकरी करावीच लागते. लग्नाच्या दिवशी आपला सैनिकी पोशाख घालूनच लग्नाला उभं रहावं लागतं.. मग तो कोणत्याही पदावर वा कुठल्याही खात्यात असू दे.” 

“ आणि याचं कारण काय ? “ मी विचारलं.

ते जरासे सरसावून बसले आणि सांगू लागले……

– – “ हे कृतज्ञतेचं प्रतीक समजलं जातं. आपल्या कितीतरी पूर्वजांनी आपल्या देशासाठी कितीतरी युद्धांमध्ये भाग घेतला होता. किती जणांनी प्राणांची आहुती दिली होती.. काही युद्धं जिंकली, काही हरली ! पण त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं ते फक्त आमच्या या देशासाठी… त्यांच्या त्यागाचं मोल फार मोठं आहे. आणि प्रत्येक नवविवाहित जोडप्याला ह्याची जाणीव असणं फार आवश्यक आहे. ज्या शांत स्वतंत्र राष्ट्रात ते दोघं आता आनंदाने राहणार आहेत ते राष्ट्र आज ह्या लोकांच्या बलिदानावर उभं आहे… ही जाणीव. आम्ही वयस्कर लोक ही परंपरा जपण्याचा आग्रह धरतो. विवाहाच्या दिवशी युद्ध-स्मारकावर जाऊन श्रद्धांजली वाहणं ही गोष्ट प्रत्येक नवविवाहित जोडप्यासाठी जणू अनिवार्यच आहे. मग लग्न कुठेही असो, मॉस्को, पिटर्सबर्ग अथवा रशियातल्या कोणत्याही शहरात !” 

मी विचारात पडले… ‘आता हे दोघं लग्न करताहेत’ म्हणून काय शिकवतो आपण आपल्या मुलांना ? महाग महाग साड्या आणि उंची कपडे, किंमती दागदागिने, महागडे जेवणाचे मेनू, अनावश्यक डेकोरेशन, आणि डिस्को पार्टी.. बस्.. फक्त एवढंच तर शिकवतो. एक भारतीय म्हणून आनंदाने आणि शांतपणे जगण्यास आतुर झालेल्या त्या जोडप्याला.. त्यांच्या आयुष्यातल्या त्या महत्वाच्या दिवशी आपल्या शहिदांची आठवण ठेवायला का शिकवत नाही आपण ? का त्यांचे महत्त्व आपण पटवून देऊ शकत नाही आपल्या पुढच्या पिढीला…. आणि खरं तर स्वत:लाही ?

माझे डोळे भरून आले ! मन दाटून आले !

खरंच !आपण भारतीयांनी रशियाकडून ही महान परंपरा आणि ही कृतज्ञतेची जाणीव शिकलीच पाहिजे. देशासाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान केले आहे त्यांचा योग्य तो सन्मान आपणही केलाच पाहिजे… आपल्या आनंदाच्या प्रत्येक क्षणी त्यांचे स्मरण तर केलेच पाहिजे.

– – पण केव्हा शिकू आपण हे ????

 

मूळ हिन्दी लेखिका : सुश्री सुधा मूर्ती

अनुवाद व प्रस्तुती  –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – ३ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.) – इथून पुढे —

Adolescence मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असे समीकरण होते. पाच एक वर्षापूर्वी मुंबई उपनगरात एक घटना झाली होती, ज्यात अठरा मुले (बारा ते तेरा वयोगट) आणि दोन मुलगे असे समीकरण होतेब. दोन महिने या मुलांनी शाळा संपल्यावर दुपारी, एक मुलाच्या इमारतीच्या गच्चीत दोन मुलांना sodomise केले होते.

सुरुवातीला कुतूहल, नंतर व्हिडिओ करून ब्लॅकमेल.

एक मुलगा आत्महत्या करून सुटला.. दुसऱ्याने प्रयत्न केला तो वाचला आणि हे बाहेर आले.

सगळ्यांचे पालक उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय.

ते दोषी होते का? त्यांचे संस्कार या बाबतीत मला माहीत नाही पण नवल आहे, दोन महिने ही अठरा मुले अनैसर्गिक कृत्ये करत आहेत. त्यांच्या मनात काही तरी असेल, अपराधीपण, भीती, excitement, आपण पकडले जाऊ ह्याची धास्ती, अनैसर्गिक आनंद, ज्या मुलांवर अत्याचार झाले त्यांच्या मनातली खळबळ, वेदना.. दोन महिन्यात ही लक्षात सुद्धा येऊ नये! एका ही कुटुंबात.. ही गोष्ट मला जास्त अस्वस्थ करून गेली. आपल्या मुलांचे मार्क्स, रूप रंग, भविष्यातही त्याची प्रगती, खेळ कला यातील यश अपयश हे सगळे आपण आवर्जून पाहतो, त्यासाठी पैसे खर्च करतो, यशस्वी होण्यासाठी दबाव घालतो पण आपल्याला मुलांचे मन वाचता येत नाही, आणि मुलांना आपला आधार वाटत नाही! 

मग आपण आई वडील का होत आहोत असा विचार करायची वेळ आली आहे.

Adolescence मध्ये त्या मुलावर sexually तो attractive आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी आहे.. आताचे जग हे क्रूड आहे. त्यामुळे ते डायरेक्ट मुद्द्यावर येते.

आमच्यावेळी शाळेत पहिला दुसरा नंबर, आकर्षक व्यक्तिमत्व, कला किंवा खेळ यात प्राधान्य असणाऱ्या मुलांकडे/ मुलींकडे, मुलींचे/ मुलांचे लक्ष असायचे. जोड्या तेव्हाही जमायच्या आणि ज्यांच्याकडे कुणाचेच लक्ष नाही अशी मुलं मुली तेव्हाही असायची. नकार, दुर्लक्ष, स्वतःच्या आयुष्याची काळजी, आपण कुणालाही आवडत नाही म्हणून येणारा एकाकीपणा, न्यूनगंड यातून अनेक जण जात असतील.

अशा लोकांच्या मनातले नैराश्य आणि त्यातून स्वतःला सावरणे, यात कोण पूल बनत असेल हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर याचे उत्तर मिळाले तर कदाचित ह्या मुलांच्या समस्यांच्या गुंत्याचे टोक आपल्याला सापडू शकते.

ही सिरीज बघत असताना मला माझा भाऊ आठवला. अभ्यासात हुशार पण रंगाने सावळा. त्यात बाहेर उनाडायचा खूप. त्यामुळे काळा दिसायचा. आपल्याकडे अनेकांना बोलण्याची पद्धत नसते.. त्याच्यावर प्रेम असणारी अम्माच म्हणायची, अरे रामोशी कसा दिसतो.

पुढे जसजसा मोठा झाला तसा बाहेरच्या जगात सुद्धा वजनावरून वरून टर, रंगावरून चेष्टा सुरू झाल्या.. मुले खूप vicious असतात. बिल्डिंग च्या भिंतीवर त्याचे कार्टून काढणे, त्याला हसणे, काहीही नावे ठेवणे असायचे.

पुढे वयात आल्यावर सुद्धा नकोसे वाटणारे अनेक अनुभव आले असतील, असणार.

तेव्हाचा रागीट स्वभाव, उर्मट वर्तन. नको असलेल्या घटकांशी सामना करण्याचे ते मार्ग होते.

आयुष्य त्याचे सोपे नव्हते.

घरात उगाच बाजू घेणे नव्हतेच. चुकले असेल तर ओरडा खायचा तो पण अनेकदा तो down असेल तर त्याच्या केसातून हात फिरवत ” एका तळ्यात होती ” म्हणणारी आई मला अजून आठवते. राजहंस एक असे म्हणताना आमचे आवाज सुद्धा त्यात मिसळायचे आणि मग आम्ही हसायचो… तो ही हसायचा.

आता exactly आम्ही त्याला कसे समजून घेतले हे नाही सांगता येणार पण त्याच्या मागे आम्ही होतो. We all shared a very close bond he knew we would be there for him always.

त्यामुळे असेल, बाह्य जगात वावरताना सुद्धा आपल्यासाठी कुणी आहे ही जाणीव त्याला सावरत होती.

त्याच्याबद्दल लिहावे असे खूप आहे आणि ते अत्यंत प्रेरणादायक आहे. अनपेक्षित भोग त्यानेही अंगावर घेऊन जिरवले. FB वर तो नाही आणि स्वतःबद्दल लिहिलेले त्याला आवडत नाही पण 

पुढे शिक्षण, नोकरी… उत्तम भविष्य घडवले त्याने, खूप लहान वयात. मोठ्या कंपनीत डायरेक्टर, स्वतःचे मोठे फ्लॅट्स, मर्सिडीज.. आणि बरेच. त्याच्या कंपनीतून गेली अकरा वर्षे उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून अठ्ठावीस देशातून त्याची निवड केली जात आहे. या सारखी अनेक जण माहिती आहेत. घरातील तणाव, व्यसने, रूप रंग, व्यंग यामुळे झालेला मानसिक त्रास, आर्थिक परिस्थिती मुळे झालेला अपमान आणि या साऱ्यातून तावून सुलाखून वर आलेले अनेकजण.

सूड घेण्याकडे अनेकांकडे कारणे असतील पण त्यांनी ते केलेले नाही.

या सर्वांच्या मध्ये एक महत्त्वाचे साम्य आहे. पाठीशी असलेला हात आणि विश्वासाची माणसे आणि त्याला समजून घेण्यासाठी दिलेला वेळ.

“मी राजहंस आहे” हे पटवून द्यायला त्यांच्याकडे त्यांची माणसे होती आणि ती आहेत ह्याचा त्यांना विश्वास होता.

हा सिरीजचा रिव्ह्यू नाही. असे काही घडण्याची शक्यता असू शकते म्हणून सिरीज पहायला हरकत नाही 

पण नव्वद टक्के गोष्टी या खरेतर हातात असतात आणि आईवडील, आजीआजोबा यांनी आपल्याला घडवले असल्याने अंगात सुद्धा मुरलेल्या असतात.

आपल्यासाठी भरपूर माणसे आहेत असा भास सोशल मिडिया मुळे होऊ शकतो. इथे खरच तुमच्यावर प्रेम करणारी माणसे असतात.. ती प्रेम करतात ते ही निखळ असू शकते कारण तुमची कायदेशीर आणि सामाजिक जबाबदारी त्यांच्यावर नसते. You don’t owe anything to them nor they owe to you.. त्यामुळे असेल, त्या मर्यादित वेळेत ते तुमचे कौतुक करतात. अनेकवेळा ते खरे असते. ह्यात आपली माणसे, ज्यांच्याशी आपली आर्थिक, सामाजिक, कायदेशीर बांधिलकी असू शकते ती रुक्ष वाटू शकतात. होते असे म्हणून तर सोशल मिडिया लोकप्रिय आहे. काहीही प्रत्यक्ष न करता केल्याचा आभास इथे निर्माण होतो. आपली माणसे नक्की कोण असतात? 

माझ्या सासूबाई आजारी होत्या. माझ्या लग्नाला जेमतेम एक वर्ष झाले होते. कधीतरी लक्षात आले असावे त्यांच्या की हे आपले शेवटचे दिवस आहेत. माझा हात धरून त्या म्हणाल्या, जगू आणि बाबांना जप. खरेतर दोन्ही माझेही. नवरा, सासरे पण त्यांच्या प्रति आईंची जी जबाबदारी होती ती त्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली.

गेल्या आठवड्यात अचानक हॉस्पिटल मध्ये मला जावे लागले. खरेतर सगळे पूर्ववत होत असताना अचानक श्वासाचा त्रास सुरू झाला आणि झाले ते काही तासांत, त्यामुळे हॉस्पिटलमध्ये emergency मध्ये दाखल झाल्यावर ना मला नीट बसता येत होते, ना बोलता, जीभ जड आणि ऐकू येत असलेले नीट पोचत नाही अशा स्थितीत मी जवळ उभ्या असलेल्या नवऱ्याला म्हटले, take care of Amarjeet.. मुलगा लांब उभा होता म्हणून मनातल्या मनात त्याला पपाला पाहायला सांगितले. खरेतर काही तासापूर्वी किती काय काय करायचे होते, कुणाकुणाशी बोलायचे होते, pending कामे आठवत होती.. पण त्या क्षणाला लक्षात आले…let go असे करता येत नाही.

माझ्या जबाबदाऱ्या अशा टाकून कशी जाणार.. I have to handover..

आतापर्यंत माझा जो बांधिलकीचा वाटा होता तो दुसरे कोण घेणार! 

वारसा म्हणजे फक्त पैसे घर, मालमत्ता याहीपेक्षा असतो ते आपण स्वतः..

आपली ओळख ज्या व्यक्ती मार्फत उरणार ती आपला वारसदार असते. आपल्याला हवी असलेली आपली ओळख, आपल्या नंतर रहावी असे वाटत असेल तर आपल्या मुलाला तसे बनवणे हेच आपल्या हातात असते. तेवढा प्रयत्न जरी प्रत्येकाने स्वतःपुरता केला तर adolescence ही सिरीज प्रत्यक्षात न येता एक फिक्शन म्हणून उरेल.

— समाप्त —

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘लायकी…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै ☆3

“गवार वीस रुपये…

कलिंगडं शंभरला तीन!”

सूर्यही नीट उगवला नव्हता. रस्त्यावरून असा खणखणीत आवाज आला आणि डोळे चोळत उठलो. गॅलरीतून खाली पाहिलं. सोसायटीच्या खालीच तेरा चौदा वर्षाचा पोरगा येऊन थांबला होता. कपाळाचा घाम पुसत उभा. सोसायटीचा वॉचमन त्याला लांब थांबायला सांगत होता. तसा तो पोऱ्या वॉचमनला हात जोडत थांबू देण्याची विनंती करत होता. मी आवाज दिला आणि त्या पोऱ्याला थांबायला सांगितलं. पोऱ्यानं मान डोलवली. तोंडाला रुमाल बांधून खाली गेलो. दोन चार बाया आणि काही पुरुषही त्याच्याभोवती येऊन थांबले होते. सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही सगळे गवार, कलिंगड घेऊ लागलो.

इतक्‍यात तो पोऱ्या एकाला म्हणाला,

‘दादा, तांब्याभर पाणी मिळंल का?’ दादानं तोंड वाकडं करत, ‘समोरच्या चौकात पाण्याची टाकी आहे. तिथं पी’ असा सल्ला दिला.

‘एवढ्या सकाळी तहान कशी लागतीरे तुला?’दुसऱ्या दादानं असं विचारत स्मित केलं.

तसा तो पोऱ्या म्हणाला, ‘पहाटं पाचला निघलोय साहेब घरातून. सात किलोमीटर चालत आलोय. पाण्याची बाटली होती. पण, तीबी संपली. म्हणून म्हणालो.’

तशी एक ताई लॉजिक लावत म्हणाली, ‘वाह रे वाह शहाणा! म्हणजे आम्ही तुला तांब्याभर पाणी देणार. तू ते पाणी पेणार आणि तुला कोरोना असेल, तर तो आम्हाला देऊन जाणार.’ ताईंच्या या वाक्‍यावर पोऱ्या काही बोलला नाही. आवंढा गिळत त्यानं शांत राहणं पसंत केलं.

आम्ही सो कॉल्ड व्हाईट कॉलरवाली माणसं होतो. रस्त्यावरच्या अशा कोण्या एैऱ्यागैऱ्याला पाणी देऊन आम्हाला आमची इमेज खराब करायची नव्हती. आज ह्याला पाणी दिलं की, उद्या वॉचमन पाणी मागेल, परवा कचरा उचलणारी बाई पाणी मागेल, परवा पेपर टाकणारा पोऱ्याही पाणी मागेल. त्यांनी त्यांच्या औकातीत रहायचं आणि आम्ही आमच्या रुबाबात, अशी काहीशी अव्यक्त भावना आम्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होती.

आम्ही सगळेजण स्वत:ला उच्च विद्याभूषित, सुशिक्षित आणि श्रीमंत समजत खरेदी करत होतो. तितक्‍यात तिथे एक स्कॉर्पिओ आली आणि थोड्या अंतरावर थांबली. त्यातून एक दाढी मिशीवाला रांगडा माणूस उतरला. त्याच्या हातात पिशवी होती. तो चालत आला आणि ती पिशवी त्यानं पोऱ्याच्या हातगाडीवर ठेवली. ‘उन्हाच्या आत घरी ये रे भैय्या,’ असं म्हणत तो माणूस पुन्हा स्कॉर्पिओत बसला आणि निघून गेला.

आमच्यातला एक दादा हसत म्हणाला, ‘त्यांच्याकडं कामालाहे कारे तू भैय्या?’ पिशवीतून बिसलेरी काढत भैयानं पाणी तोंडावर ओतलं. नंतर चार घोट घशात ढकलले आणि तोंड पुसत म्हणाला, ‘वडील होते माझे.’

त्याच्या वाक्‍यावर आम्ही सगळ्यांनी एकाचवेळी आवंढा गिळला. तरीही रुबाब कमी न करता भुवयांचा आकडा करत एक ताई म्हणाली, ‘घरी स्कॉर्पिओ असून तू हातगाडीवर भाजी विकण्यासाठी इतकं हिंडतोय व्हय?’ गवार तोलत भैय्या म्हणाला, ‘घरी एक नाय चार गाड्याहेत ताई. तेवीस एकराची बागायतबीहे. पुण्यातल्या मार्केटयार्डात तीन गाळेहेत. पण तात्या म्हणत्यात, आपल्यासारख्या शेतकऱ्यांना लोकांची नियत समजून घ्यायची असेल, तर हाच भारी चान्स आहे. आत्ताच्या काळात गरिबांबरोबर लोक जेवढं वाईट वागत्यात, तेवढं याच्याआधी कधीच वागले नाय. आमच्या धंद्याला ते लय गरजेच असतंय ताई. म्हणून रोज हातगाडी घेऊन पाठवत्यात मला. आज ना उद्या सगळा धंदा मलाच सांभाळावा लागणारे. रोजचा दोन अडीच लाखाचा माल निघतोय. तेवढा सांभाळण्यासाठी लोकांची लायकी समजून घ्यायला पाहिजेच ना.’

त्याचं वाक्‍य संपलं, तशे पटापट त्याच्या हातावर पैशे टेकवत सोसायटीतले आम्ही सगळे ताई, दादा पटापट आपापल्या फ्लॅटकडं निघालो. मी गॅलरीतून गुपचूप पाहत होतो. आम्हाला आमची लायकी दाखवणारा तो गरीब माणूस पुढच्या श्रीमंताना त्यांची लायकी दाखवण्यासाठी निघाला होता.

 लेखक :अज्ञात

प्रस्तुती : श्री. ब्रह्मानंद पै 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ महाराष्ट्रातील संत स्त्रिया – भाग – ६ – संत बहिणाबाई… ☆ सौ शालिनी जोशी

संत बहिणाबाईंचा जन्म वेरूळ जवळील देवगाव येथे. आई-वडील, जानकी व आवजी कुलकर्णी यांनी वयाच्या केवळ पाचव्या वर्षी पाठक आडनावाच्या एका तीस वर्षाच्या बिजवराशी बहिणाबाईंचा विवाह करून दिला. पण मुलीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज आई-वडिलांना फेडणे शक्य झाले नाही. म्हणून जावयासह सारे कुटुंब घर सोडून प्रवासाला बाहेर पडले. पंढरपूर, शिंगणापूर करत कोल्हापूरला आले. एका ब्राह्मणांने त्यांना आश्रय दिला. बहिणाबाईंचे वय केवळ आठ वर्षाचे होते. पण त्यांना ईश्वराची अनावर ओढ होती. येथे जयरामस्वामी वडगावकरांची कीर्तने त्यांनी ऐकली. त्यातील तुकारामांच्या अभंगांनी त्या भारावल्या. सतत मुखात अभंग आणि तुकारामांचे ध्यान. ‘पती हाच परमेश्वर’ मानण्याचा तो काळ होता. बहिणाबाईच्या कर्मठ पतीला ते मानवले नाही. हात, पाय बांधून गोठ्यात टाकण्यापर्यंतच्या छळाला सामोरे जावे लागले. पण संसाराकडे तटस्थ भावनेने बघण्याचे सूत्र त्यांनी अवलंबले. करावं वाटतं ते करता येत नव्हतं. जे करावे लागत होतं ते आवडत नव्हतं. अशा कोंडीत त्या सापडल्या. तरीही प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड त्यांनी घातली. परमार्थाचा आनंद घेतला.

स्त्रियेचे शरीर पराधीन देह l न चाले उपाय विरक्तीचा l

शरीराचे भोग वाटतात वैरी l माझी कोण करी चिंता आता ll

अशी व्यथा त्या अभंगातून व्यक्त करतात.

बहिणाबाईंची निष्ठा पाहुनी संत तुकारामानी त्याना स्वप्नात दृष्टांत दिला. त्यावेळी त्या अठरा वर्षांच्या होत्या. त्यांचे जीवन बदलून गेले. ‘प्रपंच परमार्थ चालवि समान l तिनेच गगन झेलियेले l’ असे आपले जीवन त्यांनी आपण अभंगातून उलगडले. हळूहळू बहिणाबाईंचा लौकिक पसरू लागला. लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. पण एका ब्राह्मण स्त्रीने शूद्र जातीच्या तुकारामाचे शिष्य व्हावे ही गोष्ट सनातन्यांना पटणारी नव्हती. नवराही संतापला. पण बहिणाबाई तुकारामांच्या अधिकार संपन्न शिष्या झाल्या. ‘मत्स जसा जळावाचूनि चडफडी lतैसी आवडली तुकोबाची l’अशा प्रकारची तगमग त्यांची तुकोबांविषयी असे. ‘स्वप्नामाजी कृपा केली पूर्ण’ अशी बहिणाबाईंची साक्ष आहे.

ब्रह्मज्ञांनी, भक्तीभाव व वैराग्याने त्या युक्त होत्या. नवऱ्याच्या संतापाला त्यांनी प्रतिक्रिया दिली.

‘भ्रताराची सेवा तोचि आता देव l भ्रतार स्वयमेव परब्रह्म ll

भ्रतार तो रवि मी प्रभा तयाची l वियोग त्याची केवी घडे ll

भ्रतारदर्शनाविण जाय दिस l तरी तेची राशी पातकांच्या ll

पुढे हळूहळू पतीचा स्वभाव बदलला.

काही दिवस त्या देहूला राहिल्या होत्या. तुकारामांची त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. तेथे असताना त्यांना दोन मुले झाली एक मुलगा व एक मुलगी. स्वतः ब्राह्मण असूनही ब्राह्मण कोण या विषयावर त्यांनी आपले सडेतोड विचार तत्कालीन सनातनी ब्राह्मणांना सांगितले. ‘ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण’ असे ठामपणे सांगितले. त्यांनी साधारण ७३२ अभंग लिहिले.

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीतील संतांच्या कार्याचे रूपकात्मक वर्णन करून संतांची माहिती लोकांवर बिंबवली. ती प्रसिद्ध रचना,

संत कृपा झाली इमारत फळा आली l

ज्ञानदेवे रचीला पाया उभारिले देवालया l

नामा तयाचा किंकर तेणे विस्तारले आवार l

जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत l

तुका झालासे कळस भजन करा सावकाश l

बहिणी फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा l

त्यांचे अभंग अलंकारिक, रसपूर्ण, शांतरसाचे अधिक्य असलेले असे आहेत.

असे सांगतात की त्यांना आपल्या पूर्वीच्या १२ जन्मांचे स्मरण होते. चालू जन्म हा तेरावा होता. हे जन्म मरण्यापूर्वी त्यांनी अभंगातून आपल्या मुलाला सांगितले. ‘घट फुटल्यावरी l नभ नभाचे अंतरी l’ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या. (१७००साली) शिरूर येथे त्यांचे समाधी आहे.

अशा या बहिणाबाई स्त्रियांना सुधारण्याचा मार्ग दाखवणाऱ्या क्रांतीज्योत !

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १/२  ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

अथातो भक्तिं व्याख्यास्यामः

साधन चतुष्ट्य 

भक्त म्हणजे भगवंतापासून जो विभक्त नाही तो. भक्त होण्यासाठी काय पात्रता लागते, तर असे अमुक अमुक सांगता येणं अवघड आहे. पण भक्ताने कसे असावे, किंवा आदर्श भक्त कसा असतो ते सांगता येईल….. ! उत्तम भक्ताची लक्षणे अनेक ग्रंथात आलेली आढळतील.

जेव्हा आपण भक्ति चा शास्त्र म्हणून अभ्यास करतो, तेव्हा त्याला काही सूत्रे जोडावी लागतात, पटतंय ना ?

त्यातील प्रमुख चार सूत्रे खालील प्रमाणे आहेत.

१. नित्यानित्यविवेक म्हणजे जगात नित्य म्हणजे शाश्वत काय आहे आणि अनित्य म्हणजे अशाश्वत काय आहे हे जाणणे.

२. नित्य आणि अनित्य जाणल्यानंतर त्यांचा यथासंभव त्याग करणे.

३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे.

४. मुमुक्षता

कोणत्याही शास्त्राची, विषयाची पदवी घ्यायची असेल तर त्यासाठी किमान पात्रता असणे अनिवार्य ठरते. एखाद्याला वैद्यकीय पदवी घ्यायची असेल तर बारावीला नुसते उत्तीर्ण होऊन चालत नाही तर सर्वोत्तम गुण असावे लागतात. त्या अनुषंगाने भक्तिशास्त्र शिकण्यासाठी, भक्तीचा लाभ होण्यासाठी आंतरिक व्याकुळता खूप महत्वाची ठरते. ज्याप्रमाणे एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत, त्याप्रमाणे मनात जोपर्यंत वासनेचा जोर आहे तो पर्यंत भक्तीचा उगम होणे कठीण आहे. परंतु मनुष्याचे सुकृत उदयास आले आणि त्याचवेळी सद्गुरूकृपा झाली तर मात्र भक्ति देवता त्याच्यावर कृपा करते असे सर्व संत सांगतात. याच सूत्रानुसार ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी साधन चतुष्ट अत्यावश्यक सांगितले गेले आहे.

आपण एकेक मुद्दा पाहू.

१. नित्य आणि अनित्य :~ मी नसताना भगवंत होता, मी असताना भगवंत आहे आणि उद्या कदाचित मी नसेल तेव्हाही भगवंत असेल…, अर्थात तो नित्य आहे. तसेच मी अनित्य आहे, या नश्वर जगातील प्रत्येक गोष्ट अनित्य अर्थात कधीतरी नष्ट होणारी आहे. माउली म्हणतात,

“उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।

हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥”

 (ज्ञानेश्वरी २. १५९)

२. ईश्वर सर्व चराचरात भरून राहिला असल्याने तो माझ्यामध्ये ही आहे. त्याला ओळखणे म्हणजेच भगवंताची ओळख करून घेणे असल्याने, येथील अनित्य गोष्टीत न रमता त्यांचा त्याग करायला शिकणे.

३. शम, दम, श्रद्धा, उपरम, तितिक्षा, समाधान यांचा अंगिकार करणे. हे सहा गुण आहेत. प्रत्येक साधकाने नव्हे तर प्रत्येक मनुष्याने त्याचा अंगिकार करायला हवा.

शम.

म्हणजे मनाचा निग्रह, अर्थात स्वतःच्या बाबतीत कठोर आणि दुसऱ्याच्या बाबतीत मृदु. सामान्य मनुष्य नेहमी याच्या उलट करीत असतो.

दम.

इंद्रियांचा निग्रह. एखाद्याने शुभ्र पांढरा कपडा परिधान केलेला असेल तर मनुष्य त्या कपड्याकडे न पाहता त्यावर कुठे एखादा डाग दिसतो का ते पाहतो… , त्याची नजर चांगल्या गोष्टींकडे न जाता, वाईट गोष्टीकडे जाते. इथे इंद्रियांचा निग्रह महत्त्वाचा ठरतो.

श्रद्धा

सद्गुरूंवर, त्यांच्या वचनावर दृढ श्रद्धा. आईने घास भरवायला तोंडाशी आणला की बाळ अगदी सहज तोंड उघडते, त्याची त्याच्या आईवर आत्यंतिक श्रद्धा असते. त्याच्या मनात असे कधीही येत नाही की आई या घासात मला विष घालेल…. ! अशी श्रद्धा असलेला कल्याण नावाचा शिष्य समर्थांनी कल्याणा, माझी छाटी… असे म्हटले की क्षणाचाही विलंब न करता थेट कड्यावरून उडी मारतो…

उपरम

सर्व कर्माचा त्याग करणे, अर्थात इथे मनाने त्याग अभिप्रेत आहे. कारण कर्म केल्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही….

तितिक्षा

मनुष्याच्या आयुष्यात सुख दुःखाचे प्रसंग येत जात असतात. सुख आले की मनुष्य खुश असतो पण दुःख येऊच नये असे त्याला वाटत असते. जो मनुष्य सुखदुःखात समतोल रहातो, तोच खरा अधिकारी ठरतो. त्याची कसलीच तक्रार नसते. “तू ठेवशील तसा राहीन….. !” इतकेच त्याला कळते…

समाधान 

मनुष्य अनेक इच्छा मनात धरून असतो. कधी त्या पूर्ण होतात तर कधी अपूर्ण राहतात. समाधानी व्हायचे असेल तर पुढील सूत्र उपयोगी पडू शकेल.

इच्छा पूर्ण झाली तर देवाची कृपा समजावी आणि इच्छा अपूर्ण राहिली तर देवाची इच्छा समजावी. आपण आनंदात असावे.

४. मुमुक्षता

 जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होणे हे प्रत्येक मानव देह प्राप्त केलेल्या जीवाचे आद्य कर्तव्य आहे. हे मनुष्याचे प्रमुख दीर्घकालीन ध्येय असले पाहिजे. त्यासाठी अन्य छोटी छोटी ध्येय जरूर असावीत, पण त्यामुळे आपल्या दीर्घ कालीन ध्येयाकडे डोळेझाक होऊ देऊ नये.

देवर्षी नारद महाराज की जय!!

– क्रमशः सूत्र १ / २ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी ☆

सौ. प्रतिभा कुळकर्णी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “नोंदी…” भाग – २ – लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई ☆ प्रस्तुती – सौ. प्रतिभा कुळकर्णी 

(हा रिव्ह्यू नाही)

(तिने मला तेव्हाच भोस्कायला पाहिजे होते का असेही एक क्षण मला ही सिरिज बघून वाटले. हादरलेल्या लोकांनी आपल्या भूतकाळात डोकावून पाहिले तर अनेकांना victim दिसतील. कधी आपण, कधी दुसरे.) इथून पुढे — 

आता ज्यांच्या घरात शक्यतो दुसऱ्यांबद्दल निदान उघड वाईट बोलायचे संस्कार नव्हते त्या घरातील मुले असे गॉसिपिंग करत असतील तिथे आजची परिस्थिती पहा.

इथे ट्रोलिंग च्या नावाखाली कोणालाही जे काही बोलतात, especially राजकीय नेते, त्यांचे कुटुंब, अभिनेते, अनंत अंबानीला सुद्धा.. काहीही संबंध नसताना. त्यांचाच जियो वापरून शिव्या देतात, रेवडी उडवतात…

अशा काळात आपली मुले मोठी होतायत, आपले निरीक्षण करत आहेत, ज्यांचा संबंध नाही, ज्यांच्या पुढे आपले स्थान कस्पटासमान आहे अशांना सुद्धा अर्वाच्च भाषेत बोलताना रोज पाहत आहेत आणि हेच बाळकडू पुढच्या पिढीला पोचत आहे असेही वाटले.

आपण उत्तम आईवडील आहोत असे समजणारे, कुणाचा पुरुषार्थ काढतात, कुणाला टरबूज म्हणतात, xxxxx, व्येश्या म्हणतात. त्या प्रतिक्रिया सहज, अगदी उत्स्फूर्त असतात. असे ट्रोल करणे आपल्याहून लहान मुले बघत असतात.

ते तरी आईबाबांना कुठे ट्रोल करतात, ते ही दुसऱ्यांना करतात.

ट्रोल करणे सहज असते, मजा असते, धमाल असते हे पाहताना, ट्रोल स्वतः झालो तरी ती मजा म्हणून घ्यायची एवढे मात्र ते शिकू शकत नाहीत. लहान असतात आणि त्यामुळे अपघात होतात. कुणाला मारले जाते, कुणी आत्महत्या करतात.. कुणी नैराश्यात जातात, व्यसनात जातात..

आता यावर काय उपाय आहे तर निदान आपण आपल्यापुरते सभ्य वागणे, ते शक्य नसेल तर हे जंगल आहे आणि त्या जंगलात वावरायला शिकले पाहिजे हे लहान मुलांना शिकवणे.

ह्यात अस्वस्थ होत असाल तर सगळ्यांनीच आरशासमोर उभं राहायची गरज आहे.

अपेक्षांचे ओझे आणि नकार या चक्रात अडकलेली आणि बहकलेली पिढी प्रत्येक काळात होती आणि बहकण्याचे मार्ग सुद्धा आधीच्या पिढीसाठी न समजणारे होते. आपले कुठे चुकले हे विचार करणारी पिढीही प्रत्येक काळात होती. कदाचित कुटुंब मोठे होते म्हणून असेल, एवढ्या मोठ्या कुटुंबात वाट चुकलेले एखादे मूल तसेच सामावले गेले. त्याचा फार गाजावाजा झाला नाही.

आता लहान कुटुंबात, यश आणि अपयश magnifying glass मधून बघण्याची सवय झाली आहे. साधे KG पास होणे टोप्या उडवून साजरे केलं जाते, तशाच चुका सुद्धा तेवढ्याच वाईट पद्धतीने मांडल्या जातात.

आपण यशस्वी आहोत हे सिद्ध करण्याचे फार कमी मार्ग माझ्या आधीच्या पिढीकडे होते.

शिक्षण, चांगली नोकरी, घर, जमले तर गाडी, बायकोच्या अंगावरील ठळक दागिने आणि स्वतःचा संसार करण्यास योग्य ठरलेली मुले.. बस.

हे झाले की बहुतांशी लोक समाधानात जगायची. निदान आयुष्याचा स्विकार असायचा. आता ह्या गोष्टी असायलाच हव्या, granted धरल्या जातात. अर्थात ह्या गोष्टी काही जन्माबरोबर येत नाहीत ना! त्यासाठी वेळ, मेहनत आणि “बांधिलकी” अपेक्षित असते.

प्रचंड स्पर्धा, मोठी महत्त्वाकांक्षा, मोठी स्वप्ने यामुळे मेहनत प्रचंड लागते, वेळ कमी पडतो, कुटुंबासाठी द्यायचा वेळ जो पूर्वी असायचा तो काढणे खरच कठीण झाला आहे. म्हणून असेल, “बांधिलकी outsource करण्याचे प्रमाण वाढले आहे. ”

साधेच बघा, पैसे मोजून आवडीने घेतलेल्या घरात. इंटेरियर करायला आर्किटेक्ट असतो, अनेकवेळा तुमच्या घरावर तुमच्या आवडीची खूण नसतेच…ट्रेंड जसा तसे घर असते. घरात घालवायचा वेळ सुद्धा अत्यंत कमी झाल्याने ते मेन्टेन करण्यासाठी सुद्धा नेमलेला स्टाफ असतो. आपल्या घराला कधीतरी प्रेमाने आपला स्पर्श होतो? त्यात सुट्टी पडली की एवढ्या लाडा कौतुकाने सजवलेले घर सोडून आपण out station जातो.

तक्रार नाही ही. हे घरा घरातील वास्तव आहे. घर तरी मानले तर व्यक्ती.. नाहीतर दगडाच्या भिंती.

मुलांची गोष्टच वेगळी असते. अगदी आवर्जून जन्माला घातलेले बाळ किती वर्ष बिलगुन असते! 

स्पर्धेला प्राधान्य देणारे हे जग आहे. दोन वर्षापासून त्याला सगळ्या विषयात प्रवीण करायला शिक्षक असतात, सांभाळायला आया असतात.

त्याचे जीन्स पिढीजात आले असतील पण विचार, आचार, सवयी ह्या नक्की कोणाच्या असतात? 

ऑफिस, करिअर आणि मिळाला वेळ तर सोशल लाईफ ह्यात मूल पालकांकडून काही उचलेल अशी संस्कार घडवणारी सोबत मिळते का मुलांना ? 

मौज मजा, लाड आणि अभ्यास सोडून म्हणते आहे मी. संस्कार म्हणजे पालकांच्या वर्तनाचा मुलावर उमटणारा ठसा.

दैनंदिन आचरण, यात पालकांचे आईवडिलांशी, भावंडांशी असलेले संबंध, मित्रांबरोबर असताना वर्तन, घरात काम करणाऱ्या व्यक्तींबरोबर असलेले वागणे, पार्टनर बरोबर असलेला बंध, सोशल मीडियावर असलेले तुमचे वर्तन, ह्या सर्व गोष्टी मूल indirectly न्याहाळत असतात. ते बघून मूल आपोआप घडत जाते. आपण नाही का म्हणत, अरे हा बाबासारखा नम्र आहे, आईसारखा हुशार आहे, आजोबांसारखा लाघवी आहे..

केवळ पेशी व्यक्तिमत्व घडवू शकत नाहीत. उदा. हुशारी आनुवंशिक असेल पण मेहेनत करणे हे मुलानी शिकण्यासाठी समोर उदाहरण असावे लागते. मूल घडवण्याचा पाया त्याचे घर असते.

तो बंध जर निर्माण झाला नसेल तर अचानक काही वर्षांनी लक्षात येते की अरे हे एवढे वेगळे का वागते, त्याच्या सवयी, त्याच्या आवडी निवडी, त्याची स्वप्ने, त्याची व्यसने.. ह्यात कुठेच आमचा प्रभाव का नाही ? 

कारण ते पालकांबरोबर खऱ्या अर्थाने वाढतच नाही. एकाच घरी राहणे हे पुरेसे नसते त्यासाठी. मूल तुमचे उरतच नाही. उरतात ती त्यांनी केलेली कर्मे आणि ती निस्तारण्याची, कायद्यानं पालकांवर टाकलेली जबाबदारी.

ती आऊटसोर्स करता येत नाही. चुकून जर काही भलते झाले तर पालक म्हणून ती जबाबदारी तुमच्यावर येतेच.

ती टाळू शकत नाही म्हणून पालक जास्त खचत जातात. आपण अयशस्वी आहोत हा अपमान जास्त त्रास देतो.

मुलं वाढवणे आणि एक चांगला नागरिक म्हणून त्याला समाजात वावरायला मदत करणे ही स्वतःहून स्विकारलेली गोष्ट असते. ती गृहित धरलेली कमिटमेंट असते. ती outsource पैशाने होऊ शकत नाही.

कितीही आदर्श वागायचा प्रयत्न केला म्हणून दगडातून मूर्ती घडतेच असे मला म्हणायचे नाही. काही केसेस आपल्या हाताच्या बाहेर असतात पण निदान वाट चुकलेल्या बोटीला आसरा मिळायला बंदर आहे एवढा विश्वास देण्याचा प्रयत्न मनापासून व्हायला हवा. गरज पडली तर त्याचे आयुष्य सावरण्यासाठी आयुष्याच्या स्वप्नाची सुद्धा तडजोड करण्याचा निर्धार हवा.

लहान मुलांचे जग छोटे असते त्यामुळे आपण आपल्या कुटुंबासाठी काय आहोत त्याही पेक्षा काय नाही आहोत ते त्यांना लगेच समजते. मूल एकदा घरापासून, मनातून तुटले की ती भेग सांधली जात नाही.

आईवडिलांचा अपमान करणे, त्यांना न भेटणे, त्यांच्याशी तुटक वागणे हे सौम्य प्रकार. मुलगा सुज्ञ असेल तर तो स्वतःचा विकास घडवून आईवडिलांवर बहिष्कार टाकतो, नसेल तर गरज असलेल्या सोबतीच्या शोधात मूल असे हरवले जाते.

Adolescence मध्ये हे वरकरणी दिसत नाही पण अशाही केसेस दिसतात. कुणाबरोबर पळून जाणे, ड्रग्स, व्यसने …आजूबाजूला माणसे असूनही मनात भरून उरलेला एकाकीपणा हे सुद्धा महत्त्वाचे कारण आहे.

पैसे देणे हा एक भाग झाला. वेळ दिल्याने तुमच्यात एक बंध निर्माण होतो. जबाबदारीचा आणि विश्वासाचा.. तो जर नाहीसा झाला तर आलेल्या अडचणींची उत्तरे सोडवायला मूल तुमच्याकडे येतच नाही. त्यांना माहित असते ते प्रॉब्लेम सॉल्विंग सुद्धा outsourse केलं जाणार आहे.

– क्रमशः भाग दुसरा  

लेखिका : सौ. प्रिया प्रभुदेसाई 

प्रस्तुती : सौ. प्रतिभा कुळकर्णी

संपर्क – ६, हीरु नाईक बिल्डिंग, धुलेर, म्हापसा, गोवा – ४०३५०७. मोबाईल – ९९२३१४८९०४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ मुलींचं जीवन… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

एक स्त्रीला तिच्या पतीचं समर्थन असेल तर ती अख्ख्या जगासोबत लढू शकते.. पण जर तिच्या पतीचंच समर्थन तिला नसेल तर ती स्वतःसोबत पण हरून जाते.. पराभूत होते.

‘नवरा’ आयुष्यभर ‘नवरा’च राहतो, ‘नवरी मुलगी’ मात्र “बायको” बनते..

नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ ‘फक्त नवऱ्यासाठीच’ ‘ती’ एका अनोळख्या घरात जाते, बाकी सासरची नाती तर नंतर निर्माण होतात हो..

पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्याआधी कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते, कुणाची तरी बहीण असते, कुणाची तरी हसत खेळणारी मैत्रीण असते..

नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण महत्त्व द्यायला विसरते.. आणि मित्रमैत्रिणींना वाटतं, लग्नानंतर ‘ती’ बदलली..

लग्नानंतर सगळ्या परिस्थितीसोबत ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते. त्यातही पतीची साथ असेल तर ठीकच, नाही तर ‘ती’ खचून जाते हो…

माहेरी लागलेल्या सगळ्या सवयींविरुद्ध सासरी वागावं लागतं.. अचानकच मोठं व्हावं लागतं.. अचानकच जबाबदार व्हावं लागतं.. आणि ‘ती’ हे सगळं बनण्याचा प्रयत्नही खूप करते..

माहेरी ‘ए आई, मला भूक लागली. लवकर खायला दे, ‘ म्हणत असतांना, आईने सगळ्यात आधी आपल्याच हातात ताट देणे..

पण सासरी गेल्यावर खूप भूक लागूनही सगळ्यांना वाढून झाल्यावरच, सगळ्यांचे जेवण झाल्यावरच, नंतर जेवण्याची सवय लागते..

माहेरी साधी सर्दी झाल्यावर घर डोक्यावर घेणारी ‘ती’; सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी कुणाला जाणवू देत नाही..

कधी आईच्या राज्यात स्वयंपाकघरात न शिरलेली ‘ती ‘; सासरी मात्र ‘बायको’ म्हणून नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..

कधी स्वतःच्या हातात भारी ओझं न उचललेली ‘ती’; संसाराचं ओझं मात्र उचलायला शिकते. संसाराचा गाडा ओढायला शिकते..

कधीच स्वतःची बॅग नीट न पॅक केलेली ‘ती’; सासरी मात्र स्वतःसोबत नवऱ्याचीही पॅकिंग मस्त करून द्यायला शिकते..

माहेरी बहीण-भावामध्ये सगळ्यात आधी मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

माहेरी दुसऱ्याच्या हिश्श्यामध्ये आलेलं असलं तरी हिसकावून स्वतः घेणारी ‘ती’; सासरी मात्र स्वतःच्या हिश्श्याचं आलेलंही पतीला न कळता द्यायला शिकते..

स्वतःची तयारी स्वतः नीट न करणारी ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याची, मुलांचीही तयारी करून द्यायला शिकते..

कधी स्वतःचीच योग्य काळजी न घेतलेली ‘ती’; सासरी मात्र नवऱ्याचीही, त्यांच्या घरातल्यांची काळजी घ्यायला शिकते..

कधी आईबापाची पण ऑर्डर न ऐकणारी ‘ती’; सासरी मात्र सासऱ्यांची, घरांतल्या सगळ्यांचीच ऑर्डर ऐकते..

कधी आपल्या आईबापाला पण न घाबरणारी, आईबाबांसोबत मैत्रीपूर्वक बोलणारी ‘ती’; सासरी मात्र सासू सासऱ्यांना घाबरायला लागते..

स्वतःच्या आईला कसल्याही कामात मदत न करणारी ‘ती’, सासरी मात्र सासूचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची सेवा करायला लागते..

घरी भांडून हुज्जत घालणारी ‘ती’; सासरी मात्र कुणाला वाईट वाटू नये म्हणून बोलणे सहन करते..

साधं दुखलं, खुपलं, माखलं तरी सगळ्यांसमोर ढसाढसा रडणारी ‘ती’; सासरी मात्र दुःख झालं तरी आईबाबांची आठवण काढून एकांतात रडायला लागते..

आईबाबांना खाण्यापिण्यापासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’; सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही, आईबाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..

बाहेरून शॉपिंग करून आल्यावरही लगेच लोळत, ‘ए आई, चहा दे ग, ‘ म्हणणारी ‘ती’; सासरी मात्र कितीही थकून आली, तरीही लगेच कामाला लागते..

स्वतः कितीही शिकली तरी घरी तिची ‘बायको’, ‘सून’ वा ‘आई’ म्हणून असलेली भूमिका ‘ती’ निभावत असते..

जर एक ‘मुलगी’ लग्नानंतर इतकं बदलू शकते तर मग ‘मुलाने’ व घरातल्या इतर लोकांनी थोडं बदललं तर काय होतंय.. ?

एका मुलीला फक्त आदर आणि प्रेम हवं असतं हो, बाकी तर दुय्यम आहे..

“अरे 10 दिवसाचा गणपती उठवताना हृदय पिळून निघतं, मग एवढी वर्ष सांभाळलेली मुलगी दुसऱ्यांच्या घरी देताना त्या आईवडिलांना कसं वाटतं असेल, त्या मुलीला कसं वाटतं असेल.. मुलगी सुखी राहावी, तिच्या नवऱ्याने, सासरच्या मंडळींनी तिला सुखी ठेवावं; ही केवळ एकच अपेक्षा असते.. “

ह्याची कल्पना करून पहा.. बघा ‘ती’ला आदर देणं जमतंय का?

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ स्त्री लेखन स्वातंत्र्य ☆ सौ राधिका भांडारकर

स्त्रियांना लेखन स्वातंत्र्य आहे का?

ती बोल्ड लिहू शकते का?

ती मनात येणाऱ्या सर्वच भावना सहजपणे लिहू शकते का?

या सर्व प्रश्नांना माझे एकच उत्तर आहे “हो”

“का नाही?”

पण ती लिहीत नाही हे सत्य आहे. चौकटी, मर्यादा, समाजाचे दडपण कोणत्याही प्रकारे तिच्या लेखनासाठी बंधनकारक आहेत असे मला वाटतच नाही.

स्त्रियांचे लेखन संकुचित असायला कारण स्त्री स्वतःच आहे. कारण बऱ्याच वेळा ती स्वतःच उंबरठे ओलांडायला, चौकटी मोडायला, व्यक्त व्हायला,

स्वतःच्या जीवनावर मोकळेपणाने भाष्य करायला तयारच नसते. परिणामी संसार, मुलंबाळं, कौटुंबिक नाती, सासु सुना, नातवंड, नवरा, जावई, सासरे, माहेर, अंगण याच्या पलीकडे स्त्री लेखन वाचायला मिळतच नाही. तिचं लेखन तिच्यापुरतं, तिच्या विश्वापुरतच मर्यादित असलेलं अनुभवायला येतं. फारफार तर नोकरी करणारी एखादी स्त्री लेखिका असेल तर थोडा वेगळा विषय ती हाताळताना जाणवतं परंतु तो विषय हाताळतानाही तिची मुळातली संसारिक सूत्रं वेगळी झालेली जाणवत नाहीत.

तिने लिहिलेल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित यातही चौकटीतलंच स्त्री जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. काही प्रमाणात विनोदी लेखन करणाऱ्या स्त्रिया आहेत पण त्यातही वाढलेलं वजन, माझे डाएट, शेजारीण, नाचगाण्यासारखे छंद, फसलेली पाककला, अवास्तव खरेदी, दुकानातले सेल, नवऱ्याचं बिच्चारेपण, अचानक येणारे पाहुणे या घरगुती विषयांव्यतिरिक्त फारसं काही वाचायला मिळत नाही. अभिरुची संपन्न, समाजाभिमुख असे पुल, सुभाष भेंडे, द. मा. शंकर पाटील, चिं वि. जोशी, दिवाकर वगैरे पुरुष लेखकांसारखं विनोदी लेखन सामर्थ्य स्त्री लेखिकांमध्ये अभावानेच आढळते. साहित्य क्षेत्रात स्त्री लेखिका आणि पुरुष लेखक असे दोन वेगळे विभाग नकळतच होतात. त्याला एक प्रमुख कारण म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या वैचारिकतेतील भिन्नता, निरीक्षण शक्ती आणि अभ्यासही. एका ठराविक परिघातच जगत असताना तिचे जीवनातले अनुभवही मर्यादित, चौकटीतलेच असतात. त्या पलिकडच्या जीवनाचा ती विचारही करू शकत नाही. परिघापलीकडे खूप मोठे मानवी जीवन आहे आणि ते टिपण्याचा किंवा त्याही जीवन प्रवाहाचा दूरस्थपणे भाग होऊन निरीक्षणात्मक वैचारिकतेचा प्रभाव तिच्या लेखनावर पडलेला दिसत नाही. ही वास्तविकता असताना समाजाने तिच्या लेखनावर मर्यादा टाकल्या आहेत किंवा ती बोल्ड लिहूच शकत नाही या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. ठीक आहे! एक स्त्री. . “स्त्री विषयकच” लिहिणार परंतु त्यातही बहुतांशी स्त्री लेखिकांचे विचार, अनुभव, निरीक्षण, कल्पनांची व्याप्ती तोकडीच वाटते. तोच तोच पणा जाणवतो. याचं समर्थन “ती बंधनात असते म्हणून. . ” हे होऊच शकत नाही. माझ्या मते स्त्री जेव्हा एखादी कथा, कादंबरी किंवा लेख लिहिते तेव्हा त्यातूनही ती स्वतःला पाहत असते. स्वतःच्या प्रतिमेला जपत असते. “एक स्त्री असूनही तिने असं का लिहिलं?” या समाजाच्या टिकेचं भय तिनेच तिच्यावर पांघरलेलं असतं. आपल्या लेखनातून आपल्यावर “संस्कृती, नीती मूल्याचे पतन झाले” असे ओरखडे ओढले जाऊ नयेत हा प्रचंड मानसिक अडथळा तिच्या मनात तिनेच निर्माण केलेला असतो म्हणून ती मुक्त होऊ शकत नाही आणि मुक्तपणे लिहू शकत नाही.

अर्थात असेही अनुभव स्त्री लेखिकांना आलेले आहेत. कविता महाजन, मेघना पेठे, गौरी देशपांडे यांनी स्त्रियांचेच प्रश्न अतिशय धैर्याने आणि मुक्तपणे हाताळलेत. काही ना त्यांचे लेखन फार आवडलं तर काहींनी नाके मुरडली मात्र वेगवेगळ्या अभिरुचीचे, जडणघडणीचे वाचक हे असणारच पण लेखकाने (स्त्री अथवा पुरुष कुणीही) समाजाचा आरसा बनून वास्तवतेचे दर्शन(सुंदर ते ओंगळ) मुक्तपणे घडवून देऊ नये असा अर्थ होऊ शकत नाही. सखाराम बाईंडर, पुरुष, गिधाडे, बॅरिस्टर या गाजलेल्या नाटकांसारखी, ज्वलंत तडफडणारे विषय असलेली निर्मिती एखादी स्त्री लेखिका करू शकेल का? वास्तविक या टोकाच्या बोल्ड लेखनातही स्त्रियांच्या समस्या आहेत पण त्या पुरुष मनाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत म्हणजेच इथे महत्त्वाचा भाग येतो तो दृष्टिकोनाचा. स्त्री लेखिका स्वतःचे दृष्टिकोन विस्तारित का करू शकत नाही? तसलीमा नसरीन, इस्मत चुगताई, मन्नु भंडारी, कमला दास अरुंधती रॉय सारख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच लेखिका. समाजाचा प्रचंड विरोध आणि मानहानीला सामोरे जाऊनही त्यांनी लिहिलं. ते चांगलं वाईट याची मीमांसा न करता मुक्तपणे त्यांनी लिहिलं आणि समाजाची एक बाजू उघडी करण्याचं धाडस दाखवलं यात गैर काय??

स्त्री लेखनात विषयाची व्यापकताही कमी दिसते. अश्लीलता टाळूनही शृंगारिक लेखन करता येतं. प्रेमकथा आणि प्रणय कथा यात फरक आहे पण भावनांचा अविष्कार उलगडणारं स्पष्ट लेखन स्त्री लेखिकांकडून होताना दिसत नाही हे सत्य आहे.

 “न राहवून त्याने तिचा पटकन् मुकाच घेतला” किंवा “तिच्या भरदार वक्षस्थळांवर त्याची नजर खिळून राहिली. ” अशा तर्‍हेची भाषा किंवा वाक्यरचना स्त्री लेखिका सहजपणे करू शकेल का? का करू नये? का हरकत असावी? शब्द खेचून धरावेत की मुक्तपणे त्यांची प्रासंगिक उधळण करावी हा चर्चेचा विषय आहे.

कवी कालीदासांच्या मेघदूतातलं यक्षाच्या प्रेयसीचं वर्णन जर सुंदरच वाटू शकतं तर एखाद्या स्त्रीलेखिकेने केलेलं, त्यातलं सौंदर्य जाणून केलेलं रसभरित वर्णन “बोल्ड” का ठरावं? तेव्हा सरळ, सात्विक, मसालेदार किंवा बोल्ड असं काही नसतंच. त्या प्रसंगाची तीच मागणी असते असा विचार का करू नये?

लेखक किंवा लेखिका जेव्हा काही लेखनकृती करते तेव्हा त्यात स्वत:ची गुंतवणूक आणि अलिप्तता दोन्हीची गरज असते. आपण निर्माण केलेल्या पात्रांशी बंध जुळणे आणि प्रत्यक्षात ती पात्रं अलिप्तपणे पाहणे या दोघांचा समतोल साधला गेला तरच उत्कृष्ट आणि मुक्त विचारांचे लेखन होऊ शकतं हे एक लेखनतत्व आहे. त्यात समाज, स्व प्रतिमा, बंधने, मर्यादा याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते लेखकाची जबाबदारी ही आहे की भोवतालच्या समाज जीवनाचा सखोल अभ्यास करून त्यावरचे वास्तविक दर्शन देणारे लेखन करतानाही समाजाला चांगला सकारात्मक संदेश देणं ही लेखकाची जबाबदारी आहे. स्त्री लेखकाची आणि पुरुष लेखकाची ही.

काळाबरोबर जीवन पद्धती बदलतात. संस्कृती, नीतीच्याही व्याख्या बदलतात आणि बदलत्या जीवनपद्धतीवर सहअनुभूतीने विचार करून लिहिण्याचे सामर्थ्य स्त्रीलेखिकेकडूनही नक्कीच अपेक्षित आहे. आणखी एक मुद्दाही मला महत्त्वाचा वाटतो “मी एक स्त्री लेखिका म्हणून जेव्हा विचार करते” तेव्हा मला एक जाणवतं की मी रत्नाकर मतकरीं सारखी सुसूत्र गूढकथा नाही लिहू शकत. किंवा आगाथा ख्रिस्ती सारख्या रहस्यकथा लिहितानाही मी कमी पडते. माझ्याच मनाला मी बजावते की हा माझा जॉनर नाही पण हे कितपत स्वीकारार्ह आहे? खरं म्हणजे याला एकच कारण गूढकथा, रहस्यकथा लिहिण्यासाठी लागणारी अफाट कल्पनाशक्ती याचा अभाव. बहुतेक स्त्री लेखिकांबाबत हेच घडत असावं. कल्पनाविश्व किंवा कल्पनाशक्तीचे अपुरेपण यामुळेही स्त्री लेखिका त्याच त्या लेखन वर्तुळात फिरत राहते म्हणून याही गुणांना जाणीवपूर्वक विकसित करण्याची स्त्री लेखिकांना फार गरज आहे असे म्हटले तर ते गैर ठरू नये. ”घरात असता तारे हसरे मी पाहू कशाला नभाकडे” असा वैचारिक कल नसावा. माथ्यावरच्या विशाल नभाकडे जाणीवपूर्वक पाहण्याची दृष्टी मिळवावी आणि मुक्त लेखन बिनधास्त करावे याच मताची मी आहे. मेलोड्रामा किंवा गिमीक्समध्ये अडकू नये. एखाद्या घटनेकडे ती जशी आहे तशी बघण्याची आणि शब्दातून व्यक्त करण्याची गरज ओळखावी. असे लेखन यापूर्वीही स्त्री लेखिकांकडून झालेले आहे. पद्मजा फाटकची हसरी किडनी सुनीता देशपांडे यांचं आहे मनोहर तरी माधवी देसाई यांचं नाच गं घुमा किंवा कांचन घाणेकर यांचे “नाथ हा माझा” स्नेहप्रभा प्रधान यांचं स्नेहांकिता अगदी लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ही बोल्ड लेखन प्रकारातलीच नव्हे का? अगदी अलीकडेच मी मृदुला भाटकर यांचं “हे सांगायलाच हवं” हे आत्मवृत्त वाचलं. असं लिहायला स्वातंत्र्यापेक्षा धाडसाची गरज असते. म्हणजेच स्त्रिया बोल्ड लिहू शकत नाहीत या विचार प्रवाहाला का वाहू द्यायचे?

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “स्वामी निष्ठा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… काय रे श्वाना तू इथं माणसांच्या गावात!… एव्हढ्या रात्रीत एकट्याने जोर जोराने भों भों करत भुंकत का म्हणून राहिलास?… आधी तुझं ते केकाटणं बंद कर पाहू… मी कोण आहे ओळखंलस का मला?… अरे शेजारच्या जंगल राज्यातील शेर सिंग प्रधानजी आहे मी नव्हे का? आपल्या सिंह महाराजांनी या गावातील माणसाची एक तरी शिकार घेऊन येण्याची आज्ञा केलीय… अरे तिकडं आपल्या जंगलात काही काहीही खायला मिळेनासं झालंय गड्या… जंगल खाद्या बरोबरच आपणच आपल्या दुर्बल रयतेची शिकार करत करत इतके दिवस तग धरला होता.. पण अलिकडे असं लक्षात आलयं कि हळूहळू आपलीच रयतेची संख्या खूपच कमी कमी होऊ लागलीय… रोडावलीय… म्हणून आपल्या महाराजांनी आता आपल्या रयतेची शिकार इथून पुढे बंद असा फतवा काढला आहे.. तुला काय हे ठाऊक कसे असणार म्हणा… तिथं जंगलातल्या आपल्या माणसांची भुके कंगाल झालेले हाल काय असतात ते… तू इथं या माणसांच्या घोळक्यात माणसळाला गेला आहेस ना त्याच्याच एक दुष्परिणाम असाही झालाय की हि निर्दयी माणसांची जात राजरोसपणे जंगलात घुसून दिसेल त्या प्राण्यांची शिकार करत सुटलेत.. जंगलतोड तर अहोरात्र करत असतातच शिवाय त्यात अशी सावज शिकार करत फिरतात.. आपली स्तिथी न घर का न घाट का करून टाकलीय… जरा कुठे बंदूकीच्या गोळ्यांचा ठो ठो आवाज जंगलात घुमतो न घुमतो तोच झाडावरचे पक्षीगण जसे पंख फडफडवीत नि भीतीच्या कलकलटाने अख्खं जंगल भिरभिरत राहतात नि सगळ्यांना धोक्याची सुचना देतात.. तेव्हा सिंह महाराजांसकट आमची सगळ्यांची कि रे चड्डी पिवळी पडते… थरथर अंग भीतीने कापत जाते आणि आधी स्वताचा बचाव करण्यासाठी संरक्षित जागा शोधत बसावी लागते.. मग उरलेल्या जनतेकडे लक्ष देण्याची बुद्धी येते… अरे जंगलातले हिंस्र प्राण्यांचा समुह कळीकाळालाही कधीही न भिणारा.. तर आपल्या भीतीने इतरांच्या जीवावर शक्तिशाली हल्ला करणारे आपण आता असे गलितगात्र होऊन गेलोय… आता आपण नाही तर हा माणूस नावाचा प्राणी आपल्या पेक्षाही दसपटीने हिंस्र झालाय… आपल्या अस्तित्वाचा प्रश्नच ऐरणीवर आलाय… त्यामुळे आर या पार मग जशाच तसं लढा करताना या गनिमी काव्याचा आधार घेऊन अश्या अंधारातून त्या माणसांच्या गावात शिरून एक तरी शिकार करायचीच आणि त्या भुकेलेली, दुर्बल झालेल्या जनतेच्या भुकेची व्यवस्था करायची… असा एव्हढा मोठा जीवावर उदार होऊन धोका स्वीकारायला माझ्या शिवाय दुसरं कोण तयार होणारं… म्हणून मीच तो विडा उचलला आणि आज पहिल्यांदा इकडच्या माणसांच्या गावाकडे वळलो.. काल परवा पर्यंत त्या पलिकडे च्या माणसांच्या गावाकडे आठवड्यातून दोन तीनदा जात होतो.. पण माझ्या येण्याने त्यांच्यातील दोनचार जणं नाहीशी झालेली त्यांना त्यांच्या कसल्याशा यंत्रात दिसलं आणि जी त्याच्यांत घबराट निर्माण झाली म्हणतोस… आता रात्र रात्रभर खडा पहारा ठेवून एक दोन बंदूकधारी त्यांनी तैनात ठेवले की… अशी ती डोकेबाज माणसांची जात… पण आपणही काही कमी नाही बरं.. तल्लख बुद्दीचं दान आपल्यालाही मिळालयं… मग दिला सोडून तो माणसांचा गाव नि आजपासून दूसरा नवा गावाकडे मोर्चा वळवला… माणसांना जसं जंगलाची कमतरता नाही तशी आपल्याला माणसांच्या गावाचीही कमतरता नाही बरं… अरे तु बघितंल नसशील पण आजही माणसांच्या मनात आपल्या बद्दल खूप खूप भीती आहे बरं… आता त्यांनी रात्री अपरात्री शिकारीसाठी जंगलाकडे येणं हळूहळू बंद केलयं पण आपण आता जंगल सोडून त्यांच्याच गावातच हल्ला करायला येत असतो.. करावं तसं भरावं असते रे… आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आम्हालाच सोडवायला लागणार नाही का… आता कशी नवी नवी युक्त्या काढून आम्हाला पकडून जेरबंद करायला धावू लागलेत… आम्ही असे तसे त्यांना सापडतोय होय वाट बघ… ते जाऊ दे… हे नंतरही तू जंगलात परत आलास की समजेलच.. या बोलण्यात आता जास्त वेळ नको घालवायला… हं तर तू मला मदत कर कुठल्या घरात माणसांची संख्या कमीत कमी आहे आणि डरपोक स्वभावाची आहेत. ती घरं ती माणसं मला दाखवशील.. मी मग दोन तीन दिवसाड येऊन एकेकाची शिकार करून घेऊन जाईन… या कामी तू मला मदत केल्याबद्दल आपले सिंह महाराज सैन्याचा सेनापती पद तुला बहाल करतील… आणि आपलं जंगल राज्य अधिक सुरक्षित राहील त्याचा विस्तार वाढत जाईल… हं मग श्वानमित्रा करतोस ना मदत मला.. म्हणजे माझं काम फारच सोयीचं होईल… चल चल बघू.. “

” हे पहा जंगलराज प्रधानजी महाशय तुम्ही आला तसे मुकाट्याने परत फिरा… तुम्हाला इथं माणसांची शिकार बिलकुल करता येणार नाही.. कारण मी इथला त्यांचा रखवालदार आहे… आमचा तुमच्या त्या जंगल राजशी सुतराम संबंध नाही.. आमच्या कैक पिढ्या इथं या माणसांच्या गावात राहून माणसाळाल्या आहेत.. आम्ही त्याचं मीठ खाल्लेल आहे.. तेव्हा इमानी पणाला जागणं हेच आमचं कर्तव्य ठरतं… सारं गावं माझ्यावर विश्वास ठेवून गाढ झोपेत असतं तेव्हा कोणी एक तस्कर किंवा तुमच्यासारखे जंगलातले हिंस्र प्राणी या गावात येण्याची हिंमत धरत नाहीत… आणि कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल मी असा तसा जंगली शिकारी कुत्र्या पैकी नसून जर्मन शेफर्ड कुत्र्याच्या वंशातला आहे… मलाही गावात वट आहे.. मी पहाऱ्याला असताना इथं वाकड्या मार्गाने येण्याची कुणाची माय अजून तरी व्यालेली नाही… तेव्हा मला वाटतं तुम्ही आता फारवेळ हिथं न घालवता ताबडतोब दुसऱ्या ठिकाणी निघून जावं हेच बरं.. यात तुमचेच हित आहे.. तेव्हा माझं ऐका… “

” अरे जर्मन शेफर्ड असलास तरी शेवटी तू एक य:कश्चित् श्वान आहेस.. आणि तुझ्या असल्या पोकळ धमकीला मला घाबरण्याचं काही एक कारण नाही… हे पहा तुला जर मला मदत करायची नसेल तर तु मुकाट्याने बाजूला हो.. मला माझ्या सावज टिपून शिकार करण्यास अटकाव करू नकोस.. आणि त्याहूनही जर तू माझ्या वाटेत अडथळा करणार असशीलच तर सगळ्यात आधी मला तुझीच शिकार करावी लागेल… एकदाचा तुझाच कायमचा बंदोबस्त केला म्हणजे माझा मला मार्ग निर्वेध होईल.. कसं.. त्या माणसांनी तुला पाळून तुझी खरी ओळख च विसरायला लावली आहे.. चारपायाचां पशू तू आणि दोन पायांच्या माणसांपुढे आपलं शेपुट हलवतं आपल्या एकनिष्ठेची टिमकी वाजवून दाखवतोस आणि ते ही का तर तुझ्या पुढे टाकलेल्या त्या चतकोर भाकर तुकड्या साठी.. का कशासाठी इतकी लाचारी… का तुझ्या अंगात धमक नाही का तुझ्या तंगड्यात चपळपणा नाही… स्वताची भुक स्वता भक्ष्य शोधून आणण्याची स्वावलंबी वृत्ती नाही.. परावलंबित्व स्विकारून इतकं भिंधेपण तुझ्या रोमारोमात भिनलयं पहा कसं.. आधी स्वताची नीट ओळख करून घे.. त्या मतलबी ढोंगी आणि दगाबाज माणसाच्या नादाला लागू नकोस.. माझं ऐक.. अरे शेवटी आपलं जंगल राज्य हेच सुखाचं आणि सुरक्षित असतयं बरं.. तेव्हा यावर मी शिकार करून येईपर्यंत गंभीरपणे विचार कर आणि मग आपण जंगलाकडे जाऊया… कसं… “

” नाही नाही ते कदापि शक्य होणार नाही.. आता आम्हा कुत्र्याचं जगणं हे जीना यहां मरना यहा इसके सिवा जाना कहा.. असं कायमस्वरूपी ठरलेलं आहे.. जिथलं मिठं खाल्लं तिथे एकनिष्ठ राहायचं हेच आमच्या वाडवडिलांच्या पासून शिकवण मिळाली आहे.. आणि घेतलेल्या वसा प्राणपणाने जतन करायचा.. मग भले त्यात आपल्या जीवनाची आहूती पडली तरी चालेल.. ते जीवन सार्थकी लागले म्हणून समजलं जाईल.. तेव्हा आपण इथं निष्कारण बडबड करण्यात वेळ न दवडता तुम्ही आलात तसे परत जा.. आणि या गावातली शांतता अढळ राहू द्या… “

” मी इतका वेळ तुला बऱ्याबोलानं समजावून सांगितलं तरी तुला आपल्या या प्रधानजीच ऐकायचं नाही ठरवलसं तर ठिक आहे आज तुझ्या शिकारी पासूनच शुभारंभ करतो… ” जबरदस्त ताकदीच्या वाघाने त्या जर्मन शेफर्ड कुत्र्याच्याअंगावर झेप घेतली दोघांनी झुंज देण्यास उलटं पालटं होत एकामेंकाच्या उरावर बसत हाताच्या पंजाने एकमेकाला ओरबाडत आणि तोंडाने मोठ मोठ्याने चित्कारत झटापट करत राहिले… त्यांच्या या गदारोळाने अख्खा गाव जागा झाला.. आ वासून जो तो समोरचं दृश्य पुतळ्या सारखा स्तब्ध होऊन बघत राहिला.. पण पुढे जाण्याची एकाचीही शामत नव्हती… त्या वाघाच्या आणि शेफर्ड कुत्र्याच्या झटापटीत शेफर्ड कुत्र्याने जीवाची बाजू लावून लढत दिली पण अखेर त्या वाघाच्या ताकदीपुढे त्याचा टिकाव लागला नाही.. त्याचे त्राण संपत आले तसे तो ढिला पडला… ते पाहताच वाघाने त्याला आता आपल्या कराल दाढेत धरून त्याचे तंगडे ओढत नेऊ लागला.. पण तिथं जमलेल्या माणसांची गजबज पाहून त्या वाघाने तिथून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.. शेफर्ड कुत्र्याच्ं तंगड तोंडात घट्ट धरून तो धावत सुटला… पण त्याच वेळी त्या शेफर्ड कुत्र्याच्या अंगात एक विज सळसळत गेली आणि त्यानं तेव्हढ्याच जोरजोराने आपल्या अंगाला असे काही हिसडे दिले कि त्या पळणाऱ्या वाघाला ने डरकाळी फोडताना त्या शेफर्डचं धरलेलं तंगड सोडून दिल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही.. तो तसाच आधी जंगलाकडे पळत सुटला… वाघ गेलेला पाहून सगळे गावकरी त्या शेफर्ड भोवती जमा झाले आणि मग जो तो त्याचं कोडकौतुक करू लागला… शेफर्ड च्या अंगावर काही जखमा झाल्या होत्या त्याच्या कडे त्याने लक्ष दिलं नाही.. त्याला ठाऊक होतं आता माझी काळजी घेणारी माझी माणसं ते सारं पाहतील असा विश्वास त्याला होताच… आज आपण स्वामीनिष्ठेला जपलो याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर झळकत राहिलं…

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? मनमंजुषेतून ?

मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “ 

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… ! 

तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !

गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.

गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.

गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.

त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.

मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!

दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.

दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !

मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.

गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.

हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.

रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!

दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!

© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares