मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ती.. आणि तीच… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ती.. आणि तीच… ? श्री आशिष  बिवलकर ☆

संसाराचा गाडा ओढतांना,

ती खांद्याला खांदा लावते |

प्रत्येक नर नारायणाला,

त्याची लक्ष्मी अशीच पावते |

*

नांदा रांधा उष्टी खरकटी काढा,

इतक्यावर ती थांबत नाही कधी |

वेळ प्रसंगी कंबरेला पदर खोचून,

घराच्या प्रगतीची सोडत नाही संधी |

*
तिच्याच भक्कम पायांवर,

संसाराचा डोलारा उभा राहतो |

कशाची उणीव आहे की नाही,

तिच्या डोळ्यातच तो सारं पहातो |

*
संसारातल्या अडीअडचणीला,

तीच त्याला हिम्मत देत राहते |

तोल कधी ढळणार नाही त्याचा,

कटाक्षाने सार काही सांभाळते |

*
ती शिकलेली असो वा अडाणी,

संसाराचं गणित अचूक सोडवते |

लेकरांना नुसता जन्मच देत नाही,

चांगल्या संस्कारांनी त्यांना घडवते |

*

व्यक्ती म्हणून जरी एक असली तरी,

जीवनात अनेक भूमिका ती निभावते |

संसार सहाणेवर चंदनाप्रमाणे झिजून,

आयुष्यभर शीतल सुगंधाने दरवळते |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नाटक… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ नाटक… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

दैवा वरती जगणाराना किंमत नसते

कर्म करावे तेव्हा कोठे जीवन फुलते

प्रेमा साठी जमतो तितका त्याग करावा

त्यागाने तर जग जिंकाया हिंमत मिळते

 *

जनन मरण हा खेळ धरेवर अविरत चाले

काळा संगे धावत फिरणे गंमत असते

 *

माती मधला अंकुर साधा वाढत जातो

संघर्षाचे जगणे त्याला सावध करते

 *

माझ्या असली प्रेमाला मी विनवत बसतो

दोघांच्या मग भेटीनंतर अंतर मिटते

 *

मी जगण्याचे असली नकली नाटक करतो

मी सजल्यावर रंगपटावर जीवन खुलते

 *

चिंता मिटता मन हळवे मग खुलते फुलते

माझ्या सोबत गोडगुलाबी जगणे हसते

 *

देव दयेने येथे सगळे तुमचे आहे

जाताना पण सोबत काही नेणे नसते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुझ्याविना जगणे… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

तुझ्याविना जगणे… कवी : श्री अनिल दाणी ☆ प्रस्तुती : श्री मिलिंद जांबोटकर 

तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही, अशातला भाग नाही़

 

पण तुझ्याविना जगणे म्हणजे क्रिया कर्म केल्यासारखं

वाळवंटातल्या वादळवार्‍यासारखं

तुझ्यासह जगणे म्हणजे उत्सवासारखं

आनंदाला उधाण आल्यासारखं

 

तुझ्याविना जगणे म्हणजे वांझोटे जगणे

तुझ्यासह जगणे म्हणजे नंदनवनात जगणे

 

ना जाणे कुठून जुळतात या गाठी?

अन परस्परांच्या सावली होऊन सोबत करतात.

जन्माच्या गाठी जितक्या घट्ट असतात तितक्याच त्या रेशमी मुलायम असतात.

 

म्हणून म्हणतो तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही अशातला भाग नाही,

पण तुझ्याशिवाय जगण्यात ती रेशमी मुलायमता नसेल

मायेचा, प्रेमाचा ओलावा नसेल

न भरणारी पोकळी असेल

शून्यवत जगण्याची खंत असेल

तुझ्याविना जगणे म्हणजे क्रिया कर्म असेल.

 

कवी: श्री. अनिल दाणी

प्रस्तुती: श्री. मिलिंद जांबोटकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तो अवचित आला तेव्हा…☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ तो अवचित आला तेव्हा ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

तो अवचित आला तेव्हा, मी उन्हात होते बसले

सडसडला अंगावरती, अन् उन्हात चांदणे हसले..

 *

शिरशिरी ती थरार आली, मी सर्वांगे मोहरले

वाटले मला जर्रा…. से, कल्पनेत मी थरथरले…

 *

तो मोती पेरत आला, मी भाळी माळत होते,

अन् जन्मोजन्मीचे होते…अहो, त्याचे माझे नाते…

 *

भांगावर पेरत मोती, मी कुंतल झटकत होते

चांदण्या जणू अवतरल्या, मज खरेच वाटत नव्हते…

 *

नक्षत्रे घेऊन आला, मी तशीच झेलत गेले

खदखदा ऊन्हात तो हसला, सर्वांग भिजवले ओले…

 *

किती वेचू माणिकमोती, का वेड लावले मजला

वाऱ्यावर विहरत होता, तो ऊनचांदणं झुला…

 *

भिजवून तो मजला गेला, गेला विरहार्त ठेवूनी

अजूनही मनात का पेटे, अवचित तयाची धुनी…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – svpawar6249@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अगतिकता… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? अगतिकता…  ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

सवारीच्या डोई सावली

याच्या डोई तळपे ऊन

रस्त्यावर रिक्षा चालवे

लेकराला उरी धरून

*
एका हाती निरागसता

 दुजा हात कर्तव्य लढे

 पायांनी रेटत ही रिक्षा

 एकटा पिलासह झगडे

*
काय असेल अगतिकता

असेल कोठे पोराची माय!

आजारी असेल घरामधे

की वाईट घडले असेल काय?

*
चित्र पाहता येई व्याकुळता

डोळा भरूनी येई पाणी

रिक्षा चालवणाऱ्या बापाची त्या 

अन् काय असेल कहाणी?

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवन गाणे… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर☆

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ जीवन गाणे ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

(वृत्त- वनहरिणी)

लय तालावर बांधियलेले सुंदर माझे जीवनगाणे

तिरकिट धा धा बोलांवर या गात राहिले मीच तराणे

*

संथ भासले कधी मला ते अवखळ निर्झर कधी वाटले

वादळ वारे साहत साहत थकले शिणले श्रांत जाहले

सुरावटीची एकसंधता कधीच नाही ती ढासळली

घाम गाळुनी कष्टाने मी संसाराची बूज राखली

 *

ऊन सावली खेळ चालला, वर्षा आली दिला गारवा

हरित तृणांच्या गालिच्यावरी जीवनास या मिळे विसावा

 *

गात्रे थकली तेज हरपले, तार छेडते परि मी आहे

रंग भानुचा तांबुस पिवळा मावळतीला खुलतो आहे

 

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ तो तर आपल्यासारखंच वागतोय! – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

? इंद्रधनुष्य ?

☆  तो तर आपल्यासारखंच वागतोय! – लेखक :अज्ञात ☆ प्रस्तुती  – सौ.अस्मिता इनामदार ☆

लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय..

वर्षाची सरासरी अवघ्या काही दिवसांत, गाठत तो वेड्यासारखा कोसळतोय.

असं काही नाही. त्याचं कुठं काय चुकलंय?

पूर्वी तो वेळेवर न चुकता जूनच्या पहिल्या आठवड्यात यायचा 

आणि सप्टेबरअखेर पर्यंत दमादमाने आस्ते कदम बरसत राहायचा.

शाळेच्या सुरुवातीला पोराठोरांसंगे दंगा करायचा.

 

ज्येष्ठात तांबड्या मातीतल्या भातशेतीतून लोळण घेत शिवारभर फिरून दमल्यावर,

कौलारू घरांवरून घसरगुंडी खेळायचा.

आषाढात वारकऱ्यांच्या पायात घुटमळत दिवेघाटातून दरवळत भवतालात घुमायचा,

काळ्या मातीत पेरलेल्या बीजांना गोंजारायचा, आभाळमाया करायचा.

सह्यकड्यापासून सातपुड्यापर्यंत डोंगररांगांवर अभिषेक करायचा,

वसिष्ठीला वंदन करुन तापीच्या पायावर लीन व्हायचा,

त्याचा हा प्रवास ठरलेला असायचा…

 

वाटेतल्या बांधांबांधांवर वडिलकीच्या मायेने हात फिरवायचा,

एखाद्या चंद्रमौळी झोपडीत वाकून बघताना गहिवरून यायचा,

 

ओल्या बाळंतिणीच्या अंधारल्या खोलीत डोकावून पाहताना बाळाच्या मखमली पायाला गुदगुल्या करायचा.

गावागावातल्या मंदिरांची शिखरे अन मस्जिदींचे मीनार स्वच्छ धुवून काढायचा,

वेशीवरच्या जीर्ण पिंपळाला आलिंगन द्यायचा,

पारावरच्या वटवृक्षाच्या पारंब्यांशी झोंबायचा.

गावकुसातल्या म्हाताऱ्या कोताऱ्यांच्या डोईवरल्या चांदीला स्पर्श करुन 

अंगणातल्या तुलसी वृंदावनाला वंदन करायचा.

 

पांदीतल्या आंब्यापाशी आठवणींची सय कुशीत घेऊन झोपायचा,

गावांच्या शिवेपाशी थरथरून जायचा.

ओढ्यांच्या कडेने वाहताना 

अनंतात लीन झालेल्यांचे अस्तित्व शोधत फिरायचा,

 

कडेवर नातवंडे घेऊन चाललेल्या वृद्धांच्या भाळाचे चुंबन घ्यायचा.

मातीत कोसळून, अंकुराच्या देठातून उगवून यायचा.

म्लान झालेल्या गवतफुलांना लकाकी द्यायचा.

 

पूर्वीचा पाऊस बोलायचा म्हणे!

माणसंच नव्हे तर झाडंझुडपं पशू पक्षी देखील त्याच्याशी संवाद साधायचे!

पहिल्या पावसाच्या वेळी त्याचे पूजन व्हायचे,

गावतळे तुडूंब भरल्यावर ओटी भरायचे.

पाऊसही मग जाम खुश व्हायचा,

आपल्या लेकरांवर तालासुरात कोसळायचा.

श्रावणात माहेरी आलेल्या माहेरवाशिणींच्या डोळ्यातून वाहायचा,

तिच्या संगे ऊंच झुल्यावर विहरताना रडता रडता हसायचा.

 

भाद्रपदात, परतीच्या पावसाची पावले जड व्हायची,

गोठ्याचं दावं तोडून गेलेल्या वासरागत वागायचा.

लहर आली तर परत यायचा, नाहीतर माळांवरच्या झाडांत दडून बसायचा.

 

निरोप घेताना, तो ओक्साबोक्शी रडायचा!

घरादाराला आशीर्वाद देऊन जायचा,

सूरपारंब्या खेळताना, फांद्यांवर केलेल्या खुणांपाशी रेंगाळायचा.

 

शहरातल्या डांबरी सडकांवर इंद्रधनुष्य रेखाटायचा,

बागेत बसलेल्या जोडप्यासंगे ओला कंच होऊन जायचा,

गल्लीच्या कोपऱ्यावरल्या टपरीवर 

चहाच्या वाफाळत्या चॉकलेटी द्रावणावर जीव लावायचा.

भिजून घरी गेलेल्या चाकरमान्यासंगे घरात मुक्त शिरायचा

आणि थकलेल्या आईच्या हातची गरमागरम भजी खाऊन पुन्हा बाहेर पडायचा,

नव्याने कोसळण्यासाठी!

प्रेमिकांच्या पहिल्या आलिंगनाशी एकजीव होताना पुरता रोमॅण्टिक व्हायचा,

तिच्या गालावरून ओघळत यायचा 

आणि त्याच्या ओठांवर स्थिरावायचा.

चेन पडलेल्या सायकलमागे फरफटत जायचा,

हायवेवरून सुसाट जाणाऱ्या गाड्यांच्या चाकांशी स्पर्धा करायचा.

 

कोसळताना तो काळी तांबडी माती असा भेद करत नसे; 

बोरी बाभळींनाही माया लावायचा,

आणि बकुळ प्राजक्तांवरही प्रेम करायचा.

 

पूर्वी त्याचे काही शिरस्ते होते,

त्याचा एक मौसम होता,

त्याची एक पद्धत होती,

त्याचं एक वेळापत्रक होतं.

 

पूर्वी माणसांचंही वेळापत्रक होतं म्हणे..

आता लोकांपाशी वेळच उरला नाहीये.

सगळयाची घाई आहे,

सावकाश निगुतीचं काही उरलंच नाही.

खाणं पिणं असो वा असो झोपणं,

सगळं घाईतच असतं.

मनमुराद गप्पादेखील होत नाहीत,

फुरसतीनं भटकणं होत नाही व्यक्त होण्याचीही घाई असते,

नावालाच बोलायचे असते मन मात्र जागेवर नसते.

रस्त्यांनी घाई, जायची घाई यायची घाई.

ब्रेकअपची सुद्धा असते घाई!

नुसती घाई! [reposted]

 

पूर्वी घराबाहेर पडताना उंबऱ्यापाशी हलणारा हात असायचा,

सोज्वळ हसायची अंगणातली जाई आणि प्रेमळ आई!

आता कुठले छंद उरले नाहीत की कुठल्या आवडी हौसेने राहिल्या नाहीत

मने जुळायच्या आधीच तुटायची आस असते.

 

मागे सिनेमे महिनोनमहिने थियेटरवर असत 

आता चारच दिवसांत त्यातली मजा संपलेली असते,

पूर्वी एखादं गाणं वर्षभर ऐकलं जायचं,

आता दिवसागणिक हिट गाणं बदलतं!

 

पूर्वी, रोज थोडे थोडे पैसे साठवत असत 

आता बसतात जॅकपॉटसाठी तिष्ठत,

आताशा तासाला बिग ब्रेकिंगची बातमी बदलते 

त्यातलं मूल्यही मिनिटांत संपून गेलेलं असतं!

 

सकाळची गोष्ट संध्याकाळी राहत नाही,

रात्रीच्या आणाभाका सकाळी स्मरत नाहीत!

महिन्याचं काम एका दिवसात करायचं असतं 

वर्षाचं पीक एका महिन्यात काढायचं असतं,

सालभराची कमाई तासात हवी असते,

इतकेच काय कुठली शहाणिवही आता नकोशी असते,

सणवाराला माहेरी यायचीही ओढ नसते.

 

मौतीला सुद्धा आता माणसं येत नाहीत,

आरआयपीचा मेसेज पाठवतात.

जिवलगांपाशी बसायला माणसांना वेळ नसतो

मायबापांना पोराबाळासाठी नि पोरांना आईसाठी टाइम नसतो

आणि पतीच्या छातीवर मस्तक टेकवायला पत्नीला उसंत नसते.

मैदानांवर खेळासाठी मुलांना सवड नाही,

पुस्तके ही तिष्ठत असतात, वाचणाऱ्या हातांच्या प्रतिक्षेत.

 

सालं ते प्रेमसुद्धा इन्स्टंट असतं,

सकाळी दृष्टादृष्ट झाल्यावर दुपारीच आडोसा शोधत फिरतं!

श्रमलेल्या पायांवर मस्तक टेकायची ओढ नसते कुणाला,

दमलेल्या हातांना धन्यवाद द्यायला आवडत नाही कुणाला 

विचारलाच जाब कुणी तर सरळ सरळ उत्तरतात – वेळच नाही हो कुणाकडे,

हल्ली टाईम भेटत नाही दुनियेला!

 

पावसाचंही तसंच झालंय,

आताशा वेळ नसतो त्याच्याकडे.

वर्षाची सरासरी एका दिवसांत गाठतो 

कधी कधी महिनाभर येत नाही, कुठे तरी बिझी असतो! ‘

अचानक येतो मग.

सुट्टीवर एक दिवसासाठी घरी परत आलेल्या मुलासारखा,

पहाटेच येतो, त्याच दिवशी परतण्याचे वेध डोळ्यात घेऊन!

विचारलं तर म्हणतो आता मन रमत नाही गं आई!

 

पावसाचंही तसंच झालंय त्याचं आता मन रमत नाही,

आता तो बरसतो फक्त बॅकलॉग भरण्यासाठी,

त्याच्याकडे वेळ उरला नाही,

तो कुणाची विचारपूस करत नाही की,

कुणाच्या मस्तकावरून मायेचा हात फिरवत नाही..

 

दोस्तहो पाऊस बदललेला नाही 

आणि चुकलेलाही नाही,

तो तर आपल्यासारखंच वागतोय!

मग त्याला दोष देऊन कसे चालेल?

 

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : अस्मिता इनामदार 

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ आलोच पहा… कविवर्य ग. ल. ठोकळ – संकलनकर्ता – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित

कविवर्य ग. ल. ठोकळ ह्यांची माझ्या बालपणी खेड्यातील शाळेत ऐकलेली कविता विस्मृतीत गेली होती आणि फक्त पहिली ओळ आणि पायजमा, अर्ध्या बटनपट्टी चा फुल शर्ट आणि गांधी टोपी अश्या वेशातील गुरुजींनी मदर इंडिया तल्या दुनिया में हम आये हैं तो जीना ही पडेगा ह्या गाण्याची चाल लावून दिलेली आठवत होती. खूप काळ अनेक ठिकाणी शोधल्या नंतर सापडली एकदाची.

लाही लाही करायला लावणाऱ्या, शरीराची काहिली करणाऱ्या ह्या उन्हाळ्यात कविवर्य ठोकळांचा शब्द न शब्द मनाला भिडतो.

☆ जतन करून ठेवण्यासारखे काहीतरी… ☆

 आलोच पहा ग्रीष्म अशी दे ललकारी

 ओतीत सुटे आग नभी सूर्य दुपारी

 या ऊन झळा या करिती तप्त शरीरा

 आता कुठला शितळसा विंझण वारा

 कासाविस हो जीव, ती सूर्य करांनी

 घामेजूनी अंगांग निघे चिंब भिजोनी

 देई फिरताना चटके ऊन फुपाटा

 अंगात भरे पूर्णपणे शीण गाळाठा

 एकेक तरू लागतसे पार झडाया

 कोठून मिळावी हिरवी पाखर माया

 खाऊन उन्हाळा सुकली ही वनराई

 दृष्टीस पडेना हिरवे चार कुठेही

 काळी ठिकळे आणिक हे कुंपण काटे

 या वाचून शेतात दुजे काही न भेटे

 या शुष्क तृणांनी भरल्या पाऊल वाटा

 रानात दिसे जीर्ण उभा लाकूडफाटा

 बारीक ढगाळी दिसती सुन्न आभाळी

 रोडाऊनी ओढ उघडी होत लव्हाळी

 झाडांवर पक्षी दिसती केविलवाणी

 आणिक पिकांची सरली साखरराणी

 ओहोट कधी घेईल हा तीव्र उन्हाळा

 देईल कधी पाणकळा सुख जीवाला…

कविवर्य ग. ल. ठोकळ (१९३१)

संकलक : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 252 – बालमोहिनी..! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 252 – विजय साहित्य ?

☆ बालमोहिनी..!

बालरूप‌हे, श्रीरामाचे,

कपी बालके,भवताली.

प्रेमळ मोहक,सुहास्य‌वदनी,

राम सानुला,वनमाळी. १

*

चंद्र प्रभेने, झळके मुद्रा,

तेजस लोभस,रामाची

सशस्त्र होऊन, खेळ खेळतो,

वानर बाळे,कामाची .२

*

दिठी तयाची,चित्ताकर्षक,

स्मितहास्याने, भरलेली.

मूर्त साजिरी,बाल शशीची

आभुषणांनी,सजलेली.३

*

माळ केशरी,वस्त्र केशरी,

उत्साहाच्या बलभीमा.

मुकुट शिरीचा,वेष राजसी

अध्यात्माच्या, परिसीमा.४

*

त्याग समर्पण,धैर्य वीरता,

पुरुषोत्तम हा,करी लिला.

रूप हरिचे, बाल सोबती,

वेचक वेधक,राम लिला.५

*

आनंद शक्ती, रामा ठायी

रामबाण‌ हे, रूप नवे.

पहा भोवती,श्रीरामाच्या

बागडणारे, कपी थवे.६

*

बाल रुप हे,रघु रायाचे,

चराचराला, असे लळा.

दशरथ नंदन, राम आगळा,

चैतन्याचा,फुले मळा.७

*

राम रूपाची,बाल मोहिनी

सालंकृत हा‌ दिसे हरी.

राजस‌ लोभस,छबी आगळी,

प्रत्येकाच्या,हवी घरी.८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “आईचे उपकार…“☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

☆ आईचे उपकारसौ. वृंदा गंभीर

एक दिवस मातृदिन साजरा करून सिद्ध होई मातेचे प्रेम

मनी कुठला भ्रम ठेऊनी साजरा करतो हा दिन

आई च्या सुंदर संस्कारातच असतो हो राम

आई ला क्षणाक्षणाला द्यायला हवा मान

*

आई असते संस्काराची शिदोरी छान

आई मुळेच मिळतो समाजात मान

तिच्यात असते ईश्वराची छाया अन माया

आई चं असते घडवणारी आयुष्याची शान

 *

आईविना घर असतं सुनं सुनं आईविना अंधाराचं जीणं

लेकीला आईची कूस वाटे गोड आईविना माहेर नसे गोड

आईला वंदन करते कोटी कोटी

जन्मदेऊन केल्या जगाच्या भेटी

 *

आईची जागा हृदयात ठेवा नको वृद्धाश्रमात

एक दिवस साजरा करून फिटत नाही तिचे पांग

आई असेलतर घर कसे राहते आनंदात

तिच्या उपकारांची असते जीवनात रांगच रांग

 *

आईचे उपकार कुणीच फेडू शकत नाही

कताड्याचे जोडे केले तरी ऋण फिटत नाही

तिला असते फक्त दोन प्रेमळ शब्दाची अशा

तिला फक्त समजते प्रेमाची भाषा

 

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares