मराठी साहित्य – विविधा ☆ डुल्लू… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ डुल्लू… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

हा शब्द ऐकला आणि खूप गंमत वाटली. आणि आठवले लहान बाळ. ज्याला पहिली टोचणी मिळते पाचव्या किंवा बाराव्या दिवशी.आणि जगात आल्याचे बक्षीस म्हणून पाहिला दागिना मिळतो तोच हा डुल्लू म्हणजेच डूल त्या डुलच्या सोन्याच्या तारेने कान टोचणी होते.अर्थात हे हौसेचे असते. आणि न रडणारे बाळ पण त्या टोचणीने अगदी आकांताने रडते. जणू पुढच्या आयुष्यात होणाऱ्या कान टोचणीची नांदीच! अर्थात दोन्ही अर्थाने होणारी कानटोचणी फायद्याचीच असते.

कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो तो डोळे व मेंदू यांना ऍक्टिव्ह बनवतो.  डोळ्यांच्या नसा या बिंदूतून जातात. त्यामुळे  दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत होते. त्याच बरोबर लहान व मोठा मेंदू एक्टिव्ह होतो.या बरोबरच कान टोचल्याने शरीराचा तो बिंदू उघडतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. कान टोचल्याने लठ्ठपणाही कमी होतो.

एक्यूप्रेशर तज्ञांच्या मते, कानाच्या खालच्या भागात मास्टर सेन्सरी आणि मास्टर सेरेब्रल नावाचे 2 कानाचे लोब असतात. या भागांना छेद दिल्यास बहिरेपणा निघून जातो. कानाला छिद्र केल्याने स्पष्ट ऐकू येते.

ज्या ठिकाणी कान टोचले जाते ते थेट स्त्रियांच्या प्रजनन अवयवांशी संबंधित आहे. कान टोचल्याने महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेच्या समस्येपासून आराम मिळतो  त्याचप्रमाणे मासिकपाळीच्या काळात  होणारा त्रास कमी होतो. मध्यभागी कान टोचले तर सगळ्या रक्तवाहिन्या एक्टिवेट होतात.

कानाचे बिंदू टोचून घेऊन धातू वापरल्याने अंगातील वात ताब्यात राहतो.  आपल्या या सर्व जुन्या आणि मागासलेल्या परंपरा चालीरीतींना वैज्ञनिककदृष्ट्या  महत्त्व आहे.

एका डूल ने सुरु झालेला दागिन्यांच्या प्रवास कितीही दागिने घेतले,घातले तरी संपत नाही.पण आज आपण फक्त कानातील दागिने बघू.

तसे कान न टोचता सुद्धा विविध प्रकारे कानात घालू शकतो.आणि त्याचे फायदे पण विविध आहेत. जसे क्लिपचे,चुंबकीय,नुसते दाब देऊन चिकटणारे इत्यादी. बरे हे इथेच संपत नाही. याच बरोबर कानातले चौकडा,कुडी,भोकर, वेल,पट्टी,रिंग,झुबे,टॉप्स,सोन्याचे कान असे विविध प्रकार असतात. शिवाय पुरुषांचे  कानातील दागिने पण असतातच. ही परांपरा अगदी पूर्वी पासून आहे. पूर्वीचे राजे,महाराजे यांचे फोटो किंवा चित्रे तर त्यांच्या कानात भिकबाळी व बाळी दिसतेच.

रामायण महाभारत काळापासून कर्णभूषणे प्रचलित होती. त्यांचे दोन प्रकार होते. १) कानाच्या वरच्या भागात घालायचे कर्णभूषण याला कर्णिका म्हणत. २) कानाच्या खालच्या पाळीत घालायची कर्णभूषणे याला कुंडल म्हणत.

गोलाकार व नक्षीदार कुंडलांना मकरकुंडले म्हणत. वर्तुळाकार प्रफुल्ल कमळाप्रमाणे असलेल्या कर्णभूषणास कनक कमल म्हणत.

भिकबाळी ही उजव्या कानात वरच्या बाजूस घातली जात होती.

ती घातल्याने मूत्र साफ होते.

व मानसिक स्वास्थ्य चांगले रहाते. जेथे पाण्याचे दुर्भीक्ष असेल तेथे ही भिकबाळी लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त असते.म्हणून वाळवंटी प्रदेशात कानाच्या पाळीच्या वरच्या बाजूस कान टोचून तेथे भिकबाळी, सुंकली किंवा छोटी बाळी घातली जाते.

पूर्वी सोन्याची तार  खोबऱ्याच्या वाटीला टोचून ठेवायचे आणि त्या तारेने बाळाचे कान टोचले जायचे. आता वेगवेगळी मशिन्स आहेत. पूर्वी कानाच्या पाळीला खालच्या बाजूला एकाच ठिकाणी छिद्र करत असत.पण आता कान २/३ ठिकाणी तर ५/६ ठिकाणी पण टोचलेला दिसतो. म्हणजे ही आरोग्या विषयी जागृती व फॅशन दोन्ही एकत्र करता येते. आहे की नाही फायदा?

या एका कान टोचण्याने (दोन्ही अर्थाच्या) कितीतरी फायदे होतात. तर आपणही याचा फायदा मिळवू व इतरांना पण करुन देऊ.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सच्चाई/खरेपण… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? विविधा ?

☆ सच्चाई/खरेपण? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

साधेपणा हे सर्वात जास्त चांगले सौंदर्य आहे आणि आपलेपणा हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आज हा सुविचार वाचला आणि त्यापुढेच सच्चाई किंवा खरेपणा हा सर्वात मोठा दागिना आहे असे म्हणावेसे  वाटले.

बघा तुम्ही, लहानमुले जी असतात, ती आई वडिलांचे शत्रू, आपले-परके, जात-पात हे काही जाणत नसतात. मग अशी मुले कोणाकडे पाहून नुसते हसून हात उंचावले तरी त्या मुलांना उचलून घ्यावेसे वाटते , त्यांची पापी घ्यावी वाटते . कारण त्यांच्या साधेपणातील सौंदर्य, हसून दाखवलेल्या आपलेपणातून निर्माण केलेले नाते आणि त्यांची ओसंडून वाहणारी निरागसता, कृतीतली सच्चाई/ खरेपणा हा आपल्या मनाला भुरळ घालतो.

कोणतेही सौंदर्यप्रसाधन  न वापरता हसून स्वागत करणारी मुलगी जास्त सौंदर्यवती वाटते . तिचे आपुलकीचे बोल एक गोड नाते निर्माण करते आणि तिच्या हृदयातला खरेपणा जो तिच्या चेहर्‍यावरून ओसंडतो, हालचालीतून जाणवतो, नजरेतून बोलतो, तो खरेपणा मनाचा ठाव घेऊन जातो.

एखाद्या कामाच्या ठिकाणी कोणी साधा माणूस असेल तर त्याला भोळा हे विशेषण आपोआपच लागते. मग हे भोळेपण सगळ्यांनाच भावते आणि मग त्यातून पाझरणारी आपुलकी त्यांच्यामधे प्रेमाचे, सहकार्याचे असे नाते निर्माण करते. त्या व्यक्तीच्या खरेपणाचा प्रत्यय वेळोवेळी येऊन या प्रामाणिकपणाची चर्चा देखील होत रहाते. ( त्याच्या याच गुणामुळे वरिष्ठ/ चुकीचे काम करणारे नेहमी त्याला बिचकून रहातात)

अगदी पुरातन काळापासून सत्य महात्म्य चालत आलेले असल्याने गांधिजींनी तर सत्यमेव जयते हा मूलमंत्रच जगताला बहाल केला आहे. त्यांचे माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रातून त्यांनी हे आधी सत्य करून दाखवले आहे.

सत्य हे कधी मरत नसते असे संत  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून सांगितले आहे. तसेच सत्य हे कोठेही सत्यच रहाते हे पण एक सत्यच आहे.

जगात सगळे नश्वर आहे. मग शाश्वत काय आहे? तर सत्य! जे आपल्या जन्माच्या आधीपासून आहे, आयुष्यभर आपल्या भोवती रहाणार आहे आणि आपल्यानंतरही येथेच रहाणार आहे.

सानेगुरूजींनी ‘खरा’ तो एकची धर्म जागाला प्रेम अर्पावे असे सांगून सध्या जगात जे अनाठायी धर्म डोकाऊ पहात आहेत ते सगळे मिथ्या असून जगाला प्रेमार्पण करणारा हा धर्मच खरा आहे हे सांगितले आहे. त्याचा खरेपणा जगातील कोणतीही व्यक्तीच काय पण खुद्द देव सुद्धा नाकारू शकणार नाही.

खरे बोलण्याचा एक फायदा असतो की आपण काय बोललो हे लक्षात ठेवावे लागत नाही. किती खरे आहे ना? जर आपण कोणाला वेळ मारून नेण्यासाठी खोटं काही सांगितलं तर आपल्यालाच जन्मभर ते लक्षात ठेवावे लागते नाहीतर कधी हे उघडे पडेल या तणावातच जीवन घालवावे लागते. कोणा दुसर्‍याकडून खरे कळेल का अशी भिती मनात रहाते.

एक खोटे बोलले की पुढच्या हजार खोट्यांचा जन्म होतो. मग या खोट्या गर्ततेत सत्यताच कुठेतरी हरवली जाते पण जनाला फसवले तरी मनाला फसवता येत नसल्याने उगाच मन मारून खोटे वागण्यापेक्षा मनभरून खरे जगले तर निरोगी दीर्घायू प्रत्येकालाच लाभेल.

दागिन्यांनी सौंदर्यात भर पडते म्हणतात. मग अशाच सच्चाईचा, खरेपणाचा,प्रामाणिकपणाचा दागिना मनाने घातला तर त्रिकालाबाधित सत्य असलेल्या तुमच्या जीवनाचे सौंदर्य खर्‍या अर्थाने खुलणार आहे.

खोटे हे कधीपण लक्षात येते म्हणजेच खोटेपणाचे सत्य बाहेर पडते. सोन्याचा मुलामा दिलेले पितळ उघडे पडते म्हणजे सोन्याचा आव आणलेले हे पितळ आहे हे खरे सिद्ध होते. म्हणून खोटेपणा हा भित्रा तर सच्चाई ही निर्भिड असते.

कोर्टात गेले की खरं खोटं सिद्ध होते म्हणतात पण वास्तविक खोटे सिद्ध होते आणि पर्यायाने खरं, सत्य उजेडात येते.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे खरं हे लोकांना कडू वाटते . लोकांचे दुर्गुण सांगून त्यांना सुधारू पहाणारा सज्जन त्याला कशाला पाहिजेत नस्त्या पंचायती? असे म्हणून त्या सज्जनापासूनच लोक लांब रहातात पण खोटी स्तुती खोटा मोठेपणा देणार्‍या व्यक्तींना जवळ करतात. पण अशाच व्यक्ती आपला मतलब साध्य झाला की पाठीत खंजिर खुपसतात मग अशावेळी सज्जनाचे ऐकले असते तर किती बरे झाले असते असा विचार येऊनही काही उपयोग होत नाही हे खरंच!

खरेपणाचा सुगंध आल्याशिवाय रहात नाही. तो हिरव्याचाफ्यासारखा असतो. खरेपणा हा सूर्यासारखा असतो. कितीही असत्याच्या कोंबड्याने झाकायचा प्रयत्न केला तरी वेळेत उगवणारच.

म्हणूनच लग्न झालेल्या स्त्रीला मंगळसूत्र, मुंज झालेल्या मुलाला जानवे, अभिमान दाखवण्यासाठी डोक्यावर पगडी, फेटा, टोपी शोभून दिसते तसे हृदय , जीवन सुंदर करण्यासाठी सत्यता धारण केली की बाकी कशाची गरज रहात नाही.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आनंद मानायला शिकूया…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

दोन तीन दिवसांपूर्वीच त्यांचं आमच्या घरी आगमन झालयं आणि जणू खूप तहान लागली असतांना समोर फक्त आणि फक्त अथांग समुद्र  असावा किंवा नुकतीच शुगर डिटेक्ट झाल्याबरोबर समोर पंचपक्वान्नाचे ताट यावे,असा फील आलाय. कारणं बँकेचे ऑडिट सुरू असल्याने बँक सोडून बाकी कशालाही जणू वेळच उरत नाही. अर्थातच बँकेचे काम हे नोकरी असल्याने माझ्यासाठी प्रायोरीटी मध्ये वरच्या क्रमांकावर.

परवा मस्त दिवाळीअंकाचा गठ्ठा घरी आला.समोर वाचण्यासाठी इतकी वाचनसंपदा पसरली आहे आणि आपली अतिव्यस्त दिनचर्येमुळे आपण त्याचा धडपणे आस्वाद घेऊ न शकल्याने मन खरचं व्यथित होतं.

खरचं बोटांवर मोजण्याइतक्या काही व्यक्ती असतात त्यांना आपल्या आवडीनिवडी आणि आपल्या जबाबदा-या ह्यांचा योग्य समतोल साधण्याचं कसबं असतं.नाहीतर बहुतेक ठिकाणी दात असले की चणे नसतात आणि चणे येतात तेव्हा दात गायब होतात.

सहसा आपण लोकं आधी पैसा मिळवणे, तो साठवणे ह्या मागे इतके हात धुवून लागतो की आपण आपल्याच साठी क्षणाचीही उसंत घेत नाही. प्रसंगी आपण आपल्या आवडींना फाटा देतो आणि आधी कर्तव्य बजावायला सज्ज होतो.हे करतांना स्वतःची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या ध्यासाने इतके कामात गुरफटतो की स्वतःच्या आवडीच्या छोट्या  छोट्या गोष्टींचाही आस्वाद घेण्यात वेळ घालवायचा विसरतो.आणि जेव्हा सगळ्या जबाबदा-या आटोपून आपण जरा हूश्श् करतो आणि आपल्या आवडींकडे वळू असे ठरवितो तेव्हा आपलेच शरीर आपल्याला साथ देत नाही.

सध्या आपण चार ओळी वाचायला वेळ काढत नाही आणि जेव्हा वेळच वेळ मिळतो तेव्हा वाचण्यासाठी आपली नजर,आपले डोळेच साथ देत नाहीत. हीच गोष्ट पर्यटनाच्या बाबतीत पण लागू पडते.कित्येकदा आपण परदेशी फिरण्याच्या स्वप्नापाई तरुणपणात नुसती ढोर मेहनत करतो. जेणेकरून सगळ्या जबाबदा-या उरकल्या की सहजतेने परदेशी फेरफटका मारता येईल. पण वस्तुस्थिती अशी येते की तेव्हा पैसा तर येतो पण परदेशी फिरण्याची शरीरात ताकदच नसते.ह्या परदेशी फिरण्याच्या ध्यासापायी आपण आपला भारत देश सुध्दा धड पूर्णपणे बघत नाही.

खरचं मला फार कौतुक वाटतं अशा लोकांच जे आयुष्यातील जबाबदा-या पार पाडतांना प्रत्येक पायरीवर काही क्षण का होईना विसावा घेतात,त्या विसाव्यातच आपल्या आधी लहान का होईना पण आवडी,ईच्छा पूर्ण करतात.नाहीतर काहीजणं भराभर पूर्ण जीना घाईघाईने चढायच्या नादात कधीकधी अजिबात विराम न घेता धावतपळत  ध्येय गाठण्यासाठी उरापोटावर जावून इच्छित स्थळी पोहोचतात तर खरं पण पोहोचेपर्यंत पार दमून गेल्यामुळे त्यातला आनंद, त्यातला रसच गमावलेला असतो.

त्यामुळे शरीराला आणि मनाला सुध्दां टप्प्याटप्प्यावर विश्रांतीची ,थकवणा-या मोठमोठ्या स्वप्नांमागे न धावता छोट्याछोट्या गोष्टीतही आनंद मानायला शिकण्याची सवय हवी हे नक्की.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

श्री सुबोध अनंत जोशी

?  विविधा ?

☆ आपुलकीची पुस्तके ☆ श्री सुबोध अनंत जोशी ☆

तसं पाहिलं तर, पुस्तके ही निर्जीव भौतिक वस्तू आहे. मुद्रित  मजकूर असलेल्या कागदांची बांधणी करून तयार झालेली वस्तू म्हणजे पुस्तक.विविध आकारप्रकाराची निर्जीव वस्तू.ही वस्तू पुस्तकाच्या बाजारात विकली जाते, विकत घेतली जाते;दुकानातून, ग्रंथालयातून, स्टॉल मधून वितरित होते. त्याचा उपयोग संपल्यावर किंवा त्याचा उपयोग न केल्यावर  या वस्तूची रद्दी होते. काही पुस्तकाच्या जिवांवर वितरक, प्रकाशक  क्वचित् लेखक पैसे मिळवतात. पुस्तकांचे जिवावर मोठ-मोठी ग्रंथालये उभी राहतात. पुस्तकाच्या प्रदर्शनात कमाई करणारे प्रकाशक भेटतात;क्वचित् लेखकही असतात. हौशी लेखक प्रसिद्धीच्या आशेने, अपेक्षेने  अधिकाधिक पुस्तकांना प्रसवतात.अशा पुस्तकांचे गठ्ठे  ग्राहकांची वाट पाहत असतात. डिजिटल, ऑनलाइन पुस्तके, डमी पुस्तके, पीडीएफ आवृत्ती, कॉपीराईट  असे कितीतरी शब्दप्रयोग पुस्तकांच्या दुनियेत चलनी नाण्याप्रमाणे प्रचलित असतात.

 वरील मजकूर बव्हंशी तिरकस,तिरसट,सिनिकल दृष्टीने लिहिला गेला आहे.कारण पुस्तकाला निर्जीव मानलं गेलं तर असंच लिहिलं जाईल. पुस्तकाला सजीव तरी कसे म्हणता येईल? सजीवतेच्या व्याख्येत पुस्तक बसत नाही. ते कधी श्वास घेतं का? ते स्वतःहून इकडून तिकडे फिरते का?  पुस्तकाला पुनरुत्पादनाची शक्ती आहे का? पुस्तकाला पाच संवेदनापैकी एक तरी संवेदना आहे का? या सर्वांची उत्तरे नकारार्थी आहेत. असे असूनही पुस्तक असे काही आहे की ते आपल्या मनाला जिवंतपणा देते, पुस्तक असे आहे की ते स्वतः अलिप्त राहून अशी कांहीं प्रक्रिया घडवून आणते,की त्यामुळे पुस्तकवाचनाचा परिणाम संजीवनीसारखा होतो. या कारणामुळेच पुस्तके भौतिक निर्जीव वस्तू रहात नाही. पुस्तकविक्रेत्याला पुस्तक वस्तू वाटेल,परंतु पुस्तकप्रेमीला ती सजीव वाटेल.  पुस्तकप्रेमीच्या द्रृष्टीने पुस्तकातला मजकूर ही  अक्षरांचे एका मागून एक ठेवलेले डबे नसतात. पुस्तक हे अक्षरे, शब्द, वाक्य,त्यामधील अर्धविराम, पूर्णविराम,स्वल्पविराम या सर्वांसोबत सर्व  वाचकांच्या मनासमोर असे एक जिवंत काव्य, सळसळते विश्व निर्माण करते की त्यामुळे वाचकांचे मन तळापासून ढवळून निघते.ही प्रक्रिया कशी असते याचा उलगडा करण्याचा प्रयत्न कांहीं समीक्षकांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी केला आहे.

 या संदर्भातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे वाचक प्रतिसाद सिद्धांत(Reader Response Theory) आणि वाचन ग्रहण सिद्धांत.पुस्तक म्हणजे संहिताच (Text) असते. ही संहिता  एक स्तरीय नसते; ते जाळेच असते आणि या जाळ्यात वाचक अडकतात किंवा अडकवून घेतात.  आयसरने प्रतिपादन केल्याप्रमाणे साहित्यकृतीच्या संहितेत काही रिकाम्या जागा असतात. अर्थात्, त्या वाचक आपल्या बुद्धीनुसार भरून टाकतो.आयसरच्या मते वाचनाचा प्रत्येक क्षण हा भूतकाळातील स्मृती आणि भविष्यकाळातील अपेक्षा यांच्यात  जे द्वंद्व   उभे राहते त्याच्या संबंधित असते.  आयसरने म्हटले आहे की  प्रत्यक्षात   या गोष्टी संहितेत नसतात.  वाचकाने त्या भरायच्या असतात.

जौशच्या  मते आपल्या काही कलाकृतीच्या संदर्भात काही अपेक्षा असतात.  ही अपेक्षांची क्षितिजे( Horizon of Expectations) नेहमी बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक काळात वाचकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.जौशच्या मते वाचकसमूह संहितेचा अर्थ लावतो.पॉल स्टिकर याने वाचनप्रक्रिया कशी विकसित होते याचे विवेचन केले आहे.वाचक हा वाचन करताना तीन अवस्थातून जातो.पहिल्या अवस्थेत वाचक संरचनात्मक संबंधाचा(Configuration) विचार करतो. दुसऱ्या अवस्थेत साहित्यकृतीच्या अर्थात्मक भागाचा (Recofiguration) विचार केला जातो. आणि तिसऱ्या अवस्थेत वाचकाला स्वतः विषयीचे ज्ञान,आत्मज्ञान(Self-understanding) यांचे आकलन होते.  अमेरिकन समीक्षक स्टॅनले फिश याने Is There a Text in This Class? या पुस्तकात वाचकवर्गाची  किंवा वाचक समूहाची   कल्पना मांडली.

या सर्व सिद्धांतानुसार असे दिसते की कांहीं समीक्षक वाचकाच्या वैयक्तिक प्रतिसादाला महत्त्व देतात;बहुसंख्य समीक्षक वाचकसमूहाला महत्त्व देतात.मराठी समीक्षक प्रा.रा.ग.जाधव यांनी साहित्याचे परिस्थिती विज्ञान(Ecology of Literature) ही संकल्पना मांडली.साहित्यकृती ही सजीव आहे आणि साहित्य ही समुदायवाचक कल्पना आहे असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

एक गोष्ट स्पष्ट आहे की वैयक्तिक वाचक असो किंवा वाचकसमूह असो, पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक हे सजीवतेकडे वाटचाल करू लागते. यासंदर्भात अमेरिकन समीक्षकांनी म्हटले आहे की पुस्तकाला त्याचा वाचक मिळेपर्यंत कोणतेही पुस्तक हे अनेक पुस्तकांपैकी एक असते.पुस्तकाला वाचक भेटल्यावर मात्र वाचनातून सौंदर्यभाव निर्माण होतो आणि सौंदर्यभाव हा अत्यंत सुंदर असा चमत्कार आहे आणि त्याचे स्पष्टीकरण ना मानसशास्त्र करते,ना  कोणती समीक्षा करते.(  A book is a thing among things,a volume lost among the volumes that populate the indifferent universe until it meets its reader, the person destined for its symbols. What then occurs is that singular emotion called Beauty,that lovely mystery which neither psychology nor criticism can describe  ).वाचकाला जो सौदर्यानुभव येतो ते एक गूढ आहे असे म्हटले आहे आणि ते खरेही आहे.वाचकाला जो आनंद मिळतो त्यासंबंधी  प्लेटो,अॅरिस्टाॅटल,वर्डस्वर्थ,कोलरिज,टी एस.ईलियट,आय.ए.रिचर्ड तसेच संस्कृत वैय्याकरणी मम्मट  अशा अनेकांनी आपले सिद्धांत प्रतिपादन केले आहेत.त्या सर्वांचा हाच निष्कर्ष आहे की साहित्यवाचनातून असे काही मिळते की त्यामुळे वाचकांच्या मनाचे उन्नयन होते.पुन्हा एकदा हेच सिद्ध होते की पुस्तकाला वाचक भेटल्यावर पुस्तक निर्जीव राहत नाही.

यापुढे जाऊन असे म्हणता येईल की काही पुस्तके ही वाचकसमूहाला किंवा वैयक्तिक वाचकाला आपलीशी वाटतात. या आपलेपणाच्या कारणाचाही शोध घेता येईल. समाजशास्त्रात Kinship of  Spirit हा एक सिद्धांत आहे.या सिद्धांताप्रमाणे काही गोष्टी कॉमन असतील,तर  एखादे ठिकाण,व्यक्ती,वस्तू याकडे आपले मन ओढ घेते.(An inherent attraction and liking for a particular person, place or a thing, often based on some commonality).

लेखक आणि पुस्तक यांचाच विचार केला तर लेखकाला त्याच्या स्वतःच्या पुस्तकाबद्दल आपुलकी वाटणे हे अगदी नैसर्गिक आहे. नीराद चौधरी यासारखे लेखक अपवादात्मकच म्हणावे लागतील. याचे कारण असे की निराद चौधरींच्यामते लेखकाची पुस्तके ही त्याची  प्रौढ झालेली मुलेच(Grown up Children) असतात आणि एकदा पुस्तक लिहून झाले की त्या पुस्तकाचा आणि लेखकाचा संबंध तुटतो. असा विचार करणारा निराद  चौधरी हा एखादाच असेल. बहुतेक लेखक हे आपल्या पुस्तकांना आपली आवडती मुलेच मानत असणार यात शंका नाही.

वाचकाच्या बाबतीत बोलायचं झाले तर वाचकही सर्व पुस्तकांच्या बाबतीत तटस्थ राहू शकत नाही. काही पुस्तकांचेबाबतीत त्याला काहीच वाटणार नाही. काही पुस्तकांचेबाबतीत थोडे काही  वाटेल आणि काही पुस्तकांचेबाबतीत मात्र त्याला खरोखरीच आपलेपणा वाटेल आणि तीच पुस्तके त्या वाचकाची, सह्रदय वाचकाची आपुलकीची पुस्तके होतात.

पुस्तकातल्या अनुभवाशी आपल्या आयुष्यातील अनुभव काही वेळा जोडले जातात किंवा या उलट होऊ शकते.एक वाचक म्हणून आपण पुस्तकातल्या व्यक्ती, प्रसंग आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींशी, प्रसंगाशी कळत नकळत जोडतो आणि या कारणामुळे ते पुस्तक आपलेसे होेते.कांही अनुभव खूप नाजूक असतात, दिसत नाहीत पण जाणवतात. एखादे पुस्तक वाचल्यावर मन ‘पर्युत्सुक’ होते,

ते का होते, कसे होते याची चिकित्सा नंतर करायची. कदाचित ‘जननान्तरसौह्रदानि” पूर्वजन्मसंस्काराची आठवण होत असेल का? या जन्मातली,सुदूर भूतकाळातील आठवण येत असेल का?

आयुष्याच्या सांदीकोपऱ्यात असंख्य सुखदुःखे, संकटे, अडचणी हा सगळा गोमकाला  जमलेला असतो.पुस्तक वाचताना, आपल्या आयुष्यातील त्या प्रसंगासारखे असणारे प्रसंग वाचनात आले तर आपण त्या पुस्तकाशीही जोडले जातो. ना.सी फडके यांचा ‘हरवली म्हणून सापडली’, या नावाचा एक लघुनिबंध आहे.किल्ली हरवली म्हणून ती शोधण्यासाठी लेखक फडके माळावर जातात आणि  तिथल्या अनेक वस्तू पाहून ते गतकाळातल्या आठवणीत रमून जातात. एखादे पुस्तक वाचताना आपल्या आयुष्यात हरविलेल्या गोष्टी आपल्याला सापडू शकतात. याबाबतीत  माझा वैयक्तिक अनुभव मी सांगू शकेन.

काही समीक्षकांनी वाचकसमूहाचा विचार केला असला तरी वाचन ही पूर्णपणे खाजगी बाब आहे असे मला वाटते. पुस्तकाचे सार्वजनिक  अभिवाचन असले तरी श्रवण हे खाजगीच आहे आणि आपल्या वाचनाची आवडनिवड आपल्याला जोखता येते आणि त्यातूनच आपली वाटणारी पुस्तके निवडता येतात.

माझ्या किशोरवयात कुमारवयात सुंदर पुस्तके वाचायला मिळाली.पाठ्यपुस्तके तर इतकी सुंदर की अजूनही ती डोळ्यासमोर येतात. चांदोबासारखी मासिके फेर धरून नाचतात. किशोरवयात वाचलेली साने गुरुजींची “सुंदर पत्रे”आठवतात.  महाविद्यालयात शिकत असताना राम गणेश गडकरी,केशवसुत, देवल इत्यादींच्या साहित्यकृती वाचलेल्या होत्या. प्रौढ वयात वाचलेले आरती प्रभू, कुसुमाग्रज,  तेंडुलकर,महेश एलकुंचवार,रवींद्र पिंगे,चिं.वि.जोशी असे कितीतरी साहित्यिक. हे सर्वच आवडते लेखक.परंतु आपुलकीची पुस्तके कोणती? असं विचारलं तर आवडता लेखक हाच निकष लावता येणार नाही.खरे तर आपुलकीचे असे निकष असतात का?असले तर कोणते?आपुलकीची पुस्तके पूर्वी वाचलेली आहेतच.ती परत एकदा वाचून या प्रश्र्नांची उत्तरे कदाचित देता येतील.

ले. सुबोध अनंत जोशी

सांगली

मो 9423661068.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “उपोषण…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

उपोषण हे हत्यार आहे याची खात्री पटली. त्यातही आपला पोषणकर्ता उपोषण करत असेल तर आपल कुपोषण होण्याची भिती असते.

सध्या वातावरणात गारवा येत असतानाच आमच्या घरातल वातावरण मात्र तापत होत. कारण एकच होत. ऑफिसच्या धावपळीतून येणाऱ्या दिवाळीसाठी तयारी करायला त्यांना वेळ मिळत नव्हता.

तापलेल्या वातावरणाची धग मधे मधे भांड्यांच्या वाढणाऱ्या आवाजाने आणि तोंडाने होणाऱ्या भडिमाराने  जाणवत होती.

काय मेली मदत ती काडीची नाही. घर, ऑफिस सांभाळून सगळी मरमर करायची ती आपणच. आणि त्यात यांना कौतुक त्या वर्ल्डकप च. तो मिळायचा त्याला मिळेल. त्यांच काय?…. जाहिरातवाले सगळ त्यांच्या घरी वेळेअगोदर पाठवतील. यांच काय…… यांचे चहाचे कप मात्र वाढत चालले आहेत.

काही नाही….. हे चालणार नाही…. मी तुम्हाला काही वेगवेगळ्या दिवसांची मुदत देते. या दिवशी सांगितलेली सगळी कामं झाली तर ठिक…… नाहीतर उपोषण हे नक्की…..

हे अल्टिमेटमचे सगळे दिवस वेचून वेचून भारताची मॅच असणारेच होते.‌‌……

मी पण आपल मध्यस्थी करण्याच्या प्रयत्नात…… जरा दिवस तरी बदलता येतील का? सगळ्या दिवशी भारताचीच नाहीतर एक चांगली मॅच आहे……

म्हणूनच….. म्हणूनच हे दिवस…. कारण सगळेच तुमच्या सारखे टाळ्या वाजवत, नाहीतर कसं खेळायला पाहिजे होतं याची बडबड करत टी.व्ही. समोर बसतील. बाजारात गर्दी कमी असेल. तुमचा पार्किंग चा प्रश्न पण निकालात निघेल. आणि मॅच चांगली होईल का सांगता येत नाही, पण खरेदी चांगली होईल…… तिने थर्ड अंपायर ने निर्णय द्यावा तसा ठोस निर्णय सांगितला.

झाल…… अशा उपोषणाची चर्चा फोनवर मैत्रिणींशी झाली सुध्दा…… संध्याकाळी मैत्रीणी (वेळात वेळ काढून) बराचवेळ हजर. नुसत्या नाही. कोणी वेफर्स ची पाकिट, कोणी थंडपेयाची लहान खोकी, किंवा बाटल्या आणल्या. अगं उपोषण म्हटल्यावर कोणीतरी तुला पाहायला येतीलच. तु पाणी पिशील. पण त्यांना नको का काही…

दुसरी….  पाण्यावरून आठवल. तुला पण पाणी लागेलच. मी दहा बारा बाटल्या पाठवते. राहू दे. कामाला येतील. सारख तुला कोणाकडे पाणी मागायला नको. आणि परत येणाऱ्यांशी थोड बोलण होइलच. घशाला कोरड पडते. (दोन बायकांमध्ये ऐकण थोडच आणि बोलण जास्त असत हे यांना सांगावस वाटत होत. पण बोललो नाही….. नाहीतर उपोषण लगेच सुरू झाल असत. आणि उपोषण करणाऱ्यांची संख्या पण वाढली असती.)

अगं खरंच. माझ्याकडे पण ग्लुकोज पावडरचे डबे आहेत. कुठला ऑरेंज फ्लेवर पाठवू का?……. आणखीन एक आवाज.

आणि हो, आत्ता बोलायला नको, पण लागला तर सलाइन लावायचा स्टॅण्ड पण आहे माझ्या कडे…… सासूबाई आजारी असतांना त्यांनीच आणायला लावला होता. येवढा लगोलग आणला पण मोजून दोनदाच लागला त्यांना. आता घरात येताजाता तो पायालाच लागतो. सध्या हातरुमालच वाळत असतात त्यावर…….. एक आवाज…..

आणि हे काय?……बसणार कुठे?…. तु आपली हाॅलमधेच बैस. रिमोट मात्र तुझ्या हाताशी ठेव.  प्राईम व्हिडिओ, नाहीतर ते यु ट्यूब वरचे कार्यक्रम चांगssssssले पहात बैस. यात चांगले कार्यक्रम बराचवेळ असे दोन्ही भाव होते. परत एक आवाज…..

एक्स्टेन्शन बाॅक्स आहे का? नाहीतर तो पण आणते. फोन चार्ज करायला उठायला नको. आपल जवळ असलेला बरा. आणि मऊ उशा, शाल, आणि तक्या मात्र राहू दे जवळ. त्या शिवाय उपोषणाचा फिल येणार नाही.

आणि तु उपोषणाला बसलीस की कळव. म्हणजे येताना ती नवीन लागलेली आहे ना… तिला घेऊन येईन. अगं मोबाईल मधे काय मस्त शुटिंग करते ती. आणि बॅकग्राऊंडला समर्पक गाणीपण भरायला जमत तिला. यंग जनरेशन……. उपोषणावर गाणी आहेत का?….. नाहीतर सॅड म्युझिक टाकू.

यंग जनरेशन म्हणतांना त्यात कौतुक होत की आपल्याला जमत नाही याची खंत याचा सुगावा काही लागला नाही. पण शुटिंगची व्यवस्था होणार होती.

जमेल तसं आम्ही लंच ब्रेक मध्ये येऊच. नाहीतरी नंतर अर्धा तास गप्पांमध्येच जातो. त्या काय इथे सुध्दा होतील. आणि पाठिंबा सुद्धा मिळेल.

अशी उपोषणाच्या अगोदरची तयारी झाली.

सगळे गेल्यानंतर मी म्हटलं. मी दोन दिवस सुट्टी घेतो. काय हव ते सगळ आणू. आणि यावेळी तुला साडी ऐवजी पैठणी. आणि एक दागिना. चालेल…….. आणि या आश्वासनानंतर उपोषण स्थगित.

आता काय?…….. आज सुटीच्या दिवशी मी दिवाणावर….. मऊ तक्यासोबत. समोर ती आधीच कोणीतरी आणलेली थंडपेयाची बाटली……. आणि वेफर्सच पाकीट.

आणि हाॅलमधेच खाली बायको चिवड्यासाठी खोबऱ्याचे काप करतेय. आणि आम्ही दोघंही मॅच बघणार आहोत.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मनचाफा ☆ सुश्री मानसी चिटणीस

सुश्री मानसी विजय चिटणीस

परिचय 

ग्रंथसंपदा : * सृजनभान, सांजवर्खी शकुन, माझ्यातील बुद्धाचा शोध हे तीन कवितासंग्रह . उत्सव कथांचा हा प्रातिनिधिक कथा संग्रह प्रकाशित नामांकित मासिकातून लेख प्रकाशित . वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन , तसेच सदर लेखन. विविध विषयांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिचय व रसग्रहण वर्तमान पत्रातून प्रसिद्ध. २० हून अधिक पुस्तकांसाठी प्रस्तावना लेखन* मराठी सोबतच हिन्दी व इंग्रजी कविता लेखन *In Marathi, बोभाटा या प्रसिद्ध पोर्टल साठी लेखन

सामाजिक : १. समरसता साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा- कार्यवाह२. महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषद- कार्यकारी विश्वस्त ३. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य व कला आकादमी- मुख्य कार्यवाह ४. यशवंतरावजी चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभाग- सदस्य.

मानसन्मान व पुरस्कार:

१. शब्दधन काव्यमंच यांचा ‘छावा’ पुरस्कार २. नवयुग श्रावणी काव्य स्पर्धेत ‘प्रथम’ परितोषिक ३. कोकण म सा प राज्यस्तरीय काव्यस्पर्धेत द्वितीय परितोषक प्राप्त; चारूतासागर प्रतिष्ठान यांचे उत्कृष्ट लेख पारितोषक४. सर्वोदय साहित्य पुरस्कार, कोल्हापूर ५. बाल कुमार साहित्य सभा, कोल्हापूर यांचा ‘साहित्यसृजन’ पुरस्कार
६. ‘आवाज महाराष्ट्राचा’ या न्यूज चॅनल चा ‘क्रांतीज्योती’ पुरस्कार ७. महाकवी कालिदास प्रतिष्ठान,पुणे यांचा ‘कालिदास काव्यगौरव पुरस्कार’ ८. ग.दी.मा.प्रतिष्ठान,पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद,भोसरी व कामगार साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य यांचा ‘ग.दी.मा. साहित्य पुरस्कार ‘ ९. करम प्रतिष्ठान चा ‘करमज्योत’ पुरस्कार १०. डॉ. अशोक शिलवंत काव्यभूषण पुरस्कार.

मराठी चित्रपटासाठी गीतलेखन, चित्रपट कथालेखन व रेडियोसाठी जाहिरात लेखन, विविध कादंबर्‍या, कथासंग्रह, काव्यसंग्रह यांचे शब्दांकन, विविध संस्था,संमेलनात व्याख्याती म्हणून सहभाग,

स्वत:च्या कथांच्या अभिवाचनाचे प्रयोग. कथाकथन, कविता लेखन,अभिवाचन, बालगीते,नाट्यछटा स्पर्धा यात परीक्षक म्हणून सहभाग *’कवितासखी’ या स्वरचित कार्यक्रमाचे सादरीकरण तसेच ‘ ही कविता आली तुम्हास भेटायला’ या समूह कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन *विविध शाळांमध्ये कथाकथनाचे कार्यक्रम

उपक्रम : ‘कवितासखी’ हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम

? विविधा ?

☆ “मनचाफा…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस ☆

संध्याकाळची गडबड चालू होती.. मी आपली स्वयंपाकात मग्न. लौकर स्वयंपाक संपवून मला लिहायला बसायचे होते. मी पोळ्या करता करता त्याला हाक मारली पण रोजच्यासारखी आलो, आलो ची आरोळीही आली नाही की काय गं सारखी हाका मारत असतेस ची भुणभुणही आज नव्हती. कुठे गेला हा असा संध्याकाळचा? असा मी विचार करतानाच

हयाने मागून येवून घट्ट गळामिठी मारली.. मी ओरडले,

 “अरे काय हे !!!दिसत नाही का पोळ्या करतेय.. एवढा मोठा झालास तरी खोड्या काही संपत नाहीत तुझ्या. “

 तो हिरमुसला… पटकन हातातल्या रूमालाची पुरचूंडी त्याने कट्ट्यावर ठेवली आणि गेला… मी लक्षच नाही दिले.. नंतर तो ही अजिबात आला नाही लूडबूड करायला..

जेवायची वेळ झाली तरी नेहमीसारखा भूक म्हणून पण ओरडला नाही.. मीच दोन हाका मारल्या पण एक नाही की दोन नाही. अचानक लक्ष कट्ट्यावरच्या रूमालाकडे गेलं. उघडून पाहिलं तर मला आवडणारी चाफ्याची फूलं होती.. माझी चटकन ट्यूब पेटली आणि लक्षात आलं.. महाराज कुठे गेले होते ते. मी तसाच रूमाल घेवून त्याच्या खोलीत गेले.. खिडकीतून बाहेर बघत पाठमोरा उभा होता.. माझ्या हातातली फुलं बघून मला म्हणाला, ..

“आई… तुला आवडतात ना गं.. म्हणून तेजस च्या बागेतल्या झाडाची तोडून आणलीत.. मी स्वतः चढलो गं वर…. हे बघ ना कित्ती सुंदर आहेत ना… !!”

खरंच नुकतीच उमललेली ती चाफ्याची फुलं खूप सुंदर होती.. आणि त्यांच्या दरवळानं माझेही हात सुगंधीत झाले होते. मी क्षणभर तो सुगंध मनात भरून घेतला.. माझे डोळे भरून आले… त्याला जवळ घेतलं आणि पाठीवरून हात फिरवतं राहीले काही न बोलता.. सुगंध काय फक्त फुलांनाच येतो? नात्यातला सुगंधही असाच अविट असतो. काही दरवळ फक्त नाकाचीच नाही तर मनाचीही तृप्ती करतात. नात्यांचे दवरळही तसेच असतात काहीसे. निरनिराळ्या भावनांचे, तशाच वेगवेगळ्या फ्लेवर्सचे प्रत्येक  नात्याचा गंध वेगळा, तसाच दरवळही वेगळा. जे नातं पुन्हा जगावासं वाटतं त्या नात्याचा फ्लेवर आठवायचा आणि अनुभवायचे त्यांचे दरवळ. खासकरून त्यात मायेचा ओलावा मिसळला असेल तर ते तसेच दरवळत राहतात वर्षानुवर्ष..

काही नाती जन्मभर जोडलेली असतात काही बंधनात अडकतात तर काही जपली जातात कोणतेही नाव न देता.. एकमेकांना सांगितले जाते, नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा.

हा जो काही नात्यांचा बंध असतो तो सहवास, आपुलकी, माया अशा धाग्यांनी गुंफला गेला तरच चिरकाल टिकतो.. त्यातली सहजता तितकीच महत्वाची. आपण जितके एखादे नाते सहजतेने वागवू तेवढे ते फुलत जाते, मोकळे होते. हे सहजपण म्हणजे तरी काय? तर उत्स्फुर्तता जपणे. क्रियेला प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद देणे आणि गुंफण गुंफत राहणे. हे नात्यांचे रेशिमबंध घट्ट असतील तर त्यातील मऊ, मुलायम, स्निग्ध भाव.. आणि तेच बंध उसवलेले, विसविशीत असतील तर त्यातील टोकदारपणा, शुष्कता.. हे देखील तेवढ्याच संयतपणे समजून घेण्याचा आणि समजवण्याचा प्रयत्न करणे हे देखील गुंफण जपणेच होय..

सहजतेवरून आठवले नाती जपताना, गुंफताना माणसं घडवायची पण आपल्या हातातली छिन्नी दिसू द्यायची नाही.. मुळात घडवायची हा शब्दही चूकच.. त्यांना त्यांच्या कलेन घडू द्यायचं.. त्यांच्या जडणघडणीचा साक्षीदार व्हायचं.. शान्तपणे सोबत करायची.. अविर्भावाचा असुरी रंग स्वतःला स्पर्शू द्यायचा नाही… अशा नितळ प्रक्रियेतच खरेपण जोपासायचे ही नात्यांची विण आणि गुंफण.. मनात विचारांच्या सरी झिरझिरू लागल्या आणि डोळ्यांतून ओघळताना हातातल्या चाफ्याला भिजवू लागल्या.

माझे भरलेले डोळे पाहून त्याचा रुसवा क्षणात छू.. झाला. तो गोंधळला. त्याला कळेना आपली आई का रडतेय?…

“आई.. रडू नको ना गं.. ! काय झालं तुला…. ?तू रागावलीयस का माझ्यावर? अगं काय झालं तुला?” तो विचारत राहीला..

काहीच नाही बोलले.. पण एक मात्र नक्की,      नात्यांतले हे दरवळ नकळत जपताना         आज तो माझी आई झाला होता..

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “आवडनिवड…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

प्रत्येक व्यक्तीचा स्वतःच्या आवडीचा जणू एक साचाच असतो. त्या साच्यातून  तो आपल्याला आवडणारं राहणीमान, खानपान, वाचन,गायन,जीवन जगण्याची पद्धत ह्या सारख्या आवडी जपतं असतो. त्यामुळे तो जीवनात स्वतःला आवडणा-या गोष्टींचा आस्वाद घेतो पण हा आस्वाद घेतांना जर कधीतरी अवचट आपल्या आवडीचं वळण बदलून दुसऱ्यांच्या आवडीच्या वाटेवर चालून बघितलं तर ते कधीकधी जास्त पण आवडून जातं. पण असा बदल हा एखादेवेळीच स्विकारला जातो, एरवी आपली स्वतःची आवड,कल हा तसा ठाम असतो.

जबाबदा-या,कर्तव्य उरकंत आल्या की वेध लागतात स्वतः कडे नीट लक्ष देण्याचे, आपल्या आवडीनिवडी जपण्याचे, बरीचशी आवडती कामं,कला,छंद जोपासण्याचे. ह्या आवडीनिवडी,छंद जोपासण्याची पण एक  गंमत आहे.आपण दुसऱ्या ला सहजसहज सल्ले देतो,अमूक एक गोष्ट कर म्हणून आग्रही होतो पण विचार केला तर लक्षात येतं आपण सुचवलेली गोष्ट ही समोरच्या व्यक्तीच्या आवडीनुरुप आहे की नाही ? की आपण आपली मतं त्यावर लादतोय.माझा स्वतःचा पिंड नोकरी करण्याचा ह्या उलट माझ्या बहिणीचा पिंड हा अतिशय उत्कृष्ट, आदर्श अशी गृहीणी होण्याचा.माझ्या बहिणीसारखी सुगरण,टापटिप घर ठेवणारी,अगदी बारीकसारीक सगळ्यांच्या आवडीनिवडी जपणारी, घरच्यांच्या आरोग्याची उत्तम सुश्रुषा करणारी आणि घरच्या अगदी लहानात लहान कामापासून ते मोठमोठ्या कामांचा पण भार लिलया पेलू शकणारी स्त्री अभावानेच आढळते.  आणि ही सगळी कामं ती अतिशय आवडीने, आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे करते. जर अशावेळी मी तिला बाहेर नोकरी करण्याचे सल्ले दिले तर तो तिच्यावर नुसता अन्यायचं होणार नाही तर तिच्या उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा एक प्रकारे अपमानच होईल. थोडक्यात काय तर प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते,त्यामुळे आवडीनिवडी बदलविण्याच्या चुकीच्या अट्टाहासापेक्षा त्या व्यक्ती मधील गुणांना पुरक कौतुकाची थाप देणं,तिला उत्तेजन देणं ही खरी माणुसकी.

मला स्वतःला विचाराल तर आता नोकरीमुळे असलेल्या अतिशय व्यस्त दिनचर्ये पेक्षा निवृत्ती नंतरचे आयुष्य हे अतिशय शांत, कमी गजबजलेल्या ठिकाणी घालवायला आवडेल, त्यामध्ये माझं वाचनं आणि शांत ठिकाणी भ्रमंती व पर्यटन हे आलचं. प्रवासाचं म्हणाल तर माझ्या बकेटलिस्ट मध्ये सागरीप्रवास याने की क्रुझ वरुन सागराच्या शांत सानिध्यात फेरफटका मारणे,अगदी “मै ओर मेरी तनहाई अक्सर बाते करेंगे”च्या स्टाईलमध्ये “डोंट डिस्टर्ब”चा बोर्ड न लावताही मिळणारा एकांत, बाजूला मंद,अलवार,हळू आवाजात ऐकू येणारे पण ह्रदयाला भिडणारे संगीत, ती अर्थपूर्ण हिंदीमराठी गाणी,स्वतःमध्ये रमुन जाण्याचे क्षण ह्याला मी नक्कीच अग्रक्रम देईन. बघूया आपली बकेटलिस्ट बनवून ठेवायला तरी हरकत नाही.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “डिसेंबर अर्थात मार्गशीर्ष…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट

इंग्रजी डिसेंबर महिन्याची सुरवात आणि मराठी मार्गशीर्ष नुकताच लागलेला, म्हणजे आनंददायी, उत्साहवर्धक वातावरण.मस्त हवीहवीशी गुलाबी थंडीची सुरवात असते.ह्या थंडीला गुलाबी विशेषण देणा-या रसिकाला सँल्युट. ह्या दिवसात हवामान एकदम मस्त, दुधदभतं, फळफळावळ,भाजीपाला ह्यांची रेलचेल. दिवसभर भरपूर उत्साहाने काम करायचं मग आपल्या सुखाच्या,हक्काच्या झोपडीत परतायचं,रात्री मस्त मऊमऊ ,उनउनं खिचडी, गरमागरम टोमॅटो चं सूप ओरपायचं आणि मग मस्त दिवसभराच्या दगदगीनं मस्त मऊमऊ गोधडीत अवघ्या काही मिनीटातच निद्रादेवीच्या अधीन व्हायचं, खरचं सुखं, सुखं म्हणतात ते हेच,आपल्यापाशीच असतं फक्त आपल्याला हुडकून त्याच्या आस्वाद घेता यायला हवा.

मार्गशीर्ष मास वा डिसेंबर महिना हे धार्मिक दृष्टीने पण खूप महत्त्वाचे, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार,चंपाषष्ठी,दत्तजयंती ह्याच काळातील.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. कुलाचाराप्रमाणे पूजेत सुघट व टाक असतात. नवरात्राप्रमाणेच रोज माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात.

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीची देवता खंडोबा किंवा मल्लारी ही आहे . मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात . मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा मोठी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना आळवण्याचा हा दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

लगेच येणारा उत्सव म्हणजे दत्तजयंती चा उत्सव.मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना दैत्य म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्‍तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले. तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळया ठिकाणी वेगवेगळया रूपांत दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला. त्यानंतर दैत्य नष्ट झाले. तो दिवस `दत्तजयंती’ म्हणून साजरा करतात.

दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.

दत्तजयंती साजरी करण्यासंबंधाने शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी आढळून येत नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याचा प्रघात आहे. यालाच गुरुचरित्रसप्ताह असे म्हणतात. दत्तमंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजीत केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात. दत्ताच्या हातातील कमंडलू व जपमाळ ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे. शंख व चक्र विष्णूचे आणि त्रिशूळ व डमरू शंकराचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रांत या उत्सवाला विशेष महत्त्व असतं. बडने-या जवळ “झिरी”येथे.दत्तमहाराजांचे जागृत देवस्थान आहे.

असा हा हवाहवासा मार्गशीर्ष व डिसेंबर महिन्याच्या शुभेच्छा.

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ उगवतीचे रंग – अभिव्यक्ती स्वातंत्र्य… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला गेलो होतो. जेव्हा प्रमुख वक्त्यांचे भाषण सुरु झाले तेव्हा त्यांनी मर्यादा सोडून बोलणाऱ्या आजच्या राजकारण्यांवर टीका केली. खरोखरच राजकीय नेते म्हणजे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी असतात. त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. पण त्याचे भान काही अपवाद सोडले तर आज कुठेही दिसत नाही. ते उपरोधिकपणे म्हणाले ‘ विद्या विनयेन शोभते ‘ असे एक संस्कृत सुभाषित आहे. पण बोलणाऱ्यानी एवढी खालची पातळी गाठली आहे की ते म्हणतील, ‘ ही कोण आणि कुठली विद्या ? कुठला विनय ? ‘ रोजच्या बातम्या पाहिल्या आणि त्यात राजकारण्यांनी केलेली विधाने पाहिली की याचे प्रत्यंतर येते. बातम्या सुद्धा बघू नये असे सुजाण नागरिकांना वाटत असल्यास नवल नाही.

याच व्यासपीठावरून आणखी एक वक्त्या बोलल्या. त्यांनी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल एक विधान केले. त्या म्हणाल्या, ‘ सुरुवातीला मला सावरकरांबद्दल प्रचंड आदर होता पण आता तो कमी झाला आहे. ‘ त्याचे कारण त्यांनी सांगितले की राहुल गांधी जर सातत्याने सावरकरांवर टीका करत असतील, तर त्यांच्या हातात काहीतरी पुरावे असल्याखेरीज ते तसे बोलणार नाहीत.  आणखी एक वक्ते उभे राहिले ते म्हणाले की या बाई बोलल्या त्यात नक्कीच तथ्य आहे. आपल्याला सावरकरांच्या विरोधात कोणी बोललेलं आवडत नाही कारण तशा प्रकारची विधानं त्यांच्याबद्दल आपण ऐकलेली नसतात. पण म्हणून ते खोटं आहे असं मानायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपण केलेल्या चुकांची कबुली ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या पुस्तकात दिली आहे. अशी कबुली देण्यासाठी फार मोठे मन लागते. याच व्यासपीठावरून मग दाभोलकर, पानसरे आणि गौरी लंकेश यांनी विरोधाची भूमिका घेतली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का ? देश धार्मिक हुकूमशाहीकडे, फॅसिस्ट वादाकडे झुकतो आहे अशी विविध विधाने केली गेली.

दाभोळकर, पानसरे किंवा गौरी लंकेश यांच्या हत्येचे समर्थन कोणीच करणार नाही आणि करू नये. कोणी वेगळी भूमिका मांडली तर त्यांची हत्या करणे हे कधीच समर्थनीय ठरू शकत नाही. ती निषेधार्हच गोष्ट आहे.

विशेष म्हणजे सावरकरांबद्दल वरीलप्रमाणे विधाने करणाऱ्या  व्यक्ती या जेष्ठ साहित्यिक किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या होत्या. त्यांच्याकडून अशा प्रकारची विधाने ऐकणे हे आश्चर्यचकित करणारे आणि धक्कादायक वाटले. उथळ विधाने करणारी आणि सावरकरांच्या जीवनकार्याचा फारसा अभ्यास न करणारी एखादी व्यक्ती सावरकरांच्या विरोधात बोलते म्हणून तिचे म्हणणे खरे मानून सावरकरांचा त्याग, देशभक्ती या सगळ्याच गोष्टींवर बोळा फिरवायचा का याचा बोलणाऱ्यांनी विचार करायला हवा. महात्मा गांधींनी आपल्या ‘ माझे सत्याचे प्रयोग ‘ या आत्मचरित्रात आपण केलेल्या चुकांची कबुली दिली आहे म्हणून ते महान होत नाहीत किंवा सावरकरांनी स्वतःच्या चुकांबद्दल असे काही लिहिले नाही म्हणून ते लहान होत नाहीत. सावरकर,गांधी, नेहरू, सरदार पटेल, डॉ आंबेडकर, म. फुले  यांच्यासारख्या व्यक्ती मुळात महान आहेत. या सगळ्या महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यातून काय संदेश दिला हे माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हल्ली कोणीही काहीही बोलावे असे झाले आहे. ज्यावेळी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात किंवा समारंभात आपण भाषण करतो, तेव्हा लोकांपुढे कोणता आदर्श ठेवायचा हा खरंतर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण ज्यावेळी आपण महापुरुषांबद्दल बोलतो, त्यावेळी त्यांचे दोषदिग्दर्शन न करता त्यांच्या गुणांवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे असे मला वाटते. गुणग्राहकता आपल्याजवळ असली पाहिजे. महापुरुष हे देखील शेवटी माणसेच असतात. त्या त्या परिस्थितीत निर्णय घेताना त्यांच्या हातून कदाचित काही चुका होऊ शकतात. पण म्हणून त्यांच्या महत्वाच्या कार्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे दोष किंवा चुकाच आपण दाखवत राहायच्या हे कितपत योग्य आहे ? अलीकडे महापुरुषांच्या कार्याचे, गुणांचे गुणगान करण्यापेक्षा त्यांच्यातील दोष दाखवण्याचा जो पायंडा पडत चालला आहे, तो भविष्यकाळाच्या दृष्टीने घातक आहे. पुढच्या पिढ्यांसमोर आपण आदर्श ठेवायचा की दोष दिग्दर्शन करायचे ? स्वा. सावरकर असोत, गांधी किंवा नेहरू असोत या सगळ्या महापुरुषांनी देशासाठी प्रचंड त्याग केला आहे, अपार कष्ट, तुरुंगवास सोसला आहे. अमुक एका महापुरुषावर टीका केली म्हणजे तो लहान होत नाही किंवा त्याच्या कार्याचे महत्व कमी होत नाही.

पुलं हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. पुलंनी अवघ्या महाराष्ट्राला सुसंस्कृत विनोद कसा असतो हे दाखवून दिले. नाट्य, संगीत, अभिनय, दिग्दर्शन, लेखन इ कलेच्या विविध प्रांतात सहज संचार करणारा अवलिया म्हणजे पुलं. याच पुलंवर मध्यंतरी एक चित्रपट येऊन गेला. ‘ भाई -व्यक्ती आणि वल्ली ‘ या नावाचा. आपल्यापैकी बऱ्याच पुलं प्रेमींनी तो पाहिला असेल. पण या चित्रपटातून पुलंचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समोर येण्याऐवजी सतत धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे पुलं अशीच व्यक्तिरेखा डोळ्यासमोर येते. कदाचित वस्तुस्थिती तशी असेलही आणि दिग्दर्शकाला काय दाखवायचे याचे स्वातंत्र्यही नक्कीच आहे. पण इथे पुन्हा माझ्यातील शिक्षक जागृत होतो. समाजापुढे आपण काय ठेवतो आहोत याचा विचार नक्कीच करायला हवा असे मला तीव्रतेने वाटते. वाईट गोष्टी लगेच उचलल्या जातात. चांगल्या गोष्टी रुजवायला वेळ लागतो. उतारावरून गाडी वेगाने खाली येते. वर चढण्यासाठी कष्ट पडतात. आपल्याला समाजाची गाडी प्रगतीच्या दिशेने न्यायची असेल तर योग्यायोग्यतेचा विवेक ठेवायलाच हवा. अर्थात  माझे हे विचार आहेत. सगळ्यांनाच आवडतील असेही नाही याची जाणीव मला आहे. प्रत्येकाला  अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच !

पण जाता जाता आणखी एक सुदंर सुभाषित सांगून समारोप करू या. या सुभाषितात सुभाषितकार म्हणतो

 विद्या ददाति विनयं, विनयाद याति पात्रतां ।

 पात्रत्वात धनमाप्नोति, धनात धर्मं तत: सुखम ।।

ज्या व्यक्तीला खरोखरीच ज्ञानप्राप्ती झाली आहे, अशी व्यक्ती विनयशील म्हणजे नम्र असते. कुठे कसे वागावे हे अशा व्यक्तीला सांगावे लागत नाही. विनम्रतेतून योग्यता किंवा पात्रता अंगी येते. त्यातूनच मग धनाची प्राप्ती करण्यायोग्य व्यक्ती होत असते. धनाचा उपयोग करून मनुष्य धार्मिक कार्य संपन्न करू शकतो आणि त्यातूनच त्याला आनंद प्राप्त असतो. या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. यात अर्थातच ज्ञानप्राप्तीचे आणि त्या खऱ्या ज्ञानप्राप्तीतून अंगी येणाऱ्या गुणांचे महत्व अधोरेखित केले आहे.

© श्री विश्वास देशपांडे,

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

?  विविधा ?

अंगाई… ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

अंगाई हा शब्द कसा आला असेल? खूप विचार केला. अगदी आपल्या गुगल गुरूला पण विचारलं. काही पत्ता लागला नाही. मीच उत्तर मिळवायचा प्रयत्न केला. पूर्वी ‘ गायी गं गायी, माझ्या बाळाला दूध देई ‘ असं म्हणायचे. म्हणजे बाळाच्या परिचयाच्या दोन्ही गोष्टी असणार. गोठ्यात गाय असणार आणि दूध ती देते हे बाळानं पाहिलं असणार.  बाळ रडायला लागलं की त्याची समजूत या गाण्यानं काढली जात असेल व गायी बद्दल आदर लहानपणीच निर्माण होत असेल. नंतर हळू हळू गोठे, गायी काळाच्या उदरात गडप झाल्या. नंतर ते गाणं ‘ गाई  गं अंगाई ‘ असं झालं. त्याचा अर्थ असा लावला गेला असेल की बाळाला, गाई म्हणजे झोप, ती येण्यासाठी गायलं गेलेलं गाणं म्हणजे अंगाई! ही आपली मी माझी काढलेली भाबडी समजूत! पण हे नक्की की आई व्हायचं झालं तर त्या मुलीला अंगाई म्हणता आली पाहिजे असा अलिखित नियम होता. होता म्हणते आहे कारण आज काल आईच्या मदतीला मोबाईल नामक मैत्रीण येते. अंगाई म्हटलं की एक शांत, सौम्य, सोज्वळ गाणं लागतं. अजूनतरी हं ! पुढची पिढी कदाचित ‘ आवाज वाढव डी जे ‘ सारखी गाणी लावतील सुद्धा! कारण तोपर्यंत मुलांना नाजूक आवाजातली गाणी ऐकू येणं बंदही झालं असेल, त्यांनाही मोठ्ठया आवाजातली गाणीच आवडायला लागतील.

मुलांना झोपवताना गाणं म्हणायची पद्धत खूप जुनी असावी. जसं जात्यावर बसलं की ओवी सुचते. तसं बाळ मांडीवर आलं की अंगाई सुचते. ओवी गाण्यासाठी जसं चांगला आवाज किंवा संगीतातील ज्ञान असावं लागत नाही तसंच अंगाईलाही! आपल्याकडे अजून लहान मुलांना झोपताना ऐकवायच्या ट्यूनची खेळणी आली नव्हती, त्या काळात मी लंडनला मला नात झाली म्हणून गेले होते. नातीसाठी तशी म्युझिकवाली खेळणी आणली होती. पण ती रडायला लागली की एवढ्या मोठ्ठयांदा रडायची की त्या खेळण्याचा आवाज कुठे ऐकूच यायचा नाही. मग पारंपारिक मोठ्या आवाजात ‘ हात हात गं चिऊ, हात हात गं काऊ ‘ अशी गाणी किंवा ओरडावं  लागायचं. मला त्यावेळी वाटलं की इंग्रज लोकांच्यात अंगाई गाण्याची परंपराच नसावी. त्यामुळं हे संगीत ऐकवण्याची पद्धत पडली असावी. पण तसं नाही म्हणे! तिथे बाळ आई वडिलांजवळ झोपतच नाहीत. बाळ हे बाळ असल्यापासून त्याची बेडरूम वेगळी असते. त्यामुळं बाळ रडलं तरी आईने जवळ घेण्याचा किंवा अंगाई गाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून ते म्युझिक!

आपल्याकडच्या परंपरा जरा माणसाच्या मानसिक गरजा बघून बनवल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. केवळ आपलंच कुटुंब नाही तर सगळा समाजच एकत्र बांधून ठेवणाऱ्या प्रथा आहेत.

स्पर्शात ओलावा असतो, तो शब्दात मिळणं सुध्दा अवघड आहे. स्पर्शात प्रेम असतं, आधार असतो, आता कशाचीही भिती नाही हा विश्वास असतो. हा विश्वास लहान बाळांना देण्यासाठी मांडी, कूस, पदर, बाळाशी केलेला संवाद यागोष्टी महत्त्वाच्या असतात. आपल्याकडे लहान बाळांना बोललेलं सगळं कळतं असं आपण समजतो. बाळ जन्माला आल्यावरच असं नाही तर अभिमन्यू  सारखे गर्भातही संस्कार होतात हा आपला विश्वास आहे. जिजाऊ यांनी तर शिवाजीला वीरश्रीने भरलेल्या गोष्टी ऐकवल्या, अंगाई ऐकवली आणि तो  शूरवीर झाला.    आपल्या सामान्य माणसांच्या अंगाई मध्ये चिऊ, काऊ, झाडं, चंदामामा अशी निसर्गाची ओळख असते.अंगाई वरून एक गम्मत आठवली. माझ्या दुसऱ्या मुलाला मुलगा झाला. तो जरा रडवाच होता. माझा मुलगा जरा जास्तच हळवा त्यामुळं तो रडायला लागला की हा कासावीस व्हायचा. त्याला तर  मराठी गाणी, अंगाई असं काही म्हणायला येत नव्हतं. हिंदी सिनेमातली गाणी यायची पण प्रेमाची नाहीतर विरहाची! ही सोडून एक गाणं त्याला यायचं, ते कुठलं सांगू?  ‘हमारीही मुठ्ठीमे आकाश सारा ‘ आणि तो हेच गाणं म्हणून मुलाला झोपावयाचा. मला खूप उत्सुकता आहे, तो नातू पुढे मोठ्ठा झाल्यावर कोण बनेल, कोणतं कर्तुत्व गाजवेल याचं!

आपल्याकडे एक जगावेगळी आई होऊन गेली, मदालसा! अंगाई चा विषय निघाल्यावर मदालसा चा उल्लेख व्हायलाच हवा. एकमेव आई जिने अंगाई तून मुलांना अध्यात्माचे धडे दिले. असं कां, हे कळण्यासाठी तिची गोष्ट थोडक्यात सांगावीच लागेल. ही ऋतूध्वज राजाची राणी ! पातालकेतू राक्षसाच्या मायावी कृत्यामुळे तिने मृत राजा पाहिला, आणि अग्निकाष्ठ भक्षण करून देह विसर्जित केला. राजा अतिशय दुःखी झाला. त्याला वैराग्य प्राप्त झाले. अजून राजाला मूलबाळ ही नव्हते, राज्यकारभार कोण पाहणार? मग कंबल व अश्र्वतल या नागऋषींनी शिवाराधना करून तशीच दुसरी मदालसा प्राप्त करून घेतली. ती शिवाचा अंश असल्यामुळे वैराग्यशील होती. अगदी नाईलाज म्हणून संसार यात्रा आक्रमू लागली. पहिल्या मुलाच्या नामकरणाच्या वेळी ती म्हणाली, नश्वर देहाला नाव कशाला ठेवायचे, मृत्तिका व शरीर दोघांची योग्यता सारखीच.राजाने तिला नामकरण व आत्मोन्नत्ती याची माहिती दिली, पण परिणाम उलटाच झाला. मुलांनी राज्यशकट हाकण्यापेक्षा आत्मोद्धार करावा म्हणून ती निवृत्ती विषयक, आध्यात्मपर अंगाई गात असे. त्याचा साधारण अर्थ असा – ‘सुबाहू उगा रडून शिणू नकोस, पूर्व जन्मीच्या संचितानेच या मायाजालात अडकलास, सावध हो, डोळे मिटून घे पण झोपू नकोस, दृष्टी प्रभुकडे ठेव, अज्ञानाने तू भवबंधनात अडकला आहेस, पण आत्मा मुक्त असतो, ही मायेची बंधने तुटणे कठीण आहे, सावध हो.’

या पुढे जाऊन ती विश्व निर्मितीची क्रिया, मायेचे पाच उद्गार, पंचतत्वे , पंचवायू, पंचेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये, पाच अवस्था, जड देह, लिंग देह, शरीर रचना, सर्व नाड्या व शटचक्रांची माहिती सांगते. पुढे नाडी जागृत करणे, आत्मज्योतीचे दर्शन, मोक्ष यांचीही माहिती देते. परिणामी सुबाहू, शत्रुमर्दन, शुभकिर्ती ही तिन्ही मुले राजवैभवाचा त्याग करून अरण्यात जातात. शेवटच्या  अलर्क या मुलाच्या वेळी राजा तिची मनधरणी करतो त्यामुळे ती अलर्क ला राजनीतीचे पाठ देते, पुढे तो अनेक वर्षे राज्य करतो. ज्यावेळी तो लढाईत हरतो त्यावेळी आईने जपून ठेवण्यासाठी दिलेले पत्र वाचतो, त्या पत्राप्रमाणे तो सह्याद्री पर्वतावर श्री दत्त प्रभुंच्याकडे जातो, त्यांचा अनुग्रह प्राप्त करून मुक्त होतो. मदालसाने ‘ माझ्या पोटातला गर्भ, कुण्या दुसऱ्या आईच्या पोटात जाणार नाही ‘ अशी प्रतिज्ञा केली होती. त्याप्रमाणे तिने तिन्ही मुलांना मुक्तीमार्ग दाखवला. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले मदालसेचे अभंग म्हणजेच तिच्या अंगाईचे भाषांतर!

एकूण सांगायची गोष्ट अशी की हा आपला विश्वास आहे की अगदी लहानपणापासून आपण बाळांना जे सांगतो, जे शिकवतो ते ती आत्मसात करतात. त्यालाच आपण ‘ बाळकडू ‘ म्हणत असू.

आपण असं कितीही मानलं तरी याला कितीतरी अपवाद असल्याचं आपल्या लक्षात येतं. बाळ मोठ्ठं झाल्यावर कसं निपजेल हे सांगता येत नसलं तरी हे खरं आहे की आई आणि बाळ यांच्यात एक स्पर्शाचं नातं असतं, एक हळुवार नातं असतं, हे नाजूक बंध जास्त दृढ होतात, जेंव्हा आई त्याला आपल्या हाताने न्हाऊ, माखू घालते, चिऊ काऊ चे घास भरवते. मातृत्वाचं जे सुख असतं ते बाळाच्या बाललीलात, बालसंगोपनात ओतप्रोत भरलेलं असतं. हे संगोपन परक्याच्या हातात सोपवून, जन्माला आल्याबरोबर स्वतंत्र बेडवर, स्वतंत्र बेडरूम मध्ये झोपवून, आई या मातृसुखाला पारखी होत नसेल? कदाचित बाळ त्यामुळं धीट, स्वावलंबी आपल्या बाळापेक्षा लवकर होत असेल पण अशा बाळाला  जन्मदात्रीशी सांधणारा दुवा निर्माणच होत नसेल तर तो दुवा इतर कुठल्याही नात्याला सांधण्यासाठी निर्माण होणार नाही. त्यामुळं माणूस नुसता एकटा पडत नाही तर तो कोरडाही होतो. अर्थात ही आपल्या पिढीची मतं झाली. पुढच्या पिढ्या पाश्चिमात्य संस्करावर, विज्ञानातील प्रगतीवर  जोपासल्या जाणार आहेत. त्यामुळं जन्माला आल्यापासून मोबाईल किंवा त्याचं दुसरं एखादं व्हर्जन बघत बघत झोपतील, आईची किंवा अंगाईची गरज संपलेली असेल. असो, कालाय तस्मैनमः|

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print