मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग 2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

(धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. … आता पुढे)

त्याचदिवशी आमच्या गिरगावातल्या ठाकूरद्वार नाक्यावरचे  इराणी हॉटेल ” सनशाईन ” चा शेवटचा दिवस होता. त्यानंतर ते हॉटेल कायमचे बंद होणार होते. आमच्या लहानपणीच्या कडक ब्रून मस्का पाव आणि मावा सामोसाच्या आठवणी त्या हॉटेलशी निगडित होत्या त्यामुळे माझ्या मित्रांबरोबर मॅरेथॉन मेडल मिळाल्याचे सेलिब्रेशन हे ठाकूरद्वारच्या सनशाइन इराण्याकडेच झाले.

४८ व्या मेडल साठी  १० डिसेंबर २०२२ अभिजित भोसले, निखिल पोवार आणि मी असे आम्ही तिघे जण गोव्याला गेलो. ज्या ठिकाणी मी माझे पहिले मॅरेथॉन मेडल कमविले होते तेथे मधली कोरोनाची २ वर्षे सोडली तर दरवर्षी मी धावायला जात आलो आहे. अभिजित आणि निखिल पोवार  ह्यांनी १० कि मी मध्ये भाग घेतला होता तर. मी २१ कि मी मॅरेथॉन धावलो. गोव्याचा धावण्याचा मार्ग हा चढ उताराचा असल्याने आणि तेथील हवेतली आद्रता जास्त असल्याने, तेथे धावताना चांगली वेळ देणं खूप कठीण असते तरीही मी ती  मॅरेथॉन २ तास ५२ मिनिटात धाऊन पुरी करून माझे ४८ वे मॅरेथॉन मेडल मिळविले.

आता पुढची मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ ला होती ती, आपल्या भारतातली १ नंबरची मॅरेथॉन म्हणजेच टाटा मुंबई मॅरेथॉन. त्या मॅरेथॉनसाठी धावायला खूप जण उत्सुक असतात पण सगळ्यांनाच धावायला मिळतेच असे नसते. त्याचे रजिस्ट्रेशन खूप आधी करायला लागते. ह्या नावाजलेल्या मॅरेथॉनसाठी ह्यावर्षी जवळ जवळ ५५००० जणांनी भाग घेतला होता. ह्या मॅरेथॉन मार्गात एक केम्प्स कॉर्नरचा ब्रिज काय तो चढ लागतो बाकी सरळ रस्ता, समुद्र किनारा, वांद्रे सी लिंक आणि हवेतील गारठा ह्यामुळे ह्या मॅरेथॉनला धावायला खूप मजा येते. धावण्याच्या मार्गात आम्हा रनर्सना चिअर अप करायला दुतर्फा खूप माणसे उभी असतात त्यामुळे धावायला जोर ही येतो. ह्यावर्षी वातावरणात अती थंडावा असल्याने आम्हां सगळ्या रनर्सना ह्या मॅरेथॉनचा चांगल्या तऱ्हेने आनंद घेता आला त्यामुळे हे माझे २१ कि मी धाऊन ४९ वे मॅरेथॉन मेडल मी २ तास ३२ मिनटात मिळविले. तेथेच गिरगांव  चौपाटीच्या आयडियल हॉटेल मध्ये नेहमी प्रमाणेच माझ्या काही गिरगावातल्या मित्रांबरोबर सेलिब्रेशन करून माझ्या ५० व्या मॅरेथॉन मेडल साठी सगळ्या मित्रांच्या शुभेच्छा घेतल्या.

आता वेध लागले ते माझ्या ५० व्या मॅरेथॉनचे. १२ फेब्रुवारी २०२३ ला हिरानंदानी ठाणे हाल्फ मॅरेथॉन होती. माझे होम पीच. ह्यावेळेला गेल्या महिन्यांत माझ्याबरोबर गोव्याला धावलेला माझा मित्र निखिल पोवार हा ही धावणार होता. गोव्याला त्याची पहिलीच मॅरेथॉन तो दहा कि मी धावला होता पण हिरानंदानी मॅरेथॉनसाठी त्यांनी माझ्या आग्रहात्सव २१ कि. मी.मध्ये सहभाग घेतला होता. ही मॅरेथॉन हिरानंदानी इस्टेट पासून चालू होऊन ब्रह्माण्ड वरून हायवे क्रॉस करून खेवरा सर्कल, उपवन ते थेट येऊर डोंगरच्या पायथ्याशी जाऊन परत फिरते. तसे  बघायला गेलो तर ह्या मॅरेथॉनचा मार्ग चढणीचा असल्याने मॅरेथॉनची चांगली वेळ नोंदवणे कठीण असते. पहाटे ५.३० ला मिलिंद सोमण ह्याने मॅरेथॉनला फ्लॅग दाखवून धावायला सुरवात झाली. निखिल आणि मी बरोबरीने धावत होतो. दोघेही एकमेकांना साथ देत होतो. काही वेळेला मी पुढे गेलो तर निखिल मागून त्याचा वेग वाढवून माझ्या बरोबर धावत होता. आम्ही दोघेही १६ कि मी पर्यंत पुरते दमलो होतो. निखिल तरुण वयाचा तिशीतला जरी असला तरी त्याच्याकडे धावण्याचा अनुभव कमी होता तर माझ्याकडे धावण्याचा दांडगा अनुभव जरी असला तरी वाढीव वयाचा अडसर होत होता. शेवटचे दोन किमी खूप थकायला झाले होते तरीही ही माझी ५० वी मॅरेथॉन मी २ तास २९ मिनिटांत पूर्ण केली आणि माझे ५० वे मेडल माझ्या गळ्यात पडले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिला आला तरच जिंकला असे नसते तर स्वतःचा चांगला परफॉर्मन्स देणे म्हणजे जिंकल्यासारखेच असते आणि तो मी माझ्या ५० व्या मॅरेथॉनला दिला होता.

हे ५० वे मेडल म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातली मोठी कमाई आहे. माझी ही सगळी ५० मेडल म्हणजे माझ्या तिजोरीतली नाही तर भिंतीवर प्रदर्शित केलेली माझी अनमोल संपत्ती आहे, जिची कधीही, कोणीही किंमत करू शकत नाही तसेच ती कोणीही माझ्यापासून चोरून किंवा हिरावून घेऊ शकत नाही. मॅरेथॉनचा ५० मेडलचा एक टप्पा मी पार केला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच  १३ फेब्रुवारील मला ६२ वर्षे पूर्ण होणार होती त्याच्या एक दिवस आधी देवानेच मला मोठे बक्षीस मिळवून दिले होते, अर्थात ह्या मध्ये माझे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी आणि रेषा चा हातभार खूप आहे. तुमचे माझ्यावरचे प्रेम आणि तुम्ही मला देत असलेले प्रोत्साहन, ह्यामुळेच मला धावायला अजून ऊर्जा मिळते.

… असेच माझ्यावरचे प्रेम तुमचे द्विगुणित होऊ दे आणि माझ्या धावण्यासाठी तुम्ही देत असलेले प्रोत्साहन मला मिळत राहिले  तर पुढच्या पाच वर्षात माझे १०० वे मॅरेथॉन मेडल नक्की माझ्या गळ्यात असेल ह्याची मला खात्री आहे.

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

??

☆ पन्नासावे मॅरेथॉन मेडल… भाग १ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

२०२२ च्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीलाच लिखाण बंद करून मॅरेथॉनसाठी धावायचा सराव चालू केला. एक महिन्यापूर्वीच डेंगू आजारातून बाहेर आल्याने धावतांना जरा अशक्तपणा जाणवत होता. सुरवातीला खूपच कठीण वाटत होते. लिखाणासाठी रात्रीचे जागरण करायची सवय झाल्याने पहाटे पाच वाजता उठून धावायला जाणे जरा कठीणच जात होते, धावायला सुरवात केल्यावर जरा २०० मिटर ते ३०० मिटर धावल्यावर दमायला होत होते. पहिला आठवडा जरा तणावातच गेला. १६ फेब्रुवारी २०२० ला ठाण्यामध्ये ठाणे हिरानंदानी ही शेवटची २१.०२ किलोमीटर ची मॅरेथॉन धावलो होतो, त्यांनतर मार्चपासून लॉकडाऊन चालू झाले आणि आणि पुढची अडीच वर्षे म्हणजेच नोव्हेंबर २०२२ पर्यंत एकही मॅरेथॉन झाली नाही आणि मॅरेथॉन नसल्याने धावायची सवयही गेली होती. ह्या लॉकडाऊन काळात खूप लिखाणआणि चालणे झाले, तरी धावणे मात्र बंद झाले होते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला, २० नोव्हेंबर २०२२ ला नेव्ही मॅरेथॉन मुंबईचा मेसेज आला आणि डोक्यात परत मॅरेथॉन धावायचे चक्र चालू झाले. मनात मॅरेथॉन धावायचे येणे आणि प्रत्यक्षात मॅरेथॉन धावणे ह्यातले अंतर कितीतरी कोसाचे आहे.  तरीही दुसऱ्याच दिवशी पहाटे ५ वाजता उठून साडेपाचला धावण्याच्या सरावाला सुरवात केली. वाटले होते तेवढे सोप्पे नव्हते. जरा धावलो तरी थकायला होत होते. धावायचा सराव नसल्याने सगळेच अवघड वाटत होते. सुरवातीचा आठवडा असाच, नुसते सकाळच्या चालण्यातच गेला.

रोज डोळ्यासमोर आधी मिळालेली मॅरेथॉन मेडल्स दिसत होती. वयाच्या ५४  व्या वर्षी धावायला सुरवात करून डिसेंबर २०१४ ला गोव्याला १० किलोमीटर धाऊन मिळालेले माझे पहिले मॅरेथॉन मेडल मला खुणावत होते. त्याच्या बाजूला असलेले जानेवारी २०१५ ला स्टॅंडर्ड चार्टर्ड २१ किलोमीटर धावलेले मेडल मला स्फूर्ती देत होते. गेली दोन वर्षे मॅरेथॉन स्पर्धा झाल्या नसल्यातरी ऑक्टोबर २०२२ पर्यंत मिळालेली सगळी मिळून ४६ मेडल्स आणि दोन ट्रॉफी ह्यांचे प्रत्येकाचे एक स्वतःचे वजन होते, स्वतःचा संघर्ष होता, स्वतःची अशी एक गोष्ट होती. त्या प्रत्येक मेडल्सनी त्यांच्यासाठी मी घेतलेली मेहनत जवळून नुसती बघितली नव्हती तर त्यांनी माझ्या बरोबर ती अनुभवली होती आणि माझ्या प्रत्येक सेलिब्रेशनला माझ्या गळ्यात राहून मला साथ दिली होती. ती मेडल्स मला जोशात सांगत होती, “थांबू नकोस, हार मानू नकोस अजून ४ मेडल्ससाठी मेहनत घे म्हणजे आमचा ५० चा अर्ध शतकाचा टप्पा गाठल्याचे आम्हांला समाधान मिळेल.”

मोठ्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी धावायला निघालो पण गती काही मिळत नव्हती. एखादे किलोमीटर धावलो तरी थकायला होत होते. ऑक्टोबर २०२२ महिन्याच्या मध्यावर आलो तरी मनासारखे धावणे होत नव्हते. २० नोव्हेंबरला आता एकच महिना उरला होता. २१ किलोमीटर मॅरेथॉन न करता १० किलोमीटर धावावे आणि एक मेडल घेऊन यावे असे मनात आले होते पण त्याच वेळी एकदा का १० किलोमीटर धाऊन  खालच्या पायरीवर आलो तर परत २१ किलोमीटर धावणे कधीच जमणार नाही ह्याची भीती होती आणि… आणि शक्य होईल का नाही ह्याचा काहीही विचार न करता, जो वेड्यासारखा विचार, वयाच्या ५४ व्या वर्षी २०१४ ला केला होता त्याचेच पुन्हा अनुकरण करून नेव्ही मॅरेथॉन २१ किमी धावण्यासाठी रजिस्ट्रेशन केले. आता काहीही झाले तरी २१ किलोमीटर धावयाचेच असे मनाशी पक्के केले आणि दुसऱ्या दिवशीपासून जोमाने सरावाला सुरवात केली. 

२०१४ ला धावणे जसे चालू केले होते तसेच म्हणजे हळूहळू दर दोन दिवसांनी, एक तर किलोमीटरमध्ये एक एक किलोमीटरची वाढ करायची किंवा किलोमीटर सारखे ठेवून,  कमी वेळेत ते पार करायचे. असे करत पुढच्या १५ दिवसांत मी १० किलोमीटर पर्यंत पोचलो आणि माझा २१ कि मी धावण्याचा हरवलेला आत्मविश्वास मला परत मिळाला. पहिल्यासारखे जलद धावणे जमत नसले तरी २१ कि मी मॅरेथॉन मी पुरी करू शकतो ह्याची मला खात्री आली. 

२० नोव्हेंबरला २०२२ नेव्ही मॅरेथॉन मुंबई, मी २१ कि मी धावायला सुरवात केली. सुरुवातीचे काही कि.मी. मी जोरात न पळता मध्यम गतीने धावत होतो. शक्तीचा जोर लाऊन धावायचे मी टाळत होतो. १५ किलोमीटर पर्यंत मला कसलाही त्रास नव्हता. थकायला झाले होते पण जिद्दीने मी स्वतःला पुढे नेत होतो पण १६ व्या कि मी नंतर अंगातली शक्ती गेली आणि पुढचा ५ कि मी चा रस्ता मला खुप कठीण गेला. कसे बसे मी २१ किलोमीटरची अंतिम रेषा गाठली तेव्हा वेळ नोंदवली गेली,  २ तास ५५ मिनिट्स. आत्तापर्यंतच्या माझ्या मॅरेथॉन धाऊन नोंदविलेल्या वेळेचा तो नीचांक होता. माझे ४७ वे मॅरेथॉन मेडल माझ्या गळ्यात घातले गेले. ह्या ४७ व्या मेडलचे महत्व माझ्यासाठी, माझ्या २०१४ च्या पहिल्या मेडल सारखेच होते, फरक फक्त वयाचा होता आणि वयानुसार मिळालेल्या टायमिंगचा होता. माझे पहिले २१ कि मी मॅरेथॉन मी २ तास १४ मिनिटात पुरे केले होते. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आपण कसे धावतो ह्याला महत्व नसते तर तेथे जायचे, धावायचे आणि आपल्याला लक्ष असलेले अंतर धाऊन पुरे करून अंतिम रेषा गाठणे हेच खरे असते. 

– क्रमशः भाग पहिला 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ “पोशाख” हा जणू कवच—कुंडले… ☆ सौ राधिका भांडारकर 

माणसाचे नाव आणि माणसाचा पोशाख ही त्या व्यक्तीची पहिली ओळख असते.  केवळ पोशाखावरूनच त्याची जात, भाषा, प्रांत राष्ट्रीयत्व तसेच जीवन पद्धतीचाही अंदाज बांधता येतो.

 भारतामध्ये विविध पोशाख  परिधान केले जातात. पुरुषांचे वेगळे, स्त्रियांचे वेगळे. सदरा लेंगा किंवा धोतर आणि नऊवारी साडी म्हटलं की लगेच पारंपारिक महाराष्ट्रीयन स्त्री— पुरुष नजरेसमोर येतात. सलवार-खमीस, घागरा—ओढणी,  उलट्या पद्धतीची गुजराती साडी, दाक्षिणात्य पद्धतीचे विशिष्ट पोशाख, काठीयावाडी, राजस्थानी कितीतरी प्रकार!  अनेक रंगी, कलाकुसरींचे.   वेगवेगळ्या प्रकारचे पोशाख.पोशाख हा नुसता कपड्यांपुरताच मर्यादित नसतो, तर त्या त्या पोशाखावर साजेसे असे अलंकारही त्यानिमित्ताने घातले जातात.  आणि त्यामुळे अंगावर घातलेल्या कपड्यांची शोभा, लज्जत ही वाढते.  अशा परिपूर्ण पोशाखातील व्यक्ती ही आकर्षक, प्रसन्न भासते.  नीटनेटक्या पोशाखातल्या व्यक्तीचा सामाजिक प्रभाव हा लक्षवेधी असतो. 

कुणी कुठला पोशाख घालावा याबद्दलही आपले अगदी पूर्वापार संकेत आहेत. नेत्यांचा वेश, समाजसेवकांचे कपडे, कलाकारांचे कपडे, संगीतकाराचा पोशाख, कचेरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेश, क्वचित  कधीतरी ड्रेस कोड,(शर्ट,पँट,टाय किंवा पारंपारिक पोशाख),शेतकरी,गुराखी,  सणासमारंभाचे पोशाख, शाळेत जाणाऱ्या मुलांचे गणवेष हे सारे ढोबळ मनाने ठरलेलेच असतात.  आणि सर्वसाधारणपणे याच प्रकारची वेशभूषा सामाजिक स्तरावर ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे, परिधान केली जाते. 

पोशाख आणि वय याचाही संबंध आहेच.कुमारवय, तरुण, वृद्ध अशी विभागणी पोशाखाच्या बाबतीतही होतेच. आणि व्हायलाही हवी.  जे कपडे तरुणपणी शोभतात ते म्हातारपणी अशोभनीय वाटू शकतात.  सहजच आपण बोलतोच की “असे कपडे वापरताना जरा वयाचा तरी विचार करायचा ना? 

काहीजण मात्र बिनधास्त, बेलाशक पणे भडक, चित्रविचित्र कपडे घालण्यास मागेपुढे पहात नाहीत. वयाचा विचार करत नाहीत.  पण कधी कधी या लोकांना अशाच वेशात बघण्याची, बघणाऱ्यांना ही सवय होऊन जाते.

खरोखरच विशिष्ट पोशाखावरून माणसाची एक विशिष्ट प्रतिमाही निर्माण होत  असते. जागतिकीकरणामुळे मात्र आता “ड्रेसेस” या विषयात प्रचंड उलथापालथ झालेली आहे.        

पाश्चिमात्य कपड्यांचा दिमाख, सुटसुटीतपणाच्या नावाखाली सर्रास दिसू लागला आहे.  बदलत्या काळा नुसार, जीवनपद्धतीनुसार पोशाखातला बदलही तसा स्वीकृतच आहे.  पण त्यात केवळ अनुकरण नको.  जो वेश आपण घालू, तो तितकाच सहजपणे आपल्याला निभवताही  आला पाहिजे याचेही भान ठेवायला हवे. 

स्त्रियांमध्ये   पारंपारिक नऊवारी साडी हा आता कधीतरी हौसेने, खास प्रसंगी नेसण्याचाच प्रकार उरला आहे.  फार कशाला?.. साडीची जागा सलवार-कमीसने अगदी सहजपणे बळकावली आहे. टाॅप आणि जीन्स वरचढ झालेत.

आजकाल विनोदी ,हसवणुकीचे कार्यक्रम म्हटले की पुरुषांनी स्त्रियांच्या वेशातच पेश होणे. हे विडंबनही नकोसेच वाटते.विकृत,अतिरंजीत ,अश्लील वाटते.

पोशाखातले विविध बदल आता समाजाच्या अंगवळणी पडूच लागलेत.  त्याविषयी हरकत घेण्याचे ही काही कारण संभवत नाही.  पण गैर एका गोष्टीचं वाटतं— ज्यात केवळ परदेशी अनुकरण आहे, ते म्हणजे उद्युक्त करणारे, लांडेबांडे, तोकडे, शरीर प्रदर्शन करणारे अपुरे पोशाख!  कितीही डोळे झाक करायची म्हटली तरीही यामुळे आपल्या संस्कृतीतले काहीतरी घसरत चालल्यासारखे वाटते या पोशाखांमुळे.  “शेवटी ज्याची त्याची निवड”,” ज्याची त्याची मर्जी” किंवा “उगीच काकू बाईचा शिक्का नको बसायला”  म्हणून हट्टाने केलेला उपद्व्याप असेही असेल.  दृष्टीचा ही दोष असेल. ज्या पोशाखात, आपण एखाद्या युरोपियन स्त्रीला बघू शकतो तर भारतीय नारीला का नाही?   असा प्रश्न येऊच शकतो. कशासाठी या संस्कृतीच्या भिंती?—-

 —— पण तसं नाही. या नुसत्याच संस्कृतीच्या भिंती नाहीत, तर ती सभ्यतेची कवच कुंडले ही आहेत. 

नेहमीच दूरचे डोंगर साजरे दिसतात का?

मी अमेरिकेत असताना तिथली एक तरुणी मला म्हणाली होती,

” आंटी ! मला तुझ्यासारखी साडी नेसायला शिकवशील का? मला तुझा हा ड्रेस (साडी) फार आवडतो.  तू यात किती सुंदर दिसतेस !”

 —- नेमकं मला हेच म्हणायचे आहे. कपडे घाला कोणतेही ! पण समोरच्या व्यक्तीने अगदी सहज, मनापासून म्हटलं पाहिजे,

——–” तू किती सुंदर दिसतेस!”

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? मनमंजुषेतून ?

☆ “शरदागम”… लेखक – श्री विश्वास वसेकर ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

‘रघुवंश’ काव्यात कालिदासानं शरद ऋतूच्या आगमनाची खूण सांगितली आहे. शरद ऋतू सुरू झाला. त्याने पुंडरीकरूपी छत्र आणि काशतृणरूपी चामरे धारण केली.. पुंडरीक हे कमळ पावसाळा संपला की फुलू लागते. काश नावाच्या तृणास फुले येतात.

कवी अनिलांच्या तोंडून ‘शरदागम’ ही कविता मी अनेकदा ऐकली आहे. आभाळ निळे नि ढग पांढरे, हवेत आलेला थोडा गारवा, या शरदागमाच्या खुणा आहेत. साचून राहिलेल्या गढूळ पाण्याचे हळूहळू निर्मळ जळात रूपांतर होतंय आणि त्या आरशात डोकावून बाभळी आपलं सावळं रूप पाहतात. ज्वारी टवटवली आहे. काळी आता काळजी करते, की अजून कापूस का फुलत नाही? त्यासंबंधी अधिक चौकशी करायला निळे तास पक्षी खाली उतरतात. कुणीतरी शेवंतीच्या कानात सांगतं, अजून तुझी वेळ आलेली नाही. गवत अजून हिरवे आहे. त्याचे पिकून सोने होण्याआधी पिवळ्या फुलांची घाई करू नकोस. अनिलांच्या कवितेतली ही चित्रं निसर्गाच्या कॅनव्हासवर दिसायला लागली की समजायचे, ऋतुराज शरदाचे आगमन झाले. 

मोगरा आणि कुंद यांनी बरोबर सहा-सहा महिने वाटून घेतले आहेत. जानेवारी ते जून हे मोगर्‍याचे दिवस. जुलै ते डिसेंबर हे कुंदाचे दिवस. शरद ऋतू हा कुंद, शेवंतींच्या बहरण्याचा ऋतू आहे. काश या गवताची ओळख करून घ्यायला मी उत्सुक आहे. उसासारखे सुंदर तुरे येणारे ते गवत असले पाहिजे.                                                                              

शरद ऋतूचे वर्णन असलेल्या वसंत बापटांच्या ‘निचिंत’ या कवितेत काश फुलांचा उल्लेख आहे. बापट असतानाच त्यांना विचारायला हवे होते. बापटांची ‘सेतू’ ही प्रसिद्ध कविता शरद ऋतूची आहे. तिच्यातल्या प्रतिमा एकावेळी निसर्ग आणि प्रेयसी दोहोंनाही लागू पडणार्‍या आहेत. किंबहुना शरद ऋतूतील पहाटच सेतू होऊन कवीला ‘तिच्या’कडे घेऊन जात आहे. ….. 

‘ही शरदातील पहाट…. की….  तेव्हाची तू?

तुझीया माझीया मध्ये पहाटच झाली सेतू’ 

….‘सेतू’ ही माझ्या वाचनातील शरद ऋतूवरील सर्वांत सुंदर मराठी कविता आहे.                                                    

जिला मी दुसरा क्रमांक देईन ती इंदिरा संतांची कविता शरदातली दुपार चित्रांकित करते. ही निळी पांढरी शरदातली दुपार कशी आहे? तर तिचे ऊन तापलेल्या दुधासारखे हळूवार आहे. सव्वीस ओळींच्या मोठय़ा कवितेत शरदातील निसर्गाचे सुंदर तपशील आहेत. आणि हा शेवट….. 

‘का अशी विलक्षण इथे पसरली धुंदी?

का प्रसन्नता ही सुंदपणे आनंदी?

का गोड जाड्य हे पसरे धरणीवरती?

रेंगाळत का हे सौख्य विलक्षण भवती?

दिस भरलेली ही काय तरी गर्भार

टाकीत पावले चाले रम्य दुपार!’      

मराठी कवींप्रमाणे संस्कृत कवींनाही शरद ऋतू तितकाच प्रिय आहे. महाकवी कालिदासाला तो ‘रूपरम्या नववधु’सारखा सुंदर, टवटवीत वाटतो. ‘किरातार्जुनीय’ या भारवीच्या महाकाव्यात यक्ष अर्जुनाला म्हणतो, ‘हे अर्जुना, हा शरद ऋतू फलदायक असून तो परिश्रमांचा मोबदला फुलांच्या रूपाने देतो. या ऋतूत नद्या, सरोवर यांचे जल स्वच्छ व नितळ असते. मेघ शुभ्र असतात. असा हा शरद ऋतू तुझ्या सफलतेचे व्रत वृद्धिंगत करो !’

पूर्णता आणि परिपक्वता यांची प्रतिमा होऊन शरदातले मेघांनी धुतलेले आकाश रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांतून येते.  पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या ‘मुक्काम शांतिनिकेतन’ मध्ये आश्रमातल्या शरद ऋतूचे वर्णन केले आहे, तेही रवींद्रनाथांच्या पत्राद्वारा. भानूसिंहेर पत्रावलीच्या अकरा क्रमांकाच्या पत्रात गुरुदेव लिहितात, ‘आज बागेत हिंडताना मालती फुलांचे हे ‘अनुप्रास’ पाहायला मिळाले.’ 

शरद ऋतू हा रात्रींच्या सौंदर्याचा ऋतू आहे. आकाशातली निळाई हळूहळू स्पष्ट आणि गडद होते. तारांगण निरखावे शरदाच्या रात्रीच. या रात्रीही मोठय़ा असतात. इतर कोणत्याही ऋतूंना रात्रीच्या सौंदर्याचं हे वरदान नाही, म्हणून तर कालिदासाने या ऋतूतील रात्रींना ‘ज्योतिष्मती रात्र’ म्हटलं आहे. शरदात येणारे सणदेखील रात्रींशी निगडित आहेत. कोजागरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दिवाळी हे रात्रीचेच उत्सव आहेत.

चकोर पक्ष्याचं मला भारी आकर्षण वाटायचं; पण तो म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू किंवा परीस यांसारखी कवीकल्पनाच असावी, असा समज. शरद ऋतूच्या चंद्रकलेचे कोवळे अमृतकण चकोर खातो. याचे सुंदर वर्णन ज्ञानेश्‍वरीच्या पहिल्या अध्यायात येते.                                                                    

मारुती चितमपल्लींनी चकोर नाकारला तर नाहीच; पण त्याचे विज्ञान सांगून कवीकल्पनेला शास्त्रीय पुस्ती जोडली आहे. शरद ऋतूत चकोरीची पिल्ले तिच्याबरोबर जंगलात फिरत असतात. वाळवीच्या किड्यांना सूर्यप्रकाश सहन होत नाही म्हणून वारुळातून वाळवी रात्री बाहेर पडते. आपल्या पिलांची जलद वाढ व्हावी म्हणून चकोरी पिलांना वाळवी चारते. शरद ऋतूतल्या चंद्राच्या प्रकाशात चकोराला वाळवी सहज दिसते. हे दृश्य पाहून कवींना वाटते, की चकोर चांदणेच टिपत आहेत ! मी ग्रंथप्रेमी असल्याने वाळवी खाणार्‍या चकोरांबद्दल आता कृतज्ञता वाटते.

शरदातल्या चंदेरी रात्री जेवढय़ा सुंदर, तेवढाच शारद रात्रींतला अंधारही प्रियतम आणि मोहमयी असतो. अंधार ही प्रेम करण्यासारखीच गोष्ट आहे हे शरदातल्या रात्रीच   पटते, हे अरुणा ढेरे यांचे म्हणणे आहे आणि ते अगदी खरे आहे…. 

‘पर्वतों के पेडों पर शाम का बसेरा है. 

चंपई उजाला है, सुरमई अंधेरा है !’

 …. हे साहिरचं वर्णन एखाद्या शारद सुंदर रात्रीलाच उद्देशून असलं पाहिजे. सुरम्यासारखा अंधार ! व्वा ! कोजागिरीची रात्र म्हणजे चंपई उजाला आणि दिवाळीची रात्र म्हणजे सुरमई अंधेरा !

शरद ऋतूचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते म्हणजे तिन्ही ऋतूंचा त्यात झालेला संगम. पावसाळ्याच्या सत्तावीस नक्षत्रांपैकी तीन नक्षत्रं तरी शरद ऋतूत येतात. दसर्‍याला जेव्हा आपण शिलंगणाला जातो, तेव्हा गावाच्या सीमेवर येऊन बसलेलं ‘हींव’ शिलंगणावरून परत येताना आपल्यासोबत गावात, घरात येतं आणि हिवाळा सुरू होतो. याच शरदऋतूत विश्‍वामित्राचा उन्हाळाही होऊन जातो, त्यालाच अलीकडे ‘ऑक्टोबर हीट’ म्हणतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळ्याचा त्रिवेणीसंगम म्हणजे शरद ऋतू. 

लेखक :  -प्रा. विश्‍वास वसेकर 

लेखक साहित्यिक आहेत.

प्रस्तुती : मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

??

☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

मराठी मातृभाषादिनाच्या निमित्ताने….. 

फेसबुक, व्हाॕटस् अॕपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी, तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.

स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे. 

आतपुढ (आले तसे पुढे ढकलले) ही व्हाॕटस् अॕप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात. 

आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हेही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे. 

आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल, त्यांना याविषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.

त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे  ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते ! 

याला काय करायचे ! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो, इंग्रजी असो, वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा. 

लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते !

समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘काॕपी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे. 

लेख लिहिताना, ‘घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते’ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे’ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे, हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजीकाट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.

‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर’, ‘उसमे क्या है’, ‘उससे क्या फरक पडता है’,  ‘चलता है याsर’, ‘टेक इट ईझी’ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचूकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य  आहे. 

अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.

मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही  किती परकीय शब्द, किती ऊर्दू , किती इंग्रजी शब्द! 

इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’ , please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?

आपली दैनंदिन विचारविनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी, येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?

एका हिंदी लेखातील अवतरण…

… ‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोगमें लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजीके शब्द बोलते है। हर हिंदीप्रेमी इस लेखको पढ़नेके बाद अपने मित्रोंके साथ साझा अवश्य करे। ‘

अवतरण समाप्त

आपण मराठीतही अनेक उर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का, की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा, ह्या सूचनेचा.

अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, अभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग?

समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेवून आता इथेच थांबणे उचित समजतो. 

व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर ! तो पर्यंत नमस्कार !!

लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे

व्हाॕटस् अॕपः  ९२८४३००१२५

संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ

??

☆ मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी … सुश्री पल्लवी पाटणकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆

मानसिक त्रासातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक मूलभूत पायर्‍या.    

एकाच जोकवर आपण परत परत हसत नाही. तर मग एकाच दुःखावर आपण परत परत का रडतो?

कधी विचारलं आहे आपण स्वतः ला की आपण एकाच दुःखावर वारंवार का विचार करतो, आणि जर करतोय हे जाणवते आहे तर मग त्यातून बाहेर पडण्यासाठी स्वतः ची मदत कशी आणि किती करतोय?

मानसोपचाराच्या क्षेत्रात गेली 15 वर्षे सतत काम करताना मला ही गोष्ट नेहमीच जाणवत राहिली की आपण सगळेच आपल्याला किती आणि कसा त्रास होतोय, कोणामुळे होतोय हे पुनःपुन्हा बोलत असतो आणि त्या प्रत्येक वेळी पुनःपुन्हा स्वतः ला नकारात्मक विचारांमधे घेऊन जात असतो. हे अगदी नकळतच होते, पण त्याने त्या प्रत्येक वेळी होणारा त्रास मात्र अधिकाधिक वाढतच राहतो हे लक्षात येत नाही.

भावनिक त्रास कमी करायचा असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण किती दुर्दैवी आहोत, आपल्यावर कसा अन्याय झाला आहे, कोणी आपला किती छळ केलाय, आपणच किती भोगलय, किती असह्य झालय आणि आपला कसा बळी गेलाय किंवा आयुष्याची कशी माती झालीय त्यामुळे आता काही होऊ शकणार नाही इत्यादी…… सगळे स्वतः ला सांगणे पुर्णपणे बंद करणे.

आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे मला हेच तर जमत नाही, हे विचार बंद करणं इतक सोपं असतं तर मी केव्हाच केलं असतं ना असेही स्वतः ला सांगणे थांबवले तरच एक पाऊल पुढे म्हणजेच प्रगतीच्या, भावनिक सौख्याच्या दिशेने जाता येईल.

स्वतः ला आपणच देत असलेले नकारात्मक संदेश बंद करणे ही उपचाराची पहिली पायरी म्हणूया.

मग दुसर्‍या पायरीवर काय येईल तर आपण स्वतः ला काय सांगावे याचा सराव करणे. हा सराव तुम्हाला रोज काही सकारात्मक तार्किक विचार लिहून करता येतो आणि दीर्घ श्वसन करून शांत झालेल्या मनालाही स्वयं सूचना देऊन करता येतो.

१. मी एक सामान्य व्यक्ति आहे जी नकारात्मकतेकडे जाऊ शकते, खचू शकते, दुखावली जाऊ शकते. पण तरीदेखील हे दुःख म्हणजे माझे सर्व आयुष्य नसून हा माझ्या आयुष्यातला एक छोटासा हिस्सा आहे, ज्यातून मी अगदी सहजपणे बाहेर पडू शकेन.

२. माझा स्वतः वर ठाम विश्वास आहे की मी प्रत्येक संकटातून यशस्वीपणे बाहेर पडू शकेन.

३. कोणत्याही दुःखाचा माझ्यावर अंमल चढू न देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याची मानसिक शारीरिक ताकद माझ्यात आहे यावर माझा संपूर्ण विश्वास आहे. 

४. ज्या गोष्टी चे दुःख, त्रास आहे ती सोडून माझ्या आयुष्यात इतर खूप महत्त्वाच्या गोष्टी आणि प्राधान्य आहेत ज्यावर मी माझे लक्ष केंद्रित करून तिथे माझी शक्ति वापरून त्यातला आनंद वाढवू शकेन.

५. कोणी माझ्याशी कसे वागले याचा विचार करण्यापेक्षा मी नको असलेल्या, इतरांच्या नकारात्मक वागण्याला महत्व न देणे यावर माझा पूर्ण ताबा आहे.

६. भूतकाळात जे काही घडले त्यावर मात करून वर्तमानात जगण्याची आणि त्यातून आनंद मिळवण्याची क्षमता माझ्यात आहे.

आता तिसरी पायरी म्हणजे या विचारांचा लिहून आणि स्वयंसूचना देऊन अगदी नियमितपणे श्रद्धेने सराव करणे. करताना मात्र याचा कधी फायदा होईल, होईल की नाही, किती दिवस करावे लागेल असे जर पुन्हा नकारात्मक विचार केले, तर मग जे काही कराल त्याचा फायदा मिळत नाही. खूप प्रयत्न केले पण आमचा त्रास कमी होत नाही असे जेव्हा लोक म्हणतात, तेव्हा त्यामागे मूळ कारण हे आहे की प्रयत्नांमध्ये सातत्य नसते, विश्वासाचा अभाव असतो आणि जे प्रयत्न आहेत त्याबद्दल साशंकता असते.

जर योग्य दिशेने, योग्य प्रमाणात, संपूर्ण सकारात्मकतेने प्रयत्न केले तर नक्किच आहे त्या भावनिक त्रासातून बाहेर पडता येईल हे सगळ्यांपर्यंत पोहोचावे या प्रामाणिक उद्देशाने लिहिलेला हा लेख.

धन्यवाद . 

लेखिका :  सुश्री पल्लवी पाटणकर

(Psychotherapist) 

संग्राहिका : सुश्री स्नेहलता गाडगीळ

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “बॅग कशी भरायची?…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆

? मनमंजुषेतून ?

☆ “बॅग कशी भरायची?…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने

आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी….  

बॅग कशी भरायची ते *आता मला कळले आहे ! *

फापट पसारा आवरून सारा , 

आता सुटसुटीत व्हायचं  आहे  !

 

याच्यासाठी त्याच्यासाठी , हे हवं , ते हवं 

इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं  नवं 

हव्या हव्या चा हव्यास आता  प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे, 

*बॅग हलकी स्वतः पुरती * आता फक्त ठेवायची आहे ! 

बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! 

 

अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो 

*आयुष्याच्या होल्डॉल मध्ये *काय काय कोंबत होतो !

किती बॅगा किती अडगळ ! साठवून साठवून ठेवत होतो 

काय राहिलं, कुठे ठेवलं आठवून आठवून पाहत होतो 

त्या त्या वेळी ठीक होतं आता गरज सरली आहे, 

कुठे काय ठेवलंय ते ते *आता विसरून जायच आहे *

बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे ! 

 

खूप जणांनी खूप दिलं .. सुख दुखाःचं भान दिलं 

आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे !

मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’ यातून बाहेर पडायचं आहे !

बॅग कशी भरायची ते  *आता मला कळले आहे ! *

 

आत बाहेर काही नको .. आत फक्त एक कप्पा, 

जना – मनात एकच साथी सृष्टी करता एकच देवबाप्पा ! 

सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे !

रिक्त -मुक्त होत होत अलगद विरक्त होत जायचं आहे .

… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे… 

… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे… 

 

लेखक : अज्ञात

संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆

डाॅ. शुभा गोखले

अल्प परिचय 

शालेय शिक्षण: मराठी माध्यमातून हुजूरपागा, पुणे

M.Sc. आणि  Ph.D. (Physics), पुणे विद्यापीठ

LLM (Intellectual Property Rights -IPR), Turin University, Italy

इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालयात भौतिकशास्त्र प्राध्यापिका

छंद: निसर्ग निरीक्षण, शास्त्रीय संगीत श्रवण, मराठी-इंग्रजी ललित वाचन, फोटोग्राफी, Facebook blogger

? मनमंजुषेतून ?

☆ सापेक्ष दृष्टीकोन… ☆ डाॅ. शुभा गोखले ☆ 

एखादी मुलगी आणि मुलगा यांना टाळ्या देत हसतखेळत भेळ खाताना पाहून बहुतेक कपाळांवर ‘ काय हा थिल्लरपणा ‘ – असं म्हणणाऱ्या आठ्या उमटतात. पण त्याचवेळेला एका कोपऱ्यात उभे असलेले त्यांचे आई-बाबा, नुकतीच दृष्टी मिळालेल्या आपल्या धाकट्या बहिणीला भेळ खायला घालत, समोरच्या समुद्रात वेगाने जाणाऱ्या मोटर-बोटी दाखवणाऱ्या आणि एकमेकांना टाळ्या देऊन एन्जॉय करणाऱ्या दादाचं कौतुकच करत असतात….  म्हणजेच पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनावर सगळं अवलंबून असतं!

तसंच काहीसं  गेले काही आठवडे WA/FB व इतर माध्यमांतून आपल्यावर भडिमार होणाऱ्या गुरू-शुक्र युतीचं ! ……. सूर्यापासून ७८ कोटी किलोमीटर वरचा गुरू हा आकारानी सगळ्यात मोठा असलेला भाऊ, तर ११ कोटी किलोमीटर वर असणारा शुक्र …  हे दोघेही आपापल्या कक्षांमधून आपापल्या वेगाने सूर्याभोवती प्रदक्षिणा करत असतात ! गुरूला एका परिक्रमेला साधारण ११. ८ वर्षं,  तर शुक्राला केवळ २२५ दिवस लागतात…. असे परस्परांशी फारसा संबंध नसलेले ग्रह आपला क्रम आक्रमित असताना, त्या  दोघांनाही कल्पनाही नाहीये, की सूर्यापासून १५ कोटी किलोमीटर वर असलेल्या आपल्या पृथ्वी नावाच्या बहिणीवर वास्तव्य करणारे माणूस नावाचे प्राणीमात्र त्यांच्याकडे दुर्बिणी रोखून बसले आहेत ! 

कारण काय …  

… तर पृथ्वीवरून या दोघांच्या आपापल्या कक्षांमधल्या  आजच्या स्थिती अशा रीतीने एका सरळ रेषेत आल्यात की वाटतंय, ते एकमेकांच्या खूप जवळ आलेत. यालाच विज्ञानात ‘ युती  असे म्हणतात. ही स्थिती फक्त पृथ्वीच्या आजच्या सापेक्ष स्थानामुळे दिसतेय. अवकाशातल्या इतर कुठल्याही बिंदूवरून ते दोघे अगदी सुट्टे-सुट्टे दिसतील.

म्हणूनच म्हटलं दृष्टीचा-कोन महत्वाचा ! …. पटतंय का?

(फोटो सौजन्य : डॉ. गौरी दळवी, फ्लोरिडा. )  

© डॉ. शुभा गोखले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

सौ. उज्ज्वला केळकर

?मनमंजुषेतून ?

☆ शिवरात्र आणि ऊसाचा रस – सुश्री विनीता क्षीरसागर ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆

पूर्वी शिवरात्र आणि उसाचा रस हे जणू समीकरणच ठरलेले होते. म्हणून लहानपणी आम्ही अगदी वाट बघत बसायचो, शिवरात्रीची….!                     

पूर्वी उपवासाचे पदार्थ अगदी पोटभर असे मोठी एकादशी, शिवरात्र, अशा मोठ्या उपवासालाच मिळायचे………….! नाहीतर एरवी मोठ्या माणसांना फराळासाठी केले की एकेक घास हातावर मिळायचा…….! आता कसे आपण एरवी सुध्दा साबुदाणा खिचडी करतो..! किंवा बाहेर हॉटेलमध्येसुध्दा खिचडी, साबुदाणा वडे इ… सगळे काही मिळते……! पूर्वी अगदी आई, आजी राजगिऱ्याच्या लाह्या सुध्दा घरी फोडायच्या……!                                                                        

शिवरात्रीला आजीबरोबर  सगळ्यांनी रामेश्वर मंदिरात जायचे….. आल्यावर साबुदाण्याची खिचडी, बटाटा भाजी, कवठाची पाट्यावर वाटलेली चटणी, घरी केलेल्या तळलेल्या पापड्या, खाडिलकरांकडून विकत आणलेले ताक, रताळयाचे गुळाच्या पाकातले काप ह्यावर अगदी पंगत मांडून यथेच्छ ताव मारायचा एवढेच होते…!

नंतर दुपारी सगळी मोठी मंडळी डाराडूर पंढरपूर म्हणून झोपून जायची………..! घरातली लहान मुले मात्र केव्हांच एकदाचे साडे चार  वाजून जातायत  ह्याची वाट बघत घड्याळ बघत बसायची……! कारण  दुपारी पाच वाजून गेले की घरी उसाचा रस आणायचाच हे शिवरात्रीला ठरले असायचे…..! तोही एक कार्यक्रम च असायचा….! स्टीलची एखादी मोठी लोटी घेऊन गुऱ्हाळात जायचे, जाताना बर्फासाठी एखादा मोठा कापडी रूमाल किंवा पिशवी घेऊन जायची……!  त्या वेळी आमच्या घराच्या जवळ म्हणजे धर्म चैतन्याच्या कोपर्‍यावर एक गुऱ्हाळ सुरू झालेले असायचे. तट्टे ठोकून केलेल्या भिंतभर रंगीबेरंगी कॅलेंडर्स, देवांची चित्रे लावलेल्या त्या गुऱ्हाळात जायला खूप छान वाटायचे……..! आई त्याला गेल्या बरोबर “ताजा काढून देरे बाबा रस” म्हणून बजावायची….. तसेच न विसरता त्यात आले लिंबू टाकायला सांगायची……….! त्याचा रस चक्रातून काढणे……., भुश्श्यातला तरटात गुंडाळलेला बर्फ फोडणे हे जवळून बघायला खूप मजा वाटायची…..!  त्या वेळी फ्रीज नव्हते म्हणून बर्फ बाहेरून च विकत घ्यावा लागे……………! गुऱ्हाळात सुध्दा बर्फाचे वेगळे पैसे द्यावे लागत……! … असे सगळे करून एकदाचा रस घरी यायचा……….!                                 घरातले चहाचे कप रसासाठी सज्ज असायचे….! बर्फ पाण्याने स्वच्छ धुवून फोडून झाला की रसाचे कप भरून सगळयांना रसाचा वाटप व्हायचा……!..

….. रस पिऊन मन तृप्त व्हायचे व आता खरी शिवरात्र साजरी झाली असे वाटायचे………! दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर “काल आमच्या कडे उसाचा रस आणला होता.” हे न चुकता सांगण्यात एक धन्यता वाटायची…………! कारण पूर्वी उसाचा रस पिणे ही सुध्दा एक चैनच वाटायची……..! बैलाच्या चरकावरचा रस पिण्यासाठी आम्ही सगळे… घरातले लोक  लक्ष्मी रोड जवळच्या इलेक्ट्रिक आॉफीसजवळच्या गुऱ्हाळात जायचो…….! ते सुध्दा सगळ्यांच्या वार्षिक परीक्षा झाल्यावर बरं का………!

लेखिका : सुश्री विनीता क्षीरसागर

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170 ईमेल  – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? मनमंजुषेतून ?

☆ “मला भावलेलं इंग्लंड” ☆ श्री मोहन निमोणकर ☆

मागच्या वर्षी मी आणि बायको संजीवनीची इंग्लंडला जायची तिसरी वेळ होती. मुलगा आशिष फिजिओथेरपीमध्ये एम.एस. करून तिथं नोकरी करतोय, तर सून निवेदिताही तिथंच वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करते. दोघांनी तिथं नवीन संसार सुरु केल्यानं त्यांचं कौतुक करायला आणि चिरंजीव अभिनवला भेटायला आम्ही इंग्लंड गाठलं.

इंग्लंडमध्ये भौगोलिकदृष्ट्या पाहण्यासाठी ब-याच गोष्टी आहेत. पण यंदा आम्हाला तिथल्या सामाजिक आणि सार्वजनिक गोष्टी खूपच भावल्या. किंबहुना याच तिथलं वेगळेपण सिध्द करायला पुरेशा ठरल्या. एखाद्या देशाची ठरलेली जीवनशैली आणि स्वभाव असतो, यामध्ये इंग्लंड खरंच चारचौघांपेक्षा भिन्न ठरतो.

इंग्लंडमध्ये ढोबळमानानं चार ऋतू आहेत. समर, ऑटम, विंटर आणि स्प्रिंग. समरमध्ये पहाटे पाच वाजताच उजाडतं आणि रात्री १० वाजता अंधार पडतो. ऑटम, विंटर आणि स्प्रिंगमध्ये उशीरा उजाडतं आणि अंधारही लवकर म्हणजे दुपारी चार वाजताच पडतो. विंटरमध्ये तापमान सर्वात जास्त म्हणजे पाच ते सहा अंश तसंच कमी म्हणजे उणे असतं. इंग्लंड उत्तरध्रुवाजवळ असल्यानं तिथं खूप थंडी असते. समरमध्ये मात्र तापमान १८ अंश झालं, तरी लोकांना उष्णतेची लाट आल्यासारखं वाटतं. आम्हाला इथं एक गोष्ट नवीन वाटली. ती म्हणजे, दिवस लवकर वा उशीरा उजाडण्याचा, मावळण्याचा दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये म्हणून वर्षातून दोनदा घड्याळ ऍडजस्ट केलं जातं. मार्च महिन्याच्या शेवटच्या रविवारी घड्याळ एक तास मागं करतात. सार्वजनिक बागांमध्येही बागा उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या वेळा उजेडानुसार बदलतात. तशा प्रत्येक महिन्याच्या वेळांचा बोर्ड आगाऊच लावलेला असतो. वर्षभरात पाऊस कधीही येतो; परंतु वेगळा असा पावसाळा हा ऋतू इथं नाही.

इंग्लंडची वाहतूक व्यवस्था जगातील उत्तम व्यवस्था म्हणावी लागेल. महाग आहे; पण अतिशय उत्तम. रेल्वेचं नेटवर्क हे खाजगी कंपन्यांकडे सोपवलंय. त्या कंपन्या म्हणजे सदर्न रेल, साउथ इस्टर्न रेल्वे, नॉर्दन रेल, ग्रेट वेस्टर्न रेल्वे आणि व्हर्जिन रेल्वे. या पाच खाजगी कंपन्या सर्व युकेचा रेल्वेचा प्रवास सांभाळतात. रेल्वे डब्यांची स्थिती अतिशय उत्तम. दारं आपोआप उघड-बंद होतात. त्यामुळे पळत येऊन गाडीला लटकत गाडी पकडणं हा प्रकार नवीन नाही. याव्यतिरिक्त लंडन ट्यूब रेल्वेही म्हणजे ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ इतर कंपन्यांचा भार हलका करते. ‘ट्रान्सपोर्ट फॉर लंडन’ ही खाजगी कंपनी इंग्लंडमधील बसवाहतूक सांभाळते. बसमध्ये लहान मुलांच्या बाबा गाड्यांनाही प्रवेश प्राधान्यानं असतो. चढण्या-उतरण्याचे मार्ग वेगवेगळे असतात, शिवाय उतरण्याचा आपला स्टॉप येण्यापूर्वी आपल्या सीटजवळील बटण दाबलं, की ड्रायव्हरला मेसेज जातो आणि तो बस स्टॉपवर थांबवतो. ड्रायव्हरच तिकिटं पाहतो आणि काढतोही.

रेल्वे आणि बसच्या तिकिटांचे दर हे वेळेनुसार (गर्दीच्या) कमी-जास्त असतात. तसंच, शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी कमी असतात. एखादी ट्रेन रद्द झाली आणि रात्रीनंतर ट्रेन नसेल, तर पर्यायी व्यवस्था स्टेशनबाहेर केलेली असते. नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत वा-यावर सोडलं जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये पादचा-यांना फार महत्त्व दिलं आहे. रस्ता क्रॉस करण्यासाठी ‘सेल्फ ऑपरेटेड सिग्नल्स’ आहेत. या गोष्टी आम्हाला खूपच भावल्या. एखाद्याला कार रिव्हर्स घ्यायची असेल आणि तो रस्ता कितीही वाहता असेल, तरी त्याचं रिव्हर्स घेणं पूर्ण होईपर्यंत सर्व गाड्या थांबतात आणि कुणीही हॉर्न वाजवत नाहीत, हे विशेष. रस्ते आपल्याएवढेच, तरीही लहान-मोठी वाहनं बिनबोभाट जा-ये करत होती. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कठीण अशा परीक्षेला सामोरं जावं लागतं. पहिल्या फटक्यात लायसन्स मिळणारा अगदी विरळाच.

आपल्या घराबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायलाही वर्षाला ४० पौंड द्यावे लागतात. ठिकठिकाणी पार्किंगच्या सोयी केल्या आहेत. गर्दीच्या वेळी पैसे आणि एरवी फुकट! वीज आणि गॅस वापरण्यासाठी बिलिंगची पध्दत नाही, तर एक प्रीपेड कार्ड असतं आणि त्यात जेवढा टॉप अप तुम्ही केला असेल तेवढीच वीज आणि गॅस तुम्हाला वापरता येतो. केंटमधल्या ग्रेव्हज् एंड इथं आमचं वास्तव्य होतं. लंडनपासून रेल्वेनं एक ते दीड तासाच्या अंतरावर दक्षिणेला हे ठिकाण आहे. त्या शहरात कचरा संकलनाची अतिशय उत्तम सोय आहे. प्रत्येक भागासाठी आठवड्यातून एक ठराविक वार कचरा संकलनासाठी ठरवलेला असतो. दोन मोठ्या पेट्या त्यासाठी कौन्सिलतर्फे पुरवल्या जातात. एकात रिसायकल होणारा आणि दुस-यात रिसायकल न होणारा असं एकआड एक दर आठवड्यानं असं कचरा संकलन केलं जातं. रिसायकल होणा-या गोष्टींची आणि न होणा-या गोष्टींची यादी कौन्सिलतर्फे वेळोवेळी प्रसिध्द केली जाते.

इथं दैनंदिन जीवनातल्या ब-याच गोष्टी स्वत:च्या स्वत:ला कराव्या लागतात. नोकर-चाकर, मोलकरीण कुणी ठेवत नाहीत. कुणी ठेवलीच, तर त्यासाठी खूप पैसे मोजावे लागतात. त्यामुळे भांडी घासणं, घराला रंग देणं, सायकलचं पंक्चर काढणं, सायकल आणि कारमध्ये हवा भरणं इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. एवढंच काय, तर पेट्रोल पंपावर पेट्रोलही आपल्यालाच भरायला लागतं. नंतर बिल दुकानात नेऊन द्यायचं. आशिषनं कार खरेदी केल्यावर दुस-याच दिवशी तो आणि निवेदिता पंपावर जाऊन पेट्रोल कसं भरायचं हे शिकून आले होते. घरात पाहुणे आल्यावर, आपल्याला जेवणानंतर भांडी घासताना पाहून तेही पहिल्या दिवसानंतर आपल्याला आपोआप मदत करू  लागतात.

इंग्लंडमधील अशा ब-याच गोष्टी आपल्याला भावतात. त्यांचं अप्रुप आपल्याला वाटतं. तरीही अखेर आपलं आपल्या मातीशी असलेलं घट्ट नातंच वरचढ ठरतं. तीन महिन्यातच आपल्याला मायदेशातील घराची आठवण येते आणि सहा महिने काढायचे असले, तरी काऊंटडाऊन तेव्हाच सुरु होतं, परतण्यासाठी ..…

         

 ©️ श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print