श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – १ ☆ श्री दीपक तांबोळी

कुठेतरी वीज कडाडली.त्या आवाजाने शहारुन अंजलीने खिडकीतून बाहेर पाहिलं.पावसाचा जोर खूप वाढला होता.सकाळपासूनच तो वेड्यासारखा कोसळत होता.सकाळी रितेश आँफिसला जायला निघाला तेव्हाही तो कोसळतच होता पण आतासारखं त्याचं स्वरुप रौद्र नव्हतं म्हणून तर रितेशला तिने अडवलं नव्हतं.सात वाजले होते.थोड्याच वेळात रितेश येणार होता.रेनकोट घालून गेला असला तरी तो थोडाफार ओला होणारच होता.’

आई बाबा आले नाही का गं?”छोटी पाच वर्षांची प्रिया बाहेर येवून विचारत होती.अंजली भानावर आली.”

 नाही अजून. येतील थोड्याच वेळात.तुझा अभ्यास झाला?”

मान डोलावत प्रियाने आपल्या हातातली वही तिच्यासमोर केली.एक ते दहा अंक लिहायचे होते.ते तिने व्यवस्थित लिहिले होते.

“आई देवाघरी जाणं म्हणजे काय गं?”तिच्या शेजारी सोफ्यावर बसत अचानक प्रियाने विचारलं.अंजली चमकली.

“का गं कुणी काही म्हंटलं का?”

” हो.ती आर्या आहे ना आमच्या क्लासमध्ये. तिचे बाबा देवाघरी गेले म्हणून ती आज आली नव्हती.”

अंजली अवघडली.त्या लहानग्या जीवाला काय सांगावं ते तिला सुचेना.शेवटी तिने खरं सांगायचं ठरवलं.

” बेटा आपण जन्म घेतो.मोठे होतो.शेवटी वय वाढलं की आपल्या सर्वांना मरण येतं.मरणं येणं म्हणजेच देवाघरी जाणं”

“हो पण मरणं म्हणजे काय?” प्रियाने निरागस चेहऱ्याने अजून एक गुगली टाकला.

” मरण म्हणजे आपलं आयुष्य संपणं.आपण मेलो की आपण नंतर कधीही कुणाला दिसत नाही.तू मोठी झाली की तुला सगळं व्यवस्थित कळेल.चल आता मला स्वयंपाक करु दे.बाबा येऊन फ्रेश झाले की आपण जेवायला बसू.”

लेकीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघून तिला हसू आलं.पण तिचे प्रश्न लवकर संपणार नाहीत हे तिला अनुभवावरुन माहित होतं.प्रिया मग पुस्तक उघडून वाचत बसली.अंजली किचनमध्ये आली पण येतायेता प्रियाचा जन्म झाला तो दिवस तिला आठवला.मुलगीच झाली म्हणून सगळं घराणं नाराज होतं.कारणही तसंच होतं.तिच्या मोठ्या दिराला आणि नणदेलाही दोन्ही मुलीच होत्या.रितेशला तरी मुलगा व्हावा म्हणून तिच्या सासुबाईंनी कितीतरी नवस कबूल केले होते.रितेशला स्वतःला मुलगाच हवा होता.तोच काय अंजलीच्या भावानांही मुलीच असल्याने आपल्याला तरी मुलगा हवा याची तिने स्वतःही स्वप्नं रंगवली होती.अर्थातच प्रियाच्या जन्मामुळे सर्वच नाराज होते.तिच्या सासुबाईंनी तर महिनाभर नातीचं तोंड पाहीलं नव्हतं.प्रिया मोठी झाली ,गोड दिसायला लागली.मग मात्र सर्वांची नाराजी कमी होत गेली.तिच्या बाललीलांनी आणि बडबडीने सर्वांना वेड लावलं.पण आता दुसऱ्यावेळी मात्र मुलगाच हवा असंच सगळ्यांचं म्हणणं होतं.

अंजलीचा स्वयंपाक झाला पण रोज सात वाजेपर्यंत घरी येणाऱ्या  रितेशचा पत्ता नव्हता.पावसामुळे त्याला उशीर होईल हे तिने ग्रुहित धरलंच होतं.पण सव्वाआठ झाले होते.प्रियाला भुक लागली असणार म्हणून तिने त्याला फोन लावला.बराच वेळ टूकटूक वाजत राहिलं .शेवटी फोन न लागताच बंद झाला.तिने लागोपाठ तीन चार वेळा फोन लावला पण प्रत्येक वेळी बराच वेळ टूक टूक वाजून फोन बंद होत होता.शेवटी कंटाळून तिने प्रियाला हाक मारली.

“प्रियू.ये आतमध्ये आणि जेवून घे”

प्रिया आत आली आणि म्हणाली

” मी बाबा आले की जेवणार आहे”

“अगं वेडी आहेस का?बाहेर पाऊस सुरु आहे.त्यांना किती वेळ लागेल माहित नाही. तू जेवून घे आणि झोप”

” नाही. मी बाबांसोबतच बसेन”

ती जणू हट्टालाच पेटली होती.

“बरं ठिक आहे.नऊपर्यंत वाट पाहू या.मग मात्र जेवून घ्यायचं हं मुकाट्याने”

प्रियाने मान डोलावली.

दोघीही हाँलमध्ये येऊन बसल्या.अंजलीने टिव्ही लावला.सिरीयलमध्ये नेमका एका पात्राचा अपघाती म्रुत्यु दाखवल्या जात होता.तो पाहून अंजलीला अस्वस्थ वाटू लागलं.तिने चँनल बदललं पण मनाची अस्वस्थता काही कमी झाली नाही.

“आई बाबांना खुप ऊशीर झाला ना?फोन कर ना त्यांना”प्रिया म्हणाली .तिच्या बोलण्यात आणि चेहऱ्यावर चांगलीच बैचेनी दिसत होती.अंजलीने मोबाईल घेऊन रितेशचा नंबर डायल केला पण मघासारखाच त्याचा फोन लागला नाही. काय करावं याचा विचार करत असतांनाच तिला एक कल्पना सुचली.रितेशचा मित्र प्रकाशचा नंबर तिच्याकडे होता.तिने प्रकाशला फोन लावला

” भाऊजी हे अजून घरी आले नाहीत. त्यांचा फोनही लागत नाहिये.काही आँफिसचं महत्वाचं काम होतं का?” प्रकाशने फोन उचलल्यावर तिने विचारलं

“नाही तसं तर काही काम नव्हतं आणि रितेश तर साडेसहालाच आँफिसमधून बाहेर पडला.आतापर्यंत घरी पोहचायला हवा होता.मीसुद्धा आताच घरी आलोय.वाटेत खुप पाणी साचलंय.पण तुम्ही काळजी करु नका वहिनी. येईल तो.रस्त्यात कुठंतरी अडकला असेल”

” तुम्ही फोन करुन बघता का त्यांना?”

” हो करतो ना!आणि लगेच तुम्हांला अपडेट्स कळवतो”

“ओके.थँक्स” तिने फोन ठेवला

दहा मिनिट्स झाले पंधरा झाले तरी प्रकाशचा फोन आला नाही. शेवटी अंजलीने त्याला फोन करण्यासाठी मोबाईल उचलला तेवढ्यात त्याचाच फोन आला

“वहिनी तीनचार वेळा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला पण फोन काही लागत नाहिये. मला काय वाटतं आपण अकरापर्यंत थांबावं.मग नंतर मी कुणालातरी घेऊन त्याला पहायला जातो”

” भाऊजी पोलीस कंम्प्लेंट केली तर?”

” त्यासाठी आपल्याला सिटी पोलिस स्टेशनला जावं लागेल.एकतर सध्या जोरदार पाऊस सुरु आहे शिवाय ठिकठिकाणी झाडं कोसळून पडली आहेत.त्यामुळे आपल्याला तिथपर्यंत जाणंच मुश्कील. दुसरं म्हणजे मला नक्की नियम माहित नाही पण पोलिसही किमान चोवीस तास वाट बघायला सांगतात मगच तक्रार स्विकारतात.आपण असं करु उद्या सकाळी पोलिस स्टेशनला जाऊ तोपर्यंत वाट बघूया रितेशची “

“चालेल भाऊजी मी अकरा वाजता फोन करते तुम्हांला”

तिने फोन ठेवला तशी प्रिया एकदम येऊन तिला बिलगली

“आई बाबा येतील ना गं?” तिच्या डोळ्यात आसवं जमा होत होती.

” हो गं बेटा.येतील.तू चल बरं जेवून घे आणि झोप.उद्या सकाळी शाळेत जायचंय ना?”

प्रियाने मान डोलावली

” पण मला भुक नाहिये.बाबा आल्यावर आपण एकत्रच जेवूया ना “

” नको.त्यांना उशीर झाला तर तू झोपून जाशील.आणि मग जेवणार नाहीस “

तिला ते पटलं असावं.म्हणून मग ती आईच्या मागे किचन मध्ये गेली.अंजलीने तिला वाढलं

“आई तू पण जेव ना!”

“नाही बेटा मी बाबांसोबतच जेवते तुला माहितेय ना?”

“हो”

प्रियाने जेवायला सुरुवात केली पण चतकोर पोळी खाऊन होत नाही तर ती म्हणाली

“आई बस झालं मला भुक नाहिये”

“अगं असं काय करतेस?तेवढी पोळी संपव तरी!रोज तर दोन पोळ्या खातेस.”

“नको ना आई प्लीज.मला खरंच भुक नाहिये”

“बरं चल.हात धू आणि झोप”

तिला बेडरुममध्ये झोपवून ती बाहेर हाँलमध्ये आली.परत तिने रितेशला फोन लावला पण तोच प्रकार पुन्हा घडला.मग तिने टिव्ही लावला.तिची आवडती सिरीयल सुरु होती पण ती बघण्यातही तिचं मन लागेना.नवरा करतो तशी चँनल वारंवार बदलून ती सर्फिंग करु लागली पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं.जरासा गाडीचा आवाज आला की तिचे कान टवकारायचे.टिव्ही म्युटवर करुन ती फाटक उघडण्याचा आवाज ऐकायचा प्रयत्न करायची.दोनतीनदा तर तिने दरवाजा उघडून बाहेरही बघितलं होतं.पाऊस सुरुच होता.खरंतर पाऊस तिला खुप आवडायचा.रिमझिम पावसात तिला भिजायला खुप आवडायचं.पण आताचा पाऊस जीवन देणारा नसून जीवन हिरावून घेणारा होता.या पावसाने आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार कोसळणार होते.उभ्या पिकांना झोपवून टाकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची स्वप्नं भंग पावणार होती.अर्थातच एरवी रोमँटिक वाटणाऱ्या या पावसाला आता मात्र ती मनातल्या मनात  शिव्याच देत होती.

दहा वाजले.आता बेडरुममध्ये जाऊन पडावं असं वाटून ती उठायला लागली तोच प्रिया बाहेर आली

“आई बाबा अजून आलेच नाही का गं?”तिने रडक्या आवाजात विचारलं

“नाही बेटा.पण येतील.तू जाऊन झोप”

” मला झोप येत नाहिये.बाबांचा फोन आला होता?”

“नाही. पण मला वाटतंय ते लवकरच येतील” आपल्या स्वतःच्या बोलण्यावर तिला विश्वास नव्हता पण तीच्या समाधानाकरता ती बोलली.

प्रिया एकदम जोरजोरात रडायला लागली

“आई मला बाबांची खुप आठवण येतेय गं!”

अंजलीने तिला जवळ घेतलं

“अगं वेडाबाई इतकं रडायला काय झालं?अगं येतील बाबा”

“आई त्या आर्यांच्या बाबांसारखे माझे बाबा देवाघरी तर नाही ना गेले?”

अंजलीला एकदम धक्का बसला.लेकीच्या मनातली खळबळ तिच्या लक्षात येऊन तीही अस्वस्थ झाली

“चल काही काय बोलतेस.असं काही होणार नाही. आणि असं वाईट बोलायचं नसतं बेटा.चल तू झोप बरं”

“नाही. मला झोप येत नाहिये. मला माझे बाबा पाहिजेत” ती अजुनच जोरात रडायला लागली

“हो पण तू रडल्यामुळे तुझे बाबा परत येतील का?चल आपण दोघीही झोपू”

तिला तसंच उचलून अंजली बेडरुममध्ये आली.तिला झोपवून थोपटू लागली.प्रिया अजून रडतच होती.थोड्या वेळाने तिचा आवाज कमीकमी होत गेला आणि शेवटी ती झोपली.ती झोपल्याचं पाहून अंजलीने स्वतः झोपायचा प्रयत्न केला.पण नाना शंका कुशंकांनी भरलेलं मन तिला झोपू देत नव्हतं.ती उठून हाँलकडे आली.वाटेत देवघर दिसलं आणि ती थबकली. देवासमोर उभं राहून तिने हात जोडले.

” देवा काही चुकलं असेल तर माफ कर पण माझ्या नवऱ्याला सुरक्षित घरी येऊ देरे बाबा” तिने प्रार्थना केली.संकटाच्या वेळी तिची आई गणपती पाण्यात ठेवायची याची तिला आठवण आली.”आपणही ठेवावा का तसा?” तिला प्रश्न पडला.”नको.अजून तितकी वाईट वेळ आली नाहिये”तिने स्वतःच त्याचं उत्तर दिलं आणि ती हाँलमध्ये येऊन सोफ्यावर बसून राहिली. हाँलमधला लाईटही लावायची तिला इच्छा झाली नाही.बसल्याबसल्या रितेशचा हसरा तिच्या नजरेसमोर उभा राहिला.त्याच्यासोबत घालवलेल्या गेल्या सहासात वर्षातले अनेक बरेवाईट प्रसंग तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले. रितेश तसा चांगलाच होता.हसमुख होता,समजदार होता.पण आईवडिलांबाबतीत नको तेव्हढा संवेदनशील होता.त्यांच्यातले दोष दाखवलेले  त्याला आवडायचे नाहीत.याचं कारणही तसंच होतं.रितेशला त्याच्या आईवडिलांनी अतिशय विपरीत परिस्थितीत वाढवलं होतं.त्याची जाण रितेशला होती म्हणून तो नेहमी आईवडिलांची बाजू घ्यायचा.मग ते चुकीचे असले तरीही. त्यामुळे अंजलीला  सासूसासरे असेपर्यंत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला होता.सासूसासरे वारल्यानंतर मात्र सगळं सुरळीत झालं होतं.

क्रमश: भाग १

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments