मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? इंद्रधनुष्य ? 

☆ – स्वा. सावरकरांची दहशत ! — ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित  

(— कोणाला व किती वाटायची —)

दिल्लीचे पालम विमानतळ ! 

विमानप्रवास फार दुर्लभ वाटावा असा तो काळ ! विमानतळावर एक केंद्र सरकारचा टपाल खात्याचा मोठा अधिकारी आपल्या विमानाची वाट बघत होता. भोपाळ येथील टपाल विभागाचा तो मुख्य अधिकारी होता. 

त्याच्या शेजारीच एक माणूस येऊन बसला. हे वयोवृद्ध गृहस्थ होते. हा माणूस फार फार मोठा होता. इंग्लंडमधून रँग्लर ही पदवी त्याने गणितात मिळवली होती. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे ते प्राचार्य होते, भारताचे ऑस्ट्रेलियामधील आयुक्त होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठी ज्यांनी आयुष्य खर्चले त्या महर्षी धोंडो केशव कर्वे ह्यांचे भाऊ होते. त्यांची मुलगी ही कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात त्याकाळी काम करत होती.

ह्या माणसाने त्या अधिकाऱ्याला पाहिले आणि मराठीतून विचारले…

“तुम्ही श्री ***** ना ?”

त्या अधिकाऱ्याने सांगितले…”हो”.– ” पण मी आपणास ओळखले नाही !”

त्या प्राचार्यांनी सांगितले… ” तुम्ही जेव्हा ICS ची परीक्षा दिली तेव्हा मी तुमचा परीक्षक होतो इंग्लंडमध्ये “

क्षणार्धात ओळख पटली.

प्राचार्यांनी विचारले…  *”ICS च्या लेखी परीक्षेत तुम्ही पहिले आला होतात, दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी आणि तुम्ही ह्यात दीडशे गुणांचा फरक होता. आणि तरीही इंग्रज सरकारने तुम्हाला अनुत्तीर्ण घोषित केले होते. बरोबर ?”*

ते अधिकारी उत्तरले “हो.”

“कारण माहीत आहे?”, प्राचार्यांनी विचारले.

“नाही” .. ते अधिकारी उत्तरले.

“जाणून घ्यायचंय ?” .. प्राचार्य.

“हो”, .. अधिकारी.

“सांगतो…”, प्राचार्य.

त्या प्राचार्यांनी दिलेले उत्तर पुढीलप्रमाणे —–

ह्या अधिकाऱ्याने ICS चा अर्ज भरतांना आपल्या गावाचे नाव दिले होते “रत्नागिरी” ! रत्नागिरी हे नाव वाचताच ब्रिटिशांनी आपल्या भारतातल्या गुप्तचर खात्याला तपासणी करण्याचा आदेश दिला .

त्या तपासात असे आढळून आले की हा अधिकारी माणूस, शाळकरी असतांना, वीर सावरकरांच्या सम्पर्कात आला होता. सावरकर तेव्हा दररोज संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना गोष्टी सांगत असत. तेव्हा हा मुलगा त्या गोष्टी ऐकण्यासाठी सावरकरांच्या घरी जात असे.—-  “आणि म्हणून लेखी परीक्षेत अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही आम्ही तुम्हाला नागरी सेवा परीक्षेसाठी अनुत्तीर्ण घोषित करून तुम्हाला भारतीय टपाल सेवेत प्रवेश दिला…. ह्या परीक्षेत मी तुमचा एक परीक्षक असल्याने मला सर्व माहीत आहे.”

—सावरकरांशी कोणत्याही प्रकारे संबंध आलेला माणूस ब्रिटिशांना आपल्या नागरी सेवेत नको होता.

जी सावरकरांची परीक्षा ब्रिटिश सरकार करू शकले, ती भारतीय सरकार मात्र कधीच करू शकले नाहीत.

— हे प्राचार्य होते रँग्लर रघुनाथराव परांजपे …

— आणि हा विद्यार्थी होता श्रीराम भि.वेलणकर ! संस्कृत भाषेचे तज्ञ ! —- *आपली, भारताची पोस्टाची पिनकोड पद्धती ज्यांनी शोधून काढली ते….*

संग्राहक – सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं… 😎☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.

२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.

३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.

४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.

५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.

६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.

७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने same शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही. उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात.

थोडक्यात काय तर  ……

पुरुष हे बटाटयाप्रमाणे असतात — कोणत्याही भाजीबरोबर एडजेस्ट होतात. 

बटाटे कुठले !!!!!!

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर ☆

? विविधा ?

☆ पिंपळ एकटा उभा… ☆ श्री सुनील यावलीकर 

पिंपळ एकटा उभा

आप्पाजी गेले तेव्हा मी आठ नऊ वर्षांचा असेल ..त्यांच्या जाण्याच्या स्मृती अजूनही कायम आहेत. त्यांनी मातीच्या मोठ्या भांड्यात लावलेला पिंपळ त्यांच्याशिवाय पोरका उभा होता. दर दिवशी मध्यान्ही ते त्याची तांब्याच्या छोट्या गडूतून बुडाशी पाणी ओतून पूजा करायचे.आप्पाजी गेल्यानंतर त्याला पोरकेपणाचे चटके बसायला लागले. त्याचा पुरुष भरा पेक्षाही उंच असलेला देह मलूलपणे उभा होता. मातीच्या भांड्यातील माती सुकत चालली होती. शेवटी वडिलांनी त्याला घराबाहेर लावायचे ठरवले. घराच्या मागच्या भागात असलेल्या मारुतीच्या देवळा समोर लावावे असे मी सुचवले. देवळाच्या बाजूला विहीर होती विहिरीच्या खालच्या बाजूला थोड्या अंतरावर दोन तीन हात खोल खड्डा खणला. मातीच्या भांड्यासह पिंपळाचे झाड उचलून त्या खड्ड्याजवळ आणले. भोवतालचे मातीचे भांडे फोडताच मातीत एकजीव झालेली एकमेकांना घट्ट धरून गुंतून असणारी त्याची मुळे मोकळी झाली. त्याला तसेच त्या खड्ड्यात सोडले आणि स्थानांतर होऊन एका जागी तो स्थिर झाला .

खड्ड्यात अजून थोडी माती ढकलली. त्याच्या खोडाभोवती वर्तुळाकृती छोटी नाली खोदली. विहिरीवर बाया सकाळ-संध्याकाळ पाणी भरायच्या. विहिरी भोवती पाणी सांडायचे .

विहिरीच्या उतारावरून एक छोटी नाली काढून पिंपळाच्या आळाशी जोडली. विहिरीच्या काठावर सांडलं उबडलं पाणी नालीतून थेट पिंपळाच्या आळ्यात पोहोचायचं.  पिंपळाचे खोड हाताच्या मुठीत मावेल एवढे होते. त्याला गाय-बैल या कोणत्याही प्राण्याने अंग घासले तर मोडून जाईल या चिंतेनं त्याच्याभोवती बोराटीच्या काट्यांचे कुंपण केले. आता जोमाने वाढेल. आपल्यासोबत त्याची वाढही अनुभवता येईल…

 त्याची वाढ अनुभवताना आपल्या बालवयाची किती वर्षे उलटून गेली कळलंच नाही.

आता त्याचे खोड दोन्ही हातांच्या पंजात मावण्यापेक्षाही मोठे झाले होते .त्याने आपली जागा कोणत्याही संरक्षणाशिवाय पक्की केली होती. काट्यांच्या बाह्य कुंपणाची गरजच नव्हती .

या आठ वर्षात विहिरही खोल  गेली होती. आटत चालली होती .तिथे पाणी भरणाऱ्या बाया हातपंपा कडे वळल्या होत्या …त्याची मुळे खोलखोल गेली होती. आता त्याला बाहेरून मिळणाऱ्या पाण्याची गरज नव्हती. तो खऱ्या अर्थाने स्वावलंबी झाला होता. त्यामुळे मीही निश्चिंत झालो होतो. तो सर्वांगानं फुलत होता .त्याच्या या फुलत्या वयात आपलेही फुलते वय मिसळत होते. त्याच्या उमलत्या तांबूस कोवळ्या पानांची लव वात्सल्य जाणीव फुलवत होती. कालांतराने पाने पोपटी होत गडद हिरवी होऊन सळसळत होती .त्या सळसळण्यातून आपण कितीदा मावळणारा चंद्र अनुभवला,कितीदा सूर्यास्त  अनुभवला..त्याच्यापाठीमागे उमटलेले

 सूर्यास्ताची फिके केशरी रंग गडद होई पर्यंत त्याचे सळसळणे अनुभवलेले.. बाल रंगात रंगविलेल्या चित्रांच्या जीर्ण कागदी स्मृतींच्या रंगछटा अजूनही जपून ठेवल्या आहेत.. आपण त्याच्यासोबत एकांत घालवलेले कितीतरी क्षण अंतर्मनाच्या तळ कप्प्यात साठवून ठेवले आहेत…..

…शेती माती जगवण्यास असमर्थ ठरली.. त्यामुळे पोटापाण्यासाठी गाव सोडावे लागले ..

दररोजची त्याची भेट दोन तीन महिन्यांवर गेली. गावाला आलो की त्याला भेटल्याशिवाय आपली भेटच पूर्ण व्हायची नाही.  घरासमोरच बाभूळबन, वाहणारी  रायघोळ माय आणि आपला पिंपळ हेच खऱ्या अर्थाने आपलं जैव कुटुंब होतं बालपणात .त्यांची उराउरी भेट झाल्याशिवाय समाधान होत नव्हतं .त्यांच्या भेटीचा गंध उरात भरून पुढचे दोन-तीन महिने काढता यायचे .

पुढे पुढे बाभूळबन ,नदी यांच्या भेटीत त्रयस्थता जाणवायला लागली ..

त्यांच्या देहबोलीत एक प्रकारची उदासीनता दिसायला लागली ..

ते पहिल्यासारखं मन उघडे करून वागत नव्हते. घर ही आपले खांदे पाडून बसलं होतं. त्याला कितीही डागडुजी केली तरी पहिल्यासारखं खुलत नव्हतं. पिंपळाचे मात्र तसे नव्हते, तो नव्या झळाळीने सळाळत होता. त्याची सळसळती  भेट आपलं बालवय जागवून तीच सळसळ निर्माण करीत होती. आता त्याच्या खोडाने हाताच्या मिठी इतका आकार धारण केला होता. एका हाताच्या मुठीत मावणारा त्याचा आकार आणि आताचा ही त्याची वाढ स्तिमित करणारी होती .आपण त्याला घट्ट मिठी मारून कितीतरी वेळ बिलगलेलो.. त्याच्या खोडावर डोकं टेकवून त्याची सळसळ अनुभवलेली. पश्चिमेचे क्षितीज तेच आणि मावळणारा चंद्रही तोच .बाकी सर्व बदलत गेले. पिंपळ ,क्षितिज आणि चंद्र मात्र आपल्या अवस्थेत कायम असलेले .काहीही न बोलता त्याचा माझा संवाद सुरू व्हायचा …

……..गावावरून कोणी आलं की,आपली पिंपळाची चौकशी ठरलेली…

 नेहमीप्रमाणे भावाकडे पिंपळा बद्दल बोलायला लागलो.. तेव्हा तो काही वेळ स्तब्ध राहिला. तो काहीच बोलत नाही हे पाहून त्याला पुन्हा विचारलं, त्यांनं जे सांगितलं ते ऐकून खूपच हादरलो ..शक्तिपात झाल्यासारखं वाटायला लागलं. पिंपळा शेजारी राहणाऱ्याने पिंपळाला मुळापासून तोडले होते. बालपणापासूनचा माझा जीवसखा एका मूर्ख माणसाच्या क्रूर कुर्‍हाडीचे घाव झेलून उन्मळला होता …..

आता गावात कसे जावे.. असे किती दिवस सुन्न गेले आपले ..

मोठा धीर धरून आपण गावात गेलेलो… घरा मागचे दार उघडून  पिंपळाच्या जागेकडे पाहिले .बुडापाशी बुंध्याची  निर्जीव खूण शिल्लक फक्त.. दार बंद केले डोळे डबडबले ..

 

त्याने पिंपळावर नाही घाव घातला.. आपल्या बालपणावर घातला….

ही तीव्र भळभळती जाणीव ओघळायला लागली..

आता गावात काय उरले..

बाभुळबनाची अनोळखी तिसरी पिढी  म्हातारपण भोगत उभी आहे ,ती आपल्याला ओळखत नाही. वाहणार्‍या रायघोळ नदीमायचे  रूप स्मृतिभ्रंश झालेल्या म्हातारी सारखे झालेले आहे ..

भावकीत घर ही हरवलं . गावात आता आपल्यासाठी उरलंच काय ही जाणीव देह मनाला कुरतडत राहते.

 

© श्री सुनील यावलीकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

? मनमंजुषेतून ?

☆  पालवी… ☆ श्री संजय आवटे ☆

वसंताचा सांगावा घेऊन येणा-या चैत्राच्या पालवीचा धर्म कोणता? रणरणत्या वणव्यात बहरणा-या झाडांचा धर्म कोणता? ‘उन्हाच्या कटाविरुद्ध’ त्वेषाने फुलून येणा-या गुलमोहराचा धर्म कोणता?  

तरीही नववर्षाला धर्माशी जोडणारे जोडोत बापडे, आपला धर्म मात्र पालवीचा. आपला धर्म बहरण्याचा. आपला धर्म फुलून येण्याचा. हा धर्म ज्याला कळतो, त्यालाच झाडांची हिरवाई खुणावते, त्यालाच निळं आकाश समजतं. आणि, 

“चंद्रोदय नव्हता झाला, आकाश केशरी होते”, हा केशरी रंगही त्यालाच मोह घालतो ! 

परवा असंच तळेगावला जायचं होतं. ड्रायव्हर म्हणाला, ” सर, मामुर्डीचं जे चर्च आहे ना, तिथून पुढं गेलं की बुद्ध विहार आहे. तिथून सरळ पुढं जाऊ. तसे आलो, तर आयोजकांचा फोन आला- तळेगाव स्टेशनच्या जैन मंदिराकडं या. मग आपण पुढं जाऊ. आयोजक तिथं भेटले. गेलो, तर प्रत्यक्ष कार्यक्रम गणपती मंदिरात. तिथं शेजारीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा टुमदार बंगला. बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याचा त्यांचा विचार इथंच अंतिम झाला, असं म्हणतात. अवघ्या दहा किलोमीटरच्या प्रवासात कुठं कुठं जाऊन आलो!  

हा भारत आहे. 

उद्यापासून रमजान सुरू होईल. 

पुण्याजवळच्या खेड शिवापूरला दर्गा आहे. हजरत कमर अली दुर्वेश रह दर्गा. रमजान आला की या गावातले सगळे कोंडे-देशमुख रोझे ठेवतात. एवढेच नाही, रमजानमध्ये, तिथल्या उरूसात देशमुखांचा मान असतो.

अशी कैक उदाहरणं देता येतील. 

भारताची ही गंमत आहे. 

हिंदुत्वाचं राजकारण करून थकलेल्या नेत्याला अखेर जावेद अख्तरांचा आदर्श जाहीरपणे सांगून नववर्ष साजरं करावं लागतं, ही खरी मजा आहे. जावेद यांनी पाकिस्तानात जाऊन बरंच सुनावलं, हे भारी आहेच. पण, भारतात राहून ते रोज काही सुनावत असतात. तेही ऐकावं लागेल मग ! कारण काहीही असो, पण हिंदू मतपेटीचं राजकारण करणा-यांना जावेद अख्तर सांगायला लागणं, असा ‘क्लायमॅक्स’ सलीम-जावेद जोडीला सुद्धा कधी सुचला नसता. 

पण, तीच भारताची पटकथा आहे ! 

साळुंब्र्याच्या प्राथमिक शाळेपर्यंत चालत चालत आलो. तर, पोरं ‘ खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे ‘, ही साने गुरूजींची प्रार्थना म्हणत होती. 

वाटलं, हे वेगळं सांगण्याची गरजही भासू नये, इतकं भिनलेलं आहे ते आपल्या मनामनात. इतकं नैसर्गिक आहे हे. अर्थात, उगाच नाही उगवलेलं हे. त्यासाठी मशागत केलीय आमच्या देहूच्या तुकारामानं. आळंदीच्या ज्ञानेश्वरानं. कबीरानं. त्याहीपूर्वी बुद्धानं. म्हणून तो वारसा सांगत आज ही पोरं प्रेमाचा धर्म सांगू शकताहेत. 

या प्रेमाच्या धर्मावर आक्रमण करणारे मूठभर प्रत्येक काळात असतात. त्यांचा विजय झाला, असं काही काळ वाटतंही. पण, युद्ध संपतं. बुद्ध मात्र उरतो. मंबाजी संपतो, तुकोबा उरतो. शेणगोळे विरतात, सावित्री-ज्योतिबा उरतात. 

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। 

भेदाभेद-भ्रम अमंगळ॥ 

हाच धर्म अखेरीस जगज्जेता ठरतो. 

आपण चालत राहायला हवं, या पोपटी पालवीकडं पाहात. जोवर ही पालवी येते आहे, तोवर निसर्गानं आशा अद्याप सोडलेली नाही, हे नक्की आहे ! 

तुम्ही का सोडता? 

© श्री संजय आवटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

? इंद्रधनुष्य ?

☆ सत्राणे उड्डाणे… ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆ 

समर्थ रामदासजींनी दासबोध, आत्माराम, मनोबोध इत्यादी ग्रंथ रचले आहेत, तसेच शेकडो ‘अभंग’ही लिहिलेले आहेत. यासोबतच समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ९० पेक्षा अधिक आरत्या महाराष्ट्रातील घरा- घरात म्हटल्या जातात.

समर्थांचा गायनीकलेचा अभ्यास होता. ‘धन्य ते गायनी कला’ असे म्हणून समर्थांनी गायनीकलेचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांच्या रचनेत लयीचा गोडवा अनुभवता येतो. पारमार्थिक विचार असो, आत्मनिष्ठ, अभ्यासपूर्ण चिंतन असो, ते लयीत मांडण्याची खुबी रामदास स्वामींजवळ आहे. याचा प्रत्यय त्यांनी रचलेल्या आरत्यांतून घेता येतो. 

गणपती उत्सवात रामदासांनी रचलेल्या आरत्या म्हटल्या जातात. त्या आबालवृद्धांच्या तोंडी सहजपणे येतात. त्या आरत्यांची लोकप्रियताही वर्षानुवर्षे टिकून राहिली आहे. याला कारण म्हणजे त्या आरत्यांतील गेयता, चपखल शब्दरचना, लयबद्धता, शब्दांचे माधुर्य, आघात, भाषेतील ठसका..!

वीररसाने युक्त अश्या हनुमंताची ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ ही आरती समर्थ रामदासस्वामी यांनी रचलेली असल्याने तिच्यामध्ये मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे. ‘सनातन’चा भाव असलेल्या, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. 

आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल.

हनुमंताच्या ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी’ या आरतीतील शब्दरचना मारुतीची प्रचंड शक्ती, अद्भुत कार्य नजरेसमोर उभे करतात. त्यातील शब्द हृदयावर आघात करीत आपले बल वाढवतात. समर्थ भाषाप्रभू होते. गेयता, लय, उचित शब्दयोजना त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहतात.

हनुमंताचे कार्य जेवढे अफाट, तेवढेच त्याचे कार्य शब्दबद्ध करणारे समर्थ रामदास स्वामी यांचे शब्दही अफाट. म्हणूनच हनुमंताची आरती म्हणताना अनेकदा बोबडी वळते आणि नुसते जयदेव जयदेव म्हणत आरती पूर्ण केली जाते. परंतू , या आरतीतील अवघ्या दोन कडव्यांचा भावार्थ नीट समजून घेतला, तर ती पाठ होणे अवघड नाही.  

समर्थ रामदास रचित, म्हणायला अवघड परंतू आशयघन अशी हनुमंताची आरती आणि भावार्थ —- 

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।

कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं । सुरवर, नर, निशाचर, त्या झाल्या पळणी ।। १ ।।

(आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ समजून घेऊ या. ‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.)

भावार्थ :-समर्थ रामदास वर्णन करतात- मारुती स्वत:च्या सामर्थ्यानिशी लोकांचे रक्षण करण्यासाठी झेप घेत असताना त्याच्या तोंडातून हुंकार बाहेर पडला. त्यामुळे संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली. सागराच्या पाण्यावर उत्तुंग लाटा उसळल्या आणि त्या आकाशापर्यंत पोचून तिथेही खळबळ माजली. संपूर्ण ब्रह्मांड थरथरू लागले आणि तीनही लोकांमध्ये भीती उत्पन्न झाली. पंचमहाभूतांमध्ये खळबळ उडाली. देव, मानव, राक्षस या सर्वांना पळता भुई थोडी झाली. ।।१।।

जयदेव जयदेव जय श्रीहनुमंता, 

तुमचेनि प्रसादे न भिये कृतांता।। धृ।।

(कठीण शब्दांचा अर्थ:- ‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.)

भावार्थ :- अशा भीमकाय हनुमंता तुझा जयजयकार असो. तुझी कृपा असली, की कोणीही यमाला सुद्धा घाबरणार नाही. ।।धृ।।

 दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द । धगधगिला धरणीधर मानिला खेद ।

कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद । रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।

(कठीण शब्दांचा अर्थ –  ‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला. ‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक. ‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.)

भावार्थ :– सप्त पाताळांमध्ये प्रचंड आवाज झाला. त्याचा प्रतिध्वनी इथे भूमीवर पोहोचला. त्याचा त्रास होऊन पर्वताचा सुद्धा थरकाप झाला. पर्वत कोलमडू लागले आणि सर्व प्राणीमात्रांवर मोठी आपत्ती आली. पक्ष्यांचा विनाशकाळ आला की काय अशी स्थिती उत्पन्न झाली. तुझ्याठायी असलेल्या अफाट शक्तीचे सर्व चराचराला आकलन झाले. परंतू, या शक्तीचा तू गैरवापर केला नाहीस हे महत्त्वाचे ! ती सर्व शक्ती रामचरणी अर्पण केलीस आणि रामकार्यार्थ वापरलीस, यातच तुझ्या भक्ती आणि शक्तीचा गौरव आहे. 

— ‘दुमदुमले पाताळ’ किंवा ‘थरथरला धरणीधर’, ‘कडकडिले पर्वत’ या शब्दांतून वीररसाचा आविर्भाव होतो. हा वीरमारुती होय.

— ‘अशा पद्धतीने आपणासही भावपूर्ण आरती म्हणता येवो अन् भावजागृतीचा आनंद मिळो’, अशी श्रीरामचरणी प्रार्थना.

संग्राहक : श्री अनंत केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “एक वेगळं ज्ञान” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “एक वेगळं ज्ञान ” ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

कामानिमित्त लोहाराकडे गेलो असता,

काम झालं, आणि त्याला सहज विचारलं की 

“बाबा, ऐरण व हातोडी ही तुमची साधने ! तर किती वर्ष झाली हातोडी व ऐरणीला?”

*

लोहार म्हणाला, “हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण कायम टिकून आहे”

मी विचारलं, “असं का ?”

त्यावर लोहाराने जे उत्तर दिले ते जणू मला जगण्याचा अर्थच सांगून गेले. 

लोहार म्हणाला—  

“जे घाव घालतात ते त्यांच्या कर्मामुळे तुटतात, पण जे घाव सहन करतात ते कायम अभंग राहतात !”

*

मनोमन त्याला राम राम करून निघालो — 

— एक वेगळं ज्ञान घेऊन !

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ वाचणाऱ्या मना .. जरा थांब ना… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ 

तुमच्याबाबतीत असं कधी घडलं आहे का, की आपण आवर्जून एखादं पुस्तक वाचायला घेतो. बसल्या बैठकीत वाचून काढायचं असं पण मनाशी ठरवतो. उत्साहात १००-१५० पानंसुद्धा वाचून झालेली असतात. मध्येच काही कारणाने खंड पडतो आणि तेवढ्यातच दुसरं एखादं नवीन आपणच मागवलेलं पुस्तक आपल्या पुढ्यात येतं. झालं! आता नवीन पुस्तकानं आपलं मन वेधलेलं असतं. त्यात काय असेल ते वाचण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नसते. मन अगदी उतावीळ होतं‌. मन काय आपल्या प्रत्येक गोष्टीचं समर्थन करायला तयारच असतं. लगेच बहाणा शोधतं.‌ आता या पुस्तकात इतकं वाचून झालंय तर थोडा ब्रेक घेऊया म्हणजे पुढचं वाचताना नवं काही सापडेल का ते पाहता येईल, त्याच्यावर चिंतन करता येईल. आणि मग परिचय लिहिताना आपल्याला काही अवांतर मुद्दे सुचतील. सतत एकाच विचारानंं सगळं वाचण्यानं, वाचताना पण मोनोटोनस झाल्यासारखं वाटतं. तसं न वाटता प्रत्येक पान फ्रेश विचारातून वाचलं गेलं पाहिजे. म्हणजे मग पुस्तक आपल्याला खऱ्या अर्थाने उमगेल वगैरे वगैरे. 

असा विचार करून पुढ्यात आलेलं नवं पुस्तक थोडं वाचूया म्हणून ते उत्साहाने हातात घेतलं जातं. पाहता पाहता आपण त्याच्यामध्ये रमून जातो. त्याचीही शंभर एक पानं होतात. आपण ठरवलेलं टार्गेट बऱ्यापैकी पूर्ण करत आलेलो असतो पण ते ठरवलेल्या पुस्तकाबाबत नव्हे. कालांतराने दोन्ही पुस्तकं सारखीच प्रिय होतात आणि मग कुठलं पूर्ण करावं यावर मनात द्वंद्व सुरू होतं. 

पहिल्या पुस्तकातल्या एखाद्या पात्रानं मनावर पकड घेतलेली असते आणि त्याचवेळी दुसऱ्या पुस्तकातल्याही एखाद्या पात्रानं मनावर पकड घ्यायला सुरुवात केलेली असते. आता मनाच्या आणि पात्रांच्या आपसातल्या युद्धात कुठलं पुस्तक विजयी ठरणार हे आपल्याला समजत नसतं. अशावेळी नाईलाजानं जास्त ताण घेऊयात नको म्हणून दोन्हीही पुस्तक बाजूला ठेवली जातात. आणि या आधीच वाचून काढलेलं ज्याच्यावर चिंतन, मनन वगैरे सगळं करून झालं आहे असं तिसरंच पुस्तक आपण हाती घेतो. 

पण आता हे तिसरं पुस्तक वाचताना आपलं मन त्याच्यात अजिबात गुंतलेलं नसतं. आधीच्या दोन्ही पुस्तकांतली आपल्याला आवडलेली दोन्ही पात्रं या तिसऱ्याच पुस्तकात मध्येच डोकावत असतात आणि आपली स्वतःची वेगळीच गोष्ट घुसडण्याचा प्रयत्न करतात. हे लक्षात आल्यावर आपण ते तिसरं पुस्तक निमूटपणे बाजूला ठेवतो. 

या सगळ्या गडबडीत दिवस संपून जातो. खरी मजा  झोपताना येते. आपल्या दोन्ही अर्धवट राहिलेल्या पुस्तकांची कथा आता सतावत असते. एखाद्या पात्राचा उत्कंठावर्धक प्रवास तर दुसऱ्या पात्राचा गुढ प्रवास उलगडायचा राहिलेला असतो. एखाद्याचा तरी प्रवास पुढे नेऊयात म्हणून आपण अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी ते पुस्तक दामटून वाचायला घेतो. वाचता वाचता दोन्ही पुस्तकातली पात्रं वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये घुसून आपली तिसरीच गोष्ट निर्माण करतात. 

‘टार्गेट असद शाह’ आणि ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या दोन पुस्तकांतील पात्रं एकमेकांच्या दुनियेत शिरली आणि त्यांनी प्रचंड धमाल केली. टार्गेट असद शाह मधल्या कबीरनं ‘मायसेलियम’ म्हणजे झाडांच्या बुरशीच्या जाळ्याच्या सहाय्यानं इंटरनेटवरून गम्बोला अरबाज़च्या ठिकाणाविषयी माहिती दिली. आणि त्याला पाइनच्या जंगलात पकडलं. अरबाज़ जंगलात आला तेव्हा जंगलातल्या सर्व वृक्षांनी एक विषारी वायू जंगलात सोडला आणि त्यामुळे तिथे लपलेल्या कवचकुंडलच्या आर्मी ऑफिसर्सना त्याचा पत्ता लागला. असं बऱ्यापैकी भन्नाट कथानक तयार झाल्यावर आपण गुंगीत असलो तरी नंतर लक्षात येतं आपण काहीतरी भलतंच वाचतोय आपल्याला जे वाचायचंय ते हे नाही. अजून एक दोनदा प्रयत्न केला जातो पण तसंच घडायला लागल्यावर मग निमुटपणे हातातलं पुस्तक बाजूला ठेवून दिलं जातं आणि आपण झोपेच्या स्वाधीन होतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी आपल्या टेबलवर पडलेली ती दोन पुस्तकं आपलं टार्गेट पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याकडे अतिशय आशेने पाहत असतात आणि त्यावेळी पुन्हा मनात आज यापैकी कुठलं निवडावं याचं द्वंद्व सुरू होतं.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ || अखेर भीती संपली ||… लेखक : अस्मिता (वार्ताहर) ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

|| एकदा आपल्या मुलींना यांच्या जागेवर ठेऊन पाहूयात???…..अखेर भीती संपली ||

आज दादर प्लॅटफॉर्म बाहेर तिकीट काउंटर येथे सहा शिकणाऱ्या मुली जमिनीवर अंथरलेल्या एका बॅनरवर बसलेल्या, त्रस्त असलेल्या, चिंतीत व भयभीत अवस्थेत दिसल्या.. 

मुंबईत हे दृश्य सायंकाळच्या 7.30 ते 8.00 च्या वेळेचे होते… या मुली बाहेर जमिनीवर अश्या का बसल्या आहेत ? विचारणा केली असता किती वाईट व्यवस्था व भीतीदायक परिस्थिती आहे हे कळाले…. 

आपल्या गांव खेड्यातून येणाऱ्या एकट्या मुलींसाठी ही किती गांभीर्याची बाब आहे …… ( सदिच्छा मनीष साने, ही MBBS शिकणारी तरुणी प्रीलियम परीक्षा देण्यासाठी मुंबईत गेली असता एकाएकी बेपत्ता होते आणि मग तिचा खून या घडलेल्या घटनेनेही आपण सावध अजूनही नाही कसे????) …हे मुंबईत घडत असताना आपण इतके निष्काळजी कसे ?????…..

अश्या अनेक मेहनती मुली आपल्या कुटुंबीयांचे आधार असतात….मुंबईत एकट्या येतात परीक्षा देतात आपल भवितव्य घडविण्यासाठी….

नाशिक जिल्ह्यातून अश्याच या सहा मुली मुंबईत नायगांव येथे पोलिस भरती परीक्षेला आलेल्या आहेत, आपल्या आई वडिलांच्या, आपल्या शेतकऱ्यांच्या घरी वाट बघत असलेल्या  या लाडक्या मुली दुर्दैवाने त्यांना पोलिस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी नायगांव येथे राहण्याची जागा अचानक नाकारण्यात येते, जागा तुडुंब भरलेली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात येते…. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नाही… या बिचाऱ्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत पण कोणीच कसलीच मदत करत नाहीत … आम्ही रात्र काढायची कुठे??? याचे कोणी उत्तर देत नाही…. खरंच शरमेची गोष्ट आहे….

या सहा मुली रात्री कुठे जातील?? कुठे राहतील?? काय खातील?? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांची सुरक्षा बाहेर अंधारात कोण करतील???? किंवा रस्त्याकडील फूटपाथ वर या मुलींचे संरक्षणाचे काय???….  हा विचार कोणालाही पडला नाही ???? मग काही अनर्थ घडले की मेणबत्ती घेऊन आपण सगळे काही वेळ मैदानात….मग आपआपल्या घरी…. ही दयनीय व्यवस्थेची अवस्था पाहून भीतीदायक वाटले आणि या सहा मुलींची चिंता वाटू लागली आणि वाईटही…

आपल्या शेतकऱ्यांची ही मुले गावा खेड्यातून पोलिस भरतीसाठी प्रचंड मेहेनत घेऊन मुंबईत येत, या मुली आपल्या कुटुंबीयांचा आधार असत आणि पोलिस परीक्षेला मुंबईत आल्यावर या मुलींनाच आपल्या सुरक्षेची भीती वाटणारे घडत…. सायंकाळच्या वेळेस नायगांव पोलिस भरती ग्राउंड वर राहण्याची सोय नाकारण्यात येत…. मग नंतर कोणीतरी 5000 रुपये मागत गेस्ट रूम चे…. 

कुठून देणार या शेतकऱ्यांच्या मुली इतके पैसे एका रूम चे???म्हणून या मुली एकत्र पुन्हा दादर स्टेशन परिसरात आल्या…व तेथे बसल्या….व प्रत्येक मुलगी चिंतेत होती रात्री काय होईल आपले ????कसे होईल ???

दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबल ला विचारले असता त्यांनी ही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्म वर असलेल्या विश्रामगृहात 2 तासांच्या वर राहता येणार नाही असे ते म्हणाले..मग दोन तासांनी या 6 मुली रात्री कुठे जाणार????…. 

या सहा मुली जेथे बसलेल्या होत्या तेथे गर्दुल्ले, पाकीट मार सतत फिरतात हे ही पोलिस कॉन्स्टेबल यांनी सांगितले म्हणाले रात्रीचे इन्चार्ज या मुलींना बसू देणार नाहीत मी आहे तोवर इथे बाहेर बसा पण सामानाची काळजी घ्या….मी इथेच आहे काही वेळ….

रात्रीच्या भीतीच्या विचारात असताना मी या सहा मुलींना पाहिले व ही सगळी बाब ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला व त्यांचा फोन व्यस्त असल्याने लगेचच वर्षा बंगल्यावर फोन केला, तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं एकताच ताबडतोब स्टेशन मास्टर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधला व त्या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्याची व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रुममध्ये तत्काळ व्यवस्था केली …. 

सकाळी 5.00 वाजता ग्राउंड वर धावण्याची, अंग कासरतीची परीक्षा म्हणजे आदल्या दिवशी पुरेस जेवणं आणि पुरेशी झोप…या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव हे कर्तव्यात खरे उतरले…. 

या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे वा रेल्वे स्टाफ यांचे मनःपुर्वक आभार मानले…CM एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहे असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे….

रात्रीची भीती ?…अखेर संपली….

पण जर पूर्णतः संपल्यास बरे होईल अशी ग्वाही या मुलींच्या कुटुंबीयांनी दिली आहे….या परिस्थतीचा विचार करून प्रशासनाने काळजी घेत योग्य तो निर्णय घेऊन GR काढला तर बाहेरगावाहून येणाऱ्या या आपल्या मुली मुंबईतही पूर्ण: सुरक्षित राहतील ……

जरा आपण सगळ्यांनी काही क्षणासाठी आपल्या मुलींना या मुलींच्या जागेवर ठेऊन पाहूयात ???? किती भीतीदायक आहे असे घडणे.  

लेखक : अस्मिता (वार्ताहर)

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शब्द… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ शब्द… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

श्री संत तुकाराम महाराज म्हणतात,

‘आम्हां घरी धन, शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।

शब्दची आमुच्या जीवीचे जीवन। शब्दे वाटू धन, जनलोक।।

तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव। शब्दाची गौरव पूजा।।

किंवा एके ठिकाणी ते असेही म्हणतात•••

घासावा शब्द | तासावा शब्द |

तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी ||

शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा

बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान, कर्म, भक्ती |

स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |

शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

– संत तुकाराम महाराज

तशी शब्दांची महती ही शब्दातीत आहे.  पण मला याठिकाणी शब्दाची  एक व्याख्या सांगावीशी वाटते, दोन किंवा अधिक अक्षरे जोडल्याने त्या अक्षरांना मिळालेला अर्थ म्हणजे शब्द.

मग शब्दाचा हा अर्थ असला तरी या शब्दाचा अर्थ त्याला क्रियापद जोडल्याने बदलतो. यासाठी एक प्रसंग  वर्णन करते.

कॉलेजातील ते दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे आणि केव्हा पडले हे त्यांनाच कळले नाही . लग्नाचा विषय येताच तो म्हणाला मी तुला शब्द देतो   की मी माझ्या पायावर व्यवस्थित उभा राहिलो की तुझ्याशीच लग्न करेन. ती म्हटली मी हा शब्द घेते पण तू तुझा शब्द नक्की पाळशील ना?

तो म्हणाला मी आमच्या अण्णांचा शब्द मानतो. त्यांच्या शब्दाला फार किंमत असते. गावातही त्याच्या शब्दाचे वजन पडते त्यामुळे त्यांनी हो म्हटले की लगेच मी शब्द प्रमाण मानून तुझ्याकडे येणारच .

ती म्हणाली ए तू उगाच शब्दात अडकवू नकोस हां !! नंतर म्हणशील मी शब्द टाकला पण त्यांनी नाही माझा शब्द झेलला त्यामुळे माझा शब्द चालला नाही. असा तुझा शब्दाघात मी सहन नाही करू शकणार. तुला तुझ्या शब्दांची किमया तुझ्या अण्णांवर करावीच लागेल. तुला तुझा शब्द फिरवता येणार नाही. तू म्हणशील मी शब्द मागे घेतो पण शब्दांचा असा महाल बांधून माझा शब्द तुला तुडवता येणार नाही.

तो म्हणाला अगं वेडे तुझ्यावर उधळलेला शब्द  म्हणजे शब्दांची पेरणी करून शब्दांचे फळ मिळेपर्यंतच्या प्रक्रीयेचा आनंदोत्सव आहे.  मग उगीच शब्दाने शब्द कशाला वाढवायचा ?  त्यापेक्षा शब्द तोलूया. तू आणि मी शब्दजोडून आपण होऊया. या शब्दाची कधीच फोड नाही होणार  ही खात्री बाळगूया. आणि नि:संदेह होऊन म्हणू•••

शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलिकडले.

असेच शब्दांसोबत हसता, खेळता, बोलता, चालता, रूसता, प्रेमात पडता, लिहिता, वाचता अनुभवूया शब्दांचा लळा.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘एक असते चिमणी’ – डाॅ.केशव साठ्ये ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मध्यंतरी सातारला गेलो होतो. हॉटेलची खिडकी सहज उघडली तर समोर २,३ चिमण्या, अगदी दोन फूटांवर. हरखून पहात बसलो. खरं सांगतो, पहिल्यांदा मोर बघितला तेव्हाही एवढा आनंद झाला नव्हता. आता ‘चिमणी’ हा पक्षी पुण्यात पाहायला मिळणे दुर्लभ झालंय. निदान आमच्या कोथरुडमध्ये तरी. 

चिमणी ही आपली लहानपणापासूनची सखी आहे. आम्ही फलटणला राहत होतो, पहिल्या मजल्यावर. तिथे मोठे माळवद (पाऊस कमी होणाऱ्या प्रदेशात माळवदी घरे असतात) होते. असंख्य चिमण्या तुरुतुरु चालत पुढ्यात यायच्या. टाकलेले दाणे, पदार्थ ऐटीत टिपायच्या आणि भुर्र उडून जायच्या. चिमणी हा घरातलाच सदस्य आहे, अशी भावना माझ्यासारख्या लाखोजणांची असेल. किंबहुना चिमणी हा आपल्या जगण्याचा एक भागच झाली होती. तिला वेगळे तरी कसे करणार? 

राखाडी, भुरा रंग, प्रमाणबद्ध शरीर, इवलीशी चोच, टुक टुक पाहणारे डोळे, न घाबरता, बिनधास्त पुढ्यात येऊन बसायच्या. पण हे चित्र गेल्या १०, १५ वर्षांत झपाट्याने बदलले. चिमण्या दिसेनाश्या झाल्या. त्यांची जागा कबुतरांनी, पारव्यांनी घेतली. आजही कुणी खेड्यात, थोड्या दुर्गम भागात गेला आणि त्यांनी चिमणी पाहिली असे सांगितले की, मन त्या रम्य आठवणीने भरुन येते. 

‘या चिमण्यांनो परत फिरा’ सारखे गाणे लागले, किंवा बाळ जेवावे म्हणून एखादी आई ‘हा घास चिऊचा’ असे म्हटलेले ऐकले, की अधिकच गलबलून येते. आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टी स्मरणरंजनाच्या कप्प्यात जाऊन बसल्यात. त्यातच ही पण जाऊन बसली. हे दुःख आपल्या सर्वांचेच आहे आणि त्यात भर म्हणजे आता ती नसण्याचा दिवसही आपण साजरा करायला लागलोय.

त्यामागे हेतू चांगला असला तरी तिचे नसणे अशा दिवसाने अधिक ठसठशीत होते. अर्थात आपण आपली कातडी टणक करुन टाकलीय म्हणा. एक असते चिमणी… एक असतो कावळा… कावळ्याचं घर असतं शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. धो-धो पाऊस पडतो, कावळ्याचं शेणाचं घर वाहून जातं.. ही लहानपणी ऐकलेली गोष्ट खोटी ठरली म्हणायची. कारण कावळे बहुसंख्य दिसतात. म्हणजे चिमणीचं घरच वाहून गेले म्हणायचे.. 

आज जागतिक चिमणी दिवस (२० मार्च), त्या निमित्त…

लेखक : डॉ. केशव साठये

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print