मराठी साहित्य – विविधा ☆ चरैवती चरैवती… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ चरैवती चरैवती…  ☆ श्री विश्वास देशपांडे

तसे आमचे संस्कृत लहानपणापासून कच्चे. आता अर्थात ते सुधारण्याचा संभव कमीच ! संस्कृतमध्ये काही काही शब्द वेगळ्या अर्थाने येतात. आपल्या मराठीत आणि त्यांच्या मूळ अर्थात फरक असतो. पण आम्हाला हे सांगतो कोण ? लहानपणी रामरक्षा म्हणायचो. अर्थ कळायचा नाही. रामरक्षा म्हणताना ‘ रामम रमेशम भजे ‘ असे शब्द यायचे. लहानपणी ‘ भजे ‘ म्हणजे भजणे किंवा आळवणे  हा अर्थ माहितीच नव्हता.  पुढे तो केव्हा तरी कळला. तोपर्यंत देवासमोर बसून रामरक्षा म्हणताना हे शब्द आले की आम्हाला भजेच आठवायचे. कधी कधी रामरक्षा म्हणताना समोर डिशमध्ये गरमागरम भजी ठेवली आहेत, आणि ते स्तोत्र म्हणत असताना ती अधूनमधून तोंडात टाकतो आहोत अशी कल्पनाही यायची.

तसेच कधीतरी ‘ चरैवती चरैवती ‘ हे शब्द कानावर पडले होते. मूळ अर्थ माहित असण्याचे काही कारणच नव्हते. लहानपण एका अगदी छोट्याशा खेड्यात गेले. आमच्याकडे शेती असल्याने गाई, बैल वगैरे असायचेच. सकाळी गाई चरायला जायच्या. बैल रिकामे असले तर शेतात चरायला सोडले जायचे. बकऱ्या देखील चरून यायच्या. घरात सुद्धा आम्ही स्वयंपाकघरातील डबे उचकून काही खायला मिळते का हे पाहत असायचो. तेव्हा घरातल्या कोणाचे तरी बोल कानावर पडायचे, ‘ सारखा चरत असतोस ‘ त्यामुळे चरणे म्हणजे सतत खाणे हा अर्थ आमच्या मनात अगदी फिट्ट बसला होता. म्हणून जेव्हा ‘ चरैवती चरैवती ‘ शब्द कानावर पडले तेव्हा त्यांचा या चरण्याशी म्हणजेच खाण्याशी संबंध असावा असे आमच्या बालबुद्धीस वाटून गेले असल्यास नवल नाही ! त्यामुळे ऋग्वेदात सुद्धा आपल्याला आवडणारी काहीतरी गोष्ट सांगितली आहे हे लक्षात येऊन आम्हाला अतिशय आनंद झाला होता.

नंतर कधीतरी महर्षी चार्वाकांचा पुढील ‘श्लोक कानी पडला होता. त्यात म्हटलं होतं

यावज्जीवेत सुखं जीवेद ऋणं कृत्वा घृतं पिवेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः॥’

यात ते म्हणतात जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ते सुखाने जगून घ्या. हवं तर कर्ज काढून दूध तूप खा प्या. ( कर्ज घ्यावे की नाही, ते फिटेल की नाही याची चिंता करू नका) अहो, जोपर्यंत शरीर आहे, तोपर्यंत मौजमजा करून घ्या. एकदा शरीर नष्ट झाले की संपले सगळे. खरं तर भौतिक गोष्टींचा मोह धरणे ही चांगली गोष्ट नाही. अध्यात्मात तर हे सगळं नश्वर म्हणजे नष्ट होणारं आहे. ब्रह्म सत्य, जग मिथ्या. वगैरे आमच्या कानावर पडत होतं. पण ते पटायला पाहिजे ना ! त्यामुळे त्याच्या बरोबर विरुद्ध  सांगणारा चार्वाक आम्हाला जवळचा वाटू लागला. पुढे विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यासारख्या काही लोकांनी बँकांकडून कर्जे घेऊन चार्वाकांचा उपदेश अमलात आणला.

पण पुढे काळाच्या ओघात अस्मादिकांचे जसजसे शिक्षण वगैरे होत गेले, तसतसे मनावर संस्कार की काय म्हणतात ते झाले असावेत आणि चार्वाक, चरैवती चरैवती वगैरे आम्ही साफ विसरलो. खायचं ते जगण्यासाठी. खाण्यासाठी जगायचं नाही वगैरे गोष्टी लक्षात आल्या. जीवनाचं ध्येय महत्वाचं वगैरे वगैरे यासारख्या मोठमोठ्या शब्दांचा पगडा मनावर बसला. आणि पुढे दोन तीन दीक्षितांनी आमच्या मनावर प्रभाव टाकला. त्यापैकी एक माधुरी दीक्षित होती. पण तिचे केवळ चित्रपट पाहण्यातच आम्ही धन्यता मानली. पुढे जे दोन दीक्षित आले त्यात एक होते स्वदेशीचा पुरस्कार करणारे राजीव दीक्षित आणि दुसरे जगन्नाथ दीक्षित. या मंडळींनी तर आरोग्यासंबंधी अशा काही गंभीर गोष्टी सांगितल्या की आम्ही आहारावर नियंत्रणच आणून टाकले. फक्त दोन वेळा खायचे. मध्ये मध्ये काही वाटले तरी खायचे ( चरायचे ) नाही. आणि त्या मार्गावरच वाटचाल सुरु होती. तसे आमच्या किरकोळ शरीरयष्टीकडे पाहून काही लोक सांगत होते की तुम्हाला हे करायची आवश्यकता नाही. पण आमच्यावर दीक्षितांचा प्रभाव पडला होता. त्यामुळे आम्ही सकाळी आणि चार वाजताच चहा फक्त घ्यायचो. तेवढ्या बाबतीत दीक्षितांनी आम्हाला आमच्याकडे पाहून माफ केलेच असते. पण तसे व्हायचे नव्हते.

झाले असे की परवा आम्ही जरा लांबचा प्रवास करून आलो. पण प्रवासात कशाने तरी तब्येत बिघडली. तुम्ही म्हणाल खाण्यापिण्यात काही तरी गडबड झाली असावी. पण नाही हो, आम्ही काळजी घेत होतो. दीक्षितांचे म्हणणे जरी कटाक्षाने पाळले नाही तरी खाताना त्यांची आठवण करून खात होतो. आणि पिण्याचे म्हणाल तर आम्ही पाण्याशिवाय आणि चहाशिवाय दुसरे काही पीत नाही. त्यामुळे प्रवासात बाटलीबंद पाणीच प्यायलो. आयुष्यात बाटलीला हात लावला असेल तर तो पाण्यासाठीच ! असो. पण व्हायचे ते झाले. सर्दी, ताप वगैरेंनी त्रस्त होऊन शेवटी डॉक्टरांना शरण गेलो. त्या डॉक्टरांनी गोळ्या औषधे तर दिलीच पण जो काही सल्ला दिला तो फार आवडला. ते म्हणाले, ‘ दिवसातून चार पाच वेळा थोडे थोडे खात जा . ( आपल्या भाषेत ‘ चरत जा ‘ ) म्हणजे पोट व्यवस्थित भरेल. आणि तब्येतीच्या तक्रारी राहणार नाहीत. ‘ बरं ज्यांनी हा सल्ला दिला ते डॉक्टर पुण्याचे आणि अनुभवी. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष थोडेच करता येणार ? तरी त्यांना मी भीत भीतच माझ्या मनातील शंका विचारली. ‘ डॉक्टर, पण ते दीक्षित तर दोनपेक्षा जास्त वेळा खाऊ नका म्हणतात. ‘ यावर डॉक्टर फक्त हसले. ( बहुधा मनातल्या मनात असं म्हणत असतील की काय मूर्ख माणूस आहे हा ! मी सांगतो यावर याचा विश्वास दिसत नाही. ) मग ते म्हणाले,’ अहो, सर्वांसाठी तसं आवश्यक नाही. तुम्ही त्याचा विचार करू नका. ‘

मग काय पुन्हा ‘ चरैवती चरैवती ‘ आठवलं. खरं तर चरैवती चरैवती म्हणजे चालत राहा. चालणं आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही ते दोन्ही अर्थानं घेतलं इतकंच. आता बघू या. डॉक्टरांचा सल्ला पाळतो आहे. त्याप्रमाणे चालत राहू.

लेखक – श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एक तास एक मिनिट… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

एक तास एक मिनिट… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सकाळी मेडिटेशन केल्याने त्याचे फायदे दिवसभर राहतात.परंतू इतर विचार,नकारात्मकता,अनुभव या मुळे एनर्जी हळूहळू कमी होते.या साठी आपण पुढील उपाय करु शकतो.

सकाळी जी सकारात्मक वाक्ये म्हणतो किंवा जे संकल्प करतो तिच वाक्ये रात्री झोपताना म्हणावीत.म्हणजे पुढील ६/७ तास तेच विचार मनात राहतात.व सकाळी  त्याचा परिणाम दिसतो.

ती वाक्ये पुढील प्रमाणे असावीत.

मी वैश्विक शक्तीचा पवित्र अंश आहे.

निसर्ग शक्ती माझ्यात पुरेपूर आहे.

मी आमच्या घरातील माणसे सुखी व आनंदी आहेत.

सगळ्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत.

जर काही प्रॉब्लेम किंवा शरीरिक व्याधी असतील तर ते प्रॉब्लेम सकारात्मक पद्धतीने सुटलेले आहेत असे म्हणावे.व काही व्याधी,दुखणी स्वतःला किंवा दुसऱ्या कोणाला असतील तर त्याची नावे ( आजाराची व संबंधित व्यक्तींची ) घेऊन ते व्याधी मुक्त झालेले आहेत असे म्हणावे.

जसे वाहनांचा गोंधळ कमी करून सर्वांना आपल्या इच्छीत ठिकाणी वेळेवर पोहोचता यावे म्हणून ठिकठिकाणी सिग्नल्स असतात त्या प्रमाणे आपणही करु शकतो.मना साठी सिग्नलची व्यवस्था करु शकतो.

जर आपले मन स्वच्छ  करायचे असेल किंवा गोंधळ कमी करायचे असतील तर एक तास एक मिनिट याचा अवलंब करावा.

दर एक तासाने एक मिनिट विश्रांती घ्यावी.तीन दीर्घ श्वास घ्यावेत.आणि डोळे बंद करुन वरील वाक्ये म्हणावीत.

या पद्धतीने भरकटणाऱ्या मनाला आवर घालू शकतो.व मनाला वारंवार त्या सूचना देऊ शकतो.मनाला त्या सूचना दिल्या की शरीर त्या प्रमाणे आपले कार्यक्रम ठरवते.

वरील संकल्पा साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद!

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळे – ऋतूंचे…भाग २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग २ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

(श्रावणातला प्रत्येक  दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचा असतो.सणावाराला रेलचेल असणारा ऋतू !)

चौथा ऋतु शरद! स्वच्छ निरभ्र आकाश, रात्रीचं टिपूर चांदणं, ते पिण्यासाठी आतुर चकोर, काव्याच्या चांदण्याची बरसात,’ चांदणे शिंपीत जाशी’, ‘ टिपूर चांदणे धरती हसते’, ‘चांदण्यात फिरताना’ ! सण म्हणाल तर शारदीय नवरात्र, दसरा, कोजागिरी पौर्णिमा! कोजागिरीला (शरद किंवा आश्विन पौर्णिमा असेही म्हणतात) चंद्राची पूजा करायची, त्याला ओवाळायचं , चंद्र हा मातृकारक म्हणून मातृत्वाचा पहिला पाझर अनुभवण्याचं सुख दिलेल्या ज्येष्ठ अपत्याला ही ओवाळायचं, चंद्राच्या सर्वात प्रखर अशा चांदण्याची गुण शक्ती दुधाद्वारे प्राशन करायची, आनंदा बरोबर कृतज्ञता ही व्यक्त करायची. कुठे थिल्लरपणा नाही,सारं वैचारिक, जाणिवांचं नेणतेपण जपणारे सण! आणखी कोणता सण? विचारू नका. वर्णन संपणारच नाही. मी वर्णन करणार पण नाही.फक्त डोळ्यासमोर पणत्यांची आरास, आकाशदिवे, फराळाची ताटं आणा आणि कल्पनेतल्या आनंदात बुडून जा.

अर्थात दिवाळी हा सण मराठी महिन्याप्रमाणे येत असल्यामुळे कधी शरदात तर कधी हेमंतात  येतो.

पाचवा ऋतू हेमंत! गार बोचरा वारा, हुडहुडी भरणारी थंडी, गोधडीच्या उबेत शिरणारी, अगदी रविवारी तर दुपारी सुध्दा गोधडी घ्यायची, झोप लागली नाही तरी गुडूप पडण्यात मजा असते, मग उठल्यावर गरम भजी लागतेच. दारोदारी शेकोटीच्या गप्पा, गाण्यांच्या भेंड्या रंगतात.मग येतो धुंधूर मास, सूर्याचा धनू राशी प्रवेश!आरोग्य शास्त्र आणि भक्ती यांचा संगम! पहाटे विष्णू पूजन ( काकडा) मग सूर्य पूजन करून, नैवेद्य दाखवून सूर्योदयाला जेवणे महत्त्वाचे!खिचडी, बाजरीची भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा, भाज्या, गाजर हा आहार असतो. ब्राह्म मुहूर्ताला आराधना, नामस्मरण करण्याचे महत्त्व सांगितले आहे. सूर्याचा मकर राशी प्रवेश झाला की धनुर्मास संपतो.मग संक्रांत, तिळगुळ, हळदीकुंकू, नव्या वधूचा सण, लहान बाळाचं बोरन्हाण अशा सामुदायिक सणांची रेलचेल, भाज्यांची सम्राज्ञी शाकंभरी,तिचं नवरात्र, असा हा आरोग्यदायी ऋतु!

सहावा ऋतू शिशिर! सुरवातीला हेमंतासारखा, थंडी जरा आणखी वाढवणारा! दवबिंदुंनी नटलेली सृष्टी, पण पुष्पहीन झाल्यामुळे थोडासा उदास वाटणारा! जणू हा थकलेल्या सुष्टीला निजायला सांगतो, परत नव्या उत्साहानं वसंताचं स्वागत करण्यासाठी! तरी रंगीबेरंगी पानांचा सडा, गुलमोहरा सारखं सौंदर्य मनाला मोहून टाकतंच ! पडलेल्या पानांची होळी करून परिसर स्वच्छ करायचा आणि रंगपंचमीला रंगांची उधळण करूनआनंद साजरा करायचा,कारण वसंत येणार!

ऋतूंचे वर्णन आलं म्हणजे कालिदास आठवणारच. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘ ऋतुसंहार ‘,यात सगळ्या ऋतूंचे क्रमाने वर्णन आहे. त्यांची सुरवात ग्रिष्माने तर शेवट वसंताने आहे. एकतर कालिदासाच्या सर्व रचना सुखांत आहेत म्हणून असेल किंवा अथर्ववेदाच्या सहाव्या कांडात पहिला ऋतू म्हणून ग्रीष्म आहे, त्यामुळे असेल. कालिदासाच्या या ‘ ऋतुसंहार ‘ ची अगदीच एक दोन वाक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न!

ग्रीष्म ऋतूत शीतल चंद्र हवासा वाटतो, पण गारवा मिळवण्यासाठी कारंजाचा उल्लेख कवीने केला आहे आणि एरवी एकमेकाच्या जीवावर उठणारे प्राणी सुध्दा आता एकदिलाने जलपान करताहेत, असे वर्णन आहे.

वर्षा ऋतू राजाप्रमाणे वाजत गाजत येतो, स्त्रिया पाण्याने भरलेले घडे त्याच्या पायावर घालत आहेत, शृंगारलेले हत्ती, चौघडे पुढे चालले आहेत, कमळे नसल्याने भुंगे भ्रमित झाले आहेत, त्यामुळे ते मोराच्या पिसाऱ्यावर भाळले आहेत.

शरद ऋतू मधे कोजागिरीच्या चांदण रात्री धरती आणि आकाश दोन्हीकडे समृद्धीची भरती आली आहे. तळ्यात राजहंस फिरू लागले आणि आकाशात चंद्रमा! कवीला निसर्गाकडे पाहून स्त्रीचा शृंगार दिसतो तर स्त्री च्या शृंगारात निसर्ग सापडतो.

हेमंत ऋतू चे वर्णन करताना कर्नाटकातील बेलूर मंदिरावर दर्पण सुंदरीचे अप्रतिम शिल्प आहे, त्याचा आधार घेऊन हेमंत ऋतूतील शृंगाराचे वर्णन केले आहे.

शिशिर ऋतू फारसा न आवडणारा असावा, कारण कवी हिमालय परिसरात राहणारा असल्यामुळे हिमवर्षाव, हिमांकित थंड रात्रीचे वर्णन आहे.शेवटच्या श्लोकात संक्रांत सणाचा उल्लेख आहे.

वसंत ऋतू खूपच आवडता!

शृंगार रसाची मनापासून आवड असल्यामुळे या ऋतूचे वर्णन फार सुंदर केले आहे. मदन जणू योद्धा बनून काम युद्ध जिंकण्यास निघाला आहे असे वर्णन केले आहे. आंब्याचे झाड, त्याचा आकार, सावली, त्याचा डौल, मोहराचा धुंद करणारा गंध, कोकिळेला फुटलेला कंठ, रस रंग व गंध यांचा सर्वोत्कृष्ट आविष्कार असणारा आंबा यांचे रसाळ वर्णन कवीने केले आहे. वसंत म्हणजे फुलांनी नटलेली झाडे, रंगांची उधळण आहे, वसंत  हा ऋतूंचा राजा त्यामुळे त्याच्या डौलाचे भरभरून वर्णन केले आहे, वसंत पौर्णिमेचा ही उल्लेख आहे.

विरोधी प्रतिमा वापरण्याची शैली, अप्रतिम कल्पना विस्तार, उपमांची खाण कवीकडे आहे, शब्द सौंदर्याच्या बाबतीत तर कालिदासांचा हात कुणीच धरू शकत नाही. कारंज्याला ते जलयंत्र संबोधतात. पक्षी, प्राणी, फुलं, झाडं यांची इतकी विविध नावं वापरली आहेत की वाचणारा संभ्रमित होतो.उदा. प्राजक्ताला शेफालिका, जाई ला मल्लिका   आणि कितीतरी! आता पुष्कळ कवींनी कालिदासाच्या काव्यांचा मराठीत भावानुवाद  केला आहे त्यामुळं आपणही त्या काव्यांचा रसास्वाद घेऊ शकतो.

असे हे ऋतुचक्र, त्यातले ऋतु एकामागून एक त्याच क्रमाने येणारे, कधीही न थांबणारे, म्हणून अविनाशी ठरलेले, आपल्याही आयुष्यात बदल घडवून आणणारे, त्यामुळे आपलं आयुष्य सुसह्य करणारे!

मंगेश पाडगावकर यांच्या दोन सुंदर ओळी आठवतात —

सहा ऋतूंचे, सहा सोहळे, बघुनी भान हरावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

– समाप्त – 

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

☆ सोहळे – ऋतूंचे…भाग १ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

वेलींवर धुंद बहर यावा, निसर्गाने रंग आणि गंध यांची उधळण करावी, फुलपाखरांचे थवे पाहून नयन तृप्त व्हावेत, पक्ष्यांच्या मधुर कूजनाने आसमंत भारून जावा, हळू हळू चोचीत काड्या घेऊन पक्ष्यांचं विणकाम सुरू व्हावं, अशी जर निसर्गात आनंदाची बरसात असेल तर आपलं मन ही त्यात भिजून चिंब होतं. दिवस बदलत जातात, आणि एक दिवस पानगळ सुरू होते. पक्ष्यांचा आधारच नष्ट होतो. पण कुठे त्रागा नाही, कासाविशी नाही, फक्त वाट पहायची पुन्हा बहर येण्याची! निसर्गाची हीच शिकवण आहे, पुढे चालत रहायचं,फक्त चालत रहायचं! बोरकरांची ध्यासपंथे चालणारी ती देखणी पाऊले असतील तर, वाट कशी आहे याची काळजी करायचं कारणच नाही.

रोज उद्याची नव्यानं वाट पाहायची. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस वेगळा असणार आहे. त्यामुळेच तर जगण्यात मजा आहे. ही मजा आणखी वाढविण्यासाठी निसर्गाने ऋतु निर्माण केले असावेत. ऋ म्हणजे गती, ऋत म्हणजे क्रमाने येणारी गती, ऋतु म्हणजे क्रमशः विशिष्ट गतीने पुन्हा पुन्हा येणारे. भारतात आपण सहा ऋतू मानतो त्यांची नावे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर!प्रत्येक ऋतु सुखावह असो किंवा नसो त्या त्या वेळी वेगवेगळे सण साजरे करून आपण ते आनंदी करतो.

वसंताने आपले नववर्ष सुरू  होते आणि शिशिराने संपते. जणू नव्या पालवी बरोबर नव्या आकांक्षा, नवं ध्येय, नवा उत्साह वसंत देतो, म्हणून ही नव्या वर्षाची सुरवात! आपोआपच शेवट शिशिराने होतो. जसं पालवी बहरते, पाने, फुले, फळे, शाखा यांनी झाडाची वाढ होते. ही पाने वर्षभर नको असलेल्या गोष्टी काहीही त्रागा न करता साठवतात. वर्षाच्या शेवटी हा सगळा कचरा झाडं अलगद शरीरापासून वेगळा करतात. कारण त्याला माहीत असतं, नवी पालवी फुटणार आहे. आपलं पण असंच असावं, नव्या उमेदीने वर्षाची सुरुवात करायची. जे जे दुःख पदरी पडलं असेल ते हळूच मनाच्या एखाद्या कोपऱ्यात साठवावं अगदी कचरा समजून, आणि असंच मनापासून अलगद वेगळं करून टाकावं, परत नवी उमेद भरून घेण्यासाठी!

वास्तविक कललेली पृथ्वी, तिचे सूर्याभोवती (लंबवर्तुळाकार) व स्वतःभोवती भ्रमण यामुळे जलवायुचे भिन्न भिन्न कालावधी निर्माण होतात. त्यांना ऋतू म्हणतात. भारताचं खास वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य व ईशान्य मोसमी वारे त्यामुळे पावसाळा हा स्वतंत्र ऋतु असतो. सूर्य मृग नक्षत्रात आला की पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रात आला की संपतो.अशी नऊ नक्षत्रे पावसाची असतात.असे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा यांचा हिशेब चार चार महिन्यांचा असतो. त्यातले बारीक फरक लक्षात घेऊन होतात सहा ऋतू, दोन दोन महिन्यांचे!

आपण जरी चैत्र,वैशाख महिन्यात वसंत आणि याप्रमाणे क्रमाने दोन दोन महिने एक एक ऋतु असं मानलं असलं तरी हे मराठी महिने अंदाजे ऋतू सांगतात कारण प्रत्यक्षात हे चांद्रमास आहेत, म्हणजे पौर्णिमा, अमावस्या यावर ठरणारे आणि ऋतु हे सूर्याभोवती च्या भ्रमणामुळे  होत असल्यामुळे त्यांचा आपल्या मराठी महिन्यांशी काही संबंध नसतो. म्हणून ऋतु आपले रंग त्या मराठी महिन्यात  दाखवेलच असे नाही.

आकाशातील तारका समुहावरून आपण २७ नक्षत्रे ठरवली आहेत. सव्वा दोन नक्षत्रांची एक रास होते. अशा बारा राशी आहेत. म्हणजे सूर्य  प्रत्येक महिन्यात एक रास ओलांडतो. त्याला सूर्य संक्रांत म्हणतात. (उदा.मकर संक्रांत,कर्क संक्रांत) सहा ऋतु मधे शिशिर, वसंत, ग्रीष्म हे उत्तरायणात होतात .२२ डिसेंबर,पासून उत्तरायण सुरू होते ,याचदिवशी शिशिर ऋतु सुरू होतो. पृथ्वी सूर्याच्या जास्त जवळ जवळ जाऊ लागते म्हणून तापमान हळू हळू वाढत जाते.  दिवस मोठे व्हायला सुरवात होते. तर वर्षा, शरद, हेमंत हे दक्षिणायनामुळे होतात. २१ जून ला दक्षिणायन सुरू होते,ह्याच दिवशी वर्षा ऋतू सुरू होतो.त्यानंतर पृथ्वी सूर्यापासून लांब जाऊ लागते, म्हणजेच दिवस लहान होऊ लागतात. तापमान हळू हळू कमी होऊ लागते. म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे आपण ऋतूंचा अंदाज बांधू शकतो, मराठी महिन्याप्रमाणे  नाही.

तैत्तरीय संहिते प्रमाणे ऋतु —

तस्य ते (संवत्सरस्य) वसंता: शिर: || ग्रीष्मो दक्षिण: पक्ष:|| वर्षा: पृच्छं||शरदुत्तर: पक्ष:|| हेमंतो मध्यं ||

म्हणजे संवत्सर ( वर्ष) हा काल्पनिक पक्षी आहे, त्याचे वसंत हे शिर, ग्रीष्म हा उजवा पंख, वर्षा ही शेपूट, शरद हा डावा पंख, व हेमंत हे उदर आहे.

आपला पहिला ऋतु वसंत! आंब्याच्या मोहराचा सुगंध, कोकिळेचं मधुर कूजन, बहरलेली झाडं, वेली, रंगीबेरंगी फुलांनी नटलेली सृष्टी, किती वर्णन करावं तेवढं थोडं आहे. कविमनाला भुरळ घालणारा हा ऋतु! हा ऋतु साजरा करायला असतो चैत्र पाडवा, वसंतोत्सव,अक्षय्य तृतीया, चैत्रागौर! पन्हं,कैरीची डाळ देऊन हळदीकुंकू करायचं, चैत्रागौरीला आरास करायची, कलेला प्रोत्साहन देण्यासाठी! असं म्हणतात की, यौवन व संयम, आशा व सिध्दी, कल्पना व वास्तव, भक्ती व शक्ती यांचा समन्वय साधून जीवनात सौंदर्य, संगीत, स्नेह निर्माण करणारा तो वसंत!

दूसरा ग्रीष्म, अंगाची लाही लाही करणारा! मुलांना मनसोक्त पाण्यात डुंबण्याचं स्वर्गसुख देणारा! अगदीच सृष्टी रुक्ष वाटू नये म्हणून मोगऱ्याचा बहर देणारा! जेंव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो दिवस सर्वात उष्ण असतो. या नक्षत्रावर भात पेरणी करतात. या नक्षत्रात सूर्य नऊ दिवस असतो. जर हे नऊ दिवस तापमान वाढलेले राहिले तर भाताचे पीक चांगले येते. म्हणून रोहिणीचा पेरा अन् मोतियाचा तोरा अशी म्हण पडली आहे. ह्या नौतापात रोहिणी व्रत करतात. ह्या व्रतात चंदन व पाणी यांचे दान करतात, तसंच गरजूंना छत्री व चप्पल देणं पुण्याचं मानतात. किती विचार केला आहे नं, ह्या गोष्टी पाप पुण्याशी जोडून! बाकी हा ऋतु साजरा करण्यासाठी लागतं कैरीचं पन्हं, कलिंगड, आंब्याचा कोणताही प्रकार कोणत्याही प्रकारे स्वाहा करणं.

तिसरा ऋतु वर्षा! प्रियाविण उदास वाटे रात वाला! सृष्टी सौंदर्याचं आणि स्त्री सौंदर्याचं वर्णन करून कवी थकत नाहीत असा! प्रणयातील हुरहूर, अधीरता वाढवणारा! एकाच छत्रीतून, आधे गिले आधे सुखे वाला! चोच उघडून बसलेल्या चातकाचा! आषाढातला पाऊस आणि श्रावणातला पाऊस यांचं   वर्णन मी असं करते

आषाढाचा पाऊस म्हणजे, कुणीतरी याला रोका

श्रावणाचा पाऊस म्हणजे, आनंदाचा झोका

आषाढाचा पाऊस म्हणजे, धरतीवर आक्रमण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, धरतीचं औक्षण

आषाढाचा पाऊस, अखंड रिपरिप

श्रावणाचा …फक्त टिपटिप

आषाढाचा पाऊस देतो, काळोख आंदण

श्रावणाचा पाऊस करतो, पिवळ्या रंगाची शिंपण

आषाढाचा पाऊस म्हणजे, मातीच्या सुवासाची पखरण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, वृक्षवेलींवर रंगांची उधळण

आषाढाच्या पावसात, अंगणाच्या बंदरावर गर्दी नावांची

श्रावणाच्या पावसात,अंगणी झिम्मा-फुगडी चिमुरड्यांची

आषाढात सूर्य मारतो दडी

श्रावणात तोच होतो, लपाछपीचा गडी

आषाढाचा पाऊस म्हणजे, नंगा नाच पत्र्यांचा

श्रावणाचा पाऊस म्हणजे, प्रेमळ धाक आईचा

आषाढाच्या पावसासाठी, भरतो चातकांचा मेळा

श्रावणाचा पाऊस करतो, फुलपाखरे गोळा

पण त्याशिवाय काही प्रकारचे पाऊस, त्यांची गमतीदार नावे, म्हणी सांगणार आहे.

१.पडता हत्ती, कोसळती भिंती

२.सासूचा पडेल मघा, तर चुलीपुढे बसा (सतत मारा, घराबाहेर पडताच येत नाही)

३.म्हातारा पडेल पुख(पुष्य), तर चाकरीच्या गड्याला सुख( थांबून थांबून पडतो, पाऊस थांबला म्हणून कामाला सुरवात करावी तोवर पुन्हा पडायला लागतो, त्यामुळे गड्यांना हजेरी आणि विश्रांती दोन्ही मिळतं)

४.पडतील चित्रा तर भात न खाई कुत्रा (बेभरवशाचा, अन्नाची नासाडी करतो)

५.आला अर्दोडा, झाला गर्दोडा (आर्द्रा चा पाऊस चिखल करतो)

६.पडल्या मिरगा तर टिरी कडे बघा ( मृग पडला तर शेतीची कामे खोळंबतात)

७.आली लहर, केला कहर, गेला सरसर(आश्र्लेशाचा पाऊस म्हणजे थोड्या थोड्या भागावर जोरदार सरी येऊन जातात. एकाठीकाणी मोठ्ठा पाऊस लागावा आणि थोड पुढं गेलं की सगळं कोरडं ठणठणीत)

८. पूर्वा फाल्गुन हा सुनेचा (चंचल, कामचुकार)

९.पुनर्वसु चा तरणा पाऊस( शक्तिशाली)

वर्षा ऋतू म्हणजे भक्तीचा पूर!आषाढीवारी, गुरूपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, कृष्ण जन्म, गोपाळकाला, श्रावणातला प्रत्येक दिवस हा त्या त्या देवतेची पूजा करण्याचाच असतो. सणावारांची रेलचेल असणारा ऋतु!

क्रमशः…

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आईपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आईपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आई जाउन आता ४ वर्षे होऊन गेली. पण आईची आठवण झाली नाही असा एकही दिवस जात नाही. कधी कधी भाउक होऊन आईच्या आठवणीने कासाविस झाले तर बाकीचे म्हणतात, काय लहान असल्यासारखे करतेस? तुला स्विाकारायला हवं ना? मग अशाने जास्तच व्यथित व्हायला होते.

अशी अवस्था कितीतरी जणांची होत असेल. पण मग विचार करताना आई भोवती मन पिंगा घालू लागले. आई विषयीचे कितीतरी विचार डोक्यात येऊन गेले.

प्रत्येक ठिकाणी देवाला जाता येणे शक्य नसल्याने देवाने आई निर्माण केली.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी.

आईची किंमत जो करत नाही त्याला जगाशी लढण्याची हिंमत होत नाही.

तसेच आईचा महिमा सांगणार्‍या कितीतरी कविता आठवल्या

गदिमा, मभाचव्हाण, यशवंत अशा कितीतरी कविंसोबत अलिकडेच कवि अनिल दिक्षीत, उद्धव कानडे आदि कविंच्या भावपूर्ण कविता मन हेलावून टाकतात.

मग वाटले खरच जगात कुठेही गेले तरी आईला किती महत्व आहे ना? मुलांना जन्म देण्याचे सामर्थ्य एका आईतच असते. तसेच त्यांना वाढवणे संस्कार करणे हे काम जबाबदारी न वाटता फूल उमलते तसं, सकाळी दव पडते तसं,सहज नकळत करण्याचे कसब हे एका आईठायीच असते.

वात्सल्य, प्रेम, ममता तिच्या अंगी ठासून भरलेली असते. आणि मग आई ही कोणी व्यक्ती नसून वृत्ती आहे असे वाचल्याचे आठवले. ती एक वृत्ती म्हणजे भावना असल्याने  ज्ञानेश्वर हे महाराष्ट्राची तर विठ्ठल हे जगत माऊली झाले. अनेक पुरुष संत हे गुरूमाऊली बनले.

म्हणजेच आईपण ही वृत्ती खूप अवघड असूनही ती वृत्ती जो धारण करू शकतो तो आई होऊ शकतो.

सगळ्यांच्या आवडी निवडी सांभाळणे, सगळ्यांवर सारखे प्रेम करणे,चुका पोटात घेणे, शी-शू मनात कोणतीही घृणा न ठेवता आनंदाने काढणे, मुलांना हृदयाशी धरणे, चांगल्या-वाईट गोष्टिंचे ज्ञान देऊन चांगल्या गोष्टी मनावर बिंबवणे, सतत काहीतरी मुलांसाठी करत रहाणे, स्वत्व विसरून फक्त देत रहाणे,जिच्या सान्निध्यात आल्यावर सुरक्षित वाटते , लढण्याचे बळ येते असा भक्कम आधार होणे, अशी लाखो कारणे देता येतील जी वरवर अगदी सामान्य वाटतील पण करायला गेले तर किती अवघड आहे हे समजते.

मग ज्या लेकरांची आई लवकर देवाघरी गेली त्या लेकरांना आई बापाचे प्रेम एकट्या पुरुषाने दिले अशी कितीतरी उदाहरणेही पहातो म्हणजेच तो पुरूष त्याच्या अंगी असलेले आईपण जागृत करून मुले घडवतो. किंवा मुलांसाठी दुसरी आई आणतो . पण अशावेळी ती आई सावत्र बनते. का? तिच्या अंगी आईपण नसते का? असते तिच्या अंगीही आईपण असतेच पण मनात कुठेतरी दुजाभाव असतो म्हणून स्वत: जन्माला घातलेल्या मुलांवर ती मुद्दाम अधिक प्रेम आदर देते. मग अशावेळी ती नवर्‍याच्या मुलाची आई होऊच शकत नाही कारण आईपण असणार्‍या व्याख्येला ती कुठेतरी छेद देत असते.

फार कशाला कैकयीने सावत्र पणा जागृत ठेऊन रामाला वनवासात पाठवले हे उदाहरण सगळ्यांना माहित आहेच.

तसेच कृष्णाचा सांभाळ करणारी यशोदा, कर्णाला वाढवणारी राधा या खर्‍या अर्थाने आई झाल्या अशी उदाहरणे पण सर्वश्रृत आहेतच की!!

मग आई, आईपण याचे मोठेपण शब्दातीत असल्याची जाणिव होते. प्रत्येक घरात एक आई असते. तुमची आमची सेम असते पण आमच्या आईसारखी दुसरी कोणीच नाही असे सारखे वाटत रहाते.

तरी देखील दुसर्‍यांच्या आईत आपली आई म्हणजे त्या आईतील आईपण जाणून तिच्या चरणीही नतमस्तक होते.

ज्ञानेश्वर विठ्ठल इतर गुरू माऊली यांच्यातील आईपणा पाहून प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीप्रमाणे त्यांनी किती प्रयत्नामधून हे आईपण आपल्या ठायी आणले असेल ते वाटून त्यांचा हेवा वाटतो .

स्वत: आई होऊनही काही गुण स्वभावत:च अंगी आले तरी आपल्या आईसारखे नाहीच जमत असे वाटून तिचे श्रेष्ठत्व मनातच जाणून तिच्यासारखे होण्याचा मन प्रयत्न करते.

असे मातृत्व अर्थात आईपण जर सगळ्यांच्या हृदयी आले तर?•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “मैत्री  चहाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

कधीकधी उगीचचं आपली नेहमीचीच आवडती काम करायला मूड लागत नाही, संगतवार अशी लिंक लागत नाही तेव्हा एरवी काय करावे असा प्रश्न पडायचा,काही सुचायचं नाही. विशेषत: पावसाळा आणि हिवाळा आपली संपूर्ण दिवसभराची कामे सुसंगत पार पाडावयाची असल्यास ह्याच्या शिवाय पर्याय नाही असा रामबाण उपाय. पण जेव्हापासून माझी मी मला नीट ओळखायला लागले तेव्हा हा मूड चुटकीसरशी बदलवण्याच कसब मला साधलयं.आणि ते ही एका सीप मध्येच.

हाँ,हाँ, असं दचकू नका.एक सीप म्हणजेच एक घुँट चाय का भाई.खरचं मस्त वाफाळलेला,आलं घातलेल्या,फेसाळ दुधाचा चहा म्हणजे अमृत. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडीनुसार चहामध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण वेगवेगळं असतं.

आजकाल मधुमेही,अतिशय तब्येतीबाबतीत जागरूक मंडळी बिनसाखर,कमीसाखर,चहापत्तीचं अल्प प्रमाण, अगदी कमी उकळलेला चहा घेणा-या शहरी लोकांचं प्रमाण बरचं वाढलयं.चहाच्या परिवारात ग्रीन टी,लेमन टी ह्यासारखी भावंडही घुसलीयं.पण जो मजा कड्डक मिठ्ठी,आलं,गवतीचाय डालके जो चाय बनती है नं उसका जवाब नही. तबल्याचा गंध नसूनही हा चहा घेतल्यावर प्रत्येकाच्या तोंडून “वाह ताज”बाहेर हे पडतचं पडतं.

खरतरं चहाची आणि माझी ओळख तशी जरा उशीराच झाली. पण कसं असतं नं ओळख,नातं परिचय किती वेळ किंवा उशीरा झाला ह्याच्यापेक्षाही ते नातं,ती ओळख किती मनापासून घट्ट असते त्यावर त्याची खोली अवलंबून असते.त्याचं नात्याप्रमाणे माझी चहाशी ओळख जरी उशीरा झाली तरी ती मैत्री, ओळख खूप मनापासून, घट्ट, न शेवट असणारी झालीय हे ही खरे.

आज हे सगळं चहापुराण आठवायचं कारण म्हणजे गुगलबाबाच्या माहितीनुसार 15 डिसेंबर  हा “चहा दिवस”आहे.आम्ही लहान असतांना माझं माहेर गाईम्हशीवालं.दुधदुभतं माहेरी भरपूर त्यामुळे चहा तोंडी लागणं शक्यच नव्हतं.गाईम्हशींनी दुध दिलं नाही किंवा दुध नासलं तरचं चहा तोंडी लागायचा. पुढेपुढे दुधाचे दात पडल्यावर,जरा ब-यापैकी अक्कल फुटल्यावर मात्र जी चहाशी घट्ट मैत्री झाली ती आजतागायत वाढतेच पण कमी व्हायच नावचं नाही बघा.जशी चहा घ्यायची मजा ही फुल्ल कपभरुन चहामध्येअसते तशीच एक आगळीवेगळी लज्जत ही कटींग चहा मध्येही असते आणि तो अर्धा कटींग चहा आपल्या जिवाभावाच्या,आवडत्या व्यक्तीनं जर दिला असेलं नं तर क्या कहना. आजकाल अमृततुल्य वा प्रेमाचा चहा अशी बरीच तयार चहाची दुकान आहेत शिवाय वारेमाप चहा कॅन्टीन पण आहेत परंतु मला अगदी मोजून इन मिन तीन ठिकाणचा चहा आवडतो, एक म्हणजे माझ्या स्वतःच्या हातचा घरचा चहा, दुसरा आमच्या बँकेत बनणारा चहा आणि तिसरा अमरावतीच्या शाम चौकातील सुंदरम् कॅफे मधील चहा. आमच्या बँकेत तर दोन पुरुष कर्मचारी असा अफलातून साग्रसंगीत आल वैगेरे घालून दिलखेचक चहा करतात न की मस्त चहा ने कामाचा मुडच बनून जातो.

ह्या चहापुराणावरुनच आठवलं बघा.चहा आणि प्रेम किंवा मैत्री ह्यांच एक अनोखं असं नातं असतं.एक कुणी अनामिकानं लिहीलेली चहा आणि मैत्री वरील ही पोस्ट माझी खूप आवडती.ह्या पोस्टमध्ये मी थोडा बदल केलायं.पोस्ट खालीलप्रमाणे

चहाच्या कपासोबतच त्याने मैत्रीचा हात पुढे केला,तेव्हा ती भांबावली,लग्न झालयं,मुलं मोठी झालीयं,छान चाललयं सगळं असं म्हणाली.तो हासून म्हणला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

ती पुढे म्हणाली मला हे आवडत नाही, मी बरी माझे काम बरे,ह्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही, तेव्हा हलकेच चहाचा कप पुढे करुन हसून परत बोलला तो, अग मी मैत्री म्हणतोयं तुला.

इथे मेली सगळ्या जगाची नजर,सगळ्यांना नसत्या उचापती,प्रमोशन्स तोंडावर, साध्या गोष्टीनेही काहूर माजतं,तो चहाचा कप तिच्या ओठी लावतं खळखळून हसतं म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोयं तुला.

थंड होत असलेल्या चहात हिचे अश्रु पडताच डोळे पुसायला पेपरनँपकीन पुढे करतच तो परत बोलला अगं मी मैत्री म्हणतोय तुला.

चहा थंड झाल्यामुळे तो दणदणीत आवाजात परत तिच्या आवडीचा फुल्ल,कड्डक, मीठा चाय आँर्डर करतो तेव्हा ती खुदकन डोळे पुसत हसते.आणि जेव्हा तो फुल्ल चहा कटींग करून आळीपाळीने प्याल्यावर तीच आभाळं खरचं निरभ्र होतं,मनावरचं ओझं हलकं होतं म्हणून तो परत म्हणतो अगं वेडाबाई ह्याचसाठी मैत्री म्हणतोय तुला.

आणि मग ह्या चहाच्या साक्षीनचं परत दोघे शेवटच्या श्वासापर्यंत अंतापर्यंत मैत्रीसाठी बांधील राहण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच घेतात.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आयुष्याच्या पुस्तकातून… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

आयुष्याच्या पुस्तकातून? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

पु.ल.देशपांडे यांच्या नाटकातला एक प्रसंग आठवला. एका केसचा साक्षिदार म्हणून एका स्त्रीला साक्षीदाराच्या पिंजर्‍यात उभे केलेले असते. वकील नाव विचारतात ती नाव सांगते. पुन्हा वकील तिला म्हणतात वय? तर ती बाई म्हणते, आता गरीबाला कसलं आलय वय? आन अडाण्याला कसली आलीय जन्मतारिख?

कोर्टात एकच हशा. असो यावरून प्रश्न पडला अडाणी कोणाला म्हणायचे? अडाणी लोक पण अनुभवाचे बोल बोलताना सहज म्हणतात, नुसतं शाळा कालेजात जाऊन चार पुस्तकं वाचून शानपन येत नसतं•••

मग शिक्षणाचा आणि शहाणपणाचा काही संबंध आहे का? असेल तर वरचा डायलॉग का बोलला जातो? नसेल तर मग माणूस शिकतो का? अर्थातच शिक्षण म्हटले की पुस्तकांचा संबंध येतोच. मग एवढी शेकड्याने पुस्तके वाचून, हाताळून जर शहाणपण आले नाही म्हणत असतील तर असे कोणते पुस्तक आहे जे अशिक्षीत लोकही वाचून शहाणपणाच्या गोष्टी करतात?

मग लक्षात आले, प्रत्येक चराचराचे आयुष्य म्हणजे त्या चराचराचे पुस्तकच नाही का? अनुभवाचे गुरू प्रसंगांच्या पानातून हे पुस्तक ज्याचे त्याला शिकवत असतात. त्याच अनुभवाच्या जोरावर शिकलेले ज्ञान त्यांना शहाणपण देत असते. म्हणून शाळेत न गेलेली व्यक्ती अशिक्षित असू शकेल पण अडाणी नाही.

किती महत्वाचे असते ना हे पुस्तक? जन्माचे मुखपृष्ठ आणि मृत्यूचे मलपृष्ठ घेऊन आलेले पुस्तक ज्याचे त्यानेच लिहायचे असते.

पुस्तके जशी वेगवेगळ्या विषयाची, वेगवेगळ्या लिखाणाची वेगवेगळ्या प्रकाराची असू शकतात तशीच प्रत्येकाच्या आयुष्याची पुस्तके वेगवेगळी असू शकतात पण या एकाच पुस्तकात सगळ्या प्रकारची सगळ्या विषयाची प्रकरणे असतात.

कधी त्यात दोन ओळी, तीन ओळी, चारोळी, कविता,गझल,मुक्तछंद सारख्या असंख्य कविता मिळतील

तर कधी, पॅरॅग्राफ, लेख,निबंध, लघुकथा, दीर्घकथा, कादंबरी असे लिखाण मिळेल.

प्रत्येक पान हे उत्सुकतेने भरलेले असते. मधे अधे लिखाणाला पुरक अशी चित्रे मिळतील. लेखनातील पात्रेही किती केव्हा कशी पुढे येतील हे खुद्द लेखकालाही माहित नाही.

प्रत्येकालाच असे पुस्तक लिहावेच लागते.

मग अशी पुस्तके काळाच्या पडद्याआड गेली की काही दिवस हळहळून ही विस्मरणात पण जातात.

पण खरे सांगू? प्रत्येकाने आपले पुस्तक लिहीताना आपल्या पुस्तकाची प्रत कोणाला काढावी वाटेल असे लिखाण केलेले असावे. या पुस्तकाचा आदर्श कोणीतरी घ्यावा असे लिखाण करून मग आपले पुस्तक बंद करावे.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आयडेंटिटी…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

मध्यंतरी एका कार्यक्रमाला जायचा योग आला तेव्हा त्यांनी माझा परिचय करून देताना माझ्या बद्दल काही माहिती सांगून ओळख करून दिली.तेव्हां जरा लक्षात आल एकाच व्यक्तीची किती वेगवगळ्या प्रकाराने ओळख दडलेली असते.ती ओळख कधी नात्यातून तर कधी आपण करीत असलेल्या कामावरून तर कधी कधी आपला स्वभाव, आपला जनसंपर्क ह्यावरून ठरत असते.

एकदा नोकरीत असतांना सर्व्हिस बुकमध्ये बोटांचे ठसे घेतले तेव्हाही ही आपली अजून एक ओळख हे ध्यानात आले.  इंशुरन्स पाँलिसी काढतांना ओळख म्हणजेच आयडेंटिटी मार्क विचारतात ही पण एक ओळखच. अशा निरनिराळ्या प्रकारच्या आपल्या एकाच व्यक्तीच्या ओळखी बघुन अचंबित व्हायला झालं.

सहजच मनात आलं खरचं एवढीच असते आपली ओळख?आपली आयडेंटिटी?नक्कीच नाही.

मग ठरवलं आपली ओळखं आपली आयडेंटिटी आपण स्वतः तयार करायची.

सहसा घरच्या सगळ्या जबाबदा-या पार पाडता पाडता स्त्रीला स्वतः चा विसरच पडतो आणि मग इतर लोक जसे तिला गृहीत धरायला लागतात तसेच ती पण स्वतः ला गृहीत धरायला लागते.

कोणाची बायको,कोणाची आई म्हणून ओळख असणं आनंद देतचं पण आपल्या ओळखीला परिपूर्णता तेव्हाच मिळते जेव्हा आपली आपल्या स्वतःवरून ओळख पटते.

तिचं सगळं वागणं,बोलणं,आवडनिवड,सोयी ह्या सगळ्या घरच्यांचा आधी विचार करूनच ठरल्या जातात.अर्थात हा तिच्या स्वभावाचाच भाग असतो.ह्याचे प्रमाण सिमीत असेल तर तिला त्यात आनंदही मिळतो. ह्या गुणांमुळे घर एकत्र बांधून ठेवायला मदतच होते. पण ह्याचा अतिरेक झाला तर ती स्वतः मधील “स्व” च विसरते.

ह्याचाच परिणाम म्हणजे स्वतःचा स्वतः वरील विश्वास उडतो म्हणजेच आत्मविश्वास कमी होतो. लहानसहान बाबींमध्ये सुध्दा दुसऱ्या वर अंवलंबून राहायला लागतो.

समोरच्यांच्या मतांचा आदर जरूर करावा पण तेवढेच आपल्या मतांनाही प्राधान्य द्यावे.

शेवटी काय तर आपण केलेले कर्म आणि करीत असलेले कार्य च खरी दाखवतात आपली आयडेंटिटी.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “50-50 अर्थात थोड तुझं… थोड(स) माझं” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

आमचही घर इतर (सर्व) सामान्य घरांसारखच आहे. म्हणजे आमच्याही आपसातल्या काही गोष्टी फक्त स्वयंपाक घरापर्यंतच असतात. काही थोड्या घरंगळत बाहेर हाॅलमधे रेंगाळतात. तर काही मात्र हाॅलमधून बाल्कनीत फेरफटका मारायला येतायेता बाहेर केव्हा पडतात ते समजत नाही. पण आमच छान चालल आहे.

दोन किंवा जास्त पक्षाच सरकार आल्यावर जस त्यांचा आपसात वेळोवेळी वेळेवर समन्वय असतो, तसाच आमचा समन्वय आहे. त्यांची जशी आपसात हवी तशी खातेवाटप आहे असे दाखवतात तशीच आम्ही आम्हाला हवी तशी आमची खाती वाटून घेतली आहेत.

आता घर म्हणजे देणंघेणं, सणवार, खाणंपिणं, खरखोटं, कमीजास्त, उठणबसण यासारख्या बऱ्याच गोष्टी जोडीने येणारच. आणि याच जोड गोष्टी आम्ही गोडीने आमची खाती म्हणून वाटून घेतल्या आहेत. यातच आमची ख्याती आहे.

आता देणंघेणं, यात देण तिच्याकडे आणि घेणं माझ्याकडे ठेवलंय.उगाचच देतांना आपल्याकडून काही कमी गेल का?…. याची खंत वाटायला नको. आणि घेण यात माझ्या काहीच अपेक्षा नसतात. त्यामुळे तिथे खेद नसतो. मिळाल त्यात आनंद.

सणवार, यात सण कोणते, कुठल्या पध्दतीने साजरे करायचे हे ती ठरवते. आणि ते कोणत्या वारी आहेत, आणि त्या दिवशी मी नेमक्या गोष्टी टाळायच्या हे मला ठरवावच लागतं. त्यामुळे सण तिचे आणि वार माझ्याकडे येतात. पण अशा वारांची वारंवार आठवण ती करून देते.

खाणंपिणं यांचंही तसच. खाण्याच्या गोष्टी तिच्याकडे, आणि पिण्याच्या मात्र मी माझ्याकडे ठेवून घेतल्या आहेत. यात तिच्या खाण्याबद्दल मला काहीच म्हणायचे नसते. पण माझ्या (काही) पिण्याबद्दल तिला आक्षेप असतो. मी तिच्या खाण्याबद्दल बोलत नाही. पण माझ्या त्या पिण्याबद्दल निषेध हा पिण्याअगोदर आणि प्यायल्यानंतर दोन्ही वेळा नोंदवला जातो.

खरखोटं यात ती काही वेळा मला विचारते, खर सांगताय ना……. पण ती बोलते किंवा विचारते त्यात खोटं काहीच नसत. पण तरीही ते खरंच आहे असं खोटखोटच मी म्हणतो असं तिला वाटत. इतका माझ्या खरेपणा बद्दल तिला विश्वास आणि आदर आहे.

कमीजास्त बद्दल जास्त काय सांगणार. पण तिच्या म्हणण्याप्रमाणे सगळं वेळेवर, व्यवस्थित करून, कमी बोलून सुद्धा कमीपणा मात्र तिच्याच वाट्याला येतो. आणि याचा जास्त त्रास तिलाच होतो. यात सगळं, वेळेवर, व व्यवस्थित यावर विशेष जोर असतो. तरीही माझ्याकडून तिला जास्त अपेक्षा नसतातच. पण त्यातही मी कमी पडतो. यापेक्षा जास्त सांगण्यासारख काही नाही.

उठणबसण यात टी.व्ही. समोर बसून कार्यक्रम पाहताना थोड्या थोड्या वेळाने काम करण्यासाठी उठण तिच्याकडे, तर कार्यक्रम संपेपर्यंत (तंगड्या लांब करून) बसण मला भाग असत.

या प्रकारे आमचं सगळ व्यवस्थित चालल आहे. यात काही ठिकाणी आमचे मतभेद असतील. पण मनभेद मात्र कुठेच नाही. आणि यावर आमच एकमत आहे.

अरे हो… एकमतावरून आठवल. आमचे बरेचसे निर्णय हे एकमताने घेतलेले असतात. याबद्दल शंका नाही. पण हे एकमत म्हणजे एकच मत असतं, आणि अर्थातच ते कोणाच असेल……. यावर सगळ्यांचच एकमत असेल.

अस आमच थोड तुझं आणि थोड(स) माझं असलं तरीही 50/50 आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

डॉ. जयंत गुजराती

🔅 विविधा 🔅

जी सरकार ☆ डॉ. जयंत गुजराती ☆

कधीकधी मला इतका राग येतो ना की मला क्रांती कराविशी वाटते. बंडाळी, क्रांती, उठाव हे शब्द वामपंथीयांचे साहित्य वाचल्यामुळे डोक्यात भिनलेले. आता त्याशिवाय म्हणजे क्रांति शिवाय पर्याय नाही. बंड करावेच लागेल. उठाव करावाच लागेल. जुलूम सहन करता कामा नये. किती सहन करावं. सारखं तेच तेच अन्यायच अन्याय. मग एक दिवस असा उगवतो की कडेलोट होतोय असं वाटताना उद्रेकच होईल असं ठाम मत होतं. असा एकच दिवस नव्हे तर महिन्यातून एक दिवस उगवण्याचे ठरलेलेच व बहुतेक तो रविवारचाच दिवस असतो, ज्यादिवशी हक्काची सुट्टी असते व त्याला कारण आमचं सरकार!!

तसं आमचं सरकार अजबच म्हणायचं. (तसं म्हणण्याची हिम्मत होत नाही ही गोष्ट वेगळी!)  तर आमचं सरकार, आलं देवाजीच्या मना या धर्तीवर, चला आपण ही खोली साफ करूयाचं फर्मान सोडून मोकळं होतं. सरळ सरळ ब्रह्मांडच आठवतं. निम्मा दिवस तरी वाया जाईल याची अक्षरशः मनाची खात्रीच पटते. रविवार म्हटला की कसं, सकाळीस उशिरा उठणं, सावकाश दाढी उरकणं मग मनसोक्त शॉवर खाली आंघोळ, मग गरम गरम नाश्ता व हातात वर्तमानपत्र, वा मोबाईल, त्यातील व्हॉट्स एप व फेसबुक फ्रेंड्स, इन्स्टा, स्नॅपचेट, वाटच पहात असतात की हा गडी कधी ऑनलाईन होतो. यापरतं परमसुख नाही. थोडं…. . फार इकडे तिकडे सर्फिंग केलं की रविवार मजेत जाणार याची ग्यारंटी! पण कधीकधी तसं घडायचं नसतं!

बायको एका हातात झाडू, दुसऱ्या हातात खराटा, काखेत वरची जळमटं काढायला लांब काठीला बांधलेला झाडू, तीन चार बादल्या पाण्याने भरलेल्या,  हिपोलीनच्या पुड्या, ओली फडकी, कोरडी फडकी, जय्यत तयारी करून समोर उभी ठाकलेली. मग मनातले मांडे बाजूस सारून आपसूकच उभं होणं आलं. हिचं आपलं ओठातल्या ओठात पण खरमरीत पुटपुटणं चालूच असतं, “ नाही तरी तुम्हाला कामाचा कंटाळाच तेवढा. हातातून मोबाईल खाली ठेवता ठेववत नाही.”   मी आपला तिच्या वाक् बाणांकडे कानाडोळा करत होतो. पण खरं सांगू का? ते क्रांती, बंड, उठाव यांचं अवसान गळूनच पडलं होतं. बघता बघता कपाटं रिकामी होत असलेली, खिडकीचे पडदे काढणं, भिंतींवरचे फोटोफ्रेम, काय काय ते खोलीच्या मधोमध माझ्या उंचीचे ढीगच ढीग. शिवाय शेजारी मोठालं स्टुल ठेवलेलं. त्यावर मलाच चढणं भाग होतं. पंखा, ट्युबलाईट पुसायला.  अडगळीची खोली, पोटमाळा असला की त्या स्टुलावरून एकदा चढणं झालं की मोहीम फत्ते झाल्याशिवाय उतरणं होत नसे.

“ एकेक वस्तु द्या बरं पुसून, अगोदर कोरड्या फडक्याने मग  ओल्याने. ” मी म्हटलं, “ हुकूम सरकार! ” हे झालं का? ते झालं का? हे इथे नका ठेवू, ते तिथे बरं दिसेल. पुढे सरकवाना पुढे. ते तेवढं बाजूला ठेवा. मग मोलकरीणला देऊ, भंगारात काढू, अहो हे माझ्या मावशीची चुलत भाची हे केव्हापासून मागत होती. तिच्यासाठी राखून ठेऊ. ती इतक्या वेगाने ती निर्णय घेत होती की मला काय मत द्यावं ते उमजत नव्हतं. मग तिने एकेक बॉक्स काढायला घेतले, तसं माझं पित्त खवळलं, “ अगं त्यात वर्तमानपत्रात व मासिकांत आलेले माझे लेख आहेत. ती अडगळ नाहीये, पाहिजे तर पुसून देतो पण ते बॉक्स जसेच्या तसे परत ठेव. ” यावर “कोण वाचतंय इतकं सगळं? नुसती जागा अडून राहिलीय.” कुणीतरी गरम शिसं कानात ओततंयची फिलींग आली बुवा. पण मग मी निक्षून सांगितलं. “त्याला हात लावू नको, पाहिजे तर दुसरं कपाट आणून देईन मी!” मग ते तेवढ्यावर निभावलं.

बारा वाजले तरी पसारा आ वासून डोळ्यापुढे! म्हटलं, “ ए बये, तू आणखी नको करू उचकपाचक, नाहीतर ह्यातच संध्याकाळ व्हायची. ”  तिनं उलट उत्तर दिलं, “ तुम्हीच पटापट हात चालवा बघू. आवराआवर करायला वेळ लागत नाही. ” मी कपाळाला हात लावला. हिच्या समोर कोणतीही संथा चालत नाही. आलिया भोगासी म्हणत(अर्थात मनातल्या मनात!) एकेक वस्तूंवरून हात फिरवू लागलो. तिचा चेहेरा सगळं मनासारखं होत असल्याचं सांगून जात होता.

झालं एकदाचं आवरून. माझं तर तसं कंबरडंच मोडलेलं. तरीही हुश्श, साहीसुट्ट्यो असं सवयीने मनातल्या मनात म्हणून घेतलं. तिचं बारीकसारीक सामान इथे तिथे लावणं चालूच होतं. तेही एकदाचं आटपलं, मग माझ्यासमोर जितंमयाच्या आवेशात पहात ती बोलली, “आता कसं दिसतंय सगळं?” अनाहूतपणे मी बोलून गेलो, “काही फरक पडलेला नाही, जसंच्या तसंच तर आहे सगळं!” हे ऐकल्या बरोबर तिचं मुसमुसणंच सुरू झालं. बाकी एकदम शांतता पसरली. मी किती घोर अपराध केलाय याची प्रचंड जणीव मला झाली. अचानक तिला वाचा फुटली, “ तुम्हाला तर माझी किंमतच नाही. कितीही कष्ट करा, मर मर मरा,  राब राब राबा, सगळं पालथ्या घड्यावर पाणीच. ” आता घड्याच्या जागी मीच मला दिसू लागलो व अंगावरून गार पाणी वाहत असल्याचा भास झाला. तेव्हा लक्षात आलं, दोघांच्या आंघोळी लटकलेल्या. तसं मी तिला जवळ घेत म्हटलं, “ नाही गं, तुला छानच जमतं सगळं यथास्थित लावणं. जशी तू देखणी तशी तुझी ही खोली.  चल, आज तसा उशीरच झालाय, तू सैंपाक करण्याच्या भानगडीत पडू नकोस, बाहेरच जेवू!!” मी अंदाज घेऊ लागलो. माझ्या शब्दांचा परिणाम होत असलेला. तिचं मुसमुसणं थांबलं. म्हणाली, “तसं आपण दोघेही दमलोय तेव्हा तू म्हणतोस तसंच करू. मी आंघोळ करून येते. तोपर्यंत….” तिने चक्क  मोबाईल माझ्या हाती दिला. अन् मी खरडू लागलो.   अजून लेख लिहून पूर्ण होत नाही तो बाथरूममधून हाक आली, हाक कसली दमदार आवाजातला आदेशच. “आंघोळ करून घ्या बघू! अन् तो मोबाईल ठेवा खाली!!” मी लगेच म्हटलं, “जी, सरकार….”

© डॉ. जयंत गुजराती

१०/१२/२०२३

नासिक

मो. ९८२२८५८९७५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print