मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “चैत्र”… ☆ सौ राधिका भांडारकर 

आंब्याच्या झाडावर कोकीळ पक्षाचे “कुहू” ऐकू येते आणि वसंत ऋतूच्या आगमनाची वर्दी मिळते.   चैत्राची चाहूल जाणवते. नववर्षाची सारीच नवलाई घेऊन सृष्टीही बहरते.

सूर्य जेव्हा मेष राशीत प्रवेश करतो, त्यावेळी हिंदू पंचांगातल्या शालिवाहन शकानुसार चैत्र महिना सुरू होतो. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची बोंबाबोंब आणि रंगपंचमीच्या रंगात नहाल्यानंतर वसंत ऋतु एखाद्या राजासारखा, दिमाखात अवतरतो.  नवा उत्साह, नवी उमेद, चैतन्याचे नजराणे  घेऊन तो कसा ऐटीत येतो.

जुने जाते नवे येते. वृक्ष नव्या, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या पालवीने बहतात.  गुलमोहराला अपूर्व रक्तिमा चढतो.  पिवळा बहावा फुलतो.  पलाश वृक्षाची अग्नी फुले डोळ्यांना सुखावतात.  मोगऱ्याचा सुगंध दरवळतो. आणि कोकणचा राजा रस गाळतो. उत्तम उत्तम गोष्टींची मनमुराद पखरण करणारा हा वसंत!  ना कशाची वाण  ना कशाची कमतरता.  सारेच साग्रसंगीत, उच्च अभिरुची दर्शवणारे.

।। गंधयुक्त तरीही उष्ण वाटते किती ..।।

आसमंत उष्णतेने भरून जातो.  उन्हाच्या झळा जाणवतात. तप्त वारे वाहतात पण तरीही हे वारे गंधयुक्त असतात.  अनंत आणि मोगऱ्याचा दरवळ जाणवतो. जंगलात कुठेतरी पिवळी धमक सुरंगीची फुलं उमलतात. आणि त्याचा सुगंध साऱ्या सृष्टीला व्यापून राहतो.

चैत्र महिना— वसंत ऋतु म्हणजे सृजनोत्सव.  चैत्र महिन्याच्या साक्षीने आनंदाचे एक महोत्सवी स्वरूपच प्रकटते.  या मासाचे आपल्या सांस्कृतिक जगण्याशी  उत्कट नाते आहे.

या आनंदोत्सवाचे स्वागत उंच गुढ्या उभारून शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी केले जाते.  दुष्टांचा संहार  आणि सुष्टांचा विजय म्हणून हा विजयोत्सवही ठरतो.  या ब्रह्मध्वजाच्या पूजेनेच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. तोच हा चैत्रमास!  चंद्र, चित्रा नक्षत्राच्या सानिध्यात असतो म्हणून हा चैत्र मास.

संस्कृतीची, धार्मिकतेची, सृजनाची, सौंदर्याची जाण देणारा हा टवटवीत, तजेलदार, तालबद्ध मास— वसंत आत्मा— मधुमास.

चैत्रगौरी पूजनाच्या निमित्ताने आंब्याची डाळ,कैरीचे  पन्हे याचा रसास्वाद घेणे म्हणजे परमानंदच.  अंगणात चैत्रांगण सजते.

या महिन्याला जसे श्रद्धा, भक्तीरसाचे वलय आहे, तसेच शृंगार रसात न्हालेल्या  प्रणय भावनेचाही अनुभव आहे.

पक्षी झाडावर घरटी बांधतात.  त्यांची मधुर किलबिल मिलनाची हाक देतात.  मधुप  फुलातल्या परागाशी प्रीतीचे नाते जुळवतात.  तरुण-तरुणींची सलज्ज कुजबुज ऐकू येते.  कवी कल्पनांना प्रणय गीतांचे धुमारे फुटतात.  चाफा फुलतो आणि बोल घुमतात,

” हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण

उणे करु आपण दोघेजण रे..”

साऱ्या सृष्टीतच या शृंगार रसाची झलक जाणवत असते. निर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या भावनांना हळुवारपणे गोंजारणारा हा चैत्र महिना, राधा कृष्णाच्या प्रीतीत रमणारा हा चैत्र महिना,  कुणाच्या कवितेत असाही फुलतो..

सिंगार सिसकता रहा

बिलखता रहा हिया

दुहराता रहा गगन से चातक

पिया पिया …

किंवा,

ऋतू वसंत से हो गया कैसा ये अनुराग

काली कोयल गा रही

भांति भांति के राग…

तर असा हा नवीनतेचा, प्रेमाचा, उत्पत्तीचा,  चैतन्याचा संदेश घेऊन येणारा,  सुगंधाचा दरवळ पसरवणारा, हसरा बागडणारा,  धुंद करणारा चैत्र मास …किती त्यास वर्णावे?

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी …”… कवी – माणिक कौलगुड ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “मराठी …”… कवी – माणिक कौलगुड ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

नवरसयुक्त सालंकृत मराठी माझी 

वैभवशाली शालीन मराठी माझी 

वसे हृदयसिंहासनी मराठी माझी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

ज्ञानियांनी कौतुके जी मिरविली 

शब्दकळा झळके गीतेची वैखरी 

सुरवंद्य गीर्वाण वाणी तव जननी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

कधी बोलते आर्त बोली तुकयाची 

कधी रोखठोक रामदासी स्वभावे 

भावव्याकूळ नामदेवाची गाऱ्हाणी  

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

लेखणीच होई खड्ग विनायकाचे 

धार केसरीची विलायतेस भिववी 

हळवी मृदुल काळजाची दिवाणी 

माय मराठी माझी सखी साजणी ।।

 

विश्व एक होता भेटती मातृभगिनी 

ज्ञानगुरू असो कोणी पूजनीय ती 

आपपर भाव नसे साऱ्या गुणखनी 

माय मराठी माझी सखी साजणी ।। 

 

कवी : माणिक कौलगुड.  

प्रस्तुती : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काही टाकायचे आहे पण टाकणार नाही… –– सुश्री योगिनी पाळंदे ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ काही टाकायचे आहे पण टाकणार नाही… –– सुश्री योगिनी पाळंदे ☆ संग्राहिका – सुश्री आनंदी केळकर  

मधुचंद्रहून ठाण्याला घरी आल्यावरची पहिली रात्र ….. नाही नाही….ती..वाली रात्र नव्हे….

त्या रात्रीचा पहिला स्वैपाक…… 

शेजारच्या शेगडीवर कुकर फुसफुसत होता.

(कोकणस्थ) गोड-आमटी करायची गोड जबाबदारी माझ्यावर होती

 मी गॅस लावायला काडेपेटी हातात घेतली मात्र….. माझ्या पाठीवर एक स्पर्श झाला … 

मी लाजून चूर..मनाने कायशिशी मोहरून गेले… अजूनही आमचा माफक रोमान्स चालू होता ना.

माझे गाल लाल व्हायला लागले…. सॉरी…मी गोरी नाही..सबब..माझे गाल चॉकलेटी व्हायला लागले !!

तिरपा कटाक्ष टाकून मागे बघते तो साक्षात सासुमा… “ शेजारी गॅस चालू आहे ना,मग नवीन काडी कशाला पेटवली??”

त्या काडीने माझ्या रोमान्सची झिंग क्षणात काडीमोल होऊन मी भानावर आले.

सासूमानी मला दुसरी काडेपेटी दाखवली, ज्यात जळलेल्या काड्या होत्या.. एक शेगडी पेटलेली असेल तर नवीन काडी लावायची नाही.. जळलेल्या जुन्या काडीनेच पेटलेल्या शेगडीवरून विस्तव उचलायचा.

आता कुकरचा अतीप्रशस्त-ओबेस देह शेगडीवर तापलेला असताना, त्याखालून जुन्याकाडीने विस्तव कसा पळवावा? …. मग सांडशीच्या तोंडात जुनी काडी.. आणि तो पलीता कुकरच्या कुल्ल्याखाली.. अशी कसरत झाली. अखेर आमटीखाली गॅस लागला.

तोपर्यंत मी गॅसवर होते, कारण कर-कटेवरी घेऊन सासुमा माझ्या प्रत्येक कृतीकडे डोळे बारीक करून बघत होत्या.

दुसऱ्या दिवशी फुरसतीत सासुमांनी मला उभेउभे तुकडे केलेली जुनी पिवळी-पोस्टकार्ड दाखवली.

त्या लांबलांब-तुकड्यांनी ह्या शेगडीवरून त्या शेगडीवरचा अग्नी प्रज्वलित करायला सोप्पा कसा पडतो त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं…” हे बघ प्रत्येकवेळी नवीन काडी लावायची नाही. आम्ही काडी-काडी जोडून वाचवलेलं आहे, तेव्हा कुठे हे आजचे दिवस दिसतायत.”…. आज मनात येतं, नवीन पिढीची सून असती तर त्या एका न पेटवलेल्या काडीने तिने एव्हाना काडीमोडसुद्धा घेतला असता.

सासूमांची काडी-काडी कॉन्सेप्ट स्वैपाकघरातच नव्हे तर घरभर वावरत असे. प्रत्येक वस्तू वापरताना आणि जुनी होऊन टाकताना त्यांची परमिशन लागे. अगदी अंतर्वस्त्रसुद्धा त्यातून सुटली नव्हती !!

चिंधीवालीकडे अंतर्वस्त्र विकली जातात हा ज्ञानसाक्षात्कार मला त्यांनीच घडवला. जुने परकर,ब्लाऊझ,साड्या वगैरे मंडळींची रवानगी, कपाटातून स्वैपाकघरात होत असे.

घासलेली भांडी पुसून जागच्या जागी ठेवायला, हात पुसायला आणि स्वैपाकघरातला कार्यभाग संपला की त्यांचे deputation पाय पुसणे म्हणून होत असे.

आंघोळीच्या गरम पाण्यात रवी व ताकाचं भांडं धुणे. दुधाच्या पिशव्या धुवून वाळवून विकणे. दुधाच्या कोरड्या पिशव्यांनी तर आमच्या घरात इतिहास घडवला होता…..त्या पिशवीने काय काय पाहिलं नव्हतं?

त्यात सासुमाच्या प्रभातफेरीतील पुष्पचौर्य-कथा लपलेल्या असत. जास्वंदीच्या टप्पोऱ्या कळीचा उमलण्यापूर्वीचा कळीदार प्रवास त्या पिशवीतून होत असे… त्यातच देवळातल्या मैत्रिणींना वाटण्यासाठी तिळगुळ असत… दशभुजा गणपतीच्या देवळातून संकष्टीच्या प्रसादाचे मोदक त्या दूधपिशवीच्या पालखीतूनच घरी येत. हनुमानजयंतीचा सुंठवडा त्यातूनच येई आणि….. रामा-शिवा-गोविंदा ह्या मानकऱ्यांचे प्रसादसुद्धा कधी चैत्र तर कधी श्रावण महिना साधून, त्या पिशवीतून आमच्या घरी येत.

त्यात कधी सुट्टी नाणी विराजमान होत, तर एखादी फाटलेली पण खपवायची असलेली दहा रुपयांची नोटही असे…. कहर म्हणजे एकदा तर  बँकेच्या लॉकरमधले किडुक-मिडुक सासुमांनी त्या पिशवीतून घरी आणल्यावर मात्र मी त्यांना कोपऱ्यापासून हात जोडले होते.

जी गत दुधाच्या पिशवीची तीच इतर वस्तूंची. आणि केवळ सासुमाच नव्हे तर तिच्या पिढीने हाच पुनर्वापरमंत्र जपला. दिवाळीच्या वेळी वापरलेल्या मातीच्या पणत्या स्वच्छ पुसून माळ्यावरती  चढत. तीच कथा कंदील किंवा चांदणीची असे. इस्त्रीची एकदा वापरलेली साडी त्याच घडीवर घडी पाडून कपाटात जायची आणि अर्थातच पुन्हा नेसली जायची… अश्या कित्येक गोष्टी !!

चहाच्या कानतुटक्या-अँटिक-कपमध्ये वाटलेली हिरवी चटणी ठेवणे, क्वचित तो कप विरजणासाठी वापरणे, त्याच क्रोकरी सेटच्या (?) विजोड झालेल्या बश्या झाकण म्हणून वापरणे… तुटक्या प्लास्टिक बादल्यामध्ये झाडे लावणे… रिकाम्या डालडा-डब्यात तुळस लावण्याचे सत्कार्य ज्या कुणी सर्वप्रथम केले असेल त्याला काटकसर आणि पर्यावरणप्रेमाचे एकत्र नोबेल का बरं देऊ नये?

पूर्ण वापर झाल्याशिवाय फेकणे ह्या गुन्ह्याला त्या सर्वांच्याच राज्यात क्षमा नव्हती. फ्रीजमधे हौसेने आणून ठेवलेल्या आणि न वापरून एक्सपायरी डेटलेल्या सरबताच्या, व्हिनेगरच्या बाटल्या टाकायला काढल्या की सासुमांचा तिळपापड होत असे… “वापरायची नव्हती तर आणली कशाला इतकी महागातली बाटली?आम्ही नाही बाई अश्या वस्तू कधी टाकल्या.” एक्सपायरी डेट नसलेले अमर आयुर्वेदिक काढे त्यांना भारी प्रिय.

वस्तूंचा पुनर्वापर हा शब्द कधीही न ऐकता सासूमांनी त्या कल्पनेची अम्मल बजावणी कितीतरी वर्षे आधीच केलेली होती. साधे इस्त्रीचे कपडे घरी आले तरी त्या कागदाचा बोळा न होता तो रद्दीच्या गठ्ठ्यात जाई आणि त्याला बांधलेला पांढरा दोरा गुंडाळून एका विशिष्ठ ठिकाणी ठेवलेला असे. भेटवस्तुचे चकचकीत रंगीत कागद निगुतीने घडी करून ठेवलेले असत… त्यांच्या पिढीने अश्या अनेक प्रकारे कचरासंवर्धन केले. 

लाकूड,प्लास्टिक,काच आणि कपड्यांचेच  नव्हे, तर तव्यावरच्या उष्णतेचेसुद्धा रीसायकलिंग केले !!!

पोळ्या झाल्यावर त्या तापलेल्या तव्यावरच फोडणी करणे. फोडणीचे काम नसेल तर क्वचित त्या तव्याचा शेक दुधाच्या पातेल्याला देणे. वरणभात शिजल्यावर कुकर गरम असतानाचे तळातले पाणी फोडणीची-वाटी, किंवा दह्याची-वाटी वगैरे ओशट भांडी धुवायला वापरणे हे सर्वमान्य होते.

भांड्याच्या बिळात लपलेले तूप गरम कुकरात ठेवून पातळ करून ते पोळीला लावणे आणि शेवटी ते भांडं घासायला टाकण्यापूर्वी त्यातून हात फिरवून तो ओशटपणा हाता किंवा पायाला चोळणे हे करणारी सासुमांची पिढी आता राहिली नाही.

” काय ती जुनी बोचकी सांभाळून ठेवता तुम्ही? सगळं फेकून द्या ” हे वाक्य त्या पिढीला आमच्या पिढीकडून अनेकदा ऐकायला लागलं असेल. आणि त्या मंडळींनीही नव्या संसारात आमच्या वस्तूंची अडगळ नको म्हणून गपचुप ऐकलेही असेल…. आम्हीही शोर्य दाखवून अशी अनेक प्लास्टिकची, कपड्यांची,भांड्यांची, काचेची, कागदाची बोचकी बेमुर्वतखोरपणाने फेकली आहेत.

जुन्या वस्तू फेकून देऊन नव्या आणणे ह्याला मुळीच डोकं नाही लागत, लागते ती फक्त मस्ती आणि बेफिकिरी…. पण वस्तू ,तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत वापरायला बुध्दी आणि मन ह्या पलीकडेही जाऊन एक पर्यावरण प्रेम लागतं, ज्याचा उल्लेख त्या पिढीने कधी केला नसेल, पण त्या विचाराचं आचरण मात्र आवर्जून केलं. ती पिढी जगलीही तशीच आणि गेलीही तशीच …. शरीराच्या प्रत्येक अवयवाचा पूर्ण वापर करून ते जीर्ण शिर्ण झाल्याशिवाय त्या पिढीतल्या कुणी मरणही पाहिले नाही. सासुमासुद्धा अठ्याईंशी वर्षे परिपूर्ण जगून मग गेल्या.

आज निसर्गाचा, सृष्टीचा पोएटिक जस्टिस लावायला बसलं तर आमच्या पिढीला आणि आमच्या पुढच्या पिढीला निसर्ग पूर्ण जगून नाही देणार. आम्ही न वापरता फेकलेल्या,आणि अकाली टाकलेल्या वस्तूंसारखाच आमच्याही शरीराचा आणि आयुष्याचाही अकाली शेवट होईल आणि आम्हीच ह्या पृथ्वीतलावर तयार केलेल्या, टाकलेल्या वस्तूंच्या कचऱ्यात विलीन होईल असं वाटत राहतं.

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈ 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अशक्य ते शक्य करिता सायास… श्री सुहास कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ अशक्य ते शक्य करिता सायास… श्री सुहास कुलकर्णी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

शिवथरघळची ट्रिप एकंदरीत छान झाली असे म्हणत घरी आलो आणि वेगळीच गोष्ट लक्षात आली. घरी आल्यावर चेहरा धुताना माझ्या पत्नीला ( सौ. मीना ला) जाणवले कि, गळ्यातील लहान मंगळसूत्र गायब आहे. दिवसभरात अनेक ठिकाणी गेलो होतो. कुठे पडले असेल अंदाज बांधणे कठीण. अनेक शक्यतांपैकी एक शक्यता म्हणजे आम्ही वापरलेल्या रेंटल कार मध्ये असू शकते. ड्रायवरशी लगेच संपर्क साधला पण काहीही मिळाले नाही.

निदान कुठे पडले समजले तर काहीतरी करता येईल या विचाराने आमच्यातील डिटेक्टिव्ह जागृत झाला. ट्रिप चे सर्व फोटो झूम करून पाहिले तेव्हा असे लक्षात आले कि शिवथरघळ च्या अलिकडे एका टपरीवर आम्ही चहा भजी खाल्ली तेव्हा मंगळसूत्र होते आणि त्या नंतरच्या फोटोत म्हणजे शिवथरघळ च्या पायर्‍या चढण्यापूर्वी पायथ्याशी काढलेल्या फोटोत मंगळसूत्र नव्हते. याचाच अर्थ एकतर ते गाडीत पडले किंवा पायथ्याशी असलेल्या पार्किंग एरियात पडले. ट्रिप ला बरोबर आलेला मित्र प्रकाश महाजन याच्या कानावर सदर घटना घातली. त्यांनी पण ड्रायवरला पुन्हा शोध घेण्यासाठी सांगितले तसेच दुसर्‍या दिवशी शिवथरघळ च्या ट्रस्टींना फोन करून घटना कानावर घातली.   

दोन चार दिवस फोनाफोनी व पाठपुरावा केल्यानंतर सत्य स्विकारून जीवन चालू होते. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी अचानक फोन आला. सौ. मीनाने तो घेतला.

” हॅलो, आपण मीना कुलकर्णी ना?”

”  हो, आपण कोण ” 

“. मी PNG मधून स्मिता घाटपांडे बोलतीय. आपले मंगळसूत्र हरवले आहे का?” 

” हो ” 

” कुठे हरवले होते? “

” शिवथरघळला” 

” आमच्या सरांबरोबर बोलता का प्लिज?” 

” ओके” 

” नमस्कार मी प्रफुल्ल वाघ. 

आपले मंगळसूत्र कधी हरवले? 

गळसूत्राचा एखादा फोटो आहे का? 

मंगळसूत्राची पावती आहे का?

महाडच्या एका कुटुंबाला आपले मंगळसूत्र सापडले आहे. ते त्यांना द्यायचे आहे. त्यांची फक्त एकच विनंती आहे. आपण त्या मंगळसूत्राचे मालक असल्याची खात्री पटवावी. मग आम्ही तुम्हाला त्यांचा फोन नंबर देऊ. “

तर, हे  कुटुंब कोणते व या स्टोरीत PNG कुठून आले? हा किस्सा जाणून घेणे रोचक आहे.

शिवथरघळहून तीस किलोमीटर अंतरावर महाड येथे पाथरे कुटुंब राहते. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांसह ते सर्वजण त्याच दिवशी शिवथरघळला आले होते. त्या कुटुंबातील आजींना ते मंगळसूत्र सापडले. त्याचवेळी तेथे असलेल्या माकडांनी  आजींची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्या गडबडीत मंगळसूत्राबद्दल कोणाला सांगायचे राहून गेले. त्या नंतर आजींचे आजारपण झाले. त्यानंतर मात्र आजींनी याबद्दल चर्चा केली. आजींचा आणि कुटुंबाचा मानस पक्का होता. मूळ मालक शोधायचा व मंगळसूत्र त्यालाच द्यायचे. 

काम थोडे अवघड होते. शिवाय मंगळसूत्र खोटे असेल तर खटाटोप कशाला असा विचार करून त्यांनी ते मंगळसूत्र ‘ रत्नदीप ज्युवेलर्स ‘ या स्थानिक सोनारास दाखवले. त्यांनी ते खरे असल्याची ग्वाही दिली आणि ते PNG ( पुणे ) यांचेकडून केलेले असल्याचे निदर्शनास आणले. तसेच प्रत्येक दागिन्यावर एक नंबर असतो ज्या आधारे पावती व मालक शोधणे शक्य असते असेही सांगितले. इतकेच नाही तर PNG च्या काही ब्रांचेसला दागिन्यावरील नंबर सांगून माहिती मिळवण्याचा  प्रयत्नही केला पण उपयोग झाला नाही. मग रत्नदीप ज्युवेलर्सने असा सल्ला दिला की पुण्यात सिंहगड रोडवर अभिरुची माॅलमध्ये PNG चे कार्पोरेट आॅफिस आहे तेथे सर्व ब्रांचेसचा एकत्र डेटा असतो त्यामुळे मंगळसूत्राच्या मालकाचा शोध लागू शकतो. 

या घटनेनंतर सुमारे महिनाभराने पाथरे कुटुंबियांस पुण्यातील आजारी नातेवाईकांस भेटावयाचे होते. त्याचवेळी ते PNG च्या कॉर्पोरेट आॅफिसमध्ये मंगळसूत्र घेऊन गेले. मंगळसूत्राची पावती संगणकावर सापडली. मालकाचे नाव कळले  पण त्यावर पत्ता अपूर्ण होता व मोबाईल नंबर चा एक अंक चुकला होता. शोधकार्याच्या अगदी जवळ जाऊन सुद्धा काही साध्य झाले नाही. पाथरे कुटुंबीय नाईलाजाने मंगळसूत्र घेऊन घरी गेले. PNG ने शोधकार्य चालूच ठेवले.  नावावरून जुन्या पावत्या शोधल्या त्यात त्यांना मोबाईल नंबरचा अंदाज आला आणि अखेर 14 फेब्रुवारीला आम्ही त्यांना सापडलो.

आम्ही what’s app वर मंगळसूत्राची पावती पाठवली. मंगळसूत्राचा फोटो नव्हता म्हणून ज्या फोटोत मंगळसूत्र गळ्यात आहे असे ट्रिपचे. ग्रुप फोटो त्यांना पाठवले. पावतीमुळे गाडगीळांची खात्री पटली आणि ग्रुप फोटो पाहून पाथरे कुटुंबियांची. त्यांनी आम्हाला लगेच ओळखले कारण ते आणि आम्ही एकाच दिवशी एकाच वेळी शिवथरघळला होतो.

हे सर्व घडण्यासाठी कष्ट घेणार्‍या पाथरे कुटुंबातील व्यक्ती म्हणजे श्रीयुत महेश व सौ. श्रुती पाथरे. आमचा शोध लागावा म्हणून पाथरे आजी रोज देवाला साकडे घालत होत्या. जर आमची त्यांची भेट झाली नसती तर मंगळसूत्र गंगार्पण करायचे आजींनी ठरवले होते. प्रामाणिकपणाच्या जोडीला प्रामाणिक प्रयत्न केले तर काय घडू शकते याचा हा प्रसंग वस्तुपाठ आहे.

खरंतर पाथरे कुटुंबियांच्या नावाला कुठेही प्रसिद्धी देऊ नये अशी श्रुती पाथरे यांनी विनंती केली होती पण अशी माणसं आजही असतात हे नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे.

पाथरे कुटुंबियांची प्रामाणिक तळमळ गाडगीळांच्या लक्षात आली असावी. रविवर्मा यांच्या चित्राची एक फ्रेम पाथरे यांना देण्यासाठी आमच्या घरी आणून दिली. आम्ही पण त्यांना अल्प भेटवस्तू दिल्या. यावर त्यांनी आम्हाला प्रत्येकाला काही ना काही रिटर्न गिफ्ट म्हणून दिले. महाडच्या ज्या रत्नदीप ज्युवेलर्सने या विषयात मदत केली त्यांची आमची भेट पाथरे यांनी घालून दिली.

आज आम्हाला मंगळसूत्राच्या जोडीला बरेच काही मिळाले. 

मनाने श्रीमंत माणसांचा लाभलेला सहवास

निर्मळ प्रामाणिकपणा

मनापासुन केलेले आदरातिथ्य

प्रसिद्धीपासून दूर स्वभाव

भरभरून देण्याची वृत्ती 

PNG च्या माणसांनी सचोटीने केलेला पाठपुरावा

रत्नदीप सोनारांनी out of the way जाऊन केलेली मदत. 

सर्वच विचारापलिकडचे .

खरोखर हा प्रसंग धन्यतेचा अनुभव देणारा होता.

मंगळसूत्र मिळाल्यावर आम्ही पुन्हा शिवथरघळला गेलो. दर्शन घेतले. समर्थ कृपेनेच हा अद्भुत चमत्कार घडून आला असेच म्हणावे लागेल.

अशी ही साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफल संपूर्ण.

लेखक : श्री सुहास कुलकर्णी

कोथरूड पुणे.

प्रस्तुती : बिल्वा अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? मनमंजुषेतून ?

☆ अस्तित्व आणि अधिकारासाठी दिलेला लढा… ☆ सुश्री सुनीला वैशंपायन 

8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन . स्त्रीचे अस्तित्व आणि अधिकार यासाठी दिलेल्या लढ्याचे स्मरण म्हणून जगभर साजरा केला जाणारा दिवस. Clara Zenth या जर्मन स्त्रीच्या पुढाकाराने हा जगभर पसरला आणि यशस्वी झाला..याची सुरुवात १९१० मध्ये झाली.

असं म्हणतात भरपूर वेळ घेऊन ईश्वराने निर्माण केलेली एक नितांत सुंदर, भावपूर्ण, प्रेमळ, प्रसंगी कणखर अशी कलाकृती म्हणजे स्त्री. “जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती या जगाते उध्दारी “, “क्षणाची पत्नी अनंत काळाची माता ”, “ देवी, राक्षसांचा, दुर्जनांचा संहार करणारी “ वगैरे भारदस्त विधानं जरी तिच्याबद्दल केली गेली असली,  तरी समाजात तिला सहसा कायमच दुय्यम स्थान मिळालेले आपण पाहतो.

एक निर्बल भोगवस्तू म्हणून तिच्यावर अधिकार गाजवण्यासाठी झालेल्या लढाया आणि त्यात  तिने केलेले  आत्मदहन, जोहार हे जसे सर्वश्रुत आहे, तसेच एकीकडे हेही सर्वश्रुत आहे की इतिहासात अनेक शूर स्त्रिया होऊन गेल्या. स्वातंत्र्यलढ्यात अनेक स्त्रियांचे योगदान आहे. आणि आता स्त्रियांच्याच प्रयत्नांनी स्त्रियांना  स्वातंत्र्य आणि समानता मिळत आहे हेही महत्वाचे आहे. अशा सगळ्याच स्त्रियांची आठवण म्हणून हा महिला दिन. 

फक्त अतिशय समजूतदारपणा, प्रेमळपणा, सहनशीलता हे सहज दिसणारे गुणविशेषच नाहीत, तर बुद्धी, कल्पकता, चातुर्य, साहस ,जिद्द, हेही गुणविशेष  पुरुषांइतकेच तिच्यामध्येही आहेत हे स्त्रीने आता वेळोवेळी आणि अनेक क्षेत्रात सिद्ध केले आहे. मी तर म्हणेन की ती multi taskerआहे, आणि हा विशेष गुण पुरुषांमध्ये बराचसा अभावानेच आढळतो हेही आता उघड सत्य ठरले आहे.  म्हणूनच जगाला आवर्जून स्त्रियांची जाहीर दखल घ्यावीशी वाटते. कारण समाजात स्त्रीचे अस्तित्व पुरुषांइतकेच महत्त्वाचे आहे हे सत्य आता विवाद्य राहिलेले नाही. स्त्रीच्या अस्तित्वासाठी आणि अधिकारासाठी सुरु झालेल्या लढ्याचं पहिलं पाऊल आता जणू एक मैलाचा दगड म्हणून इतिहासात कायमचं नोंदलं गेलं आहे. 

मुळातच स्त्री ही पुरुषापेक्षा शक्तीने कमी असते हा निसर्ग नियम आहे. पण काही स्त्रिया यावरही मात करतांना आता वरचेवर दिसून येते. थोडक्यात काय, तर लिंगभेद, रिप्रॉडक्टिव्ह राईट, व्हायलेन्स अब्युज या विरुद्ध तिला द्यावी लागणारी लढाई आता खूपच मिळमिळीत झाली आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. 

विविध संशोधन क्षेत्रे, राजकारण ,सायन्स, मेडिसिन,अर्थ ,खेळ, सैन्यदल, यामध्ये तर ती आता सर्रास आहेच. शिवाय वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्येही तिचा दमदार सहभाग आहे. पोलीसदल, रिक्षा किंवा चारचाकी वाहनचालक, शिक्षणक्षेत्रात लक्षवेधी वाटचाल अशा विविध प्रांतात, आणि अध्यात्मासारख्या सहजसाध्य नसलेल्या प्रांतातही ती यशस्वीपणे मिळवत असलेले ज्ञान…..सगळंच अतिशय कौतुकास्पद. खरंतर आता असे एकही महत्वपूर्ण क्षेत्र उरलेले नाही, जिथे स्त्रीने आपले कर्तृत्व सिद्ध केलेले नाही.  अगदी अवकाशातही भरारी घेण्यात, त्यासाठीच्या अतिशय गुंतागुंतीच्या महत्वपूर्ण संशोधनात  पुरुषांच्या बरोबरीने तिचा सहभाग आहे…. स्त्री आता खरोखरच ‘ स्वयंसिद्धा ‘ ठरलेली आहे. सिंगल मदर म्हणून एकटीने मुलांचे उत्तम संगोपन करण्यात देखील ती यशस्वी झालेली आहे – होते आहे. 

इथे एक गोष्ट आवर्जून सांगायला हवी. शहरवासीयांसाठी अनेक मार्ग खुले असतात. पण विपरीत परिस्थितीतून, आडगावातून पुढे आलेल्या अशाही स्त्रिया आहेत, ज्या “पद्मश्री” पुरस्काराच्या मानकरी आहेत. अशा स्त्रियांबद्दल मला विशेष आदर वाटतो. असे पुरस्कार मिळवणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही जणींचा उल्लेख करायचा तर —

१) मध्यप्रदेशातील काटक्या गोळा करणारी दगडफोड करणारी दुधीयाबाई– एक चित्रकार– पद्मश्री मानकरी

२) कलकत्ता येथील प्रीती कोना–कांथा वर्क

३) छत्तीसगडची कलाकार उषा बारले– नाच

४) झाबुवा ,मध्य प्रदेश, मधील दाम्पत्य शांती आणि रमेश पवार— आदिवासी गुडिया

५) हिमोफेलियावर संशोधन करणाऱ्या डॉक्टर नलिनी पार्थसारथी

६) गणित प्रेमी सुजाता— अनेक पुरस्कार आणि पद्मश्री. 

अर्थात या सगळ्याच्या जोडीने एक वेदनादायक सत्य अजूनही काही ठिकाणी आपले नकोसे अस्तित्व दाखवून देत असते. ठराविक पद्धतीनेच आयुष्य व्यक्तीत केले पाहिजे हा विचार अडाणी अशिक्षित वर्गातच फक्त नसतो, तर तो शिक्षित उच्चभ्रू समाजात देखील दिसतो हेही असेच एक सत्य. छत्तीसगडच्या आदिवासी समाजात जन्मलेली एक लहानशी मुलगी… तिला नाचाची अत्यंत आवड… पण नाच म्हणजे समाजात मान खाली घालायला लावणारी कला… म्हणून बापाने त्या मुलीला विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न केला आणि कोणीही त्याला प्रतिकार केला नाही.  पण ही मुलगी केवळ स्वतःच्या मनोबलावर जिद्दीने त्या परिस्थितीतून आपला मार्ग शोधते आणि स्वतःला सिद्ध करते हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे. अशा अनेक स्त्रिया. अगदी सुधा मूर्ती यांच्यासारख्या प्रचंड बुद्धिवान स्त्रीला देखील जेंडर डिस्क्रिमिनेशनला तोंड द्यावं लागलं. पण त्यांनी खंबीरपणे आणि चिकाटीने सगळ्या अडथळ्यांना यशस्वीरीत्या पार केले आणि   आपली योग्यता सिद्ध करून दाखवली. आज ‘ सुधा मूर्ती ‘ हे नाव कुणाला माहित नाही ? अशी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कर्तबगारी दाखवणाऱ्या किती जणींची नावं घ्यावीत … ज्या सगळ्या पद्म पुरस्कारांच्या मानकरी आहेत …. सर्वांच्या मनात आदराचे स्थान मिळवलेल्या आहेत . 

अर्थात जसे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते म्हणतात, तसेच यशस्वी स्त्रीच्या मागेही पुरुष असतो हे तर खरेच. पण ही गोष्टही स्त्री जास्त दिलखुलासपणे मान्य करते हेही तितकेच खरे.  

८ मार्च प्रमाणेच १३ फेब्रुवारी हा दिवसही श्रीमती सरोजिनी नायडूंच्या स्मरणार्थ ‘ नॅशनल वूमन्स डे ‘ म्हणून साजरा केला जातो. देशबांधणीत हातभार लावलेल्या स्त्रियांचा हा गौरव दिन असतो. कदाचित याची माहिती फारशी सर्वश्रुत नसेल म्हणून इथे आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायलाच हवा. 

या सगळ्या ज्ञात-अज्ञात स्त्रियांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढ्याला… कार्याला आणि… त्यांनी मिळवलेल्या गौरवास्पद यशाला माझं मनःपूर्वक अभिवादन…

संग्राहिका : सुश्री सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराई… लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

? मनमंजुषेतून ?

जगावेगळी ही सबला– जगावेगळी वनराईलेखिका : सुश्री योगिनी पाळंदे ☆ डाॅ. शुभा गोखले

महिलादिनाबद्दल लिहायला घेतलं आणि ती आठवली !!!!!

मी तिला सांगितलं,तुझ्याबद्दल लिहायचं आहे. तर अंगभूत स्थितप्रज्ञतेने म्हणाली …… 

“ इतकं कौतुक आवश्यक आहे का? आणि जर करायचंच असेल तर माझ्या कामात मी एकटी नाही.  माझ्यासोबत माझा नवरा,शेखर आहे आणि या कामात आम्हा उभयतांचे विचार आणि कृती आहेत.”

तर….तिची आणि त्याची गोष्ट ऐका………

ती किलबिलीने उठते… तिनेच जपून वाढवलेला, मोठ्या केलेल्या झाडांवरचे पक्षी तिला उठवतात

कमीतकमी पाणी वापरून ती आन्हिक उरकते .. संततधारी नळ चालू न ठेवता. ती नेमक्या वेळी नेमकेच पाणी वापरते.

आंघोळीच्या वेळी ती साबण लावत नाही. वर्षानुवर्ष ती पाण्याचे रासायनिक प्रदूषण टाळून फक्त हळद-चणापीठ-तांदूळपीठ-मीठ वापरते आहे.

भांडी घासायचे,कपडे धुवायचे साबणही ती रसायनविरहित वापरते.

ती तशीच आहे…. अस्सल आणि  निर्विष. तिच्या घरातून बाहेर जाणारे सांडपाणीसुद्धा तसेच आहे …. 

अस्सल आणि निर्विष. तिचे सांडपाणी मुठेला अशुद्ध करत नाही. 

ती प्लास्टिक वापरत नाही आणि जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर आवर्जून करते.

तिच्या घरच्या ओल्या कचऱ्याचं काळ सोनं होतं…. काही काळाने त्या काळ्याचं-हिरवं होतं.

म्हणून तर तिच्या गच्चीत आणि परसात जादुई-हिरवी उधळण आहे, आणि हिरव्याने परिधान केलेली लाल, गुलाबी, पिवळी, जांभळी, केशरी रंगबरसात आहे. 

तिथेच फुलपाखरांच्या जन्मकहाण्या लिहिल्या जातात. मधमाश्या,भुंगे,चतुर आणि असंख्य पक्षी प्रणयाराधन करतात .. आणि तिच्या ऋणमुक्तीसाठी सकाळी गीत गातात. तिच्या गच्चीत मधमाश्यांच्या पेट्या तर असतातच, पण क्वचित बागेत सापही सापडतात. आलाच एखादा आगंतुक साप घरात, तर ती अविचल राहून situation handle करते …. झुरळ पाहून किंचाळणाऱ्या मला ती क्षणोक्षणी प्रभावित करते. 

कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तिच्या घरात उन्हाळ्यातही पंखा लागत नाही. प्रशस्त खिडक्या आणि भोवतालची झाडं हीच तिची वातानुकूलित यंत्रणा असते.

स्त्री-मुक्तीच्या दांभिक कल्पनांना, ही मुक्ताई फाटा देते. उन्हाळ्यात ती पारंपारिक वाळवणं घालते

आणि घरच्या गच्चीतून मिळालेल्या हळदीचं लोणचंही घालते. लोणच्यापासून ते थेट जिलबीपर्यंत सगळं घरी करते. जुन्या साड्यांच्या गोधड्या शिवते….. बागेतल्या वाळलेल्या फूलपाकळ्यांनी रांगोळीचे रंग बनवते.

गणपती उत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवण्याच्या कार्यशाळासुद्धा घेते…..  

… आणि हे सारे काही करताना ती स्थितप्रज्ञ असते. आपण काही विशेष करतोय असा तिचा अभिनिवेश नसतो. तिचे श्वास, तिचे उच्छ्वास, तिचे शब्द, तिचं वावरणं… हे सगळं एखाद्या सुखदुःखापल्याड पोचलेल्या अभोगी योगिनीसारखे असते. ज्या निसर्गाच्या घरी आपण साठ-सत्तर वर्षांसाठी पाहुणे म्हणून आलोय त्याला आपण माघारी जाताना काय काय देऊन जायचे ह्याचा तिचा सशक्त-विचार तयार आहे.

… म्हणून तर निवृत्तीपूर्वीच निवृत्त होऊन तिने च..क्क….चाळीस एकरांचं एक जंगल विकत घेतलं आहे..

जं..ग..ल….

त्या जंगलाला तिने प्राणपणाने जपलंय, वाढवलंय. तिथे आंबा-काजू अशी कोकण-स्पेशल लागवड नाही.

तिथे तिने निसर्गाला हवं-तसं,हवं-तेवढं वाढू दिलंय. छोट्या-मध्यम-महाकाय वेली, छोटी-मोठी झुडुपे,

छोटे-मध्यम-महाकाय वृक्ष …… 

सूक्ष्मकिड्यापासून ते फुलपाखरापर्यंत आणि  साळिंदरापासून ते गव्यापर्यंतचे सगळे प्राणी त्या जंगलाला आपलं-घर मानतात….. तो हिरवा-जंगल-सुगंध मी घेतलाय. तिथली ती शाश्वत शांतता.. तिथे साधलेला स्व-संवाद.. सृष्टीची खोल गाभ्यापर्यंत पोचलेली हाक मी ऐकली आहे.

तिने निसर्गाला घातलेल्या सादेला त्याने भरभरून दिलेलं हिरवगच्च प्रतीउत्तर मी त्या जंगलात पाहिलं आहे.

हे सगळं कल्पनेपलीकडचं आहे असं म्हणत आपण आपलंच खुजेपण कुरवाळत राहायचं का? ह्यातलं थोडतरी आपण करू शकतो का???

… शहरात राहणारी, उच्चविद्याविभूषित असलेली, कॉर्पोरेट महिला, एका जीवावर बेतलेल्या अपघातानंतर पुन्हा उभी राहून हे सगळ करत असेल तर आपण ‘आम्हाला नाही बुवा असलं काही जमणार’  हा मंत्र जपणार का? …. आपण तिच्यासारखा शाश्वत-वसा घेऊ शकतो का?? …. घ्यायची इच्छा तरी आहे का?? …. एखादी तरी कृती त्यादिशेने होईल का?…. 

… तिने चाळीस एकर जंगल जपलंय !!! मी दहा स्क्वेअरफुटात काही हिरवं लावेन का??

… मी प्लास्टिक वापरण सोडीन का??

… जर वापरलंच तर त्याचा पुनर्वापर करीन का??

…. पाणी कमीत कमी वापरून बघेन का???

… आठवड्यात दोन दिवस बिनासाबणाची आंघोळ नाक न मुरडता करेन का???

… मी निसर्गाचे देणे मानेन का???

… त्याची ऋणजाण पावलोपावली ठेवेन का???

… प्रश्नांची घुसळण मनात येते आणि… ते प्रश्न-काहूर माझ्या मनात आठ मार्च जवळ आला की जास्तच उधळतं. कारण तेव्हा मी शोधत असते…. ऑफिसच्या महिला-दिनाची पाहुणी.  पण ते कुठेही शोधायची गरज नसतेच.  

… कारण…ती जी कुणी आहे ना….  ती कायमच असते…….. माझ्या मनातल्या महिला-दिनाची पाहुणी..

जिचं नाव असतं …….. शिवांगी चंद्रशेखर दातार !!!!!!

लेखिका : सुश्री योगिनी पाळंदे

प्रस्तुती :  डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

??

☆ फक्त चौकट काढा…अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे

“साहेब गाडीची डिलिव्हरी घ्यायला किती वाजता  येणार?”

“मॅडम येतील. त्यांचा नंबर फॉरवर्ड करतो. त्यांच्या वेळेबद्दल त्यांच्याशी बोलून घ्या.”

“पण साहेब गाडी मोठी आहे.”

“मग काय झालं? घेऊन येतील त्या. तुम्ही बोला त्यांच्याशी”

नवी कोरी गाडी घरी आणण्यासाठी विश्वासाने (बायकांच्या गाडी चालवण्याबद्दल अनेक पोस्ट , अनेक जोक्स  सोशल मीडियावर फिरत असतात) नवऱ्याने माझा नंबर डीलरला दिला …त्यादिवशीच खरं माझा महिला दिन साजरा झाला.

**************

इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी दुकानात गेलेल्या दिरांनी सेल्समनला माझा नंबर लावून दिला आणि प्रॉडक्ट विषयी माहिती द्यायला सांगितले.

“या सगळ्या माहितीवरून तुच ठरव बाई कुठलं घ्यायचं ते आम्हाला त्यातलं काही कळत नाही.”

माझा त्या क्षेत्रातील शिक्षणाचा असाही सन्मान झाला…. त्याच वेळी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

एका कार्यक्रमासाठी नातेवाईक घरी जमले होते. खूप प्रयत्न करूनही ऑफिसच्या कामामुळे घरी जायला उशीर झालाच. सचिंत मनाने घरी पोहोचले आणि पटकन आवरायला घेतलं.

बाहेरून सासूबाईंचा आवाज ऐकू आला

“मनु आईला हा एवढा चहा नेऊन दे. दमून आलीये ती. खूप काम असतं आताशा तिला ऑफिसमध्ये.”

सगळ्या नातेवाईकांसमोर जेव्हा एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या कर्तुत्वाचा आदर केला… त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“काही अडचण आली ना तर तुझ्याशी बोललं की बरं वाटतं. आपोआप सोल्युशन्स मिळत जातात आणि सगळे प्रॉब्लेम चुटकीसरशी सुटतात.” जेव्हा  बहिणी, मित्र-मैत्रिणी अशी सुरुवात करून त्यांचा प्रॉब्लेम विश्वासाने सांगतात आणि माझ्यावर अवलंबून राहतात …त्याच दिवशी खरं तर माझा महिला दिन साजरा झाला

****************

लेकीच्या कॉलेजमधील माझ्या आयुष्यातील हिरो या विषयावरील भाषण स्पर्धेत  हिरो म्हणून तिने माझं नाव घेतलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्यांनी सभागृह दणाणून सोडलं…

 खरंच सांगते त्या दिवशी माझा महिला दिन साजरा झाला

****************

“तुम्ही नक्की करू शकता हे काम. काहीच अवघड नाही. Pl. Go ahead. We believe in your capabilities” पुरुषांच्या बरोबरीने कामाची जबाबदारीही तितक्याच आश्वस्तपणे बॉसने खांद्यावर टाकली, आणि सफलेतही भागीदारी दिली.. त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

****************

“मुली आहेत म्हणून काय झालं? माझ्या मुली माझा आधार आहेत.. अभिमान आहेत” असं म्हणत वडिलांनी पुढे प्रॉपर्टीबरोबरच खांदा आणि अग्नी देण्याचा अधिकारही आम्हाला बहाल केला. त्यांचं हे मानस ऐकलं… आणि खरं सांगते त्याच दिवशी माझा महिला दिन साजरा झाला.

*****************

नेहमीप्रमाणे नवऱ्याने ऑफिसला जाताना जवळ घेऊन आज Love you न म्हणता ‘ आम्हाला तुझा अभिमान आहे ‘ असं म्हटलं आणि सकाळी सकाळीच खरं सांगते माझा महिला दिन साजरा झाला.

महिलादिन म्हणजे महिलांसाठी विविध कार्यक्रम… कुठेतरी सवलतीच्या दरात काहीतरी उपलब्ध करून देणे किंवा  वेगवेगळ्या  पुरस्कारांची लयलूट करणे नाही.   इतक्या क्षुल्लक गोष्टींतून कोणी स्त्रीच्या आयुष्यात आनंद आणू शकत नाही…

महिलांच्या सबलीकरणावर आतापर्यंत बऱ्याच महिलांनी तसेच त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या पुरुष सहकार्यांनी सुद्धा  विविध स्तरांवर अवलोकन केले आहे.

डॉ. शुभांगी कुलकर्णी यांची एक अतिशय सुंदर कविता वाचनात आली होती. 

“ती स्त्री आरशाला विचारते–  

कसा आहेस?

आरसा म्हणतो ठीकाय..

फक्त ती चौकट तेवढी काढून टाक.. गुदमरायला होतंय.

तिने चौकट काढली आणि तेव्हापासून तिचा उत्फुल्ल चेहरा आरशात कधी मावलाच नाही…”

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे, भ्रमणध्वनी:-  9860006595

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

? मनमंजुषेतून ?

☆ दडपण — महिला दिनाचे !!… ☆ सुश्री अश्विनी अभ्यंकर ☆

मला ‘महिला दिन’ आला की दडपण येते… महिला दिनी मला काय वाटले पाहिजे, मी काय केले पाहिजे, कसे वागले पाहिजे म्हणजे महिला दिनाचा आनंद मला आहे असे प्रतीत होईल, हे मला कळत नाही. एकाहून एक सुंदर आणि कलात्मक banners, भावनेला हात घालणारे संदेश, स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणारे लेख, ह्यांनी फोन भरून गेलेला असतो. ह्या दिवसाच्या निमित्ताने गोष्टींचा व्यापक आढावा घेणे, सिंहावलोकन करणे, हे कुठेच दिसत नाही. फक्त उत्सवी प्रक्षेपण दिसते. 

वास्तविक भारत हा खूप मोठा देश आहे आणि ज्याला जसा पाहिजे तसा तो त्याला दिसतो. म्हणजे देशातल्या सर्व महिला आपल्या सारख्याच आहेत, असा भाबडा समज होऊ शकतो. खरं तर आपला देश म्हणजे वीसेक युरोपीय देशांचा ऐवज होय. तर मग वीस प्रदेश, त्यांच्या भाषा, संस्कृती, समाजव्यवस्था – आणि ओघानेच तितक्याच प्रकारात मोडणाऱ्या महिला. त्यात भर म्हणून प्रत्येक प्रांतातले विविध स्तर – प्रिविलेज्ड क्लास, एन्टायटल्ड क्लास, अंडर प्रिव्हिलेज्ड क्लास, असे अनेक. शिवाय धर्म, जात इत्यादी वर्गीकरणं, ती तर आहेतच. ह्या व इतर प्रकारात मोडणाऱ्या महिला, त्यांच्या समस्या, कसोट्या, अडचणी एका सूत्रात बांधता येतील का? मग महिला दिन हा सगळ्यांसाठी एकच प्रकारात मोडेल का? मला जे वाटते तेच माझ्यापासून शंभर किलोमीटरवर राहणाऱ्या महिलेला वाटेल का? मग महिला दिन सामान्यकृत असू शकतो का?

काय केले किंवा कसे वागले म्हणजे आपण योग्य अर्थाने स्त्री म्हणून स्वाभिमानाने आणि आनंदाने जगू शकू? काय विचार केल्याने आपण खऱ्या अर्थाने मुक्त पण जबाबदारपणे आयुष्य जगू शकू? कुठल्या दिशेने आपल्याला ‘स्व’चा शोध होऊ शकेल? महिला म्हणून आपल्या स्वतःकडून काय अपेक्षा आहेत?  त्याचप्रमाणे महिला म्हणून इतरांनी आपल्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात?—- अनेक वर्षं शोषण व अन्याय सहन करणाऱ्या वर्गाच्या हातात अधिकाराचे बळ आले की तोच वर्ग तसेच शोषण आणि अन्याय करू लागतो हा अनुभव खरं तर बऱ्याचदा येणारा. मग आता स्त्रीच्या बाबतीतही ही अशीच व्याख्या होणार नाहीये ना? आपल्याला स्त्री म्हणून विशेषाधिकार हवा आहे का समानाधिकार? —– ह्या व अश्या अनेक गोष्टींचे विचार महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी माझ्या डोक्यामध्ये येतात. त्यामधे एक भीती देखील वाटते….. स्त्रीची खरी अस्मिता आणि भावना या ‘ महिला दिना ‘च्या गलक्यात हरवत जात नाहीये ना? नाहीतर स्त्री समानता, स्त्रीमुक्ती, महिला सशक्तीकरण या चळवळी, फक्त दिसायला सुरेख असणाऱ्या banners आणि भाषिक सौंदर्य असणार्‍या संदेशापलीकडे जाऊच शकणार नाहीत !… असेही होऊ शकते की …

© सुश्री अश्विनी अभ्यंकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे   

? मनमंजुषेतून ?

☆ पूर्णांगिनी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

(अंतरराष्ट्रीय महिला दिन 2023)

नवरा बायको, दोन मुलं वा एक मूल अशी साधारण कुटुंबाची हल्ली रचना आढळते. संयुक्त कुटुंब पद्धती आता कमी होऊ लागली आहे. या आगोदर कोणत्याही कारणाने जोडीदाराचा मृत्यू झाला तर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सर्वस्वी सासरच्या किंवा माहेरच्या लोकांवर अवलंबून राहावे लागत असे. एका बाजूला तिची ते त्यांच्या परीने जबाबदारी उचलताना दिसत होते. दूसऱ्या बाजूला तिला कुणाकडूनही मदत न मिळाल्याने तिची खूप वाईट अवस्था होत असे. आता ही काही ठिकाणी हे पाहावयास मिळत आहे. सावित्रीजोतीबांनी शाळेची सुरुवात केली त्या काळात जे स्त्रीयांचे हाल होते ते आता कमी झाले आहे. तेव्हा पेक्षा बराच बदल झालेला आहे. त्यावेळी मुलींचे शिक्षण खूपच कमी असायचे अगदी वाचायला येण्या इतपतच होते. हल्ली मुलींचे माध्यमिक तसेत उच्च माध्यमिक शिक्षणाचे प्रमाण चांगले आहे. त्यांचे स्वाभिमान, आत्मभान जागृत होताना दिसत आहे. अडथळे कमी झालेले नाहीत वा पुरुषसत्ताक/ पितृसत्ताक  व्यवस्थेत खूप काही अफलातून बदल झालेले दिसून येत नाहीत, तरीही शिक्षणाने इच्छाशक्ती व आत्मविश्वास वाढला आहे असे म्हणता येईल. सावित्रीजोतीबांच्या आणि बाबासाहेबांच्या योगदानाचे हे फलित आहे. हे विसरुन चालणार नाही. कुणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी होण्याची इच्छा प्रबळ होताना दिसते आहे. त्या प्रबळ ईच्छाशक्तीला सहकार्याची जोड म्हणावी तशी मिळत नाही. सगळेच अलबेला आहे असे नाही पण जात्यापासून काॕम्पुटर, स्मार्ट फोन पर्यंतचा तिचा प्रवास अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतही उठावदार झाला आहे.

बायका स्वबळावर कुणाचाही आधार नसताना खूप घडपडताना दिसतात. यात सुशिक्षित आणि अशिक्षित असा भेद होऊ शकत नाही. करुच नये. प्रत्येक स्त्री स्वतःच्या कौशल्याचा कुटुंबासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहे. 

जोडीदाराचा अचानक मृत्यू झाल्यावर अथवा शेतकरी कुटुंबात व इतर व्यवसायात जोडीदाराने अनेक अडचणींना तोंड देताना आलेल्या मानसिक तणावाने स्वतःचे जीवन संपवलेले असले तरी या महिला हिंमतीने जगणं उभे करताना दिसतात. कोविडच्या काळात अनेक जणींनी जोडीदार गमावला. अशा एकल स्त्रीया न खचता पुर्णांगीनी होऊन आई व बापाची भूमिका निभावताना दिसतात. अजूनही पुनर्रविवाह म्हणावे इतके होत नाही. शिवाय विधूर पुनर्विवाहासाठी कुमारीच शोधताना दिसतात. विधवांच्या पर्यायाचा विचार पुनर्विवाहासाठी विधूर करीत नसतील तर त्यांना त्या अगोदरच्या आपत्यासहित स्विकारणे तर दूरची गोष्ट. अगदीच अपवाद म्हणून कुठेतरी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आपत्यासहित विधवेशी लग्न करणारे दिसतात. फुलेंनी त्यांच्या काळात सुरु केलेले विधवा पुनर्रविवाह अजूनही प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. पण विधवा बायका स्वबळावर ताठ मानेने जगताना दिसतात. किंवा काही महिला लग्न न करता अथवा लग्न राहून गेलेल्या स्वतःच्या हिंमतीवर जगताना दिसतात. हे चित्र माणूस म्हणून आनंदादायी आहे. अशांनाच मला पूर्णांगिनी म्हणायचे आहे.

माझ्या मते कर्तव्यतत्पर, निस्पृह, निष्कपट, निःस्वार्थी, परोपकारी, धेय्याला समर्पित, जगण्याची आस असलेले, मृदू पण तितकेच कठोर आणि कणखर ते नेहमी सुंदर…! 

माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सुंदर असलेल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. यांचे जोडीदार तसे नावापुरतेच जोडीला होते. काही करकोळ गोष्टी सोडल्या तर मुलं जन्माला घालण्यातच जोडीदाराचा काय तो सहभाग. अन्यथा संसाराचा गाडा या माऊलींनीच पुढे ओढत नेला. जोडीदार सोडून गेल्यावरही कोणत्याही प्रसंगाला बळी न पडता, सामाजिक व्यवस्थेला शरण न जाता, प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ जगण्यावर त्यांनी मनापासून प्रेम केले. अतिशय कष्टाने, परिश्रमाने जीवनाची वाट चालत त्या जगण्यावर स्वार झाल्या. माणूस म्हणून अनेक प्रसंगाशी दोन हात करत स्वतःला जिंकत आल्या. अशा सखींचा मला खूप अभिमान आहे..! त्या खऱ्या अर्थाने पूर्णांगिनी आहेत. असे मला वाटते.

खरंतर शेतीचा शोध लावणारी, मातृत्व पेलणारी, संगोपन करणारी, समर्पणाने मानवी मुल्ये पेरणारी, शिवबा घडवणारी, वेळप्रसंगी युद्धात लढणारी, आणि युद्धापेक्षा बुद्ध मानणारी ती कधीच दुर्बल नव्हती. पण व्यवस्थेने तिला एकीकडे देवीचा दर्जा दिला त्याचवेळी तिला अबला, दुर्बल, दुय्यम ठरविले आणि तिच्यावर अन्याय होत गेला. सत्ता संपत्तीला खूप महत्त्व आले. क्रांती प्रतिक्रांती आणि परत क्रांती होत महिला सबलीकरण सुरु झाले. आता प्रत्येक जण महिलांना सक्षम करण्यात गर्क आहे. पण या सक्षम झालेल्या महिलांशी पुरुषांनी योग्य रीतीने वागावे यासाठी त्यांची मानसिकता घडविण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. ही आजची खंत आहे. म्हणून पुरुष सबलिकरणाची गरज भासू लागली आहे. 

आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमपणे उभी आहे. तिच्या शिवाय जन्मच नाही. पण तिची तारेवरची कसरत चालू आहे. मदतीचा हात तिला कुणाकडून मिळत नाही. तिच्या मनात दाटलेले काळे ढग कुणाला दिसतील का? तिने पापण्यांपर्यंत आडविलेला पाऊस कुणाला जाणवेल का ? वादळातही मन सावरुन इतरांसाठी झटणारी ती कधी कुणाला उमगेल का ? आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला वेळीच साथ मिळेल का ? का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे? मुक्त वावरावे अनिर्बध, स्वतःला शोधण्यासाठी?….. 

ती म्हणेल कधीतरी तळमळून “नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण.” मग काय कराल ?  माणूसपणाच्या सागरात तिलाही डुंबायचे आहे. त्यामुळे वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा नाहीतर विपरीत घडेल ! आई, आईपण दोन्ही गोठून जाईल !

ग्रामीण भागातील सखी तर कुणी कितीही पसरो, ती मुकाट्याने आवरत असते. काबाड कष्ट करून मुलांना वाढवते. जगण्याच्या शोधात कामानिमित्त  रानोरान भटकते. अनेक संकटांना निमूटपणे सहन करते. मध्येच जोडीदाराचा साथ सुटला तरी हिंमतीनं पोटच्या मुलांसाठी झटते. मुलांच्या शिक्षणासाठी जीवाचं रान करताना दिसते. वेळप्रसंगी अनेकांच्या समोर पदर पसरते. पण हार मानत नाही. मनातली घुसमट कोंबून ठेवते. ठेच लागली तरी एकाचवेळी डोक्यावरील घागर आणि कडेवरचं तान्हुलं बाळ अलगद सावरताना दिसते. अनेक वेदना घेऊन हसणं जपून ठेवते. तिच्या समर्पणाची, कष्टाची, आणि सहनशीलतेची कला कुणाला कधीच जमणार नाही, असे मला वाटते. अशा माणसातील पूर्णांगिनी आईला मी मनापासून मनापासून सलाम् करते. शेवटी जाताजाता माझ्याच कवितेतून मला एवढेच म्हणावेसे वाटते की …… 

तू कोणाशी बरोबरी करु नकोस, 

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जन्मदात्री, तू संगोपन करणारी

तू शेतीचा शोध लावणारी

त्यागाची परिभाषा तू

सती जाणारी ही तूच

युद्धापेक्षा बुद्ध मानणारी तू 

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू जिजाऊ, तू सावित्री 

तू झाशीची राणी, तू रणरागिणी

तू इंदिरा, तू कल्पना चावला,

अनेक रूपात, अनेक क्षेत्रात

पाय रोवून उभी आहेस तू,

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तू सुंदर आहेस, कर्तृत्ववान आहेस 

चेहऱ्याला लेप लावून सजवू नकोस 

तू नितळ, निर्मळ, प्रेमळ, आहेस 

तू निधर्मी व विज्ञानवादी हो 

तू दैववादात अडकू नकोस,

प्रयत्नवाद कधी सोडू नकोस 

तूच कुटुंबाचा गाभा आहेस..

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!

 

तुला कुणी विकू नये.

तुला कुणी विकत घेऊ नये..

अशी आईच्या हृदयाची माणसं

तूच घडवू शकतेस..

बलात्कार, अन्याय, अत्याचार तू 

स्वतःच थांबवू शकतेस…

तू सर्व सामर्थ्याने पेटून उठू शकतेस

तू कोणाशी बरोबरी करु नको,

तू सदैव एक पाऊल पुढे आहेस..!…. 

 

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9767812692/9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ फ्यूज उडालेले बल्ब… लेखक – जोशी काका ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

सर्व फ्यूज उडालेले बल्ब एक सारखेच असतात !…… 

एक वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावर महालासारखे सरकारी घर सोडून एका हाउसिंग सोसायटीत, त्यांच्या स्वत:च्या फ्लॅट मध्ये राहायला गेले. ते सेवा निवृत्त असले तरी, अजूनही स्वतःला एक मोठा अधिकारी समजत असतं आणि कधीही कोणाशी जास्त बोलत नसतं. ते दररोज संध्याकाळी सोसायटीच्या पार्क मध्ये फिरत असतांनासुद्धा, दुसऱ्यांची उपेक्षा करत आणि तिरस्कृत नजरेने पाहात असत.

एके दिवशी त्यांच्या शेजारी बसलेल्या एका ज्येष्ठ गृहस्थाने त्यांच्याशी संभाषण सुरू केले आणि हळूहळू या गप्पा-गोष्टी पुढेही चालू राहिल्या. आता ते दोघे रोज संध्याकाळी भेटत आणि खूप गप्पा मारत.  

प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे बहुत करून एकतर्फी असे, कारण ते निवृत्त होऊन आलेले अधिकारी एक सारखे फक्त स्वतःबद्दलच बोलत असत. 

ते कधीही बोलायला लागले की म्हणायचे, “सेवानिवृत्त व्हायच्या आधी मी इतक्या पदावर कार्यरत होतो, की तुमच्यापैकी कोणीही त्या पदाची कल्पनासुद्धा करू शकणार नाही, केवळ नाइलाज आहे म्हणून मी येथे आलो आहे.” आणि ते गृहस्थ अशाच अनेक गप्पा करत असत आणि ते दुसरे वयस्कर गृहस्थ शांतपणे  त्यांचे सगळे बोलणे ऐकून घेत असत.

बरेच दिवसांनंतर एके दिवशी त्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इतर ज्येष्ठ नागरिकांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता दाखविली, तेव्हा मग त्या गृहस्थाने इतर प्रत्येक व्यक्तीची माहिती देण्यास सुरुवात केली.

ते म्हणाले, “सेवानिवृत्त झाल्यावर, आपण सगळेच फ्यूज उडालेल्या बल्बसारखे असतो. याने काही फरक पडत नाही की त्या बल्बची वॅट क्षमता किती होती, फ्यूज व्हायच्या आधी त्याने किती प्रकाश अथवा उजेड दिला.”

पुढे ते म्हणाले, “मागील 5 वर्षांपासून मी ह्या सोसायटीत रहात आहे, परंतु आजपर्यंत कोणालाही हे सांगितले नाही की मी दोन वेळा सांसद म्हणून राहिलो होतो. तुमच्या उजवीकडे वर्माजी आहेत, जे भारतीय रेल्वेत महाप्रबन्धक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तिकडे सिंग साहेब आहेत, जे सेनेत मेजर जनरल होते.  तिकडे बाकावर पांढऱ्या शुभ्र पोशाखात बसलेले ते गृहस्थ मेहराजी आहेत, जे इस्रो (ISRO) च्या प्रमुख पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत.

— आजपर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, अगदी मलासुद्धा, पण मला  माहीत आहे—- 

“सगळे फ्यूज उडालेले बल्ब आता  एक समानच आहेत – त्यांची वॅट क्षमता काहीही असो  – 0, 10, 40, 60, 100 वॅट – आता त्याने काहीही फरक पडत नाही. आणि यामुळेसुद्धा काही फरक पडत नाही की फ्यूज  उडायच्या आधी तो कोणत्या प्रकारचा बल्ब होता – एलईडी, सीएफएल, हॅलोजन, फ्लोरोसेंट, किंवा सजावटीचा.

— आणि माझ्या मित्रा, हीच गोष्ट तुलासुद्धा लागू होते— 

ज्या दिवशी तुला ही गोष्ट समजेल, त्यादिवशी तुला या सोसायटीतसुद्धा शांती आणि समाधान लाभेल.

उगवता सूर्य आणि मावळता सूर्य दोन्ही अतिशय सुंदर आणि मनमोहक दिसतात.

परंतु, खरे पाहता उगवत्या सूर्याला जास्त महत्त्व दिले जाते. इतके की त्याची पूजा सुद्धा केली जाते. पण मावळत्या सूर्याला तितके जास्त महत्त्व दिले जात नाही. ही गोष्ट जितक्या लवकर  समजेल तितके चांगले आहे.”

आपलं वर्तमान पद, नाव आणि रुबाब हे स्थायी नसतात. 

या गोष्टींबद्दल जास्त जिव्हाळा व आसक्ती ठेवली असता, आपले जीवन अधिकच गुंतागुंतीचे होते कारण एके दिवशी आपण ह्या सर्व गोष्टींना मुकणार असतो. 

— लक्षात ठेवा की जेव्हा खेळ संपतो, तेव्हा राजा आणि प्यादे एकाच डब्यात बंदिस्त होतात. 

— आज, आपल्या जवळ जे काही आहे त्याचा आनंद घ्या आणि भविष्यात उत्तम जीवन जगा .

लेखक : जोशी काका

प्रस्तुती : सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print