मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ भीमाचे गर्वहरण… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, ‘ माझी शेपूट हलवून बाजूला कर ‘  म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.
— —
मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो. संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता.

in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.

म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार ? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.

“ काय काय विकता ?”

“ बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”

“ दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात ?”

“ तीन एकशे. पाच रुपयाला एक.”

“  ते कसे बनवतात ?”

—  मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.

२ किलो साखर म्हणजे फार तर  १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा .. दिवसाला. म्हणजे महिन्याला ??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.

“ आणि बुडबुडे व फुगे कुठेत ?”

“ संपले.”

त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या  नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.

– “ इथे कसे काय ?”

“ लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉन्ट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. .”.. उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.

“ पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग ? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता.”  माझा चाणाक्ष सवाल.

“ मुलं ठेवली आहेत ना…”  त्याचं शांत उत्तर. “ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw  material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२,००० पगार देतो ….”

—  मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०,००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. .. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो  रुपयांच्यावर जातो.— 

“ दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत ….”. बबलू सांगत होता, मी गाडी चालवत होतो.
—  —

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp  road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.

मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं , “कुठे रहातोस ?”

तो म्हणाला : “हडपसरला.”

“ बबलूकडे का ?”

तो चकित. हो म्हणाला.

“ त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता.”

 भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं——

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी ☆

श्री राजीव गजानन पुजारी

? इंद्रधनुष्य ?

☆ SSLV-D2 प्रक्षेपकाचे सफल प्रक्षेपण ☆ श्री राजीव गजानन पुजारी

१० फेब्रुवारी २०२३ रोजी इस्रोने त्याच्या नवीन विकसित केलेल्या SSLV (Small Satellite Launch Vehicle) श्रेणीमधील प्रक्षेपकाचे दुसरे विकासात्मक उड्डाण यशस्वीरित्या पार पाडले. त्याला SSLV-D2 (Small Satellite Launch Vehicle-Development flight 2) असे नाव दिले आहे. सतीश धवन स्पेस सेंटर श्रीहरीकोटा येथील पहिल्या प्रक्षेपण तळावरून भारतीय वेळेनुसार सकाळी ०९:१८ मिनिटांनी प्रक्षेपक अवकाशात झेपावला. प्रक्षेपकावर तीन उपग्रह अधिभार म्हणून होते. EOS-07, JANUS-1 आणि AzaadiSAT-2. प्रक्षेपणानंतर साडेतेरा मिनिटांनी EOS-07 प्रक्षेपकापासून विलग झाला चौदा मिनिटांनी JANUS-1 वेगळा झाला आणि पंधरा मिनिटांनी AzaadiSAT वेगळा झाला. तीनही उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षेत म्हणजे ४५० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ३७ डिग्री कलासह (inclination) यशस्वीरीत्या प्रस्थापित केले गेले व इस्त्रोने एक मैलाचा टप्पा पार केला.

७ ऑगस्ट २०२२ रोजी SSLV च्या पहिल्या विकासात्मक उड्डाणावेळी प्रक्षेपकाच्या तीनही टप्प्यांनी व्यवस्थित काम करून प्रक्षेपकाला योग्य ती उंची व गती प्राप्त करून दिली,पण संगणक आज्ञावलीतील एका चुकीमुळे उपग्रह ३५६ किलोमीटर x ७६ किलोमीटर या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रक्षेपित केले गेले. या कक्षेतील ७६ किलोमीटर हे अंतर पृथ्वीपासून एवढे जवळ आहे की वातावरणातील ओढीमुळे दोन्ही उपग्रह पृथ्वीकडे ओढले गेले. ही चूक  दुसऱ्या विकासात्मक उड्डाणात सुधारण्यात आली.  

SSLV हा घन प्रणोदक असणारा तीन टप्प्याचा प्रक्षेपक आहे. हा प्रक्षेपक द्रव प्रणोदनाधारित गती वियुज अनुखंडाद्वारे (velocity trimming midule) उपग्रहाला निर्धारित कक्षेत प्रस्थापित करतो. या प्रक्षेपकाद्वारे दहा किलोग्राम ते पाचशे किलोग्राम पर्यंतच्या लघु, सूक्ष्म व अती सूक्ष्म (mini, micro and nano) उपग्रहांना क्षैतीज कक्षेत (planar orbit) प्रस्थापित केले जाऊ शकते.  अंतरिक्षात गरजेनुसार उपग्रह त्वरित सोडण्याची संधी SSLV कमीत कमी किंमतीत पुरवू शकतो. कार्यवाहीसाठी लागणारा कमीत कमी वेळ, एकाधिक उपग्रहांना सामावून घेण्याची लवचिकता, मागणीनुसार प्रक्षेपणाची व्यवहार्यता, प्रक्षेपणासाठी पायाभूत सुविधांची किमान आवश्यकता यामुळे SSLV हा जगातील एक अग्रेसर प्रक्षेपक ठरणार आहे.

SSLV-D2 हा ३४ मीटर उंचीचा व दोन मीटर व्यासाचा प्रक्षेपक असून उड्डाण समयी त्याचे वजन ११९ टन होते.

EOS-07 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह इस्त्रोने डिझाईन केलेला, विकसित केलेला आणि उत्पादित केलेला आहे. त्याच्या नवीन प्रयोगांमध्ये मिलिमीटर तरंग आर्द्रता ध्वनीजनक (Millimeter- wave Humidity Sounder) आणि वर्णपट निरीक्षक (spectrum monitoring) पेलोड्सचा समावेश आहे. उड्डाण समय त्याच्या वजन १५६.३ किलोग्रॅम होते त्याची आयुर्मयादा एक वर्ष असून त्याला २७.२१Ah च्या लिथियम आयन बॅटरीद्वारा ऊर्जा पुरवठा केला जातो. या उपग्रहाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत. (अ) सूक्ष्म उपग्रह बस (micro satellite bus)¹आणि भविष्यातील कार्यरत उपग्रहांना हव्या असलेल्या नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत अधिभाराचा आराखडा व विकास करणे.

(ब)नवीन तंत्रज्ञान सामावून घेणाऱ्या सूक्ष्म उपग्रहांची निर्मिती कमीत कमी वेळात करणे.

JANUS-1 हा १०.२ कि.ग्रॅ.वजनाचा अंटारीस सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आधारित, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दर्शविणाऱ्या कुशाग्र उपग्रहांच्या (smart satellite) मालिकेतील पहिला उपग्रह आहे. हा घटकीय वाहक (modular bus) प्रकारचा असून ऑनबोर्ड एज कॉम्प्युटिंग² च्या मदतीने मल्टी टेनंट पेलोड्स³,प्रोग्रॅमेबल स्मार्ट EPS⁴, S/X बँड⁵ SDR⁶, सिक्युअर TT&C⁷, SaaS⁸ प्लॅटफॉर्मसह डिजिटल ट्वीनिंग⁹ यांचे प्रात्यक्षिक दाखवितो.

AzaadiSAT-2 या उपग्रहाचे वजन ८.८ कि.ग्रॅ. आहे. या उपग्रह मोहिमेचा उद्देश अव्यवसायी आकाशवाणी संप्रेषण (Amareur radio communication) व LoRa¹⁰ या तंत्रज्ञानांचे प्रात्यक्षिक दाखविणे, अंतराळातील किरणोत्सर्गाच्या (radiation) पातळीचे मोजमाप करणे व विस्तारयोग्य उपग्रहांच्या बांधणीचे प्रात्यक्षिक दाखविणे हा आहे. भारताच्या सर्व राज्यांमधील ७५० विध्यार्थिनींना या उपग्रहावरील आधीभार तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले होते. स्पेस किडझ् इंडियाच्या विध्यार्थी संघाने या अधिभारांची जोडणी केली.

टिपा :-

  1. Satellite bus- हा उपग्रहाचा मुख्य भाग आणि संरचनात्मक घटक आहे. यामध्ये पेलोड्स व वैज्ञानिक उपकरणे असतात.
  2. Edge computing- ही एक संगणन क्रिया असून ती वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ केली जाते. संगणक सेवा वापरकर्त्याजवळ किंवा विदेच्या उगमाजवळ पुरविल्यामुळे वापरकर्त्याला किंवा संस्थेला जलद व विश्वासनीय सेवा मिळते.
  3. Multi-tanent payloads – एकाचवेळी एकाधिक वापरकर्त्यांना वापरता येण्याजोगे अधिभार.
  4. EPS- Encapsulated Post Script. याद्वारे व्हेक्टर ग्राफिक्सचे व्यवस्थापन केले जाते आणि घेतलेल्या प्रतिमांना उच्च विभेदन (high resolution) छपाईसाठी तयार केले जाते.

Vector graphics- कॉम्पुटरला क्रमाने दिलेल्या आज्ञा किंवा गणिती विधानांद्वारा तो रेषा किंवा आकार काढतो.

  1. Band- मायक्रोवेव्ह श्रेणीतील लहरींच्या वारंवारीतेनुसार त्यांचे गट केले आहेत, त्यांना बँड म्हणतात. त्यांनाs, x वगैरे नांवे दिली आहेत.
  2. SDR- Software Defined Radio ही एक रेडिओ दूरसंवाद प्रणाली आहे. जी विविध संकेतांवर (signals) कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारा प्रक्रिया करते.
  3. TT& C- Telimetry, Tracking and Command म्हणजे उपग्रहाकडून आलेल्या संकेतांची (signals) उकल (decoding) करणे, त्याद्वारे उपग्रहाची स्थिती व त्याचे ठिकाण ठराविणे आणि त्यानुसार उपग्रहाला आज्ञा पाठविणे.
  4. SaaS- Software as a Service यामुळे वापरकर्त्याला इंटरनेटवरील क्लाऊड आधारित ऍप्सशी संपर्क साधता येतो.
  5. Digital twining – एकाद्या भौतिक वस्तू, प्रक्रिया किंवा प्रणालीचे डिजिटल प्रतिरूप. याचा उपयोग प्रतिमानविधान (simulation), एकीकरण (integration), चाचणी (testing), देखरेख (monitoring) व देखभाल (maintenance) यांसाठी केला जातो.
  6. 10. LoRa- Long Range हे एक खाजगी मालकीचे आकाशवाणी दूरसंवाद तंत्र आहे. हे चिर्प स्प्रेड स्पेक्ट्रम (CSS) तंत्रज्ञानापासून घेतलेल्या स्प्रेड स्पेक्ट्रम मोड्युलेशन तंत्रावर आधारित आहे.

© श्री राजीव  गजानन पुजारी 

विश्रामबाग, सांगली

ईमेल – [email protected] मो. 9527547629

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पाण्याची expiry date ? ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ पाण्याची expiry date?  ☆ प्रस्तुती – सौ. दीप्ती गौतम ☆

जिथे रोज नळाला पाणी येते, तिथे पाणी रोज शिळे होते आणि रोज ओतून दिले जाते म्हणजे expiry date 1 दिवसाची.

जिथे दिवसाआड पाणी येते, तिथे पाणी दिवसाआड expire होते आणि ओतून दिले जाते

जिथे 8 दिवसांनी पाणी येते तिथे ते  8 दिवसांनी expire होते.

लग्न कार्यात पुढची बिस्लरी समोर आली, की हातातील पाण्याची अर्धी असलेली बाटली expire होते आणि फेकून दिली जाते.

वाळवंटात प्रवास करताना जोपर्यंत पाणी दिसत नाही, तोपर्यंत जवळचे पाणी चालते..

धरणातील पाणी पुढच्या पावसाळ्या पर्यंत चालून जाते.

जर दुष्काळ परिस्थिती आली तर दोन तीन वर्षे चालते…

जिथे 50 फूट बोरवेल मधून पाणी काढले जाते तिथे ते जमिनी खाली शेकडो वर्षे जुने असते म्हणजे शेकडो वर्षे झालेले पाणी पिण्यास चालते – expiry date शेकडो वर्षे.

जिथे पाणी 400 ते 500 फुटावर पाणी बोरवेल खोदून काढले जातात, तिथे ते हजारो वर्षांपूर्वी भूगर्भात साठलेले असते, तरीही ते चालते..

एकूणच पाण्याची expiry ही आपल्या कमकुवत बुद्धिमत्तेवर Flash जाते…😢

पाणी जपून वापरा, आपले विचारच आपला घात करतील…

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘पद्मश्री डाॅ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर…’ – डाॅ.अस्मिता हवालदार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर

पद्मश्री डॉ.विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरिभाऊ वाकणकर, भारताच्या पुरातत्व शास्त्राचे  पितामह. संपूर्ण जगात पुरातत्व संशोधनात हे नाव आदराने घेतलं जातं….. त्यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आदरांजली.

वाकणकर म्हटल्यावर डोळ्यासमोर येते ते भीमबेटका. भोपाळच्या जवळ असलेल्या भीमबेटकाच्या गुहांत पुराश्म युगातली दगडावरची चित्रे शोधली ती हरिभाऊनी. भीमबेटकाला जगाच्या नकाशावर आणून त्यांनी मानाचे स्थान दिले. अलेक्झांडरच्या आधी भारताला इतिहासच नव्हता. किंबहुना भारत  हे नावच अस्तित्वात नव्हते, ते देण्याची महान कृपाही इंग्रजांनी  केली असं आपल्या डोक्यावर मारलं जात होतं. शत्रूच्या मनावर हल्ला केला,आत्मबल खच्ची केलं की राज्य करणं सोपं जात हे त्या धूर्त, मतलबी व्यापाऱ्यांना उमजले नसते तरच आश्चर्य. आपला इतिहास विकृत पद्धतीने मांडण्याचे यशस्वी प्रयत्न  त्यांनी केले आणि आपल्याकडच्या काही ‘थोर’ विद्वानांनी त्यावर विश्वास ठेवला ! हरिभाऊंच्या या शोधामुळे आपला देश किती पुरातन आहे, इथली संस्कृती किती प्राचीन आहे याचे सज्जड पुरावे मिळाले. हा मोठा विजय आहे. प्रत्येकाची लढाई वेगळी,रणांगण वेगळं,शस्त्र वेगळी आणि शत्रूही वेगळे. समानता फक्त एकच –लक्ष्याप्रती असलेली प्रतिबद्धता ! हरिभाऊंनी याच बळावर लढाई जिंकली होती.

भीमबेटकातली शैलचित्रे त्यांनी कशी शोधली यापाठी एक लहानशी कथा आहे. ते कामाच्या निमित्ताने भोपाल  ते नागपूर ट्रेनने प्रवास करत असत. भोपाळजवळ असलेल्या जंगलात त्यांना नेहमी दगडांचे उंच सुळके दिसत. इथे काय असेल याबद्दल त्यांना नेहमीच कुतूहल वाटायचं. सहप्रवाशांना विचारल्यावर तिथे गुहा आहेत, दाट जंगल आहे, तिथे कोणी जात नाही, असं समजलं. हरिभाऊना आता आंतरिक उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उडी मारून सरळ भीमबेटका गाठलं आणि आजवर काळोखात दडपून राहिलेला इतिहास जगासमोर आला. १९६१ पासून सलग सहा वर्ष त्यांनी भीमबेटकामध्ये संशोधन केले. साडेआठशे गुहांत पुराश्म आणि मध्य पुराश्म युगात राहिलेल्या माणसांनी दगडांवर काढलेली  चित्रे सापडली. प्राणी, पक्षी,  माणसे, झाडे, पाने,फुले आदी त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या सगळ्याची चित्रे सापडली. पांढऱ्या आणि लाल नैसर्गिक, खनिज रंगांत असलेल्या या चित्रांत काही ठिकाणी हिरवे ठिपके दिसतात. जणू मोठा खजिना हाती लागला होता. माणसाच्या विकासाचा एक टप्पा उलगडायला मदत होणार होती.

त्यांनी सहा वर्षे सलग संशोधन कसं केल असेल हा विचार मनात येताच त्यांच्याविषयी आदर दाटून येतो. एवढे निबिड अरण्य, तिथे खायलाप्यायला काय मिळणार? ते पिशवीत बटाटे घेऊन जात.  जंगलात गेल्यावर ते जमिनीत गाडत. सूर्याच्या प्रकाशाने, मातीच्या उबेने बटाटे शिजले की सोलून खात. हेच अन्न …. किती कठोर तपश्चर्या आहे ही ! भीमबेटकाचं महत्व सरकारच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांनी हरिभाऊना वार्षिक १०००० रुपये इतके  (घसघशीत !) अनुदान दिले होते. या रकमेतून त्यांचा चरितार्थ चालवणेही अवघड होते, मग संशोधनाला पैसा कुठून पुरणार ? तरीही संशोधनात खंड पडला नाही. रानात प्राण्यांचे भय असतेच. इतक्या जुन्या गुहांत वटवाघळाचा कुबट वास असतो. तिथेच तासनतास संशोधन करायचं योद्ध्याप्रमाणे ! युनेस्कोने भीमबेटका (भीमाची बैठक ) जागतिक वारसा जाहीर केलं. भारतात सापडलेले पुरातत्वीय पुरावे,वस्तू,चित्र आदी बाकी जगात सापडणाऱ्या पुराव्यांपेक्षा अधिक मोलाचे आहेत, पण त्यांची काळजी घेतली जात नाही, महत्व समजलं जात नाही याची त्यांना खंत होती.

‘सरस्वती शोध अभियान ‘ हाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प होता. सरस्वती नदीचा उल्लेख वेदात वारंवार येतो. पण प्रत्यक्षात ती शोधता आलेली नव्हती. वैदिक संस्कृती सरस्वतीच्या काठावर फुलली होती. या प्रकल्पाचे महत्व लक्षात घेऊन इस्त्रोने त्यांना मदत केली. पाकिस्तानातल्या आदिबिद्री पासून कच्छच्या रणापर्यंतचा चार हजार किलोमीटरचा प्रदेश त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यासला.  हरीभाऊनी सरस्वती नदीचा शोध लावण्यासाठी संस्था स्थापन केली.  त्यांच्याबरोबर पुरातत्व शास्त्रज्ञ, लोककला अभ्यासक, फोटोग्राफर आदी तज्ञ मंडळी होती. सेटेलाईट चित्रांच्या आधाराने त्यांनी सरस्वतीचा मार्ग शोधला. वैज्ञानिक कसोटी लावून तिची लुप्त होण्याची कारणे सिद्ध केली. आर्यांनी सिंधू सरस्वती संस्कृती नष्ट केली ही समजूत चुकीची आहे हे सिद्ध केलं. आर्य युरोपातून भारतात आले असा शोध युरोपियन लोकांनी लावला होता. तसे नसून आर्य मूळचे इथलेच आहेत हे त्यांनी ठासून सांगितले.  सरस्वतीच्या अस्तित्वाबद्दल अविश्वास दाखवणाऱ्या लोकांसमोर भरभक्कम पुरावा ठेवला. तरीही लोक या संशोधनाला दुजोरा द्यायला धजावत नव्हते.  कारण युरोपीय संशोधकांच्या विरुद्ध बोलल्यावर आपली किंमत कमी होईल अशी मनोधारणा होती. त्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेचे वैषम्य वाटत असे. स्वातंत्र्य मिळाले तरीही मनाने स्वतंत्र झालो नाही. हरिभाऊनी जगासमोर पूर्ण आत्मविश्वासाने संशोधन ठेवले आणि आजवर थोपलेल्या मिथकांना आव्हान दिले.

१९५४ पासून त्यांनी भारतात आणि बाहेरच्या जगात शैलचित्र अभ्यासायला सुरवात केली. त्यांनी युरोप, अमेरिका आणि मध्य पूर्वेला शैलचित्रांचा अभ्यास करून पुरातत्वावर पुस्तके लिहिली. केवळ भारतात त्यांनी ४००० गुहा शोधल्या. त्यांनी चंबळ आणि नर्मदेच्या खोऱ्यांत संशोधन केले. त्यांनी महेश्वर, नेवाडा, मनोती, आवरा, इंद्रगड,कायथा, मंदसौर, आझाद नगर, दंगवाडा भागांत खोदकाम करून पुरातत्वीय पुरावे गोळा केले. त्यांनी इंग्लंड, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, ग्रीसमध्ये १९६१-६२ साली संशोधन केले.  ते उत्कृष्ट चित्रकार होते. त्यामुळे शैलचित्र त्यांनी कागदावर उतरवली. अशी ७५०० चित्र वाकणकर संस्थानाकडे आहेत. त्यांनी सहा पुस्तके आणि ४०० शोधनिबंध प्रकाशित केले. ‘ वाकणकर भारतीय संस्कृती अन्वेषण न्यासा ‘च्या संग्रहालयात त्यांनी गोळा केलेली ५००० नाणी आहेत. ते नाणकशास्त्राचे तज्ञ होते. जी.डी.आर्ट्सची पदवी संपादन केल्यावर त्यांना पुरातत्वात विशेष रस वाटू लागला. भारतीय कलांमध्ये त्यांना रस होताच. कलांच्या संवर्धनासाठी त्यांनी संस्कारभारतीची स्थापना केली. उज्जैनच्या विश्व विद्यालयातल्या पुरातत्व उत्खनन विभागाचे आणि रॉक आर्ट इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक आहेत. ललित कला संस्थान आणि शैलचित्र कला संस्थानाचे ते संचालक होते. त्यांनी ‘मेरा पुरातत्त्वीय उत्खनन ‘आणि ‘भारतीय शैलचित्र कला’ ही पुस्तके लिहिली.  हिंदीमध्ये कथासंग्रह प्रसिद्ध केला आणि आर्य प्रश्नावर रोबर्ट आर. यांच्यासह लेख लिहिला. २५० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले. भीम बेटकाच्या शैलचित्रांवर प्रदर्शने भरवली. १९७५ साली हरिभाऊना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

माळव्यातल्या मंदसौर जिल्ह्यातल्या नीमचमध्ये ४ मे १९१९ रोजी हरीभाउंचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीला सर्वजण लक्ष्मीवाहिनी नावाने ओळखत. पतीच्या कार्यात त्यांचा तन मन धन अर्पून सहभाग होता. लक्ष्मी वहिनींचा त्याग तितकाच मोठा आहे.  हरिभाऊच्या पायावर चक्र पडलं होत. अशा व्यक्तीबरोबर संसार करणे किती कठीण असते ते लक्ष्मी वहिनीच जाणो. हरिभाऊचे कुटुंब आर्थिक दृष्ट्या सबळ नसले तरी समाजकार्य आणि राष्ट्रप्रेम या शिकवणीची शिदोरी त्यांना कुटुंबाकडून मिळाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी उज्जैनमध्ये एक आर्ट सेंटर चालवून अर्थार्जन केले. कालिदासाने मेघदूत लिहिले ती जागा या परिसरात असायला हवी असे त्यांना वाटत असे. त्यानुसार त्यांनी रामगिरी पर्वतावर जाऊन शोधायला सुरुवात केली, पूर्ण प्रदेश विंचरून काढल्यावर एका गुहेवर ‘मेघदूत’ अशी अक्षरे सापडली. एका बाजूला ‘सुतनुका’ लिहिलेले दिसले आणि थोडे पुढे गेल्यावर ‘कालिदास’ असे लिहिलेले दिसले. पुढे कालिदासावर अधिक संशोधन केल्यावर हेच ते स्थान हे सिद्ध झाले. 

त्यांनी अजून एक महत्त्वाचे संशोधन केले. उज्जैनजवळच्या डोंगला गावात २१ जून रोजी सूर्यकिरण पृथ्वीशी लंबकर्ण अवस्थेत  पडतात. त्यामुळे सावली पडत नाही. हे गाव प्राचीन काळाचे time meridian होते.  कर्कवृत्त आणि रेखावृत्त इथे एकमेकांना छेद देतात. हरिभाऊनी कुठल्याही आधुनिक उपकरणांचा वापर न करता ती जागा दाखवून दिली. प्राचीन काळी हे वृत्त उज्जैनमधून जात असल्याने तिथे कर्कराजेश्वर मंदिर बांधले होते ! उज्जैनच्या वेधशाळेला वाकणकरांचे नाव दिले आहे. भारतीय पुरातत्व खात्यातर्फे हरिभाऊंच्या नावे पुरस्कार दिला जातो. पुरातत्वात रचनात्मक आणि सृजनात्मक कार्य करणाऱ्या व्यक्तीला दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

१९८८ साली सिंगापूरला एका हिंदू संमेलनाच्या निमित्ताने गेले असताना खिडकीतून दिसणाऱ्या चित्राचे रेखाटन करताना त्यांना मृत्यू आला. उणेपुरे सत्तर वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले, जे खऱ्या अर्थाने ‘जीवन’ होते. संशोधकाचा मूळ पिंड असलेले हरिभाऊ कलाकार होतेच, राष्ट्रभक्तही होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करताना महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण करत  होते. आनंदी,खेळकर स्वभावामुळे संकटाना सहज सामोरे जात. आपला ‘खरा’ इतिहास समोर येण्याची नितांत गरज आहे याची त्यांना जाणीव होती आणि त्यासाठी ते आयुष्यभर झटले. हरिभाऊनी सुरु केलेल्या कार्याची पताका पुढे नेण्यासाठी संशोधक काम करत आहेत, निश्चितच हे कार्य लवकर सुफळ होईल. मानसिक गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झालेला त्यांच्या स्वप्नातला भारत नवा, स्वाभिमानी, आत्मविश्वासपूर्ण भारत असेल, हीच आपणा सर्वांकडून त्यांना वाहिलेली आदरांजली असेल.

कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळींची इथे आठवण होते:

रात सरे ये प्राचीवरती तेजाची रेषा, 

नव्या मनूचा घोष घुमे हा, दुमदुमतात दिशा…  

जागृत झाल्या दलित जगाच्या बलशाली आशा …. 

डॉ. अस्मिता हवालदार

इंदूर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ खुळ्या कळ्या… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

खुळ्या कळ्या…

पूजेसाठी आलेल्या फुलपुड्यामध्ये निशिगंधाच्या काही कळ्या आल्या. आणि मग त्यांना नीट फुलायला मिळावं म्हणून मी एका हिरव्या बाऊलमध्ये थोडसं पाणी घालून त्यांना खिडकीत ठेवलं. किती प्रयत्न केला पण त्या काही उभ्या राहात नव्हत्या. सारख्या आडव्या होत होत्या. मग मला जाणवलं की त्यांची अजूनही त्यांची नीज उतरली नाहीये‌. हा मंदधुंद श्वास जणू त्यांच्या गोड झोपेची साक्षच !…. काय बरं स्वप्नं पहात या निजल्या असतील. आपण आपल्या हिरव्या आईच्या कुशीत नाही आहोत हे कळलं असेल का त्यांना.‌.. उठल्यावर जेव्हा त्या बघतील की आपण भलतीकडेच आहोत तेव्हा त्या काय विचार करतील… दुःख होईल का त्यांना… काय बरं वाटत असेल या कळ्यांना….. 

… आणि वाटीतल्या कळ्या उमलल्या नाही तरी.. माझ्या मनात मात्र त्या कळ्या उमलू लागल्या…

साध्या भोळ्या शब्दांत फुलूही लागल्या……. 

हिरव्यागार वाटीत

निजवलं होतं कळ्यांना

किती वेळ झोपावं 

कळेनाच की खुळ्यांना 

झोपेतही चालू होता 

त्यांचा मंद मंद श्वास

अन् घरभर दरवळला 

त्यांचा निरागस सुवास 

इवलुसा देह त्यांचा

इवलुसं हे जगणं 

इवलुशा या जीवांचं  

इवलुसंच स्वप्नं 

असू कुठेही आपण

फांदीत अथवा मातीत 

दुःखी नाही व्हायचं

नि:स्वार्थतेनं जगायचं 

सोनुले किरण आले की 

त्यांच्या संग खेळायचं

वाऱ्यासंगे सुगंधाला

सुरेल गुणगुण द्यायचं 

कधी पडायचं परडीत

कधी सजायचं वेणीत

कधी गुंफायचं हारात

तर कधी झुलायचं दारात 

इवलुसं हे आपलं आयुष्य

सदा घमघमत ठेवायचं

अखेरच्या क्षणीदेखील 

अत्तर होऊन जगायचं …

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

श्री कमलाकर नाईक

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ आनंदाश्रू… ☆ प्रस्तुती – श्री कमलाकर नाईक ☆

सकाळी सातची वेळ, शांतारामअण्णांना जोरात प्रेशर आलं होतं पण घरात मुलाची,नातवाची आवरायची लगबग होती. खरंच होतं ते. डोंबिवलीतला वन बीएचकेचा ब्लॉक, तो सुद्धा चाळीतली खोली विकून घेतलेला.

अण्णा करीरोडला एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होते.रोज सकाळी साडेसहाला घर सोडायचे. ओव्हरटाईम करुन रात्री उशिरापर्यंत घरी यायचे.

आताशा दोन महिने झालेले, अण्णांना रिटायर्ड होऊन. पहिली पहिली ही हक्काची सुट्टी बरी वाटली त्यांना. थोडे दिवस गावी जाऊन आले; पण तिथेही थोरला भाऊ नोटांची पुडकी मागू  लागला. पहिल्यासारखं आदराने बोलेनासा झाला. शेवटी अण्णा आठवडाभर राहून पत्नीसोबत माघारी आले. घरी आल्यावर मयंकच्या (मुलाच्या) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतंच,”रहाणार होतात ना,इतक्या लवकर कसे परतलात?” काही वाक्यं चेहऱ्यावर वाचता येतात. त्यासाठी शब्दांची आवश्यकता नसते आणि अशी वाक्यं आपल्या पोटच्या मुलाच्या चेहऱ्यावर पेरलेली पाहणे, याहून क्लेशदायी काही नाही.

“आणायची कोठून प्रत्येकाला द्यायला नोटांची पुडकी? अरे मी काय टाकसाळीत होतो का?” अण्णा स्वतःशीच बोलले व कुशीवर वळून निजले;पण त्यांना आत्ता थोपवेना. ते गेलेच तडक टॉयलेटमध्ये. इकडे मयंकलाही प्रेशर आलं. अण्णा दहा मिनटं झाली तरी बाहेर पडेनात. मयंक तिथल्या तिथे येरझाऱ्या घालून दमला. टॉयलेटचं दार ठोकवू लागला.

शेवटी एकदाचे अण्णा बाहेर आले. आताशा अर्ध्या अधिक दंताजींचे ठाणे उठल्याने अण्णांना अन्न नीट पचत नव्हते. त्यामुळे त्यांना नीट मोशन होत नव्हते. बराच वेळ बसून रहावे लागे. त्यांचे पायही वळून येत. अण्णा बाहेर येताच मयंक आत पळाला. पोट मोकळं करुन बाहेर आला व पेपर वाचायला घेणार तर अण्णा पेपर वाचत बसलेले. मयंकला रागच आला. मयंक अण्णांच्या अंगावर खेकसलाच,”काय हे अण्णा? सकाळीसकाळी कशाला उठता? टॉयलेट अडवून ठेवता. आत्ता पेपर घेऊन बसलात. मी ऑफिसला गेल्यावर करा की तुमची कामं निवांत. माझ्या वेळेचा कशाला खोळंबा करता? आत्ता माझी आठ चौदाची डोंबिवली लोकल चुकली. पुढच्या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा नसते. तुम्हाला कसं समजत नाही.”

“हो रे बाळा, मी कुठे ऑफिसला गेलोच नाही कधी. मला कसं कळणार?”

“काय ती तुमची नोकरी, अण्णा! कुठेतरी चांगले नोकरीला असला असतात तर आत्ता रिटायरमेंटनंतर भरघोस पेंशन मिळाली असती. पीएफ,ग्रेज्युइटी मिळाली असता. टुबीएचके घेता आला असतं आपल्याला. टॉयलेटचा असा प्रॉब्लेम आला नसता. माझ्या मित्राचे बाबा बघा गेल्या वर्षी रिटायर झालेत. त्यांनी लेकाला टुबीएचके घेऊन दिला. शिवाय कर्जतला फार्महाऊस घेतलंय,एक होंडा सिटी घेतली. बढाया मारत होता लेकाचा. अण्णा, तुम्ही काय केलंत हो माझ्यासाठी?”

अण्णांचे डोळे पाण्याने डबडबले. मोठ्या कष्टाने त्यांनी आसवांना बांध घातला व हॉलच्या खिडकीशेजारी असणाऱ्या त्यांच्या पलंगावर जाऊन खिडकीत पहात बसले. त्यांना तसं पाहून आभाळही भरून आलं. मधुराने(सुनेनं)चहा आणून दिला. तो कसातरी गळ्याखाली उतरवला त्यांनी.

अण्णांची सौ., लताई देवळातून आली. लताई रोज पहाटे स्नान उरकून महालक्ष्मीच्या देवळात जायची. देवीला स्नान घालणं,साडीचोळी नेसवणं,आरती करणं हे सारं ती भक्तीभावाने करायची. अण्णा रिटायर्ड झाले म्हणून तिने तिच्या नित्यक्रमात बदल केला नव्हता. घरी आल्यावर अण्णांचा मुड पाहताच तिच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय. अण्णांनी लताईकडे आपलं मन मोकळं केलं तेव्हा नकळत त्यांच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले.ते पाहून मधुराला गलबलून आलं.

मधुराला वडील नव्हते; पण सासरी आल्यापासून अण्णांनी तिची ही पोकळी त्यांच्या वात्सल्याने भरून काढली होती.

संध्याकाळी मधुरा,मयंक व छोटा आर्य फिरायला गेले. मयंक आर्यसोबत फुटबॉल खेळला. आर्य मग मातीत खेळू लागला, तसा मयंक मधुराशेजारी येऊन बसला. मधुराने मयंकजवळ सकाळचा विषय काढला. ती म्हणाली,”मयंक, तू लग्न झालं, तेव्हा मला अण्णांबद्दल किती चांगलं सांगितलं होतंस. अण्णा स्वतः जुने कपडे वापरायचे; पण तुझ्या साऱ्या हौशी पुरवायचे. तुला खेळण्यातल्या गाड्या फार आवडायच्या. अण्णा तुला दर महिन्याला नवीन गाडी आणून द्यायचे. पुढे तुला वाचनाचा छंद लागला,तेव्हा अण्णांनीच तुला चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तकं त्यांच्या तुटपुंज्या पगारातून आणून दिली. तुला हवं त्या शाखेत प्रवेश घ्यायची मोकळीक दिली. तुला अकाऊंट्ससाठी क्लास लावावा लागला नाही. अण्णांनीच तुला शिकवलं पण आज तू ‘अण्णा, तुम्ही माझ्यासाठी काय केलंत?’ या एका प्रश्नाने चांगलेच पांग फेडलेस त्यांचे. मयंक,अरे तुला वडील आहेत तर तुला त्यांची किंमत नाही रे. आपल्या आयुष्यात वडिलांची किंमत काय असते, ते माझ्यासारखीला विचार, जिला आपले वडील नीटसे आठवतही नाहीत.”

आर्य मम्मीपप्पांजवळ कधी येवून बसला, त्यांना कळलंच नाही.

आर्य म्हणाला,”खलंच, पप्पा. तुम्ही फाल वाईट्ट वादलात आजोबांशी. आजोबा ललत होते. आजीने गप्प केलं त्यांना. आजोबा दुपाली जेवलेपन नाही.”

मयंकला अगदी भरुन आलं. त्याला त्याची चूक कळली. घरी परतताना तो लायब्ररीत गेला व अण्णांची वार्षिक मेंबरशिप फी भरली. तसंच मधुराला म्हणाला,”आपला बाथरुम मोठा आहे त्यात आपण एक कमोड बसवून घेऊया अण्णांसाठी आणि थोड्या वर्षांत जरा मोठं घर बघूया. मी अण्णांशी नीट बोलेन. माझं असं कधी परत चुकलं, तर अशीच मला माझी चूक वेळोवेळी दाखवत जा.”

घरी गेल्यावर मयंक अण्णांबरोबर चेस खेळायला बसला. मधुराने त्यांच्या आवडीचा मसालेभात  व मठ्ठा केला. चेस खेळता खेळता मयंकने अण्णांचा हात हलकेच दाबला व  तो त्यांना ‘सॉरी’ म्हणाला.

आर्य तिथेच त्यांचा खेळ बघत बसलेला. तो आजोबांच्या गळ्यात हात टाकून म्हणाला,”बाबा,यू आल आलवेज वेलकम.” अण्णांचे डोळे पुन्हा भरुन आले; पण आत्ताचे अश्रू सकाळच्या अश्रूंपेक्षा वेगळे होते. हे तर आनंदाश्रू होते.

एक इंग्रजी वाक्य वाचनात आलं होतं. ते असं होतं की, “we are all a little broken. But the last time I checked, broken crayons still colour the same”

म्हणजे,

“आपण प्रत्येकजण कधी ना कधी मनानं तुटलेलो असतो. पण तुटलेले रंगीत खडू मी पाहिले, तर लक्षात आलं ते तुटले असले तरीही त्यांचा रंग तसाच राहिला आहे.”

किती सुंदर वाक्य आहे, नाही! आपण प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी मनावर आघात झाल्यानं किंवा ओरखडा उमटल्यानं तुटलेलो असतो. पण म्हणून त्या तुटलेपणानं आपल्यात जो चांगुलपणा आहे, तो का नष्ट होऊ द्यायचा? ज्या क्षमता आहेत, त्या का लयास जाऊ द्यायच्या? तसेच रंगाचे खडूदेखील कधी कधी वापरताना तुटतात, पण म्हणून त्यांचा रंग पालटतो का? नाही! तो खडूचा तुटका तुकडाही आपल्या मूळ स्वरूपाप्रमाणेच त्याच रंगाचा प्रत्यय देत राहतो… अगदी झिजून संपेपर्यंत! त्या खडूच्या तुकड्यांकडून आपण इतकं तरी शिकलंच पाहिजे!!

 “जिंदगी एक बार मिलती है”

  “बिल्कुल गलत है!”

सिर्फ मौत एक बार मिलती है!

 जिंदगी हर रोज मिलती है !!

  बस जीना आना चाहिए!!

 

संग्राहक – श्री कमलाकर  नाईक

फोन नं  9702923636

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मोहोरला बहावा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ मोहोरला बहावा… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

 चैत्रमहिना आला कि.. निसर्गाच्या रंगपंचमीला उधाण येतं.पळस, पांगारा, करंजा, सावरी, कुडा यांच्या जोडीला बहावा फुलतो.जसा गेले आठ-दहा महिने समाधिस्थ असलेला मुनी समाधी अवस्थेतून जागृत व्हावा तसा हा बहावा फुलतो.

सोनसळी लावण्याने हा सजतो.याची फुले म्हणजे स्वर्णफुलेच.अंगांगावर या कळ्याफुलांचे साज.लेवून हा राजवृक्षएखाद्या सम्राटा प्रमाणे आपल्या ऐश्वर्याने सर्वांचे मन मोहित करतो. हीस्वर्णलेणी इतकी झळाळत असतात कि सूर्याचे तेजच प्राशन करून उमलली आहेत असे वाटावे.यालाकर्णिकार म्हणतात. तसेच अमलतास असेही संस्कृत भाषेतम्हणतात.

बहावा हा वृक्ष आठ ते दहा मीटर पर्यंत वाढतो. पाने संयुक्त व समसंख्य असून ४ ते ८ पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. हिवाळ्यात वृक्ष पर्णहीन असतो.बहाव ही सदहरित असून वर्षावनात आढळणारी पानझडीची वनस्पती आहे.

बहावा पूर्णपणे भारतीय वनस्पती आहे.

बहाव्याच्या द्राक्षाच्या झुपक्यांसारख्या दिसणाऱ्या पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे असते. फुलांच्या सोनेरी रंगामुळे हा वृक्ष ‘Golden shower tree’ म्हणून ओळखला जातो.

बहाव्याचे फुलोरे अर्धा हात लांब आणि लोंबणारे असतात.

फुलांच्या परागीभवनानंतर वाटोळ्या पण लांबलचक शेंगा तयार होतात. शेंगेत अनेक आडवे कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्यात मऊ गरात बिया असतात.हा वृक्ष बहुपयोगी आहे.

उपयोग पुढील प्रमाणे

१ कर्णिकाराच्या मोठ्या खोडापासून इमारती लाकूड मिळते.

२ बहाव्याची साल कातडे कमावण्यासाठी उपयुक्त आहे.

३ शेंगेतला गर सारक औषध म्हणून उपयोगी आहे, तसेच तंबाखूला स्वाद आणण्यासाठी गर वापरतात.

४ बहाव्याचे लाकूड अत्यंत टणक असून ते वजनाला जड असते. शेतीची अवजारे, चाके, टेबल, खुर्च्या तयार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आदिवासी स्त्रिया याच्या फुलांची आणि कळ्यांची भाजी करतात.  

..Cassia Fistulal (कॅसिया फिस्टुला) हे त्याचे शास्त्रीय नाव आहे. पिवळाधम्म एक सारखा फुललेला, नाजूक पाकळी, डोळ्यांना सुखावणारा सोनसळी पिवळा रंग, पोपटी रंगाची पाने आणि मध्ये झुलणाऱ्या करड्या रंगाच्या शेंगा एवढा मिलाफ क्वचितच इतरत्र पाहायला मिळेल.नवरीला नटवावे आणि हळद ल्यालेल्या अंगाने तिने अकृत्रिम लाजावे तसा दिसतो बहावा. बहावा फुललेला असताना त्याला नववधूच्या हळदीच्या हातांना हिरव्याकंच चुड्याची शोभा किती मोहक असते ना तशी शोभा येते बहाव्याला दांडीवर वर थोडे जास्त आणि खाली कमी कमी होत निमुळते होत गेलेले घोसच्या घोस लटकलेले असतात. जणूस्वर्गलोकीची झळकती स्वर्णझुंबरेच. शेवटच्या टोकावर न उमललेल्या चार पाच कळ्या.नाजूक पाकळी आणि मिटून बसलेली कळीही. विशेष म्हणजे या देठावर एकही पान नाही आणि असंख्य घोस उलटे टांगल्यागत झुलत असतात वार्‍याच्या झुळकीने सोबत जातात इकडून तिकडे. डोळ्यांना अत्यंत सुखद अनुभव येतो बहाव्याच्या दर्शनाने.भारतातल्या काही क्षेत्रात महावृक्ष रूपात दिसतो. याचेखोड पांढरट असते.एरवी हेझाड ओळखूही येणार नाही. पण वसंतराजाच्या जादूई किमयेने याच्या अंतरीचे सौंदर्य खुलून येते एप्रिल ते मे महिन्यात. मला हा फुललेला बहावा “लेकुरवाळा” वाटतो.

अगदी विठू माझा लेकुरवाळा असाच.कारण याच्या फुलां मधील मध चाखण्यासाठी कीटक, मुंग्यां, मधमाशां याच्या़ अवती भवती, अंगाखांद्यावर खेळतात.बहावा मात्र यांचा दंगा, रुंजी घालणं असा कौतुक सोहळा स्वतः शांत बसून बघतो. बहावा फुलल्यानंतर साधारण४०-४५ दिवसात पाऊस येतो, असे म्हणतात. भारतात बहुतेक सर्वत्र बहावा आढळतो. पिवळाधम्मक बहावा फुलल्यानंतर झाड गोलाकार पिवळ्या उघडलेल्या छत्री सारखा दिसतं. बहावा जणू थंडीत ध्यानस्थ होतो. बहाव्या ची पाने साधारणपणे एकमेकांसमोर असतात देठाला चिकटून, रंग नाजूक पोपटी असतो. पोपटी पानांआडून खळखळून हास्य करीत पिवळे घोस येतात एकामागून एक.फुलोरा साधारणपणे अर्धा हात लांब असतो. मे च्या शेवटच्या आठवड्यात शेंगा तयार होतात. शेंगा हातभर लांबीच्या असतात.खुळखुळा वाजतो तशा वाळल्यावर वाजतात.दक्षिण भारतात बहाव्याच्या फुलांना विशेष लोकप्रियता लाभली आहे. तिकडे या फुलांना सोन्याचे म्हणजेच वैभवाचे प्रतीक मानतात. त्याला ‘कणिपू’ असे म्हणतात. ‘विशूच्या’ सणाला घरातील ज्येष्ठ व्यक्ती सर्व सौभाग्य व संपत्तीच्या गोष्टींची आरास करतात त्यात बहाव्याची फुलेदेखील असतात. घरातील प्रत्येकाने झोपेतून उठताना डोळे उडताना ही आरास पाहिली की त्याचे संपूर्ण वर्ष सोन्यासारखे भरभराटीचे जाते अशी त्यामागे श्रद्धा आहे. केरळ या राज्याचे राज्यफूल ‘बहावा’ असून भारत सरकारच्या टपाल खात्याने बहाव्याच्या फुलांचे चित्र असलेले पोस्टाचे तिकीटदेखील काढले आहे.

वसंत राजानंमोठ्या कौशल्यानं आणि रसिकतेनं आपल्या लाडक्या वसंतलक्ष्मीला साजशृंगार करून नटवले आहे असेच या फुललेल्या बहाव्या कडे बघून वाटते.

 निसर्ग आपला गुरु असतो.तसेच बहाव्याकडे पाहून मला वाटते, बहावा सांगतोय संकटाच्या काळातही हसत रहावे सर्व मानवांनी अगदी आनंदाने सामोरे जावे.कारण तीव्र उन्हाच्या झळा सोसून अग्नीत जसे सुवर्ण झळकते तसे या बहाव्याचे अंगांग सुवर्ण लेणी लेवून सजते.आनंदोत्सव साजरा करते या तीव्र उन्हातही!

☆ मोहोरला बहावा ☆

 सोनवर्खी साज लेऊनी

 बहावा मोहोरला वनी

 कुसुम कळ्यांची कनकवर्णी

 अंगांगावर लेऊनी लेणी

 ऋतु रंगांची उधळण करुनी

 राज वृक्ष हा शोभे वनी वनी

याचे फुलणे बहरुनी येणे

तप्त धरेवर सडे शिंपणे

अगांगातून तेज झळकणे

 फुले बहावा अंतरंगातूनी

डोलती झुंबरे पुष्प कळ्यांची

पखरण जणू ही चांदण्यांची

 वर्दळ येथे शत भुंग्यांची

 हसे वसंत शत नेत्रांतूनी

 तप्त उन्हाचा ताप साहतो

 शीतल कौमुदी जणू पांघरतो

 समाधानाचा मंत्रची देतो

 वार्‍यासंगे हा दंग नर्तनी

 

फुललेला बहावा पाहून या काव्यपंक्ती सुचल्याशिवाय रहात नाहीत.

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून  ☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ वसंतोत्सव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

‘कोकीळ कुहू कुहू बोले’ गाण्याचे बोल रेडिओवरून कानावर पडताच वसंत ऋतुची चाहूल मनाला लागली! फाल्गुनातील रंगपंचमीचा रंग उधळत होळीच्या सणाची सांगता होते आणि वेध लागतात ते वसंताचे! सूर्याच्या दाहक किरणांनी सृष्टी पोळली जात असतानाच वसंताचे होणारे आगमन नकळत सृष्टीतील नव्या बदलाची जाणीव करून देते. संध्याकाळी येणारी थंड वाऱ्याची झुळूक वसंताचा निरोप आपल्याला देते! सुकलेल्या झाडांना पालवी येण्याचे दिवस जवळ येतात. पिवळी, करड्या रंगाची, वाळलेली पाने जमिनीवर उतरतात.जणू ती आपल्या आसनावरून- जागेवरून- पायउतार होतात आणि नव्याला जागा करून देतात.कॅशिया, गुलमोहरा सारखी रंगांचे सौंदर्य दाखवणारी झाडे आकाशाच्या निळ्या पार्श्वभूमीवर केशरी, जांभळे पिसारे फुलवून उभी असतात. त्याच वेळी आंब्याचा मोहर आपला सुगंध पसरवीत असतो!

 आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक ऋतुचे स्वागत आपण सणाने करतो. वसंत ऋतु येतो तेव्हा चैत्रगौरीचा उत्सव सुरू होतो.

पूर्वी अंगणात चैत्रांगण घातले जाई.या चैत्रांगणातून चंद्र, सूर्य, गाई, झोका, कैरी… अशा विविध प्रतीकांची रांगोळी काढली जाई. निसर्गाप्रती कृतज्ञता दाखवण्याचा हा उत्सव असतो. चैत्री पाडव्या नंतर येणाऱ्या पहिल्या तीजेला चैत्र गौरीची

स्थापना करतात. देवीचा उत्सव म्हणून तिला पानाफुलांची सजावट करून झोक्यावर बसवतात. रुचकर कैरीची डाळ, कैरीचं पन्हं आणि खरबूज, कलिंगडासारखी थंड फळे देवीसमोर ठेवली जातात. या सर्व गोष्टींचा एकत्रित आनंद घेता यावा म्हणून चैत्रागौरीचे हळदी कुंकू केले जाते. अक्षय तृतीये पर्यंत हा सण साजरा केला जातो. हळदीकुंकू सारख्या समारंभात सुगंधित गुलाब पाणी शिंपडून, अत्तर, गुलाब देऊन सुवासिनी वसंताचे स्वागत करतात.

 काही ठिकाणी ‘वसंत व्याख्यानमाला’चे कार्यक्रम चालू असतात. अशा व्याख्यानमालां मुळे लोकांना नवीन ज्ञान आणि मनोरंजन मिळत असते. याच काळात गायनाचे कार्यक्रम होत राहतात. कोणत्याही ऋतूत, सण साजरे

करून माणूस आनंद शोधत असतो. आणि त्यानिमित्ताने निसर्गाची जवळीक साधली जाते!

पंजाब, उत्तर प्रदेश यासारख्या भागात या दिवसात कलिंगड, खरबुजे यासारखी फळे ही थंड म्हणून खाल्ली जातात.फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी अधिक चांगले असते. त्यात वाळा, मोगरा टाकला की पाण्याला एक प्रकारचा सुगंधही येतो.

 आपल्या महाराष्ट्रात कोकम, लिंबू, कैरी,वाळा,खस यांची सरबते थंडाव्यासाठी आपण वापरतो. निसर्गाने दिलेले नैसर्गिक पदार्थ या उन्हाळ्याच्या काळात वापरणे हे शरीराला हितकर असते. पुढे येणाऱ्या वर्षा ऋतूत कोणतेही त्रास होऊ नयेत म्हणून शरीराला सज्ज ठेवण्याचे काम नैसर्गिक विटामिन ‘सी’ घेण्यामुळे होत असते!

 वसंत ऋतुची खासियत यातच आहे की, हा ऋतू नवीन सृजनाची सुरुवात करून देतो. वसंतोत्सवामुळे नवचैतन्य दिसते. शिशिर आणि हेमंत ऋतूत थंड, निद्रिस्त झालेले वातावरण वसंत ऋतूच्या आगमनाने चैतन्यमय बनते आणि तोच निसर्गाचा खरा ‘वसंतोत्सव’ असतो !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆

श्री विनय माधव गोखले

? इंद्रधनुष्य ? 

☆ मरावे परी — एक सत्यकथा ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले

मृत्युशय्येवर अखेरच्या घटका मोजीत असलेल्या टॉम स्मिथने आपल्या मुलांना आपल्याजवळ बोलावून घेतले आणि तो त्यांना म्हणाला, “बाळांनो, मी आज या जगाचा निरोप घेत आहे, परंतु जातांना मला तुम्हा मुलांना एव्हढंच सांगायचं आहे की मी आजपर्यंत जसं सरळमार्गी आयुष्य जगलो तसंच जीवन जर तुम्हीही जगाल तर मला जी मनःशांती लाभली ती तुम्हालाही लाभेल.” 

त्याची मुलगी सारा म्हणाली, “बाबा, आमचं हे दुर्दैव आहे की तुम्ही हे जग सोडून जातांना तुमचं बँक खातं हे पूर्णपणे रितं झालेलं आहे. आमच्यासाठी तुम्ही काहीच पैसा शिल्लक ठेवला नाहीत. ज्यांचा तुम्ही भ्रष्ट, सरकारी पैसा चोरणारे चोर, अशा शेलक्या शिव्यांनी उद्धार केलात, अशा सर्व लोकांनी आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या मागे भरपूर संपत्ती ठेवली आहे. आपलं तर हे घरसुद्धा आपल्या मालकीचं नसून भाड्याचं आहे. निदान मी तरी तुम्ही दाखवलेल्या आदर्श मार्गावरून चालणार नाही. आम्हाला आमचा मार्ग निवडू द्या.” 

थोड्याच वेळात स्मिथने आपला अखेरचा श्वास घेतला आणि त्याचा देह निष्प्राण होऊन पडला. 

तीन वर्षांनंतर सारा एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करण्यासाठी मुलाखत द्यायला गेली..

मुलाखतीदरम्यान तिला मुलाखतकाराने विचारलं, ” तुझं आडनांव काय म्हणालीस? स्मिथ ना? कुठली बरं ही स्मिथ…..?

यावर सारा म्हणाली, “मी सारा स्मिथ. माझे वडील टॉम स्मिथ. ते आता हयात नाहीत.”

मुलाखत घेणाऱ्या पॅनेलच्या अध्यक्षाने जरा अविश्वासाच्या सुरातच विचारलं, ” ओहो, तू टॉम स्मिथची मुलगी आहेस? “

— पॅनेलमधील इतर सदस्यांकडे एकवार नजर टाकून तो म्हणाला, ” हा स्मिथ नावाचा मनुष्य तोच आहे बरं का, ज्याने ‘ Institute of Administrators ‘ या संस्थेमध्ये माझ्या सभासदत्वाच्या अर्जावर स्वाक्षरी केली होती, आणि आज त्याच्याच शिफारशींमुळे मी या पदापर्यंत पोहोचू शकलो. त्याने हे माझ्यासाठी अगदी निरपेक्षपणे, कसलाही मोबदला न घेता केलं. मला तर त्यांचा पत्ताही माहित नव्हता. त्यांची माझ्याशी कसलीही ओळख नव्हती, पण तरीही हे त्यांनी केवळ माझ्या हितासाठी केलं…” 

इतकं बोलून तो साराकडे वळून म्हणाला, ” मला तुला आता कुठलाच प्रश्न विचारायचा नाहीये. तुला ही नॊकरी मिळालीच आहे असं समज. उद्या येऊन तुझं नियुक्ती पत्र या कार्यालयातून घेऊन जा…”

— सारा स्मिथ कॉर्पोरेट अफेअर्स मॅनेजर म्हणून कंपनीत नियुक्त झाली.. तिच्या दिमतीला ड्रायव्हरसहित दोन कार्स, कार्यालयाला लागूनच असलेला एक डुप्लेक्स बंगला आणि दरमहा एक लाख पौंडांचा पगार आणि याशिवाय इतर भत्ते आणि खर्च इत्यादी मिळू लागलं. 

नोकरीत दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अमेरिकेतून आपल्या देशात परतले आणि त्यांनी आपली निवृत्ती घोषित केली. त्यांच्या जागी नवी नियुक्ती करणं आवश्यक होतं. या जागेसाठी अतिशय विश्वसनीय मनुष्याची आवश्यकता होती. आणि या जागेसाठी कंपनीच्या सल्लागारांनी पुन्हा एकदा सारा स्मिथच्याच नांवाला पसंती दिली. 

एका मुलाखतकाराला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये तिला जेव्हा नोकरीतील तिच्या यशाचं गुपित विचारल्या गेलं तेव्हा अश्रूभरल्या नेत्रांनी ती उत्तरली, ” माझ्या वडिलांनीच माझ्या यशाचा मार्ग मला आखून दिला होता. ते जेव्हा स्वर्गवासी झाले तेव्हा मला कळलं की सांपत्तिकदृष्ट्या जरी ते गरीब होते, तरी सचोटी, शिस्त आणि प्रामाणिकपणा या गुणांनी ते खूप खूप श्रीमंत होते.

“आता इतक्या वर्षांनी वडिलांच्या आठवणींनी रडण्याइतक्या आपण लहान नसूनही आपल्या डोळ्यांत त्यांच्या आठवणींमुळे पाणी कां येते?” — मुलाखतकाराच्या या प्रश्नावर त्या उत्तरल्या, ” माझ्या वडिलांच्या मृत्यूसमयी मी त्यांना ते आयुष्यभर सचोटीच्या मार्गाने चालले या गोष्टीसाठी अपमानास्पद बोलले होते. आज मी त्यासाठी त्यांची क्षमा मागतेय. ते मला त्यांच्या थडग्यातून उठून निश्चितच माफ करतील अशी मला आशा आहे. मी आज या पदावर पोहोचले ते केवळ त्यांच्या पुण्याईमुळे. यात माझं श्रेय काडीचंही नाही.”

मग शेवटी तिला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. 

“मग आपण आपल्या वडिलांनी जो मार्ग आपल्याला आखून दिला आहे त्याच मार्गाचं अनुसरण कराल का?”—- यावर त्या म्हणाल्या, ” मी आता माझ्या वडिलांना खूप मानते. त्यांचं एक भव्य तैलचित्र मी माझ्या दिवाणखान्यात प्रवेशदारासमोरच लावून ठेवलंय. माझ्यापाशी आज जे काही आहे त्याचं श्रेय भगवंताच्या खालोखाल मी माझ्या वडिलांनाच देते.”

आपणही टॉम स्मिथसारखेच आहोत का..? —- 

कीर्ती रूपाने शिल्लक राहता येऊ शकते. कीर्ती पसरायला आणि कीर्तीरूपाने जिवंत रहाण्यासाठी वेळ लागतो जरूर, पण त्या रूपाने माणूस अमर होऊन जातो..सचोटी, शिस्त, स्वतःवर ताबा ठेवणं आणि परमेश्वर आपल्याकडे पाहतोय याची सदोदित जाणीव हे गुणच माणसाचं खरं धन आहे, बँक खात्यातील अमाप पैसा नव्हे..आपल्या मुलाबाळांसाठी हा वारसा ठेवावा..

—आपणही या परिवर्तनाचे अग्रदूत बनू या आणि ही सत्यकथा आपल्या माणसांत अधिकाधिक शेअर करू या.

संग्राहक : श्री विनय माधव गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “सासू – सून समीकरण”  – लेखिका :सुश्री संध्या बेडेकर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

काल ताई कडे गेले होते. सहजच आठवण आली आणि गेले. ताई व भाऊजी आरामात TV बघत बसले होते. ताई माझ्या पेक्षा चार वर्षं मोठी.आमच्या बागेतले देवगड हापूस घेऊन गेले.•••

छान गप्पा रंगल्या आमच्या. जुन्या गोष्टी निघाल्या व वेळ कसा गेला कळलेच नाही.••••

 संध्याकाळ झाली.मी ताईला म्हणाले,•••• निघते ग मी आता, •••

 अग !! आरती येण्यातच आहे, तिला भेटून जा.ताई म्हणाली.••••

 भावजी म्हणाले,हो,मी तसा तिला मेसेज केला आहे,येईलच ती इतक्यात.•••

 थोड्या वेळाने आरती आली.

 कशा आहात मावशी ? तिने विचारले. छान झालं मावशी, तुम्ही आलात.••••

आई बाबांना पण छान वाटलं असेल. आमच्या दोघांच्या नोकरी मुळे त्यांना कुठे बाहेर जाता येत नाही,अडकलेले असतात ते दोघे.••••

 ताईने विचारलं,••••

 कसा गेला ग दिवस आज ऑफिस मधे ?

खूप काम असतं ग दोघांना.आम्ही काय घरीच असतो. शनिवार, रविवारी आरती काही करू देत नाही आम्हाला. कधी कधी तर नाटक / सिनेमाची तिकीटं हातात आणून देते.••••

माझ्या लक्षात आलं,दोघी आपापली बाजू मांडत होत्या.व एकमेकांच्या मदतीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करत होत्या.••••

मावशी !! आई बाबा आहेत म्हणून मला घरची, आर्याची काळजी नसते हो. आर्या म्हणजे ताईची नात. ••••

ताई म्हणाली,••••

अग !! आर्या आज दूध प्यायला नाही म्हणाली बघ.मग मी तिला केळं आणि थोडे ड्राय फ्रूट दिले व खेळायला पाठविलं.

अग !! आज तिला औषध द्यायचे राहून गेलं बघ,विसरलेच ग मी. असं कर आरती,तू माझ्या मोबाईलवर अलार्म लावून दे. म्हणजे मग मी विसरणार नाही. •••••

ठीक आहे आई.काही हरकत नाही.होतं कधी कधी असं. मी देते.आरती म्हणाली.•••

ताई चहा करायला उठणारच होती, तर लगेच आरती म्हणाली, ••••

आई !! तुम्ही रोज करताच चहा. आज बसा मावशीबरोबर गप्पा मारत, मी करते सगळ्यांसाठी चहा. बाबांचा मेसेज मिळाला होता. म्हणून येताना मी समोसे आणले आहेत.•••••

मी शांतपणे दोघींचे बोलणे ऐकत होते.ताई म्हणाली,•••

अग आरती !! मावशीने आंबे आणले आहेत. उद्या न विसरता घेऊन जा हं तुझ्या आईसाठी. ••••

आई बाबा, औषध घेतले ना वेळेवर?..आरती ने विचारले.•••

हा हिचा रोजचाच प्रश्न असतो बघ आम्हाला. कौतुकाने ताई म्हणाली,•••

आरती आल्यापासून, त्यांच्या गप्पा ऐकून,एक गोष्ट माझ्या लक्षात आली, की दोघी एकमेकींना सांभाळत आहेत. एकमेकींची काळजी घेत आहेत.•••

छान वाटलं बघून.•••••

‘Old Age Parenting’ म्हणजे आजी आजोबा नातवंडे सांभाळतात. हे आता बरेच ‘Common’ झाले आहे.पण ते सोप्पं नाही.••••

दोन पिढ्यांनी एकत्र रहायचे व तिसऱ्या पीढीला सांभाळायचे, म्हणजे तारेवरची कसरतच.••••

खरं तर यापेक्षा मोठे सुख तरुणांना काय असू शकतं की त्यांची मुलं सुरक्षित हातात आहेत. मुलांची मुलं तर ‘दुधावरची सायच ‘. त्यांना सांभाळणे तर आनंदाची गोष्ट आहे आजी आजोबासाठी, पण दडपणाखाली नाही. ••••

 ताई आणि आरतीची रिलेशन्स बघून खूप छान वाटलं.••••

 ” दोन शब्द काळजीचे, प्रेमाचे पुरतात आजी आजोबांना.”••••

खूप नाजूक धागा आहे हा दोघांच्या मधला. एकमेकांच्या अडचणी समजल्या, चुका पदरात घातल्या,थोड्या सवयी बदलल्या, मदतीचा हात पुढे केला तर ,सर्वच आनंदात राहू शकतात.मोकळेपणा हवा नात्यात.•••••

आजी आजोबांची ही ‘second inning ‘आहे मुलांना मोठं करायची. वेळेनुसार सर्वच बदललंय. पद्धती पण. आजी आजोबांची पण वयाप्रमाणे शक्ती,गती कमी झाली आहे. विस्मरण होऊ लागलं आहे.••••

तडजोड,आदर सर्वांचा सर्वांसाठी हवाच. ही ‘Two Way प्रोसेस’ आहे. बोलणे स्पष्ट पण मधुर ठेवलं तर छानच. आमच्या वेळेस, तुमच्या वेळेस हे शब्द नकोच.••••

सोपं नाही,पण अशक्य नक्कीच नाही. तरुण व जेष्ठ -दोघेही आपलं जीवन आनंदाने जगू शकतील.दोघांचा अधिकार आहे तो व गरजही.••••

ताई निश्चिंत झाली आहे.कारण आता तिला अमरची काळजी नाही.त्याला तिने सुरक्षित हातात सोपवले आहे.•••••

ताईला सासू सूनेचे समीकरण चांगलं जमलंय. ती म्हणते,•••

आरती माझी ‘स्पर्धक’ नाही, माझी जबाबदारी उचलणारी माझी ‘सहयोगी ‘ आहे.ती आणि मी या घराचे ‘आधारस्तंभ’ आहोत.•••••

आनंदाचे दिवस केव्हा येतील ?याची वाट बघायची नसते. दोन्ही कडून प्रयत्न करुन ते आणायचे असतात.••••

म्हणतात ना,•••

” जहां चाह वहां राह “••••

“रिश्ते बरकरार रखने की सिर्फ एक ही शर्त है,किसी की कमियां नहीं अच्छाइयां देखें “•••

 

लेखिका: सुश्री संध्या बेडेकर

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print