वाचताना वेचलेले
☆ “आज अचानक गाठ पडे” – लेखिका : सुश्री प्राची पेंडसे ☆ प्रस्तुती – श्रीमती राधा पै ☆
आपल्या आयुष्यात सजीव भेटतातच. तशाच काही निर्जीव गोष्टीही अवचित, अचानक भेटतात. पण निर्जीव तरी कशा म्हणू? कारण अशा वस्तू कधी सुखावतात, अल्लद मोरपीस फिरवतात. काही रडवतात. काही तर आपल्या आठवणींचा अगदी आतला, आतला कप्पा उघडून देतात. पुनःप्रत्ययाचा आनंद देतात.
अशा अचानक, अवचित गाठ पडलेल्या अलक कथा…
- अण्णासाहेब सकाळचे फिरून आले. सूनबाई एप्रिलच्या कडकडीत उन्हात आमची परंपरागत सोन्याची जर असलेली पैठणी दांडीवर ऊन दाखवायला घालत होती.
अण्णासाहेब तिकडून जात असताना दांडीवरच्या पैठणीने त्यांच्या अंगाशी लडिवाळपणे घसट केली. “आलात फिरून, दमला असाल, ” पाठोपाठ बोलण्याचा भास.. गर्रकन अण्णासाहेब 65 वर्ष मागे गेले.. अंगापेक्षा बोंगा मोठा असूनही पैठणी सावरत असलेली कावेरी आठवली. क्षणभर त्या पैठणीला हळूवार कुरवाळत म्हणाले “आज अचानक गाठ पडे. “
सूनबाईच्या नजरेतून सासऱ्यांच्या डोळ्यांत आलेले पाणी सुटले नाही. तिचेही डोळे पाणावले.
2. दिवाळीची साफसफाई चालू होती. माळ्यावरचे सामान खाली आले होते. नको असेल ते सामान काढून टाकायचे, असे ऑडिट चालू होते. एवढ्यात चांदीची मूठ असलेली सामानातली काठी उचलून चार वर्षांचा नातू घोडा घोडा खेळायला लागला. शांताक्का ती काठी पाहून खूप मागे जाऊन पोचल्या. नातवाचे खेळून झाल्यावर ती काठी हातात धरून शांताक्का कितीतरी वेळ नुसत्याच बसून होत्या. कुठूनसा आवाज येत होता, “वापर तू आता, फिरायला जाताना असू दे आधाराला. “
काठीचे निमित्त.. पण एवढ्या वर्षांनी “आज अचानक गाठ पडे” असे वाटून मन भूतकाळात फिरून आले.
3. सव्वा महिन्याचा पणतू मजेत मुठी चोखत मऊशार दुपटयावर राजासारखा पहुडला होता..
मी मात्र….
आई खूप आजारी होती. शेवटचेच आजारपण. भेटायला गेले तेव्हा मला क्षीण आवाजात म्हणाली, “ताई, तुला काय देऊ ग? हातातल्या दोनच बांगडयांपैकी एक तू घेऊन जा,” असे म्हणून काढत होती.
“आई ग, बांगडी नको ग.. तुझी आठवण म्हणून तुझी एक मऊसूत नऊवारी साडी घेऊन जाते.. त्याची छानशी गोधडी शिवून रोज पांघरूण म्हणून वापरेन. तेवढीच तू कायम माझ्या अगदी जवळ असशील ना ग.”
आई गेली, पण होती माझ्या अगदी जवळच. गोधडी थोडी जीर्ण झाली तरी मी वापरत होते. एकदा लेकाने नवीन छान पांघरूण आणले आणि म्हणाला “आता हे वापर आई. ” त्याचे मन मला मोडवले नाही. पण अंथरुणाच्या तळाशी मी गोधडी ठेवून दिली होती. माझ्या आईची आठवण.
नातसुनेला मुलगा झाला. यांच्या माॅडर्न जमान्यात दुपटी शिवायला छान मऊसे काही सापडेनाच. मग मीच माझ्या आईच्या गोधडीची चार दुपटी शिवली..
आत्ता तो गुलाम तिच्यावरच पहुडला आहे.. जणू काही त्याची खापरपणजी त्याला अंगाई म्हणत जोजावत आहे..
मनोमन मी आणि आई बाळाजवळ बसलो होतो.. “आज अचानक गाठ पडे”.
4. मी सोळाच वर्षांची होते.
नुकतीच अकरावीची परीक्षा झाली होती आणि तेव्हाची फॅशन म्हणून आम्ही सगळ्या मैत्रीणींनी मिळून उंच टाचाच्या चपला खरेदी केल्या होत्या.. टाॅक टाॅक करत रुबाबात चालायचे स्वप्नरंजन होते तेव्हाचे.. दोनच महिन्यांत माझे लग्न ठरले(तेव्हाचा काळ). आम्ही दोघे उंचीने जवळपास सारखेच होतो. झाले! टाॅक टाॅक चालायचे स्वप्न पूर्ण झालेच नाही. उंच टाचांच्या चपला बासनात गुंडाळून ठेवल्या. परवाच नातीला त्या सापडल्या..
म्हणाली, “आज्जी तू का नाही वापरल्यास ग? आता घालत जा.”
दोन्ही पायांची कनी Replacement झाली होती. आणि आत्ता त्या टाॅक टाॅक अवचित समोर आल्या. “आज अचानक गाठ पडे”.
5. मोबाईल ची लांब रिंग वाजली. बंगलोरहून मावसभाऊ बोलत होता. लग्न होते त्याच्या लेकाचे. त्यासाठी त्याला आमच्या आईच्या पिढीतील एका नातेवाईकांचा पत्ता हवा होता. खूप जुने असल्यामुळे मोबाईल मध्ये त्यांचा काँटॅक्ट मिळणे अशक्यच होते. म्हणूनच त्याने मला फोन केला होता.. माझ्याजवळ माझ्या आईची डायरी होती. आणि मोबाईलच्या जमान्यातही मी ती वेळोवेळी अपडेट करत होते.
त्याला हवा होता तो पत्ता मी दिला आणि सहज म्हणून डायरी चाळत होते.
तेव्हा त्या डायरीतून टुपकन दोन जुनी पोस्टकार्डं माझ्या मांडीवर पडली.. माझ्या नमू आणि कुसुम मावशांनी लिहिलेली पत्र होती ती.. काय नव्हते त्या पत्रांमधे? अगदी वरच्या टोकापासून ते थेट पत्त्याच्या लाईनपर्यंत गिचमीड करून मजकूर ठासून भरलेला होता.. ती नुसती गिचमीड नव्हती. तर त्यात ओतप्रोत माया, प्रेम, काळजी भरून वाहात होती.. ओसंडत होती.
आजच्या मोबाईलच्या जमान्यातील इमोजी, खोटे खोटे वरपांगी मेसेजेस, वाढदिवसानिमित्त आणि मेल्या-गेल्यां बद्दल खोटी सहानुभूती.. या पत्रांच्या पार्श्वभूमीवर सगळेच कसे उघडे बोडके पडले होते..
जुना पत्ता शोधता शोधता मला माझ्या जिवाभावाच्या, माझ्यावर निखळ, निस्वार्थी प्रेम आणि माया करणाऱ्या मावशा भेटल्या.. कित्ती तरी वेळ आम्ही बोलत होतो.. “आज अचानक गाठ पडे.. आज अचानक गाठ पडे.”
लेखिका : श्रीमती प्राची पेंडसे
प्रस्तुती : श्रीमती राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈