सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ वळीव… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं!

लहानपण डोळ्यासमोर आले,परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे.ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणात तर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या,डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती.सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू!आंबे बाजारात सुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे,फणस,काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे.घामाच्या धारा वहात असायच्या,पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा.

बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले.देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूप असे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे.दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे! हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे.वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई.झाडांवर पालवी फुटलेली दिसे.कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे  पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे!अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत,बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे.जोराचा वारा सुटला की पाखरे लगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई!तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे.डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते.पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग!असा ओथंबून येतो की,त्याची होणारी बरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की,ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरी कधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग?अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे!काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटून येते आणि काळे बनतात.योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments