मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ कलियुगातील राम सीता… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

आज करंजाड येथून जात असताना रस्त्याच्या  कडेनं एक म्हातारं जोडपं जाताना दिसलं. माझी नेहमीची सवय असल्यामुळं, मी त्या भिकार्‍यासारख्या दिसणाऱ्या जोडप्याला, दुपार असल्यामुळं सहजच जेवणाचं विचारलं, तर ते ‘नको’ म्हणाले. मग मी त्यांना 100 रुपये देऊ केले, तर ते सुद्धा ‘नको’ म्हणाले. मग पुढचा प्रश्न विचारला की तुम्ही असे का हिंडताय ? मग उलगडत गेला  त्यांचा जीवनपट  : 

ते 6000 कि.मी.चा प्रवास करून आता द्वारकेला स्वतःच्या घरी चालले होते. त्यांनी सांगितले, ” माझे दोन्ही डोळे 1 वर्षांपूर्वी गेले होते आणि डॉक्टरनी सांगितले की ऑपरेशन करून उपयोग नाही ; मग माझ्या आईने डॉक्टरला भेटून ऑपरेशन करायला भाग पाडलं व तिने द्वारकेच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन देवाजवळ नवस केला की, डोळे परत आले तर माझा मुलगा पदयात्रा करत बालाजी व पंढरपूरला जाऊन परत द्वारकेला पायी येईल. म्हणून मी आईच्या शब्दासाठी पदयात्रा करतोय.” मग  मी त्यांच्या बायको विषयी विचारलं तर ” ती पण मला एकटं सोडायला तयार नव्हती ;  रस्त्याने मी तुम्हाला जेवण तयार करुन द्यायला येते   म्हणून निघाली “.  

मग मी ते 25%हिन्दी, 75%इंग्रजी बोलत असल्यामुळे शिक्षणाबद्दल विचारलं तर ऐकून माझी बुद्धी सुन्न झाली. त्यांनी लंडन येथे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये 7 वर्षे खगोलशास्त्र यावर पी एच डी केलीय, तर त्यांच्या बायकोने मनोविकार  शास्त्र या विषयावर लंडन येथेच पी एच डी केलीय. एवढं शिकून सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नव्हता.   नाहीतर आपल्याकडे 10वी नापासवाला छाती ताणून   हिंडतो. एवढंच नाहीतर  सी. रंगराजन (रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर) यांच्याबरोबर ,तसेच अंतराळवीर कल्पना चावला  ह्यांच्याबरोबर काम  व मैत्रीचे संबंध होते.   तसेच त्यांना मिळणारे मासिक पेन्शन ते एका अंधांच्या ट्रस्टला  देऊन टाकतात.त्यांना दोन मुलगे व एक मुलगी असून ते लंडन येथे उच्च पदावर कार्यरत आहेत.

दोघे पती पत्नी आॅक्सफोर्ड युनिव्हर्सिटी व डाॅनबाॅस्कोचे गोल्ड मेडॅलिस्ट आहेत.असे असूनही ते गुजरात येथील द्वारका येथे कुठलीही फी न घेता गरजू विद्यार्थ्यांसाठी केमिस्टी आणि मॅथेमॅटीक्सचे क्लास घेतात.. सध्या ते सोशल मिडियापासून लांब राहतात.  रोडच्या कडेनं जाणारं प्रत्येक  जोडपं भिकारी असतंच असं काही नाही. एखादी व्यक्ती आपल्या आईच्या शब्दासाठी प्रभू राम व्हायला तयार होते आणि आपल्या पतीसोबत कोणी पत्नी सीता सुद्धा होते; म्हणूनच  भेटलेली अशी माणसे आपण कलीयुगातील राम-सीताच समजायला पाहिजेत.

आम्ही जवळ जवळ 1 तास त्यांच्याशी गप्पा मारल्या. रस्त्यावर उभे राहूनच. त्यांचे प्रगल्भ विचार ऐकून मन सुन्न झाले. अहंकार गळून गेला आणि वाटलं, की आपण  उगाचच खोट्या फुशारकीवर जगतो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातील सहजपणा बघून असं वाटलं की आपण या जगात शून्य आहोत. हा  पायी प्रवास बघून थक्क झालो. प्रवासाला निघून तीन महिने झाले आणि अजून घरी पोचायला एक महिना लागेल.

त्यांचं नांव : डाॅ. देव उपाध्याय व डाॅ.सरोज उपाध्याय.

लेखका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

कवी मंगेश पाडगावकरांच्या घरात चोरी

पाडगावकर त्या चोराचेच कौतुक करत होते ही हकीगत सांगताना.

इतक्या भर पावसात तो पाईपवरून चढला कसा असेल? दुसऱ्या मजल्यावरच्या आमच्या खोलीत शिरला कसा असेल? खरंच काही कल्पना करवत नाही !

तरी एकाने थट्टेने विचारले ,”कवितांचे हस्तलिखित त्याने नेले नाही ना?”

तेव्हा पाडगावकर म्हणाले, ” माझे दुःख त्यापेक्षा जास्त आहे. मी पोलिस स्टेशनवर गेलो .तक्रार केली. काही दागिने, वस्तू गेल्या होत्या, त्याची माहिती दिली व नंतर उत्सुकतेने त्या पोलिस अधिकाऱ्यास म्हटले,’मला साहित्य अकादमीने दिलेले एक मेडल त्यात होते, तेही चोराने नेले आहे’.

पोलिस अधिकाऱ्याने मान वर करून विचारले ,’ते कशाचे होते?’ ”

पाडगावकर म्हणाले ,”साधेच असते.काही खास मेटल त्यासाठी वापरले जाते असे नाही .”

“मग चिंता कशाला करता? घराजवळच शोधा.चोराने ते निश्चितच रस्त्यावर टाकले असेल”.

पाडगावकर घरी आले.आपल्या घराच्या जवळच्या रस्त्यावर पाहिलं मग गटारात पाहिलं .

साहित्य अकादमीने ‘सलाम’ कवितासंग्रहाला दिलेले ते पदक चोराने खरोखरच गटारात टाकले होते.त्याच्या लेखी त्या पदकाची किंमत शून्य होती.पाडगावकरांनी ते आनंदाने उचलले.

साहित्य अकादमीचे पदक फक्त मिळाले, बाकीचे सर्व गेले, कारण ते मौल्यवान होते!!!!

पाडगावकर म्हणाले, माझा चोराला सलाम

—तेच ते.

लेखक : अज्ञात.

संग्राहिका :सौ. गौरी गाडेकर.

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ तुळस… लेखक : डाॅ. जयंत गुजराती ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ☆

? वाचताना वेचलेले ?

⭐ तुळस… लेखक : डाॅ. जयंत गुजराती ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

“मी वेडी नाहीय्ये हो डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगल्या घरची तरीही मला वेडी ठरवली गेलीय. विनाकारण डांबून ठेवलेय या वेड्यांच्या इस्पितळात. मला गोळ्या इंजेक्शनं याची काहीच गरज नाहीये. उगाचच माझे हाल करताहेत सगळे. नर्स, वॉर्डबॉय, इथले डॉक्टरही. सांगून सांगून थकले मी. परोपरीने मी विनवण्या केल्या, हातापाया पडले पण पालथ्या घड्यावर पाणी. म्हातारी झाले म्हणून काय झाले? मी हिंडू फिरू शकते. चांगलं बोलते तशी वागतेही. काय न्यून आहे माझ्यात की मला या छोट्याशा खोलीत जखडून ठेवलंय? सुरूवातीस सगळे सांगतील तसं केलं,तरीही छळ मांडला गेलाच माझा.”

मी फाईलवरनं हात फिरवत होतो. ऐंशीला टेकलेल्या बाईचं बोलणं मी शांतपणे ऐकत होतो. तिच्या बोलण्यात ओघ होता. रडकथाच. पण ती रडत नव्हती. हतबलता डोळ्यांतून पाझरत असलेली. व्हेरी डेंजरस, व्हायोलंट, पझेसिव्ह, फाईलमधले शेरे व तिचं म्हणणं मेळ खात नव्हते. काउन्सेलर म्हणून नेमणूक झाल्यापासून इस्पितळातील एकूणएक पेशंटसच्या फाईली बघून झाल्या होत्या. नेहेमीच्या डॉक्टरांच्या उपचारांमधे दखल न घेता प्रत्येक केसमधे काऊन्सेलिंगची गरज आहे का हे पाहून त्यानुसार पुढचे मानसोपचार  ठरवण्याची मुभा मात्र होती. तसं पाहिलं, तर वेड्यांच्या इस्पितळातील प्रत्येक केस ही आव्हानात्मक असते. तरीही बऱ्याचशा केसेस बरे होण्यापलीकडे गेलेल्या असतात. मग अशा केसेसना वगळून ज्यात काही करता येऊ शकेल अशा केसेस हाताळायच्या हेही ठरलेलं. मनोविकारतज्ञ व्हायचं हे एमबीबीएस झाल्यावर नक्की केलेलं. मनोविकार म्हणजे तमाने व्यापलेलं वेगळंच विश्व. प्रत्येक रुग्णाची कथा व्यथा निराळीच. मनोविकारांचे एकेक पदर उलगडले की माणसाच्या मनाची काळी, विकृत, दळभद्री, अनुचित, नैराश्याने ग्रासलेली, क्वचित शिसारी आणणारी,शेंडाबुडखा नसलेलीही बाजू समोर येत राहते.  हे सारं अभ्यासताना माणसाच्या मनाचे रूप,विद्रूप पाहून थक्क व्हायला होतं. साऱ्या केसेस हाताबाहेरच्या नसतात. अंधुकशी आशा कुठेतरी असते की संपेल हे नरकातलं जगणं. अशा केसेस निवडून पुढील उपचार करायचे हा प्रोटोकॉल. अशीच ही केस, फाईलवर नाव ठळकपणे लिहीलेलं होतं तरीही विचारून घेतलं,  “नाव काय आपलं? ” बऱ्याच वेळ त्या बोलल्याच नाही. शून्यमनस्कपणे खिडकीतून बाहेर बघत राहिल्या. खोलीतल्या झरोक्यातून उन्हाच्या तिरिपीमुळे त्यांचा सुरकुत्यांनी वेढलेला उदास चेहेरा भाजून निघत असलेला. तरीही मघा ज्या अजिजीनं म्हणणं मांडत होत्या, त्या आता थिजल्यासारख्या. मी उगाच फाईलशी चाळा करत बसलो. मात्र त्यांच्यावरची नजर ढळू दिली नाही. भरभरून बोलणं व मधूनच एकदम गप्प होऊन जाणं, हे मनाने आजारी असलेल्यांमध्ये तसं नेहेमीचंच. अशावेळेस वाट बघणं हे ओघानं आलंच. तीही बोलेना, मीही बोललो नाही. इतर रुग्णांनाही भेटायचं होतं. मी हलकेच उठलो. खोलीतून बाहेर पडत असताना दाराजवळ पोहोचताच मागून आवाज आला, “ मी वृंदा गोखले….” तरीही मी  “उद्या येतो”, म्हणत खोली सोडलीच.

गुंतागुंतीच्या अनेक केसेस सोडवताना एकेक विलक्षण कथा ऐकावयास, पाहावयास मिळतात. त्यातही काही तर चटका लावणाऱ्याच. त्यापैकीच ही एक असावी. अगदी घरी जाईपर्यंत व घरी गेल्यावरही वृंदा गोखले यांचा पीडेने करपलेला चेहेराच सारखा समोर येत असलेला. फाईलमधून फारसं काही हाती लागलं नव्हतं. अडीच तीन वर्षांपूर्वी त्या इस्पितळात आणल्या गेलेल्या.  कुणी आणून सोडलं याचा पत्ता नव्हता. त्यावेळचे डॉक्टरही बदलून गेलेले. अधूनमधून त्यांना वेडाचे झटके येतात. त्यावेळेस  सतत रडणं, किंचाळणं, कधीकधी दार खिडक्या आपटणं. हातात असेल ते फेकून मारणं व मग जोर ओसरला की उदासवाणे होऊन बसून राहणं काही खाता न पिता दिवसच्या दिवस. त्यातही ‘ मी वेडी नाही,’ हा हेका कायम. सीनिअर सिस्टर व सीनिअर वॉर्डबॉय यांनी ही वेगळी केस असल्याचे इस्पितळात ड्युटीवर रूजु झालो होतो, त्यादिवशीच सांगितलं होतं. दीड महिना झाला रुजू होऊन. या दिवसांत मोजून सहा केसेसच निवडल्या होत्या. त्यात ही गोखलेंची. पडलेल्या चेहेऱ्याने वावरणाऱ्या.

दुसऱ्या दिवशी  गोखले काकू जणू वाटच पहात असल्यासारख्या. अगोदर पहिल्या पाच केसेस पाहूनच काकूंना सर्वात शेवटी  भेटायचं हे ठरवलं होतं. जेणेकरून काकूंना जास्त वेळ देता यावा. नेहमी विमनस्क राहणाऱ्या गोखले काकूंच्या चेहेऱ्यावर आज ताजेपणा उमटलेला.  इस्पितळात वावरताना रोज नजरानजर व्हायची. डॉक्टर रुग्ण एवढीच ओळख एकमेकांची. गोळ्या औषधं घेतली का नाही, असे जुजबी बोलणं. कालपासून प्रत्येक केस वेगळी हाताळायची ठरवल्यावर प्रथमच बोलणं झालं होतं जवळून. आज खोलीत गेल्या गेल्या हात पकडून खाटेवर बसवून घेतलं. “ मी वृंदा गोखले, बोलू का? ” मी मानेने होकार भरताच त्या भडभडून बोलायला लागल्या. “ तीन वर्षं झाली त्या गोष्टीला. म्हणजे मला वेडं ठरवलं गेलं त्या गोष्टीला!!  सगळं लख्ख आठवतंय. का नाही आठवणार? सगळं घडलंच होतं विपरीत. कधीही विसरता न येण्याजोगं. साठ वर्षांचा सहवास सोडून हे गेले. दीर्घ आजाराने जर्जर होऊन गेले. सोन्यासारखे दोन मुलगे.ते परदेशात युएसला. मुलगी कॅनेडात. तिघांचाही सुखी संसार. त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडून हे गेले. सर्व मुलामुलींनी आपल्या बरोबर रहावं ही शेवटपर्यंतची त्यांची इच्छा. मुलं हुशार निघाली. मोठमोठाली पॅकेज घेऊन पंख पसरून उडून गेलीत. ह्यांनी तर शनिवारपेठेतली बखळवजा राहती जागा तशीच ठेऊन कोथरूडला दोन फ्लॅटही घेतले शेजारी शेजारी. अगोदर मुलीचं लग्न लावून दिलं श्रीमंत सासर पाहून, मग सुना आणल्या. मुलं, मुलगी, सुना सगळे हुशारच. सगळे कमवते.  काहीच ददात नाही. ” गोखले काकूंनी आवंढा गिळला. मधेच थबकल्यासारख्या, काहीच बोलल्या नाहीत बराच वेळ. मी पाण्याचा ग्लास दिल्यावर तो घटाघटा पिऊन टाकला.

“ह्यांच्या आजारपणातच दीड वर्षं  गेलं. इथे मी एकटीच. सर्व सेवा केली. पैसा अडका काही कमी पडू दिलं नाही. मुलांना, मुलीलाही परोपरीने विनवण्या केल्या की या भेटायला, बाबांना भेटायचंय. कुणीही फिरकलं नाही दीड वर्षात. मी माझ्यापरीने कुठेही कमी पडले नाही. शेवटपर्यंत आशा होती की हे हाताशी येतील, बरे होतील. आणखी काही दिवस असतील सोबत. पूर्वीही सुखासमाधानाने जगलो होतो. परत तसेच जगू!! मी तर साठ वर्षे अधिराज्यच गाजवलं होतं आयुष्यात. किती दागिने घातले होते, किती पैठण्या नेसल्या होत्या, किती मिरवून घेतलं होतं, मोजदादच नाही. वाटलं होतं असतील सोबत काही दिवस. होतील बरे, पण तसं व्हायचं नव्हतं.”

बराच वेळ पुन्हा त्या गप्पच. मग एकदम कडवटपणे म्हणाल्या, “ ते गेल्यावर सगळे आले. क्रियाकर्म पार पाडण्याचीही वाट काही पाहिली नाही पोटच्या गोळ्यांनी. शनवारातली बखळवजा जागा, कोथरूडमधले दोन फ्लॅट्स, शिवाय गावाकडची जमीन सगळ्यांचा सौदा करून टाकला. मुंबईतील कोणीतरी मोठी असामी होती त्याच्याबरोबर, बॅंकेतील लॉकरमधील कॅश व दागिनेही आपापसात वाटून घेतले. सहा महिन्यांपासून मुलांनी तयारी करून ठेवली होती सौद्यांची म्हणे!! नंतर कळलं मला ते! मी या सगळ्याला विरोध करेन हे गृहीत धरून मला वेडी ठरवण्याचेही ठरवून टाकलं होतं. तसं सर्टिफिकेटही मिळवलं कायदेशीर व मला वृद्धाश्रमात न धाडता पोहोचवलं या इस्पितळात वेडी म्हणून. एक लॉकर यांनी कुणालाही न सांगता वेगळं ठेवलं होतं तेवढं वाचलं गिधाडांपासून. तरीही मुलगी विचारत होती, तुला माहेराहून मिळालेली मोत्यांची नथ यात दिसत नाही ती!! मग मात्र मी वेडच पांघरलं. आतून तर कोसळूनच पडले. जे आपले आहेत ते आपले होऊ शकत नाही तर इतरांबद्दल काय बोलावं. दहा दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं. पंधराव्या दिवशी सगळे पांगलेसुद्धा आणि नकोशा गोष्टीला उकिरड्यावर फेकून देतात तशी मी भिरकावली गेली इथे. ” कळवळून बोलत असलेल्या गोखले काकू खिन्नपणे शांत झाल्या निदान बाहेरून तरी.

माझी फाईलवरची पकड काहीशी सैल झाली. मी फाईलमधील पानं पुन्हा भरभर चाळायला लागलो. एके ठिकाणी थांबलो.  त्या पानावर लिहीलं होतं, सुनेच्या कपाळावर साणसी फेकून मारून भोक पाडलं होतं. मी नेमकं त्यावर बोट ठेऊन गोखलेकाकूंसमोर धरलं. तर त्या शांतपणे म्हणाल्या, “ सगळं खोटं आहे. मुलाला बोचकारल्याचं, भला मोठा आरसा फोडल्याचं, देवघरातले देवही नदीत फेकून दिल्याचंही त्यात लिहीलं असेल!!”

मी म्हटलं, “बरोबर आहे, पण तुम्ही हे सगळं कुणाला सांगितलं का नाही?” त्यावर त्या उदासपणे म्हणाल्या, “ इतकी वर्षं माझ्याशी कुणी जिव्हाळ्याने बोललंच नाही रे!! ” यावर काय बोलावं सुचेचना!! त्यांच्या शब्दाशब्दांतून अगतिकता पाझरत होती. मनाला सारखं मारावं लागलं असेल क्षणोक्षणी, अधिराज्य गाजवणारीला  पदोपदी अवहेलना सोसावी लागली असेल. किती भोगलं असेल वृंदाकाकूंनी. त्यापेक्षा वेड लागलेलं परवडलं!!

गोखले काकूंशी मग रोजच भेटणं व्हायला लागलं तसे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पदर उलगडत गेले. काय नव्हतं वृंदा गोखलेंकडे? अगदी पाळण्यातल्या मुलांसाठी बडबड गीते, मोठ्या मुलांसाठी गोष्टी, व्रतवैकल्ये करणाऱ्यांसाठी कहाण्या, कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींसाठी कथा, मोठ्यांसाठी अनुभवाचे बोल. गोखलेकाकू एकदा बोलायला लागल्या की ऐकत राहावंसं वाटत राहतं आणि दुर्दैव म्हणजे आतापर्यंत त्यांच्याशी बोलायला कुणी नव्हतं.  “मला झोपेच्या गोळ्या नकोत रे!!  मी तासनतास झोपून राहते. सारखी मरगळ मुरते मग अंगात!! मला जगायचंय अजून! मला माणसांत रहायचंय.” त्यांच्या काकूळतीने मलाही गलबलून यायचं. त्यांचा वनवास संपला पाहिजे असं मनापासून वाटायला लागलं. हळुहळू त्यांच्या गोळ्यांचा डोस टेपर करत आणला.

बरेच दिवस गेले. गोखले काकू कैदेत असल्याची जाणीव मनाला कोरून खात होती. त्यांच्यासाठी आणखी काय करता येईल यावर विचार करत असताना एकदम सुचलं. इस्पितळातून त्यांना घेऊन मित्राचा एक छोटेखानी फोटो स्टुडिओ होता तेथे गेलो व त्यांचा एक विडीओ बनवला व युट्युबवर अपलोड केला. अगदी त्यांचं पर्सनल चॅनलच बनवून टाकलं. मग रोज एक विडीओ द्यायला लागलो. त्यांची बडबड गीते, गाणी,अनुभवाचे बोल, आजीबाईचा बटवा, गृहिणींसाठी नवनवीन रेसिपी,  त्यांच्याशी मनसोक्त गप्पा असं साधं सुटसुटीत स्वरूप ठेवलं. चॅनलचं नाव ठेवलं,  तुळस. आठवडाभरातच पाच हजार फॉलोअर्स मिळाले चॅनलला. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप.. जगभरातील मराठी बांधवांनी भरघोस प्रतिसाद दिला. आपापली मते, आपापल्या समस्या, आपले विचारही तुळस चॅनलवर यायला लागले. सुरूवातीला अवघडलेल्या वाटत असणाऱ्या गोखले काकू लवकरच रूळावल्या. काही दिवसात तर मित्राने तुळस पेड चेनल करून टाकलं. काकूंकडे तेवढीच गंगाजळी. चॅनल पेड केलं  तरीही काकू दिवसेंदिवस लोकप्रिय होत गेल्या. ही तुळस आपल्याही अंगणात असावी अशी ओढ प्रत्येकाच्या मनात.

मी आपला बाजूस होऊन डवरणाऱ्या तुळशीला विस्मयाने पाहत राहिलो. थोड्याश्या पाण्यानेही कोमेजलेली तुळस पुन्हा टवटवीत होते हा अनुभव गाठीशी. तसं तर ओलावा थोडासाच तर हवा असतो!!

लेखक : डॉ. जयंत गुजराती नासिक

संग्राहिका : सौ. प्रज्ञा गाडेकर, मुंबई.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

माझे वडील रोज पूजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधी कधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुदा एकच असते. मला पण छान वाटतं, असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते. त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

‘अनायासेन मरणं’: मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा, तर अनायासेन – सहज.

‘विनादैन्येन जीवनं’ : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

‘देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर’:  मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा, तुझे’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

हेचि दान देगा देवा

 तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना!रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कार वर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते, दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड असते,तोच विषय आमचापण होता. हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, आता काय ग आपली मुलं मोठी झाली, संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली. आता ती घडली, आता परिवर्तन होणार नाही. मला तेव्हा सांगावंसं वाटलं तिला, संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीसारखं  नाही ग, आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही. ती तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते.

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे, पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तोपर्यंत तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील. आज कदाचित त्याच महत्त्व तिला कळणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडतांना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार मानणे’ ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.  आपल्या जीवनाची जो पर्यंत ‘जबाबदारी’ आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध’ शक्ती सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण त्याची जबाबदारी घेतो त्या क्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

‘अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्। देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।’

लेखिका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ वय होण्याचं वय… लेखिका :सुश्री सुजाता भडभडे ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

ईशा :-  “आजी काय शिवतेयस? ” 

आजी :-  “अगं! विशेष काही नाही.  नेहमीचेच आपले! उसवलेले  शिवणे.  पण बरं झालं  आलीस.  जरा सुई ओवून दे ग राणी.  “

ईशा  :- “हो  , देते.  आण.  “

आजी :-  ” ईशा! खरंतर मला असे एवढ्या- तेवढ्यासाठी तुला कामाला लावायला आवडत नाही.  पण….. काय करणार! वय झाले की परावलंबन येतेच! “

ईशा :-  “ परावलंबन म्हणजे काय ग आजी? “

आजी  :- “अगं! म्हणजे  काही कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून  राहणे.  dependence  ग! “

ईशा  :- ” हं…. आजी तू  74 वर्षांची आहेस न? मग 74  व्या वर्षी म्हणतात का? वय झालंय असं?  मी आत्ता  आठव्या वर्षी  नाही म्हणू शकत का? माझं  वय झालंय म्हणून? 🤔 “

आजी :-  ” 😃! अगं  बाळा, असं नाही.   एका वया नंतर म्हाताऱ्या माणसांना सर्व कामे  पूर्वीसारखी  जमेनाशी होतात.  तेव्हा  वय झालंय म्हणतात.  तुझे वय तर आत्ता  नवनवीन कामे , कौशल्ये  म्हणजे  skills   शिकण्याचे वय आहे.  “

ईशा  : – ” अगं पण आजी तू मोदक , पुरणपोळ्या,  गुळाच्या  पोळ्या  वगैरे  करतेस की अजूनही  पहिल्यासारख्याच.  मग? “

आजी  :-  ” अगं सोने! त्यात डोळ्यांचे काम नसते न फारसे! “

ईशा :-  ” अच्छा! मग असे म्हण  ना की तुझ्या  डोळ्यांचे वय झालेय.  जसे  आजोबांच्या  गुडघ्यांचे  वय झालेय  तसे.  बरोबर ना?  “

बडबड अक्का  बडबड करून पळून गेली.  पण आजी मात्र विचारांच्या भोवऱ्यात जणू  फिरतच राहिली.  

ईशा पटकन बोलून गेली   ‘डोळ्यांचे  वय  ‘.  नकळत किती बरोबर बोलली होती ती.  

अलिकडे 2/3 वर्षे मंदाताईंनाही असे काहीसे जाणवत होते की काही गोष्टी  अगदी  पूर्वीसारख्या  पूर्ण  आत्मविश्वासाने आपण अजूनही करतो आणि काही बाबतीत मात्र वय झालेय असे  पुन्हा पुन्हा वाटते.  मालिकांची नावे आठवत नाहीत; पण शेजारची अनू  वीण विचारायला आली की अगदी सहज आठवून सांगते.  स्मार्ट फोन वापरताना बोटे भलतीचकडे पडतात पण वाती करताना ,  मोदक करताना हीच बोटे  किती शिताफीने  भराभर  फिरतात.  

याचा अर्थ असा की आपल्या वेगवेगळ्या अवयवांचे वय वेगवेगळ्या वयात होते.   मंदाताईंना आता नादच लागला , कोणती कामे  पूर्वीसारखी  होतात व कोणती  होत नाहीत हे पहाण्याचा.  

एक दिवस त्यांनी सरळ 50 कामांची यादीच  केली.  त्यातली काही कामे  दैनंदिन तर काही कामे  कौशल्याशी निगडीत.  यादी पूर्ण झाली आणि त्यावर टिकमार्कही झाले.  

मंदाताईंना खूप आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला  कारण त्यांना त्यातली  41 कामे अजूनही जशीच्या तशी करायला जमतात  हा शोध लागला.   म्हणजे 82% कामे जमतातच की! 👍👍

अरेच्चा! मग आपण दिवसाकाठी इतक्या वेळा  ‘ वय झालेय ‘ असे का बरे म्हणतो? 🤔🤔 खरंतर आपल्या एखाद्या अवयवाने असहकार पुकारणे म्हणजे वय होणे  नव्हे.   जी कामे माझ्या आवडीची आहेत ती मी अजूनही छान करू शकते कारण ती पुन्हा पुन्हा करते  म्हणून सराव आणि आत्मविश्वास दोन्ही खूप असतो.   म्हणजेच सरावाने  आत्मविश्वास टिकवता येतो.  

याच विचारातून  मंदाताईंना एक समाधानकारक शोध लागला.  तो म्हणजे…… वय होण्याचे वय थांबवणे  हे थोडेफार का होईना, आपल्या हातात आहे.  

त्या लगेच उठल्या  , खोलीत गेल्या  आणि पेटीतून जुनी , जपून ठेवलेली  लोकर आणि सुया काढल्या.  छान एकसारखे  टाके घालू लागल्या.  त्या स्वतःवरच खूप खूश होत्या. प्रत्येक टाका जणू  सांगत होता ‘मनाचे आणि मेंदूचे वय  अजून झालेले नाही  मंदाताई. ‘ 😊

लेखिका :सुश्री सुजाता भडभडे

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ रोज थोडाथोडा मरतोय – कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी – मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा ☆ प्रस्तुति – सुश्री दीप्ती गौतम ☆

मी कधी कधी अंधाऱ्या रात्री

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

आणि खात्री करतो त्याचा श्वासोच्छवास सुरु असल्याची

कारण मला शंका आहे की . .

तो रोज थोडाथोडा मरू लागलाय

 

तारांकित हॉटेलात मी जेवणाचं बिल भरतो

मला दिसतो जवळच उभा असलेला द्वारपाल

त्याचा महिन्याचा पगार या बिलाइतका तरी असेल काय?

कॉलरवर बसलेल्या नाकतोड्यासारखा,

हा विचार मी बोटाच्या टिचकीने झटकतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी रस्त्याकडेच्या भाजीवालीकडून भाजी घेतो

तिचा मुलगा छोटू, कांदे निवडून देतो

छोटू शाळेत का जात नसेल?

फुकट घेतलेल्या कढीपत्त्या बरोबर

हा प्रश्नही मी पिशवीतल्या भाजीखाली कोंबतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

डिझायनर कपडे चढवून मी गाडीतून जात असतो

बसल्या बसल्या गुटखा खात असतो

सिग्नलवर मळक्या, फाटक्या वस्त्रातली भिकारीण दिसते

थुकण्यासाठी खाली केलेल्या काचेतून ती हात पुढे करते

खिशात चिल्लर न सापडल्याने मी गाडीची काच वर करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मी मुलींसाठी महागडी खेळणी घेऊन येत असतो

खपाटीला गेलेल्या पोटाचा अन मलूल चेहऱ्याचा

एक पोरगा रस्त्यात खेळणी विकताना दिसतो

सद्सदविवेकाच्या टोचणीपायी

एक खेळणे त्याच्याकडूनही घेतले जाते, तरीही ..

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

मोलकरणीच्या ऐवजी एक दिवस तिची शाळकरी मुलगी येते

माझ्या घरच्या कामासाठी तिने शाळा बुडविलेली असते

तिला शाळेत पाठवावं असं क्षणभर माझ्या मनात येते

मग मला उष्ट्या भांड्यांनी भरलेलं सिंक दिसतं

एकदोन दिवसाचा तर मामला आहे, मी मलाच समजावतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

रोज सकाळी एखादी ब्रेकिंग न्यूज येते

अल्पवयीन मुलीवरील बलात्काराची किंवा हत्येची

वाईट वाटते खूप, तरीही मी देवाचे आभार मानतो

कि ती अभागी अत्याचारग्रस्त,

माझी मुलगी नाहीये

आरशामध्ये स्वतःच्या नजरेला नजर द्यायलाही मी घाबरतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

जातीपातीवरून, आरक्षणावरून होणारे झगडे रोजचेच

अधूनमधून होणाऱ्या दंगलींनी मी अस्वस्थ होतो

कुठे नेऊन ठेवलाय देश माझा?

मी उद्वेगाने म्हणतो

सर्व दोष राजकारण्यांवर टाकून, हात झटकून मी मोकळा होतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

प्रदूषित हवा शहराचा गळा घोटत असताना

विकासाचा भार शहराला सोसत नसताना

मी रोज कार घेऊन ऑफिसला जातो

बस, ट्रेन, मेट्रो, कारपूल हे पर्याय असतीलही कदाचित,

एका कारने काय फरक पडतो असा विचार मी करतो

माझा अंतरात्मा तेव्हा किंचितसा मरतो

 

किट्ट काळोख्या रात्री जेव्हा मी

माझ्या अंतरात्म्याच्या नाकासमोर सूत धरतो

त्याचा श्वासोच्छवास सुरु पाहून मलाच आश्चर्य वाटतं

 

मग मी नव्याने, स्वतःच्या हाताने, नवनव्या मार्गाने

त्याला रोज थोडंथोडं मारू लागतो, पुरु लागतो

मूळ इंग्रजी कविता : It dies a little.

कवयित्री : सुश्री रश्मी  त्रिवेदी

मुक्तानुवाद :श्री सॅबी परेरा

संग्राहिका : सुश्री दीप्ती गौतम

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 31 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

४८.

  पाखरांच्या मंजुळ स्वरांनी

  प्रभातसमयीचा शांत सागर उचंबळला,

  रस्त्याकडे ची फुलं आनंदानं नाचू लागली.

  ढगाढगांच्या पोकळीमधून परमेश्वराची

  दौलत पसरू लागली.

 

 मात्र या साऱ्यांकडे दुर्लक्ष करून

आम्ही आमच्या उद्योगाला लागलो.

आनंदगीतं आम्ही गायली नाहीत की

खेळलो- बागडलो नाही.

बाजारहाट करायला आम्ही गावात गेलो नाही.

 

एकही शब्द आम्ही बोललो नाही,

हसलो नाही की वाटेवर रेंगाळलो नाही.

 

जसजसा समय जाऊ लागला तसतसा

आमच्या चालण्याचा वेग वाढत गेला.

 

सूर्य माथ्यावर आला.

बदकं सावलीत जाऊन गाऊ लागली.

दुपारच्या उन्हात गिरकी खात

पिकली पानं नाचू लागली.

केळीच्या झाडाखाली बसून

मेंढपाळांची पोरं पेंगू लागली,

स्वप्नात हरवून गेली

आणि मी जलाशयाशेजारच्या गवतावर

थकलेली गात्रं पसरली.

 

माझे सोबती उपहासानं मला हसून

ताठ मानेनं न थांबता घाईघाईनं निघून गेले.

विसाव्यासाठी ते विसावले नाहीत.

दूरच्या निळाईत ते दिसेनासे झाले.

त्यांनी किती कुरणं पार केली,

किती टेकड्या पार केल्या,

दूरचे किती मुलूख पादाक्रांत केले!

 

हे शूरवीरांनो, अनिर्बंध पथाच्या प्रवाशांनो,

तुमचा जयजयकार असो!

 

तुमची चेष्टा- मस्करी ऐकून,

त्वेषाने मला उठावेसे वाटले,

पण माझ्यात उभारी नव्हती.

 

अंधूक आनंदाच्या सावलीत

सुखी अवमानाच्या गहराईत मी लुप्त झालो.

सूर्यवलयांकित पोपटी निराशेनं

माझ्यावर पखरण घातली.

 

मी कशासाठी प्रवासास

निघालो होतो कुणास ठाऊक?

विनासायास माझं मन मात्र

छाया आणि संगीत यांना शरण गेलं.

 

आणि शेवटी, जाग आल्यावर मी डोळे उघडले, तेव्हा तू माझ्या बाजूला उभा होतास.

माझी निद्रा तुझ्या स्मितानं

काठोकाठ भरून टाकत होतास.

 

मात्र मला भिती वाटली होती. . .

तुझ्याकडे नेणारा हा प्रवास. . .

किती दीर्घ पल्ल्याचा,

कंटाळवाणा आणि कठीण असेल?

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

? वाचताना वेचलेले ?

☆ नवीन फंडा… सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ ☆ प्रस्तुती – सुश्री दीप्ती गौतम ☆

विरंगुळा म्हणून आजी आपल्या लेकाकडे राहायला आली.  आज रविवार, सगळे घरी एकत्र भेटतील या विचाराने  सुखावली.

सकाळी उठल्यावर पाहते तर तीन खोल्यात तीन माणसं बघून भांबावली. लेकाची आणि सुनेची खोली वगळून तिने नातीच्या रूमकडे पावलं टाकली. मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला पाहून, ‘ये बस’ म्हणाली. ‘नाश्त्याला काय करायचं, हे विचारायला आले होते’, असं म्हणत आजी मऊ गादीवर बसताच बेडमध्ये रुतून गेली. नातीने तिघांच्या फॅमिली व्हॉट्स अप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. स्वीगीने मागवून घेऊया, असा आईचा रिप्लाय आला. घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक पाहून आजी आश्चर्यचकित झाली. इथे हाकारे ऐकू आले नाहीत, तरी मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो, असं नात म्हणाली. गृह कलह टाळण्याचा नवीन फंडा बघून आजी इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली. आजी तिच्या सेपरेट रूममध्ये मोबाईलसह दहा दिवस सुखाने राहिली. मुलाला-सुनेला आशीर्वादाचा इमोजी आणि नातीला gpay करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली.

लेखिका :सुश्री ज्योत्स्ना गाडगीळ

संग्राहिका :सुश्री दीप्ती गौतम.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ घर खरचं कोणामुळे फुटते… ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे☆

बहुतेक वेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते. पण कोणाचेही घर एकट्या स्त्रीमुळे फुटत नाही, तर ते फक्त स्वार्थामुळे फुटत असते, आणि तो स्वार्थ कुटुंबातील स्त्री , पुरुष यापैकी कोणाच्याही मनात निर्माण होऊ शकतो . 

मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते. मग पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते.  आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्री अतिउत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येते. खरेतर हा फक्त धूर असतो, स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते. माणसाला दुरुन धूर दिसतो ,आग दिसत नाही .

स्त्रीने कितीही प्रयत्न केला, तरी  घरातील पुरूष निःस्वार्थी आणि खंबीर असेल, तर तिला घर कधीच फोडता येत नाही. 

कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला, पण दशरथ निःस्वार्थी होते. त्यांनी जीवन संपवले, पण घर फुटू दिले नाही.  

वडिलांच्या आज्ञेनुसार स्वतःची काहीच चूक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वडलांच्या वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला, पण भरतानेही त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले, कारण हे सर्व पुरुष निःस्वार्थी होते. कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही. उलट तिलाच घरात एकटे रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली.

पुरुष निःस्वार्थी असेल तर जगातील कोणत्याही स्त्रीला घर फोडता येत नाही.  पण जर पुरुष स्वार्थी बनला तर कोणत्याच स्त्रीला घर एकत्रित ठेवता येत नाही हेही तितकेच खरे आहे. 

धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला. गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता. या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत केला. पण त्यांनाच काय,  भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरीसुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही. पुरुषाच्या मनात स्वार्थ निर्माण झाला तर देवालासुध्दा घर वाचवता येत नाही.  यात स्त्रियांना दोष देऊ नका.

एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय, हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानाचा क्षण असतो आणि आईवडील हयात असताना घराच्या  वाटणीचा दिवस हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .

याबाबतीत त्यांना सुख द्यायचे की दुःख द्यायचे हे सर्वस्वी मुलांच्या हातात– म्हणजेच त्यांच्या मनातील स्वार्थावर अवलंबून असते.

म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी उगीचच फक्त घरातील स्त्रीला बदनाम करू नका. 

घर कधीच फक्त स्त्रियांमुळे फुटत नाही, तर ते एका कुणाच्या स्वार्थामुळे फुटते. आपल्या घराचे घरपण हे बहुतांशी स्त्रीमुळे टिकून असते.  ज्या घरातील पुरुष आणि स्त्री दोघेही खंबीर व निस्वार्थी असतात , त्यांचे घर कधीही फुटू शकत नाही हे नक्की. 

 

संग्राहिका : मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

☆ पैसा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात. कसे ते बघा—-

१ ) चर्च मधे दिल्यास—त्याला ऑफरींग म्हणतात.

२) शाळेत दिले— तर त्याला फी म्हणतात.

३) लग्नात दिले=== तर त्याला हुंडा म्हणतात.

४) घटस्फोटात दिले— तर त्यालापोटगी म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले— तर त्याला उसने दिले म्हणतात.

६) शासनास दिले— तर त्याला कर म्हणतात.

७) न्यायालयात दिले— तर त्याला दंड म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले– तर त्याला पेन्शन म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले— तर त्याला पगार म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले— तर त्याला बोनस म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास— त्याला कर्ज म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना—त्यास हप्ता म्हणतात.

(१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास— त्याला टिप म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर दिल्यास— त्याला खंडणी म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास— त्याला लाच म्हणतात..

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास—त्याला भाडे म्हणतात.

१७) सामाजिक / धार्मिक कार्यास दिल्यास— त्याला देणगी म्हणतात.

(१८) देवालयास/ मंदिरास दिले—- तर नवस म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले— तर त्याला आहेर म्हणतात.

आता प्रश्न असा आहे की —–

२०) पतीने पत्नीस पैसे दिल्यास—- त्याला काय म्हणावे ?

      अहो सोपं आहे— एवढंही माहीत नाही का ?

— त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares