मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

परिचय

शिक्षण- एम.ए.,एम.एस.डब्ल्यू.,डी.एल.एल.अॅन्ड एल.डब्ल्यू, एम.फिल ,पी.एच.डी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागातून प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त . कार्यकाळात अध्यापन, संशोधन व क्षेत्रकार्य केले.

प्रकाशित लेखन-

– कवितासंग्रह- हिरवी चाहूल, प्राजक्त, प्राजक्ताची चाहूल.

– पुस्तके- असंघटित कामगार, राजाज्ञा(छ.रा.शाहू महाराजांचे आदेश, आज्ञापत्रे इ.) ,साक्षरता खेळ,जोतीसंवाद, केल्याने होत आहे रे,महान महात्मा फुले.

इतर- क्रांतिरत्न

क्रांतिरत्न (इंग्रजी आवृत्तीत लेखन- आगामी),सूर्याच्या लेकी महाग्रंथात लेखन (आगामी).

याशिवाय विविध वृत्तपत्रे, नियतकालिकांतून, दिवाळी अंकातून सतत लेखन. आकाशवाणी,दूरदर्शन व विविध वाहिन्यांवरून मुलाखती आणि विविध विषयांवर कार्यक्रम.

शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यासनाच्या वेबसाईटची निर्मिती केली.

विद्यापीठातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागात(पूर्वीचा प्रौढ, निरंतर शिक्षण आणि विस्तार विभाग) पुढील डाॅक्युमेटरीजचे संहितालेखन केले –

– विस्कळीत, disrupted, यशोगाथा प्रौढ शिक्षणाची,हा धन्य महात्मा झाला.

अनेक वृत्तपत्रे, नियतकालिकांतून विविध विषयांवर सतत लेखन.

सदस्यत्व-

– Indian Adult Education Association, New Delhi.

– Indian University Association for Continuing Education, New Delhi.

– Asian Network for Comparative Adult Education.

– Pune University Teachers Association,

Savitribai Phule Pune University, Pune.

-Dr.Babasheb Ambedkear Teachers Organization, University of Pune, Pune.

– Paragon (Organization of Teachers) .

– Vishwa Marathi Parishad,Pune.

– Mahatma Phule Samta Pratishthan .

– Kavyanand Pratishthan, Pune .

बाली व माॅरिशस येथे आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदांत सहभाग व पेपर सादरीकरण.

विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांत सतत सहभाग.

??

☆ दिवाळी : एक आठवण ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

पुणे विद्यापीठात प्रौढ शिक्षण प्रकल्प अधिकारी म्हणून मी नोकरीला लागलो. तेव्हा पुणे,अहमदनगर, नाशिक,  जळगाव आणि धुळे जिल्ह्य़ातील  काॅलेजं विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होती. ऑफिसबरोबरच भरपूर फिल्ड वर्कचं आमचं काम होतं. महिन्यातून दहा- पंधरा दिवस आम्ही बाहेरगावी जात असू. काॅलेजमध्ये गेल्यावर विद्यार्थ्यांपुढे भाषण, प्राध्यापकांशी चर्चा, प्रौढ शिक्षणातील संघटनांबरोबर बैठक, असा दिवसभरातील व्यग्र कार्यक्रम. नंतर 

दुपारचं जेवण. थोडीशी विश्रांती झाल्यावर दूरवर कुठंतरी  गावात प्रौढ शिक्षण केंद्र पहायला जायचा कार्यक्रम असायचा.

असाच एकदा एका काॅलेजला गेलो होतो. नुकतीच दिवाळी संपली होती. हवेत गारठा होता. सायंकाळी काॅलेजच्या प्रौढ शिक्षण कार्यक्रम अधिकारी प्राध्यापकांसोबत दूरवरच्या खेड्यातल्या एका प्रौढ शिक्षण केंद्रावर आम्ही पोहोचलो. ते महिलांचे प्रौढ शिक्षण केंद्र होते.घरातील जेवणं, भांडी धुण्याची कामं आटोपून केंद्रात महिला यायला वेळ होता. तोपर्यंत  प्राध्यापकांबरोबर गप्पा मारत बसलो. महिला आल्यावर प्राध्यापकाने माझी ओळख करून देऊन माझे स्वागत केले. 

“ पुण्याहून आलेले  हे साहेब तुम्हाला आता मार्गदर्शन करतील “– असं सांगून ते बसले. हाताची घडी घालून महिला 

मी काय बोलतो हे कान देऊन ऐकू लागल्या. ” मार्गदर्शन वगैरे नाही.आपण सगळेजण गप्पा मारू ” असं सांगून मी  ते टेन्स वातावरण हलकं केलं.

” हे बघा,नुकतीच दिवाळी संपली आहे.कुणी कुणी काय काय केलं हे सांगा. सगळ्यांनी बोलायचं बरं का “.

” आम्ही लाडू,करंज्या, शंकरपाळया केल्या, मुलांनी फटाके वाजवले,आकाशकंदील लावले इ.इ.” हे असं सगळं मला अपेक्षित होतं.—–पण महिलांनी दिलेली उत्तरं ऐकून मी बधिर झालो. काय काय म्हणाल्या महिला ?—-

” सायेब, आम्ही गावातल्या आमक्या तमक्याच्या वावरात कामाला गेलो वतो. पोरांना शाळेच्या सुट्ट्या होत्या. त्यांना

  पन घिवून गेलो वतो .”

” आवं सायेब,  आमाला कुनीच नौतं बोलौलं. घरीच वतो या दिवाळीला “.

”  पोरांचा आजा कवापासून आजारीच हाये. वरल्या आळीतल्या रामू पवाराकडून गंडा बांदून घेत्ला या दिवाळीत.     पण नौरात्राच्या चौथ्या माळेला म्हतारा ग्याला “.

खरं तर मी यांना मार्गदर्शन करावं अशी अपेक्षा होती. मात्र झालं उलटंच. या महिलांनीच मला स्वतंत्र भारतातील करूण वास्तव शिकवलं. कुठल्याच पुस्तकात मी हे वाचलं नव्हतं.

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ.

ईमेल- [email protected]
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पँपरींग… लेखिका – सुश्री शितल ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ पँपरींग… लेखिका – सुश्री शितल ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆

खरंतर या इंग्लिश शब्दाला मराठीत खूप छान अर्थ आहेत—- लाड , कोड,  कौतुक , जपणूक,  सांभाळणे , गोंजारणे ……अर्थातच या सगळ्या क्रिया किंवा इतिकर्तव्य ही आपल्या आसपास असणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत करायची असतात. आपले कुटुंबिय किंवा आपले वडिलधारे लोक आपलं कौतुक करत असताना आपण लहानपणापासून पहात आलोय. तद्वतच आपणही आपल्या जवळच्या लोकांचं यथायोग्य कौतुक आणि लाड करतोच.  

कौतुक आणि लाड हे समोरच्याने केले की त्याचा गोडवा वाढतो. 

पण …पण…पण  धावत्या जगाबरोबर आत्मकेंद्रित होत चाललेली माणसं, संकुचित आणि इर्षेखोर मनं , कामाच्या व्यापाच्या नावाखाली मी भोवती आखून घेतलेली नेणीवेची आवर्तनं, यांच्या वावटळात या पॅंपरिंगचाचा अक्षऱश: पाचोळा होतोय … मी आणि माझं काम हे सगळ्यात मोठं, दुसरा माझ्यापेक्षा मोठा होऊच नये ही भावना, किंवा मी माझ्या व्यापातून इतरांना वेळ देऊच शकत नाही, आता ज्याने त्याने स्वावलंबी व्हावं ही जाणीवेची धग, नात्यांच्या आणि भावभावनांच्या बंधांना एकटेपणाचे चटके देत राहतीय ..

बाहेरचे, परके, नातेवाईक वगैरे ठीक आहे. पण कधी कधी आपल्या घरच्या रक्ताच्या नात्यांकडूनही असाच अनुभव तरळून जातो, आणि मग येते एक विषण्णता, वैराग्य, किंवा चीड आणि क्रोध. 

पण खरं सांगायचं तर हे सगळं आता इतकं पुढं गेलंय ना, की आपण ठरवलं तरीही यात बदल करु शकत नाही. सोशल लाईफ , सोशल मीडिया आणि सोशल एडिक्शनच्या तिकडीवर सोशल अवेयरनेसचं मात्र वाटोळं होत चाललंय .. 

मी , माझा , माझं , मला , या ‘ म ‘ च्या आवर्तनात गुरफटलेला प्रत्येक माणूस समोरच्यापासून दूर आणि मग्रूर होत चाललाय. यात सगळेच आले– अगदी तुम्ही आणि मी सुद्धा ….. 

पण हे झालं समोरच्यासाठी. जेव्हा अशा पॅंपरींगची गरज मला स्वत:ला असते तेव्हा काय करावं बरं … आली का पंचाईत– म्हणजे दुसऱ्यासाठी विणलेल्या जाळ्यात आता आपणही अडकणार तर ?—–   आज आता मला कुणाच्या तरी खंबीर खांद्याची, कुरवाळणाऱ्या हातांची आणि मायेच्या कुशीची गरज आहे, पण कुणीच नाहीये सोबत किंवा  ते कुणी करत नाहीये ….

अशा वेळी तडक उठावं– मस्त आवडीचे कपडे घालावे– मोठा प्लान असेल तर बॅगच भरावी —–

आणि कर्तव्य, जाणीवा, व्याप,  जबाबदारीची  सगळी लक्तरं आपल्याच अंगणातल्या झाडाखाली ठेवून … सरळ स्टार्टर मारावा आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसावं —- अगदी एकटं —-डोंगराच्या कड्यावर , नदीच्या काठावर , मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा निर्जन बेटावर — आपल्याला आवडेल अशा ठिकाणी जावं , आपल्याला आवडतं  ते खावं , आपल्याला आवडतं ते संगीत लावावं, आवडेल तसं हसावं, आवडेल तसं रडावं , आवडेल तसं बागडावं, आवडेल ते……ते सगळं करावं —– 

—–उघड्या माळावर बसून आपणच आपल्या कौतुकाचं एक छानसं भाषण करावं— आपणच त्यावर टाळ्या वाजवाव्या— आपल्याला आवडती फुलं आपणच गिफ्ट करावी—- रोमॅंटिक साँग लावून अगदी मध्यरात्री वाईनच्या ग्लाससोबत सोलो डान्स करावा —- आपणच आरशात बघून आपल्यालाच कॉम्प्लीमेंट द्यावी —-  आपणच आपल्या फोटोला करकचून मिठी मारावी —- खळखळून हसावं, देखणं दिसावं, आणि स्वत:च्या मिठीत स्वत:च विसावावं …….. मस्त समुद्रावर जावून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची खोली मोजावी – आव्हान द्यावं सागराला — चल  मोजून पाहू कोण जास्त गहिरं आहे – तुझं अंतरंग, की मी — माझ्या मनाचे तरंग. 

—– मस्त मनसोक्त वागावं, मनसोक्त जगावं आणि दुःख, तणाव, व्याप, एकटेपणाची खेटरं भिरकावून द्यावीत खोल दरीत आणि शांत झोपी जावं ………  

—– कारण सकाळी उठायचं असतं— पुन्हा  एकदा  त्याच आपमतलबी जगाशी सामना करायला —- नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने ——

लेखिका : सुश्री शितल

प्रस्तुती : सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘नमस्कार मित्रांनो —- TMT’ – डॉ. स्मिता दातार ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

नवरात्रात माझ्या  वहिनीकडे गेले होते. तिच्याकडे   घटस्थापना झाली होती. दरवर्षी  देवीचं नवरात्र निगुतीने करणार्‍या माझ्या वहिनीला एका आठवड्यापूर्वी  रिक्षाचा अपघात होऊन तिचा पाय दुखावला होता. तिच्या सचिनचं सहा महिन्यांपूर्वीच  लग्न झालं होतं. नव्या सुनेचं हे पहिलं नवरात्र होतं. दरवर्षी नवरात्रीत सवाष्णपूजन , कन्यापूजन करणारी , साग्रसंगीत स्वयंपाक– हो अगदी ‘स्वयं’ पाकसिद्धी करणारी वहिनी  .. आता या वर्षी काय करेल ,याची मला काळजी वाटली. काळजीपेक्षा परंपरांच्या बाबतीत आग्रही मतं असणार्‍या वहिनीच्या नव्या सुनेची मला जास्त  काळजी वाटली. जरा धास्तावूनच जरीच्या साडीचा घोळ सावरत मी वहिनीच्या घरी पोचले.  वहिनीच्या  सुनेनं हसून माझं स्वागत केलं. रंगवलेल्या सोनेरी ब्लॉन्ड केसांचा सैलसर बुचडा, आधुनिक फॅशनच्या स्लीव्हलेस ब्लाऊज, वर चापून चोपून नेसलेली नऊवारी साडी आणि साडीच्या सोग्याजवळ खणाच्या पर्समध्ये अडकवलेला मोबाईल फोन—-स्मार्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आधुनिक तरुणीचं रुप. ती अध्येमध्ये फोनवरून तिच्या स्टाफला सूचना देत होती. तिने नुकतीच एक स्टार्टअप कंपनी सुरु केली होती. जुन्या नव्याची सांगड जणू तिने पेहरावातच घातली होती. तिने जमलेल्या आम्हा नातेवाईक बायकांची चौकशी केली. ‘आईंना बोलवते हं .’. असं सांगून ती तिच्या सासूबाईंना बोलवायला आत गेली.

वहिनी चार पायांची स्टीलची  काठी टेकत  बाहेर आली. सगळ्या बायकांच्या नजरा गरकन वहिनीच्या दिशेनं वळल्या. वहिनीने चक्क गुडघ्याखाली येईल असा खणाच्या कापडाचा  फ्रॉक घातला होता. तिच्या पायाला अजून बॅंडेज होतं. वहिनी अवघडलेली मुळीच दिसत नव्हती. उलट कौतुकाने सगळ्यांना सांगत  होती, अपघात झाला तरी सुनेनं कार्यक्रम करुया म्हटलं. तिच्या  सुनेनं हौसेनं दोन पदार्थ रांधले होते. वहिनीनं बसल्या बसल्या कोशिंबीर केली होती. बाकीचे पदार्थ बाहेरून मागवले होते. वहिनी उत्साहानं सांगत होती. प्रधानांच्या घरात क्रांतीच झाली म्हणायची, माझ्या मनात आलंच.  देवीची आरती झाली. सवाष्णींच्या ओट्या  सूनबाईनं छान पॅक केलेल्या होत्या. देणारीला आणि घेणारीलाही सुटसुटीत . सांडलवंड नाही की काही राहिलं- विसरलं नाही. छान गप्पा चालू होत्या. मध्येच अर्धा तास वहिनीची सून  लॅपटॉपवरुन  एक ऑनलाईन मीटिंग करायला आतल्या खोलीत  गेली. 

सूनबाई आत गेलीये, हे पाहून न राहवून बायकांनी विषय काढलाच. “ सुमनताई ,रूढीपरंपरांच्या बाबतीत तुम्ही एवढ्या आग्रही असता.  तुम्ही एवढ्या कश्या बदललात ?”

वहिनी हसून म्हणाली , “ मला  एक मंत्र मिळालाय. मला  या मंत्राचे खूप फायदे जाणवले.  लेकाचं लग्न झाल्यापासून मी या  मंत्राचा जप करते.”

“ कुठला मंत्र ?”  बायका उत्सुक होत्या. 

वहिनी म्हणाली , “ मन:शांतीचा  मंत्र.”                      

“ कुठल्या आध्यात्मिक गुरूकडे जायला लागलात की काय ? “ शेजारच्या काकींनी विचारलं . 

“ नाही हो .. स्वत:च स्वत:चा गुरु झाले आणि  जवळच्यांना  गुरु मानलं.” वहिनी अजूनही सस्पेन्स राखून होत्या.

“— कसंय नं .. आपल्यासाठी  घर खूप महत्वाचं असतं.  मुलं आणि आपण सोयीसाठी  वेगवेगळ्या घरात राहिलो तरी मनानं  सगळ्यांनी एकत्र येणं, एकमेकांना सोबत देणं गरजेचं असतं. मात्र नवीन सून आली की  सासूचा मानसिक गोंधळ सुरु होतो. घराची सत्ता, मुलावरचा अधिकार  आणि माझ्यावाचून अडलं पाहिजे.. हा अहंकार—  यामुळे आपल्या जवळच्या प्रिय  माणसांशीच वाद सुरु होतात. मीसुद्धा यातून जायला लागले होते. पण थोड्याच वेळात भानावर आले. घर आणि घरपण अबाधित ठेवायचं असेल तर बदलायला हवं होतं.  अनेक वर्ष साचलेलं पाणी स्वच्छ होण्यासाठी त्याखालचे नैसर्गिक झरे पुन्हा वाहते करावे लागतात, हा तर निसर्गनियम आहे . घरातल्या कर्त्या बाईने आणि पुरुषाने देखील सत्तेचं सिंहासन वेळीच मोकळं केलं तर पुढच्या पिढीला जबाबदारी लवकर कळते. म्हणून माझा मीच मंत्र ठरवला … TMT  .. ‘ तू म्हणशील तसं ‘

“TMT? तू म्हणशील तसं … किती छान आहे हा मंत्र  . “  पस्तीशीची  कनका  उत्साहाने म्हणाली. 

“ छान काय ?  मला नाही पटत .. सुनेनं आधी तिचा वकूब सिद्ध करायला नको का ? उगीच आधीच डोक्यावर घेऊन नाचलं तर उद्या या आपल्याच डोक्यावर मिरी वाटायच्या. त्यातून या आजकालच्या मुली .. “ वहिनींची जाऊ करवादली . 

“ जाऊबाई , नात्यांना आधीच चुकीची  लेबलं का लावायची . आणि वकूब सिद्ध करायला, सुनेला संधी तर दिली पाहिजे ना . उलट ‘ तू म्हणशील तसं  ‘ म्हटलं की  नवी पिढी आपल्याशी चर्चा करायला येते, असा माझा अनुभव आहे. आता आधुनिकता म्हटलं, तर प्रत्येक बाबतीत त्यांचं चुकतं असंही नसतं हो . या पिढीला परंपरांमधलं  विज्ञान समजावून सांगितलं तर त्यांना ते नक्की पटतं. आपणही काही चुकीच्या गोष्टी आंधळेपणी  पुढे चालवत असू तर आपल्यालाही त्यातल्या  चुका उमगतात.  माझी सूनबाई देव देव करणारी नाही. पण तिला माणसं आवडतात, नवीन नाती जोडायला आणि जपायला आवडतात. माणसातच देव शोधावा, असं म्हणते ती. आता हेच बघा ना, माझा पाय जायबंदी झालाय, साडी पायात येऊन मी पडू नये, म्हणून सूनबाईनेच हा खणाचा ड्रेस माझ्यासाठी  शिवून घेतला. माझा संकोच दूर केला . आजचा कार्यक्रम आणि  मेन्यू ठरवताना ही मी हाच मंत्र ओठांवर ठेवला होता  तू म्हणशील तसं— पण त्यामुळे आमच्यात छान चर्चा झाली. अनावश्यक गोष्टींना मी ही फाटा दिला . थोडा तुम  चलो, थोडा हम चले .. “

“ वहिनी , खरच छान आहे हे.. TMT.. “  मी भलतीच इम्प्रेस झाले होते. 

“ आणि बरं का ..सूनबाई  आता येऊन कानात सांगून गेली, की तिला देवीची आरती करायला खूप आवडलं . मेडिटेशन झालं म्हणाली. तुम्ही सगळे आलात, सगळ्यांशी ओळख झाली म्हणून देखील खूश आहे स्वारी. कुणास ठाऊक, आपल्या पूर्वजांनी नाती दृढ करण्यासाठी आणि  मानसिक शांतीसाठीच या आरत्या , श्लोक म्हणायला आणि सण साजरे करायला सांगितलं  असेल . “ 

वहिनी काठी टेकत स्वयंपाकघरात गेली. तिच्या सूनबाईंची मीटिंग संपली होती.  “ आई , पानं आधी घेऊया की आधी फन गेम्स घेऊ,” असं सूनबाई  वहिनीला विचारत होती. 

वहिनी म्हणाली , “ बायका भुकेजल्या असतील तर आधी वाढूया , मग खेळ घे. तरी तू म्हणशील तसं करूया.”

“ ओके . मी आधी वाढायलाच घेते. सचिन आज वर्क फ्रॉम होम आहे, त्याला हाक मारते. तो करेल मदत . तुम्ही बसा बरं .. पायावर प्रेशर येईल. “

त्यांच्या मदतीला आत आलेल्या माझ्या कानावर  पुन्हा एकदा  TMT  मंत्र  पडला आणि मला खुद्कन हसू आलं.  लेकाच्या लग्नाचं घोडामैदान जवळंच आलय. त्याआधीच एक छान मंत्र मला सापडला होता. TMT—

लेखिका :  डॉ. स्मिता दातार

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आमची दिवाळी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ आमची दिवाळी… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! 

ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…! 

काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!! 

आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागे मागे फिरून बाजार करत असे…सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेले हे सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. ! —- भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. ! 

एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!! 

तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं ! 

आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!

वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. 

वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही……. असो…

फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे…. आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…

आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता “धंदा” करतो….!

मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….

घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!

घरा समोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….

पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…….. 

गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! 

माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे… ! 

चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… अन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी 

आजी… ! —– आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!! 

या महिन्यात दिवाळी होती….! 

मोठ्या हौसेने आम्हीसुद्धा पणत्या घेतल्या. पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! …. विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…! 

आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते…….. या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे ! 

आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती…  घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची…… जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत….. आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू….  त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….!  सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे……. 

…. ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान ३० हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…

गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला…. लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…….  

…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या …….  

…. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…! 

वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या,  मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत. 

वृद्ध लोक ज्यांना बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिले आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत….. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण  रस्त्यावरच केल्या आहेत. 

शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत. 

या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…

आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….

या अल्लाह…. दर्गाह मे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्ते पे जो बुजुर्ग थंड मे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है …. 

Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people….! 

वाहेगुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…

इस बार हमने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…… पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? 

देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर  होते…..

हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..

हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद  “प्रसाद” म्हणून  आम्ही मिळवला आहे… ! 

आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. ! 

कारण…….. 

कारण हे सर्व माझ्या हातांनी करणारे…… 

करवणारे……. 

करवून घेणारे……. 

….. तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… !!!

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ तुलसी विवाह !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ तुलसी विवाह !… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

नुकतीच दिवाळी संपली आहे, पण तरी परवापासून सुरु झालेल्या तुळशीच्या लग्नामुळे अजूनही मस्त सणाचे  वातावरण आहे, नुसते आजुबाजुला नाही तर फेसबुक वर पण…. 

आज असंच दिरांशी बोलता बोलता, तुळशीच्या लग्नाचा विषय  झाला … आम्ही सांगलीत असताना दिरांकडे धडाक्यात लग्न साजरे करायचो.. तेव्हा माझ्या मनात लहानपणापासून पाहिलेली तुळशीची लग्नं आठवायला 

लागली !—–  खरंच आपण का करतो तुळशी चे लग्न ?–हे आताच्या पिढीला समजेल अशा पध्दतीने सांगायला पाहिजे,  म्हणून हा लेखनप्रपंच !

आम्ही ही लहानपणापासून तुळशीचे लग्न पाहिलंय,पण आता मुलींना त्याची कारणमीमांसा पण लागते. त्यामुळे मी लगेच त्याबद्दलची माहिती शोधायला सुरुवात केली !

— या मागची पौराणिक कथा आहे ती अशी — जालंदर नावाचा असुर देवांना अजिंक्य झाला होता. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता होती. विष्णूने जालंदरचे रूप घेऊन वृंदेचे सत्वहरण केले. तेव्हा जालंदराने तिला शाप देऊन

दगड केले. तेव्हा ती सती वृंदावनात प्रकट झाली. हीच ती तुळस ! विष्णूने याचे प्रायश्चित्त म्हणून तिच्याशी विवाह केला. विष्णूच्या कृष्णावतारात हे लग्न झाले. त्यामुळे आपण विष्णू आणि कृष्णाला तुळस वहातो.—-

या सर्व पुराणकथा झाल्या ! पण आताही आपण तुलसी विवाह का करतो? आपल्या संस्कृतीत प्रत्येक गोष्ट निसर्गाशी निगडीत केलेली आहे. निसर्गातील प्राणी,पशूपक्षी, वनस्पती ,वृक्षवेली हे आपले सगेसोयरे आहेत. त्यामुळे माणूस या सर्वांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्सव करतो. जसे वटपौर्णिमा, नागपंचमी, नारळी पौर्णिमा….. पंचमहाभूतांचे त्या निमित्ताने स्मरण केले जाते.

तुलसी विवाहाची प्रथाही अशीच आली असावी. तुळस ह्या वनस्पतीचे शास्त्रीय महत्व आहे. तुळशीचे झाड हे चोवीस तास ऑक्सिजन देणारे आहे. तिच्या मंजि-यांपासून असंख्य रोपे तयार होतात. सर्वांना ऑक्सिजन मिळावा म्हणून पूर्वी घराभोवती तुळशीची झाडे वाढवली जात. तुळशीमुळे कीटक येत नाहीत, इतकंच काय डासही कमी होतात. तुळशीचा रस अंगाला लावला की डास चावत नाहीत. तुळशीची पाने औषधी आहेत. तुळशीच्या पानांचा रस खोकल्यासाठी उपयुक्त आहे. तसेच त्वचेच्या रोगांवरही तुळशीचा रस उपयोगी असतो. अशी ही बहुगुणी तुळस पूजेसाठी योग्य ठरली !

पूर्वीच्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे समाजात मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना घराबाहेरची मोकळी हवा मिळत नसे. अशा विचाराने बहुतेक तुळशीला रोज स्त्रियांनी पाणी घालण्याची पध्दत आली असावी. पूर्वी वाडा संस्कृती होती, तेव्हा वाड्यात शिरले की मधोमध तुळशी वृंदावन असे. ती एक पवित्र जागा असे, जिथे संध्याकाळी घरातील स्त्रिया, मुलेबाळे बसून शुभंकरोती,परवचा म्हणत असत. तुळशीसमोरच्या पणतीच्या शांत उजेडात मनही शांत होऊन जाई !

या दिवसात चिंचा,बोरे,आवळे यायला सुरुवात होते. ही फळे म्हणजे व्हिटॅमिन ‘सी’ चा साठाच जणू ! त्यामुळे तुळशी विवाहाच्या वेळी ही सर्व फळे पूजेसाठी असत. आपोआपच घरातील मुलांना ती  खायला मिळत. उसाची मोठी झाडे आणून ती तुळशीला मांडव म्हणून वापरली जात. दिवाळी झाल्यानंतर मुलांसाठी तुळशीचे लग्न हा एक आनंददायी कार्यक्रम असे. दिवाळीत राहिलेले फटाके तुळशीच्या लग्नात उडवून संपवायचे. दिवाळी फराळ संपत आला असला तरी नवीन लाडू,करंजी लग्नासाठी बनवली जात असे. तुळशीचे लग्न झाले की विवाह मुहूर्त सुरू होत असत. आणि वातावरण सणांकडून लग्न समारंभाकडे वळत असे.

तुळशीचे लग्न ही गोष्ट आता जरी कालबाह्य वाटत असली तरी तुळशीचे गुणधर्म काही नाहीसे होत नाहीत ! निसर्ग आणि ईश्वर यांची सांगड आपल्या संस्कृतीत अशा पध्दतीने घातली गेली आहे. शिक्षणामुळे ज्ञान वाढले, सुबत्ता आली पण अशांतता ही वाढली. एकत्र कुटुंब पद्धती कमी झाली. प्रत्येक कुटुंब म्हणजे एक बेट बनले आहे !  हे असे प्रसंग लोकांना जोडून ठेवायला मदत करतात.. हल्ली लोकांना एकटेपणा मुळे बऱ्याच मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते……  नुसती  भौतिक प्रगतीच नाही तर मन:स्वास्थ्य  जपणे हे तितकेच महत्वाचे आहे. —आणि आपल्या संस्कृतीतून हे आपसूकच घडून येत असे. 

दुसऱ्याच दिवशी, तुळशीचे लग्न करून मुलीने पण तुळशी लग्नाचे फोटो पाठवले. स्वत: छान साडी नेसलेला,नातीने परकर पोलके घातलेला, आणि नातवाने तुळशीसाठी अंतरपाट धरलेला आणि हे सर्व कौतुकाने जावई बघत आहेत…..असे फोटो मोबाइलवरून आले. आणि क्षणार्धात माझे मन विमानाच्या वेगाने दुबईला पोचले…तुलसी विवाह कसा साजरा झाला हे बघण्यासाठी !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

 ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ पणत्या कशा दिल्या काकू? ”

“ नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन ”

“ मला ६ हव्यात.”

“ ६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी..”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर, लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहीत धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“ हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या.” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “ हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“ केवढ्याला दिली रे? ”

“ साठ रूपये साहेब.”

“ साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“ खेळणंच आहे.”

“ साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीसला दे.”

“ साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीसला कशी देऊ?”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “ पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे.”

“ चल. देतो तुला प्ले स्टेशन.”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट.” असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“ दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही.” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “ जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “ गरिबी.” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘ पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊ जण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टिकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित ☆

??

☆ दिवाळीनंतरचा मऊ भात..आणि मेतकूट !… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ.स्मिता पंडित☆

आज चिवडा करू…. उद्या लाडू…. असं म्हणत दिवाळीआधीच फराळाचं वेळापत्रक बनतं खरं… पण ते सोयीनुसार बदलतही राहतं.  म्हणजे असं, दाणे भाजून झाले नाहीत म्हणून आजचा चिवडा उद्यावर ढकलला जातो आणि भाजणी लवकरच आणली म्हणून परवाची चकली आज होऊनही गेलेली असते. थोडक्यात, हे ‘सवडीचं’ वेळापत्रक असतं… आणि ते सवडीनुसार पाळलं किंवा बदललं जातं!

आता…’आवडीचं’ वेळापत्रक सुरु होतं…. आवडीचे पदार्थ संपण्याचं वेळापत्रक !

सवडीने दिवाळीचा फराळ कोणत्याही क्रमाने बनवला जावो… आवडीने संपण्याचा क्रम आमच्या घरात अगदी निश्चित ठरलेला असतो…. या वेळापत्रकात बदल नाही म्हणजे नाहीच!—-

सर्वात पहिला मान चकलीला ! त्यामुळे, सगळ्यात आधी ती संपलेली असते. “नेहमीपेक्षा जरा जास्तच खुसखुशीत झालीय नै चकली ” असं नेहमीपेक्षा जास्त कौतुक ऐकू आलं की समजावं… चकल्या संपत आल्यात  !

तिच्या पाठोपाठ करंज्या…. !! करतांना सर्वात शेवटी; पण संपताना मात्र या आघाडीवर असतात ! अर्थात, चूक त्यांची नाहीच… चार खाऊन एक आकडा मोजायचा असं ठरवल्यावर दुसरं काय होणार म्हणा..!!

चकल्या आणि करंज्या ही पहिली आघाडी संपल्यानंतरची दुसरी आघाडी बेसन लाडू आणि कडबोळी एकत्रितपणे पार पाडतात. दोनच दिवसात कडबोळ्यांच्या डब्याच्या तळाशी  तेलकट झालेला केविलवाणा टिश्यू पेपर उरलेला असतो आणि बेसन लाडवांच्या डब्यात लाडू वळतांना टोचलेले बेदाणे, दाताखाली खडा आल्यावर जसा बाजूला केला जातो, तशी उपेक्षा झाल्याने निपचित पडून असतात.– थोडक्यात, बिनीचे सर्व शिलेदार गारद झालेले असतात. चिवड्यातले काजू चाणाक्ष नजरांनी टिपलेले असतात. मग शेव-चिवडा, चहा-शंकरपाळे अशा जोड्या, किल्ला काही काळ लढवत ठेवतात.

मानाचे पाच गणपती यात्रेत आपापल्या क्रमाने गेल्यानंतर या आळीचा, त्या गल्लीचा असं करत सगळे सामील होतात तसं .. या क्रमाने फराळाचे मानाचे डबे संपल्यानंतर कुण्या काकूकडचे अनारसे, ताईकडून आलेले चिरोटे वगैरे सर्वांचा यथायोग्य समाचार घेतला जातो…

फराळाची ही भाऊगर्दी कमीच होती की काय !!! म्हणून अगदी ठरवून दिवाळीच्या या चार दिवसात, पहिल्या दिवशी नैवेद्याला बासुंदी, पाडव्याला छोले-भटुरे, घरातच एक वाढदिवस म्हणून गुलाबजाम आणि भाऊबीजेला भाऊ कित्येक दिवसांनी येणार म्हणून सूप, स्टार्टर्स, स्वीट, मेन कोर्स आणि डेझर्ट्स असं फाईव्ह कोर्स डिनर झालेलं असतं — आणि ……. 

हा अस्सा रविवार उजाडतो….अस्सा म्हणजे… आजच्यासारखा !!!

“आज मी फक्त मऊभात करणारे ” अशी घोषणा माझ्याकडून केली जाते… आणि सगळ्यांचे चेहेरे गेल्या चार दिवसांपेक्षा जास्त उजळतात ! 

पदार्थांच्या भाऊगर्दीत त्या गरमगरम मऊभाताला आणि त्यावर घेतलेल्या तूप-मेतकुटाला अमृताची चव येते. अगदी सकाळीच विरजलेलं दही आणि डावीकडचं लोणचं या आजच्या मेन्यूला फाईव्ह कोर्स डिनरच्या फाईव्ह स्टार मेन्यूपेक्षा जास्त स्टार दिले जातात… तळलेल्या पदार्थाचा खमंगपणा, मसालेदार फोडणीचा झणझणीत स्वाद, चीझ-बटर-क्रीमचा श्रीमंती थाट, तुपात तळलेल्या आणि साखरेत घोळलेल्या मिष्टान्नाची गोडी, काचेच्या प्लेट मधून आलेल्या डेझर्टची नजाकत… यातलं काही – काही नसतं त्या मऊभातात….. पण आजच्या दिवशी ‘तोच’ हवा असतो.. ‘ फक्त आणि फक्त तोच ‘ हवा असतो…… आणि हवं असतं त्याच्या साधेपणातलं समाधान….. 

–कित्येक दिवस परदेशातल्या झगमगाटात फिरून परत येतांना आपला देश दिसू लागल्यावर मनात असतं ते समाधान…… 

ब्रँडेड कपड्यांच्या दिखाऊपणानंतर एक जुनाच, पण मऊसूत कुर्ता घातल्यावर मिळतं ते समाधान….. 

पुस्तकांचं कपाट आवरतांना अचानक जुनी कवितांची वही मिळाल्यावर मिळतं ते समाधान….. 

सिल्कच्या गर्भरेशमी साड्यांच्या कपाटात आजीच्या साडीची गोधडी दिसल्यावर मिळतं ते समाधान…. 

महागड्या भेटवस्तूंच्या तळाशी आपल्यासाठी कुणीतरी हाती लिहिलेलं शुभेच्छापत्र सापडतं… त्यावेळचं समाधान…

आणि ……. आणि दिवाळीच्या पंचतारांकित मेजवान्यांनंतर रविवारच्या दुपारच्या मऊभाताचं समाधान……. 

खरं तर समाधान शोधावंच लागत नाही… ते आपल्या जवळपासच असतं !—– 

******

लेखक  . : अज्ञात. 

संग्रहिका : सुश्री स्मिता पंडित . 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ आहोत आम्ही पुण्यवान … लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ आहोत आम्ही पुण्यवान … लेखिका- सुश्री मृदुला बर्वे आणि डाॅ.अपर्णा कल्याणी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

एका बातमीवर नजर पडली – आपल्या सर्वांच्याच आवडत्या – the most famous – Switzerland – स्वित्झर्लंड मध्ये आत्महत्येला सहाय्य करणारे – suicide pods बनवले गेले आहेत आणि त्या पॉडमध्ये जाऊन आत्महत्या करण्यासाठी म्हणे “waiting list” आहे. ज्या वेस्टर्न जगाची, तिथल्या राहणीमानाची भूल पाडून आपल्याला आपल्या धर्मापासून दूर केले गेले, तिथे ही अवस्था?आत्महत्या करायला रांग? आणि कुपन्स? आपसूक उद्गार निघाले – मी भारतात जन्मले, हो आहेच मी भाग्यवान ! In this land, every birth and every death counts! 

त्याच आठवड्यात एका लग्नाच्या मीटिंगसाठी ओपंडित (म्हणजे ओव्हर्सिज भटजी/पंडित) कडून गेले होते. मुलगी मराठी आणि मुलगा अमेरिकन. लग्न विधी समजावून सांगताना त्याला मी विचारले – तुझे पालक? म्हणतो – “ I have no idea, I haven’t spoken with my parents for 12 odd years :O” 

मी त्याला विचारले – “ don’t you feel lonely? “  त्याने प्रामाणिकपणे उत्तर दिले – “  I do… I miss them. Then I drink and then I am okay. I want to change this and hence I decided to get married to an Indian woman. I envy you guys…”  मी कसंनुसं जराशी हसले – मनात तेच शब्द, तेच वाक्य – ‘ होय, होय आहोतच आम्ही भाग्यवान, पुण्यवान…’

न मागता मिळालेले सुख म्हणजे भारतात जन्म ! त्यातही हिंदू कुटुंबात जन्म ! त्यातही धार्मिक, भगवंतावर विश्वास असणाऱ्या कुटुंबात जन्म !

“सर्वेपि सुखिन: सन्तु |” अशी मागणी करणारा आपला धर्म ! —

“Hindus seek out life, not destroy it. Hindus are the only people who have never invaded any land. We live in perfect harmony with nature.”

आपले अकरावे इंद्रिय – मन. हे मन जे आपल्या सर्व आयुष्याला आकार देते, त्यावर सर्वात जास्त संस्कार करणारी संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आणि हिंदु धर्म.

” मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव|” – ह्या मूल्यांवर आधारित आपली संस्कृती व धर्म !

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जर कुठली संस्कृती देऊ शकते तर ती आहे ‘ वैदिक सनातन आर्य हिंदु संस्कृती!’

‘ जीवन तर धन्य कराच पण मृत्यूही धन्य करा,’ अशी शिकवण देणारी आपली संस्कृती!

प्रत्येक प्रदेशात, प्रत्येक राज्यात, प्रत्येक पंथात – मनाला बळकटी देणारे अध्यात्मिक ज्ञान, संत वाङ्मय, उपासना – म्हणजे भारत देश !

” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ” – असे सांगणारे स्वामी समर्थ…

” समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?”, किंवा “आम्ही काय कोणाचे खातो तो राम आम्हाला देतो “- असे मनोबल वाढवणारे समर्थ रामदास स्वामी…

” शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा, अवतार महादेवाचा ” – हिंदु साम्राज्य प्रस्थापित करणारे राजे… 

—अगणित उदाहरणे, अगणित संदेश, पण उद्देश्य एकच –- “ बाबारे, ८४  लाख योनिंमधून प्रवास करून मिळालेला मनुष्य जन्म धन्य कर—- तू कुठल्याही वर्णात असशील, तू कुठल्याही आश्रमात असशील, तू श्रीमंत असशील, गरीब असशील, तू आंधळा असशील, पांगळा असशील, तरी हा मनुष्य जन्म धन्य कर. अध्यात्मिक व पारमार्थिक प्रगती कर !”— अशी शिकवण देणारी आपली संस्कृती, अशा भारत देशात आम्ही जन्मलो… एक अख्खा जन्म कमी पडेल एवढे ज्ञान ह्या भूमीने आम्हाला दिले…

होय ! आहोतच आम्ही पुण्यवान, आहोतच आम्ही भाग्यवान ! 

 – सुश्री मृदुला बर्वे. 

(डॉ.अपर्णाताई कल्याणी यांच्या FB Wall वरुन साभार) 

https://www.facebook.com/aparna.kalyani.58

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ देवा तू करतोस ते योग्यच आहे… सौ.शुभांगी देशपांडे ☆ प्रस्तुती – सुश्री मंजुषा सुनीत मुळे

आज फ्रीज उघडला तर काय काय त्यात भरलेले. महालक्ष्मी साठी केलेले पुरण ,ओल्या नारळाचे उरलेले सारण, परवा बाप्पांच्या विसर्जनासाठी केलेली वाटली डाळ, असे बरेच उरलेले ठेवलेले.

बाप्पा आले पण येताना काही आणले नाही,अगदी दहा दिवस लागणार माहित असूनही, कपडे नाही,औषधे नाही,अंथरायला नाही, पांघरायला नाही, छत्री,रेनकोट ,अगदी साधा रुमालही नाही.

त्यांना माहीत होत खाली भौतिक सुखाचा सतत विचार करणाऱ्यांनी त्यांची चोख व्यवस्था केली आहे. नसती केली तरी बाप्पा कोणत्याही परिस्थितीत अगदी आनंदात आहेतच.

ते जातांना माझ्याच मनाची घालमेल, की शिदोरी द्यायची बाप्पांना. पुन्हा २१ मोदक केले, डाळ केली. नैवेद्याच्या वाटीत नैवेद्य ठेवला. तेवढाही नेला नाही. पण आले तेव्हा जसे आनंदी होते, प्रसन्न होते, तसेच जातांना होते. डोळ्यातून आशिर्वादाची,समाधानाची झलक दिसत होती.

महालक्ष्मी येण्याआधी तेच झाले. किती ती तयारी. घराची स्वच्छता,आरास करण्यासाठी बाजाराच्या चकरा. महालक्ष्मीसाठी साड्या घेतांना मला आवडल्या म्हणून बाजूला काढलेल्या अजून दोन तीन साड्या. तिच्यासाठी म्हणून दोन आणल्या खऱ्या, पण त्यातही एक मला होतीच….. मग फुलोरा, पुरण, त्या १६ भाज्या,चटण्या, कोशिंबिरी.

आधीच्या खूप पसाऱ्यातून, आधीच्या  कुळाचारातून ,रीतीरीवाजातून, माझ्या मनाच्या घालमेलीनंतर मीच कमी कमी केलेले ,थोडे सुटसुटीत होईल असे पदार्थ, नैवेद्य, त्यात माझा ओतलेला सुगरणपणा……. हे सगळं सगळं करून खूप थकायला झाले. पण त्या महालक्ष्मी आणि त्यांच्या बाळांनी जाताना काहीही नेले नाही, त्या पिटुकल्यांनी जाताना आई जवळ काहीही हट्ट केला नाही. त्याही जाताना भरभरून आशीर्वाद देऊन गेल्या….. कुंकवाच्या करंड्यात मला भासतील असे दोन चिमटीच्या खुणा ठेवून गेल्या. दोन्ही सणांनी खूप खूप आनंद दिला. 

पण आता हा उरलेला मागचा पसारा बघता सहज मनात विचार आला, मला जर कोणी दहा दिवसात किंवा तीनच दिवसात सगळं पटापट आवरून आता चला, बास आता इथले वास्तव्य ,असे जर म्हणाले तर माझे कसे आवरेल?

…… बापरे! हा विचार नुसता मनात आला आणि सर्व ब्रम्हांडच आले डोळ्यासमोर….. 

नुसते थोडा वेळ बाहेर जायचे म्हंटले तरी पाऊस येईल का?—कपडे बाहेर आहेत का?—अन्न झाकलेय का?—

मी बाहेर गेल्यावर गॅसवाला येईल का?—मोबाईल घेतलाय का?——बापरे बाप किती विचार डोक्यात.

साधे  एक दिवस गावाला जायचे म्हंटले तर  मी १० साड्या पलंगभर पसरवून ठेवते. कोणत्या दोन घ्याव्यात ह्यावर माझेच माझे एकमत होत नाही. काही साड्या जाड,जड, फुगणाऱ्या, काही चुरगळणाऱ्या, काही ओल्या झाल्या तर खराब होतील का? असे ढीगभर विचार डोक्यात—-

——मग कायमचे जायचे असेल, त्यात बरोबर काहीच न्यायचे नाही ,आणि दोन, तीन, फारतर दहा दिवसात सगळाच पसारा आवरायचं म्हंटले तर कसे होणार?

परवा त्या सायरस मिस्त्री नावाच्या टाटा कंपनीच्या मोठ्या व्यक्तीला अपघात झाला. केवढा पसारा,केवढे साम्राज्य असेल त्यांचे? किती कोटींची गुंतवणूक, किती कोटींची उलाढाल…  कसं आणि कोणी आवरायचं हे सगळं. त्यांनी जे ठरवले असेल ते तसेच राहिले की मनात….. 

खूप वेळा एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.

मग कधी कधी वाटते की ह्या पॉलिसीज, इन्शुरन्स, ही संपत्ती, हे खोऱ्याने चोरून लपवून ठेवलेले पैसे, काळे धन, लॉकर्स, शेती, जमिनी, कारखाने, नाव, पद, प्रतिष्ठा, इगो,ह्या सगळ्या सगळ्याला खरंच काय अर्थ आहे?—-

—-तरी माणूस धावतोच आहे, धावतोच आहे ,तोंडाला फेस येईपर्यंत पळतोच आहे ,खोटी खोटी स्वप्न बघतोच आहे, झगमगाटी दुनियेमध्ये रमतोच आहे. कसलाच भरवसा नाही तरी तीन तीन महिन्यांचे रिचार्ज मारतोच आहे.

गाड्या ,फ्लॅट,बुक करतोच आहे—-

—- का ? कशासाठी?

दरवर्षी येणाऱ्या आणि बुद्धीची देवता असणाऱ्या बाप्पाकडून काहीच शिकत नाही. उलट त्या बाप्पांनाच पुन्हा पुन्हा ह्या येण्याजण्याच्या फेऱ्यात अडकवतोय—-

“ गणपती बाप्पा मोरया — पुढच्या वर्षी लवकर या.” –

बाप्पा ही येतात तेही काहीच न घेता, जाताना काहीच न नेता. आणतात फक्त आनंद..देतात फक्त आनंद.

आपणच अडकलो आहोत ह्या चक्रव्यूहात— अडकण्याचे सगळे मार्ग आपण माहित करून घेतलेत. बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला नकोय.

ह्या जीवाचे तंतर काही समजत नाही—

आला सास गेला सास, जिवा तुझं रे तंतर..

अरे जगणं मरण एका सासाच अंतर!

देव कुठे? देव कुठे,आभायाच्या आरपार!

देव कुठे, देव कुठे तुझ्या बुबाया मधी र !

हा आपल्याच बुबुळामधील देव, आपल्याच बुबुळामधील आपल्या प्रेमाचा माणूस, आपल्याला शेवटपर्यंत दिसत नाही.

देव येतात ,देव जातात, आशीर्वाद देतात ,आनंद देतात. प्रत्येक वर्षी तेच ते सांगण्यासाठी येतात. पण तरीही आपल्याला काहीही समजत नाही. देवांच्याकडून, निसर्गाकडून आपल्याला काही शिकवण घ्यायचीच नाही. ते दोघेही नुसते देतच असतात. कसलीच अपेक्षा न ठेवता– पण मुळात आपल्याला समजूनच घ्यायचे नाही.

आपण तर आपल्या आईवडिलांच्याकडून ,आणि आईवडील मुलांच्या कडून अपेक्षा ठेवतात.

एक साडी कुणाला दिली तर तिने चार डबे घासून द्यावे अशीही आपली अपेक्षा असतेच.

गणपती बाप्पा तू बुध्दीची देवता.

लहानपणी रोज आई म्हणून घ्यायची ते आजही आठवतंय— ‘ की देवा मला चांगली बुध्दी दे.’—आता कुणी  हे असे मागणे फारसे  मागताना दिसतच नाही.

मागण्या पण काळानुरूप बदलल्या आहेत. गणपतीकडे तरी तेच मागायचे लोक.

तो येताना बुद्धी आणत असेल वाटायला सोबत… पण कुणी मागितली तर ?

असो. माणसाच्या ह्या सगळ्या वागण्यामुळे त्याने काही प्यादी अजून त्याच्या हातात ठेवली आहेत.

त्याला माहित आहे की ह्या आधाशी माणसाला नेण्याची पूर्व कल्पना दिली, तर काय काय बांधून वर नेईल हा.

तो सगळा विचार करूनच त्याची गणितं संपली की तो काहीच विचारत नाही.–बोलावणे आले की नेतोच.

नाहीतर हा माणसाचा जमवलेला पसारा तीन दिवसात, दहा दिवसात काय, तर कधीच न आवरता येणारा आहे.

तो फक्त ह्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतो.  बाकी काही नाही.

देवा तू करतोस ते योग्यच आहे.

लेखिका : सौ.शुभांगी देशपांडे

संग्राहिका: सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

कधी वाटले, पुन्हा एकदा –

घ्यावा वेध, अपुल्याच मनाचा –

होतो जैसा, तसाच आहे –

किंवा बदल घडे का साचा ॥

 

वाचावी उलटुनिया पाने –

अपुल्या जीवनगाथेची –

निरखावी आपुलीच प्रतीमा –

तटस्थ बुद्धीने साची ॥

 

मूल्यांकन आपुलेच आपण –

कसे करावे समजेना –

करून तुलना दुसर्‍याशी मग –

जाणावे, उमगले मना ॥

 

गुणवैगुण्ये आणि परिस्थिती –

लाभली मज जी दैववशात् –

जोखावी तोलुन दुसर्‍याशी –

ज्यास लाभली भाग्यवशात् ॥

 

बुद्धी क्षमता कार्यचतुरता –

त्याची माझी तोडीस तोड –

सौख्ये मजला कमी न मिळती  

परि त्याची चाले घोडेदौड ॥

 

तरीही कौतुक मनात त्याचे  –

हेवा नाही तिळमात्र –

परंतु काटा वैषम्याचा –

मनात सलतो दिनरात्र ॥

 

तुलना करता कुणी खालती –

तसेच वरचढ दिसती कुणी –

वरची पायरी कुणी गाठता –

न्यूनगंड का रुजे मनी ॥

 

विचार चुकीचा मलाच कळले –

अन कळले की विचारण्याला  –

गुरू न कोणी अंतर्मनसा 

मार्ग योग्य तो दाखविण्याला  ॥

 

सूर मारला नि:शंकपणे –

खोल मनाच्या डोहात –

वेगाने गाठला तळ जसा –

मीन पोहतो दर्यात ॥

 

उघड्या नेत्री धुंडाळुनिया –

कोनकोपरा अंतरिचा –

शोध घेतला गूढ मनाचा –

उत्कटतेने बिनवाचा ॥

 

दूर दिसे देव्हारा त्यातच –

दिसले मजला आंतरमन – 

समाधिस्थ योगिसे बैसले –

घालुन चक्री पद्मासन॥

 

मी काही बोलणार त्याच्या –

आधिच त्याने खुणाविले –

करोनिया स्मितहास्य तयाने –

निकटी मजला बैसविले ॥

 

“जाणून होतो येणारच तू” –

कथिता त्याने दिग्मुढ मी –

“झाला भ्रम बुद्धीस तुझ्या जो –

निवारितो मी एक क्षणी” ॥

 

आंतरमन मग सांगू लागले –

“तन मन बुद्धीची शुचिता –

प्रामाणिक राहून स्वत:शी –

जपणे रे आपुली स्वत:” ॥

 

“आत्मपरीक्षण करून घेण्या –

विचार सुचला तुला भला –

उत्तर मिळण्या परी तुवा जो –

मार्ग निवडला तो चुकला” ॥

 

“मूल्य जाणण्या स्वत: स्वत:चे –

तुलना तर करण्यास हवी –

परंतु दुसर्‍यासवे करुनिया –

वाट न धरि खोटी फसवी “ ॥

 

“तुलना करणे असेल तर मग –

फक्त करावी स्वत: स्वत:ची –

नैतिक आणि सनदशीर ती –

गाठील सज्जनतेची उंची ॥

 

“कालच्याहुनी अधिक चांगला –

आहे का मी आज पहावे –

सत् प्रत्यय भूषीत सर्व गुण –

जमतिल तितुके मिळवावे” ॥

 

बोलुन इतुके लुप्त जाहले –

आंतरमन अदृश्यात –

मी ही परतलो मनडोहातुन –

पिऊन उपदेशाचे अमृत ॥

 

अपुली बुद्धी, नशीब अपुले –

अपुल्या निष्ठा, अपुले संचित –

मिळकत माझी कां तोलावी –

व्यर्थ दुज्याच्या तराजुत ॥

 

कधीच नाही नंतर केली –

तुलना दुसर्‍या वा तिसर्‍याशी –

माझा मीच यशस्वी झालो –

प्रामाणिक राहून स्वत:शी ॥

 

वैषम्यासम न्यूनगंड अन् –

भाव नकारात्मक मनिचे –

कसे वितळले गळून गेले –

भाव सकारात्मक सजले ॥

 

रचना : सुहास सोहोनी, रत्नागिरी

Please share your Post !

Shares
image_print