मराठी साहित्य – विविधा ☆ “दोन हजारांची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “दोन हजारांची गोष्ट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आज रविवार…… रोज घडाळ्याच्या काट्यानुसार होणारी कामे दर रविवारी जरा हळू हळू होतात. पण आजचा रविवार वेगळाच होता. 

खूप घाईने नसली तरी सकाळपासूनच घरात आवराआवर सुरू झाल्याचे लक्षात आले. प्लास्टिक बरण्यांमध्ये भरलेले कडधान्य, दाणे, तिखट, मीठ हे बरणी उलट सुलट करून बारकाईने बघितले जात होते. डाळ, तांदूळ, रवा इत्यादी वस्तुंच्या डब्यात हात खोलवर घालून हात व्यवस्थित फिरवून पाहिले जात होते. गव्हाच्या छोट्या कोठीत कापडात गुंडाळून टाकलेल्या पाऱ्याच्या गोळ्या चाचपून बघितल्या जात होत्या. शंका आल्यास ती कापडी पुरचुंडी उघडून बघितली जात होती. 

कशातही आपल्याला हवे ते सापडते का? यांची चेहऱ्यावर असणारी उत्सुकता, काहीच मिळाले नाही तर नाराजीचा सूर निघत बदलत होती.  रॅक मध्ये डब्यांच्या खाली घातलेले पेपर देखील काढून पाहिले जात होते. त्या पेपरच्या घडीत चुकून नाही ना याची खात्री केली जात होती.

कशाला हवी दर रविवारी अशी आवराआवर…….. असा कधी कधी निघणारा नाराजीचा सूर अजिबात निघाला नाही. दोघींचे सुर आज चांगलेच जमले होते. तसे जमतेच. पण आज एकदमच छान जमले होते. सुरसंगम…….

पुर्वी घरात पोत्यांमध्ये धान्य असायचे. आता धान्य पाच सात किलोच्या डब्यात आणि पोत्यांमध्ये जास्तीची (केव्हातरी लागतील म्हणून घेतलेली) भांडी आढळतात.  स्वयंपाक घरात अपेक्षित असे हाताला फारसे काही लागले नाही. फक्त डब्यात हात घालतांना जरा घाई झाल्यामुळे हाताला थोडेसे लागले इतकेच. हाताला लागणे याचे दोन्ही अर्थ मला चांगले समजले. पण ज्या अर्थासाठी (पैशांसाठी) ही  आवराआवर सुरू होती ते व्यर्थ ठरले होते.

आता मोर्चा कपड्यांच्या कपाटाकडे वळणार होता. त्यांच्या मोर्चात मला सामील करून घेतले. (मोर्चा असल्याने तुम आगे बढ़ो…. हम तुम्हारे साथ है| अशा घोषणा मी दबक्या आवाजात दिल्या.) कपाटातील खालचे कपडे वर, वरचे खाली. मागचे पुढे, पुढचे मागे. असे सगळे करुन झाले.

काही साड्यांच्या घड्या त्या साड्या घेतल्यापासून मोडल्या नव्हत्या. (हे त्यांच्या बोलण्यावरुनच समजलं) या निमित्ताने त्या साड्यांच्या घड्या (जागेवरच बसल्या बसल्या) मोडून तर झाल्याच. पण साड्या झटकून देखील झाल्या. त्यातही अपेक्षित असे काही मिळाले नाही. फक्त  चार पाच डांबरच्या गोळ्या तेवढ्या घरंगळत बाहेर पडल्या…. माझे सगळे शर्ट, पॅन्ट झटकून तर झालेच. पण त्यांचे खिसे देखील तपासून झाले. (नोटा मिळाल्या नाहीत, पण दुसरेही आक्षेपार्ह असे काही मिळाले नाही. यावर दोघांचा समाधानाचा सुस्कारा तेवढा एकाचवेळी बाहेर पडला.) घेतलेले, मिळालेले शर्टपीस, पॅंटपीस, जास्तीचे टाॅवेल हे देखील मोकळे करून झाले. 

घरात असणाऱ्या सात आठ प्रकारच्या वेगवेगळ्या पर्स, पर्स मध्ये ठेवलेल्या पर्स यांच्या प्रत्येक कप्यांची कसून तपासणी झाली. त्यात एक दोन टाकल्याची पाकिटे, दोन चार चॉकलेट, सोन्याचे दागिने घेतांना त्या माणसाने केलेले आकडेमोडीचे चार पाच छोटे कागद, काही चिल्लर, पाच सहा औषधांच्या गोळ्या सोडल्या, तर हव्या त्या नोटा औषधालाही सापडल्या नाहीत.

दिवाणावरील गाद्यांची उलथापालथ झाली. येवढीच उलथापालथ पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर देखील झाली होती. चादरी सरळ होत्या त्या विस्कटून झाल्या.  दोन चार किरकोळ बिलं, लाईट बिल, कधीतरी काढलेल्या (जास्तीच्या) आधार कार्डच्या झेराॅक्स काॅपीज, एक दोन पुस्तके, बॅंकेचे चेकबुक, पासबुक या शिवाय गादीखाली काहीच पसारा नव्हता. घर आवरण्याऐवजी पसाराच जास्त झाल्याचे लक्षात आले. 

शेवटी आपल्याकडे दोन हजारांची नोट नाही आणि त्यामुळे ती बदलण्याची गरज नाही यावर शिक्कामोर्तब झाले. आणि आता थोडी विश्रांती घ्यावी म्हणून गादीवर पडणार तोच…

अय्या… खरंच… अहो ते देवघरातील पोथ्यांमध्ये तीन चार नोटा ठेवल्याचे मला चांगले आठवतेय…… असे म्हणत दोघींचा (गृहमंत्री आणि राष्ट्रपती, बायको आणि आई) मोर्चा पोथी ठेवलेल्या जागेवर गेला‌…….

दोघापैकी पैकी एकीचा आवाज… ‘ कुठेतरी ठेवल्यासारखे मला सारखे आठवत होते…’  दुसरा आवाज .. ‘ कुठेतरी नाही…… कुठेतरीच ठेवल्या होत्या. ही काही जागा आहे का ठेवायची…’. (घरापरत्वे हे आवाज आपसात बदलू शकतात.) हाताला लागणे याचे वेगळे अर्थ मला समजले, तसे कुठेतरी याचेही वेगळे अर्थ समजले.

अशा रीतीने आवराआवर झाल्यावर दोन चार दोन हजारांच्या नोटा मिळाल्या. सुवर्ण पदक मिळाल्यावर विजेता जसे त्या पदकाला निरखून पाहतो आणि कपाळाला लावतो तसेच या नोटांच्या बाबतीत देखील झाले.

आता उद्या बॅंकेत जाणे आलेच…  

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे ☆

सुश्री अर्चना दादासाहेब मुळे

परिचय 

शिक्षण 

  • पदवी –  मानसशास्त्र आणि पत्रकारिता
  • पदव्युत्तर पदवी – एम. एस. डब्ल्यू.
  • डिप्लोमा  – समुपदेशन
  • व्यवसाय: समुपदेशन तज्ज्ञ, संवाद समुपदेशन केंद्र.सांगली.

विद्यार्थी समुपदेशक — पद्मभुषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी. इथे महिन्याला ३५ ते ४० विद्यार्थ्यांचं समुपदेशन केलं जातं.

प्रकाशित साहित्य: राज्यातील विविध वृत्तपत्रे, नियतकालिक, मासिक यामध्ये लेख व कवितांना प्रसिध्दी. दै. लोकसत्ता मधून काही लेखाना प्रसिध्दी.

पणती – काव्यसंग्रह प्रकाशित.

वयात येताना – पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर

?  विविधा ?

☆ क – क करियर… ☆ सुश्री अर्चना दादासाहेब मुळे☆

हजारो पालकांना, मुलांशी संवाद साधत असताना अनेकवेळा असं वाटत राहतं की, भारतात बाळांचा जन्म होतंच नाही.  इथे जन्मतात इंजिनियर्स, डाॅक्टर्स, वकील, मार्केटिंग गुरू, सरकारी नोकर, खाजगी कंपन्यांमधील कर्मचारी, एच आर, एम आर म्हणजे पैसे मिळवणारी जिवंत मशिन्स. कारण गर्भात असताना बाळाच्या कानावर आई वडिलांची स्वप्नंच पडतात. आपलं बाळ मोठं झाल्यावर प्रथितयश डाॅक्टर होणार. तो आय टी कंपनीत नोकरी करणार. यु एस मधे शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक होणार. बाळाच्या चाहुली बरोबरच त्याच्या करियरसाठीचं नियोजन सुरू होतं. बाळाचे डोळे आकाराला येण्यापूर्वीच त्याला स्वप्नं दाखवली जातात. जेंव्हा मुलगा क – क कमळ हाताने गिरवत असतो. त्याचवेळी पालकांच्या डोक्यात मुलाचं क – क करियर एखाद्या वादळासारखं चकरा मारत असतं. 

भारतात स्वत:चं करियर पणाला लावून मुलांचं करियर घडवू पाहणारे पालक मोठ्या प्रमाणात आहेत. पोटाला चिमटा काढून मुलांचं करियर घडवण्याचा प्रयत्न करणारे, मुलांना शिक्षणात काहीही कमी पडू नये म्हणून मुलांच्या सर्व मागण्या पुरवणारे, मुलांच्या मुलभूत शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी जिद्दीने कष्ट करणारे, वडिलोपार्जित संपत्ती मुलांवर खर्ची घालणारे असे अनेकविध प्रकारातील पालक दररोज भेटतात. आपल्याकडील जवळजवळ सर्वच पालकांना ठराविक क्षेत्रातील उच्च शिक्षण हे पैसे मिळवण्यासाठी, भविष्यात स्थिरस्थावर होण्यासाठी महत्वाचा आणि खात्रीचा मार्ग आहे असंच वाटत असतं. परंतु करियर हे मुलांच्या आवडीच्या क्षेत्रातही होऊ शकतं. त्या क्षेत्रातील उच्च शिक्षण घेता येऊ शकतं. अशा क्षेत्रावर आणि आपल्या मुलांवरही पालकांचा विश्वास नसतो. त्यानी सुचवलेल्या क्षेत्रातच मुलानी करियर करावं असा अट्टाहास बर्‍याच पालकांचा असतो.

मुलांना हव्या त्या क्षेत्रात स्थिर होऊ दिलं तर कदाचीत पैसे कमी मिळतील पण आनंद केवढा मिळेल. समाधान किती मिळेल. या सुखाच्या कल्पनांना कोणत्या पॅकेजमधे कसं बसवता येईल. याचा  थोडातरी विचार पालकांनी करायला हवा. तसेच करियरच्या मागे धावणार्‍या तरूणांनी क क करियर व्यवस्थित समजून घ्यायला हवं. तरच तरुणांमधले मानसिक घोटाळे संपुष्टात येण्यासाठी मदत होईल.

काही क्षेत्रात मिळणार्‍या एखाद्या पॅकेजचा तुलनेने गाजावाजा होत नाही म्हणून त्या पर्यायांकडे दुर्लक्ष केलं जातं. भारतात असे कितीतरी चित्रकार आहेत ज्यांचं एक चित्र लाखाची कमाई करून देतं. अॅनिमेशन पदवीधारक असणारे कितीतरी तरुण वीस बावीस लाखाचं पॅकेज घेत आहेत. फोटोग्राफर्सची कमाई सुध्दा काही कमी नसते. वाईल्ड फोटोग्राफर्स तरी एक वेगळाच थरार अनुभवण्यात यश मानतात. चित्रपट सृष्टीमधे तर विविध तर्‍हेचं कौशल्य असणार्‍यांना अनेक संधी आहेत. करियरची संधी अजमावण्यासाठी हजारो क्षेत्र उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थी पालकांची नजर ठराविक क्षेत्रावरुन हलतंच नाही. मुलाना वेगळं काहीतरी करायचं असतं परंतु ते वेगळं काय हे शोधता येत नाही. पालकांचा संकुचित दृष्टिकोन मुलाना त्यांची स्वत:ची पायवाट तयार करु देत नाही. मुलांना करियर निवडीचं स्वातंत्र्य दिलं जात नाही. 

एका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिकणार्‍या एका मुलाने माझं भाषण होईपर्यंत माझंच स्केच काढलं. नंतर मला ते गिफ्ट दिलं.तेंव्हा म्हणाला,”स्केच काढणं ही माझी आवड आहे.आतापर्यंत मी १५० पेक्षा जास्त स्केचीस काढल्या आहेत. वडिलांची इच्छा म्हणून मी इकडे आलोय.”

दुसरा एक मुलगा भाषण होईपर्यंत रडत होता. नंतर जवळ बोलावून विचारलं. तेव्हा म्हणाला,” मला बेस्ट कोरिओग्राफर व्हायचंय.इथे माझा जीव गुदमरतोय. अभ्यासात लक्ष लागत नाही. फेल झालो तरी आई बाबा नाराज होणार पण मला हे करायचंच नाही. आई बाबा माझं काहीही ऐकून घेत नाहीत.”

एका मुलीला प्राण्यांचं मानसशास्त्र शिकायचं होतं. तिने पालकाना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. किती वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण विषय आहे.पण पालकांच्या इच्छेपुढे तिचं काही चाललं नाही.

आज घडीला अशी शेकडो उदाहरणं देता येतील. अशा पालकाना मुलांच्या भविष्याची चिंता असते. परंतु त्यांचा वर्तमान चितेवर ठेवून कसलं भविष्य घडवण्याची भाषा हे पालक करत असतात तेच कळत नाही.  शिक्षण घेतल्यानंतरची आपल्याकडे नोकरीसाठी काय परिस्थिती आहे हे लक्षात यावं याकरता एक उदाहरण पाहूया. तमिळनाडू विधानसभेत १४ सफाई कामगार हवे होते. त्या नोकरीसाठी ४६०० इंजिनियर्स आणि एम बी ए पदवी प्राप्त मुलानी अर्ज केले होते… असं अनेक ठिकाणी घडतंय.

चांगलं शिक्षण घेऊनही जेंव्हा नोकरी मिळत नाही तेंव्हा करियर म्हणायचं तरी कशाला आणि शिक्षण घेऊन करायचं तरी काय असा प्रश्न  सुशिक्षित बेरोजगार तरुणांना आणि पालकांना पडणं साहजिकच आहे. खरंतर शिक्षण घेत असतानाच करियरचा विचार व्हायला हवा. मार्कांवरती अवलंबून न राहता आपल्या आवडी निवडी वरही थोडा विश्वास ठेवायला हवा.

यशाची व्याख्येतील विविधता- प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगळी असते. भरपूर पैसै मिळवण्यात एखाद्याला यश वाटत असेल. तर कुणाला प्रसिध्दीमधे यश वाटत असेल. एखादा रोजची कामं नीट झाली यातच यश समजत असेल. एखाद्याला आज पोटभर खायला मिळालं यातच यश वाटत असेल. आपलं यश आपण कशात मोजतो हे समजणं महत्वाचं आहे. त्यानुसार यशप्राप्तीसाठी नियोजन करणं आवश्यक आहे.

वेगळी वाट शोधलीच पाहिजे – इतरांनी शोधलेल्या मार्गावर जाणे सहज सोपे असले तरी त्याच मार्गावरून हजारो आधीच पोहोचलेले असतात. त्या गर्दीत हरवून जाण्यापेक्षा वेगळी पायवाट निर्माण करणं कधीही खडतरच असतं. परंतु त्या मार्गावरून हजारो आपल्या मागे येतात. आणि काहीच दिवसात या पायवाटेचा महामार्ग होऊ शकतो. हा विश्वास तरुणांमध्ये निर्माण करायला हवा.

अपयशातही साथ देणारेच खरे पालक- शिक्षणानंतरही मुलांना जेव्हा नोकरी मिळत नाही तेव्हा मुलांपेक्षा जास्त पालकच खचून जातात. चिडचिड करतात. मुलांना अपशब्द बोलतात. मुलांच्या भावना समजून घेण्यापेक्षा स्वत:च्या अनियंत्रित भावना मुलांवर लादतात. मुलांना अपयशाचा सामना करायचा असतो. तिथे पालक साथ देत नाहीत. 

‘स्व’ चा शोध घेता आला पाहिजे – स्वत: मधील क्षमता आणि कमतरता माहित असल्या पाहिजेत. कोणतंही व्यावसायिक क्षेत्र निवडताना आपण हे का निवडत आहोत याची स्पष्टता असायला हवी. कोणत्याही कारणास्तव हे क्षेत्र जबरदस्तीने निवडले गेले असेल तर त्यात जाणीवपुर्वक आवड निर्माण करता येऊ शकते.

भविष्याचा वेध- पैसा,नोकरी, छोकरी सगळं हवंय पण त्यापलीकडे जाऊन आपल्याला आपलं काम मनापासून स्विकारता येतंय का याचा वेध घ्यायला हवा. तर भविष्य सुरळीत होतं. 

कौशल्याधिष्ठीत शिक्षण –  नोकरीसाठी शिक्षण, त्यासाठीच अभ्यास ही संकल्पना बदलली पाहिजे. व्यवसाय, छोटा उद्योग करण्यासाठीचं शिक्षण उपलब्ध व्हायला हवं. आयटीआय, नर्सिंग, आॅटोमोबाईल्स सारख्या शिक्षण संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला हव्यात.

अशा संधींचा विचार करायचा झाला तर फॅशन डिझाईनर,चामड्याच्या वस्तू, सौंदर्य प्रसाधन, घड्याळं, दागिने, फरफ्युम्स, गाड्या, मयक्रोसाॅफ्ट, गुगल, फेसबुक, वाॅल मार्ट, फार्मास्युटिकल, इव्हेंट मॅनेजमेंट, फाॅरेन्सिक सायन्स, इंटिरियर डिझाईन, फिजिओथेरपी, नर्सिंग, पत्रकारिता, फोटो पत्रकार, अॅनिमेटर, गुन्हेगारी शास्त्र, मानसशास्त्र, लेखक, खेळाडू, शुज डिझाईनर, चित्रपट, नाट्य,नृत्य, संगीत, खेळातील पंच,ओशियनग्राफी, डिजिटल मार्केटर,ग्राफिक डिझाईनर,आय टी आय अशी अनेक क्षेत्रं लाखो रुपयांची कमाई करुन देऊ शकतात. त्यासाठी आपल्या आवडीचं क्षेत्र निवडण्याचं धाडस करायला हवं. नेमकं करियर शोधायला हवं. स्वत:चं निरीक्षण केलं तर निश्चितंच करियर सापडू शकतं.त्याला पालकांची साथ असेल तर मुलांची प्रगती होतंच असते.

क -क करियर म्हणजे फक्त रोजगार मिळवणं नाही तर कोणतंही काम करताना जगण्याचा आनंद घेणं होय. करियर शोधताना योग्य मार्गदर्शन करुन तरुणांची ऊर्जा टिकवून ठेवणं हे आव्हान पालकांनी स्वीकारायला हवं. काॅलेजमधून बाहेर पडल्याबरोबर  सर्वोच्च पद, मान सन्मान लगेचच मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवं. त्यासाठी कष्ट करणं, नविन गोष्टी शिकून घेणं, संबंधित कामाचं ज्ञान आत्मसात करणं, प्रश्न समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास करणं अशा गोष्टी जमायला हव्यात. आपले विचार मुक्तपणे आणि ठामपणे मांडता यायला हवेत. भावनांक चांगला असायला हवा. तरुणांचा देश असणार्‍या भारतात तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी सर्वानी मिळून घ्यायला हवी नाहीतर त्यांच्या हातात व्यसनाधिनतेचे पेले असतील. आणि त्यांचं डोकं मानसिकतेनं खचलेलं, अनेक छिद्र पडलेलं मडकं असेल.

© सुश्री अर्चना मुळे 

समुपदेशन तज्ज्ञ, सांगली

संपर्क – 21 ए बी,पार्श्व बंगला, श्रीवास्तुपूरम, धामणी रोड, सांगली – 416415

फोन – 9823787214 email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

🌸 विविधा 🌸

☆ मन आणि सकारात्मक विचारांचा प्रभाव … ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

आपले मन काय विचार करते याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असतो. तसे पाहता मन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य  भाग आहे. जे दिसत नाही पण अस्तित्वात आहे ते आपले मन. आपल्या मनात सतत विचारांचा कल्लोळ चालूच असतो. मग हे विचार कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक असतात.  आपल्यात तयार  होणारी सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा ही मनातूनच उगम पावत असते. कोणत्याही कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी आपणास प्रथम आपल्या मनाची तयारी ठेवावी लागते. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यास प्रयत्नासोबत आपल्या मनाची भक्कम साथ हवी असते.  लोक नकळतपणे बोलतात..  बघा ..  ” मनात आले तर करेन, नाहीतर नाही करणार ” 

आपले मन काय विचार करते याच्यावर आपले वागणे अवलंबून असते. मनात येणाऱ्या  बऱ्या-वाईट विचारांवर आपली वर्तणुक ठरत असते.  पण आपल्या मनास वाईट कृत्यांपासून परावृत्त करणे हे आपल्याच हातात असते. मन जर वाईट मार्गाने धावत असेल तर त्याला लगाम घालण्याचेही आपल्याच हाती असते. अर्थात अस्तित्वात नाही पण आपणासी संलग्न आहे अशा मनाचे दोर हे आपल्याच हाती असतात. आपणास जर स्वतःचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे प्रभावी  घडवायचे असेल तर मनाला ज्ञानाच्या मार्गाने वळवावे लागेल. आपले मन हे ज्ञानाने परिपूर्ण असले पाहिजे. ज्ञान हे चांगल्या विचारांचे उगम स्थान आहे. 

आपण आपल्या विचारात सकारात्मकता ठेवली पाहिजे. त्याकरिता रोज सकाळी योग, प्रार्थना,  अनेक चांगले विचार यांची मनाशी सांगड घातली पाहिजे. आपण सकाळी सकाळी जितका चांगला विचार करू तितक्या आनंदात आपले दिवस जातात. आपण पौष्टिक आहार घेऊन जसे शरीर तंदुरुस्त ठेवतो तसे चांगल्या विचारांचा नाश्ता रोज मनास भरवलाच पाहिजे. तेव्हाच आपले जीवन अतिसुंदर आणि निरोगी असेल. आपले मन हे सकारात्मक विचारांनी प्रफुल्लीत असावे. जसे सकारात्मक विचार हे आपणास आशावादी बनवतात, तसे नकारात्मक विचार आपल्याला नैराश्याकडे वाहून नेतात.  आपल्या मनावर जर नकारात्मक विचारांचा प्रभाव जास्त असेल तर आपण कोणत्याच कार्यात  यशस्वी होऊ शकणार नाही. इतकेच काय आपण जर मनाने दुबळे असू तर आजारी असताना कितीही  चांगल्या प्रतीची औषध घेतली तरी बरे होणार नाही. आपण जेव्हा दवाखान्यात जातो तेव्हा डाॅक्टर म्हणत असतात, ‘ घाबरू नका.  तुम्हाला या औषधामुळे बरे वाटेल.’ अर्थात डाॅक्टरसुध्दा प्रथम आपले मनोबल वाढवितात. निर्भय होऊन कोणत्याही संकटाचा सामना केला तर अर्धी लढाई आपण आपल्या मनाच्या तयारीवरच जिंकू शकतो.

आपण कोरोना काळाचा विचार केला तर हा काळ एखाद्या महायुद्धासारखाच होता. पण जे लोक मनाने  निर्भय, सबल होते, त्यांनी न घाबरता कोरोनावर मात केली. आणि जे भयभीत झाले ते या रोगाचे बळी ठरले. ‘ मी उद्याचा सूर्य अत्यंत प्रसन्नतेने पहाणार आहे.’ असा विचार आपण रात्री झोपताना केला तर नक्कीच उद्याचा दिवस आपल्यासाठी प्रसन्नता घेऊन येतो. ‘ मी खरोखर सुखी आहे.  माझे आयुष्य सुंदर आहे. मी निरोगी आहे. .माझे सर्व मित्र, नातेवाईक चांगले आहेत.’ ..  अशी अनेक सकारात्मक वाक्ये आपण रोज आपल्या मनावर कोरली पाहिजेत. जणू आपणच आपल्या भविष्याला सकारात्मकतेचे आव्हान दिले पाहिजे. मी येणाऱ्या संकटावर मात करण्यास समर्थ आहे असा विचार करून स्वतःमध्ये सकारात्मक उर्जा तयार केली पाहिजे. 

… अशा प्रकारे आपणाकडे सकारात्मक विचारांचे सुदृढ मन असेल तर आपण आयुष्य खूपच सोपेपणाने  आणि सुंदर जगू शकू हे निश्चित.

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. वाळवा , जि. सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी

? विविधा ?

☆ डोही मनाच्या… ☆ सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी ☆

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की

पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही

तसेच माणसांच्या मनाचा तळ समजला की

त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही

खूप दिवसांनी मला निवांत वेळ मिळालेला.. म्हणजे मी तो काढलेला होता अगदी प्रयासाने. स्वतःसाठी वेळ असतोच कुठे आपल्याला या धावपळीच्या जगात ?. घर, नोकरी, मुलं बाळं, नातेवाईक, सण समारंभ यातच गुरफटुन गेलेलो असतो आपण.. स्वतःकडे बघायला वेळच नसतो. स्वतःसाठी वेळ काढावा असे मनात पण येत नाही. बरं ते असो…

खूप उबग आला होता सगळ्याचा. अगदी सगळ्याचा. खोटं खोटं हसण्याचा, खोटं आनंदी आहे सुखी आहे हे दाखवण्याचा. कंटाळला होता जीव. घुसमट असह्य होत होती. काही सेकंद माझी मलाच भीती वाटली. सगळे मुखवटे फाडून टाकून जावे. . कुठे तरी अशा शांत ठिकाणी जिथे मी आहे तशीच मला दिसेन. देखावे करावे लागणार नाहीत. आपण कसे आहोत हे आपले आपल्याला कळत असतेच ना. जगाला दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? या विचाराने मन सुन्न झाले. नकळत पायात चप्पल चढवली आणि अशीच चालत निघाले न थांबता. कुठे जायचे असा विचारही मनात आलाच नाही. फक्त चालत राहिले… खिन्न मनाने एकटीच. . . बहुतेक निवांतपणा, एकटेपणा शोधत होते माझे मन. कोणत्याच भावना, कल्पना मनाला शिवतच नव्हत्या.

थोडा थंड वारा अंगाला स्पर्श करून गेला, पालापाचोळा वाऱ्याने सळसळला तेव्हा मी भानावर आले. संध्याकाळची वेळ होती. चंद्राचा मंद प्रकाश चोहोबाजूंनी पसरलेला होता. झाडांची सळसळ, पक्षांचा दुरुन येणारा आवाज आणि आल्हाददायक असे वातावरण एरवी मनाला मोहवून टाकणारेच होते. पण आता मनात अनेक प्रश्नांचे वादळ उठले होते त्यामुळे मनाला चैन नव्हती. मी तशीच जड पावलांनी चालत राहिले. थोड्या अंतरावर एक शांत डोह नजरेस पडला. बहुतेक मघाशी आलेली थंड वाऱ्याची झुळूक डोहाला भेटूनच आली असावी. ती झुळुक अंगावरून मोरपीस फिरवून गेल्याचा भास झाला.

पायात वाळलेली पाने घिरट्या घालत होती. एकदम हसू आले मला. . . घरी पायात सगळी सारखी (बंधने ) घुटमळत असतातच, इथे पण या पानांनी त्यांची जागा घेतली की काय असे वाटले. . . .

जरा निरखून पाहिले असता जाणवले की खट्याळ वारा त्या सुकलेल्या पानांशी छान खेळत होता. माझे तिथे असण्याने त्याच्या खेळात काहीच फरक पडत नव्हता. मी थोडी पुढे चालत आले. एक मोठे झाड दिसत होते. तिथे जरा जवळ गेल्यावर झाडाच्या जवळ थोडे हिरवेगार गवत दिसायला लागले. पायातली चप्पल नकळतच मी काढली आणि अनवाणीच झाडाच्या दिशेने चालू लागले. त्या झाडाखाली थोड़ी विसावले. पायातून हिरवाई डोळ्यात उतरावी तसे डोळे एकदम थंड झालेले. डोळे मिटून घ्यावे या विचारात असतानाच समोर निळाशार डोह एकदम शांत असल्याचे जाणवले, जसे की एखादा सन्यस्त. काहीही हालचाल नाही. कोणतीही वलय नाही. एकदम संथ आणि इतका स्वच्छ की तळ दिसावा. मी जरा पुढे येवून डोकावले तर खरंच तळ दिसत होता.

संध्याकाळची वेळ. चंद्राची एक छान लकेर सरळ पाण्याच्या आरपार अगदी तळाशी गेलेली मला दिसली. त्या किरणांच्या प्रकाशात काही दगड व वनस्पती एकदम चमकून गेले. थोडा मंद प्रकाश होता. त्यामुळे फारसे काही दिसले नाही, पण जे काही थोडेफार दिसले ते विलक्षण होते. खूप वेळ अशीच बघत राहीले त्या डोहाकडे आणि त्या तळातल्या अद्भुत वाटणाऱ्या निसर्गाच्या चमत्काराकडे. विलक्षण ओढ जाणवली मनाला. डोह आणि मन यांच्यांत काहीतरी साम्य असावे का हा विचार एक क्षणभरच मनात आला आणि गेला पण. मन आणि तेही डोहासारखे ? कसे शक्य आहे. इतके स्वच्छ नितळ मन असते का ?

तळ दिसावा एवढे. . . . .

आपल्या मनात किती चांगल्या वाईट घटना, गोष्टी, क्षण घर करून असतात. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या सगळ्यांनी मनाचा डोह ढवळून निघालेला असतो. मन अगदी गढूळ झालेले असते. त्यात आपल्याला तरी आपल्या मनाचा तळ दिसेल का ? तळ दिसला तरी तो असेल का या डोहासारखा नितळ. मनाच्या तळाशी धगधगत असतात काही सल, काही आठवणी, अपमान. आणि आपण त्यांनाच जोपासत बसतो. चंद्राची एक लकेरसुद्धा आपण त्यावर पडू देत नाही. त्या शांत स्वच्छ डोहाची तुलना मनाशी केली खरी पण ते बुद्धीला रुचेना.

माझ्या मनात असंख्य वादळे घेऊनच तर मी इथे पोहोचले होते. त्यातील साठलेला गाळ असह्य होत होता. पण याचा निचरा करण्याचा प्रयत्न आपल्यलाच करायला हवा …. चला आपल्याच मनात डोकावून बघूया. दिसतो का मनाचा तळ ते तरी बघूया. दिसत नाही ? हरकत नाही आपणच आपल्या मनातील साठलेला गाळ काढायला हवा. द्वेष, राग, मत्सर, घृणा, दुःख, वेदना या गाळरूपी भावनांना बांध घालू या. श्रध्दा, भक्ती, विश्वास, प्रेम या आनंदरूपी तुरटीने मनाचा डोह स्वच्छ नितळ करण्यास सुरुवात करू. सोपे नाही आणि इतके सोपे नसतेच काही…. पण अशक्यही नाही.

पक्षी हळूहळू घरट्यात परतू लागलेले. त्यांच्या दमलेल्या पण सार्थ चिवचिवाटाने मी भानावर आले. माझे मन एकदम शांत निर्मळ भासू लागले. . अगदी त्या डोहासारखे.

मी डोहाकडे पाहिले. तो माझ्याकडेच पहात होता. त्याने एक आश्वासक स्मितहास्य केले. माझ्या चेहर्‍यावर पण खूप दिवसांनी समाधानाचे हास्य उमटले. ते पण मी त्या डोहाच्या पाण्यातच पहात होते. त्याचे आणि माझे मन एकमेकांचे झालेले अगदी एकरूप …

आता खूप समाधानाने मी माझ्या घरच्या दिशेने भरभर पाऊले टाकत चालू लागले. घरच्या मुलाबाळांच्या ओढीने. पण ही ओढ आता खूप सुखावणारी होती. मी माझे मन जणू डोहाजवळ मोकळे करून निघालेले. दूर जातानाही तो डोह माझ्या मनात स्मरणात तसाच राहिला. अगदी सखा व्हावा असा ….

© सौ. पल्लवी ऋषिकेश कुलकर्णी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

☆ “आधुनिक वटपौर्णिमा…” ☆ सौ राधिका भांडारकर

आधुनिक म्हणजे नेमके काय?

जुन्या चालीरीतींना डावलणे, परंपरा मोडणे, जे वर्षानुवर्षे चालत आले आहे त्याला विरोध  दर्शविणे…काहीतरी वेगळं नवीन करणं म्हणजे अधुनिकता का?

खरं म्हणजे आधुनिकता याचा अर्थ कुठल्याही परंपरेच्या संकल्पनेचा शोध घेणं…त्यातली भूमिका, कारणं, आणि काळ याचा अभ्यास करुन बदलत्या काळाशी, वातावरणाशी, जीवनपद्धतीशी  त्याची सांगड घालून

प्रथेचं उचित नूतनीकरण करणं म्हणजे आधुनिकीकरण…. हा अर्थ मला अधिक पटतो…आधुनिकीकरण म्हणजे उच्चाटन नव्हे– तर पुनर्बांधणी.

वटपौर्णिमा ह्या मुख्यत्वे स्रियांच्या सणाविषयी काही भाष्य करताना हा विचार महत्वाचा वाटला…

पारंपारिक पद्धतीची वटपौर्णिमा म्हणजे ,पत्नीने पतीला दीर्घायुष्य मिळावे,आणि हाच पती सात जन्म मिळावा म्हणून केलेले व्रत !! मग उपास, वडाची पूजा ,वडाभोवती दोरा गुंडाळत मारलेल्या फेर्‍या..वगैरे वगैरे.. मग त्याच्याशी जोडलेली सत्यवान सावित्रीची कथा…

वास्तविक हिंदू संस्कृतीत कुठल्याही सणाशी , व्रताशी कुठलीतरी  कथा ही असतेच…मात्र या कथांच्या माध्यमातून एक शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन असतो. तो समजून घेणं म्हणजे आधुनिकता..

आणि आजची स्त्री हा विचार करते. कारण ती शिक्षित आहे. विचारक्षम आहे. परंपरेतला अंधश्रद्धेचा ,फोलपणाचा भाग ती डावलू शकते…आजची स्त्री वटपौर्णिमेच्या दिवशी भले उपास करणार नाही, विधीपूर्वक वडाची पूजा करणार नाही, सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून प्रार्थना करणार नाही ,पण या मागचं सौंदर्य आणि महत्व नक्की जपेल. तेही डोळसपणे…

वटवृक्षाच्या नैसर्गिक सुंदरतेचे , उपयुक्ततेचं या सणाशी , व्रताशी घनिष्ठ नातं आहे.पर्यावरणाचा महान संदेश यातून दिला आहे…हा वड सावली देतो, भरपूर प्राणवायू पुरवतो, पक्षी पांखरं पांथस्थ यांचा आधारवड आहे. याची मुळं मातीची धूप होऊ देत नाहीत .आणि हे झाड दीर्घायुषी असतं..त्याची पूजा ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असते..त्याचं जतन करण्याची शपथ घेणं असतं..आणि ही जागरुकता असणं ही काळाची गरज आहे…आजची स्त्री हे जाणते…वृक्षसंवर्धन ही हिंदू संस्कृतीत प्रत्येक सणाची मूळ संकल्पना आहे. आणि ती पाळणं म्हणजेच नवा विचार रुजवणं … मग बाकीच्या बाबी या केवळ मौज, हौस, गंमत  करमणुक — ‘साजरीकरण’ या सदरात कुठल्याही अंधश्रद्धेविना जाऊ शकतात…

आजही एखादी व्यक्ती जीवघेण्या आजारातून बरी झाली की आपण त्याच्या पत्नीविषयी चटकन् म्हणतो, “..खरंच सावित्री आहे ती..म्हणूनच तो मरणाशी झुंज जिंकला….”

… इथे सावित्री ही प्रतिकात्मक असते. ती शक्ती असते. सकारात्मकता असते.

आजच शेजारचा अमोल म्हणाला.,” गेले दहा दिवस सीमा आजारी आहे. तिला विश्रांतीची गरज आहे. .मी घर सांभाळू शकलो नसेल तिच्याइतकं..पण मनापासून केलं. आज साबुदाण्याची खिचडी तिचा वटपौर्णिमेचा उपास म्हणून बनवलीही… आणि काकू आज मीही उपास केला..का विचारा..

तमाम सावित्र्यांना मी आज मानवंदना दिली…स्त्रीमधे नैसर्गिक त्याग, सहनशक्ती ,संयम हे गुण असतात. म्हणून व्रते ही स्त्रियांची मक्तेदारी..पण आज मी तिच्या वतीने हे व्रत करुन स्त्रीत्व काय असतं याचा यत्किंचित अनुभव घेतला…”

— अमोलचं हे वक्तव्य ऐकून वाटलं,हे आधुनिकत्व.. नव्या विचारधारेची  अर्थपूर्ण रुजवण ..

हे संस्कृतीला दिलेलं डोळस वळण… एक  सुसंस्कार…

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆  वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

🌳 विविधा 🌳

☆ वटपौर्णिमा अशी असावी— ☆ सौ. विद्या पराडकर ☆

आज वटपौर्णिमा…  भारतीय संस्कृतीने जतन केलेला पती,पत्नीच्या अतूट व अलौकिक प्रेम धाग्यात गुंफलेला एक अजोड पुष्पहारच जणू. पौराणिक कथेनुसार यमराजाच्या हातून ज्या सावित्रीने सत्यवानाला अत्यंत नम्र विनंती करुन, बुध्दीचातुर्याने, विवेकाने ज्या निर्धाराने सोडविले व चार वर मोठ्या  खुबीने मिळविले, .म्हणजेच सौभाग्य मिळविले, ती सावित्री त्रिखंडात अजरामर आहे. पतीवरील नितांत प्रेम व अखंड सौभाग्याची शिंपण ही ह्या व्रतामागील मूलभूत प्रेरणा आहे.

आज समाज कितीतरी बदलला आहे. मानवी जीवनाची गतिमानता वाढली आहे  शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन असल्यामुळे आजची स्त्री घराचे कुंपण ओलांडून बाहेर पडली आहे. शिक्षणाने ती समृद्ध झाली आहे. तिचा भौतिक विकास झाला आहे. तिचा शैक्षणिक विकास झाला आहे. परंतू शिक्षणाचा जो दुसरा आणि महत्त्वाचा उद्देश ‘संस्कृती संवर्धन व नैतिक मूल्यांची जोपासना करणे‘ आहे– हे कार्य आजचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आजच्या स्त्रीला परंपरागत जीवन जगणे अशक्यप्राय झाले आहे.  आजच्या प्रगत समाजात प्रगत जीवन पद्धतीत स्त्रीला दोन्ही तारांवर नाचता येत नाही. पण दोन्ही मतांचा सुवर्णमध्य मात्र साधता येतो. जीवनाच्या अंधारमय रस्त्यावर नव्या विचारांच्या नव्या प्रकाश वाटा दिसू लागतात. या सुवर्ण मध्याचा उपयोग केल्यास मानवी जीवन सुखकर होऊन समृद्ध होऊ शकते.

ढासळलेल्या कुटुंब पद्धतीला व समाजाला आधार देण्याचे काम हा सुवर्णमध्य साधू शकतो. एकत्र कुटुंब पद्धतीतील सेवा व्रत हे कोणत्याही धार्मिक व्रताच्या योग्यतेचे नव्हे का? प्रेम जिव्हाळा आपुलकी यांना पारख्या झालेल्या नात्याला नव संजीवनी मिळू शकते व निद्रिस्त नात्याला उजाळा मिळू शकेल.

आजच्या समानतेच्या जीवन संघर्षात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्री उभी आहे. कधी तिला कौटुंबिक, सामाजिक, तर कधी आर्थिक संघर्ष करावा लागतो. या संघर्षात पतीने पत्नीला साथ देणे आवश्यक आहे.  भारतीय स्त्री ही समर्पिता आहे. षड्ररिपूवर नियंत्रण ठेवून, कर्तव्य म्हणजेच देव मानणारी तिची भूमिका असावी. सुख व दु:ख पती पत्नीचे समान खेळणे असावे. यशस्वी संसाराकरता, समृद्ध जीवनासाठी उत्तम संकल्पाचे बीजारोपण केल्यास मानवी जीवन वृक्ष वृध्दींगत होऊ शकतो.

आज आपण कलियुगाच्या मध्यावर आहोत. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विशाल छायेत माणूस राहत आहे.  भौतिक व चंगळवाद व दहशतवाद यांचे प्रचंड तांडव आज सुरू आहे. अहंकाराला कवेत घालून माणूस जगत आहे. मानवी मूल्यांचा नाश‌ होत आहे. अशा वेळी मानव्याला जपणाऱ्या संस्कारांची नितांत गरज आहे. ही गरज वटसावित्री या सणातून आधुनिक सावित्री भागवू शकते. नात्यातील समरसता, प्रेम, निष्ठा, कर्तव्य भावना, विशाल दृष्टिकोन, सेवाभाव, सहकार्याची भावना, ही सर्व या व्रताची सूत्रे आहेत. ही सूत्रे परस्परांनी जोपासल्यास कुटुंब व्यवस्था भर भक्कम पायावर उभी राहून समाजाला उन्नत अवस्था प्राप्त होईल… आधुनिक सावित्री या वाटेने गेल्यास प्रेमवीणेवरून संसाराची तार छेडली जाईल. जुने व नवे यांचा मेळ घालून, सणांचे ओझे न घेता, मानवी मूल्यांचे जतन करून, स्त्री समृद्ध होऊ शकेल.

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वेळ… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? विविधा ?

☆ वेळ… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

वेळ- दोनच अक्षरी शब्द.पण नाना  प्रकारचे अर्थ सामावणारा. कारण संदर्भानुसार अर्थ बदलत जातात हो. नीला मैत्रिणीला म्हणाली, ‘अग,एक प्रदर्शन पाहायला जायचं आहे. वेळ आहे का तुला माझ्याबरोबर यायला.’ ‘ हो.एका पायावर तयार आहे बघ यायला.’ नीला पटकन उत्तरली.  तोच आई नीलाला जेवायला बोलवू लागली, नि नीला आईस म्हणाली, “नाही ग आई. वेळ लागेल थोडा. मी एक आर्टिकल लिहितेय. ते पुरं होत आलय. ते झाल्यावर येते. इथं पहिल्यांदा वेळ या शब्दाचा अर्थ सवड होतो तर तर दुसऱ्या  उदाहरणात वेळ म्हणजे उशीर.

‌रामराव असेच मित्रांच्यात बसून बोलतांना म्हणाले, “  माझ्या एका मित्रावर, दिनेशवर काय वेळ आलीय बघा. लेकीला कॅन्सर झाला नि पाण्यासारखा पैसा खर्च करुनही उपयोग झाला नाही. शिवाय कर्जही वाढले.”  इथं “वेळ ” म्हणजे वाईट परिस्थिती. 

कोणत्याही गोष्टीसाठी वेळ महत्वाची असते. आपले नियोजन योग्य, काटेकोर असेल तर कोणत्याही वेळेस एखादे नवीन काम सुरू केले तर ते नीट पार पडते. याउलट आपली योग्य तयारी नसेल तर अगदी मुहूर्त  पाहून काम सुरू केले तरी ते यशस्वी होईलच याची खात्री देता येत नाही.वेळ पाळणे सुद्धा महत्वाचे असते हं. वेळ पाळण्याची सवय म्हणजे वक्तशीरपणा. वक्तशीरपणा हा एक चांगला गुण आहे, ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव दुसऱ्यावर चांगला पडतो.

कोणतेही काम वेळेत करण्याच्या सवयीमुळे आपण कामे वेळेत पूर्ण करतो.वेळ दरवेळी सोयिस्कर असतेच असे नाही. पण काही वेळा अवेळही योग्य प्रकारे  हाताळल्याने आपण कोणत्याही  प्रसंगातून  सहीसलामत बाहेर पडतो.चांगली वेळ आपण हसतमुखाने चांगल्या प्रकारे वर्तन करतोच  पण वेळ वाईट असताना सुद्धा जो विवेकाने वर्तन करुन त्या वाईट वेळीही चांगला वागतो नि कोणत्याही प्रसंगास व्यवस्थित सामोरा जातो तोच खरा.

कातरवेळ म्हणजेच तिन्हीसांजेची वेळ थोडी हुरहूर  निर्माण करणारी असते.सकाळची वेळ प्रसन्नच ! कारण सूर्यदेवांच्या आगमनानं पृथ्वीवर चैतन्यमय वातावरण असते. फुलांच्या उमलण्याची, सूर्यविकासी कमळे उमलण्याची ही वेळ खरच आनंदमय असते. सकाळपासून सूर्यास्तापर्यंत प्रकाशाची सोबत असते. त्यामुळे एकाकीपणा जाणवत नाही. त्यामानाने रात्रीच्या वेळी एकाकी वाटते. कधीकधी मनात भीतीही दाटते.

परीक्षार्थी ज्या वेळेची उत्सुकतेने वाट पाहतात  ती वेळ निकालाची. निवडणुक लढविणारे उमेदवारसुद्धा मतमोजणीनंतर विजय घोषित होण्याच्या वेळेची वाट पाहतात अगदी उतावीळपणे. म्हणूनच म्हणावे वाटते वेळेचे नियोजन  हवेच. मग काम बौद्धिक असो, आर्थिक असो की अन्य कोणत्याही प्रकारचे…..  कारण वेळ काही कधी सांगून येत नाही.

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुभूती ☆ सौ. अमृता देशपांडे ☆

सौ. अमृता देशपांडे

? विविधा ?

☆ अनुभूती ☆ सौ. अमृता देशपांडे 

आमच्या छकुलीचा १० वा वाढदिवस झाला परवा. हां हां म्हणता छकुली दहा वर्षाची झाली. काल परवा पर्यंत पिटुकली, सोनुकली होती… मलाच मी खूप मोठा झालो आहे, असं वाटलं, वयानंही आणि विचारानंही. त्यालाही दोन कारणं होती. गेल्या दहा वर्षात मुलांबरोबर त्यांच्याच वयाचे होऊन खेळता खेळता काळ कसा सरला कळलंच नाही.  मुलं मोठी होत होती,  आम्ही ही एक एक नवीन अनुभव घेत मोठे झालो.

दुसरं म्हणजे मला आणि नंदिताला , माझ्या पत्नीला, गेल्या दोन महिन्यात एका वेगळ्याच  प्रसंगाला सामोरे जावे लागले. नवीन वर्षाची सुरुवात झाली तीच टेन्शनमध्ये. आईची तब्येतीची तक्रार होती म्हणून चेकअप साठी हाॅस्पिटलमध्ये गेली आणि पाच वर्षांपूर्वी झालेल्या ह्रदयाच्या शस्त्रक्रियेनंतर परत तेच दुखणं,  आजारपण समोर ठाकलं . तिच्या ह्रदयावर परत शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. तीही ताबडतोब. 

मनात खूप गोंधळ माजला. वैद्यकीय शस्त्रक्रिया, उपचार याबाबतीत नेहमीच उलटसुलट मते असतात. चहू बाजूंनी लोक अनेक सल्ले देत असतात. खूपदा सर्वच वास्तवात आणणे शक्य नसते. त्यामुळे गोंधळ,  साशंकता निर्माण होते. मुख्य म्हणजे सल्ले द्यायला लोक एका पायावर तयार असतात. प्रत्यक्ष वेळ येते तेव्हा कोणीही जवळ नसतो. जवळचेही सोबतीला नसतात. हा सर्वसामान्य दुनियादारीचा अनुभव आम्हालाही आला.

मी आणि नंदितानं सगळा धीर एकवटला. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याची मनाची तयारी केली. 

शस्त्रक्रियेची तारीख ठरली. मन धास्तावलं होतंच. त्याला कारणही तसंच होतं.आईचं वय, नाजुक तब्येत,  दुस-यांदा शस्त्रक्रिया.  एकीकडे काळजी, जबाबदारी, तर दुसरीकडे अॅडमिट करण्याचे सोपस्कार. 

माझ्या ऑफिसचे माझे सहकारी सतत माझ्याबरोबर होते. रक्तपुरवठ्याची जुजबी तयारी केली होती. पण आदल्या दिवशी अठरा रक्तबाटल्यांची सोय करण्याची सूचना हाॅस्पिटलमधून देण्यात आली आणि पळापळ सुरू झाली. फोनवरून एकमेकांना निरोप सुरू झाले. 

तासाभरातच चार तरूणांचा ग्रुप आला मला शोधत, ” साहेब, रक्त द्यायला आलोय.” 

हाॅस्पिटलमध्ये फाॅर्म भरून रक्त घेण्याचे काम सुरू झाले. त्या चौघांचं संपता संपता आणखी दोघं आले. पाठोपाठ एका गाडीतून  सहा जणांचा ग्रूप आला. सर्व जण फाॅर्म भरत होते, रक्त देत होते. मी आणि नंदिता अक्षरशः अवाक् झालो. आम्ही या शहरात नवीन होतो. रोजच्या संपर्कात येणा-यांशिवाय इतरत्र ओळखी करायला वेळच नव्हता.  पण अनोळखी असूनही स्वयंस्फूर्तीनं स्वतःचं रक्त देणं, तेही कसलाही मोबदला न घेता. त्या फाॅर्म भरून घेणा-या नर्सताई मला तिथूनच हात हलवून सांगत होत्या, don’t worry,  everything will be good!  त्यांच्या डोळ्यांतही तेच भाव होते. मुलं घरी असल्याने नंदिता घरी चालली होती. जाताना त्या नर्सताईंना सांगायला गेली. तेव्हा त्या ” काळजी करू नका,  सर्व ठीक होईल ”  असं म्हणाल्या. कठीण परिस्थितीत ह्या एका शब्दाचा केव्हढा आधार वाटतो.

ज्या हाॅस्पिटलमध्ये  आठ-दहा लाखांची बिलं आधी भरल्याशिवाय इलाज, उपचार सुरू  होत नव्हते, तिथेच माणुसकीची ही श्रीमंती अनुभवली. शिवाय जाताना प्रत्येक जण प्रेमानं, आपुलकीनं आणि थोड्याशा प्रेमळ हक्कानं सांगत होते, ” काहीही, कसलीही गरज लागली तर लगेच फोन करा, फोन नंबर दिलाय. आम्ही आहोतच. ” जवळ जवळ रात्री १२ पर्यंत लोक रक्त द्यायला येत होते. गरजेपेक्षा जास्तच रक्त उपलब्ध झालं. 

गेले चार-सहा तास हे चालू होते. मी झपाटल्यासारखा दिग्मूढ झालो होतो. जणू काही रक्तदानाचा एक सोहळा घडत होता. सगळे वातावरण परमेश्वराच्या अस्तित्वाची प्रचीती देत होते.

उद्या आईचं ऑपरेशन.  पापणी मिटत नव्हती. मनात देवाचा धावा सुरू होता. नंदितानं देवाजवळ अखंड दिवा लावला होता. आम्हां दोघांना जाणवलं, ह्या सर्व मित्रांच्या रूपात ( हो, आता ते अनोळखी नव्हते, मित्र होते) देवच आमच्या बरोबर आहे.

दुसरे दिवशी ऑपरेशन व्यवस्थित झालं. डाॅक्टरनी बाहेर येऊन सांगितलं तेव्हा चार वाजले होते. दुपारनंतर अनेक रक्तदात्यांचे फोन आले आईची चौकशी करायला. आठ दहा दिवस झाले, आईची तब्ब्येतही दिवसागणिक सुधारू लागली.  आईसारखा positive minded पेशंट लवकर बरा होतो. पंधरा दिवसांनी ती घरी आली. 

मित्रांचे, त्या रक्तदात्यांचे आभार कसे मानू? त्यांची नावे माहीत नाहीत फक्त फोन नंबर आहेत माझ्याकडे. सर्वांना फोन करून छकुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावले. छकुलीचे दोस्त होतेच, आमचे शेजारी,  माझे ऑफिस सहकारी बोलवले होते. नर्सताईंना बोलवायला मी हाॅस्पिटलमध्ये गेलो पण त्या भेटल्या नाहीत.  काऊंटरवर निरोप ठेवला. पण तो स्टाफ ” मी कोणाबद्दल बोलतोय?” अशा संभ्रमात दिसला.  

फूल ना फुलाची पाकळी म्हणून सर्वांना छोटीशी सस्नेह भेट दिली. सगळ्यांना Thank you म्हणताना माझ्या मनात एक विचार होता, इतक्या निस्वार्थी आणि निरपेक्षतेने दिलेल्या मदतीच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ का? नर्स ताई आल्या. मला खूपच बरं वाटलं. आईची सगळ्यांशी ओळख करून दिली.  नर्स ताईंची ओळख करून देणार होतो, पण त्या तिथे खुर्चीवर दिसल्या नाहीत.  

हळूहळू सर्व लोक परतू लागले.  त्यांना निरोप देता देता मी नर्सताईंना शोधत होतो. तिथे बसलेल्या एक दोघांना विचारले, त्या लाल साडी नेसलेल्या, आणि मोठ्ठं कुंकू लावलेल्या बाई गेल्या का? नंदिता पण त्या कुठे गेल्या म्हणून शोधू लागली. सेक्युरिटीला विचारले. त्यांना कळेना, कुठली लाल साडीवाली ताई? अशी कुणीच नव्हती. आम्हाला कळेना, कुठे गेल्या? त्यांनी फक्त गोड खीर खाल्याचे मी बघितले होते.  पण माझ्याशिवाय आणि नंदिताशिवाय दुस-या कुणीच त्यांना बघितलेच नव्हते…असं कसं?

 ……

मनाला चुट्पुट लागली……

त्या बसल्या होत्या त्या खुर्चीवर  आमच्या कुलदेवीचा फोटो आणि गुलाबाचं फूल होतं. ……

ते कसं तिथे आलं? त्यांना आमची कुलदेवी कशी माहीत?  शेजारचे ८५ वर्षाचे आजोबा म्हणाले, “ अहो, तुमची देवीच आली असणार…. किती भाग्यवान आहात तुम्ही ! “

आम्ही निःशब्द…..

देवीनं दिलेला फोटो आणि फूल घेऊन घरी आलो. ऊर भरून आला होता  देवासमोर हात जोडून दंडवत घातलं….

© सौ. अमृता देशपांडे 

पर्वरी – गोवा

9822176170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “फोन स्टोरी…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

फोनवर बोलणाऱ्यांचे किती प्रकार सांगता येतील. काहींना निरोप सांगितला, किंवा मिळाला, की फोन ठेवण्याची घाई असते. काही फक्त हं……. बरे……. ठिक आहे……. बघतो……. चालेल….. नक्की असे म्हणत फोन ठेवतात. आपल्याला अजूनही काही सांगायचे असते‌…… पण त्याने फोन ठेवल्याने आपण फक्त फोनकडे बघतो…. कारण फोन ठेवणारा आपल्या समोर नसतो. (मग आपण सवडीने त्याला बघतो.)

पण बायकांचे फोनचे तंत्र वेगळेच असते. ज्या कारणासाठी फोन केला आहे तो विषय सोडून इतर विषयांवर देखील थोडक्यात विस्तृत चर्चा करण्याचे कसब यांच्याकडे असते.

हे समजण्याचे कारण आज सकाळी झालेले फोन. विषय साधाच होता. केरला स्टोरी सिनेमा बघायला जायचे का? किती वाजता? सह जायचे की आपले आपण…..

पहिला फोन झाला….. जायचे की नाही या चर्चेत काय सुरू आहे?….. अशी सुरुवात झाली……स्वयंपाक…….  पलीकडून उत्तर……. मग आज काय करते आहेस? यावर भाजी पोळी पासून आमरसापर्यंत सगळा स्वयंपाक फोनवर सांगून झाला…… आता त्यांच्याकडची भाजी आम्हाला नवीन होती…… झालं….. केरला स्टोरी थोडी बाजूला राहिली, आणि भाजीची स्टोरी (डायरेक्शन सह) अगोदर संपली…….

मग दुसरा फोन…… (पहिला फोन संपेपर्यंत माझा चहा गरम करून, पिऊन देखील संपला होता.) परत सुरुवात काय करतेस? केरला स्टोरी ला जायचे का?….. हो जाऊ……. पण आत्ता साडी खरेदी करायला जाणार आहे……. मग काय? कुठे? कोण? काय विशेष? यावर माहिती असणाऱ्या सगळ्या साड्यांच्या प्रकाराची आणि काय घ्यायचे यांची स्टोरी फोनवरच सुरू झाली……. (तो पर्यंत दुध वर येते आहे का ते बघणे, आणि कुकरच्या तीन शिट्या झाल्या की गॅस बंद करायची जबाबदारी माझ्यावर होती ती देखील संपली. कदाचित प्रेशर देखील उतरले असावे…….. यांच्या लांबलेल्या फोनमुळे कुकरने देखील रागारागातच शिट्या दिल्या असाव्यात असे वाटले.) पण फोन सुरुच……. केरला स्टोरी अगोदर साडी स्टोरी झाली…..

कपड्यांच्या बाबतीत मला यांचे कळत नाही……. (हे त्यांनी पदोपदी खरेतर पदरोपदरी मला ऐकवले आहे……) म्हणजे यांनी नवीन कपडे घेतल्यामुळे यांचे आधीचे कपडे जुने होतात. का कपडे जुने झाल्यामुळे हे नवीन कपडे घेतात. (आधी कोंबडी की आधी अंड इतकाच हा कठीण प्रश्न आहे.)

अजुनही फोन करायचे होतेच. मग तिसरा फोन…….. तो पर्यंत माझे मोबाईलवर कोणत्या ठिकाणी किती वाजता

शो आहेत याचा अभ्यास सुरू झाला होता. यांची परत फोन लाऊन विचारणा सुरू झाली. केरला स्टोरी…….. बास येवढेच म्हटले असेल…….. तो पर्यंत पलिकडून हो…. नक्की……. मी पण तेच विचारणार होते……… मागचा एक कार्यक्रम माझा मिस झाला…….. मग तो मिस झालेला कार्यक्रम कोणता होता……. तो कसा मिस झाला……. यावर त्यांची (मिसींग) स्टोरी….. आणि त्याच कार्यक्रमात किती मजा आली……. कोण कोण आले होते…….. यावर यांची स्टोरी…….. असा स्टोरी टेलींगचा कार्यक्रम सुरू झाला…… यांच्या स्टोरी संपेपर्यंत माझा जवळपास सगळा पेपर वाचून झाला होता…….

शेवटी एकदाचे किती जणांनी आणि कोणत्या शो ला जायचे हे ठरले आणि मी तिकिटे बुक करायला फोन हातात घेतला.

आता जेवणानंतर कोण कसे येणार…. आपण कोणाला कुठून बरोबर घ्यायचे की आपण कोणाबरोबर जायचे यासाठी परत फोन होतीलच. तेव्हा अजुनही काही वेगळ्या स्टोरी ऐकायला येतीलच……

अशी ही केरला स्टोरी ची तिकीटे काढायची स्टोरी……

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “चित्रपटनगरीची जादू…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

चित्रपटनगरी तशी अफलातून नगरी.  हे तसं म्हंटलं तर वादळी क्षेत्र.ह्याची दुनियाच वेगळी. ह्या क्षेत्रात सगळंच मुळी बेभरवशाचं बघा.काहींना अल्पावधीतच यश मिळतं तर काहींची हे यश मिळविण्यासाठी संपूर्ण कारकिर्दच पणाला लागते.कुणाला हे यश स्वतःच्या रुपावर मिळतं तर काहींच यश हे त्यांचा उच्चप्रतीचा अभिनय ओढून आणतो. काहींना पचवता येणार नाही इतकी अलोट संपत्ती येथून मिळते तर काहींना ही मायानगरी अक्षरशः कंगाल बनविते. पण तरीही बहुतेकांच्या मनात ह्या चित्रपटसृष्टीविषयी आवड,उत्सुकता, कुतूहल हे असतं, अगदीच खासकरून अभिनेते वा अभिनेत्रींबाबत.

ह्या नगरीत अनेक आवडते कलाकार आपली कला फुलवित भरघोस योगदान देतात  तर काही व्यक्तींनी ह्या क्षेत्रात भरघोस योगदान देण्याआधीच एक्झीट घेतलीयं.

ही मायानगरी म्हणजे एक अख्ख भलमोठं कुटूंबच असत जणू. कुटूंबाप्रमाणेच सगळी कामं ही वेगवेगळ्या लोकांनी वाटून घेतलेली असतात. ह्या क्षेत्राचे कायम आपल्या सामान्य जनतेला आकर्षण, उत्सुकता वाटत असते.काळ खरच खूप बदललायं. आता ह्या मध्ये चांगले वाईट हा वादग्रस्त मुद्दा विचारात न घेता फक्त एक गोष्ट नक्कीच मान्य करुया ,की ह्मा बदलत्या काळामुळे स्थित्यंतरे आलीत, गोष्टी मुळासकट खूप बदलत गेल्यात.काही चांगल्या गोष्टी काळाच्या उदरात गडप झाल्यात तर काही चांगल्या गोष्टींचा उदय पण झाला. असो शेवटी कालाय तस्मै नमः हेच खर.

बदलत्या काळानुसार, वयानुसार आवडीनिवडी ह्या खूप बदलतात. प्रत्येक वयाच्या विशिष्ट टप्प्यावर आपल्या आवडी वा गरजा ह्यामध्ये आमुलाग्र बदल होतो.खरतरं आपण व्यक्ती त्याच असतो पण आपलाच आपल्या बदलत्या आवडी बघितल्यावर प्रश्न पडतो खरचं आपण त्याच व्यक्त आहोत?

अगदी उदाहरणादाखल बघितले तर आपली स्वतःची चित्रपटांची आवड,चित्रपट बघण्याची क्रेझ, त्यासाठी करावी लागणारी खटपट, ह्या विषयातील चोखंदळपणा ह्यात जमीनआसमान चा फरक पडलाय, किंबहुना अजूनही पडतोय.

लहानपणी वा तरुणवयात आठवड्यातून एकदाच टीव्हीवर बघायला मिळणारा चित्रपट हे एक खूप मोठे आकर्षण होते.त्यासाठी त्या दिवसात घरच्यांनी सांगितलेली कामे,अभ्यास ह्या गोष्टी नियमानुसार कटाक्षाने पाळाव्याच लागतं.तेव्हा सर्रास थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघायची पद्धत. नव्हती.आधी पालक त्या चित्रपटविषयी जाणून घेऊन मगच सठीसहामाशी आपल्या मुलांना एखादा चित्रपट बघण्यासाठी परवानगी देत असतं. फक्त शाळे कडून दाखविल्या जाणारे इतिहास वा सामाजिक विषयक चित्रपट बघायला मिळायचे.असो तो काळच वेगळा होता.

तरुण वयात फारसा कथानकाचा विचार न करता गाणी,हाणामारी ह्यांनी भरलेले चित्रपट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असायचे. नंतर जस वय वाढत गेलं,जरा प्रगल्भता आली तेव्हा कथा

दिग्दर्शक  कलावंत ह्याकडे काळजीपूर्वक चोखंदळपणे अभ्यासपूर्ण बघून मग चित्रपट बघण्याची जाण आली.आणि आता तर अजून थोड वय पुढ गेल्यावर फारशी चित्रपट बघण्याची ईच्छा वा इतका वेळ देण्याचा स्टँमिना पण नाही राहीला.

पूर्वी चित्रपट कमी बघायला मिळायचे म्हणूनही कदाचित त्याची जास्त ओढ होती. अति मिळालं की नाविन्य,गोडी संपुष्टात येते त्यानुसार टीव्ही, वाहिन्या, थिएटर ह्यांच्या मुबलकतेमुळे चित्रपट बघण्यातील गोडवाच कुठेतरी हरवून गेला असं वाटतं.पण त्या चंदेरी आठवणी मात्र  कायम  असतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print