मराठी साहित्य – विविधा ☆  आनंददायी संप्रेरके – भाग – 1… अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.अस्मिता इनामदार ☆

सौ.अस्मिता इनामदार

 

?  विविधा ?

⭐ आनंददायी संप्रेरके – भाग – 1 … अनामिक ⭐  प्रस्तुती –  सौ.अस्मिता इनामदार ⭐

आनंददायी संप्रेरके – चार संप्रेरके जी माणसाला आनंदी ठेवतात….

बागेत रोजच्याप्रमाणे सकाळी फिरायला गेलेले मी आणि माझी बायको एका बाकावर बसलेलो होतो. थोडावेळ निवांत गप्पा मारल्यानंतर ती म्हणाली की ती आयुष्यात आनंदी नाही आहे. माझा विश्वास बसेना कारण लौकिक दृष्ट्या तिच्याकडे सर्व काही उत्तम आहे. मी विचारले, “असे का वाटते तुला?”

“मला माहित नाही. सगळेजण म्हणतात की माझ्याकडे सर्व काही आहे पण मला आतून आनंदी वाटत नाही आहे.”

आता मी स्वतःला विचारू लागलो की खरच मी स्वतः आनंदी आहे का?

काही वेळानंतर मला माझा आतला आवाज सांगू लागला – नाही! मला सुद्धा आनंदी वाटत नव्हते.

माझ्यासाठी हा एक धक्का होता. मी त्या दिशेने विचार करण्यास सुरुवात केली, असे का वाटत आहे?

आता मी या गोष्टीचा शोध घेण्याचे ठरवले. काही लेख वाचले, तज्ञ व्यक्तींशी बोललो, पण काहीच मेळ बसत नव्हता. शेवटी माझ्या एका डॉक्टर मित्राने मला एक उत्तर दिले ज्यामुळे माझे समाधान झाले.

त्याने जे सांगितले ते मी अमलात आणले आणि आता मी म्हणू शकतो की मी पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक आनंदी मनुष्य आहे.

तो म्हणाला, आपल्या शरीरात चार संप्रेरके असतात यांच्यामुळे आपल्याला आनंदी, प्रसन्न वाटत राहते-

१. एंडॉर्फिंस

२. डोपामाईन

३. सेरोटोनिन

४. ऑक्सिटोसिन

आपण ही संप्रेरके समजून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आपल्याला आनंदी राहण्यासाठी या चारही संप्रेरकांची गरज आहे.

इंडॉर्फिंस

आपण जेव्हा व्यायाम करतो तेव्हा हे संप्रेरक तयार होते.

हे संप्रेरक शरीराला वेदना सहन करण्यास आणि दुःखावर मात करण्यास मदत करते.

मग आपण व्यायामाचा आनंद घेऊ लागतो कारण इंडॉर्फिंस आपल्याला आनंदी वाटण्यास मदत करतात.

हसणे हा इंडॉर्फिंस निर्मिती साठी आणखी एक चांगला मार्ग आहे.

आपल्याला दररोज तीस मिनिटे व्यायाम करणे किंवा काही तरी विनोदी वाचणे ऐकणे किंवा पाहणे हे पुरेसे इंडॉर्फिंस निर्मितीसाठी मदत करू शकते.

डोपामाइन

आपल्या जीवन यात्रेत आपण अनेक लहान मोठी कामे पार पाडत असतो आणि त्यामुळे कमी जास्त प्रमाणात डोपामाइन तयार होत असते.

जेव्हा आपण केलेल्या कामाचे कौतुक कोणीतरी घरी किंवा कामाच्या ठिकाणी करते तेव्हा आपल्याला सार्थक आणि आनंदी वाटते कारण तेव्हा शरीरात डोपामाइन तयार होत असते.

तून आपल्याला समजते की घरातील अनेक कामे करणाऱ्या आणि करतच राहणाऱ्या गृहिणींना अनेकदा निराश का वाटते.. कारण त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक फार क्वचित केले जाते.  आपण जेव्हा काम करतो, पैसे मिळवतो, नवीन वस्तू खरेदी करतो तेव्हा सुद्धा डोपामाइन तयार होते. आता आपल्याला समजले का, खरेदी केल्यानंतर आपल्याला इतके उत्साही का वाटते?

क्रमशः…

– अनामिक

संग्राहिका : – अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 14 – अध्यात्मिकतेची खूण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 14 – अध्यात्मिकतेची खूण ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्रला मन एकाग्र होण्याची अद्भुत शक्ती बालवयातच लाभली होती.मनाची एकाग्रता आणि उत्तम स्मरणशक्ती हे त्याचे विशेष गुण लहानपणापासूनच लक्षांत येत होते. लहान मुलं ऐकत नसतील तर आपण त्यांना,कशाची तरी भीती दाखवतो,तू ऐकलं नाहीस तर बाऊ होईल,बुवा येईल,देवबाप्पा अमुक करेल,असे आणखी काही.अशीच भीती नरेंद्रला ही दाखवली गेली होती,त्याला लहानपणी खेळताना झाडावर उंच चढण्याचा छंद होता.

मित्रांशी खेळताना,एकदा अंगणातल्या चंपक वृक्षावर पारंब्याना धरून लांबच लांब झोके घेण्याचा खेळ नरेंद्र खेळत होता. ते मित्राच्या वडिलांनी, रामरतन बसूंनी पाहिले,या वृक्षाच्या फांद्या फार बळकट नसतात,तुटल्या तर, खाली पडेल,नरेंद्रचे हातपाय मोडतील या काळजीने त्यांनी सांगितले,”नरेंद्र,खाली उतर,पुन्हा या झाडावर चढू नकोस”, त्यावर नरेंद्रने विचारले,”का? चढले तर काय होईल?यावर काहीतरी भीती आताच घालून ठेवली तर बरे होईल या हेतूने बसू म्हणाले,”या झाडावर ब्रम्हरक्षस आहे, मोठा भयंकर आहे, झाडावर कोणी चढलं तर तो रात्री येऊन मानगुटीवर बसतो” नरेंद्रने हे शांतपणे ऐकून घेतले आणि बसू पुढे निघून गेल्यावर तो पुन्हा झाडावर चढला, तसे मित्र म्हणाला,अरे ब्रम्हराक्षस मानगुटीवर बसेल ना? क्षणाचाही विलंब न करता, नरेंद्र म्हणाला, अरे तू काय खुळा आहेस का? आपण या झाडावर खेळू नये म्हणून असंच सांगितलंय आपल्याला, खरोखरीच ब्रह्मराक्षस असता तर तो या आधीच माझ्या मानगुटीवर नसता का बसला? असा हा घटनेच्या मुळाशी जाऊन,त्याचं स्वरूप समजावून घेण्याची नरेंद्रची वृत्ती होती.

लहान वयातच ध्यान मंदिरात ध्यानधारणा करणे हे नरेंद्र सुरुवातीला खेळ म्हणून खेळायचा. नंतर छंद म्हणून करू लागला. पण तो ध्यानासाठी बसला की सर्व देहभान विसरून जायचा. त्याला भानावर आणावे लागे.

बैराग्यांच्या मस्तकावरच्या जटांचे त्याला लहानपणी भारी आकर्षण वाटायचे. एकदा त्यानं ऐकलं होतं की बराच वेळ शिवाचं ध्यान केलं की आपल्या डोक्यावर जटा वाढतात आणि खूप लांब होऊन जमिनीत शिरतात. मग काय नरेंद्र ध्यान लावून बसला आणि आपले केस वाढताहेत का, लांब झालेत का, ते तपासू लागला. खूप वेळ झाला तरी काहीच घडेना, मग आईकडे जाऊन, “एव्हढा वेळ झाला तरी जटा का वाढत नाहीत?असे विचारले. आईने सांगितले, इतका थोडा वेळ ध्यान केल्याने जटा वाढत नसतात, त्यासाठी खूप दिवस जावे लागतात,”अशा घटनातून नरेंद्रला संन्यासी आणि बैरागी यांच्या बद्दल मनातून ओढ असायची हे दिसते. संन्याश्या चे नाते शिवाशी असते असे त्याला माहिती होते.

एक दिवस त्याने आपल्या अंगावर भस्माचे पट्टे काढले,कपाळावर टिळा लावला,कमरेभोवती एक भगव्या रंगाचे कापड गुंडाळले,आणि “हे बघा मी शिव झालो,”असे आनंदाने ओरडत घरभर उड्या मारू लागला.ही नकळत असलेली ओढ पाहून भुवनेश्वरींना मनातून धास्ती वाटली,की आपला हा मुलगा आजोबांच्या मार्गाने जाऊन संन्यासी तर होणार नाही ना?

मोठा होता होता नरेंद्र युवावस्थेत येईतो लहानपणीचे ध्यान लावणे, मित्रांना जमवून गप्पा मारणे, चर्चा करणे, गंगेवर जाणे हे प्रकार पुढे परिपक्वतेने होऊ लागले. ज्ञानाच्या आधारे होऊ लागले.

दिखाऊपणा किंवा उथळपणा त्यांच्या वृत्तीत मुळातच नव्हता, केवळ उत्तम कपडेलत्ते घालून मिरवणे म्हणजेच आपले सर्वस्व समजणारी मुले/मित्र यांचा त्याला खूप तिटकारा होता. कुठल्याही मिळमिळीत गोष्टी करमणुकीसाठी का असेना, नरेंद्रच्या जीवनात त्याला स्थान नव्हते.

त्याच्या संन्यस्त वृत्तीचा युवा अवस्थेतला एक बोलका प्रसंग आहे. ‘शांतपणे अभ्यास करायला नरेंद्र आपल्या आजीच्या घरी अधून मधून जात असे, माडीवरच्या खोलीत तो अधून मधून गाणी पण म्हणत असे. गाणे चालू असताना, एकदा समोरच्या घरांत एक वैधव्य आलेली तरुण मुलगी नरेंद्रच्या मधुर आणि धुंद स्वरांनी भान हरखून गेली आणि क्षणात बाहेर पडून,नरेंद्र गात होता त्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली,एक नवयौवना आपल्या दाराशी येऊन आपल्याला निरखते आहे हे कळताच नरेंद्र तत्परतेने उठून तिच्या पायाशी वाकून तिला प्रणाम करत म्हणाला,”माताजी का आला होतात? काय काम होतं? मोकळेपणाने सांगा, मी तुम्हांला माझ्या आईच्या जागीच मानतो” यातून व्यक्त झालेला अर्थ त्या मुलीने समजायचा तो समजला आणि दुसऱ्याच क्षणी निमुटपणे घरी निघुन गेली. नरेंद्रने त्या दिवसापासून अभ्यासाची खोली बदलली, पुन्हा कधीही तो तिथे बसला नाही, या तरुण वयात संन्यस्त वृत्तीच्या प्रकृतीचा आविष्कार एका क्षणात घडला होता. ही नरेंद्रच्या आंतरिक अध्यात्मिकतेची च खूण होती.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राजक्ताची फुले… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

?  विविधा  ?

☆ प्राजक्ताची फुले… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

जेव्हा जेव्हा मला तुझी आठवण येते

मी प्राजक्ताला पहाते

ही टपटपणारी फुले जणू

आहेत अबोल अश्रुधारा …

हो ना …तू असा दुनियेच्या संसारात गुंतलेला तुला कुठे ठाऊक आहेत या उरीच्या वेदना ?? या प्राजक्ताच्या झुळुकीसारखेच तुझे अस्तित्व …तू आलास म्हणून मोहरून जातात दिशा …स्तब्ध होतो वारा …… मध्यान रात्री पक्षी फडफडतात …सूर्यही अवचित डोकावतो अवेळी काळ्याशार ढगांच्या जळात …गायी कान टवकारतात ..इतकेच काय ती तुझी बासुरी सुद्धा अधीर होते तुझ्या कोमल अधरांवर विसावायला …थरथरते तिचीही काया अन अधीर होते तुझ्या मंजूळ स्पर्शासाठी …केवड्याच्या बनात नाग उगीचच सळसळत रहातात …निशिंगन्ध डोकावतो हळूच हिरव्या पानाअडून तुझ्या आगमनाची वार्ता पसरावयाला ! पण …पण तू येतोस …विद्युल्लतेच्या वेगाने … धड -धड होते काळजात ..कालिंदीच्या डोहात तरंग उठत रहातात …आसुसतो तोही डोह …तुझ्या चरण कमलाना स्पर्शायला … धावते वेड्यासारखी मीही तुझ्या भेटीला पण …पण पितांबर  लहरत रहातो रुक्मिणीच्या परसदारात …चांदण झुला झुलत राहतो …..कर -कर आवाज अंधार कापत जातो ..कस्तुरी रेंगाळत रहाते आसमंतात …खोलवर श्वासात रुतत जाते माझ्या .. .. अन … अबोल प्राजक्त हळुवार ओघळतो त्या काजळलेल्या डोळ्यांच्या व्याकूळ काळोखात नि:शब्द ….

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ हसत हसत फसवुनी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ हसत हसत फसवुनी… ☆ श्री अरविंद लिमये ☆

शब्द सुंदर असतात. त्यांना रंग असतात आणि भावनाही. पण शब्द फसवेही असू शकतात यावर एरवी माझा विश्वास बसला नसता. पण मला खूप वर्षांपूर्वी एकदा ‘साळसूद’ या शब्दामुळे आणि आता या विषयाच्या निमित्ताने ‘डल्ला’ या शब्दामुळे याचे प्रत्यंतर आले.

‘साळसूद’म्हणजे साधा, भोळा, पापभीरू असा माणूस.खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.तेव्हा टिव्हीवर गाजत असलेल्या स्मिता तळवळकर निर्मित आणि दिलीप प्रभावळकर अभिनित ‘साळसूद’ या प्रचंड लोकप्रिय मालिकेमुळे मराठी भाषिकांमधेही फारसा रोजच्या बोलण्यात न येणारा ‘साळसूद’ हा शब्द घरोघरी जाऊन पोहोचला होता. पण त्या शब्दाच्या अतिशय चुकीच्या अर्थासह.यात अर्थात त्या शब्दाची कांहीच चूक नव्हती. त्या मालिकेमधे वरवर साळसूद वाटणार्‍या माणसाची मध्यवर्ती भूमिका दिलीप प्रभावळकर यांनी केलेली होती. तो इतरांसमोर वागता बोलताना अतिशय गरीब, पापभीरू वाटणारा पण प्रत्यक्षात अतिशय बेरकी आणि कपटी असा माणूस असतो.संधी मिळेल तेव्हा तो इतरांच्या नकळत जमेल तिथे डल्ला मारुन नामानिराळा राहून सर्वाना फसवत असतो. त्याच्या साळसूदपणामुळे कुणालाही त्याचा संशय मात्र येत नाही. या मालिकेच्या जन मानसावरील प्रभावामुळे अनेकांचा ‘साळसूद’ म्हणजे कटकारस्थानी, कपटी असाच समज दृढ झालेला होता.त्या निमित्ताने हा शब्द सर्रास बोलण्यातही येऊ लागला होता पण तो मात्र कुणाही बेरकी माणसाचं वर्णन करताना ‘तो एक नंबरचा साळसूद आहे’ असा चुकीचा वापर करुन. याला आपल्या भाषेबद्दलच्या अज्ञानापेक्षाही त्या टीव्ही मालिकेचा प्रभाव हेच तत्कालिक कारण असलं तरी शब्दही फसगत करु शकतात याचं ते एक उदाहरण होतं.

‘डल्ला’ शब्दही असाच. ‘डल्ला’ म्हणजे ‘चोरणे’असा अर्थ सर्रास गृहीत धरला जातो. खरंतर ‘डल्ला’ असा सुटा शब्द आपण कधीच वापरत नाही.तो ‘डल्ला मारणे’ असाच ‘ चोरी करणे’ या अर्थाने वापरला जातो. त्यामुळे नकळत डल्ला म्हणजे चोरी असे गृहीत धरले जाते पण तो या शब्दाच्या वापरातील ध्वनीत अर्थामुळे झालेला चुकीचा समज आहे.

‘डल्ला’ या शब्दाचा खरा अर्थ ‘पैसाअडका’, ‘संपत्ती’, ‘खजिना’असा आहे. त्या पैशावर, संपत्तीवर हात मारणे,खजिन्याची लूट करणे म्हणजे ‘डल्ला मारणे’.

म्हणजेच चोरी करणे.’डल्ला मारणे’ हा दोन शब्दांच्या संयोगाने तयार झालेलाच पण जोडशब्द नव्हे तर ‘वाक्यप्रचार’ आहे. ‘वाक्यप्रचारा’चं वैशिष्ट्यच हे की तो तयार होताना त्या दोन्ही शब्दांचे मूळ अर्थ नाहीसे होऊन त्या वाक्यप्रचाराचा एक वेगळाच अर्थ निर्माण होत असतो. उदाहरण म्हणून ‘डल्ला मारणे’ हाच वाक्यप्रचार घेऊ.इथे ‘डल्ला’ या शब्दाचे पैसा,संपत्ती,खजिना यासारखे अर्थ आणि ‘मारणे’ या शब्दाचा ‘ताडन करणे’ हा असे दोन्ही अर्थ लोप पावून ‘चोरी करणे’ हा अर्थ निर्माण होतो.अशा वाक्यप्रकारांची ‘हात दाखवणे’ , ‘हात मारणे’, ‘डोळा असणे’,  ‘घामटा निघणे’,’नाक खुपसणे’ ‘साळसूदपणाचा आव आणणे’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

अर्थात चोरी केल्यामुळे होणाऱ्या फसगतीसारखा त्रास या अशा फसव्या शब्दांच्या फसगतीमुळे होत नाही हे खरेच.म्हणूनच याला फारतर हसत हसत फसवून असे शब्द स्वतःकडे कारणपरत्त्वे आपलं लक्ष वेधून घेतात असे फारतर म्हणता येईल.तरीही अशा फसव्या शब्दांचा वापर करताना आपणं सावध रहायला हवंच.

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं!

लहानपण डोळ्यासमोर आले,परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे.ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या,डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती.सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू!आंबे बाजारात सुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे,फणस,काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे.घामाच्या धारा वहात असायच्या,पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा.

बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले.देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे.दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे! हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे.वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई.झाडांवर पालवी फुटलेली दिसे.कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे  पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत,बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे.जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई!तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे.डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते.पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग!असा ओथंबून येतो की,त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की,ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग?अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे!काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटून येते आणि काळे बनतात.योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! नवीन अंगाई गीत ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? चं म त ग ! 😅

🤣 नवीन अंगाई गीत ! 😅  श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

“नमस्कार पंत, हा तुमचा पेपर आणि आपल्या चाळीची बातमी आली आहे आजच्या पेपरात पान सहावर, ती आठवणीने वाचा, येतो मी !”

“कसली बातमी मोऱ्या ?”

“पंत तुम्ही वाचलीत तर तुम्हांला कळेल ना आणि त्या बातमीत माझं पण नांव छापून आलं आहे, अगदी फोटो सकट !”

“अरे गाढवा तू ती बातमी सांगितलीस तर तुझी जीभ काय झडणार आहे ? आणि तुझा फोटो कशासाठी छापलाय पेपरात ? तू साधा गल्लीतला नेता पण नाहीस अजून !”

“तसं नही पंत, तुमच्यामुळेच ती बातमी आणि माझा फोटो छापून आला आहे पेपरात !”

“माझ्यामुळे ? ते कसं काय ?”

“अहो पंत, तुम्हीच नाही का मला गेल्यावेळेस नवीन आयडिया दिलीत त्या बद्दलच ती बातमी आहे !”

“मोऱ्या, नेहमी तू मला ‘कोड्यात बोलू नका’ असं सांगतोस आणि आज तू स्वतःच कोड्यात बोलतोयस ! आता मला जर ती बातमी उलगडून नाही सांगितलीस तर उद्यापासून आमच्या पेपरला हात लावायचा नाही, कळलं ?”

“असं करू नका पंत ! अहो तुमचा पेपर वाचल्या शिवाय माझी ‘प्रातरविधी’ पासूनची सारी कामं अडतात हे तुम्हांला पण माहित आहे !”

“हॊ ना, मग आता मुकाट्यानं मला ती बातमी सांगतोस का उद्यापासून आमचा पेपर वाचण बंद करतोस ?”

“सांगतो सांगतो पंत ! आता तुम्ही माझ्या वर्मावरच वार करायला निघालात तर….”

“उगाच अलंकारिक बोलायला जाऊ नकोस, पट पट बोल !”

“पंत, अहो गेल्यावेळेला तुम्ही नाही का म्हणाला होतात, की आपल्या अहमद सेलरच्या आठ चाळीत रोज कोणाकडे ना कोणाकडे कसलं तरी मंगल कार्य असतं आणि लोकं हजारो रुपये खर्च करून DJ लावून ते साजर करीत असतात, त्या ऐवजी…….”

“त्याच पैशातून गरीब हुशार विद्यार्थ्यांना मदत करावी अथवा कुठल्यातरी सामाजिक संस्थेला देणगी द्यावी, असं मी सुचवलं होत खरं !”

“बरोबर पंत आणि चाळ कमिटीचा अध्यक्ष या नात्याने मी तो कार्यक्रम यशस्वीपणे राबवला त्याचीच बातमी आली आहे आजच्या पेपरात !”

“अरे व्वा ! तुझं अभिनंदन मोऱ्या !”

“धन्यवाद पंत, पण तुमच्यामुळेच हे शक्य झालं ! येतो आता !”

“मोऱ्या थांब जरा, माझं काम आहे तुझ्याकडे !”

“कसलं काम पंत ?”

“अरे माझा मित्र वश्या जोशी पूर्वी डोंबिवलीला रहात होता, अगदी स्टेशन जवळ आणि आता तो ठाण्यात घोडबंदरला आला आहे रहायला !”

“बरं मग ?”

“मोऱ्या वश्याला ठाण्यात आल्यापासून निद्रानाश जडला आहे, रात्रभर झोप म्हणून लागत नाही त्याला !”

“मग जोशी काकांना एखाद्या डॉक्टरकडे जायला सांगा ना !”

“अरे चार, पाच डॉक्टर करून झाले त्याचे पण काडीचा उपयोग झाला नाही त्याला, उगाच पैशा परी पैसे गेले ते वेगळेच !”

“पंत जोशी काकांच्या निद्रानाशावर जर चार पाच डॉक्टरांनी हात टेकले असतील तिथे मी बापडा काय करू शकणार सांगा ?”

“सांगतो ना ! अरे परवाच वश्याचा फोन आला होता आणि तो माझ्याकडे अगदी रडकुंडीला येवून, त्याच्या निद्रानाशावर काहीतरी उपाय सांग रे असं म्हणत होता ! त्यावर मी बराच विचार करून एक उपाय शोधला आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत लागेल, म्हणून तुला थांब म्हटलं !”

“असं होय, बोला पंत काय मदत हवी आहे तुम्हाला माझ्याकडून ?”

“मोऱ्या त्या तुमच्या DJ च्या कर्कश्य आवाजावरूनच मला एक उपाय सुचलाय बघ !”

“कोणता?”

“सांगतो ना, अरे त्याची डोंबिवलीची जागा अगदी स्टेशन जवळ, म्हणजे दिवस रात्र ट्रेनचा खडखडाट बरोबर ?”

“बरोबर, मग ?”

“म्हणजे रोज रात्री झोपतांना वश्याला ट्रेनच्या खडखडाटाचे अंगाई गीत ऐकायची सवय आणि ते अंगाई गीत ठाण्यात त्याच्या कानावर पडत नाही, म्हणून वश्याला निद्रानाशाचा विकार जडला असावा असं माझं ठाम मत आहे !”

“मग पंत मी तुम्हाला यात काय मदत करू शकतो ते तर सांगा !”

“मोऱ्या तू मला फक्त एका CD वर, ट्रेनचा भरधाव जायचा आवाज, रेल्वे ट्रॅकच्या खडखडा सकट एखाद दुसऱ्या ट्रेनच्या हॉर्न बरोबर रेकॉर्ड करून दे, बास्स !”

“त्यानं काय होईल पंत ?”

“अरे तोच वश्याच्या निद्रा नाशावर उपाय, कळलं ?”

“नाही पंत !”

“अरे गाढवा, मी वश्याला सांगणार, ही CD घे आणि रात्री झोपतांना हे तुझं अंगाई गीत ऐकत ऐकत सुखाने झोप ! नाही तुला निद्रादेवी प्रसन्न झाली तर नांव बदलीन माझं !”

“धन्य आहे तुमची पंत !”

© प्रमोद वामन वर्तक

ताजा कलम – आपल्यापैकी कोणी नुकतीच स्टेशनं जवळची जागा बदलली असेल आणि वश्या सारखा झोपेचा प्रॉब्लेम आपणास सतावत असेल तर वरील उपाय करून बघायला हरकत नाही !

२२-०४-२०२२

ठाणे.

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

? विविधा ?

☆रावळगाव…अनामिक ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

रा व ळ गा व

भारतीय चॉकलेट, गोळ्यांसाठीचा एक मोठा पण तुलनेने थोडा विस्मृतीत गेलेला ब्रॅण्ड म्हणजे रावळगाव. एका पिढीचा शाळेत जायचा कंटाळा सुसह्य़ करण्याचं काम या ब्रॅण्ड्सच्या पानपसंद, मँगो मुड, कॉफी ब्रेक या आणि अशा अनेक चॉकलेट व गोळ्यांनी केलं. त्या ब्रॅण्ड्सची ही कहाणी.

सोलापूर जिल्ह्य़ात जन्माला आलेल्या हिराचंद वालचंद यांना अभ्यासाची फारशी गोडी नव्हती. व्यावसायिक होण्याचं स्वप्न मात्र त्यांना खुणावत राहायचं. वडिलांचा पारंपरिक अडतीचा व्यवसाय सोडून ते आपलं व्यावसायिक नशीब आजमावायला थेट बांधकाम व्यवसायात शिरले. फाटक नावाच्या बांधकाम व्यावसायिकाशी भागीदारीत फाटक-वालचंद बांधकाम व्यवसाय त्यांनी सुरू केला. बार्शी लाइट रेल्वेसह अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. या कामात त्यांना ब्रिटिशांचा दुजाभाव खटकत होता. मर्जीतील ब्रिटिश कंपन्यांना संधी देत भारतीयांना डावलण्याच्या ब्रिटिशनीतीला ठोस उत्तर देण्याची वालचंद यांची इच्छा होती. त्यांनी शेतकी जीवन लहानपणापासून पाहिलं होतं. आणि शेतकी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर हा शेतीप्रधान भारत देश ब्रिटिशांना पुरून उरेल अशी त्यांची भावना होती. याच भूमिकेतून त्यांनी नाशिक जवळील रावळगाव येथे तब्बल दीड हजार एकर उजाड नापीक जमीन स्वस्तात घेतली. अनेक कृषीतज्ज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, अभियंते यांना हाताशी धरून त्या नापीक जमिनीचं रूपांतर काहीच वर्षांतच उपजाऊ  कसदार जमिनीत झालं. तिथे उसाची लागवड करण्यात आली. १९३३ मध्ये भारतातील पहिला साखर कारखाना रावळगाव येथे उभा राहिला. थोडासा दुर्लक्षित असा तो भाग त्यामुळे रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह विकसित झाला. याच कारखान्याच्या जोरावर १९४० मध्ये रावळगाव चॉकलेट, गोळ्यांचं उत्पादन सुरू झालं. अगदी तसंच शेतकी प्रारूप त्यांनी पुण्याजवळील कळंब इथे राबवलं. ज्या परिसराला सध्या आपण वालचंदनगर म्हणून ओळखतो.

गोळ्या, चॉकलेट यांचं विलक्षण अप्रूप असण्याच्या काळात रावळगाव टॉफीजना लोकप्रियता मिळाली. बदलत्या काळानुसार आपली संस्कृतीही बदलत गेली. वाढदिवस, त्यानिमित्ताने शाळेत गोळ्या वाटणं, घरी जंगी मेजवानी साजरी होणं हे सारं रुजत असताना घाऊक प्रमाणावर चॉकलेट किंवा गोळ्यांची पाकिटं खरेदी करणंही अनिवार्य झालं. ८०/९० च्या दशकातील पिढीला आई-बाबांनी अशाच निमित्ताने घरी आणलेली रावळगाव चॉकलेटची थैली नक्की आठवत असेल. हिरव्या, लाल चकचकीत आवरणातली ती चॉकलेट्स म्हणजे वाढदिवस धमाल साजरा होणार याची ग्वाही असायची. त्या चॉकलेट्सवर विशिष्ट नाव नसायचं तर रावळगाव अशी छान लफ्फेदार अक्षरं असायची. या घाऊक खरेदीबरोबर शाळेजवळच्या दुकानातील हाका मारून बोलावणाऱ्या बरण्यांमध्ये रावळगावचं पानपसंद, मँगो मूड खुणावायचं. महागडी चॉकलेट भेट देऊन मैत्री करण्याचा तो काळ नव्हता. पण खिशातील पानपसंद, मँगो मूडने शाळेतील कितीतरी मैत्रीबंध पक्के केले. खिसा अशक्त असेल तर फक्त स्वत:पुरतं गोळी घेणंही लपून राहायचं नाही. लालभडक झालेली जीभ दगा द्यायची. ‘‘एकटीनेच पानपसंद खाल्लंस ना? आता मी देते का बघ’’ अशा धमक्या मिळायच्या.

रावळगाव हे ब्रॅण्डनेम मनावर ठसण्यात त्यांच्या जाहिरातीचा वाटाही मोठा होता. मँगो मूडच्या जाहिरातीतला तो गवतातला तरुण आणि नंतर पिकल्या मिशीचा आंबा आठवून बघा. पानपसंदच्या जाहिराती हिंदी असल्या तरी मराठी कलाकारांच्या दर्शनाने त्या अधिक जवळच्या वाटत. ‘शादी और तुमसे? कभी नहीं’ असं रागात म्हणणाऱ्या अर्चना जोगळेकर किंवा हातात लाटणं घेऊन ‘देखो मुझे गुस्सा मत दिलाओ, अपनी बिवीपे हुकूम चलाते हो?’ असं खडसावणाऱ्या भारती आचरेकर पडद्यावर दिसत. मग पानपसंद समोर येई. सोबत आवाज ‘पान का स्वाद गजब की मिठास’ आणि तीच वाक्यं लाडेलाडे बोलली जात. या जाहिरातीसुद्धा रावळगाव गोळ्यांइतक्या गोड होत्या.

नंतर अनेक परदेशी कंपन्यांच्या मार्केटिंगचा झंझावात आला आणि आपली ही देशी बनावटीची चॉकलेट्स गोळ्या कुठेतरी मागे पडली. आजही रावळगाव चॉकलेट वितरित होतात पण सध्याची पिढी त्या स्वादापासून अनभिज्ञ आहे. मध्यंतरी एका सर्वेक्षणात कोणती भारतीय चॉकलेट्स परत बाजारात यावीशी वाटतात? या प्रश्नाला अनेकांनी इतर गोळ्यांसह पानपसंद, मँगो मूड हे दिलेलं उत्तर बोलकं आहे.

रावळगाव गोळ्यांची टॅगलाइन आहे, स्वीट स्माइल ऑन मिलीअन्स ऑफ फेसेस. ही टॅगलाइन अनेक अर्थाने खरी होती. गोळ्या, चॉकलेट यांच्या गोडव्यासोबत तुलनेने स्वस्त अशी ही चॉकलेट सर्व थरांतील मंडळींना परवडत.

आज ७८ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड काहीसा झाकोळलाय, पण तरीही स्मृतींच्या पडद्यावर त्याच्या आठवणी लख्ख आहेत. लहान वयातील अप्रूप असणारे वाढदिवस, मैत्रीच्या आणाभाका, भांडणांची मिटवामिटवी यांचा हा गोड साक्षीदार म्हणूनच आजही केवळ नावाच्या उच्चाराने चेहऱ्यावर हसू फुलवतो.

– अनामिक (सोर्स व्हाॅटसअप)

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ किती किती रुपे तुझी..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

?विविधा ?

☆ किती किती रुपे तुझी..! ☆ श्री अरविंद लिमये ☆

दिसतं तसं प्रत्येकवेळी असतंच असं नाही याचं ‘किरण’ हा शब्द नेमकं उदाहरण म्हणता येईल.

पहाटप्रहरी मागे रेंगाळणाऱ्या अंधारकणांना हळूवार स्पर्शाने दूर सारत चैतन्याचं शिंपण करीत क्षितिजरेषेवरुन अलगद डोकावून तांबूस पायवाटांवरुन सर्वदूर पसरणारे कोवळे सूर्यकिरण आणि दिवसभराच्या अथक श्रमानंतर विसावू पहाणाऱ्या शरीरमनाला आपल्या शितल स्पर्शाने प्रसन्नचित्त करणारे सुखद चंद्रकिरण ही परस्परभिन्न अशी किरणांची दोन रुपे ! एक चैतन्यदायी ऊर्जास्त्रोत तर दुसरे हळूवार स्पर्शाने शांतवणारे ! तथापी वरवर दिसणाभासणारी ही सर्वप्रिय किरणे एवढीच किरण या शब्दाची परिपूर्ण ओळख म्हणता येणार नाही.

अतिनील किरणे,तसेच शास्त्रज्ञानी अथक प्रयत्नांती शोधलेले ‘क्ष’ किरण अशी किरणांची विस्मित करणारी परस्परवेगळी वैशिष्ट्यपूर्ण रुपे हा सविस्तर विवेचनाचाच विषय आहे.तरीही त्यांचा ओझरता परिचयसुध्दा उद्बोधक ठरेल.

सर्वसाधारण प्रकाशकिरण आपल्या शरीरातून आत प्रवेश करु शकत नाहीत.पण प्रकाशकिरणांच्या परावर्तनावर संशोधन करीत असताना एका जर्मन वैज्ञानिकाला अशा किरणांचा अचानक शोध लागला जी शरीराच्या अंतर्गत भागातसुध्दा  प्रवेश करु शकतात. हे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्या किरणांचे नेमके नाव माहित नसल्याने त्या किरणांना त्याने ‘क्ष’ हे नाव दिले.X Ray हे या X Radiation चेच लघुरुप.पुढे त्यावरील अनेक प्रयोगांदरम्यान या X Radiation ची शरीराच्या आत प्रवेश करुन आतील शरीराच्या नेमक्या भागाची छायाचित्रे घेऊ शकण्याची आश्चर्यकारक क्षमता लक्षात येताच वैद्यकीय निदान आणि उपचारांसाठीच्या उपयोगितेसाठी संशोधनाची द्वारे  खुली होऊ शकली .त्याचे फलितआज आपण अनुभवतो आहोतच.या क्ष किरणांची अतिशय मर्यादित मात्रा शरीरांतर्गत छायांकनासाठी पुरेशी असते.मात्र याच किरणांची जास्त प्रमाणातली विध्वंसक मात्रा (गरजेनुसार कमी-जास्त) कॅन्सर वरील रेडिएशन ट्रीटमेंटमधे देण्यात येते.त्यामुळेच त्याचे होणारे साईड-इफेक्ट्सही लक्षणीय असतात.

अतिनील किरणे ही सुर्यप्रकाशात आढळणारी किरणे.यांचं सुर्यप्रकाशातील प्रमाण अत्यल्प असलं तरी हानीकारकता मात्र प्रचंड असते. वायुपटलावरील ओझोनच्या थरामुळे अतिनील किरणांना थोपवून धरले जाते.वाढत्या प्रदुषणामुळे ओझोनचा थर विरळ होत गेल्याने सजीवांच्या जीवाला निर्माण होऊ पहाणारा अतिनील किरणांचा धोका हा पर्यावरणाच्या दृष्टीने आजचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे.

हे अतिनील किरण हानीकारक जसे तसेच उपयोगीही.याच किरणांचा वापर पाणी शुध्दीकरण आणि हवा शुध्दीकरण उपकरणांमध्ये केला जातो.

साधारणत: सूर्याची     प्रकाशकिरणे आपल्या शरीरावयवात प्रवेश करु शकत नाहीत या नियमाला एकमेव अपवाद म्हणजे आपले डोळे.आपल्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी पापण्या आणि भुवयांची निसर्ग योजना असली तरी डोळ्यांची ही सुरक्षाकवचे अतिनील किरणांना थोपवू शकत नाहीत.त्यामुळेच डोळ्यांच्या आरोग्याची विशेषतः उन्हाळ्यात जास्त काळजी घेणे हितकारक असते.

किरणांचा ‘उत्सव’ ही एरवी कवीकल्पनाच वाटली असती.पण वास्तुशिल्पकलेतील कल्पकतेने साकारलेला चमत्कार ठरलेला हा ‘किरणोत्सव’ याची देही याची डोळा पहाण्याचे भाग्य मिळते ते करवीर निवासिनी ‘श्री महालक्ष्मी मंदिरा’त !

आपलं शरीरस्वास्थ्य बव्हंशी आपल्या मन:स्वास्थ्यावर अवलंबून असते.सतत दडपणाखाली अस्वस्थ असणाऱ्या मनोवस्थेचा परिणाम शरीरावरही होत असतोच. अस्वस्थ मनातील हा नैराश्याचा अंधार एखाद्या आशेच्या किरणाच्या ओझरत्या स्पर्शानेही नाहीसा होऊ शकतो खरा पण त्या किरणांच्या आपल्या मनातील मुक्त प्रवेशासाठी आपण आपल्या मनाची कवाडे मात्र खुली ठेवायला हवीत !

किरणांची ही विविध रंगरुपे आश्चर्य वाटावीत अशीच.ती पाहून वाटणारं आश्चर्यच मनात उमटणाऱ्या ‘ किती किती रूपे तुझी ‘ या आश्चर्योद्गारांत प्रतिबिंबित होत रहाते !

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर ☆

डाॅ.नयना कासखेडीकर

?  विविधा ?

☆ विचार–पुष्प – भाग 13 – संगीत -२ ☆ डाॅ.नयना कासखेडीकर 

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील घटना-घडामोडींचा आणि प्रसंगांचा आढावा घेणारी मालिका विचार–पुष्प.

नरेंद्र शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सर्वात आधी वेणी माधव अधिकारी यांच्याकडे जाऊ लागला आणि दुसरे गुरु होते उस्ताद अहमद खां. दोघांकडेही काही दिवस शिक्षण घेतले. हिन्दी, उर्दू आणि पर्शियन भाषेतली अनेक भक्तीगीतं शिकला. या बरोबरच शास्त्र पठण, सुरू होते, चीजांचा संग्रह व सरगम तयार करणे हे शिक्षण सुद्धा एकीकडे चालू होते.

गायना बरोबर नरेंद्र वादन पण शिकत होता. यातले वादन गुरु त्याचे सख्खे चुलत भाऊ अमृतलाल उर्फ हाबू दत्त होते. त्यांचे कलकत्त्यात संगीत विद्यालय होते. या विद्यालयात जागतिक किर्तीचे उस्ताद अल्लाउद्दीन खांसाहेब यांनीही सुरूवातीला सतार व सरोद वादनाचे शिक्षण अमृतलाल यांचे कडून घेतले होते असा उल्लेख आहे. यांच्याकडे नरेंद्राने सतार, पखावज आणि तबला वादनाचे धडे घेतले. गायन आणि तबला वादनात त्याने चांगले कसब कमावले होते. अगाध संपदा मिळवली होती. कुटुंबात आणि परिचयात, मित्रांमध्ये एव्हाना चांगली माहिती झाली होती की, नरेंद्र खूप छान गातो.

१८८१ मध्ये जेंव्हा नरेंद्र आणि श्री रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाल्याची घटना अशी, नरेंद्रच्या शेजारच्या गल्लीत, शिमला स्ट्रीटवर सुरेन्द्र बाबू राहत होते. त्यांनी एक दिवस अचानक तातडीने नरेंद्रला घरी बोलावलं. त्यांच्या कडे परमहंस आले होते. त्यांना ठाकुर म्हणत असत. ठाकूरांना गायन अत्यंत प्रिय होते. त्यांना एक दोन गीतं तरी नरेंद्र ने  ऐकवावीत, यासाठी नरेंद्रला बोलावले होते. तेंव्हा नरेंद्रने मल्हार रागातलं एकतालातलं , अयोध्यानाथ पाकडाशी यांची रचना ‘मन चलो नीज निकेतने…’ आणि मुलतानी रागातलं, एकतालातलं, बेचरम चट्टोपाध्याय यांची रचना, ‘जाबे की हे दिन आमार बिफले चालीये…’ ही दोन गीतं त्याने ऐकवली. पुढे प्रत्येक भेटीत श्री रामकृष्ण नरेंद्रला गायचा आग्रह करत असत. तो गाणी, भजन, कीर्तन त्यांना ऐकवीत असे.

तानपुरा सुरांत लावल्याशिवाय  नरेंद्र कधीही गाणं सुरू करत नसे. मनाचे समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो तारा जुळवित असे. कधी कधी त्यात खूप वेळही जात असे. बाकीचे अस्वस्थ होऊन जात. एकदा तर अशा वेळी परमहंस इतके ऊतावीळ झाले की, ते दर दोन मिनिटांनी नरेंद्रला गायन सुरू करण्याचा आग्रह करु लागले.तानपुरा लागेपर्यंत नरेंद्र कोणाचेच ऐकत नसे. अगदी गुरूंचे सुद्धा. एकदा तानपुरा लगेच न मनासारखं तेंव्हा नातरेन्द्र हताश होऊन, ढीम्म बसून होता. गायन ऐकण्यास व्याकुळ झालेले परमहंस शेवटी, शिष्यांना म्हणाले. “उठा आता, आजचा दिवस तंबोरा जुळणीचा आहे. गाणं उद्या होईल”. असे इतके ते नरेंद्रला ऐकण्यासाठी आतुर झालेले असत.

नरेंद्रचा आणखी एक गुण ,म्हणजे  काव्य रचना करणे. बंगाली, संस्कृत आणि इंग्रजीत त्यांनी भावपूर्ण कविता रचल्या आहेत. ‘विरवाणी’  या पुस्तिकेत त्या संग्रहीत आहेत. त्याचे अनेक भाषांमधून भाषांतर पण झाले आहे. याशिवाय त्यांनी सहा बंगाली गीतं पण रचली. त्याला चाली लावल्या आहेत. ध्रुपद गातांना ते स्वताच पखावज वाजवित.  कवी आणि संगीतकार असून सुद्धा पुढच्या कार्यबाहुल्यात वेळे अभावी संगीताकडे त्यांचे दुर्लक्ष झालेले दिसते.

तरी पण गायन वादनातले आणि संगीत शास्त्रातले ते कसे मर्मज्ञ अधिकारी होते हे त्यांच्या ‘संगीत कल्पतरू’ या शास्त्रीय ग्रंथावरून दिसते. १८८७ मध्ये चंडीचरण बसक यांनी हे पुस्तक बंगालीत  प्रकाशीत केलं आहे. हे जवळ जवळ संपूर्ण नरेंन्द्रने लिहिले आहे काही भाग चंडीचरण यांनी लिहून पूर्ण केला आहे. नव्वद पानांचे नरेंद्रचे प्रास्ताविक त्याला आहे. ही तेवीसाव्या वर्षी लिहिलेली, सर्वांनी चकित व्हावी अशी प्रस्तावना आहे. स्वता आर्थिक दृष्ट्या अडचणीत असताना गरीब प्रकाशकाला काहीतरी आर्थिक सहाय्य व्हावे या हेतूने हे पुस्तक लिहिल्याचे सांगितले जाते.

या पुस्तकात , भारतीय परंपरेतील मौखिक संगीत आणि वाद्य संगीत यांच्या मागील असलेला शास्त्रीय दृष्टीकोन व त्याची विविध अंगे यात स्पष्ट केली आहेत. संगीतातील सिद्धांताचे विवेचन आणि गायनाच्या मैफिलीतील सौंदर्याचा अविष्कार याचे दर्शन यात होते. तसेच विविध भारतीय भाषातील, प्राचीन, आधुनिक आणि पाश्चात्य संगीत, वाद्य, कवी यांची माहिती आहे. एक हजार भक्तिपर आणि स्फूर्ति गीतांचा संग्रह यात आहे.

संगीताचार्य रामकृष्णबुवा वझे यांनी स्वामी विवेकानंदांकडून काही दिवस गायकीचे धडे घेतले होते. परिव्राजक म्हणून नेपाळ इथे गेले असताना स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण बुवा वझे यांची भेट झाली.त्यांना पंधरा दिवसांचा स्वामीजींचा सहवास लाभला होता. वझे बुवा तेंव्हा नेपाळच्या दरबारात राजदरबारी होते. तिथे त्यांच्याकडून काही चीजा बुवा शिकले होते.

एकदा स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या अमेरिकन युवतीला लिहीलेल्या पत्रात,ते म्हणतात,  “संगीत ही एक सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ज्यांना समजू शकते त्यांच्या दृष्टीने ईश्वराची पूजा करण्याचा तो सर्वोत्कृष्ट प्रकार आहे”.                                                                                                                                                                                                  

नरेंन्द्रचे संगीतावरचे प्रेम आणि त्यावर असलेलं प्रभुत्व पाहून, ‘जर श्रीरामकृष्णांची भेट झाली नसती तर नरेंद्र एक उत्कृष्ठ गायक म्हणून कीर्तीमंत झाला असता’ असे सर्वांचे मत होते.

© डॉ.नयना कासखेडीकर 

 vichar-vishva.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मी करवली उमेची..! ☆ सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) ☆

?विविधा ?

🍃 मी करवली उमेची..! 🍃 सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

`गुढीपाडव्याची म्हणजे नववर्षाच्या प्रथम दिनाची तयारी करत असतांनाच नेहमीच माझ्या मनात वाजंत्री वाजू लागतात. कशाची म्हणाल तर, माझ्या बहिणीच्यालग्नाची.. . उमेची.. . श्रीपार्वतीदेवीच्या लग्नाची.. ! कारण पण मी करवली आहे तिची.

साताऱ्या जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर हे माझं माहेरचं मूळ गांव. शिव पार्वती हे माझ्या माहेरचे कुलदैवत. उंच डोंगरावर, भक्कम, दगडांच, हेमाडपंथी, सुरेख गोपुरे,उंच शिखर, कळस,असं शिल्पाकृतींनी नटलेलं महादेवाचं मंदिर हे वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना आहे. गाभा-यात शिवपार्वतीच्या दोन शाळुंका (पिंडी)आहेत. सभामंडपातील खांब व मूर्ती सुरेख आहेत. डोंगरउतारावरअमृतेश्वर,मंदिरआहे. ,आजूबाजूला उतारावरच गाव वसलं आहे.

माझं माहेरचं आडनाव जिराईतखाने. पार्वती कडून मानकरी. तेथील बडवे पुजारी हे शंकराकडून मानकरी जंगम म्हणजे शैव.. हेही  देवस्थानच्या मानकऱ्यांपैकी एक. चैत्र शुद्ध पंचमीला शिवपार्वती ला लग्नाच्या हळदी लागतात याच रात्री वाड्यावर ताशा वाजंत्री शिंग फुंकत देवस्थानचे सेवेकरी भालदार चोपदार गावातील प्रतिष्ठित हळदीच मानाच बोलावं पण करण्यासाठी आमच्या वाड्यावर येत. मग पुरुष मंडळी सर्वांसह देवळाकडे निघत. हे सर्व अनुभवताना आनंद भक्तिनं मनं भरून येतात.  लहानपणी मी आमच्या दादांना (वडिलांना) सोवळं नेसून असं मानानं जाताना, त्यांच्या चेहऱ्यावर भक्ती मिश्रित तेज पाहिलं आहे. हळद लावण्याचा पहिला मान आमचा नंतर मानाप्रमाणे सर्वजण व भक्तगण हळद लावतात. सगळीकडे `हर हर महादेव ʼचा गजर होत असतो. ही वेळ रात्री बाराची. भक्तगण नुसते पळत ही वेळ गाठतात यानंतर रोज  धार्मिक विधी असतात. मुख्य मंदिर ते अमृतेश्वर मंदिर यांच्या कळसाला हात मागाचा कापडी शेला दोन टोकांनी दोन बाजूंनी बांधतात. त्याला ध्वज असे म्हणतात. ध्वज विणणारा एक मानकरी आहे  रात्रीच्या वेळी ध्वज खाली न टेकवता भक्तीभावाने कुशलतेने करतात. चैत्र शुद्ध अष्टमीला रात्री बारा वाजता शिवपार्वती चे लग्न लागतं. मुलीचे बाजू असूनही आमच्या घराण्याला मान आहे. सारीपाटात हरल्यावर शंकर रुसून या डोंगरावर आले तेव्हा भिल्लिणीच्या रुपात आलेल्या पार्वतीवर, शंकरांनी मोहित होऊन त्यांनी तिला लग्नाची मागणी घातली पार्वतीने बरेच आढेवेढे घेतले अशी आख्ययिका आहे. यामुळे कदाचित तिची बाजू मानाची असावी. आम्हाला तो मान मिळाला नाहीतर वधू पक्षाला एवढा कुठला हो मान?

नवमीला भंडारा असतो त्यावेळी पंक्तीत उदक सोडण्याचा मान असतो. दशमीला कवडी घराण्याचा पुरुष घोड्यावरुन तळ्यापासून सर्व दगडी ,पायर्‍यांना कमानी ना पार करून देवदर्शनाला जातो त्यालाही भालदार चोपदारांचा मानअसतो. एकादशीला सासवडहूनʼ तेल्या भुत्याʼ आडनावाच्या भक्तांची,कावड येते. प्रचंड मोठी जडशीळ कावड आणि त्याला मोठी भगवी निशाण आणि पाण्यानं भरलेलं तांब्यांचे मोठे रांजण भक्तीभावाने चिंब होऊन वाटेत कुठेही न टेकवता अखंड चालत हे भक्त मुंगी घाटातून वर मंदिरात येतात खडकाळ डोंगराचा उंच,  खडा कडाच,भक्तीची परीक्षा घेतो असं वाटतं. वाटेत, सावलीला झाड नाही. भर उन्हाचा चटका, अशा स्थितीत खांद्यावर कावड घेऊन येणं केवळ अवघडच. तोंडानं अखंडʼ हर हर महादेव `ही गर्जना ,धावाही अन् असह्य झालं कि,चक्क`  महाद्या`अशा आपुलकिच्या-हक्काच्या आरोळ्याही. !भक्तांची सगळी जत्रा दिवसभर उन्हातान्हात त्या डोंगर माथ्यावर जमलेली असते सायंकाळी महादेवावर कावडीतल्या,पाण्याचा अभिषेक होतो.

लाखांच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी धावतात शिवपार्वतीच्या लग्नाच्या वेळी पिंडीवर चांदीचे सुरेख मुखवटे चढवून मुंडावळ्या बांधतात. बाहेरच्या पटांगणात बाजूला होम हवन होतं. पालखी फिरवतात सगळीकडे आनंदाचा ,भक्तीचा जल्लोष आणि `हर हर महादेव ʼची देवाला हाक. ! हा आनंद सोहळा मी लग्नानंतर एकदाच अनुभवला. त्याला आता साठ वर्ष पूर्ण झाली. इतर जत्रा आणि प्रमाणे इथंही दुकान ,सिनेमा इत्यादींची रेलचेल असते. पण आम्हाला पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या विवाह सोहळ्याचं अप्रूप! माझे आजोबा व नंतर आमचे वडील दादा त्यावेळी आवर्जून जात असत. पण सेवानिवृत्तीनंतर व वयोमानाने त्यांना नंतर जमत नसे आता तेथील नातेवाईक यात सहभागी होतात. कधी भाऊही जातात. शिंगणापूर प्रमाणेच माहेर घरी,घाणा भरणे,हळद दळणे,फराळाचे लाडू,इ. पदार्थ, रुखवताचे, डाळं,-शेंगादाणे-चुरमु-याचे लाडू,देवाला हळद लावणे,लग्न असा सोहळा होत असे. भाऊही करतात. म्हणूनच म्हटलं.. “मी करवली आहे, उमेची.. !

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares