सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ अनायासेन मरणं… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ⭐

अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्।

देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।

माझे वडील रोज पूजा झाल्यावर हा श्लोक म्हणतात. कधी कधी त्यांचा गळासुद्धा भरून येतो हे म्हणताना.

त्यांची पूजेची वेळ आणि माझी स्वयंपाकाची वेळ बहुदा एकच असते. मला पण छान वाटतं, असं वाटतं की माझ्या स्वयंपाकावर अनायासे संस्कार होत आहेत.

पूर्ण पूजा झाल्यावर जेव्हा ते हात जोडून हा आशीर्वाद देवाकडे मागतात, तेव्हा तो क्षण मी माझ्या मनात फार जपून ठेवते. त्यांची पाठमोरी आकृती, देवाजवळ तेवणारी शांत समई आणि निरांजन, उदबत्तीचा सुवास आणि नुकतेच चंदनाच्या उटीने आणि झेंडूच्या किंवा तत्सम फुलांनी सजलेले माझे छोटेसे देवघर.

शुद्ध अंतःकरणाने देवाला काय मागायचे तर,

‘अनायासेन मरणं’: मृत्यू तर आहेच पण तो कसा हवा, तर अनायासेन – सहज.

‘विनादैन्येन जीवनं’ : जीवन असं असावं जिथे आपण कुणावर अवलंबून नको, उलट कोणाचातरी आसरा बनता यावे.

‘देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर’:  मृत्यू नंतर कोणाचं सानिध्य लाभावे तर ‘हे परमेश्वरा, तुझे’.

पण हे सगळं व्हायला आपलं जीवनक्रमण तसेच झालेले हवे, तरच हे शेवटचे दिवस समाधानाचे जातील.

इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले

गोविन्द नाम लेकर, फिर प्राण तन से निकले

हेचि दान देगा देवा

 तुझा विसर न व्हावा

न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा

काय मागणे आहे ना!रोज जर तुमच्या घरात ह्या सगळ्याचा गजर झाला, तर कुठल्या दुसऱ्या संस्कार वर्गाची गरज भासेल का?

परवा एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते, दोन नवतरुणांच्या आयांची जी ओरड असते,तोच विषय आमचापण होता. हल्ली संस्कार कमी पडतात. बोलता बोलता ती म्हणाली, आता काय ग आपली मुलं मोठी झाली, संस्कार वगैरे ह्या सगळ्याच्या पलीकडे गेली. आता ती घडली, आता परिवर्तन होणार नाही. मला तेव्हा सांगावंसं वाटलं तिला, संस्कार काय १०वी-१२वी किंवा पदवीसारखं  नाही ग, आता १३ वर्षाचा कोर्स पूर्ण झाला, आता काही होणार नाही. ती तुमच्या मनाची जडण-घडण आहे. ती एकदा करून चालत नाही, सतत मनाची मशागत करत राहावी लागते.

माझीपण मुलगी आता मोठीच झाली आहे, पण जोपर्यंत ती घरात रोज हे बघेल, ऐकेल, तोपर्यंत तिच्या मनावर त्याचे संस्कार होतच राहतील. आज कदाचित त्याच महत्त्व तिला कळणार नाही, पण जेव्हा ती तिच्या आयुष्याची सुरवात करेल, आपलं विश्व निर्माण करेल त्यावेळी ही ‘संस्कार शिदोरी’ तिला उपयोगी पडेल.

देवासमोर हात जोडतांना ‘नवस’ बोलण्यापेक्षा ‘दिलेल्या जीवनाबद्दल आभार मानणे’ ह्यावर विश्वास ठेवणारी आपली संस्कृती.  आपल्या जीवनाची जो पर्यंत ‘जबाबदारी’ आपण घेत नाही, तोपर्यंत ‘ती अगाध’ शक्ती सुद्धा आपल्याला मदत करणार नाही आणि ज्या क्षणी आपण त्याची जबाबदारी घेतो त्या क्षणी आपले ‘मागणेच बदलते’.

‘अनायासेन मरणं, विना दैन्येन जीवनम्। देहांते तव सान्निध्यम् देहि मे परमेश्वर:।।’

लेखिका : अज्ञात

संग्राहिका : सुश्री शशी नाडकर्णी -नाईक

फोन  नं. 8425933533

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments